1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला विस्मय व विषाद

डेव्हनपोर्ट
ता. ३-४-१९०२

परवा गुडफ्रायडेच्या दिवशी येथील निरनिराळ्या ख्रिस्तीधर्मपंथांच्या देवळांत निरनिराळ्या थाटाच्या उपासना सर्व दिवसभर झाल्या. अज्ञान, दुराग्रह, सवय किंवा दुस-या अनेक अज्ञेय आणि अनिर्वाच्य कारणांमुळे ह्या सुधारणेच्या शिखरास पोहोचलेल्या राष्ट्रातसुद्धा अद्यापि धर्मभोळेपणाचे जे अवशेष राहिले आहेत, त्यांचे दिग्दर्शन वरीलप्रसंगी बरेच झाले. त्यांपैकी काही अनुभवाचे मासले आपल्याकडे पाठविणार होतो, इतक्यात ता. ११ मार्च १९०२ च्या केसरीने कृष्णातटाकी नुकत्याच घडलेल्या सोमयागाची गोष्ट यथासांग सांगितली. ती ऐकून दुस-याचे घरी डोकावून पाहून तेथे काय चालले आहे त्यासंबंधी चर्चा करण्यापूर्वी आपल्याच पायाखाली काय जळते आहे, ह्याची पृच्छा करणे अधिक जरूर वाटले. केसरीने सांगितलेली गोष्ट ऐकून केसरीचे आभार व त्या गोष्टीबद्दल विस्मयपूर्वक विषाद एका दोघांसच नव्हे तर पुष्कळांस वाटण्याचा संभव आहे. आणि खरोखर तो संभव नसेल तर विषाद वाटण्याला सोमयागाहूनही हे एक दुसरे जबर कारण आहे असेच म्हणावे लागते.

एकाद्या आडरानात चारचौघा कोळ्यांनी एकाद्या शेंदूर माखलेल्या दगडाच्या म्हसोबापुढे जमून ‘जय म्हसोबा! भगतावर कृपा कर’ अशी मराठीत साधी प्रार्थना करून एकादे कोंबडे कापले आणि म्हसोबाचा प्रसाद म्हणून ते सर्वांनी मिळून गिळिले तर होणारा जो प्राकृत यज्ञ तो, आणि कृष्णातटाकी वीस विद्वान ब्राह्मणांनी तीन बक-यांस बुक्क्यांनी मारून शेवटी त्याचे तिळाएवढे मांस खाऊन जी संस्कृत कंदुरी केली ती, या दोहोंमध्ये वास्तविक फरक किती आहे! फरक जर असेल तर तो हाच की साध्या मराठी अनार्य यज्ञाचा साधारण समाजावर म्हणण्यासारखा परिणाम घडत नाही, आणि ह्या थाटाच्या खर्चाच्या सोवळ्या आर्यजत्रेचा परिणाम उच्चवर्गापासून तो खालपर्यंत समाजावर इतका जोरदार घडतो की बिचा-या उदार धर्मास दोन पावले आणि दोन दशके मागे हटावे लागतेच!!

सोमयागाचे एकंदर वर्णन वाचून त्यात तीन निरूपद्रवी बक-यांचा सदोषवध अगर निरर्थक खून याखेरीज दुसरे काहीही धडधडीत अनीतीचे अगर अन्यायाचे नाही ही गोष्ट प्रथम दर्शनीच धर्मवेडाच्या अगदी कट्ट्या शत्रूसही साफ कबूल करावी लागेल.

(तशी काही अनीती अगर अन्याय असला तर कायद्याने त्याचा सक्त बंदोबस्त कधीच झाला असता, हेही सांगावयास नको.) समाजात उत्तरोत्तर विकसित होणा-या न्याय, नीती आणि शिष्टाचार ह्या तीन गोष्टीं संभाळून कोणाही व्यक्तीस अथवा समूहास आपले जुने आचार मोठ्या थाटाने साजरे करून मनाची करमणूक अगर दुसरी कसलीही समजूत करून घेण्याची पूर्ण मुभा आहे.ते जुने आचार त्यांच्या कितीही पूर्वदशेतील असोत, त्यांची परंपरा आजघडीपर्यंत सारखी चालू असो, किंवा मध्यंतरी हजारो वर्षांची खळ पडली असून आजच त्यांची आठवण होऊन त्यांच्या जीर्णोद्धाराचा काळ आला असो, कोणत्याही बाजूने पाहिले तरी ते आमचे आचार आम्ही करण्याचा आमचा जो बाणेदार उपजत हक्क आहे, त्यास रतीमात्र बाध येत नाही, इतकेच नव्हे तर सार्वभौम सर्व सामर्थ्यवान, सरकारासही ह्या हक्काकडे वाकड्या नजरेने पाहण्याची छाती नाही. ह्या सर्व गोष्टीं समाधानकारक आहेत ह्यात शंका नाही.

पण येथे हक्काचा किंबहुना आवडीचाही विचार कर्तव्य नाही. ह्या घडलेल्या प्रकरणात धर्म कितपत आहे किंवा तो मुळी आहे की नाही, किंबहुना बक-यांच्या रूपाने धर्माचाच येते खून घडला आहे की काय, ही गोष्ट दिसल्यास पाहणे आहे, आणि डोळे उघडे असल्यास ती दिसण्यास मुळीच कठीण पडणार नाही, ह्याची खात्री आहे. घडलेला प्रकार जर गमपत्युत्सवाप्रणाणे केवळ राष्ट्रीय उत्साह वाढविण्याप्रीत्यर्थ घडला असता तर त्यात विशेष मन घालण्याची जरूरी नसती. पण ज्याअर्थी तो अस्सल धर्माच्या नावावर घडला आहे, त्याअर्थी त्याजकडे सर्व मुमुक्षू जनांचे लक्ष पोहोचले पाहिजे. आणि विशेषेकरून धर्मसुधारकांचे ह्या बाबतीत ओदासीन्य तर अगदी अक्षम्य होईल.

आत-बाहेर सर्वत्र नांदणारा जो परमात्मा आणि व्क्तिविशिष्ट जो जीवात्मा ह्यांचा परस्पर संबंध आणि निरंतर समागम ह्यांस, धर्म म्हणतात. अंतर्याम, उच्च मनोविकार, नैतिक शक्ती इत्यादिकांच्या द्वारे, बाह्यसृष्टी, अंत:सृष्टी आणि जगाचा विकासमय इतिहास ह्या तीन प्रदेशांत जिवंत जागृत परमेश्वराचे प्रतिक्षणी काय काय व्यापार घडतात ते ओळखणे, कृतज्ञतापूर्वक त्याचे सान्निध्य साधणे आणि संसारातील लहान मोठी कामे त्याच्या सान्निध्यास शोभतील अशा रीतीने करणे ही आमची धार्मिक कर्तव्ये. तीन साडेतीन हजार वर्षांपूर्वी आमच्या आर्यपूर्वजांनी जेव्हा हिंदुस्थानाच्या काठावर प्रथम बि-हाड ठेविले असेल तेव्हा परमेश्वराचे बाह्यसृष्टीतील विलास पाहून ते किती मोहित झाले असावेत ह्याचे साद्यंत दाखले वेदात आढळतात. आपल्या साध्या सरळ आणि जिवंत भाषेत त्यांनी देवावरची गाणी गाइली. फूल नाही फुलाची पाकळी, जे काही ज्यांच्याजवळ होते त्याचा थोडा भाग, नवीन भेटलेल्या देवास आपली कृतज्ञता दर्शविण्यासाठी त्यांनी सांज-सकाळ अर्पण केला, हे त्यास कितीतरी शोभले! पण कालांतराने जेव्हा ह्या परकीयांच्या वसाहती उत्तर-हिंदुस्थानात ब-याच पसरल्या आणि ह्यांचे सांपत्तिक व सामाजिक वैभव पुष्कळ वाढले, तेव्हा अर्थात वरील आराधनेचा स्वाभाविकपणा नाहीसा होऊन तिच्यात कृत्रिमपणा शिरला. पूर्वी जे अंत:करणाच्य देठापासून निघत होते, तेच आता जिभेच्या व ओठाच्या शेवटापासून निघू लागले. पूर्वी  प्रत्येक घरधनी आपला आपणच योद्धा, कुणबी व उपाध्याय होता, पण आता त्या तीन कामक-यांच्या तीन जाती बनल्या, आणि धर्माच्या नावावर कर्मठपणा वाढू लागला, पण अद्यापि ब्राह्मण तेज लयास गेले नव्हते. खरे जे ब्रह्मवीर होते. त्यांनी अरण्यातच राहून उपनिषदांतून ह्या कर्मठपणाचा जोराने निषेध केला आणि धर्माची इमारत बाह्यसृष्टीतल्या साक्षात्कारावरून उठवून ती अंत:सृष्टीच्या अधिक खोल व खंबीर पायावर उभारली. आमच्या धार्मिक इतिहासातील हा पहिला निषेध (Protestantism) होय. पण ह्या रानातील मानसिक चळवळीमुळे गावांतील बहुजनसमाजातील कर्मठपणा कमी होणे शक्य नव्हते. म्हणून त्यास वैतागून गौतमबुद्धाने दुसरी धर्मसुधारणा केली (ख्रि. श. पूर्वी ४६८) सुमारे १०००-१२०० वर्षांनी बुद्धाच्या सुधारणेचाही जोर संपला आणि कर्मठपणाच्या लाटा तर पूर्वीपेक्षाही जास्त उंच उसळू लागल्या! नंतर १२ व्या शतकापासून तो १६ व्या शतकाअखेर सर्व हिंदुस्थानभर नानक, चैतन्य, तुकाराम वगैरे साधुसंतांनी तिसरी सुधारणा केली. आता २० व्या शतकातला प्रकार आमच्या डोळ्यांपुढेच आहे.

धर्माचे जे लक्षण वर सांगितले आहे आणि त्या लक्षणाचा जो धर्म उपनिषदे, भगवद्गीता, गौतमबुद्ध आणि आधुनिक साधू यांनी प्रचारिला, त्या सनातन धर्माचा कोणता भाग किती अंशाने वरील सोमयागात आहे आणि ज्यांस प.वा. आगरकरांनी आपल्या एका निबंधात ‘हे भीषण, बीभत्स हिंदुधर्मा........तू आपले तोंड लवकर काळे कर,’ अशी सक्त नोटीस दिली आहे, त्या धर्माचा किती अंश ह्या सोमयागात आहे, ह्यांचा विचार धर्माची ज्यांना म्हणून किंचित तरी पर्वा आहे, त्या प्रत्येकाने आपल्या स्वत:शी केला पाहिजे. बाकी ज्यांना धर्माच्या नावाने नुसती करमणूकच करावयाची असेल अगर दुसरा कसला तरी अर्थ साधावयाचा असेल, त्यास हाच काय पण दुसरा कोणताही प्रकार चालेल आणि शोभेल. कृष्णातटाकी जमलेल्या वीस विद्वानांच्या विद्वत्तेसंबंधाने कोणासही शंका घेण्याचे कारण नाही. पाच दिवस एकसारखे तिन्ही वेदांचे पाठ ह्यांनी बिनचूक आणि बिनविलंब म्हटले तर श्रौतवाड़मयात ह्यांची नंबर एकची गती असली पाहिजे. पण ह्यांच्या ह्या अमूल्य संपादणुकीचे चीज अशा योगाने होईल काय? इकडे पाश्चात्य पंडित, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश भाषांतून वैदिक वाड़मयाचा प्रत्येक शब्द उतरवीत आहेत,  तर ह्या ब्राह्मण विद्वानांनी त्या वाड़मयाचे निदान काही वेचे तरी देशी भाषेत उतरविल्यास त्यांची योग्य संभावना होणार नाही काय? जुन्याचा खरा उद्धार अशा रीतीने होईल की तीन हजार वर्षांपूर्वी ज्या गोष्टी जशा घडल्या त्या आता तशाच उठविल्याने होईल?

शेवटी धर्माच्या बाबतीत उदासीन राहणा-या नास्तिक व अज्ञेयवादी सुधारकांनीही हे लक्षात ठेविले पाहिजे की धर्माच्या नावाने जी ही थोतांडे वेळोवेळी उपस्थित होतात व वाढत जातात ती त्यांची केवळ थट्टा किंवा निंदा केल्याने नाहीशी होत नाहीत. उलट लोकमतांचे ह्या थोतांडास पूर्ण पाठबळ असल्याने ह्या रिकामटेकड्या सुधारक थट्टेखोरांचीच थट्टा होते. शिवाय ही सर्व थोतांडे नाहीशी झाली तरी म्हणजे मोठासा कार्यभाग झाला असे नाही. शुद्ध धर्माची ज्योत राष्ट्रात सतत जळती राखल्यासच राष्ट्राच्या अनेक चळवळीस जोम येईल आणि ह्यास्तव प्रत्येक देशभक्ताने धर्मसुधारणेचे काम हस्ते परहस्ते करणे जरूर आहे.

सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र

इकडे शुद्ध व उदार धर्माच्या अनेक चळवळी चालू आहेत. त्यात स्त्रिया अलीकडे बहुतेक पुरूषांच्या बरोबरीने पुढाकार घेऊ लागल्या आहेत. युनिटेरिअन्स हे सुधारलेल्या देशातले सुधारक असल्याने त्यांच्यात तर हा प्रकार विशेष दिसून येतो आणि तो दिवसेंदिवस वाढतच आहे. उपासनामंदिरात नेहमी स्त्रियांची संख्या पुरूषांपेक्षा सर्वत्र दुप्पट असतेच, पण कार्यसभेतही ह्यांची संख्या निदान पुरूषांइतकी असते, इतकेच नव्हे, तर प्लॅटफॉर्मवरही ह्या आपले काम दक्षतेने बजावतात. मागच्या वर्षी लंडन येथे युनिटेरिअन वार्षिक सभेत दोघींची भाषणे झाली, तर ह्या वर्षी काही आठवड्यांपूर्वी जी मोठी परिषद भरली होती, तीत चौघींनी स्वानुभवानी जोरदार व मुद्देसूद भाषणे केली.

पण केवळ स्त्रियांनीच जे काम आपलेकडे घेतले आहे आणि जे त्या मोठ्या मार्मिकपणे व उमेदीने बजावीत आहेत ते पोस्टल मिशन हे होय. ते काम असे आहे.

प्रमुख युनिटेरिअन आचार्यांचे साधे आणि मनोवेधक उपदेश पुस्तकरूपाने युनिटेरिअन मंडळी प्रसिद्ध करते. त्यांपैकी काहींची प्रथम निवड करून, ह्या बाया कोणाही वाचकांस फुकट आपल्या खर्चाने पाठविण्यासंबंधीच्या जाहिराती, इकडील प्रसिद्ध पत्रांतून आपल्याच खर्चाने देतात. ह्या पत्रांचा युनिटेरिअन मताशी कसलाही संबंध बहुतेक नसतो. संशयाने गांजलेल्या लोकांकडून अगर केवळ काय आहे हे पाहण्याच्या इच्छेने इतरांकडून ह्या पुस्तकांस सहजच मागणी येते. पुस्तक पाठविताना अशी एक लहानशी सूचना करण्यात येते की वाचून काही शंका आल्यास त्यांच्या निरसनार्थही यत्न होईल. शंका कळविल्यास त्याचे समाधान ज्यात मिळेल, अगर समाधान कळविल्यास त्याचे दृढीकरण जेणेकरून होईल अशी दुसरी पुस्तके पाठवितात. त्याबरोबर लहानसे पण सहानुभूतीचे पत्रही जाते. अशा रीतीने सहजच पत्रव्यवहार वाढून, शेवटी आपम युनिटेरिअन आहो असे प्रत्येकास कळून येते. पुस्तके पाठविण्यात विनाकारण घाई अगर मिशनरी लोकांत काही ठिकाणी दिसून येणारा अधाशीपणा न होऊ देण्याची खबरदारी घेतली जाते. पत्रव्यवहारही जिज्ञासूंच्या अनुसंधानानेच चालतो. अशा रीतीने युनिटेरिअन म्हणजे धर्मलंड अगर धर्माभिमानशून्य वगैरे ज्या भ्रामक कल्पना झाल्या असतात, त्यांचा निरास होऊन वाचक युनिटेरिअन मंदिरात उपासनेस जाण्यास राजी झाले, असे दिसल्यावर त्यास त्यांच्या गावांतील युनिटेरिअन मंदिराची वाट दाखविण्यात येते, अगर आचार्यांची ओळख करून देण्यात येते. आतापर्यंत जी मदत पत्र मार्गाने होते ती ह्यापुढे प्रत्यक्ष होऊ लागून लवकरच वाचक झालेल्या उपकाराबद्दल उतराई होण्यास उत्साहपूर्ण युनिटेरिअन होतो.

ही कल्पना मूळ अमेरिकन युनिटेरिअन स्त्रियांत निघाली. ती लंडन येथील स्त्रियांनी उचलली. जाहिराती व टपाल खर्चासाठी लहानशी वर्गणी स्थापून युनिटेरिअन स्त्रियांनी आपल्यातच एक अशी मंडळी बनविली. १८८७ साली एकच मंडळी होती. १८८९ साली ह्या देशातील निरनिराळ्या शहरांत अशा १३ मंडळ्या निघाल्या. हल्ली २३ मंडळ्या असून त्यांचे सभासद वाढतच आहेत. ह्या सर्वांचे एक साधारण संमेलन लंडन येथे आहे. गेल्या तीन वर्षांत ५००० लोकांकडून मागण्या आल्या व त्यास १५००० वर पुस्तके पाठविण्यात आली. अशी पुस्तके वाचून युनिटेरिअन झालेल्यांपैकी काही थोडे आचार्य बनले, बरेच साधारण उपदेशक बनले, कित्येक आदित्यवारच्या शाळेत शिकवू लागले.

त्रैवार्षिक, वार्षिक आणि प्रांतानिहाय युनिटेरिअन समाजाच्या इतर ज्या सभा भरतात त्यांत ह्या मंडळ्याही जमतात. तेव्हा त्या आपल्या कामाचा ऊहापोह करून आपली हकीकत प्रसिद्ध करितात. अशा वेळी जी भाषणे व्हावयाची असतात, ती ते लोक ह्या मिशनच्याद्वारे युनिटेरिअन बनलेले असतात, त्यांच्याकडूनच होतील अशी योजना असते. काही पत्रांचे उतारे वाचतात त्यांचे मासले येणेप्रमाणे:

जुन्या मताचा उपदेशक- ‘मि. बोबीसाहेबांचा उपदेश ऐकल्यापासून मी स्वत:शी युनिटेरिअन आहे की काय असा विचार करीत आहे. तो उपदेश प्रत्येक पीठातून व्हावा असे वाटते..............’

खाणीतील मेथॉडिस्ट मजूर- ‘मार्टिनोसाहेबांचा (..............) हा ग्रंथ वाचण्याची आमची इच्छा आहे. पण विकत घेण्याची शक्ती नाही. आमच्या समाजातील काही जणांची मते तुमच्यासारखीच आहेत. तुमचा समाज तुम्हांला वाटतो त्यापेक्षा मोठा आहे........’

अज्ञेयवादी- ‘तुम्ही मला पाठविलेली पुस्तके वाचून सुमारे १२ जण युनिटेरिअन झाले आहेत......माझे कोडे उकलले......तुम्ही दाखविलेले देवाचे स्वरूप इतके सहज आहे की, त्याचे प्रेम मला अपरिहार्य झाले आहे.’ ह्याप्रमाणे असे हे काम केवळ बायकांनीच मिळून नीटनीटके बिनबोभाट व बिनतक्रार चालविले आहे. पुरूष हकीकत ऐकण्यास मात्र सभेस येतात. लहानमोठ्या पुस्तकांचा साठा मात्र युनिटेरिअन असोसिएशनकडून लागेल तितका खुषीने मिळतो, त्यात काय नवल!

वर मी जी हकीकत दिली आहे, ती केवळ वाचून हर्ष आणि आश्चर्य मानण्याकरिता एक विलायती चुटका पाठविला आहे असे नव्हे. तर हे काम तुम्हांकडूनही होण्यासारखे आहे व होणे जरूर आहे.

मी गेल्या वर्षी एकदा लंडनमध्ये असता ह्या मंडळीच्या मुख्य अध्यक्षबाईस ह्या कामाची माहिती विचारली. प्रत्यक्ष ओळख नसता ह्या बाईने मला आणि मुख्य सेक्रेटरीबाईला आपले घरी भेटविले आणि दोघांनी मोठ्या आनंदाने व अगत्याने मला सर्व माहिती करून दिली. लगेच आमचे बंधू रा. सुखटणकर ह्यांनी हे काम आपल्या अंगावर घेतले व आतापर्यंत अनेक अडचणी सोसून तिकडे हे काम चालविले आहे पण आता त्यांना इकडे येणे आहे.

हे काम खरोखर स्त्रियांनाच योग्य आहे, आणि स्त्रियांना खरोखरी तूर्त हेच काम आहे, हे इकडच्या अनुभवावरून निर्विवाद आहे. आर्य महिला-समाजात तुमच्यापैकी कित्येकींनी निबंध वाचलेले ऐकिवात आहे. असे निबंध वाचण्यापेक्षा वरील पोस्टल मिशनची दोन चार ओळींची पत्रे लिहिणे विशेष अवघड आहेसे वाटत नाही. उलट फायदा मात्र पुष्कळ होईल. ह्यावरून आर्य महिला-समाज बंद करा असे माझे म्हणणे नाही, तर त्यात एक तुमचेच पोस्टल मिशन वरील धोरणावर काढा अशी विनंती आहे. रा. सुखटणकर तेथे आहेत तोपर्यंत आपल्या अनुभवाचा फायदा तुम्हांला अगदी आनंदाने देतील. ह्या कामाला मोठी एक परिषद भरविली पाहिजे असे नाही. हे काम बोभाट्याचे अगर भपक्याचे मुळीच नव्हे तर तुम्हांला शोभेल अशा मर्यादेचे आहे. दिवाणखान्यात पडद्याआड बसून मुलांस खेळवीत खेळवीतही तुम्ही हे काम उरकू शकाल. प्रत्येक पोस्ट-मास्तर व पोस्टाचा शिपाई तुम्हांस बेमालूम मदत करील-करणे भाग आहे.

जिज्ञासूंची उणीव आहे म्हणावे, तर तसेही नाही. आज हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतांतून कित्येक तरूण विद्यार्थ्यांची पत्रे लंडन येथील सेक्रेटरीबाईकडे येत आहेत. ती बाई ती पत्रे मजकड पाहण्यास पाठविते. घरच्याघरी तेथे तुम्ही हे काम पत्करल्यास किती सोय होईल!

युनिटेरिअनांचा, आमचा व इतर सर्वांचा देव एकच आहे. सर्वांच्या अंत:करणातल्या ख-या गरजा व वेदना एकच आहेत. म्हणून ह्याबाबतीत तुम्हांला इंग्रजीत जितक्या म्हणून वाड्मयाची गरज पडेल तितके सर्व इकडील तुमच्या बहिणींकडून मोठ्या आनंदाने पुरविण्यात येईल. येशू ख्रिस्त किती जरी चांगला मनुष्य होता अशी इकडे ह्यांची समजूत आहे, तरी आमच्या लोकांनी त्यांचेच गोडवे गावे अशी ह्यांची कोती इच्छा नाही. आधुनिक विचारपद्धतीस पूर्ण पटतील अशीच केवळ ईश्वरविषयक पुस्तके लागतील तितकी पाठवतील. इतकेच नव्हे तर आफ्रिकेतून काही मुसलमान लोकांकडून पत्रे आली आहेत, त्यांच्यासाठी राजा राममोहनराय ह्यांनी मागे मुसलमानांसाठी कुराणासंबंधी काही लेख लिहिलेले उपलब्ध आहेत काय म्हणून अध्यक्षबाई मिस् टॅगर्ट हिने मला परवा लंडन येथे विचारले. ते लेख मिळतील तर इकडे छापून निघण्यास अडचण पडणार नाही. ह्याचप्रमाणे आमचे पुढारी केशवचंद्र व प्रतापचंद्र इत्यादिकांचेही लहानलहान लेख रा. सुखटणकरांनी तिकडे छापून ह्याच कामासाठी काढिले आहेत. सवडीप्रमाणे व मदतीप्रमाणे मराठी पुस्तकांचीही ह्यात भर पडत जाईल.

म्हणून आमच्या समाजातील तुम्हा सर्व बहिणींस-खुशी असल्यास बाहेरच्यासही-अशी अगत्याची विनंती आहे की रा. सुखटणकर हे हिंदुस्थान सोडण्यापूर्वी तुम्ही आपल्यात एक पोस्टल मिशन स्थापावे. प्रथम प्रथम जड गेल्यास एका-दोघांकडून मदत घ्यावी. पुष्कळ जी जमण्याची जरूरी नाही. एक अध्यक्ष, एक खजिनदारीण आणि खरोखर झटून काम करणारी एक सेक्रेटरी मिळाल्यास पुरे. सर्व काही ह्या एकीवरच अवलंबून आहे. टपालखर्च भागविण्यास इतर वर्गणीदार स्त्रिया मिळतील तितक्या थोड्याच.

इतर पाल्हाळ लिहिण्याची गरज नाही. सार्वजनिक कामे करण्याचा स्त्रियांना हक्क आहे व त्यांच्यात शक्तीही आहे अशा अर्थाचे बरेच लेख सुधारकांनी लिहिले आहेत व तुम्हांस ते पटले आहेत. हे एक लहानसे काम घरी बसूनच होणारे आहे. त्याचा विचार व्हावा.

सुधारकांची जुनी परंपरा (स्फूट)

रा. शिंदे आपल्या भाषणात म्हणतात:

“परंतु समाजसुधारणेचे कार्य आमच्या देशात जे इतक्या सावकाशीने व अल्पप्रमाणात प्रगती करीत आहे, त्याच्या आणखी एका कारणाचा (माझ्या मते सर्वात महत्वाच्या अशा कारणाचा) अद्यापही उल्लेख करावयाचा आहे आणि ते म्हणजे शुद्ध सामाजिक सुधारणेचे म्हणविले जाणारे कार्य अद्यापही बुद्धिपुरस्सर धर्मापासून अलिप्त ठेवले हे होय. कै. आगरकरांच्यासारखे जुन्या परंपरेतील समाजसुधारक ह्या कार्याची उभारणी अद्यापही उपयुक्ततावाद, युक्तिवाद, भूतदया वगैरे दुस-या कोणत्याही तत्वावर करण्यास तयार असतात. पण धार्मिक मनोवृत्तीच्या पायावर मात्र उभारण्यास तयार नाहीत. त्यांना एकतर अशा प्रकारच्या धार्मिक मनोवृत्ती नसतात किंवा असल्या तरीही त्यांचा उपयोग करण्याची त्यांची प्रवृत्ती नसते आणि अशा त-हेची ही धर्मविन्मुख प्रवृत्ती समाजसुधारकामध्य असावी ही अगदी दुर्दैवाची गोष्ट आहे. इतके तरी निदान म्हटल्यावाचून माझ्याच्याने रहावत नाही.”

सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक

[“सुधारकच हिंदू धर्माचे खरे रक्षक” ह्या सक्षक” ह्या सदराखाली लिहिलेल्या व ‘विजयी मराठा’ पत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात रा. रा. वि. रा. शिंदे ह्यांनी ब्राह्मसमाजाविषयी वरील विचार प्रदर्शित केले आहेत......संपादक].

हिंदू धर्माला अत्यंत विशुद्ध आणि जिवंत स्वरूप दिले, इतकेच नव्हे तर अखिल भारताला आधुनिक राष्ट्रांच्या कोटीत ज्या महात्म्याने आणून बसविले, त्या जगप्रसिद्ध राजा राममोहन रॉय ह्यांनी इ. स. १८२८ सालीच्या ऑगस्ट महिन्यात ब्राह्मसमाजाची संस्थापना कलकत्ता येथे केली. इ. स. १९२८ सालात ब्राह्मसमाजाची पहिली १०० वर्षे पूर्ण होतील म्हणून सर्व हिंदुस्थानभर ठिकठिकाणच्या ब्राह्मसमाजांकडून हा शतसांवत्सरिक उत्सव मोठ्या थाटाने करण्यात येणार आहे. त्यावेळी कलकत्त्यास ह्या समाजाचे अखिल भारतवर्षीय प्रचारक एकत्र जमून पुढील प्रचार कार्याची नवीन योजना करणार आहेत. ब्राह्मसमाजात सर्वमान्य झालेले जे ग्रंथ, देवेंद्रनाथ ठाकूर ह्यांचे ब्राह्मधर्म व्याख्यान, सर डॉ. भांडारकर आणि आंध्र देशातील प्रसिद्ध पुढारी सर व्यंकटरत्न नायडू ह्यांचे उपदेश व व्याख्याने इ. ह्यांच्या देशी आणि इंग्रजी भाषेतून नवीन आवृत्त्या प्रसिद्ध करण्याची योजना हल्ली कलकत्त्यात चालू आहे. सदर उत्सवाचे प्रसंगी अमेरिका, जपान, इराण आणि युरोपातील मुख्य मुख्य देशांतील ख्रिस्ती, बौद्ध आणि मुसलमानी धर्मातील उदार मतवादी चळवळीच्या पुरस्कर्त्यांनाही मुद्दाम आमंत्रण करून आणविण्यात येणार आहे. अशी ही आंतरराष्ट्रीय उदार धर्माची परिषद भरविण्याची तयारी इ.स. १९१४ सालीच बहुतेक झाली होती. पण तेव्हा अकस्मात युरोपियन महायुद्धाची वावटळ उठल्याने हा शांतिहोम जागच्या जागी जिरला. इ. स. १९२८ साली तो ब्राह्मसमाजाच्या विद्यमाने पुन्हा घडविण्यात येणार आहे. हे काम केवळ एका राष्ट्राचे नसून अखिल जगाच्या एकीचे व शांतीचे आहे. आणि त्याची जरूरी सर्वाहून आमच्या कलहाग्नीने होरपळून गेलेल्या राष्ट्राला अधिक भासत आहे. त्यात ब्राह्मसमाज यशस्वी होवो!

सुखवाद व सुखाची साधने

स्वभावताच जे सुखवादी, आनंदवादी त्यांना नैराश्यवाद खोटा असे सांगत रहाणे म्हणजे लहान मुलापुढे मद्यपान निषेधावर व्याख्यान देण्याप्रमाणे निरर्थक आहे. एवढेच नव्हे तर असे वर्तन परिणामी घातुकही होण्याचा संभव आहे. दारू पिऊ नका, त्या व्यसनापासून दूर रहा, जे कोणी व्यसनाधीन झाले त्यांचा नाशच झाला आहे. असे वारंवार ऐकून दारू म्हणजे काय वस्तु आहे हेही ज्यास माहित नाही अशा मुलांच्या मनात ती काय चीज आहे हे तरी एकदा पहावे हा विचार येणे ज्याप्रमाणे संभवनीय आहे, त्याप्रमाणे निराशा म्हणजे काय असते पाहू तर खरी, असे म्हणून बळेच निराशा ओढून घेऊन काहीजण नुसत्या दु:खात पडण्याचा संभव आहे. परंतु स्वभावत:च जे नैराश्यवादी त्यांनी मात्र घोर साधन करणे फार अगत्याचे आहे. इष्ट मित्रांनी आपल्या समागमाचा लाभ व सुख अशा लोकांना देऊन त्यांच्या निराशेचे बीज नाहीसे निदान कमजोर तरी करण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. आता, आपण जे साधारण जन ते सर्व केवळ सुखवादी किंवा आनंदवादी अगर केवळ नैराश्यवादी नसतो. आपण मधल्या स्थितीमध्ये नेहमी असतो म्हणजे आपणाला केवळ सुखवादी, दु:खी किंवा नैराश्यवादी म्हणता यावयाचे नाही. म्हणून आपल्यावर दु:खाचे प्रसंग आले म्हणजे आपण अतिशय दु:खी होतो. त्यावेळी हा आनंदवाद आपल्या मनात आला पाहिजे.

आता हा आनंदवाद स्थापित कसा करावयाचा? ह्यावेळी एका वेड्याची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्या वेड्याच्या मनाने घेतले की, आपण मेलो आहे व मेलेले लोक जेवत नाहीत म्हणून तोही जेवेचना. ही त्याची स्थिती पाहून एका कुशल डॉक्टरने दहा जणांना मेल्याचे सोंग घेण्यास सांगितले. त्या वेड्यालाही वाटले की हे मेलेलेच आहेत. काही वेळाने ते हळूहळू एकमेकांत कुजबुज करू लागले. त्यातला एक म्हणाला-आपम मेलो म्हणून काय झाले, मेलेले लोक जसे जेवतात तसे आपण जेवू या. म्हणून ते जेवायला बसून जेवू लागले. अर्थात त्यांच्याबरोबर तो वेडाही जेवू लागला. डॉक्टरचे काम झाले. पण व्याधी एकीकडे व उपाय एकीकडे असे केले तर डॉक्टर खरा यम होतो. ज्या कारणामुळे आजार त्याच कारणाशी हात घातला म्हणजे तो बरा होतो. म्हणून ज्या आपल्या वाड़मयात एकदेशीय नैराश्यवाद भरलेला आहे त्याच वाड़मयातून आनंदवाद निघतो की काय हे पाहताना एखाद्या गरीबाने आपले एकच पागोटे पण तेच परतून परतून ज्याप्रमाणे निराळे बांधावे व त्यात आनंद मानून घ्यावा तसे जरी आपणास करावे लागले तरी हरकत नाही. तुकोबाच्या अनेक अभंगामध्ये नैराश्यवाद भरलेला आहे. परंतु बुद्धासारखे कर्मवादी, शंकराचार्यासारखे आत्मवादी आणि रामानुजाचार्य व मध्वाचार्य ह्यांच्यासारखे ईश्वरवादी अशा कोणत्याही दृष्टीने तुकोबांची गाथा चाळली असता आपणास आनंदवाद आढळून येणार आहे. उदा. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, आपुले मरण पाहिले म्या डोळा व सरले आता नाही. हे अभंग अनुक्रमे पाहण्यसारखे आहेत. अशा दृष्टीने आपले वड़मय वाचावे, केवळ रडतियासवे रडत बसू नये.

सुखाच्या साधनाविषयी विचार करताना महाभारतातील अश्वमेधीक पर्वातील इंद्र व वृत ह्यांची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरे पाहता विषय सुखाचे एक साधन आहे. विषय इंद्रिय ह्यांचा संनिकर्ष झाला म्हणजे जो प्रत्यय येतो, जी एक प्रकारची समाधानाची स्थिती होते, जो योग घडतो त्याचा अनुभव साधारणपणे सर्वांना असतोच. हे साधन इतके उघड आहे की, त्याविषयी मुद्दाम कोणास काही सांगावयासही नको पण विषय हे अनादर करण्याचेच विषय आहेत असे धार्मिक म्हणतात. विषयसुखाचा अतिरेक झाला असता विषय विरक्तीचा प्रादुर्भाव होतो तेव्हा विषयांचा अनादर म्हणजे विषयाचा उत्पादक जो ईश्वर त्याचा अनादर होय. विषयांचा अनादर करून पुन्हा इतर विषयासंबंधीच धंदे करीत राहणे म्हणजे पापच. सारांश सरळपणे विचार करता आपले स्वत:चे व इतरांचे विषयसुख संपादन करण्याच्या प्रयत्नात वावगे काहीच नाही व विषयसुख तरी जोपर्यंत आपला प्रयत्न असतो तोपर्यंतच होत असते.

दुसरे, या संसारात त्रास तरी किती प्रकारचा आहे बापापासून मुलास त्रास, मुलाकडून बापास, सासूपासून सुनेला, सुनेपासून सासूला, धनी व नोकर ह्यांना परस्परापासूनचा त्रास, प्रवासात इतराकडून त्रास होऊ लागला असता यावे तर घरच्या मंडळीकडून त्रास, अशा आपत्ती पावलोगणती आपणावर येत असतात. त्या काही टळत नाहीत अशा स्थितीत सुख संपादन कसे करावयाचे? तर ह्या आपत्ती सोसणे हे एक सुखाचे साधन आहे. आपत्ती सहन करून मिळणारे सुख विषयसुखापेक्षा उच्च दर्जाचे होय. वारसाने मिळालेल्या संपत्तीचे सुख व स्वकष्टाने मिळविलेल्या संपत्तीचे सुख ह्यामध्ये जो फरक आहे तोच फरक वरील दोहोंमध्ये आहे. पण आपत्तींना सुखाचे साधन म्हटले म्हणून त्यांना हुडकत बसायचे नाही किंवा इतरावर त्या मुद्दाम आणावयाच्या नाहीत. त्या न आल्या किंवा आणल्या तर इतर किंवा आपण दु:खी बनतो असे मात्र नव्हे. आपत्ती आपण होऊन आली पाहिजे. ईश्वराने पाठविली पाहिजे. आपला दोष नसताना जेव्हा सृष्टीक्रमाने आपत्ती येतात तेव्हा त्यांचा आदराने स्वीकार केला पाहिजे. मुद्दाम ओढून आणलेली आपत्ती सुखकारक होत नाही म्हणून आपणावर किंवा इतरावर होता होईल तोवर आपत्ती येऊ न देण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केलाच पाहिजे. तेव्हा ह्या तीन प्रकारच्या मनोभावना सांगितल्या. एक प्रयत्न करणे, दुसरे सहन करणे आणि तिसरे टाळणे. आणखीही दुस-या सांगता येतील. या प्रकारे आपण वागलो तर आपला तसाच इतरांचाही संसार अत्यंत सुखमय होऊन जाईल.

  1. सार्वजनिक कर्मयोग नित्य व नैमित्तिक उपासनेच्या वेळी केलेले उपदेश
  2. साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे
  3. सह्याद्रीवरुन-२
  4. सह्याद्रीवरुन१
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
Page 2 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी