1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

बहिष्कृत भारत

(मार्च सन १९०९ मध्यें प्रसिद्ध झालेला लेख)

ह्या पृथ्वीवर सर्व मनुष्यजातीच्या इतिहासांत जरी कोठे कधीं कोणावर प्रचंड बहिष्कार घालण्यांत आला असेल आणि जो पुरातन काळापासून चालत येऊन आज पूर्ण दशेला पोंहोंचला असेल, तर तो ह्या भरतखंडातील नीच मानलेल्या जातीवरचा भयंकर बहिष्कारच होय ! भारतवासियांनो ! स्वार्थाला, मानवजातीला आणि ईश्वराला स्मरून हा घातकी, पातकी आत्मबहिष्कार नाहींसा करा !!

मायो
* सुमारें  एक हजार वर्षांपूर्वीं गुजराथ देशाची पाटण नामें राजधानी होती. तेथे इ. स. १०९४-११४३ पर्यंत सिद्धराजा नावाचा राजा राज्य करीत होता. त्यानें एकदा सहस्त्रलिंग नांवाचा एक मोठा तलाव बांधण्यास सुरुवात केली. पण कांहीं केल्या तलावांत पाणी म्हणून ठरेना. तेव्हां धर्माचार्यांच्या सूचनेवरून राजानें कोणा तरी एकास बळी देण्याचें ठरविलें. ' देवो दुर्बल घातकः !' बली देण्याकरितां मायो नांवाच्या एका धेडास आणून उभें करण्यांत आले. शिरच्छेद करतेवेळीं ''शेवटची काय मागणी असेल ती माग  !''  अशी आज्ञा होतांच मायो गहिंवरून म्हणाला ! ''महाराज ! माझा हा नीच देह सार्वजनिक हिताकडे लागणार ह्याबद्दल मला आनंदच होत आहे. माझ्या तिरस्कृत जातिबांधवांवर आपण एवढीच कृपा करावी की, आजपर्यंत त्यांना शहरापासून दूर अंतरावर जंगलांत राहावें लागत आहे आणि त्यांच्या नीचपणाची खूण म्हणून त्यांना निराळाच पोशाक करावा लागत आहे, तसें ह्यापुढें होऊं नये; त्यांना शहराजवळ राहण्याची परवानगी असावी.''

सिद्धराजानें ही विनंति मान्य केली आणि मायोनें आनंदानें प्राण सोडला !

----------------------------------------------------------
* मासिक मनोरंजन, १९०८
* मुंबई गॅझेटियर, काठेवाड, पुस्तक ८, पान १५७ मा.म.२१.
-----------------------------------------------------------

वाचकहो ! ही साडेसातशें वर्षांपूर्वीं घडलेली गोष्ट वाचून आपल्याला आज काय सुचतें ?  आपल्या ह्या चमत्कारिक देशांत जातिभेदरूपी सहस्त्रलिंग म्हणजे दुहीच्या हजारों खुणा किंवा लहरी दाखविणारा जबरदस्त तलाव आहे. आज हजारों वर्षें ह्यांतलें पाणी स्थिर आहे, पण ह्याच्या तळाशीं गाळामध्यें मायोचे असंख्य नीच मानलेले जातिबांधव जिवंत आणि वंशपरंपरेनें रुतले आहेत. मायोच्या स्वार्थत्यागानें किंवा सिद्धराजाच्या मेहरबानगीनें ह्या जाति जरी नगराजवळ राहूं लागल्या आहेत, तरी नगरवासी होण्यास, अर्थांत् सुधारलेल्या जगांत राहण्यास त्यांना अद्यापि ह्या विसाव्या शतकांतही परवानगी मिळालेली नाहीं ! ह्यांना अद्यापि अस्पृश्यच ठेवण्यांत आलें आहे.

अंत्यज हे कोण आहेत ?

महार, मांग, धेड, पारिया, नामशूद्र इत्यादी ज्या अगदीं नीच मानिलेल्या जाति सर्व हिंदुस्थान देशभर आढळतात, त्यांना ओळखण्याकरितां अद्यापि चांगलेंसें एक सर्वसाधारण नांव प्रचारांत आलेलें नाहीं, आणि तसें एखादें नवीन नांव कल्पून प्रचारांत आणणें हेंही कांहीं सोपें नाहीं. मुंबई शहरांत म्युनिसिपालिटीच्या ह्या लोकांकरितां ज्या स्वतंत्र शाळा आहेत, त्यांना 'निराश्रित शाळा' असें नांव देण्यांत आलें आहे. त्याला अनुसरून ह्या शहरांत 'प्रार्थना समाजा' च्या लोकांनीं ह्या लोकांच्या साहाय्याकरितां जे एक मिशन काढलें आहे, त्याच्या शाळेलाही 'निराश्रित शाळा' असें म्हटलें आहे, परंतु खरें म्हटलें असतां निराश्रित हें नांव ह्या मंडळीस अगदीं अन्वर्थक आहे असें नाहीं. इंग्रजीत Depressed Classes ह्याचें मराठींत शोभेलसें रूपांतर होण्यासारखें नाहीं. ह्या सर्व वर्गांचें एक मुख्य आणि साधारण लक्षण अथवा खूण म्हटली म्हणजे 'अस्पृश्यता' ही होय. ह्यांना शिवून घेण्यांत येत नाहीं. म्हणून ह्यांना अस्पृश्य ह्या नांवानें ओळखावें, तर तो शब्दही चांगलासा प्रचारांत नाहीं व तितका साधा आणि सोपाही नाहीं. पंचम हें नांव अलीकडे मद्रास इलाख्यांत ह्या वर्गाला नवीन देण्यांत आलें आहे, आणि तें यथार्थ असून त्यांत कोणत्याही प्रकारचा तिरस्कार ध्वनित होत नाहीं. पण तें नांव ह्या प्रांती प्रचारांत नाहीं. अंत्यज हा शब्द मात्र बराच व्यवहारांतला आहे. पण हे लोक खरोखरच सर्वांच्या शेवटीं जन्मले, अशांतला मुळींच प्रकार नव्हे!  म्हणून हें नांव त्यांच्यापैकी पुष्कळांना आवडण्यासारखें नाहीं. तथापि वरील सर्व अडचणींचा विचार करितां एकंदरींत तूर्त लेखनव्यवहाराच्या सोईसाठी अंत्यज हेंच नांव नाइलाजाने पसंत करावें लागत आहे, आणि अंत्यज म्हणजे त्यांचा दर्जा हिंदुसमाजांत अगदी खालच्या प्रतीचा अथवा शेवटचा समजला जात आहे असे लोक, एवढाच अर्थ प्रस्तुत विषयासंबंधीं ह्या नांवाचा घेतला आहे.

व्याप्ति आतां प्रथम ह्या अफाट हिंदुस्थानांतील अनेक धर्मांच्या, असंख्य जातींच्या जनसमूहामध्यें ह्या अंत्यज वर्गाची व्याप्ति किती आहे, व अंत्यज ह्या सदराखालीं कोणकोणत्या जाति येण्यासारख्या आहेत व त्या कोणत्या कारणांनीं येतात, ह्याचा विचार करूं. एकंदर हिंदी जनसमूहाकडे पाहिलें असतां त्याच्यामध्यें इतका विचित्रपणा व विस्कळितपणा दिसून येतो कीं, कोणत्याही दृष्टीनें एका विवक्षित कारणासाठीं ह्या जनसमूहाचें नीटसें वर्गीकरण करूं म्हटलें असतां जवळजवळ अशक्यच वाटतें. तथापि आपण हल्लीं प्रचारांत असलेले सर्व जातिभेद व वर्गभेद घटकाभर बाजूस ठेवून केवळ विद्या, आचार, विचार व गृहस्थिति इत्यादि मिळून एकंदरींत सामाजिक दर्जाच्या दृष्टीनें पहातां ह्या अफाट जनसमूहाचे ठोकळमानानें पांच वर्ग करतां येण्यासारखे आहेत.

१ ला. वरिष्ठ वर्ग  :  ह्यांत मोठमोठे अधिकारी, सरदार, मानकरी, मोठमोठे व्यापारी वगैरे बडया लोकांचा समावेश होतो.

२ रा. मध्यम वर्ग  :  ह्यांत साधारण नोकऱ्या करणारे, कलाकौशल्याची कामें करून उदरनिर्वाह करणारे, लहान-लहान दुकानदार व आपल्या मालकीची शेती करणारे वगैरे पांढरपेशांचा समावेश होतो.

३. रा. कनिष्ठ वर्ग  :  आपल्या पोटासाठीं केवळ काबाडकष्ट करणारे, उदाहरणार्थ न्हावी, धोबी, साळी, माळी, स्वयंपाकी, पाणक्ये, शागीर्द, कुणबी इत्यादिकांचा ह्या वर्गात समावेश होतो.

वर सांगितलेल्या तिन्ही वर्गांचा हिंदी समाजांत समावेश होतो. लग्नकार्य झालें तर ब्राह्मण , सरदार आणि युरोपियन अधिकाऱ्यांपासून तों अगदी कनिष्ठ नोकरापर्यंत सर्व एकाच दिवाणखान्यांत जमूं शकतात. एखादी सभा अगर व्याख्यान झालें तर वरील तिन्ही वर्गांपैकी कोणीही सारख्याच हक्कानें येऊं शकतो व त्यांना कोणीही मनाई करूं शकत नाहीं. रोटीबेटीव्यवहाराचा भाग मात्र निराळा. त्या दृष्टीनें पाहतां हिंदी समाजांतच काय, पण हिंदुसमाजांत व त्यांतल्या  कोणत्याही एका नांव घेण्यासारख्या मुख्य जातींत देखील एकोपा नाहीं ! पण सार्वजनिक, किंवा एखाद्या विशेष खासगी प्रसंगीं एकत्र बसणें, उठणें हा जो साधारण सार्वजनिक व्यवहार आहे, त्यांत वरील तिन्ही वर्गांचा सारखाच समावेश होतो. इतकेंच नव्हे, तर अगदीं कनिष्ठ वर्गांतला एखादा न्हावी, धोबी जर आपल्या अंगाच्या करामतीनें आपली विद्याचारसंपन्नता वाढवील, तर त्याला सभेसारख्या सार्वजनिक ठिकाणींच नव्हे, तर लग्नकार्यासारख्या घरगुती प्रसंगींही मानपान देण्यास हल्लीं जुन्या चालींचा देखील कोणी गृहस्थ कचरत नाहीं ! उलट, जर कोणीं वरच्या वर्गांतल्या मनुष्यानें आपल्या बेअकलीपणानें आपली सर्व विद्याचारसंपन्नता घालविली, तर तो वरील मानपानास खास मुकतो; पण तोसुद्धा एकत्र बसण्या-उठण्याच्या सामाजिक हक्काला मुकत नाहीं.

४ था.  हीन वर्ग :  ह्यांत महार, मांग, चांभार, पारिया, शिक्लिया, नामशुद्र, डोंब, धेड, मेहतर, मिरासी इत्यादि अनेक नीच मानलेल्या जातींचा समावेश होतो. हा वर्ग हिंदी समाजाला लागून पण समाजांत नाही असा आहे. समाज ह्यांजवर कांही बाबतींत अवलंबून आहे व ह्या वर्गाची उपजीविकाही समाजावरच चालते. हा वर्ग हिंदी साम्राज्याची कर देणारी रयत आहे. हिंदी राष्ट्राचा योगक्षेम चालवित आलेला हा घटक आहे. पण असें असून हिंदी समाजांत वरील तीन वर्गांप्रमाणें ह्याचा मुळींच समावेश होत नाहीं ! हा वर्ग हीन आहे म्हणून समाजबाह्य आहे. किंवा समाजबाह्य आहे म्हणून हीन आहे, ह्याचा विचार पुढें करूं. पण सध्यां वस्तुस्थिति एवढीच ध्यानांत घ्यावयाची आहे कीं, राष्ट्राचा हा एक घटक असून समाजबाह्य आहे.

५ वा. अलग वर्ग  :  ब्रिटिश राज्य व एतद्देशीय संस्थानें ह्यांच्या सरहद्दीवर डोंगरांतून व जंगलांतून राहणारे कोंग, शिकलगार, चिगलीबगली, भिल्ल, खोंड, सांताळ वगैरे अर्धवट रानटी जातींचा ह्यांत समावेश होतो. हिंदी राष्ट्राशींच मुळीं ह्या वर्गाचा अद्यापि संबंध जडला नाहीं. हे वर्ग सरकारची रयत नाहींत. आपल्या पंचायती ते स्वतःच करितात. शिकारीवर पोट भरलें नाहीं तर परकीयाप्रमाणें आपल्याजवळचा कांहीं ओबडधोबड माल गावखेड्यांतून विकून परत जंगलांत शिरतांत व तेथें परस्परांशीं व सर्व हिंदी समाजाशीं अगदीं तुटून राहतात.

वर जे स्थळ मानानें आपण पांच वर्ग केले, त्यांत ह्या विशाल भरतखंडांतील हल्लीं राहत असलेल्या सर्व मनुष्यप्राण्यांचा समावेश होत आहे. प्रस्तुत विषयाच्या दृष्टीनें पाहतां ह्या पांच वर्गांचे तीन मुख्य भेद होतात. ते असे :

पहिले तीन म्हणजे वरिष्ठ, मध्यम, कनिष्ठ हे वर्ग हिंदी साम्राज्यांतर्गत असून समाजांतर्गतहि आहेत, म्हणून ते तिन्ही मिळून एक मुख्य भेद समजण्यास कांहीं हरकत नाहीं. चवथा जो हीन वर्ग, तो हिंदी साम्राज्यांतर्गत आहे तथापि समाजबाह्य आहे म्हणून तो निराळा दुसरा मुख्य भेद समजला पाहिजे. पांचवा जो अलग वर्ग तो साम्राज्यबाह्य आणि समाजबाह्य आहे म्हणून तो तिसरा मुख्य भेद होय.

आतां मधला मुख्य भेद जो साम्राज्यांतर्गत असून समाजबाह्य आहे, त्यालाच आपण प्रस्तुत लेखाच्या केवळ सोईसाठीं प्रचारांत असलेलें अंत्यज हें नांव दिलें आहे. ह्याच वर्गाच्या अवनत स्थितीसंबंधीं आमचा आजचा लेख आहे. ह्या गरीब जाति खरोखरच अंत्यज आहेत असें आम्हांला मुळींच वाटत नाहीं; इतकेंच नव्हे तर ह्या अमंगल आणि अन्यायमूलक नांवाचा प्रचार होतां होईल तों लवकर बंद व्हावा अशी आमची इच्छा आहे.  म्हणूनच ह्या निबंधाच्या मथळ्यांत ह्या नांवाचा प्रवेश होऊं न देण्याची आम्हीं मुद्दाम काळजी घेतली आहे.

मूळ

आपल्या देशांत महार, मांग, चांभार, पारिया इत्यादी ज्या अनेक नीच मानलेल्या जाति आहेत, त्यांची बरोबर मूळपीठिका शोधून काढण्यास येथें अवकाश नाहीं. आणि प्रस्तुत तशी जरुरीही नाहीं. ह्यासंबंधी प्राचीन शास्त्रांत या आणि हल्लीं पाहण्यांत व ऐकण्यांत येणाऱ्या कांही थोड्या ढोबळ गोष्टींचा निर्देश केला म्हणजे पुरे आहे. आमच्या आद्य श्रुतींमध्यें व त्यानंतरच्या भगवद्गीतेमध्यें चारच वर्ण सांगितले आहेत. मध्यंतरीच्या स्मृतींमध्यें मनूनें १० व्या अध्यायांत स्पष्ट म्हटलें आहे :

ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यस्त्रयो वर्णा द्विजातयः ।
चतुर्थ एकजातिस्तु शूद्रो नास्ति तु पंचमः ॥४॥

अर्थ : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीन वर्ण दोनदां जन्मतात; म्हणजे एकदां सृष्टिक्रमानें व मागून उपनयनसंस्कारानें. शूद्र सृष्टिक्रमाप्रमाणें एकदाच जन्मतो, ह्या चारीपेक्षां पांचवा असा वर्णच नाहीं.

म्हणजे चंडाल म्हणून जो वर्ग आहे तो वरील चार जातींचीच कशी तरी भेसळ होऊन झाला आहे, हें त्याच अध्यायांतील पुढील श्लोकावरून उघड होतें.

शूद्रादायोगवः क्षत्ता चंडालश्चाधमो नृणाम् ।
वैश्यराजन्यविप्रासु जायन्ते वर्णसंकराः ॥१२॥

अर्थ : शूद्र पुरुष आणि त्याच्यावरील वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण जातींतील स्त्री ह्यांच्यामध्यें प्रतिलोम म्हणजे उलट्या शरीरसंबंधामुळें जी प्रजा होते तिला अनुक्रमें अयोगव, क्षत्ता आणि चंडाल अशीं नांवें आहेत, त्यांत शूद्र आणि ब्राह्मणी ह्यांची संतति जी चांडाल तिला अत्यंत नीच मानून अस्पृश्य ठेवण्यांत आलें आहे.

मनूनें वर्णसंकराचा जो निषेध केला आहे, तो प्रतिलोमाचाच म्हणजे खालच्या जातीचा पुरुष आणि वरच्या जातीची स्त्री ह्यांच्या संबंधाचाच केला आहे. ह्याच्या उलट जो अनुलोमसंकर त्याचा निषेध केला नाहीं. स्मृतींत स्पष्ट म्हटलें आहे :

शूद्रायां ब्राह्मणाज्जातः श्रेयसा चेत्प्रजायते ।
आश्रेयान्श्रेयसी जातिं गच्छत्यासप्तमादयुगात ॥
शूद्रो बा्रह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम ।
क्षत्रियाज्जातमेव तु विद्याद्वेश्यात्तथैव च ॥६५॥

अर्थ : शूद्र कन्येला ब्राह्मणापासून कन्या झाली, त्या कन्येला पुनः ब्राह्मणापासून कन्या झाली आणि अशा सात पिढ्या झाल्यावर जी संतति होईल, ती अगदीं ब्राह्मणच उपजली असें होय. ह्याप्रमाणें शूद्राचा ब्राह्मण व ब्राह्मणाचा शूद्र बनतो.

ह्यांतील तत्त्व असें मानलें गेलें आहे कीं, स्त्रीपेक्षा पुरुषाचें अर्थात क्षेत्रापेक्षां बीजाचें सामर्थ्य श्रेष्ठ, म्हणून प्रतिलोमापेक्षां अनुलोम संकर श्रेष्ठ आणि प्रतिलोमांतही स्त्रीपुरुषांत जितकें वर्णांचें जास्त अंतर असेल तितका संकर अधिक निषिद्ध आणि शेवटीं शूद्र आणि ब्राह्मणी ह्यांच्यांतील संकर तर अत्यंत अधम होय. तो करणे गुन्हा समजून त्याला अस्पृश्यत्वाची शिक्षा दिली आहे.

गुन्हा आणि कडेलोटची शिक्षा

असो. हा गुन्ह्याचा विचार एकीकडे ठेवला तर वस्तुतः पाहतां शूद्र पुरुष व ब्राह्मणकन्या ह्यांची संतति केवळ शूद्र संततीपेक्षां अधिक श्रेष्ठ असली पाहिजे. मात्र येथें ब्राह्मण, शूद्र इत्यादि जातींचा दर्जा ठरवावयाचा तो केवळ गुणधर्माप्रमाणेंच ठरविला पाहिजे. ह्या दृष्टीनें पाहतां आज अंत्यज मानलेले सर्व लोक वर सांगितल्याप्रमाणें जर खरोखरच शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्रिया यांच्या संबंधापासून उत्पन्न झालेले असते आणि त्यांना आजपर्यंत असली जबर शिक्षा भोगावी लागली नसती, तर त्यांची स्थिती आजच्या केवळ शूद्रांपेक्षा खात्रीनें उच्च दिसून आली असती.

मद्रासेकडील कर्नल आलकाटच्या पारिया शाळेंतील विद्यार्थ्यांची शाळेंतील इतरांच्या मानानें दिसून येणारी प्रगती आणि वऱ्हाड व मध्यप्रांतातील रेल्वेची कंत्राटे वगैरे घेऊन, पुढें सरसावलेल्या कांहीं महार मंडळीची अलीकडे झालेली सुस्थिति, ह्या गोष्टी लक्ष्यांत घेतां असें दिसून येतें की, ह्या तिरस्कृत वर्गांना योग्य रीतीनें थोडीशी सवलत किंवा मदत मिळाली असतां त्यांच्या अंगीं बराच काळ दबून गेलेले चांगले गुण लवकर विकास पावूं लागतात, पण तसा सुयोग फारच विरळा. एकंदरींत ह्या विस्तीर्ण देशांतील ह्या हतभागी लोकांची अवाढव्य संख्या लक्ष्यांत घेतली असतां, ह्यांची स्थिति सर्व बाजूंनीं केवळ शूद्रांपेक्षां अत्यंत हीन झाली आहे, हे उघड होते.

ह्यावरून दोन प्रकारचीं अनुमानें निघतात. एक असें कीं, सांप्रत अस्पृश्य असलेल्या लोकांच्या सर्वच पूर्वजांनीं कांहीं वरील प्रतिलोमसंकरांचा गुन्हा केलेला नसावा. ह्यांच्यांतील बरेच लोक - विशेषतः दक्षिणेकडील जाति - केवळ एतद्देशीय अर्धवट रानटी अनार्य लोक असावे आणि त्यांचा वरील कोणत्याही श्रेष्ठ वर्णाशीं कसलाही शरीरसंबंध झालेला नसावा आणि ज्या अर्थीं भिल्ल, गोंड, वडारी इत्यादि जाति अद्यापि जरी रानटी स्थितींत असूनही त्यांना अस्पृश्य समजण्यांत येत नाहीं, त्या अर्थीं, ह्यांच्यांतील पुष्कळांना ही धर्मशास्त्राची शिक्षा लागू पडत नसावी. दुसरें अनुमान असें कीं, ज्यांच्या पूर्वजांनीं हा गुन्हा केला असेल, त्यांना आजपर्यंत झालेली ही अस्पृश्यत्वाची शिक्षा वाजवीपेक्षां अत्यंत कठोर झाली आहे. त्यांची स्थिति केवळ शूद्राच्यापेक्षां स्वभावतः बरी असावी, ती तशी नसून उलट इतकी हीन झाल्यामुळें नुसतें त्यांचेच नव्हे तर राष्ट्राचेंही जबर नुकसान झालें आहे.

शिक्षेचा सूड
आर्य-अनार्यांचा विरोध उत्तर हिंदुस्थानापेक्षां दक्षिणेंतच जास्त दिसून येतो. त्यांत कर्नाटकाच्या खालीं दक्षिणेंत जसजसें जावें तसतसें तर हा स्पृश्यास्पृश्यविधि अधिक तीव्र होत जातो. रंग, चेहरा, चालीरीति वगैरेवरून पाहतां कर्नाटकांतील व्हलिया  (महार), मादिग (मांग) इत्यादि ज्या जाति आहेत; त्यांचा वरच्या जातींशीं फारच कमी संकर झालेला असावा असें दिसतें. हे आपल्याला मूळचे एतद्देशीय समजतात, ह्यांना जंबु असेंही नांव आहे, ह्यांचा मूळ पुरुष जंबु नांवाचा होता. पूर्वीं पृथ्वीचा हा भाग दलदलीचा आणि डळमळीत होता. तो *जंबूनें आपल्या मुलास जिवंत पुरून स्थिर केला, अशी ह्या लोकांमध्यें दंतकथा आहे. ह्या दंतकथेंत जरी विशेष तथ्य नसलें, तरी आर्य लोकांनीं ह्यांच्यापासून जमीन हिसकावून घेऊन तिला पुढें जंबुद्वीप हें नांव दिलें असावें, हें कांही अंशी संभवतें. ह्या लोकांचा आर्यांच्या तीन वर्णांशी जरी फार क्वचितच संकर झालेला दिसतो, तरी जेव्हां जेव्हां तो झाला तेव्हां तेव्हां त्याचा परिणाम फारच भयंकर झाला असावा, हें खालील आख्यायिकेवरून दिसून येतें.

ह्या व्हलिया जातींत * पोतराज (रेडयाचे राजे) ह्या नांवाची एक शाखा आहे. कर्नाटकांतील बहुतेक लहान मोठ्या गांवांत जेव्हां पटकी वगैरे भयंकर व्याधीच्या शमनार्थ द्यामव्वाची (दुर्गादेवीची) जत्रा गावकऱ्यांकडून करण्यांत येते; तेव्हां हे पोतराज - मुख्य हक्कदार, जत्रेंतले अध्वर्यूच असतात. जत्रेंत पुष्कळ रेड्यांचा वध होत असतो, त्यांतील मुख्य रेड्याचें शिर डोक्यावर घेऊन ह्या पोतराजांस, गांवपंचांस बरोबर घेऊन नगरप्रदक्षिणा करावयाची असते. ह्या पोतराजांच्या उत्पत्तीसंबंधीं अशी एक चमत्कारिक दंतकथा आहे कीं, यांच्या मूळ पुरुषानें आपण ब्राह्मण आहों असें भासवून द्यामव्वा नांवाच्या एका ब्राह्मणीशीं विवाह केला. पुढें जेव्हां तिला पोतराजाची हीन जात कळून आली, तेव्हां तो भिऊन रेड्याचें रूप घेऊन पळाला. द्यामव्वानें आपल्या घरास आग लावून पोतराजाचा पाठलाग केला आणि त्याचा वध केला.

-------------------------------------------------------------
* मुंबई गॅझेटियर सन (१८८४), पुस्तक २२, पान २१४-१७.
-------------------------------------------------------------

मागें केव्हां तरी एखाद्या प्रमुख अनार्यानें आर्यस्त्रीशीं वर्णसंकर केला असेल व त्यावरून ही भयंकर झटापट झाली असेल. हल्लीं अमेरिकेंत एखाद्या गौरकाय तरुणीवर एखाद्या काळया निग्रोनें हात टाकला तर कायद्याची वाट न पाहतांच सार्वजनिक रीतीनें त्याचा वध करण्यांत येतो, त्याला लिंचिंग असें म्हणतात. हें लिंचिंग जरी हल्लीं आमच्या देशांत उघडपणें होत नाहीं, तरी आजपर्यंत कर्नाटकांत ह्या प्राचीन लिंचिंगचें ओबडधोबड स्मारक ह्या जत्रेच्या रूपानें राहिलें आहे. अजूनही हे पोतराज ह्या जत्रेच्या शेवटीं देवीच्या समोर तिला शिव्याशाप देत, कित्येक गरीब कोंवळ्या कोंकरांना हातांत धरून दांतानें त्यांच्या अंगावरचें सर्व कातडें जिवंतपणीं सोलतात ! हीं कोंकरें म्हणजे मूळ द्यामव्वा नांवाच्या ब्राह्मणीचीं मुलें असें मानून त्यांचा असा भयंकर घात करून हे लोक आपल्या मूळ पोतराजाच्या लिंचिंगचा सूड उगवितात.

मराठे वगैरे जातीशीं ह्यांचें साम्य

हल्लीं ह्या देशांतील नीच मानिलेल्या एकंदर लोकांची स्थिति किंचित सहानुभूतीच्या दृष्टीनें आणि उदार बुद्धीनें अवलोकन केल्यास असें दिसून येईल कीं, ह्यांच्यामध्यें अनेक प्रसंगीं अनेक कारणांनीं वरील पुष्कळ जातींची भेसळ होत आहे. गुजराथ, सिंध, गंगथडी इत्यादि प्रांतांत रहाणाऱ्या मेघवाल महारांचें असें म्हणणें आहे कीं, मागें काठेवाडांत एकदा बारा वर्षांचा दुष्काळ पडला होता, तेव्हां मेलेलीं जनावरें उचलून नेण्याचें काम केल्यामुळें त्यांना ही हीन दशा आली. * काठेवाडाकडील भंग्यांचे सहा पोटभाग आहेत, त्या सर्वांची नांवें पुढीलप्रमाणें अस्सल रजपुतांचीं आहेत. १. मकवान, २. परमार (पवार), ३. राठोड, ४. सोळांकी, ५. वाघेला व ६. डोरी. महाराष्ट्रांतील महारांमध्येंही मराठ्यांच्या अस्सल ९६ कुळांपैकीं बऱ्याच कुळांचीं नांवें आढळतात.  तीं जाधव, साळुंके, चालुक्य, पवार, मोरे (मौर्य), गाईकवाड, शेलार, साळवी, सुरवसे, (सुर्यवंशी) इत्यादि.

-------------------
* मुंबई गॅझेटियर महिकाठा, पुस्तक ५, पान ६३
-------------------

महाराष्ट्रांतील महारांची भाषा पाहिली असतां त्यांचे उच्चार, स्वर व एकंदर बोलण्याची ढब मराठी कुणब्यांसारखीच आहे असें दिसून येतें. कोळी वगैरे गांवांत राहणाऱ्या खालील जातीच्या लोकांच्या भाषेंत कांहीं फरक दिसतो, पण ह्या बहिष्कृत लोकांच्या भाषेंत तितका फरक दिसत नाहीं. ह्यांच्या देव्हाऱ्यांवर खंडोबा, बहिरोबा, भवानी वगैरे मराठ्यांच्याच देवतांच्या मूर्ति दिसतात. नाशिक, त्र्यंबक, पैठण, पंढरपूर, तुळजापूर इत्यादी क्षेत्रांचे ठिकाणीं इतरांबरोबर ह्यांची गर्दी जमते आणि वारकरी, कथेकरी, भाविणी, बाघ्ये वगैरे धर्मसंप्रदाय मराठ्यांप्रमाणें ह्यांच्यांतही पूर्वींपासून चालू आहेत. ह्या सर्व गोष्टींत ह्यांनीं आपल्याला उच्च म्हणविण्यासाठींच मराठ्यांचे केवळ अनुकरण केलें असावें असें म्हणावें, तर ह्यांच्या वरच्या कोळी वगैरे जातींनीं हें अनुकरण कां केलें नाहीं ? शिवाय, अनुकरण करून आपल्यास उच्च म्हणवून घेण्याचें चातुर्य ह्यांच्यांत असतें तर तें ह्यांनीं मराठ्यांचेंच कां केलें ?  सर्वांत उच्च समजले गेलेले जे ब्राह्मण, त्यांचें अनुकरण ह्यांनीं कां केलें नसावें ?

ह्यांच्या अंगचे गुण

ह्या लोकांत इमानीपणा, करारीपणा, शौर्य इत्यादि नैतिक गुण अगदीं उपजत असलेले आढळतात. महारासारखी निमकहलाल जात दुसरी क्वचितच सांपडेल. म्हणूनच जुन्या व अलीकडच्या अमदानींतदेखील रखवालदारीचें, सरकारी पोतें पोंहोंचतें करण्याचें वगैरे विश्वासाचीं कामें ह्या लोकांकडेच चालत आलेलीं आहेत. मद्रास इलाख्यांत अव्वल इंग्रजीचा पाया घालण्याच्या कामीं ज्या लढाया झाल्या, त्यांत तिकडच्या पारिया मंडळीनें अतुल बहाद्दरी गाजविली आहे. क्लाइव्हच्या सैन्यामध्यें गोऱ्या सोजिरांस भात देऊन आपण वरचें नुसतें पाणी पिऊनच ह्या पारिया पलटणींनीं लढाया जिंकिल्या, अशी तिकडे प्रसिद्धि आहे; पण बिचाऱ्यांचा इतिहास लिहितो कोण !

आत्मिक गुणांचीही ह्या लोकांत वाण नाहीं. उत्तरेकडे रोहिदास चांभार व महाराष्ट्रांत चोखोबा महार हे महान् साधुपुरुष प्रसिद्धच आहेत. ''बुद्धि, विद्वत्ता आणि साधुता ह्यासंबंधीं प्राचीन काळीं पुष्कळ पंचम वर्गांचे लोक प्रसिद्धीस आले होते. आद्यकवि वाल्मिकी हा पंचम जातीचा होता, अशी कथा आहे. पद्मपुराण व ज्ञानवासिष्ठ ह्यावरून ह्या कथेला दुजोरा मिळतो. सुप्रसिद्ध ग्रंथ 'कुरळ' ह्याचा कर्ता तिरुवेल्लुवर आणि वैष्णव लोकांनीं पूज्य मानलेले जे बारा संत झाले, त्यांपैकीं एक तिरूप्पानियल्वर हे दोघेही मुळीं पंचम जातीचेच होते. यमुनाचार्यांचेच शिष्य भार्नर नंबियर हे एक महान पंडित साधू झाले. ते पंचम असूनही त्यांना ब्राह्मण संन्याशाप्रमाणें समाधी देण्यांत आली.'' *

-------------------------------
* मि. सी. वाय. चिंतामणी ह्यांनी प्रसिद्ध केलेल्या इंडियन सोशल रिफॉर्म ह्या पुस्तकातील मि. के. रामानुजाचार्य एम. ए. बी. एल. ह्यांचा निबंध पाहा.
-------------------------------

दुराग्रह टाकून ह्या आणि अशा अनेक गोष्टींचा विचार केला असता कळून येते की, हल्ली नीच मानलेल्या ज्या असंख्य जाति ह्या अफाट देशांत पसरल्या आहेत, त्यांचे खरे मूळ काय हे ठरविणे जरी कठीण आहे व पूर्वींपासून वरच्या जातींतून ह्यांच्यात कशी कशी भर पडत गेली आहे तेंही कळण्यास जरी फारसा मार्ग नाहीं, तथापि एवढें मात्र उघड आहे कीं, ह्या वर्गाचे सर्वच लोक जितके मानण्यांत येत आहेत तितके मुळापासूनच नीच नाहींत. त्यांच्यांत वरिष्ठ वर्गापासून तो कनिष्ठ वर्गापर्यंत सर्वांचें अनेक कारणामुळें देशकालमानानें मिश्रण होत आलें आहे; आणि आज हजारो वर्षें ह्यांच्याशीं वरील वर्गांचा व्यवहार जबरीने बंद पाडल्यामुळें ह्यांची अर्थातच अशी हीन आणि करुणास्पद स्थिति झाली आहे.

आजकाल आमच्या देशांत लहानमोठ्या सर्वांच्या अगदीं परिचयांतली अशी गोष्ट म्हणजे बहिष्कार ही होय.

ह्या पृथ्वीवर सर्व मनुष्यजातींच्या इतिहासांत जर कां कोठें, कधीं कोणावर प्रचंड बहिष्कार घालण्यांत आला असेल, व जो पुरातन काळापासून चालत येऊन हल्लीं पूर्णदशेला पोंहोंचला असेल, तर तो ह्या नीच मानलेल्या जातीवरचा हा भयंकर बहिष्कार होय  !!

मनुस्मृतीच्या दहाव्या अध्यायांत ह्या बहिष्काराचा सुमारें दोन हजार वर्षांपूर्वींचा असा दाखला आढळतो :

चांडालश्वपचानां तु बहिर्ग्रामात्प्रतिश्रयः ।
अपपात्राश्च कर्तव्या धनमेषां श्वगर्दभम् ॥५१॥
वासांसि मृतचैलानि भिन्नभांडेषु भोजनम् ।
कार्ष्णायसमलंकारः परिव्रज्या च नित्यशः ॥५२॥
न तैः समयमन्विच्छेत्पुरुषो धर्ममाचरन् ।
व्यवहारी मिथस्तेषां विवाहः सदृशैः सह ॥५३॥
अन्नमेषां पराधनं देयं स्याध्दिन्नभाजने ।
रात्रो न विचरेयुस्ते ग्रामेषु नगरेषु च ॥५४॥
दिवा चरेयुः कार्यार्थ चिह्यिता राजशासनेः ।
अबांधवं शवं चैव निर्हरेयुरिति स्थितिः ॥५५॥
वंध्याश्च हन्युः सततं यथाशास्त्रां नृपाज्ञया ।
वध्यवासांसि गृण्हीयुः शय्याश्चाभरणानि च ॥५६॥

अर्थ : चंडाल, श्वपच इत्यादि जातींनीं गांवाबाहेर रहावें, ह्यांच्याजवळ भांडीं नसावीं; कोंबडी आणि गाढव हेंच ह्यांचें धन; प्रेतावरचे कपडे हींच ह्यांचीं वस्त्रें; ह्यांनीं फुटक्या मडक्यांत खावें, काळ्या लोखंडाचे अलंकार ल्यावे, नित्य भटकत असावें; इतरांनीं ह्यांच्यांशीं कसलाही व्यवहार करूं नये; त्यांना पाहूंही नये; ह्यांना अन्न द्यावयाचें असल्यास दुसऱ्यांकडून खापरांतून देववावें; शहरांत किंवा खेड्यांत ह्यांनीं रात्रीं येऊं नये; दिवसा कामासाठींच कांहीं चिन्ह धारण करून यावें; तें काम म्हणजे बेवारशी प्रेत नेणे, देहान्त शिक्षा झालेल्यांचा राजाज्ञेनें वध करणें व त्यांचे कपडे, दागिने वगैरे घेणें हीं होत.

दोन हजार वर्षांहूनही अधिक काळपर्यंत अशा ह्या घोर बहिष्काराचें, जबरीचें वंशपरंपरागत वतन स्वीकारावें लागल्यामुळें, ह्या हतभागी लोकांची जी अवनति झाली आहे, तिच्याविषयीं यथार्थ ज्ञान इतरांना होणें कठीण ! इतकेंच नव्हे, तर स्वतः या लोकांनाही करून देणें जवळ जवळ अशक्य आहे !  असा बहिष्कार कधीं आणि कोठेंही घालण्यांत आला नसावा ! जरी असेल तरी त्याला इतकी पूर्ण सिद्धी आलेली नाहीं हें अगदीं खास.  ह्या बहिष्कार-कुठाराला दोन धारा आहेत. एका धारेनें ज्यांच्यावर हा बहिष्कार आहे, त्यांची स्वाभिमानबुद्धि कापून नष्ट केलेली आहे. ह्या दैवहतकांचा उपजत स्वाभिमान असा नष्ट झाल्यामुळें जरी कदाचित् कोणी अपवादक दयेने प्रेरित होऊन ह्यांना जवळ करण्यास गेला, तरी दोन हजार वर्षांच्या संवयीमुळें हे स्वतःच आपल्या हितकर्त्यापासून दूर दूर पळतात  ! कारण, सवय म्हणजे दुसरा स्वभावच ! उलटपक्षी, ह्या कुठाराच्या दुसऱ्या धारेमुळें ज्या उच्च वर्गांनी हें बहिष्कारशस्त्र पिढ्यान् पिढ्या आपल्या हातांनीं चालविलें त्यांच्या, ह्या लोकांसंबंधीं विवेक आणि करुणा ह्या दोन्ही शक्ति नष्ट झाल्या आहेत ! सर्व माणसांनी आपल्या गुणकर्माप्रमाणें गुजारा करावा, त्यांत कोणी कोणास अडथळा करूं नये व हा उपजत हक्क ह्या नीच मानलेल्यांना आहे, हें साधें आणि उघड तत्त्व दुसऱ्यांना नीच मानणाऱ्या व आपल्याला उच्च म्हणविणाऱ्या कोळ्या-माळ्यापासून तों क्षत्रिय-ब्राह्मणापर्यंत कोणालाही मान्य होत नाहीं; ह्यांत त्यांचा कांहीं जाणूनबुजून अविचार किंवा कठोरपणा आहे, असेंच केवळ नव्हे; तर हा प्रताप केवळ त्या बहिष्कार-कुठाराच्या दुसऱ्या धारेचा ! तिच्यामुळें ह्या स्वतःस उच्च म्हणविणाऱ्या व दुसऱ्यांना नीच मानणाऱ्या लोकांचा साहजिक विवेक आणि दया नष्ट होऊन ह्यांना संवयीनें असें वाटत आहे कीं, नीच मानलेल्या लोकांस देवानेंच ज्या अर्थी ह्या स्थितींत उत्पन्न केलें आहे, त्या अर्थी तीच स्थिति त्यांना योग्य आहे व म्हणून तिजबद्दल कोणालाही दोष देतां येणार नाहीं.

ह्यापेक्षां थोडा अधिक विचार केल्यास हे लोक असेंही म्हणूं लागतात कीं, ह्या नीच मानलेल्या लोकांस जर उच्च स्थितींत आणिलें, तर ते हल्लीं जी समाजाचीं मलमूत्र साफ करण्यासारखीं हलकीं कामें करीत आहेत तीं पुढें कोण करील ? जर कोणी तीं कामें करील तर तेही असे नीच मानण्यांत येतील ! त्यापेक्षां हेच ह्या अवस्थेंत आहेत हें काय वाईट ?

सुधारकांनीं विधवाविवाहाची प्रथम जेव्हां चर्चा सुरू केली, तेव्हां विधवांचीं लग्नें झाल्यास कुटुंबांत पोळ्या लाटण्याचें, मुलांचीं हागओक काढण्याचें, केरपोतेरे करण्याचें व अशींच दुसरीं फुकट्या मोलकरणींचीं कामें कोण करील ?  अशी एक मोठी अडचण त्यांचे प्रतिपक्षी काढीत असत ! ती लक्ष्यांत घेतली असतां वरील शंका पाहून फारसें आश्चर्य वाटावयास नको ! स्वतःच्या आयाबहिणी आणि मुली ह्यांच्यासंबंधीं देखील ज्यांची साहजिक दया, प्रेम व विवेक केवळ संवयीच्या जोरानें नष्ट होऊन जे असले कोटिक्रम करण्यास तयार होतात, ते गांवाबाहेरील महार-मांगांविषयीं वरील शंका काढतील यांत नवल काय ?  समाजाचीं असलीं घाणेरडीं कामें अनादिकालापासून माणसेंच करीत आलीं आहेत, आणि अनंत कालापर्यंत माणसांनींच ती केलीं पाहिजेत, किंबहुना माणसांनाच तीं करावीं लागतील, असें कांही खात्रीनें म्हणतां येणार नाहीं. मुसलमान लोक इकडे येण्याचे पूर्वी ह्या देशांत पायखान्यांची व्यवस्था हल्लीं आहे अशीच होती कीं काय ?  असती, तर मनुस्मृतींत चंडालाकरितां जी सर्व नीच कामें सांगितलीं आहेत, त्यांत ह्यांचा उल्लेख झाल्याशिवाय राहताना.*  ह्या प्रांतांत म्युनिसिपालिट्यांची स्थापना झाल्यावर पायखाने साफ करण्याकरितां भंगी लोकांना गुजराथ, काठेवाड आणि पंजाब येथून आणावें लागलें. कारण येथील कोणीच अंत्यज मंडळी हें काम पत्करीना. ह्यावरून पायखान्यांची ही चाल उत्तरेकडूनच आली असावी, व ज्या अर्थी भंगी लोकांमध्यें बहुतेक मुसलमानच फार आहेत, त्या अर्थीं ही चाल मुसलमानांकडून प्रथम आली असावी, असें अनुमान करण्यास हरकत नाहीं. यद्यपि, भंगी लोक मुसलमानांतून आले नसले, तरी आज ज्या असंख्य लोकांवर हा सार्वजनिक बहिष्कार पडला आहे, ते सर्वच कोठें भंगी आहेत ? आणि जे फार थोडे भंगी आहेत त्यांच्यावर तरी असा बहिष्कार कां असावा ? इराण, अरबस्थान वगैरे मुसलमानांच्या देशांत, किंबहुना पृथ्वीवरच्या कोणत्याही देशांतील भंगी लोकांवर हा बहिष्कार नाहीं; मग आमच्याच देशांत हा राष्ट्रघातकी सोंवळेपणा कां असावा ?

Read more: बहिष्कृत भारत

बंगालची सफर

(सुबोधपत्रिका, २८-०१-१९०६)

ब्राह्मधर्माची परिषद १८८९ सालीं प्रथम  मुंबईस भरल्यापासून एक दोन वर्षे खेरीज करून जरी सालोसाल दर काँग्रेसच्या वेळी भरत आली आहे, तरी तिजसंबंधी माहिती पुष्कळांना झालेली नव्हती. केवळ काँग्रेसकरिता आलेलेच लोक काय ते जमत व त्यांच्याही आठवणीत ती फार दिवस टिकत नसे. पण मुंबईस भरलेल्या १९०४ च्या परिषदेपासून हिची प्रसिद्धी होऊ लागली. ती काशी येथील परवाच्या परिषदेमुळे तर बरीच झाली. ह्या परिषदेत बंगाल्यातील दोन्ही पक्षांची परस्पर बरीच सहानुभूती वाढली व शिवाय निरनिराळ्या प्रांतांतील ब्राह्मांचा बराच स्नेह झाला. अशा हितकारक परिषदेची खबर अधिक पसरावी. मुंबईकडील कामाची हकीकत इकडच्या दूरदूरच्या समाजास कळवावी, (कारण प्रार्थनासमाज व आर्यसमाज यांतीलही भेद न जाणणारे काही ब्राह्म इकडे भेटले) काही प्रमुख सभासदांची प्रत्यक्ष ओळख करून घ्यावी, मुख्य मुख्य समाज समक्ष पहावे, शिवाय सर्व समाजांची एक डिरेक्टरी करावयाची आहे, त्याअर्थी काही माहिती स्वत: मिळवावी वगैरे हेतूने मी बंगाल व आसाम प्रांतांत फिरतीवर निघालो. ता. २ जानेवारी रात्री ११ वाजता मी......

बांकीपूर
बिहार प्रांतातील मुख्य शहर बांकीपूर येथे आलो. बांकीपूर, पाटणा व दिनापूर ही मोठमोठी शहरे एकमेकांला अगदी लगूनच भागीरथीच्या काठी आहेत. हा देश जरी बहारी (हिंदुस्थानी) लोकांचा, तरी येथे बंगाली लोकांची बरीच वस्ती आहे, व सरकारी नोक-या पटकावण्याच्या व विद्याव्यासंगाच्याबाबतीत ह्यांचा पुष्कळच पुढाकार आहे. अर्थात एतद्देशीय बहा-यास हे आवडत नाही, हे बंगाली जाणून आहेत. वायव्येकडील प्रांतात ज्याप्रमाणे एकही ब्राह्म एतद्देशीय सापडणे कठीण, त्याप्रमाणे सबंध बहार प्रांतातही बहारी ब्राह्मांची संख्या एकाच हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी आहे. पण ही उणीव केवळ ब्राह्मसमाजाचीच आहे असे नव्हे. स्त्रीशिक्षणासारख्या सर्वमान्य सामाजिक सुधारणेतही इकडे महागाई फार आहे. बांकीपूर येथे एक मुलींचे खासगी हायस्कूल आहे; ते मूळ बंगाल्यांनीच काढले. हल्ली एकंदर सुमारे १०० मुलींपैकी बहारी मुली ४ च आहेत. बाकीच्या बंगाली मुलींपैकी २४ ब्राह्मांच्या आहेत. सर्व स्त्री व पुरूषशिक्षक ब्राह्मच आहेत. ह्या शाळेची व्यवस्था बहुतेक येथील प्रमुख ब्राह्मांच्याच हाती आहे. ह्याचे श्रेय येथील वृद्ध पेन्शनर आचार्य बाबू प्रखाशचंद्र राय व विशेषेकरून त्यांची परलोकवासी पत्नी अघोरकामिनी ह्यांजकडे आहे. मध्ये एकदा ही शाळा मोडकळीस आली असता अघोरकामिनीने सर्व व्यवस्था आपल्याकडे घेतली व शाळा हायस्कूलच्या दर्जास आणून सोडिली. ब्राह्मसमाजाच्या दृष्टीने पाहता कलकत्त्याच्या खाली डाक्का व त्याचे खाली बांकीपूरचाच नंबर लागतो. येथे जरी दोन पक्षांचे हल्ली दोन समाज आहेत तरी परस्पर बरीच सहानुभूती आहे व ती वाढत्या कलेवर आहे. तथापि अगदीच भेद मिटून पूर्ण ऐक्य होण्याची नुसती आशादेखील तूर्त दिसत नाही. मात्र दोन्ही पक्षांकडून प्रामाणिकपणे यत्न होत आहे.

बांकीपूर ब्राह्मसमाज
हा नवविधान पक्षाचा आहे. हा सन १८६६ मे, ता. २४ दिवशी स्थापण्यात आला. ह्यापूर्वी एकदा केशवचंद्र ह्यांनी येथे येऊन एका व्याख्यानाने सर्व प्रदेश दणाणून सोडला असे सांगतात. हल्ली ह्या समाजातील उपासकांची संख्या स्त्रीपुरूष व मोठी मुले मिळून सुमारे ५० आहे. शिवाय हितचिंतक. हल्ली जुने मंदिर पाडून नवीन बांधण्याचे काम चालू आहे. अघोरकामिनीच्या परिश्रमाने स्थापन झालेल्या दोन संस्था हल्ली तिच्या नावाने चालू आहेत. अघोर नारी समिती नावाची सभा स्त्रियांच्या उन्नतीसाठी व इतर परोपकाराची कामे करीत आहे. अघोरपरिवार नावाचे सुमारे १०-१२ लहान मुलींचे बोर्डिंग बाबू गौरीप्रसाद मुजुमदार व त्यांची पत्नी ह्यांचे व्यवस्थेखाली आहे. शिवाय कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता एक बोर्डिंग आहे. त्यात हल्ली ११ विद्यार्थी राहत आहेत. हे जरी ब्राह्म नाहीत तरी त्यांस ब्राह्मधर्माचेच वळण लागत आहे.

बांकीपूर ब्राह्म कांग्रिगेशन
हे साधारण समाजपक्षाचे आहे. सन १८९६ चे सुमारास कलकत्त्याच्या साधनाश्रमातून भाई प्रकाशदेव, सुंदरसिंग, गुरूदास चक्रवर्ती, सतीशचंद्र चक्रवर्ती एम. ए. व श्रीरंग बिहारीलाल एम. ए. असे पाचजण केवळ ईश्वरावर भरंवसा ठेवून धर्मप्रचारार्थ निघाले ते वाटेत बहारप्रांती आरा येथे उतरले व तेथे त्यांनी एक साधनाश्रम स्थापिला. सन १८९६, ऑगस्ट महिन्यात तो आश्रम आरा येथून बांकीपूर येथे नेण्यात आला. तेव्हापासून ह्या समाजाची सुरूवात झाली. सुंदरसिंग परलोकी गेले, भाई प्रकाशदेव ह्यांनी लाहोरास ठाणे दिले व मागे राहिलेल्या तिघांनी जिवापाड श्रम करून नावजण्यासारखी कामे उभारली आहेत. ह्यांचे स्वतःचे अद्यापि मंदिर नाही. प्रचारक गुरूदास चक्रवर्ती ह्यांचे घरीच समाज दर रविवारी सायंकाळी भरतो. हल्ली ब्राह्मउपासकांची संख्या स्त्रिया, पुरूष व मुले मिळून एकंदर ६० आहे.

राममोहन राय सेमिनरी ही १८९७ जानेवारी ता. १ रोजी स्थापिली. ह्या शहरी हे एक पहिल्या नंबरचे हायस्कूल झाले आहे. लोक व सरकारी अधिकारी ह्य दोघांच्याही आदरास ते पात्र झाले आहे. शाळेस क भक्कम व पुरेशी इमारत स्वतःच्या मालकीची आहे व तिच्याभोवती विस्तीर्ण पटांगण व कंपौंड आहे. मुलांची संख्या १०९ आहे. शाळेतच ब्राह्ममुलांकरिता एक बोर्डिंग आहे. प्लेगमुळे बोर्डिंगात मुलांची संख्या फार कमी झाली आहे. हल्ली ६ मुले आहेत, पैकी २ च ब्राह्म आहेत. पण बाकीच्या चौघांस पूर्ण रीतीने ब्राह्म वळण लावण्याचे अटीवरच घेण्यात आले आहे. ह्या शाळेची इमारत विकत घेण्याचे बाबतीत बरेच कर्ज झाले होते ते शेठ दामोदरदास गोवर्धनदास ह्यांच्या उदार देणगीने फेडण्यात आले. ह्या बाबतीत चालक मंडळीनी फार फार आभार प्रदर्शित केले. ह्याशिवाय एक स्त्रियांची सभा. एक आदित्यवारचा लहान मुलांचा वर्ग आणि तरूण ब्राह्मगण अशा संस्था आहेत. गरीब लोकांकरिता एक रात्रीची शाळा आहे. दुष्काळात व विशेषेकरून प्लेगमध्ये आश्रमाने फार मेहनत घेतल्यामुळे प्रचारक मंडळीचे बरेच वजन आहे. ह्याशिवाय बहारी यंग मेनस् इन्स्टिट्यूट नावाची संस्था ह्यांच्याच हाताखाली आहे.

ता. ३ रोजी अघोरपरिवारात उपासना चालविली. ता. ४ रोजी सायंकाळी बाबू प्रकाशचंद्र राय ह्यांचे घरी दोन्ही पक्षांची प्रमुख मंडळी जमली. मी प्रथम मुंबईकडची सर्व हकीकत सांगितली. नंतर दोन पक्षांचे एकत्र कार्य कसे होईल ह्याविषयी संभाषण चालले. प्रकाशचंद्र राय हे जरी पक्के नवविधानी आहेत तरी ह्यांचा दोघांसही एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. शेवटी उत्सवात एकमेकांनी कार्यक्रम मिळून ठरवावा व एकमेकांच्या उपासनेस वगैरे पाळीपाळीने जावे असे ठरले. ता. ५ रोजी दोहोंकडील स्त्रियांची सभा मि. दास बॅरिस्टर ह्यांचे घरी जमली होती. पोस्टल मिशन, डोमेस्टिक् मिशन, सामाजिक मेळा वगैरे कामे स्त्रियांनी कशी करावयाची आहेत ह्याविषयी बोललो. मुलींनादेखील माझे इंग्रजी भाषण कळले. हेमंतकुमरी चौधरी सिलहतहून कॉन्फरन्सला आलेल्या डेलिगेटही त्यावेळी हजर होत्या. त्यांनी हिंदीत भाषण केले.

मोंगीर
ता. ६ रोजी दोनप्रहरी येते आलो. भागिरथीचे तटी हे मोठे रमणीय स्थान आहे. विशेषेकरून जुन्या किल्ल्यातील भाग मनोहर आहे. इंग्रज पाठलाग करीत असता मीरकाशीम ह्यांनी येथेच शेवटचे ठाणे दिले होते. पुराणातील राजा दानशूर कर्ण ह्याची दान देण्यास बसण्याची जागा गंगेच्या तीरावर एका लहानशा उंचवट्यावर अद्यापि दाखविण्यात येते. हल्ली ह्या ठिकाणी बेद रामपूरच्या जमीनदाराने सुंदर महाल ‘कर्णचौडा’ बांधला आहे. येथून पुढे गंगाजीचे विस्तीर्ण व बाकदार पात्र व माठोमोंगीर गावाभोवतालच्या टेकड्यांची अर्धगोल रांग व त्यावरची दूर क्षितिजात दिसणारी सुपारीची झाडे ह्या सर्वांचा एकंदर देखावा प्रेक्षकांचे म दंग करून टाकतो. एका फ्रेंट प्रवाशाने तर ह्या देखाव्यास अगदी अप्रतिम असे शिफारसपत्र दिल्याचे ऐकण्यात आले.

असो. ब्राह्म यात्रेकरूंस ह्या स्थळाचे महत्त्व असे सांगण्यात येते की, ब्राह्मसमाजात भक्तिसंप्रदाय जो सुरू झाला तो मूळ ह्या ठिकाणी. सन १८६८ च्या सुमारास इ. आय. रेल्वेचे ऑडिट ऑफिस जेव्हा कलकत्त्याहून मोंगीरजवळ जमलापूर येथे आणिले तेव्हा त्यातील ४-५ ब्राह्म कारकून मोंगीर येथे राहू लागले. पुढे त्यांच्या श्रमाने येथील समाज स्थापण्यात आला व नंतर १८७२ त हल्लीचे मंदिर बांधण्यात आले. मंदिरात एकदा काही वैष्णव मंडळीस भजनास बोलाविले होते. त्यापैकी एका चांडाळ जातीच्या भक्ताने इतके प्रेमळ व आवेशयुक्त भजन केले की त्याचा मंडळीवर विलक्षण परिणाम झाला. पुढे साधू अघोरनाथ ब्राह्मप्रचारक ह्यांचे भजनाविषयी प्रेम अधिकाधिक वाढून शेवटी स्वत: केशवचंद्रसेन एकदा येथे असता त्यांच्यावरही भजनाचा परिणाम घडला व येथे समाजाचे कार्य बरेच वाढले. पुढे हा भक्तीचा वेग जरी सर्व ब्राह्मसमाजात पसरला आणि मोंगीर समाजात एका काळी ४०-५० सभासद होते तरी हल्लीची येथली ओसाड व दीनवाणी स्थिती पाहून अंतःकरण गहिवरते व मानवी मनाची अस्थिरता पाहून विस्मयते. मंदिरापुढील पटांगणात केशवचंद्रसेन, साधू अघोरनाथ, दीनानाथ चक्रवर्ती प्रचारक यांच्या तीन समाधी मध्यभागी एका चौथ-यावर बांधल्या आहेत. मंदिराकडे पाहून व इतिहास ऐकून मनास जी उदासीनता प्राप्त होते तिच्याच जणू ह्या तीन दृश्य मूर्ती.

पुढे लवकरच कर्ताभजा मंडळीचा कोणी एक पुरूष ह्या गावी आला. इकडे ह्या नावाची एक ईश्वराच्या कर्तृत्वगुणाची उपासक मंडळी आहे. ह्यांचे लक्षण जवळजवळ शाक्तमार्गीयांप्रमाणेच असावेसे वाटते. केवळ मनोविकारालाच वश होऊन समाजात आलेली काही नादलुब्ध मंडळी वरील पुरूषाच्या नादी लागली. सुमारे १८८० साली कृष्ण प्रसन्नसेन नावाच्या समाजातील एका हितचिंतकाने सनातनधर्म मंडळीची नवीनच एक ध्वजा उभारली. ह्या प्रकारे मंडळी कमी होता होता शेवटी मध्ये ऑडिट ऑफिसही पुनः पूर्वस्थळी गेले. १९०२ त ह्या गावी आर्यसमाजाची स्थापना झाली पण तोही नीट चालत नाही. हल्ली मंदिरात फार तर ३-४ जण उपासनेस जमतात. बागची बावू (द्वारकानाथ बागची) नावाचे एक वृद्ध गृहस्थ मंदिरातच असतात. कुचबिहारच्या महाराजांकडून त्यास दरमहा ४ रू. मिळतात. आपल्या पित्याच्या समाधीपुढे दिवा लावण्याकरिता म्हणून महाराणी दरमहा ३ रू. देते.

येथील कॉलेजातील एक तरूण प्रोफेसर बाबू सुरेशचंद्र राय हे सभासद आहेत व दुसरे एक बोर्डिंग सुपरिटेंडेंट हितचिंतक आहेत. त्यांच्याशी व इतर काही मंडळीशी दोनप्रहरी संभाषण झाले व येथील तरूण विद्यार्थ्यांकरिता काही धार्मिक संस्था काढावी असे ठरले. यानंतर

भागलपूर
येथे ता. ७ रोजी आदित्यवारी ७|| वाजता पोहोचलो. एकांतस्थळी एक लहानसे पण सुंदर मंदिर आहे. उपासना संपत आली होती. स्त्रिया-पुरूष मिळून उपासक १०-१२ होते. दुसरे दिवशी सकाळी आचार्य हरीसुंदर बोस ह्यांचे घरी केशवचंद्रसेन ह्यांच्या पुण्यतिथीसंबंधी उपासना त्यांनीच चालविली. येथील प्रमुख लोकांचा विशेष कल जरी नवविधान पक्षाकडे आहे तथापि मंत्री बावू निवारणचंद्र मुकरजी हे फार समजूतदार व वजनदार असल्याने समाजाचे एकंदर धोरण अगदी ति-हाईतपणाचे आहे. आनुष्ठानिक ब्राह्म उपासकांची एकंदर संख्या सुमारे ६० व इतर ५ आहे.

हा समाज ता. २२ माहे फेब्रुवारी सन १८६४ रोजी, विशेषेकरून बाबू ब्रजकृष्ण बसू व  नवकुमार राय ह्यांच्या प्रयत्नाने व प. वा. प्रतापचंद्र मुझुमदार ह्यांच्या सल्ल्याने स्थापित झाला. राजा शिवचंद्र बानर्जी नावाच्या एका अत्यंत आस्थेवाईक हितचिंतकाने स्वत: सर्व खर्च सोसून मंदिर बांधविले ते केशवचंद्र ह्यांचे हस्ते ता. २२ फेब्रुवारी १८८० रोजी उघडण्यात आले. ह्याचे पूर्वी सन १८७८ साली ह्या जागेला लागूनच एक भली मोठी जागा विकत घेऊन त्यात ५ ब्राह्म कुटुंबांनी आपली राहण्याची मोठमोठी घरे बांधली.

समाजात थोडी का होईनात पण बडीबडी प्रमुख व वृद्ध मंडळी आहेत. पण उपासनेशिवाय दुसरे काही काम होत नाही. संगत सभा, बायकांची सभा, तरूण ब्राह्मगण, मुलांसाठी शाळा, सामाजिक मेळे वगैरे बरेच सुखसोहळे उपभोगून हा समाज आता शांत झाला आहे. ता. ९ रोजी सायंकाळी सुमारे ५-६ तरूण पदवीधर ब्राह्म मंडळीपुढे मुंबईच्या तरूण ब्राह्मगणाचे छापील नियम वाचून दाखविले व विचाराअंती येथील पूर्वीची तरूणांची संस्था पुन: सुरू करण्याचे ठरले. ह्यानंतर रात्री ७ वाजता बाबू निवारणचंद्र मुकर्जी ह्यांचे घरी प्रमुख मंडळी जमली. त्यापुढे मी मुंबईकडील कामाची हकीकत सांगितली. बहुतेकांस ती नवीनच असल्याने ऐकून फार समाधान झाले व दोघांनी तर वारंवार अशी इच्छा प्रदर्शित केली की मुंबई व बंगालप्रांतातील ब्राह्मांचे अधिक निकट संबंध जुळविणे फार इष्ट आहे व त्याकरिता परस्पर विवाह-व्हवहार करणे, अवश्य आहे. मी म्हटले की, निरनिराळ्या प्रांतांतील ऐपतदार ब्राह्म गृहस्थांनी सहकुटुंब निरनिराळ्या प्रांतांत प्रवास केल्याविना वरील विवाह-व्यवहार कधीही शक्य होणार नाही आणि अशा प्रवासामुळे सर्वपक्षी अत्यंत हित होणार आहे. नवविधान व साधारण समाज ह्यांतील दुहीसंबंधाने मुंबईकडील समाजाचे अगदी ति-हाईतपणाचे वर्तन पाहून इकडील पुष्कळ ठिकाणच्या दोहोंपक्षांच्या कट्ट्या अभइमान्यांसही बरे वाटते हे मोठे सुचिन्ह आहे.

ता. १० सकाळी मी कुचबिहारकडे निघालो. भागलपुराजवळ वाळवंट व प्रवाह मिळून गंगेचे ७ मैल अफाट पात्र आहे. ते आगगाडी व आगबोटीतून ओलांडले. पुढे दोनप्रहरी

Read more: बंगालची सफर

बंगलूरच्या रस्त्यांतील एक फेरी

(सुबोधपत्रिका. २७-१२-१९०३)    

ता. २७ रोजी सकाळी ७ वाजता कॉफी आटपल्यावर ब्राह्मबंधु-स्वामी मजकडे आले व आम्ही दोघे मिळून शहर पाहण्यास निघालो. युरोपीय शहरांचा देखावा स्मृतिपटलावर अद्यापि ताजा असल्यामुळे त्याच्या तुलनेने आजच्या देखाव्याचे मला विशेषच कौतुक वाटू लागले. हिंदुस्थान म्हणजे रशिया खेरीज करून बाकीच्या युरोपाप्रमाणे एक खंडच आहे, असे म्हणतात ते पुष्कळ दृष्टीने खरे आहे. उत्तर युरोपातून आल्प्स् चढून खाली दक्षिणेस इटालीत उतरल्यावर पाहणारास जी देखाव्याची पालट दिसते तीहूनही जास्त मला येथे दिसू लागली. दक्षिण युरोपात जुन्या ग्रीक व लॅटिन सुधारणांच्या सांगाड्यावरून आधुनिक सुधारणेचे मांस भरलेले तर काही ठिकाणी नुसता रंग चढलेला पाहून इतिहास भक्तास जो विस्मय वाटण्यासारखा आहे त्याहून अधिक दक्षिण हिंदुस्थानात वाटतो-निदान मला तरी वाटला. आज सकाळच्या फेरीत रस्त्याने मला जागोजाग एक ना दोन, चार सुधारणा आढळल्या- द्रविडी, आर्य, मुसलमानी, इंग्रजी. मोठी मौज ही की, काही ठिकाणी चारींची बेमालूम भेसळ होऊन गेली आहे तर काही ठिकाणी एकीवर दुसरीची, दुसरीवर तिसरीची अशी पुटे बसलेली आहेत. रस्त्यात जाणा-या येणा-याकडे नुसते घटकाभर निरखून पाहिले तरी बस्स, मानवजातिशास्त्राचे एक दोन धडे सहज समजतात. काळा वर्ण तर सांगावयास नकोच. पण बसके नाक, पसरट तोंड, लोंबते ओठ, एकंदरीत बावळी व राकट मुद्रा ही खालील वर्गाची साधारण चेहेरेपट्टी पुष्कळ ठिकाणी उच्छ वर्णासही लागू पडते. जातिभेदाचे ठराविक नियम अद्यापि जरी महाराष्ट्रातल्याहीपेक्षा अधिक कडकपणे इकडे पाळले जात आहेत तरी, आर्य आणि अनार्य ह्या नैसर्गिक वर्णांचा संकर कधीच होऊन गेला आहे हे उघड दिसते. हल्लीच्या अय्यर, अयंगार, राव, कोमटी, मुदलीयार, नायडू, बक्कलग्यार, कुरूबर, पारिया इत्यादी जाती, हिंदुस्थानच्या इतर भागातल्या जाती आणि वेदांतल्या चार जाती ह्यांचा कसा काय मेळ बसवावा ह्यासंबंधी घोटाळा रस्त्याने जाता जाता मनात माजत असे. ह्या घोटाळ्यात मन आहे तोच एकादी पारिया (महार) बाई (तिने स्वत: अगर तिच्या बापाने ख्रिस्तीधर्माचा स्वीकार केला असल्यामुळे) मडमसाहेबासारखा पोशाख करून एकाद्या दुकानात शिरताना दिसे आणि मुख्य शेटजी तिला खडी ताजीम देऊन आपल्या सर्व जिनसा दाखविण्यास पुढे पुढे करीत. इकडे तिचा जातिबंधूच पण ‘स्वधर्मे निधनं श्रेय:’ म्हणून परधर्माला भिणारा एकादा पारिया गटारावरच उभा असलेला दिसे. असो.

ह्याप्रमाणे....स्वामींशी इंग्रजीत बोलत, स्वामींचे शब्द मात्र इंग्रजी पण उच्चार अस्सल तामिळी व कित्येक ठिकाणी वाक्यरचनाही तीच! इकडे वरचेवर लक्ष जाई पण गेल्यासारखे दाखवीत रस्त्याने चाललो असता ह्या द्राविडी शहराची अस्ताव्यस्त शोभा नजरेत भरू लागली. भक्कम वर्तुलाकारमध्ये झिजलेल्या खांबांच्या रांगा, गुळगुळीत चुनेगच्चीच्या थंडगार ओट्या, स्वच्छ धुतलेली दगडी आंगणी, त्यांवर घातलेल्या रांगोळ्या, मधूनमधून लहान लहान शेणाच्या गोळ्यांत रोवून ठेविलेली भोपळ्याची फुले, (मला वाटते लक्ष्मीची आवडती जी कमळे त्यांच्याऐवजी ही असावीत) किंचित् आखूड पण भक्कम लाकडी दरवाजे आणि अंबरठे आणि त्यांवर ओढलेले हळदीकुंकवाचे पट्टे वगैरे पाहून खरोखर आल्हाद होत असे. आणि स्वच्छता व नीटनेटकेपणा ह्या गुणाने पाश्चात्यांनी आमच्यापुढे विशेष घमेंड मारू नये असे वाटू लागते तोच, ह्या स्वच्छ घरापुढच्या गलिच्छ गटारात केवळ सार्वजनिक हलगर्जीपणाची हेंदर साचली होती आणि कित्येक ठिकाणी तर स्वत: गटारांचाच हमरस्त्यात लोप होऊन गेला होता ते पाहून वरील तुलनात्मक बाबीत पुन: विचार करणे भाग पडे. नागरिक नीटनेटकेपणा राखण्याची जबाबदारी सर्व नगरावर आहे, आणि ती सक्तीने पाळण्याचे काम नागरिक अधिका-याचे आहे हे काही नुसते सरकाराबरोबर भांडून आम्हांला कळण्यासारखे नाही. आमच्या रस्त्यांत सुंदर इमारती नाहीत असे नाही. चालता चालता एका चौकात आल्याबरोबर आडगल्लीतल्या लाल मसजीद नावाच्या एका सुंदर मुसलमानी उपासनामंदिराकडे माझी नजर गेली. मंदिराची मासेलवाईक बांधणी आणि रसिक सुबकता मनात एकदम भरल्यामुळे ते नीट पाहिल्याशिवाय पुढे पाऊल पडेना. ते सर्व पाहून बाहेर पडल्यावर बाजूचा दरिद्री व घाणेरडा देखावा पाहून चमत्कारिक हिरमोड झाला. एका बाजूस बुरूडांनी आपल्या उंच वेळूंची भलीमोठी जुडगी आणि तट्ट्याची भेंडोळी मशिदीला लागूनच ठेविली होती. ती मशिदीहून उंच दिसत होती आणि जवळ त्यांच्या तक्रारी, व्यापाराचा गलबला चालला होता. मशिदीच्य दारातच मिठाईवाल्याची भजी तळण्याची एक जंगी कढई कढत होती. आणि हा खाण्याचा माल, विकणा-याची मूर्ती व तिचा पेहराव ही दोन्ही कढईपेक्षाची काळी कुळकुळीत दिसत होती. दुस-या बाजूस कोळसेविक्यांची दुकाने लागली होती. ह्या प्रकारे ह्या मशिदीच्या सौंदर्याची व सात्विकतेची चोहोंकडून हलाखी चाललेली पाहून सादृश्यामुळे चटकन माझ्या मनात निराळेच विचार आले. जो आमच्या रस्त्यात हा प्रकार नित्य चालला आहे. त्याहून ओंगळ प्रकार आमच्या धर्मात नाही का चालला? धर्मात किती शुद्ध, सात्विक व सुंदर तत्त्वे आहेत, धर्माच्या इतिहासात किती थोर प्रयत्न झालेले आहेत आणि त्या सा-यांवर आता भलत्याच गोष्टींचे किती कठीण वेष्टण पडले आहे आणि कोण गवगवा माजला आहे! लाल मशिदीची काळजी काजीसाहेबास असावयाला पाहिजे खरी. तथापि त्यांनी आपले काम केले नाही अगर त्यास करता आले नाही म्हणून एकादा म्युनिसिपालिटीचा कामगार येऊन केवळ रस्त्यातील शोभेची नाहक हानी होते ती न व्हावी ह्या हेतूने, मशिदीच्या दारातल्या भल्या मिठाईवाल्यास आपले दुकान तेथून उठविण्यास ताकीद देऊ लागला तर त्यास काजीसाहेब खात्रीने अनुकूल होतील काय? ते काही असो, काजीसाहेबाचा व दुकानदारांचा अंतस्थ संबंध काही असो किंवा त्या मशिदीचे काही होवो, सध्या धर्मात जी बाजारी लोकांनी चोहीकडे धुमाकुळ उडवून दिली आहे ती निवारण करणारा कोणीतरी चांगला खवीस आला पाहिजे खास. जेरूसलेमच्या देवळात नित्य जमून गिल्ला करणा-या सराफांना येशूने एकदा पार धुडकावून दिले होते. असे कित्येकांना कित्येकदा केले आहे तरी हे सराफ पुन: जमतात. त्यांना वेळोवेळी हुसकून लावण्याची योजना झालीच पाहिजे. दुसरा इलाज नाही.

ह्या प्रकारें ह्या दक्षिणेंतील शहरांत हिंडत असता द्रविडी देवळांची पसरट व बोथट शिखरे ख्रिस्ती चर्चची गाथिक निमुळती स्पायर्स, मुसलमानी मशिदीचे पांढरे शुभ्र मनोरे ह्या
सा-यांचे एकच विसंगत चित्र नजरेस दिसू लागले. एकादा अस्सल आर्य, कडकडीत सोवळा, अर्धा उघडा, मानेवर लांब शेंडीचा झुपका लटकत असलेला असा आयंगार आपल्या वाटेत एकादी गरीब पारियाबाई जिच्या एकंदर शारीरिक व मानसिक विकासावरून पाहता ती हिंदुस्थानापेक्षा आफ्रिकेत राहण्यास योग्य दिसत आहे......आली म्हणून तिजवर डोळे वटारीत आहे तोच मागून एक बाईसिकल घंटी न वाजता एकदम आलेली पाहून पारियाबाई व आपण दोघेजण गटारावर उभी राहतात, व एकादा सोजीर बेगुमान दौडत जातो. एकादा अर्धवट शिकलेला अंडरग्राजुएट पायात जोडा वरती पाटलून घालून कानडी हेलात इंग्रजी बोली रस्त्याने मोठमोठ्याने आपल्या सोबत्याशी बोलत जात आहे. एकादा मुसलमान ज्याच्या जातीची स्थिती टिपू सुलतानाच्या वेळी कशी असेल ती असो; आता मात्र तिचा मोठा धंदा म्हणजे गाडी हाकण्याचा झाला आहे, इतका की परवा कुतब्याचा मोठा सण होता म्हणून गाड्या अत्यंत महाग झाल्या होत्या..... असा तो सणानिमित्त भपकेदार कपडे घालून निमाज पडण्यास निघाला आहे. असे नानाविध चमत्कार दाखविणारा जीवंत सिनेमेटोग्राफ मला बंगळूरच्या रस्त्यात दिसला.

ही अपूर्व विसंगतता व विविधता पाहून हिवाळ्याच्या थंड हवेत हिंदुस्थानात चैनीसाठी फिरावयास आलेल्या युरोपियन प्रवाशास मोठी मौज वाटत असेल. पण मद्रासच्या राष्ट्रीय सभेस निघालेल्या एकाद्या यात्रेकरूस व देशभक्तास काय वाटेल! बिचा-याच्या मानेवर केवढी प्रचंड जबाबदारी! असली परस्परविरूद्ध तत्त्वे एकत्र ठोकून त्यांचे एक राष्ट्र घडवावयाचे केवढए जोखमीचे आणि दीर्घोद्योगाचे काम हे! हे पाचपंचवीस वर्षात होणारे नव्हे तर शतकेच्या शतके करीत राहिले पाहिजे. आणि ते एकाच बाजूने करून होणार नाही तर सर्वच बाजूंनी अनेक अडथळे सोसून करीत राहिले पाहिजे. खरोखर धार्मिक काम हे !!

प्रेरणा आणि प्रयत्न

(रविवार ता. १८-९-१० रोजीं केलेल्या उपदेशाचा सारांश.)

मनुष्य कसाही असो, ज्ञानी असो वा अज्ञानी असो, संपत्तिसुखसागरात पोहणारा असो किंवा पापाने गांजलेला असो, त्याला कोणत्या ना कोणत्या प्रसंगी तरी कमीअधिक प्रमाणाने ईश्वरी प्रेरणा ही होणारच. मानवी मन आणि ईश्वरी प्रेरणा ह्यांचा अपरिहार्य संबंध आहे. किंबहुना ईश्वरी प्रेरणेला पात्र असणे हेच मानवी मनाचे लक्षण असेही म्हणता येईल. ज्यास कधीही दैवी प्रेरणेचा स्पर्श होण्याचा संभव नाही, ते मन पशूचे समजावे. अपवादादाखलही ते मनुष्यामध्ये आढळणार नाही. प्रेरणा ह्या शब्दाचा आजच्या प्रसंगी एवढाच अर्थ घ्यावयाचा आहे की, एकाएकी अकल्पितपणे मनाची सुखमय स्थिती होऊन त्यात आदर्शाचे दर्शन होणे. ह्या दर्शनामुळे नेहमीच एकादा मोठा युगांतर करणारा, (Epoch making) शोध किंवा विचार लाभतो असे नव्हे, किंवा ‘न भूतो न भविष्यति’ असा काही अजब चमत्कार घडतो असेही नव्हे, तर केवळ मनाची अनिर्वचनीय सुखमय स्थिती होऊन त्या वेळी त्यास एकाद्या थोर ध्येयाचा साक्षात्कार होतो. ह्या साक्षात्काराचे एक लक्षण असे आहे की, तो आपल्या कसल्याही प्रयत्नांनी होत नाही व होण्यासारखा नसतो. कठोपनिषदामध्ये म्हटले आहे.

नायमात्मा प्रवचनेन लभ्यो | न मेधया न बहुना श्रुतेन ||
यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तैस्यैष आत्मा | विवृणुते तनू स्वाम् ||
-कठोपनिषद् ३-२-२२

(हा आत्मा आदर्श केवळ प्रवचनाच्या योगें म्हणजे पुष्कळ सांगितल्यानें, किंवा बुद्धीच्या योगें किंवा ऐकण्यानें मिळत नाहीं. ज्यावर त्याची कृपा होईल त्यालाच तो मिळतो. त्यालाच तो आपले स्वरूप उघड करून दाखवितो.)

ह्या ठिकाणी आधुनिक थिऑसॉफिस्ट किंवा सूक्ष्मवादी म्हणतील की, ह्या प्रेरणेला यद्यपि आपला ह्या जन्मातील प्रयत्न कारणीभूत झालेला नसला, तथापि पूर्वजन्मातील प्रयत्न कारणीभूत होत असावा. आणि आधुनिक मानसशास्त्रवेत्ते (Psychologists) सांगतात की, मनाच्या बाह्य आणि ज्ञात व्यापारामुळे ह्या प्रेरणेचा अनुभव घडलेला नाही, असे जरी भासले तथापि काही गूढ अंतर्व्यापारामुळे तरी तो घडत असला पाहिजे. ते व्यापार आपणांस कळत नसले, तरी मुळीच घडत असला पाहिजे. ते व्यापार आपणांस कळत नसले, तरी मुळीच घडत नाहीत असे म्हणता येत नाही. पण ह्या दोहों पक्षांचे म्हणणे काही असो, उपनिषदातील वरील उद्गाराची यथार्थता कमी होत नाही. कारण, ह्या प्रेरणेच्या सुखमय स्थितीस आपला कोणताही तिच्यापूर्वी आपल्याकडून नुकताच झालेला प्रयत्न कारणीभूत होत नाही हे खरेच आहे. पूर्वसंचितामुळे ती होवो, किंवा अंतर्व्यापारामुळे होवो, ती प्रेरणा हल्ली आपल्यास आपोआप प्राप्त झालेली आहे, अशी साक्ष आपले मन आपल्यास देते. जसे काय आपल्यासाठी एकाद्या पिढीत अनामत ठेवलेल्या शिलकेचा वारसा असून, त्यावरील व्याज आपल्यास एकाएकी मिळावे आणि आपली संकटातून मुक्तता व्हावी, किंवा एकादा कार्यारंभ करण्यास मदत व्हावी असाच ह्या प्रेरणेचा प्रकार अनुभवाला येतो. तात्पर्य इतकेच की, आदर्शदर्शन होण्याला आपले प्रयत्न कारण नसून, ते आपल्यास अकस्मात घडते.

पण ही प्रेरणा अथवा आदर्शदर्शन झाले म्हणजे सर्व काही मिळविले असे होत नाही. उलट ह्यानंतर आपल्या ख-या आणि घनघोर प्रयत्नास सुरूवात व्हावयाची असते. कवीला एकाद्या कल्पनेची प्रेरणा झाल्यावर तिचा त्यास सारखा ध्यास लागतो, आणि त्या कल्पनेला शब्दसृष्टीतले मूर्तस्वरूप देण्यास त्याला अविश्रांत श्रम करावे लागतात. केवळ प्रेरणा झाली एवढ्यावरूनच कोणी कवी बनतो असे नाही. प्रतिभा हे काव्याचे सर्वस्व असे जरी आहे, तरी ही प्रतिभा कमीअधिक मानाने सर्वांमध्येच असते. कवीच्या अंत:करणाची सहृदयता आणि त्याला अकस्मात होणारी प्रेरणा हे दोन्हीही गुण मानवी मनास सामान्य आहेत. पण ज्या व्यक्तीमध्ये ह्या गुणांशिवाय झालेल्या प्रेरणेत शब्दाचे सुंदर आणि कायमचे स्वरूप देण्याची अलौकिक शक्ती असते, तीच व्यक्ती प्रचारात आम्ही ज्याला कवी म्हणतो त्याच्या पदाला पोहोचते. हे मूर्तस्वरूप देण्याचे काम तडीस नेण्यासाठी कवीला भाषा, व्याकरण, लोकरीती, मनुष्यस्वभाव आणि अभिरूची इत्यादी अनेक गोष्टींशी सतत झगडावे लागते. मूर्तिकाराचेही असेच आहे. प्रख्यात इटालियन मूर्ती करणारा मायकेल आजेलो ह्याने मनुष्याच्या आकृतीएवढी मोझेसची हुबेहूब मूर्ती केलेली रोम शहरामध्ये ठेविलेली आहे. ती घडविण्याचे कामी त्याला चाळीस वर्षे लागली असे सांगतात. इतक्या काळानंतर ज्या घाटाची अलौकिक मूर्ती घडविण्याचे श्रेय त्याला शेवटी मिळाले, तिची हुबेहूब छाया प्रेरणेच्या रूपाने त्याला चाळीस वर्षांच्या आरंभीच दिसली असावी. ज्याप्रमाणे एकाद्या आधीच घडलेल्या मूर्तीवर चिखलाचा जाड आणि कठीण थर सांचलेला असावा आणि तो खरडून काढून आतील मूर्ती उघडकीस आणीत असतात. हाच प्रकार चिता-याचा आणि हाच प्रकार संसारात पुरूषार्थ साधणा-या प्रत्येक पुरूषाचा. ज्याप्रमाणे कवी धिमेपणाने हळूहळू पदरचना करतो, मूर्तिकार टाकीचे घाव मारतो, चित्रकार कलमाचे फटकारे ओढतो, त्याचप्रमाणे संसारपटावर पुरूषार्थसाधकही हळूहळू आपल्या ध्येयाकडे मार्ग क्रमीत असताना प्रयत्नश: पावले टाकितो.

प्रेरणा होत असताना मोठे सुख होते, पण प्रयत्न करीत असताना घोर यातना होत असतात. प्रेरणेचा काळ मध्यरात्रीसारखा मनास मोहून टाकणारा, तेव्हा कोणत्याही रंगास जिल्हई येते; न्यूने दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. प्रेरणेस कालावधी न लागल्यामुळे श्रमाची तर गोष्टच काढावयास नको. पण प्रयत्नाचे तसे नाही. ह्यावेळी मध्यान्हाचा प्रखर उजेड पडून सर्व रंग निस्तेज झालेले असतात, न्यूने उघडी होतात, पावलोपावली विलंब लागून मार्गप्रतीक्षा करावी लागते, अनिश्चय, निराशा, प्रलोभन, प्रमाद ह्यांच्या प्रखर तापातून अडखळत जावे लागते. पुष्कळदा साधक रंजीस येऊन हात टेकितो, माघारही घेतो. अशा वेळी त्याला पूर्वी झालेल्या आदर्श दर्शनाची पुन:पुन्हा आठवण करावी लागते.

ह्यावरून उपनिषदात सांगितलेला आत्मा आपल्या इच्छेने ज्याच्याकडे येतो, त्याचे तेवढ्यावरूनच चांगले होते असे नाही. तुकाराम म्हणतात :

देवाची ते खूण, आली ज्याच्या घरा | त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा ||
देवाची ते खूण, करावे वाटोळे | आपणा वेगळे कोणी नाही ||
देवाची ते खूण, तोडी मायाजाळ | आणि हे सकळ जग हरी ||
पहा देवे तेचि बळकाविले स्थळ || तुक्यापे सकळ चिन्हे त्याची ||

असाच उद्गार येशू ख्रिस्तानेही काढला आहे. “मी पृथ्वीवर आग पाखडण्यासाठी आलो आहे. मी शांती देण्यास आलो आहे असे तुम्हांस वाटते काय? मी सांगतो ‘नाही’ पण दुही माजविण्यास आलो आहे. कारण आतापासून ज्या घरात पाच असतील त्यांपैकी दोन तिहींच्या विरूद्ध होतील आणि तीन दोहींच्या विरूद्ध होतील, मुलगा बापाच्या आणि बाप मुलाच्या उलट होईल. मायलेकीचे पटणार नाही. सासू सुनेचे भांडण लागेल” (लूकसने केलेले शुभ वर्तमान भाग १२, श्लोक ४९-५३). आदर्शाचे एकदा दर्शन झाले म्हणजे ते पिशाच्चाप्रमाणे कसे माणसाच्या मागे लागून त्यास भ्रमविते, ह्याचे उत्तम वर्णन श्रीएकनाथांनी पुढील अभंगात केले आहे.

भूत जबर मोठे ग बाई | झाली झडपण करू गत काई ||
सूप चाटूचे केले देवऋषी | या भूताने धरिली केशीं ||
लिंब नारळ कोंबडा उतारा | त्या भूताने धरिला थारा ||
भूत लागले त्या नारदाला | साठ पोरे झाली त्याला ||
भूत लागले ध्रुव बाळाला | उभा अरण्यात ठेला ||
एकाजनार्दनी भूत | सर्वठायी सदोदित ||

ह्यावरून आदर्शदर्शन झाल्यावर जे सतत प्रयत्न करावयास लागतात त्यासच ते दर्शन किंवा प्रेरणा झाली म्हणावयाची, इतरांस नाही. एरवी काही लोक म्हणत असतात की आम्ही प्रेरणावादी आहो, आम्हांला प्रयत्न करण्याची काही जरूरी नाही. जसे काय प्रयत्नाचा आणि प्रेरणेचा काही संबंध नाही. पण वरील उदाहरणावरून प्रेरणा ही ख-या प्रयत्नास कारण आणि आरंभ आहे असे दिसून येते. आपले हे १०० किंवा ६० वर्षांचे आयुष्य म्हणजे आपल्यास मिळालेली एक संधीच होय. आयुष्याची बाळपणरूपी प्रस्तावना संपल्यावर केव्हा ना केव्हा तरी तरूणास आदर्शाचे दर्शन होतेच. हे झाल्यावर त्याच्यापुढे जे त्याचे भावी आयुष्य असते ते एकाद्या मूर्तिकारापुढे ठेविलेल्या संगमरवरी शिळेप्रमाणेच आहे. मायकेल आंजेलोने ४० वर्षांत ज्याप्रमाणे मोझेसचा पुतळा कोरिला, त्याप्रमाणे संसारातील प्रत्येक साधकास आपल्या पुढील कमी अधिक ४० वर्षांच्या आयुष्यातून आपल्या आदर्शानुरूप स्वचरित्राचा पुतळा कोरावयाचा असतो. कारखान्यामध्ये मुले शिकत असता कारखानदार त्यांना ज्याप्रमाणे लाकूड, धोंडा, धातू इत्यादी सामग्री पुरवितात आणि पुष्कळ वेळां विद्यार्थी ज्याप्रमाणे ह्या सामग्रीचे काहीच न बनविता तिची केवळ नासधूस करितात, त्याप्रमाणे आयुष्यरूपी बहुमोल धातूची नासधूस सर्वत्र चाललेली दिसते. तथापि ह्याच संसारशाळेतून ब-याच विद्यार्थ्यांनी बाहेर पडण्यापूर्वी आपणास दिलेल्या सामग्रीच्या आपल्या दर्शनानुरूप काही तर मूर्ति मागे करून ठेविलेल्या आढळतातच.

प्रेमप्रकाश

(रा. रा. द्वा. गो. वैद्य यांच्या मातोश्रीच्या आद्यश्राद्धानिमित्त केलेल्या उपदेशाचा सारांश.)

पुत्र वित्त वारा गृहादि सकळ ।। देऊनि दयाळ वाट पाहे ।।
देवाचे मनांत मज हे ध्यातील ।। अंती पावतील निजपद ।।
सोडूनि देवासि गुंतले दोरासी ।। झाले अविश्वासी विश्वंभरीं ।।
तुका म्हणे फार भुलूनिया मेले ।। विरळा लागले हरिपायीं ।।

ह्या अभंगातील उक्ती विचार करण्यासारखी आहे. देवाने पुत्र, वित्त, दारा देऊन गृह निर्माण केले व त्या घरामध्ये अशी एक प्रेमाची ज्योत उत्पन्न केली की त्या ज्योतीच्या प्रकाशामुळे कुटुंबातील माणसे एकमेकांस स्पष्ट दिसतात, आपणांस नेत्र आहेत पण बाहेरच्या व आतल्या गोष्टींचे संनिकर्ष करणारा प्रकाश नसता तर त्या नेत्राचा काहीएक उपयोग होणार नाही. त्याचप्रमाणे धैर्य, सहनशीलता वगैरे प्रेमाची अधिष्ठाने असूनही प्रेमाचा प्रकाश पडला नाही तर त्याचा काहीएक उपयोग होणार नाही, म्हणजे जड सृष्टीमध्ये प्रकाश हे कार्य करतो. ह्या प्रेमप्रकाशातूनच पुत्र, पती, पत्नी, बंधू, भगिनी, माता, पिता ही सर्व संबंधाच्या योगे एकत्र झालेली माणसे परस्परांस स्पष्ट दिसतात. बाह्य सृष्टीतील प्रकाशामुळे पदार्थ जसा स्पष्ट दिसतो, त्याचप्रमाणे डोळ्यांस अंधारी येऊन सूक्ष्म पदार्थही दिसत नाही किंवा तो आहे त्यापेक्षा निराळा दिसतो, त्याचप्रमाणे प्रेम हे डोळ्यांना डोळेपण देणारे आहे तसेच आंधळेपणही देणारे आहे. म्हणजे प्रेमाच्या प्रकाशातून स्वत:च्या संबंधी माणसाचे गुण जेवढे दिसतात, तेवढे अवगुण दिसत नाहीत. माता केवळ बालकाच्या लाघवाने मोहीत स्वकर्तव्यास कधी कधी विसरते. पण साधारणपणे मनुष्याच्या अंगी जाणीवबुद्धी असेल तर स्वयंस्फूर्तीने व स्वयंशक्तीने प्रेमाच्या प्रकाशाच्या साहाय्याने घरातील मंडळीचे गुणावगुण दिसतील म्हणजे मग आपण प्रेमाच्या प्रवाहात सापडून ईश्वराकडे सहजगत्या चाललो आहो हे आढळून येईल. ह्याकरिता एकमेकांविषयी यथार्थ ज्ञान होण्यास प्रेमप्रकाश ही ईश्वराची एक योजना आहे. ह्या योजनेमुळे आपणांस ईश्वराबद्दलचे ज्ञान प्राप्त होते. पण ह्या प्रकाशाचा योग्य उपयोग केला नाही तर देवास विसरून दोरीवर प्रेम बसते. म्हणजे हा प्रेमप्रकाश ज्याने उत्पन्न केला त्यासच आपण ओळखीत नाही. देव हा गारूड्याप्रमाणे आपल्याकडून खेळ करवून शेवटी आपल्या सर्वांना स्वत:कडे खेचतो, ह्यात त्याचा स्वार्थ नसून आपणांस निजपद प्राप्त करून देण्याचा त्याचा हेतू असतो. ह्याकरिता आपणांस आपला पुढचा मार्ग सुलभ करणे असेल तर आपण आपल्या गृहातील माणसांच्याच गुणावगुणांचे निरीक्षण करावे. मात्र अवगुण काढून टाकण्याची जेव्हा त्यांना संधी प्राप्त झाली तेव्हा ती संधी त्यांनी साधली की नाही ह्याचे योग्य निरीक्षण करावे व त्यापासून आपण धडा घ्यावा म्हणजे आपोआप आपण निजपदास जाऊ. तुकारामांनी अभंगात सांगितल्याप्रमाणे पुत्र, वित्त, घर, दार, आपणास देऊन तो द्याळू परमेश्वर आपण निजपद अंती पावू अशी वाट पहात बसला आहे तर ह्याची पूर्ण गाठ बांधून ज्याने प्रेमप्रकाश निर्माण केला त्या प्रभूला आपण ओळखावे आणि ते घरातील कुटुंबाच्या गुणावगुणांच्या निरीक्षणानेच उत्तम साधले जाईल, शेजा-यावर, देशावर, राष्ट्रावर प्रीती ठेवून ईश्वरास ओळखणे हा निराळा मार्ग, पण सोपा म्हणजे वर सांगितलेलाच होय.

  1. प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो कां ?
  2. प्रस्तावना.
  3. पॅरिस शहर.
  4. पृथ्वीच्या पोटांत ४४० यार्डांखालीं
  • 98
  • 99
  • 100
  • 101
  • 102
  • 103
  • 104
  • 105
  • 106
  • 107
Page 103 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी