1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मिशनच्या स्थापनेचा संकल्प

विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया) हि संस्था अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यतानिवारणाचे आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाची उन्नती करण्याचे कार्य करण्यासाठी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी स्थापन केली. या संस्थेची स्थापना ही केवळ अस्पृश्यवर्गाच्या दृष्टीनेच नव्हे तर भारतीय समाजाची पुनर्घटना करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना होती. ही संस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने शिंदे यांची पूर्वतयारी कसकशी होत गेली व अखेर त्यांच्या ठिकाणी ही प्रेरणा कशी निर्माण झाली ते पाहू.

घरच्या उदारमतवादी वातावरणाचे संस्कार तर विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर बालपणीच झाले होते. मॅट्रिकच्या वर्गात आणि कॉलेजमध्ये गेल्यावर ह्या संस्कारांना बुद्धीवादी विचाराची जोड मिळाली. परंतु विठ्ठल रामजी हे केवळ विचाराच्या पातळीवर थांबणारे व्यक्तिमत्त्व नव्हते. विचार आचरणात आणण्याचा सच्चेपणा आणि धडाडी त्यांच्या ठिकाणी होती. अस्पृश्य मानल्या गेलेल्या व्यक्तीच्या सुधारणेची पहिली कृती त्यांच्याकडून १८९३ मध्ये घडली. विठ्ठलराव फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रीव्हियसच्या वर्गात शिकत असताना मे महिन्याच्या सुटीत जमखंडीला आले. त्या वेळी त्यांना एक अस्पृश्य जातीची पाच-सात वर्षांची मुलगी देवाला मुरळी म्हणून वाहिलेली आढळली. मुरळी म्हणून तिचे आयुष्य नासले जाऊ नये, तिला माणुसकीचे जिणे जगता यावे यासाठी त्यांनी कळकळीचे प्रयत्न करावयाचे ठरविले. त्यांनी तिला शाळेत घालण्याचा प्रयत्न केला. पण त्या काळी अस्पृश्य मुलीस जमखंडीसारख्या संस्थानातील शाळेत प्रवेश मिळणे शक्य नव्हते. म्हणून ते तिला आपल्या घरीच शिकवीत असत. विठ्ठलरावांच्या आईनेही त्या मुलीला प्रेमळपणे वागविले. नंतर ही मुलगी जमखंडी येथील अस्पृश्य मुलींच्या शाळेत शिक्षिका झाली.१ अस्पृश्यवर्गीयांबद्दल शिंदे यांनी पहिले कार्य केले ते हे.

अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबाबत आपण काहीएक कार्य करावे ही जाणीव त्यांच्या मनात उद्भूत झाली होती. बारामतीचे रा. कळसकर यांची आणि विठ्ठलरावांची भेट झाली, याचा वृत्तान्त त्यांनी २२ मे १८९८ या तारखेस रोजनिशीमध्ये लिहिला आहे. ह्या नोंदीवरून महार, मांग या अंत्यज समजल्या जाणा-या जातींबद्दल त्यांना वाटणारी कळकळ किती उत्कट स्वरूपाची होती व या लोकांच्या उन्नतीसाठी आपण काहीएक करावयास पाहिजे याबद्दलची जाणीव कशी तीव्र स्वरूपाची होती याची कल्पना येऊ शकते.२

इंग्लंडमधील दोन वर्षांच्या वास्तव्यात युनिटेरियन धर्ममताच्या मंडळींनी चालविलेल्या डोमेस्टिक मिशनसारख्या संस्था ह्या लंडन, मँचेस्टर वगैरे औद्योगिक शहरात दीन, दुबळे अपंग, बाल आणि वृद्ध इत्यादिकांसाठी परोपकराची कामे करतात व दीन-दुबळ्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात ह्याचे त्यांनी जवळून निरीक्षण केले होते. अशा प्रकारची मिशन चालविणारी मंडळी ही कामे जीव ओतून समर्पणशील वृत्तीने करतात म्हणूनच ह्या प्रकारच्या मिशनची कामे सातत्याने व सफळपणाने चालू शकतात हेही त्यांच्या अनुभवास आले होते. दीन-दुबळ्यांची सेवा करणे हे धर्मकार्यच आहे, अशी ह्या मंडळींची धारणा ह्या कामाच्या मुळाशी होती.

इंग्लंडमध्ये बघितलेल्या मिशनचा विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला.३ अशा प्रकारच्या कामाची गरज सगळ्यात अधिक कुणाला असेल तर ती अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाला असेच त्यांच्या डोळ्यांसमोर आले असणार. शिंदे १९०१च्या डिसेंबरमध्ये नाताळची सुटी लंडनमध्ये घालविण्यासाठी गेले होते. त्या वेळी २२ तारखेस पोर्टलंड स्ट्रीटमधील युनिटेरियन देवळात रेव्ह. पेरिसचे आफ्रिकेतील लढाईसंबंधी जोरदार प्रतिकूल मत प्रकट करणारे व्याख्यान ऐकले होते. रेव्ह. पेरिसची भूमिका त्यांच्या मनाला एकदम पटली. व्याख्यानात त्यांनी म्हटले होते, “धर्म जर व्यवहारात येत नसेल, अगर कोणताही नीतीचा अथवा न्यायाचा व्यवहार धर्मात गणला जात नसेल तर मी आजच प्रचारकपदाचा राजीनामा देईन.”४

विठ्ठल रामजी शिंदे हिंदुस्थानात परत आले ते तेथील मिशनच्या कामाचे निरीक्षण करून. लोकोपयोगी काम कृतज्ञतेची भावना आणि धर्मकार्य यांची एकरूपताही त्यांच्या मनाला पटली होती. हिंदुस्थानात परत आल्यानंतर बडोद्यास गेले असता अस्पृश्यवर्गाच्या शाळांची तपासणी त्यांनी केली होती. श्रीमंत सयाजीरावमहाराजांनी चालविलेले हे कार्य किती उच्च दर्जाचे आहे हे त्यांच्या मनाला भावलेच. मात्र महाराजांच्या या उदात्त कार्याला रूढीमुळे पडलेली मर्यादाही त्यांच्या ध्यानात आली. ही मुले मराठी पाचवी किंवा इंग्रजी दुसरी-तिसरीनंतर शाळा सोडून देतात. कारण त्यांनी परिश्रमपूर्वक विद्या संपादन केली तरी त्यांना तिचे फळ पुढे मिळण्याची कोणतीच सोय असत नाही. “हिंदू समाज त्यांना आपल्यातील एक म्हणून स्वीकारीत नाही. नोकरीच्या बाबतीत इतरांबरोबर समान संधी देत नाहीत म्हणून महाराजांची राजसत्ता आणि अमर्याद सहानुभूतीचा ओघ असूनदेखील हिंदू समाजाच्या सहानुभूतीच्या अभावी ह्या शाळांची फारशी प्रगती होऊ शकत नाही,”५ असा आपला अभिप्राय त्यांनी कथन केला.

बडोत्यात सयाजीरावमहाराजांनी चालविलेले अस्पृश्यांच्या शिक्षणाचे हे कार्य पाहून विठ्ठल रामजी शिंदे प्रभावित झाले. ह्या वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करण्याची गरज आहे हे त्यांना तीव्रपणाने जाणवले. येथील शाळांत शिकणारी मुले भविष्यकालीन संधीच्या अभावी वैफल्याने शिक्षण अर्ध्यावरच सोडून देतात व अशोभनीय असा पारंपरिक धंदा करण्याकडे प्रवृत्ती न राहिल्याने ते आळशीपणा जास्त प्रतिष्ठेचा मानू लागतात असे त्यांच्या पाहण्यात आले. ह्याच वेळी त्यांनी आपल्या मनामध्ये अशी खूणगाठ बांधली असेल की, ह्या मुलांना केवळ शालेय शिक्षण देणे पुरेस ठरणार नाही. जोडीला औद्योगिक शिक्षण देण्याचीही गरज आहे.

ह्या सा-या निरीक्षणामुळे, अनुभवामुळे व अस्पृश्य मानलेल्या वर्गाबद्दल त्यांच्या ठिकाणी असणा-या आंतरिक कळकळीमुळे ह्या लोकांच्या सुधारणेसाठी आपण काहीएक करावे अशी प्रबळ ऊर्मी शिंदे यांच्या मनामध्ये निर्माण झाली. ह्याच सुमाराला म्हणजे १९०३च्या अखेरीस नागपूरजवळील मोहपा या गावचे महार तरुण श्री. किसन फागुजी बनसोडे हे त्यांच्या सहवासात आले. एका मराठा तरुणाच्या प्रेरणेने त्यांनी मोहपा येथे सोमवंशीय हितचिंतक मंडळी ही संस्था स्थापन केली.६ तेव्हापासून व्याख्याने, चर्चा आणि पंधरवड्यातून धार्मिक ग्रंथाचे वाचन करण्यासाठी आणि भजन करण्यासाठी होणा-या बैठका अशा प्रकारच्या प्रयत्नातून या संस्थेने स्वोद्धाराचे काम चालविले आहे. मोहपा येथील अंत्यज लोकांनी स्वोद्धाराच्या प्रेरणेने स्थापन केलेली ही संस्था एकत्रितपणे कार्यरत होती. ह्या संस्थेचे सेक्रेटरी किसन फागुजी बनसोडे यांचा पोस्ट मिशनच्या द्वारा मुंबई प्रार्थनासमाजाशी संबंध आला होता. प्रार्थनासमाजाच्या वार्षिकोत्सवाला त्यांना प्रतिनिधी म्हणूनही निमंत्रित केले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी २४ डिसेंबर १९०५ रोजी सुबोधपत्रिकेमध्ये लिहिलेल्या लेखात एका मराठा सद्गृहस्थाच्या प्रेरणेने मोहपा येथील ही संस्था सुरू झाल्याचे सेक्रेटरीकडून कळते असे लिहिलेले आहे. हे मराठा गृहस्थ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द विठ्ठल रामजी शिंदे हेच असावेत. प्रेरणा देणारे गृहस्थ त्यांच्याशिवाय अन्य कोणी असते तर मात्र शिंदे यांनी त्या व्यक्तीचे नाव यथायोग्य श्रेय देण्याच्या हेतूने निश्चित दिले असते. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये पाहता हे मत मांडावेसे वाटते.

धर्मकार्य आणि अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेचे कार्य ह्यांच्यामध्ये शिंदे यांनी एकरूपता मानली होती. प्रार्थनासमाजाच्या कार्याचा दौरा करीत असताना धर्मप्रचाराच्या जोडीने गोरगरिबांसाठी काय करता येईल व अस्पृश्यवर्गासाठी काय करता येईल याबद्दल त्यांचा विचार व प्रयत्न सतत चालू असत. १९०५ सालच्या प्रारंभी पुण्यात प्रार्थनासमाजाचे काम करीत असताना त्यांनी मीठगंज पेठेत अस्पृश्यांसाठी रामनवमीच्या दिवशी एक शाळा उघडली. पुढील काळात धर्मप्रचार कार्यासाठी केलेल्या दौ-यातही अस्पृश्यवर्गासाठी ते सतत प्रयत्न करताना दिसतात.

ज्या काळामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनात अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी व अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्यासंबंधी कळकळीचे विचार होत होते व त्या दृष्टीने त्यांच्याकडून काहीएक प्रयत्न होण्यास सुरुवात झाली होती त्या काळात जातिभेदाचे आणि उच्चनीचपणाचे कडक निर्बंध समाजातील सगळ्याच थरांमध्ये पाळले जात असत. जातिभेदविषयक हे निर्बंध केवळ खेडवळ वा अशिक्षित लोकांतच पाळले जात असत असे नव्हे, तर इंग्रजी शिक्षण घेतलेले, राष्ट्रकार्य करावयास प्रवृत्त झालेले राष्ट्रसभेतील ब्राह्मण पुढारीही हे निर्बंध काटेकोरपणाने पाळावेत याबद्दल दक्ष असत. “राष्ट्रसभेच्या अधिवेशनात सहभागी होणारे प्रतिनिधी आपल्याबरोबर खाण्यापिण्याचे जिन्नस घेऊन येत वा स्वतःचा वेगळा स्वयंपाक करीत आणि आपल्या सहप्रतिनिधींची अशुभ दृष्ट लागू नये म्हणून दरवाजा लावून जेवण उरकीत.”७ काही सधन मंडळी तर आपल्यासाठी ब्राह्मण स्वयंपाक्याची व्यवस्था केली जावी, इतकीच मागणी करून थांबत नसत, तर स्वयंपाकी विवक्षित उपजातीचा असला पाहिजे असाही आग्रह धरीत. अलाहाबाद काँग्रेसच्या आधी ११ एप्रिल १९०८ रोजी आर. सप्रू यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना लिहिले आहे, "आपण फार तर ब्राह्मण स्वयंपाकी पुरविण्याची व्यवस्था करावी, पण एखाद्या विवक्षित उपजातीचा ब्राह्मण स्वयंपाकी हवा, असा ज्यांचा आग्रह असेल त्यांनी आपल्याबरोबर स्वतःचा स्वयंपाकी आणावा असे आपण ठरविले तर बरे होईल.”८ सप्रू यांनी गोखल्यांना केलेल्या या सूचनेत सुधारणेचा टप्पासुद्धा किती मर्यादित होता याची कल्पना येऊ शकेल. अशा या काळात सवर्णातील जातिभेद ओलांडण्याचा प्रश्न नव्हे तर हजारो वर्षांपासून ज्या जातीच्या लोकांना अस्पृश्य मानण्याचा निर्बंध शेकडो वर्षांपासून चालत आलेला होता ते मोडून त्यांच्याशी केवळ स्पर्शाचा व्यवहार नव्हे तर त्यांच्यासमवेत भोजनादिक व्यवहार करणे केवढे धाडसाचे म्हणावे लागेल. ह्या जातीच्या सुधारणेसाठी शाळा सुरू करणे ह्यासारखे उपक्रम तर त्यांनी सुरू केले होतेच. पण व्यक्तिगत पातळीवर अस्पृश्यता न पाळता ह्या मंडळींशी भोजनादिक व्यवहार स्वतःच्या घरामध्ये अत्यंत स्वाभाविकपणे सुरू केला होता. बडोद्याचे जागृतीकार भ. ब. पाळेकर यांनी लिहिले आहे, “१९०५ साली प्रसिद्ध अस्पृश्योद्धारक विठ्ठल रामजी शिंदे त्या वेळी प्रार्थनासमाजाच्या राममोहन आश्रमात राहत होते. त्यांचा माझा परिचय झाला. एके वेळी त्यांचेकडे नागपूरचे अस्पृश्य समाजातील मुख्य कार्यकर्ते रा. किसन फागुजी बनसोडे, गणेश आकाजी गवई वगैरे मंडळी जेवावयास होती. श्रीयुत शिंदे यांनी मला व माझ्या पत्नीलाही जेवणाचे आमंत्रण दिले. १९०६ सालची ही गोष्ट. माझ्या पत्नीला इतक्या जुन्या काळी अस्पृश्य जातीच्या पंक्तीला जेवण्यास आपण अधर्माचरण करीत आहोत असे वाटले नाही. खुद्द शिंदे यांनाही आम्हा दोघांविषयी आदर वाटला.”९ राष्ट्रसभेतील उच्चवर्णीय प्रतिनिधींपेक्षा विठ्ठल रामजी शिंदे यांची वृत्ती आणि आचरण किती पुढारलेले होते याची कल्पना ह्या प्रसंगावरून येऊ शकते.

राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनाच्या वेळी भरविल्या जावयाच्या धर्मपरिषदेच्या कामानिमित्त विठ्ठल रामजी शिंदे यांचा १९०३ डिसेंबरपासून भारताच्या ह्या ना त्या प्रांतात सदैव प्रवास चाललेलाच होता. भारताच्या विविध प्रांतांमध्ये अस्पृश्यता किती काटेकोरपणाने पाळली जाते व अस्पृश्य मानलेल्या या लोकांवर किती भयंकर अन्याय केला जातो याचे विदारक चित्र त्यांना पाहावयाला व ऐकावयाला मिळत होते. जुन्या मलबार प्रांतात अस्पृश्यवर्गीयांना साक्षात पशूचे अथवा गुलामाचे जिणे जगावे लागत असे हे शिंदे यांनी पाहिले होते. तेथील शेतावर प्रत्यक्ष देह झिजवून कष्ट करणारे चेरुमा जातीचे लोक हे वंशपरंपरेने त्या जमिनीवरच झोपड्या बांधून राहत असत. एखाद्या जमिनीची विक्री झाली म्हणजे जमिनीवरील झाडे, माती जशी नवीन मालकाच्या ताब्यात कायदेशीरपणे जात असे त्याचप्रमाणे ह्या चेरुमांचीही मालकी नवीन शेतमालकामकडे जात असे. शेतावरची ही कुळे जनावराप्रमाणेच इतरांना भाड्यानेसुद्धा दिली जात असत. एवढेच नव्हे तर अशा गुलामांची रीतसर खरेदी विक्री होत असे व यासंबंधीचे खटलेही कोर्टात जात असत. कर्नल अल्कॉट यांनी आपल्या पुअर पारिया ह्या पुस्तकात २२ मे १९००चा एक कर्जरोख्याचा उतारा दिलेला आहे. ह्या कर्जरोख्यात कुटुंबकर्ता, त्याची बायको व मुले कर्जापोटी स्वतःला गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज काढीत असे नमूद केल्याचे पाहावयास मिळते.१० धर्मांतर केल्यानेही ह्या लोकांच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला नव्हता. ते पूर्वीच्याच हीन दशेत होते असे त्यांना दिसून आले. त्रिचनापल्ली या शहरात एक भयंकर दृश्य त्यांना दिसले. ते पूर्वीच्याच हीन दशेत होते असे त्यांना दिसून आले. त्रिचनापल्ली या शहरात एक भयंकर दृश्य त्यांना दिसले. एके दिवशी ते मोठ्या रस्त्याने चालले असताना समोरून म्युनिसिपालटीचा अवजड केराचा छकडा रखडत येताना दिसला. त्यास एकीकडे एक म्हातारा रेडा जुंपला होता व दुस-या बाजूस एका तरुण मजुरानेच आपली मान लावली होती. मोठ्या करुणेने शिंदे यांनी त्याची जात विचारली तेव्हा त्याने मोठ्या आढ्यतेने आपण रोमन कॅथॉलिक(ख्रिस्ती) असे सांगितले. त्यांनी अत्यंत सहानुभूतीने त्याची पूर्वाश्रमीची जात विचारली तेव्हा त्याने पारिया असे सांगितले. केरळ अथवा मलबार प्रांतात धर्मांतरित पारियांची अवस्था साक्षात पशूचीच असल्याचे त्यांना दिसून आले.११

काठेवाडातील आगगाडीमध्ये धेडांना डबा राखून ठेवीत असत. त्यांना इतरांच्या डब्यात प्रवेश करता येत नसे हे शिंदे यांनी स्वतः पाहिले होते.

गुजराथ येथील नवसारी प्रांतातील जंगलामध्ये असलेल्या सोनगड या गावी विठ्ठल रामजी शिंदे १९०५ साली गेले होते. ढाणके या जंगली जातीतील मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशी वसतिगृहे श्रीमंत सयाजीरावमहाराजांनी स्थापन केली होती. ह्या वसतिगृहाचे सुपरिटेंडेंट फत्तेखाँ नावाचे मुसलमान गृहस्थ प्रार्थनासमाजीय होते. त्यांनी ह्या लोकांबाबत एक मनोरंजक हकिकत सांगितली. श्रीमंत सयाजीरावमहाराज हे ह्या लोकांची परिस्थिती स्वतः बघण्यासाठी जंगली प्रदेशात आले असता तेथे त्यांना कोणीच माणसे दिसेनात. हे गूढ काय आहे याचा तपास केल्यावर पुरुष व बायकामुले ही सर्व झाडावर उंच चढून बसलेली दिसली. महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला पाहून या लोकांची सुधारणा अवश्य केली पाहिजे असा महाराजांनी निश्चय केला. मानवी संस्कृतीपासून कितीतरी योजने अशा प्रकारचे लोक दूर आहेत हे या हकिकतीवरून शिंदे यांना जाणवले.

हिंदुस्थानच्या विविध प्रांतांत अस्पृश्यवर्गाची होणारी दुर्दशा पाहून विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनाची तळमळ वाढत चालली होती. ह्या वर्गातील लोकांची स्थिती सुधारण्यासाठी काहीतरी केले पाहिजे अशी त्यांच्या मनाला ओढ लागून राहिली. मनाच्या या अवस्थेत त्यांच्या जीवितकार्याची दिशा निश्चित करणारा एक प्रसंग घडला. २८ ऑक्टोबर १९०५च्या अमावस्येच्या रात्री ते अहमदनगरच्या मुक्कामी असताना भिंगार गावची अस्पृश्य मंडळी त्यांना भेटावयास आली व सभेला येण्याबद्दल त्यांना विनंती केली. ह्या प्रसंगी सभेला गेल्यानंतर भाषण करीत असताना आपले सगळे आयुष्य ह्या लोकांच्या उन्नतीसाठी क्षणाचाही वेळ न दवडता समर्पित करावे अशी त्यांना अंतःप्रेरणा होऊन त्यांनी त्याच रात्री तसा संकल्प केला. ह्या प्रसंगाचे वर्णन पुस्तकाच्या प्रारंभी केले आहे. भिंगारच्या ह्या सभेनंतर प्रार्थनासमाजाचे कार्य करीत असताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यवर्गाची सर्वांगीण उन्नती कशी होईल ह्याचा ध्यास घेतला. ता. १७, २४ व ३१ डिसेंबर १९०५च्या सुबोधपत्रिकेच्या अंकामधून त्यांनी ‘अस्पृश्य मानलेल्या वर्गाची उन्नती’ ह्या विषयावर इंग्रजीमधून एक विस्तृत लेख लिहिला. ह्या लेखामध्ये त्यांनी अंत्यजवर्गाच्या उन्नतीच्या प्रश्नाचा आणि प्रयत्नाचा अनेक अंगांनी सखोल ऊहापोह केला. ख्रिस्ती मिशन-यांनी ह्या जातीकरिता जे कार्य केले ते बरेच आणि उदात्त स्वरूपाचे आहे हे त्यांनी मोकळेपणाने मान्य केलेले आहे. मात्र त्यांचा परकीपणा आणि धर्मांतराचा हेतू हे ह्या कामामधील दोन मोठे अडथळे ठरतात असेही नमूद केले. ब्रिटिश सरकारने मात्र कधी काळी जो अलिप्तपणाचा सोपा मार्ग अथवा सात्त्विक निष्क्रियतेचा दृष्टिकोण पत्करला होता त्यालाच ते अजूनही चिकटून आहेत व सरकारचा हा दृष्टिकोण अधिकाधिक बिघडत चालला आहे अशी परखड टीका त्यांनी केली आहे. (इतर प्रार्थनासमाजीयांपेक्षा विठ्ठल रामजी शिंदे यांची ख्रिस्ती मिशनरी व इंग्रज सरकार ह्या दोहोंबद्दलची मते काहीशी भिन्न व विरुद्ध स्वरूपाची होती. ख्रिस्ती मिशन-यांबद्दल सातत्याने सुबोधपत्रिकेमधून तीव्र स्वरूपाचा विरोधाचा सूर लावलेला आढळतो. त्यांच्या चांगल्या कामाबद्दल कधीही उल्लेख केलेला दिसून येत नाही. इंग्रज सरकारबद्दल मात्र टीकेचा सूर प्रार्थनासमाजीयांकडून काढलेला फारसा आढळत नाही. जिथे विरोध प्रकट करणे योग्य वाटते त्या ठिकाणीही प्रार्थनासमाजीय मौन बाळगतात असेच दिसते. या दोहोंबाबत शिंदे यांचा दृष्टीकोण अन्य प्रार्थनासमाजीय मंडळींपेक्षा कसा वेगळा हे अस्पृश्यांबाबतच्या प्रश्नाबाबत त्यांनी मांडलेल्या भूमिकेवरून दिसून येते.)

ह्या लोकांचे भले होण्यासाठी दोन महत्त्वाचे प्रयत्न म्हणून सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचा व प्रार्थनासमाजाकडून होणा-या प्रयत्नाचा त्यांनी निर्देश केला आहे. अस्पृश्यवर्गात जी जागृतीची चिन्हे दिसू लागली होती तीही त्यांना महत्त्वाची वाटली. ख्रिस्ती मिशनरी, इंग्रज मालक आणि थोडेफार शिक्षण ज्यांच्या वाट्याला आले होते त्याचा परिणाम त्या वर्गातील तरुण पिढीवर दिसून येत होता व काही म्हातारी आणि जुन्या वळणाची माणसे तरुण पिढीशी सहकार्य करीत होती. हे लोक आपल्या नव्या आकांक्षांशी जुळणा-या जुन्या धार्मिक प्रथांशी संबंध ठेवीत होते.

ह्या लेखाच्या शेवटी त्यांनी असे प्रतिपादले की, “परोपकारी व्यक्तिंकडून ह्या निराश्रित लोकांच्या सुधारणेसाठी होणारे प्रयत्न व खुद्द त्या वर्गातील मंडळींकडून स्वोद्धारासाठी होणारे प्रयत्न हे हल्लीच्याप्रमाणे अलग चालू राहिले तर ते थकून बंद पडतील. म्हणून मुंबईची ‘सोशल रिफॉर्म असोसिएशन’ आणि ‘प्रार्थनासमाज’ ह्या दोन्ही संस्था एकत्र येऊन विचारविनिमय करून या दोन्ही प्रयत्नामध्ये सहकार्य निर्माण होईल अशी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.”१२

विठ्ठल रामजी शिंदे यांची अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबद्दलची तळमळ लक्षात घेऊन मुंबई येथील सामाजिक मंडळाचे (बाँम्बे प्रेसिडन्सी सोशल रिफॉर्म असोसिएशनचे) अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांनी मंडळापुढे त्यांचे ह्या विषयावर व्याख्यान करविले. या व्याख्यानात त्यांनी हिंदुस्थानातील बहिष्कृतवर्गाची प्रांतवार संख्या, त्यांच्या अडचणी, त्यांच्या निवारणार्थ वरिष्ठवर्गाकडून होणारे निरनिराळे प्रयत्न आणि स्वतः त्या लोकांकडून होणारे स्वोद्धाराचे प्रयत्न ह्यांची प्रथमच व्यवस्थेशीर मांडणी केली. दक्षिण कानडामधील त्यांच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सांगितले की, तेथील पंचम जातीची स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. दिवसभर मजुरी करूनही त्यांना दिवसातून एकदाच जेवण मिळते व दुपारची भूक त्यांना ताडी पिऊन भागवावी लागते. युरोपियन अधिकारी हे ह्या वर्गातील माणसाला नोकरीत नेमून आपल्या हाताखालच्या हिंदूंचा असंतोष कशाल ओढवून घ्या, म्हणून खालच्या दर्जाचीही नोकरी त्यांना देत नाहीत.

ह्या निबंधात त्यांनी पुढे म्हटले आहे की, “शतकानुशतके अशा प्रकारच्या दुःस्थितीत हे लोक राहात असूनही देशाचा उद्धार करायला निघालेले राजकारणी त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देताना आढळत नाहीत. अशा प्रकारे परिस्थितीचे बळी असणा-या या व्यक्ती थोड्याथोडक्या आहेत असे नव्हे. खानेसुमारीच्या आकड्यांवरून या लोकांची संख्या किती प्रचंड आहे याची कल्पना येऊ शकते. १९०१ सालच्या खानेसुमारीतील अस्पृश्य गणलेल्या चांभार, मोची, डोंब, भंगी, होलिया, मांग, महार, पारिया इत्यादी प्रमुख अस्पृश्य जातींची लोकसंख्या चार कोटी छप्पन लाख नव्याण्णव हजार दोनशे साठ एवढी आहे. हिंदुस्थानच्या एकंदर २९, ४३, ६१, ०५६ लोकसंख्येपैकी ह्या वर्गांची लोकसंख्या साडेचार कोटींपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ प्रत्येक सात हिंदुस्थानी माणसांमध्ये एक दुर्दैवी अस्पृश्य मानला गेलेला प्राणी असतो. तो सवर्ण हिंदूच्या बोलण्याइतक्या अंतराजवळ जाऊ शकत नाही. एकंदर लोकसंख्येत ब्राह्मण शेकडा ४.७ आहेत. तर अंत्यजांची संख्या १५% आहे. एकूण हिंदू १९, ०४,३३,६९६ एवढे आहेत. ह्या दुर्दैवी बहिष्कृत जातीच्या लोकसंख्येइतकी इतर कोणत्याही जातीची संख्या नाही. जगातील ह्या मोठ्या देशातील एकसप्तमांश लोकांना निष्कृष्ट ठरवून बहिष्कृत केले आहे. ह्या खंडप्राय देशात परकीय स्वा-या, राजकीय क्रांत्या, धार्मिक सुधारणा आणि सामाजिक उत्क्रांत्या होऊन गेल्या तरी विसाव्या शतकातील आजमितीला हे साडेचार कोटी लोक अस्पृश्य मानून त्यांच्यास्पर्शाने माणूस दूषित होतो असे समजावे याला काय अर्थ? इतिहासकाळापासून चालत आलेल्या ह्या राष्ट्रीय पापाची आणि राष्ट्रीय दुष्कृत्याची व्याप्ती आणि खोली किती भयंकर आहे याची आपणाला कल्पना येऊ शकते.”

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रस्तुत लेखात हिंदुस्थानातील अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींची एकूण लोकसंख्या किती आहे हे दाखवून देऊन तिची व्याप्ती किती मोठी आहे हे पहिल्यांदाच मनावर ठसविले गेले. देशाचा उद्धार करायला प्रवृत्त झालेले राजकारणी ह्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत अशी परखडपणे त्यांनी तक्रार केलेली आहे. ह्या अस्पृश्यतेचा उल्लेख त्यांनी ‘राष्ट्रीय पाप’ आणि ‘राष्ट्रीय दुष्कृत्य’ अशा भेदक शब्दांनी केलेला आहे.
 
ह्या लेखामध्ये ख्रिस्ती मिशनांनी जे काम केले आहे त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला असला तरी “आपल्या वाढत्या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये एक अस्वस्थता निर्माण करणारा परकीय घटक असे त्याचे वास्तव स्वरूप ध्यानात घ्यावे लागते” असेही म्हटले आहे.

अस्पृश्य मानलेल्या लोकांची सर्वांगीण उन्नती करावयाची असेल तर ती केवळ त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार केल्याने होण्याजोगी नाही, तर त्यांच्यासाठी देशी मिशनची आवश्यकता आहे असे त्यांना जाणवत होते. प्रस्तुत लेखात त्यांनी पुढे म्हटले आहे, “ह्या लोकांच्या उद्धारासाठी नुसती शिक्षणसंस्था, मग ती कितीही मोठ्या प्रमाणात असो, स्थापून चालावयाचे नाही तर ज्यामध्ये जिवंत व्यक्तिगत पुढाकार आहे अशा मिशनची आवश्यकता आहे असो, स्थापून चालावयाचे नाही तर ज्यामध्ये जिवंत व्यक्तिगत पुढाकार आहे अशा मिशनची आवश्यकता आहे आणि दुसरी याहीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रांती न करता आपला धर्म, परंपरा व सामाजिक जीवन यांमध्ये क्रमशः विकास म्हणजेच उत्क्रांती घडवून आणली पाहिजे.”१३

या लेखाच्या अखेरीस शिंदे यांनी असेही मतप्रदर्शन केले की,  “असे मिशन स्थापन करण्यासाठी मुंबई शहर हे योग्य ठिकाण व मुंबई प्रार्थनासमाज ही असे मिशन चालविण्यास योग्य संस्था आहे. उदारमतवादानुसार कार्यरत असणारी दुसरी संस्था म्हणजे ‘दि प्रेसिडेन्सी सोशल रिफॉर्म असोसिएशन’ ही असून ती प्रार्थनासमाजाला उत्तम सहकार्य करू शकेल.” मिशनचा प्रारंभिक आराखडाही शिंदे यांच्या मनात याच वेळी तयार होता. त्यांनी म्हटले आहे, “दिवसाची एक माध्यमिक शाळा व खेडेगावातून आलेल्या अस्पृश्य मुलांसाठी एक छोटेखानी बोर्डींग हे अशा मिशनचे चांगले केंद्र ठरू शकेल. ह्या शाळेतील शिक्षक अशाच प्रकारे निवडले पाहिजेत व प्रशिक्षित केले पाहिजेत की, जे ह्या मुलांच्या घरी जाऊन कुटुंबांना भेटी देऊन पालकपणाचे काम करतील.” शाळेशिवायच्या इतर वेळी साधारण धर्माची उपासना करणे; नैतिक शिक्षणाच्या हेतूने व सर्वसाधारण विषयावर व्याख्याने घडविणे; जवळपासच्या वस्तीत सभा घेऊन या वर्गाची आत्मिक उन्नती करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गोष्टी त्यांच्या मनामध्ये होत्या. अशा प्रकारचे काम प्रार्थनासमाजाने सुरू करावे यासाठी हिंदुस्थानातील परोपकारी व देशप्रेमी नागरिकांनी आर्थिक साहाय्य करावे असे आवाहन त्यांनी या लेखाच्या शेवटी केले.

अशा प्रकारे मिशन स्थापन करण्याचा संकल्प सोडून विठ्ठल रामजी शिंदे यांनी एका कठीणतम कार्याला प्रारंभ करावयाचेच ठरविले असे म्हणावे लागेल.

इंग्लंडमध्ये असताना शिंदे यांनी दीन-दुबळ्यांसाठी काम करणा-या संस्था, मिशने पाहिली होती. परंतु इंग्लंड वगैरे ख्रिस्ती धर्मीयांच्या देशातल्यापेक्षा दीन-दुबळ्यांसाठी येथे काम करणे बिकट होते. तेथील दुबळ्यांचे दैन्य आणि दुःख मुख्यतः आर्थिक परिस्थितीमुळे, भांडवलदारी अर्थव्यवस्थेतील विषमतेमुळे व शोषणामुळे निर्माण होणारे होते. मात्र दुःखितांचे दुःख दूर करावे, त्यांचे अश्रू पुसावे यासाठी ख्रिस्ती शिकवणीला कालोचित कलाटणी देणे हे ख्रिस्ती धर्माच्या मूळ मांडणीला सुसंगत ठरणारे होते. ही  ख्रिस्ती शिकवण साहाय्यभूत ठरणारी होती.

हिंदुस्थानातील स्थिती नेमकी उलट होती. येथील अस्पृश्यवर्गाच्या हीन-दीन स्थितीला, त्यांच्यावरील अस्पृश्यतारूपी बहिष्काराला येथील धर्मच-हिंदू धर्मच-कारणीभूत ठरलेला होता. येथील समाजव्यवस्था धर्माधिष्ठित होती व ती वर्णव्यवस्थेवर आधारलेली होती. वर्णव्यवस्थेला पाठबळ धर्माचे-म्हणजे स्मृतिरूप धर्माचे-व रूढीचे होते व ही धर्माधिष्ठित समाजरचना अपरिवर्तनीय आहे अशीच येथे सार्वत्रिक धारणा होती. म्हणजे अस्पृश्यवर्गाची स्थिती सुधारावयाची असेल, येथील अस्पृश्यता नष्ट करायची असेल तर धर्माने निर्माण केलेल्या ह्या जाणीवा नष्ट करणे, रूढीमुळे पाळले जाणारे आचार बंद करणे आवश्यक होते. म्हणजेच एक प्रकारे धर्माच्या नावाखाली निर्माण झालेल्या भ्रामक अंधश्रद्धा व आनुषंगिक जाणिवा नष्ट करून लोकांच्या मनामध्ये पालट घडवून आणण्याचे काम येथे करावे लागणार होते आणि स्वाभाविकपणेच हे काम अत्यंत बिकट स्वरूपाचे होते. अशा कामाला हात घालायचा व आपले आयुष्य अस्पृश्यवर्गीयांच्या उन्नतीसाठी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी वाहावयाचे असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ठरविले.

संदर्भ
१.    कृ. भा. बाबर, कर्मवीर विद्यार्थी, पुणे, १९३०, पृ. २४.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. २८.
३.    दि ख्रिश्चन लाइफ, लंडन, १० मे १९१३, पृ. २६७.
४.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८४.
५.    सुबोधपत्रिका, १७ डिसेंबर १९०५.
६.    सुबोधपत्रिका, २४ डिसेंबर १९०५.
७.    बलराम नंदा, गोपाळ कृष्णा गोखले, (अनु.) वसंत पळशीकर, विश्वकर्मा साहित्यालय, पुणे, १९८६, पृ. १३२.
८.    तत्रैव, पृ. १५२.
९.    भ. ब. पाळेकर, जागृतिकार पाळेकर, आत्मवृत्त आणि लेखसंग्रह, बडोदे, १९६१, पृ. २३. समाविष्ट, (संपा.) सदानंद मोरे, जागृतिकार पाळेकर, डॉ. बाबा आढाव, अध्यक्ष, महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान, पुणे, १९९६, पृ. ५५.
१०.    विठ्ठल रामजी शिंदे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, पृ. १२९-१३२. मूळ संदर्भ, हेन्री एस्. ऑल्कॉट, दि पुअर पारिया, थिऑसॉफिकल सोसायटी, अड्यार, मद्रास, पृ. ५.
११.    तत्रैव, पृ. १३३.
१२.    व्ही. आर्. शिंदे, ‘इलेव्हेनशन ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस’, सुबोधपत्रिका, १७, २४ व ३१ डिसेंबर १९०५.
१३.    व्ही. आर्. शिंदे, ‘ए मिशन फॉर दि डिप्रेस्ड क्लासेसः ए प्ली’, इंडियन सोशल रिफॉर्मर, २९ जुलै १९०६. प्रस्तुत इंग्रजी लेखात शिंदे यांनी त्यांना अभिप्रेत असलेल्या मिशनचे स्वरूप ख्रिस्ती मिशनसारखे असू नये, तर ते देशी असावे असे ठासून म्हटले आहे.
“What is wanted therefore is not merely a machinery of education however grand but a real mission i.e. an organization in which the personal element presides over and energizes the mechanism; and 2ndly, which is still more essential, a mission which is not exotic but indigenous or in other words a mission which is bent upon working an evolution but not a revolution, as Christian Missions are, in the religion, traditions and social life of these people.”
शिंदे यांच्या आत्मचरित्रपर ‘माझ्या आठवणी व अनुभव’ ह्या ग्रंथात शेवटच्या वाक्याचा आशय चुकीमुळे नेमक्या विरुद्ध स्वरूपात आला आहे तो असाः ‘अशा मिशनने ख्रिस्ती मिशन-यांप्रमाणे ह्या लोकांच्या जीवितामध्ये क्रांती व विकास घडवून आणला पाहिजे.’ (माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २१७.). वस्तुतः हे वाक्य ‘अशा मिशनने ख्रिस्ती
मिशन-यांप्रमाणे ह्या लोकांच्या जीवितामध्ये क्रांती नव्हे, तर विकास घडवून आणला पाहिजे.’ असे असावयास पाहिजे होते. शिंदे यांच्या हस्तलिखितात ते दुरुस्त स्वरूपात असेच आहे.

मिशनची स्थापना

अस्पृश्यवर्गीय लोकांची अस्पृश्यता नष्ट करावी व त्यांची स्थिती सुधारावी ह्या हेतूने एक मिशन काढून विठ्ठल रामजी शिंदे हे अस्पृश्यवर्गासाठी अशा प्रकारचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू करू इच्छितात ही वार्ता प्रसृत झाली. ह्या कामाला अनुकूल अशा प्रकारचा प्रतिसाद प्रार्थनासमाजाचे उदार उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला ह्यांच्याकडून मिळाला. १६ ऑक्टोबर १९०६ रोजी शेठ दामोदरदास ह्यांनी अशा प्रकारची मंडळी स्थापन करण्यासाठी एक हजार रुपयाची देणगी दिली. दोनच दिवसांनी दिवाळी-पाडव्याच्या शुभदिनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी कार्तिक वद्य प्रतिपदेस शिंदे ह्यांनी ह्या कामाला आरंभ करण्याचे ठरविले. सकाळी ९ वाजता मुंबई येथील एल्फिन्स्टन रोडलगतच्या मुरारजी वालजी ह्यांच्या बंगल्यात भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची पहिली शाळा उघडण्याकरिता प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष न्या. चंदावरकर ह्याप्रसंगी रा. ब. नारायण त्रिंबक वैद्य, रा. बाळकृष्ण नारायण भाजेकर वगैरे बरीच समाजाची हिंतचिंतक मंडळी समारंभास आली होती. सुबोधपत्रिकेने ह्याबद्दलची बातमी देताना असे म्हटले आहे, “अस्पृश्य मानलेल्या लोकांकरिता व इतर गरीब लोकांकरिता येथील प्रार्थनासमाजाशी निकट संबंध असलेल्या काही मंडळींनी ही शाळा स्थापन केली.” ह्या शब्दप्रयोगावरूनही शाळा प्रार्थनासमाजाच्या वतीने उघडण्यात आली नसून नव्याने स्थापन होणा-या एका वेगळ्या मंडळीच्या वतीन ही शाळा सुरू होत आहे हे सूचित होते. ह्या बातमीच्या शीर्षकामध्येही ‘नीच मानलेल्या लोकांकरिता नवीन शाळा’ असे म्हटले आहे.१

“समारंभाच्या आरंभी ईशस्तवनाचे एक पद्य म्हटल्यावर रा. ब. काशीनाथ बाळकृष्ण मराठे ह्यांनी ईश्वरप्रार्थना करून प्रसंगास अनुरूप असे उपदेशपर भाषण केले. त्यावर रा. रा. विठ्ठल शिंदे, समाजाचे धर्मप्रचारक ह्यांनी नीच मानिलेल्या जातीविषयी थोडी माहिती सांगितली. देशातील एकंदर प्रजेपैकी एकसप्तमांश प्रजा अशा वर्गातली आहे असे त्यांनी मनुष्यगणतीच्या आधारे ह्याविषयावर एक नुकताच लेख प्रसिद्ध केला आहे, त्याचा उल्लेख करून सांगितले. ह्या लोकांस आम्ही विद्या देऊन शिक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत पण त्यांना वरच्या पायरीस घेण्यास लोकांनी तयार झाले पाहिजे असे ते म्हणाले.” ह्या प्रसंगी रा. रा. भाजेकर व सदाशिव पांडुरंग केळकर ह्यांचीही भाषणे झाली. शेवटी न्या. चंदावरकर ह्यांनी भाषण केले. त्यात ते म्हणाले की, “ह्या लोकांस खाली ढकललेले लोक (डिप्रेस्ड क्लासेस) असे वारंवार म्हणण्यात येते, पण खरे पाहिले तर आम्ही सर्वजण अशा नीच पदास पोहोचलो आहोत, तेव्हा आम्ही उच्च व तुम्ही नीच असे कोणास म्हणावयास नको. आम्ही सर्वांनीच आपली नीच  झालेली स्थिती सुधारण्याचा यत्न केला पाहिजे.” ह्या प्रसंगी न्या. चंदावरकर ह्यांनी आपल्या भाषणात जे सूत्रवाक्य सांगितले ते फार महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, “ह्या नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वतःला वर आणीत आहोत. हे पवित्र कार्य करीत असताना ह्या लोकांचा आम्ही उद्धार करणार हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणात न शिरो आणि आम्हां सर्वांना ह्या घोर अन्यायामुळे जी अधोगती मिळाली आहे, ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे असा साधा आणि सात्त्विक भाव आम्हामध्ये निरंतर जागृत राहो.”२

एकदा कार्याला प्रारंभ केल्यावर शिंदे ह्यांनी मिशनच्या कामाची पद्धतशीर मांडणी केली. एक मध्यवर्ती संस्था ठरवायची व तिचा हेतून आणि रचना ह्यासंबंधी आवश्यक तेवढेच नियम करावयाचे असे त्यांनी धोरण ठरविले. मातृसंस्था मुंबईत स्थापन करण्यात आली. प्राथमिक अथवा दुय्यम शिक्षणाची शाळा, उद्योगशाळा, विद्यार्थिवसतिगृहे, मोफत दवाखाना, धर्मशिक्षणाच्या आणि नीतिशिक्षणाच्या साप्ताहिक शाळा, केवळ सार्वत्रिक धर्माला अनुसरून म्हणजे जातिभेद आणि मूर्तिपूजा ह्यांना फाटा देऊन चालविण्यात येणारी उपासनालये एवढी निदान या मध्यवर्ती संस्थेची अंग असावीत, असे ठरविले. कार्याचा पुढे जसजसा अनुभव येईल त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रांतांतून भाषावार प्रांतिक शाखा आणि त्यांच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय पोटसंस्था स्थापन करण्याचा विचार ठरला. शिंदे ह्यांनी स्थानिक कार्यावर लक्ष केंद्रित करून ते काम पद्धतशीरपणे करणे ह्याला सुवर्णकार पद्धती असे म्हटले आहे व मोठ्या प्रमाणावर सर्व लोकांसाठी जाणीव उत्पन्न करण्याच्या स्वरूपाच्या कामाला मेघवृष्टीची कार्यपद्धती असे म्हटले आहे. मेघवृष्टीचे काम जाहीर व्याख्यानांद्वारे होते. प्रचाराच्या कामाची जबाबदारी स्वतः शिंदे ह्यांनी पत्करली तरी, सुवर्णकार पद्धतीच्या कामासाठी आजीव कार्यावाह मिळविणे आवश्यक होते.

मिशनच्या ह्या कामासाठी माणसे मिळविण्याचा प्रयोग शिंदे ह्यांनी स्वतःच्या घरापासूनच केला. घरच्या लोकांना घेऊन थोडेसे काम करून दाखविल्यावर आपले आध्यात्मिक घर म्हणजे प्रार्थनासमाज येथून आपल्याला माणसे मिळतील अशी त्यांची बळकट श्रद्धा होती. मिशनच्या मध्यवर्ती शाखेतील पदाधिकारी हे प्रार्थनासमाजातील पदाधिकारी होते. अध्यक्ष सर नारायण चंदावरकर, उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला, खजीनदार नारायणराव पंडित, सुपरिटेंडेंट डॉ. संतुजी रामजी लाड व मिशनचे जनरल सेक्रेटरी स्वतः शिंदे राहिले. कार्यवाहक म्हणून त्यांनी पनवेल येथे म्युनिसिपालटीच्या मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका असणा-या भगिनी जनाबाई ह्यांना त्यांनी बोलावून घेतले. प्रार्थनासमाजाच्या कामामध्ये उपासनेच्या वेळी भजन करणे, प्रसंगविशेषी गोरगरिबांचा समाचार घेणे वगैरे कामे त्या आधीपासून करीत होत्याच. मिशनच्या अण्णासाहेबांच्या कामात सहभागी होण्याच्या सूचनेवरून जनाबाईंनी पनवेलच्या शाळेतील मुख्याध्यापिकेच्या पदाचा राजीनामा दिला व मिशनच्या कामामध्ये त्या सामील झाल्या. अण्णासाहेबांचे आई-वडीलही आपल्या मुलांच्या पाठीमागे आले व मिशनच्या कामामध्ये शक्य होईल ती मदत त्यांना करू लागले. त्यांच्या घरोब्याचे सय्यद अब्दुल कादर हे मॅट्रिक पास झालेले तरुण मुंबई येथील इस्लामिया स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करीत होते. शिंदे ह्यांच्या प्रभावाने त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली होती. त्यांनीही आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व ते मिशनचे आजीव कार्यवाह बनले. मुंबई प्रार्थनासमाजाचे दुसरे निष्ठावंत सभासद श्री. वामनराव सदाशिवराव सोहनी हे विल्सन हायस्कूलमध्ये नावाजलेले शिक्षक होते. प्रार्थनासमाजाच्या कामात व विशेषतः रात्रशाळेच्या कामात ते लक्ष घालीत असत. तेही मिशनच्या कामासाठी शिंदे ह्यांना येऊन मिळाले. ही सर्व मंडळी मिशनच्या कामाला स्वार्थत्यागपूर्वक तयार झालेली पाहून शिंदे ह्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला.

मिशनचे हेतू पहिल्यापासूनच पुढीलप्रमाणे ठरविलेः १) हिंदुस्थानातील महार, मांग, चांभार, पारिया वगैरे (विशेष करून पश्चिम हिंदुस्थानातील) अस्पृश्य समजल्या जाणा-या वर्गांना व इतर अशाच रीतीने निराश्रित झालेल्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, २) नोक-या मिळवून देणे, ३) सामाजिक अडचणींचे निवारण करणे, ४) सार्वत्रिक धर्म, व्यक्तिगत शील आणि नागरिकता वगैरे गुणांचा प्रसार ह्या गरीब लोकांमध्ये करणे.

ह्या वर्गामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रयत्न काहीएक प्रमाणात स्थानिक पातळीवर केले जात असत. मात्र शेवटचे तीन हेतून केवळ मिशन निघाल्यामुळेच साधणे शक्य होणार होते. मिशनचे काम उदार धर्माच्या पायावर उभारण्यात आले. त्यासाठी दर शनिवारी व्याख्याने आणि कीर्तने होत. रविवारी सकाळी धार्मिक शिक्षणाचे वर्ग आणि सायंकाळी उपासना होत. प्रारंभी हे काम स्वतः शिंदे व त्यांच्या भगिनी जनाबाईही करीत असत. सणाच्या दिवशी सामाजिक मेळे भरविण्यास त्यांनी सुरुवात केली. अस्पृश्यवर्गीय स्त्री-पुरुष, वरिष्ठवर्गातल्या स्त्री-पुरुषांमध्ये समानतेच्या नात्याने भाग घेत. पहिल्या वर्षी ९ जाहीर व्याख्याने, ४ कीर्तने, ५ पुराणवाचने असे कार्यक्रम झाले.

पहिल्या वर्षातच मिशनच्या कामाने जोरात वेग घेतला. मिशनचे जनरल सेक्रेटरी म्हणून शिंदे ह्यांनी तयार केलेला तिस-या तिमाहीचा अहवाल ९ जुलै १९०७ ह्या तारखेस प्रसिद्ध झाला. तो ‘इंडियन सोशल रिफॉर्मर’ने प्रसिद्ध केला.

मिशनच्या सुरुवातीच्या काही अहवालांमध्ये मिशनचा उद्देश सांगताना काही आकडेवारी देण्यात येत असे. पहिल्या अहवालात दिलेली आकडेवारी खालीलप्रमाणेः
हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्याः २९ कोटी ४३ लक्ष ६१ हजार ०५६ पैकी एकूण हिंदूंची संख्या २० कोटी ७१ लक्ष ४७ हजार २० पैकी अस्पृश्य मानलेल्यांची संख्या ५ कोटी ३२ लक्ष ६ हजार ६३२. हे आकडे देऊन पुढे असे म्हटले आहे की, दर ७ हिंदुस्थानी माणसामागे १ दुर्दैवी अस्पृश्यप्राणी आहे की जो बोलण्याच्या अंतराइतका जवळ येऊ शकत नाही.” मुंबई इलाख्यात अस्पृश्य मानलेल्यांची लोकसंख्या हिंदूंच्या १७ टक्क्यांइतकी आहे. मुंबई शहराची लोकसंख्या ९ लाख ८२ हजार एवढी आहे. त्यांपैकी अस्पृश्यवर्गाची लोकसंख्या ८३ हजार १४ एवढी आहे. मात्र शाळेत जाणा-या अस्पृश्य विद्यार्थ्यांची संख्या केवळ ३०० आहे. ह्या आकडेवारीवरून अस्पृश्य मानलेल्या वर्गाची स्थिती सुधारणे किती निकडीचे आहे हे ध्यानात येते, असे नमूद केले आहे. ह्या अहवालासोबत शिंदे ह्यांचा ‘मिशन काढण्याची आवश्यकता’ ह्या विषयावर इंग्रजी लेख प्रसिद्ध केला आहे.

मिशनने पुढील संस्था सुरू केल्याः १) मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशा मोफत दिवसाच्या २ शाळा(मराठी ५वी आणि ३-या वर्गापर्यंत), २) नोकरी करणा-या लोकांसाठी रात्रशाळा, ३) धर्मार्थ दवाखाना, ४) वाचनालय व ग्रंथालय, ५) मुलांसाठी तालीम, ६) महिलांसाठी शिवणवर्ग, प्रार्थना व व्याख्याने.

ह्याच अहवालामध्ये मुलांसाठी माध्यमिक शाळा, मुलींसाठी माध्यमिक शाळा, उद्योगशाळा व ग्रामीण भागांतून आलेल्या गरीब होतकरू मुलांसाठी वसतिगृहे असे नवीन उपक्रम सुरू करण्याचा मनोदय प्रकट केला.

२८ फेब्रुवारी १९०७ ह्या दिवशी परळ येथील ग्लोब मिलजवळील शाळेच्या जागेत होळीच्या निमित्ताने एक समारंभ आयोजित करण्यात आला. ह्या समारंभासाठी शेठ दामोदरदास सुखडवाला, गोकुळदास पारेख, सौ. रमाबाई भांडारकर, काशीताई नवरंगे इत्यादी स्त्री-पुरुष उपस्थित राहिली होती. ह्या प्रसंगी शिंदे ह्यांचे ‘शिमगा सणातील चांगले व वाईट प्रकार’ ह्या विषयावर उद्बोधक भाषण झाले. सायंकाळी ६ वाजता मुख्य पाहुणे सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर हे उपस्थित झाले. शिंदे ह्यांनी स्वागतपर भाषणामध्ये मिशनने केलेल्या कामाचा आढावा घेतला. मिशनमध्ये सध्या दोन पुरुष व दोन स्त्री शिक्षक असून त्यांपैकी शिक्षिका विनावेतन काम करतात अशी माहिती दिली.

फेब्रुवारी १९०७ अखेरपर्यंत दिवसाच्या शाळेत खालीलप्रमाणे विद्यार्थी येत होते.
दिवसाची शाळा : प्रारंभ १८ ऑक्टोबर १९०६
 

 

विद्यार्थी महार मांग चांभार इतर हिंदू एकंदर विद्यार्थी
मुलगे ७७ ५ २३ ३७ -
मुली १८ ० ४ ८ -
एकंदर ९५ ५ २७ ४५ १७२

 

डिसेंबर १९०६ पासून मिशनच्या वतीने एक रात्रशाळा सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे दर रविवारी सकाळी धार्मिक व नैतिक शिक्षण देण्यासाठी मुलांचे वर्ग भरविण्यात येत. सुमारे २५ मुले हजर असत. ही नीतिशिक्षणाची शाळा १८ ऑक्टोबर १९०६ रोजी सुरू करण्यात आली. २२ नोव्हेंबर १९०६ पासून मिशनच्या वतीने मोफत दवाखाना सुरू करण्यात आला. ४ महिन्यांच्या अवधीत महार, चांभार, इतर हिंदू, मुसलमान व ख्रिश्चनवर्गातील १०९ आजारी व्यक्तींनी औषधोपचाराचा लाभ घेतला. डॉ. संतुजी रामजी लाड हे दररोज सकाळी ठाण्याहून येऊन टार तास रोगी पाहण्याचे काम करीत असत. डॉ. लाड केवळ दवाखान्यातच काम करीत असत असे नव्हे, तर आजूबाजूच्या गरीब वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार करीत असत असे नव्हे, तर आजूबाजूच्या गरीब वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार करीत असत. डॉ. लाड ह्यांच्या जोडीने डॉ एस. पी. नाशिककर हेही मिशनच्या दवाखान्याचे काम पाहत असत.

शेठ तुकाराम जावजी, बाबाजी सखाराम आणि कंपनी आणि मनोरंजक प्रसारक ग्रंथ मंडळ ह्यांनी पुस्तकाची मदत केल्यामुळे मिशनच्या वतीने एक ग्रंथालय जानेवारी १९०७ मध्ये उघडण्यात आले. ग्रंथालयात २३२ पुस्तके जमा झाली.

बुकबाइंडिंगचे काम दोन महार विद्यार्थी मिशनमध्ये शिकू लागले होते.

होळीच्या दिवशी होणा-या गैरप्रकाराला आळा बसावा ह्या हेतूने मिशनच्या भायखळा आणि परळ ह्या ३ शाळांच्या ठिकाणी मॅजिक लँटर्नच्या साहाय्याने दारूच्या दुष्परिणामावर व्याख्याने देण्यात आली. तीन रात्री चांदण्याच्या प्रकाशामध्ये मिशनच्या शाळांतील मुले व परिसरातील माणसे स्वदेशी खेळ खेळत होते. ह्या खेळाचे संयोजन प्रार्थनासमाजातील काही तरुणांनी केले.

जनरल सेक्रेटरी शिंदे ह्यांच्या अहवालात नमूद केले आहे की, सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर ह्यांनी मुलामुलींना पारितोषिके दिली व मिशनने चालविलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. इतर ठिकाणी व्यसनात गढून प्रचंड गोंधळ चाललेला असताना ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यसनापासून दूर राहून मुले-माणसे खेळामध्ये भाग घेत आहेत हे चित्र आपल्याला फार आशाजनक वाटले असे त्यांनी सांगितले.

ह्या समारंभानंतर सर भालचंद्र ह्यांनी पायाने फूटबॉल उडवून मैदान क्लबचे उदघाटन केले.

मिशनच्या कामाचा चहूकडे बोलबाला होऊ लागला. ह्या नवीन कार्याबद्दल अनुकूल-प्रतिकूल मते वृत्तपत्रकार प्रसिद्ध करू लागले. ह्या काळातच अखिल भारतीय पातळीवरील अन्य संस्था सुरू होऊ लागल्या होत्या. गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली होती. धोंडोंपंत कर्वे ह्यांनी अनाथ महिलाश्रम आधीच स्थापन केले होते. अशा ह्या काळात मिशनचे काम सुरू झाले होते. ह्या सुमारास मुंबईत कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता परोपकारी कृत्ये करणारे दोन दानशूर गृहस्थ होते. एक, मलबारी नावाचे पारसी व दुसरे दयाराम गिडुमल.

एके दिवशी दयाराम गिडुमल ह्यांच्याकडून शिंदे ह्यांना आपल्याला समक्ष भेटून जावे अशाबद्दलची चिठ्ठि आली. शिंदे भेटीला गेल्याबरोबर त्यांना आपलेपणाने कवटाळून डोळ्यांत आसवे आणून विचारले की, हे अपूर्व मिशन काढण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? ह्या कामी अस्पृश्यवर्गातल्या महिलांसाठी तुम्ही काही तजवीज केली आहे काय? त्यावर शिंदे ह्यांनी स्पष्टपणे सांगितले, “ह्या हतभागी भारतामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची स्थिती अत्यंत दुर्बल व केविलवाणी आहे. हे मी जाणून आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या घरातल्या मंडळींनाही ही जाणीव असल्याने माझी त्यागी बहीण आणि पूज्य माता यांनी पाठबळ दिले आहे.”३ ही वार्ता दयारामजींच्या कानावर अगोदरच आली होती. म्हणूनच त्यांनी शिंदे ह्यांना समक्ष भेटीला बोलावून असे कळकळीचे स्वागत केले. अस्पृश्य महिलांच्या सेवेसाठी मिशनच्या मध्यवर्ती आश्रमात ‘निराश्रित सेवासदन’ ह्या नावाखाली एक स्वतंत्र शाखा काढण्याची तयारी शिंदे यांनी दाखविली. ह्या कार्यासाठी दयारामजींनी दरमहा १०० रुपयांची मदत देऊ केली आणि त्याप्रमाणे सदन निघाले. मिशनच्या तिस-या तिमाही अहवालात सेवासदन सुरू झाल्याचे वृत्त असून एका दानशूर परोपकारी गृहस्थांनी दरमहा १०० रु. ची मदत ह्या सदनासाठी देऊ केली आहे, असा उल्लेख आढळतो. दयारामजींनी आपले नाव गुप्त ठेवण्याबद्दल शिंदे ह्यांना सांगितले असले पाहिजे.

निराश्रित सेवासदनातील स्त्रीप्रचारकांना विविध प्रकारची कामे करावी लागत. अस्पृश्यवर्गीय मुलांसाठी नुसत्या शाळा काढून उपयोग नव्हता. कारण ह्या मुलांना रोजच्या रोज शाळेत जाण्याची सवय नसे व पालकांना रोजच्या रोज पाठवण्याचे महत्त्व वाटत नसे. शिक्षणाची अभिरुची लावून देण्यासाठी सदनातील स्त्रीप्रचारकांना घरोघरी जाऊन भेटी घ्याव्या लागत असत. हे काम करणा-या स्त्रिया ह्या ख्रिस्ती प्रचारक असल्या पाहिजेत असा अनेकांचा गैरसमज होऊ लागला. तो दूर करण्यासाठी या प्रचारक स्त्रियांनी भारत, भागवत, रामायण अशा हिंदू धर्मग्रंथांचे घरोघरी वाचन सुरू केले. आजा-यांची शुश्रुषा करण्यासाठी आणि बाळंतपणात मदत देण्यासाठी सदनातील स्त्रियांना शिक्षण देऊन तयार करण्यात आले. श्रीमती वेणूबाई, द्वराकाबाई आणि श्रीमती कल्याणीबाई सय्यद ह्या तीन स्त्रिया सदनात राहून ही कामे उत्तम रीतीने करीत असत. सदनातील घरगुती कामे शिंदे यांच्या भगिनी जनाबाई पार पाडीत. बाहेरच्या कामाचा सर्व बोजा सय्यद अब्दुल कादर यांनी उचललेला होता. ह्या कामासाठी निराश्रित महिला समाज ही निराळी संस्थाच जनाबाईंनी काढली. या महिलासमाजाचा पहिला वार्षिकोत्सव सौ. लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. ह्यावेळी सौ. कल्याणीबाई सय्यद यांनी वाचलेल्या रिपोर्टात पुढील माहिती आहेः “घरातील वर्ग सुमारे ६ महिने चालले. गेल्या वर्षी एकंदर १३ बायकांची प्रसूती करण्यात आली. पुष्कळांना दवाखान्याचा लाभ मिळाला. घरोघरी भेटी देऊन समाचार घेण्याचे काम वर्षभर चालले होते. पोलीस कमिशनरांकडून बेवारशी मुले व बायका मिळून पाच व्यक्ती आल्या, त्यांची निगा ठेवण्यात आली.”४

हया तिस-या तिमाही अहवालात विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा उल्लेख असून सुरू केलेली कामे जोरात चालू असल्याचे नमूद केले आहे. मिशनमध्ये विल्सन हायस्कूलमधील नव्याने राहण्यास आलेल्या गणेश आकाजी गवई ह्या महार विद्यार्थ्याचा निर्देश केला असून सेवासदनामध्ये त्याच्या राहण्याजेवण्याची मोफत सोय करण्यात आली असून होणा-या मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला बसणार असल्याची माहिती दिली आहे. (सदर विद्यार्थी म्हणजेच पुढे प्रसिद्धीस आलेले मध्यप्रदेश कायदेकौन्सिलचे सदस्य झालेले प्रख्यात महार पुढारी होत.)

अस्पृश्य लोकांकरवीच स्वतःच्या उद्धारार्थ धार्मिक व सामाजिक सुधारणा करवून घेण्याच्या उद्देशाने पुरुषांसाठी सोमवंशीय मित्रसमाज ही संस्था २४ मार्च १९०७ रोजी भायखळा येथे इंप्रूव्हमेंट चाळीमध्ये स्थापन करण्यात आली. प्रारंभी १४ नियमित सदस्य पटावर नोंदले गेले. ही मंडळी दर शनिवारी रात्री मदनपु-यातील दगडी चाळीत भाड्याने घेतलेल्या एका खोलीत आजूबाजूच्या परिसरातील लोकांना एकत्र करीत. प्रारंभी भोजन झाल्यानंतर एखाद्या उपयुक्त विषयावर भाषण होई. मिशनचे प्रतिनिधी अधूनमधून तेथे जात असत. देवनार येथील म्युनिसिपल कॉलनीत राणा-या ५०० अंत्यजवर्गीयांसाठी एक दिवसाची व एक रात्रीची शाळा काढण्याची मिशनला गरज वाटू लागली. काही विशेष प्रसंगी ही मंडळी परळ येथील शाळेमध्ये येत असत.

मिशनचा वार्षिक खर्च सुमारे ३ हजार रुपयांइतका झाला. मिशनचे वाढते काम लक्षात घेता श्रीमंत, परोपकारी देशभक्तांनी त्याचप्रमाणे निराश्रित समाजाच्या मित्रवर्गांनी मिशनने चालविलेल्या उदात्त कामासाठी मुक्तहस्ताने मदत करावी असे आवाहन शिंदे ह्यांनी अहवालाच्या अखेरीस केले आहे. इंडियन सोशल रिफॉर्मरने हा संपूर्ण अहवाल छापून धनिकवर्गाने व नागरिकांनी मदत करण्याची आवश्यकता कशी आहे हे अखेरीस नमूद केले.५

स्थापनेपासूनच्या तीन वर्षांच्या अवधीत मिशनने कामाचा मोठाच विस्तार केला.

Read more: मिशनची स्थापना

मिशनची पुनर्घटना

२९ मार्च १९२३ रोजी अण्णासाहेब शिंदे यांचे निवेदन ज्ञानप्रकाशात प्रसिद्ध झाले, त्याच दिवशी पुणे शाखेच्या सर्व वर्गणीदारांची साधारण सभा सूचनेनुसार भरली. अण्णासाहेब शिंदे यांनी संस्था अस्पृश्यवर्गीयांच्या स्वाधीन करण्याचा जो मनोदय निवेदनामधून प्रकट केला होता त्यानुसार लगेच कार्यवाहीला प्रारंभ त्याच दिवशी भरविलेल्या मिशनच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आला. अर्थात पुणे शाखेच्या सर्व वर्गणीदारांची ही साधाण सभा होती. ह्या सभेला ७७ सभासद व नसलेले १२ गृहस्थ हितचिंतक म्हणून हजर होते. ह्या सभेने पूर्वीच्या कमिटीत भर घालून अस्पृश्यवर्गाच्या सभासदांचे बहुमत राहील असे केले व तिजला नवीन नियमांची घटना करण्याचा अधिकार दिला. ह्या नव्या घटनेचा खर्डा सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यासाठी १५ एपिल १९२३ रोजी पुढची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. पुनर्घटनेचे काम होत असताना काही मिशनमधील व काही बाहेरील लोकांकडून अडवणुकीचा मार्ग अवलंबिण्यात आला. वर्तमानपत्रातमध्येही ह्याची जाहीर वाच्यता होऊन क्वचित त्याला जातीय स्वरूप देण्याचाही प्रयत्न झाला. परंतु अण्णासाहेब शिंदे यांनी जे धोरण जाहीर केले होते ते सामान्यतः अस्पृश्यवर्गाला प्रिय झाले व महार, मांग, चांभार व भंगी इत्यादी जातींचे पुढारी आपसातील पुष्कळ दिवसाचे बखेडे विसरून आपले हित ओळखून एकोप्याने काम करू लागले. कमिटीच्या सभा दररोज रात्री होऊ लागल्या. कमिटीने नव्याने केलेला घटनेचा खर्डा मंजूर करून घेण्यासाठी १५ एप्रिल १९२३ रोजी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. ह्या सभेस केवळ सभासदांनाच उपस्थित राहण्याचा अधिकार होता व त्या दृष्टीने बंदोबस्त ठेवण्यात आला. नियमांची नवी घटना मंजूर करण्यात आल्यावर पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे सभासद नव्याने निवडण्यात आले. ह्या सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेल्या मंडळींमध्ये शिवराम जानबा कांबळे, विठ्ठल रामजी शिंदे, श्री. रा. थोरात, डॉ. खेडकर, मा. भि. कदम, डॉ. नायडू, सुभेदार घाटगे, केशवराव बागडे, एम्.एल्.ए., डॉ. गोखले, भालेराव, संकपाळ, उबाळे, काळभोर, एम.एल.सी., बाबुराव वायदंडे, माधवराव घोरपडे हे प्रमुख सभासद होते, अध्यक्षस्थानी सुभेदार घाडगे यांची सर्वानुमते निवड झाली. सुभेदार घाटगे व विठ्ठल रामजी शिंदे यांची प्रास्ताविक भाषणे झाल्यावर पुढीलप्रमाणे ठराव मंजूर झाले. पहिल्या ठरावानुसार ११/४/१९२३ रोजी मंजूर केलेला मसुदा काही दुरुस्त्यांसह मंजूर करून त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यानुसार सभासदांची निवड जातवारीने करावी असे ठरले. एक चेअरमन (स्पृश्य), तीन व्हॉईस चेअरमन (प्रत्येकी एक महार, एक मातंग, एक चांभार), एक खजिनदार (अस्पृश्य), तीन जॉइंट सेक्रेटरी (दोन अस्पृश्य व एक स्पृश्य) अशा त-हेने आठ अधिका-यांपैकी सहा अस्पृश्य निवडावेत असे ठरले. नव्या घटनेत दुरुस्तीनंतर मंजूर करून त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यानुसार सभासदांची निवड जातवारीने करावी असे ठरले. एक चेअरमन (स्पृश्य), तीन व्हॉईस चेअरमन (प्रत्येकी एक महार, एक मातंग, एक चांभार), एक खजिनदार (अस्पृश्य), तीन जॉइंट सेक्रेटरी (दोन अस्पृश्य व एक स्पृश्य) अशा त-हेने आठ अधिका-यांपैकी सहा अस्पृश्य निवडावेत असे ठरले. नव्या घटनेत दुरुस्तीनंतर २२ सभासदांचे कार्यकारी मंडळ निवडावे, त्यात अस्पृश्यवर्गाचे दोनतृतीयांश सभासद असावेत व त्यांपैकी महार, चांभार, मांग, भंगी, मुसलमान यांचे प्रत्येकी दोन आणि पार्शी, मराठा, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या जातींचा प्रत्येकी एक असे जातवारीने १४ सभासद घेण्याचे ठरविले. आठ अधिका-यांपैकी सहा व तीन ट्रस्टीतील एक अस्पृश्यवर्गातील निवडण्याची तरतूद केली व त्याप्रमाणे पदाधिका-यांची व सदस्यांची निवड दुस-या ठरावाने करण्यात आली. जनरल बॉडीचे अध्यक्ष विठ्ठल रामजी शिंदे, कार्यकारी मंडळाचे चेअरमन डॉ. आर. व्ही. खेडकर, व्हाईस चेअरमन म्हणून शि. जा. कांबळे (महार), मा. भि. कदम (चांभार), सी. गे. बल्लाळ (मातंग), खजिनदार हरिभाऊ उबाळे (महार), जॉइंट सेक्रेटरी म्हणून डी. व्ही. गायकवाड, सुभेदार घाटगे (महार), कृ. गो. पाताडे (मराठा) हे निवडले गेले. सभासद म्हणून ए. के. घोगरे व रामजी थोरात (महार), प. शु. पवार व नारायण सदाशिव जमादार, (चांभार), ता. स. गायकवाड, बी. डी. वायदंडे (मातंग), नाथमहाराज (भंगी), डॉ. मोदी (पार्शी), केशवराव बागडे व सी. अ. माणूरकर (ब्राह्मणेतर), प्रिं. कानिटकर(ब्राह्मण), एम. सलाउद्दीन, एम.एल.सी., व ए.ए.खान, (मुसलमान), बाबुराव जगताप (मराठा) (एक चांभार, दोन मातंग व दोन मुसलमान यांची नावे कार्यकारी मंडळीने स्वीकृत केली.) बाबूराव जगताप (मराठा) (एक चांभार, दोन मातंग व दोन मुसलमान यांची नावे कार्यकारी मंडळे स्वीकृत केली.) हिशेब तपासनीस म्हणून मा. ह. घोरपडे व एस. एस. चव्हाण यांना घेण्यात आले.


तिस-या ठरावानुसार विठ्ठल रामजी शिंदे, शिवराम जानबा कांबळे व केशवराव बागडे (एम्.एल्.ए.) यांना संस्थेचे ट्रस्टी निवडण्यात आले. अध्यक्षांचे समारोपादाखल भाषण झाल्यावर विठ्ठल रामजी शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले व अध्यक्षांनी सभा बरखास्त केली. या सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेल्या वरील निर्णयाचे जाहीर प्रकटन संस्थेचे नवे जॉइंट सेक्रेटरी (सुभेदार) राघोराम सज्जन घाटगे, धाकजी विठ्ठल गायकवाड व कृष्णाजी गोविंद पाताडे यांनी वृत्तपत्रांकडे प्रसिद्धीला दिले.१


अण्णासाहेब शिंदे यांनी मिशनची नवी घटना तयार करून ती मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्यामुळे सर्वसामान्यपणे अस्पृश्यवर्गाचे पुढारी हे संतुष्ट होते व अण्णासाहेबांबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञता भावच निर्माण झाला होता. मात्र त्यांच्याबद्दल काही असंतुष्ट मंडळी अजूनही आरोप करीत होती. याबद्दलची प्रतिक्रिया अस्पृश्यवर्गीय मंडळींनी वृत्तपत्रातून देऊन अस्पृश्यवर्गाचा भाव केलेला आहे. १९ एप्रिल १९२३च्या ज्ञानप्रकाशाच्या अंकात ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांचे जे तीन कॉलेजचे पत्र प्रसिद्ध झाले होते त्याला अनुलक्षून शिवराम जानबा कांबळे व अस्पृश्यवर्गातील अन्य पुढा-यांनी जाहीर उत्तर देऊन आपली भूमिका प्रकट केली आहे. त्या असे म्हटले आहे, घोलपांच्या पत्रामुळे “मराठ समाज व संबंध ब्राह्मणेतर पक्ष ह्यासंबंधी विनाकारण गैरसमज होण्याचा संभव आहे. ज्या मे. अण्णासाहेब शिंदे यांनी कोणत्याही जातीची अगर पक्षाची भीड न ठेवता केवळ अस्पृश्यवर्गाच्या हिताकडे लक्ष ठेवून अपूर्व अडचणी व स्तार्थत्याग सोसून आम्हा अस्पृश्यांना जन्मोजन्मीचे ऋणी केले आहे, त्यांच्यावर रा. घोलपांनी कारस्थानाचा नाहक आरोप केला, इतकेच नव्हे तर डी. सी. मिशनच्या पुणे शाखेवरही बेजबाबदार शिंतोंडे उडवले आहेत म्हणून आम्हाला हा खुलासा करणे भाग आहे. गुरुवर्य पुणे शाखेवरही बेजबाबदार शिंतोंडे उडवले म्हणून आम्हाला हा खुलासा करणे भाग आहे. गुरुवर्य अण्णासाहेबांनी ही शाखा भरभराटीस आणली. शहरातील मध्यवर्ती भागात सात एकर जमीन, तिच्यावरील एक लक्ष सात हजार रुपये किमतीच्या प्रचंड इमारती, जवळ जवळ दहा-पंधरा हाजारांची नगद शिल्लक इतकी मिळकत मिळवून पुन्हा आपण आता सर्व अधिकाराचा संन्यास करून तो नवीन कार्यकारी मंडळातील महार, मांग, चांभार, भंगी ह्या जातींच्या सन्मान्य प्रतिनिधींच्या बहुसंख्येच्या हवाली केला आणि बाकी राहिलेल्या अस्पसंख्येच्या ब्राह्मण, ब्राह्मणेतर, पारशी, मुसलमान समाजात योग्य प्रकारे करून आपल्या वचनाप्रमाणे पुनर्घटना करून ते मोकळे होतात न होतात तोच आमच्यापैकी काही उलट्या काळजाच्या निराश झालेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर आग पाखडण्यास सुरू करावी ह्यात अण्णासाहेबांची नालस्ती नसून आमच्या समाजाची नामुष्की आहे असे आम्हांस वाटत आहे.” ह्या निवेदनातच, ज्ञानप्रकाशमध्ये केवळ एकाच बाजूच्या निवेदनाला प्रसिद्धी देण्यात येते ह्याबद्दल आश्चर्य प्रकट करण्यात येते. “तसेच ‘फोडा आणि झोडा’ यान नीच तत्त्वाचा अवलंब करण्याचा ब्राह्मणेतर पक्षाचा डाव आहे, महारांचे शत्रू मराठे आहेत, बहिष्कृतांची दिशाभूल डी. सी. मिशनने चालविली आहे वगैरे शिंतोडे त्या निराशा झालेल्या एम.एल.सी. ने (घोलपांनी) उडवून म्हणजे अखिल अस्पृश्यवर्गांना खाली पहावयास लाविले आहे. त्यांचा मात्र तिरस्कारपूर्वक निषेध करणे आम्ही आमचे पवित्र कर्तव्य समजतो.” पुणे येथे १९ एप्रिल १९२३ रोजी प्रसिद्धीस दिलेल्या त्या निवेदनाच्या खाली शिवराम जानबा कांबळे (महार), माधव भिकाजी कदम (रोहिदास) सीताराम गेनू बल्लाळ (मातंग), हरिभाऊ उबाळे, आर. एस. घाटगे, मिल्ट्री सुभेदार आणि डी. व्ही. गायकवाड(महार), डी. सी. कार्यकारी मंडळाचे सभासद ह्या नावाने हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.२ विठ्ठल रामजी शिंदे आणि मिशन यांच्याबद्दल ज्या अस्पृश्यवर्गीय पुढा-यांच्या मनात आशंकाची पटले निर्माण झाली होती, ती मिशनची पुनर्घटना करण्यात आल्यानंतर नाहीशी झाली व अस्पृश्यवर्ग अण्णासाहेबांबद्दल कृतज्ञता भाव प्रकट करू लागला हे या पत्रामुळे दिसून येते.


मिशनच्या नव्या घटनेनुसार पदाधिका-यांची व कार्यकारी मंडळाची निवडूक झाल्यानंतर आपले कार्य आटोपले आहे असे शिंदे यांना वाटले. मातृसंस्थेतील व इतर शाखांतील सर्व अधिकार त्यांनी खाली ठेवले, फक्त मिशनचे संस्थापक ट्रस्टी एवढाच त्यांचा अधिकार राहिला. त्यांची व जनाबाईंची अल्पवेतनाची नेमणूकही त्यांनी सोडली. निर्वाहाचे नियमित स्वरूपाचे कोणतेही साधन आता उरले नव्हते. आपण ‘पुन्हा एकवार उघडे पडलो’ अशी उदासपणाची भावना त्यांच्या मनामध्य निर्माण झाली. पुणे शाखेच्या नव्या अधिका-यांनी अण्णासाहेबांना एखादे लहानसे पेन्शन द्यावे असा विचार पुढे आणला, पण आधी काही मिशन-यांनी काम सोडले होते व त्यांना कोणतीही पेन्शन देण्यात आली नव्हती. तेव्हा आपणच काढलेल्या मिशनमधून व आपणच मिळवलेल्या पैशामधून रिकामपणी पेन्शन घेणे हा विचारही त्यांना दुःखसह वाटला. काही अंशी शारीरिक विश्रांती आणि मानसिक शांती मिळते आहे हेच त्यांना पुरेसे वाटले.


संदर्भ
१.    विजयी मराठा, २३ एप्रिल १९२३.
२.    तत्रैव.

मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा

डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी इंडिया या संस्थेला कायदेशीर स्वरूप देण्याच्या दृष्टीने संस्थेच ट्रस्टडीड ९ जुलै १९१० रोजी रजिस्टर करण्यात आले व १८६०च्या कायद्यानुसार ही संस्था धर्मादाय संस्था म्हणूनही नोव्हेंबर १९१० मध्ये रजिस्टर करण्यात आली. ही संस्था कोणत्याही ब्राह्म अथवा प्रार्थनासमाजाशी अंगभूतपणे निगडित नसली तरी तिची उद्दिष्टे प्रार्थनासमाजाशी सुसंगत असवी आणि कार्य आध्यात्मिक पातळीवरून-मात्र धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) भूमिकेवरून-व्हावे हे निश्चित करण्यात आले होते. म्हणजे हिंदू अथवा ख्रिश्चन अशा कोणत्याही धर्मानुसार या संस्थेचे कार्य होणे अभिप्रेत नव्हते.
मिशनच्या घटनेमध्ये संस्थेची उद्दिष्टे म्हणून पुढील गोष्टी नमूद केल्या होत्या. अस्पृश्य मानल्या गेलेल्या, उदाहरणार्थ, महार, चांभार, पारिया, नामशूद्र, धेड आणि अशाच अन्य अस्पृश्य समजल्या जाणा-या जातींची सामाजिक आणि आध्यात्मिक स्थिती उंचावण्याच्या हेतूने कार्य करणारे मिशन चालविणे. हे उद्दिष्ट पुढील प्रकारे साध्य केले जाईलः १) या वर्गामध्ये शिक्षणाचा प्रसार करून २) त्यांना काम उपलब्ध करून तसेच त्यांची व्यक्तिगत नैतिकता आणि नागरिकता यांचे संवर्धन करून हे उद्दिष्ट साध्य केले जाईल.
संस्थेच्या घटनेमध्ये मिशनच्या कामाला वाहून घेणा-या मिशनरीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले. पाच वर्षांहून अधिक काळ संस्थेत मिशनरी म्हणून काम करणा-या व्यक्तीस आजीव सदस्य म्हणून मान्यता देण्याची तरतूद करण्यात आली. मिशनरींना प्रतिष्ठा देण्यात आली. याचे कारण हे मिशनरीच संस्थेचा कणा होत, ही जाणीव संस्थेची घटना तयार करताना ठेवण्यात आली.१

शिंदे यांनी मांडलेल्लया कल्पनेनुसार मिशनचे स्वरूप देशी होते. मिशनचे कार्य हे ब्राह्मसमाज व प्रार्थनासमाज यांच्या तत्त्वानुसार चालणारे असेल असे नमूद केले व त्याप्रमाणे धर्मातीत (सेक्युलर) असेही म्हटलेले आहे. ह्या दोन विधानांमध्ये विरोध नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण ज्या धर्मात जन्माला आलेलो आहोत, त्या धर्माचा त्याग न करता त्याच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक पातळीवरील मतांचा स्वीकार करणे असेच प्रार्थनासमाजाचे ध्येय आहे. ख्रिस्ती मिशनप्रमाणे धर्मप्रचाराच हेतू त्यात अनुस्यूत नव्हता.

मुंबई येथे मध्यवर्ती संस्थेची कामे जोरात सुरू होऊन एका नमुनेदार मातृसंस्थेची उभारणी झाली. ही उभारणी झाल्यानंतर जनरल सेक्रेटरी ह्या नात्याने विठ्ठल रामजी शिंदे हे मातृसंस्थेच्या पत्यक्ष शासनाखाली प्रांतिक, मुख्य शाखा तयार करावयाच्या कामाला लागले. मिशन ही संस्था कायद्यानुसार रजिस्टार करण्यात आली होती. सर नारायणराव चंदावरकर अध्यक्ष, शेट दामोदरदास सुखडवाला उपाध्यक्ष व शिंदे जनरल सेक्रेटरी होते. संस्थेचे ट्रस्टी शेट दामोदरदास सुखडवाडा, रा. हरी सीताराम दीक्षित व विठ्ठल रामजी शिंदे हे होते. मिशनच्या घटनेनुसार मिशनच्या शाखांचे तीन प्रकार ठरले होते.

पहिला प्रकार अंगभूत शाखांचा. ह्या शाखा मिशनची जी मध्यवर्ती कार्यवाहक कमिटी होती तिच्या प्रत्यक्ष अमलाखाली चालावयाच्या होत्या. जमाखर्चाची सर्व जबाबदारी आणि इतर कारभार मिशनच्या मध्यवर्ती कमिटीच्या संमतीने चालावयाचा होता. प्रांतिक शाखांचे मुख्य चालक आणि त्यांच्या मदतनीस समितीचे सभासद हे मध्यवर्ती कमिटीच्या संमतीने नेमले जात. हा चालक स्वतःला वाहून घेऊन काम करणारा असल्यास त्याच्या पगाराची जबाबदारी मध्यवर्ती कमिटीकडे असे. बाकीचा सर्व खर्च चालविण्याची जबाबदारी ह्या मुख्य चालकांवर आणि त्याच्य कमिटीवर असे. जमाखर्चाच्या मान्यतेची जबाबदारी मध्यवर्ती कमिटीची असे. ह्या प्रांतिक शाखांची व त्यांच्या आश्रयाखाली चाललेल्या इतर शाखांच्या संस्थांची तपासणी जनरल सेक्रेटरीकडून होत असे. ह्या शाखांची वर्षाअखेर जी शिल्लक असे तीपैकी जास्तीतजास्त एक हजार रुपये मध्यवर्ती कमिटीद्वारे मातृसंस्थेकडे येत. शिवाय विशिष्ट हेतूने दिलेले कायमचे निधी असतील तर ते ट्रस्ट फंड ह्या नात्याने वरील ट्रस्टीकडे येत.

दुसरा प्रकार संलग्न शाखांचा. ह्या शाखांची जमाखर्चाची आणि कामाची जबाबदारी प्रत्यक्षपणे मध्यवर्ती कमिटीकडे नसे. मात्र कामाचे धोरण मिशनच्या हेतूला धरून चालले आहे की नाही हे जनरल सेक्रेटरी वेळोवेळी तापासून पाहत. मिशनच्या वार्षिक सर्वसाधारण अहवालात सामील करण्यासाठी अशा शाखांच्या जमाखर्चाचा तक्ता आणि कामाचा अहवाल जनरल सेक्रेटरीकडे सलग्न शाखेने वेळेवर पाठवावा अशी अपेक्षा असे.

मातृसंस्थेचे आद्य ट्रस्टीः १) नामदार गोकुळदास कहानदास पारेख, २) शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला व ३) श्री. विठ्ठल रामजी शिंदे असे होते.

शिंदे हे कामकाजाच्या बाबतीत दक्ष व हिशोबाबाबत अत्यंत चोख होते. मिशनचा कारभार हा वाढणारा आहे, किंबहुन वाढवावयाचा आहे अशी त्यांची कल्पना व इच्छा होती. म्हणून सर्व दृष्टींनी काटेकोर अशा प्रकारची मिशनची घटना तयार करून त्यांनी संमत करून घेतली होती.

प्रार्थनासमाजाचे कार्य करण्यासाठी शिंदे ह्यांनी काढलेल्या आपल्या प्रचारदौ-यात पुणे येथे रात्रीची शाळा काढली होती. ह्या शाळांची संख्या आणखी एकाने वाढविली. दोन शाळा प्रार्थनासमाजाच्या वतीने चालू केल्या. पुण प्रार्थनासमाजाच्या देखरेखीखाली असलेल्या ह्या शाळांचे कामकाज श्री. ए. के. मुदलियार हे पाहत होते. ह्या शाळांमध्ये अस्पृश्यवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाऊ लागले. ह्या मुलांच्या पालकांना महिना एक आणा एवढीदेखील फी भरण्याची ऐपत नाही हे लक्षात आल्यावर त्यांच्यासाठी मोफत शिक्षणाची सोय करण्यात आली.

विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मुंबईत डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना करून अस्पृश्य मानलेल्या वर्गातील मुलांना शिक्षण देण्याचे काम जोरात चालू केले आहे ह्याचा बराच बोलबाला लगेचच झाला. शिवाय पुण्यात शिंदे ह्यांच्या प्रेरणेने रात्रशाळांमधून काही अस्पृश्यवर्गातील मुलांना शिक्षण देण्याची सोय उपलब्ध केली आहे हे पुण्यातील अस्पृश्यवर्गातील काही पुढा-यांच्या ध्यानात आले होते. म्हणून पुणे येथे मिशनची शाखा स्थापन व्हावी व आपल्या वर्गातील मुलांना शिक्षण मिळू लागावे असे पुण्यातील अस्पृश्यवर्गातील पुढा-यांना तीव्रतेने वाटू लागले. तेव्हा हा हेतू मनात धरून मिशनचे जनरल सेक्रेटरी ह्या नात्याने विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना पुण्यास भेट देण्याची कळकळीची विनंती केली. १९०८ सालच्या एप्रिलमध्ये शिंदे ह्यांनी पुण्यास भेट दिली. तेथील अस्पृश्यवर्गातील पुढारी त्याचप्रमाणे प्रार्थनासमाजाची मंडली ह्यांच्यासमवेत त्यांनी विचारविनिमय केला. मिशनच्या घटनेमध्ये अंगभूत शाखा स्थापन करण्याची तरतूद होती. तिला अनुसरून पुण्यास मिशनची पहिली अंगभूत शाखा असावी असे ठरविण्यात आले. पुढे दोन महिने शिंदे ह्यांनी आपले मदतीस सय्यद अब्दुल कादर यांना ह्या कामासाठी पुण्यास पाठविले. त्यांनी २२ जून १९०८ रोजी पुणे लष्कर येथील सेंटर स्ट्रीटमधील एका घरात पुणे शाखेची पहिली दिवसाची शाळा उघडली. पैशाची व्यवस्था तात्पुरतीच होती. शाळेचे सामान काहीच नव्हते. एका अस्पृश्यवर्गीय पुढा-याकडून एक टेबलखुर्ची तात्पुरती मिळाली होती. पुढील सर्व व्यवस्था करण्याचे काम ए. के. मुदलियार ह्यांच्यावर सोपविण्यात आले. मुदलियार ह्यांनी शाळेचे काम कळकळीने चालविले. वर्तमानपत्रांतून जाहिराती देऊन पाहिल्या. महिन्यात ५७७ रुपये जमविण्यात आले. बॅरिस्टर एच. ए. वाडिया ह्यांनी १०० रु.ची पहिली देणगी दिली. मध्यभागाचे कमिशनर डब्ल्यू. टी. मॉरिसन, डेक्कन कॉलेजचे प्रोफेसर वुडहाऊस ह्यांनी प्रत्येकी ३० रुपये देऊन सुरुवातीची गरज भागविली. शिक्षक मिळणे कठीण गेल्याने मातृसंस्थेकडून मुंबईतील ए. व्ही. गुर्जर ह्यांना पाठविण्यात आले. शाळेमध्ये लिहिणे-वाचणे ह्याच्या जोडीनेच संवाद, गाणी, चित्रकला, शिवणकाम व कसरत ह्यांचे शिक्षण दिले जाई. ह्याशिवाय स्वच्छता ठेवण्याचे शिक्षण व नीतिशिक्षण दिले जात असे. शाळेचा खर्च महिन्याकाठी सुमारे २०० रु. होत असे. पैकी जेमतेम ५० रुपये वर्गणीकाठी सेक्रेटरींना मिळत असत. ह्या अत्यंत उपयुक्त शाळेला देशबांधवांनी साहाय्य करावे म्हणून एक कळकळीचे पत्र अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या सह्यांनी ‘ज्ञानप्रकाशा’त प्रसिद्ध झालेले पाहावयास मिळते. निराश्रित साहाय्यकारी मंडळींच्या शाळेतील विद्यार्थी म्हणून साधू सखाराम वापजारे, महार(इयत्ता पाचवी), सुकाजी नारायण कांबळे, महार(इयत्ता पाचवी) व राधा दगडू चांभार(इयत्ता तिसरी), लक्ष्मी श्रीपती थोरात, महार(इयत्ता तिसरी) ह्या विद्यार्थ्यांनी सदर पत्राखाली सह्या केलेल्या आहेत.२

हिंदू लेडीज सोशल क्लबकडूनही पुणे येथील शाखेस प्रासंगिक स्वरूपात मदत मिळाल्याचा वृत्तान्त पाहावयास मिळतो. ज्ञानप्रकाशातील वृत्तान्त लिहिले आहे, “निराश्रित लोकांच्या उन्नतीस वाहिलेले रा. शिंदे ह्यांच्या भगिनी सौ. जनाबाई ह्या एकदा आमच्या क्लबात आल्या होत्या. त्यातही ब-याच शिकलेल्या आहेत व त्यांनी स्वतःस ह्या कामास वाहून घेतले आहे. सध्या रा. ए. के. मुदलियार यांनी मोठ्या खटपटीने पुणे येथे चालविलेल्या निराश्रित लोकांच्या शाळेमध्ये त्या काम करीत असत. त्यांच्या कामास मदत म्हणून आमच्या सभासदांनी १४ रुपयाची रक्कम दिली आहे.”३ अशा प्रकारे विविध ठिकाणांहून मिशनच्या पुणे शाखेच्या शाळांसाठी मदत मिळविण्याचा प्रयत्न होत असे. परंतु वाढत्या कामासाठी वाढत्या खर्चाची तरतूद कशी करात येईल ह्याची चिंता शाखेचे ए. के. मुदलियार ह्यांना सदैव पडलेली असे. त्यांनी एक वेगळा प्रयत्न त्या दिशेने केला. मुंबईचे त्या वेळचे गर्व्हनर सर जॉर्ज क्लार्क ह्यांच्याकडे १९ जुलै १९०८ रोजी विनंतीपत्र पाठविले. मिशनचे चालक कोण आहेत व मिशनचे कार्य कसे चालू आहे ह्याची योग्य ती चौकशी केल्यानंतर गव्हर्नरांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीचे मुदलियार ह्यांना १८ ऑगस्ट १९०८च्या पत्राने पुढीलप्रमाणे उत्तर आलेः “आपले मिशन मदतीला लायक आहे आणि ते यशस्वी होवो अशी गव्हर्नरसाहेबांची इच्छा आहे. मदतीसंबंधी आपणास कळविण्यास येते की, गव्हर्नरसाहेबांनी आपली कन्या मिस् व्हायोलेट क्लार्क यांना पुढील महिन्यात एक जाहीर गायनाचा जलसा करण्याची परवानगी दिली आहे. जलशाच्या उत्पन्नातू मिशनला बरीचशी शिल्लक उरेल अशी आशा आहे.”४

हा गायनवादनाचा जलसा पुण्यात १९०८च्या सप्टेंबर महिन्यात करण्यात आला. प्रत्यक्ष गव्हर्नरसाहेबांचा आणि पुणे येथील सैन्य विभागाचे कमांडर मेजर आल्डरसन यांचा आश्रम होता, म्हणून ह्या इलाख्यातील ब-याच राजेरजवाड्यांनी आणि शेठ-सावकारांनी मुक्तहस्ते साहाय्य केले. खर्च वजा जाता ३ हजार ४६७ रुपये १३ आणे ६ पैसे एवढी शिल्लक ह्या मिशनला मिळाली. ती मातृसंस्थेच्या अध्यक्षांकडे मुंबईस पाठविण्यात आली. ह्या जलशाच्या निमित्ताने इलाख्यातील राजेरजवाडे व प्रतिष्ठित पुढा-यांना मिशनचे कार्य माहीत झाले ही महत्त्वाची गोष्ट साधली गेली. ह्या जलशाच्या निमित्ताने काही प्रमुख देणगीदारांकडू पुढीलप्रमाणे देणगी मिळालीः श्रीमंत सर सयाजीराव गायकवाड ५०० रुपये, श्रीमंत शाहू छत्रपती २०० रुपये, नामदार आगाखान ५०० रुपये, भोरचे अधिपती वगैरेंकडून देणग्या मिळाल्या.

शिंदे ह्यांनी पुणे शहरातील आणि आसपासच्या खेड्यांतील अस्पृश्य मानलेल्या लोकांची एक मोठी सभा भरवून गव्हर्नरसाहेब व मिस् क्लार्क यांनी ह्या लोकांसाठी सहानुभूती दाखवून त्यांची उन्नती करण्याच्या प्रत्यक्ष प्रयत्नामध्ये जो सहभाग घेतला त्यासाठी त्यांच्या आभाराच ठराव मंजूर करून त्यांच्याकडे पाठविला.५ डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपॉल एफ्. जी. सेल्बी हे पुणे शाखेचे अध्यक्ष व ए. के. मुदलियार सेक्रेटरी व मि. अर्जुनराव आर. मुदलियार, खजिनदार अशी मातृसंस्थेच्या अनुमतीने कमिटी नेमण्यात आली. ह्या कमिटीने झपाट्याने काम चालविले. १९०८ अखेर पुणे शाखेच्या पुढील संस्था कार्य करीत होत्या. १) पुणे लष्कर येथे दिवसाची शाळा, २) पुणे लष्कर येथे रात्रीची शाळा, ३) पुणे लष्कर येथे वाचनालय, ४) गंज पेठ येथील रात्रीची शाळा आणि ५) मंगळवार पेठ येथील रात्रीची शाळा.

१९१०च्या जूनमध्ये संपणा-या वर्षाच्या अखेरीपर्यंत पुणे शाखेच्या कामाचा बराच विस्तार झाला. नव्या कमिटीमध्ये डॉ. हॅरोल्ड एच्. मॅन, शेतकी कॉलेजचे प्रिन्सिपॉल हे अध्यक्ष, रँग्लर र. पु. परांजपे हे उपाध्यक्ष होते. कॅप्टन एच्. सी. स्टीव्ह, दि. ब. व्ही. एम. समर्थ, श्री. एम्. डी. लोटलीकर हे ह्या समितीत समाविष्ट होते. ए. के. मुदलियार हे सेक्रेटरी म्हणून काम करीत होते.

१९१२ नंतर श्री. मुदलियार यांना कौटुंबिक अडचणीमुले मिशनच्या कामामधून निवृत्त व्हावे लागले व अण्णासाहेब शिंदे पुणे शाखेचे काम बघू लागले. भगिनी जनाबाईंनी सुपरिटेंडेंटच्या कामाची जबाबदारी उचलली. सर्व शिंदे कुटुंबीयच मिशनच्या कामात कसे समरस झाले होते याचे वर्णन त्या काळातील सुप्रसिद्ध लेखिका आनंदीबाई शिर्के यांनी एका प्रसंगाच्या निमित्ताने केले आहे.

१९१७ सालच्या सुमाराची एक हकिकत आनंदीबाई शिर्के यांनी नमूद केली आहे. पुण्याच्या प्रा. मा. का. देशपांडे यांच्या भगिनी द्वारकाबाई या त्यांची मैत्रीण झाल्या होत्या. देशपांडे कायस्थ. त्यांची घरमालकीण ब्राह्मण. आनंदीबाई मुलाला घेऊन वाड्यातल्या विठोबाच्या देवळाच्या ओटीवर बसल्या होत्या. त्यांचा अडीच-तीन वर्षांचा शरद हा मुलगा पाय-या चढून देवळात जाणार तोच एक बाई ओरडली, “हा हा! आत नाही जायचं. तो ब्राह्मणांचा विठोबा आहे.” आनंदीबाईंनी पुढे लिहिले आहे, “मला घडलेले सदाशिवपेठी पुण्याचे प्रथमदर्शन हे असे होते. मी शरदच्या हाताला धरून ओढले आणि म्हटले, “अरे बाबा, तो ब्राह्मणांचा विठोबा ब्राह्मणांना राहू दे. आपण आपल्या महाराच्या विठोबाला जाऊ.”
“आणि चमत्कार असा की एका आठवड्यातच मला महारांच्या विठोबाचे दर्शन घडले” आणि त्यानंतर आनंदीबाईंनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी परिचय कसा झाला याचे निवेदन केले आहे. ते त्यांच्याशी वडील भावासारखे वागत. काही दिवस त्यांनी आपल्याला स्वतःच्या घरी राहावयास नेल. अण्णासाहेबांची पत्नी रखमाबाई व भगिनी जनाबाई यांच्या सुशिक्षितपणाचे, स्वभावाच्या चांगुलपणाचे वर्णन करून त्यांनी ह्या सर्वांची संस्थेतील अस्पृश्य मुलांशी वागणूक कशी होती, ह्या संबंधाने लिहिले आहे. “ही शिंदेमंडळी अस्पृश्योद्धाचे कार्य करीत असत आणि भोकरवाडीतील त्यांच्या संस्थेच्या इमारतीत राहत असत. अण्णासाहेब शिंद्यांचे ठीक होते, पण ह्या स्त्रिया? त्या महार-मांगाच्या मुलांना आंघोळी घालीत, त्यांच्या उवा काढीत आणि त्यांना शिकवीत. अशी अंतर्बाह्म स्वच्छता व सुधारणा न कंटाळता, न किळसता त्या करीत. ते पाहून माझे मन आदराने भरून येई व वाटे, आपण काय रांधा, वाढा, उष्टी काढा, एवढे जाणतो. आपल्या जिण्याला कसलेच मोल किंवा अर्थ नाही आणि ही माणसे खालच्या थरातील माणसांशी समरस होऊन वागतात. मी अगदी दिपून गेले... एकदा सहभोजनाचा योग आला. तेव्हा अण्णासाहेब शिंदे, गणतराव शिंदे व बाबुरा जगपात यांच्या घरची बायकामुले, तसेच आणखी मराठा कुटुंबे या सहभाजनात निःसंकोचणाने भाग घेताना पाहून मला सानंद कौतुक वाटले...
“सहभोजन म्हणजे एके जागी स्वयंपाक होऊन पंक्तीला जेवणे असा नव्हे; तर महार, मांग, चांभार इत्यादी अस्पृश्य मानलेल्या मंडळींनी व इतर स्पृश्य मंडळींनी आपापल्या शक्तीनुसार व आवडीनुसार करून आणलेले शाकाहारी पदार्थ एकत्र करून सर्वांना प्रसादाप्रमाणे वाढणे व ते सर्वांनी आवडीने खाणे. खरे म्हणजे यांनी ते स्वच्छपणे केले असतील का, अशी शंका प्रथम माझ्या मनाला चाटून गेल्याशिवाय राहिली नाही. पण समोर बसलेला स्त्री-पुरुष समाज चांगला स्वच्छ कपडे घातलेला, नीटनेटका पाहून मी शंका सोडून त्या समारंभात समरस झाले! अण्णासाहेब शिंद्यांचे व त्यांच्या कुटुंबीय मंडळींचे कार्य पाहून मला खरोखरच महाराच्या विठोबाचे दर्शन घडल्यासारखेच वाटले!६

संदर्भ
१.    व्ही. आर्. शिंदे, दि डिप्रेस्ड क्लासे मिशन सोसायटी ऑफ इंडिया – व्हाट इट इज् अँण्ड व्हाट इट डज, मुंबई, १९१२.
२.    ज्ञानप्रकाश, ७ मे १९१०.
३.    तत्रैव, ९ जुलै १९०९.
४.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २३६.
५.    डी. सी. मिशन सोसायटी ऑफ इंडिया, पूना ब्रँच, फर्स्ट हाफ इयरील रिपोर्ट, जून १९०८, डिसेंबर १९०८, अँपँडिक्स ४, पृ. २४.
६.    आनंदीबाई शिर्के, सांजवात, मौज प्रकाशन, मुंबई, १९७२, पृ. १९०-९२.

मिशनचा कार्यविस्तार : कर्नाटक-मध्यप्रांतातील शाखा

१९१२ साली मुंबई येथे भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे काम करीत असतानाच विठ्ठल रामजी शिंदे यांना जाणवत होते की, कर्नाटक प्रांतामध्ये मिशनचे काम वाढविणे आवश्य आहे. कर्नाटक प्रांतामध्ये अस्पृश्योद्धाराचे व अस्पृश्यतानिवारण्याचे कार्य करायचे असेल तर हुबळीसारख्या ठिकाणी मिशनची एक अंगभूत शाखा स्थापन करणे फार उपयुक्त ठरेल असेही त्यांना जाणवले. ह्या कामासाठी सय्यद अब्दुल कादर यांची योजना करणे युक्त राहील असे त्यांना वाटले व हा विचार पक्का केल्यानंतर ते हुबळी येथे अंगभूत शाखा स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्नाला लागले. ही शाखा स्थापन करावयाची असेल तर निदार दोन वर्षांच्या खर्चाची आधीच तरतूद करणे आवश्यक होते व ह्या कामी कोल्हापूरकडील भागामधून विशेष साहाय्य होईल ह्या कल्पनेने ३ मे १९१२ रोजी शिंदे हे सय्यद यांना घेऊन कोल्हापुरास पोहोचले.


कोल्हापूर येथे मोठमोठ्या धनिक लोकांच्या शिंदे यांनी भेटी घेतल्या व पैसे देण्याचे अभिवचनही ह्या मंडळींकडून मिळविले. अलीकडच्या काळामध्ये अमण्णासाहेब शिंदे यांनी ते कोणत्याही गावी गेले असता महारवाड्याला भेट देणे, तेथे भजन करणे, प्रवचरन करणे असा उपक्रम चालू ठेवला होता. त्याला अनुसरून कोल्हापूर येथील महारवड्या जाऊन त्यांनी भजन केले. एक आठवडा कोल्हापूर येथे हुबळी शाखेसाठी वर्गणी गोळा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते कुरुंदवाडला गेले.


११मे रोजी तेथे चीफ मेडिकल ऑफिसल डॉ. यशवंत वामन मोडक यांच्या दिवाणखान्यात स्टेट कारभारी रा. ब. सोवनी यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरविली. अध्यक्षांनी अस्पृश्यवर्गाला शिक्षण घेता यावे; आपली उन्नती साधता यावी यासाठी त्यांना मदत करणे हे वरच्या वर्गातील लोकंचे कर्तव्य आहे असे सांगितले. काही उच्च वर्णातील व्यक्तींच्या ठिकाणी अस्पृश्यांना शिवून घेण्याची मानसिक तयारी झाली नव्हती. मात्र त्यांची उन्नती व्हायला पाहिजे; त्यासाठी उच्चवर्णीय स्पृश्यांनी मदत केली पाहिजे अशी धारणा झाली होती. सभेचे अध्यक्ष रा. ब. सोवनी हे अशांपैकी एक होते. अस्पृश्यवर्गीयांना शिवावे की नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण त्यांना मदत करणे हे आपले पवित्र काम आहे असे अध्यक्षांनी प्रतिपादन केले. अण्णासाहेब शिंदे यांनी संस्थेबद्दलची सर्वांगीण माहिती सांगितली. त्यानंतर श्रीमंत चिवटे हे अध्यक्ष व रा. ब. सोवनी, दादोबा चिवटे, रा. घोरपडे व डॉ. मोडक (सेक्रेटरी) एवढ्यांची कमिटी नेमण्यात आली. तेथील थोड्या काळातील वास्तव्यातही रुपये ६५/- एवढी वर्गणी जमली. त्या दिवशी रात्री अण्णासाहेब शिंदे यांनी महारवाड्यात भजन केले. दुस-या दिवशी कुरंदवाडहून अण्णासाहेब शिंदे सय्यदांसमवेत शिरोळ येथे गेले. तेथे प्रतिष्ठित लोकांची सभा भरविली. सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये वर्गणी जमणे कठीण आहे असे मामलेदारांनी सांगितले. ह्या गावामध्ये महारमांग लोकांची लोकसंख्या जवळ जवळ एकतृतीयांश इतकी होती, ही बाब शिंदे यांना लक्षणीय वाटली. शिरोळ्याहून मग ही मंडली बेळगावास गेली.१


हुबळी येथे मिशनच्या कर्नाटक शाखेचे काम सय्यद यांनी कल्याणीबाईंच्या सहकार्याने उत्तम प्रकारे चालविले. हुबळी येथील शाखा १९१२ साली स्थापन झाली होती, बेळगाव येथील शाखा १९१५ साली स्थापन झाली होती; तर गोकाक येथे १९१८ साली शाखा स्थापन करण्यात आली. हुबळी शाखेमध्ये दिवसाच्या शाळांच्या जोडीनेच रात्रीच्या शाळा चालविल्या जात. दिवसा भरणा-या शाळेत पुस्तकी शिक्षणाबरोबरच शिवणकाम, सुतारकाम इत्यादी धंद्याचे शिक्षण दिले जात असे. १९१८ सालचा खर्च विचारात घेतला तर सुमारे ३,५०० रुपये एवढा खर्च सुमारे २२५ मुलांवर दरसाल होत असे. हुबळी येथील मिशनच्या वतीन चालविलेले धंदेशिक्षणाचे महत्त्व ध्यानात घेऊन तेथील दक्षिण भागाचे कमिशनर मि. माउंट फोर्ट यांनी डिस्ट्रिक्ट बोर्डाला सूचना केली, की दर जिल्ह्यात खालच्या वर्गातील मुलांना धंदेशिक्षण देण्यासाठी एक शाळा असावी. त्याप्रमाणे धारवाडच्या डिस्ट्रिक्ट बोर्डाच्या सूचनेवरून हुबळी शाखेच्या सुपरिटेंडेंटनी एक योजना तयार करून पाठविली. ह्या शैक्षणिक कामाबरोबरच मिशनची शाखा परोपकाराची कामे करत होती. १९१८च्या नोव्हेंबर महिन्यात हुबळी येथे इन्फ्लुएंझाची मोठी साथ आली त्या वेळेला शाळा बंद कराव्या लागल्या मात्र मिशनच्या शाळेतील शिक्षकांनी गोरगरिबांना औषधे पुरविण्याचे काम ह्या साथीमध्ये केले. गोकाक येथील शाळेत रात्रीची एक शाळाही सुरू करण्यात आली.२


कर्नाटक शाखेने अस्पृश्यवर्गासाठी ह्या प्रकारचे काम सुरू करून एक नवी जागृती इकडील प्रांतामध्ये निर्माण केली. कर्नाटक प्रांतात सुखवस्तू लोक बरेच आहेत मात्र ह्या कामाकडे त्यांचे अद्यापि जावे तसे लक्ष गेलेले नव्हते. या सुखवस्तू लोकांच्या सहानुभूतीचा ओघ अस्पृश्य समजल्या जाणा-या लोकांच्या उन्नतीसाठी वळविण्यात कर्नाटक शाखेला बरेच यश मिळाले असे म्हणता येईल. सय्यद यांनी घालून दिलेली घडी व नंतरच्या काळात श्री. दा. ना. पटवर्धन यांनी शिस्तशीरपणे व कळकळीने केलेले कार्य ह्यामुळे हुबळी शाखा कर्नाटक प्रांतामध्ये उत्तम प्रकारे कार्य करू शकली.


विठ्ठल रामजी शिंदे पुण्यास आल्यानंतर व पुणे शाखेची जबाबदारी त्यांनी घेतल्यानंतर मोठमोठ्या कामाला गती आली. अहल्याश्रमाच्या संकल्पित इमारतीचे आराखडे तर सादर केले होतेच. परंतु युरोपमध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे नंतर ते काम स्थगित झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमावर मात्र विशेषत्वाने भर देण्यात आला. सेंट्रल प्रायमरी स्कूनमध्ये तीन इंग्रजी इयत्तांपर्यंत शिकविले जात होते. मुलींकडून फी घेण्यात येत नसे. भगिनी जनाबाई शिंदे मुलींसाठी स्वतंत्र वर्ग चालवीत असत. त्याशिवाय बोर्डिंगची देखरेखही त्याच करीत असत. पुढे मुलींची शाळा स्वतंत्र करावयाची असा उद्देश ठेवून त्यांनी मुलींचे वर्ग चालविले होते. या शाळेतील शिस्त व वळण वाखाणण्याजोगे होते. दररोज अभ्यासाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व मुले हॉलमध्ये जमून धार्मिक स्तोत्रे म्हणत. मुलांच्या चालीरीतींकडे, स्वच्छ राहणीकडे व योग्य भाषा वापरण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविले जाते, असा एज्युकेशनल इन्स्पेक्टर पी. बी. बापट यांनीही अभिप्राय नमूद केला. कार्पेंटरी क्लासमध्ये दहा मुले शिक्षण घेत होती व इन्स्पेक्टिंग ऑफिसर मि.एल्.एस्. डॉसन यांनी त्यांच्याबद्दल चांगला अभिप्राय नमूद केला. टेलरिंग क्लासमध्ये मुलगे व मुली दोन्ही असून मिशनमधूनच तयार झालेले शिक्षक शिकविण्याचे काम करतात; विद्यार्थी आपले कपडे शिवू शकतात एवढी त्यांची चांगली तयारी झाली आहे, असा इन्स्पेक्टिंग ऑफिसर आर. एन्. दीक्षित यांनी चांगला अभिप्राय दिला. हॉस्टेलमध्ये आठ जेवण करणारे व सहा राहणारे विद्यार्थी होते. संस्थेच्या वतीने भजनसमाज चालविला जात असे. रविवारी साडेआठ ते साडेदहा साप्ताहिक उपासना होत. महाभारत, गीता व बुद्धचरित्र यांमधून मुलांस समजण्यासारखे भाग समजावून दिले जात.३ विद्यार्थींचे सामान्यज्ञान वाढावे, त्यांना आपला इतिहास व परंपरा नीट माहीत व्हावी या हेतूने अण्णासाहेब शिंदे यांनी मिशनमध्ये व्याख्यानादिकांचे उपक्रम सुरू केले होते. त्याला अनुसरून दत्तो वामन पोतदार यांना मराठ्यांच्या इतिहासावर दर आठवड्याला एक असे व्याख्यान देण्याची विनंती केली होती व त्याप्रमाणे पोतदार यांनी दहा व्याख्याने दिली. ही व्याख्याने सोप्या भाषेत, मुलांना कळतील अशा प्रकारे व्हावीत अशी शिंदे यांची इच्छा होती, असे पोतदार यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे भान शिंदे हे ठेवीत असत हे त्यांच्या या उपक्रमावरून दिसून येते. ही व्याख्याने प्रसिद्ध करण्यासाठी पोतदारांनी लिहून द्यावीत अशी विनंती शिंदे यांनी त्यांना केली होती, असेही पोतदारांनी नमूद केले आहे.४


मुंबई, पुणे, हुबळी येथील मिशन शाखांचे काम चांगल्या प्रकारे सुरू झाल्यानंतर नागपूर येथे मध्यप्रांतासाठी एक अंगभूत शाखा काढावी असा विचार शिंदे यांच्या मनामध्ये बळावला. कोल्हापूचे वकील श्री. कृष्णाजी कदम ह्यीं या कामी स्वतःला वाहून घेण्याची तयारी दाखविली. अमरावती, अकोला, यवतमाळ ह्या मध्यप्रांतातील ठिकाणी संलग्न शाखांची कामे ह्यापूर्वींच चालू होती. नागपूर येथे अंगभूत शाखा उघडून तिच्यावर ह्या संलग्न शाखांची जबाबदारी सोपविणे इष्ट ठरले असते व व-हाड प्रांतामध्ये मिशनच्या कामाचा विस्तार करणे सोयिस्कर झाले असते असे शिंदे यांना वाटले. म्हणून १९१४च्या उन्हाळ्यात ते नागपूरास गेले. रा. ब. वामनराव कोल्हटकर ह्या वृद्ध प्रागतिक पुढा-यांकडे ते उतरले. सुप्रसिद्ध मराठी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे ते चुलते. मातब्बर लोकांच्या भेटी घडवून आणणे व अन्य प्रकारे साहाय्य करणे ह्या कामी रा. ब. कोल्हटकरांची शिंदे यांना मोठी मदत झाली. या प्रारंभिक तयारीनंतर शिंदे यांनी श्री. कदम यांना बरोबर घेऊन मध्यप्रांतातील हिंदी जिल्ह्यांतून पूर्वतयारीसाठी आणि निधी जमविण्यासाठी एक विस्तृत दौरा काढला. भंडारा, बालाघाट, जबलपूर, रायपूर, बिलासपूर आणि उत्तर हिंदुस्थानात सागर व दमोह वगैरे ठिकाणी शिंदे व कदम यांची व्याख्याने झाली. ह्या दौ-यात त्यांना सुमारे चार हजार रुपयांची मदत मिळाली. यावरून शिंदे यांचे प्रचारकार्य किती प्रभावीपणे चालले होते व किती वेधकपणे ते लोकांचे लक्ष अस्पृश्यतानिवारणाच्या कामाकडे आकृष्ट करून घेऊ शकत होते याचा पडताळा मिळतो. दमोहहून श्री. कदम यांना नागपूरला पाठवून ते स्वतः भोपाळ, देवास, इंदूर आणि धार ह्या संस्थानिकांच्या भेटी घेऊन, त्यांची या कामासाठी सहानुभूती संपादन करून मुंबईला परत आले.


नागपूर येथे पुन्हा जाऊन त्यांनी एम्प्रेस मिलचे मालक सर बेझनजी यांची गाठ घेऊन त्यांच्या मालकीच्या पाचपावली येथील चाळींपैकी एक चाळ मिशनच्या कार्यासाठी घेतली. नागपूर येथील प्रतिष्ठित व्यक्ती सर मोरोपंत जोशी, नामदार मुधोळकर वकील, रा. ब. वामनराव कोल्हटकर, डॉ. ल. वि. परांजपे, न्या. भवानीशंकर नियोगी वगैरेंची एक कमिटी नेमण्यात आली. नागपूर येथील ह्या अंगभूत शाखेच्या कार्यामध्ये अनेक अडचणी आल्या. एक तर प्लेगची मोठी साथ लगेच उदभवली, दुसरे म्हणजे श्री. कदम यांना हे काम योग्य त्या प्रकारे करणे झेपेना. स्थानिक कमिटीच्या त्यांच्याबद्दलच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे कदमांना तेथून हलविण्याचा विचार शिंदे यांना करावा लागला. कोणत्याही नवीन ठिकाणी जाऊन मिशनच्या शाखेचे काम उत्तम प्रकारे करण्याचे कौशल्य श्री. सय्यद अब्दुल कादर यांच्या ठिकाणी आहे हे शिंदे प्रारंभापासून पाहत होते. तेव्हा नागपूर शाखेवर सय्यद यांची नेमणूक करण्याचे त्यांनी ठरविले व त्याप्रमाणे ते सहकुटुंब हुबळीहून नागपूरला रवाना झाले. पाचपावली येथील ज्या चाळीमध्ये वसतिगृह होते तेथेच त्यांनी आपले राहण्याचे ठिकाण कायम केले व अमरावती, अकोला, यवतमाळ येथील संस्थांची देखरेखही ते तेथून योग्य प्रकारे करू लागले.


सय्यद यांना हुबळीहून हलविल्यानंतर हुबळी शाखेची जबाबदारी कोणा तज्ज्ञ अधिका-यावर सोपविणे भाग होते. श्री. दा. ना. पटवर्धन हे पुणे शाखेचे काम उत्तम प्रकारे चालवीत होतेच. हुबळी येतील आश्रमात सहकुटुंब जाऊन राहण्याची तयारी श्री. दामोदरपंत पटवर्धन व त्यांच्या सुशील पत्नी सौ. अन्नपूर्णाबाई यांनी दाखविली. केवळ पत्नीलाच नव्हे, तर आपल्या वृद्ध आईलाही बरोबर नेण्याची तयारी दामोदरपंतांनी केली. सय्यद यांना हुबळी शाखेचे काम करताना भाषेची अडचण नव्हती. कारण कानडी भाषा हे ते मातृभाषेप्रमाणेच बोलत. दामोदरपंतांना मात्र भाषएची अडचण होती. परंतु तेथे गेल्यावर तीन-चार महिन्यांतच ते कानडी शिकून सर्व कामे कानडी भाषेतून करू लागले. शाळा, वसतिगृह व दवाखाना अशी तीन प्रकारची कामे हुबळी येथील स्थानिक शाखेत करावी लागत. शिवाय धारवड, बेळगाव, विजापूर येथील शाखांचे कामही पाहावे लागत असे. हुबळी म्युनिसिपालटीकडून ९९ वर्षांच्या कराराने व सवलतीच्या भाड्याने मिशनसाठी सय्यदांनी जागा मिळविली होती. सय्यदांनी योजिलेले दवाखान्याच्या व शाळेच्या इमारतीचे बांधकाम पटवर्धनांनी पूर्ण केले. ह्या मागासलेल्या प्रांतात पटवर्धनांनी कामाच्या तळमळीने व त्यांच्या ठिकाणी असलेल्या कार्यकौशल्यामुले थोड्या अवधीतच उत्तम जम बसविला. त्यांच्याबद्दल लोकमत एवढे चांगले होते की, पुढे झालेल्य हुबळी म्युनिसिपालटीच्या निवडणुकीमध्ये सरकारतर्फे त्यांची नेमणूक झाली. अशा त-हेने हुबळी येथील कर्नाटक प्रांताच्या अंगभूत शाखेचे काम समाधानकारक रीतीने चालू झाले.


संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, १९ मे १९१२.
२.    सुबोधपत्रिका, २९ मे १९१९.
३.    सुबोधपत्रिका, २ जुलै १९१६.
४.    द. वा. पोतदार, लोकमान्यांचे सांगाती, केसरी प्रकाशन, पुणे १९७५, पृ. १११.

  1. महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखीते
  2. मनोगते
  3. मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा
  4. मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य
  • 111
  • 112
  • 113
  • 114
  • 115
  • 116
  • 117
  • 118
  • 119
  • 120
Page 116 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी