1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज

(रविवार ता. २२-१-११ रोजीं केलेल्या उपदेशाचा सारांश.)
एकादा धाडसी पुरूष फार दूरच्या प्रवासास निघाला असता त्याच्या मनाची दोन प्रकारची स्थिती होते. एका बाजूने घरदार, बायकामुले, शेतीभाती ह्यांकडे ओढा लागतो. आजपर्यंत मिळविलेला लौकिक आणि केलेली लोकसेवा ह्यांत त्याचे मन गुंतते. दुस-या बाजूस ज्या दूरच्या प्रदेशी त्याला जावयाचे असते तेथील अनुभव, सुखे आणि कर्तव्ये, तेथील नवीन संपादणी ह्यांच्याकडे त्याचे मन ओढ घेते. ज्या ज्या मनाने त्याचा प्रवास अधिक लांबीचा आणि मार्गात अधिक विघ्ने असतील त्या त्या मानाने त्याच्या मनाची ही द्विधा वृत्ती अधिकाधिक जोरावते. व्यक्तीची ही जशी स्थिती होते, तशीच नवीन सुधारणेच्या मार्गाने जाण्यास निघालेल्या एकाद्या जुन्या जागृत राष्ट्राची स्थिती होते. आपले भूतकालचे वैभव, पुराण ग्रंथ, प्राचीन पुरूष, धर्मशास्त्रे आणि वाडम्य इत्यादिकांकडे त्या राष्ट्राचे लक्ष लागते. सुधारणेच्या मागे लागून स्थित्यंतर करण्यापूर्वी आपल्या प्राचीन संपादणीतून काही तरी निष्पन्न होणार नाही काय? ह्याच आशेने ते एका बाजूने त्यातच घोटाळ रहाते.
दुस-यापक्षी ह्या सर्व जाळ्यातून आपला पाय काढून घेऊन त्याच्या भोवती नवीन विचार, नवीन विश्वास, ताजी आशा आणि ताजा दम ह्यांचे जे वातावरण पसरलेले असते, त्यातून दूरवर दिसणा-या नवीन ध्येयाकडे ते धाव घेते. व्यक्तीच्या बाबतीत एकाच मनाची द्विधा वृत्ती होते, पण राष्ट्रात निरनिराळे पुढारी आणि त्यांचे अनुयायी ह्या दोन भिन्न वृत्तींचे द्योतक असतात, इतकेच नव्हे तर पुष्कळ वेळां प्रगतीच्या मार्गाने धावणा-यांचाही पाय वेळोवेळी मगे घेतो आणि पुराणप्रिय लोकही वेळोवेळी पुढे सरसावतात. ह्याप्रमाणे पुढे सरण्याची आणि थांबून रहाण्याची अशा दोन भिन्न भावना एकाच वेळी होतात. ब्राह्मसमाज ही आमच्या राष्ट्राची वर सांगितल्यापैकी पहिली भावना होय. त्या समाजाची स्थापना अथवा ह्या भावनेचा उदय प्रथम बंगाल्यात होऊन आता ८१ वर्षे पूर्ण झाली म्हणून ह्या समाजाचा ८१ वा महोत्सव ठिकठिकाणच्या ब्राह्म अथवा प्रार्थना समाजामध्ये साजरा होत आहे.

ह्याप्रसंगी आमचे राज्य आधुनिक युगाच्या वातावरणात हालत आहे आणि ज्याचे नवीन नवीन संस्कार त्याच्यावर घडत आहेत, त्या आधुनिक युगाची एक दोन लक्षणे काय आहेत ते आपण पाहू, म्हणजे ती लक्षणेच आमच्या ब्राह्मसमाजाची आद्यतत्त्वे होत हे पुन: निराळे सांगण्याची गरज रहाणार नाही. ज्यांना ज्यांना ह्या लक्षणाचा परिचय घडलेला आहे व ज्यांच्यावर त्यांचा संस्कार घडून ते जाणूनबुजून पुढे पाऊल टाकीत आहेत ते सर्व ब्राह्मधर्मानुयायीच म्हणावयाचे. मग त्यांचा संबंध ब्राह्मसमाजाशी जडलेला असो वा नसो. उलटपक्षी जे केवळ सृष्टिक्रमानुसार ब्राह्मसमाजामध्ये जन्मले आहेत आणि केवळ चालीच्या ओघाने त्यांच्यावर यद्यपि समाजाचे सोळाही ‘संस्कार घडले आहेत पण ज्यांना वरील लक्षणांचा परिचय आणि प्रत्यय प्रत्यक्ष घडलेला नाही ते ब्राह्म नव्हेत.’

मानवी इतिहासात जी निरनिराळी युगे झाली आहेत ती काही तरी कालाचे भाग आहेत असे नव्हे. ती प्रत्येक काही विशिष्ट लक्षणान्वित असतात. आधुनिक युगाचे पहिले लक्षण विश्वरूपदर्शन होय. ते अर्जुनाला कृष्णाने कसे दाखविले ह्याचा सुंदर उल्लेख गीतेमध्ये आहे.

अनेकबाहूदरवक्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वताSनंतरूपम् |
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् ||

यावर ज्ञानेश्वरांनी सुंदर मराठी भाष्य केले आहे ते असे :-

हे असों स्वर्गपाताळ | की भूमि दिशा अंतराळ | हे विवक्षा ठेली सकळ | मूर्तिमय देखतसे || तुजवीण एकादियाकडे | परमाणूहि एतुला कोंडे | अवकाश पाहतसे परि न सांपडे | ऐसे व्यापिले त्वां || इथे नानापरी अपरिमिते | जेतुली सांठविली होती महाभूते | तेतुलाही पवाड तुवां अनंते | कोंदला देखतसे || ऐसा कवणेठायाहूनि तूं आलासि | एथ बैसलासी की उभा आहेसी | आणि कवणीये मायेचीये पोटी होतासी | तुझे ठाण केवढे || तुझे रूप वय कैसे | तुज पैलीकडे काय असे | तूं कायिसयावरी आहासि ऐसे | पाहिले मियां || तव देखिले जी अवघेची | तरी आतां तुझा ठाव तूंचि | तूं कवणाचा नव्हेशी ऐसाची | अनादि आयता || तूं उभा ना बैठा | दिधडा ना खुजटा | तुज तळी वरी वैकुंठा | तूंच आहासी || तूं रूपे आपणयांचि ऐसा | देवा तुझी तुंचि वयसा | पाठी पोट परेशा | तुझे तूं गा || तुज महामूर्तिचिया आंगी | उमटलिया पृथक् मूर्ति अनेगी | लेइलासि वाने परीची आंगी | ऐसा आवडतु आहासी || नाना पृथक् मूर्ति तिया द्रुमवल्ली | तुझिया स्वरूपमहाचळी | दिव्यालंकार फुली फळी || सासिन्नलिया || ऐसा पवाड मांडूनि विश्वाचा | तूं कवण पां एथ कोणाचा | हे पाहिलें तव आमुचा | सारथि तोचि तूं || तरि आतां दिठीचा विटाळ गेला | तुवां सहजें दिव्यचक्षू केला | म्हणोनि यथारूपे देखवला महिमा तुझा ||

हे विश्वरूपदर्शन हल्लीच्या काळी आम्हां आधुनिकांना मिळालेले आहे. आधुनिक शास्त्रे ही श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आम्हांस दिलेले दिव्य चक्षू होत.

न तुमां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा |
दिव्य ददामि ते चक्षु: पश्य मे यागमैश्वरम् ||

ह्या दिव्य चक्षूने आम्ही ईश्वरास यथारूप पाहतो, तथापि आमच्या दृष्टीचा विटाळ त्या निराकार तेजाला होत नाही. त्यामुळे आमची त्याच्यावर विशुद्ध श्रद्धा बसते. आमचा बिनमताचा विश्वास “Creedles faith” आहे. म्हणजे मतमतांतराच्या भानगडीत न पडता आम्ही त्याच्या प्रत्यक्ष दर्शनानेच तृप्त होतो. सर्व विश्वाचा विस्तार पाहून तो विश्वेवर आमचा सारथी आहे, आमचा मार्गदर्शक आहे, आमचा संसारशकट त्याचे हाती आहे, असा आमचा विश्वास होतो. कोणत्याही अनुदार आणि एकदेशीय मतामुळे आमचा हा विश्वेश्वरावरील विश्वास आकुंचित होत नाही. ह्या दर्शनामुळे ह्या युगामध्ये ज्ञानाची द्वारे खुली झाली आहेत, त्यावरील प्राचीन मतांचे दडपम उडून गेले आहे. चहूंदिशी वहाणारे ज्ञानाचे प्रवाह आम्हांस त्याचेच स्वरूप दाखवितात, “किंबहुना आता | तुझे तूंचिं आघवे अनंतां | हे पुढत पुढत पाहतां | देखिले मियां ||”

आधुनिक युगाचे दुसरे लक्षण अखंड उल्हास हे होय. बरेच दिवस गोठ्यात बांधलेल्या वासराला बाहेर एकदम उघड्या मैदानात आणले असता त्यास जसा अपूर्व उल्हास होतो आणि ते दशदिशा आनंदाने बागडू लागते, तसे आधुनिक मनुष्यास झाले आहे. आम्ही हवेतून उडू पहातो, लोहमार्ग आणि जलमार्ग ह्यांचीही बंधने आम्हांस नकोशी वाटतात, सर्वांहून प्रिय प्राण ह्याचीही पर्वा न करताना आम्ही अंतराळात हजारो कोस उंच जाऊन प्रवास करू पहातो, पृथ्वीचे कानेकोपरे, अत्यंत शीतल प्रदेशातील तिचे टोक, अत्यंत उष्ण आणि रूक्ष प्रदेशातील तिचा कटिप्रदेश आम्ही शोधून काढीत आहो. तिच्या गर्भात काय आहे, तिच्या भोवताली काय आहे, तिचे घटकावयव काय आहेत, तिचे वय काय, वजन काय, दूरदूरच्या खगोलांचीही वस्तुस्थिती काय, ह्या सर्वांचा शोध आम्ही उल्हासाने करीत आहो. आणि त्यात आमचा नवीन विश्वास, नवीन आशा, आकांक्षा उत्तरोत्तर बळावतच आहेत. नुसत्या अध्ययनातच नव्हे तर खेळ आणि विनोद ह्यांमध्येही आम्हां आधुनिकांचा धाडसी उल्हास दिसून येत आहे. केप कॉलनीपासून कैरो शहरापर्यंत आफ्रिकेच्या निर्जन प्रदेशातून मोटार गाड्यांची लौकरच एक शर्यत होणार आहे असे ऐकतो. सहारासारखी अरण्ये, दाट जंगले, मोठ्या नद्या आणि सरोवरे, ही सर्व उल्लंघून ही शर्यत मारली जाणार आहे! असा हा आधुनिक उल्हास; विश्वरूपदर्शनाचे हे आवश्यक पर्यवसना; ह्यास कोणी आधुनिकांचा जडवाद असे म्हणतात. पण खरे पहात असे म्हणणा-यांचाच हा जडवाद आहे.

तिसरे लक्षण सार्वत्रिक परस्पर सख्य हे होय. अनेक राष्ट्रे, अनेक भाषा, अनेक चाली आणि धर्म ह्यांचा प्रत्यक्ष एकमेकांशी संबंध जडू लागल्यामुळे हल्लीच्या काळी पृथ्वीवर अपूर्व स्नेहसंबंध अनुभवास येऊ लागला आहे. सत्याची सार्वत्रिकता आता जशी सिद्ध होत आहे, तशी पूर्वी कधी झाली नाही. त्यामुळे जातिजातीतील तिरस्काराची भावना आता अगदी संपुष्टात येऊ लागली आहे. कोणी म्हणतील की अद्यापि जातिमत्सर आणि जातिद्वेष पृथ्वीवर वाढत आहे, आणि ह्यास प्रत्यंतर पहावयाचे असल्यास इंग्लंडात होऊ घातलेली सर्व-जाति परिषद (Race Congress) ही होय. जातिमत्सर नसता तर ही परिषदच करण्याचे कारण नसते. पण आमचे तर ह्याचे उलट असे म्हणणे आहे की, ही परिषद जातिमत्सराचा वेग आता ओसरू लागला आहे हे दाखवीत आहे.

मनुष्यामनुष्यांमधील दुजाभावाचा पूर जो आजपर्यंत भरून वहात होता, त्याला आता ओहोटी लागली, आणि तो लवकर नाही, तरी काही काळाने आटून जाणार. भिन्न भिन्न काळी भिन्न भिन्न लोकांमध्ये सत्याचा, शीलाचा आणि स्नेहाचा आविर्भाव होत आला आहे. ही भावना आता बळावून सर्व धर्मामध्ये परस्पर सख्य जडत चालले आहे. युरोप, अमेरिका ह्या ठिकाणी आजपर्यंत उदार धर्माची माणसे आणि संस्था जे परधर्मातील सत्यशोधनाचे काम करीत होत्या ते आता गेल्या वर्षी एडिंबरो आणि ह्या वर्षी अलाहाबाद येथे भरलेल्या जुन्या ख्रिस्ती आणि हिंदुधर्माच्या परिषदेने चालविलेले आहे. हे आधुनिक युगाचे विशिष्ट लक्षण आणि अपूर्व महिमा होय.

ह्याप्रमाणे विश्वरूपदर्शन आणि तज्जन्य अकलुषित विश्वास, अखंडित उल्हास आणि सार्वत्रिक स्नेह ही आधुनिक युगाची तीन लक्षणे, हीच आमच्या ब्राह्मसमाजाची तीन आद्य तत्त्वे होत. आमच्या राष्ट्रात ब्राह्मसमाजाशिवाय इतरही समाज, राष्ट्रहिताची कामे करीत आहेत. आर्यसमाजाचा देशाभिमान, थिऑसाफीची सूक्ष्म विद्या, आणि रामकृष्ण मिशनचे वैराग्य ह्या निरनिराळ्या तत्त्वांच्या द्वारे आमचे हित होणार नाही असे आमचे म्हणणे नाही, पण ही तीन लक्षणे मागील निरनिराळ्या युगांची आहेत. सर्वात्मक भाव, सुस्पष्ट दर्शन आणि वृत्तीचा उल्हास ही आधुनिक युगाची लक्षणे आमच्या राष्ट्रास प्रगतीच्या मार्गाने पुढे ओढीत आहेत, आणि ही प्रगतीची भावना म्हणजे ब्राह्मधर्म होय.

आत्म्याची वसति

(ता. २३-९-१२ रोजीं मुंबई येथील प्रार्थना समाजाच्या वार्षिकोत्सवामध्यें झालेलें व्याख्यान.)

विश्रांतीची शांति तुझे पायाविण |
न होयचि जाण नारायण ||
कोटी कल्पवरी उपाय साधने |
केलियाही तेणे सुख नोहे ||
सुखाचे जे सुख अखंड अपार |
जेथे मुनीश्वर रमताती ||
तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना |
दावी हो चिद्धना पाउले ती ||

गेल्या वर्षाच्या उत्सवामध्यें आत्म्याची यात्रा ह्या विषयाचें विवेचन केलें. त्यावेळीं कामना आणि कर्तव्यबुद्धी हे जे आत्म्याचे दोन पुरूषार्थ त्यांचे स्वरूप काय आहे हे सांगितले, आणि ते साधीत असताना आत्म्याला श्रम होत असतात, त्या श्रमातून विश्रांती कोठे मिळेल ह्याचाही शेवटी उल्लेख केला. आत्मा हा असा कायमचा यात्रेकरू आहे, ह्याला श्रमाशिवाय दुसरी अवस्थाच नाही हे खरे असे तर मोठी कठीण स्थिती होईल. आम्ही ब्राह्म आत्म्याची जी अनंत उन्नती मानतो तिचा अर्थ असा नव्हे की आत्म्याची निरंतर परिश्रमाचीच अवस्था आहे. तसे नसता ह्याला मधूनमधून विसाव्याचेही स्थान आहे. श्रम आणि विश्रांती अथवा यात्रा आणि वसती, किंबहुना बंधन आणि मोक्ष ह्यासंबंधीच्या इतरांहून आमच्या कल्पनेचा निराळेपणा इतकाच की, इतर ह्या अवस्था एकामागून एक येतात असे मानतात, म्हणजे आत्मा काही काळ बद्ध राहून पुढे कायमचाच मुक्त होतो, एक जन्म असो किंवा ८४ लक्ष योनी असोत, ती यात्रा संपल्यानंतर तो कायमच्या वसतिस्थानाप्रत जातो, अशी इतरांची समजूत आहे. आम्हांस असे वाटते की पुरूषार्थाचे श्रम आणि ‘विश्रांतीची शांती’ ह्या आमच्या अवस्था आलटून पालटून पुन: पुन: होतात व येणेप्रमाणे आत्म्याची उन्नती अनंतकाळ चालू असते.

आता आपण आत्म्याच्या वसतीविषयी विशेष विचार करू या. व्यवहारातील आमचा अनुभव असा आहे की घराबाहेर पडल्याबरोबर आम्हांला नुसते शारीरिकच नव्हे तर मानसिक श्रम आणि चिंता उत्पन्न होतात. जंगलात गेलो तर पायात काटे बोचतील काय? वन्य पशू आपणांस खातील काय? अशी भीती असते. शहरात फिरावयास गेलो तर आपला पेहराव नीटनेटका आहे की नाही, चालीरीती आणि सभ्यतेचे नियम आपणांकडून पाळले जातात की नाही ह्याची चिंता असते. सभेत बसून बोलत असलो तरी आपली भाषा शुद्ध आहे की नाही, तिचे प्रघात योग्य आहेत की नाहीत, हे वेळोवेळी पहावे लागते. मनातील भाव गैरसमज न होता दुस-यास कळावे म्हणून अनेक वेळां केवळ औपचारिक रीतीने आम्हांस माफी मागावी लागते, सभेचे आभार मानावे लागतात. एकूण ह्या प्रकारे नेहमी चिंता आणि श्रम होत असतात. पण तेच आम्ही आपल्या वसतिस्थानी म्हणजे घरी बसलो असताना आम्हांला अगदी मोकळे वाटते, घरी कसेही असलो, कसेही बसलो, हसलो की रूसलो ह्याची काही काळजी घ्यावी लागत नाही. हा ऐहिक जीवनातल्या वसतिस्थानाचा महिमा.

आता आमच्या आध्यात्मिक जीवनातही अशा वसतिस्थानाची गरज भासते. शरीराला जसे आमचे घर, तसेच आमच्या आत्मारूपी पक्ष्याला कोठेतरी घरटे आहे काय की, ज्यात तो मधूनमधून विराम पावेल? आत्म्याच्या अनंत उन्नतीचा असा अर्थ समजावा काय की त्याने नेहमी अंतराळामध्ये फडफडतच रहावे? केवळ नीतीच्या जगामध्ये हे घरटे नाही. नीती म्हणजे निरनिराळ्या आदर्शांच्या मागे लागून आम्ही करतो ते प्रयत्न. ते श्रमाचेच जग. नीतीच्या पलीकडे हे घरटे कोठेतरी असावयास पाहिजे. केवळ नीतीने म्हणजे शुभ प्रयत्नाने मानाची आणि आत्म्याची भूक भागत नाही, निदान ‘विश्रांतीची शांती’ तरी मिळत नाही. ह्या शांतीचे एकच स्थळ आहे. जसे आपल्या शरीरामध्ये जीवचैतन्य, त्याप्रमाणे सर्व विश्वामध्ये विश्वचैतन्य नांदत असून जीवचैतन्य अल्प प्रमाणावर जसे शुभ प्रयत्न करीत आहे त्याप्रमाणेच ते विश्वचैतन्यही अवीट अमर्याद प्रमाणांनी शुभ प्रयत्न करीत आहे, ह्या गोष्टीचा अनुभव आणि साक्षात्कार हेच जीवाच्या विश्रांतीचे व शांतीचे स्थळ होय. हीच आमच्या आत्म्याची वसती. हे स्थान नीतिजगाच्या पलीकडचे आहे, नीतिजगाशिवाय त्याजकडे जाण्याला मार्ग नाही हे खरे. नीती ही ह्या शांतीची शिडी आहे, पण नीती ही स्वत:च शांती नाही. नुसते ज्ञान, नुसता भक्तीचा मनोविका, तो कितीही शुद्ध आणि उज्ज्वल असो ह्या दोनच पाय-या ओलांडून ही वसती प्राप्त होत नाही, तर नीतीची कठीण पायरीही ओलांडली पाहिजे. आणि ती नुसती नीतीच आपल्याला पुरे असे म्हणूनही चालत नाही.

जीवचैतन्याचा दुसरा एक असा अनुभव आहे की ह्याच्यावर दोन इतरांनी नेहमी ताण पडलेला भासतो. एक बाहेरून शासनाचे दडपण आणि दुसरे अंत:करणातून प्रेरणेचे प्रोत्साहन. कुटुंबसंस्था, राजसंस्था, समाजसंस्था, धर्मसंस्था ह्या सर्व संस्थांचे आपणांवर नेहमी दडपण असते. हे दडपण नेहमीच अहितकारक असते असे नाही. ह्यामुळेच आपली उन्नती होत असते हे खरे. तथापि त्यांचे दडपण आपल्याला भासत आहे हे खोटे नव्हे. ह्याच्या उलट आपल्या अंत:करणामध्ये अशी एक प्रवृत्ती आहे की आपण ह्या सर्व दडपणांतून आपल्या ध्येयाकडे वाट काढावी. बाहेरचे दडपण आणि आतील प्रोत्साहन ह्या दोन शक्तींचा अनुभव जसा जीवचैतन्यास येतो ही गोष्ट एकदा का आपल्यास पटली म्हणजे आमच्या विश्रांतीच्या शांतीला दुजोराच येतो आणि जीवचैतन्य आणि विश्वचैतन्य  ह्यांमध्ये अनुपम सख्य अनुभविले जाते. मग गेल्या व्याख्यानात सांगितल्याप्रमाणे:

तो हरि सांपडला सांपडला |
मोठा लाभ जाहला ||
ज्यातें स्मरतां मीपण जाय |
आत्मा प्राण विसावा माय ||

ह्या वचनांतील आप्तपुरुष आपणांला भेटून आपणांस घरच्यासारखी शांति मिळते.

पण आतां असा प्रश्न उद्भवतो की वर सांगितलेले जीवाचे जे लक्षण यत्नशीलता त्या लक्षणानें युक्त अशी विश्वामध्ये एकादी शक्ती आहे किंवा नाही? मनुष्यजातीपुढे असलेल्या तत्त्वज्ञानाच्या पुरातन प्रश्नांपैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणून तत्त्वज्ञानाची आज कोठवर मजल येऊन पोहोचली आहे त्याचे निरीक्षण करू. हा विचार करीत असताना पाश्चात्य तत्त्वज्ञान, पौरस्त्य तत्त्वज्ञान, प्राचीन तत्त्वज्ञान, अर्वाचीन तत्त्वज्ञान अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाच्या भेदाकडे फारसे लक्ष पुरवू नये. एकंदरीत स्थूलमानाने मनुष्याची विचारसरणी कशी वाहत आली आहे हे ध्यानात घेऊन आज काय ह्या बाबतीत विशेष शोध झाला आहे हे पहाणे प्रस्तुत प्रसंगी युक्त होणार आहे.

पौरस्त्य देशात उपनिषदे, षड्दर्शने आणि बुद्ध ह्यांच्या काळई आणि पाश्चात्य देशात सॉक्रेटिस व प्लेटो ह्यांच्या काळई मानवी तत्त्वज्ञानामध्ये जो नवीनपणा होता तो पुढील मध्ययुगामध्ये राहिला नाही. सृष्टीचे प्रत्यक्ष ज्ञान करून घेऊन वर निर्दिष्ट केलेल्या काळातील ऋषींनी आपली तत्त्वमीमांसेची इमारत रचली आणि पुढे त्याच पायावर सृष्टीशी प्रत्यक्ष संबंध न ठेवता आणि तिच्याशी नवीन परिचय करून न घेता पुढील तत्त्ववेत्त्यांनी स्वकपोलकल्पित तर्कवितर्काच्या जोरावरच मीमांसा केली. त्यामुळे त्यांच्या मीमांसेचा परिणाम म्हणण्यासारखा काहीच झाला नाही. अलीकडे आधुनिक शास्त्रांचा प्रसार होऊन सृष्टीच्या अनेक नवीन चमत्कारांचा परिचय झाल्यावर तत्त्वमीमांसेला एक नवीनच वळण लागू लागले. प्रथम प्रथम ह्या नवीन वळणाचा परिणाम मनुष्याच्या उपजत श्रद्धाशक्तीच्या उलट होऊ लागला. पण आधुनिक शास्त्रांचा पाया आता बळकट बसल्यामुळे हल्लीच्या मीमांसेला अधिक पूर्ण स्वरूप येऊ लागले आहे. ह्या गोष्टीची साक्ष आज युरोपात नाणावलेल्या तत्त्ववेत्त्यांचे शिरोमणी फ्रान्स येथील बर्घसन आणि जर्मनीतील ऑयकेन ह्यांच्या विचारसरणीत स्पष्ट दिसून येत आहे. कँट, हेगेल ह्यांच्यापेक्षाही ह्या तत्त्ववेत्त्यांच्या विचारसरणीचा आधुनिक शास्त्रीय शोधांशी अधिक निकट संबंध असल्यामुळे ह्यांच्या विचारात कँट, हेगेलपेक्षाही अधिक ताजेपणा दिसून येतो. इतकेच नव्हे तर कँट, स्पेन्सर इत्यादिक निश्चित ज्ञानवाद्यांपेक्षा ह्यांच्या विचारसरणीत अधिक खोलपणाही दिसून येत आहे. त्यामुळे ह्यांच्या विचारांचा परिणाम विचारशील समाजावर जितका आणि जसा होत आहे, तितका आणि तसा आजवर कोणाच्याही विचारसरणीचा झाला नाही. आता स्पेन्सरच्या विचारांचा पगडा सुशिक्षित लोकांवर अद्यापि असलेला क्वचित दिसून येतो हे खरे, तथापि त्याच्या परिणामाचे निराकारण करून शिवाय नवीन परिणाम ज्याअर्थी ह्या आधुनिक तत्त्ववेत्त्यांचे घडत आहेत त्याअर्थी ह्यांचे विचार सर्वांपेक्षा अधिक परिणामकारी आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. ह्या दोन तत्त्वज्ञान्यांपैकी ऑयकेनपेक्षाही वर्गसनच्या विचारांचा प्रसार सुशिक्षित लोकांमधअये अधिकच झपाट्याने होत आहे. म्हणून त्याच्या विचारसरणीतील मुख्य एक दोन मुद्यांचे आज आपल्या विषयाला अनुसरून अवलोकन करू. ती विचारसरणी मुख्यत्वेकरून त्याच्या “Creative Evolution” ह्या पुस्तकामध्य निर्दिष्ट केलेली आहे. जडसृष्टी, वनस्पतिसृष्टी, प्राणिसृष्टी आणि मनुष्यसृष्टी ह्या चार सृष्टींचे खोल आणि मार्मिक निरीक्षण करून बर्गसन ह्याने असा सिद्धांत काढलेला आहे की, विश्वामध्ये पसरलेल्या अनंत प्रकृतीशी काही एक अज्ञात शक्तीची एकसारखी झटापट सुरू आहे. ह्या मूळ शक्तीला त्यांनी आपल्या ग्रंथात “Vital Impulse” असे म्हटले आहे. वनस्पती, प्राणी आणि मनुष्यकोटी हे ह्या शक्तीचे तीन निरनिराळे फाटे आहेत. ज्याप्रमाणे एकाद्या बोगद्यात लावलेला सुरूंग फुटून बाहेर येण्याविषयी वाट शोधीत असतो, आणि दोन तीन ठिकाणी प्रयत्न करून शेवटी एका बाजूने येतो, त्या रीतीने मनुष्यकोटीच्याद्वारा ह्या मूळ शक्तीने प्रकृतीच्या अभेद्य दडपणातून बाहेर वाट काढली आहे. प्रकृतीशी अनंतकाळ झगडत असताना जरी ह्या मूळ शक्तीस मनुष्यकोटीच्याबाबतीत थोडेबहुत यश आले आहे, तरी मनुष्यामध्ये दिसून येणारी जी संवेदना किंवा जाणीव ती खालील कोटीमध्येही अपरिपक्व दशेत बीजरूपाने आहेच. मनुष्याचा मेंदू हा ह्या जाणीवेचे अवयव किंवा अधिष्ठान आहे. म्हणून तेवढ्यावरून मेंदू हीच जाणीव नव्हे. त्यावरून जेथे मेंदू नाही तेथे जाणीव नाही, असे म्हणता येत नाही. पचनक्रियेचे अवयव जे पोट, ते वनस्पतीमध्ये नसते, तरी झाडातून पचनक्रिया चालू असतेच. त्या विशिष्ट अवयवाचे कार्य झाडाच्या सर्व अंगात चालू असते. पचनक्रियेप्रमाणेच अधिक स्थूलदशेत झाडामध्ये जाणीवही असतेच. मात्र तिची वाढ वनस्पतीत खुंटलेली असते. पुढील कोटीत त्या जाणीवेचे दोन फाटे फुटलेले दिसतात. खालील प्राण्यांत उपजतबुद्धी (Instinct) आणि मनुष्यमात्रांत विवेकबुद्धी (Intelligence) अशी हिला निरनिराळी नावे देता येतील. पण उपजतबुद्धी ही जाणीवेची प्रथम पायरी असे जे काही तत्त्ववेत्ते म्हणतात ते बरोबर नाही. ह्या दोन भिन्न भिन्न शाखा आहेत. एक दुसरीची पूर्व तयारी नव्हे. पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांपैकी मनुष्यामध्ये दुसरीला पूर्णता आली आहे तर कणा नसलेल्या मुंग्या आणि माशा म्हणजे (Orthropods) प्राण्यांमध्ये विशेषत: पहिलीचा (Instinct) बराच विकास दृष्टीस पडतो. इंग्लंडात मी एकदा स्वत: एका बाईने एका मोठ्या पेटीत मुंग्यांनी बांधलेल्या शहराचे प्रदर्शन केलेले पाहिले, त्या शहरात घरे, रस्ते, पूल वगैरे ह्या लहान प्राण्यांनी उत्तम प्रकारची रचना केलेली दिसून आली. तशी नागरिक रचना आमच्या कित्येक मोठ्या शहरातील म्युनिसिपालिट्यांचीही दिसून येत नाही. उपजतबुद्धी आणि विवेकबुद्धी ह्यांची भिन्न स्वरूपे आणि भिन्न विकास बर्गसनने आपल्या वरील ग्रंथात वर्णिले आहेत. विशेषेकरून त्यांनी १९११ च्या मे महिन्यात बर्मिगहॅम युनिव्हर्सिटीत जीव (Life) आणि जाणीव (consciousness) ह्या विषयावर जे अत्यंत महत्त्वाचे पण सुबोध असे व्याख्यान दिले आहे व जे “Hibbert Journal” ह्या मासिकाच्या गेल्या अंकात प्रसिद्ध झाले आहे, त्यांत त्यांनी ह्या विषयाचे फार सुंदर स्पष्टीकरण केले आहे. त्यात त्यांनी जाणीवेच्या विकासाला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली आहे. एकदी मोठी नदी पर्वतावरून निघून तिचे निरनिराळे फाटे फुटून जंगालातून, वाळवंटातून वगैरे गडप होतात तरी मुख्य प्रवाह जसा पुढे वाहत जातो, त्याप्रमाणे ही वनस्पती आणि खालील अनेक जीवकोटी ह्यांमधून प्रवास करीत अखेर मनुष्यप्राण्यांमध्येही ब-याच उज्ज्वल रूपाने विकसली आहे. ज्यांना ही विचाराची सरणी पटत असेल त्यांनी बर्गसनच्या ग्रंथांचे लक्षपूर्वक अध्ययन केल्यास मोठा लाभ होईल.

वर सांगितल्याप्रमाणे विश्वचैतन्याचे पर्यवसान केवळ विवेकातच झालेले नाही, तर प्रेम आणि कर्तव्याचाही रूपाने तिचा ह्या मनुष्यकोटीत विकास झालेला दिसत आहे. हिचे अंतिम पर्यवसान कोठे आणि कसे होणार, हिचा मूळ हेतू काय आहे ह्या गोष्टी जरी आपल्या ज्ञानाच्या पलीकडच्या आहेत तरी आजर्यंत हिचे झालेले उत्पादक उत्क्रमण (Creative Evolution) आमच्या डोळ्यांपुढे स्वल्प तरी दिसत आहे. ह्या मूळशक्तीने केलेल्या सर्वच प्रयत्नांत यश आले आहे असे नाही, उलट हिला बहुतेक प्रयत्नांत बर्गसनने म्हटल्याप्रमाणे अपयश आलेले दिसत आहे, तरी हिचा प्रयत्न उत्तरोत्तर जोरावतच आहे. त्याला खंड नाही किंवा तो कायमचा विराम पावण्याचाही संभव दिसत नाही. ह्याप्रकारे आपल्याभोवती विश्वामध्ये आम्हांप्रमाणेच जी एक विराट शक्ती आपले सतत कार्य करीत आहे, तिचे दर्शन झाल्याबरोबर तेच ह्या जीवचैतन्यास विश्रांतीची शांती देण्याला कारण होते. ते दर्शन झाल्याबरोबर नुसती विश्रांतीच मिळते असे नव्हे, तर नवीन प्रयत्न करण्याला हुरूपही येतो. आपल्या मार्गात जे अडथळे येतात किंवा आपल्याभोवती जे दडपण पडते त्यांच्याशी टक्कर देण्याला वरील दिव्य दर्शनाने मिळालेल्या अंत:शांतीमुळे अधिक जोर येतो. आमच्या प्रार्थनासमाजाला ह्याच वरील विश्वचैतन्याचा भरंवसा आहे. तीच आमच्या आत्म्याची वसति.

आत्म्याची यात्रा

(ता. २४-९-११ रोजीं झालेलें व्याख्यान)

हल्लींच्या स्थितींत होत असलेले शोध आणि सुधारणा ह्यांच्या मानाने पाहता आमच्या कायमच्या हितसंबंधाकडे आम्ही आपल्या पूर्वजांपेक्षा कमी लक्ष पुरवीत आहो हे दिसून येत आहे. आमच्या सनातन हिताहितसंबंधी विचार करण्याची जबाबदारी आम्हांपैकी सुशिक्षित वर्गावर विशेषत: असूनही त्यांचे बहुतेक सर्व लक्ष चालू गोष्टीतच गुंतुन जात आहे. आज ना. बसूचे बिल, उद्या गुजराथचा दुष्काळ, ह्या आणि अशा तात्पुरतिक चळवळीतच आमच्या शक्तीचा लय होत आहे. शिवाय जगात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी बातमी पोहोचविण्याची साधने अत्यंत सुलभ झाल्यामुळे तर नित्य नव्या चळवळी आणि नवे प्रश्न ह्यांनी मन व्यग्र होऊन मनाची वरील कामचलाऊ स्थितीच दुणावत आहे. परंतु आमच्या ह्या प्रार्थना समाजसंस्थेचा उद्देश मनुष्याने आपल्या नित्याच्या गरजा सांभाळून कायमच्या हिताकडे आपले लक्ष लावावे हा आहे. म्हणून आपण वरील विषयाविषयी थोडासा विचार करूं.

आत्मा हल्लींप्रमाणें देहांत राहूं लागल्या काळापासूनही त्याचा इतिहास अत्यंत दीर्घ काळाचा आहे हे ह्या देहाच्या विलक्षण रचनेवरूनच दिसून येणार आहे. मग देहातील त्याच्या प्राचीन चरित्राची नुसती कल्पनाही आपणांस करवत नाही म्हणून त्याचा प्रस्तुत विचार करणे नाही. तो अत्यंत प्राचीन यात्रेकरू आहे, एवढेच लक्षात नीटपणे आणून ह्या पुढील त्याच्या यात्रेच्या किंचित भागाचे दिग्दर्शन आज करावयाचे आहे.

आत्मा पुरूषस्थितीला येऊन पोहोचल्यापासून त्याला चार प्रकारचे पुरूषार्थ साधावयाचे असतात, असे आपल्या हिंदुधर्मात सांगितले आहे. ते-अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष. ह्यांपैकी पहिला जो अर्थ हा केवळ साधनीभूत आहे. काम किंवा धर्म ह्या दोन्ही पुरूषार्थाला ह्याची जरूरी असते आणि त्याच्याशिवाय ह्याचा काहीच उपयोग नाही. ह्यावरून अर्थ हा एक निराळा पुरूषार्थ आहे असे विशेष विभागदृष्ट्या म्हणता येत नाही. ना काम ना धर्म; केवळ अर्थच साठविणारे असे काही अभागी आणि अधन्य पुरूष आढळून येतात, ते केवळ अपवादात्मक होत. १०० साधारण माणसांमध्ये असे अपवाद क्वचित आढळावयाचे. कंजूष माणसाचे राष्ट्र, कंजूष माणसाचे गाव किंबहुना कंजूष माणसाचे कुटुंबही असणे शक्य नाही. ते शक्य असते तर हाही एक निराळा पुरूषार्थ संभवला असता. तसेच शेवटचा अर्थ जो मोक्ष हाही ह्यामधील दोन पुरूषार्थांचा एक अवश्य घडणारा परिणाम आहे. आपल्या प्राचीन वेदांताचे (गौडपाद) असे मत आहे की, मोक्ष ही एक पुढे कधीतरी आरंभणारी स्थिती नाही. तिचा पुढे कधी तरी आरंभ व्हावयाचा असेल तर तिचा अंतही होणार असावयाचा. ज्याला आदी आहे त्याला अंत आहेच. मग असा अंत पावणारा मोक्ष मिळाला तरी त्याला दुस-या मोक्षाची आकांक्षा रहाणार. ह्यावरून पहिला पुरूषार्त केवळ साधन आणि चौथा पुरूषार्थ हा एक केवळ परिणाम हे ध्यानात आणिले असता खरे पुरूषार्थ केवळ दोनच आहेत असे दिसून येते. ते काम आणि धर्म हे होत.

ह्या दोन्ही शब्दांविषयी आपल्या प्राकृत भाषेत पराकाष्ठेचा गोंधळ माजलेला आहे. शब्दांचे यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय आणि त्यांची सम्यक् योजना न करता भाषेचा व्यवहार करणे म्हणजे मोठा धोका आहे. हे थोड्या दिवसांपूर्वीच आमच्या ह्या समाजाचे सन्मान्य अध्यक्ष सर नारायण ह्यांनी फार उत्तम रीतीने दुसरीकडे सांगितल्याचे आपल्याला स्मरत असेलच. काम म्हणजे काही विवादित दुष्ट वासना आणि धर्म म्हणजे देवाविषयी आणि परमार्थाविषयी काही गोष्ट असा ह्या दोन्ही शब्दांचा आकुंचित अर्थ हल्ली अगदी रूढ झालेला आहे. पण वस्तुत: पहाताच काम ह्याचा अर्थ इच्छा अर्थ इच्छा किंवा मनाची भूक आणि धर्म ह्याचा अर्थ कर्तव्यबुद्धी हा आहे. संस्कृत वाडमयामध्ये व इकडील देशात इंग्रजीचा व्यवहार सुरू होण्यापूर्वी प्राकृत भाषांमधूनही धर्म ह्या शब्दाचा केवळ कर्तव्यकर्म असाच साधा अर्थ होत असे. मग ते कर्तव्यकर्म एकाद्या शास्त्रात किंवा ग्रंथात सांगितलेले असो, किंवा ईश्वराने मनुष्याच्या मनामध्ये प्रत्यक्ष प्रेरणा केलेले असो, मनुष्याच्या मनाच्या स्वाभाविक प्रवृत्तीकडे पाहिले असताही त्या ह्या दोनच प्रकारच्या आहेत असे दिसून येते. अमुक एक गोष्ट रूचकर आहे, अमुक एक हितकर आहे, अमुक एक सुंदर आहे, ती आपणांस पाहिजे अशी इच्छा होणे ही एक प्रवृत्ती. अमुक एक गोष्ट रूचकर असो व नसो, सुंदर दिसो वा न दिसो किंबहुना आपल्या स्वत:स हितकर असो वा नसो, ती योग्य आहे म्हणून आचरलीच पाहिजे, किंवा अयोग्य आहे म्हणून टाकलीच पाहिजे, अशी आतून प्रेरणा होणे ही दुसरी प्रवृत्ती. पहिलीचे नाव कामना व दुसरीचे नाव कर्तव्यबुद्धी. ह्या दोन्ही प्रवृत्तींना अनुसरून आत्म्याला दोन भिन्न पुरूषार्थ साधावयाचे असतात. ते साधित असताना केवळ उपकरण म्हणून त्याला अर्थसंचयही करावयाचा असतो आणि हे दोन पुरूषार्थ तो ज्या ज्या मानाने अधिक अधिक साधीत जाईल त्या त्या मानाने त्याची यात्रा अधिकाधिक सफल होते व ती झाली म्हणजे तो मुक्त किंवा पूर्ण झाला म्हणावयाचे.

आता आपण ह्या दोन प्रवृत्तींचाच विशेष विचार करू. साधारणत: लौकिकात असा समज आहे की, ह्या दोन वरील स्वाभाविक मन:प्रवृत्तींपैकी कामना ही हलक्या दर्जाची आणि कर्तव्यबुद्धी ही श्रेष्ठ दर्जाची आणि वस्तुत: जरी लोकांचा खरा ओढा, कर्तव्यापेक्षा कामनेकडेच अत्यंत अधिक आहे तथापि त्याचा समज पाहू गेले असता वरीलप्रमाणे विपरीत दिसून येतो. पण हा केवळ गैरसमज आहे. कामना आणि कर्तव्यबुद्धी ह्या दोन्हीही सारख्याच ईश्वरदत्त आहेत आणि त्या दोहोंचे कार्यही आत्म्याच्या यात्रेत सारखेच पवित्र आणि सारख्याच महत्त्वाचे घडून येत आहे. खाणे, पिणे वगैरे शारिरीक वासनांमध्येच गुरफटून असलेल्या आद्यस्थितीतील पुरूषांची कर्तव्यबुद्धीही बेताचीच असते आणि श्रेष्ठपदाप्रत पोहोचलेल्या पुरूषांमध्ये विकास पावणा-या कर्तव्यबुद्धीची कारणे शोधून पाहता ती त्याच्या थोर मनकामनामध्येच आढळून येणार आहेत. ह्यावरून पाहता यद्यपि कठोपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे प्रिय वस्तू एक, श्रेयस्कर वस्तू निराळीच म्हणजे कामना आणि कर्तव्यबुद्धी ह्या दोन अगदी भिन्न प्रवृत्ती आहेत हे जरी खरे आहे, तथापि ह्या प्रत्येकीचा विकास परस्परांवर अवलंबून आहे. जगाचे कल्याण मनुष्याच्या कर्तव्यबुद्धीमुळेच झाले आहे आणि कामनेमुळे नाही असे मुळीच म्हणता येत नाही. प्राचीन काळी मोठमोठ्या तत्त्वांचा जो शोध लागला, आधुनिक काळी जे शास्त्राचे शोध लागत आहेत, ते केवळ कर्तव्यबुद्धीमुळे नव्हेत, तर शोधकाच्या जिज्ञासास्वरूपी मनकामनेमुळेच होत. मला जगताचे कल्याण कर्तव्य आहे म्हणून कोणी शोधक होत नाही, तर क्षुधितास जशी अन्नाची जरूरी वाटावी तशी विवक्षित पुरूषास ज्ञानाची हाव सुटून तो शोधक बनतो, त्याच्या त्या मनकामनेमुळे आणि ती पूर्ण करून घेण्यामध्ये त्याने दाखविलेल्या पुरूषार्थामुळे जगताचे कोटकल्याण होते. कामनेचा हव्यास नसताना केवळ जगताची कितीही कीव येऊन मनुष्यास कर्तव्यजागृती झाली असती तरी त्याच्या हातून हे कोटकल्याण झाले नसते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या ललितकलांचा, सदभिरूचीचा, शिष्टाचारांचा आणि सभ्य संप्रदायांचा प्रकार आहे. ललितकलांच्याद्वारा आत्म्याची उन्नती होते ही थोडीबहुत अलीकडचीच भावना आहे. यद्यपि जुन्या धर्माच्या कित्येक प्रचारात संगीतादी कलांची योजना रूढ झालेली आहे; तथापि ह्या कलांचा आधअयात्मिक प्रभाव आणि त्यांच्या विस्ताराची जरूरी अद्यापि कळून यावी तितकी आलेली नाही. संगीत, चित्रलेखन, शिल्प, वाड्मय, वक्तृत्व आणि विनोद इत्यादी कलांचा विकास होण्याला कारण मनुष्याची कर्तव्यबुद्धी अथवा धर्म हा पुरूषार्थ नव्हे तर काम हा पुरूषार्थ होय. सौंदर्याचे दर्शन होऊन मनुष्य तळमळू लागला आणि पुढील सौंदर्यास किंवा आपल्या मनाच्या स्थितीला दृश्य स्वरूप देऊ लागला म्हणजे ह्या विविध कलांचा विकास होतो, आणि तद्वारा दुस-याचीही अभिरूची, सहृदयता, सानुकंपा वाढते. एका आधुनिक बंगाली चित्रकाराने काढलेले शहाजहानाचे स्वप्न हे चित्र ज्यंनी पाहिले असेल त्यांनाच कळून येण्यासारखे आहे की हल्ली यमुनेच्या तीरावर उभारलेला ताजमहाल, तो बांधण्यापूर्वी शहाजहानाच्या मनकामनेमध्ये कित्येक दिवस पोहत होता. त्याला दृश्यस्वरूप द्यावयाची इच्छा शहाजहानाला अनावर झाली म्हणून पुढे वीस हजार मनुष्यांनी २२ वर्षे खपून त्याला हल्ली दिसतो तसा उभा केला आहे. हा शहाजहानाच्या कर्तव्यबुद्धीचा प्रभाव नव्हे तर त्याच्या कल्पनेचा विकास होय. पुष्कळ वेळां खोट्या कर्तव्यबुद्धीमुळे म्हणजे समाजाच्या विघातक अशा वैराग्यवृत्तीमुळे वरच्यासारख्या कित्येक शुद्ध आणि दैदीप्यमान कामनांचा नायनाट झालेला आहे. मनुष्यव्यक्तीचे आणि राष्ट्राचे आजवर नुकसान झाले आहे ते त्याच्या केवळ क्षुद्र स्वार्थपरतेमुळेच झाले आहे असे नव्हे तर त्याने खोट्या धर्मबुद्धीला बळी पडून आपल्या उदात्त कामना पूर्ण करून घेण्याचा पुरूषार्थ साधला नाही म्हणूनही झाले आहे. मनुष्याच्या मनाचा विकास जसजसा अधिकाधिक होतो तसतशा त्याच्या कामना अधिक पवित्र, अधिक महत्त्वाच्या आणि अधिक लोकहितकारक होतात, इतकेच नव्हे, तर त्यामुळे त्याच्या कर्तव्यबुद्धीचेही क्षेत्र अधिक शुद्ध आणि अधिक विस्तृत होते. म्हणून जो धर्म अथवा जी कर्तव्यबुद्धी ह्या कामनेच्या मुळाशीच कुठार घालू पहाते तो अधर्म समजावा. पुरूषार्थहीन माणसे आपला दुबळेपणा विसरून ह्या अधर्माचा सहज आश्रय करतात आणि आपणांस धार्मिक समजतात पण त्यात त्यांचे आणि सर्वांचेच अशुभ होते, ते न व्हावे म्हणून प्रत्येकाने कामना ह्या पहिल्या पुरूषार्थासंबंधाने दक्ष असावे. पण कामनेच्या मानानेच कर्तव्यबुद्धीचाही विकास झाला पाहिजे, म्हणजे कर्तव्याचा ओघ कामनेच्या उलट न वाहता जसजसा कामनांचा विकास होईल तसतसा त्यांच्या शुभ परिणामाचा विस्तार सर्व जनसमूहावर करून देण्याची कामगिरी कर्थव्यबुद्धीने केली पाहिजे आणि हाच धर्म हा दुसरा पुरूषार्थ होय. जगाच्या इतिहासामध्ये आजवर हा पहिला पुरूषार्थ ज्यंनी नेटाने साधला आहे असे तत्त्वद्रष्टे, कवी, कलावंत, वक्ते, विनोदी महात्मे वेळोवेळी निर्माण झाले आहेत. परंतु त्यांच्या कृतीचा शुभ परिणाम सर्व जगतावर विस्तरणारे कर्तव्यवान पुरूषही निपजावयाला पाहिजेत. त्यांनी आपली स्वार्थपरायणता बाजूला ठेवून वरील शुभाचा विस्तार हाच आपला स्वार्थ केला पाहिजे. ह्या विस्ताराच्या मार्गांमध्ये जे हीनधर्म, क्षुद्रधर्म, मृतधर्म आड येतील ते काट्यासारखे निवडून काढून लोकहिताचा मार्ग खुला केला पाहिजे. शुद्धता, स्वतंत्रता, समानता ह्यांची द्वाही फिरविली पाहिजे. व्हावे तितके आजवर असे न झाल्यामुळे कोठेतरी क्वचित एकादी अद्वितीय तेजस्वी विभूती, आणित त्याच्याभोवती गाढ अज्ञानांधकारामध्ये बुडालेले जनसमूह, एकादा प्रतापी राजा आणि त्याच्याभोवती पशुतुल्य प्रजासमूह, एकादा श्रीमान पुरूष आणि त्याच्या सभोवती दैन्य आणि दारिद्र्य ह्यांत रूतलेले त्याचे सजातीय, असे ओंगळ देखावे इतिहासात असंख्य दिसत आहेत. ते नाहीसे होऊन आत्म्याची यात्रा सुरळीत चालावी आणि जनता सुखी व्हावी असे असेल तर आपण दुस-या ह्या पुरूषार्थाविषयी दक्ष असले पाहिजे. कामना आणि कर्तव्यबुद्धी ह्या वरील मन:प्रवृत्ती अगदी भिन्न आहेत असे वर सांगितले, पण त्यांना अनुसरून मनुष्य जसजसा पुरूषार्थ गाजवू लागला तसतसा ह्या दोहोंमधील अलगपणा नाहीसा होऊन त्यांची सांगड जुळते आणि कर्तव्यबुद्धी हीच एक कामना आणि कामना हेच क कर्तव्य असे ह्या दोन पुरूषार्थाचे ऐक्य भासू लागते. असे झाल्यावर तेच एक पूर्णतेचे किंवा मोक्षाचे लक्षण होय. भिन्न पुरूषार्थ संपादन करण्याचे प्रयत्न करीत असता आत्म्यास शीण आणि श्रम हे होणारच. परंतु देहामध्ये जसा आत्मा, तसाच विश्वामध्येही एक परमात्मा असून त्याचे दर्शन झाल्यावर आत्म्यास पले श्रम विसरून जाऊन विसावा खावा लागतो. आपली कामना आणि कर्तव्यबुद्धी ही दोन्ही ह्या परमात्म्याच्या कामना आहेत, असे ओळखल्यावर आत्म्याला आपल्या यात्रेमध्य विसावा होतो. इतकेच नव्हे तर त्याला ह्या दोन भिन्न पुरूषार्थांचे ऐक्यही दिसून येते. परमात्मरूप दर्शन प्राप्त झाल्याशिवाय आत्म्याला विसाव्याला ठिकाणच नाही.

‘ज्याते स्मरता मीपण जाय | आत्मा प्राण विसावा माय ||

असा हरी सापडावयालादेखील अगोदर वरील दोन पुरूषार्थ साधले पाहिजेत. आत्म्याने आपल्या कामनेची आणि कर्तव्यबुद्धीची शिकस्त केल्याशिवाय त्याला परमात्मदर्शनाचा मार्ग खुला होणे शक्य नाही.

परमात्माही विश्वामध्ये आपल्या कामना पूर्ण करून घेत आहे व अहर्निश आपले कर्तव्य बजावीत आहे हे निरखण्याला आम्ही तेव्हाच समर्थ होऊ की जेव्हा आम्ही हे वरील दोन्ही पुरूषार्थ अंशत: तरी साधू आणि यद्यपि आमचे हे दोन्ही पुरूषार्थ पूर्णपणे साधले गेले नाहीत, तथापि ह्या परमार्थ दर्शनामुळेच आत्म्याच्या यात्रेमध्ये वेळोवेळी आम्हांला विसावा मिळेल, ती सुरळीत चालेल आणि योग्य काळी तीस फलही येईल.

'नॉटर डेम् ड ला गार्ड' देऊळ व तें पाहून सुचलेले विचार.

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड.
ता. २९।११।१९०१.

पुण्यास जशी पर्वती, मुंबईस जसा बाबुलनाथ, तसें हें वरील नांवाचें देऊळ मार्सेय येथें आहे.  ह्या फ्रेंच नांवाचा मराठींत अर्थ 'आमची रक्षक माता' असा होतो. ही माता म्हणजे श्री येशू ख्रिस्ताची आई कुमारी मेरी ही होय.  हीच ह्या देवळांतील मुख्य आराध्यदैवत आहे.  शहराला लागूनच आग्नेय बाजूस एक उंच टेंकडी आहे.  तिच्या माथ्यावर हें सुंदर देऊळ बांधिलें आहे.  टेंकडी चढून वर जाईपर्यंत थकवा येतो. टेकडीच्या पायथ्यापासून तों माथ्यावर देवळाच्या दारापर्यंत लिफ्टनें प्रेक्षकजनांस वर उचलून नेण्याची योजना केली आहे, असें आम्हांस वर गेल्यावर कळून आलें. ही टेकडी समुद्राच्या कांठावर असल्यानें येथून एका बाजूस अनंत महासागराचा व दुसर्‍या बाजूस चित्रविचित्र मार्सेय शहराचा देखावा एकाच वेळीं दिसत होता.  माथ्यावर पोहोंचल्यावर देवळाचा दगडी घाट लागला.  आजूबाजूस आंतबाहेर चहूंकडे झाडून साफ केलें असल्यामुळें, मनाला फार निर्मळ वाटलें.  तसेंच ह्या उंच एकांत पवित्र स्थळीं माणसाची फारशी चाहूल नव्हती.  म्हणून येथें लवकरच मन निःशंक होऊन खेळूं लागलें.  देऊळ भक्कम दगडांचें बांधलें असून काम साधें, सफाईदार व सुबक झालें आहे.  तळमजल्याचें दार झांकलें होतें व आंत अंधार दिसत होता.  देवळाचा मुख्य भाग दुसर्‍या मजल्यांत होता म्हणून आम्ही वर गेलों.  आम्ही हिंदुस्थानचे लोक परकीय यवनांस आमच्या पवित्र देवळांत येऊं देत नाहीं, तसेंच या देवळांतही आम्हां हिंदुनांस जाऊं देतील कीं नाहीं ही अपवित्र शंका आमच्या मनांत येऊन आम्ही सगळे दारांतच गुटमळूं लागलों.  इतक्यांत एका वृद्ध मनुष्यानें आंत जाण्यास खूण केली.

देवळांत शिरलों, तेव्हां १२ चा अम्मल होता. चोहींकडे शांत व गंभीर देखावा दिसत होता.  विरळा एखादा प्रेक्षक अगर उपासक पावलांचा आवाज न करितां जपून पाहून अगर प्रार्थना करून नकळत जात असे.  आंत गेल्याबरोबर दोन्ही बाजूंस दोन मोठ्या ७-८ फूट उंच पितळेच्या लखलखीत ठाणवया दिसल्या.  त्यांवर २।३ फुट लांब बारीक मोठ्या शेंकडों मेणबत्या जळत होत्या.  हे ख्रिस्ती नंदादीप पाहिल्यावर क्यॉथलिक धर्माचें साक्षात् स्वरूप पुढें दिसूं लागलें.  खालपासून वरती गाभार्‍यापर्यंत विशाल भिंतीवरून पौराणिक चित्रें टांगलीं आहेत.  कोठें दुःखितांचे अश्रु पुशीत आहे, कोठें आजार्‍यांस बरें करीत आहे तर दुसरीकडे कोठें स्वतः येशूचीच छळणा चालली आहे, कोठें त्यास सुळावर खिळून टाकलें आहे, अशीं नानातर्‍हेचीं चित्रें हुबेहुब रेखिलीं होतीं.  शिवाय कोपर्‍यांत, कोनाड्यांत, चौकांत चौरंगावर निरनिराळ्या धातूंचे ओतलेले व दगडांचे घडविलेले येशूचे व त्याच्या शिष्यांचे पुतळे बसविले होते व त्यांपुढें धूप, दीप पुष्पांदिकांचा थाट सजला होता.  ही दिव्य शोभा पहात पहात आम्ही शिखराखालच्या मुख्य गाभार्‍यांत उच्च स्थानीं दैदीप्यमान् देव्हार्‍यावर उभी असलेली कुमारी मरीआमा हिच्यापुढें आलों.  ही उंचीनें वीस वर्षांच्या कुमारीइतकी होती.  रंग सांवळा, पोशाक अगदीं साधा व पायघोळ आणि चेहरा उदात्त पण सचिंत आणि उदास दिसत होता. हिनें डाव्या कडेवर लहानग्या येशूस घेतलें होतें.  ह्या उतावळ्या अर्भकाचें वय केवळ १॥ वर्षाचें असून तो कांहीं केल्या आईच्या बगलेंत ठरत नव्हता, ती आई तशीच बालकाकडे अर्धवट दुर्लक्ष करून, त्याचें पुढें कसें होईल ह्याच विवंचनेंत तटस्थ उभी होती. इकडे पोरालाही आईच्या चिंतेची पर्वा मुळींच नसून उलट त्याच्या गुबगुबीत गालावर हास्याचें कमल फुललें होतें !!  त्याच्या डोईवर काट्यांचा सोनेरी मुकूट लकाकत होता.  दीनोद्धारासाठींच जणूं ह्या अचाट कीर्तीच्या लहान मूर्तीनें आईच्या कडेवरून पुढें झेंप टाकिली होती.  ह्या मायालेंकरांच्या दोन्ही बाजूंस नंदादीपाच्या तेजाचें हजारों कारंजीं सतत वहात होतीं ! अशाप्रकारें ह्या दैवी गुणांचें हें मंगल प्रदर्शन पाहून मन आपल्या स्वाभाविक धर्मास अनुसरून सर्व मंगल गुणांचें जें मळ त्यास आळवूं लागलें !  क्षणमात्र सात्त्विक वृत्तीच्या उच्च वातावरणांत विहार करून पुनः मानवी कृतीचें कौतुक करण्यास तें खालीं उतरलें.  इतक्यांत १२ चा ठोका पडून चर्चमधील माध्यान्ह घंटा दणदणूं लागली.  आम्हांला इतर ठिकाणें पहावयाची घाई होती म्हणून आम्ही देवळाच्या दुसर्‍या बाजूचीं चित्रें व पुतळे लगबगीनें पाहून बाहेर पडलों.

तुळजापूरची भवानी, सौंदत्तीची यल्लमा, कोल्हापुरची महालक्ष्मी इत्यादि जीं जीं कांहीं पुरातन हिंदु देवस्थानें पाहिलीं आहेत त्यांची सहजच आठवण होऊन मार्सेयच्या मरीआमाच्या देवळाचे त्यांच्यांशीं साम्यभेद काय आहेत ह्याविषयीं मनांत विचार येऊं लागले.  साम्य हें कीं हिंदु उपासकांस बारामाहे आणि आठी प्रहर आपल्या देवळांत मोठमोठ्या दिव्यांची आवश्यकता वाटते, तशीच येथेंही ख्रिस्ती उपासकांस वाटत आहे.  हिंदु आपल्या देवळांतील भिंतीवर रामरावणाचीं व कौरव पांडवांची चित्रें काढितो तर ख्रिस्त्यानेंही येथें आपल्या भिंती चित्रविचित्र केल्या आहेत.  हिंदु आपल्या देवळांत मुख्य स्थानीं झगझगीत देव्हार्‍यावर पार्थीव मूर्तीची स्थापना करितो, तशी येथें ख्रिस्त्यानेंही आपल्या उपास्य देवतेची मूर्ति उभी केली आहे.  येथपर्यंत दोघांचे केवल साम्य आहे.  ख्रिस्त्यानें हिंदूस हींदन, आयडॉलेटर (मूर्तिपूजक) इ. नांवें ठेवून कितीही हिणविलें तरी त्यानें येथें आपली आकारप्रियता पूर्ण व्यक्त केली आहे.  ही उणीव एखाद्या विशिष्ट धर्मपंथाची अगर मनुष्यवर्गाची नव्हे, तर हिचें मूळ मानवी स्वभावांतच आहे.  म्हण आहे कीं, वाघ्याचा पाग्या बनला तरी त्याचा यळकोट जात नाहीं !  त्याचप्रमाणें तिकडे पौरस्त्यानें आपल्यास पूर्ण ब्रह्मज्ञानी, अद्वैती इ. इ. जाड्या संज्ञा देऊनही त्याच्या पाठीची लिंगपूजा अद्यापि सुटली नाहीं; आणि इकडे पाश्चात्य पॅगनचा ख्रिस्ती झाला तरी मूर्तिपूजा आणि विभतिपूजा ह्यांनीं कोणत्या ना कोणत्या तरी रूपानें त्यांस घेरलें आहेच.

असो; मला येथें मूर्तिपूजेच्या युक्तायुक्ततेबद्दल विचार मुळींच कर्तव्य नाहीं, उलट बाह्य देखावा व आकृति ह्यांच्या साह्यानें ईश्वराकडे मन जास्त लवकर लागतें-निदान साधारण मनुष्यास तर हाच मार्ग योग्य आहे, हा जो मूर्तिपूजेच्या अभिमान्यांचा मोठा मुद्दा आहे तो मीं तूर्त येथें गृहित धरून चालतों !  आणि मीं वर जे हिंदु व ख्रिस्ती देवळांमध्यें साम्य दाखविलें आहे त्यावरूनही वरील मुद्यालाच बळकटी येते; पण पुढें ह्या दोन्ही देवळांत भेद काय आहे तो पहा.  देवळांत मुख्य स्थानीं ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असते त्याविषयीं विचार केला तर बराच भेद दिसून येतो.  कित्येक ठिकाणीं मारुतीच्या, कित्येक ठिकाणीं गणपतीच्या, कित्येक ठिकाणीं भयंकर देवींच्या मूर्ती असतात.  कांहीं ठिकाणीं शेंदूर आणि तेल ह्यांच्या थराखालीं व कांहीं ठिकाणीं बेढब वस्त्रालंकारांखालीं मूर्तीच्या मूळच्या रूपाचा लोप झालेला असतो.  देवळाच्या भिंतींवरील चित्राकडे लक्ष्य गेलेंच तर तेथें गांवठी जिनगराचें कौशल्य झळकत असतें.  चित्रांतील विषय पाहूं गेल्यास कोठें मारुतीनें कुंभकर्णाच्या डोक्यावर गदा मारिली आहे, तर कोठें कृष्णानें राधेस कवटाळलें आहे, कोठें महिषासुरवध तर कोठें रासक्रीडा इत्यादि प्रकार चाललेले असतात.

धर्मसाधनाचे बाबतींत चित्रकार व शिल्पकार ह्यांची मदत अगदीं अवश्यच वाटल्यास वाटो.  पण ती घ्यावयाची झाल्यास सौंदर्यशास्त्री आणि नितिशास्त्री ह्यांच्या सल्ल्यानें तरी ती घ्यावयाला पाहिजेना ?  विशेषतः जेथें केवळ साधारण जनसमूहाच्याच फायद्यासाठीं मूर्तीची योजना झालेली असते, तेथें तर अधिक काळजी घ्यावयाला पाहिजे.  एकाद्या तिर्‍हाईतानें इकडचीं देवळें व त्यांतील मुर्ती पाहिल्या तर तो मूळचा निराकारवादी असला, तरी कदाचित् मूर्तिपूजक होण्याची इच्छा करील.  पण त्याच तिर्‍हाईतास आमच्या एका देवळांत नेलें आणि त्याच्यापुढें मूर्तिपूजेवर कितीही लांब व्याख्यान दिलें, तरी तो विषय त्याच्या मनांत नीटसा भरणार नाहीं.  इतका मोठा भेद पडण्याचें कारण काय असावें बरें ?  आमच्यांत कलाकौशल्य कमी आहे काय ?  आम्हीं नीतीनें कमी आहों काय ?  कां आमच्या पुराणांत, दंतकथांतून व इतिहासांतून उदात्त विषयांची बाण आहे ?  छे; ह्यांपैकीं एकही गोष्ट वरील भेदाचें कारण असावें असें आमच्या शत्रूसही वाटणार नाहीं.  श्री ख्रिस्ताच्या चरित्रांतील देखाव्याचें इकडे जसें प्रदर्शन केलें जात आहे,  तसें तिकडेही श्रीकृष्णाच्या कांहीं कृत्यांचें प्रदर्शन करितां येणार नाहीं काय ?  आपल्या भक्तांचे घोडे धुणें, उष्टी काढणें, आपल्या भक्ताची जी दासी तिची वेणी घालणें, तिला द----- लागणें, इ. पवित्र प्रेमाचे मासले ज्या विभूतीसंबंधानें ऐकतों, तिचीच विडंबना जागोजागीं व वेळोवेळीं काव्यांतून व चित्रांतून होत आहे आणि तो धर्माभिमान्यांस खपत आहे !  गौतमबुद्धाचा स्वार्थत्याग, बाबा नानकाची सुधारणा, कबीराची सत्यप्रीति आणि तुकोबाची भक्ति इ. अनेक सुबोधपर विषयांची निवडणूक करून रविवर्म्यांसारख्या मार्मिक चित्रकारांनीं त्यांवर आपलें चातुर्य खर्चिलें, तर आमच्या देवळांच्या सौंदर्यांत व पावित्र्यांत किती भर पडेल बरें !  पण अलीकडे जे नवीन नवीन धर्मांच्या नांवानें उत्सव निघूं लागले आहेत आणि त्यांत ज्या मूर्तींचें व चित्रांचें प्रदर्शन होत आहे, त्यावरून पाहतां आमच्याकडील मूर्तिपूजकांचें लक्ष्य ह्या गोष्टीकडे लागेल, ह्याचा कांहीं संभव दिसत नाहीं.

१९२० सालातील निवडणूक

लॉर्ड साऊथबरो यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानात आलेल्या फ्रँच्याइज कमिटीने आपला अहवाल ब्रिटिश पार्लमेंटला सादर केला. सदर अहवालाच्या संदर्भात आपले मत, प्रतिक्रिया आणि शिफारशी हिंदुस्थान सरकारने भारमंत्र्यांना कळविल्या व अखेरीस पार्लमेंटने मतदारसंघाची निश्चिती करून राखीव तसेच सर्वसाधारण मतदारसंघ जाहीर केले. जाहीर करण्यात आलेल्या योजनेनुसार मराठा व तस्तम जाती असा एक गट करण्यात आला व त्यांच्यासाठी मुंबई इलाख्यात सात जागा राखून ठेवण्यात आल्या. मराठा व तत्सम जाती या नव्या वर्गीकरणात मराठा, कुणबी, माळी, कोळी, भंडारी, शिंपी, लोहार, कुंभार, धनगर, भोई इत्यादी जातींचा स्पष्ट नामनिर्देश करून समावेश होईल असे स्पष्ट केले. ह्या नव्या योडनेनुसार नोव्हेंबर १९२० मध्ये निवडणुका होतील असेही सरकारने जाहीर केले.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी निवडणुकीत जातीय तत्त्व आणण्याच्या कल्पनेला १९१७ पासूनच जाहीरपणे विरोध केलेला होता. त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या राष्ट्रीय मराठा संघाने आयोजित केलेल्या शनिवारवाड्यापुढील १६ डिसेंबर १९१७च्या सभेत सर्व जातींच्या प्रतिनिधींनी एकमुखाने राष्ट्रसभेच्या लखनौ येथे ठरलेल्या धोरणाला पाठिंबा दिला होता व राजकीय सुधारणेबाबत अथवा होमरूलबाबत आपली एकोप्याची भूमिका प्रकट केली होती. शिंदे यांच्या या भूमिकेला पुण्यातील मातब्बर मराठा नेत्यांचा पाठिंबा होता. त्यामध्ये त्र्यंबक हरी आवटे, काशिनाथ ठकुजी जाधव, नारायण गुंजाळ, बॅ. व्ही. एम्. पवार हे प्रमुख होते व राष्ट्रीय मराठा संघाचे ते प्रमुख कार्यकर्ते होते. तारीख १० व ११ नोव्हेंबर १९१७ रोजी बेळगाव येथे व-हाडातील बॅ. रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतवासी मराठा परिषद भरली. विठ्ठल रामजी शिंदे यांचाही या परिषदेला पाठिंबा होता. ह्या परिषदेमध्ये मराठा जातीसाठी स्वतंत्र अथवा राखीव जागा असू नयेत असेच मत प्रकट केले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांचीच भूमिका बडोदा येथील जागृतीचे संपादक भगवंतराव पाळेकर हे मांडीत होते.


मात्र मराठा जातीसाठी लीगने मराठा राष्ट्रीय संघाच्या विरुद्ध भूमिका मांडावयास सुरुवात केली. शाहू छत्रपतींनी १९१७ सालच्या अखेरीस खामगाव येथे भरलेल्या अकराव्या मराठा शिक्षण परिषदेत बोलताना निदान दहा वर्षे आम्हाला जातवार प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार असला पाहिजे अशी जाही मागणी केली. ब्रिटनमधील संसद सदस्यांना जातवार प्रतिनिधित्वाच्या मागणीपाठीमागची भूमिका पटवून देण्यासाठी मराठा लीगच्या वतीने श्री. भास्करराव जाधव १९१९च्या जुलैमध्ये इंग्लंडला गेले होते. प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये गेल्यावर भास्करराव जाधवांच्या भूमिकेत पालट झाला. तरी त्यांनी संयुक्त संसदीय समितीसमोर साक्ष देताना मुंबई इलाख्यातील कायदेमंडळावर एकंदर शेकडा तीस जागा मराठा वगैरे मागासवर्गाच्या प्रतिनिधींसाठी राखून ठेवाव्यात असे प्रतिपादन केले. ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी व डेक्कन रयत असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिनिधी वा. रा. कोठारी यांनीही जातवार प्रतिनिधित्वाची भूमिका आपल्या निवेदनातून मांडली होती. साऊतबरो कमिटीच्या अहवालातही मराठ्यांना जातवार प्रतिनिधित्व का असावे याबद्दलची कारणमीमांसा नमूद केली आहे. “अस्पृश्यवर्गाशिवाय ज्यांना जातवार प्रतिनिधित्व देण्याचा विचार करावा असा वर्ग म्हणजे मराठ्यांचा समाज. मराठ्यांच्या बाजूने असे म्हणणे शक्य आहे की शिखांबाबत स्वतंत्र जागा देण्यासंबंधी जो युक्तिवाद केला जातो तो मराठ्यांनाही लागू आहे. म्हणजे अनेक जिल्ह्यांत एकंदर लोकसंख्येत त्यांची बहुसंख्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर ब्राह्मणी वर्चस्व इतके दांडगे आहे की जेथे त्यांची बहुसंख्या आहे तेथेसुद्धा ते स्वजातीचा प्रतिनिधी निवडून आणू शकत नाहीत. मात्र एकंदर लोकसंख्या आणि महत्त्व यांचा विचार करता त्यांना प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. हे प्रतिनिधित्व त्यांच्यासाठी जातवार मतदारसंघ निर्माण करून अथवा सर्वसाधारण मतदारसंघात जातवार जागा राखून देता येऊ शके.” कमिटीने हेही नमूद केले आहे की मराठा समाजाच्या आकांक्षा जर सफळ झाल्या नाहीत तर गंभीर स्वरूपाचा असंतोष निर्माण होण्याची भीती आहे. ह्या भूमिकेला विरोधी असणारे दुसरे मत म्हणून मुसलमानांप्रमाणे मराठ्यांचा विचार करता येत नाही असेही नमूद केले आहे. मराठ्यांना जातवार जागा देण्यात प्रमुख अडचण म्हणजे मराठा या संज्ञेची व्याप्ती निश्चत करणे कठीण असल्याचे तिसरे मतही कमिटीने नमूद केले आहे.१


मराठा जातीच्या प्रतिनिधित्वासंबंधी एवढे उलटसुलट विचारमंथन झाल्यावर अखेरच्या निर्णयात मात्र सरकारने मराठा व तत्सम जातींसाठी सात जागा राखून ठेवल्या.
नोव्हेंबर १९२० मध्ये निवडणुका होणार हे जाहीर झाल्यानंतर पुण्यातील मराठा समाजाच्या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा उत्साह दाखविला व निवडणुकीच्या संदर्भात जेधे मॅन्शनमध्ये एक सभा बोलावली. ह्या सभेस विठ्ठल रामजी शिंदे यांना आग्रहपूर्वक बोलावणे केले होते. आगामी निवडणुकीमध्ये शिंदे यांनी उमेदवार म्हणून उभे राहावे असे दोन्ही पक्षांच्या मंडळींनी आग्रहपूर्वक सांगितले. शिंदे यांनी याप्रसंगी मी राखीव जागेसाठी उभा राहणार नाही. त्यातील जातिवाचक तत्त्वाच्या मी विरुद्ध आहे असे ठामपणे सांगितले. मात्र पुणे शहराच्या सर्वसाधारण जागेसाठी सर्व पक्षांनी मिळून मदत करावयाची ठरवल्यास आपण निवडणुकीस उभे राहण्यास तयार आहोत, असे सांगितले.


१९२० पर्यंत सक्रिय राजकारणातून सदैव दूर राहणा-या विठ्ठल रामजी शिंद्यांनी कायदेमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावयाचे जे ठरविले, त्यापाठीमागे काहीएक कारमे संभवतात. माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्यापासून हिंदुस्थानातील राजकारणाचे चित्र बदलले होते. वेगवेगळ्या स्तरावरील जातीच्या लोकसमाजामध्ये राजकीय आकांक्षा निर्माण होऊ लागल्याचे स्पष्टपणाने दिसून येऊ लागले. याचे अनेक बरेवाईट परिणाम सामाजिक जीवनातही दिसून येऊ लागले.


अस्पृश्य मानलेल्या वर्गालाही ह्या नव्या राजकीय घटनेचा लाभ व्हावा, असे शिंदे यांना वाटत होते. सभा-परिषदा घेऊन त्यांच्यामध्ये सर्वांगीण जागृती करण्याचे कामही शिंदे यांनी चालविले होते. बदललेल्या वातावरणात अस्पृश्यवर्गामध्ये काही एका प्रमाणात राजकीय जागृती झाल्याची चिन्हे दिसत होती. मात्र त्याचबरोबर आपल्या लोकांसाठी शिंदे यांनी स्थापन केलेली संस्था आपण आपल्या ताब्यात घ्यावी व शिदे यांचे नेतृत्व सर्वस्वी झुगारू द्यावे, अशा प्रकारचा प्रयत्न अस्पृश्यवर्गातील काही मंडळींकडून सुरू झाल्याचे शिंदे यांना जाणवू लागलेले होते. अस्पृश्यवर्गीय पुढा-यांचा विरोध वाढतच जाणार अशी चिन्हे त्यांना दिसू लागली तेव्हा आतापर्यंत आपण अस्पृश्यवर्गाची उन्नती हेच जे कार्यक्षेत्र मानले होते व संघटित स्वरूपात आपण त्यांच्यासाठी संस्थात्मक पातळीवरून जे काम केले ते तसेच चालू ठेवण्यास स्वारस्य नाही. लवकरच ही संस्था त्या मंडळींच्या ताब्यात द्यावी. असे शिंदे यांनी मनोमन ठरविले असणार. अस्पृश्यवर्गाची सेवा ही तर त्यांची जीवननिष्ठा बनून राहिली होती. यापुढे कायदेकौन्सिलात जाऊन ह्या वर्गाची सेवा करत आली तर पाहावे, असा विचार त्यांच्या मनात आला असणे शक्य आहे.


अस्पृश्यवर्गाच्या जोडीनेच समाजातील शेतकरी, स्त्रिया यांसारके वर्ग मागासलेले आहेत व त्यांचीही स्थिती सुधारणे आवश्यक आहे, असेही त्यांना वाटले असावे. बहुसंख्य असलेल्या मराठावर्गामध्ये राष्ट्रीय स्वरूपाच्या जाणिवा निर्माण करणेही त्यांना आवश्यक वाटले होते वत्या दृष्टीने त्यांनी मराठा राष्ट्रीय संघ स्थापन करण्याच्याबाबतीत पुढाकार घेतला होता. त्या निमित्ताने मराठा समाजातील कर्तबगार नेते त्यांच्याजवळ आले होते.


सक्रिय राजकारणात भाग घेऊन देशकार्य करावे असे त्यांच्या जर मनात आले, तर काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवावी असे त्यांना का वाटले नाही? बहुजन पक्ष असा स्वतंत्र जाहीरनामा काढून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यापाठीमागे विठ्ठल रामजी शिंदे यांची वैचारिक भूमिका असणार. स्वराज्या मिळविणे हा काँग्रेसचा निकडीचा प्रश्न होता. हे स्वराज् अथवा स्वातंत्र्य मिळविल्यावर देशाची भावी घटना कशी असावी ह्या प्रश्नामध्ये काँग्रेसने लक्ष घातले नव्हते. त्याबद्दल काँग्रेसला विशेष आस्था असल्याचेही जाणवत नव्हते. त्यांच्या ददृष्टीने काँग्रेसमधील जहाल व मवाळ हे ध्येयावरून नव्हे, तर पद्धतीवरून पडलेले भेद होते. तेव्हा स्वराज्य मिळाले तरी दलित, शेतकरी, स्त्रिया इत्यादी दुर्बल समाजघटकांची दाद काँग्रेसकडे सत्ता आली तरी लागेलच अशी शिंद्यांना खात्री नव्हती. म्हणून विद्या, सत्ता, संपत्ती यांनी आचवलेल्या व म्हणून दुर्बल राहिलेल्या बहुजन जमाजातील विविध गटांचा कैवार घेणारा बहुजन पक्ष या नावाने जाहीरनामा काढून आपली भूमिका विशद करून निवडणूक लडवावी असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ठरविले असावे. आपण राजकारणात का भाग घेत आहोत यासंदर्भात आपली भूमिका कोणती आहे हे प्रकट व्हावे यासाठी शिंदे यांनी ‘बहुजन पक्ष’ ह्या नावे आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. शिंदे यांचा जाहीरनामा पुढीलप्रमाणे होताः


बहुजन पक्ष
हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्येचे केवळ राजकीयदृष्ट्या दोन मुख्य भाग पडत आहेत. ते हे की, (१) विद्याबल, द्रव्यबल किंवा अधिकारबलाने पुढारलेला वर्गा आणि (२) दुसरा, यातील कोणतेच बल अंगी नसल्याने व नाइलाजाने मागासलेला वर्ग किंवा बहुजन समाज. ह्या दुस-या वर्गातच अत्यंत तिरस्कृत अशा अस्पृश्यवर्गाचा अंतर्भाव होतो. हल्लीच्या राजकीय सुधारणेचा अरुणोदय होतो न होतो तोच या दोन भागांत मोठा विरोध भासू लागला आणि या विरोधानुसार बहुजन समाजाचा अथवा मागासलेल्या वर्गाच एक नवीन पक्षच होऊन चुकला आहे. ह्यालाच ब्राह्मणेतर पक्ष असे नाव दिले जाते. पण नाइलाज आणि बलहीनता ही जी मागासलेल्या वर्गाची मुख्य लक्षणे ती ह्या वर्गाच्या पक्षास ब्राह्मणेतर पक्ष असे जातिविशिष्ट नाव दिल्याने अगदी काटेकोर रीतीने सार्थ होत नाही. म्हणूनच ह्या नवीन पक्षास बहुजन पक्ष असे जातिविशिष्ट नाव दिल्याने अगदी काटेकोर रीतीने सार्थ होत नाही. म्हणूनच ह्या नवीन पक्षास बहुजन पक्ष अथवा जनपद पक्ष असे अगदी सार्थ व निर्विकल्प नाव दिल्याने त्यावर कसलाही आक्षेप आणण्यास जागा उरणार नाही.


कार्यपद्धती : हा नवीन पक्ष इतरांशी स्वतंत्रपणाने वागणारा आहे. तरी जेथे त्याच्या हितसंबंधाचा प्रश्न उभा राहील तेथे तेथे समानतेचा दर्जा संभाळून जी कोणी व्यक्ती असो की पक्ष असो त्याला सक्रिय साहाय्य करण्यास तयार असेल त्याच्यासाठी तेवढ्यापुरते सहकार्य करायला हा पक्षही तयार राहील. कारण ह्या पक्षाच्या पायाखाली केवल पोकळ भावना नसून भरीव हितसंबंध आहेत. ह्या पक्षात खालील वर्ग मोडतात.


पहिला, शेतकरीवर्ग : ह्यात डोईजड जमीनदारांचा किंवा पिढीजात जहागीरदारांचा समावेश मुळीच होत नाही. जो आपल्या मालकीचे अथवा कौलाचे शेत आपणच वाहतो आणि त्या कामासाठी पुरेशा मजुरांना समान दर्जाने योग्य वेतन देऊन संभाळतो तोच शेतकरी जाणावा.


दुसरा, शिपाईवर्ग : ह्यात सरदारांची गणना मुळीच नाही. पण सामान्य शिपायाने हितसंबंध आमच्या पक्षाशीच राखले पाहिजेत. कारण ते मागासलेलेच आहेत. कुणबी हा ह्या सर्वांचा खरा पोशिंदा आणि मोठमोठे ऐतखाऊ जमीनदार व जहागींरदार हे केवळ त्याचे पोष्य होत. तसेच हाताव शिर घेऊन लढणारा एकांडा शिलेदार हाच खरा क्षत्रिय, तो केवळ पट्टेवाला चपराशी नव्हे.


तिसरा, शिक्षकवर्ग : ह्यात सोवळे शास्त्री, हक्कदार, पुरोहित किंवा बलुते जोशी हे किंवा इतर ऐतखाऊ यांची गणना करत येत नाही. वाङमयाचे किंवा उद्यमाचे व्यावहारिक शिक्षण देण्याला जे कोणी लायक आहेत व जे आपल्या वृत्तीचा पिढाजात हक्क न सांगता बाजारभावाप्रमाणे चालू वेतन घेण्यास तयार आहेत त्यांची जात धर्म काही असो, त्यांचे हितसंबंध ह्या पक्षाने राखणे जरूर आहे.


चौथा, उदमी : सुतार, सोनार, शिंपी, तेली, तांबोळी, गवळी इत्यादी लहान लहान धंदे करून राष्ट्राची सेवा करणारे जे अशिक्षित व अनधिकारी वर्ग आहेत तेही राष्ट्राचे धारक असून त्यांचा दर्जा शेतकरी किंवा शिपाई यांपेक्षा रतिभरही कमी नाही.


पाचवा, दुकानदार : ह्यात व्याज देऊन दुस-याचे भांडवल वळवून आणून त्यावर गबर होणारे पेढीवाले किंवा कंपनीवाले वर्ज्य आहेत. परंतु उदमी लोकांच्या व मजुरांच्या साहाय्याने जी राष्ट्रीय संपत्ती शेतक-याने निर्माण केली व शिपायांनी राखली तिची देशभर वाटणी होण्याला बिनव्याजी भांडवलवाल्या दुकानदारांची तितकीच जरुरी आहे. हा वर्ग डोईजड होऊन बहुजन समाजाचे रक्त बिनहक्क शोषणार नसेल तर ह्यालाही पुढे आणण्यासाठी आमच्या पक्षाने झटणे अवश्य आहे.


सहावा, मजूरवर्ग : ह्यात बाजारभावाप्रमाणे वेतन घेऊन अंगमेहनत करणारेच नव्हेत तर बद्धिचातुर्य लढवणारे वकील, डॉक्टर यांचाही समावेश होण्याचा संभव आहे. परंतु हा दुसरा वर्ग आपल्या विद्याबळामुळे आपल्या गरजेपेक्षा जास्त धनसंचय करून अधिकारपदावरही सहजच जाऊन बसतो. इतकेच नव्हे तर आपल्या विद्येच्या व चळवळी स्वभावाच्या जोरावर बहुजन समाजाचे पुढारीपणही बहुतेक हिस्से त्याच्याच वाट्याला येते. असे लोक तत्त्वतः मजून असले तरी वस्तुतः मागासलेले नसल्यामुळे त्यांच्या हितसंबंधांची जबाबदारी त्यांच्यावरच टाकणे बरे. बाकी उरलेल्या ख-या अंगमेहनती मजुरांची दाद आमच्या पक्षाशिवाय इतर कोठेच लागणे शक्य नाही. मजूरही डोईजड झाल्यास त्यांची समजूत करण्याचा अधिकार बहुजन पक्षालाच आहे.


सातवा, अस्पृश्यवर्ग : अस्पृश्यपणामुले हा वर्ग मागासलेलाच आहे; एवढेच नव्हे तर चिरडला गेला आहे. धर्माची, परंपरेची, रूढीची अगर दुसरी बहुजन समाजात एकजीव करणे हे ह्या पक्षाचे केवळ पवित्र कार्य आहे. पुष्कळशी संधी वायफळ वादात, ढोंगी ठरावात व मतलबी सहानुभूतीत अगोदरच दवडली गेली असल्यामुळे ह्या वर्गातील व्यक्तींना साहजिकच भलतेच वळण लागू लागले, म्हणून आमच्या पक्षाने सावध राहिले पाहिजे.


आठवा, स्त्रीवर्ग : चालू राज्यक्रांतीत आमच्या देशातील स्त्रीवर्गाच्या हाती काहीच लाभले नाही. आमचा पक्ष विद्वानांचा नाही; वक्त्यांचा नाही; ओरडणा-यांचा नाही, म्हणून तो स्त्रीवर्गाला विसरणारा आहे असे थोडेच होणार आहे? स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा. त्यांची हयगय करू तर पाळण्यातच आमचे थडगे डोलू लागेल. हे आम्ही पूर्ण जाणून आहोत.


येथवर आम्ही केवळ वर्गवारीने हितसंवर्धनाचै निरीक्षण केले. पण ज्यांची वर्गवारी मुळीच करता येत नाही असे पुष्कळ हितसंबंध आहेत. सक्तीच्या शिक्षणाचा, मद्यपाननिषेधाचा, धार्मिक विधी व सामाजिक परंपरा पाळण्याच्या बाबतीत स्वयंनिर्णयाचा इत्यादी कोणताही पक्ष घ्या. हे सर्व राष्ट्रीय असूनही स्वतःस ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाराच पक्ष जेव्हा त्यांच्या आड येतो आणि ‘प्रागतिक’ म्हणवून घेणारा आपले हात टेकतो तेव्हा बहुजन समाजास जागे करून त्याला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कठीण काम करण्यासाठी आमच्यासारख्या एखाद्या स्वतंत्र व नवीन पक्षाला पुढे येणे जरूर आहे. राष्ट्रहिताची ज्याला चाड असेल त्याच्या हिताला आमचाही विरोध नसेल. ते सर्व आम्हांला सामील होतील, निदान साहाय्य तरी करतील अशी आम्हांला उमेद आहे.”२

विठ्ठल रामजी शिंदे
नानाची पेठ, भोकरवाडी, पुणे
१ सप्टेंबर १९२०


समाजामधील अस्पृश्यवर्ग, शेतकरीवर्ग, स्त्रीवर्ग तसेच इतर मागासलेले वर्ग ह्या सा-यांची उन्नती करण्याबद्दल विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनात अतीव तळमळ होती. सामाजिक पातळीवरून विशेषतः अस्पृश्यवर्गाची सेवा करण्याचा आतापर्यंत तळमळीने प्रयत्न केला होता. प्रत्यक्ष राजकाणात प्रवेश करून व कायदेमंडळावर प्रतिनिधित्व करून ह्या सा-या मागासवर्गाची सेवा अधिक परिणामकारक रीतीने करता येईल काय हे शिदे यांना पाहावयाचे होते असे दिसते. अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्यासाठी आतापर्यंत केले त्यापेक्षाही अधिक प्रयत्न जारीने करणे आवश्यक आहे त्यांना वाटत होते. अस्पृश्यवर्गाबद्दल त्यांना वाटणारी आस्था तिळमात्र कमी झालेली नव्हती अशी वस्तुस्थिती असली तरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून मिशनबद्दल व खुद्द शिंदे यांच्याबद्दल केवळ तक्रारीचाच नव्हे तर टीकेचा सूर अस्पृश्यवर्गातून शिकलेल्या तरुणांकडून आणि काही पुढा-यांनकडून तीव्रपणे उमटू लागला होता. कदाचित या कारणांनीही असेल. अस्पृश्यवर्गाबद्दलची उन्नती करण्याची आपली भूमिका व प्रयत्न कायम ठेवून कायदेमंडळात जाऊन आपल्या कार्याचे क्षेत्र अधिक विस्तृत करावे व लोकप्रतिनिधी म्हणून अस्पृश्यांसकट अन्य मागासवर्गाची सेवा करावी, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटावे असे शिंदे यांना वाटले असावे व म्हणूनच त्यांनी निवणुकीस उभे राहण्याची आपली तयारी दाखविली असावी.


निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रारंभिक अवस्थेत राष्टवादी मराठे तसेच सत्यशोधकी अथवा ब्राह्मणविरोधी मराठे ह्या दोन्ही पक्षांनी शिंदे यांच्या उमेदवारीस जोराच पाठिंबा दर्शविला खरा, परंतु हे चित्र शेवटपर्यंत तसेच टिकून राहिले नाही. ह्यामध्ये दिसून आलेली मतमतांतरे व भूमिकांमधील पालट चित्तव्धक म्हणावेत अशा प्रकारचे दिसून आले. पुण्याच्या ह्या जागेसाठी श्री. न. चिं. केळकर हे जहालांमार्फत, शेठ मानूरकर हे मवाळांमार्फत आणि वासुदेवराव गुप्ते व विठ्ठल रामजी शिंदे हे दोघे स्वतंत्र असे चार उमेदवार उभे होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिले आहे की, “पैकी वासुदेवराव गुप्ते यांना कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांचा पूर्ण पाठिंबा होता. स्वतः महाराज आणि त्यांचे दिवाण रा. ब. सबनीस हे पुण्यास येऊन राहिले होते.” शिंदे यांनी असे जरी नमूद केलेले असले तरी निवडणूकीच्या प्रारंभी श्रीमंत शाहू छत्रपतींनी विठ्ठल रामजी शिंदे यांना पाठिंबा प्रकट केला होता. शिंदे यांनी इलेक्शनला उभे राहण्याचे ठरवल्यानंतर शाहूमहाराजांना समाधान वाटले. ते त्यांनी पुढील पत्रातून प्रकट केले.


आपण आम्हा सर्वांचे विनंतीस मान देऊन इलेक्शनला उभे राहण्याचे कबूल केले याबद्दल आम्हास आपले उपकार वाटत आहेत. आपल्यासारखे योग्य पुरुष मराठा समाजाला काय तर कोणत्याही समाजाला लाभले तर फारच उत्तम आहे. इलेक्शनच्या कामी माझ्या हातून जी सेवा होईल ती मोठ्या आनंदाने करीन.

शाहू छत्रपति३


विठ्ठल रामजी शिंदे यांना मदत करण्यासाठी त्यांचे बडोद्याचे मित्र श्री. खासेराव जाधव पुण्यास दोन महिने येऊन राहिले होते व निवडणुकीच्या खर्चाची जबाबदारी त्यांनी स्वतः उचलली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांनी पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली भवानी पेठेत सभा भरली होती. या सभेमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी श्री. न. चिं. केळकर यांनी भाषण केले त्यात त्यांनी आपले वाडवडील शेतकरी होते. आपण मराठा पत्राचे संपादक आहोत म्हणून मराठेच आहोत असे सांगितले. ही बातमी ऐकल्यानंतर श्रीमंत शाहूमहाराजांनी स्वतःच्या सहीने विठ्ठल रामजी शिंदे यांना पत्र पाठविले ते असे:


रायबाग कँप
रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांस
सप्रेम लोभाची वृद्धी असावी ही विनंती.
मला मनापासून आपले अभिनंदन करण्याची परवानगी द्या. आपण शहरातर्फे निवडून यावे अशी माझी आशा आहे. नरसिंह चिंतामण केळकर म्हणतात की “मी मराठा आहे म्हणून मला निवडून द्यावे. कारण मी मराठा वर्तमानपत्र चालवितो.” त्याच्यावर मी म्हणतो की, माझ्या बैलाचे नाव ‘ब्रिटानिया’ ठेवले आहे, माझ्या आवडत्या घोड्याचे नाव ‘टर्किश फ्लॅग’ ठेवले, माझ्या गायीचे नाव ‘जपानिका’ ठेवले म्हणून का मी जपानी अगर टर्की लोकांचा पुढारी होणे योग्य होईल? वि. रा. शिंदे मराठेवर्गापैकी आहेत. जपानातील सामुराई वर्गाने (क्षत्रिय) आपले उच्च स्थान सोडून सर्व लोकांस आपल्या बरोबरीचे केले व देशोन्नती केली तसे शिंद्यांनी केले आहे. मी पुण्यास लवकर येणार आहे. भेटीअंती सर्व खुलासा होईल. परमेश्वर आपणास इलेक्ट करो.


ता. क. जहाल असो किंवा मवाळ असो, जपानी असो की टर्किश असो आमचे धोरण असेच की, ज्यात जनतेचे धोरण त्याशी आम्ही सहाय्य करणेचे व आमचा पक्ष स्वतंत्रच रहावयाचा. सत्य पक्षाशी नेहमी सहाय्य करण्याचे हेच ना आम्ही ध्येय ठेवण्याचे? ह्यात काय चुकत असल्यास लिहून कळवावे. आपण वृद्ध अनुभवशीर आहात म्हणून मी आपल्या उपदेशाची अपेक्षा करीत आहे.


ता. क. आम्ही कोणातच मिळू इच्छित नाही. सत्य असेल तेथे मिसळल्याशिवाय राहणार नाही. हेच ना आम्ही मुलांनी ध्येय ठेवायचे? लोभ करावा ही विनंती.
शाहू छत्रपति४


छत्रपती शाहूमहाराजांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल अतीव आदराची भावना प्रकट केली व निवडणुकीत त्यांना यश लाभावे याबद्दलही पत्रामधून शुभेच्या प्रकट केल्या, मात्र श्रीमंत शाहू छत्रपती शाहूमहाराजांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल अतीव आदराची भावना प्रकट केली व निवडणुकीत त्यांचा यश लाभावे याबद्दलही पत्रामधून शुभेच्या प्रकट केल्या, मात्र श्रीमंत शाहू छत्रपतींची ही भूमिका अखेरपर्यंत टिकून राहिली असे मात्र दिसत नाही. ह्या संदर्भात एक घटना नोंद घेण्याजोगी घडली असे दिसते. या निवडणूकीच्या धामधुमीच्या काळात श्री शिवाजी मराठा सोसायटीची एक सभा भवानी पेठेतील पालखीच्या विठोबाच्या धर्मशाळेत ३ ऑक्टोबर १९२० रोजी भरली होती. काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरास क्षात्रजगदगुरूच्या निर्मितीची कल्पना उदित झाली होती. या बाबतीत मराठा समाजातले लोकमत आजमावून पाहावे असे शाहू छत्रपतींना वाटत होते. सभेच्या प्रारंभी श्री. शिवाजी मराठा सोसायटीच्या विद्यार्थ्यांचे कसरतीचे व लाठीकाठीचे खेळ झाल्यावर संस्थेचे सेक्रेटरी श्री. बाबुराव जगताप यांनी संस्थेचा अहवाल वाचला. छत्रपतींनी जो मराठा क्षात्रजगदगुरू नेमण्याचा विचार चालवला होता ह्या संदर्भात तेथे जमलेल्या प्रमुख मंडळींनी आपले विचार मांडावेत असे आवाहन केले. ह्या बाबतीत रा. ब. वंडेकर यांचे भाषण झाले. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांनीही आपली भूमिका मांडावी असे शाहू छत्रपतींनी सुचविल्यानंतर शिंदे म्हणाले, “धार्मिकबाबतीत काही वाद निघाल्यास त्यात अखेरचे मत अभिषिक्त राजाने द्यावे अशी परंपरा पहिल्या शाहूमहाराजापासून आहे, असे इतिहास सांगतो. आता छत्रपती शाहूमहाराजांनी दुस-या कोणास जगदगुरू न नेमता त्याचे सर्व अधिकार आपणच चालवावेत.” विठ्ठल रामजी शिंदे यांची भूमिका ही त्यांच्या प्रार्थना अथवा ब्राह्मसमाजाच्या भूमिकेशी सुसंगत अशीच होती. परमेश्वर आमि भक्त यांच्यामध्ये कोणीच मध्यस्थ असू नये ह्या भूमिकेचे हे मतप्रतिपादन स्वाभाविक पर्यवसान होते. मराठ्यांचे अभिमानी असणा-या मंडळींना अथवा तीव्र स्वरूपाचा ब्राह्मणविरेध असणा-या मंडळींना शिंदे यांची भूमिका पटणारी नव्हती. शिंदे यांच्यानंतर भास्करराव जाधव यांचे आवेशयुक्त भाषण झाले. जाधवांच्या भाषणातील एका विधानावर मुंबईचे श्री. रामचंद्र अर्जुन गोळे यांनी आक्षेप घेतला. त्यावर गोंधळ माजून सभेत प्रत्यक्ष मारामारीस सुरुवात झाली. अशा स्थितीतही खासेराव जाधवांनी श्री. शाहू छत्रपतींचे आभार मानून सभा विसर्जन केल्याचे जाहीर केले. ह्या मारामारीत श्री. बाबुराव जेझे व गं. मु. काळभोर यांना बराच मार बसला. जागृतीकार पाळेकरही ह्या सभेला उपस्थित होते, परंतु त्यांच्या डोक्यावर बडोद्याचे पागोटे असल्यामुळे ते परस्थ आहेत या समजुतीने मारामारीतून बचावले.”५


ह्या उधळल्या गेलेल्या सभेचा परिणाम शिंदे यांच्या निवडणुकीवर निश्चितपणे झाला. कारण ज्या सर्व पक्षांच्या मराठ्यांनी मिळून त्यांना निवडणुकीसाठी उभे केले होते त्यांच्यामध्येच फूट पडली. राष्ट्रवादी मराठ्यांच्या म्हणजेच शिंदे यांच्या विरोधात सत्यशोधकी विचाराची अथवा ब्राह्मणेतरवादी मराठा मंडळी गेली.


या सुमारास महात्मा गांधींनी कौन्सिलप्रवेशावर बहिष्कार टाकण्याची असहकाराची चळवळ जोरात सुरू केली. म्हणून न. चिं. केळकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली व शिंदे यांनाही निवडणुकीत अपयश आले. सत्यशोधकी विचाराच्या मराठ्यांप्रमाणे छत्रपती शाहूमहाराजांची शिंदे यांच्याबद्दलची भूमिका कदाचित ह्या सभेत प्रकट झालेल्या मतामुले बदलली असण्याची शक्यता आहे. कारण छत्रपती शाहूमहाराजांचा पूर्ण पाठिंबा वासुदेवराव गुप्ते यांना होता व स्वतः महाराज व त्यांचे दिवाण रा. ब. सबनीस हे पुण्यास येऊन राहिले होते असे शिंदे यांनी याबाबतीत नमूद केलेले आहे. एवढे खरे की, शाहू छत्रपतींचे ह्या निवडणुकीत साहाय्य मिळाले नाही. मात्र शिंदे यांचे मित्र खासेराव जाधव ह्यांनी या निवडणुकीनिमित्त दोन महिने आपला मुक्काम पुण्यामध्ये ठेवला. शिंदे यांना मते मिळावीत यासाठी घरोघर हिंडण्याचे परिश्रम घेतले व हजारो रुपयांचा खर्च केला. खासेराव जाधवांनी दाखविलेले प्रेम व केलेले कष्ट याबद्दल विठ्ठल रामजी शिंदे यांना त्यांच्याबद्दल अतिशय कृतज्ञता वाटली. पुण्यातील स्थानिक मंडळींपैकी ‘विजयी मराठा’कार श्रीपतराव शिंदे, गंगारामबुवा काळभोर, बाबुराव जेधे व केशवराव जेधे आणि शिंदे यांचे लष्करातील मित्र डॉ. मोदी यांनी जी निष्कामपणे ह्या निवडणुकीत शिंदे ह्यांना मदत केली त्याबद्दलही शिंदे यांना त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटली. ह्या निवणुकीत मराठा मंडळींमध्ये पडलेली फूट व मराठा समाजात निर्माण झालेला अंतर्गत पुढील काळात टिकून राहिला.


संदर्भ

१.    दि रिफॉर्म्स कमिटी, Vol.II कलम ६४०४-०६.
२.    वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ३०६-३०८.
३.    तत्रैव, पृ. ३०९.
४.    तत्रैव.
५.    भगवंत पाळेकर, जागृतिकार पाळेकरः आत्मवृत्त आणि लेखसंग्रह, बडोद, पृ. ४२-४३.

  1. हुजूरपागा शाळा आणि शांता सुखटणकरची करुण कहाणी
  2. हिंदू गृहस्थिती आणि समाजस्थिती व्याख्यान व नाट्यप्रयोग
  3. स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि धर्मप्रचारकार्याला आरंभ
  4. सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व
  • 106
  • 107
  • 108
  • 109
  • 110
  • 111
  • 112
  • 113
  • 114
  • 115
Page 111 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी