1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

गुरूशासन

(रविवार ता. २३-१०-१० रोजीं मुंबई प्रार्थनामंदिरामध्यें केलेल्या उपदेशाचा सारांश.)

मागें पितृशासनासंबंधीं विचार करीत असताना असे सांगण्यात आले होते की, प्राचीन काळी शासनासंबंधी सर्व अधिकार पित्याकडेच होते. पित्याची सत्ता पुत्राच्या मालमत्तेवरच होती, इतकेच नव्हे तर प्राणावरही चालत असे. समाज अधिकाधिक उन्नत दशेप्रत जसजसा जाऊ लागला, तसतशी मनुष्याच्या कर्तव्याची व्याप्ती आणि गरजा अधिकाधिक वाढून व साहजिकच वरील शासनाची विभागणी होत जाऊन, एका पित्याच्या ठिकाणी पिता, गुरू आणि राजा असे तीन शासनाचे अधिकारी झाले. तथापि सर्व शासन पितृमूलक आणि पुत्रवात्सल्याच्या उदार हेतूनेच प्रेरति असते आणि असावयास पाहिजे असेही सांगितले. तसेच मनुष्येतर खालील प्राण्यांमध्ये बाल्यावस्थेचा काळ फार अल्प असून, मनुष्याचे बाळपण मात्र दीर्घकालचे असते, ह्याचे कारण पशूपेक्षा मनुष्यामध्ये अधिक उन्नत स्वत्व अथवा पौरूषाचा विकास व्हावयाचा असतो, म्हणून त्याला आपल्या पितरांच्या शासनाखाली अधिक काळ रहावे लागते, असे सांगितले. बाल्यावस्थेची शेवटची पायरी किशोरदशा पंधरा वर्षापर्यंत असते, असे शास्त्र सांगते. पण इतक्या अवधीत मनुष्याची शासनाची आवश्यकता संपत नाही. ह्यापुढील दहा पंधरा वर्षांचा यौवनावस्थेचा काळही त्याला शिष्यदशेत घालवावयाचा असतो. हे पुढील शासन अधिक विशिष्ट अधिकाराचे आणि जबाबदारीचे असल्यामुळे, शिष्यास पितृकुलातून गुरूकुलात जावे लागते. आणि तेते गुरूच्या आज्ञेत राहून त्यांच्यावर निश्चल श्रद्धा आणि आदरभाव ठेवून भावी स्वत्वसंपत्तीकडे मजल मारावयाची असते.

निरनिराळ्या देशांतील प्राचीन धार्मिक वाड्मयामध्ये मुक्ती अथवा मोक्ष (Salvation) असा शब्दप्रयोग आढळतो. पण आधुनिक वाड्मयामध्ये ह्या शब्दयोजनेचे महत्त्व कमी कमी होत जाऊन स्वातंत्र्य आणि स्वत्वाची अभिवृद्धी अशी योजना अधिकाधिक आढळण्यात येते. यद्यपि हे दोन्ही प्रयोग शब्दश: भिन्न आहेत तथापि सूक्ष्म विचार केला असता अर्थत: ह्यांच्यामध्ये ऐक्य आहे, असे दिसून येईल. एकूण मनुष्यप्राणी उत्तरोत्तर परिस्थितीच्या गुलामगिरीतून सुटका पावून त्याच्या आत्म्याच्या ठायी ज्या गूढ आणि थोर शक्ती आहेत, त्यांचे संपादन करून तो पूर्ण स्वतंत्र व्हावा हाच हेतू मनुष्यजीवनाच्या विकासाचा आहे आणि म्हणून गुरूशासनाची आवश्यकता आहे. मातेच्या अंगावर केवळ शरीराचे पोषण होते. पितृगृही मनाची पूर्वतयारी होते आणि गुरूगृही बुद्धीचा विकास होतो, असे होईपर्यंत मनुष्यप्राणी नागरिकत्वाचे हक्क संपादन करून राजाची प्रजा म्हणविण्यास पात्र होत नाही.

अशा प्रकारे बुद्धीचा विकास करण्याचे कामी गुरू कसा असावा व त्याचे लक्षण काय? हे वामन पंडितांनी प्रल्हादाचे तोंडी घालून मार्मिक रीतीने वदविले आहे. हिरण्यकश्यपूने प्रल्हादास पुष्कळ दिवसांनी गुरूगृहातून बोलावून तेथे जे शिकलास त्याचे सार काय, असे विचारिता प्रल्हादाने ‘हरिभक्ती’ असे चमत्कारिक उत्तर दिले. हे शिक्षण कोणत्या गुरूने दिले असे हिरण्यकश्यपूने विचारिता प्रल्हादाने उत्तर दिले, ‘ज्या गुरूकडे मला ठेवण्यात आले होते त्यांच्यामधे गुरूपणाच नव्हता.’

सार मानित असे विषयाते | विष्णुभक्ति गमते विषयाते ||
न स्वये हरि तया प्रिय वाटे | बोधिला तरि  येचि सु-वाटे ||
सर्व प्रयत्ने भवती गृहाते | न सेविती भागवता महा ते ||
गहव्रती ते, मति त्या जनांची | न गोष्टिही घे भव-भंजनाची ||
हे तो गुरू पापतरू  म्हणावे | अंधासवे अंध तसे गणावे ||
दे  प्रीति कृष्णी गुरू तोच साच | श्रुत्यर्थ इत्यर्थ असे असाच ||
पशू जसे चाविति चाविल्याते | पुनः पुन्हा सेविति सेविल्याते ||
कृष्णी नव्हे प्रीति कदापि त्याला | प्रल्हाद इत्यादि वदे पित्याला ||

एकूण ज्या गुरूमुळे ईश्वराचे ठायी प्रीती उत्पन्न होते तेच गुरू साच. बाकी सर्व अंध किंवा पापतरू असा स्पष्ट निवाडा केलेला आहे. गुरूचे काम म्हणजे शिष्यास ध्येयदर्शन करून द्यावयाचे, पण गुरू जर स्वत: केवळ ‘गृहव्रती’. म्हणजे आपलेच पोट भरणारा असेल, तर ध्येयाची गोष्टही काढावयाला नको वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान करून देणारे काही कुशल गुरू असतात. पण ते त्यांच्या कुशलतेमुळे केवळ कुशल कारागीर होत. केवळ त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना गुरूत्व येते असे नव्हे. वस्तुस्थितीतून (Realism) वर उंच ध्येयाकडे (Ideal) शिष्याचा लय जो लावील-साध्या भाषेत सांगावयाचे म्हणजे ईश्वरपदी जो प्रीती उत्पन्न करून देईल-सांत जीवनातून अनंत जीवनाकडे, तात्पुर्तिक कर्तव्यातून चिरकालच्या कर्तव्याकडे, नैमित्तिक धर्मातून सनातन धर्माकडे जो नेईल, तोच गुरू. पण ‘न गोष्टीही घे भवभंजनाची’ असे जे पोटार्थी पंतोजी त्यांच्याकडून हे महत्कार्य कसे होणार? हल्लीच्या काळी धर्म आणि नीतिशिक्षणाविषयी जगभर शाब्दिक चळवळ चालली आहे. कित्येक लोक कित्येक उपाय सुचवीत आहेत. पण हा प्रश्न कोणत्याही बाह्य उपायांनी सुटण्यासारखा नाही. गुरू हे उपजत गुरू असावयास पाहिजेत. त्यांना ध्येयदर्शन झाल्याबरोबर त्याचे प्रतिबिंब शिष्यांत:करणामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. एरवी लिहिणे, वाचणे आणि बोलणे ह्याची कला शिकविणारे आणि तसेच इतर संसारोपयोगी हुन्नर शिकविणारे कारागीर मिळतील. पुष्कळ वेळां हेही मिळत नाहीत.

पिता, गुरू आणि राजा ही जी शासनाधिकाराची परंपरा आहे तिच्यामधील साम्यभेद लक्षात घेण्यासारखे आहेत. पिता हा केवळ त्या त्या व्यक्ती-पुरताच असतो. उलटपक्षी राजा हा कधीही एकाच व्यक्ती-पुरता नसतो. तो नेहमीच सार्वजनिक असतो. मध्यंतरी गुरू हा व्यक्ती-पुरता किंवा अनेक व्यक्तिसमूहाचा एक, असा असतो. त्याच्याशी शिष्याचा व्यक्तिश: संबंध असतो किंवा केव्हा केव्हा नसतोही. किंबहुना गुरूच्या ठिकाणी कोणती एकादी विशिष्ट व्यक्ती मुळीच नसून तेथे एकादे विद्यापीठ किंवा कोणती तरी एकादी संस्था असते. पिता आणि गुरू ह्यांमध्ये जरी हा भेद आहे तथापि त्यांच्यामध्ये हे साम्य आहे की, ज्याप्रमाणे पितापुत्राच्या मनाचा प्रत्यक्ष संबंध जडतो त्याचप्रमाणे गुरूशिष्याचाही प्रत्यक्ष संबंध (Personal touch) जडला पाहिजे. तरच गुरूशिष्याचे नाते सार्थ होते. ह्यावरून आपल्याला झालेले ध्येयदर्शन शिष्यास करून देण्याचे कामी प्रत्यक्ष संबंधाशिवाय अन्य उपाय नाही हे दिसून येईल, आणि आपल्यात ध्येयदर्शन नसेल तर शिष्याशी कितीही निकट संबंध जडला तरी त्याला प्रत्यक्षता येत नाही.

ह्या प्रत्यक्ष संबंधाच्या दोन बाजू आहेत. जसा गुरूकडून तसाच शिष्याकडूनही प्रत्यक्ष संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ असे म्हणणारे सारे प्रल्हादच असतात असेही नव्हे. भल्या गुरूची कदर न ओळखणारे फटकळ उनाड विद्यार्थी पुष्कळ आढळतील. उलपक्षी प्राचीन काळी होऊन गेलेले सॉक्रेटीस, प्लेटो, शंकराचार्य आणि बुद्ध ह्यांच्याशी तन्मयता पावून त्यांचा आदर्श तो आपलासा करून घेऊन स्वतंत्र अथवा मुक्त होणारेही काही भले शिष्य आढळतील. ह्यावरून प्रत्यक्ष संबंध जोडून ध्येयदर्शन करून देणे आणि घेणे हा परस्परावलंबी व्यवहार आहे. गुरूचे शासन आणि शिष्याची निष्ठा ही एकमेकांची कार्यकारणे आहेत.

ह्या ठिकाणी ब्राह्मसमाजाची एक सूचना ध्यानात ठेवण्यासारखी आहे. योग्य गुरूशी गाठ पडून शिष्याचे कल्याण झाल्याबरोबर त्या शिष्याकडून किंवा त्याच्या अनुयायाकडून ह्या गुरूच्या स्वरूपाविषयी गैरसमज होण्याचा पुष्कळ वेळां संभव आहे. आणि ज्या ज्या मानाने हा गुरू जास्त अलौकिक असतो त्या त्या मानाने हा वरील गैरसमजाचा संभव जास्त वाढतो. हा गुरू म्हणजे ईश्वर आणि मनुष्य ह्यांमधील कोणी अद्वितीय आणि अपरिहार्य मध्यस्थ किंवा ईश्वराचा कोणी अवतार किंवा प्रतिनिधी किंबहुना त्यास प्रतिईश्वरच समजून ईश्वर आणि तो हे दोन असून एक, आणि एक असून दोन अशा प्रकारच्या अनेक गूढ तत्त्वज्ञानाचा सुकाळ होऊ लागतो. ब्राह्मसमाजाचे सांगणे एवढेच आहे की, ईश्वराच योग्य असलेली पूजा ईश्वरास द्यावी आणि गुरूस द्यावयाचा मान तोच गुरूस द्यावा. गुरू कितीही अलौकिक असला तरी त्याचे मनुष्यत्व हिरावून घेऊन त्याला उंच ईश्वरपदाची दक्षिणा दिल्याने, ना कधी शिष्याचे, ना गुरूचे, ना जगताचे कल्याण होईल.

कालियामर्दन

पुराणातील ही कथा शुकाने परिक्षित राजाला सांगितलेली आहे. पुराणे चांगली का वाईट हाच वाद सध्या माजून राहिलेला आहे. एक पक्ष म्हणतो, पुराणामध्ये पावणे सोळा आणे गाबाळ आहे व पाव आणा ग्राह्यांश आहे. दुसरा पक्ष म्हणतो, पुराणे सोळा आणे बरोबर आहेत. पण कोणी असे सांगत नाही की पुराणामध्ये वाईट गोष्टी आहेत, चांगल्याही आहेत. चांगले असेल  ते घ्या, वाईट असेल ते टाकून द्या. यःकश्चित क्षुद्र पदार्थदेखील तिखटमीठ लावून रसभरित करता येतो मग पुराणामध्ये गोडी नाही असे कसे म्हणावे ? पुराणांनी सुधारणा सोपी केलेली आहे, मात्र त्यामधील चोथा टाकून देऊन रस घेतला पाहिजे. ‘कालियामर्दन’ ही पुराणातीलच गोष्ट आहे.

श्रीकृष्ण हा आपल्या सोबत्यांबरोबर यमुनातीरी खेळत असता त्याने बळेच तो चेंडू यमुनेच्या तिरावरील कळंबाचे झाडावर उडविला. त्या झाडावरून तो काढण्याकरिता त्याने आपल्या सोबत्यांना बोलाविले. त्यांपैकी काही त्याच्याबरोबर गेले व काही मागच्या मागे पळाले, पण कोणाच्याने त्या झाडावर चढण्यास धीर होईना, एवढेच नव्हे तर श्रीकृष्ण जेव्हा झाडावर चढू लागला तेव्हा त्यांनी त्याला निराश करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणू लागले-

नेणो म्हणती हे करितोसि काई । आम्हा तुझी आई देईल शिव्या ।।
आपुलिया काना ठेवूनिया हात । सकळी निमित्त टाळियेले ।।
निमित्ता कारणे रचिले कारण । गेला नारायण खांदीवरी ।।
खांदीवरी पाव ठेवियला देवे । पाडाव त्या भावे चेंडु तळी ।।
तळीला नेणती तुका म्हणे भाव । अंतरीचा देव जाणो नेदी ।।

आपल्या बुद्धीला जे योग्य वाटले ते श्रीकृष्णाला करावयाचे होते, म्हणून कोणाची पर्वा न करिता तो झाडावर चढला व मुद्दामच त्याने तो चेंडू यमुनेच्या डोहात पाडला व तो काढण्याकरिता त्याने आत उडी घेतली. तेव्हा सर्वत्र फार हाहाःकार झाला. गोपांनी ही बातमी नगरात जाऊन सांगितली, तेव्हा सर्व गोप, गौळणी वगैरे नदीकिनारी येऊन, अहाहा, उहूंहूं, अगाई करून रडू लागले. श्रीकृष्ण कधी मरणार नाही म्हणून बलरामाने त्यांचे खाली लिहिल्याप्रमाणे समाधान केले-

बळ तयासि म्हणे तुम्ही आयका । सकळ गोवळ गौळणि बायका ।।
भय कदापि न या व्रजनायका । असुख कोण करी सुखदायका ।।
अशा रामशद्वासि घेऊन कानी । यशोदादि संपूर्ण त्या गोपिकांनी ।।
दिले प्राण नाही तया बायकांही । गमे धैर्य त्या रामवाक्येचि काही ।।

हा बळरामाचा उपदेश ऐकून रडे बंद करून सर्वजण घरी गेले. श्रीकृष्णाला त्यांची ही भावना कळून चुकली. तो पाण्याच्या आतही गेला नव्हता व बाहेरही नव्हता, पण आडून कोण कसा रडतो हे पाहत होता. आईबाप, भाऊबंद तटाजवळच येऊन तटस्थ होत असतात, त्याच्या पलीकडे जाण्याचे कोणाला सामर्थ्य होत नाही. स्वबचावाकरिता जो तो सावध असतो. कृष्णाचा जीव धोक्यात आहे असे त्यांना वाटत असूनही त्याला सोडविण्यास कोणी तयार झाला नाही.

दूर देखोनिया यमुनेचे जळ । काठीच कल्होळ करिताती ।।
मागे सरे माय पाऊला पाउली । आपलेच घाली धाके अंग ।।
अंग राखोनिया माय खेद करी । अंतरीचे हरी जाणवले ।।
जाणवले मग देवे दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ।।

जो मनुष्य काळाची पर्वा न करता सुधारणा करू इच्छितो, त्याने कृष्णाप्रमाणेच कोणाची वाट न पहाता आपल्याच बलावर सुधारणा केली पाहिजे. म्हणजे त्याला काळ म्हणजे कःपदार्थ आहे असे कळून येईल. त्या कामी मदत करण्यास तर कोणी तयार नसतात, पण उलट त्याच्या मार्गामध्ये विघ्ने उत्पन्न करणारे बरेच असतात, पण खरे सुधारक आपल्या मताप्रमाणेच वागून आपल्या बुद्धीचे समाधान करीत असतात. काळावर नजर देऊन स्वस्थ न बसता काळ म्हणजे कःपदार्थ आहे हे श्रीकृष्णाने कालियाचे म्हणजे काळाचे मर्दन करून स्पष्टपणे लोकांचे दृष्टोपत्तीस आणून दिले. अशा रीतीने ख-या सुधारकाचे लक्षण श्रीकृष्णामध्ये किती पूर्णपणे दिसून येत होते आणि त्याने आपल्या बालक्रीडेमध्ये ते वेळोवेळी कसे दाखविले हे वरील कथेत स्पष्ट दिसून येते. डोहातून वर आल्यावरही कोणावर न रागावता कृष्णाने सर्वांना आलिंगन दिले.

कर्मयोग

(ता. ८-११-१९०३ रोजीं मुंबई येथें झालेल्या उपदेशाचा सारांश.)

यस्त्विंद्रियाणि मनासा नियम्यारभ्यतेर्जुन |
कमेंद्रियै: कर्मयोगमसक्त: स विशिष्यते ||
-भग. गीता अध्याय ३. श्लोक ७.

प्रेमसूत्र दोरी | नतो तिकडे जातो हरी ||
-तुकाराम

कर्माचे साम्राज्य सर्वत्र आहे, जेथे जेथे म्हणून जीवन आहे तेथे तेथे कर्म  आढळतेच. सर्व जीवमात्राचे ते लक्षण आहे, इतकेच नव्हे तर त्यावाचून जीवनाची कल्पनाही होऊ शकत नाही. फार काय तर जड पदार्थात दृढता, स्थिरता इत्यादी जे गुण दिसतात आणि बाहेरच्या शक्तीशी त्या पदार्थाकडून जो विरोध घडतो त्यावरून निर्जीव वस्तूतही उघड नसले तरी, अंतस्थ कर्म चाललेलेच दिसेल. पण, इतक्या खोल न जाता आपण जर नुसते सजीव सृष्टीपासून पुढे निरखू लागलो, तर सर्वत्र कर्माचा अबाधित विस्तार दिसतो.

वनस्पतीसृष्टीत अगदी प्राथमिक कोटीच्या लव्हाळ्यापासून तो सुंदर विस्तारलेल्या मोठ्या वटवृक्षापर्यंत ज्या असंख्य घटना आहेत, त्या सर्वांचा आपल्या अल्पजीवन कालात आत्म मरणाचा व्यापार सतत चालू असतो. तसेच केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानेच दिसणा-या जीवाणूपासून तो वनात उद्दामपणे हिंडणा-या पशुपती सिंहापर्यंत प्राणिगणांचाही तोच उद्योग अहर्निश चालू असतो. स्वत:चा घट कायम राखणे, तो वाढविणे आणि पुढे पुढे त्याचा वंशविस्तार करणे हा निसर्गदत्त व्यवहार सर्वात बहुतेक सारखाच. तहानभुकेच्या रूपाने प्रकृतीचा बडगा पाठीवर बसला की पुढे हलावे, नाही तर तेथेच स्वस्थ बसावे, एवढाच त्यांचा अधिकार. माणसांपैकीही पुष्कळांची ह्यावर मजल गेलेली नाही. हे कर्म प्राकृत अथवा तामसिक समजावे. कारण ज्यांच्याकडून ते होत असते ते त्याच्या इच्छेवर थोडेच अवलंबून असते! प्रकृतीच आपला कडक अमल चालविण्यासाठी आपल्या योजनेस त्या बिचा-यांच्या इच्छेचे स्वरूप देऊन तितके कर्म बिनतक्रार करून घेत असते.

असे हे गाडे चालले असता उत्क्रांतीची दुसरी मजल येते. प्रकृतीने जवर अत्यंत कष्टाने घडवून ठेविलेल्या काही उत्कृष्ट घटात (आतापर्यत गूढ असलेल्या) आत्मतत्त्वास ह्यानंतर जागृती येते. पण जरी ही जागृती आली तरी प्राकृत कर्मास काही विराम पडत नाही. अनादी कालापासून घटाला जे कर्माचे वळण लागले असते त्यातच आत्माही भ्रमण पावू लागतो. कुंभाराने आपल्या काठीने काही वेळ चाक फिरवून काठी काढून घेतल्यावरही ते चाक जसे पुष्कळ वेळ फिरून कुंभाराचे इष्ट कार्य करते, किंवा एकाद्या गिरणीतल्या इंजिनाची शक्ती जवळच्या जड फ्लाय व्हीलमध्ये जाऊन इंजिनच्या शक्तीस जशी फ्लाय व्हीलच्या गतीची भर पडते, त्याप्रमाणेच हा नुकताच जागा झालेला आत्मा प्राकृत कर्मातच आपल्या भ्रांतकर्माची भर टाकीत असतो, ह्यामुळे ‘मी हे आज मिळविले, हेही पुढे मिळवीन- हे तर माझे आहेच, उद्या तेही दुसरे धन माझेच होईल, हा पहा वैरी मी मारिला, इतरांनाही चित करीन, मी राजा आहे, मी भोगी, मी सिद्ध, बलवान, सुखी, मी मोठा कुलीन,-कोण मजसारखा आहे,-मी स्वत: भोगतो, दुस-याला पण देतो,- ह्या प्रकारचा गीतेत (अ. १६ श्लोक १३-१५) सांगितलेला “अज्ञानविमोहित” प्रकार होतो. फ्लाय व्हीलने गिरणीत जसे अधिक कार्य होते तसे भ्रांत आत्म्याच्या कर्माने प्रकृतीतही अधिकच घडामोड होते. हे राजसी कर्म होय. आत्म्याच्या विकासात ह्याची जरूरीच आहे. म्हणून शहाण्यांनी ह्याची विनाकारण अवहेलना करू नये. सात्विक कर्माकडची वाट आत्म्याला ह्यातूनच आहे...” ‘कर्माचा आरंभ केल्याविना नैष्कर्म्य प्राप्त होणे नाही’ (गीता अ. ३ श्लोक ४) म्हणून ह्यात गुंतलेला ‘पुरूष’ आपल्या इष्ट वाटेवरच आहे असे समजावे.

पण, ह्या राजसी कर्माचे सर्व चलन प्रकृतीकडून मिळाले असल्यामुळे ह्याचे पर्यवसान दोन रीतीने होण्याचा संभव आहे. स्वत:ची शक्ती नसल्यामुळे कुंभाराचे चाक जसे काही वेळाने बंद पडते तसेच राजसी पुरूषाला प्रकृतीकडून जे चलन मिळाले असते ते बंद पडते आणि वृद्धावस्थेत त्याला शीण व औदासिन्य ही शिल्लक उरतात. आणि त्याच्या शरीराचे अवसान होण्यापूर्वी त्यास शोचनीय नैष्कर्म्य प्राप्त होते. हा एक प्रकार. दुसरा असा की, राजसी मनुष्यास काही अंशी स्वप्रयत्नाने व काही अंशी ईशप्रसादाने वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे, आपण करतो ती सर्व कृत्ये किती बालिश आहेत व आपल्या प्रवृत्ती वस्तुत: किती व्यर्थ आणि विवश आहेत, ह्याची खात्री होऊन तो तटस्थ आणि निष्कर्म होतो. गीतेतील दुस-या अध्यायातला ईश्वरी उपदेश ऐकून अर्जुनाची हीच स्थिती झाली. किंवा आपल्या विवेक सामर्थ्याने विश्वव्यापाराचे विज्ञान झाल्यावर वेदांत्यास अगर ब्रह्मज्ञान्यास जी विरक्ती आणि विवृत्तदशा येते तीही ह्याच प्रकारची.

ही वर सांगितलेली दुस-या प्रकारची निष्कर्म दशा प्राप्त झाली म्हणजे आपल्या वरचा प्रकृतीचा जुलूम अगदी नाहीसा होतो. आत्मा पूर्ण जागृत व स्वतंत्र होतो. ह्या उज्ज्वल जागृतीस कोणी आत्म्याचे पुनर्जन्म म्हणतात. म्हणून आम्हास द्विज ही संज्ञा येते.

पण अशा रीतीने आत्म्यास पूर्ण ज्ञान व स्वातंत्र्य प्राप्त झाले म्हणजे तो कृतकृत्य झाला असे नव्हे तर उलट आतापासूनच त्याच्या कर्तव्यास आरंभ होतो. आतापर्यंत जी त्याने कर्मे केली ती यंत्राप्रमाणे केली. ह्यावर त्याला एकाद्या हुशार आणि विश्वासू नोकराप्रमाणे कामगिरी बजावयाची असते. पण तो पूर्ण स्वतंत्र असल्यामुळे ही नोकरी पत्करणे न पत्करणे त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. वेदांती असतो तो अवश्य तितकी प्राकृत कर्मे केवळ निरूपायाने व उदासीनपणे करतो. पण जो भक्त असतो तो-

मने सहित वाचा काया| अवधी दिली देवराया||

हा तुकारामाचा मार्ग पत्करतो; केवल ज्ञानापलीकडे वेदांत्यापासून इतरांस काहीच फायदा होत नाही. पण भक्त आहे तो ईश्वरी नोकरी म्हणून परार्थास आपल्यास वाहून घेतो. ही नोककरी म्हणजे अगदी खुशीचा सवदा आहे. येथे कसली जबरदस्ती नाही. वाटल्यास करावी, वाटेल तितकी करावी! पण ब्रह्मज्ञान्यांनीही हे लक्षात ठेवावे की, स्वातंत्र्याचे जोरावर जरी त्यांनी देवाची कामगिरी सोडली तरी प्रकृतीची गुलामगिरी त्यास करावी लागणारच. एकपक्षी खुशीची नोकरी, उलट घनघोर गुलामगिरी ह्यांत शहाण्यांनीच निवडावे. बरे, नोकरी जी आहे तीही नुसती खुशीची आहे, इतकेच नव्हे तर तिचे पर्यवसान अखेर मैत्रीत होणारे आहे. नोकर आणि प्रभू ह्यांमध्ये जे सूत्र आहे ते प्रेमसूत्र आहे. नोकरी करता करता आपल्यास इतकी बढती मिळणार आहे की, आपण ईश्वराचे अगदी सके बनू. ज्ञानयोग साधून संसारातून उठावे आणि प्रकृतीचे दास्य करावे की कर्मयोग साधून ईश्वराचे मित्र होऊन पृथ्वीवर स्वर्ग आणावा ह्याचा निकाल स्वतंत्र माणसांनी करावा.

हा कर्मयोग साधणे आमच्या समाजाचा धर्म आहे. संसारात आनंदाने राहणे आणि तदंगभूत कौटुंबिक, सामाजिक, राजकीय इ. जी अनेक कर्मे असतील ती केवळ जडहित साधण्याच्या हेतूनेच नव्हे, तर ईश्वरी योजना असे समजून त्याची सेवा जाणूनबुजून करण्याचे हेतूने करणे म्हणजे वरील कर्मयोग होय. विश्वात ही जी अवाढव्य योजना आहे, ती आपल्या इच्छेवर अवलंबून नाही किंवा ती पार पाडण्याची आपल्यात शक्ती नाही, तरी ह्या योजनेस अंशत: साधनीभूत होणे किंवा तटस्थ राहणे हे आपल्या इच्छेवर आहे.

सत्कर्म कोणते व दुष्कर्म कोणते ह्यांविषयीची प्रेरणा आणि ते करण्याची स्फूर्ती ह्या प्रत्येक मानवी अंत:करणात होण्यासारख्या आहेत व त्या तशा नित्य होतातही. धर्माधिकारी व उपदेशक ह्यांचे जर काही काम असेल तर ते इतकेच की मानवी अंत:करण व ह्या प्रेरणांचा उगम जो ईश्वर ह्यांमध्ये ज्या काही उपाधी असतील त्या दूर करून आत्म्याचा ईश्वराकडचा मार्ग सुगम व जवळचा करावा. ह्या उपाधींपैकी स्वत: आपणच एक उपाधी होऊन राहू नये. ज्ञानाचे भक्तीत आणि भक्तीचे ह्या कर्मयोगात नेहमी पर्यवसान होत आले आहे हे धर्माच्या एकंदर इतिहासावरून स्पष्ट दिसून येते.

एकनाथ व अस्पृश्य जाती

(श्रीमत चोखामेळा यांची पुण्यतिथी साजरी करण्याकरिता माजगाव, नेसबिट रोड, मुंबई येथील रा. कोंडाजी रामजी मास्तर यांच्या घरासमोर रविवार ता. ५ जून १९१० रोजी सायंकाळी पनवेलचे अस्पृश्य जातीचे सुभेदार मेजर बहादूर, गंगारामभाऊ ऑनररी मॅजिस्ट्रेट यांच्या अध्यक्षतेखालीं अस्पृश्य जातींच्या स्त्रीपुरुषांच्या मोठया जाहीर सभेपुढे दिलेले व्याख्यान.)

आज आपण सर्वजण येथे श्री चोखोबांची पुण्यतिथी साजरी करण्याकरिता जमलो आहोत. नामदेवांनी म्हटले आहे :

शालिवाहन शके बाराशे साठ ।  प्रमाथे नाम स्पष्ट संवत्सर ॥
वेशाख वद्य पंचमी सुदिना ।  गुरुवारी प्रयाण करी चोखा ॥

चोखोबा हे मंगळवेढ्याला गावकुसू बांधण्याला गेले असता अंगावर भिंत पडून चिरडून मेले.  श्री. विठ्ठलाने नामदेवास त्यांच्या अस्थी आणण्यास सांगितले तेव्हा त्या इतर अस्थींतून कशा ओळखाव्या असे त्यांनी विचारले, ह्याचे उत्तर देवांनी दिले :

नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या ।  विठ्ठलनाम जयामध्ये निघे ।
ऐकोनिया कानी अचळी भराव्या ।  आणेनियां द्याव्या आम्हापाशी ।
वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार ।  नामाचा गजर महाद्वारी ।
ऐसी आनंदाने नामाच्या गजरी ।  दिली महाद्वारी समाधि त्या ॥

हाडांमधून विठ्ठलनामाचा गजर झाला असो किंवा नसो, चोखोबांचे सर्व चरित्र ईश्वरपर होते, हे ह्यावरून स्पष्ट दिसेल. त्यांच्या पुण्यतिथीचा आज समय आहे. आजच्या सुप्रसंगी मला एका प्रश्नाचा विशेष विचार करावयाचा आहे.

तो प्रश्न माझे मित्र रा. पांगारकर यांच्या तारीख २८ मेच्या 'ज्ञानप्रकाशा'त प्रसिद्ध झालेल्या व्याख्यानावरून उद्भवला आहे. रा. पांगारकर म्हणतात, ''एकनाथांनी अंत्यजोद्धार केला. पण कधीही १२-२० महार पंक्तीस घेऊन जेवण्याचे नुसते सोंग केले नाही. वेदशास्त्रांनी घातलेले निर्बंध पाळून त्यांनी अंत्यजोद्धार केला'' जेवण्याचे नुसते सोंग एकनाथांनी केले नाही हे खरे; पण जेवणाचा राजरोस व्यवहार केल्याचा पुरावा एकनाथाच्या चरित्रात स्पष्ट आहे. अंत्यजोद्धार करताना नाथमहाराज वेदशास्त्रांची पाने चाळीत बसले असतील असे त्यांच्या चरित्रावरून मुळीच दिसत नाही. प्रत्यक्ष आपल्या पितरांच्या श्राद्धाच्या वेळी महार-मांगांस आधी जेवू घातले. आणि पुढे ब्रह्मवृंद रागावला तरी त्याची पर्वा केली नाही. आणि देवानेही साक्षात त्यांचे पितर खाली आणून त्यांचाच पक्ष सांभाळला. ह्या गोष्टीतील तात्पर्य वेदशास्त्राशी साधक आहे की बाधक आहे ह्याचा कथ्याकूट शाब्दिकांनी करावा, संतास करावयास नको. पुढे रा. पांगारकर म्हणतात, ''भूतदयेने प्रेरित होऊन नाथांनी महाराचे पोरसुद्धा उचलून कडेवर घेतले पण ते तेवढ्यापुरतेच.''  नाथमहाराजांचे करणे तेवढ्यापुरते होते हे त्यांचे आधुनिक चरित्रकार होऊ पाहणारे जगाला सांगतात, हे पाहून स्वतः नाथांच्या डोळ्यांतून रक्ताचे अश्रू वाहतील असे वाटते. संतांची कोणतीच कृती 'एवढ्यापुरती' नसते, ती शाश्वत असते. रा. पांगारकर आणखी म्हणतात, ''परकीयांना कवटाळण्यासाठी स्वजनांना खवळून सोडण्यात अर्थ तो काय ?  महारांना आज जवळ केल्यास ब्रह्मवृंद रागावतो त्याची वाट काय ?  परकीय कोण आणि स्वकीय कोण हे ठरविताना नाथ आणि इतर संत रक्तसंबंधाकडे पाहत नसत, मनाकडे पाहत आणि ब्रह्मवृंद रागावतो त्याची वाट काय ?  या प्रश्नाचा विटाळ त्यांना कधीच झाला नाही.''  रा. पांगारकर आणखी पुढे म्हणतात, ''भूतदयेने प्रेरणा झाल्यावेळी त्यांना शिवा पण नंतर स्नान करून आपला आचारविचार पाळा,''  रा. पांगारकरांच्या सात्त्वि वृत्तीची आम्हांला जी कल्पना आहे, तिच्यावरून प्रसिद्ध झालेले वरील वाक्य खरोखरीच त्यांच्या तोंडातून आले असेल की का, ह्याविषयी आम्हास शंका वाटत आहे; पण त्यांचा खराच तसा भाव असल्यास भूतदयेची प्रेरणा म्हणजे एक प्रकारची भूतबाधाच - जी होऊन गेली असता आपण स्नान करून शुचिर्भूत व्हावे अशी त्यांची समजूत झाल्यासारखी दिसते. भूतदयेने प्रेरित होऊन आमचे जे वर्तन होते ते तर अत्यंत थोर आणि पवित्र, त्या वेळची स्थिती स्वर्गीय स्थिती असे असूनही ''आचार-विचार'' पाळण्यापूर्वी पुन्हा स्नान करण्याची जरुरी असावी, हा भूतदयेचा व आचार-विचारांचा कोण विपरीत संबंध ! कदाचित हा संबंध आम्हासारख्या अर्धवट सुधारकांच्या वर्तनात राहील, पण त्याचा दाखला नाथसारख्या संतांच्या माथ्यावर मारण्याचे दुसरे पाप तरी निदान आम्ही करू नये. शेवटी रा. पांगारकर म्हणतात, 'एकनाथाने समाजास खरे ज्ञान करून दिले. पण प्राचीन परंपरा त्यांनी मोडली नाही-' खरे ज्ञान करून देणे पण प्राचीन परंपरा न मोडणे हे हस्तकौशल्य संतास साधले होते की नाही हे आम्ही सांगू शकत नाही.'  श्रीचोखोबांचे चरित्र नामदेव, तुकाराम, एकनाथ व इतर संतांनी अभंगद्वारा लिहिले आहे. त्या सर्वात प्राचीन परंपरेच्या उलट एकनाथकृत अभंगांतच कडेलोट आहे. ते अभंग असे :

अमृतासी रोग स्वर्गी जाहला पाही ।  अमरनाथा तेंही गोड नसे ॥
नारदाते प्रश्न करी अमरनाथ ।  शुद्ध हे अमृत कोठें होय ॥
पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी ।  पुंडलीकाचे द्वारी देव उभा ॥
तया ठाई जातां शुद्ध होय अमृत ।  नारदे ही मात सांगितली ॥
तेव्हां एकादशी आली सोमवारी ।  तेव्हां पंढरी उतरले ॥
नामदेवासहित अवघे गणगंधर्व ।  इंद्रादिक देव चालीयले ॥
रुक्मिणीसहित पंढरीनिवास ।  चोखीयाचे घरास आले वेगी ॥
चोख्याचे अंगणी बैसल्या पंगती ॥  स्त्री ते वाढीती चोखीयाची ।
अमृताचे ताट इंद्रे पुढे केले ॥  शुद्ध पाहिजे केले नारायणा ॥
तेव्हां देवराय पाचारी चोखीयासी ।  शुद्ध अमृतासी करी वेगीं ॥
चोखामेळा म्हणे काय हे अमृत ।  नामापुढे मात काय याची ॥
चोखियाची स्त्री चोखा दोघेजण ।  शुद्ध अमृत तेणे केलें देखा ॥
चोखीयाच्या घरी शुद्ध होय अमृत ।  एका जनार्दनी मात काय सांगू ॥
वरील अभंगातील तात्पर्य परंपरेस धरूनच होते अशी शंका येत असल्यास तिचे निरसन एकनाथांनी पुढील चरणास केले आहे.

यातिहीन मी अमंगळ महार ।  कृपा मजवर केली तुम्ही ॥
पंढरीचे ब्राह्मण देखतील कोण्ही ।  बरे मजलागूनी न पाहती जन ॥

या प्रकारे परंपरेचे पुरस्कर्ते आणि इतर टवाळ जन यांचा नुसता उल्लेख करूनच नाथ राहिले नाहीत. अशा जनांशी गाठ पडली असता भल्याने कसे वागावे तेही खालील चरणात त्यांनी सांगितले आहे.

ऐसे ऐकोनियां हंसती सकळ ।  आनंदे गोपाळ हास्य करी ॥

यावरून परंपरा मोडल्याचे दुःख व टवाळांची थट्टा हसून घालवावी. सभासदहो, आजचा प्रसंग गंभीर आहे. रा. पांगारकर हे सात्त्वि वृत्तीचे आहेत. त्यांची मते कशीही असोत ! त्यांवर नुसती लौकिक टीका करून आम्ही आजची वेळ दवडू नये. 'अस्पृश्य' जातींच्या तुम्हा सभासदांना त्यांच्या मतावरील टीका आवडून तुम्ही आनंदाने टाळया पिटाल ही मोठी गोष्ट नाही. रा. पांगारकर म्हणजे लौकिकाला भिणारे, प्राचीन परंपरेचे भक्त, वरिष्ठ वर्गातच आहेत असे नाही. अशी माणसे अस्पृश्य वर्गातही किंबहुना जास्त सापडतील; न सापडल्यास नवल ! शिवास राजसी व तामसी हेतूने प्राचीन परंपरा मोडण्यातच कोणतीही सुधारणा होणार नाही. पांगारकर, तुम्ही आम्ही सर्वच भित्री आणि नीच जातीची माणसे आहोत, श्री एकनाथ, नामदेव तुकाराम व चोखोबा ही शुद्ध सात्त्वि आणि एकाच उच्च जातीची माणसे होत. आम्हा सर्वांचा उद्धार करण्यास तेच एक समर्थ होत. त्यांनी असे केले, त्यांनी तसे केले याची चर्चा करणारी आम्ही कोण माकडे ! आमच्या ह्या नीच योनीतून त्यांच्या शुद्ध योनींत उद्धार व्हावयाचा असल्यास त्याला शुद्ध ईश्वरभक्ती हा एकच मार्ग आहे. तो चोखोबाने तुम्हांपुढे रेखाटलेला आहे. सभासदहो, तुम्ही पांगारकर व शिंदे यांच्या परस्परांविरुद्ध भाषणाने आपली दिशाभूल होऊ देऊ नका. चोखोबांचे शुद्ध वर्तन आपल्यापुढे ठेवा व त्याचा कित्ता गिरवा. मग कोण ब्राह्मण व कोण महार, प्राचीन परंपरा मोडते कशी व सुधारणा घडते कशी हे पाहणे हे देवाचे काम. तो ते योग्य वेळी करीलच करील.

ईश्वर आणि विश्वास

ईश्वर
(१९०८ च्या उत्सवांत दिलेल्या व्याख्यानाचा सारांश)

मानवोन्नतिशास्त्र (Anthropology) ज्यांनी पाहिले असेल, त्यांना ५००० वर्षांपूर्वीपासून आतापर्यंत धर्माची प्रगती कशी होत आली आहे, हे कळून येईल. एवढ्या काळात जड जगत् जशाचे तसेच राहिले आहे. जी माती पूर्वी तांबडी होती ती आताही तांबडीच आहे, जी काळी होती ती आता तशीच आहे. जो दगड पूर्वी जितका कठीण होता तो तितकाच आता आहे. मनुष्येतर प्राणीही बहुतेक त्याच स्थइतीत आहेत. पण मनुष्यप्राण्याने इतक्या अवधीत किती आघाडी मारिली आहे! भौतिक कला, मानसिक विद्या आणि आत्मिक उन्नती ही ह्या एका प्राण्याने किती तरी संपादिली आहेत पहा.

हे जे ऐश्वर्य आणि ही जी संपत्ती मनुष्याने मिळविली आहे त्या सर्वांत श्रेष्ठ दर्जाची संपत्ती म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराची गूढ शक्ती, की जिच्यामुळे अनंतकोटी ब्रह्मांड निर्माण होऊन चालली आहेत... त्याच्यासंबंधी मनुष्याने आपल्या ज्या कल्पना, भावना व सिद्धांत केले आहेत, ते होत. ईश्वर म्हटल्याबरोबर काय काय विचार, विकार, ईर्षा, इ. उदभवतात! ह्या संपत्तीशी दुस-या कशाचीही नुसती तुलना देखील करणे शोभत नाही.

हा जो आपल्याजवळ अपूर्व संपत्तीचा संचय आहे, तो जशाचा तसाच पूर्वीपासून मिळालेला आहे असे नाही. स्वत: ईश्वर जरी उत्क्रांतिनियमाच्या बाहेर आहे, तरी त्याने आपल्यासंबंधी ज्ञान मनुष्यास एकदम जाहीर केलेले नसून ते तो उत्क्रांतिनियमाप्रमाणे हळूहळूच देत आहे. पृथ्वीच्या नकाशाकडे पाहिले असता दिसून येईल की, भूमध्यरेखेपासून उत्तरेकडील ४० अक्षांशांच्या दरम्यान जे इजिप्त, अँसिरिया, बॅबिलोनिया, इराण, हिंदुस्थान, चीन, जपान, मेक्सिको आणि पेरू इ. प्राचीन देश आणि राष्ट्रे होऊन गेली, ह्यांतच मनुष्यजातीच्या हल्लीच्या सर्व सुधारणांची उत्पत्ती झाली आहे, असे उपलब्ध इतिहासावरून दिसून येते. ह्या चाळीस अक्षांशांच्या समशीतोष्ण कटिबंधात हे सर्व देश दिसून येते. ह्या चाळीस अक्षांशांच्या समशीतोष्ण कटिबंधात हे सर्व देश असल्यामुळे, युरोप व आफ्रिकेत गहू, आशियात तांदूळ आणि अमेरिकेत मका ही मनुष्याच्या सुस्थितीस आवश्यक धान्ये उत्पन्न होऊन त्यांच्याबरोबरच सुधारणांचीही लागवड होणे शक्य झाले. ह्यावरून इतरांबरोबरच ईश्वरासंबंधी ज्ञानालाही भौतिक साधनांची कशी आवश्यकता आहे, हे दिसून येईल. फार प्राचीन काळी अर्धवट रानटी माणसांच्या ज्या साध्याभोळ्या धर्मसमजुती आधुनिक शोधामुळे व शास्त्रीय उपकरणांच्या योगे आम्हांला माहीत होऊ लागल्या आहेत, त्यांच्याशी आमच्या स्वत:च्या सुसंस्कृत समजुती ताडून पाहता हा ईश्वरी ज्ञानाचा विकास होत असलेला दिसून येईल. मनुष्य मेला असता त्याच्या आत्म्याला बाहेर जाण्याला वाट करून देण्यास प्रेताच्या टाळूस वाटोळे भोक करण्याची चाल काही रानटी लोकांत असावी अशी काही प्रेतांच्या प्रस्तरभूत सांगाड्यावरून व इतर खुणांवरून अटकळ होते. मस्तकात प्राण नावाची कल्पना आपल्या योगशास्त्रातही आहे. “इस बंगलेकू नऊ दरवाजे दसवी खिडकी खोल” असा जो कबीरजींचा उल्लेख आहे, तोही ह्या मस्तकातील खिडकीसंबंधी होय. ह्यात रहस्य इतकेच की आत्मतत्त्व म्हणून काही आपल्यात आहे आणि बाहेरही आहे आणि त्याचा मिलाफ व्हावयाचा आहे ही जी धार्मिक कल्पना ती अनेक प्रकारच्या समजुतींच्या द्वारापूर्वीपासून सारखी परिणत होत आहे. तसेच आकाश, वायू, पर्जन्य, महासागर, सूर्य, इ. सृष्ट महाविभूती निरनिराळ्या दैवते मानून त्यांची पूजा करण्याची प्रवृत्ती जशी ग्रीक लोकांत आणि हिंदुस्थानात होती तशीच नव्या खंडातील मेक्सिको आणि पेरू देशांतही असलेली शोधकास आढळून आली, इतकेच नव्हे, तर मेक्सिकोच्या जुन्या देवळातील सूर्याच्या मूर्तीचे जे चित्रवर्णन केलेले आहे, ते तर मराठी जुन्या तिस-या पुस्तकातील सूर्याच्या चित्राची हुबेहूब आठवण करून देते. ही अनेक दैवते नाहीशी होऊन गेली, तिचाही प्रकार चहूंकडे सारखाच दिसून येतो.

असो. ह्याप्रमाणे मनुष्यप्राणी ईश्वराची कोणत्या ना कोणत्या त-हेने तरी भावना केल्यावाचून राहिला नाही. इतकेच नव्हे, तर ईश्वरासंबंधी त्याची भावना उत्तरोत्तर शुद्धच होत गेली आहे व पुढे ह्याहूनही शुद्ध होत जाणार आहे. किंबहुना ईश्वराला भावणे हाच मनुष्यपणा आहे.
असन्नेव स भवति | असदब्रह्मेति वेद चेत् | अस्ति ब्रह्मेति चेद्वेद | (तैतिरीयोपनिषद २.६)

ब्रह्म नाही असे म्हणणारा स्वतः आपणच नाही असा होतो. ब्रह्माला आहे असे जाणण्यानेच जाणणा-या स्वतःला अस्तित्व येते. मननशील असणे हाच मनुष्याचा धर्म. तो नाहीसा झाला म्हणजे मनुष्याचा मनुष्यपणा नाहीसा होऊन तो नुसता प्राणीरूपाने उरतो. असा वरील श्रुतिवाक्याचा भाव आहे. तेव्हा ईश्वरासंबंधी काही तरी भावना मनुष्यमात्रामध्ये असलीच पाहिजे, ही गोष्ट निर्विवाद आहे.

मानवोन्नतिशास्त्र किंवा तुलनात्मक धर्मशास्त्र ह्यांचा उद्देश ईश्वर आहे की नाही हा प्रश्न ठरविण्याचा नाही, तर ईश्वरभावनेची शुद्धी कसकशी होत गेली हे दाखविण्याचा आहे. आणि ह्या शुद्धीची मुख्य दिशा ही आहे की, ईश्वर हा कोणी शरीरविशिष्ट व्यक्ती नसून सर्वव्यापी शुद्ध चैतन्य आहे, अशी मानवजातीची मती होत चालली आहे. म्हणजे थोडक्यात सांगावयाचे तर ईश्वर हा भोगायतन नसून केवळ गुणाश्रय आहे. मनुष्यही स्वत: गुणाश्रय आहे, परंतु त्याच्या गुणाला शरीराची अपेक्षा आहे तेव्हा ह्या त्याच्या दोषामुळे तो कितीही ज्ञानी झाला तरी तो आपल्या स्वतःचा देहभाव सूक्ष्म मानाने नकळत का होईना, ईश्वरावर आरोपितोच. तो देहभाव (Anthropomorphism) पूर्ण नाहीसा करून ईश्वर हा केवळ गुणाश्रय आहे, असे जाणणे ही त्याविषयी सम्यग्भावना होय. म्हणजे ईश्वर आमच्यासारखा सुखी किंवा दुःखी नसून केवळ सुखरूपच आहे, आमच्याप्रमाणे द्याळू किंवा निर्दय नसून दयेचा प्रेरक आहे, आमच्यासारखा प्रेमी किंवा द्वेषी नसून प्रेमाचा प्रवर्तक आहे, हे आम्ही उत्तरोत्तर अधिक जाणिले पाहिजे.

ह्या ठिकाणी असा एक आक्षेप येण्याचा फार संभव आहे की ईश्वर जर सर्व गुणांचा प्रवर्तक आहे, तर तो सदगुणांचा असावा तसाच दुर्गुणांचा असला पाहिजे. चांगल्या गुणाला मात्र ईश्वर कारण आणि वाईटाला मनुष्य कारण असे म्हणणे म्हणजेच ईश्वरावर ही मोठी मेहरबानीच करू पाहणे होय. ह्यावर थोडा विचार केल्यास कळून चुकेल की सदगुण आणि दुर्गुण ह्या दोन भिन्न परस्परविरोधी स्थिती मुळीच नाहीत. जे काय आहेत ते गुणच आहेत आणि ते सर्व मंगलच आहेत. उदारणार्थ, मनुष्य प्रेमामुळे दुस-यावर उपकार करतो व लोभामुळे दुस-याला अपकार करतो असे दिसते. पण प्रेम आणि लोभ हे परस्पर विरोधी पदार्थ नाहीत. तर उत्क्रांतीच्या निरनिराळ्या पायरीवरचे गुण असून दोन्ही सत्कार्याची साधनेच आहेत. प्राणिमात्रांनी आत्मसंरक्षण करावे, ह्यासाठी ईश्वर लोभाचा प्रवर्तक होतो; आत्मसंरक्षणाचे खालचे कार्य चांगले स्थापित झाल्यावर त्याहून उच्च दर्जाचे जे परहितपोषण-उत्क्रांतीचे कार्य त्यासाठी प्रेमाचा प्रवर्तक ईश्वरच होतो. आपण मात्र वरच्या पायरीवर पोहोचूनही वरच्या प्रेरणांना न जुमानता खालच्या प्रेरणांना वश झालो, तर आपल्याला दिलेल्या स्वतंत्रतेचा आपण दुरूपयोग केला असे होते. ईश्वर दुर्गुणांचा प्रवर्तक होत नाही. कारण दुर्गुण असा कोणताच नाही. ह्याचप्रमाणे शौर्य आणि भीती, सहिष्णुता आणि क्रोध, जितेंद्रियता आणि काम, ह्या सर्व गुणांचे प्रयोजन समजावे. हे भिन्नभिन्न दिसणारे गुण एकाच पायरीवरचे नव्हेत. उत्क्रांति-कार्यासाठी ह्यांची शुभ परंपरा सत्त्वाचा प्रवर्तक जो परमेश्वर त्यानेच लावून दिली आहे. आणि वाढीच्या मानाने प्राणिमात्रांना ईश्वराने अधिकार आणि स्वतंत्रता ही कशी दिली आहेत ह्याचा अनुभवही ज्याचा त्यालाच आहे. ह्यासंबंधी इतरांनी वाच्यता करण्याची जरूरी नाही आणि करून फळही नाही. एवंच ईश्वर सत्त्वाचा प्रवर्तक आहे ह्या श्रुतिवाक्याला बाध येत नाही.

विश्वास ईश्वर सत्त्वाचा प्रेरक आणि प्रवर्तक कसा आहे ह्याचा आपण इतका वेळ विचार केला. आता त्याच्या आमच्यामधील संबंध जो विश्वासाचा त्याकडे वळूं.

ईश्वराचा व आपला संबंध बुद्धीच्यापेक्षा विश्वासाच्याद्वारे अधिक जडतो. इतकेच नव्हे, तर बुद्धीच्यामुळे हा संबंध केव्हा केव्हा शिथिल होतो असे दिसून येते. बुद्धी आणि विश्वास ह्यांतील फरक थोडक्यात सांगावयाचा झाल्यास असे म्हणता येईल की, बुद्धी म्हणजे पुष्कळ प्रयत्नानंतर पुष्कळ सामग्रीच्या साहाय्याने अल्प ज्ञान करून देणारी शक्ती आणि विश्वास म्हणजे काहीच प्रयत्न न करता अल्पशा सामग्रीने पुष्कळसे ज्ञान करून देणारी शक्ती होय. अनेक शास्त्रांच्या पुष्कळ साधनांनी आणि मोठ्या अविश्रांत श्रमाने मनुष्याला बराच अनुभव आला आहे, तरी विश्वाचे ठोकळ आणि यथार्थ ज्ञान काय झाले हे पाहू गेले असता साधनांच्या मानाने सिद्धी फारच अल्प झालेली दिसून येईल. पण माणसामध्ये विश्वास म्हणून एक अधिक मोलाची आणि नवलाची शक्ती आहे. विश्वामध्ये सत्त्वाचा, शुभाचा आणि मांगल्याचा प्रसार करणारी ईश्वर ही शक्ती भरली आहे, हे ज्ञान प्राचीन काळापासून कमी अधिक मानाने कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे अवगत झाले आहेच. थोडा कोठे एक विशेष प्रकारचा अंगस्पर्श होतो न होतो, तोच नूतन बालकाचा आईवर केवढा दृढ आणि कायमचा विश्वास बसतो! थोडी खुणेला खूण पटली की तरूणी आपल्या माहेराच सर्व वारसा सोडून देऊन परक्या तरूणावर आपल्या सर्व आयुष्याचा भार टाकते! ही विश्वासाची जादू होय. “आकारैरिंगितैर्गत्यागृह्यतेSन्तर्गतं मन:|” मनुष्याच्या आतला मतलब समजण्याला, आकार, हावभाव, बसणे, उठणे इ. वरून सहजच उपजणारा विश्वास हा कारण होतो. येथे तर्काची प्रमाणे पंगू पडतात आणि मनुष्याप्रमाणेच अखिल विश्वाचा मतलब समजण्यालाही बुद्धीच्या कृत्रिम खटपटीपेक्षा उपजत विश्वासच कामाला येतो. कारण “तुका म्हणे माझा स्वामी अबोलणा | पुरवू खुणे खुणा जाणतसे ||”

बुद्धी आणि विश्वास ह्यांमध्ये दुसरा एक विशेष फरक आहे तो असा. विश्वामध्ये सत्त्वाचा प्रवर्तक ईश्वर आहे असे केवळ अस्तित्वबोधक ज्ञान बुद्धीच्याहीद्वारे मिळू शकते. हल्लीच्या काळी शिक्षण आणि संसाराच्या इतर सोयी पुष्कळ सवंगल्या असल्यामुळे ब-याच सुशिक्षित लोकांना आपल्या बुद्धीची थोडीशी हालचाल करून, थोडेसे तुलनात्मक धर्मशास्त्राचे अवलोकन करून, ईश्वरासंबंधी वरील अस्तित्वबोधक ज्ञान मिळविता येते आहे. पण अशा सुशिक्षितांना त्यांच्या सुखवस्तू स्थितीत त्यांच्या ह्या सुलभ ज्ञानामुळे फारसा उपद्रव होत नाही, किंवा साहाय्यही पोहोचत नाही. नित्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक व्यवहारात सत्याचा आग्रह धरून रहावयाला त्यांचे हे आयते ज्ञान त्यांना भाग पाडीत नाही. किंवा भाग पडले असता त्यांना धीरही देत नाही, येथे विश्वासाचे काम आहे. ईश्वर सत्त्वप्रवर्तक आहे असे नुसते मत असून चालत नाही, तर तो सत्याचा आशि शुभाचा प्रवर्तक आहे. म्हणूनच मी सत्याचा आग्रह धरून राहिलो तर, माझे कितीही हाल झाले तरी हानी-माझी किंवा कोणाचीही-मुळीच होणार नाही, असा विश्वास पाहिजे आहे. अशा विश्वासामुळेच ईश्वराचा व आपला खरा आणि निकट संबंध जडतो, बुद्धीने जडत नाही.

माझ्या समाजबंधूंनो, मला आपल्यापुढे हाच मुद्दा विशेष कळकळीने सांगावयाचा आहे. ह्यात नवीन काही नाही आणि ते नको आहे. तुम्ही व मी प्रार्थनासमाजात आलो, येवढ्यावरूनच सर्व ईश्वरावर विश्वास ठेवणारे झालो असे होत नाही. ती गोष्ट आम्ही आमच्या नित्याच्या व्यवहारात कसे वागत असतो ह्यावर अवलंबून आहे. पुष्कळ वेळा तर असे घडते की आम्ही आपल्या व्यक्तीच्या वर्तनावर दुस-यांनी टीका करण्याची वाट देखील पाहत नाही. म्हणजे कोणीतरी समाजावर साधारण टीका केल्याबरोबर आमचा सर्व विश्वास विरघळून जाऊन आम्ही शुष्क होतो. परवाच पुणे येथील मराठा पत्रात एका सन्मान्य गृहस्थाचा एक सुंदर लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, प्रार्थना समाजात फारच थोड जीव उरला आहे आणि त्याचे लोकांवर तर मुळीच वजन नाही. गोष्ट खरी असेल. पण अशा टीकेचा आमच्या समजाबंधूंवर भलताच परिणाम होण्याचा संभव आहे म्हणून मला पुढील एक गोष्ट सांगावी असे वाटते.

एकदा एका मोठ्या आगबोटीवरील एक उतारू फार आजारी पडला. तो जगण्याची आशा बहुतेक नाहीशी झाली. शेवटी आगबोटीवरील डॉक्टरांनी रोग्याला नीट तपासून आपली खात्री करून घेतली, आणि स्ट्यूअर्डस लोकांना एकीकडे बोलावून सांगितले की, रोग्यात आता जीव फारच थोडा उरला आहे. तो १० वाजण्याच्या आत खात्रीने मरणार. त्यानंतर त्यास समुद्रात टाकून द्यावे. १० वाजता सांगितल्याप्रमाणे स्ट्यूअर्डस येऊन रोग्यास उचलून नेऊ लागले, रोगी त्यास तसे करू देईना, स्ट्यूअर्डसनी डॉक्टरचे मत कळविले तरी रोगी आपण मेलो आहे हे कबूल करीना. स्ट्यूअर्डसनी त्याला दरडावून विचारले, काय डॉक्टरापेक्षा तुला अधिक कळते काय? एकाद्या विद्वान टीकाकाराने टीका केली, व आमच्यामध्ये जीव आहे की नाही हे विद्वानांपेक्षा आपणांस जास्त समजते. अशावेळी विद्वानांच्या म्हणण्याकडे किंबहुना लोकांच्या दटावणीकडे लक्ष न पोहोचविता आम्ही जिवंत आहो हा विश्वास जतन केला पाहिजे व लोकांनी ढकलून दिले तरी आपण आपल्या नावेतून समुद्रात पडू नये.

ही समाजावरील टीकेची गोष्ट झाली. व्यक्तिविषयक वर्तनावरील टीका झाली तरी आपला विश्वासच जसा कामाला येतो; तसे दुसरे काही येत नाही. पण काही झाले तरी असे दुस-याच्या टीकेचे प्रसंग कमीच येतात. पुष्कळ वेळा आम्हांला स्वत:चीच टीका आणि भीती ह्या नडतात आणि नागवितात. समाजात यावे किंवा न यावे हे ठरविण्याला ईश्वरावरील विश्वासाची इतकी जरूरी भासत नाही. पण वरील आत्मटीका व आत्मभीती ह्यांचे निवारण, सत्त्वप्रवर्तक ईश्वर आपल्या जवळ आहे असा विश्वास आपल्यात अष्टौप्रहर जागत असल्याशिवाय होणे शक्य नाही. एकाद्या कामाचा आरंभ करतेवेळी हा विश्वास असतो, पण अर्ध्या वाटेवर गेलो असता धीर सुटतो, दिशा धुंद होतात.

पॅरीस शहरात सुमारे २०० फूट व्यासाचे एक विशाल चक्र बारीक तारांच्या उंच खांबावर उभे केले आहे. १०-५ माणसे सुखाने बसतील अशा खोल्यासारख्या १००-१५० पेट्या त्या चक्रात बसविल्या आहेत. प्रेक्षक लोक ह्या खोल्यांतून बसले असता हळूहळू ते चक्र फिरत असते. ह्या ठिकाणी फ्रेंच कारागिरांच्या यंत्रकुशलतेची व योजनेची कमाल झाली आहे. मी ह्या एका खोलीत बसून जसजसा हळूहळू वर जाऊ लागलो तसतसा माझा धीर सुटू लागला. किती दिवस तरी ह्या चक्राचा खेळ चालला होता, हे मला माहीत असूनही माझ्याच वेळी ते मोडणार अशी पोरकट भीती मला वाटू लागली. ही भीती केवळ संस्कारजन्य होती. पण तिच्यामुळे त्रास झाला तो काही कमी नव्हता. २०० फूट उंच वर हवेत जेव्हा आमची खोली गेली तेव्हा तर अवस्था फारच कठीण झाली. ह्या चक्राची एक फेरी कशी तरी झाली. पण एफेला टॉवर नावाचा जो ८०० फूट (सर्व जगात उंच) लोखंडी मनोरा आहे, त्याच्या अर्ध्यावर तर चढवेचना. प्रार्थनासमाजाला जो मनोरा चढावयाचा आहे त्याची उंची अनंत आहे, त्यातील सभासदांचा धीर पदोपदी सुटण्याचा संभव आहे. अशा वेळी विश्वासाचे बळ पाहिजे. संस्कारामुळे जी भीती वाटते ती घालवावयाची असल्यास विश्वासाचीच सवय केली पाहिजे.

आत्मोन्नतीचे आणि देशोन्नतीचे पुष्कळ चढाव समाजाला चढावयाचे आहेत. सभासदांचा व्यक्तिश: विश्वास उत्तरोत्तर वाढत जावो आणि ईशभक्ती व लोकसेवा त्यांच्याकडून अधिकाधिक घडो, ही जगच्चालकाजवळ प्रार्थना आहे.

  1. इंग्लंडांतील आधुनिक धर्मविषयक चळवळ
  2. आवड आणि प्रीति
  3. आपुलिया बळें घालावी हे कास
  4. आपला व खालील प्राण्यांचा संबंध
  • 104
  • 105
  • 106
  • 107
  • 108
  • 109
  • 110
  • 111
  • 112
  • 113
Page 109 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी