1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

दुस-या आवृत्तीच्या निमित्ताने

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य हा चरित्रग्रंथ ४ जुलै २००४ रोजी प्रकाशित झाला. दीड वर्षातच ग्रंथाची पहिली आवृत्ती संपली व आता दुस-या आवृत्तीचा योग येत आहे, याचा मला फार आनंद वाटतो.

ग्रंथ प्रकाशनाचा समारंभ ऍड. गोविंदराव पानसरे यांनी कोल्हापूर येथील शाहू स्मारक सभागृहात मोठ्या सुंदर रीतीने आयोजित केला होता. प्रा. राम बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात भाई एन्. डी. पाटील यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले. या दोघांसह प्रा. रा. ग. जाधव, ऍड. गोविंदराव पानसरे, श्री. सतीश काळसेकर या सर्वांची भाषणे विचारप्रवर्तक, महर्षींच्या कार्याचे महत्त्व आणि थोरवी विवेचन करणारी व चरित्रग्रंथाची गुणवत्ता विशद करणारी झाली.

ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्याचे सर्व थरांतून जे स्वागत झाले त्यामुळे मी आनंदित तर झालोच, शिवाय कृतज्ञतेच्या भावनेने भारावूनही गेलो. ग्रंथ वाचल्याबरोबर प्रा. भगवंत देशमुख, प्रा. गंगाधर गाडगीळ, प्रा. म. द. हातकणंगलेकर, प्रा. भालचंद्र नेमाडे, प्रा. रवींद्र किंबहुने, प्रा. भास्कर भोळे, श्री. पन्नालाल सुराणा, श्री. वसंत पळशीकर, श्री. सदा डुंबरे, श्री. म. श्री. दीक्षित या व अन्य मित्रांनी पत्रद्वारे अथवा दूरध्वनीवरून प्रस्तुत ग्रंथलेखनामुळे महत्त्वाचे कार्य झाले आहे असा निर्वाळा देत ग्रंथलेखनाबद्दलही मुक्तपणे प्रशंसा केली. विचारवंत, अभ्यासक यांप्रमाणेच सर्वसामान्य वाचकवर्गानेही प्रस्तुत ग्रंथाचे मोठ्या आत्मीयतेने स्वागत केले हेही मला आवर्जून कृतज्ञतापूर्वक नमूद केले पाहिजे. अनेक अपरिचित वाचकांनी मला अभिनंदनाची पत्रे लिहिली व अभिप्राय कळविले. त्यांपैकी एक प्रातिनिधिक निर्देश मी करतो. उल्हासनगर येथील एक वाचक सेवानिवृत्त फौजदार श्री. गणेश मा. पोतदार यांनी मला पत्र लिहून मोठ्या मर्मज्ञपणे आपला अभिप्राय कळविला. दीड वर्षात या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपली ही बाबही सर्वसामान्य वाचकांनी या ग्रंथाची दखल घेतली याचेच चिन्ह म्हणता येईल.

ग्रंथ प्रकाशित झाल्यावर चार-सहा महिन्यांत त्यावर विचारप्रेरक, मार्मिक तसेच आस्वादक स्वरूपाचे परीक्षण-लेख विविध नियतकालिकांतून व वृत्तपत्रांच्या साप्ताहिक आवृत्त्यांतून प्रसिद्ध झाले. हे लेख लिहिणा-या व्यासंगी विचारवंतांपैकी डॉ. ग. वा. तगारे, प्रा. गो. पु. देशपांडे, प्रा. गंगाधर गाडगीळ, श्री. दीपक घारे, डॉ. विलास खोले, कन्नड लेखक प्रा. वसंतराव दिवाणजी यांचा मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो.

चरित्रग्रंथाच्या प्रकाशन समारंभात कवी सतीश काळसेकर म्हणाले होते, 'या ग्रंथाला अनेक पुरस्कार लाभतील.' त्यांचे शब्द सार्थ ठरले. प्रस्तुत ग्रंथाला वर्षभरात पुढील आठ पुरस्कार प्राप्त झाले. सोलापूरचा भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार; कुर्डुवाडीचा शिवगिरिजा प्रतिष्ठानचा स. ना. कदम गुरुजी साहित्य पुरस्कार; वाई येथील रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार; प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील पुरस्कार; महाराष्ट्र फाउण्डेशनचा मराठी साहित्य पुरस्कार; महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा राज्य पुरस्कार; औरंगाबाद येथील धोंडीराम माने साहित्यरत्न पुरस्कार आणि सोलापूर येथील शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार. या पुरस्कारांमुळे महर्षी शिंदे यांच्या कार्याकडे लक्ष वेधण्याचे महत्त्वाचे कार्य साधले गेले. पुरस्कार देणा-या या सगळ्या संस्थांच्या संयोजकांचे मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो.

ग्रंथ प्रकाशनाच्या समारंभातल्याप्रमाणेच पुरस्कार वितरण सोहळ्यात व गौरवप्रसंगी सुशीलकुमार शिंदे, प्रा. केशव मेश्राम, प्रा. रावसाहेब कसबे, प्राचार्य रा. कृ. कणबरकर, श्री. अनंत दीक्षित, खासदार बाळासाहेब विखे पाटील, भाई वैद्य, श्री. विजय कुवळेकर, डॉ. राम ताकवले, डॉ. दिलीप जोग, डॉ. जनार्दन वाघमारे या मान्यवरांनी मोठ्या आत्मीयतेने भाषणे केली. या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे.

प्रस्तुत ग्रंथाच्या प्रथम प्रकाशनाच्या वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे विश्वस्त श्री. ज्ञानेश्वर खैरे व सचिव श्री. शरद काळे यांचे साह्म झाले याबद्दल त्यांचा मी आभारी आहे.

प्रस्तुत ग्रंथप्रकाशनानंतर त्यावरील परीक्षणलेखांमुळे तसेच पुरस्कारप्राप्तीमुळे महर्षी शिंदे यांच्या कार्याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले गेले याचे निदर्शक चिन्ह म्हणजे प्रस्तुत लेखकाला विविध शहरांतून मान्यवर संस्थांकडून महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्यावर व्याख्याने देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालय, जमखंडीची नगर परिषद, वाई येथील प्राज्ञपाठशाळा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद; रयत शिक्षण संस्था, सातारा; पुणे येथील प्रार्थनासमाज; नगर परिषद, लातुर; आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी या सगळ्या सुप्रतिष्ठित संस्थांनी व्याख्यानासाठी निमंत्रित केले याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे.

प्रस्तुत चरित्रग्रंथाचे एवढे जे स्वागत झाले त्याचे एक मुख्य कारण म्हणजे महर्षी शिंदे यांच्या कार्याचे व विचाराचे महत्त्व आजच्या काळात तर विशेषच आहे हे विचारवंतांना तसेच सर्वसामान्य वाचकांना जाणवत असणार, हे होय. इतके समीक्षक म्हणतात त्या अर्थी या चरित्रग्रंथाची गुणवत्ताही वाचकांना भावली असेल. चरित्रग्रंथाला लाभलेल्या प्रा. राम बापट यांच्या प्रस्तावनेमुळे या ग्रंथाचे मोल निश्चितच वाढले. या सगळ्यांच्या जोडीने आणखी एका बाबीचा मला कृतज्ञतापूर्वक निर्देश करावासा वाटतो. ती म्हणजे अतिशय आकर्षक, सुंदर स्वरूपात या ग्रंथाची केली गेलेली निर्मिती. 'लोकवाङ्मय गृहा'चे श्री. प्रकाश विश्वासराव हे मुळातील उत्तम चित्रकार. त्यांनी आपल्या कलावंताच्या दृष्टीनेच प्रस्तुत ग्रंथाचे मुद्रण, पानाचा आकार, बांधणी या बाबींकडे लक्ष दिले असल्याने ग्रंथाला एवढे देखणे रूप प्राप्त झाले आहे. त्यांचे सहकारी श्री. सतीश काळसेकर यांचाही ग्रंथनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग आहे. 'लोकवाङ्मय गृहा'तील त्यांचे अन्य सहकारी प्रा. नितीन रिंढे, श्री. जयप्रकाश सावंत, कु. माधवी विचारे यांनीही आपापल्या कामाचा वाटा मोठ्या आत्मीयतेने उचलला होता. या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे.

प्रस्तुत दुस-या आवृत्तीत 'उपसंहार' या प्रकरणाची अखेरीस भर घातली आहे. ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर माझे मित्र श्री. सदा डुंबरे यांनी मला सुचविले, की एकंदरीत समाजसुधारकांत महर्षी शिंदे यांच्या स्थानासंबंधी विवेचन करणारे एक प्रकरण ग्रंथाच्या अखेरीस असावे. त्यांची ही सूचना मला एकदम पटली; व ह्या दुस-या आवृत्तीत 'उपसंहार' या प्रकरणाचा समावेश केला आहे. प्रा. गो. पु. देशपांडे यांनी हे प्रकरण वाचून काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. प्रा. भालचंद्र नेमाडे, प्रा. दिगंबर पाध्ये व श्री. सदा डुंबरे यांनी केलेल्या सूचनांचाही मला फार उपयोग झाला. श्री. विलास गिते यांनी काही उपयुक्त माहिती कळविली. या सर्व मित्रांचा मी फार आभारी आहे.

महर्षी शिंदे १९२७ साली ब्रह्मदेशात गेले असता तेथे त्यांना भेटलेल्या महाराष्ट्रीय मंडळींचे एक छायाचित्र व महर्षी शिंदे यांच्या मोडी अक्षराचा नमुना (त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांना लिहिलेल्या पत्राचा प्रारंभिक भाग) प्रस्तुत आवृत्तीत नव्याने समाविष्ट केला आहे.

प्रस्तुत चरित्रग्रंथाची दुसरी आवृत्ती काढण्यात 'लोकवाङ्मय गृहा'चे श्री. प्रकाश विश्वासराव यांनी पहिल्या आवृत्तीप्रमाणेच आत्मीयता व तत्परता दाखविली याबद्दल त्यांचा मी फार आभारी आहे.
गो. मा. पवार

तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य या चरित्रग्रंथाची दुसरी आवृत्ती २००६ मध्ये प्रसिद्ध झाली व तीही अडीच-तीन वर्षांत संपली. वाचकांनी, अभ्यासकांनी व विचारवंतांनी या चरित्रग्रंथास जो मनःपूर्वक प्रतिसाद दिला याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे.

प्रस्तुत चरित्रग्रंथाबद्दल कॉ. गोविंदराव पानसरे, श्री. प्रकाश विश्वासराव, श्री. सतीश काळसेकर यांना प्रारंभपासून उत्साह वाटत आलेला आहे. त्यांच्या आस्थेमुळेच या ग्रंथाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे, याचा मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करू इच्छितो.

हा चरित्रग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्या वर्षातच त्याला प्राप्त झालेल्या आठ पुरस्कारांचा उल्लेख आधी केलेला आहेच. दुस-या आवृत्तीनंतरही प्रस्तुत ग्रंथास महत्त्वपूर्ण पुरस्कारांची मान्यता मिळतच राहिली. मिळालेले नंतरचे चार पुरस्कार असे :

१. औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेचा स्व. लोकनेते यशवंतराव चव्हाण पुरस्कार,
२. दिल्ली येथील साहित्य अकादेमीचा २००७ चा पुरस्कार,
३. सातारा येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था व फुले-आंबेडकर साहित्य पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार व
४. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने कै. प्रा. अ. का. प्रियोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेला ज्येष्ठ संशोधक पुरस्कार.

साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाल्यामुळे त्याचप्रमाणे प्रस्तुत चरित्रग्रंथाचे महत्त्व पटल्याने त्याचे इंग्रजीत व अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवाद होऊ लागले. प्रा. सुधाकर मराठे यांनी इंग्रजीत व प्रा. चंद्रकांत पोकळे यांनी कन्नडमध्ये केलेले अनुवाद साहित्य अकादेमीच्या वतीने लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. तंजावरचे डॉ. विवेकानंद गोपाल हे तमीळमध्ये अनुवाद करीत आहेत.

चरित्रग्रंथाच्या या अनुवादामुळे महर्षी शिंदे यांच्या असाधारण ऐतिहासिक स्वरूपाच्या कार्याची माहिती अन्य भारतीय भाषांतील वाचकांना तसेच भारताबाहेरील जिज्ञासू वाचकांना व अभ्यासकांना होईल याचे मला विशेष समाधान वाटते.

आधीच्या आवृत्तीत राहून गेलेले मुद्रणदोष डॉ. रोहिणी तुकदेव व डॉ. रणधीर शिंदे यांनी निदर्शनास आणले; व माधवी विचारे यांनी ते काळजीपूर्वक रीतीने दुरुस्त केले याचा मी आभारपूर्वक निर्देश करतो.

महर्षी शिंदे यांनी मोठ्या द्रष्टेपणाने व निष्ठावंतपणे आरंभिलेल्या कार्याचे मोल उत्तरोत्तर विशेषत्वाने जाणवू लागले आहे. अशा या काळात प्रस्तुत ग्रंथाचे स्वागत वाचक मोठ्या आत्मीयतेने करतील, असा मला विश्वास वाटतो.

गो. मा. पवार
सोलापूर, २१ जून २०१०

दक्षिण किना-यावरील पंधरवडा

मँचेस्टर कॉलेजमध्ये आठवड्यात अभ्यासाचे चारच दिवस असत आणि शनिवार, रविवार, सोमवार या दिवशी सुटी असे. सलग तीन दिवस सुटी ठेवण्याचा उद्देश हा असे की, इतर गावातील कुठल्याही एका युनिटेरियन समाजामध्ये एखाद्या वेळी उपासना चालविणारे आचार्य नसले तर मँचेस्टर कॉलेजातील विद्यार्थ्याला उपासना चालविण्यासाठी पाठविण्यात येत असे. त्याबद्दल त्याला येण्याजाण्याचे भाडे व पाहुणचारासह दोन पौंड मोबदला मिळत असे. विठ्ठल रामजी शिंदे यांचीही अशा प्रकारची उपासना चालविण्यासाठी वर्णी लागत असे. ब्रह्मसमाजाचा प्रतिनिधी म्हणून विशेष आवडीने त्यांना निवडण्यात येत असे.

१५ मार्च १९०२ पासून त्यांच्या कॉलेजला सहा आठवड्याची ईस्टरची सुटी सुरू झाली. १६ तारखेला ब्रिडपोर्ट येथील युनिटेरियन चर्चमध्ये उपासना चालविण्याचे त्यांना निमंत्रण मिळाले होते. त्याच परिसरात इतर ठिकाणीही उपासना चालविण्याची आणि व्याख्याने देण्याची निमंत्रणे त्यांना होती. डेव्हनशायर या नावाने ओळखल्या जाणा-या विभागातील इंग्लंडच्या दक्षिण किना-यावर असलेल्या डेव्हनशायर या परगण्यातील ब्रिडपोर्ट या शहरी जाण्यासाठी १५ मार्चल सकाळी ९ वाजता ते रेल्वेने निघाले. त्यांचे मित्र जे. वॉल्टर कॉक यांच्या परिचयाचे मि. कॉर्निक हे ब्रिडपोर्टमधील एक दुकानदार त्यांना नेण्यासाठी दीडच्या सुमारास स्टेशनवर आले होते. ते जुन्या वळणाचे मेथॉडिस्ट पंथाचे होते. शिंदे यांच्याशी ते फार स्नेहभावाने वागले.

ब्रिडपोर्ट हे इंग्लंडच्या दक्षिण किना-यावरील टुमदार शहर आहे. एकेकाळी दोरखंडे आणि जाळीसाठी सुप्रसिद्ध असलेले हे शहर मुळात दोन गावांनी मिळून तयार झाले आहे. शहरामधील ईस्ट स्ट्रीटवर युनिटेरियन देवळाची १७९४ मध्ये बांधलेली साधी, सुंदर इमारत आहे.१ संध्याकाळी युनिटेरियन मंदिरामध्ये आचार्य मि. सॉली यांची शिंदे यांनी भेट घेऊन उपासनाक्रम समजून घेतला. दुस-या दिवशी रविवारी सकाळी त्यांची उपासना झाली. उपासनेनंतर मि. कॉलफॉक्स ह्या श्रीमंत युनिटेरियन गृहस्थांची भेट झाली. हे मि. कॉलफॉक्स मँचेस्टर कॉलेजचे अध्यक्ष होते. त्यांच्या भेटीनंतर शिंदे शहरापासून दीड मैलावर कॉर्निकच्या आईवडिलांच्या घरी गेले. ते फळझाडाची लागवड करीत असत. शेतीबद्दल विठ्ठल रामजींना कुतूहल असल्यामुळे फळझाडांच्या आणि जिराईत जमिनीच्या लागवडीसाठी किती भाडे द्यावे लागते ह्याची त्यांनी चौकशी केली.

शिंदे यांची ब्रिडपोर्ट येथील युनिटेरियन मंदिरातील उपासना व त्यांचे व्याख्यान हा ब्रिडपोर्ट शहरातील संस्मरणीय प्रसंग ठरला. मँचेस्टर कॉलेजमधील भारतीय विद्यार्थी मि. व्ही. आर. शिंदे हे रविवारी १६ तारखेच्या संध्याकाळी उपासना चालविणारे हे दोन आठवड्यापूर्वीच जाहीर झाले होते. त्यामुळे तेथील युनिटेरियन समाजामध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले होते. ब्रिडपोर्ट न्यूज मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या उपासनेच्या वृत्तान्तामधील मुख्य भाग असाः उपासनेसाठी मोठा समाज जमला होता. शिंदे हे हिंदुस्थानातून आलेले काळ्या वर्णाचे गृहस्थ असून त्यांनी गुलाबी फेटा बांधलेला असल्याने आकर्षक दिसत होते. त्यांनी आठवी उपासना फारच प्रभावी रीतीने वाचली. उपासनेनंतर त्यांनी ब्राह्मधर्मावर उद्बोधक व्याख्यान दिले. ब्राह्मसमाज १८३० मध्ये राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केला व केशवचंद्र यांनी तो वाढविला. शिंदे स्वतः ब्राह्मसमाजाचे उपासक आहेत. हा एकेश्वरी पंथ म्हणजे भारतामधील युनिटेरियन धर्म म्हणता येईल. शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, परमेश्वर विशिष्ट लोकांपुरता प्रकट झाला, ज्यू लोक हे त्याने निवडलेले त्याचे खास लोक होत असे समजणे, ह्यावर विश्वास ठेवणे अज्ञपणाचे म्हणावे लागेल. आपण कोणीतरी विशेष लोक आहोत असे समजणे हा प्रकार इतर धर्मांतही दिसतो. उदाहरणार्थ, ख्रिश्चन हे इतरांना धर्मभ्रष्ट समजतात. हिंदू स्वतःला उच्च आणि इतरांना हीन समजतात. येथील युनिटेरियनप्रमाणे भारतामधील ब्राह्मसमाज प्रारंभी छोटासा पंथ होता. ब्राह्म आणि युनिटेरियन हे दोन्ही पंथ प्रेमळ भगिनीप्रमाणे असून उत्तरोत्तर विकास पावणारे आहेत. कोणीही एक पंथ दुस-याकडे श्रेष्ठपणाच्या प्रौढीने पाहत नाही. हिंदुस्थानातील ब्राह्मधर्म म्हणजे ख्रिस्ती मिशन-यांच्या कामाचे फलित होय असे समजणे चुकीचे ठरेल. कारण ब्राह्मधर्म पूर्णतया वेगळा असून धर्माग्नी प्रज्वलित झाल्यामुळे पारंपरिक हिंदू धर्ममतातून विवेकपूर्ण रीतीने घडलेला तो आंतरिक विकास होय. केशवचंद्र सेन इंग्लंडमध्ये आले असताना विविध धर्मपंथांच्या श्रद्धांबद्दल ते असे म्हणाले : “मी इंग्लंडमध्ये आल्यापासून पाहतो की, विविध नावे धारण करणारे धर्मपंथ आपण ख्रिश्चन असल्याची घोषणा करतात. मला वाटते की, मी एका भल्या मोठ्या मार्केटात आलो आहे. प्रत्येक पंथ म्हणजे लहानसे दुकान असून तेथे विशिष्ट प्रकारचा ख्रिश्चन धर्म हा विक्रीसाठी ठेवला आहे. मी जेव्हा ह्या दाराकडून त्या दाराकडे जातो, ह्या दुकानाकडून त्या दुकानाकडे जातो त्या वेळेला प्रत्येक धर्मपंथ पुढे येऊन आपला बायबलचा विशिष्ट अर्थ आणि आपली विशिष्ट ख्रिश्चन श्रद्धा मला देऊ पाहतो. माझा असा पक्का विश्वास आहे आणि मला स्पष्टपणे म्हणावेसे वाटते की, कोणताही ख्रिस्ती धर्मपंथ खराखुरा आणि परिपूर्ण ख्रिस्त पुढे करीत नाही, तर तो ब-याच ठिकाणी विरूप स्वरूपात प्रस्तुत केला जातो आणि अधिक लज्जास्पद गोष्ट कोणती असेल तर काही ठिकाणी नकली ख्रिस्त पुढे केला जातो. मात्र मी हे सांगू इच्छितो की मी इंग्लंडमध्ये ख्रिस्त शोधण्यासाठी आलो नाही. ही परमेश्वराची कृपा आहे की, माझा ख्रिस्त माझ्याजवळ आहे.” उपदेशक म्हणाले की, “ब्राह्मांचा आणि युनिटेरियनांचा गेल्या सात-आठ वर्षांत घनिष्ठ संबंध येत आहे. मात्र ब्राह्मांचे खरे बळ परमेश्वराच्य अदृश्य धर्मसंघात साठविले आहे.”२

शिंदे यांनी आठवी उपासना लिटनी पद्धतीने वाचली. या पद्धतीत आचार्य व उपासक आळीपाळीने काही वाक्ये म्हणतात. त्यामुळे दोघांचेही लक्ष उपासनेत लागते. युनिटेरियनाशिवायही बरेच लोक उपासनेसाठी जमले होते. एकंदरीत श्रोतृसमाज साडेतीनशेपर्यंत होता. शिंदे यांचे ब्राह्मसमाजावरील व्याख्यान त्यातील स्पष्ट प्रतिपादनामुळे अनेकांना आवडले.३

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ब्रिडपोर्ट भेटीच स्मरण असणारी एक व्यक्ती १९८३ मध्ये हयात होती. रे. बेसिल शॉर्ट यांनी आपल्या परिचयाच्या ८९ वर्षांच्या स्त्रीजवळ विठ्ठल रामजी शिंदे यांच्या १९०२ मधील ब्रिडपोर्ट भेटीचा उल्लेख केल्यावर त्या उदगारल्या, “हो, मला आठवतं की, मि. शिंदे ब्रिडपोर्टला आले होते. त्या वेळेला संडे स्कूलमध्ये एक सभा झाली होती. त्या वेळेला पुढच्या रांगेत मि. शिंदे बसले होते. त्यांनी मला आपल्या मांडीवर घेतले होते.”४

“त्या बाईचे सध्याचे नाव मिसेस फुलर. लग्नाआधी त्यांचे नाव हेनरीएटा ऍबट होते. ह्या बाईंची आई मंदिराची देखभाल करण्याचे काम करीत होती व वडील बांधकामाचे कंत्राटदार होते.”५

ही उपासना चालविण्यात आपण फार रंगलो होतो असे शिंदे यांनी नमूद केले आहे. उपासनेचा व त्यानंतरच्या त्यांच्या व्याख्यानाचा वृत्तान्त इतरही वृत्तपत्रांत आला. शिंदे यांनी काहीशा विनोदाने म्हटले आहे, “रविवारच्या नेहमीच्या पोशाखाप्रमाणे माझ्या डोक्यावर गुलाबी फेटा होता. निरनिराळ्या वर्तमानपत्रांत जो रिपोर्ट आला त्यात ब्राह्मसमाजापेक्षा माझ्या फेट्याचे आणि विशेषतः शेमल्याचेच अधिक वर्णन होते.”६

दुस-या दिवशी सकाळी साडेदहा वाजता विठ्ठल रामजी शिंदे रेव्ह. सॉली यांच्याबरोबर संभाषण करीत समुद्रकाठी फिरावयास गेले. वेस्ट बेवरील टेकडीचा दीडशे फूट उंचीचा कडा तुटलेला होता. इंग्लंडमधील हा एक अप्रतिम समुद्रकिनारा समजला जातो. शिंदे यांना एकंदर देखावा फार उदात्त व रमणीय वाटला.७

खेडेगाव आणि शिक्षक हे दोन्हीही विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आस्थेचे विषय होते. ब्रिडपोर्टसारख्या ठिकाणी आल्यावर इंग्रजी खेड्यातील शिक्षण स्वतः डोळ्याने पाहण्याची उत्कट इच्छा मिस्टर कॉर्निक ह्यांस त्यांनी दर्शविली. त्यानुसार ब्रिडपोर्टच्या पूर्वेला तीन मैलावर असलेल्या सुमारे ७०० वस्तीच्या बर्टन खेडेगावातील शाळा त्यांना पाहावयास मिळाली. गावाबाहेर एका जुन्या पण स्वच्छ इमारतीत ही शाळा होती. मुलांची संख्या ७१ व मुलींची संख्या ६७ होती. इंग्लंडात सात वर्षावर व चौदा वर्षाखाली प्रत्येक मुलामुलीने शाळेत गेलेच पाहिजे असा सक्तीचा कायदा होता. हा कायदा मोडल्यास पालकास दंड अगर कैदेची शिक्षा होते. हे सक्तीचे शिक्षण मुलांना मोफत असे. शासनाची ही बाजू विठ्ठल रामजी शिंदे यांना महत्त्वाची वाटत असणार. शाळेत एक लहानसे म्युझियम होते. मुलांचा सगळा अभ्यास शाळेतच करून घेतला जात असे. घरी करावयाच्या अभ्यासाचा बोजा त्यांच्यावर पडत नसे. मुलांना फी तर पडत नसेच शिवाय काही स्कॉलर्शिपा होत्या. शाळेची शिस्त वाखाणण्याजोगी होती. हेडमास्तरांबद्दल शिंदे यांनी लिहिले, “मि. मिलबोर्न ह्या कामाला अगदी लायक दिसला. मुलावर त्याची अशी जरब होती की, कधी न पाहिलेल्या माझ्या फेट्याकड् फारसे न पाहता नेहमी पाहिलेल्या त्याच्या तोंडाकडे सावधपणे पाहात...”८ समुद्रकाठच्या डोंगराळ प्रदेशातील आडवळणाच्या खेडेगावातील शाळांची ही व्यवस्था पाहून विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डोक्यात विचारांचे व मनात विकारांचे काहूर माजले. “इतका पैसा व अक्कल इकडे खर्च होत असूनही राष्ट्रीय शिक्षणाची हेळसांड होत आहे अशी ओरड पत्रांतून, सभांतून ऐकू येते; तर आमच्याकडे १०० स ७ला लिहिण्यावाचण्यास येते तर नोक-या मिळत नाहीत म्हणून शिक्षण फार सवंगले असे कधी कधी उदगार ऐकू येतात.”९

शिंदे यांचा बी. ए. च्या परीक्षेत इतिहास हा अभ्यासाचा विषय होता. रोमच्या साम्राज्याचा इतिहास त्यांनी आवडीने वाचला होता. त्यामुळे ब्रिडपोर्टपासून सहा-सात मैलावर एग्गार्डन टेकडीवर रोमन छावणीचे अवशेष आहेत असे कळल्यावरून १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मि. कॉर्निक व रेव्ह. वुइंटर यांच्यासह ते ही टेकडी पाहावयास गेले. एग्गार्डन टेकडीची उंची समुद्रसपाटीपासून ८१२ फूट असून टेकडीच्या माथ्यावरून जुन्या रोमन काळाची एक सडक सरळ बाणासारखी खाली जाते. सडका अगदी सरळ करण्याची चाल रोमन आहे. टेकडीच्या माथ्यावरील रोमन छावणीचे अवशेष त्यांनी पाहिले. मधे दोन पुरुष खोल खंदक व दोन्हीकडे समांतर बांध असे एक मोठे वर्तुळ टेकडीच्या माथ्यावर बघितल्याचे त्यांनी नमूद केले आहे.१०

एग्गार्डन हिलवरून परत येताना मि. कॉर्निक यांनी त्यांना एका खेड्यातील मेथॉडिस्ट चर्चमध्ये नेले. नंतर गरीब लोकांच्या दोन घरात जाऊन त्यांची स्थिती त्यांनी पाहिली. पैकी एक बाई १० वर्षे आजारी होती व अलीकडील ५/६ वर्षे अगदी अंथरुणाला खिळून होती. शिंदे तिच्याजवळ जाऊन तिला भेटले व तिच्यासाठी प्रार्थना केली. त्या रुग्ण बाईल फारच आनंद वाटला. मेथॉडिस्ट समाजाची गरीब लोकांमध्ये पद्धतशीरपणे सेवावृत्तीने काम करण्याची वृत्ती व हातोटी त्यांना फारच चांगली वाटली. आठवडाभर आपापला कामधंदा करणारे तरुण उत्साहाने खेडोपाड्यांमध्ये रविवारी उपासना करण्यास जातात. मि. कॉर्निक हे अशा लोकांपैकी होते. दर रविवारी ते दोन-तीन खेड्यांमध्ये फेरी मारून येत असत.

मि. व्हाईट ह्या मेथॉडिस्ट गृहस्थांचा ब्रिडपोर्टच्या मुक्कामामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांना परिचय झाला. हे व्यापारी गृहस्थ विनोदी स्वभावाचे होते. गौतमबुद्धबद्दल त्यांना चांगली माहिती व आदरभाव होता. शिंदे यांना त्यांनी १९ तारखेस जेवावयास बोलाविले. त्यांच्या कुटुंबातील मुले आणि मुली मोठ्या स्नेहभावाने वागली.

शिंदे यांचा ब्रिडपोर्टमधील आठ दिवसांचा मुक्काम चांगला झाल. वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या उपासनाबद्दल बातम्या येत होत्या. ब्रिडपोर्टपासून जवळ असलेल्या डेव्हनपोर्ट येथेही उपासना चालविण्याची त्यांना निमंत्रणे आली होती. २२ मार्चला ब्रिडपोर्टहून क्रुकर्न स्टेशनवर जाण्यासाठी ते मुद्दाम बसगाडीने निघाले. दरीत खोलवर दिसणारी गावातील कौलारू घरे रमणीय दिसत होती. दुपारी साडेतीनला ते डेव्हनपोर्टला आले. स्टोक नावाच्या खेडेगावातील चार क्रमांकाच्या घरामध्ये त्यांनी मुक्काम केला.

डेव्हनपोर्ट, प्लीमथ व स्टोन हाऊस ही तीन शहरे एकमेकांस अगदी भिडून तिन्हीचे आता दोन लाखाचे एकच गाव बनलेले दिसत होते. ही गावे टेकडीवर वसली असल्याने एकही रस्ता सपाट दिसला नाही. मात्र उंच-सखलपणामुळे सगळ्या गावाला रम्यपणा प्राप्त झालेला दिसत होता.

ब्रिडपोर्टमधील युनिटेरियन आणि इतर ख्रिश्चन मंडळींमध्ये धर्माबद्दल जो उत्साह त्यांना आढळला तो डेव्हनपोर्टमध्ये दिसून आला नाही. वाढत्या लोकवस्तीचा आणि शहरीकरणाचाही हा प्रभाव असण्याची शक्यता आहे. डेव्हनपोर्ट येथील युनिटेरियन मंदिरात सकाळी ११ वाजता शिंदे यांची उपासना झाली. विषय ‘लौकिक व धार्मिक जीवन’ हा होता. त्यांना देऊळ भव्य दिसले पण युनिटेरियन चळवळ मंदावलेली वाटली.११ उपासकांची संख्या तीसपेक्षा जास्त नव्हती. संध्याकाळच्या उपासनेत ‘ब्राह्मसमाज’ हा विषय होता. सुमारे ५० उपासक आले होते. मंगळवारी युनिटेरियन मंदिरात त्यांचे, लिटररी सोसायटीच्या वतीने ‘पाश्चात्त्यांचे हिंदू समाजावर परिणाम’ या विषयावर व्याख्यान झाले. युनिटेरियनांच्या ठिकाणी हिंदुस्थानाबद्दल आस्था असल्याचे त्यांना जाणवले. शिंदे यांनी प्लीमथ येथील ऑक्सफर्ड स्ट्रीटवरील बोर्ड स्कूल २६ तारखेस पाहिले. ही शाळा शहरातील असल्यामुळे मोठी होती. ३६४ मुले हजर होती. ह्या बोर्ड स्कूलमध्ये केवळ कामकरीवर्गातील लोकांची मुले येत होती. शिक्षण सक्तीचे, मोफत व योग्य प्रकारचे चालल्याचे शिंदे यांना दिसून आले. २७ तारखेला संध्याकाळी डेव्हनपोर्टच्या दक्षिण भागातील गरीब लोकांची वस्ती पाहण्यासाठी ते मुद्दाम गेले. लोकांची घरे गलिच्छ व सडकाही घाणेरड्या दिसल्या. श्रीमंत लोकांची वस्ती आणि गरिबांची मोहल्ले यांमध्ये पुष्कळच तफावत असल्याचे त्यांना जाणवले.

डेव्हनपोर्टमध्ये असतानाच २८ मार्चला गुड फ्रायडेचा दिवस आला. ख्रिस्तास सुळी दिल्याचा हा दिवस सोमवार संध्याकाळपर्यंत धार्मिक लोक, विशेषतः रोमन कॅथॉलिक, व्रतस्थपणे पाळतात. विठ्ठल रामजी शिंदे शुक्रवारच्या संध्याकाळी रोमन कॅथॉलिक कॅथीड्रलमध्ये उपासनेस गेले. गुड फ्रायडेची उपासना किती कर्मठपणाने केली जाते याबद्दलचे सगळे कर्मकांड त्यांनी निरखून पाहिले. उपासना संपल्यानंतर देवळातील गॅसचे दिवे एकदम मालविले जातात व सर्वत्र अंधार केला जातो. कारण येशूस फाशी दिल्यावर सर्वत्र अंधार पडून धरणीकंप झाला असे बायबलमध्ये वर्णन केले आहे. शेवटी धरणीकंपाची नक्कल करण्यासाठी एका कोप-यात धड्धड् असा बारीक आवाज करण्यात आला वगैरे गोष्टी त्यांनी पाहिल्या. प्रॉटेस्टंट देवळात अशा नकला होत नाहीत. परंतु व्याख्यानाचा सूर असाच असतो. युनिटेरियन देऊळ गुड फ्रायडेच्या दिवशी बंद होते आणि ईस्टरच्या रविवारी म्हणजे ३० मार्च १९०२ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यातील दोन्ही उपासना चालविल्या.

शिंदे यांनी मँचेस्टर कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याला सहा महिने झाले होते. इंग्लंडच्या दक्षिण किना-यावरील ब्रिडपोर्ट आणि डेव्हनपोर्ट ह्या दोन गावी त्यांनी ईस्टरच्या सुटीत १५ दिवस वास्तव्य केले. ब्रिडपोर्ट आणि डेव्हनपोर्ट येथे चार उपासना चालविल्या व दोन स्वतंत्र व्याख्याने दिली. उपासना चालविण्याची त्यांची उत्तम तयारी झाली होती हे उपासकांच्या प्रतिसादावरून स्पष्ट होत होते. शिंदे यांचा आत्मविश्वास वाढावा. त्यांना समाधान वाटावे अशी ही बाब होती. बर्टन या खेड्यातील, प्लीमथ या शहरातील गरीब वस्तीतील प्राथमिक शिक्षण देणा-या शाळा बघितल्यानंतर मुलांमुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणे आवश्यक आहे हे त्यांच्या मनावर चांगल्या त-हेने बिंबले असावे. (पुढे १९१९ साली पुणे म्युनिसिपालिटीने केवळ मुलांसाठीच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी असा विचार चालला होता तेव्हा विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुलांच्या जोडीने मुलींनाही ही सोय मिळावी यासाठी चळवळ करून हा प्रश्न धसाला लावला.) मि. व्हाईट, मि. कॉर्निक इत्यादी मेथॉडिस्ट धर्मपंथांच्या मंडळींना त्यांनी जवळून पाहिले. त्यांची गोरगरिबांबद्दलची कळकळ आणि त्यांच्यासाठी अंग झाडून काम करण्याची वृत्ती शिंदे यांच्या अनुभवास आली. ब्रिडपोर्ट, डेव्हनपोर्टकडील १५ दिवसांचा दौरा आटोपून ते समाधानाने ऑक्सफर्डला परतले.

संदर्भ
१.    बेसिल शॉर्ट, ए रिस्पेक्टेबल सोसायटीः ब्रिडपोर्ट, १५९३ ते १८३५, मून रेकर प्रेस, ब्रॅफर्ड-ऑनअँव्हॉन, १९७६, पृ. ८-९
२.    ब्रिडपोर्ट न्यूज, ब्रिडपोर्ट, शुक्रवार, २१ मार्च १९०२.
३.    विठ्ठल रामजी शिंदे रोजनिशी, पृ. ९२.
४.    रेव्ह. बेसिल शॉर्ट यांचे मला व माझ्या पत्नीला आलेले १६ ऑक्टोबर १९८३चे पत्र. शिंदे यांच्यासंबंधी संशोधन करण्यासाठी मी सप्टेंबर १९८३ मध्ये पत्नीसह ब्रिडपोर्टला गेलो होतो त्या वेळी रेव्ह. शॉर्ट यांनी आम्हास ब्रिडपोर्ट न्यूजच्या कार्यालयात नेले व इतरही आवश्यक माहिती दिली.
५.    गो. मा. पवार, ‘महर्षीच्या पावलांमागे इंग्लंडमध्ये : ब्रिडपोर्टमधील एक दिवस’, सिंहासन, दिवाळी, १९८४, पृ. ६१.
६.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १३८.
७.    वेस्ट बेच्या किना-यावरील वाळू म्हणजे विविध रंगाचे, आकारचे, चपटे लंब वर्तुळाकार गोटे होत. काही तळहाताएवढे मोठे तर काही करंगळीच्या नखाहून लहान. यांचा स्पर्शही मुलायम. वेस्ट बेवर आम्हाला घेऊन जाणारे आमचे सोबती मि. लेस्ली ह्यांनी सांगितले की, ह्या वाळूची न्यायला बंदी केली आहे.
८.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनीशी, पृ. ९६.
९.    तत्रैव, पृ.९७.
१०.    तत्रैव, पृ.९७.
प्रस्तुत लेखकाने १९८३ साली हे स्थळ बघितले. शिंदे यांनी वर्णन केल्याप्रमाणे आता तेथील खंदक दोन पुरुष राहिलेला नव्हता. ५-६ फूट खोल वाटत होता.
११.    ४ आणि ५ ऑक्टोबर १९८३ रोजीम मी डेव्हनपोर्ट येथे असताना युनिटेरियन मंदिराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आता तेथे युनिटेरियन मंदिर अस्तित्वात राहिलेले नाही. त्याचे एका सार्वजनिक करमणुकीच्या (पबमध्ये) रूपांतर झाले असे तेथे जाण्यापूर्वी ऐकले होते ते खरे ठरले.

जमखंडी-मुधोळ येथील प्रचारकार्य

कलकत्त्याहून परतल्यावर शिंदे हे मुंबईतील कामाचा कार्यक्रम निश्चित करू लागले. धर्मकार्याची दोन मुख्य अंगे. एक आचार्यकार्य व दुसरे प्रचारकार्य. ज्यांनी धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतलेली असते अशांकडून धर्माचरण योग्य त-हेने होईल असे पाहावे लागते. ह्या कामाचा प्रमुख भाग म्हणजे दर आठवड्याला साप्ताहिक उपासना चालविणे; सभासदांच्या घरी भेटी देऊन त्यांचे कौटुंबिक धर्माचरण नीट चालले ना ते पाहणे व त्यासाठी साह्य करणे; नामकरण, उपनयन, विवाह, अंत्येष्टी इत्यादी गृहविधी चालविणे; सभासदांचा परस्परपरिचय वाढून समाज दृढ व्हावा म्हणून वेळोवेळी स्नेहसंमेलने करणे इत्यादी. स्त्रियांसाठी दर शनिवारी आर्य महिलासमाज; मुलांसाठी रविवारचे धर्म व नीती शिकविण्याचे वर्ग; तरुणांसाठी ब्राह्ममंडळ; वृद्धांसाठी संगतसभा आणि बाहेरच्यांसाठी व्याख्याने असा कार्यक्रम आठवडाभर चाले. ह्या कार्यक्रमांना चालना देऊन ते अधिक नेटकेपणाने व जोरदारपणाने चालविणे हे काम त्यांना करावयाचे होते. ह्या कामाच्या जोडीनेच शिंदे यांनी पुढील तीन संस्थांची नव्याने भर घातली.

पोस्टल मिशन
शिंदे विलायतेत असताना त्यांनी मिस् टॅगर्ट व मिस् हिल् या स्त्रियांनी चालविलेले युनिटेरियन पोस्टल मिशनचे कार्य जवळून पाहिले होते. त्या वेळी त्यांचे मित्र श्री. वासुदेव सुखटणर हे पुण्यास होते.

अशा पद्धतीची ब्राह्म पोस्ट मिशन ही संस्था त्यांच्या साह्याने स्थापन करून शिंदे यांनी हिंदुस्थानात येण्याआधीच या प्रकराच्या कामाल प्रारंभ केला होता. ब्राह्मधर्माच्या तत्त्वावर आणि उपासनापद्धतीवर लहान लहान पुस्तके तयार करून ती टपालाद्वारे लोकांना पाठवून त्यावर वाचकांकडून ज्या शंका अथवा प्रश्न येतील त्याबाबत पत्रव्यवहार करून आणि सवडीप्रमाणे त्यांना भेटीस बोलावून धर्मप्रसार करण्याच्या पद्धताली पोस्टल मिशन हे नाव पडले. ह्या कामी युनिटेरियन लोकांकडून त्यांनी पुस्तकांचे व द्रव्याचे साह्य मिळविले. शिंदे स्वदेशी आल्यानंतर सुखटणकर हे मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी गेले तेव्हा शिंदे यांनी हे कार्य मुंबईला आणून वाढविले. ह्या कामी त्यांचे मित्र आणि समाजाचे सभासद सय्यद अब्दुल कादर यांचे मोठे साह्य झाले. सात-आठ वर्षांच्या अवधीत एकंदर ३,४३८ ब्राह्मधर्मावरील पुस्तके, १२, ७०० लहानसहान पत्रके, ६३३ युनिटेरियन पुस्तके व ५,००० युनिटेरियन पत्रकांचा प्रसार करण्यात आला. ह्या कामासाठी शिंदे यांनी मुंबई प्रांतात दोन वेळेला प्रवासदौरा करून व्याख्याने दिली.

उदार धर्मग्रंथ वाचनवर्ग (लिबरल रिलिजस रीडिंग क्लास)
कॉलेजातील व हायस्कुलातील तरुण विद्यार्थ्यांना मूलभूत धर्मग्रंथांचे वाचन करण्याची सवय लागावी म्हणून हा वर्ग शिंदे यांनी सुरू केला. ह्या वर्गात महाराष्ट्रीय, गुजराथी, ख्रिश्चन आणि मुसलमान अशा भिन्नभाषी विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने हा वर्ग इंग्रजीत चालविला जात असे. दर बुधवारी सायंकाळी प्रार्थनामंदिरात वर्ग भरत असे. डॉ. आर्मस्ट्राँगचे ‘गॉड अँड सोल’, इमर्सनची पुस्तके, डॉयसनचे ‘फिलॉसॉफी ऑफ उपनिषद’ अशा पुस्तकांचे तेथे अध्ययन चालत असे. समाजाच्या डॉ. भांडारकर फ्री लायब्ररीमधूनही ह्या वाचनाला पूरक अशी अन्य इंग्रजी पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येत असत.

तरुण ब्राह्मसंघ (यंग थीइस्ट्स युनियन)
ब्राह्मधर्माच्या तत्त्वाप्रमाणे गृह्यसंस्कार व विधी चालविण्याला अनुष्ठान हे नाव आहे. मुंबईत झालेल्या ब्राह्मधर्म प्रसाराच्या तुलनेने अनुष्ठान तितक्या प्रमाणात घडत नसे. तरुणांमध्ये अनुष्टानाची आवड निर्माण व्हावी व त्यांना आनुष्ठानिक कार्ये करता यावीत या हेतूने १९०५ सालच्या दस-याच्या दिवशी शिंदे यांनी ही महत्त्वाची संस्था स्थापन केली. त्यांच्या या उपक्रमाला ब-याच प्रमाणात यस आले.

वरील धर्मप्रसाराच्या कामाशिवाय प्रार्थनासमाजाच्या वतीने लोकशिक्षण आणि परोपकाराची कृत्ये करण्यासाठी काही संस्था चालविल्या जात होत्या. मुंबई शहरात मजुरांसाठी रात्रीच्या दहा-बारा शाळा होत्या. त्यांपैकी दोन शाळा अस्पृश्यांसाठी होत्या. त्यांची देखरेख करण्याचे काम शिंदे यांना करावे लागे. पंढरपुरात बालहत्त्या प्रतिबंधक गृह ही नमुनेदार संस्थाही चालविली जात असे. समाजाचे सुबोधपत्रिका हे मराठी-इंग्रजी अशा दोन बाजू असलेले साप्ताहिकही चालविले जाई. त्यामध्ये लेखन करणे हेही शिंदे यांच्याकडून अपेक्षित होते. त्याप्रमाणे ते करीतही असत. मुंबई शहरातील ही स्थानिक कामे चालवून मुंबईबाहेरही धर्मकार्याच्या निमित्ताने त्यांना जावे लागत असे.

ह्याप्रमाणे शिंदे यांच्या कामाचा आराखडा होता व त्याप्रमाणे त्यांनी कामाला आरंभही केला. तथापि त्यांच्या घरची व्यवस्था अद्याप झाली नव्हती. त्यांचे वृद्ध आईबाप आणि पत्नी रुक्मिणीबाई जमखंडीस होते. जनाक्का, तान्याक्का आणि चंद्राक्का या तीन बहिणी पुण्यास हुजूरपागेत शिकत होत्या. लहान भाऊ एकनाथ कोल्हापूरात गोविंदराव सासने यांच्याकडे शिकत होता. तर गोविंदरावांची मुलगी सुशीला आणि शिंदे यांच्या आलगूरच्या मामांची मुलगी मथुरा ह्या दोघी जमखंडीस त्यांच्या घरी राहून शिकत होत्या. मुलगा प्रताप तीनचार वर्षांचा. ह्या विखुरलेल्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी शिंदे यांच्यावर होती आणि त्यांचे काम तर देशभर पसरलेले, तेव्हा कुटुंबाची एकत्र राहण्याची सोय करावी; याबाबतीत आईवडिलांचा विचारविनिमय घ्यावा असे त्यांना वाटू लागले. ह्या सुमारास म्हणजे १९०४ च्या फेब्रुवारीमध्ये मुंबईस प्लेगचा प्रादुर्भाव झाला. तूर्त काही दिवस मुंबईतील वास्तव्य कामाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे नव्हते. तेव्हा त्यांनी जमखंडी, मुधोळकडे दौरा करावयाचे ठरविले. पुण्यास राहणारे समाजाचे वृद्ध प्रचारक श्री. शिवरामपंत गोखले यांनाही बरोबर न्यावयाचे योजिले. त्यांचा वडीलधारेपणा, त्यांची भजन करण्याची असलेली तयारी प्रचारदौ-यात उपयोगी पडेल असेही त्यांना वाटले.१ त्यानुसार ते फेब्रुवारीच्या चौथ्या आठवड्यात जमखंडीस जावयास निघाले.

ब्राह्मधर्माचा प्रचार जमखंडीस अगदी नवा होता असे नव्हे. शिंदे विलायतेला जाण्यापूर्वी त्यांच्या घरी ब्राह्मोपासना होत होत्या. ते विलायतेस गेल्यावरही त्यांच्या आईबाबांनी त्या चालू ठेवल्या होत्या. ह्या वेळी मात्र जमखंडीस दोन आठवडे राहून प्रार्थनासमाजाच्या सहा मूळ तत्त्वांची छाननी करण्यासाठी सहा स्वतंत्र जाहीर व्याख्याने त्यांनी दिली. व्याख्यानाचे ठिकाण म्युनिसिपालटीच्या दुस-या दिवाणखान्यात होते. नावीन्यामुळे बरीच गर्दी जमत असे. त्यांच्याबरोबर असलेले वृद्ध शिवरामपंत ब्राह्मण असूनही त्यांच्याकडे जेवतात याचा गवगवा गावभर झाला होता. जमखंडी हा गाव आगगाडीपासून दूर, विचारात मागासलेला आणि आचारात अत्यंत सोवळा असल्यामुळे शिंदे यांच्या व्याख्यानमालेमुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळल्यासारखे झाले. ह्यापूर्वी शिंदे हे गावचे लाडके असले तरी त्यांची आत्यंतिक सुधारकी तत्त्वे आणि ती मांडण्याची सडेतोड पद्धती कुणाच्याही गळी सहजासहजी उतरण्यासारखी नव्हती. लोकमत हळूहळू प्रक्षुब्ध होऊ लागले. आगीत तेल ओतण्याचे काम हायस्कूलमधील एका उपद्व्यापी शिक्षकाने केले. मुलांच्या वानरसेनेने गोंधळ करावा अशी व्यवस्था करून ते व्याख्यान ऐकण्यास साळसूदपणे पुढे येऊन बसत व मान डोलवीत व्याख्यान ऐकत असत. ‘जातिभेद’ या विषयावर शेवटचे व्याख्यान ज्या वेळी सुरू झाले तेव्हा रस्त्यावरील वानरसेनेने गोंगाट करून तृप्त न राहता कच-यांचा आणि दगडांचा वर्षा केला. शिंदे यांनी म्हटले आहे, “अशा प्रकारे शेवटची आरती होऊन ही सभा संपली.” नव्या धर्मसुधारकी विचारांना कर्मठ जमखंडीकरांचा प्रतिसाद मिळाला तो असा.

परंतु गोष्टी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. वृद्ध शिवरामपंतांचा छळ करण्याची एक घटना घडली. माधवराव गाडगीळ नावाचे एक सरकारी अधिकारी होते. त्यांना समाजाची तत्त्वे पटली व त्यांनी आपल्या घरी ब्रह्मोपासनेसाठी शिवरामपंतांना बोलावून घेतले. घरापासून दूर अंतरावर असलेल्या शौचकूपामध्ये शिवरामपंत गेले असताना बाहेरून कडी लावून त्यांना बराच वेळ कोडूंन ठेवण्याचा प्रकार त्या शिक्षकाच्या चिथावणीवरून व्रात्य मुलांनी केला. ते दिवसही शिमग्याचे होते. शिमग्यातल्या रात्रीच्या दंगलीचा मोर्चा विठ्ठलरावांच्या राहत्या घरावर येऊ लागला. धुळवडीच्या आदल्या रात्री तर ह्या मंडळींनी एवढा कहर केला की, त्यांच्या वडिलांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. प्रकरण येथपर्यंत आल्याने आपल्या घरच्या मंडळींनी कोठे राहावे हा त्यांचा प्रश्न एक प्रकारे सुटला. जमखंडी गाव सोडून सगळ्यांना आपल्याबरोबर मुंबईस घेऊन जावे असा निश्चय विठ्ठलरावांनी केला.
हा सामाजिक प्रकोप एवढ्या तीव्रपणे होण्याचे दुसरे एक कारण म्हणजे जमखंडीच्या शाळेतील एका दहा वर्षांच्या लहान मुलीला मुरळी सोडण्यात आली असे विठ्ठलरावांना समजल्यानंतर त्यांनी तिला घरी बोलावून घेतले आणि तिच्या पुढील शिक्षणाची चांगली व्यवस्था ठेवण्याबद्दल तिच्या आईबाबांना बजावले. निदान मुरळीचा धंदा तिने चालवू नये अशी त्यांना ताकीद दिली. आता विठ्ठलराव शिंदे यांची सुधारणेची मजल व्याख्यानातूनच न आटपता प्रत्यक्ष कृतीत उतरू लागली हे पाहून जीर्णमतवादी समाजाचा रोष त्यांच्या घरावर ओढवला. ज्या रामजीबाबा शिंदे यांनी जातपंचायतीचे पुढारपण मोठ्या सन्मानाने केले होते त्यांच्यावर अशी पाळी आल्याने जमखंडी गाव सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आपल्या लहानशा नोकरीची पेन्शन घेऊन चंबुगबाळे घेऊन मुंबईस येण्याचे ठरविले. मानी स्वभावाच्या रामजीबाबांना आपली पिढीजात जन्मभूमी सोडून प्रेमळ मित्रांची व नातलगांची अखेरची रजा घेऊन तडकाफडकी मुंबईची वाट धरताना किती यातना झाल्या असतील याची कल्पनाच करणे बरे.

उदार धर्मप्रचारासाठी आपले सर्वस्व वाहून टाकण्याचा एकदा निर्णय घेतल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांची येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची मानसिक तयारी झाली होती. कोणत्याही परिस्थितीत मनाची शांती ढळू द्यायची नाही असा त्यांच्या मनाचा निर्धार झाला होता. जमखंडीचा हा अनुभव घेतल्यानंतर प्रचारकार्यासाठी मुधोळला जावयाचे त्यांनी शांतपणे ठरविले.

जमखंडीपासून बारा मैलावर श्रीमंत घोरपडे यांचे हे छोटेसे संस्थानी गाव. शिंदे यांचे कॉलेजमधील सहाध्यायी मित्र जनुभाऊ करंदीकर हे मुधोळास इंग्रजी शाळेचे हेडमास्तर होते. ते व दत्तोपंत मिरजकर यांनी तेथील लायब्ररीत ५ मार्च रोजी सायंकाळी शिंदे यांचे व्याख्यान ठरविले होते. अध्यक्षस्थानी रामदुर्गचे मुन्सफ रावसाहेब चिप्पलकट्टी हे होते. शिंदे यांनी आपल्या दीड तासाच्या भाषणात पूर्वार्धात युरोपमधील प्रवासाची साधारण हकिकत सांगितली व उत्तरार्धात इंग्लंडातील व युरोपातील धार्मिक चळवळीचे वर्णन केले. हिंदुस्थानात ज्याप्रमाणे ब्राह्म, आर्य हे समाज हिंदू धर्माचे स्वरूप शुद्ध करून सार्वत्रिक धर्माची संस्थापना करण्याचे प्रयत्न करीत आहेत त्याचप्रमाणे इंग्लंड, युरोपमधील युनिटेरियन लोक ख्रिस्ती धर्माची सुधारणा करून उदार धर्माची स्थापना करण्याचे प्रयत्न कसे करीत आहेत ह्याबद्दल सुबोधपणे माहिती सांगितली. मुधोळास व्याख्यानाची फारशी प्रथा नसली तरी ५०-६० मंडळी उपस्थित होती.

दुस-या दिवशी म्हणजे ६ मार्च रोजी रात्री साडेआठ ते दहा लायब्ररीमध्ये मंडळी जमली. प्रथम भजन, प्रार्थना झाल्यावर शिंदे यांनी प्रार्थनासमाजाच्या साधारण तत्त्वाविषयी विवेचन केले. विवेचन सुरू करण्याच्या आधी मूर्तिपूजा व जातिभेद याविषयी शांतपणे चर्चा झाली. ७ तारखेस रात्री ९ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत शिंदे यांचे भाषण झाले. त्यात आस्तिक व नास्तिक मताविषयी विशेष विवेचन केल्यानंतर ग्रंथप्रामाण्य व अवतारवाद याविषयी त्यांनी आपले विचार सांगितले. शिंदे यांच्या भाषणानंतर दत्तोपंत मिरजकर यांनी छोटेस भाषण करून विचारले की, विचाराअंती समाजाची तत्त्वे मान्य होण्यासारखी आहेत पण ज्यांना अद्यापि मूर्तिपूजेपासून काहीएक प्रकारचे सुख होत आहे अशांना मूर्तिपूजा सोडल्याशिवाय समाजाच्या धर्माचा फायदा मिळू नये असा समाजाचा आग्रह आहे काय? का असावा? उदाहरणादाखल ते म्हणाले की, रामाची मूर्ती पाहून रामाची पितृभक्ती, एकपत्नीव्रत व समाजवात्सल्य इत्यादी गुण मनात चांगले ठसतात. शिंदे यांनी उत्तरादाखल सांगितले की, समाजाचा फायदा पाहिजे त्यांनी घ्यावा, समाजाच्या उपासना सर्वांसाठी होत असतात. मूर्तिपूजा पाप आहे असे समाजास वाटत नाही आणि ज्यास खरोखर तिच्यामुळे उच्च सुख होत असेल त्यांनी ती सोडावी असा आग्रहही नाही. पण ज्यांना धर्माचे खरे स्वरूप समजले आहे त्यांची मूर्तिपूजा आपोआप सुटते.

शिंदे यांच्या व्याख्यानांना दोन्ही दिवशी रात्री सुमारे तीस-पस्तीसजण हजर होते. संस्थानचे कारभारी, मामलेदार, वकील वगैरे मंडळींनी शिंदे यांचे विवेचन लक्षपूर्वक ऐकले व शांतपणे प्रश्न विचारले. विठ्ठलराव वाळिंबे वकील यांनी पोस्टल मिशनमार्फत समाजाची पुस्तके मागवून माहिती वाढविण्याचा उत्साह दाखविला.२ जमखंडीपेक्षा मुधोळ येथील श्रोतृवर्गाने समंजसपणा व आस्था दाखविली. एक महिन्याचा हा दौरा आटोपून आईवडिलांना मुंबईला घेऊन जाण्याचा विचार त्यांनी पक्का केला. जनाक्का व चंद्राक्का ह्या दोघींना पुण्यातील शाळेत जावयाचे होते म्हणून शिंदे यांनी त्यांनाही आपल्याबरोबर घेतले व अन्यत्र कोठेही दौरा न करता पुण्याहून ते मुंबईस मार्चच्या दुस-या आठवड्यात परतले.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, २८ फेब्रुवारी १९०४, इंग्रजी बाजूकडील शिंदे यांचा अहवाल.
२.    सुबोधपत्रिका, १० एप्रिल १९०४.

जनाबाईंचे शिक्षण

१८९५च्या मे महिन्याच्या सुटीत विठ्ठलरावांचा आणि गोविंदरावांचा पत्रव्यवहार चालला होता. घरातील स्त्री-व्यक्तींपैकी कुणाला तरी बरोबर आणून पुण्यास बि-हाड करावे असा दोघांचा विचार होता त्याला निश्र्चित स्वरूप प्राप्त झाले. जनाबांईंच्या सासरच्या छळामुळे आणि विठ्ठलरावांच्या कठोर निश्र्चियामुळे ती कायमची माहेरी आली होती. जनाबाईंना माहेरी आणण्याचा निश्चय केवळ विठ्ठलरावांच्या आग्रहामुळे अमलात आणला होता. स्वाभाविकपणेच जनाबाईंच्या भावी आयुष्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेणे त्यांना स्वतःचे नैतिक कर्तव्य वाटले. अखेरीस १८९५ च्या दुस-या टर्ममध्ये मातोश्री व भगिनी जनाबाई या दोघींना बरोबर घेऊन विठ्ठलराव पुण्यास बि-हाड करण्याच्या इराद्याने आले. कोल्हापुराहून गोविंदरावही आपली पत्नी व मुलगी यांना घेऊन आले. सदाशिव पेठेतील नागनाथ पाराजवळचा पालकरांच्या वाडयात आपले कुटुंब थाटले. या दोघांच्या जोडीला विठ्ठलरामजींचे मित्र जनुभाऊ करंदीकर आणि रामचंद्र नारायण सावंत असे राहू लागले.

आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी जनाबाईंचे शिक्षण सुरू करणे विठ्ठलरावांना भाग होते. आपल्या पायावर ऊभे राहून स्वतःच्या हिमतीवर आयुष्य काढायचे असेल तर जनाबाईने जास्तीतजास्त शिक्षण घेतले पाहिजे. अशी विठ्ठलरावांची धरणा होती. प्रथमतः त्यांनी सदाशिव पेठेतील चिमण्या गणपतीजवळच्या अमेरिकन ख्रिस्ती मिशनच्या शाळेत जनाक्काला घातले. मात्र ख्रिस्ती धर्ममताचा प्रभाव पाडून विद्यार्थिनींना ख्रिस्ती धर्मात ओढण्याचा संस्थाचालकांचा हेतू त्यांच्या लक्षात आला. सहा महिन्यानंतर त्यांनी जनक्काचे नाव त्या शाळेतून काढून घेतले.

पंडिता रमाबाई यांच्या नावाचा त्या काळामध्ये बराच गवगवा होता. सुधारक मंडळींत त्यांना मोठीच मान्यता होती. पुण्यातील लष्कर भागामध्ये त्यांनी ‘शारदा सदन’ नावाची बोर्डिंग शाळा ऊघडली होती. जनाबाईंची तिथे काही सोय होते का हे पाहण्यासाठी विठ्ठलरावांनी त्यांची भेट घेतली. तिच्या निराधारपणाची कहाणी ऐकून त्या एकेक अटी घालू लागल्या. मुलगी त्यांच्या स्वाधीन कल्यावर पाच वर्षे तिला सुट्टी मिळणार नाही. कारण मुलीच्या शिक्षणक्रमात अडथळे येतील असे त्यांनी सांगितले. ह्या अटीमागचा अंतःस्थ हेतू विठ्ठलरावांच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. त्यांनी या संदर्भात लिहिले आहे, “पण ज्या नवमताचे पाणी पंडिता प्याली होती त्याचे चार थेंब माझ्याही पोटात गेले होते. मी उत्तर दिले, “बाई, शिक्षणात अडथळे आणण्यासाठी मी बहिणीस तुमच्याकडे पाठवण्याचे नाकारीन हे खरे कारण नाही. तिने ख्रिस्ती होण्यास आम्ही अडथळे आणू ही भीती तुम्हांस असणे साहजिक आहे. मुलीस नियमाप्रमाणे (विद्याखात्याच्या) सर्व सुट्ट्या तुम्हांला देणे आवश्य आहे. मुलीच्या हिताची काळजी निदान तुमच्याइतकी तरी मला व मुलीच्या आईबापांना आहेच, हा विश्वास तुम्हांला असावा. तुमच्या शिक्षणाने मुलगी आपखुशीने व अक्कलहुशारीने ख्रिस्ती होऊ लागल्यास निदान मी तरी अडथळा आणणार नाही. तिच्यावर तिला नकळत जबरी तर राहोच, पण भुलभुलावणी होऊ लागली तर ते  मी सहन करणार नाही. बेहत्तर आहे अशी तुमची अटीतटीची मदत न मिळाली तरी!’’१ विठ्ठलरावांच्या या परखड बोलण्यानंतर पंडीता रमाबाईने त्यांच्याबद्दल चौकशी केली. ते फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी आहेत असे ऐकल्यावर ह्या कॉलेजचे प्रोफेसर नास्तिक आहेत, असा शेरा त्यांनी मारला. त्यावर “जखडलेल्या धर्मापेक्षा मोकळा नास्तिकपणा बरा,’’ असा टोमणा प्रत्युत्तरादाखल देण्यावाचून त्यांना राहवले नाही.

ख्रिस्ती शिक्षणसंस्थेची ही स्थिती, तर अण्णासाहेब कर्वे यांच्या सुधारकी कार्यक्रमाची दुसरी त-हा त्यांच्या अनुभवास आली. प्रो. अण्णासाहेब कर्वे यांनी हिंगणे येथे ‘अनाथ बालिकाश्रमाची मंडळी’ ह्या नावाने विधवा, परित्यक्ता वा गरजू महिलांना आधार देण्यासाठी ह्या संस्थेची १८९६ मध्ये स्थापना  केली होती. डॉ. रा. गो. भांडारकर हे तिचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्या आश्रमात त्या वेळी दहा-पंधरा विधवा मुली होत्या. “माझ्या बहिणीला आपल्या आश्रमात घ्याल काय,’’ ह्या विठ्ठलरावांच्या प्रश्नाला “ब्राम्हणेतरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाही” असे स्पष्ट उत्तर देऊन जनाक्काला आश्रमात घेण्याचे प्रोफेसर कर्वे यांनी साफ नाकारले. कर्वे यांच्या ह्या धोरणाबद्दल अतिशय संयमाने विठ्ठल रामजी शिंदे यांनी अभिप्रायकथन केले ते असेः “तत्कालीन महाराष्ट्रात एक सुधारणा करताना दुस-या सुधारणेला कसा अडथळा येई ह्याचे हे उदाहरणच आहे.’’२ जनाक्काच्या शिक्षणासाठी त्यांना पुष्कळच धडपड करावी लागली. शेवटी पुणे येथील प्रसिद्ध हुजूरपागा म्हणून ओळखल्या जाणा-या फिमेल हायस्कूलमध्ये नाव घातले. जमखंडीस तिच्या चार मराठी इयत्ता झाल्याच होत्या. त्यामुळे इंग्रजी पहिल्या इयत्तेत नाव घालण्यास वस्तुतः कोणतीच हरकत नव्हती. ह्या निमित्ताने हिंदू स्त्रीच्या पारतंत्र्याचा आणखी एक नमुना विठ्ठलरांवाच्या अनुभवास आला. जनाक्काच्या शिक्षणासाठी शाळेचे अधिकारी तिच्या नव-याची परवानगी मागू लागले. शिंदे यांना आपल्या बहिणीच्या आयुष्याची कर्मकथा मुख्याध्यापिकाबाई मिस हरफर्ड आणि प्रख्यात शिक्षिका मिस् मेरी भोर यांना सांगावी लागली. या दोघींनाही जनाक्काची परिस्थिती ऐकून तिच्याबद्दल फार कळवळा आला. मिस मेरी भोरकडे ह्या दोघांचे जाणे-येणे सुरू झाले. विठ्ठलरावांची सुधारणेती मते व वागण्याचा बाणेदारपणा ह्यांमुळे ह्या दोघांबद्दल त्यांचा फार अनुकूल ग्रह झाला. जनाक्काच्या नव-याला शाळेने पाठविलेल्या पत्राला त्यांच्याकडून “माझ्या पत्नीला शाळेत दाखल करण्यास परवानगी नाही” असे स्पष्ट उत्तर आले. त्यामुळे तर ह्या दोघी प्रेमळ शिक्षिकांना जनाक्काबद्दल अधिकच कणव वाटू लागली. जनाक्काची सासरची करुण अवस्था, विठ्ठलरावांचा स्त्री-शिक्षणाकडे असणारा ओढा, रूढ आचाराविरुद्ध माहेरी ठेवून घेण्यात त्यांनी दाखविलेले अपूर्व धाडस आणि आपली सुधारकी मते प्रत्यक्षात आचरून दाखविण्याची आंतरिक तळमळही त्यांनी ध्यानात घेतली. त्यांनी ह्यातून एक मार्ग काढला. जनाबाईने माहेरचे शिंदे आडनाव लावून घेतल्यास शाळेत प्रवेश मिळणे सोपे जाऊन तिचा पुढील अभ्यासक्रम सुरळीतपणे पार पडेल असा मार्ग मिस हरफर्ड व मिस भोर या दोघींनी सुचविला. त्याप्रमाणे सासरच्या केवळ नावापुरत्याच असलेल्या कामते ह्या आडनावाचा त्याग करून जनाबाईने शाळेत शिंदे हे आडनाव लावले व ते कायमचे झाले. विठ्ठलरावांच्या प्रयत्नांमुळे जनाक्काला मुधोळ संस्थानची दरमहा दहा रूपयांची स्कॉलरशिप मिळाली. शाळेतील प्रवेश पक्का झाला. अखेरीस जनाबाई हुजूरपागेची विद्यार्थिनी बनली.

महात्मा जोतीबा फुले यांनी स्त्री- शिक्षणाला प्रारंभ करून जवळ जवळ पन्नास वर्षे झाली होती. परंतु पुण्यातील सांस्कृतिक वातावरणात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फारशी सुधारणा झाली नव्हती. शाळेत जाणा-या मुलींची कुचाळकी करण्याची टवाळखोरीची वृत्ती अद्यापि तशीच होती. याचा संकोचून टाकणारा अनुभव जनाबाईंना घ्यावा लागला. जनाबाई पालकरांच्या वाड्यातून शाळेत जात असताना रस्त्यावरील लोक मुद्दाम उघडपणे तिच्या पोशाखावरून, डोक्यावरून पदर घेण्याच्या पद्धतीवरून कुचेष्टेचे उद्गार काढीत असत. त्यामुळे तिला भारी लाजल्यासारखे होई. जनाबाई नुकतीच खेड्यातून शहरात आलेली. मराठा स्त्रिया गोल पातळ नेसुन डोक्यावर पदर घेतात, तशी तिची नेसण्याची पद्धत. पुस्तके पदराआड उराशी कवटाळून सर्वांग लुगड्याने लपेटून खालच्या मानेने अनवाणी जाणा-या जनाक्काचा वेश व आकृती पाहून कुत्सित शेरे मारण्याची कुचाळखोरांना ऊर्मी येत असे. शाळेच्या ठिकाणी पूर्वी पागा होती हे ध्यानात घेऊन ह्या मोठ्या वयाच्या मुली शाळेला चालल्या म्हणजे त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने “ह्या पहा घोड्या तालल्या” असे कुत्सित उद्गार ते काढीत असत. केवळ पुरुषच नव्हे तर चांगल्या पोक्त बायादेखील तोंडाआड पदर धरून टवाळी करण्यास कचरत नसत. या कुचाळखोरीमुळे खट्टू झालेली जनाबाई बंधू विठूअण्णाजवळ तक्रार करी. ते मोठ्या समंजसपणे आणि वडिलांच्या मायेने तिची समजूत काढीत असत.  
           
    संदर्भ
१.विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १०४.
२.तत्रैव, पृ.१०५

जनाबाई पनवेलमध्ये शिक्षिका

इंग्रजी सहावीत असताना जनाक्का आजारी पडल्या. खोकल्याने त्या प्रचंड बेजार झाल्या. चंद्राबाई नुकतीच क्षयाच्या विकाराने वारली होती. शांता सुखटणकरचा संसर्ग तिला झाला असावा अशी शंका सर्वांच्याच मनात होती. जनाक्कालाही तीच बाधा झाली की काय अशी भीती सर्वांना पडली. पण त्यांचा हा आजार क्षयाचा नसून प्लुरसीचा आहे असे डॉक्टरांनी निदान केले. या आजाराने तीन महिने त्यांना अंथरुणाला खिळून पडावे लागले. अभ्यासात खंड पडला होता. परीक्षा जवळ येत चाललेली. आपण परीक्षा नीटपणे पास झालो नाही तर स्कॉलरशिप बुडेल म्हणून जनाक्का डॉक्टरांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून व जवळच्या माणसांची नजर चुकवून रात्री अभ्यास करीत असत. आजारातून उठल्यावर इंग्रजी सहावीची परीक्षा त्यांनी दिली व त्यामध्ये चांगल्या त-हेने पास झाल्या; पण पुन्हा आजारी पडल्या. आईबाबा आणि अण्णा नको म्हणत असतानाही आपला हेका चालवून त्यांनी मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश घेतला. पण प्रकृती इतकी अशक्त झाली होती की, वाडिया डॉक्टरांनी मदरना स्पष्टपणे सांगितले, या मुलीला संपूर्ण विश्रांतीची जरुरी आहे. फुफ्फुसे फारच कमजोर झाली आहेत. यापुढे तिला अभ्यास करू देणे योग्य नाही. डॉक्टर मोदींनीही जनाक्काची शाळा बंद करावी असाच सल्ला दिला.

अण्णासाहेबांचे मन धाकटी बहीण चंद्राबाई हिच्या अकाली निधनाने आधीच हळवे बनले होते. तशात जनाक्काच्या बाबतीत डॉक्टरांनी दिलेला सल्ला डावलून धोका पत्करायला ते तयार नव्हते. अखेरीस १९०६ सालातल्या पहिल्या सहामाहीत जनाक्काला आपल्या आवडत्या हुजूरपागेलाच नव्हे तर पुढच्या अभ्यासक्रमालाही कायमचे अंतरावे लागले. हिंडण्याफिरण्यासारखी परिस्थिती झाल्यावर आपल्या वडीलबंधूसमवेत त्या नगर, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी जात. अण्णासाहेबांचे धर्मप्रचाराचे काम कसे चालते हे जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली. समाजातील कितीतरी मंडळींच्या ह्या निमित्ताने ओळखी झाल्या. डॉ. भांडारकर, चंदावरकर यांसारख्या थोरामोठ्यांना समाजाच्या उत्सवप्रसंगी जवळून पाहता आले.

मुंबईला आल्यानंतर श्री. बलभीमराव केसकर यांच्याशी जनाक्काची भेट झाली. केसकर हे विठ्ठल रामजींचे कळकळीचे जिवलग मित्र व प्रार्थनासमाजाचे निष्ठावंत सभासद होते. मुंबईची हवा कोंदट, जनाक्काच्या प्रकृतीला न मानवणारी. म्हणून केसकरांनी जनाक्काला अशी सूचना केली की, पनवेल येथील म्युनिसिपल शिक्षिकेची जागा त्यांनी पत्करावी. पनवेलची हवा कोरडी असल्याने ती त्यांच्या प्रकृतीला मानवेल व कामामध्ये वेळही चांगला जाईल. जनाक्कांनी अण्णासाहेबांचा विचार घेऊन तयारी दाखविली. पनवेल येथील मामलेदार श्री. तेंडुलकर हे केसकरांच्या परिचयाचे होते. म्युनिसिपल बोर्डाचे ते चेअरमन असल्यामुळे जनाक्काची शिक्षिका म्हणून नेमणूक करणे त्यांना शक्य होते. जनाक्काची इंग्रजी सहावी पूर्ण झालेली. शिवाय गायन, शिवणकला इत्यादी विषय त्यांना अवगत होते. जनाक्काची पात्रता ध्यानात घेऊन मुलींच्या शाळेत हेडमिस्ट्रेसच्या जागेवर दरमहा २५/- रु. पगारावर शिक्षिका म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. मुलींची संख्या सुमारे ६० पर्यंत होती. शाळेत हेडमिस्ट्रेस व एक शिक्षक एवढाच शिक्षकवर्ग होता. शाळेच्या इमारतीजवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था झाली होती. केसकरांची विधवा बहीण भागीरथीबाई ही आपल्या पाचसहा वर्षांच्या मुलाला घेऊन तेथे राहत होती व चांगल्या प्रकारे प्रगती करीत होती. जनाबाईंच्या सोबतीस वडील रामजीबाबा पाच-सहा वर्षांचा छोटा प्रताप ह्या नातवाला घेऊन राहत होते.

जनाक्कांच्या मनावर जातिभेदाचा संस्कार घरातूनच झालेला नव्हता. त्यामुळे पनवेलमध्ये परिचित मुसलमान कुटुंबात त्यांचा होणारा वावर व त्यांच्या लग्नकार्यात त्यांनी घेतलेला भाग यामुळे व एकंदरीतच त्यांच्या सुधारकी वागण्याने पनवेलच्या कर्मठ मंडळींचा त्यांच्यावर रोष झाला होता. आपण पनवेलमध्ये जाऊन सुधारणेसंबंधी व्याख्यान दिल्याने आपल्या बहिणीवरील तिथल्या मंडळींचा रोष काहीसा कमी होईल अशी विठ्ठल रामजी शिंदे यांची अटकळ होती म्हणून ते स्वामी स्वात्मानंदजींना बरोबर घेऊन व्याख्यान करण्याच्या इराद्याने पनवेलला आले.

शिंदे हे इंग्लंडला जाऊन विद्याविभूषित होऊन आलेले व्याख्याते म्हणून त्यांच्याबद्दल एक प्रकारचे आदरयुक्त कुतूहल निर्माण झाल्यामुळे श्रोत्यांचा मोठा वर्ग उपस्थित राहिला होता. परंतु व्याख्यात्यांनी त्या वेळी नुकत्याच अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या संस्थेची माहिती सांगितली व अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याची निकड प्रतिपादली तेव्हा जुन्या मताच्या लोकांची व्याख्यात्याबद्दल व व्याख्यात्याच्या बहिणीबद्दलची प्रतिकूलताच वाढली. त्यातून रामजीबाबा शिंदे यांनी पनवेलचे गंगारामभाऊ सुभेदार या लष्करातून पेन्शन घेतलेल्या महार गृहस्थाला आपल्या घरी चहाला बोलावले. यामुळे पनवेल येथील लोकमत जनाक्काच्या विरोधात फारच प्रक्षुब्ध झाले. गावातल्या सनातनी वर्गाने त्यांच्या घरावर जवळ जवळ बहिष्कार टाकला. शाळेमध्ये काम करणारी बाई अधिकचे पैसे घेऊन जनाबाईच्या घरी पाणी भरणे वगैरे काम करीत असे. तिने यापुढे आपण तुमच्या घरातील काम करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. कारण गावातील लोक तुमचे काम करते म्हणून आपल्याला फार त्रास देतात असे तिने सांगितले. इतकेच नव्हे तर रामजीबाबांना हजामत करण्यासाठी न्हावीदेखील मिळेनासा झाला. त्या कारणाने त्यांना मुंबईला जाऊन आपली हजामत करून घेणे भाग पडू लागले. सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासही त्यांना हरकत घेऊ लागले. समंजस घरमालकीण मात्र त्यांची साह्यकर्ती झाली. ती जनाबाईंकडे आली व तिने सांगितले, “आपल्या वाड्यातल्या विहिरीचे पाणी मी तुम्हाला स्वतः पोहोचते करीन. तुम्ही चिंता करू नका. हे असेच चालायचे. एकनाथमहाराजांनादेखील असाच जाच सहन करावा लागला. काही दिवसांनी सारे ठीक होईल. बाईमाणूस म्हणून धीर सोडू नका.”१

जनाबाईंना आणि आपल्या वडिलांना पनवेलला छळ सहन कराव लागत आहे हे ध्यानात येताच विठ्ठल रामजी शिंदे यांनी जनाक्काला कळविले की, “तू मुंबईला निघून ये, तू तेथे नोकरी करणे जरुरीचे नाही. उलट आपल्या मिशनच्या संस्थेत तुझी फार गरज आहे. अस्पृश्यवर्गाच्या स्त्रियांत जागृती करण्याचे मोठे काम तुला करावे लागणार आहे.” इत्यादी.

आपल्या वडील भावाचे पत्र त्यांनी म्युनिसिपल बोर्डाचे चेअरमन तेंडुलकर यांना दाखविले. त्यांनी ‘वार्षिक परीक्षा जवळ आलेल्या आहेत त्या आटोपल्यावर तुम्ही नोकरी सोडलेली बरी. म्हणजे लोकमताला भिऊन तुम्ही नोकरी सोडून गेलात असे व्हावयाचे नाही,’ अशा प्रकारचा सल्ला दिला. जनाक्कांनाही तो पटला. अण्णांना कळवून त्या शाळेच्या कामात पूर्ववत लक्ष घालू लागल्या.

शाळेच्या वार्षिक परीक्षा पार पडल्या. जनाक्काने शिवकविलेल्या वर्गातील दुसरीपासून चौथीच्या वर्गातील सर्व मुलींच्या उत्तपत्रिका तपासण्यासाठी गावातील एका हेडमास्तरकडे गेल्या. हे गृहस्थ जनाबाईंच्या विरोधातील होते. तरीही सगळ्या मुली चांगल्या त-हेने पास झाल्या. जनाबाईंना तर आनंद झालाच. शिवाय तेंडुलकरांना, जनाबाईंना पाणी
पोहोचविणा-या ब्राह्मण मालकिणीला फार आनंद झाला. शेवटी शाळा सोडून जनाबाई आणि कुटुंबीय मुंबईस जावयास निघाले. पण पावसाळ्यात वाहतूक बंद असे. मचव्यात बसून मुंबईला जाणे भाग पडे. त्या वेळी ह्याच हेडमास्तरांनी मचव्यातून त्यांना सोबत करून सुखरूपणे मुंबईस पोहोचवले.

विरोधाच्या वातावरणात एक वर्षभर राहून जनाक्कांनी आपली शिक्षिकेची भूमिक यशस्वीपणे पार पाडली. आता त्या आपल्या बंधूंनी आरंभिलेले अस्पृश्यतानिवारणाचे जनाक्कांनी आपली शिक्षिकेची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. आता त्या आपल्या बंधूंनी आरंभिलेले अस्पृश्यतानिवारणाचे जे अपूर्व कार्य होते त्यामध्ये त्यांना साह्य करण्यासाठी सिद्ध झाल्या होत्या.

संदर्भ
१.    जनाबाई शिंद, स्मृतिचित्रे, तरुण भारत, २४-६-१९४९.

  1. गैरसमजाचा ससेमिरा
  2. कौटुंबिक वातावरण
  3. कौटुंबिक अडचणी, पुणे प्रार्थनासमाजाचे कार्य
  4. कॉलेजची पहिली दोन वर्षं
  • 117
  • 118
  • 119
  • 120
  • 121
  • 122
  • 123
  • 124
  • 125
  • 126
Page 122 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी