1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. १०-४-१९०२

नाताळच्या खालोखाल ईस्टर हा ख्रिस्ती लोकांचा मोठा सण आहे. ह्याची गणना चांद्रमानाप्रमाणे होत असल्यामुळे सौर वर्षात ह्याची तारीख मागे पुढे बदलते. गुड फ्रायडे (चांगला शुक्रवार) पासून तो पुढच्या सोमवार अखेर, अत्यंत गरजेची-विशेषेकरून दारूची दुकाने खेरीज करून, बाकी सर्व दुकाने सर्वत्र ह्या चार दिवसांत बंद असतात. हा चांगला शुक्रवार येशू ख्रिस्ताची पुण्यतिथी होय. ह्याच दिवशी ज्यू लोकांनी त्यास सुळावर चढविले. पुढे तीन दिवसांनी आदित्यवारी तो थडग्यातून आपल्या जड शरीरासह उठला आणि आकाशात देवाच्या उजवीकडे बसला अशी जुन्या ख्रिस्ती लोकांची भोळी समजूत आहे. म्हणून शुक्रवार हा शोकाचा दिवस आणि  आदित्यवार हा आनंदाचा दिवस मानून देवळातील सर्व आराधनेचे प्रकार ह्या समजुतीस अनुरूपच होतात. चांगल्या शुक्रवाराच्या पूर्वीच्या सहा आठवड्यास लेंट (Lent) हे नाव आहे. हा शब्द सॅक्सन भाषेतील लेनटन् (Leneten) ह्या शब्दापासून आला आहे, लेनिटनचा अर्थ लांबणे व ह्या सहा आठवड्यांत दिवस अधिकाधिक लांबत असतो व रात्र कमी होत असते. ह्यावरून लेंटची संस्था ख्रिस्ताच्याही पूर्वीची असून नंतर तिला ख्रिस्ती धर्माचे स्वरूप आले ते असे,:-……जॉन दि बाप्टिस्ट ह्याने ख्रिस्तास बाप्तिस्मा दिल्यावर ख्रिस्ताने ४० दिवस वनवास भोगिला. चाळीस अहोरात्री त्याने उपवास केला. ह्या अवधीत सैतानाने त्यास अनेक प्रकारे भुलविण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. ह्यानंतर ख्रिस्त, लोकांस उपदेश करण्या निघाला. हे चाळीस दिवस आता लेंट ह्या नावाने  पवित्र मानण्यात येत आहेत. हिंदू लोक जसे चातुर्मास साधला नही तरी शेवटची कार्तिकी एकादशी तरी पाळतात तसे इकडेही निदान गुडफ्रायडेच्या दिवशी पुष्कळ बायका, मुले व म्हातारी माणसे उपवास करितात. फराळाचे मुख्य जिन्नस म्हणजे मासे व अंडी हे होत. आमच्याकडे जसे एकादशीच्या दिवशी केळी, रताळी, भुईमूग इ. जिन्नस दोनप्रहरी अगदी महाग होतात. तसेच येथे (डेव्हनपोर्ट हे मासे धरण्याचे मुख्य ठिकाण असूनही) शुक्रवारी सकाळीच बाजारात मासा म्हणजे अगदी दुर्मिळ पदार्थ झाला होता, असे आमच्या घरवालीने सांगितले. अशा प्रकारची व्रते आणि धार्मिकपणा रोमन कॅथोलिक लोकांमध्ये फार आढळतो. संध्याकाळी एका कॅथोलिक देवळातून बाहेर पडल्यावर एका गृहस्थाशी बोलत असताना त्याने म्हटले, “हे प्रॉटेस्टंट लोक इतके उद्दाम आहेत की ते आजदेखील मांस खातात” मग मी त्यास विचारले तुम्ही मासे नाही का खात? ते धार्मिक गृह्थ म्हणाले, “मासे काय प्राणी आहेत?” हे ऐकून मी निरूत्तर झालो!

एकंदरीत हा सण शोकाचा व अनुतापाचा आहे. म्हणून क्वचित काही पापभीरू लोक कललीही मौज, चैन अथवा करमणूक न करिता घरी स्वस्थ चिंतनात काल घालवितात, पण अशी उदाहरणे दिवसेदिवस दुर्मिळ होऊ लागली आहेत असे दिसते. सुशिक्षित आणि फॅशनेबल लोकांत तर कोणत्याही प्रकारचे सण पाळणे म्हणजे गावंढळपणाचे लक्षण समजले जाते. हे राष्ट्र अत्यंत उद्यगी लोकांचे असल्यामुळे बहुजनसमाज सुट्टी मिळाल्याबरोबर सहजच ती चैनीत व करमणुकीत घालवितो. हा वसंत ऋतूचा काळ असल्यामुळे फुटबॉल, हॉकी इ. मोकळ्या हवेतले खेळ खेळणे व ते पाहणे ह्या मुख्य करमणुकीखालील वर्गाची मोठी करमणुक म्हणजे दारू पिणे. धर्माधिकारी ह्या सर्वच करमणुकी सरसकट बंद करण्याठी कंठशोष करितात म्हणून त्यांस कोणीही विचारीत नाहीत!

आज सारा  दिवसभर सर्व देवळांत उपासना चालू असतात. सकाळच्या उपासनेस येथील एका प्रॉटेस्टंट मुख्य देवळात गेलो. उपासकांची संख्या १० पुरूष, ३० बायका, १०० मुळे इतकी होती. नेहमी बायकापुरूषांचे प्रमाण बहुतेक असेच असते. कॅथोलिक देवळात पूजेचा संभार विशेष आणि आराधनाक अधिक थाटाचा असतो, तशात जवळच प्लिमथ येथे कॅथोलिक कथीड्रल म्हणजे मुख्य मठस्थान आहे, म्हणून तेथे संध्याकाळच्या मुख्य उपासनेस गेलो. कथीड्रलची इमारत जुनी आणि भव्य आहे. जागोजागी ख्रिस्ताच्या व ख्रिस्ती साधुसंतांच्या अनेक मूर्तींची स्थापना केली आहे. देवळात सर्वत्र शोकचिन्हे दिसत होती. मुख्य गाभा-यातील देव्हारा व त्यातील मूर्ती ह्यांवर काळ्या पडद्याचे झाकण होते. इतर मूर्तीपुढे नेहमी असणारा धूपदीप, पुष्पांचा थाटही आज नव्हता. ह्यामुळे देवळात शिरल्याबरोबर असा काही अवर्णनीय गंभीर देखावा दिसला की लवकरच अंत:करण खेदमय भावाने भरून गेले. पहावे तिकडे ख्रिस्ताच्या दु:खपर्यवसायी चरित्राचे असे प्रदर्शन होत होते की पुण्यशील आत्म्यास पश्चात्ताप घडावा! मग पाप्यांची काय कथा!

७|| वाजता उपासनेस प्रारंभ झाला. प्रत्येक स्त्रीपुरूष देवळात आल्याबरोबर देव्हा-यासमोर गुडघे किंचित वाकवून पुढे जाई. नेमिल्या वेळी बिशपचा छबिना आला. सर्वांपुढे वृद्ध आणि मौनव्रत धारण करणा-या बिशपची स्वारी, त्याच्या मागून ८|१० धर्माधिकारी व त्यांच्या मागून सुमारे ६० गाणा-या मुलांचा मेळा, अशा क्रमाने येऊन सर्व मुख्य गाभा-यात आपापल्या जागी बसले. दोन रांगांच्यामध्ये एका व्यासपीठावर बायबल ठेविले होते त्यातील निवडक भाग प्रत्येक धर्माधिकारी पुढे पूर्वेकडे तोंड करून म्हणजे इतर सर्व उपासकांकडे पाठ करून वाचीत असे. असे सर्व धर्माधिका-यांनी केल्यावर मुख्य कॅननचा उपदेश झाला. त्यात त्याने ख्रिस्तास सुळी देण्याच्या प्रसंगाचे वर्णन केले, त्याच्या रक्ताने भाविक मनुष्याच्या पापाचे क्षालन कसे होते, त्याप्रसंगी जे अनेक चमत्कार घडले ते सर्व अक्षरश: खरे आहेत, त्याविषयी जुन्या ज्यू लोकांच्या करारातही भविष्य आहे इ. इ. गोष्टी त्याने सांगितल्या. त्याचा पोषाक, पायघोळ पांढरी कफनी, छातीवर तांबडे वस्त्र, कंबरेस व दोन्ही बाजूंनी जरीकाठी काळ्या कापडाच्य पट्ट्या, डोकीस मुकुटाकृती काळी टोपी असा होता. व्याख्यानात जेव्हा ख्रिस्ताचे नाव येई तेव्हा तो आपली टोपी उचलीत असे व सर्व उपासक नमन करीत. व्याख्यान आटपल्यावर मेळ्यातील मुलांनी अत्यंत करूण व दीर्घ स्वराने काही गाणी म्हटली. आज कसलेही वाद्य वाजविण्यात आले नाही. ह्यानंतर ख्रिस्ताच्या प्राणोत्क्रमणाची वेळ आली. ह्यावेळी पृथ्वीवर चहूंकडे मोठा अंधार पडला, धरणीकंप झाला आणि मोठा आवाज झाला इ. वर्णन बायबलात आहे. म्हणून आता तसेच करण्यात आले. देवळातील सर्व दिवे ग्यासचे असल्याने ते एकदम नाहीसे केले. पाच मिनिटे चहूंकडे अंधार आणि सामसूम झाले. ह्यावेळी ह्या मोठ्या देवळात सुमारे ३०० लोक होते; पण कोणीही मोठ्याने श्वोसोच्छवास देखील करीना. शेवटी धरणीकंपाची नक्कल करण्यास्तव एका कोप-यातून धडधड असा बारीक आवाज झाला! मग सर्व दिवे एकदम लागले आणि उपासना आटपली!!

प्रॉटेस्टंट देवळात ह्या नकला होत नाहीत, पण व्याख्यानांचा सारांश बहुतेक असाच असतो. युनिटेरिअन देऊळ गुड फ्रायडेच्या दिवशी तर मुळी बंदच होते व इस्टरच्या आदित्यवारी त्यातील दोन्ही उपासना एका ब्राह्मानें चालविल्या !

डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंति

* डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंति

घ्यारे भाई घ्यारे भाई । कोणी कांहीं थोडें बहू ॥ - तुकाराम

(* डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था मुंबई येथें स्थापन होऊन चार वर्षें झालीं व बलिप्रतिपदेच्या दिवशीं तिला पांचवें वर्ष लागलें, म्हणून मिशनच्या परळ येथील इंग्रजी शाळेंत ता. २ नोव्हेंबर सन १९१० रोजीं पाडव्या दिवशीं सकाळीं आठ वाजतां ईश्वरोपासना झाली.  ती रा. विठ्ठलराव शिंदें यांनीं चालविली.  त्या वेळीं प्रार्थनासमाजांतील आणि बाहेरील मिशनचे हितचिंतक मंडळीनीं आणि अस्पृश्य वर्गांतील स्त्रीपुरुष मंडळींनीं शाळेचा हॉल भरला होता. शाळेंतील पुष्कळशीं मुलें स्वच्छ स्नान करून आणि नीटनेटका पोशाख करून बसलीं होतीं. त्यांना दिवाळीचा खाऊ वाटल्यानंतर थोडीशी प्रार्थना करून त्यांना पाठविण्यांत आलें. नंतर उपासनेस आरंभ झाला. उपदेशाच्या वेळीं रा. शिंदे यांनीं 'अभय दान मज देई गा उदारा' आणि - 'घ्यारे भाई घ्यारे भाई । कोणी कांहीं थोडें बहु' ॥  हे दोन अभंग घेतले होते.)

डिप्रेस्ड क्लासेस मिशन काढून काल चार वर्षें संपली. आज नूतन वर्षारंभीं 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी' या नांवाचा खोल अर्थ काय आहे आणि त्या अर्थाची खरी सिद्धी कशी होणार या दोन गोष्टींचा विचार करणे अवश्य आहे. मिशन हा शब्द आमच्याकडे अद्यापि नवीन आहे. तो आमच्या अंगवळणी न पडल्यामुळे त्यामध्यें कांहीं न रुचणारी अशी परकीयता भासते. पौरस्त्य धर्मांतील मोक्षाचा मार्ग हा व्यक्तिविषयक आहे. प्रथम प्रथम तर ज्ञान आणि समाधि यामध्यें त्यांचा नीरस लय होऊन पुढें त्यांत भक्तीची जोड मिळाली तरी प्रत्येकानें एकाकी ईश्वराकडे जावें हेच धोरण बराच काळ होतें. पुढे भक्तिमार्गाचा विकास होत जाऊन रामानुजादि यांनीं त्याला सामाजिक स्वरूप दिले. तथापि या भागवत धर्मास साधेंभोळें प्राकृत रूप देऊन अभयाची सुवार्ता सर्व मनुष्यप्राण्यांस पोहोंचविण्याचें श्रेय तुकारामसारख्यांनीं ''यारे यारे लहान थोर । नारि भलते नारी नर ॥'' , ''आम्ही वैकुंठवासी'', ''पिटूं भक्तीचा डांगोरा'' इत्यादी प्रकारें दवंडी पिटून संपादन केलें. तथापि मिशन, गास्पेल, इव्हांजेल इत्यादी शब्दांस अन्वर्थक शब्द आमच्या भाषेंत न मिळण्याइतका त्यांतील अर्थाचा आमच्यांतील सामाजिक आणि धार्मिक चळवळींमध्ये कमी प्रचार झाला आहे. इतकेंच नव्हे, तर अजूनही हे शब्द आमच्या कानाला कडू लागतात. मिशन स्थापन झाल्यावर दोनतीन वर्षें वरील नांवांतील 'मिशन' हा शब्द काढून टाकण्याविषयीं कित्येक हितचिंतकांकडून कळकळीच्या सूचना वेळोवेळीं आल्या. याचें कारण या संस्थेचें खरें स्वरूप कळले नाहीं एवढेंच. मनुष्याचा कोणताही वर्ग किंबहुना कोणीहि व्यक्ति कायमची पतित नाहीं, अस्पृश्य नाहीं, निराश्रित नाहीं, स्वर्गीय आशेचा तंतु कोणीही तोडण्यास समर्थ नाहीं. तात्पुरतिक निराशेने खिन्न झालेल्यांना, दुःख, दैन्य आणि दारिद्रय यांच्या संवयीनें जड झालेल्यांना अभयाची सुवार्ता पोहोंचविणें हे मिशनचें काम आहे. मिशन म्हणजे प्रेषित संस्था; केवळ ऐहिक कल्याणासाठीं झटणारी मंडळी नव्हे; यशापयशाकडे न पाहतां प्रेरणेच्या प्रवाहावर यत्न करणारी मंडळी होय. पण ही सर्व भाषा आमच्या देशबंधूंस परकीय वाटते. हिच्या योजनेंत नुसतें पोकळ अनुकरण दिसतें. खाणें, पिणें, पेहराव आणि बोलणें चालणें या वरवरच्या क्षुल्लक गोष्टींमध्यें पाश्चात्त्यांचें अनुकरण राजरोस सर्वच करीत आहेत. परंतु आध्यात्मिक अनुभवाच्या भरींवपणानें समाजसेवा घडत असतांनाही तद्दर्शक शब्द ऐकल्यावर मात्र कित्येक लोक कानांवर हात ठेवतात. असो. मिशनचा खरा अर्थ हा आहे. एवढा थोर अर्थ आमच्या नांवामध्यें आहे म्हणून तशी लायकी आम्हांमध्यें आहे असें आम्हां कोणांसही वाटत नाहीं. या कामास स्वतःस कायमचीं वाहून घेतलेलीं जीं चार-दोन माणसें असतील तीं जवळ जवळ पूर्णपणें कामास नालायक आहेत, हें उघड करून दाखविण्याची आवश्यकता नाहीं. काहींना तर आपल्या नालायकीचीही जाणीव नाहीं इतकी ती साधीं भोळीं आहेत. मिशन सुरू झाल्यानंतर एकदोन वर्षांनींच मिशनची कान्स्टिट्यूशन (सनद) तयार झाली. त्या वेळी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया' असा नांवाचा विस्तार होऊन उद्देशामध्यें असें म्हटलें आहे कीं, शिक्षण, कामधंदा, समतेची आणि ममतेची वागणूक, धर्मनीति आणि नागरिकता इत्यादि संबंधीं उपदेश ह्यांच्या द्वारां हिंदुस्थानांतील अस्पृश्य वर्गांना साह्य करण्याचा हें मिशन यत्न करील आणि ह्या मिशनचा योगक्षेम ही सोसायटी चालवील. ह्यावरून प्रतयक्ष यत्न करण्याचें काम मिशनचें आहे. आणि द्रव्यबळ, व्यावहारिक अनुभव, नियंत्रण, सल्लामसलत, शिफारस इत्यादी ऐहिक सर्व अनुसंधानांच्या योगें हें मिशन जिवंत राखणें हें सोसायटीचें काम. मिशनरी आपल्या कामाला जसे नालायक आहेत तशीच सोसायटीही नालायकच आहे. कारण जबाबदारीच इतकी कठिण आणि जड आहे. तुकारामासारख्यांनाही सेवाभक्ति भावाच्या आदर्शाकडे नजर गेल्याबरोबर आपण पतित आहों असें वाटतें तर तेथें आमच्या मिशनचा आणि सोसायटीचा पाड काय ?  आम्ही वरपासून खालपर्यंत नालायक आहो हें उघड दिसतें. पण नांवाचा अर्थ आणि पुढील आदर्श हीं फार खोल असल्यामुळें आपल्या स्वतःची व सर्वांची नालायकी उघड आणि स्पष्ट केल्याशिवाय राहिल्यास पदरीं अहंपणाचा आरोप येणार म्हणूनच केवळ स्वतःची नालायकी आम्हीं सर्वांनीं स्वतः सांगण्याची जरूरी आहे.

मिशन आणि सोसायटी याशिवाय एकत्र सामाईक काम करण्याची तिसरी एक योजना आहे. अशा मंडळीस कंपनी असें नांव असतें. तिचा उद्देश परार्थांस बाधक न होईल अशा सर्व कायदेशीर बाजूंनीं आपला समाईक स्वार्थ साधावा असा असतो. या तिसऱ्या अर्थांचा नुसता स्पर्शही आमच्या मिशन सोसायटीस आज चार वर्षें झालेला नाहीं आणि पुढें होणार नाहीं असा विश्वास आहे. कोणत्याही एका मताचा स्वीकार करून त्या मताचा प्रसार करण्यासाठीं म्हणजे त्या मतानुयायांची संख्या वाढविण्यासाठीं मिशनाची स्थापना होत असते. अशा निरनिराळ्या मिशनांना कंपनी हें नांव दिल्यास वावगें होणार नाहीं. मुंबईच्या किंवा कोणत्याही प्रार्थना अथवा ब्राह्मसमाजाच्या कमिटीनें केवळ आपल्या अनुयायांची संख्या वाढविण्याच्या हेतूनें ही मिशनसोसायटी आपल्या हस्तगत करून घेतलेली नाहीं. यद्यपि ह्या मिशनची प्रेरणा वरील समाजाच्या उदार तत्त्वामुळें झाली आहे इतकेंच नव्हे तर मिशनच्या कार्यांतही समाजाच्या सभासदांचाच पुढाकार आहे, तथापि हें मिशन आपल्या हस्तगत करून घेऊन आपली संख्या वाढविण्याचा स्वार्थ - मग तो कितीही उदात्त असो - या सभासदांच्या मनांत वागत नाहीं. समाजाच्या बाहेरील मंडळीकडून मात्र वेळोवेळीं अनेक प्रकारच्या सूचना येतात. मिशनच्या कार्यांतून धर्मतत्त्वांला अजिबात फाटा द्यावा किंवा त्यांस एकदेशीयत्वाचें वळण द्यावें, असा या सूचनांना भिन्नभिन्न दिशांनीं रोख असतो. व दोन्हीही या परस्पर भिन्न सूचनांचा शांतपणें विचार करून मिशनच्या चालकांवर सर्वदेशीय सनातन धर्मतत्त्वाची व स्वतःस झालेली प्रेरणा सांभाळून आपलें तारूं सुरक्षितपणें हाकारावयाची जबाबदारी आहे आणि ती त्यांनीं आजपर्यंत राखिली आहे.

याप्रमाणें डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी या नांवाचा अर्थ आहे. त्याची सिद्धि होण्यासाठीं त्याला चिकटून रहाणें आवश्यक आहे. प्रत्यक्ष सेवा करणारी मिशनरी मंडळी आणि त्यांचा योगक्षेम चालविणारे सोसायटीचे सभासद यांनीं या नांवाचा खरा अर्थ आपल्या डोळ्यांपुढे ठेवून, परस्परांतील संबंध शुद्ध आणि प्रेमाचा राखून नंतर आपल्यापुढे असलेल्या असंख्य निराश्रित वर्गांना 'घ्यारे भाई घ्यारे भाई' अशी हाक मारावयास पाहिजे. हाकेचा स्वीकार होण्यापूर्वीं तिला जोम येण्यास मिशनरींचे स्वतःचें धर्मसाधन आणि सभासदांचे परस्परांतील आणि सर्वांचें इतर देशबंधूंशी जें वर्तन व्हावयास पाहिजे त्यावर अवलंबून आहे. ईश्वरापासून प्रथम अभयदान मिळवून त्याच्या जोरावरच ही हाक मारावयाची आहे. ज्या मानानें तो जोर कमी होईल त्या मानानें ऐहिक अडचणींचा जोर वाढणार आहे. म्हणून सेवकांनीं आपलें ईश्वराशीं अनुसंधान कायम राखलें पाहिजे; आणि मग आपल्या निराश्रित बंधूंस ''भरणी आली मुक्त पेठा ।  करा लाठा व्यापार ॥  उधार घ्यारे उधार घ्यारे ।  अवघे थोर जातीचे ॥  येथे पंक्तिभेद नाहीं ।  मोठें मोठें कांहीं लहान ॥  तुका म्हणे लाभ घ्यावा ।  मुद्दल भावा जतन ॥''  असें सांगितल्यास त्यांस त्याचा अर्थ आणि जोर कळून ईश्वरी नांवाचा जयजयकार होईल.

जलप्रवास

प्रयाण

आगबोट पर्शिया.  
तरुण भार्या, तान्हें बालक, वृद्धही माता-पितरें । अनाथ भगिनी, बंधु धाकुटा, आश्रित बांधव सारे ॥  आलों टाकुनियां । पदरीं घेईं दयामाया ॥१॥

शनिवार ता. २१ सप्टेंबर १९०१ रोजीं सकाळचे १०॥ वाजतां रा. कोरगांवकरांचे घरांतून निघालों तेव्हांपासून वियोगाच्या तीव्र वेदनांस सुरूवात झाली.  बॅलर्ड पियरवर माझ्या आधीं बरीच मित्रमंडळी जमली होती.  गुरूजन आशीर्वाद देऊं लागले. मित्रमंडळ अभिष्टचिंतन करूं लागला.  कांहीजण प्रवासांत उपयोगी अशा महत्त्वाच्या सूचना करूं लागले.  अशी एकच गर्दी उडाल्यामुळें मी भांबावल्याप्रमाणें झालों होतों.  अशा स्थितींत मीं कांहींचा मुळींच निरोप घेतला नसेल, कांहींस मीं उत्तरें दिलीं नसतील.  त्या सर्वांची मी आतां प्रांजलपणें क्षमा मागत आहें.  १२ वाजतां प्लेग-डॉक्टरची तपासणी सुरू झाली.  १२॥ वाजतां मी सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन निघालों.  दारावर आंत सोडतांना रखवालदारानें थोडासा दांडगाईचा प्रसंग आणिला, पण हिंदुस्थानांतील निदान २ वर्षेपर्यंत तरी ही अखेरची असल्यामुळें मीं ती कौतुकानें सहन केली ।  तपासणी एका मिनिटांतच आटोपली.  एकदां आंत गेल्यावर जाणारांची आणि पोंचविण्यास आलेल्यांची नुसती
नजरानजरही होत नाहीं, म्हणून दोघांसही फार वाईट वाटतें.  मी मचव्यांत बसल्यावर, मला न भेटलेल्या बाहेरच्या तिघां मित्रांकडून, पुनः भेटून जाण्याबद्दल ३ चिठ्या आल्या.  पण इतक्यांत मचवा निघाल्यामुळें, माझा नाइलाज झाला.  हळूहळू माझा मायदेश डोळ्यांदेखत अंतरूं लागला.  परदेशगमनाचा विचार प्रथम आल्यापासून तों आतांपर्यंत मी सारखा धांदलींत असल्यामुळें, स्वीकृत गोष्टीचें पूर्ण स्वरूप डोळ्यांपुढें आलें नव्हतें; तें मी मचव्यांत स्थिरपणें बसल्यावर प्रत्यक्ष दिसूं लागल्यामुळें, ह्या पांच मिनिटांत मनाच्या ज्या कित्येक कधींच न अनुभविलेल्या भावना झाल्या, त्या लिहून व्यक्त करणें केवळ अशक्य आहे !  वियोग मूर्तिमंत पुढें उभा राहून माझ्या जिवलग माणसांचीं उदास व खेदमय दिसणारीं चित्रें मला एकामागून एक दाखवूं लागला.  अशाच कष्टमय स्थितींत मला दोन वर्षें काढावीं लागतात कीं काय अशी धास्ती पडली.  पण अखेरची मनाची भावना प्रार्थनामय झाली. विरहवेग कमी होऊं लागला.  किंचित् शांत दृष्टीनें किनार्‍याकडे पाहूं लागलों, तों ह्या प्रवासाची मनांत प्रेरणा होण्यास जी पर्यायानें कारण झाली आहे, ती मुंबई युनिव्हर्सिटी जणूं काय हात वर करून आशीर्वाद देत आहे, असें दिसलें.

याप्रमाणें मी १ वाजतां पर्शिया आगबोटीवर दाखल झालों.  नंतर एका तासानें माझें सर्व सामान मला मिळालें.  २॥ वाजतां आम्ही सर्व मिळून जेवणास बसलों.  जेवण चाललें असतां आगबोट सुटून केव्हां चालू लागली होती हें कांहीं वेळ कळलेंच नाहीं.  एंजीनची धडधड लांबनं किंचित् ऐकूं येत होती.  ग्लासांतील पाणी देखील सहज दिसण्यासारखें हालत नव्हतें.  ३ वाजतां जेवण आटपून घाईनें डेकवर येऊन पाहतों तों कुलाब्याचा दीपस्तंभही मागें राहिला होता.  ३॥ वाजतां १० लाख वस्तीच्या मुंबई शहरास मला क्षितिजांत शोधून काढावें लागलें !  ४। वाजतां मुंबईजवळच्या डोंगरांचाही कोठें मागमूस लागेना !!  सभोंवर क्षितिजाचें विशाळ वलय पसरलेलें, वरतीं ढग खालीं लाटा, ह्यांशिवाय आसमंतात् दृश्य पदार्थ काय तो आगबोटींतून निघणारा धुराचा लोट हाच होता.  खरोखर हा देखावा साक्षात् दगडालाही कवित्वाची स्फूर्ति करणारा आहे !  बोटीच्या अगदीं पिछाडीच्या टोंकावर-म्हणजे मजकडून होईल तितकें करून माझ्या देशाजवळ-मी सुमारें एक तासभर हा देखावा पाहात चित्राप्रमाणें तटस्थ उभा होतों.  बोट वेगानें चालली असतां पाणी दुभंगून तिच्या मागें कोनाकृति घार दिसत होती.  बाजूनें पाण्याचे तुषार उडून त्यावर ऊन पडून त्यांतून इंद्रधनुष्य दिसे.  संध्याकाळानंतर रात्रीं चांदणें पडलें आणि समुद्रानें आपला पेहेराव बदलला.  दुसरे दिवशीं पहाटेस उठून पोशाक करून डेकच्या अगदीं आघाडीस गेलों.  हा देखावा कालच्यापेक्षांही अधिक मोहक व प्रेरक होता.  आकाश अगदीं निरभ्र असल्याकारणानें समुद्र त्याच्या रंगानें रंगला होता; आणि बोटींतून धूर निघालेला दिसत नसल्यामुळें, चहूंकडे ऐक्य नांदत होतें.  अत्यंत पुरातन सागर महामुनि शांत व गंभीर रूप धारण करून 'एकमेवाद्वितीयम्' ह्या महामंत्राचा आपल्याशींच पाठ करीत संध्यावंदन करीत बसलेले दिसले.  त्यांस पाहून प्रत्यक्ष पापमूर्तिचाही संत बनेल ह्यांत शंका नाहीं !!

पर्शिया आगबोट :-  कॅलिडोनिया, अरेबिया यांप्रमाणेंच पर्शिया आगबोटही फार मोठी आहे.  ही लांबीनें सुमारें एक फर्लांग म्हणजे १/८ मैल व रुंदीनें मध्यें २२ यार्ड आहे.  उंचीनें ४।५ मजली इमारतीइतकी भरेल.  वजन ७,००० टनपर्यंत नेऊं शकते.  हिजमध्यें ५३० प्रवाशांची सोय आहे.  पण ह्या खेपेस प्रवासी फार थोडे म्हणजे केवळ ७५ च होते.  हिचा वेग दर तासास सरासरीनें १५ मैल पडतो.  पहिले दिवशीं ३१८, दुसरे दिवशीं ३५८, तिसरे दिवशीं ३५५ मैल ह्याप्रमाणें ही चालते.  हिला दोन धुरांडीं आहेत.  समुद्र खवळून केव्हां केव्हां तुषार आंत येतात, म्हणून आगबोटीच्या बाजूस पुष्कळ आणि मोठ्या अशा खिडक्यांची योजना करितां येत नाहीं.  ह्यामुळें चोहींकडे वारा खेळावा,  विशेषेंकरून खालच्या मजल्यांत हवा पोंचावी म्हणून अशी योजना केली असते कीं, मोठाले २।३ फूट रुंदीचे बंब खालपासून वरपर्यंत नेऊन त्यांची तोंडें पुष्कळशीं पसरट करून हवेंत निरनिराळ्या दिशेनें वळवून दिलेलीं असतात.  तेणेंकरून वारा कसाही वाहत असला, तरी ह्यांच्या तोंडांत सांपडून खालीं उतरतो. असे बंब सुमारें ४० आहेत.  प्रकाशासाठीं खालच्या मजल्यांत २४ तास एकसारखे विजेचे दिवे जळत असतात.  बोटीला एकंदर पांच मजले आहेत.  तळमजला पाण्याखालीं आहे.  त्यामुळें त्यांत अंधार असतो.  त्यांत जड सामान आणि माल भरलेला असतो.  दुसर्‍या मजल्यास लोअर डेक म्हणतात. दुसर्‍या वर्गाचें ह्या डेकवरील मुंबईपासून लंडनपर्यंत एका जागेचें भाडें ५२२८८ रु. पडतें.  पाण्यावरचा हा पहिलाच मजला असल्याकारणानें, प्रकाश आणि हवा येथें पुरेशीं नसतात.  वरचेवर एखादी लाट खिडकीवरून जाते म्हणून ती नेहमीं जाड भिंगानें बंद ठेवावी लागते.  तिसर्‍या मजल्यास मेनडेक म्हणतात.  मी ह्यांत दुसर्‍या वर्गाचें तिकीट घेतलें आहे; त्यास लंडनपर्यंत ६०० रुपये भाडें पडलें.  ह्यांतील खोलींत अधिक सोई असून, खिडकी नेहमीं उघडी ठेवितां आल्यामुळें, हवा व प्रकाश मुबलक असतात.  शिवाय अंथरुणावर पडल्या ठिकाणाहूनच खिडकींतून समुद्राचा सर्व देखावा नजरेस पडतो.  चवथ्या मजल्यास डेक किंवा अपर डेक म्हणतात.  येथें दुसर्‍या वर्गाच्या जागा नाहींत.  मंडळीस हिंडण्यास, फिरण्यास, आरामखुर्च्यांवर बसण्यास किंवा कांहीं खेळ खेळण्यास दोन्ही बाजूंस दोन ग्यालरीसारख्या ४० यार्ड लांब व ५।६ यार्ड रुंद अशा खुल्या जागा आहेत.  मध्यें सुमारें १० यार्डांची चौरस धूम्रपानाची खोली आहे.  पहिल्या वर्गांच्या मात्र ह्या मजल्यांतही खोल्या आहेत.  एका प्रवाशास सबंध एक खोली मिळते. तिचें भाडें लंडनपर्यंत सुमारें ८२२ रुपये पडतें.  पांचवा मजला उंच गोपुरासारखा आहे.  येथें कोणी जात नाहींत.  पण येथून सर्व क्षितिज नजरेस पडतें.  

केबिन - एक एक खणाची एक खोली असते.  तीस केबिन म्हणतात.  लोअर डेकवर एका केबिनमध्यें तिघांची व मेनडेकवर एकींत चौघांची सोय केलेली असते.  प्रत्येकाच्या जाग्यास बर्थ म्हणतात.  त्यावर नंबर मांडलेला असतो.  असे एकंदर ५३० नंबर आहेत.  प्रत्येकाकरितां एक गादीवर चादर आंथरलेली, एक ब्ल्यांकेट, एक पासोडी, दोन मोठ्या व मऊ उशा आणि एक मोठा टॉवेल इतकें सामान भिंतीत अडकविलेल्या दोन गजांवर व्यवस्थेनें ठेवून एक अंथरूण बनवलेलें असतें.  हीं दोन खालीं आणि दोन त्यावर असतात.  भिंतींत एक शिसवीचें टेबल असतें; त्यांत एकावर एक असें चार खण असतात.  समोर दुसरें एक टेबलासारखें असतें त्यावर एक मोठा गोल आरसा लटकलेला असतो.  त्याचेखालीं एक फडताळ असतें; तें उघडल्याबरोबर तोंड धुण्याचें एक जाड चिनी भांडें बाहेर येतें.  त्याचे मागेंच दोन पेल्यांतून दोन साबण ठेवलेले असतात.  दोन्ही बाजूंस दोन स्वच्छ रूमाल टांगलेले असतात.  तोंडधुणें आटपल्यावर फडताळ उचलून झांकल्याबरोबर त्यांतील पाणी खालीं जाऊन सर्व पूर्वींप्रमाणें पेटीसारखें दिसतें.  आरशाच्या मागें एक कांचेचा तांब्या व दोन ग्लास पिण्याचें पाणी भरून ठेविलेले असतात; अशा पेट्या दोन असतात.  बारीक सामान ठेवण्यास चार जाळ्या आणि कपडे ठेवण्यास १२ खुंट्या असतात.  एक विजेची बत्ती असते, ती संध्याकाळीं आपोआप लागते.  तिच्याखालीं एक बटण असतें.  तें फिरविल्यास आपल्या मर्जी प्रमाणें ती विझवितां येते.  शिवाय एक मेणबत्तीचें शेड असतें.  वरतीं माळ्यावर चार लाइफ बेल्टस् असतात.  २ इंच जाड व १ फूट लांब असे कॉर्कचे तुकडे दुहेरी एकत्र बांधून आपल्या पोटाभोंवतीं बांधण्यास एक पट्टा तयार असतो.  अपघाताचे वेळीं हा पट्टा बांधून पाण्यांत पडल्यास मनुष्य बुडत नाहीं.

डायनिंग सलून -  हा एक सुरेख दिवाणखाना आहे.  त्यांत दोन्हीकडे चारचार खुर्च्या ठेविलेल्या अशीं पांच टेबलें एकापुढें एक मांडलीं आहेत.  अशा पांच टेबलांच्या दोन्ही बाजूंस दोन रांगा असून मध्यें एक मोठें न्याहारीचें टेबल ठेविलेलें आहे.  सकाळीं ६॥ वाजतां चहा, रोटी, लोणी, फळें इ. असतात.  ८॥ स न्याहारी; १॥ ला मुख्य जेवण; ४॥ वाजतां फराळ; ६॥ ला चहा आणि रात्रीं ९॥ वाजतां फराळ, असा नेहमींचा क्रम असतो.  ह्या सर्व प्रसंगीं सर्व मंडळी हॉलमध्यें जमते; आणि आपापल्या ओळखीप्रमाणें जागा पसंत करते.  सकाळचा चहा व रात्रीचा फराळ सोडून बाकी सर्व प्रसंगीं जेवणास कोणते पदार्थ तयार केले आहेत त्यांची यादी कार्डावर छापून तीं कार्डे टेबलांवर मांडलेलीं असतात.  प्रत्येक टेबलाजवळ एक स्टुअर्ड (वांकनीस) उभा असतो.  क्रमानें सर्व पदार्थ आपलेकडे हा वांकनीस आणितो.  आपल्यास लागेल तो लागेल तितका आपण घ्यावा.  प्रत्येक वेळीं सात किंवा अधिक पदार्थ असतात.  कलकत्त्याची कढी, फ्रान्सचे वाटाणे, यारमाउथचे मासे, इटलीची आमटी, सार्डिनियाचें अमुक आणि रंगूनचें तमुक, अशीं यादींतलीं चटकदार नांवें वाचून नवख्यांस मोठी मौज वाटते.  तरी प्रत्यक्ष पदार्थ पाहीपर्यंत नुसत्या यादीवरून कांहीं कल्पना होत नाहीं. हा सर्व थाट आणि हे प्रकार पाहून नवीन मनुष्य सहजच वाजवीपेक्षां अधिक खातो आणि दोन दिवसांनीं ओकूं लागल्यावर म्हणतो कीं आपल्यास बोट लागली !

Read more: जलप्रवास

जनांतून वनांत आणि परत

(सु. प. १-२-१९०३)

इंग्लंडच्या उत्तरभागीं कंबर्लंडशायरमध्ये सरोवर प्रांत (Lake District) नावाचा प्रदेश आहे. उंच पहाड, विस्तृत सरोवरे, दाट वनराजी इ. बहुविधा सृष्टिसुंदरी तेथे नटली आहे. तशात वर्डस्वर्थ, कोलरिज्, साउदे इ. प्रासादिक कवींच्या सहवासाने हे शांतिस्थळ अधिकच पवित्र झाले आहे. उष्णकाळी इंग्लंडचे किंबहुना सा-या सुधारलेल्या जगाचे हे एक हवा खाण्याचे ठिकाण आहे. गेल्या उन्हाळ्याच्या सुटीत प्रो. कार्पेंटर साहेबांनी आमच्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांस आपल्याबरोबर आपल्या कुटुंबात पंधरा-पंधरा दिवस सदर ठिकाणी रहावयास बोलाविले होते. कॉलेजातील व्याख्यानपीठातून व मंदिरातील व्यासपीठातून दिलेल्या ईश्वरविषयक ज्ञानाची पुरवणी वरील उदात्त स्थळी प्रकटलेले स्वरूप प्रत्यक्ष दाखवून करून देण्याचाच जणू ह्या गुरूवर्यांचा हेतू होता.

गेल्या जुलैत मी तिकडे ऑक्सफर्डहून निघालो. पुढे मिळणारा धडा मनावर नीट बिंबावा म्हणूनच की काय वाटेत निराळाच अनुभव आला. आमची गाडी लांब पल्ल्याची असल्या कारणाने ती एक्स्प्रेस होती. वाटेत बर्मिंगहॅम पासून तो लँकेस्टरपर्यंत अगदी निराळा मुलूख लागला. इंग्रजाने बहुतेक सगळ्या जगाचे कंत्राट आपल्याकडे घेतले आहे. म्हणून अर्थात एवढा प्रदेश म्हणजे जगाची एक मोठी वखारच! बर्मिगहॅम, स्टॅफर्ड, शेफिल्ड, मॅचेस्टर अशी अचाट घडामोडीची शहरे आणि त्यांच्या दरम्यान इतर कारखान्यांची गावे ह्यांची कशी येथे खेचाखेची झाली आहे. दाट जंगलातून एकादी चेतलेली वाघीण जशी सुटावी तशी आमची एक्स्प्रेस हजारो जीवांना घेऊन, अशा दाट वस्तीतून लांब लांब झापा टाकीत सुटली. स्टॅफर्डहून लॅकेस्टरपर्यंत सुमारे दीडशे मैलांचा पल्ला तर तिने एकाच उडीसरशी मारला. त्यास पुरे दोन तासही लागले नाहीत.

लहान वस्तु ती स्थूल विसली| तुटकी वाटे कुणी जुडली|
सहज कुटिला सरला झाली| जवळी न बाजुस अथवा आता|
दूर न मज काही||१||

असे झाल्याने मी दुष्यंत राजाच्याच रथात बसलो आहेसे वाटू लागले. शहरे, खेडी, नद्या, नाले इ. आमच्या पायाखालून पार निघून जात. अशा वेगाने आम्ही जात असता समोरून एकादी अशीच राक्षसी आमच्या अंगावर एक मोठा फुत्कार टाकून बिजलीसारखी चमकून जाई! वाटेने मोठी स्टेशने आली म्हणजे आमच्यापुढे रूळांच्या जाळ्याचा गुंता पसरलेला दिसे, पण त्यातूनही ही नेमकी निसटून पार होई!  

बाहेर धुराने व धुळीने दिशा धुंद झाल्या होत्या. मांडीवरच्या वर्तमानपत्रावर दोन चार मिनिटांतच कोळशाची भुकटी साचे. छाती करून बाहेर डोकावल्यास चहूकडे नुसती गिरण्यांची धुराडी व त्यांतून निघणारे धुरांचे कल्लोळच दिसत. घरे, देवळे, झाडे व रस्ते ही सर्व सारखीच काळवंडून गेली होती. म्हणून त्या प्रदेशास ब्लॅक कंट्री म्हणजे काळा देश असे नाव आहे. अशा वातावरणात अष्टौप्रहर राहून निर्जीव यंत्राप्रमाणे झीज सोसणा-या हतभागी मजुरांची काय दशा असेल! आमच्या कवीनी नुसत्या कल्पनेनेच भवचक्राची चित्रे काढली आहेत. येथे मात्र ते चक्र प्रत्यक्ष भ्रमत असलेले दिसत आहे! प्रगतीची ही काळी खरबरीत बाजू पाहून माझ्या तोंडातून आपोआपच हे उद्गार निघाले :-

“अहागे सुधारणे! तू दिवाणखान्यात येताना कशी नटून येतेस! तुझ्या पदरावर माशी देखील बसलेली खपत नाही. तुझा नाजूक बांधा, कोमल गात्रे, उंची पोषाक व जडजवाहीर पाहून आम्हा पौरस्त्यास कितीही कौतुक केले तरी पुरेसे होत नाही! पण हे गे काय तुझे एथळे स्वरूप! किती हे तुझे कष्ट, कोण ह्या घामाच्या धारा आणि हे हातापायाला घट्टे! येथे तुला नुसते श्वासोच्छवास करण्यालाही वेळ मिळेना. तीच तू मंडळीत बसलीस म्हणजे काय काय ढंग करतेस! येथे तुला नुसती मोकळी हवाही मिळत नाही. दुसरीकडे काय तुझ्या क्रीडा, करमणुकी, चैनीचे प्रवास, रूचीच्या आलटापालटी! नाही आम्हांला हे तुझे बहुरूपी प्रकार कळत. कार्यालयातून क्रीडालयात व क्रीडालयातून पुन: अशा कार्यालयात जाणारी जर तूच असशील तर असे वेश पालटण्यात तला किती शरम वाटत असेल? हाल आणि श्रमाची तर गोष्ट राहू दे. जगात राहण्याची कला आपल्यास चांगली साधली आहे, असे तू किती वेळां तरी म्हणतेस, पण नाही सुधारणे! तुलादेखील अद्यापि पुष्कळ सुधारले पाहिजे आहे. ते कसे ते सांगण्याची आमच्यातही शक्ती नाही, तोवर तुला तरी नावे ठेवून काय फळ! तरी दिसला तो प्रकार कळविण्याचे तूर्त आमचे काम आहे.”

ज्या सुधारणेने आपल्यावर इतके जब्बर मोहिनी-अस्त्र टाकिले आहे तिची अशी कोणती व किती व्यंगे दिसली की मी तिला इतके टाकून व टोचून बोललो? मी तर अग्नीरथातून वा-याच्या वेगाने चाललो होतो. पण तशातच ह्या सुंदरीचे कृष्ण आणि कठोर स्वरूप असे दिसून आले की वरील उद्गार मला नकळतच निघाले! एकाद्या भयंकर स्वप्नाचा काळ फार तर एक दोन  पळेच असतो, पण तेवढ्यात कितीतरी स्थितींचा आपल्यास अनुभव येतो! इतकेच नव्हे तर जागे झाल्यावरही त्याचा परिणाम मनावर घडत असतोच! ह्याचे कारण हे की स्वप्नातले देखावे आपण जागृतीत आधीच निरनिराळ्या वेळी पाहिलेले असतात. फक्त त्यांचे एकीकरण मात्र मनाच्या केंद्रस्थानी एक-दोन क्षणांतच झाल्याने आपली अशी कासाविशी होते. अशातलाच काहीसा प्रकार ह्यावेळी माझा झाला. दम न घेता सारखा दोन तास धावत होतो तरी खिडकीतून बाहेर मोकळा प्रदेश असा फार वेळ पहावयाला सापडेना. व्यापाराची घडामोड व उद्योगाची धडपड किती लगट केली तरी मागे राहीनात. एकादे पटांगण नजरेस पडल्यास त्यात धुरकट व दमट हवेत आणि कोळशाच्या राखेत कंगाल पोरे बागडत आहेत असे दिसावे! घरे पहावीत तर कबुतराच्या खुराड्यासारखी रांगेत नेमकी बसविलेली. सोय आणि सांती ह्यांमुळे माणसे इतकी सवंगली आहेत की बिचा-यांस राहता भुई पुरेना. काही हौसेने, काही केवळ निरूपायाने ती अशी दिवसेदिवस अधिकाधिक गर्दी करून राहत आहेत. एकाद्या आधुनिक मोठ्या शहरात सावकाशपणे हिंडू लागल्यास त्यातील मातबर चौक, उपवने, संग्रहालये, चित्रालये इत्यादी मोहक स्थळे नजरेस येतात आणि त्या झुरक्यासरशी शहरातील इतर ठिकाणच्या नानाविध यातनांचा विसर पडतो हे खरे. पण त्याच शहराकडे असे विहंगम दृष्ट्या पाहू गेल्यास त्याचे रूप तितके मोहक दिसत नाही. ह्यावरून मला असे वाटू लागले की,काही गोष्टी सावकाश पाहिल्याशिवाय कळत नाहीत; तर काही झटक्यासरशी पाहिल्याशिवाय कळत नाहीत. असो! अशा रीतीने मी पेनरिथ स्टेशनावर येऊन पोहोचलो. येथे दगदगीचे जग संपले आणि पुढे निराळेच जग दिसू लागले.

जन आणि वन

जगाचे दोन भाग आहेत. एक जन, दुसरे वन. ह्यासच आधुनिक शास्त्रीय नावे द्यावयाची झाल्यास एकास नीती व दुस-यास निसर्ग असे म्हणता येईल. निसर्गात नीतीचा अत्यंताभाव आहे असे नाही. उलट स्वत: नीतीचा कोणताही प्रदेश निसर्गाच्या बाहेर आहे असेही नाही. निसर्गाच्या विराट मंडळात नीतीचा लहान गोल पोकळीतल्या परमाणूप्रमाणे तरंगत आहे! हाच विषय दुस-या बाजूने निराळा दिसतो. नीतीचे अधिष्ठान मन. निसर्घाचे मूळ प्रकृती. प्रकृतीत मन मुळीच मावण्यासारखे नाही. उलट प्रकृती किती जरी अनंत भासली तरी मन तिला क्षणार्धात गिळून बसते. पण गिळते म्हणून त्यास कळते थोडेच! मन आणि माया, नीती आणि निसर्ग अथवा जन आणि वन ह्या द्वंद्वांचे परस्पर नाते काय आहे, ते कोण सांगू शकेल? ह्या द्वंद्वांचे मूळ जी महावस्तू तिचे केवळ स्वरूप कोठे दिसेल! ‘नकळे महीमा वेद मौनावले जेथे पांगुळले मन पवन’ ते ह्याच ठिकाणी! महंतांनी जर प्रांजलपणे ही कबुली दिली आहे तर आमच्यासारख्या लहानांनी काय विचक्षणा करावी! असा प्रकार असून आम्ही प्रसंगी दुस-याचे शब्द उसने घेऊन ज्ञानाची कितीतरी प्रौढी मिरवितो! वासनेचा थोडा कोठे हिसका बसला की तीनदा उलथून पडतो, तरी पुनः उठल्यावर ‘अहं ब्रह्माSस्मि’ म्हणावयाला आहेच तयार!

प्रयत्नशाली जे महावीर आहेत ते जनात राहून सुधारणा साधोत. ज्ञानशाली जे महायोगी आहेत ते वनात राहून सत्य शोधोत. विषय हेच ज्यांचे सुख ते विषयाची खटपट करोत. वाद हेच ज्यांचे ज्ञान ते वादाची घटपट करोत. मध्यंतर आम्ही साधारण माणसे विश्रांतीसाठी व उपासनेसाठी काही काळ जनातून वनात जाऊ या!

पेनरिथपासून केसिकपर्यंत सरोवर प्रांतात जाण्यास सुमारे १८ मैल आगगाडीचा एक फाटा आहे. पेनरिथ सोडल्यापासून नीतीचा गोंधळ मागे दूरदूर राहू लागला आणि निसर्गाचा सोहळा पुढे जवळजवळ येऊ लागला. दोहोंबाजूस उंच उंच पर्वत हिरव्या गवताच्या झुली पांघरून हत्तीप्रमाणे तटस्थ उभे राहिलेले आणि गंभीर दिसू लागले. अस्तास जाणा-या सूर्याची शेवटची किरणे त्यांवर रेंगाळत होती. समुद्रावरील ताजा आणि मंद वारा आणि रानातील झाडपाल्याचा वास काळ्या प्रदेशातून नुकतेच बाहेर पडलेल्या प्रवाशांस सुखवू लागले. केसिक येथे पोहोचल्यावर सुधारणेची शेवटची खूण जी आगगाडी तिलाही निरोप दिला. माहेरी आल्यावर सासरच्या गड्यास निरोप देताना कितीसे वाईट वाटते हे प्रत्येक सासुरवासिणीस माहीत आहेच.

स्टेशनावर आम्ही तिघे विद्यार्थी उतरलो. आम्ही येण्याची वेळ जरी कळविली नव्हती तरी आमचे प्रोफेसरसाहेब व आमच्या पूर्वीचे आलेले एक विद्यार्थी आम्हांस घरी नेण्याकरिता तेथे वाट पहात उभे होतेच. ऑक्सफर्ड विद्यालयात नेहमी विद्याव्यासंगात पाहिलेल्या प्रोफेसरसाहेबांची मूर्ती येथे किती निराळी दिसली! अंगात पहाडी सडा पोषाक, हातात रानटी काठी, खांद्यावरून आडवी जानव्यासारखी सोडलेली कातड्याच्या वादीस लटकलेली लहानशी दुर्बिणीची थैली, गालावर हासे, तोंडात माहितीचा पुरवठा (खिशातले गाईडबुक जणू पाठच केलेले) भाषणात विनोद, वतनात तत्परता, असे गुरूचे चालते बोलते चित्र पाहून आम्ही वाटेचे सर्व क्लेष केव्हाच विसरून गेलो. बॉरोडेल-दरीत लीथस कॉटेज हे आमचे ठिकाण येथून चार मैल होते. आमचे सर्व सामान घरी रवाना केल्यावर, डरवेंट वॉटर सरोवरावरून बोटीतून लिथस् कॉटेजला जाण्यास निघालो.

गाडीतून उतरल्याबरोबर बदललेल्या परिस्थितीत व बदललेल्या पेहरावात आपल्या गुरूस पाहून आम्ही आमचे श्रम विसरलो असे वर सांगितले, पण स्टेशनातून बाहेर येऊन सभोवती पाहतो तो गुरूंचा गुरू जो परमेश्वर त्यानेतर ह्या ठिकाणी आपला पेहराव अधिकच बदललेला पाहून आम्ही श्रमच काय पण स्वत:लाही हळूहळू विसरू लागलो. डरवेंट वॉटर सरोवर केसिक गावाला अगदी येऊन भिडले आहे. प्रोफेसर, सगळे विद्यार्थी आणि एक युनिटेरियन् आचार्य इतकेजण आम्ही एका क्रीडानौकेत बसून निघालो! सूर्यास्त होऊन गोड संधिप्रकाश पडला होता. अशा शांत समयी देव कसा दिसला! ज्याने जन निर्माण केले त्यानेच वनही केले आहे. जो समाजात वसत आहे, तोच सृष्टीतही वसत आहे. असे असता दर्शनात किती तरी हा फरक! तिकडे समाजात तो स्वरूपाने प्रकटतो. पण ते सत्त्वदर्शन कित्येकास होते? आणि ज्या थोड्यास होते ते तरी कितीदा होते? आणि जे होते ते तरी किती कष्टाने, किती अनुतापाने आणि किती आत्मदंडाने आणि इतक्याही सायासाने एकदा कृपा झाली तर ती टिकते किती वेळ! तुकोबा सांगतात की, ‘आठवचि पुरे| सुख अवघे मोहोरे’ पण ह्या आठवेच्या मार्गातच अगणित अडथळे घडलेलेही पुन्हा त्यांनीच वर्णिले आहे की, ‘कामक्रोध आड पडले पर्वत| राहिला अनंत पलीकडे’ तेव्हा जन म्हणजे अशा अडथळ्यांचा डोंगराळ प्रदेश ह्यात आधीच अदृश्य असे जे सत्त्वरूप त्याचे दर्शन होणे अति कठीण. पण येथे पहा, तोच देव कसा सुंदर रूपाने प्रकटला आहे. आठवण करण्याचेही श्रम नकोत. डोळे उघडले की पुरे, सुख अवघे मोहोरे! समाजात जो इतका दुर्लभ तो येथे किती तरी सुलभ झाला आहे. समाजात जो दुर्मिळ, त्याचा सृष्टीत हा कोण सुकाळ! शास्त्रकारास आणि स्मृतिकारास जो तेथे सहसा लाभत नाही, तो येथे पशुपक्षांस भेट देऊन रमवीत आहे! येथे येण्याचाच अवकाश की ताबडतोब भेट व लगेच सलगीदेखील! पश्चात्ताप नाही, प्रायश्चित्त नाही, इंद्रियदमन नको, देहदंडन नको, पापाची आठवणच नाही. मग क्षमेची गोष्ट कशाला! पुनर्जन्मच हा!!

समाजात सुख आहे, ऐश्वर्य आहे, प्रीती आहे, प्रगती आहे, पण तेथे पुष्कळ अंशी ह्या गोष्टी असतात. आम्ही बसलो आहो ही नाव जर पुढे न्यावयाची झाली तर आधी वल्ह्यांनी पाणी मागे ढकलले पाहिजे. आणि हाच प्रकार सर्वदा नाही तरी पुष्कळदा समाजात चालला असतो. माझे धन ते दुस-याचे ऋण, माझा आराम तो दुस-याचे कष्ट, गर्दीतून माझे पाऊल पुढे पडावे म्हणून मी इतरांस मागे रेटीत असतो. असा प्रकार असल्यामुळे समाजात शुद्ध सुख मिळणे फार कठीण होते. तेथे इतर आत्म्यामध्ये परमात्म्याचे जे प्रतिबिंब दिसते ते स्थानमानाने थोडे बहुत अशुद्धच असते. पण सृष्टीतला प्रकार वेगळा. येथे आपण व परमात्मा ह्यांमध्ये इतर कोणी येत नाही म्हणून एथली सर्व सुखे निर्भेळ असतात, निश्चित असतात, निरालंब असतात!

असो. आम्ही पाळीपाळीने दोघे दोघे वल्हवीत, भोवतालची शोभा पहात, मधूनमधून विनोद करीत, प्रसंगानुसार ह्या प्रदेशाची प्रोफेसरांच्या तोंडून चटकदार माहिती ऐकत निघालो. ह्या विस्तीर्ण सरोवराचे पाणी इतके स्वच्छ आणि शांत होते की एक मोठा आरसाच पसरलेला! केसिक गाव लवकरच वळणात लपून गेल्यावर आसमंतात कोठेही जीवांची हालचाल दिसेना. आमच्या बोटीभोवती लाटांची काय ती थोडी हालचाल होती तेवढीच. सर्वत्र एकच निर्विकल्प समाधी लागली होती. एका बाजूस सुमारे एक हजार फुटांचा एकदम तुटलेला काळाकुट्ट कडा किना-यावर तोल सांभाळून तटस्थ उभा होता. दुस-या बाजूस हळूहळू उंच उंच होत जाणा-या पर्वतसपाटीवर दाट गवताचा हिरवा गालिचा पसरला होता. पुढे पुढे ह दोहोंकडचे डोंगर अगदीच जवळ येऊन सरोवरास कवटाळू लागले. अखेरीस सरोवर संपले व आम्ही दरवेंट नदीच्या पात्रात शिरून तसेच बॉरोडेल नावाच्या रमणीय दरीतून वर वर जाऊ लागलो. नागिणीसारखी नदी वरचेवर वळसे मारू लागली. येथे सौंदर्याची तर अगदी सीमा झाली आणि सृष्टिसुंदरीचा गर्व तिच्या पोटात मावेना असे उघड दिसू लागले. किना-यावरील झाडे, लता आणि पर्वत ह्यांच्या प्रतिबिंबाची तर काय बहार! कुलस्त्री एकांतात असताना आरशात आपले रूप पाहून आपल्यासच धन्य मानीत असलेली दिसल्यास कोणास बरे परमावधीची धन्यता वाटणार नाही! आमची नौका पुढे नेऊन ह्या तरूणीचा रसभंग करण्याचे आम्हांला जीवावर आले! आम्ही आता अगदी लीथस् कॉटेजच्याजवळ पोहोचलो. नौका एका झाडाच्या मुळाशी बांधून किना-यावर पाय ठेवितो तोच मिसेस कार्पेंटरबाईनी झोपडीच्या खिडकीतून बाहेर डोकाविले आणि आपला हातरूमाल हालवून मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले !    

  1. गुरूशासन
  2. कालियामर्दन
  3. कर्मयोग
  4. एकनाथ व अस्पृश्य जाती
  • 103
  • 104
  • 105
  • 106
  • 107
  • 108
  • 109
  • 110
  • 111
  • 112
Page 108 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी