1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

कॉलेज-प्रवेश

भाग पांचवा : ‘क़ॉलेज शिक्षणाचा काल’
प्रकरण २१ वें
इ. स. १८९३ चे आरंभापासून तो इ. स. १८९८ अखेर सहा वर्षें मी पुणें येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतों. ह्या काळाचे दोन भाग पडतात. प्रिव्हियस आणि इंटरमिजियट परीक्षांचा पहिला भाग; आणि बी. ए. आणि एल्. एल्. बी. च्या परीक्षेचा दुसरा भाग. ह्या दोन भागांत माझ्या घरची स्थिति, सांपत्तिक स्थिति, मनःस्थिति व देशस्थिति वगैरे अनेक कारणांमुळें बराच भेद पडला आहे. घरची अत्यंत गरिबी, तशांत मागें सांगितल्याप्रमाणें जमखंडीच्या ब्राह्मण संस्थानिकांशीं वाद होऊन त्यांनीं आपल्या हायस्कुलांतून शिक्षकाचे नोकरीवरून एकदम कमी केल्यामुळें निराधार होऊन मी पुण्यासारख्या विस्तीर्ण शहरांत कोणाची ओळख ना पाळख असा आलेला. त्या माझा फर्ग्युसन कॉलेजमध्यें कसा प्रवेश मिळाला ह्याचें मला अद्यापि आश्चर्य वाटतें. हायस्कुलांतील सहाव्या यत्तेंतील माझे शिक्षक रा. वासुदेवराव चिरमुले बी. ए. ह्यांनीं, पुणें येथें गरीब मराठा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे बाबतींत मदत करणारी एक संस्था आहे, असें सांगितलें म्हणून केवळ माझे नशीबाची परीक्षा करण्याकरितां मी ह्या अफाट शहरांत कसा तरी येऊन पडलों.
त्यावेळीं माझ्या वयाचें विसावें वर्ष देखील अद्यापि पुरें झालें नव्हतें. मॅट्रिकच्या परीक्षेकरितां मी पुण्यास इ. स. १८९१ चे अखेरीस फार तर एक आठवडा राहिलों असेन. पण परीक्षेच्या घाईंत ह्या शहरांतील परीक्षेच्या मंडपापलीकडे अधिक माहिती होणें संभवनीय नव्हतें. आमचे हायस्कूलचे हेडमास्तर रा. त्रिंबकराव खांडेकर ह्यांना मी आवडत असें. माझी नोकरीवरून कांहीं अपराध नसतां श्रीमंत संस्थानिकांनीं एकदम हाकालपट्टी केली ह्याबद्दल त्यांना वाईट वाटलें; पण त्यांनाही मराठ्यांना कॉलेजांत स्कॉलरशिप देणा-या पुणें येथील संस्थेची कांहींच माहिती नव्हती. रा. चिरमुले ह्यांनीं दिलेली अगदींच त्रोटक व अपुरी माहिती सांगितल्यावर त्रिंबकराव खांडेकरांचे एक बंधु पुण्यास वकील होते; त्यांना एकादें माझ्या ओळखीचें पत्र दिलें असेल कीं काय हेंही मला आतां आठवत नाहीं. ह्या वकिलाचा एक मुलगा जमखंडी हायस्कुलांत शिकण्यासाठीं कदाचित् आपल्या चुलत्यांकडे राहण्यासाठीं आला असावा; त्याचेशीं थोडी माझी ओळख होती. पण त्याची भेट होऊन त्याच्याकडून किंवा त्याच्या वडिलांकडून मला विशेष मदत झाली असेल असें कांहीं मला वाटत नाहीं. पुण्यास गरीब मराठ्यांना कॉलेजांत मदत करणारी डेक्कन मराठा असोशिएशन नांवाची संस्था आहे व तिचे संस्थापक व सेक्रेटरी रा. गंगाराम भाऊ म्हस्के ह्या नांवाचे एक मराठा जातीचे इंग्रजी शिकलेले पुढारी गृहस्थ प्रसिद्ध वकील आहेत वगैरे माहिती रा. खांडेकर वकिलांनीं मला दिली असावी. तरी पण पुण्यास आलेल्या माझी खेडवळाची कोणीं कशी राहण्याची तात्पुरती कां होईना सोय केली हें कांहींच मला आठवत नाहीं. ह्यावेळीं सदाशिव पेठेंतल्या हौदाच्या रस्त्यावरील फडतरेच्या वाड्यांत मी थोडे दिवस होतों. एवढीच अंधुक आठवण मला आतां येत आहे.

गं. भा. म्हस्के
गंगाराम भाऊ म्हस्के ह्या गृहस्थाचे मराठा जातीवर मोठे उपकार आहेत. त्या पूर्वकाळचे एक फरडे इंग्रजी शिकलेले, सुधारकी बाण्याचे हुषार वकील अशी ह्यांची प्रसिद्धि होती. ह्यांचे पुणें लष्करांत मेनस्ट्रीटवर मोठें चांगलें स्वतःचें घर आहे. रानडे, भांडारकर वगैरे त्या काळच्या सुधारक पक्षांत ह्यांची चांगली मान्यता होती. वकिलींत ह्यांनीं बरेच पैसे मिळविले होते. हिराबागेंत असलेल्या कॉस्मॉपॉलिटन क्लबच्या दिवाणखान्यांत पुण्याच्या तत्कालीन मोठमोठ्या माणसांच्या मोठमोठ्या तैल तसबिरी टांगल्या आहेत. त्यांत ह्यांचीही एक तसबीर अद्याप लटकत आहे. ह्यांची मराठे संस्थानिक, राजे व इतर जातींचे प्रागतिक शिक्षणप्रेमी श्रीमंत गृहस्थांत त्या काळीं छाप होती. त्यांच्याकडून मदत घेऊन ह्यांनीं व ह्यांचे दुसरे एक लष्करांत राहणारे राजन्ना लिंगो नांवाच्या वकिलांनीं ही ‘डेक्कन मराठा असोसिएशन’ संस्था काढली होती. पण ही सारी माहिती माझेसारख्या पुण्यांत नवीनच आलेल्या तरुणाला त्यावेळीं असणें शक्य नव्हतें. एके दिवशीं रा. म्हस्केसाहेबांना भेटावयाला मी पुणें लष्करांत गेलों. त्यावेळीं पुण्याशिवाय त्या तोडीचें दुसरें शहर मीं पाहिलें नव्हतें. त्यामुळें मेनस्ट्रीटचा भव्य रस्ता त्यांतील दोन तीन मजली घरें, परदेशी मालांनीं भरलेलीं तेथील बोह-यांचीं दुकानें आणि इतर लष्करांतील रस्ते शोभा पाहूनच माझे डोळे दिपले होते! अशा स्थितींत मी रा. म्हस्के यांच्या दिवाणखान्यांत येऊन पोंचलों.

स्कॉलरशिप
म्हस्केसाहेब त्यावेळीं आपल्या नेहमींच्या आरामखुर्चीत पाय पसरून उताणे पडले होते. दिवाणखान्यांत अगदीं अलीकडच्या पद्धतीची पूर्ण सजावट केलेली होती. दिवाणखाना ऐसपैस लांबरुंद व हवाशीर असून चांगल्या सतरंजीची व वरती कांहीं गालीच्यांची बिछायत होती. मधोमध एक गोल टेबल आणि इकडे तिकडे ब-याच मऊ खुर्च्या तसेंच साध्या खुर्च्यांची चंगळ होती. ह्यावरून म्हस्केसाहेब हे एक पुण्यांतील सुशिक्षित संभावितांतले एक पुढारी होते, ह्याची खात्री झाली. हे घरच्या पोषाखांत म्हणजे धोतर आणि सदरा ह्यांत होते. पण तोंडांत एक मोठा अस्सल विदेशी चिरूट होता. त्याचा विपुल धूर सोडीत, खालीं पिकदाणींत थुंकत आणि चिरुटाची राख जवळच्या एका लहानशा टेबलावरील रक्षापात्रांत टाकीत स्वारी अगदीं एकटी आराम करीत होती. चेहरा गंभीर, वागणूक खरोखर संभावीत होती. मला खुर्चीवर जवळच बसावयास सांगून भाषण सर्व आपण इंग्रजींत केलें. पण तें सर्व ओठांतून निदान दातांतून चिरूट न सोडतांच केलें. साधी विडीही आमच्या जमखंडींत न पाहिलेला मी गांवढळ हा मोठा चिरुट तोंडांत खोवलेला व बोलतांना हेलकावे खाणारा पण खालीं न पडणारा पाहून, माझें लक्ष बोलण्यापेक्षां त्या चिरुटाकडेच किंचित जास्त लागलें! एकंदरींत म्हस्केसाहेबांनीं मला बरें वागविलें. स्कॉलरशिप मात्र दरमहा दहा रुपयांचीच देणें शक्य होतें असें सांगितलें. कांहीं असो, माझी कॉलेजांत जाण्याची कशीबशी सोय होईल अशी आशा उत्पन्न झाली. पण ह्यापलीकडे राहण्याची किंवा अभ्यासाची दुसरी कसलीही सोय म्हस्केसाहेबांनीं केली नाहीं किंवा विचारपूस किंवा कळकळ दाखविली नाहीं. एखाद्या युरोपियन सभ्य गृहस्थाचें वर्तन ज्याप्रमाणें एकाद्या नेटिव्ह माणसाशीं बेतानेंच असतें तशीच त्यांची ढब दिसली. रंगानें ते सावळे जवळजवळ काळेच होते. एरवीं सर्व थाट युरोपिअन वळणाचा दिसला. त्या पूर्वकाळांत मराठ्यांत इतका इंग्रजी शिकलेला गृहस्थ हा एकटाच होता. इतकेंच नव्हे तर वकिलींतही बराच पुढारलेला आणि तत्कालीन नागरिकांत मान्यता पावलेला होता हें माझ्या तेव्हां लक्षांत आलें नाहीं. कारण ही तुलना करण्याइतकी मला पुण्याची माहिती नव्हती. ज्या म्हस्केसाहेबांच्या प्रयत्नानें आज शेंकडो मराठे पदवीधर झाले, त्यांपैकीं एकही आज पुण्यांतल्या समाजांत अशा मान्यतेनें राहत नाहीं. ते म्हस्केसाहेब त्यावेळीं कसे राहूं शकले ही एक मननीय गोष्ट आहे.

फर्ग्युसन कॉलेज
कॉलेजांत माझी हजेरी कशीतरी एकदां लागली. फर्ग्युसन कॉलेज त्यावेळीं पुणें शहरांत शनिवार पेठेंतील गद्रे ह्यांच्या विस्तीर्ण जुन्या वाड्यांत होतें. हें कॉलेज माझ्यासारख्या गरिबांकरितांच होतें. हें नसतें तर डेक्कन कॉलेजसारख्या भारी खर्चाच्या संस्थेंत माझा प्रवेश अशा तुटपुंज्या स्कॉलरशिपनें झाला नसता. फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल वामन शिवराम आपटे (संस्कृत कोशकार) हे मी जाण्यापूर्वींच वारले असल्यामुळें त्यांचे जागीं प्रसिद्ध सुधारक रा. गोपाळ कृष्ण आगरकर हे होते. हे गांवांत न राहतां गांवाच्या पश्चिम बाजूस ज्या विस्तीर्ण जागीं हल्लीं कॉलेजच्या स्वतःच्या इमारती आहेत त्या जागेवर एक झोपडें बांधून राहत असत. त्या झोपडीशिवाय आजूबाजूंस त्या काळीं एकही वसतीचें चिन्ह दिसत नव्हतें. दरमहा दहा रुपये स्कॉलरशिपमध्यें माझा त्या वेळींही कॉलेजचा खर्च भागण्याचें मुष्किल होतें. कारण कॉलेजची फी दरमहा ५ रु. वजा जातां माझ्या हातीं ५ रुपयेच उरत! म्हणून कॉलेजची फी माफ करण्याबद्दल मी एक अर्ज घेऊन प्रिन्सिपॉल आगरकर ह्यांना भेटावयाला गेलो. आगरकर मोठे सुधारकाग्रणी ही कीर्ति माझ्या कानावर जमखंडीस असतांनाच आली होती. इतकेंच नव्हे तर इ. स. १८९२ सालींच मी जमखंडी शाळेंत शिक्षक असतांना त्यांचे सुधारकपत्रांतले सणसणीत लेख माझ्या वाचनांत येऊन माझीं मतें झपाट्यानें सुधारणेच्या बाजूचीं बनत चाललीं होतीं. रा. गंगाराम भाऊ म्हस्के हे सुधारक आणि वकीलही होते. त्यांना पाहून पुणेरी सुधारक म्हणजे कसे असतात ह्याविषयीं मला कांहींशी कल्पना आली होती. पण आगरकरांना प्रथम पाहिल्यावर त्या देखाव्याचा माझ्या ह्या कल्पनेशीं नीट मेळ बसेना.

प्रिं. आगरकर
माझ्या भेटीची वेळ सकाळीं नऊ वाजण्याच्या सुमाराची होती. दिवस अर्थात् हिवाळ्याचे होते. आगरकर दमेकरी कायमचेच होते. ते झोपडीचे बाहेर आंगणांत उन्हांत उभे होते. लोकरीचा जवळजवळ फाटलेला काळा मळकट कोट, चित्पावनी थाटाचें नेसलेलें धोतर, लहानशा शेंडीचे थोडेसे विखुरलेले केस, पायांत आगरकरी सुधारणेचा जोडा-म्हणजे ब्राह्मणी जोडाच पण त्याचें टाचेवरचें कातडें टाचेच्या मागें उभें वर आलेलें, मुद्रा बरीच त्रासलेली, भिवयाचे केस दाट किंचित् खोल व भेदक असें हें प्रथम दर्शन घडलें. माझा अर्ज पाहून, मला डेक्कन मराठा असोसिएशनची स्कॉलरशिप मिळत आहे हें ऐकल्याबरोबर स्वारीनें मला फी माफ व्हावयाची नाहीं हें निर्भीडपणें सांगितलें. उगाच नादाला लावण्यापेक्षां त्यांचें हें तडकाफडकी उत्तर एका रीतीनें योग्यच होतें. पण मजवर मात्र त्या उत्तराचा परिणाम बरा झाला नाहीं. आधींच त्यांचा एकंदर पोषाख व मुद्रा पाहून, त्यांच्या सुधारकी कीर्तीमुळें मी जी भलतीच कल्पना करून घेतली होती ती ढासळली होती. आणि त्यावर हा नकाराचा बाँब मजवर आदळल्यामुळें आगरकरांविषयीं माझा ग्रह अनुकूल झाला नाहीं. इतकेंच नव्हे तर हा ग्रह कॉलेजच्या इतर प्रोफेसरांशीं माझा पुढें जो अत्यल्प प्रत्यक्ष संबंध आला त्यामुळें कांहीं म्हणण्यासारखा दुरुस्त झाला नाहीं. खरोखर पाहतां ह्यांत आगरकरांचा, इतर प्रोफेसरांचा किंवा कॉलेजच्या इतर परिस्थितीचा कांहींच दोष नव्हता. केवळ ह्या निराशेला माझाच अजाणपणा व अननुभवीपणा हेंच कारण होय!

कांहीं संवयी आणि वागणूक

प्रकरण १५ वें
हा काळ संपविण्यापूर्वीं माझ्या कांहीं संवयी व कांहीं विशिष्ट वागणूक यांसंबंधी आठवणी देणें बरें. माझ्या वयाच्या ६ व्या वर्षीं मी प्राथमिक शाळेंत गेलों आणि १२ व्या वर्षीं हायस्कुलांत गेलों व १९ वे वर्ष संपण्यापूर्वीं माझें दुय्यम शिक्षण संपलें. ह्या तिन्ही टप्प्यांत माझ्या स्वभावांत निरनिराळे फरक पडून अधिकाधिक विकास पडत असलेला मला देखील कमी अधिक कळून येत होता.

पेहराव
प्राथमिक शाळेंत असतांना माझ्या पोषाखाचे बाबतींत मी फार गबाळ्या होतों. कर्नाटकांत प्राथमिक शाळेंत जाण्याच्या वयांतही लहान मुलें रुमालच बांधीत असतात. अजूनही खेड्यांत तेथें हाच प्रकार दिसेल. पुणेरी टोपी मी सबंध हायस्कुलांत असतांना घातली नाहीं. पुण्यांत कॉलेजांत आल्यावर मोठमोठी बी. ए. च्या वर्गांतलीं मुलें नेहमींच-आणि मोठे प्रोफेसरही केव्हां केव्हां टोपी घातलेले पाहून आम्हां कर्नाटकीयांना मोठेंच आश्चर्य वाटे. आमच्या हायस्कूलच्या काळांत पुणेरी टोप्या जमखंडी येथील दुकानांत विकत मिळणेंच संभवनीय नव्हतें. मग कोट आणि वास्कुटांचे नांवच घ्यावयाला नको. खादीच्या बंड्या आणि वरती केव्हांतरी घालावयाला लांब झग्याचे व अस्तन्याचे मांजरपाटी आंगरखे व नेसण्यास धोतरें असत. डोईला कर्नाटकी जाडा भरडा रुमाल. तो मला प्राथमिक शाळेंत असतांना तरी कधींच नीट बांधावयाला येत नसे! ब्राह्मणांचीं मुलें लंगोटी घालीत; पण घरंदाज मराठ्यांची मुलें धोतरे किंवा विजारी घालावयाचीं. धोतरें मळलेलीं, आंगरख्यावर शाई सांडलेली, आणि रुमालाच्या एकदोन फेरी गळ्यांत आलेल्या, कसे तरी अस्ताव्यस्त बांधलेलें खर्ड्यांचे दप्तर आणि पाटी सांवरीत १०–१०॥ वाजतां आमची स्वारी दुडदुड धावत येई. भूक म्हणजे इतकी लागलेली असे कीं, आईला ओरबाडून खाण्याची तयारी! आमच्या सोप्यांत समोरच्या भिंतींत एकावर एक असे दोन मोठे कोनाडे असत. वरच्या कोनाड्यांत दप्तर, पुस्तकें वगैरे आणि खालच्यांत कपडे ठेवावयाचे असत. पण मी हें सर्व उभ्याउभ्याच फेकून देत असें. तें सर्व नीट ठेवण्याचें काम माझ्या मोठ्या भावाचें किंवा आईचें. बाबांच्या दाबामुळें आंघोळ केल्याशिवाय गत्यंतरच नसे. पण ती आंघोळ त्याच मासल्याची म्हणजे सगळे आंग कांहीं भिजावयाचें नाहीं. मात्र कपाळावर गंधाचा नाममात्र मोठा ओढलेला, त्यामुळें बाबांचें लक्ष आंघोळीच्या व्यंगाकडे जाऊच नये!

साधी राहणी
पोषाख भपकेदार करणें किंवा दागदागिने घालून नटणें ह्याची मला लहानपणापासून कधींच आवड नव्हती. हायस्कुलांत गेल्यावर पोषाखांतला हा गैदीपणा कमी झाला. तरी माझें लक्ष अशा गोष्टीकडें फारसें नसे. साधेपणा मला नेहमींच आवडे. बरेच दिवस अंगांत बाराबंदी बंडीच असे. मला अलीकडचा ज्याला (छातीवर गुंड्या लावलेला) सदरा म्हणतात हा जेव्हां प्रथम मिळाला तेव्हां मोठा आनंद झाला. तो अर्थात् खादीचा होता. तो दिवस श्रावणी सोमवार होता. हा नवीन कपडा घालून मी रामतीर्थास रामेश्वरास जाऊन आलों. एकटाच होतों. वाटेंत किती वेळां तरी माझ्या ह्या नवीन संपत्तीकडे पाहून मी स्वतःचें अभिनंदन करून घेतलें म्हणून सांगूं! ह्या वेळीं मी फार तर १२ वर्षांचा असेन.
प्राथमिक शाळेंत असतां मला एक चमत्कारिक खोड होती. सहज उभा असतां माझ्या दातांतून जीभ बाहेर आलेली दिसे. तें मला कळतच नसे. बाबांनीं मला नेहमीं टोकावें, तरी मी आपला बावळटासारखा दातांत जीभ काढून उभाच. मला माझीच शरम वाटे पण खोड कांहीं बराच काळ गेली नाहीं.

स्नान
हायस्कुलांत गेल्यावर माझ्यांत किंचित् व्यवस्थितपणा आला; पण त्याची केवळ लहर येऊन जाई. ती लहर आली कीं मग सर्व वस्तु व्यवस्थित ठेवण्याच्याच नादांत गुंगत असें. आणि ती ओसरून गेल्यावर पुनः येरे माझ्या मागल्या! हायस्कुलांत गेल्यावर मी नेहमी थंड पाण्यानें स्नान करावयाला विहिरीवर जात असे. आणि जातांना माझेच नव्हे तर बाबांचे व इतरांचेही पांढरे कपडे धुवावयास नेत असें. जमखंडीस बहुतेक पाण्याचा तुटवडा असे. चांगल्या स्वच्छ व मुबलक पाण्याच्या विहिरी १।–१॥ मैलावर असत. तितकें लांब जाऊन स्वच्छ स्नान करून, कपडे धुवून व्यवस्थित घड्या घालून येत असें.

अखंड सहवास
मीं मागें सांगितलेंच आहे कीं, घरांतली माझी मैत्रीण म्हणजे माझी धाकटी बहीण जनाक्का ही आमची जोडी जन्मभर आहे. अगदीं लहानपणीं आमची गट्टी जमणें आणि फूं होण्याचे हेलकावे घड्याळाच्या लंबकापेक्षांही वारंवार होत असत म्हटलें तरी शोभेल! दर सेकंडास भांडणारीं आम्ही भावंडें झोपेंतच काय ते अलग होत असूं. माझा वडील भाऊ आमचें भांडण मिटवीत असे. पण तो वारल्यावर जणूं मिटविणारा कोणी नाहीं म्हणून कीं काय आमचें भांडणच मिटलें! खरें पाहतां माझा स्वभावच बदलला. माझ्या बहिणीवरच्या सात्विक प्रेमाचा वाढता प्रवाह संथपणानें अखंड वाहूं लागला. माझा शाळेंतला अभ्यास, माझें खासगी वाचनाचें व्यसन, माझ्या भोंवतालचा सततचा सोबत्यांचा गराडा ह्या सर्व विक्षेपाला न जुमानतां मी माझ्या बहिणीशीं खेळत असें. मी आणि ती वृद्ध झालों आहों तरी आमच्या सहवासांत खंड नाहीं.

गुल्लव्वा
नवरात्र आलें कीं जनाक्काचा चिमुकला घट निराळा बसविणें, गणेशचतुर्थी आली कीं तिचा छोटा गणपती निराळा मांडणें, आषाढांतला मंगळवार आला की तिची गुल्लव्वा सजविणें असे एक ना दोन; तिचे नानाप्रकारचे खेळांची सजावट ती सासरी जाईपर्यंत मी करण्यांत मोठा आनंद मानीत असें. आमच्या ह्या बालमैत्रीचें कौतुक करून आमची आई आम्हांला उत्तेजन देत असे. गुल्लव्वा ही एक कर्नाटकी ब्राह्मणेतर मुलींची मंगळागौरच म्हणावयाची. देवळाच्या शिखराप्रमाणें एक चिखलमातीचें लहानसें देऊळ कुंभाराकडून दाणे घालून विकत आणीत असूं. मग त्याला गुंजा, बटगुंजा व करडीचे पांढरे दाणे मी कलाकुसरीनें चिटकवीत असें. हिची पूजा मंगळवारीं रात्रीं होई. एका जेकावर (चिखलाचा ६ इंचांचा एक लहानसा खांब) त्यावर एक आडवी चोय ठेवून तिला दोन्ही टोकाला चिखलाच्या पणत्यांतून दिवे लावून ते गरगर फिरवून आम्ही गुल्लव्वापुढें खेळत असूं. चिखलाचा एक रेडा करावयाचा त्याच्या पाठीला एक खळगा करून त्यांत कुंकवाचे पाणी भरावयाचें आणि चिखलाच्याच सुरीनें तो रेडा गुल्लव्वापुढें कांपावयाचा, ह्या सर्वांत माझा हातखंडा. दुसरे दिवशीं बुधवारीं गुल्लव्वाचे विसर्जन करावयाला आम्ही डोंगरांत जनाक्काच्या मैत्रिणी घेऊन सबंध दिवसभर खेळून येत असूं. तेव्हां शिदो-या, लाह्या, खोबरें ह्यांची लयलूट! हे एक बाळ वनभोजनच. खरें पाहातां हा खेळ मुलींचाच. मी गेलों म्हणजे मुली “शेळ्यांत लांडगा आणि बायकांत हांडगा” असें म्हणून माझी टिंगल करीत, तरी पण जनाक्कासाठीं तें सर्व सोसून तिच्या खेळाचें सुख मी भोगी. खेळच नव्हे तर मी माझ्या वाचनांतल्या गोष्टी व सहलींतील अनुभवही जनाक्काला वेळोवेळीं सांगून तिला मी माझ्या ज्ञानाच्या व माहितीच्या पातळीवर (Level) ठेवण्याचा सतत प्रयत्न करी. जनाक्काचा प्रतियोगी सहकार असावयाचाच!

घरकामाची लहर
लहर आली म्हणजे मी आईच्या घरकामालाही हातभार लावीत असें. विशेषतः सणावारीं स्वयंपाकघरांत कांहीं गोडधड होऊं लागलें कीं, मग माझ्या मातृभक्तीला पूरच यावयाचा! नागपंचमीचे लाह्यापीठाचे लाडू, गणेशचतुर्थीचे मोदक, नवरात्रीच्या कडाकण्या; दिवाळीच्या करंज्या-कडबोळीं, मोहरमांतला मलीदा-चोंगे वगैरे खाण्याचे पदार्थ करण्याला माझीं पुस्तकें टाकून तिच्या पुढेंपुढें इतका सुळसुळत असें कीं, जणूं तिची मी एक सूनच! आईनें पुरण घातलें कीं कणीक मऊ करण्याला मी काच्या मारून दुःशासन वधासाठीं भीम जसा काय सज्ज होई! अशा वेळीं रामायण-भारतांतल्या वामनाचे श्लोक, मोरोपंतांच्या आर्या आईपुढें म्हणून दाखविण्याच्या तोंडाचा पट्टा एकदां कां सुरूं झाला, कीं कणीक मऊ झाली तरी हें साग्रसंगीत दुःशासन वध चालूच राही. मग आई तिकडे न कां ऐकेना. “अरे विठ्या, लांकडांचें असतें तर तें तोंड केव्हांच झिजलें असतें की रे!” असें आई कानडींत म्हणे. जनाक्का मात्र मोठी कामचुकार असे. खायाला मी आणि कामाला माझा मोठा भाऊ, हा तिचा बाणा असे.

अव्यवहारिपणा
डोंगरांतून जळाऊ लाकडांचा भारा आणून आईला मदत करण्याचें एकदां अस्मादिकांनीं मनांत आणिलें. लागलीच एक कु-हाड व एक मोठी दोरी घेऊन निघालों. पण शेवटीं “जेनु काम तेनो थाय, बिजा करेसो गोते खाय” असाच शेवटीं प्रकार घडला. जाळण्याला अगदीं निरुपयोगी अशा कांटेरी झुडुपांचा भारा तयार केला, पण तो कांहीं केल्या घरापर्यंत आणतां येईना. रात्र पडावयाला झाली तरी घरीं हा गडी येईना म्हणून आई अर्ध्या वाटेवर मला हुडकायला आलेली भेटली. भारा अर्ध्या वाटेवरच टाकून कसें यावें लागलें ही रडकथा आईस सांगण्याची पाळी आली. कसलीं लांकडें गोळा केलीं हें आईनें विचारतां त्या झुडपाचा मासला दाखविला. तेव्हां तिनें कपाळाला हात मारून म्हटलें, “हायस्कुलांत पहिला नंबर मिळाला तरी जळाऊ लाकूड कोणतें व त्यांचा भारा घरापर्यंत कसा आणावा हें व्यवहारज्ञान तुला नाहींरे पोरा! लाकडे नाहींत तीं नाहींत पण दोरी मात्र डोंगरांत टाकून हात हालवीत आलास, काय तुझी तारीफ!” ही गोष्ट मी मोठा झाल्यावर आई मला सांगून कितीदां तरी हिणवीत असे. मी किती जरी पंडित झालों तरी प्रपंच चालविण्याचें शहाणपण माझ्यांत येईल कीं नाहीं ह्याविषयीं साशंकच असे. माझ्या भावी आयुष्यांत ही माझ्या आईची शंकाच खरी ठरली! बाजारांत जाऊन एकादा जिन्नस खरेदी करून आणणें मला आवडत नसे. तें व्यवहारज्ञानच माझेमध्यें शेवटपर्यंत आलें नाहीं. ह्यासंबंधीं एक मजेची गोष्ट मला आठवते ती अशी.

बाजारांतील शोभा
शाळेंत माझा अभ्यास उत्तम असे. विशेषतः गणितांत मी हुषार होतों. रामजीबावांचा विठू म्हणजे इंग्रजी शाळेंतला एक मोठा वाखाणण्यासारखा मुलगा अशी गांवांत प्रसिद्धि झालेली होती. पण माझें शिक्षण सर्व नव्या त-हेनें झालेलें असल्यानें जुन्या गांवठी शाळेंतल्याप्रमाणें मोडी अक्षर वळणदार काढणें, हस्तलिखित मोडी पत्रें वाचणें, तोंडचे हिशेब करणें हें उपयुक्त आणि व्यावहारिक शिक्षण मला मिळालेंच नव्हतें. त्यांत माझा लाजाळू स्वभाव! त्यामुळें मी बाजारांत जाणें नेहमीं टाळीत असें. मोहदीनसाहेब नांवाच्या वाण्याचे दुकानांत आमच्या घरचें उधारी खातें होतें. त्या दुकानांत जाऊनही जिन्नस आणावयाचे मी टाळीत असें. पण एकदां कांहीं सामान आणणें मला भागच पडलें, म्हणून मी गेलों. शाळेंतला मोठा नांवाजलेला मुलगा कधीं दुकानांत न येणारा आलेला पाहून, मोहदीन साहेबांनीं तोंडचे हिशेब मला कसें काय येतात तें पाहाण्याची कसोटी चालवली. मी जें चुकवीत होतों तेंच पुढें आलें. मला कांहीं त्यांच्या साध्या प्रश्नांस उत्तरें देतां येईनात. मग कायॽ त्यांना माझीच नव्हे तर नवीन इंग्रजी शिक्षणाचीही टर उडविण्याची अमोलिक संधि आयतीच मिळाली. त्याच्या दुकानांत नेहमीं बसणारा उठणारा त्यांचा एक उडाणटप्पू मित्रही जवळच बसला होता. मला कांहींच सांगतां येईना तेव्हां अंगाला दरदरून घाम आला! खालीं घातलेली मान वर करवेना कीं उठून जाववेनाही! जवळ बसलेल्या त्या टोळभैरवाचें नाव रामय्या असें होतें. माझी अशी भिरकंडी उडालेली पाहून रामय्यानें दांटगट कानडी भाषेंत म्हटलें, “वजन करणा-या शेराचा दगड घाल त्याच्या कपाळांत; म्हणजे तरी कांहीं उत्तर सुचेल. काय म्हणे हा शाळेंत पहिला नंबर आहे! आणि येवढा साधा हिशेब विचारला तर बोबडी वळली, द्या ढकलून त्याला खालीं, बघतां काय!” मोहदीनचें दुकान म्हणजे आमच्या शाळेसमोरील मारूतीचे देवळाला लागून भर चौकांत असलेलें. ही शोभा झाल्यावर कित्येक महिने त्या दुकानासमोर फिरकण्याचें देखील मला धैर्य होईना!

इंटरमिजिएटचें वर्ष

प्रकरण २३ वें
माझ्या हायस्कूलच्या काळापेक्षां कॉलेजचा काळ फार निराळा गेला. मराठी शाळेंतील प्राथमिक शिक्षण संपवून हायस्कूलमध्यें आल्यावर युगांतर झाल्यासारखें वाटलें असें मागें लिहिलें आहे. कांहीं अंशीं तसाच अनुभव मी कॉलेजांत प्रवेश केल्यावर येथील शिक्षणाच्या नवेपणामुळें आला खरा; पण खरा निराळेपणा वेगळाच होता.

उलटा प्रकार
हायस्कुलांत गेल्यापासून आमच्या घरच्या सांपत्तिक परिस्थितीमुळें मला मोठी आपत्ति भोगावी लागली कशी ह्याचें वर्णन मीं केलेंच आहे. पण ही आपत्ति मी अजून लहान व मुग्ध असल्यामुळें मला तितकी जाणवली नाहीं. ती माझ्या आईबाबांस विशेषतः आईला जाणविली. मी त्यांच्या आश्रयाखालीं सुखांत (चैनींत) नाहीं तरी समाधानांत होतों. विशेषतः जमखंडीसारख्या मागासलेल्या ठिकाणच्या मानानें माझा अभ्यास व हुषारी फार चांगली असल्यामुळें व मला स्कॉलरशिप मिळत असल्यामुळें मी आनंदांत असें. आईबापांच्या सहवासाशिवाय माझ्या भोंवतालच्या मित्रमंडळीच्या सहवासामुळें माझा हायस्कुलचा सर्व काळ अगदीं मजेचा गेला. पण कॉलेजचा सर्व प्रकार ह्याच्या उलट घडला.

गाढवी सवाष्णी
प्रिव्हीयस परीक्षेंत मी पास झालों असें मला जमखंडीसच कळलें. कॉलेजची परीक्षा पास झालेला पहिलाच विद्यार्थी ह्या नात्यानें जमखंडी गांवांत माझी ख्याति अधिकच पसरली हें सर्व खरें. तरी मी जेव्हां पुण्यास परत येऊन मुंबई इलाख्यांतील प्रिव्हियसला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्यें माझा नंबर कितवा आला आहे हें जेव्हां मला कळलें तेव्हां माझी मोठी निराशा झाली. माझा नंबर पहिल्या वर्गांत किंवा दुस-या वंर्गात तर आलाच नव्हता पण तिस-या वर्गांतही फारसा वर नव्हता; हें पाहून जमखंडीतील माझी हुषारी म्हणजे खेडेगांवांत गाढवी सवाष्णी ही म्हण प्रत्ययास आणून देणारीच एक चीज झाली. जमखंडी हायस्कूल म्हणजे एक क्षुद्र उंबराचें फळ. त्यांत भरा-या मारणारा मी एक किडा मुंबई विश्वविद्यालयाच्या विस्तीर्ण उघड्या आंगणांत आल्यावर माझें अल्पबळ मला कळून आलें! विश्वविद्यालयांत चमकण्याची तयारी करून देण्याची पात्रता आमच्या त्या वेळच्या बिचा-या जमखंडीच्या हायस्कुलांतच नव्हती, ती माझ्यामध्यें कोठून येणारॽ ह्याशिवाय कॉलेजशिक्षणांत मी निस्तेज होण्याची दुसरींही अनेक कारणें होती. माझ्या घरच्या गरिबीची जाणीव जी मला हायस्कुलांत घडली नाहीं ती पुण्यास मी एकटीच आईबापांपासून दूर राहूं लागल्यामुळें मोठ्या तीव्रपणानें भासूं लागली. शिवाय माझ्या लाजाळू स्वभावामुळें जमखंडींतलेच जे काय १।२ ओळखींचे सोबती होते, त्यांपलीकडे पुणेंकर विद्यार्थ्यांपैकीं कोणाशीं माझी मैत्री जमली नाहीं. जनार्दनपंत करंदीकर, विश्वनाथ पोंक्षे आणि मी ह्या तिघां जमखंडीच्या विद्यार्थ्यांपैकीं करंदीकर आणि मी दोघेच पास झालों. आणि पोंक्षे ह्यांना कॉलेजच्या शिक्षणाला मुकावें लागलें.

कंगाल स्थिति
हायस्कुलांत प्रत्येक वर्गांत थोड्या विद्यार्थ्यांशीं त्यांच्या वर्गांतील शिक्षकाचा प्रत्यक्ष संबंध घडतो. पण कॉलेजांत शेंकडो किंबहुना हजारो विद्यार्थी आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतके व तेही दर विषयाला बदलणारे प्रोफेसर त्यामुळें त्यांच्याशीं विद्यार्थ्यांचा वैयक्तिक परिचय घडत नाहीं. आणि मी तर बाहेरगांवचा कानडी मुलखांतला लाजाळू व सामान्य विद्यार्थी! फर्ग्युसन कॉलेजची त्या वेळची स्थितीही माझ्या स्वतःच्या स्थितीप्रमाणें कंगालच होती. वसतिगृह, क्रीडांगण वगैरे इतर उपकरणांचा व विद्यार्थ्यांनीं वरचेवर एकत्र जमण्याच्या प्रसंगाचा अभाव असल्यामुळें; त्यावेळची आमची-निदान माझी तरी-स्थिति जंगलांत चुकलेल्या कोंकराप्रमाणें असह्य भासत होती. इत्यादि अनेक कारणांमुळें कॉलेजच्या शिक्षणावर माझें प्रेम बसेना. हायस्कुलांतली मनाची तरतरी, गुप्त हौस हीं झपाट्याने मावळूं लागलीं. अशांत घरगुती संकटांनीं एकदम उचल खाल्ली. आणि माझ्या सत्वाची चहूंकडून ह्या काळांत पारख चालली. त्यांतून मी कसा निभावलों ह्याचें मला अद्यापि नुसतें आश्चर्य मात्र वाटतें. पण नीच मीमांसा कांहीं होत नाहीं. माझें कॉलेजांत येण्याचें कारण पर्यायानें जमखंडीच्या श्रीमंत संस्थानिकांची मजवर विनाकारण गैरमर्जी होऊन त्यांनीं मला हायस्कुलांतील शिक्षकाच्या नोकरीवरून दूर केलें हें मागें आलेंच आहे. जमखंडीचे यजमान श्री. आप्पासाहेब रामचंद्रराव येथेंच स्वस्थ न बसतां त्यांनीं माझ्या वडिलांनाही नोकरीवरून कमी केलें. त्यामुळें चहूंकडूनच आकाश फाटल्यासारखी स्थिति झाली. आणि पुण्यास माझा व जमखंडीस माझ्या घरचा योगक्षेम कसा चालला हें मला आतां कांहींच सांगता येत नाहीं!

जनाक्काचा छळ
अशा कठीण स्थितींत आणखी आकस्मिक संकट उद्भभवलें. तें असें, माझ्या दोन लहान बहिणींपैकीं मोठी बहिण जनाक्का हिचा सासरीं फार छळ होत होता. तिची सासू मोठी खाष्ट बाई होती आणि नवरा फार अविचारी व उर्मटपणानें वागत होता. ह्या सासूचा व  नव-याचा छळ जनाक्काच्या सास-याला प्रत्यक्ष आवडत नव्हता, पण त्याचें कांहीं घरीं अशा बाबतींत चालत नसे. जनाक्का चार यत्तेपर्यंत लिहावयाला वाचावयाला शिकली होती आणि तिचा नवरा केवळ अक्षरशत्रु होता. येवढेंच ह्या छळाचें कारण होतें. घरीं पडेल तें सर्व काम उत्कृष्ट एकाद्या मोलकरणीप्रमाणें जरी जनाक्का आपल्या लहान वयांत बिनबोभाट करीत असे, तरी तिच्या सासूला तें खपत नसे. शेवटीं जनाक्काच्या नव-याला बाहेरचा नाद लागून त्यानें घरीं एक द्वितीय संबंधाची बायकोही आणिली आणि जनाक्काच्या जिवाला अपाय घडण्याचेही वरचेवर प्रसंग येऊं लागले. गोष्ट येथवर आल्यानें मला ह्या प्रकरणांत हात घालावा लागला. घरची गरिबी, माझ्या कॉलेजच्या खर्चाची ओढाताण अशा वेळीं मी जनाक्काची काय व्यवस्था करणारॽ पण त्यावेळीं माझ्या सुधारणेच्या मताला आणि सामान्यतः स्त्रीजातीसंबंधीं कारुण्यालाही पूर येत चालला होता. अशा वेळीं माझ्या प्रत्यक्ष बहिणीवर तिची वागणूक इतकी पवित्र व स्वभाव सहनशील असूनही असा प्रसंग आलेला पाहून मी बेफाम झालों. मी त्या वेळीं मे च्या सुटींत जमखंडीस आलों असेन. माझ्या कानावर जनाक्काच्या छळाची वार्ता विशेषतः तिच्या क्रूर नव-यानें दुसरी बाई घरीं आणून ठेविली हे ऐकल्याबरोबर मी माझ्या आईबाबांनीं जनाक्काला एकदम आमचें घरीं आणावयाचा आग्रह केला. आमचे बाबाही मानीच होते. आम्हीं कोणींच ह्यापेक्षां मागचा पुढचा विचार जास्त न करितां, आमच्या आलगूरच्या मामांना माझ्या बहिणीला आसंगीहून आमचे घरीं आणण्याला पाठवून दिलें. त्यामुळें जनाक्काच्या सासूला व नव-याला आयतेंच फावलें. त्यांनीं जनाक्काचे दागिने सर्व काढून घेऊन नेसलेल्या एका फाटक्या लुगड्यानिशीं मामांबरोबर तात्काळ पाठविली. त्यावर आम्ही जनाक्काला अखेरपर्यंत आसंगीला कधींच पाठविलें नाहीं. अगदीं लहानपणींच जनाक्का अशी आपल्या सासरला कायमचीच अंतरली. आणि ती केवळ अविवाहित जणूं आमचे घरीं राहिली. ह्या पुढें कांहीं दिवसांनीं जनाक्काचा सासरा गोपाळराव हा तिला न्यावयाला आला, पण तिला सासरीं कोणत्याहि प्रकारें सुख लागण्याची आशाच नव्हती. उलट तिच्या जिवालाच अपाय घडण्याची भीति होती म्हणून आम्ही तिला पाठविली नाहीं. गोपाळरावालाही विशेष आशा वाटत नव्हती म्हणून तो बिचाराही जास्त आग्रह न करितां निमूटपणानें आल्या पावलींच परत गेला. ह्या सर्व प्रकरणाला मीच कारण होतों म्हणून जनाक्काच्या पुढच्या सर्व आयुष्याची जबाबदारी माझ्या कोवळ्या शिरावर पडली. हें किती प्रचंड ओझें मी शिरावर घेतलें ह्याची मला त्या वेळीं कांहींच कल्पना नव्हती! ह्या वेळीं माझी इंटरमिजिएट क्लासांतली एक टर्म संपली असावी. पण मला हा काळ नक्की कोणता हें आतां आठवत नाहीं.

बाळमित्र
प्रीव्हियस परीक्षा पास होऊन मी पुण्यास आल्यावर प्रथम नारायण पेठेंत मुंजाबाचे बोळासमोरील केळकराचे वाड्यांत खोली घेतली होती. एक खोली मी आणि दुसरी कोल्हापूरचे रा. गोविंदराव शासने अशी जोड खोलींचे एक दालन होतें. दुसरी विजापूरचे रा. गोविंदराव कलकेरी आणि कोल्हापूरचे रा. तळाशीकर ह्यांचें एक जोड खोलीचें दालन अशा चार खोल्या आम्हां चौघांमध्यें होत्या. अर्थात् मी ह्यावेळीं खोलीचें भाडें भरीत होतों; पण कसें तें मला सांगतां येत नाहीं. रा. शासने ह्यांची ओळख नक्की कोठें व कशी झाली हें मला आतां निश्चितपणें आठवत नाहीं. पण आरंभापासून अगदीं आतांपर्यंत टिकलेल्या अगदीं थोड्या मित्रांपैकीं ते एक म्हणजे चौघां मित्रांपैकी ते एक आहेत. तेरदालचे विष्णुपंत देशपांडे हे इंग्रजी ५।६ व्या यत्तेपासून म्हणजे इ. स. १८९० पासून, प्रिन्सिपॉल केशव रामचंद्र कानिटकर हे प्रिव्हीयस वर्गापासून म्हणजे इ. स. १८९३ पासून आणि गोविंदराव शासने इंटरमिजिएट म्हणजे सन १८९४ पासूनच माझे मित्र आहेत. पहिले देशस्थ, दुसरे कोकणस्थ ब्राह्मण आणि तिसरे मराठा जातीचे आहेत. चौथे जनार्दनपंत करंदीकर हे तर माझ्या गांवचेच म्हणजे जमखंडीचे बाळमित्र आहेत. ह्यांपेक्षां जास्त कोणी लहानपणापासूनचे मित्र किंबहुना अलीकडचेही कोणी विशेष म्हणण्यासारखे समान वयाचे मित्र नाहींत.

रा. शासने
शासने ह्यावेळीं पुणें नेटिव्ह इनस्टिट्युशन नांवाच्या हायस्कुलांतील ७ व्या यत्तेंतील विद्यार्थी होते. वयानें माझेपेक्षां सुमारें वर्ष सहा महिन्यांनीं मोठे असावेत. हे दिलदार मनाचे मराठा मित्र लवकरच माझ्या घरांतल्या माणसांप्रमाणें मला जवळचे भासूं लागले. ‘समानशील व्यसनेषु सख्यम्’ ह्या न्यायानें सहज जो स्नेहसंबंध आम्हा दोघांचा जडला तो कायमचाच जडला. माझा स्वभाव तापट तर त्यांचा किरकि-या! ह्या प्रकृतिदोषामुळें आमच्यांत नेहमीं कमीअधिक गोष्टीवरून वाद माजे व तो विकोपासही जाई. पण त्या मतभेदामुळें आमच्या स्नेहांत लवमात्रही बाधा येत नसे. गोविंदरावाची घरगुती स्थिति माझ्याप्रमाणें तंग नव्हती. त्यांचें वडील कोल्हापुरांतील एक घरंदाज फौजदार होते. खाऊन पिऊन सुखी घराणें होतें. माझीं उदार मतें व मोकळा स्वभाव यांवर लुब्ध होऊन गोविंदराव मजबरोबर राहूं लागले. ते आणि आम्ही जरी अभ्यासांत भिन्न वर्गांतले होतों, तरी परस्परांचा स्वाभाविक चांगुलपणा ओळखून होतों.

स्वयंपाकव्रत
ह्यावेळीं साहजिकपणें मला खर्चाचा फारच तुटवडा पडत असावा. कारण खाणावळींत न जातां मी घरींच माझा स्वयंपाक काही दिवस करून जेवत होतों. आणि केवळ माझ्यासाठीं म्हणून गोविंदरावही कदाचित् माझेप्रमाणें स्वयंपाकी बनले असतील असे वाटतें. पण दुस-या टर्ममध्यें परीक्षेचे दिवस जवळ येऊन अभ्यासाचा मारा जास्त पडल्यावर साहजिकच आम्हांला हें स्वयंपाकव्रत नाइलाजानें सोडावें लागलें. मी किंवा गोविंदराव कलेंत कधींच प्रवीण होण्यालायक नव्हतें. भात चांगला करीत असूं; पण गव्हाची पोळी मात्र खाण्यापेक्षां प्रदर्शनांत पाठविण्याच्या अधिक लायक होत असे. त्यामुळें प्रकृतीवरही परिणाम होऊन हा नाद आम्हीं सोडला.

चैतन्य शून्यता
माझ्या हायस्कूलच्या काळाच्या आठवणी लिहितांना माझे मित्र, खेळ, इतर छंद वगैरेसंबंधीं मला बरेच लिहितां आलें, तसें मला कॉलेजच्या काळासंबंधीं लिहितां येत नाहीं. ह्याचें कारण हेंच कीं दारिद्र्यामुळें व आईबापांच्या आश्रयापासून दूरच्या रहिवासामुळें माझ्या स्वभावांतला सहज आनंद बराच कमी झाला. किंबहुना मला अकालीं पोक्तपणा व विचारीपणाही आला. त्यामुळें माझा खेळकरपणा तर पार मावळलाच पण मला इतरांशीं मैत्री जोडण्याची हौस नाहींशी झाली! फार काय पण कॉलेजच्या वर्गांतील ठरीव अभ्यासावरील मनही उडूं लागलें. अभ्यास जुलमाच्या रामरामाप्रमाणें मला दुःसह झाला. त्यामुळें फर्ग्युसन कॉलेजबद्दलच नव्हे तर एकंदरींत तत्कालीन विश्वविद्यालयीन चैतन्यशून्य शिक्षणपद्धतीसंबंधीं विरक्ति आणि विमनस्कता माझ्यामध्यें वाढूं लागली. जमखंडी हायस्कुलांत पहिला नंबर म्हणून मिरवलेला मी फर्ग्युसन कॉलेजमध्यें कोठल्या कोनाकोप-यांत बेपत्ता विद्यार्थी होऊन राहण्याची मला मनांत टोंचणी लागली. अभ्यासाची हयगय चाललेली माझ्या लक्षांतच येईना.


बौद्धिक विकास
ठराविक अभ्यासाची वर सांगितल्याप्रमाणें अवस्था झाली तरी माझ्या मनाचा व बुद्धीचा विकास थांबला अशांतला मुळींच प्रकार नव्हता. तें कधीं शक्यच नव्हतें. ह्याहीपेक्षां भयंकर आपत्ति मजवर पुढील आयुष्यांत कितीतरी कोसळल्या. तरी माझ्या मनाची अंतर्वाढ थांबणें शक्यच नव्हतें. सहज आनंद माझ्या मनोरचनेचा पायाच आहे असें आतां मला दिसूं लागलें आहे. माझ्या आनंदाला, शांतीला, समाधानाला-अतएव अंतर्विकासाला बाह्य उपाधीची मदत झाली नाहीं किंबहुना विरोधही झाला नाहीं, असो.
सोबती, खेळ, बाह्य सुखसोयी वगैरेची बाजू लंगडी पडली. तरी माझें खासगी वाचन त्या काळाच्या मानानें बरेच चाललें होतें. जमखंडीसारख्या गांवढ्या गांवांतल्या हायस्कुलांत पुस्तकालयाची उणीव होती तितकी व तशी फर्ग्युसनसारख्या नवीन चालू झालेल्या कां होईना, पण कॉलेजांत असणें शक्य नव्हतें. प्रीव्हियस वर्गांत असतांनाच मला जॉन स्टुअर्ट मिल्लसारख्या तत्त्वज्ञानाचा आणि मेकॉलेसारख्या ऐतिहासिक निबंधकाराचा परिचय घडला. Liberty (स्वातंत्र्य) Utilitarianism (उपयोगवाद, बहुजनहितवाद); Subjection of Women (स्त्रियांची गुलामगिरी) वगैरे मिल्लचे प्रासादिक ग्रंथ मूळ इंग्रजींत वाचून कानांत वारें शिरलेल्या वासराप्रमाणें माझी स्थिति प्रीव्हीयसमध्येंच झाली होती! इंटरमिजियटमध्यें आल्यावर हर्बट स्पेन्सरच्या Education (शिक्षण), Introduction of the Study of Sociology (समाजशास्त्राच्या अध्ययनाचा परिचय) ह्या इंग्रजींतील मूळ ग्रंथांचे वाचन झालें. त्यावेळीं स्पेन्सरची चलती यूरोप-अमेरिकेंतच नव्हे तर हिंदुस्थान व जपान ह्या पौरस्त्य देशांतही फार वैभवशाली आणि विजयी झाली होती. बहुतेक त्या काळचे कॉलेजांतले शिक्षक स्पेन्सरच्या अज्ञेयवादानें जवळ जवळ झपाटल्याप्रमाणेंच झालें होतें. दाभोळकर नांवाच्या एका गृहस्थांनीं तत्कालीन तरुण विद्वान गृहस्थाकडून स्पेन्सरच्या ब-याच ग्रंथांची भाषांतरमाला प्रसिद्ध करण्याचें काम नेटानें चालविलें होतें. त्यांपैकीं बरींच पुस्तकें मी हाव-या हाव-यासारखें वाचीत असें.

नास्तिकपणा
जेथें आमचे गुरुच त्या नवीन विचारानें असें हैराण झालेलें, मग माझ्यासारख्या उतावळ्या विद्यार्थ्यांची अत्यवस्था झाली म्हणावयाला काय हरकत आहे. पुस्तकें जरी मी म्हणण्यासारखीं पुष्कळशीं वाचलीं नसलीं तरी जीं तात्विक महत्वाचीं वाचलीं त्यांचा माझ्यामध्यें अभिनिवेश फार जोराचा घडला. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे जमखंडींतल्या आमच्या वाड्यांतल्या अंधेरी देवघरांत बसून श्रीशिवलीलामृतांचें पारायण करीत शिवलिंगावर श्रावणी सोमवारीं सहस्त्रदळें वाहिल्याशिवाय तोंडांत पाणी न घेणारा पो-या. मी पुण्यांत आल्यावर आगरकरांचे लेख आणि मिल्ल-स्पेन्सरचे प्रत्यक्ष ग्रंथ वाचून पुण्यांतल्या विद्यार्थ्यांत एक पठ्ठ्या नास्तिक बनलों!

चर्चा मंडळ
मी नुसतें वाचून स्वस्थ बसणारा युवक नव्हतों. जें आपल्या मनांत आलें तें दुस-याजवळ बोलून त्यावर चर्चा करावयाची प्रवृत्ति किंबहुना खोड माझ्यामध्यें आनुवंशिकच होती. माझ्या वडिलांप्रमाणेंच मलाही बोलावयाला फार आवडतें. मात्र लाजाळूपणाचा दाब असल्यामुळें अपरिचिताजवळ किंवा अप्रासंगिकपणें वाकतांडव करण्याचें मात्र मला कधीं धैर्य होत नसे. तथापि पोटांत घटकाभर विष आवरेल पण नवीन विचार अगर एकादा सुंदर अनुभव मनाला घडला, कीं कोणातरी सहानुभूतिच्या मित्राजवळ किंवा आप्ताजवळ ओकून टाकल्याशिवाय मला चैनच पडत नसे. ह्यामुळें केळकरांच्या वाड्यांत असतांना माझ्या नेतृत्वाखालीं आमच्या खोलींत एक छोटेखानी Debating Union (चर्चामंडळ) स्थापन करण्यांत आलें होतें. त्यांत माझाच सुळसळाट जास्त असावयाचा. ह्या लहानशा मंडळांत नवीन भेटलेल्या मिल्ल-स्पेन्सरच्या विचारांची पुनरावृत्ति करण्यांत मी मोठें वक्तृत्व पाघळीत असें. ह्या वक्तृत्वाची संवय आमच्या जमखंडींतील वसंत व्याख्यानमालेंतल्या माझ्या दुढ्ढाचार्यपणावरून मला लागत चालली होती. विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, विकासवाद, स्त्रीदाक्षिण्य, इ. इ. मोठमोठ्या अवजड विषयांवर लहान तोंडीं मोठा घास घेण्याचें मला जमखंडींतल्या वसंत व्याख्यानमालेंतच आंगवळणीं पडलें होतें. मग पुण्यासारख्या वाचाळ आणि मुंबईसारख्या चवचाळ शहराचा संपर्क घडल्यावर आणि विशेषतः मिल्ल-स्पेन्सरच्या तत्कालीन वेदतुल्य नवीन विचारांच्या ज्ञानलतांनीं दुर्विदग्ध झाल्यावर माझें डोकें ताळ्यावर राहणें कठीण झालें. मंडळांतील सभांतूनच नव्हे तर विद्यार्थ्यांशीं खासगी संभाषणांत मी त्यांना माझा नवीन तुटपुंजा नास्तिकपणा शिकवूं लागलों. त्यावेळीं मी एक लहानसा इंग्रजींत निबंध लिहिला होता. त्यांत ‘देवानें माणसाला निर्माण केलें नसून माणसानेंच उलट देवाला निर्माण केलें’ हें अर्धवट सत्य मी मोठ्या उत्साहानें प्रतिपादिलें होतें हें पण आतां नीट आठवतें! तें कसेंही असो. कोणीं कोणाला निर्माण केलें हा वाद जगाच्या अंतापर्यंत चालणारा आहे. पण इतर अनेक कारणांत माझ्या विक्षिप्त खासगी वाचनाची आणि वादविवादाची भर पडून ठराविक अभ्यासाची आबाळ झाली. अर्थात् मला इंटरमिजियट परीक्षेंत अपयश आलें! जमखंडी हायस्कुलांतील पहिला नंबर विश्वविद्यालयांत बराच खालीं घसरतो; इतकेंच नव्हे तर उगीच घमेंड मारील तर चांगली आपटीही खातो कसा, हें मला प्रत्यक्ष अनुभवास आलें. विशेष हा कीं, ज्या (Logic) तर्कशास्त्र ह्या विषयांत माझा विशेष तोरा चालत असे त्यांतच मी नापास झालों असें वाचून तर “ज्वर इव मदो मे व्यपगतः” हा भर्तृहरीचा टोमणा मला चांगलाच जाणवला!

पशुपणा
परीक्षेंत नापास होण्याचा अनुभव मला आतांपर्यंत मुळींच नव्हता. तो आला हें एका परीनें बरेंच झालें. वाईट वाटणें साहजिकच आहे; पण अगदीं धक्का असा बसला नाहीं. मात्र विश्वविद्यालयीन परीक्षांविषयीं आदर कमी कमी होऊं लागला. ह्या परीक्षेच्या चरकांत तरुण विद्यार्थ्यांचे रक्त कसें पिळून निघतें, आणि इतक्या रक्ताच्या आहुत्या ओतूनही शेवटीं अपयशाचा टिळा लागला म्हणजे विद्यार्थ्यांचें कंबरडेंच मोडतें हें कळलें! कंबरडें मोडल्यावरही पुनः जो कॉलेजची वाट धरितो तो “स वै मुक्तोsथवा पशुः” ह्या वचनाप्रमाणें मुक्त किंवा पशु असावा. मी मुक्त नसल्यामुळें पशुपणा पदरीं घेऊन इ. स. १८९५ चे जानेवारींत हातांत नाक धरून जमखंडीहून पुनः कॉलेजच्या अभ्यासासाठीं पुण्याला निघालों!

Read more: इंटरमिजिएटचें वर्ष

आमचीं लग्नें

भाग दुसरा : 'प्राथमिक शिक्षण'
येथपर्यंत माझ्या पूर्वजांचा वृत्तांत संपला. येथून पुढें माझ्या स्वतःच्या पिढीचा वृत्तांत सुरू झाला.

तीन लग्नें
माझा भाऊ, मी, आणि माझी धाकटी बहीण ह्या तीन भावंडांचीं लग्नें एकाच वेळीं जमखंडींत बाबांनीं केलीं. बहुतकरून हीं लग्नें कोल्हापूरच्या यात्रेनंतर इ.स.१८८२ च्या सुमारास मे महिन्यांत (वैशाखांत) झालीं असावीं. सालाची खात्री नाहीं. १८८२ हें साल नक्की अंसेल तर माझें वय त्यावेळीं ९ वर्षांचें, भाऊचें १४ वर्षांचे आणि बहिणीचें ४ वर्षांचें होतें. हें लग्न करण्यांत बाबांचा फार अव्यवहारिकपणा व अविचार दिसतो. तो असा - माझ्या भावाचें वय फार तर शोभण्यासारखें होतें; पण माझें वय व माझ्या बहिणीचें वय अगदींच अक्षम्य होतें. वधूची पारख म्हणावी तर माझ्या भावाची वधू फार तर ५—६ वर्षांची होती. ती जमखंडींतील नातलगांची होती. माझी वधू माझ्या आत्या आंबाबाईची सर्वांत धाकटी मुलगी ही पुरी एक वर्षाची तरी होती कीं नव्हती ह्याची शंकाच आहे. आई तर म्हणत होती कीं, ती सहा महिन्यांची होती. लग्नाचे वेळीं तिला नीट बसतांहि येत नव्हतें. तीन लग्नें एका वेळीं करूं नयेत अशी आमच्या आईची समजूत होती. पण तिचें कोण ऐकतोॽ मला आपली मुलगी द्यावी असा माझ्या आतेचा आग्रह होता. मी तिचा फार लाडका होतों. माझा वडील भाऊ १३—१४ वर्षांचा झाला म्हणून त्यावेळचे समजुतीप्रमाणें तो लग्नाला योग्य झाला होता. तशांत आमच्या घरांत बरेच वर्षांत लग्नकार्य कधीं होण्याचा प्रसंग आला नव्हता. त्यावेळीं जरी आमच्या घराण्याला पूर्ण दारिद्र्य आलें नव्हतें तरी कर्ज काढल्याशिवाय लग्न होणें शक्य नव्हतें. लग्नाचे वेळीं घरांतील जे कांहीं दागिने उरले होते, तेही पण गहाण ठेवणें शक्यच नव्हतें, म्हणून त्यांनीं आमचा वाडा गहाण ठेवून प्रथम कर्ज काढलें. तें चिंतोपंत भिडे ह्या नांवाच्या त्यांच्या एका मित्राकडून अस्सल मुद्दल ५०० रुपयांचें होतें. धान्य वगैरे घरचें असावें.

सालंकृत कन्यादान
ह्या तिन्ही लग्नाचा खर्च बाबांच्याच अंगावर पडला. कारण माझ्या भावाचा सासरा हा गरीबच होता. माझा सासरा रामजी माने हा दुष्काळांत आमचेकडेच होता असें वर सांगितलेंच आहे. तेव्हां हीं दोन्ही लग्नें आमच्याच खर्चानें करावीं लागलीं. माझ्या बहिणीचें सालंकृत कन्यादान केलें. तिचें सासरचें घराणें आसंगीचें चांगलें खाऊन पिऊन सुखी होतें, तरी सर्व खर्च बाबांनीं कर्ज काढून केला. यावरून आमचे बाबांचे जवळ जरी स्वतःची फारशी माया उरली नव्हती, तरी त्यांची पत बरी होती म्हणावयाची. आसंगीचे व्याही गोपाळबाबा कामते नांवाचे सभ्य गृहस्थ आणि समजूतदार रयत होते. पण वराला लिहितां वाचतां येत नव्हते. सुखवस्तु बापाचा तो एकुलताएक लाडका मुलगा होता. त्याचें वय माझ्याच इतकें म्हणजे ८—९ वर्षांचें होतें. नांव कृष्णराव होतें. गोपाळरावांची बायको द्वारकाबाई, ही स्वभावानें खाष्ट व मत्सरी होती. या लग्नाचे वेळीं माझे आईचे पायाला नारु होऊन ती फार आजारी होती. मुख्य वरमाई अशी आजारी, घरीं दुसरें कोणी कर्ते वडील माणूस नाही. अशा वेळीं हीं लग्नें बाबांनीं कर्ज काढून उभारलीं ! ब्राह्मणाला दक्षिणा देऊन मुहूर्त व लग्नपत्रिका वर्तवली असेल. पण यांपैकीं एकही स्थळ माझ्या आईला मान्य नव्हते.

व्याह्यांचा धिंगाणा  
सर्व लग्नांत तिची फार हेळसांड झाली. आमच्या बाहेरच्या विस्तीर्ण अंगणांत मोठा मांडव घातला होता. अर्थात् याच मांडवांत माझ्या बहिणीचें लग्न लोकरीतीप्रमाणें आमचे घरीं झालें. पण माझ्या आत्येची घरची गरिबी फार म्हणून माझेही लग्न याच मांडवांत झालें. आणि तीन लग्नें एकाच मांडवांत करूं नये म्हणून माझ्या भावाचें लग्न मात्र त्याच्या सास-याच्या घरीं झालें. पण जेवणाखाण्याचा सर्व खर्च बाबांचा. खर्च आमचा पण देखरेखीला आमचेकडचें कोणी नसल्यामुळें एकंदर लग्न समारंभांत चार दिवस एकसारखी अंदाधुंदी चालली होती. मी लहानपणीं फार खेळकर होतों. हळदी लागल्यावर नव-या मुलानें बाहेर जाऊं नये, असें असतां मी लग्नाचे वेळीं तळ्यावर खेळत होतों. तेथून मला धरून आणिलें. माझ्या बायकोला तर पाळण्यांतून आणून माझेच मांडीवर बसविलें. ती माझी आतेबहीण असल्यामुळें पूर्वीपासून माझा तिचा लळा होताच मग लाजावयाचें कसें तें आम्ही शिकावयाचें पुढेंच होतें. सर्व खर्च आम्ही करून व्याह्यांनी म्हणजे माझ्या व माझ्या भावाच्या सास-यांनी बाबांला लग्नांत फार त्रास दिला. वरपक्षानें हिणवावयाचें तें उलट वधूपक्षांचीच कारवाई फार चालली. शेवटीं गांवजेवणाचे दिवशीं रात्रीं बारा वाजतां पानें पडलीं, पण कांहींतरी भांडण काढून जेवावयाला आलेली बरीच मंडळी पानावरून अभद्रध्वनि काढीत निघून गेली. ही हकीकत माझी आई पुढें किती दिवस तरी सांगून आमची करमणूक करीत असें.

केळवण  
आमचीं हीं तिन्ही लग्नें सायंकाळीं गोरज मुहूर्तावर झालीं. लग्नसमारंभ ४।५ दिवस यथासांग झाला. हळदी, रुखवत, रासन्हाणी, अक्षता, लग्नानंतरचें नवरानवरीचे खेळ, नव-याला बागेंत नेणें वगैरे सर्व सोहळे झाले. लग्नांत केळवणासाठीं इतक्या घरीं जेवणास जावें लागलें कीं, मला फारच कंटाळा आला होता. सर्व ओळखीचीं माणसें एकाच दिवशीं जेवणास बोलावणार! मग जेवण कसचें होतें. नुसता भात किंवा शेवयाचें ताट पुढें ठेविलें कीं त्यावरचा गूळ किंवा साखरेला थोडा हात लावला कीं झालें जेवण! आणि प्रत्येक घरीं वाजंत्रीं लावून जावयाचें असे. बेजारून गेलों.

आसंगीचें व-हाड  
याप्रमाणें हा लग्नाचा धांगडधिंगा संपल्यावर आम्ही सर्व माझ्या बहिणीच्या सासुरवाडीला म्हणजे आसंगी गावाला निघालों. हें खेडें जमखंडीच्या पश्चिमेस कुडची स्टेशनच्या वाटेवर ११ मैलांवर आहे. सुमारें चार पांच गाड्यांच्या भरतीचें व-हाड निघालें. आमचेबरोबर आमचे आलगुरचे मामा रामजीबावा हे होते. फक्त बाबा आणि आई मात्र आलीं नाहींत. कारण कन्यादान केलें असतां कन्येच्या घरीं आईबापांनीं कन्येला मुलें होईपर्यंत अन्नग्रहण करावयाचें नसतें. आसंगीचें व्याह्याची शेती मोठी व घरही प्रशस्त होतें. रात्रीच्या वेळीं आम्ही गांवांत प्रवेश केला. आमची थाटानें वरात निघाली. दारुकाम वगैरे चांगला थाट झाला.

पेंढारधाड
आसंगीस नदी आहे. नदीवर व विहीरींत पोहणें; यथेच्छ जेवणें आणि रस्त्यांतून धिंगाणा घालणें हाच काय तो आमचा कार्यक्रम होता. बरोबर आमचे आई-बाबा नव्हते, मग व्याह्यांच्या घरीं आम्हांला कोण दाबांत ठेवणारॽ आमच्या धुडगुशीला ताळच उरला नाहीं. आम्ही जमखंडीचीं बरींच मुलें होतों. त्यांत आसंगीच्या मुलांची भर पडली. मग काय आम्ही चार दिवसांत ह्या खेड्यांत कहर उडवून दिला. गांवांत एक पेंढारधाड आल्याप्रमाणेंच झालें. सर्वांत हाल आसंगीच्या गांवडुकरांचे झाले. आम्ही जमखंडीस असा डुकरांचा जमाव कधींही पाहिला नव्हता. बोळाबोळांतून डुकरांना आडवून त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करून एक मोठें भारतीय युद्धच आरंभिलें. शेवटीं वृद्धमंडळी बरीच त्रासली. या खेडेगांवांत आम्ही शहराचे पाहुणे शिकलेले म्हणून आलों होतों, म्हणून प्रथम प्रथम कोणीच बोलूं शकले नाहींत. शिवाय व्याही मोठे वजनदार होते. पण खेड्यांतील वडील लोकांकडून शेवटीं आमची कानउघडणी झालीच. अशा रीतानें आठ दिवस मेजवान्या झोडून आणि मजा करून आम्ही परत जमखंडीस आलों.

आजोळ

येथवर माझ्या बाबांच्या व त्यांच्या आईबापांच्या आठवणी झाल्या.  आतां माझ्या आईच्या आईबापांच्या आठवणींकडे वळूं.

कृष्णराव काळे :  जमखंडीच्या पूर्वेस ६ मैलांवर आलगूर म्हणून कृष्णाकांठीं एक खेडेगांव आहे.  हें माझ्या आईचें माहेर.  माझ्या आईचें नांव यमुनाबाई, तिच्या आईचें नांव गंगाबाई व बापाचें नांव कृष्णराव काळे असें होतें.  गुडघीच्या रोगानें त्यांचा एक पाय गुडघ्यांत अगदीं वांकडा झाला.  त्यामुळें ते तरुणपणींच कायमचे लंगडे झाले होते.  म्हणून त्यांना गांवांत कुंट कृष्णप्पा म्हणजे लंगडा कृष्णराव असें म्हणत असत.  जमखंडी संस्थानांत खेड्यांतील सर्व लोक कानडीच बोलतात.  मराठी कोणालाच येत नाहीं.  माझ्या आजाआजीला मराठी बोलतां येत होतें.  आजापेक्षां आजीला जास्त चांगलें येत असे.

पतिव्रता गंगाबाई :  बसवंतराव मराठी तर संताबाई जशी कानडी, तशी गंगाबाई मराठी तर कृष्णराव कानडी असें हें जोडपें होतें.  गंगाबाई गोरी होती.  कृष्णराव अगदीं काळे होते.  इकडे बसवंतराव गोरे, तर संताबाई काळी होती.  बाबांचें घराणें सुखवस्तु, वजनदार होतें आणि आईचें गरीब होतें.  तरी कृष्णरावांचा आलगुरांत चांगला दरारा होता, तो त्यांच्या प्रामाणिकपणामुळें होता.  गुडघीच्या रोगानें ते वर्षभर अंथरुणावर खिळलेले होते.  गंगाबाईनें त्यांची अतिशय प्रेमानें व श्रध्देनें रात्रेंदिवस शुश्रूषा केली.  त्या वेळीं माझी आई ५।६ वर्षांची व तिचा भाऊ सोमा नांवाचा १।२ वर्षांचा होता.  आलगूरचे कुळकर्णी गोविंदाप्पा नांवाचे वैष्णव ब्राह्मण मोठे देवमाणूस होते.  त्यांची पत्‍नी सरस्वतीबाई, वडील बंधु बाबासाहेब व एकंदरींत सर्व घराणें अगदीं बाळबोध, प्रेमळ व प्रामाणिक असे.  कुष्णरावांना या घराण्याचा मोठाच आश्रय होता.  कृष्णरावाचें या घराण्यांत त्यांच्या प्रामाणिकपणामुळें मोठें वजनही होतें.  एक वर्षाच्या आजारांत आमची आजी नेहमीं अंथरुणाला धरून बसलेली राहिल्यामुळें चूल आणि मुलाचा सर्व जोजार (भार) माझ्या आईवरच पडला.  तेवढ्या लहान वयांतही तिनें तो बिनबोभाट चालविला.  या लहानपणाच्या हालानें आमच्या आईला पुढें सहिष्णुतेचें व दक्षतेचें चांगलेंच वळण लागलें.  माझ्या आईचा सारा जन्मच सहन करण्यांत गेला.  तें सामर्थ्य तिनें लहानपणींच माहेरीं मिळविलें होतें.  माझी आजी व तिची नमुनेदार मुलगी माझी आई हीं दोन माणसें सार्‍या आलगूर गांवाला पातिव्रत्याचा व हिंदु स्त्रियेच्या चांगुलपणाचा एक अनुपम नमुनाच वाटत होता.  अद्याप त्यांचें नांव काढलें, तर त्यांची माहिती असणारांपैकी न गहिंवरणारें माणूस त्या गांवांत सांपडणार नाहीं.

आमचा तोरा :  जमखंडीस बाबांच्या घराण्याचा लौकिक व आलगुरांत आईच्या घराण्याविषयीं असा अकृत्रिम आदर यांची जोड साधल्यामुळें आम्ही लहानपणीं जेव्हां आजोळीं जात असूं तेव्हां सारा गांव आमचें नेहमीं कौतुक करीत असे.  वाटेंत कुंभारहाळ हें गांव लागे.  तेथूनच आमच्या स्वागताला सुरुवात होई.  यामुळें आम्हांलाही मोठी आढ्यता वाटत असे.  लागुरास जाण्यास आम्ही एका पायावर तयार असूं.  माझ्या बाबांच्या आईचा स्वभाव कडक व सहानुभूतिशून्य असल्यामुळें माझ्या आईला पुढें सासुरवास सोसावा लागला.  आपण भोगलेल्या त्रासाचे मासले ती आम्हांस बालपणीं सांगूं लागली, म्हणजे आमच्या कोमल अंतःकरणाला घरेच पडत.  माझ्यामध्यें पुढें पुढें जें स्त्रीदाक्षिण्य आणि हिंदुविवाहपद्धतीसंबंधीं कायमची तेढ उत्पन्न झाली, तिचें पहिलें बीज ह्या आईच्या खडतर सासुरवासांतच आहे.  आईच्या माहेरचीं माणसें-आजा असो, आजी असो, आईचा भाऊ रामजी असो किंवा माझी मावशी तान्हुबाई असो- जमखंडींत आमच्या वाड्यांत आलीं म्हणजे मुठीत जीव धरून येत.  उलट आम्ही कोणी आलगुरांत गेलों कीं, जसे बडे बापके बेटेच असें वागत असूं.  नुसत्या आजाच्या घरांतच नव्हे, तर सार्‍या खेड्यांतूनच आम्ही आमचा तोरा चालवीत असूं.  आम्ही शहरांत राहणारे, शाळेंत शिकणारे, मराठी बोलणारे, खाणें-पिणें-पोषाख यांची मिजास चालविणारे आणि सरकारदरबारांत वजन असलेल्या सुप्रसिद्ध व कडक बापाचीं मुलें.  मग काय ?  आम्हांला या खेड्यांत स्वर्ग दोनच बोटें उरत असे.  आम्हांला आलगूर फार आवडे.  याचें कारण तो नदीकांठचा गांव तेथील स्वच्छ हवा, गोड पाणी, साधी राहाणी व तेथें चालणारे आमचे चोचले !

आजोबांचा पाय लंगडा असल्यामुळें ते आम्हांस बोलावण्यासाठीं आलगुराहून आपल्या वांझ म्हशीवर बसून येत.  पोषाख खादीचा मांडचोळणा, खादीची बंडी, एक काळें दणकट कांबळें आणि डोईला तपकिरी रंगाचा एक भलामोठा रुमाल.  काटक चेहरा, मिशा पांढर्‍या झुबकेदार आणि आवाज खणखणीत.  एकंदरीनें स्वारी जरी ठेंगणी होती, तरी एखाद्या गनिमी काव्याच्या नायकाप्रमाणें पाहिल्याबरोबर नजरेनेंच पाहणार्‍याला नरम करणारी त्यांची मुद्रा होती.

आलगूरच्या आजोबांचें घर चंद्रमौळी, भांडीं मातीचीं.  अंथरूणपांघरूण जमखंडीहून नेलेलें तेवढेंच.  शिवाय लागेल तें शेजार्‍यांकडून आणलेलें.  कण्यांत घालावयास मीठदेखील शेजारणीकडे मागावयाला एखाद्या आम्हांला पाहावयाला आलेल्या गचाळ मुलीला आजी मोठ्या मायाळुपणानें सांगे.  आणि तिला कोणतीही वस्तु कोण नको म्हणेल ?  त्या वेळीं खेड्यांतून हल्लींचा रशियांतील कम्यूनिझमच होता.  म्हणजे कोणतीही वस्तु प्रत्येकानें कोणालाही हक्कानें मागावी.  यामुळें आम्हांला पाहुणचार फार आवडे.  गेल्याबरोबर आम्हांला पाहायला आळींतील लहानमोठीं पोरें व त्यांच्या पोरकट आयांचा घोळका आमच्याभोंवतीं जमे.  हाकलून दिलें तरी जातात कशाला ?  लक्कव्वा, सिद्दाव्वा, पद्मक्का वगैरे म्हातार्‍या ओरडून ओरडून कानठाळ्या बसवीत मजजवळ येत.  कोणी म्हणे माझ्याशीं लग्न कर, कोणी म्हणे पाट लाव, कोणी म्हणे तूं माझा नवराच - इतके दिवस सोडून कोठें गेला होतास - आतां पोटकी टाक वगैरे.  ही रानटी थट्टा ऐकून आम्ही चिडत असूं.  त्यामुळें त्यांचा हंशा जास्तच पिके.

आजीचें घर :  आजीचें घर धाब्याचें.  जमीन धुळीनें भरलेली.  न झाडावी तेंच बरें.  सोपा कोठें संपला व गोठा कोठें सुरू झाला हें तीन आठवडे राहिलों तरी समजलें नाहीं.  निजलों असतांना रात्रीं म्हशीचें पारडूं मुसकटींत शिरावयाचें किंवा आमच्या तंगड्या त्या वांझ म्हशीच्या शिंगांत गुंतावयाच्या !  आजीची चूल घर बांधल्यानंतर सारवली असेल तर गांवच्या मारुतीची शपथ !  खोलींत दोन मडकीं, एक काथवट व एक भला मोठा पाटा.  तो सुध्दां कधीं उभा करावयाचा नाहीं.  मग धुवायची गोष्ट कशाला !  मीठ असेल तर लसूण नाहीं व दोन्ही असलें तर मिरची नाहीं, हें रोजचें रडगाणें.  तरी तिची तांबडी भगभगीत मिरच्यांची चटणी, घट्ट ताक आणि ताज्या शाळूच्या भाकरी हें जेवण आम्हांला परमामृतासारखें गोड लागे.  वांग्यांची भाजी तर सुखाची परमावधि !  कृष्णातीरचीं बांगीं प्रसिद्धच आहेत.

देवघर म्हणून जी एक खोली होती ती एक काळोखाचे पेवच होतें.  भर दोन प्रहरींही तिथें जाण्याची छाती होत नसे.  भिंतीला व जमिनीला लोणा चढलेला.  देव्हार्‍यावर देव कोण होते, किती होते कीं मुळींच नव्हते, हें शोधायला धाडशी कोलंबसच आला पाहिजे.  खिडकी तर नव्हतीच.  एक साणें होतें.  तें जर उघडलें तर वरून जो दोन प्रहरीं प्रकाश पडे, त्यामुळें त्या गुहेला अधिकच भयानक स्वरूप येईल.  अशा देवघरांतील देव होण्यापेक्षां बाहेरील मोकळ्या हवेंतील गोठ्यांतील म्हशीचें पारडूं होणें बरें वाटे !

सावलींतील तुळस :  माझ्या बाबांची आई जशी धार्मिक होती तशी आईची आई धार्मिक दिसत नव्हती.  पण ती स्वतःच धर्माची मूर्ति होती.  निराळा धर्म तिला कोठून येईल ?  ती नांवाप्रमाणें आंतबाहेर शुभ्र यशाची गंगाच होती आणि तिच्या कुशींतून माझी आई यमुना निघालेली.  गंगाबाईचा देव म्हणजे तिचा लंगडा नवरा.  मराठ्यांतला पडदानशीनपणा तिच्यांत नव्हता.  तरी पण ती उंबरठा ओलांडून कधीं बाहेर जात नसे.  खेड्यांतील स्त्रिया शेतांत खपतात, पाणी आणतात व अष्टौप्रहर उघड्यावर असतात.  प्रत्यक्ष माझ्या बाबांची आई उघड्यांत वाढलेली रानदांडगी बाई होती.  पण गंगाबाई सावलींतील तुळस होती.  कधीं म्हणून शेजारणीकडे बालायला गेली, अशी गोष्ट कशाला !  हा जातिवंत मराठमोळा कांहीं औरच होता.  ज्या कुळकर्ण्याच्या घराचा आजाला आश्रय होता तें घराणें वैष्णव ब्राह्मणाचें असून मोठें धार्मिक होतें.  वैष्णव कर्मठ असावयाचेच.  विधि, संस्कार, उपवास, व्रतें, गाणीं, न्हाणीं, सौभाग्यलेणीं इत्यादींची तिथें लयलूट होती.  ह्या सर्वांचा जन्मजात संस्कार माझ्या आईच्या हाडाहाडांत व रोमरोमांत शिरला होता.  ती एखाद्या वैष्णव ब्राह्मणीप्रमाणें दिसत होती.  पण माझी आजी अगदीं साधी, तिच्यांत रूढ धर्माचा कसलाही वरपंग नव्हता. इतकेंच नव्हें तर तिच्यांत धर्मभोळेपणाही नव्हता.  मग कर्मठपणाचें तर नांवच नको.  हा प्राणीच कांही विरळा होता.  आळींतल्या स्त्रिया गंगाबाईचें नांव घेऊनच आपणांस पवित्र मानीत होत्या.  साध्या रोगावर माझी आजी कांहीं साधे उपचार करी.  कावीळ झाली असतां ती नेमक्या ठिकाणीं मणगटांत बिबा घाली व त्यामुळें अचूक गुण येई.  उसण भरली असतां ती उतारा करी.  वनस्पतीपेक्षां अशा वैद्यकीय श्रध्देचाच जोर असावयाचा, हें सांगावयास नको.  अशा अकृत्रिम पवित्र पातिव्रत्याला आकर्षून घेणारे आमचे आजोबाही तसेच पात्र आणि गरीब असूनही बाणेदार पति होते.  नदीचें पाणी आणायलाही कधी त्यांनीं आपल्या बायकोला बाहेर पाठविलें नाहीं.  गुडघी रोग होण्यापूर्वी ते सामर्थ्यवान् व हिंमतवान् होते.  ज्या कुलकर्ण्याच्या आश्रयाला ते होते त्याच्या घरावर एकदां दरोडा आला.  त्या वेळीं एकट्या आजोबांनीं आरोळ्या फोडून व धोंडे फेकून त्यांना पिटाळून लाविलें.

जमखंडीचे आजाआजी वारल्यावर लवकरच सुमारे इ.स.१८८२-८३ सालीं आजोबा कृष्णराव आलगूर मुक्कामीं आषाढ किंवा श्रावण मासीं उद्‍भवलेल्या पटकीचे उपद्रवानें वारले.  त्या वेळीं नदीला पूर आला होता.  मी नदीवर स्मशानयात्रेला गेलों होतों.  मला तो देखावा चांगला आठवतो.

माझी मावशी तान्हूबाई हिचा सनाळांत रामजी शिंदे यांच्याशीं विवाह झाला.  ती आतां म्हातारी झाली आहे.  शेतवाडी करून तें सर्व कुटुंब सुखी आहे.

माझे मामा :  आलगुरांत माझा मामा रामजी हा मात्र दिवाळखोर कर्जबाजारी निघाला.  अगदीं लहानपणीं लाडका, तरुणपणीं प्रथम चांगला नांवाजलेला पहिलवान होता, पण पुढें तमाशांत विदूषकाचें काम करणारा निघाला.  त्याची बायको लक्ष्मीबाई ही सनाळची.  हिला दोन मुली व एक मुलगा होता.  त्यांपैकीं एक मुलगा व मुलगी वारली आणि मामीही सुमारें १८९२ सालीं वारली.  एकुलती एक मुलगी मथुराबाई पोरकी झाली, म्हणून आमचे घरींच जमखंडीस वाढली.  ती पुढें पुणें ट्रेनिंग कॉलजची थर्ड इयरची परीक्षा चांगली पास झाली.  नंतर माझे धाकटे बंधु एकनाथराव यांच्याशीं तिचा विवाह झाला.  १९१६ सालीं तिला गंगूबाई ऊर्फ छबु नांवाची पहिली मुलगी झाली.  १९१८ च्या मोठ्या इन्फ्ल्युएंझाच्या सांथींत मथुराबाई मुंबईस बाळंतपणांत वारली.  छबूला पुढें मलाच सांभाळावें लागलें.

आमचा मामा रामाजीबावा हा दिवाळखोर निघाला, म्हणून आमच्या आजीचे फार हाल झाले.  १८९७ च्या दुष्काळांत स्वतः आमचेही हाल झाले.  शेवटीं १९०१ सालीं ती आमचे घरीं येऊन राहिली होती.  सप्टेंबर १९०१ मध्यें मी धर्मशिक्षणासाठीं विलायतेला गेलों.  म्हणून माझे आई, बाबा व इतर मंडळी पुण्यास व मुंबईस आली होती.  आजी मात्र जमखंडीस आमचे घरीं असतांनाच वारली.  ह्या गोष्टीचें मला आतां राहून राहून वाईट वाटतें.

  1. आजी
  2. ''आठवणी'' पूर्वी
  3. जन्म व बालपण
  4. हिंदुस्थानांतील उदार धर्म
  • 87
  • 88
  • 89
  • 90
  • 91
  • 92
  • 93
  • 94
  • 95
  • 96
Page 92 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी