1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

राजा राममोहन व बुवाबाजी

श्री. राममोहनाच्या पवित्र कथनाला बुवाबाजीचे अमंगळ शेपूट का लावण्यात आले अशी शंका कोणास येण्याचा संभव आहे. हे चरित्र पुष्कळदा सांगण्यात आले आहे. हल्ली महाराष्ट्रात बुवाबाजीचा वणवा पेटला आहे. त्यावर राममोहन रायांचे चरित्रात काय उपाय सापडण्यासारखा आहे हे पहाण्याचा आजच्या प्रवचनाचा उद्देश आहे. बुवाबाजी हा रोग आजकालचा नाही. धर्माचा दिवा जसा सनातन आहे तसाच त्याच्या खालचा अंधारही सनातन आहे. आणि त्याचा निषेधही पुरातन काळापासून होत आलेला आहे. आमचे मित्र महादेव शास्त्री दिवेकर ह्यांनी जी ह्या रोगावर मोहीम चालविलेली आहे तिला कोण वावगी म्हणेल ? उलट केवळ तमासगिराप्रमाणे ही मोहीम पाहात व व्याख्याने ऐकत न बसता सर्वांनी तिला शक्त्यनुसार हातभार लावावा असेच कोणालाही वाटेल. मात्र ह्या मोहिमेसंबंधाने हल्ली जो सरकारी कोर्टात एक खटला चालला आहे त्याशी आजच्या प्रवचनाचा कसलाही संबंध नाही. अमूक एक बुवा चांगले अथवा वाईट, अमूक एक महाराजांचे अमूक एक कृत्य समर्थनीय आहे की, आक्षेपार्ह आहे, अशा विशिष्ट विचारास आमच्या प्रवचनास जागा नाही. कोर्टात खटला चालला असता त्याचा निकाल होईपर्यंत वादी किंवा प्रतिवादीसंबंधाने कायद्याच्या आधारावाचून सहानुभूती किंवा दूषित ग्रह निर्माण करणे हा शिष्टाचार नव्हे. (हा निर्बंध व्याख्यात्यांनी आपणावर व मागून बोलणारांवर घातला आणि सभेत तो शेवटपर्यंत पाळण्यात आला.) बुवाबाजीच्या मुसळाचे महादेवशास्त्र्यांना जर समग्र उच्चाटन करावयाचे असेल तर त्यांनी आपल्या स्वतःच्या हृदयात विषमतेच्या कुसळास जागा देऊन चालणार नाही. बुवाबाजीचे मूळ जुन्या धर्मातील निवृत्तीवादात आहे, विशेषतः बुद्ध धर्मातील भिक्षूसंप्रदायात आहे, असे मागे एका व्याख्यानात शास्त्रीबुवांनी सांगितले होते, पण ते खरे नाही. वेळोवेळी जे आक्षेपार्ह बुवा उद्भवतात ते (वाई येथे ता. ३० सप्टेंबर १९३४ रोजी केलेल्या प्रवचनाचा सारांश. सुबोध पत्रिका, ७ ऑक्टोबर १९३४) स्वतः निवृत्त मुळीच नसतात. ते प्रवृत्त असतात, इतकेच नव्हे तर दुष्ट प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांना निवृत्तीचे सोंग आणावे लागते. ह्या सोंगाची जबाबदारी निवृत्तीवादाकडे कशी येते ? विशेषतः बुद्ध धर्माविरुद्ध पक्षपाती उल्लेख शास्त्रीबुवांनी करावयास नको होता. एवढा इशारा ध्यानात घेऊन शास्त्रीबुवांच्या ह्या धर्मसंशोधनाच्या चळवळीला सर्वांनी पाठिंबा द्यावा. बुवाबाजीचे मूळ अवतारवाद किंवा गुरुसंप्रदाय ह्यात आहे असे कोणी एकाने सुचविले होते ते खरे आहे. ब्राह्मसमाज ह्या अवतारवादाच्या अगदी विरुद्ध आहे. हे खूळ हिंदूधर्मातील असो किंवा बौद्ध, ख्रिस्ती, मुसलमान अगर कोणत्याही इतर धर्मांतील असो, श्री. राजा राममोहन रॉयांनी ह्यावर सारखे खडतर शस्त्र चालविले होते आणि त्यांना सर्व देशाच्या आणि काळाच्या धर्मोद्धारक संतांचा पाठिंबा आहे. तसेच ह्या निषेध करणा-या संत पुरुषांचा लोकांकडून छळही झाला, हेही खरे आहे. ह्या स्पष्टवक्तेपणाबद्दल साक्रेटीसला विषाचा पेला आणि ख्रिस्ताला शूळ मिळाला, बुद्धाची तर अजून नालस्ती चाललीच आहे. आणि तिला डॉ. केतकर आणि दिवेकर शास्त्र्यांचाही हात लागत आहे ! मग राजा राममोहन रॉयांचा ह्या संशोधन कार्याबद्दल छळ झाला ह्यात काही विशेष नाही. संत आणि बुवा हे जणू सावत्र बंधूच आहेत असे दिसते. वारकरी पंथातील ज्ञानेश्वरापासून तो तुकारामाच्या नंतरही तत्कालीन बुवांचा समाचार घेण्यात आला आहे.

कैसा जोग कमाया बे । ये क्या ढोंग बनाया बे ।
जटा बढाई बीभूत चढाई, जगमे कहता सिद्धा ।
सिद्धनको तो बात न जाने, बालपनोका गद्धा ।।

ही कबीरवाणी प्रसिद्धच आहे. (सभेला काही मुसलमान व ख्रिस्ती लोकही आले होते. श्री. शिंदे ह्यांनी जेव्हा खालील पद हिंदीत खड्या आवाजात म्हणून दाखविले, तेव्हा त्याचा फार परिणाम झाला).

बिना फिकर फकीरी करना । क्या जोर जुलूम बतलाना ।
बिना हरफ बिसमिल्ला अल्ला । बिनदम होके कहना... ।।धृ।।
बिना नजर नुक्तोंको देखे, कायको किताब होना । क्या जोर...।।१।।
बिना कलमसे कलमा भरना । बीन कानोंसे सुनना ।
बिना पैर मक्केको जाना । बीन हात मेवा लाना । क्या जोर...।।२।।
बिना रुके हिंदू तुर्के । मुंजखतना क्या करना ।
शामनाथ साहेबको देखे । अबकानूर छिपाना । क्या जोर...।।३।।

ख-या फकिराचे हे आध्यात्मिक उच्च स्थान ध्यानात आणता ढोंगी फकिराची कशी वाताहात होते, अल्लाचे नाव घेण्याला अक्षराचीही जरुरी नाही, ऐकण्याला कानाची जरुरी नाही, मक्केला जाण्याला पाय नकोत, मेवा आणावयास हात नकोत, शुद्ध मुसलमान व हिंदूंना सुंता व मुंज नको व अशुद्ध आहेत त्यांना हे इलाज चालत नाहीत. शामनाथाने अशा चैतन्यमय साहेबाला पाहिल्यावर तो कसा लपवू शकेल. एकंदरीत ख-या फकिराला कसलीही फिकीर नाही आणि इकडे हे बुवा पाहिले तर सर्वांचेच मिंधे असतात.

दिवेकर शास्त्री म्हणतात की बुवा तेथे बाया असतात, पण बुवांचे खरे मूळ बायातच. बाया म्हणजे नुसत्या स्त्रियाच नव्हेत, स्वतंत्र विचार नसलेले, आपल्या मताप्रमाणे वागण्याचे धैर्य नसलेले, व्यावहारिक जगाची माहिती नसलेले असे सगळे मिशाळ पुरुष बायाच समजावेत ! स्त्री असो, पुरुष असो, अशा माणसांचे भरताड बहुजन समाजात झाले की, तेथे बुवा निर्माण व्हावयाचेच ! कचरा झाडला नाही व तेथे थोडासा दमटपणा होऊ दिला तर घरच्या अंगणातही निवडुंग माततो, तसाच प्रकार समाजातही होतो.

दीडशे वर्षांचे पूर्वी राजा राममोहन रॉयांचे वेळी हिंदुस्थानात विशेषतः बंगाल्यात जनतेची स्थिती अशीच केविलवाणी झाली होती. पुरुषांची किंमत बायकांहून कमी व बायकांची निर्माल्याहून कमी झाली होती. शाक्त आणि वैष्णव हे दोघे वाममार्गाला लागले होते. दुर्गा ह्या अधम दैवताने धर्मक्षेत्रात आधिपत्य मिळविले होते. बंगाल्यातल्या अर्ध्या अधिक बोकडांचा बळी ह्या देवतेला दिला जात असे, प्रत्येक शाक्ताला एक अन्य धर्मीय आणि विदेशी बाई शक्ती म्हणून ठेवण्याची रूढीने परवानगी दिली होती. बहुपत्नीकत्वाला ताळच राहिला नव्हता. नवरा मेला की ह्या सर्व बायांना जाळण्यात येत असे. ह्या भयाण बुवाबाजीला राममोहन रॉयांनी तोंड दिले.

बुवाबाजी नष्ट करावयाची म्हणजे जनतेतील अडाणीपणा, नेभळेपणा, परावलंबन इत्यादी दोष काढावे लागतात. म्हणून राजा राममोहन रॉयाने अबलोन्नती व लोकशिक्षण ही शस्त्रे उगारली. त्याने जे प्रचंड धर्मसंशोधन केले त्याचा व्यावहारिक हाच हेतू होता. बुवांचे पाठीमागे ज्या बाया लागतात त्या बहुतेक पांढरपेशाच्याच असतात. अशा बायांना पोटासाठी काबाडकष्ट करण्याची जरुरी नसते. दुर्दैवाने जरुरी पडली तरी सवय नसते, पुरुषवर्ग किती ज्ञानी आणि अतिज्ञानी असला तरी ते आपल्या बायकांना अडाणीच ठेवतात. शरीराला काम नाही आणि मनाला ज्ञान नाही, मग अशा बायकांना चाळे सुचावे ह्यात नवल काय ? राममोहन रॉयांनी जो लोकशिक्षणाचा मार्ग स्वीकारला तोच अशा आपत्तीला उपाय आहे.

बुवाबाजीची साथ काबाडकष्ट करून पोट भरणा-या अगदी खालच्या वर्गात उद्भवणे शक्यच नाही. ह्या वर्गात गाढ अज्ञान असले तरी पोटाचा लकडा मागे लागल्यामुळे त्यांना त्यांचे अज्ञान बाधत नाही. म्हणजे त्यांना चाळे सुचत नाहीत. पण ऐतखाऊ पांढरपेशावर्गाची स्थिती निराळी. पुरूष दुबळे असल्याने आपल्या बायकांना संतुष्ट ठेवण्याचे सामर्थ्यच त्यांच्यात नसते. कामधंदा नाही, सारासार विचार नाही, घरी संतोष नाही, अशांनी धर्माचे उपद्व्याप करू नयेत तर काय करावे ?

पुराणिक, कीर्तनकार, देवऋषी, भुताटकी करणारे वगैरे धटिंगणांना ह्या कुरणात चरावयाला आयतीच जागा मिळते. घरात ढेकूण झाले तर एकेक ढेकूण वेचून चिरडीत बसण्याने ते कमी होत नाहीत. साफ-सफाई आणि कीटकविध्वंसक औषधे हाच उपाय आहे. म्हणून राजा राममोहन रॉयांनी समाजसंशोधनासाठी कंबर बांधली, त्यांना प्रचंड यश आले आणि आजकालच्या समाजसंशोधकांना यश येत नाही ह्यांचे कारण ते मोठे आणि आम्ही लहान हे नव्हे. त्यांचा मार्ग खरा होता आणि तो खरा होता हे आम्हांस कळत नाही व कळले तर वळत नाही.

दहा वर्षांत राममोहन रॉयांनी सतीच्या रूढीचे डोंगर पालथे घातले आणि आता महात्माजीसारख्यांना अस्पृश्यतेपुढे हार खावी लागत आहे ! ह्याचे कारण पाहिले तर तितका निर्भिडपणा आणि कठोरपणा आमच्यात नाही. बुवांच्यावर दातओठ खात बसण्यापेक्षा घरच्या बायांना अधिक न्यायाने वागविणे, आपण भोगतो ते स्वातंत्र्य त्यांना देणे, त्यांच्यावर घालतो ते संयमन आपल्यावर घालून पाहणे हा मार्ग बरा नव्हे काय ?

सर्व बाया स्वतंत्र झाल्या, आत्मसंरक्षणास योग्य झाल्या, धार्मिक बाबतीत स्वतः विचार करू लागल्या तर बुवाबाजी आपोआप संपुष्टात येईल. तृण नाही तेथे पडला दावाग्नी । जाय विझोनी आपसया । हे तुकारामाचे विधान अनुभवास येईल. दिवेकर शास्त्र्यासारखे संशोधक ह्या पुण्यतिथीच्या मुहुर्ताने राममोहन रॉयांची कदर ओळखून वागतील तर त्यांचे प्रयत्न भरीव व परिणामकारक होतील व तसे ते होवोत ही प्रार्थना आहे.

राजा राममोहन रॉय

हिंदुस्थानचे चरित्र सध्या पडत्या कलेवर आहे, तरी पण आता संपत आलेल्या चालू सहस्त्रकांत इंटरनॅशनल कौन्सिलसारख्या इहलोकीच्या दरबारात हिंदुस्थानचा प्रतिनिधी म्हणून कोणी पाठविण्याच्या योग्यतेचा मनुष्य असेल तर तो एक राजा राममोहन रॉयच दिसतो. त्याच्या जवळजवळचा मान कदाचित अकबर बादशहास देता येईल. पण त्यास भरतभूमीचा औरस वारस म्हणता येणार नाही. आम्हां ब्राह्म लोकांस राजा राममोहन रॉय हा ब्राह्मधर्माचा संस्थापक म्हणूनच मोठा वाटेल, परंतु तो भाग सोडून आपण ब्राह्म नाही समजून, शुद्ध मनाने चिकित्सा केली तरीही माझे वरील विधान कबूल करावे लागेल ह्यात शंका नाही. पण मौज ही आहे की अद्याप आम्हांलाच ब्राह्मसमाजांच्या सभासद लोकांना—त्याची खरी योग्यता नीटशी कळून आलेली नाही, निदान आमच्या कृतीवरून तरी असे दिसते. आधी आम्ही गुरु, ईश्वरात, आम्हात मध्यस्थ कोणी मानीत नाही. राजा राममोहन रॉयाला त्या अर्थाने गुरु नका मानू. पण त्याने केवढे धर्मकार्य, सत्कृत्य केले, हे मनात आणून तरी त्याच्याविषयी किती पूज्यबुद्धी पाहिजे, ती आमच्यात आहे काय ? ज्याने आम्हांला नीट मार्गाला, वर्तनाला लाविले, त्याच्याकरिता आम्ही काही करतो काय ? एक बाजूस जुने लोक तर गुरूची पूजाच करतात, त्याला डोकीवर घेऊन नाचतात, किती अयोग्य असे ढंग माजवितात ! तर उलटपक्षी आमच्या ब्राह्मसमाजाच दुस-या प्रकारचा अतिरेक दिसून येत आहे ! म्हणजे समाजसंस्थापक कोण, काय, इतके साधारण जरी अवगत असले, तरी ते तेवढ्यापुरते माहीत ! आम्ही दर वर्षी त्याच्या पुण्यतिथीचा उत्सव करतो, पण त्याचे स्मारक काय करतो ? कलकत्त्यास तर त्याचे काही अद्याप स्मारक झालेले नाही. आपल्या इकडे हा राममोहन आश्रम आहे, राममोहन सेमिनरी म्हणून बांकीपुरास आहे एवढेच, पण निरपेक्ष बुद्धीने मुद्दाम त्याचे स्मारक म्हणून काही आहे काय म्हणून पाहिले तर काय दिसते ? एका आश्रमाची आपल्याला (फूट नोट – ता. २७ सप्टेंबर १९०५ रोजी सकाळी दिलेले व्याख्यान.) इकडे उणीव भासत होती म्हणून एका उदार बंधूंनी आश्रम बांधून दिला व त्याला नाव काही तरी द्यावयाचे ते राममोहनाचे दिले, तसेच तिकडे शाळेची गरज होती, ती शाळा निघाली व नाव दिले राजा राममोहन सेमिनरी, असेच नाही तर काय ? पण खरोखर काहीच हितसंबंध न ठेवता केवळ राममोहनास अर्पण म्हणून कोठे काही आहे काय ?

पण आज मी तो नुसता मोठा आहे, मोठा आहे म्हणून रहात नाही. तर ह्या विभूतीचे चरित्र दोन बाजूंनी कसे निरखता येते ते आपण आता पाहू. माझ्या मते राममोहन रॉय सन १७७२ त जन्मला व सन १८८४ त वारला. वास्तविक केशवचंद्र सेन त्या वर्षी वारला, पण मी म्हणतो राजा राममोहन रॉयच तेव्हा वारला. राममोहनरूपी पर्वताची रांग, व त्याची एक शाखा केशवचंद्र आणि एक शाखा देवेंद्रनाथ ह्या तिघांच्या जीवनचरित्रात एकच दैवी हेतू सिद्ध झालेला आहे. तो हेतू सन १८८४ मध्ये परिपूर्ण झाला. इतका हा राममोहन मोठा आहे. साधू निर्माण होतात, त्यांचे चरित्र बहुधा अर्धेच संपलेले प्रत्ययास येते. ज्युलियस सीझरकडे पाहावे, तर त्याचा दगलबाजीने पण अकस्मात मृत्यू होऊन शेवटी तो व त्याच्या पाठीमागचा ऑगस्टस ह्यांच्यायोगे ती एक विभूती पूर्ण झाली म्हणावयाची. पण जो राममोहन १८३३ मध्ये वारला तो सुद्धा किती मोठा होऊन वारला हे आता आपण पाहू. येथे दोन दृष्टी ध्यानात ठेवाव्यात. एक सूक्ष्म दृष्टी व एक स्थूल दृष्टी. वृक्ष सुंदर दिसतो तो स्थूल दृष्टीने, म्हणजे स्थूलसुंदर होय व माझ्या समोरचे हे फर्नचे रोप सूक्ष्मसुंदर समजावे. पर्वत दोन-तीन मैलांवरून पाहिला, तरच सुंदर दिसेल. त्याच्यावर सूर्याचे किरण पडलेले असून जे रंग दिसायचे ते दुरून पाहिले तरच. पण ह्या फर्नचे किंवा ह्याहूनही लहान कोवळ्या फर्नचे पहावे, तो देठ कोमल, बुंधा लहान, कुंडी चहाच्या पेल्यापेक्षा फार मोठी नाही, कोमल कांती, ह्या बारीक बारीक रेषा, असे हे नाजूक झाड, दहा-पाच पावले लांब गेलो की मग ह्याचे सौंदर्य काय दिसायचे आहे ? हे पाहायला त्याच्या जवळ जाऊनच निरखले पाहिजे, न्याहाळले पाहिजे. कारण हे सौंदर्य लहान प्रमाणावर आहे. तोच पर्वत फार जवळ पायथ्याशी जाऊन पाहिला तर काय दिसणार ? ती काटेरी झाडे, दलदलीची जागा वगैरे काष्ठमय देखावाच दिसणार. पण त्याची गंभीर शोभा पाहावयाची असल्यास त्याच्यापासून दूर गेले पाहिजे. राममोहन रॉयांचे दोन्ही दृष्टीने सौंदर्य दिसून येण्यासारखे आहे. ते कसे ते आता थोडक्यात पाहू.

प्रथम तर सूक्ष्म सौंदर्य घेऊ. नुसते राममोहन रॉयाचे शारीरिक स्वरूपच घेतले तर तेसुद्धा किती मनोहर होते ! राजा राममोहन रॉय जरी राजकुलात जन्मला नव्हता तरी तो राजबिंडा असा दिसत होता. ती त्याची सहा फूट उंची, विशाल भाल, सुंदर केस वगैरे त्यांचे जे शरीरवर्णन दिलेले आहे, ते एकाद्या कादंबरीमध्ये जसे सुंदर नायकाचे वर्णन करावे तसे आहे. तो विलायतेस गेला तेव्हा एका इंग्लिश बाईने आपल्या लहानपणी त्याला पाहिले होते. त्या बाईला त्याची चांगली आठवण होती. मला ती भेटली असताना एकदा सांगत होती की राजा राममोहन रॉयमध्ये आमच्या राजापेक्षाही एक प्रकारची विशेष गंभीरता वगैरे दिसत होती. तो गंभीर रीतीने चाले, गंभीर हासे, त्याचे सर्व करणे गंभीरतेने परिपूर्ण असे.

त्याचा स्वभाव पाहिला तर तो त्याच्या शरीराप्रमाणेच उमदा होता. तो वादात कधी जहाल जात नसे. तो पुष्कळ वादी म्हणजे वाद केलेला मनुष्य. पुष्कळ मोठमोठ्या स्वदेशी, विदेशी शास्त्री, पंडितांशी त्याला वाद करावे लागले, पण वाद करताना अशा काही मधुर शब्दांनी तो करावयाचा की दुस-याच पक्षाला, प्रतिवाद्यावर चिडणे वाईट हे दाखवीत असे व आपण चिडत नसे.

तो ज्ञानी व बुद्धिमान किती होता ! कित्येक भाषांत तो पारंगत—संस्कृत, पर्शियन, आरबी, इंग्रजी, लॅटीन, ग्रीक इ. आणखी जगला असता तर आणखी काय काय शिकणार होता कोणास ठाऊक ! बंगाली भाषाही त्याने उत्पन्न केली, व्याकरण ग्रंथ लिहून ती नियमबद्ध करून ठेवली, म्हणून बंगाल्यात त्याला बंगाली भाषेचा जनक मानतात व मान देतात. आधुनिक धर्मशास्त्र जेव्हा बनत होते तेव्हा त्याचा संस्थापक तो, असे मॅक्समूलरने म्हटले आहे.

तो मनस्वी कर्मीही होता. प्रजेचे पाठबळ घेऊन राजावर तोंड सोडू नये, व राजाचे पाठबळ घेऊन प्रजेवर तोंड सोडू नये ही वृत्ती त्याने आमरण ठेविली होती. त्याने राजा व प्रजा ह्यांमध्ये उत्तम मध्यस्थाचे काम करून परस्परांच्या अडचणी परस्परांस कळवू देऊन दोघांचे मार्ग सुगम करण्याचे श्रेय घेतले. वर्तमानपत्रांचा कायदा निघाला तेव्हा तो राजाशी ह्या धडधडीत अन्यायाबद्दल भांडला. पण निळीची लागवड युरोपियनांकडून करण्यासंबंधाचा प्रश्न निघाला तेव्हा प्रजेशीही भांडून युरोपियनांना वसाहत करून राहू द्या असे स्पष्ट म्हणण्यास तो चुकला नाही. मोगलांकडून राजा हा किताब घेऊन त्यांच्या वतीने भांडण्यास तो पार्लमेंटापर्यंत गेला. सारांश स्वदेशातीलच काय, पण परदेशी राजकीय प्रश्नात तो अग्रेसर होता. त्याचप्रमाणे सामाजिक गोष्टीतही त्याचे प्रयत्न महशूर आहेत. धार्मिक, औद्योगिक आदिकरून सर्वांतच त्याची मती चालत असे.

त्याचप्रमाणे त्याचे अंतःकरण रसिक होते. कोणी कोणी तर्कवितर्कात पडून ब्रह्मास पाहिले असूनही न पाहिल्यासारखे होऊन अंतःकरणाने रुक्ष बनून जातात, पण राजा राममोहन रॉय हा योगी तसा भोगीही होता. कलकत्त्यात त्याची दोन घरे होती. एकात योग्याची संपत्ती तर दुस-यात अगदी नवीन त-हेच्या इंग्रजी सामानसुमानाने अपूर्व शोभा आणलेली. शोभा व सौंदर्य ह्यांचा तो भोक्ता होता. कवित्वही त्याने बरेच केले आहे. हा म्हणजे विषय, हे म्हणजे कनिष्ठ, त्याज्यच असे त्याला वाटले नाही. सर्व विषय देवाने निर्मिले आहेत, त्यांचा त्याने चांगल्या रीतीने स्वाद भरपूर घेतला. असा तो ज्ञानी, कर्मी, रसिक होता. राममोहन म्हणजे जणू तत्कालीन एक सहस्त्रदल कमलच फुलले की ज्याची प्रत्येक पाकळी उमलून गेली होती. त्याने दहा वर्षे सरकारी नोकरी करून हजारो रुपये साठवून इतके धर्मादी कार्य केले. त्यासाठी तो कोणाचा पगारी नोकर नव्हता ! हे सगळे त्याचे सूक्ष्मसौंदर्य. कारण हे सर्व करून तो गेला असता, तर आता मागे तो एवढा राहिला नसता. एकादे फूल कितीही सर्वांगसुंदर व विकसलेले असले, तरी ते एकदा का सुकून गेले, मग त्याचे काही राहत नाही. तेव्हा राममोहन एका दृष्टीने म्हणजे सूक्ष्मसौंदर्याच्या दृष्टीने पाहिले असता सर्वांगसुंदर विकसलेल्या फुलाप्रमाणे होता पण त्याची दुसरी बाजू पाहिली म्हणजे तो पर्वताप्रमाणे स्थूलसुंदर असे सहजी दिसून येईल.

ह्या जगात कोणी एक दिवसाची माणसे असतात, तर कोणी एक आठवड्याची, कोणी वर्षाची तर कोणी एका पिढीची अशा प्रकारची माणसे असतात. परवा प्रसिद्ध मल्ल सँडो आला, तेव्हा मुंबईत त्या आठवड्यात सर्वांच्या तोंडी सँडो होऊन गेला होता. त्याचप्रमाणे राममोहनाचे अंगी नुसते सूक्ष्मसौंदर्यच असते, तर तो आपल्या वेळच्या पिढीचा नायक इतकाच होऊन राहिला असता. पण राममोहन ही विभूती इतक्याचपुरती नव्हती हे आपणांस दिसत आहे.

राममोहनाचे मोठेपण आम्ही ब्राह्मसमाजाच्या मंडळीनेही अजून पाहिले नाही. ह्याचे एक कारण उघड आहे. कालतः आम्ही जितके दूर गेलो असता ते मोठेपण अधिक प्रमाणावर दिसून येईल तितके अद्याप आपण गेलो नाही. पण ह्यात आपला दोष नाही. सध्याच्या कालमानाने त्याचे महत्त्व जितके आपल्या अंगी बाणले पाहिजे ते जर हलगर्जीपणा किंवा अशा काही कारणांमुळे बाणले नसले, तर मात्र आपण दोषी होऊ. हा मुंबईला राजाबाई टॉवर आहे. उंच आहे, दिसायला सुंदर आहे. पण त्याच्या अगदी जवळ जाऊन उभे रहा, म्हणजे एकावर एक दहा दगड मांडून जेवढी उंची होईल तेवढ्याच उंचीचा भाग आपल्या नजरेत भरेल, जास्त नाही, तेच दूर जाऊ लागा म्हणजे हळूहळू त्याचे समग्र रूप ध्यानात येईल. तसेच आणखी दोनशे वर्षे जातील तेव्हा राममोहनाची कृती अधिक डोळ्यात भरेल. आपण आज त्याचे अंकी, मूल मातेच्या अंकावर चढून बसते त्याप्रमाणे बसलो आहो. पण कालगतीने त्याच्या पासून लांब गेल्यावर काय काय दिसेल ह्याची आपणांस कल्पना करता येते. कारण त्याचे बीज त्याच्या चरित्रातच आहे. बाकीच्या त्याच्या सर्व गोष्टी दोन-तीन हजार वर्षांनी विसरून जाण्यासारख्या आहेत. पण मुख्यतः दोन गोष्टी मला चिरस्थायी दिसतात. एक तर राष्ट्रीयता व सार्वत्रिकता ह्यांच्यामध्ये साधारण लोकांच्या व्यवहारात भेद दिसून येतो, तो राममोहनाचे मतात व वर्तनात कोठे नव्हता. त्याने दोन्ही गोष्टींची संगती कशी सुरेख लावून दिली होती ! राममोहन मोठा राष्ट्रभक्त होता. पण आपल्या मनाचा भाव अमुक एका रीतीने ठेवला पाहिजे की त्या रीतीने ठेवला म्हणजे ह्या दोन गोष्टी एक होऊन जातात हे राममोहनास पक्केपणी कळलेले होते. ज्ञान, भक्ती, कर्म इ. जीवनाचे सर्व भाग व्यापून टाकणारा असा सार्वत्रिक धर्म त्याने मनात आणिला. तो मोघम, केवळ कल्पनेच्या लहरीत तरंगणारा नसून सगळ्या विशिष्ट गोष्टींत तो जाऊन भिनणारा आहे. कोणताही भाव जो व्यक्तीत, तोच कुटुंबात, तोच राष्ट्रात, तोच सा-या जगात असा खरोखरी प्रकार आहे.

राममोहनाच्या स्थूलसौंदर्याचे दुसरे लक्षण म्हणजे त्याने पाहिलेला सार्वत्रिक धर्म अनुसरण्याकरिता प्रत्यक्ष समाजाची स्थापना केली हे होय. हीच दुसरी चिरस्थायी गोष्ट आणि आम्ही ज्या ज्या अंशाने ब्राह्म होऊ किंवा होत जाऊ त्या त्या अंशाने त्याचा मोठेपणा आपणांस दिसून येईल.

अशी ही राममोहन विभूती आहे. ‘अणोरणीयान् महतो महीयान्’ हे जसे ईश्वराचे वर्णन आहे, तसेच जवळजवळ ते त्याच्या विभूतीचेही म्हणता येईल. कोणी विभूती नुसती स्थूलच होऊन जाते, नेपोलियन, शिकंदर, तैमूरलंगादी मूर्ती ह्या प्रकारातील होत. म्हणजे त्यांचे ठायी सूक्ष्मसौंदर्य नव्हते. हे सर्व दूर गेले आहेत म्हणून ठीक आहे. त्यांचे तेवढे ते दुरून सुंदर दिसणारे रूप मात्र पाहून घ्यावे. ज्यू लोकांची संशुद्धी करणारा, नेब्रू केनेझार तोही “Instrument of God” म्हणजे देवाने हातात घेतलेला कोयताच होय. त्याच्या योगाने यहुद्यांना शिक्षा देऊन देवाने जागे केले. प्लेग आपल्याला स्वच्छ राहायला शिकवितो. गावाबाहेरची मोकळी शुद्ध हवा घेण्यास लावितो. हे सर्व चांगले आहे. पण प्लेग काय स्वतः आहे ! तीही ईश्वराची अक्राळविक्राळ विभूतीच ! नानाप्रकारच्या विभूती आजवर झाल्या, पुढे होतील, यांनी मोठी कामे करून टाकली, उत्पात करून सोडले. काही विभूती नुसत्या स्थूल व काही भयंकर म्हणून त्यांची अद्याप आठवण आहे. काही नुसत्या सूक्ष्म. त्यांचा आता कोठे मागमूसही नाही. व कोणी हे दोन्ही गुण अंगी वागविणा-या त्यांमध्येच राजा राममोहन रॉय हे आपल्या सूक्ष्म व स्थूलसौंदर्याने येतात. त्यांच्या पुण्यतिथीचे व एकंदर चरित्राचे महत्त्व आपण नेहमी लक्षात धरावे.

राजशासन

राजशासन

प्रार्थनासमाजासंबंधी कित्येक समंजस लोकांचा असा एक आक्षेप येतो की, प्रार्थनासमाज हा ईश्वराचा अवतार मानीत नाही. जुन्या धर्माच्या कित्येक समजुती प्रार्थनासमाजाने सोडलेल्या आहेत, त्या असोत. पण ईश्वराचा अवतार मुळी न मानण्यामध्ये प्रार्थना समाज सर्वसाधारण धार्मिक भावनेचे एक मुख्य अंगच मानीत नाही आणि त्यामुळे समाजात प्रवेश करण्यास मोठी खरोखर अडचण येते अशी ह्या आक्षेपकाची तक्रार असते. विचार करून पाहिले असता ह्या तक्रारीस जागा नाही. अवतारवादास प्रार्थनासमाजानेच काय, किंबहुना आधुनिक उदारधर्माभिमान्यांपैकी कोणीही अजीबात फाटा दिला आहे असे मुळीच आढळून येणार नाही. परमेश्वर सावयवरूपाने अवतार घेत नाही, एवढेच प्रार्थनासमाजाचे म्हणणे आहे. येशूख्रिस्त किंवा राम, कृष्ण इत्यादी ऐतिहासिक किंवा पौराणिक व्यक्ती तेवढ्याच ईश्वराचे अवतार अशी आकुंचित कल्पना उदारधर्मवाद्यांस पटत नाही, परंतु अदृश्यरूपाने सर्व विश्व व्यापून रहाणारा परमात्मा हळूहळू विश्वामध्ये आपले सात्विक मंगलमय आणि शक्तिशाली स्वरूप उघड करीत आहे, असा अनुभव उदारधर्मवाद्यांसही येत आहे. आणि ह्या दृष्टीने अवतारवादाचे अधिक विस्तृत, पूर्ण आणि साधे स्वरूप त्यांना मान्य आहे असे समंजस लोकांस सहज दिसून येईल.

धर्म आणि नीतिशिक्षणाच्या संबंधाने हल्ली जी विशेष चर्चा चोहींकडे चालू आहे तिला अनुलक्षून मागे पाच सात खेपेला विनययोग आणि शासनयोग ह्या मथळ्याखाली आम्ही ह्या पीठावरून जी विवेचनमालिका गुंफिली तिचाही रोख ह्या वरील विस्तृत अवतारवादाचे पर्यायाने उद्घाटन करण्याचाच होता. पितृशासनाविषयी विचार करीत असताना आपण पाहिले की, आपल्या पोटी उत्पन्न झालेल्या मांसाच्या गोळ्याचे माता चारपाच वर्षांची त्याची कुमारदशा संपेतोपर्यंत शारीरिक संरक्षण करते आणि पिता दहा पंधरा वर्षांची त्याची किशोरदशा संपेपर्यंत त्याची मानसिक जोपासना करून त्याची पुढील वाढ त्याच्या गुरूकडे सोपवितो. गुरूगृही त्याच्या बुद्धीची वाढ होऊन पंचवीस-तीस वर्षांचा प्रौढ पुरूष होऊन संसार भूमिकेवर प्रवेश करतो. अशा रीतीने क्रमाक्रमाने व्यक्तीच्या स्वत्वाची वाढ होते. जड सृष्टीतून सजीवसृष्टी, सजीव सृष्टीतून ज्ञानवान मनुष्ययोनी, आणि त्या योनीतील वरील क्रमाने प्रौढ दशेप्रत प्राप्त झालेल्या व्यक्ती अशी ही सृष्टीची हळूहळू सततची उत्क्रांती चाललेली आहे. ज्यास प्राचीन धर्मतत्त्वज्ञानामध्ये अवतारवाद असे नाव होते त्यास आधुनिक वाड्मयामध्ये विकासवाद हे नाव हळूहळू येत चालले आहे. विकास म्हणजे पूर्वी जी वस्तूंची साधी घटना असते ती उत्तरोत्तर अधिकाधिक संकिलत होत जाणे एवढाच अर्थ नव्हे, तर त्या घटनेमध्ये पूर्वी अदृश्य असलेले सूक्ष्म पण कार्यकारी असे काही एक नवीन तत्त्व उघडकीस येत असते, अशी आधुनिक विकासवाद्याची समज पडत चाललेली आहे आणि तेणेकरून प्राचीन अवतारवादाला जशी अधिकाधिक विशदता येत आहे, तशीच आधुनिक विकासवादाला अधिकाधिक भरीवता येत चाललेली आहे. किंबहुना अवतारवाद आणि विकासवाद ह्यांची तोंडमिळवणीच होत चाललेली आहे. “यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूजिंतमेव वा| तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोशसंभवम्||” हे श्रीकृष्णाचे म्हणणे जितके अवतारवादाचे द्योतक आहे, तितकेच विकासवादाचेही आहे.

असो. ह्याप्रमाणे विश्वविकासाची मजल मनुष्ययोनीतील प्रौढव्यक्तीपर्यंत आल्यावर ह्यापुढे दुसरीच महत्त्वाची एक मजल सुरू होते. व्यक्तीच्या स्वत्वाची पूर्ण वाढ झाल्यावर ह्या प्रौढ व्यक्तीच्या लहान मोठ्या घटना बनून ह्यापुढे समाजाच्या अथवा राष्ट्राच्या स्वत्वाची वाढ सुरू होते. म्हणजे जीवनशास्त्र आणि मानसशास्त्र ह्यानंतर समाजशास्त्राच्या विषयास आरंभ होतो. नुकतेच हिंदुस्थानातून प्रवास करून गेलेले मि. रामसे मॅकडोनल्ड यांनी राजसंस्थेची व्याख्या खालील दोन साध्या वाक्यांनी केलेली आहे.

“The State is the organised political personality of a Sovereign people-the organisation of a Community for making its common will efficient by political methods.”

राजसंस्था म्हणजे स्वतंत्र राष्ट्राचे संघटित स्वत्व अथवा जिच्याद्वारे राजकीय पद्धतीने एकाद्या राष्ट्राची सामान्य इच्छा अथवा हेतू परिपूर्ण करिता येईल अशी त्या राष्ट्राची घटना ही होय. ह्यावरून व्यक्तीची वाढ होण्याला ज्याप्रकारे पितृशासनाची आणि गुरूशासनाची जरूरी आहे, त्याचप्रकारे राष्ट्राचे स्वत्व संपादण्याला राजशासनाची जरूरी आहे, मग तो राजा एकमुखी असो, बहुमुखी असो किंवा सर्वांचे हितसंबंध राखणारी प्रतिनिधींची सभा असो, त्याचे शासन हे एकच आणि त्याची जरूरी ही सारखीच आहे.

आता ह्या ठिकाणी हेही ध्यानात ठेविले पाहिजे की, व्यक्तीच्या स्वत्वाची वाढ पूर्ण झाल्यावर मग राष्ट्राच्या स्वत्वाच्या वाढीला सुरवात होते, अशातला मुळीच प्रकार नाही. म्हणजे पितृशासन आणि राजशासन ह्या गोष्टी एका व्यक्तीच्या बाबतीत जरी एका मागून एक अशा येतात, तरी सर्व राष्ट्राच्या दृष्टीने पहाता त्या तिन्ही एकाच काळी चालल्या असतात. इतर पसुजातीहून मनुष्यजातीचा अधिक विकास होऊन तिची राहणी अधिक उन्नत पायावर सुरू झाल्या काळापासून ह्या तिन्ही शासनांची अंमलबजावणी समकालीनच होत आली आहे. किंबहुना व्यक्तीचे स्वत्व (personality) आणि राष्ट्राचे स्वत्व ह्या दोहोंची वाढ अगदी एकमेकांपासून अलग राहून होणेच मुळी अशक्य आहे. प्रस्तुत पुढारी व्यक्तींच्या प्रौढपणावर जसा राष्ट्राचा प्रौढपणा अलंबून आहे तसाच राष्ट्राच्या प्रस्तुत प्रौढपणावर भावी व्यक्तींचा प्रौढपणाही अवलंबून हे. गुरूकुलातून किंवा युनिव्हर्सिटीतून तरूण शिष्य पदव्या मिळवून बाहेर पडतात, आणि मग ते राष्ट्रीय भूमिकेवर देशकार्यासाठी सज्ज होऊन उभे राहिल्यावर त्यांच्या निरनिराळ्या कमीअधिक तेजस्वी स्वत्वाच्या अंशाचे संकलन होऊन त्यातून राष्ट्राचे स्वत्व किंवा राष्ट्रभूती निर्माण होते. म्हणजे थोर थोर राजे, सम्राट मुत्सद्दी, योद्धे आणि वकील ह्यांच्या व्यक्तिविषयक स्वत्वाचा सुसंस्कार सर्व जनतेच्या शीलावर व आचारविचारांवर घडून त्यांचे स्वत्व बनू लागते. ह्या थोर पुरूषांच्या शासनछत्राखाली पितृशासन आणि गुरूशासनाच्या संस्था सुयंत्रितपणाने चालू राहून त्या हळूहळू सुविकसित होत जातात. परंतु उलटपक्षी हेही खरे आहेकी शासित जनतेच्या गुणदोषाचा संस्कार शास्त्यांच्या मनावरही घडतो. शासनशकट चालवीत असता मार्गात त्यांना यशापयश, आशानिराशा, उल्हास आणि उद्वेग इ. भिन्नभिन्न जे अनुभव येतात, त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या स्वत्वाला अधिक भरीवपणा येत जातो. पितृगृही आणि गुरूगृही शिकत असताना जे अनुभव केवळ पर्यायाने आणि आदर्शरूपाने घडत होते, ते आता प्रत्यक्षपणे आणि वस्तुरूपाने घडू लागल्यामुळे ह्या थोर शास्त्याच्या स्वत्वाला केवळ अधिक भरीवपणा येतो इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष जगताशी झगडत असता जे अश्रुतपूर्व व अकल्पित अनुभव येतात त्यामुळे त्यांच्या स्वत्वास नवीनपणाही येतो आणि पुनरपि शास्त्यांच्या ह्या नवीन आणि भरीव स्वत्वाचा सुसंस्कार शासित जनतेवर घडून त्यांच्याही मनाची वाढ होऊ लागते. असा हा परस्पर गुंतागुंतीचा सुंदर संबंध आहे. आणि ह्या मानाने शासनक्रियेची जबाबदारी प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधिरूपाने जनतेतील अधिकाधिक व्यक्तींवर पडत जाते. त्या मानाने वरील गुंतागुंतीचा व्याप आणि सौंदर्य ही अधिकाधिक वाढत जातात.  

असो. ‘शासनाचे,’ हे सर्वही प्रकार केवळ प्रगतीच्या साधनीभूत पाय-या आहेत, ह्या सर्वांचे अंतिम साध्य व्यक्तीचे स्वत्व आणि तद्वारा राष्ट्राचे व मनुष्यजातीचे स्वत्व आणि पुन: त्याच्या द्वारा व्यक्तीचे स्वत्व ह्यांची परंपरित वाढ होणे हेच आहे. अशी एक म्हण आहे की मुलगा १६ वर्षांचा झाला की, त्याच्या बापाचा जोडा त्याच्या पायाला येतो. हिचा अर्थ इतकाच की १६ वर्षांनी बापाचे मुलावरचे राज्य संपून त्याच्या तो बरोबरीचा होतो. दुसरे असेही एक वचन आहे की, ‘शिष्यादिच्छेत् पराजयम्’ म्हणजे गुरूपासून विद्या शिकून चेला गुरूहूनही सवाई शहाणा झाला आणि त्याकडून गुरूचा पराजय झाला, तर उलट गुरूच्या शासनाचे सार्थक झाले, किंबहुना त्याचा दिग्विजयच झाला म्हणावयाचा. हाच न्याय राजशासनाचाही आहे. प्रत्येक व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य मिळावे व ती पूर्ण स्वत्ववान बनावी हाच हेतू राजशासनाचा आहे व त्याचा परिणामही  असाच होत आला आहे, हे इतिहास सांगेल. राशासनाच्या तालमीतून गेल्याशिवाय व्यक्तीची पूर्ण वाढ होणे शक्य नाही. ज्या व्यक्ती किंवा जाती जंगलातून स्वैर भटकत असतात त्यांच्या अंगी परिस्थितीशी झुंजण्याचे सामर्थ्य आलेले नसते. पण त्याच व्यक्ती आणि जाती संपादन करितात त्यांना अखेरीस परिस्थितीवर जय मिळतो, इतकेच नव्हे तर पुढे शासनाचीही जरूरी राहत नाही. पोलीस आणि लष्कर ही राजसंस्थांची काय ती दोनच खाती राहावीत, बाकीची सर्व खाती लोकांनी आपली आपणच स्थानिक पद्धतीने संभाळावीत असे प्रसिद्ध समाजशास्त्रवादी स्पेन्सर ह्यांनी प्रतिपादले आहे. तुलनात्मक समाजशास्त्राचे नीट परिशीलन केल्यास दिसून येईल की, एकछत्री राजसंस्थाची घटना काही मोठमोठ्या प्रमाणावर होत जाऊन अवाढव्य बादशाह्या अस्तित्वात आल्या. त्यांच्या योगाने व्यक्तीच्या स्वत्वाला त्या त्या काळी मदत झाली. पण ही वाढ पुढ खुंटून राजसंस्थेच लहान लहान मंडळे आणि त्यांची संयुक्त मंडळे बनणे अधिक इष्ट झाले हे हल्लीच्या अमेरिकेतील संयुक्त संस्थानांच्या इतिहासावरून उघड होईल. म्युनिसिपालिट्या व लोकलबोर्ड इ. स्थानिक स्वराज्याच्या विस्ताराच्या बाबतीत मोठमोठ्या अजस्त्र शहरांवर व प्रांतांवर एकाच मंडळीचे अवजड छत्र चालू ठेवून पुष्कळ प्रतिनिधींना निवडण्याच्या धांदलीत काळाचा व शक्तीचा उगीच व्यय करण्यापेक्षा आळीआळीने स्वतंत्र म्युनिसिपालिट्यांची स्थापना करणे हेच पुढे बहुतकरून अधिक सोयीचे आणि प्रगतीला शोभणारे होणार आहे. एकंदरीत ह्या दृष्टीने विचार करिता दिसून येते की व्यक्ती आणि सर्व मनुष्यजात राजशासनाच्याही पायरीवर चढत जाऊन पूर्णत्व पावणार आहे. ज्या पूर्णावस्थेच्या काळाची प्रतीक्षा आधुनिक द्रष्टे करीत आहेत आणि ज्या मोक्षपदाची अथवा स्वराज्याची (Kingdom of God) प्राचीनद्रष्ट्यांनी आकांक्षा केली त्या सर्वांचा अर्थ हेच स्वत्व होय. आणि ह्या स्वत्वाचे सर्वत्र प्रकट होणे म्हणजेच परमेश्वराचा पूर्णावतार होणे हे होय. बाकी सर्व –“विभूत”मत्सत्वम्" – अंशावतारच समजावेत; ते नुसते “मम तेजोशसंभवम्” असतात.

येणे प्रकारे जो विराट पुरूष अनादिकालापूर्वी अदृश्य होता तो अनंतकालापुढे दिसू लागणार आहे. अदृश्यातून जड, त्यातून चेतनामय व्यक्ती, त्याचे प्रौढ समाज ह्याप्रकारे सर्व सत्वांची उन्नती असे होत होत हल्ली घोरत पडलेला सर्व मृत्युलोक पुढे जिवंत आणि जागा होणार! त्या विश्व-जागृतीची कल्पना कोण करू शकेल! तिला काळाचे माप लागू पडत नाही म्हणूनच ब्राम्ही धर्माने अनंतकाळची उन्नती मानली आहे.

||ओम् शांति:शांति:शांति:||

रा. गो. भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने

मधाबद्दल फुलाचे अधिक आभार मानावेत की मधमाशीचे, हे सांगणे एकवेळ सोपे जाईल, पण वरील सद्ग्रंथाचे उत्पादक व संपादक ह्यांच्याविषयी वाचकांची जी उपकृतबुद्धी होणार आहे तिचा निर्णय करणे मुळीच सोपे नाही. फुलातील मधुर द्रव्याची साठवणी केल्याशिवाय त्यास मुळी मधपणाच येत नाही हे जसे खरे आहे तसेच फुलावर लुब्ध होणे हा जो मधमाशीचा आद्यगुण तो तर फुलाशिवाय मुळीच शक्य नाही हेही खरे आहे. प्रस्तुत उत्पादकांनी स्वतः पहिल्या आवृत्तीच्या निवेदनपत्रिकेतच जरी म्हटले आहे, “ह्याविषयी सर्व श्रेय माझे मित्र रा. रा. द्वा. गो. वैद्य ह्यांचेकडे आहे” तरी ह्या पुस्तकाचे श्रेय कोणाकडे आहे, हे ठरविण्याची कठीणता कमी होत नाही. कारण यद्यपि रा. वैद्यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यात, सर्व तरुणांनी उदाहरण घेण्यासारखा उद्योग आणि उत्साह दाखविला आहे तरी दुसरेपक्षी ज्या गुणांमुळे ते ह्या परमपूज्य गुरुवर्यांचे अनन्य अनुगामी झाले आहेत ते लक्षात आणता त्यांना मिळालेल्या प्रस्तुत श्रेयाचे मूळस्थान पुनः गुरुवर्यच होतात.

आमचे मराठी वाङ्मय अद्यापि कंगाल स्थितीतच आहे, हे कोणी कितीही स्वाभिमानी असला तरी त्याला कबूल करावे लागेल. तशात धर्मपर पुस्तकांची—विशेषतः आधुनिक संस्कृतीला साजेल अशा ग्रंथांची—तर मोठीच उणीव आहे, इतकेच नव्हे तर अशा वाचनाची अद्यापि अभिरुचीदेखील आमच्या वाचकवर्गात उत्पन्न झाली आहे किंवा नाही ह्याबद्दल आजपर्यंत जबर शंकाच वाटत होती. पण थोड्याच काळात रा. वैद्यांना ह्या पुस्तकाची वाढविलेली दुसरी आवृत्ती काढण्याचा प्रसंग आला—नव्हे त्यांनी आणिला ह्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच.

प्रस्तुत पुस्तकाचे ‘धर्मपर लेख’, ‘व्याख्याने’ आणि ‘चरित्र’ असे तीन भाग होतात. पहिल्या म्हणजे लेखांच्या भागाचा काळ म्हणजे प्रार्थनासमाजाच्या जवळजवळ आरंभाचा काळ (१७७८-८२) होता. म्हणून अर्थातच हा (फूट नोट – सुबोध पत्रिका, १२-२-१९११) वादविवादात्मक झाला आहे. डॉ. भांडारकर समाजाचे सभासद होण्यापूर्वी समाजाच्या तत्त्वांची मांडणी व शब्दरचना जी कठोर आणि अपूर्ण होती तिला डॉक्टर साहेबांनी हल्लीचे सौम्य व पूर्ण स्वरूप दिले, इतकेच नव्हे, तर त्यांचा मराठी जाणणा-यांमध्ये अधिक विस्ताराने प्रसार केला. तो ज्या लेखांच्या द्वारे केला त्यांची ही मालिका होय. पूर्वीप्रमाणे हल्ली जरी समाजमताला बाहेरून उघडउघड विरोध येत नाही तरी ह्या भागाची उपयुक्तता कमी झाली आहे असे नाही. कारण समाजमतांची तपशीलवार माहिती करून घेऊ इच्छिणारांना ह्या भागापासून विशेष फायदा होण्यासारखा आहे, इतकेच नव्हे तर स्वतः गुरुवर्यांनीच सावधगिरीची सूचना केल्याप्रमाणे समाजाच्या निषेधक बाजूची पूर्ण जाणीव कायम ठेवण्यासाठी समाजाच्या सभासदांनाही हा भाग आवश्यक आहे.

पण ज्याला सर नारायणरावांनी “Invigorating tonic to the mind, sanctifying discipline of life” (मनाला हुरूप आणणारी पौष्टिक व जीवित शुद्ध करणारी प्रणाली) असे म्हटले आहे, तो भाग म्हणजे व्याख्यानांचाच होय. पहिल्या भागाप्रमाणे ह्यात तोडीस तोड आणि फेकीस फेक हा प्रकार नसल्यामुळे कित्येकांस हा तितका रुचण्याचा संभव नाही. पण वरवर वाचणा-यांच्या करमणुकीकरिता, किंवा कोटीक्रमाची जुळवाजुळव करणा-या वावदुकाकरिता हा भाग नाही. हा विध्यात्मक व पौष्टिक भाग आहे. धर्मपर व्याख्यानाचा अथवा उपदेशाचा उद्देश प्रतिपक्षाचा पाडाव करण्याचा किंवा एकाद्या सिद्धांताची प्रतिपत्ती करण्याचा नसतो. उपदेश हा ईश्वरोपासनेचा एक भाग आहे. ध्यान, भजन, प्रार्थना इत्यादीच्या द्वारा चित्त निर्मळ, निर्लेप आणि ग्रहणशील झाल्यावर अभ्यंतरी उमटणारी, ‘अबोलण्या’ ईश्वराकडून मिळालेली ती एक खूण आहे. हा बसल्या बैठकीला भरकन वाचून टाकण्याचा भाग नव्हे. थकल्या भागल्या वेळी एकच उपदेश वाचला की कार्यभाग होणार आहे. हा निराळाच छापून काढला असता तरी बरे झाले असते. तिसरा भाग चरित्राचा. तो ह्या दुस-या आवृत्तीचा एक विशेष असल्यामुळे हिला विशेष मोहकपणा आला आहे. डॉ. भांडारकरांसारख्या मोठ्या माणसांचे चरित्र म्हणजे एक राष्ट्रीय धनच. ते खरे पाहिले असता ह्याहून पुष्कळच मोठ्या प्रमाणावर संपादित झाले पाहिजे, ते योग्य वेळी होईलच. पण तूर्त हाती घेतलेल्या कार्याला अनुरूप असा लेख लिहून रा. वैद्यांनी वाचकाला डॉक्टरसाहेबांचे विस्तृत चरित्र जाणण्याबद्दल जो चटका लावून दिला आहे, तो वाखाणण्यासारख आहे. रानडे आणि भांडारकर ही दोन्ही नावे त्यांच्या प्रतिपक्ष्याच्याही तोंडी मिळूनच असावयाची. आधुनिक महाराष्ट्र मेरूची ही दोन अति उंच शिखरे. एक अनेक संस्था, चळवळी आणि प्रेरणांची बीजे पेरणारा मुत्सद्दी व दुसरा त्या सर्वांची शास्त्रोक्त उपपत्ती स्थापन करणारा मार्गदर्शक, एक प्रवर्तक, व दुसरा पंडित. पण दोघेही एकाच आधुनिक उदार धर्माच्या मंडपात बसून एकाच राष्ट्रयज्ञाची कामे चालविणारे, परस्परसहाय्यक अध्वर्यू. डॉ. भांडारकर हे केवळ शाळेतील व कॉलेजातीलच अध्यापक नाहीत, तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचेही अध्यापक आहेत हे ह्या अल्पशा चरित्रलेखात चांगले दाखविले आहे. विशेषेकरून पहिल्या १७ पानांत त्यांच्या कॉलेजातील अध्यापनाच्या माहितीचा जो साठा केला आहे तसाच पुढील त्यांच्या सुधारण्याच्याही अध्यापनाची माहिती देण्यात आली असती तर बरे झाले असते. पुढील ६० पानांत सामाजिक व धार्मिक मतांची लेखकाने चर्चा केली आहे, ती बहुतेक माहीत असलेली व पुढील भागात आलेलीच आहे. ह्यापेक्षा ह्या मतांच्या प्रसारार्थ डॉक्टरसाहेबांनी व त्यांच्या साथीदारांनी काय काय प्रयत्न केले व त्या कामी त्यांचेवर काय काय प्रसंग गुदरले ह्याचे अधिक दिग्दर्शन ह्याहून थोड्या पानांत केले असते तरी जास्त फायदेशीर झाले असते. अशा गोष्टी डॉक्टरसाहेबांच्या चरित्रात पुष्कळ मिळण्याचा संभव आहे व त्यांपैकी संमतिवयाचे बिल, त्यांच्या कन्येचा पुनर्विवाह वगैरे काही रा. वैद्यांनी दिल्याही आहेत. पण ज्या थोड्या कालावधीत आपला नित्याचा उद्योग सांभाळून ही दुसरी आवृत्ती इतक्या सुंदर रूपाने छापून काढिली तो विचार मनात घेता रा. वैद्यांनी केली आहे हीच कामगिरी मोठी भूषणावह आहे ह्यात संशय नाही. पण ह्याहून विस्तृत चरित्र डॉ. भांडारकरांच्या नावाल शोभण्यासारखे कालानुसार प्रसिद्ध करण्याचे धाडस व पात्रता रा. वैद्यांच्याच अंगी आहे असेही म्हटल्यावाचून राहवत नाही.

  1. युनिटेरियन समाज
  2. यश परिणामात नसून प्रयत्नात आहे
  3. मोफत व सक्तीचे शिक्षण नको!!
  4. १९ मार्च १९३३- ७१ वा वाढदिवस
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
Page 12 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी