1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

समाजसेवेचीं मूलतत्त्वें

(सोमवार ता. ५ आगस्ट १९१२ रोजीं मुंबई येथील समाजसेवासंघा (Social Service League) मार्फत प्रार्थनासमाजाच्या दिवाणखान्यांत रे. डॉ. मॅकिकन यांच्या अध्यक्षतेखालीं झालेल्या व्याख्यानाचा सारांश.)

अध्यक्षसाहेब, भगिनींनो व बंधुजनहो,
प्रथम मराठीतच बोलण्याचा आग्रह धरल्याबद्दल मला आपली माफी मागितली पाहिजे. माझ्या आईच्या भाषेत, देशाच्या भाषेत बोलताना मला साहजिकच घरात असल्याप्रमाणे मोकळे वाटते. परंतु ह्यामुळे आपणांपैकी ज्यांची मराठी ही मायभाषा नसेल त्यांची गैरसोय होणार आहे. विशेषतः ह्या बाबतीत अध्यक्षांची मला माफी मागितली पाहिजे. तथापि अध्यक्षसाहेबांस मी मराठीत जोरदार शुद्ध भाषेत उपदेश करिताना ऐकले आहे. असो. इंग्रजीसारख्या जगन्मान्य भाषेचा प्रसार करणे हे जसे समाजसेवेचे एक अंग आहे, तसेच किंबहुना अधिकच देशी भाषेला उन्नत स्वरूप देणे हेही समाजसेवेचेच एक अंग आहे. शिवाय तरुणपणी परकी भाषेतून व्याख्यान ऐकताना विचारापेक्षा भाषेकडे अधिक लक्ष जाते. फ्रान्समध्ये असताना, फ्रेंच भाषेतील व्याख्यान अर्थ कळल्याशिवाय ऐकणे मला गोड वाटले. परकी भाषा गोड लागते म्हणून ती ऐकण्याची चटक लागते, ही चटक नको. भाषेपेक्षा विचाराकडे लक्ष पाहिजे.

आजचा विषय आपल्या राष्ट्रात नवीन आहे. इंग्रजी जाणणारांना तो थोडा फार अवगत आहे. परंतु निव्वळ मराठी जाणणारांना तो केवळ अपरिचित आहे. पाश्चात्य देशांतही हा विषय नवीन आहे. भूतदया, प्रेम ह्या कल्पना फार जुन्या आहेत. परंतु समाजसेवेची कल्पना नवीन आहे. आधुनिक दिशेने संघटित पायावर प्रयत्न करण्याची कल्पना नवीन आहे. आपल्याकडील सर्व चळवळी आपण नवीन उमेदवारासारख्या करतो. आपणांस त्याबद्दल उमेद असते. राजकीय चळवळीतसुद्धा नवशिकेपणा दिसतो. फुरसतीच्या वेळी कालक्षेपार्थ सार्वजनिक गोष्टीत मन घालणे वगैरे लक्षणे नवशिकेपणाचीच म्हटली पाहिजेत. नुकताच मी कर्नाटकात लोकांची मदत मागावयास गेलो होतो, त्यावेळी अपेक्षेप्रमाणे मला पैसे मिळू शकले नाहीत. कारण म्युनिसिपल निवडणुकीत मते मिळविण्यासाठी पुष्कळांनी दोन तीन हजारांपासून दहा दहा हजारांपर्यंत रुपये आगाऊ खर्च केले होते. व्यापार केला, उद्योग केला, पैसे मिळविले म्हणजे मग म्युनिसिपालिटीत जाण्याची अहमहमिका उत्पन्न होणे हे उमेदीचे लक्षण आहे. परुंतु मते मिळविण्याकरिता जो उत्साह व जो पैसा खर्च होतो, त्या मानाने निवडून आल्यावर उत्साहाने काम केल्याचा अनुभव क्वचितच येतो.

राजकीय चळवळीतसुद्धा जर ही उमेदवारी, मग समाजसेवेत काय ? केवळ अनुकरण ! निराशेचे उद्गार काढण्याचा माझा हेतू नाही. हल्लीच्या लहानसहान प्रयत्नांचेही कौतुक केले पाहिजे. मूल प्रथम चालू लागले म्हणजे आई त्याला पाय पाय सोन्याचे पाय म्हणून त्याचे कौतुक करीत असते. आपले हल्लीचे पहिले धडेही सोन्याची पावले होत, तथापि हे विसरता कामा नये की ह्या सोन्याच्या पावलांना धडधाकट माणसाच्या चालीची कधीही सर येणार नाही.

समाजसेवा ही सामाजिक सुधारणेहून (Social Reform) थोडी भिन्न आहे. समाजसत्तावादाहूनही (Socialism) ती भिन्नच आहे. ही कल्पना, भावना नवीन असल्याचे आपणांस सांगितलेच आहे. ही भावना असली तरी आमच्या ह्या जरठ देशाला पाश्चात्यांपेक्षाही तिची अधिक जरुरी आहे. कारण आमच्या ह्या म्हाता-या देशाला तरुणांची व्यसने जडत चालली आहेत. एकपक्षी खेड्यापाड्यांतून दोन तीन हजार वर्षांच्या जुन्या, दुष्ट चालींचा रोग जडलाच आहे. व दुसरेपक्षी मुंबई, कलकत्त्यासारख्या शहरांत पाश्चात्य देशांतील संकटे व व्यसने भरपूर प्रमाणात दिसू लागली आहेत. मिळून आपल्याकडे दुहेरी संकटे आहेत. मद्यपानाचे संकट नवीन आहे. वेदात मद्यपान नाही असे माझे म्हणणे नाही. मी काही वेदाचा आग्रही, अभिमानी नाही. आगगाड्या, तारायंत्रांप्रमाणे दारूही वेदात आहे. आज आगगाडीत दारू-मक्तेदाराकडे नोकर असलेल्या एका माणसाची गाठ पडली; मद्यपाननिषेधाचा उपदेश करणा-याकडून मिळणे कठीण, अशी माहिती त्याच्याशी झालेल्या संभाषणात सहज मिळाली. तो स्वाभाविक अभिमानाने आपल्या व्यापाराचे वर्णन करीत होता. तो म्हणाला, “आमची मोठी कंपनी आहे. काही नाही तरी २० लाख रुपये भांडवल आमचे ह्या धंद्यात गुंतले आहे. ग्वाल्हेर, भोपाळ, हैदराबाद, कोल्हापूर, कुलाबा, रत्नागिरी, ठाणे वगैरे अनेक ठिकाणी आमचे हे भांडवल गुंतलेले आहे. आमच्या कंपनीत किती तरी मोठमोठ्या किताबांची मंडळी आहेत. इंग्लंडातदेखील त्यांचे वजन आहे.” अशा ह्या किताबाच्या, वजनदार, सुशिक्षित, सुधारलेल्या, मिळालेल्या पैशाचा अगदी नवीन पद्धतीने उपभोग घेण्याचे ज्ञान असलेल्या, अर्थ संपादनेच्छू मंडळीच्या हातांत हा व्यापार आहे तो कायदेशीर रीतीने होत असतो. ह्या बलाढ्य मंडळीपुढे मद्यपाननिषेधकांचा काय टिकाव लागणार ! अमेरिकेतील ट्रस्ट्रीप्रमाणे आमच्या इकडील हे मद्यपानाचे संकट अनिवार्य झाले आहे. जुनी संकटेही आहेतच. दोन-दोन हजार वर्षांचे संकटांचे मुरंबे आमच्या ह्या जुन्या देशात साठवून ठेविलेले आहेत. तेव्हा समाजसेवेची भावना नवीन असली तरी तिची जरुरी अत्यंत आहे.

आज व्यावहारिक बाजूपेक्षा उपत्तीच्या, मीमांसेच्या दृष्टीनेच मी ह्या विषयाचा विचार करणार आहे.

समाजसेवासंघ (Social Service League) काही आजच बंद होत नाही. तेव्हा व्यावहारिक बाजू सांगण्याचे पुढे प्रसंग येतीलच. प्रथम व्याख्या, नंतर व्याप्ती, नंतर विभाग पाहू. अगोदर सेवेचा विचार करू. सेवेमध्ये काय काय अंतर्भूत होते (१) प्रथम प्रेम, पण नुसते प्रेम म्हणजे सेवा नाही. प्रेम हजार मैलांवरूनही करता येते. सेवा होण्यास प्रेम असून शिवाय (२) प्रयत्नही पाहिजे. तथापि एवढ्यानेही बरोबर सेवा होत नाही. प्रेम व प्रयत्न असून शिवाय (३) प्रयत्नात सातत्यही पाहिजे. ही सेवा झाली. पण आपला आजचा विषय समाजसेवा अथवा सामाजिक सेवा हा आहे. भूतदयेची कामे करणे, पाणपोई ठेवणे, झाडे लावणे वगैरे व्यक्तिविषयक सेवेत येतात. वस्तुतः ती सेवेत येतच नाहीत. व्यक्तिविषयक सेवेपेक्षा सामाजिक सेवा भिन्न आहे. सामाजिक सेवा म्हणजे संघटनेने बद्ध झालेल्या समुदायाने समाजाची प्रेम, प्रयत्न व सातत्य ह्यांचे योगाने चालविलेली सेवा. म्हणजे सामाजिक सेवेला समुदाय पाहिजे, संघटना पाहिजे, आदर्श पाहिजे. एकंदरीत समाजसेवेला पाच अंगांची जरुरी आहे : (१) प्रेम, (२) प्रयत्न, (३) सातत्य, (४) समुदाय व (५) संघटना व शिवाय आदर्शही पाहिजे.

प्रथम प्रेम म्हणजे काय ? प्रेमाच्या कल्पनेचा ख्रिस्ती धर्मात चांगला विकास पहावयास सापडतो. आपल्याकडेही प्रेमाची कल्पना आहे, परंतु तिची उत्क्रांती चांगली झालेली नाही. निदान त्या उत्क्रांतीचा इतिहास तरी उपलब्ध नाही. केव्हा केव्हा आमची प्रेमाची कल्पना ‘अवघे देखे जन ब्रह्मरूप’ ह्या उच्च कोटीला पोहोचते. परंतु ह्या भावनेचा आपलेकडे व्यवस्थित विकास झालेला दिसत नाही. तेव्हा आपण ख्रिस्ती धर्मातील ह्या कल्पनेचा विकास पाहू. प्रथम पाचव्या शतकातील सेंट ऑगस्टिन ह्यांच्या प्रेमात वैराग्य कडकडीत दिसते. ईश्वरात पूर्ण लय व्हावा म्हणून बाह्य जगताविषयी वैराग्य. ह्यानंतरच्या सेंट बर्नार्ड ह्यांच्या प्रेमात वैराग्य नव्हते असे नाही. परंतु ख्रिस्तावरील प्रेम व पूज्यबुद्धी त्यात अधिक स्पष्ट दिसून येत होती. त्यानंतर प्रेमाची तिसरी अवस्था सेंट फ्रान्सिसमध्ये दिसून येते. सेंट फ्रान्सिस ह्यांनी दुःखरूपी लोखंडाला सुखरूपी सुवर्ण केले. गरीबांत जाऊन गरीब व्हावे, दीनांत दीन बनावे, व पाप्यांत जाऊन त्यांनी पाप का केले हे पहावे अशी त्यांची वृत्ती होती. ह्या तिन्ही पाय-यांपेक्षा प्रेमाचा पूर्ण विकास सांप्रतचे मुक्तिफौजेचे उत्पादक जनरल बूथ ह्यांचे ठायी दिसून येतो. त्यांचे अंगावर तुम्हांस फाटक्या छाट्या दिसावयाच्या नाहीत. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे वैराग्याचे बाह्य चिन्ह काहीच दिसावयाचे नाही. त्यांच्यामध्ये तुम्हांला अखंड धडपड, चळवळ, प्रवृत्ती दिसून येईल. सारांश, प्रेम म्हणजे उत्साह, उदासीनता नव्हे, प्रेम म्हणजे प्रवृत्ती, निवृत्ती नव्हे, प्रेम म्हणजे जीवन, जीवनाचा कंटाळा नव्हे, सेंट ऑगस्टिनमध्ये प्रेमाच्या भावनेचा उद्भव दिसतो. जनरल बूथ ह्यांचे ठायी तिचा पूर्ण विकास दिसतो. वैराग्याऐवजी म्हणजे जीवनाच्या कंटाळ्याऐवजी “तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हांसी” असे वाटले पाहिजे. प्रेमाच्या भावनेचा—मैत्रीच्या भावनेचा पूर्ण विकास आपल्याकडे आपणांस बुद्ध भगवानांचे ठायी झालेला दिसून येतो. त्यांनी जे मैत्रीचे जीवन स्वीकारले, ते असे की, ते पाहूनच लोकांनी बुद्धधर्मी व्हावे. प्रेम ही मनोवृत्ती स्वयंभू, अहेतुक आहे. प्रेम ही कामना आहे. आत्म्याचे प्रसरण आहे. निष्काम प्रेम हा शब्दच मला कळत नाही, माझे मगजात शिरत नाही. आपण प्रेम करतो ते आपण सुखी व्हावे म्हणून नव्हे, जग सुखी व्हावे म्हणूनही नव्हे, ते स्वयंभू आहे, निर्हेतुक आहे. मातीच्या देहामध्ये प्रेमाची लहर, आत्म्याची स्वतंत्रता, किंबहुना त्याचे अस्तित्वही दाखविते. बर्गसन् आपल्या “Matter and Memory” ह्या ग्रंथात मेमरी—स्मरणशक्तीवरून आत्म्याची उपपत्ती लावितात. प्रेमावरूनही आत्म्याची उपपत्ती लाविता येईल. प्रेम हे मातीचे कार्य नव्हे, जड जग, मृण्मय जग—ह्याचे उत्क्रमण किंवा विकसित स्वरूप हे नव्हे.—प्रेमाचा तरंग—लाट पाहिल्याबरोबर दुस-याच जगाचा—आत्मिक जगाचा—प्रत्यय वाटतो. त्याचेच हे स्वरूप.

अशा ह्या प्रेमास प्रयत्नांची व सातत्याची जोड मिळाली म्हणजे सेवा झाली व समुदायाने ती संघटनेने अंमलात आणण्यास सुरुवात केली म्हणजे ती समाजसेवा झाली. आपल्या समाजसेवेत ही सर्व मूलतत्त्वे आहेत की एकादे कमी अथवा कमजोर आहे ह्याचे नेहमी निरीक्षण ठेविले पाहिजे, उणीव दिसली की ती लगेच भरून काढिली पाहिजे.

ज्या सुधारलेल्या आहेत, सुशिक्षित आहेत, विशिष्ट उद्देशाने प्रेरित झाल्या आहेत अशा सद्यःकालीन शेकडो विभूती आहेत. त्यांच्या योग्यतेचे परिमाण (Quantity) घ्यावयाचे नाही. गुणदृष्ट्या विचार करावयाचा.

अशा विभूतींकरितासुद्धा समाजसेवेची जरुरी आहे. मात्र ती भिन्न प्रकारची पाहिजे. रानटी माणसांस नियमन, नियंत्रणा, प्रेमयुक्त नियंत्रणा पाहिजे व विभूतींस साह्य स्वातंत्र्य पाहिजे. कारण त्यांचे ठिकाणी साधनसंपत्ती भरपूर असते. त्यांस फक्त स्वातंत्र्याची हवा पाहिजे. रेशमाच्या किड्यांप्रमाणे त्यांस आपल्याभोवती स्वातंत्र्यरूपी कोश बनवू दिले पाहिजेत. रानटी लोकांस ह्याविरुद्ध नियंत्रणा पाहिजे. त्यांचे राज्य घ्यावे, त्यांजवर राज्य करावे, त्यांस सुधारणेच्या चक्रात आणावे, ही युद्धाची चांगली बाजू आहे. त्यांच्यातही साधनसंपत्ती बीजरूपाने असते. ती मारता कामा नये. साधकबाधक विचार करून त्यासही केव्हा केव्हा मोकळे सोडावे लागते.

ही दोन्ही टोके अपवादक आहेत. बाकी मुख्य मोठे दोन वर्ग राहिले. एक बहुजनसमाज व पांढरपेशे. हे वर्ग ह्या दोन टोकांच्या अनुक्रमे जवळजवळ आहेत. तेव्हा बहुजनसमाजास नियंत्रणा अधिक हवी व पांढरपेशास स्वातंत्र्य अधिक हवे. समाजसेवेची व्याप्ती सर्व मनुष्यजातीएवढी आहे. भूतदयेचा व्याप फारच मोठा आहे. त्यात पशुपक्ष्यांचाही समावेश होतो. आपल्या आजच्या विषयास सर्व मनुष्यजातीइतके मर्यादित स्वरूप बस्स आहे. ह्यापेक्षा कमी व्याप्ती मात्र चालावयाची नाही. राष्ट्र, जात वगैरे काही एक तिच्या आड येता उपयोगाचे नाही. व्यावहारिक सोयीसाठी पाहिजे तर हिंदुस्थान, मुंबई, गिरगाव असे तिचे क्षेत्र मर्यादित करा. परंतु उपपत्तीच्या दृष्टीने ते क्षेत्र आकुंचित होता कामा नये. व्याप्तीस विघातक होत असेल, तर ती समाजसेवा नव्हे. इतरांच्या आड न येता प्रयत्न केला पाहिजे, आता एकाच संघाला हे सर्व करता येणार नाही हे उघड आहे. आता ह्या व्याप्तीचे मनुष्याप्राण्याचे विभाग करू—
(१) जवळ जवळ जनावरांप्रमाणें असलेलीं जंगली व रानटी माणसे, ह्यांस मनोवृत्ती आहे, मेंदू आहे, परंतु त्यांची उत्क्रांती झालेली नाहीं.
(२) साधारण सुधारलेल्या देशांतील बहुजनसमाज.
(३) पांढरपेशा वर्ग.
(४) विभूती - विभूती म्हणजे अकबर, ज्युलियस, प्रसिद्ध कवी गटे अशी मोठी माणसेच घ्यावयाची नाहीत, तर ज्यांच्यामध्ये काही विशेष गुण आहेत, ज्यांच्याकडून काहीतरी असाधारण कार्य घडत आहे त्या विभूतीच समजाव्या. वरिष्ठ जातीस अधिक स्वातंत्र्य हवे आहे. केव्हा केव्हा हे स्वातंत्र्य कायद्याने मागावे लागते. बहुजनसमाजास अथवा मागासलेल्या वर्गास नियंत्रणा अधिक पाहिजे आहे. उदाहरणार्थ, अशी नियंत्रणा नसल्यामुळेच खालील जातीत मद्याचा खप बेताल होऊ लागला आहे. मजुरी मिळू लागून पैशाचा पुरवठाही होत आहे. ह्या वर्गास पैसे जवळ झाल्यास त्यांचे काय करावे हे माहीत नसते. व्याजाचा विचार शिवलेलाच नसतो. खिशास पैशाचे ओझे होऊ लागले म्हणजे त्यांनी काय करावे ? अर्थात जवळच असलेल्या मद्याच्या पुरवठ्याकडे त्यांची नजर वळते. परळपासून माटुंगा रोडकडे जाण्याचा रस्ता आहे, त्याने मी जात होतो. त्या निर्जन भागाची शोभा पहात जाताना मला मध्यंतरी एकच घर दिसले. हे घर कसले होते ? दारूचा गुत्ता. गुत्त्यात विजेचे पंखे ठेवणे, गाणी म्हणण्याची व्यवस्था ठेवणे वगैरे सर्व चातुर्याच्या गोष्टी करावयाला सुधारलेले सुशिक्षित मक्तेदार विसरत नाहीत ! तेथे किती उपदेश केला, पिकेटिंग केले, तरी काय होणार ? ह्या कामास नियंत्रणाच पाहिजे. ती ज्यांचे हाती आहे त्यांनी तिचा उपयोग करून पहावा. तिच्या अभावी आज आपण निदान प्रॉव्हिडेंट सोसायटीज तरी काढल्या पाहिजेत. मुळाशी उपचार केले पाहिजेत. नुसत्या हस्तपत्रकांचा काय उपयोग होणार ? गुत्त्यात सुंदर गाणी ऐकू येत आहेत, तोपर्यंत वेदापासून तो केसरीपर्यंतचे उतारे एकत्र करून नुसती हस्तपत्रके वाटून काय होणार ? करिता ज्यांचे हाती सत्ता आहे त्यांच्याशी सहकार्य झाले पाहिजे. राज्यकर्ते व धर्मार्थ समाजसेवा करणारे ह्यांच्यात सख्य पाहिजे, नाहीतर तंटे होतील. नवीन संकटे उत्पन्न होतील. तथापि हे सर्व करीत बसणे हे त्यांचे काम नाही. त्यांनी काय काय करावे ? त्यांच्या नियंत्रणशक्तीचा फायदा घेतला पाहिजे. त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. त्यांनीही विश्वास ठेवण्यात मागेपुढे पाहू नये. ते येथीलच मीठ खातात. तेव्हा त्यांजवरही जबाबदारी आहेच. ह्या समाजसेवेच्या कल्पना ज्या दिशेकडू येत आहेत, तिकडूनच सिव्हिल सर्व्हंट येतात की नाही ? तेव्हा संगनमत होण्यास अडचण पडणार नाही.

पांढरपेशा वर्गास फक्त अधिक स्वातंत्र्य पाहिजे. नवीन विचार पाहिजेत. नवीन आदर्श पाहिजेत. त्यांस सामाजिक सुधारणा पाहिजे. ती आपणांस परिचितच आहे. तेव्हा अधिक सांगावयास नको.

अशा त-हेच्या विषयासंबंधाने आपन नवीन नवीन माहिती जमविली पाहिजे. दुस-या देशातील चळवळींचा व अडचणींचा इतिहास समजून घेतला पाहिजे. पण आधी मीमांसा व नंतर माहिती.

समाजसेवेचे महत्त्व समजण्यास नुसत्या अशा व्याख्यानांचा फारसा उपयोग नाही, व्यक्तीचे दर्शन झाले पाहिजे. संस्थेचे कामच पाहिले पाहिजे. ह्या विषयावर इंग्रजीत पुष्कळ पुस्तके आहेत, ती वाचल्यास पुष्कळ फायदा होईल. पाश्चात्यांकडेही ही चळवळ नवीन असल्याचे सांगितलेच. इंग्लंडातील पहिली “धर्मोदायाची संघटना करणारी संस्था” सन १८६९ त स्थापन झाली. अमेरिकेत पहिली संस्था १८९८ त निघाली. आता त्याचे काम झपाट्याने चालले आहे. १९०७ मध्ये प्रथम एका गावी एका शाळेत ह्या विषयाचे खास शिक्षण देण्यास सुरुवात झाली. १९१० मध्ये अमेरिकेतील जवळजवळ बहुतेक शाळांत ह्या विषयाच्या शिक्षणाची सोय करण्यात आली. आपल्याकडे आज शाळा न निघाल्या, तरी तुम्ही निदान त्यावरील पुस्तके वाचा. निदान त्यांचे मथळे वाचा. सामान्य ज्ञानाचा आता थोडा वीट येऊन विशेष ज्ञानाकडे, विशिष्ट विषयांच्या ज्ञानाकडे आपण वळलें पाहिजे.

संसारसुखाची साधने

(ता. ९-५-१० रोजीं केलेल्या उपदेशाचा सारांश.)

“हिरा ठेवितां ऐरणीं | वाचे मारितां जो घणीं ||
तुका म्हणे तोचि संत | सोशी जगाचे आघात ||”

गेल्या दोन खेपांस आपण नैराश्यवादाचे निरसन आणि आपल्या वाङ्मयामध्येही आनंदवादाची जी वचने आहेत त्यांचे अवलोकन केले. ह्या खेपेस संसारसुखाची साधने काय आहेत ते आपण पाहू. पहिले साधन विषयांची संपादणी होय, हे येथे स्पष्ट रीतीने सांगितले पाहिजे. आजपर्यंत धर्ममार्गातल्या माणसांनी सांसारिक विषयांची अवहेलना वाजवीपेक्षा अधिक केलेली आहे. विषय म्हणजे सर्वस्वी त्याज्य, केवळ दु:खावह असा साधारण समज करून दिला आहे. पण हा केवळ प्रत्याघाताचा प्रकार आहे. विषयातच सर्व पौरूषाचे पर्यवसान झाल्यामुळे तदितर जी सुखे आहेत त्यांच्यापासून मनुष्य दुरावतो, म्हणून नुसती विषयातिरेकाचीच अवहेलना व्हावयास पाहिजे, समूळ विषय तितके वाईट हा समज चुकीचा आहे. ईश्वराने बाह्य सृष्टीमध्ये रूपरसगंधादी अनेक सुंदर आणि सुखावह विषय उत्पन्न केले आहेत आणि त्यांच्या उपभोगासाठी आपल्यामध्ये चक्षुश्रोत्रादी पंचेंद्रियांची साधने दिली आहेत. ह्या ईश्वरी संकेतान्वये संसारात जेव्हा जेव्हा आमच्या इंद्रियांचा आणि बाहेरील अर्थाचा संनिकर्ष होतो तेव्हा तेव्हा आपल्याला जी अनुकूल संवेदना किंवा सुख होते ते खोटे किंवा वाईट असे म्हणणे हा नुसता भ्रम आहे, इतकेच नव्हे तर ही ईश्वराची बदनामी आहे. विषय सुखावह आहेत ह्याविषयी विशेष निरूपण करावयाला नको. हा अज्ञान माणसास आणि सर्व प्राण्यांसही नित्य घडून येणारा अनुभव आहे. पण ह्यासंबंधी वरील जी प्रत्याघाताची भावना होते आणि मनाची ह्याच्या उलट अतिरेकाची वृत्ती होते त्यामुळेच विषयाविषयी सम्यक् ज्ञान करून देण्याची जरूरी वाटली. विषय हा आमच्या जीविताचा पाया म्हणून त्याची संपादणी यथाशक्ती सर्व प्रयत्न करून केलीच पाहिजे. ह्यातून कोणीही आपल्याला सोडून घेऊ नये. “गृह त्यजे तो मठी बनावे उदिम त्यजे तो फेरी” ह्या दोह्यामध्ये कबीराने म्हटल्याप्रमाणे बैराग्यांनी जरी घराचा त्याग केला तरी त्यांना मठ बांधावा लागतो, आपला धंदा सोडला तरी भिक्षेसाठी फेरी करावी लागते. विषय काही कायमचे सुटत नाहीत. विषयाची संपादणी श्रमविभागामुळे व्यक्तिपरत्वे कमी अधिक होईल, परंतु त्याचा समूळ सर्वांनीच त्याग करून व्यवहार जसा चालणार नाही तसा धर्मही चालणार नाही. ह्याविषयी मनात कोणताही आडपडदा आणि भाषणात अर्धवटपणा न ठेवता सर्व धर्मोपदेशकांनी असे मोकळ्या अंत:करणाने प्रतिपादन केले पाहिजे की, शक्य ते प्रयत्न करून विषय संपादन करणे हा एक मनुष्याचा पवित्र पुरूषार्थ आहे व अशी धर्माची आज्ञाही आहे.

पण एवढ्याने आपल्या सुखाची पूर्थता होत नाही. ह्याहून सुखाची निराळी द्वारे आहेत. ह्या संसारात वारंवार आपणावर दु:खाची आपत्ती येते. क्रूर आणि अन्यायी पिता, कृतघ्न आणि कर्तव्यहीन पुत्र, जाच करणारी सासू, अपमान करणारी सून, जुलमी धनी, चुकार चाकर इत्यादी एकेक किंवा सर्व मिळून आपत्ती एकाद्या व्यक्तीवर एकदम येण्याचा संभव आहे. ह्या ठिकाणी प्रयत्नाचे काही चालत नाही. यत्नाचा हा प्रदेशच नव्हे. अशा प्रसंगी सहनच करणे जरूर असते. शांत आणि तेजस्वी वृत्ती ठेवून ह्या आपत्ती जर आपण आदराने स्वीकारू तर संसारातील सुखाचे द्वार जणू उघडलेले दिसेल. ह्या आपत्तीच उलट आपल्या सुखाची सामग्री होते. सहन करण्याचे हे प्रसंग संसारातून अजीबात काढून टाकले तर आपल्या सुखाचा एक महत्त्वाचा भाग गळाला असे होईल, तेणेकरून आपल्या मानसिक शक्तीला व्यायाम नाहीसा होऊन ते दुबळे आणि नरम होऊन जाईल, इतकेच नव्हे तर आपल्या अनुभवालाही एकदेशीयपणा येईल. वरील विषयसंपादणीच्या बाबतीतही हा व्यायामाचाच भाग प्रधान असतो. अमुक विषयांची जोड मिळाली ह्यातच सुख नसते तर ते ते विषय मिळविताना आपण जे प्रयत्न करतो ते प्रयत्न्ही सुखावह असतात. प्रयत्नाने मिळविलेली संपत्ती वारसाने मिळविलेल्या संपत्तीपेक्षा अधिक प्रिय वाटते. तर ज्याअर्थी शारीरिक व्यायामापेक्षाही मानसिक व्यायामाची सुखावहता अधिक आहे, व ज्या ज्या मानाने आपत्ती अधिक येऊन ती सहन करण्यामध्ये आम्हांला यश येईल त्या त्या मानाने आम्ही सुखाचे अधिक वाटेकरी होऊ.

पण ह्यावरून आम्ही मुद्दाम आपत्ती हुडकीत जावे असे समजू नये. क्रूर पित्यापेक्षा मायाळू पिता आणि कृतघ्न पुत्रापेक्षा निष्ठावंत पुत्र अधिक वाईट अशातला अर्थ नाही. वरील आपत्ती सहज आलेल्या ब-या, आपल्याला सहन करण्याचे सुख मिळावे म्हणून त्या ओढूनताणून आणणे बरे नाही.

वरील आपत्ती आल्यास त्या सोसाव्या, एवढ्यावरून त्या टाळण्याचा प्रयत्न करू नये असे नव्हे. त्या जर आपल्या दोषांनी येत असल्या तर सहन करण्याचा मुळी प्रश्नच उरत नाही. परंतु त्या जर दुस-याच्या दोषाने येत असल्या तर ते दोष निवारण्याचे प्रयत्न करीत असणे हे सुखाचे तिसरे साधन होय. आपले आप्त, इष्टमित्र किंबहुना शत्रूदेखील ह्यांच्या दोषांचे सात्विकपणे निवारण करण्यातही एक प्रकारचे श्रेष्ठ सुख आहे. श्रीकृष्णाने सांगितलेल्या वृत्रइंद्राच्या गोष्टीत वरील दोनच सुखे सांगितली आहेत. वृत्राला विषयातून हुसकावून लावून ती सुखाची शुद्ध साधने होतील असे करणे आणि त्याने आपल्या आत्म्यात आश्रय घेतला असता तेथूनही हुसकून लावून आत्म्यासही सुखाचे शुद्ध साधन करणे ह्या दोन गोष्टी झाल्यावर तिसरे मोठे साधन म्हणजे आपल्या शत्रु-मित्राच्या आत्म्यातूनही वृत्राला म्हणजे सुखाच्या अडथळ्याला हुसकून लावणे हे होय. वेदकाळी नुसते पहिलेच साधन साधले गेले. श्रीकृष्णाच्या काळी दुस-या साधनाची जोड मिळाली. आधुनिक काळी विचाराची आणि अनुभवाची पायरी ह्याहूनही पुढे गेली असल्यामुळे ह्या तिस-या साधनाची जोड मिळालेली आहे. आता मनुष्य केवळ व्यक्तिश: मुक्तीने किंवा पूर्णावस्थेने तृप्त होऊ शकत नाही. व्यक्तीचे विचार आणि अनुभव सर्व पूर्णावस्थेने तृप्त होऊ शकत नाही. व्यक्तीचे विचार आणि अनुभव सर्व समाजाच्या किंबहुना मनुष्य जातीच्या विचारात व अनुभवात मुरून गेलेले आहेत. पूर्णावस्था व्हावयाची ती सर्व जातींची आणि तद्वाराच व्यक्तीची होत असते अशी ही आधुनिक विकसित भावना आहे.

संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष

संतांचा धर्म

ब्रह्म सर्वगत सदा सम | जेथे ज्ञान नाही विषम ||
तया जाणतो ते अति दुर्गम | तयांची भेटी झालीया भाग्य परम ||१||
ऐसे ऐसियाने भेटती ते साधु | ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधु ||
जे कां सच्चिदानंदी नित्यानंदु | जे का मोक्षसिद्धि तीर्थाबंद्यु ||२||
भाव सर्व कारण मूळबंदु | सदा समबुद्धि नास्त्यिक्य भेदू ||
भूत कृपा मोडी द्वेषकंदु | शत्रुमित्र पुत्र सम करा बंधु ||३||
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करी | रूप सर्वत्र देखोनि नमस्कारी ||
लघुत्व सर्वभावे अंगिकारी | सांडी मांडी मी तू पण ऐसी थोरी ||४||
अर्थ काम चाड नाही चित्ता | मानामानहि मोहमाया मिथ्या ||
वर्ते समाधानी जाणोनि नेणतां | साधु भेटी देती तया अवचिता ||५||
मनी दृढ धरी विश्वास | न करी सांडी मांडीचा सायास ||
साधुदर्शन नित्यकाळ त्यास | तुका म्हणे जो विरला जाणिवेस ||६||

There is a certain composite photograph of universal saintliness, the same in all religions of which the features can easily be traced.

(1) Afeeling of being in a wider life than that of this world’s selfish little interests; and a conviction of the existence of an Ideal Power.

(2) A sense of friendly continuity of the ideal power with our own life and a willing self-surrender to its control.

(3) An immense elation and freedom as the outlines of the confining self-hood melt down.

(4) A shifting of the emotional centre towards loving and harmonious affections; towards ‘yes, yes’ and away from ‘no’ where the claims of the non-ego are concerned. These fundamental inner conditions have characteristic practical consequences as follows:-

(a) Asceticism :- The self-surrender may become so passionate as to turn into self-immolation. It may then so Overrule the ordinary inhibitions of the flesh that the saint finds positive pleasure in sacrifice and asceticism measuring and expressing as they do the degree of his loyalty to the higher power.

(b) Strength of Soul :- The Sense of enlargement of life may be so uplifting that personal motives and inhibitions commonly omnipotent, become too insignificant for notice, and new reaches of patience and fortitude open out. Fears and anxieties go,and blissful equanimity takes their place, Come Heaven, come hell, it makes no difference now!

( C ) Purity :- The Sensitiveness to Spiritual discord is enhanced and the cleansing of existence from brutal and sensual elements becomes imparative. Occasions of contact with such elements are avoided the saintly life must deepen its spiritual consitency and keep unspotted from the world.

(d) Charity :- The ordinary motives to antipathy which usually set such close bounds to tenderness among beings are inhibited. The saint loves his enemies and treats loathsome beggars as his brothers, (varieties of Religious Experience, by Prof. W. James, PP, 271-4)

वर जे दोन उतारे दिले आहेत. त्यांपैकी पहिला आपल्या एका जुन्या संताचा आहे व दुसरा एका प्रमुख आधुनिक तत्त्ववेत्त्याचा आहे. देश, काल आणि दृष्टी ह्या तिन्ही बाबतीत संत तुकाराम आणि पंडित जेम्स हे परस्परांहून अगदी भिन्न आहेत, तरी पण संतपणाची लक्षणे काय आहेत, हे ठरविण्याचे कामी दोघांचे कसे अपूर्व मतैक्य झाले आहे हे दाखविण्यासाठी वरील लांब उतारे घेतले आहेत. आणि ह्यांवरून दोघांमध्येच एकमत आहे असे नव्हे, तर संत कशा प्रकारची माणसे असतात ह्याविषयी सर्व देशी, सर्व काळी सर्व दर्जाच्या लोकांत बहुत करून फारशी गैरमाहिती किंवा मतभेद नसतो हे उघड होते. असे असून जर संतांविषयी अपवाद ऐकू आले किंवा त्यांचेवर आक्षेप घेण्यात आले, तर ते सहज चुकून किंवा त्यांच्याविषयीच्या गैरमाहितीमुळे नव्हेत तर जाणूनबुजून घेतले असले पाहिजेत.

सुमारे दहा वर्षांपूर्वी ‘संत आणि संताळ्याचा धर्म’ अशा मथळ्याखाली सुधारक पत्रातून अपवादक लेख येत होते. शेवटी ‘तुकाराम श्रेष्ठ की वाग्भट श्रेष्ठ’ ह्या प्रश्नाचा निकाल बिचा-या संतांच्या बहुतेक उलटच झाला होता. त्यानंतर मधून मधून हा विषय चर्चेसाठी पुढे येत आहे. आज पुन: त्याच ‘तुकाराम विरूद्ध वाग्भट’ दाव्याची एका दृष्टीने फेरतपासणी चालली आहे. परवा पुण्यास ग्रंथकारांचे संमेलन भरले असता एका निबंधकाराचा रोख असा होता की, फार तर रामदासाला तेवढे वगळले असता इतर कोणत्याही महाराष्ट्रीय संतांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव नव्हती आणि म्हणून अर्थातच त्यांच्या हातून राष्ट्राच्या उत्कर्षासाठी काही झाले नाही. ह्या आक्षेपानंतर तेथल्या तेथेच तुकारामाबद्दल थोडीशी तरफदारी करण्यात आली होती, आणि मागाहून येथील एका दैनिक पत्रात एक अनुकूल लेख आला होता. पण एकंदरीत संतांविषयी जे दुर्लक्ष अलीकडे वाढत्या प्रमाणावर आहे, त्याचा ओघ काही अद्यापि फिरला नाही. आणि ह्या धामधुमीत पुन: नवीन संतच उत्पन्न झाल्याशिवाय तो ओघ लवकर फिरण्यची चिन्हही दिसत नाहीत. तथापि, दहा वर्षांपूर्वी हा प्रश्न प्रथम निघाला होता. तेव्हा ह्या पीठावरून ह्याचा विचार झाला होता, तसा आताही धर्मदृष्टीने विचार होणे जरूर आहे.

प्रथम आपण संतांवर कोणते कोणते आक्षेप घेण्यात येतात ते पाहू :-

पहिला आक्षेप :- हा येतो की संत हे नेहमी ईश्वरद्रष्टे असतात, ज्या वास्तविक जगात ते राहतात तेथील अपूर्णता आणि विषमता त्यांचे नजरेत भरत नाही. त्यांचा सर्व काळ आदर्शमय पूर्म जगाकडेच लय लागला असल्याने ह्या प्रासंगिक जगातील निरनिराळ्या जबाबदा-या सांभाळण्याची पात्रता त्यांचे अंगी नसते. येथील अडीअडचणीत इतरांप्रमाणे त्यांचेही पाय अडखळत असता पारलौकिक सुखातच ते निमग्न असतात. त्यामुळे त्यांचे वृत्तीत वाजवीपेक्षा जास्त तृप्तता येऊन त्यांचे स्वत:चे आणि भोवतालचे सामाजिक जीवन हळूहळू शिथिल होऊ लागते. येथील वेळोवेळी बदलणारी स्थिती व त्यातून सतत चालू असलेला विकास वगैरे इहलोकचा सोहळा, त्यांना न कळल्यामुळे त्यांची स्वत:ची वाढ खुंटलेली असते. एकंदरीत एकदेशीयता, अरसिकता व म्हणून अपूर्णता त्यांचे ठायी असते.

दुसरा आक्षेप :- संतांचे मनात नेहमी पूर्ण जगाचेच वारे खेळत असल्यामुळे ते केवळ निंदास्तुतीचाच नव्हे तर प्रत्यक्ष सुखदु:खाचा आनंद, अद्वेगाचा किंबहुना ब-यावाईटाचाही सबगोलंकार करून सोडतात. इकडे व्यवहारात सुधारक जातिभेद मोडण्याचा नुसता प्रयत्नच करीत आहेत, तर इकडे ह्या संत-सुधारकांनी विचारसृष्टीतील सर्वच द्वंद्वांचा फन्न उडवून दिला आहे. न्याय, अन्याय, धन आणि ऋण ही सारी टक्का शेर मापाने मोजणे, पुत्र आणि शत्रू, रंक आणि राव ह्यांवर प्रेमाचा सारखाच पाऊस पाडणे हा शुद्ध अविवेक नव्हे, तर काय?

तिसरा आक्षेप :- ब-या वाईटाला सारखेच आलिंगन दिल्याने ब-याची वाढ आणि वाईटाचा प्रतिकार करण्याची बुद्धी नाहीशी होऊन संत स्वत: दुबळे होतात व दुस-याला दुबळेपणाचा कित्ता घालून देतात. अशक्तांना आपला कमकुवतपणा एक गुणच वाटतो, सशक्तांच्या शक्तीचा उपयोग न झाल्यामळे ती जागच्या जागीच लयाला जाते. कोणी एका गालावर मारील तर त्याच्या दोन्ही गालांवर रोकडा न्याय ठेवून दिला तरच आतताईपणावर नीट वचक बसेल. नाही तर एका संतामागे दहा गुंड आणि शंभर दुबळे जन्मास येणार आणि आपली आज्ञा मोडल्याबद्दल सृष्टीदेवीही, संत असंत काहीच न पाहता सरसकट आपला सूड उगविणार खास !

येणेप्रमाणे एकदेशीयता, अविवेक आणि दुर्बलता ह्यांची वाढ केल्याने तीन आरोप संतमंडळीवर ठेवण्यात आले आहेत. फिर्यादीतर्फे बळकट पुरावा सादर करण्यात आला आहे. आणि इकडे आरोपींना तर आपली नुसती तरफदारी देखील करण्याची इच्छा नाही. शिवाय ह्या खटल्याचा फैसला करण्याकरिता तुम्हा आम्हा जनसमूहाची जी प्रचंड ज्युरी बसली आहे, तिच्यात आरोपीच्या जातीचे कोणी दिसत नाही, तो प्रकार असा:

माणूसपणाचे दोन प्रकार आहेत. एक संतांचा आणि दुसरा वीरांचा, मग ते वीर्य लेखणीचे असो किंवा तलवारीचे असो किंवा तराजूचे असो, वीर्य ते एकच. जे स्वत: संतही नाहीत आणि वीरही नाहीत अशा नामधारी माणसांचाच भरणा पुष्कळ आणि हो खोगीरभरतीच प्रस्तुत खटल्यात ज्यूरीच्या उच्च पदावर विराजमान झाली आहे, ह्या भरण्यातली तुम्ही आम्ही साधी माणसे बहुतकरून वीरपक्षाची म्हणजे वीरांचेच चहाते आणि अनुयायी असतो. कारण संताचे चाहाते होण्याला अंगी तेवढ्यापुरता तरी संतपणाच यावा लागतो, आणि तो आला की आमची गणना ज्यूरीतून आरोपीत होऊ लागते. पण उलटपक्षी वीरांचे चहाते होण्याला अंगी वीर्य पाहिजे असे नाही. इतकेच नव्हे तर ज्या प्रमाणाने अंगी वीर्याचा अभाव जास्त, त्या प्रमाणाने वीरांची चहाही जास्त असण्याच संभव आहे. एक वीर दुस-याशी फटकून असतो. पण संत संताला भेटला, तर परस्पर लोटांगणच व्हावयाचे. पंढरपूरसारख्या ठिकाणी ह्या गोष्टीचा निदान प्रघात तरी पाहण्यात येतो. एकंदरीत तुम्ही-आम्ही वीरपंथी माणसे. ह्या संतांच्या अपूर्व खटल्याची चवकशी करण्यास्तव ज्यूरीच्या ठिकाणी बसलो आहो !

संतांच्यासंबंधाने वर जे मुख्य तीन आक्षेप घेण्यात आले आहेत, त्यांचा थोडा विचार केला असता कळून येईल की ते सर्व आक्षेप वीरांच्या दृष्टीने वीरपंथीयांनी घेतले आहेत. संतांना आणि वीरांना समोरासमोर उभे केले तरी जे आक्षेप वीरदृष्ट्या संतांवर लागू झाले आहेत, त्यांचीच दुसरी बाजू बरोबर वीरांना लागू होते आणि ह्याच तुलनेचा विचार करताकरता शेवटी श्रेष्ठ कोण ह्यासंबंधाचा अगदी निर्णय जरी झाला नाही तरी बरीच सूचना तरी मिळते. पहिला आक्षेप एकदेशीयत्वाचा संतांप्रमाणेच वीरांनांही लागू आहे. संत जर केवळ ईश्रवद्रष्टे किंवा आदर्शाकडेच पाहणारे असले, तर वीरही नुसते जगद्रष्टे अथवा वस्तुस्थितीकडेच पाहणारे आहेत. इहलोकीच्या व्यवहारधुराने वीरांचे डोळे नेहमी इतके भरलेले असतात की त्यांना संतांच्या अंतरीच्या दृढ शांतीची ओळखदेखील नसते. तसेच इहलोकातील व्यवहारसुख संतांना समजत नाही. म्हणून त्यांना अरसिक असे म्हणता येत नाही. आपली नातवंडे काठीचा घोडा आणि मेणाची बाहुली घेऊन खेळताना आजोबांना जसे कौतुक वाटते तसेच संतांनाही वीरांचे शौर्य-धैर्य-चातुर्याचे व्यवहार पाहून कौतुकच  वाटत असते. पण विशेष थोरवी वाटणार नाही. ज्या डोळ्यांनी ईश्वरी लीला पाहिली त्यांना मानवी कृत्यांची थोरवी वाटणे म्हणजे घोडेस्वाराला चिरगुटाच्या घोड्याबद्दल अभिमान वाटण्याइतकेच संभवनीय आहे. ह्यावरून ह्या बाबतीत संतांवर अरसिकपणाचा आक्षेप येत नाही. तर उलट वीरांवरच अप्रबुद्धपणाचा आक्षेप येऊ पाहतो. तसेच संतांमध्ये फाजील समाधान असल्यामुळे जीवनकलहाला आवश्यक असा त्यांच्यामध्ये मनगटाचा जोर (Strenuous Life) नसतो, हाही आक्षेप बरोबर नाही. सर्वव्यापी ईश्वराची पूर्णता ज्यांनी केवळ विचारानेच नव्हे तर स्वानुभवाने निरखिली त्यांचा जीवनकलहच बंद होतो आणि जीवनानंदाचा शाश्वत झरा वाहू लागतो. तेथे मनगटाच्या जोराची भान कोणाला राहणार आहे ! अशा वेळी त्याची आठवण देखील ठेवणे म्हणजे पालखीत बसूनही कुबड्यासाठी हळहळण्याप्रमाणे ग्राम्यपणाचे होणार आहे. ह्याचप्रमाणे संतांवर अविवेकाचा जो आरोप आला आहे त्याची दुसरी बाजू म्हणजे अविश्वासाचा आरोप बरोबर वीरांच्या माथी येत आहे. आम्ही जर एकाद्या आप्त पुरूषाच्या घरी गेलो तर त्या आप्तावर आमचा जो अभेद विश्वास असतो त्यामुळे त्याच्या घरची गोष्ट अमुक आपल्याला हितकर असेल तमुक हितकर असेल अशी वेडगळ शंका घेणे मुळीच संभवत नाही. आप्ताचे घरी शिरल्याबरोबर जाणीव आणि संकोच सर्व सहजच गुंडाळून ठेविली जाते. ईश्वर आप्त झाल्याने संतांना सर्व विश्व आपले घर वाटते. विश्वास आणि विभ्रम ही मनाची स्वाभाविक स्थिती होते. विवेकाला अवकाशच उरत नाही. हे शब्दांनी सांगून कोठवर भागेल! हा प्रत्यक्ष प्रमाणांचाच विषय होय. तिसरा आक्षेप दुबळेपणाचा तर सर्वात अज्ञानमूलक आहे. संत वाईटाचा प्रतिकार करीत नाहीत ह्याचे कारण त्यांचा दुबळेपणा नव्हे तर विश्वामध्ये जे सर्वगामी सामर्थ्य नांदत आहे त्याचे त्यांना जे प्रत्यक्ष दर्शन होत असते ते होय. ज्याला साम्राज्य दिसत नाही तोच मनुष्य आपल्या संरक्षणाची तयारी करील. ऐहिक साम्राज्यापेक्षा ईश्वरी साम्राज्य कमी दर्जाचे असेल काय? ऐहिक राजनिष्ठेपेक्षा ईश्वरासंबंधी राजनिष्ठेची किंमत कमी ठरेल काय? तर मग ऐहिक राज्यामध्ये आम्ही जर पदोपदी शस्त्र धारण करून वर्दळीला येत नाही तर ईश्वरी साम्राज्यात शस्त्रांचा म्हणजे प्रतिकाराचा प्रयोग ह्याहूनही कमी व्हावयाला नको काय? आणि ईश्वरी साम्राज्य जर पूर्ण प्रकारचे आहे तर प्रतिकाराचा तेथे अत्यंताभावच राखला पाहिजे! नको काय? ह्या दृष्टीने पाहता वीरांची कृत्ये म्हणजे एक तर त्यांच्या आंधळेपणामुळे घडत असावी, नाही तर त्यांच्या आतताईपणामुळेच घडत असतात असे दिसते.

असो. संतांच्या दृष्टीने वीरांना दोषी ठरवावे का वीरांच्या दृष्टीने संतांना दोषी ठरवावे हे ठरविण्याचे काम माझे नाही, फक्त वर सांगितलेला दृष्टिभेद किती महत्त्वाचा आहे हे दाखविण्याचा माझा उद्देश होता. संत मंडळींवर एकदाच निवाडा करण्यासाठी तीन आरोप ठेवण्यात आले. बळकट पुरावा मांडण्यात आला. संत स्वत: तर स्तब्धच बसले आणि निकाल देणारी ज्यूरी पहावी तर अन्य जातीय. हा सर्व करूणास्पद प्रकार पाहून वरील दृष्टिभेद स्पष्ट दाखविला नाही, तर एकतर्फी निकाल होऊन घोर अन्याय होणार अशी भीती पडली ! म्हणून वरील भेद दाखविला तो पाहून काय ठरवावयाचे ते ज्याने त्याने ठरवावे.

जगामध्ये संत आणि वीर अशी दोन प्रकारची माणसे असतात असे वर सांगितले. पण जे संत असतात त्यांमध्ये वीर्य मुळीच नसते किंवा जे वीर असतात त्यांमध्ये संतपणाचा अत्यंताभाव असतो असेही नाही. तथापि, दोघांचे विशेष गुण भिन्न असतात. वर जी दोघांची तुलना केली तिजवरून एक गोष्ट दिसते ती ही की वीरांमध्ये नाही असा संतांमध्ये एक विशेष गुण आहे. आदर्शमय अथवा आगामी जगाचा प्रकाश संतांना जसा व जितका मिळालेला असतो तितका व तसा वीरांना मिळाला नसतो. अर्थात वीरांना हा वरील प्रकाश थोड्या अंशांने का होईना, मिळाल्याशिवाय त्याला वीर्याची स्फूर्तीच येणार नाही. पण ज्या प्रकाशाचे थोडेच किरण वीराच्या स्फूर्तीला कारण होतात त्या प्रकाशाचा सतत वाहणारा झोत संतांवर पडत राहिल्यामुळे त्यांची सारी वृत्ती बदलून जाते. त्यांचे इहलोकीचे व्यवहार लटपटतात. पण वीरांचे अशी विव्हल दशा झाली नसल्यामुळे व स्फूर्तीपुरताच किरणांचा लाभ झाल्यामुळे ते आपल्या अंगच्या शक्तीचा संचय करू शकतात, व्यय करू शकतात आणि विकासही करू शकतात, प्रस्तुत जग त्यांच्या कर्तृत्वाला योग्य क्षेत्र होते. आणि त्यांच्या चरित्राचा परिणाम राष्ट्राच्या उत्कर्षात झालेला उघडउघड दिसतो. पण संतांचा असा उघड प्रकार होत नाही. म्हणून तेवढ्यावरून संतकोटी वीरकोटीहून कनिष्ठ दर्जाची म्हणता येत नाही. इतकेच नव्हे तर प्रकाशाचा वाटा त्यांना अधिक मिळाल्यामुळे अंतरीचे सुख आणि शांती, समाधान आणि शक्ती इ. गुण वीरांपेक्षाही त्यांच्यात फार उच्च दर्जाचे आणि बळकट जोमाचे असतात म्हणून राष्ट्राच्या इतिहासात नाही तरी मनुष्यजातीच्या इतिहासात त्यांचे तेज अधिक फाकते. असो. संतांची ही थोरवी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने राष्ट्राच्या उत्कर्षाला कशी कारणीभूत होते हे पुढे केव्हा तरी ईशकृपेने पाहू.

संग व विषय

(कल्याण येथें डॉ. खांडवाला यांचे घरीं केलेल्या उपदेशाचा सारांश इं. प्र. १७-८-१९१०.)

संगे वाढे शीण न घडे भजन | त्रिविध हे जन बहु देवा ||
याचिमुळें आला संगाचा कंटाळा | दिसताती डोळा नाना छंद ||
एकविध भाव राहावया ठाव | नेदी हा संदेह राहो चित्तीं ||
शब्दज्ञानी हित नेणती आपुलें | आणिक देखिलें नांवडे त्यां ||
तुका म्हणे आतां एकलेंचि भलें | बैसोनि उगलें रहावें ते ||

या अभंगांत तुकारामबुवा म्हणतात-संगाचे योगानें शीण येतो, व भजन कांहीं घडत नाहीं. बरें, वाईट व मध्यम असे तीन प्रकारचे लोक ह्या जगामध्यें आहेत. त्यांच्या संगानें मनाची एकाग्रता होत नाहीं. एकाचा कल एकीकडे, दुस-याचा दुसरीकडे, तिस-याचा तिसरीकडे अशी स्थिती सर्वत्र आहे. नानाप्रकारचे छंद दृष्टीस पडतात. एक म्हणतो संसार सांभाळा, दुसरा म्हणतो समाज, राष्ट्र वगैरे सांभाळा अशा प्रकारच्या छंदामध्ये मनास भ्रांती पडते, भजन सुचत नाहीं. नाना प्रकारचे गुरू, नाना प्रकारचे पंथ, नाना प्रकारची सोंगे, ढोंगे यामुळें एकविधि बाव रहात नाहीं, व मन छंदाधिस्थ होऊ जातें. नुसत्या शब्द ज्ञानानें आपल्या हितास धोका पोहोंचतो. ‘अर्थे लोपलीं पुराणें’ अशी स्थिती होते. असा प्रकार संगाचा होतो, म्हणून संगापासून दूर रहाणेंच बरें. अशाच प्रकारच्या संगाविषयींचा कंटाळा त्यांनी खालील अभंगांत दाखविला आहे.

रुसलों आम्ही आपुलीया संसारा | तेथे जनाचार काय पाड ||
आम्हां इष्टमित्र सज्जन सोयरे | नाहीं या दुसरें देवाविण ||
दुराविले बंधु सखे सहोदर | आणीक विचार काय तेथें ||
उपाधि वचन नाइकती कान | त्रासलें हें मन बहु माझें ||
तुका म्हणे करा होईल तें दया | सुख दुःख वायां न धरावें||

आम्ही आमच्या संसारावरच रूसलों आहों, तर जनाच्या आचाराला घेऊन आम्हांस काय करावयाचें आहे ! एकाच घरांतील कुटुंबांतील माणसांचें जमत नाहीं. बापाचा पंथ वेगळा, मुलाचा वेगळा. नव-याचा हव्यास निराळा, बायकोचा निराळा. बहीण, भाऊ यांचे जर एकमेकांशीं पटत नाहीं तर इतरांची गोष्ट बोलावयासच नको. या त्रासानें माझें मन भांबावलें आहे. तर देवा ! मला हा संसार नको, ही उपाधी नको, मी रानामध्यें जाऊन या संगापासून दूर राहीन. संसारांतील उपभोग्य जे विषय त्याविषयी नामदेव म्हणतात :

विषयीं आसक्त झालें माझें मन | न करी तुझें ध्यान देवराया ||
नाथिले संकल्प करी नानाविध | तेणें थोर खेद पावतसे ||
ऐसा मी अपराधी दुराचारी देवा | भेटसी केधवां कवणें परी ||
आयुष्य सरे परी न सरे कल्पना | भोगावी यातना नानाविध ||
जरा-व्याधि-कष्ट भोगिता संकटीं | होतसें हिंपुटी चित्त माझें ||
आशा मोहोरत भ्रांत माझें चित्त | चुकलों निजहित नारायणा ||
तूं अनाथ कैवारी म्हणुनी धांवा करी | सोडवी श्रीहरी म्हणे नामा ||

माझें मन विषयामध्ये आसक्त झाल्यामुळे ते ध्यानस्थ होत नाही. अनेक प्रकारचे नसतेच संकल्प मनात उद्भवतात. अमुक मान मिळवावा, अमके धन मिळवावे म्हणून सारखा विचार चाललेला असतो. आयुष्य संपून जातें, पण कल्पना कांहीं संपत नाहीं. अनंत लोक स्वर्गस्थ झाले पण कल्पना म्हणून जशाच्या तशाच कायम राहिल्या आहेत. विषयांच्या मोहामुळें माझें मन भ्रांत होतें.

तुकाराम म्हणतात संग नको व नामदेव म्हणतात विषय नकोत. अशाच प्रकारचा उपदेश चोहोंकडे बहुतकरून ऐकू येतो. पण आज आपण तर संघ बनवून ह्या ठिकाणी जमलो आहो. मग परस्पर विरूद्ध ह्या दोन गोष्टींची आता सांगड ती कशी घालावयाची. तुकाराम ज्याप्रमाणे संग नको म्हणून म्हणतात, त्याचप्रमाणे तो पाहिजे असेही म्हणतात.

संगतीने होतो पंगतीचा लाभ | अशोभी अनुभव असिजेते||
जैसी तैसी असा पुढिलांचे सोई| धरिती हाती पायी आचारिये||
उपकारी नाही देखत आपदा| पुढिलांची सदा दया चित्ती||
तुका म्हणे तरी सज्जनांची कीर्ती| पुरवावी आर्ति निर्बळाची||

ज्या पंगतीला आपण जेवावयास बसतो त्या पंगतीचा लाभ आपणांस मिळतो. राजाच्या पंगतीमध्ये एकदा का शिरकाव झाला म्हणजे राजाला मिळणारे पदार्थ आपल्याला मिळावयाचेच. आम्ही कोण, गरीब का मोठे असे प्रश्न वाढपी विचारीत नाहीत. त्याचप्रमाणे आचार्यांनी, सज्जनांनी धर्मस्थापनेकरिता जे संग स्थापिलेले असतात त्या संगांमध्ये जाण्याचा अवकाश की लागलीच आपणास त्याचा लाभ मिळतो. दुबळ्याची आपत्ती निवारण करण्याकरिताच संग स्थापलेले असतात. एकट्याने बसून काही होत नाही. दुसरे एके ठिकाणी म्हटले आहे की,

संगत करे सज्जनकी| बढत बढत बढ जाय||
संगत करे नीचनकी| तो फल छोड फत्तरकी||
साधूको साधू मिले तो| हशी खुषीसे दो बात||
और गद्धेकु गद्धा मिले| तो उडउडाके दो लात||

संगत करावयाची तर उत्तम संगाबरोबर केली पाहिजे. पंखा मोडलेली नाव पंखा न मोडलेल्या नावेला धरून तरून जाते त्याप्रमाणे दुर्जन सज्जनाच्या मदतीने तरून जातो. संग करावयाचा तो सज्जनांबरोबर करावा, नाहीपेक्षा एकांती राहणे बरे. विषयाविषयी तुकाराम म्हणतात :

वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे| पक्षीही सुस्वरे आळविती||
येणे सुखे रूचे एकांताचा वास| नाही गुण-दोष अंगा येत||
आकाश मंडप पृथिवी आसन| रमे तेथे मन क्रीडा करी||
कंथा कमंडलु देह उपचारा| जाणवितो वारा अवसरू||
हरिकथा भोजन परवडी विस्तार| करोनि प्रकाश सेवे रूचि||
तुका म्हणे होय मनासी संवाद| आपुलाचि वाद आपणासी||

जे उपभोग्य पदार्थ ईश्वराने निर्माण केले आहेत, त्यांवर आसक्ती न ठेवता त्यांचे सेवन करावे. विषयांचा उपभोग घेत असताना गर्व, अहंकार, कोतेपणा जर उत्पन्न झाला तर मग ते विषय नसलेले पुरवले. बागेमध्ये फिरावयास गेलो असता हा बाग माझ्या आजाचा, माझ्या आजानेच ही झाडे लावली, माझा आजा कितीतरी वाकबगार होता, असा अहंकार उत्पन्न होऊन तेथील वृक्ष, वल्ली, फळे-फुले ह्यांचा उपभोग घेण्यापेक्षा त्यांचा नाश झालेला पुरवला. अहंकार अवनतीला कारण होतो. शुद्ध भावनेने विषयांचा आदर करावा. निरहंकारभावाने आपण सृष्टीमध्ये वावरू लागलो, तर संग व विषय आपल्या घातास कारण न होता उन्नतीसच कारण होतात. तेव्हा संगाचा व विषयांचा आदरही केला पाहिजे व अनदरही केला पाहिजे. कपडे, अलंकार, धनदौलत, मान-मरातब ह्यांचे योगे जर अहंकार उत्पन्न होत नसेल तर मग अनेकश: आणखी विषय उत्पन्न झाले तरी हरकत नाही. पण जर अहंकार उत्पन्न होईल तर मग धूमकेतू येऊन त्यांचा सत्यानाश झालेला बरा. एकंदरीत काय की, संग पाहिजे, पण तो सज्जनांचा असावा. तसे नसेल तर एकांतवास बरा. विषय पाहिजेत, पण त्यामुळे गर्व होता कामा नये. नाही तर ते विषय नसलेले बरे.

शासनयोग

(रविवार ता. ७ ऑगस्ट सन १९१० रोजीं केलेल्या उपदेशाचा सारांश.)
ता. १९ आणि ता. २६ जून १९१० रोजी विनययोगावर विचार करतेवेली आपण दुस-याशी कसे वागावे आणि आपण दुस-यास कसे वागवावे असे वागणुकीचे दोन भाग करण्यात आले होते. पहिल्यास विनययोग व दुस-यास शासनयोग असे नाव देण्यात आले होते. आज दुस-या भागाविषयी थोडासा विचार करू.

मनुष्याने मनुष्यास कसे वागवावे हे पाहाण्याच्या पूर्वी मनुष्यास वागविण्याचा अधिकार मनुष्यास आहेकी नाही, ह्या गोष्टीचा विचार करावयास पाहिजे आहे. पण त्याच्याही पूर्वी म्हणजे मनुष्यास शासनाचा अधिकार आहे की नाही हे ठरविण्याच्या पूर्वी, जगतात मुळी शासन आहे की नाही, हे पाहिले पाहिजे. संसारातील व्यवहाराचा पायाच जर कोणत्याही शासनावर अथवा नियमावर अवलंबून नसला, तर मनुष्याच्या व्यवहारापुरताच शासनाचा विचार करण्याची जरूरीच रहाणार नाही. ह्या बाह्य विश्वामध्ये सर्वत्र अबाधित आढळून येणा-या शासनाविषयी जरी निरनिराळ दर्शने आहेत, तरी थोडा विचार करून पाहता त्यामध्ये वस्तुत: विरोध नाही असे दिसून येईल. केवल नीतिनियमांचे अस्तित्व मानणारा कर्मवादी बुद्धादिकांचा एक पक्ष आहे. ह्या नियमांच्या मागे कोणी नियंता आहे, त्याची इच्छा म्हणजेच नियम असे मानणारे ईश्वरवादी आहेत. पण हे दोन्ही पक्ष सारखेच आस्तिक समजावयास पाहिजेत. व्यवहारात एकास नास्तिक व दुस-यास आस्तिक समजण्यात येते हे चुकीचे आहे. केवळ नियमांसच मानून नियंत्याविषयी उदासीन रहाणा-या ईश्वरवाद्यासही वरीलप्रमाणे अंशत: नास्तिक म्हणावयास पाहिजे. कारण, ईश्वरवादाचा मुख्य सिद्धांत सांगत आहे की, ‘अपिचेत् सदुराचारो भजते मामन्यभाक्| साधुरेव समन्तव्य: सम्यग् व्यवसितो हि स:||’ ह्यामध्ये धडधडीत नियमांचे उल्लंघन करणा-या दुराचार मनुष्यासही साधू समजण्याविषयी आज्ञा आहे. ह्यावरून नियमबंधनाविषयी हा पक्ष किती उदासीन आहे दिसते. उलटपक्षी, नियमवाद्यांचा असा आग्रह असतो की, आज आम्ही जे विचार मनात आणू त्यांचे पर्यवसान उद्या आग्रह असतो की, आज आम्ही जे विचार मनात आणू त्यांचे पर्यवसना उद्या कृतीत होणार, इतकेच नव्हे, तर आजचा विचार ती उद्याची कृती, उद्याची कृती ती परवाची सवय, परवाची सवय ते तेरवाचे शील, तेरवाचे शील ती शाश्वतची समाधी, येणेप्रमाणे पर्यवसानाची अबाधित परंपरा हा पक्ष मानतो. आणि ही परंपरा नियंत्याची इच्छा आहे की नाही, ह्याविषयीच्या विचारात तो पडत नाही. ह्याप्रकारे बोधिसत्व आणि भगवतभक्त हे सारखेच आस्तिक किंवा नास्तिक ठरतात. परंतु ज्याअर्थी दोघांचाही काही विधानांवर आधार आहे, त्याअर्थी दोघांनाही आस्तिक म्हणावयास पाहिजे.

लौकिक व्यवहारामध्य काह सनद मानणारे व काही स्वामी मानणारे असे दोन पक्ष दिसून येतात. सनदपक्ष म्हणतो की, स्वामी असला तरी तो सनदी नियमांनी बांधलेलाच असणार व तो असावयास पाहिजे. म्हणून सनद हेच मुख्य ध्येय. स्वामीपक्ष म्हणतो की, सनद हे केवळ स्वामीचे दान म्हणून तेच मुख्य ध्येय. आध्यात्मात ब्रह्म हे ज्याप्रमाणे ‘शुद्धमपापविद्धं’ त्याचप्रमाणे व्यवहारातील स्वामी हाही A king can do no wrong ह्य म्हणण्याप्रमाणे गुन्हा करू शकत नाही. येणेप्रमाणे प्रपंचात आणि परमार्थात जरी वरवर पाहता दोन भिन्न पक्ष दिसतात, तरी त्या दोघांमध्ये खरा विरोध नाही. दोन्ही पक्ष सारखेच निष्ठावान आहेत. विचार करता दोघांच्याही ध्येयांचा अंतिम लय एकाच वस्तूत होतो.

पण तिसरा एक पक्ष असा आहे की, तो मनुष्याच्या मनाबाहेर नियमांचे अस्तित्व मानीत नाही. नियमांचे अधिष्ठान मनुष्याच्या अंत:करणात आहे असे त्याचे म्हणणे असते. तत्त्ववेत्ता Kant ह्यांचे Categorical Imperative आणि कविकुलगुरू कालिदास ह्यांचे ‘संतांहि संदेहपदेषु वस्तुषु प्रमाणमंत:करणप्रवृत्तय:’ ही दोन्ही सूत्रे वरील स्वेष्टवादाचेच समर्थन करितात. पण हा स्वेष्टवादही शासन मानीतच आहे. ते शासन आतून असो किंवा बाहेरून असो ते आहे आणि मानले जात आहे हे खास.

चवथा पक्ष मात्र आत बाहेर कोठेच नियम मानीत नाही. खा, पी, चैन कर, कारण उद्या मरण येणार आहे, असे सांगणारा हा मात्र खरा आणि शुद्ध नास्तिक पक्ष होय. अशा वाममार्गी शाक्तांचा नाश झाल्यास कोणासही वाईट वाटणार नाही. नाश होतेवेळी स्वत: त्यांनासुद्धा वाईट वाटण्याचे कारण नाही. स्वत:च्या शक्तीशिवाय त्यांना बाहेर काहीच दिसत नसते म्हणून त्या शक्तीचा लय झाला असता मरण्यास त्यांनी खुषीने तयार असले पाहिजे, तरच ते शाक्त; नाहीतर त्या वेळेला जर बाहेरील शासनासंबंधी त्यांच्यात श्रद्धा किंवा भीती उत्पन्न होईल, तर ते शाक्त कसले? लोकायितक, चार्वाक इत्यादि मतवाद्यांचे काही युक्तिवादपूर्वक वाड्मय होते पण ते द्वेषाने नाहीसे केले असे सांगतात. पण ते उघडकीला येईतोपर्यंत तरी त्यांच्या नास्तिकपणाला बाध येत नाही.

असो. हा चवथा पक्ष शिवाय करून वरील तिन्ही पक्षांस, सृष्टीमध्ये शासन आहे, हे मान्य आहे. आता मनुष्यास शासन करण्याचा अधिकार आहे की नाही हे पहाण्यासाठी आजपर्यंत त्याच्याकडून हा अधिकार कसा बजावला गेला आहे ह्याचा इतिहास पाहू. मनुष्येच काय पण इतर प्राण्यांमध्येही शासनाचे दाखले दिसत आहेत. शासनाचा पहिला उद्भव मातेमध्ये दिसून येतो. अपत्य जन्मल्याबरोबर माता त्यावर प्रेम करू लागते.  इतकेच नव्हे तर त्यावर राज्यही करू लागते, प्रेमामुळे तिजवर शासनाची एक जबाबदारी येते. मुलाचे लाड करणे व कौतुक करणे एवढीच प्रेमाची लक्षणे नसून, अपत्याची जी इच्छा असेल त्या इच्छेला आपल्या शहाणपणाचा आळा ती सतत घालीत असते. मग ती माता मानवी असो किंवा खालील प्राण्यातील असो.

समाजाचा अधिकाधिक विकास होऊन अनेक कारणांमुळे इतरांपेक्षा एका व्यक्तीमध्ये जेव्हा धन, बल, बुद्धी इत्यादी एक किंवा सर्व गुणांचा जास्त संचय होतो, तेव्हा त्यांच्यामध्ये साहजिक आढ्यता उत्पन्न होऊन तिच्या जोरावर तो इतरांचा पुढारी होऊन त्यांवर शासन करू लागतो. हे बळ मजमध्येच आहे, इतरांमध्ये नाही, हे कार्य मजसारखे आजपर्यंत करीत आलेले आहेत, मी आता न करणे म्हणजे मानहानी होणार आहे अशा प्रकारच्या राजसी विचारांमुळे क्षत्रियांची उत्पत्ती आणि वाढ होऊ लागते, म्हणून आढ्यता हे शासनाचे दुसरे कारण होय. वत्सलतेमुळे होणा-या शासनाचा परिघ साहजिकच अल्प असणार. अपत्यसंबंधापलीकडे त्याचा वाव नसतो. केवळ वत्सलतेमुळेच ज्या स्थितीत शासन चालू असते ती समाजाची आद्य स्थिती. पुढे आढ्यतेमुळे व्यक्तीचे आणि व्यक्तिसमूहाचे इतर व्यक्तींवर किंवा इतर व्यक्तिसमूहावर जे राज्य चालू होते ती समाजाची दुसरी स्थिती ह्या आढ्यतेच्या जोरावर अद्यापिही शासन चालले आहे आणि पुढेही ह्या शासनाचा विस्तार अधिकाधिकच चालू रहाणार.

शासनाचे तिसरे कारण कर्तव्य हे होय. समाजाचा विकास अधिकाधिक झाल्यानंतर सात्विक माणसांनी इतरांवर शासन करणे हा एक त्यांच्या सात्विकपणाचा भाग आहे अशी कर्तव्यबुद्धी जागृत होते. कमी सुसंस्कृत माणसांवर किंवा जातींवर अधिक सुसंस्कृत माणसांनी किंवा जातींनी शासन चालविणे ही हक्काची गोष्ट नसून उलट कर्तव्याची गोष्ट आहे. अडाणी माणसांवर बुद्धिवानाने, अडाणी माणसांच्या हितासाठी राज्य करणे हा बुद्धिवानाचा हक्क नसून अडाणी माणसाचा बुद्धिवानावर हक्क आहे आणि बुद्धिवानाचे हे कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे मातापित्यांनी अपत्याचा सांभाळ करावा हे मातापित्यांचे कर्तव्य आणि अपत्याचा हक्क आहे त्याप्रमाणे सुसंस्कृतांनी असंस्कृतांचे नियमन करावे हे सुसंस्कृताचे कर्तव्य योग्य होय. हे कर्तव्य बजाविले जात असताना शास्त्यांचा सात्विकपणा तीव्र कसाला लागतो आणि ज्या ज्या मानाने तो ह्या कसोटीला उतरतो त्या त्या मानाने त्याचे ते शासन, कर्तव्याचे म्हणजे तिस-या कोटीतले आणि ज्या ज्या मानाने ते उतरत नाही त्या त्या मानाने ते आढ्यतेचे म्हणजे दुस-या कोटीतील समाजावे. एकंदरीत वत्सलता, आढ्यता आणि कर्तव्यता ही शासनाची तीन निरनिराळी कारणे आहेत.

मनुष्याच्या विकासाचा इतिहास पाहिला असता वरील कारणांच्याद्वारे मनुष्याकडून जे शासन घडत आहे, त्याचे श्रेय मनुष्यशक्तीकडे आहे, किंवा मनुष्येतर कोणा श्रेष्ठ शक्तीकडे आहे ह्याच्याविषयी वाद पडतो. वत्सलता आणि कर्तव्यता ह्या सात्विक कारणांमुळे हे श्रेय श्रेष्ठ शक्तीकडे देऊ गेल्यास, त्याबरोबर आढ्यता ह्या राजसी गुणांचेही संशयित श्रेय त्याच शक्तीकडे जाईल. हा संभव टाळावा म्हटल्यास उलटपक्षी सर्वच श्रेय मनुष्यशक्तीकडे येते. मनुष्यशक्तीचा सर्व चांगला भाग श्रेष्ठ शक्तीकडे आणि अपूर्व वाईटाला मात्र मनुष्यास जबाबदार करणे ही मनुष्याविषयी सम्यग्दृष्टी होत नाही. आणि श्रेष्ठ शक्तीलाही अशा प्रकारच्या पक्षपाताची जरूरी नाही. काहीही असो, मनुष्याच्या द्वारा हे शासन घडत आहे. ह्य शासनाची त्याजवर जबाबदारी आहे. तिच्यापासून त्याची सुटका नाही. ह्या शासनाच्या जबाबदारीपासून आपली सोडवणूक करून घेणे ह्यात कोणताही सात्विकपणा नाही. ईश्वराला शरण जाणे हे भगवदभक्तीचे थोर लक्षण आहे. पण शरणतेमुळे ही शासनाची जबाबदारी चुकते असे होत नाही. शासनाविषयी ईश्वरी आज्ञा झाली असता तिच्यात कसुरी करून पुन: आम्ही शरण आहो असे. म्हणत राहणे हे शरणतेचे खरे लक्षण नव्हे ते कोडगेपणाचे लक्षण होय. कोणालाही शरण गेल्यास तो सांगेल ते काम करावयास तयार राहणे आणि ते करण्यातच आनंद आणि थोरवी मानणे हेच त्या शरण गेल्याचे खरे खरे लक्षण होय.

आता शासनाचे किती प्रकार आहेत हे पाहू : (१) आईबापांकडून मुलांवर घडणारे शासन, (२) गुरूकडून शिष्यावर घडणारे, (३) राजाकडून प्रजेवर घडणारे अशी तीनच मानवी शासने संभवतात. व्यवहारात त्याहीपेक्षा आणखी दोन शासने आढळतात. (१) धनी आणि नोकर ह्यांमधील आणि (२) पती आणि पत्नी ह्यांमधील. पण न्यायदृष्टीने पाहू गेल्यास, धनी आणि नोकर ह्यांचा संबंध शास्ते आणि शास्य असा मुळीच नाही. कचेरीतला चपराशी असो, घरातील बाल्या असो, गिरणीतील कामगार असो, किंवा नोकर कुणीही असो, त्याच्यावर राज्य करावे असा धन्याचा अधिकार नाही. धनी आणि नोकर एकाच करारनाम्याचे दोन सारखे उमदे पक्ष आहेत. दोघेही परस्परांचे सारखे ऋणको आणि धनको आहेत. असे असून घरोंघरी आणि शहरोंशहरी चाकर लोकांवर जी साम्राज्ये चालू आहेत ती केवळ ‘बली तो कान पिळी’ ह्या न्यायाची आहेत. अर्थात बळाचे हे तत्त्व जेव्हा धन्याकडून चाकराकडे कलते तेव्हा शासनाचे पारडे डळमळू लागते आणि जो घोटाळा उडतो त्यावरून वरील साम्राज्याचा पाया न्यायावर रचला नसून अन्यायावर रचला आहे हे उघडकीला येते. एकंदरीत हा संबंध शासनाचा नव्हे हे सिद्ध होते. ह्याहूनही विलक्षण प्रकार पतीपत्नी किंवा साधारण स्त्रीपुरूषांच्या संबंधात येतो. प्रत्येक कुटुंबात हे बायकांवरचे राज्य चालू असते. अर्धी मनुष्यजात ह्याप्रकारे मनुष्यजातीच्या दुस-या अर्ध्यावर सत्ता गाजवीत आहे. विवाहामध्ये यद्यपि एक पक्ष दुस-यास म्हणतो की, ‘माझे हृदय ते तुझे हृदय आणि तुझे हृदय ते माझे हृदय’ तथापि व्यवहारात ‘माझे ते माझे आणि तुझे ते माझे’ असा शुद्ध अद्वैतवाद माजलेला दिसतो. म्हणजे एका पक्षी दोन हृदये आणि दुस-या पक्षी काहीच नाही असा प्रकार होतो, हा न्याय नव्हे. कोणी म्हणतात, पती आणि पत्नी ह्यांमध्ये परस्पर शासन असावयास पाहिजे, म्हणजे पती पत्नीचा राजा आणि पत्नी पतीची राणी (राज्य करणारी) असे असावे. पण हाही भ्रम आहे. शासनाचा संबंध कधीच परस्पर असू शकत नाही. एकपक्षी शासन तर प्रतिपक्षी निष्ठाच असावयास पाहिजे. शासन आणि निष्ठा ही एकाच व्यवहाराची समकालीन आवश्यक अंगे होत. निष्ठेशिवाय शासन संभवत नाही आणि शासनावीण निष्ठा निराधार होते. शासन चालू असताना निष्ठा ही उलट दिशेने चालू असते. ह्यावरून दोन पक्षांमध्ये परस्पर शासनाचा संबंध मानणे ही विचाराची भ्रांती होय. एवंच खरी शासने तीनच आहेत, ती- (१) पितृशासन, (२) गुरूशासन आणि (३) राजशासन; आणि तदनुरूप (१) अपत्यनिष्ठा, (२) शिष्यनिष्ठा आणि (३) प्रजानिष्ठा ह्या तीन निष्ठा होत. मनुष्याने शासनाचा अधिकार आपणाकडे घेण्यापूर्वी स्वत: विनयसंपन्न झाले पाहिजे. ह्या विनयाचा अष्टांग मार्ग पूर्वी सांगितलाच आहे. आढ्यतेमुळे जो मनुष्य शासन चालवीत असतो, तोच मनुष्य कर्तव्यतेमुळे शासनास उपयुक्त होतो, हा त्याच्या विनयसंपन्नतेचा प्रभाव होय, म्हणजे राजसी शासनातून सात्विक शासनाचा जो विकास होतो, तो शास्त्याच्या विनयामुळेच होतो, शास्ता मग तो राजा असो किंवा गुरू असो किंवा पिता असो-त्या सर्वांनी आधी विनययोगात सिद्धी मिळविलीच पाहिजे. ऐहिक राजशासनात देखील राजाच्या लहान मोठ्या अधिकारी मंडळींनी प्रजेशी विनयाने वागले पाहिजे असे राजकीय हुकूम सुटतात, तेही ह्याच शास्त्राधारे. राजाचे अधिकारी हे सभ्य गृहस्थ असतात म्हणून विनयाने वागणे हा त्यांच्या सभ्यपणाचाच एक भाग आहे. एवढ्यावरच अवलंबून राजा स्वस्थ बसत नाही, तर शासनाचा अधिकार विनयाशिवाय मिळत नाही व कायम रहात नाही म्हणून विनय हा व्यक्तिविषयक सभ्यतेचा भाग असो किंवा नसो, तो शासनाची आद्य तयारी आहे म्हणून आचरलाच पाहिजे अशी राजाज्ञा असते. मग तशी धर्माज्ञा असेल त्यात नवल काय? येणेप्रमाणे पितृशासन, गुरूशासन आणि राजशासन ह्याबद्दल पृथक् पृथक् विचार निरनिराळ्या प्रसंगी पुढे केला जाईल आणि त्यावेळी ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही| मानियेले नाही बहुमता|’ असाच मनाचा भाव ठेवला जाईल. बहुमताचा एवढा मोठा प्रचंड प्रभाव आहे की, ते ज्यास सुदैवाने अनुकूल होते त्याच्या मूर्ती मंदिरोमंदिरी स्थापल्या जातात आणि त्याचे शहरातील चौकात पुतळे उभारले जातात. पण दुर्दैवाने तेच बहुमत ज्यास प्रतिकूल होईल त्यास चव्हाट्यावर सुळावर चढावे लागते. एवढा मोठा प्रभाव असूनही त्या बहुमतास न मानता सत्य आणि असत्याचा शोध करावयाचा असल्यास शोधकांनी आपले मनच ग्वाही ठेवावे असे तुकाराम सांगातत ते आम्हांस मान्य केले पाहिजे.

  1. शांतिनिकेतन बोलपूर
  2. व्यक्तित्वविकास
  3. वृत्ति, विश्वास आणि मतें
  4. विभूतिपूजा.
  • 90
  • 91
  • 92
  • 93
  • 94
  • 95
  • 96
  • 97
  • 98
  • 99
Page 95 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी