1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

अंत:प्रेरणेचा निर्णय

१९०० सालच्या सप्टेंबर महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यातील एका संध्याकाळी पुणे प्रार्थनासमाजात एक विशेष उपासना आयेजित करण्यात आली होती. समाजातील वृद्ध आणि तरुण मंडळी समाजाच्या मंदिरामध्ये हळूहळू जमली. नेहमी आस्थेवाईकपणाने व उल्हासाने एकमेकांची चौकशी करणारी व प्रेमळपणे भेटणारी ही मंडळी आज अबोल होती.  चेहर्‍यावर नेहमीचा उल्हास नव्हता. त्यावर खिन्नपणाचे सावट पसरले होते.  प्रार्थनासमाजाचे ॠषितुल्य पुढारी डॉ. रा. गो. भांडारकर हे उपासना चालविणार होते.  त्यांच्या नेहमीच्या कठोर व उग्र दिसणार्‍या चेहर्‍यावर उदासपणाची छटा दिसत होती. ही विशेष उपासना आयोजित करण्याला एक दुःखद कारण घडले होते.  दोन वर्षांपूर्वीच प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतलेले बुद्धिमान होतकरू तरुण श्री. मोती बुलासा यांची ब्राह्म व प्रार्थनासमाजाने ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये दोन वर्षांच्या धर्मशिक्षणासाठी निवड केली होती.  म्हणून ते १५ सप्टेंबर रोजी बोटीने विलायतेस रवाना झाले होते.  वाटेत पोर्टसय्यद येथे वातज्वराचा विकार होऊन त्यांचे आकस्मिक निधन झाले होते.  ही बातमी ऐकून मुंबई व पुणे येथील प्रार्थनासमाजीयांना अतीव दुःख झाले.  डॉ. भांडारकर याच्या मनाला ही गोष्ट फारच लागून राहिली.  मोती बुलासांच्या निधनानिमित्त ही विशेष उपासना आयोजित केली होती.

डॉ. भांडारकरांनी भरल्या अंतःकरणाने ही उपासना चालविली.  या वेळी त्यांच्या अंतःकरणातून अत्यंत कळकळीचे दुःखोद्‍गार प्रकट होत होते.  ह्या उपासनेसाठी श्री. मोती बुलासांच्या बरोबरीने प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतलेले एक निष्ठावंत तरुण श्री. विठ्ठल रामजी शिंदे हे उपस्थित होते.  त्यांचे स्वतःचे मन मोती बुलासांच्या वियोगाने आधीच व्याकूळ झाले होते.  गुरुवर्य डॉ. भांडारकर यांच्याबद्दल त्यांच्या मनात अतीव आदराची भावना होती.  उपासना चालवीत असताना डॉ. भांडारकरांच्या डोळ्यांतून सतत अश्रुधार चालू होती.  ह्या प्रकाराचा शिंदे यांच्या हृदयावर जोराचा परिणाम झाला.  डॉ. भांडारकर व्यासपीठावरून उतरताच ते त्यांच्याजवळ गेले व म्हणाले, ''मोती बुलासांच्या निधनाने रिकाम्या पडलेल्या जागेसाठी मला जर गुरुवर्यांनी पात्र ठरविले तर मी विलायतेस जाण्यास तयार आहे.''१  अंतःप्रेरणेच्या एका प्रबळ क्षणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्याला कलाटणी देणारा व आयुष्याचे ध्येय निश्चित करणारा निर्णय घेतला.  त्यांच्या तोंडचे शब्द ऐकून डॉ. भांडारकरांना आनंदाचे भरते आले व त्यांनी ह्या तरुणाला जवळ घेऊन मोठ्या प्रेमाने कुरवाळले.

वस्तुतः हा निर्णय घेणे ही विठ्ठल रामजी शिंदे यांच्या दृष्टीने सोपी गोष्ट नव्हती.  वडिलोपार्जित श्रीमंती जाऊन खाण्यासाठी अन्नाची भ्रांत पडावी एवढे दारिद्र्य लहानपणी त्यांच्या वाट्याला आले होते.  अतिशय प्रतिकूल अशा आर्थिक परिस्थितीत स्कॉलरशिपवर आणि शिकवण्या करून शिक्षणाचा खर्च त्यांना भागवावा लागत होता. बी. ए. ची पदवी मिळविल्यानंतर कायद्याच्या परीक्षेच्या दोन वर्षं टर्म्स भरून शेवटची परीक्षा अखेरच्या टप्प्यामध्ये आली होती.  आपल्या बुद्धिमान आणि कर्तबगार मुलाला चांगल्या प्रकारची नोकरी लागून घराचे दारिद्र्य फेडून तो आपल्याला सुखाचे आणि समृद्धीचे दिवस दाखविणार अशी आस त्यांच्या वृद्ध आईवडिलांना लागून राहिली होती.  त्यांच्यासारख्या एवढे शिकलेल्या मराठा तरुणाला बडोद्यासारख्या संस्थानात उत्तम पगाराची आणि वरच्या दर्जाची नोकरी मिळणे कठीण नव्हते.  परंतु ज्या क्षणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विलायतेस जाऊन मँचेस्टर कॉलेजमध्ये धर्मशिक्षण घेण्याची तयारी दाखविली त्याच क्षणी ह्या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवून आयुष्यभर फकिरी पत्करण्याची तयारीही दाखविली होती.  कारण धर्मशिक्षणाला जाण्यासंबंधीच्या अटी बिकट होत्या, ह्याची त्यांना उत्तम प्रकारे कल्पना होती.  दरसाल शंभर पौंडाप्रमाणे दोन वर्ष स्कॉलरशिप मिळणार होती.  पण केवळ उदरनिर्वाहाला जेमतेम पुरावी इतकी ती अत्यल्प होती.  त्याशिवाय विलायतेला जाण्यायेण्याच्या प्रवासखर्चाची तरतूद त्या विद्यार्थ्याने स्वतःच करावयाची होती व सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तेथे धर्मशिक्षण घेऊन स्वदेशी परत आल्यानंतर सदर विद्यार्थ्याने धर्मप्रचाराचे कार्य आजन्म करावयाचे असते.  निदान ह्या उद्देशाला विसंगत असे उदर भरण्याचे दुसरे कार्य करावयाचे नसते.  ह्या सर्व अटींचा, घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा व जवळ आलेल्या एल. एल. बी. च्या परीक्षेचा कोणताही अडथळा मनात येऊ न देता त्यांनी आपल्या अंतःप्रेरणेने हा निर्णय तत्क्षणी घेतला व गुरुस्थानी असलेल्या डॉ. भांडारकरांकडे गंभीरपणाने प्रकट केला.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबाबत आयुष्याला वळण देणारी व जीवितकार्याची निश्चिती करणारी ह्या घटनेसारखीच दुसरी एक घटनाही अशाच एका अंतःप्रेरणेच्या क्षणी घडली.

ऑक्सफर्डच्या मँचेस्टर कॉलेजमधील धर्मशिक्षणाचा अभ्यासक्रम आटोपून परत आल्यानंतर त्यांनी मुंबई प्रार्थनासमाजाच्या प्रचारकपदाची जबाबदारी पत्करली होती त्याला दीड वर्ष झाले होते. ठिकठिकाणचे स्थानिक प्रार्थनासमाज उत्तम प्रकारे चालावेत म्हणून महाराष्ट्रातील विविध स्थानिक समाजांना भेटी देऊन तेथील प्रार्थनासमाजाचे काम सुसंघटित करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्‍न सुरू केले होते. ह्या कामाच्या उद्देशाने अहमदनगर येथील समाजाच्या वार्षिक उत्सवासाठी ते तेथे गेले होते.

शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर १९०५.  अमावास्येची काळोखी मध्यरात्र.  दगदगीची कामे करून रात्री बर्‍याच उशिरा त्यांनी जमिनीवर अंग टेकले होते.  अवचित अस्पृश्यवर्गाचे एक शिष्टमंडळ रात्री बाराच्या सुमारास त्यांना भेटण्यास आले.  भिंगार हे अहमदनगरपासून चार मैलावर असणारे खेडेगाव.  तेथील स्थानिक अस्पृश्यवर्गीय मंडळींनी अशा वेळी एक जाहीर सभा बोलावली होती.  तिचे अध्यक्षस्थान स्वीकारून विठ्ठल रामजी शिंदे यांनी चार शब्द सांगावेत म्हणून हे शिष्टमंडळ अपरात्री आले होते.  शिंदे यांच्याबरोबर स्वामी स्वात्मानंदजी होते.  त्यांच्या मनात काही शंका आली; परंतु तिचे विठ्ठल रामजींनी निरसन करताच तेही उत्साहाने सभेला जाण्यासाठी त्यांच्याबरोबर टांग्यात बसून निघाले.  भिंगार गावाच्या हद्दीवर दोघे महारवाड्यात उतरले.

त्यांना समोर दिसलेले दृश्य अपूर्व होते.  मोठमोठे हिल्लाळ पेटलेले होते.  लहानथोर, बायकामुले ह्यांनी गजबजलेली सभा पाहुण्यांची वाट पाहत बसली होती.  शिंदे आणि स्वात्मानंदजी सभास्थानी पोहोचल्याबरोबर टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांचे स्वागत झाले.  खेडेगावातील मागासलेल्या समाजाचा एवढा जमाव पाहून स्वामीजींना आश्चर्य वाटले.  ही सभा अशा अवेळी का बोलाविली असे त्यांनी सभा भरविणार्‍या मंडळींना विचारले. त्यांनी उत्तर दिले, ''साहेब आम्ही गरीब लोक.  दिवसभर कष्टात राबावे लागते.  आम्हाला हिच्याशिवाय दुसरी वेळ कोणती ?  तशात आम्ही सर्व चालक मंडळी शेजारच्या जिल्ह्याच्या गावच्या परकी साहेबांच्या घरगुती कामात गुंतलेले असतो.  आम्हाला ह्यावेळेशिवाय हूं की चूं करण्यास मिळत नाही.  आपल्यास तसदी दिली याची माफी असावी.''  ह्या प्रसंगाचे वर्णन करताना विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात, ''माझ्या अंतःकरणात चक्क उजेड पडला.  ह्या लोकांची हजारो वर्षांची कहाणी अभ्यासून माझे मन हळुवार झाले होते.  अधिक खुलासा नको होता.''  ह्या अस्पृश्य मंडळींच्या सहवेदनेने त्यांच्या मनाची अत्यंत हळुवार स्थिती झाली.  त्यांचे मन करुणेने भरून आले.  मनाच्या या अवस्थेतच सभेच्या कामाला सुरुवात झाली.

नागपूर जवळील मोहपा येथील किसन फागुजी बनसोडे ह्या स्वार्थत्यागी तरुणाने धर्माच्या पायावर एक समाज स्थापन करून अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याचे प्रयत्‍न आरंभिले होते.  त्यांच्या सूचनेवरून अहमदनगर येथील अस्पृश्यांचे पुढारी श्रीपतराव थोरात (बटलर), पांडुरंग लक्ष्मण डांगळे (हेडमास्तर) रावी सदोबा गायकवाड (नगर म्युनिसिपालिटीचे शिक्षक) वगैरे मंडळींनी ही सभा बोलाविली होती.  मोहपा येथील मंडळींकडून आलेले छापील जाहीरपत्र जमलेल्या सभेत वाचून दाखविण्यासाठी शिंदे यांच्या हातात देण्यात आले.  एकेक उद्देश ते समजावून सांगत होते.  शिंदे यांनी ह्या प्रसंगाचे वर्णन करताना लिहिले आहे, ''हजारो वर्षे वरच्या जातीचा जुलूम सहन करूनही 'वरिष्ठ वर्गाची मने न दुखविता किंबहुना कोणत्याही प्रकारे त्यांच्या वाटेस न जाता अस्पृश्यवर्गाने आपल्या स्वतःच्या हिताचे प्रयत्‍न करावेत' अशा अर्थाचा एक उद्देश सभेला मी नीट समजावून सांगत असता हे उद्धाराचे काम आपण स्वतः अंगावर घेऊन या कामात स्वतःचे भावी चरित्र वाहून घ्यावे अशी प्रेरणा मला जोराने होऊ लागली.  इतर सर्व काम टाकून एका घडीचाही वेळ न दवडिता ह्या कार्यास लागावे असा संकल्प परमेश्वराला स्मरून ह्याच रात्रीच्या मुहूर्तावर केल्याचे मला पक्के आठवते.''२

ह्या सभेच्या प्रसंगी अंतःप्रेरणेच्या क्षणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या जीवितकार्यातील महत्त्वाचे अंग निश्चित केले आणि आपले भावी आयुष्य अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यासाठी आणि अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांच्या उन्नतीसाठी वाहून टाकण्याचा दृढ निश्चय केला.  त्यांच्या भूमिकेनुसार अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हे धर्मकार्यच होते व धर्मकार्याचा भाग म्हणून वर्षभरात म्हणजे १८ ऑक्टोबर १९०६ रोजी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया' अथवा 'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी' ही संस्था स्थापन करून अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला संस्थात्मक स्वरूपाचा प्रारंभ केला.  ह्या कामाचा अपूर्व विस्तार करून अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी भारतभर जागृती केली. सामाजिक पुनर्घटनेच्या अपूर्व अशा कामासाठी त्यांनी सगळे आयुष्य व्यतीत केले. आपले जीवितकार्य ठरविण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला तो भावनेच्या एका उत्कट क्षणी प्रबळ अशा अंतःप्रेरणेने.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवितध्येयाचे व जीवितकार्याचे स्वरूप निश्चित करणार्‍या त्यांच्या आयुष्यातील या दोन घटना होत.

या दोन्ही वेळचे निर्णय त्यांनी भावनेच्या उत्कट क्षणी अंतःप्रेरणेने घेतले असे त्यांनी म्हटले आहे व तसे आपल्याला जाणवतेही.  येथे आपल्याला हेही लक्षात घ्यावे लागेल की, जीवनाच्या निर्णायक क्षणी त्यांच्या अंतःकरणामध्ये भावनेचा स्फोट हा काही आकस्मिकपणे झालेला नव्हता अथवा निर्णयास कारणीभूत ठरणारी अंतःप्रेरणाही त्यांच्या अंतःकरणात अपरिचित स्वरूपात आकस्मिकपणे निर्माण झालेली नव्हती.  वस्तुतः भावनेची उत्कट अवस्था आणि अंतःप्रेरणेचा आविष्कार ह्या अकल्पितपणे घडणार्‍या गोष्टी नव्हेत.  हे घडण्यासाठी अंतःकरणाची भावनामय घडण काही संस्कारानेच व्हावी लागत असते.  अशा काही संस्करांनी मनाची भावनामय उत्कट अवस्था बनल्यावर अंतःप्रेरणा जोराने उफाळून येते.  अंतःकरणाच्या भावनामयतेचा आणि प्रेरणेचा जो उगम असतो तो काही संस्कारांनी झालेल्या मनाच्या घडणीमध्ये.  विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या आयुष्याला अभूतपर्वू कलाटणी देणारे, एकमेकांशी सुसंगत असणारे हे जे दोन निर्णय अंतःप्रेरणेने घेतले त्यांच्या मुळाशी विशिष्ट संस्कारामुळे झालेली त्यांची घडणच कारणीभूत आहे असे म्हणावे लागते.  विसाव्या शतकाच्या प्रारंभी आपले आयुष्य उन्नत धर्माचा प्रसार करण्याचे कार्य करण्यासाठी खर्च करण्याचा आणि त्या कार्याचाच एक भाग म्हणून अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्याचा विठ्ठल रामजी शिंदे यांनी जो निर्णय घेतला तो लोकोत्तर स्वरूपाचा म्हणावा लागेल.  अशा प्रकारचा निर्णय घेणार्‍या त्यांच्या मनाची घडण कशी झाली होती व तिला अनुसरून त्यांचे चरित्र कसे घडले हे आपण पाहू.

संदर्भ
१. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, श्री लेखन वाचन भांडार, पुणे, १९५८, पृ. ११३.
२.  तत्रैव, पृ. २१५-२१६.

साहित्यसेवा आणि संशोधनकार्य

विठ्ठ्ल रामजी शिंदे यांच्या लेखनाचे मुख्यतः तीन विभाग दिसतात. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजात व ऑक्सफर्ड येथील मॅंचेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना केलेले रोजनिशीच्या स्वरूपाचे आत्मपर व प्रवासवर्णवपर लेखन हा पहिला विभाग. धार्मिक व सामाजिक स्वरूपाचे कार्य करीत असताना त्यांनी केलेल्या प्रवचनाच्या भाषणाच्या स्वरूपाचे लेखन हा दुसरा विभाग त्यांच्या लेखनाचा तिसरा टप्पा हा प्रामुख्याने संशोधनपर लेखनाचा असून १९२३ साली ते मिशनच्या जबाबदारीच्या कामातून मुक्त झाल्यानंतर हे लेखन केलेले आढळते. १९३० साली येरवड्याच्या तुरूंगात असताना त्यांनी रोजनिशी लिहिली तसेच माझ्या आठवणी व अनुभव या आत्मचरित्रपर ग्रंथलेखनाला प्रारंभ केला व अखेरच्या आजारपणाच्या काळात तो पूर्ण केला. हे त्यांचे अखेरचे लेखन म्हणता येईल.


विठ्ठ्ल रामजी शिंदे हे फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी असताना १८९८ मध्ये त्यांनी जी रोजनिशी लिहिली, ते त्यांचे पहिले लेखन होय. लिव्हिंग्स्टनचे चरित्र वाचताना त्याने आपल्या प्रवासात लिहिलेले जर्नल अथवा रोजनिशीही त्यांच्या वाचण्यात आली. त्यावरूनच त्यांना रोजनिशी लिहिण्याची प्रेरणा झाली असावी असे वाटते. कारण फर्ग्युसनमधील या रोजनिशीची पहिली नोंद लिव्हिंग्स्टनच्या चरित्राबद्दलची आहे. विद्यार्थिदशेच्या या काळात त्यांच्या ठिकाणी आत्मविष्काराची ऊर्मीही प्रबळ असलेली आपल्याला आढळते. पुण्याच्या ह्या वास्तव्य काळात त्यांनी केळकर वाड्यामध्ये मित्रांचे एक चर्चामंडळ स्थापन केले होते. आत्माविष्काराची ही ऊर्मी किती प्रबळ आहे. हे सांगताना त्यांनी म्हटले आहे, “पोटात घटकाभर विष आवरेल, पण नवीन विचार अगर एखादा सुंदर अनुभव मनाला घडला की, कोणातरी सहानुभूतीच्या मित्राजवळ किंवा आप्ताजवळ ओकून टाकल्याशिवाय मला चैनच पडत नसे.’’२


चर्चामंडळ स्थापण्यामागे जी आविष्काराची प्रबळ उर्मी होती तीच त्यांच्या रोजनिशी लेखनामागेही असणे स्वाभाविक आहे. फर्ग्युसनमधील रोजनिशीमध्ये शिंदे हे पुण्याच्या वातावरणातमध्ये जे जे अनुभवीत होते, त्याबद्दलच्या प्रतिक्रिया प्रकट केलेल्या आहेत. या काळात सामान्यतः त्यांनी ऐकलेली व्य़ाख्याने, केलेले वाचन अथवा दृष्टीस पडलेले प्रसंग याबद्दलच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. शिंदे यांची कुतूहलबुद्धी तीव्र होती, त्यामुळे ते वसंत व्याख्यानमालेतील व्याख्याते असोत, की डेक्कन कॉलेजात ना. गोखले यांच्यासारख्या वक्त्यांचे होणारे व्य़ाख्यान असो, ही व्याख्याने ते ऐकत होते. पुण्यातील सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाचे ते निरीक्षण करीत असत. त्यामुळे शिंदे यांची फर्ग्युसनमधील रोजनिशी म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यातील पुण्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक स्वरूपाच्या संस्थात्मक जीवनावरील भाष्य आहे. शिंदे यांचे मन भावनाशील असले तरी त्यांच्या दृष्टीचा वस्तुनिष्ठपणा ढळत नाही. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा मिळालेल्या व्यक्तींच्या प्रभावाचे दडपण त्यांच्या मनावर कधी येत नाही. म्हणूनच वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यानांचा नि:सत्त्वपणा, न. चिं. केळकरांचा दुटप्पीपणा, शि. म. परांजप्यांच्या भाषणातील पोकळपणा अथवा अर्थपूर्णतेचा अभाव हा जसा ते स्पष्टपणाने नमूद करतात, त्याचप्रमाणे ना. गोखले यांच्या भाषणाचे मोकळेपणाने गुणगानही करतात. ह्या रोजनिशीतच सर्वस्वी व्यक्तिगत अशा प्रकारच्या आपल्या विकार-वासनांच्या प्रबळ उर्मीचा आविष्कार करतात, त्याचप्रमाणे मनात उदभूत झालेल्या उन्नत धर्मभावनेचा विकास रेखाटतात. अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेबाबत आपण काहीएक कार्य करावयास पाहिजे ही तळमळ त्यांना लागून राहिली होती, याचेही चित्र या रोजनिशीत पाहावयास मिळते. ह्या काळात त्यांच्या मनाची काहीएक घडण होताना दिसत असली, तरी त्यांचे जे प्रगल्भ मन आधीच घडले होते, त्याचा आविष्कार होतानाही दिसतो. शिंदे यांच्या भावी जीवनात कार्यरूपाने अथवा विचाररूपाने त्यांच्या मनाचा जो आविष्कार झालेला आहे, त्याचे सारे कंद १८९८-९९च्या या रोजनिशीमध्ये पाहावयास मिळतात.


धर्मशिक्षणासाठी शिंदे यांनी १९०१ ते १९०३ या कालावधीत ऑक्सफर्ड येथे केलेल्या वास्तव्यात लिहिलेली रोजनिशी तुलनेने मोठी आहे. या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांना ज्या सुट्या मिळाल्या, त्या त्यांनी इंग्लंडमधील त्याचप्रमाणे जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली या देशांतील रम्य व ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी खर्च केल्या. इंग्लंडमध्ये दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी कार्य करणा-या संस्थांचे जाणीवपूर्वक निरीक्षणही त्यांनी केले. इंग्लंडमधील वास्तव्यात ते धर्मशिक्षण तर घेत होतेच, त्याशिवाय विव्दानांची व्याख्याने ऐकीत, चर्चा व धर्मसाधना करीत, युनिटेरियन, कॅथॉलिक, एपिस्कोपल इत्यादी वेगवेगळ्या पंथांच्या देवळांत जात व चर्चामंडळांत सहभागी होत. परोपकारी कार्य करणा-या मिशनच्या संस्थांना ते भेटी देऊन तेथील कार्यपद्धतीचे अवलोकन करीत असत. इंग्लंडमधील रोजनिशीत अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती खच्चून भरलेली आढळते. शिंदे यांचा स्वभाव चौकस, निरीक्षण सूक्ष्म आणि नवनवीन गोष्टी माहीत करून घेण्याचा त्यांचा उत्साह उदंड असे. आपण हिंदुस्थानात गेल्यावर समाजसुधारणा कोणत्या धर्तीवर करावी हा विचारही त्यांच्या मनामध्ये प्रबळ असणार म्हणून ऑक्सफर्ड येथाल वर्कहाऊसचे किंवा कंगालखान्याचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केलेले दिसते. सुटीत प्रवास करताना फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली वगैरे देशांतील भव्य इमारती, सुंदर निसर्ग, चित्रशिल्प कलेचे उत्तमोत्तम नमुने हेही त्यांनी बारकाईने पाहून घेतले. शिंदे यांच्या या दोन्ही रोजनिशीत त्यांच्या मनाचा आध्यात्मिक पिंड, व्यापक मानवतावादी दृष्टिकोण व सर्वांगीण सुधारणेची तळमळ यांचा प्रत्यय येतो. त्यांचे मन व्यापक अर्थाने सौंदर्यासक्त असल्याचे जाणवते. निसर्गाकडे त्यांचे मन स्वाभाविकपणे आकृष्ट होते. मनुष्यस्वभावातील नैतिक सौंदर्याकडे आकृष्ट होणारी तरल संवेदनशीलता त्यांच्या ठिकाणी आहे. मात्र बाह्म भरक्याला भुलणारा त्यांचा स्वभाव नाही. त्यांची दृष्टी सदैव गाभ्यावर असते, म्हणून ते स्वाभाविकपणे बाह्म कवच भेदून अंतरंगाचे सौंदर्य, चांगुलपणा व नैतिकता पाहतात. व्यक्ती असो की परिस्थिती तिचे आकलन ते अंतर्भेदी वृत्तीने करतात, मात्र त्यांचे अंतरंग भावनामय असल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियांना कुठेही कोरडेपणा येत नाही.


विठ्ठ्ल रामजी शिंदे हे इंग्लंडंमध्ये अभ्यासार्थ असताना त्यांनी केलेले दुस-या प्रकारचे लेखन म्हणजे त्यांची प्रवासवर्णने होत. ते इंग्लंडला येणार हे ठरल्यानंतर सुबोधपत्रिकेचे संपादक द्वा. गो. वैद्य यांनी शिंदे यांच्याकडून प्रवासवर्णनपर पत्रे पाठविण्याची कबुली घेतलेली होती. त्याप्रमाणे शिंदे यांनी आपल्या इंग्लंडमधील वास्तव्यकाळात त्यांनी केलेल्या प्रवासाबद्दलची व विविध ठिकाणी बघितलेल्या सौंदर्यस्थळांबद्दलची व संस्थांबद्दलची माहिती सुबोधपत्रिकेत लेखरूपाने पाठविली. शिंदे यांनी या दोन वर्षांच्या काळात सुबोधपत्रिकेतून जे लेखन केले त्या लेखनाने सुबोधपत्रिकेच्या तत्कालीन वाचकाचे मन आकृष्ट करून घेतले. शिंदे यांच्याबद्दल फार चांगले मत व जवळीक प्रार्थनासमाजबंधूंच्या मनामध्ये निर्माण झाली. शिंदे यांनी शेक्सपिअर, वर्डस्वर्थ इत्यादी प्रतिभावंतांची स्थळे, इंग्लंडमधील व स्कॉटलंडमधील सरोवर प्रांत इत्यादींचे सुरेख वर्णन केले आहे. त्यांनी केलेले लंडन शहराचे वर्णन असो की, पारीसमधील निशाजीवनाचे वर्णन असो, ते यथातथ्य तर असतेच, शिवाय त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचाही आविष्कार त्यामधून होतो. त्यांचा ‘जनातून वनात व परत’ या शीर्षकाचा जो लेख आहे त्यामध्ये नव्या भांडवलशाहीतील शोषणाचे चित्र शहरात कसे दिसून येते व नीरव अशा सरोवर प्रांतातील देखावा याच्याविरूद्ध कसा दिसतो याचे अप्रतिम वर्णन केले आहे,३ इंग्लंडमधून पाठविलेल्या शिंदे यांच्या या लेखनाच्या परिणामासंबंधी सुबोधपत्रिकेचे संपादक व्दा. गो. वैद्य यांनी लिहिले आहे, “मन त्रस्त झाले असेल तेव्हा अगर विश्रांतीच्या वेळी या पुस्तकात प्रसिद्ध झालेली रा. शिंदे यांची केवळ विलायतेहून लिहिलेली पत्रे जे कोणी वाचतील त्यास रा. शिंदे यांचे निरीक्षणसामर्थ्य, कल्पकता, भाषेतील काव्य व रस अवलोकून समाधान वाटल्यावाचून राहणार नाही.”४


भारतामध्ये आल्यानंतर विठ्ठ्ल रामजी शिंदे यांनी १९०३ पासून धर्मप्रचार कार्याला प्रारंभ केला. ब्राह्मधर्माचे प्रचारकार्य आणि १९०६ पासून अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यासाठी त्यांना सदैव भारतभर भ्रमंती करावी लागत असे. तीसेक वर्षांच्या अवधीत त्यांनी भारताच्या बहुतेक सर्व प्रांतांतून प्रवास केला.कार्यानिमित्त केलेल्या प्रवासाबरोबरच त्यांनी विविध ठिकाणची प्रेक्षणीय स्थळे व निसर्गरम्य प्रदेश हेही जाणीवपूर्वक पाहिले. परदेशात आणि भारतात त्यांनी केलेल्या प्रवासाबद्दलचे एकंदर तीसके प्रवासवर्णनपर लेख आहेत.

Read more: साहित्यसेवा आणि संशोधनकार्य

वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य

मूळ खेडेगावातून आलेल्या व पुण्यासारख्या शहरात स्थायिक झालेल्या बहुजन समाजातील कुटुंबांत, विशेषत: त्यांमधील बायकामुलांमध्ये, ब्राह्मसमाजाच्या उदार व उन्नत धर्माची शिकवण प्रसृत करुन त्यांची मने संस्कारित करणे हे एक विठ्ठल रामजी शिंदे यांनी वेगळ्या दिशेने केलेले महत्त्वाचे कार्य होय. पुण्यामध्ये कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करुन हे काम चिकाटीने करण्याचा प्रयत्न त्यांनी केला व काही एका प्रमाणात त्यांना या बाबतीत यश मिळाले. परंतु एवढ्याने त्यांच्या मनाचे समाधान होण्याजोगे नव्हते. प्रत्यक्ष खेडेगावांत, खेडवळ लोकांमध्ये धर्माची उज्ज्वल कल्नपा प्रसृत करणे त्यांना फर महत्त्वाचे वाटत होते. कारण खेडेगावातील समाजावर धर्मविषयक अंधश्रद्धांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडलेला असतो. खेडेगावांमध्ये धर्मप्रचाराचे कार्य मुंबई, पुणे येथील समाजाकडून होणार नाही, ही जाणीव त्यांच्या मनामध्ये मुंबई ते पुणे येथील प्रार्थनासमाजाचा १८९८ मध्ये प्रारंभित परिचय झाल्याबरोबरच निर्माण झाली होती. १९०३ सालापासून प्रत्यक्ष धर्मप्रचाराचे कार्य त्यांनी सुरु केल्यानंतर महाराष्ट्रातील, तसेच भारतातील ब्राह्मधर्मविषयक कार्याचे अवलोकन केल्यानंतर हे प्रार्थनासमाजाचे धर्मकार्य केवळ शहरांत व सुशिक्षित लोकांपुरते मर्यादित आहे याची त्यांना खात्री पटली होती.

त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात वाईमध्ये तसेच आजूबाजूच्या ग्रामीण परिसरामध्ये ब्राह्मधर्मप्रसाराचे कार्य करण्याची प्रेरणा त्यांना उत्पन्न करता आली; हे कार्य संघटित करण्यासाठी ते मार्गदर्शन करु शकले व ह्या कामात ते सहभागी होऊ शकले. हा काळ १९३३ ते १९४३ ह्या दशकाचा होय. ज्या कामाची त्यांना अगदी तरुणपणापासून आस्था होती ते काम आयुष्याच्या अखेरच्या काळात ते करु शकले व ह्या कामात त्यांना मनोविश्रांती लाभली.


वाई येथे ब्राह्मसमाज स्थापन होण्यास विठ्ठल रामजी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कारणीभूत झाला, तो अशा प्रकारे : सातारा जिल्ह्यातील एक नामवंत शिक्षक श्री. कृष्णाराव उर्फ आबासाहेब बाबर हे निवृत्त झाल्यावर श्री. बा. ग. जगताप यांनी पुणे येथील आपल्या श्री शिवाजी हायस्कूलमध्ये मराठी व गणित शिकविण्यासाठी त्यांची नेमणूक केली. विठ्ठल रामजी शिंदे यांनी चालविलेल्या कौटुंबिक उपासना मंडळाच्या उपासनांसाठी ते आपल्या पत्नीसह उपस्थित राहत होते. कृष्णराव बाबर हे सुधारकी विचाराचे होते. पुणे येथील ट्रेनिंग कॉलेजात शिकत असताना ते महात्मा फुले यांना भेटावयास जात असत. सत्यशोधक समाजाबद्दल महात्मा फुल्यांची मते ते ऐकत असत व त्यांच्याशी चर्चा करीत.

सातारा जिल्ह्यातील मसूर येथे ते शिक्षक असता १९१६ साली विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासमवेत अस्पृश्यतानिवारण्याच्या कामी ते पायी हिंडले होते. सर्वच बाबतीत त्यांचा कल असा सुधारकी मताचा असल्यामुळे शिंदे यांनी चालविलेल्या कौटुंबिक उपासनेच्या कार्यामुळे ते व त्यांच्या पत्नी ताईसाहेब हे प्रभावित झाले. त्यांचे चिरंजीव रामराव हेही कौटुंबिक उपासना मंडळाच्या कार्यक्रमांना आवडीने उपस्थित राहत असत. रामरावांच्या मातोश्री ह्या वाईत राहावयास आल्यानंतर पुण्याप्रमाणे तेथेही उपासना मंडळ चालवावे असे त्यांना वाटू लागले. रामराव बाबर यांचाही कल अशा प्रकारच्या धर्मकार्याकडे झालेला होता. एका प्रसंगाने ह्या विचाराला चालना मिळाली.


२५ जानेवारी १९३३ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वाई तालुका अस्पृश्यतानिवारण परिषद भरण्याचे ठरले होते. वाई तालुका अस्पृश्यतानिवारण संघाचे अध्यक्ष श्री. बाबुराव पाडळे व सेक्रेटरी श्री. सीताराम नलावडे होते. परिषदेसाठी पुण्याहून अण्णासाहेब शिंदे हे अकरा वाजता आले. त्यांचे आगमन होताच पुष्पहार घालून टाळ्यांच्या गजरात तेथे जमलेल्या मंडळींनी त्यांचे स्वागत केले. सभेत कोणते ठराव संमत करावयाचे याविषयी चर्चा केली.


कृष्णराव थिएटरमध्ये दुपारी तीन वाजता सभेला सुरुवात झाली. सेक्रेटरीने कार्याचा अहवाल वाचून दाखविला. वाईसारख्या कर्मठ नगरीतील काही सनातनी मंडळींना अस्पृश्यतानिवारणाचे चाललेले कार्य मंजूर नव्हते. श्री. महादेव नीळकंठ साठे वगैरे मंडळींनी विरोध करण्याचा बेत आखला होता. विठ्ठल रामजी शिंदे यांचे भाषण चालू झाल्यावर सभेत गोंधळाला सुरुवात झाली. सभा उधळण्याचा रंग दिसू लागला. अण्णासाहेब शिंदे यांनी समयसूचकपणे सर्व सभेला उभे राहण्याची आज्ञा केली. सर्व सभा उभी राहिली व अण्णासाहेब शिंदे यांनी धीरगंभीर आवाजात गायत्री मंत्र म्हणून प्रार्थना केली. त्याबरोबर सभेचे रुप पालटले. सर्व वातावरण शांत व गंभीर झाले. त्यानंर शिंदे यांनी सभेचे काम उत्तम रीतीने पार पाडले. गणपती आळीच्या देवळात हरिजनांसह प्रवेश केला. शिंदे आपल्या बरोबरीच्या मंडळींसह पुण्याला जाण्यासाठी सहा वाजता निघाले.


ह्या प्रसंगाचा आणि शिंदे यांच्या व्यक्तिमत्तवाचा प्रभाव पुंडलिक हैबती ठाकूर नावाच्या एका व्यक्तीवर विलक्षण पडला. हे मूळचे खानदेशातील रहिवासी होते. वाई येथील शेतकरी असोसिएशनमध्ये कारकून म्हणून काम करीत होते. रामराव बाबर यांचे ते स्नेही होते. सभेच्या दुस-या दिवशी ते रामराव बाबरांना भेटावयास गेले व विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल माहिती विचारु लागले. रामराव बाबर यांनी त्यांच्याजवळ पूर्वीच पुण्याच्या कोटुंबिक उपासना मंडळासंबंधी माहिती सांगितली होती. अण्णासाहेब शिंदे यांच्या सभेतील प्रार्थनेमुळे ते विलक्षण प्रभावित झाले होते. रामराव बाबर यांना ते म्हणाले की , तुम्ही म्हणत होता तशा प्रकारचे कौटुंबिक उपासना मंडळी येथेही काढण्याचा प्रयत्न करावा. मी तुम्हाबरोबर काम करण्यास तयार आहे. ठाकूर यांच्या ह्या सूचनेमुळे रामराव बाबर यांच्या तसेच त्यांच्या मातोश्रींच्या मनात असलेल्या विचाराला चालना मिळाली.


रामराव बाबर व पुंडलिक ठाकूर यांनी अनेकांच्या घरी जाऊन आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी आठ वाजता झोरे यांच्या माडीवर जमून सर्वांनी सांघिक प्रार्थना करावयाची आहे तरी आपण प्रार्थनेस यावे अशी विनंती केली. त्याप्रमाणे ४ जुलै १९३३ आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी श्रीयुत नारायणराव चव्हाण, महादेवराव नलावडे, सखाराम पाटणे, रामचंद्र सिंदकर गुरुजी वगैरे तेराजण उपस्थित राहिले. सिंदकर गुरुजींनी तुकारामांचा एक अभंग गायिला व प्रार्थना केली. रा. ना. चव्हाण यांनी स्वामी विवेकानंदांचे चरित्र कथन केले.


प्रार्थनेनंतर पुण्याप्रमाणे कौटुंबिक उपासना मडळ स्थापन करावे या विषयावर चर्चा करण्यात आली. आपल्या घरची बायकामंडळी प्रार्थनेस येणे तूर्त शक्य वाटत नाही असे ब-याच जणांचे मत पडले. तरीही दर रविवारी चित्तशुद्धीसाठी आपण सर्वांनी एकत्र जमून प्रार्थना करावी. मडळास प्रार्थनासंघ असे नाव द्यावे असे ठरविले. अशी रीतीने त्या दिवशीच प्रार्थनासंघाची स्थापना झाली. पुढील उपासना रामराव बाबर यांच्या घरी व नंतर वाचनालयात झाल्या. सर्वानुमते नारायणराव चव्हाण यांना अध्यक्ष व रामराव बाबर यांना सेक्रेटरी म्हणून निवडण्यात आले. प्रतिज्ञापूर्वक सभासदांचे फॉर्म भरुन घेण्यात आले. सर्व सभासद आळीपाळीने उपासना चालवू लागले. हरिजन वस्तीजवळच्या मारुतीच्या देवळात उपासना होऊ लागल्या. आसपासची भाविक अस्पृश्य मंडळी देवळात उपस्थित राहू लागली. अस्पृश्य मंडळीचे देवळात येणे बाहेरील मंडळींना पसंत पडले नाही. म्हणून त्यापुढील उपासना नारायणराव चव्हाण यांच्या घरी नियमितपणे होऊ लागल्या.

Read more: वाई ब्राह्मसमाज आणि ग्रामीण भागातील धर्मकार्य

मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे

१९०६ सालापासून १९२३ पर्यंत म्हणजे सुमारे १६-१७ वर्षे अण्णासाहेब शिंदे यांनी अस्पृश्यवर्गीयांच्या सर्वांगीण सुधारणेसाठी अखिल भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळ अथवा डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था चालविली. विसाव्या शतकाच्या आरंभी हिंदुस्थानमध्ये अस्पृश्यतेचा म्हणून काही एक अखिल भारतीय पातळीवरील प्रश्न आहे, याची फारशी जाणीव कोणाला नव्हती. अस्पृश्यतानिवारणाचेजे थोडेफार प्रयत्न होत होते त्यांचे स्वरूप सामान्यतः स्थानिक पातळीवरचेच होते. अशा काळात व वातावरणात, हा प्रश्न सोडविणे व अस्पृश्यवर्गीयांना बरोबरीने वागविणे हे माणुसकीच्या तत्त्वाला धरून आवश्यक आहे; धर्मदृष्टीने ते कर्तव्य आहे, ह्या नैतिक जाणिवेतून शिंदे यांनी ह्या कार्याला आरंभ केला. शिवाय हा प्रश्न माणुसकीच्या पातळीवरून वेळीच सोडवून, अस्पृश्यता जर सवर्ण हिंदूनी नष्ट केली नाही तर, सामाजिक व राजकीय पातळीवर हा प्रश्न उग्ररूप धारण करील, ह्याचीसुद्धा शिंदे यांना जाणीव होती व ती त्यांनी १९०८ साली बडोदा येथे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दिलेल्या ‘बहिष्कृत भारत’ ह्या व्याख्यानामध्ये प्रकट केली. मात्र शिंदे यांच्या संदर्भात हे लक्षात ठेवले पाहिजे की, अस्पृश्यतेचा प्रश्न निकाली काढणे हे त्यांना माणुसकीच्या, न्यायाच्या व धर्मबुद्धीच्या दृष्टीने अत्यावश्यक वाटत होते. सामाजिक, राजकीय स्वार्थासाठी आवश्यक वाटत होते असे नाही, तर त्यांच्या धर्मबुद्धीमुळे ते आवश्यक वाटत होते.


विसाव्या शतकाच्या प्रारंभी मद्रास, कलकत्ता, मुंबई येथे अस्पृश्यांच्या सुधारणेबाबत जे तुरळक प्रयत्न चालू होते, ते सर्वस्वी स्थानिक पातळीवरचेच होते व अस्पृश्यवर्गातील विद्यार्थियांना शिक्षण द्यावे एवढ्या शैक्षणिक बाबीपुरतेच मर्यादित होते. तो काळच असा होता की, सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आग्रह धरण्याचा विचार स्पृश्यवर्गीय पुढा-यांच्याच काय पण अस्पृश्यवर्गीय पुढा-यांच्यादेखील मनामध्ये आलेला नव्हता. अशा काळामध्ये मिशनसारखी संस्था शिंदे यांनी अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यासाठी व अस्पृश्यवर्गाची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी स्थापन केली. दरवर्षी काँग्रेस अधिवेशनाच्या जोडीने होणा-या सामाजिक परिषदेमध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न सातत्याने तत्कालीन भारतीय पातळीवरील समाजधुरिणांसमोर मांडून ह्या प्रश्नाबद्दल जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मिशन ह्या संस्थेची प्रांतिक तसेच भारतीय पातळीवर अधिवेशने भरविली. जसजशी अस्पृश्यवर्गाच्या प्रश्नाबद्दल जागृती वाढत गेली त्याबरोबर त्यांनी अस्पृश्यवर्गासाठी राजकीय हक्क मागावयासही सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नामुळेच डॉ. अँनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यतानिवारणाचा ठराव मंजूर करण्यात आला व अस्पृश्यवर्गाच्या सर्वांगीण सुधारणेचा प्रश्न अखिल भारतीय पातळीवरील प्रश्न आहे व तो सोडविण्याची निकड आहे, ह्या बाबीला काँग्रेसने मान्यता दिली. डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन झाले तो १९०६ मधला काळ व अण्णासाहेब शिंदे यांनी हे मिशन १९२३ साली प्राधान्याने अस्पृश्यवर्गीय व्यक्तींच्या स्वाधीन करून ते स्वतः मिशनच्या जबाबदारीतून बाजूला झाले तो काळ ह्म काळातील तफावत पाहता अस्पृश्यवर्गीयांच्या प्रश्नाबद्दल विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मिशन ह्या संस्थेच्या द्वारा किती अपूर्व कार्य देशाच्या पातळीव केले ह्याची आपल्याला कल्पना येऊ शकते.


अस्पृश्यवर्गीयांसाठी एखादी संस्था चालविणे व ती दीर्घकाळ टिकवणे ही गोष्ट किती कठीण आहे हे ह्याबाबतीत संस्था काढण्याचे इतर जे प्रयत्न झाले त्यांचे अवलोकन केल्यावर येऊ शकते. खुद्द अस्पृश्यवर्गीयांकडून निदान प्रारंभिक काळात तरी अशा प्रकारे व्यापक पातळीवर संस्था काढण्याचे प्रयत्न झाले नाहीत. शिंदे यांच्या मिशनला अस्पृश्यवर्गीयांकडूनच ज्या वेळेला विरोध होऊ लागला, त्या वेळेस श्री. वा. रा. कोठारी, शिवराम जानबा कांबळे इत्यादी पुढा-यांनी पुढाकार घेऊन डॉ. हॅरॉल्ड एच. मॅन यांच्या अध्यक्षतेखाली ‘डिप्रेस्ड क्लासेस कमिटी’ ह्या नावाची संस्था १६ एप्रिल १९२१ रोजी स्थापन केली. परंतु ह्या संस्थेद्वारा अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेसाठी कोणतेही कार्य झाले नाही, एवढेच नव्हे तर ह्या संस्थेच्या रीतसर सभा झाल्या नाहीत, त्यांचा जमाखर्चाचा हिशोब कधी झाला नाही असे शिवराम जानबा कांबळे यांनी श्री. वा. रा. कोठारी यांना पाठविलेल्या एका पत्रावरून दिसते. हे पत्र पुढीलप्रमाणे आहे.१


कामाठीपुरा पाचवी गल्ली,
पुणे.
ता. २/४/१९२८


रा. रा. वा. रा. कोठारी यांस
सा. न. वि. वि.
आपल्या तारीख २७/३/२८चा जोडकार्ड पोहचला. डिप्रेस्ड क्लासेस कमिटीच्या असलेल्या शिल्लक रकमेचा व्यय पुढे कसा करावयाचा असे डॉ. मँन यांनी विलायतेहून लिहून विचारले आहे आणि त्याप्रमाणे आपण ही रक्कम बाबीच्या अस्पृश्य विद्यार्थिगृहाला व येथील चांभार विद्यार्थिमंडळाला द्यावी असे आपले मत व्यक्त केले आहे. तरी आपण दोघांनीच या रक्कमेची विल्हेवाट लावणे हे मला बरे दिसत नाही.


आपली संस्था स्थापन होऊन आज सुमारे सात वर्षे होऊन गेली आहेत. एवढ्या अवधीत जमाखर्चाचा हिशोब कमिटीपुढे एकदाही ठेवण्यात आला नाही. तेव्हा आता आपणाला संस्था बंद ठेवायची असेल तर तिच्या सभासदांची मिटिंग बोलवून ह्या गोष्टीचा विचार कराव अशी माझी सूचना आहे.
आपला
शिवराम जानबा कांबळे

 

श्री. शिवराम जानबा कांबळे हे स्वतः अस्पृश्यवर्गातील कर्तबगार पुढारी होते. श्री. वा. रा. कोठारी हे बुद्धिमान वृत्तपत्रकार असतानाही त्यांना अस्पृश्यवर्गीयांसाठी संस्था चालविणे शक्य झाले नाही असे दिसते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनीही अस्पृश्यवर्गाच्या सर्वांगीण उद्धारासाठी संस्थात्मक पातळीवर कार्य करावे असे योजिले होते. ९ मार्च १९२४ रोजी मुंबई येथील दामोदर हॉलमध्ये निमंत्रित समाजसेवकांची ह्याबाबतीत विचारार्थ बैठक त्यांनी बोलाविली व ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ ह्या नावाची संस्था स्थापन करावी असे योजिले. ‘एज्युकेट, एजिटेड अँण्ड ऑर्गनाईज’ (शिकवा, चेतवा आणि संघटित करा) असे संस्थेचे ब्रीदवाक्य त्यांनी ठरविले व २० जुलै १९२४ रोजी ही संस्था स्थापन झाल्याचे जाहीर करण्यात आले. संस्थेचे अधिपती सर चिमणलाल सेटलवाड, उपमुख्य अधिपती म्हणून जी. के. नरीमन, र. पु. परांजपे, डॉ. वि. पां. चव्हाण, बा. गं. खेर ही मंडळी होती, तर व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर, सेक्रेटरी म्हणून सीताराम नामदेव शिवतरकर, खजिनदार निवृत्ती तुळशीराम जाधव हे होते. सभासद, हिशेबतपासणीस, पंचमंडळी इत्यादी एकंदर ३८ सदगृहस्थ या संस्थेचे पदाधिकार ठरविण्यात आले. संस्थेचे उद्देश म्हणून बहिष्कृतवर्गाच् हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून सवलती मिळविणे; बहिष्कृतवर्गात जागृती करणे व त्यासाठी प्रचारक नेमणे; बहिष्कृतवर्गात हक्कांची जाणीव उत्पन्न करून ते त्यांना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणे इत्यादींचा समावेस केला होता. त्याबरोबरच शिक्षणप्रसार करणे; विद्यार्थिवसतिगृहे काढणे; लायक विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती देणे; समाजजागृतीसाठी कीर्तने, व्याख्याने वगैरेची व्यवस्था करणे इत्यादी उद्देश नमूद करण्यात आले. मुंबई इलाखा प्रांतिक बहिष्कृत परिषदेच्या वतीने निपाणी येथे एक अधिवेशनही पार पडले. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना संस्थेच्या उद्देशात नमूद केल्याप्रमाणे बहिष्कृत हितकारिणी सभेस कार्याचा विस्तार करण्यात फारसे यश मिळाल्याचे दिसत नाही. शिवतरकर ह्या सचिवाबद्दल असणारा अन्य सभासदांचा विरोध, त्याचप्रमाणे अंतःस्थ बखेडे यामुळे ही संस्था फारशी कार्यप्रवण होऊ शकली नाही. मॅनेजिंग कमिटीच पंधरा सदस्य होते. घटनेनुसार पाच सदस्यांचा कोरम ठरविण्यात आला होता. कोरमच्या अभावी मॅनेजिंग कमिटीच्या सभाही होऊ शकत नसत असे वत्तान्तवरून दिसते. ‘बहिष्कृत भारत’ ह्या वृत्तपत्राद्वारा लोकजागृतीचे कार्य आपण अधिक परिणामकारकरीत्या करू शकतो असे बाबासाहेबांना वाटले असावे. परंतु हे वृत्तपत्र चालविण्यासाठी जमलेली पुंजी १९२९ सालापर्यंतच टिकली व ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र बंद करणे त्यांना भाग पडले. बहिष्कृत हितकारिणी सभेचे कार्यही अंतःस्थ बेबनावामुळे व सभासदांच्या कार्यप्रवणतेच्या अभावामुळे चालू ठेवणे शक्य झाले नाही, म्हणून १४ जून १९२८ रोजी सभेची एक बैठक घेऊन ही संस्था बंद करण्याचा निर्णय बाबासाहेब आंबेडकरांना घ्यावा लागला.२ डॉ. आंबेडकरांसारख्या अस्पृश्यवर्गात जन्मलेल्या लोकोत्तर कर्तृत्वशक्ती असलेल्या पुरुषालाही अस्पृश्यवर्गीयांच्या हितासाठी त्या काळात संस्था चालविणे व तिच्याद्वारा काम करणे शक्य झाले असे दिसत नाही. संस्थात्मक पातळीवर अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी कार्य करणे एवढे दुष्कर असताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभिक काळात डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन करून स्पृश्य-अस्पृश्यवर्गातील सगळ्या जातींतील पुढारी, जहाल-मवाळ राजकीय नेते, संस्थानिक तसेच सरकारी अंमलदार ह्या सर्वांचे सहकार्य घेऊन अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याचा भारतभर उठाव केला ही गोष्ट अभूतपूर्वच म्हणावी लागले. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ठिकाणी असलेली अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेसाठीची आत्यंतिक तळमळ, ह्या कार्यासाठी स्वतःचे आयुष्य झोकून त्यांच्यामध्येच राहून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला अपूर्व स्वार्थत्याग, स्वतःच्या त्यागाच्या उदाहरणाने इतरांवर प्रभाव पाडणारे व्यक्तिमत्त्व ह्या बाबी तर कारणीभूत आहेतच; शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडून स्वतःचे जीवन स्वार्थत्यागपूर्वक ह्या कामासाठी वाहणारे सहकारी व कार्यकर्ते ते मिळवू शकले. या सहका-यांच्या सहकार्यामुळे ह्या कामाचा अभूतपूर्व विस्तार अण्णासाहेब शिंदे करू शकले.

Read more: मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे

मिशनची महाराष्ट्र परिषद

१९१२ साली घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची ऑक्टोबर महिन्यात पुणे येथे भरविण्यात आलेली महाराष्ट्र परिषद. १९०६ साली मिशनची स्थापना झाल्यापासून विविध प्रकारचे मिशनच्या कामाचा प्रचार करण्याचा जोरदार प्रयत्न शिंदे यांनी चालविला होता. वेगवेगळ्या गावी जाऊन तेथील हितचिंतक पुढा-यांची मने वळवून लोकमत तयार करण्यासाठी त्या गावी मोठमोठ्या सभा भरविणे, विविध ठिकाणी शाखा स्थापन करून निधी जमविण्यासाठी दौरा काढणे, ह्या मार्गाप्रमाणेच मिशनच्या खास सभा भरविणे हा एक अस्पृश्यतानिवारणकार्याचा आणि त्या वर्गाची उन्नती करण्याचा दुसरा परिणामकारक मार्ग होता.


मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक ह्या नात्याने काम करीत असताना शिंदे ह्यांनी अखिल भारतीय पातळीवरील राष्ट्रसभेचे अधिवेशन भरविण्याच्या ठिकाणी एकेश्वरी धर्मपरिषद भरविण्याचा उपक्रम सुरू केला होता हे आपण पाहिलेच आहे. १९०६ साली डिप्रेस्ड क्लासेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रसभेच्या अधिवेशनाच्या वेळी शिंदे हे मिशनची परिषदही भरवू लागले. १९०७ साली सुरत, १९०८ साली मद्रास, १९०९ साली लाहोर, १९१० साली अलाहाबाद, १९१२ साली बांकीपूर आणि १९१३ साली कराची येथे राष्ट्रसभेच्या वेळी ह्या परिषदा भरविण्यात आल्या. बांकीपूर येथील काँग्रेसचे अध्यक्ष अमरावतीचे नामदार मुधोळकर वकील हे मिशनच्या परिषदेचेही अध्यक्ष होते. कराचीच्या परिषदेत लाला लजपतराय हे मिशनचे अध्यक्ष होते. मिशनच्या ह्या परिषदांमुळे हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या प्रांतांतून आलेल्या पुढा-यांचे लक्ष मिशनच्या ह्या कार्याकडे लागत असे. अस्पृश्यतानिवारणाच्या ह्या कामाबद्दल सहानुभूतीचे क्षेत्र वाढत असे. शिवाय त्या त्या प्रांतात मिशनच्या कार्याची उभारणी करण्यासाठी शिंदे ह्यांना माहिती व मदत मिळणे शक्य होई. प्रत्यक्ष काँग्रेसच्या कार्यामध्ये अस्पृश्यतानिवारणाच्या बाबीचा शिरकाव व्हावा असा शिंदे ह्यांनी ह्या वेळी सतत प्रयत्न करून पाहिला. परंतु हा प्रश्न धर्माचा आहे, त्याची भेसळ राजकारणात नको अशी सबब सांगून त्या वेळचे जहाल अथवा मवाळ राजकीय पुढारी ह्या प्रश्नाची टाळटाळ करीत असत. मात्र मिशनच्या परिषदा भरवून अनुकूल प्रचाराचे हे कार्य शिंदे ह्यांनी नेटाने चालविले होते. ते मिशनच्या पुणे शाखेच्या कामाची पाहणी करण्यासाठी १९१२ सालच्या ऑगस्टमध्ये पुण्यास गेले असताना त्यांच्या मनामध्ये पुणे शाखेच्याच हितचिंतकांची एक लहानशी परिषद अल्प प्रमाणात भरवावी असा विचार आला होता. पुढे रा. सीतारामपंत जव्हेरे, ल. म. सत्तूर, जी. एन. सहस्त्रबुद्धे, दा. ना. पटवर्धन ह्यांच्याशी चर्चा करून परिषदेचे काम कोणत्या धर्तीवर चालवावे ह्यासंबंधी विचार झाला. परंतु पुढे विचारांती केवळ पुणे शाखेच्या हितचिंतकांची छोटी परिषद भरविण्याऐवजी विस्तृत प्रमाणावर मिशनच्या महाराष्ट्रातील हितचिंतकांचीच एक व्यापक परिषद भरवावी असे ठरले. ही परिषद ५, ६ व ७ ऑक्टोबर ह्या तारखांना सर रामकृष्णपंत भांडारकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात यावी असे ठरले. तसेच परिषदेची जागा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचे अँम्फी थिएटर हे स्थळ निश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे परिषदेची कार्यकमिटी भरविण्यात आली. कार्यकमिटीच्या ह्या रचनेत सर्व अस्पृश्य जातीचे निवडक प्रतिनिधी घेतले. शिवाय पुण्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधीही समाविष्ट केले.


महाराष्ट्रीय निराश्रित वर्गाच्या उन्नतीसंबंधी व्यावहारिक विषयांची त्यांच्या हितचिंतकांमध्ये व्यवस्थित रीतीने चर्चा व्हावी; नि. सा. मंडळीने चालविलेल्या कार्याची इतर शिक्षणविषयक व परोपकारी संस्थांच्या चालकांना माहिती मिळून त्यांच्याशी मंडळींनी सहकार्य साधावे व सर्वसाधारण लोकसमूहामध्ये ह्या कार्याविषयी सहानुभूती वाढवावी, हे हेतू परिषद भरविण्यामागे निश्चित करण्यात आले. वरील हेतूला धरून परिषदेत व्हावयाच्या चर्चेसाठी पुढील विषय निश्चित करण्यात आले.


१)मंडळीला वाहिलेल्या माणसांची जरुरी, २) पुणे येथील शाखेसाठी बोर्डिंगची आवश्यकता, ३) निराश्रित वर्गाच्या औद्योगिक शिक्षणाची दिशा, ४) निराश्रित वर्गाच्या विशेष अडचणी, ५) निराश्रितवर्गाच्या वाङमयात्मक शिक्षणाची दिशा, ६) मुंबई व पुणे येथील मंडळींच्या स्वतःच्या इमारतीची आवश्यकता, ७) म्युनिसिपालट्या, खाजगी शिक्षणसंस्था आणि परोपकारी शिक्षणसंस्था ह्यांच्याशी मंडळीचे सहकार्य, ८) सरकारी विद्यापीठे व देशी संस्थानिक ह्यांच्याशी शिक्षणाविषयक बाबतीत मंडळीचे सहकार्य, ९) आध्यात्मिक व सामाजिक बाबतीत निरनिराळ्या धर्मपंथातील अनुयायांशी मंडळींचे सहकार्य.


परिषदेच्या स्वागतकमिटीची रचना डॉ. हॅरॉल्ड एच. मॅन ह्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यामध्ये प्रो. के. रा. कानेटकर, प्रो. गो. चि. भाटे, प्रो. द. ल. सहस्त्रबुद्धे, श्री. ल. म. सत्तूर, श्री. ए. के. मुदलियार, सीताराम जव्हेरे, मा. ह. घोरपडे इत्यादी, तसेच स्थानिक निराश्रित वर्गाचे प्रतिनिधी म्हणून श्री. शिवराम जानबा कांबले, श्री. श्रीपतराव नांदणे, श्री. रखमाजी कांबळे, श्री. अनंता दा. खांडेकर, श्री. नुरासिंग पिरू मेहतर, श्री. वजीर मन्नू इत्यादी वेगवेगळ्या जातींतील मंडळींना घेण्यात आले. परिषदेचे सेक्रेटरी म्हणून श्री. विठ्ठल रामजी शिंदे आणि दा. ना. पटवर्धन ह्यांनी काम पाहावयाचे ठरविले. स्वयंसेवक मंडळींमध्ये श्री. व्ही. आर. मुदलियार, श्री. रा. ना. राजाज्ञे ह्यांच्यासमवेत अँग्रिकल्चर कॉलेजमधील विद्यार्थी श्री. बसानी, जडेजा, भाटरकर, बेंडीगिरी, साने इत्यादी होते. डॉ. मॅन ह्यांचे मिशनच्या कामी सदैव साहाय्य होत असे. त्यांनी परिषदेच्या स्वागतकमिटीचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे मान्य केले.

Read more: मिशनची महाराष्ट्र परिषद
  1. मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी
  2. मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग
  3. बहुमान, अवमान आणि निष्ठा
  4. प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती
  • 122
  • 123
  • 124
  • 125
  • 126
  • 127
  • 128
  • 129
  • 130
  • 131
Page 127 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी