प्रकरण सहावे
ब्रह्मदेशाची यात्रा करण्याचे मनात आणून मी जेव्हा इ.स. १९२७ च्या फेब्रुवारीत कलकत्त्याहून निघालो, तेव्हा माझे मनातील मुख्य उद्देश केवळ बौध्द धर्माचे साधन प्रत्यक्ष पाहण्याचाच होता. हा निर्वेधपणाने साधावा म्हणून माझे इतर व्यवसाय आणि अभ्यास काही काळ तरी बाजूस ठेवावेत, असे मला वाटत होते. पण मी जेव्हा या विचित्र देशात संचार करू लागलो तेव्हा प्राचीन वास्तुशास्त्र, तुलनात्मक भाषाशास्त्र, मानवंशशास्त्र इत्यादी ज्या माझ्या आवडीच्या गोष्टी त्यांनी मजवर एकदम हल्ला चालविला. ब्राह्म धर्माचा प्रचारक ह्या नात्याने तुलनात्मक धर्मशास्त्राचे अवलोकन मला आजन्म करणे भाग आहे. आणि वरील शास्त्रे तौलनिक धर्मशास्त्राच्या अगदी हद्दीवरती व त्याशी सजातीय असल्याने त्यांच्या अध्ययनापासून, विशेषतः इतक्या भिन्न परिस्थितीत आल्यावर, स्वतः अलिप्त राहणे मला फार कठीण पडले.
ब्रह्मदेशात हिंदुस्थानातला जातिभेद मुळीच नाही, ही गोष्ट अगदी खरी आहे. तेवढयावरून येथे कोणत्याही प्रकारचा बहिष्कृतवर्ग मुळीच नाही, किंवा पूर्वी नव्हता, असा माझा समज होता. इतकेच नव्हे, तर ह्या देशात पुष्कळ वर्षे राहून वरवर पाहणाराचाही असाच समज असलेला मला दिसून आला. पण खरा प्रकार असा नसून, अगदी अलीकडच्या काळापर्यंत ह्या देशात, बहिष्कृत स्थितीत निदान एक हजार वर्षे तरी खितपत पडलेले चार-पाच तरी मानववर्ग मला आढळले. श्वे यो ह्या टोपणनावाच्या एका इंग्रजाने लिहिलेल्या Burman - His Life and Nation ह्या इंग्रजी ग्रंथात मी जेव्हा ह्या बहिष्कृत दासवर्गाचे वर्णन वाचले तेव्हा मला त्याचे फारच आश्चर्य वाटले. जातिभेद नसताही बहिष्कृतवर्ग असून शकतो, हे अमेरिकेतील अत्यंत सुधारलेल्या संयुक्त संस्थानातील सामान्य लोकांचे तेथील निग्रोशी जे वर्तन घडते व दक्षिण आफ्रिकेतील गौरकायांचे इतर वर्णीयांशी जे वर्तन घडते, ते ज्यांनी पाहिले आहे, त्यांना सहज पटण्यासारखे आहे.
गेल्या वर्षी भारत इतिहास संशोधक मंडळापुढे अस्पृश्यतेचे मूळ आणि तिचा हिंदुस्थानातील विकास ह्या विषयावर मी माझा निबंध वाचला. तेव्हापासून ह्या विषयाचा मी अधिकच शोध करीत आहे. ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्गाची मला जी माहिती शोधाअंती मिळाली व जी हल्लीची वस्तुस्थिती जागोजागी जाऊन मी प्रत्यक्ष निरखिली, तिच्यामुळे माझ्या स्वीकृत विषयावर अधिक प्रकाश पडणार आहे, म्हणून मी पुढील माहिती संक्षेपाने देत आहे.
ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्गाचा उगम ब्रह्मदेशातील गुलामगिरीच्या संस्थेत आहे. ब्रिटिश राज्याची संस्थापना ब्रह्मदेशात इ.स. १८८५ साली पूर्णपणे झाली. ह्यापूर्वीच्या स्वराज्यात ह्या देशात गुलामगिरीची संस्था होती. ती येथे किती पुरातन होती हे ठरविण्याची निश्चित साधनू तूर्त उपलब्ध नाहीत. अनेकविध सामग्री जमवून मि.जी.ई.हार्वे, आय.सी.एस. ह्यांनी नुकताच ब्रह्मदेशाचा एक नमुनेदार आमूलाग्र इतिहास दिलेला आहे. त्यात त्यांनी इसवी सनाच्या चालू सहस्त्रकाच्या आरंभी सूरू झालेल्या पगान येथील राजघराण्यापासून विश्वसनीय इतिहास दिला आहे. हे घराणे अनिरुध्द या नावाच्या पराक्रमी थोर पुरुषाने स्थापिले. ह्या घराण्याने या देशात जे मोठे मन्वंतर घडवून आणण्यासाठी अनेक राष्ट्रीय हिताची कामे केली; त्यात देशातील बौध्द धर्माची सुधारणा करून मोठमोठी बौध्द देवस्थाने बांधली, हे एक काम होय. ही देवळे बांधण्यासाठी खेडयांतून शेतकीवरील पुष्कळशा लोकांना जबरीने धरून आणून गुलाम करून त्यांच्याकडून काम घेतले. ह्याशिवाय कायमच्या गुलामगिरीचे दुसरे एक कारण ब्रह्मदेशात असे आहे - देवस्थानांत झाडलोट व इतर राखणदरीची कामे करणे, हे गुलामांचेच काम आहे. कित्येक भाविक लोक ही गुलामगिरी आपण होऊन पत्करीत असत. पण साधारपणे राजाज्ञेने हा जबरीचा गुरवपणा खेडयातून धरून आणिलेल्या लोकांवर किंवा लढाईत जिंकून आणिलेल्या लोकांवर लादण्यात येत असे. मि. हार्वे ह्यांनी पान ३३१ वर एक इ.स. १९७९ चा शिलालेखाचा उतारा दिला आहे. त्यात 'अभिनंदथू नावाच्या एका श्रीमंत दरबारी गृहस्थाने एक मोठे देऊळ बांधून त्याच्या साफसफाईसाठी स्वतःला, आपल्या बायकोला व मुलांना गुलाम म्हणून वाहिले...' असा उल्लेख आहे.
अशा देवळी गुलामांवर व त्यातल्या त्यात लढाईत जिंकून आणलेल्या गुलामांवर वंशपरंपरेचा बहिष्कार पडत असे. त्यांच्याशी इतर साधारण स्वतंत्र समाज मिळूनमिसळून राहत नसे. म्हणजे ब्रह्मदेशांत जातिभेद मुळीच नसला तरी स्वतंत्र आणि गुलाम असे दोन मुख्य सामाजिक भेद असत व घरकामाकरिता ठेविलेल्या गुलामांना जरी समाजात वावरावयास मुभा असली, तरी देवळी गुलामांना फारच हीन व तिरस्करणीय समजण्यात येत असे. याप्रमाणे गुलामगिरीतून ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्गाचा उगम झाला असावा. एकंदरीत ब्रह्मदेशातील हल्लीची धार्मिक संस्कृती व काही अंशी घरगुती व सामाजिक संस्कृतीही हिंदी संस्कृतीतून आली आहे, असे दिसते. निदान काही वर्गांची ग्रामबहिष्कृतता तरी हिंदुस्थानातूनच गेली असावी, असे म्हणण्यात हिंदी बौध्द संस्कृतीचाच पुरावा नसून इतरही असा पुरावा आहे की, हल्लीही जे हीन स्थितीतले बहिष्कृतवर्ग तेथे आढळतात, त्यांची संडाला, डूनसंडाला, तुबायाझा अशी जी नावे आहेत, ती हिंदी भाषेतून तिकडे गेली आहेत. ती नावे चंडाल, डोमचंडाल, अशुभराजा ह्या हिंदी नावाचेच अपभ्रंभ होय, ह्यात संशय नाही. संस्कृत अथवा पाली भाषांतील शब्दांचे उच्चार ब्रह्मी लोकांना नीट न करता आल्यामुळे या भाषंतीलच च श र ह्या अक्षरांच्या उच्चारांचा ब्रह्मी भाषेत अनुक्रमे स त य असा विपर्यास व्हावा, असा ब्रह्मी अपभ्रंभाचा नियम आहे; त्याबरहुकूम ब्रह्मी बहिष्कृतवर्गाची नावे हल्ली येथे प्रचारात आहेत. अशुभराजा ह्यातील पहिल्या 'अ' चा लोप झाला व इतर नियमांप्रमाणे तुबायाझा असे शेवटले नाव सिध्द झाले आहे.
ब्रह्मदेशात ब्रिटिश राज्य स्थापन होईपर्यंत खालील चार प्रकारचे बहिष्कृत हीन वर्ग आढळत असत.
१. युध्दात जिंकलेले कैदी आणि त्यांचे वंशज यांना देवळांतील सेवेला वाहिलेले गुलाम करण्यात आलेले असे. ह्यांना फयाचून हे नाव आहे. फया हा शब्द बुध्द ह्या शब्दाचा चिनी भाषेतून आलेला अपभ्रंश आहे. बुध्द-बुढ-भुर-फुर-फया अशी ही अपभ्रंश परंपरा आहे. फया हा शब्द ब्रह्मदेशात बुध्द, त्याची मूर्ती, देऊळ आणि कोणी मोठा सन्माननीय माणूस ह्या सर्वांबद्दल उपयोजिला जातो. चून म्हणजे नोकर असा अर्थ आहे.
२. स्मशानातील मर्तिकादी अशुभ संस्कारांशी संबंध असलेली, थडगी खणण्याची व ती सांभाळण्याची वगैरे हीन कामे करणारे ग्रामबाह्य वर्ग ह्यांना तुबायाझा (अशुभ राजा), संडाला, डूनसंडाला अशी नावे आहेत.
३. केवळ भिक्षेवर निर्वाह करणारे महारोगी व इतर असाध्य रोगांनी पछाडलेले, हातपाय किंवा दुसरा एखादा महत्त्वाचा अवयव तुटून अपंग बनलेले यांना केबा असे नाव आहे. केबा हे नाव आता तुबायाझंनाही लावण्यात येते. कारण तेही भीकच मागतात. के = मदत, बा = हो (संबोधन). 'मला मदत करा', असे म्हणत भीक मागणारे असा ह्या नावाचा मूळ अर्थ आहे.
४. माफीचे भयंकर गुन्हेगार : अशा गुन्हेगारांना पूर्वी स्वराज्यात राजाच्या कृपेने किंवा इतर कारणांनी माफी मिळून त्यांना पोलीसचे, जेलरचे, फाशी देण्याचे वगैरे तिरस्कृत काम आणि अधिकार मिळत असत. त्यांना पॅगवे म्हणजे पोलीस, लेयाटों = चोपदार, छडीदार अशी नावे असत. अशा अधिकाऱ्यांचा जनतेमध्ये मोठा दरारा असला तरी त्यांच्याविषयी सर्वत्र तिरस्कार असून ते समाजबाह्य मानले जात.
५. ह्याशिवाय तु-ङै-डो म्हणजे राजे लोकांचे हलालखोर म्हणून एक वर्ग पूर्वी असे. व ह्यांचा एक लहान गाव मंडालेपासून १०-१२ मैलांवर आहे असे माझे ऐकण्यात आले. पण मला प्रत्यक्ष जाऊन पाहण्यास वेळ मिळाला नाही. ह्यांचा समावेश वरील दुसऱ्या वर्गात मी केला असता, पण हल्ली हे फारसे ग्रामबाह्य नाहीत, असेही मी ऐकले.
वरील पाचही बहिष्कृतवर्गांतील लोकांची हल्लीची संख्या हिंदुस्थानातील बहिष्कृतांच्या मानाने फारच थोडी म्हणजे फार तर साऱ्या ब्रह्मदेशांत ५६ हजार असेल. यांची स्थितीही हिंदुस्थानातल्याइतकी करुणास्पद नाही. हे आपले ठिकाण सोडून, धंदा सोडून व मूळ लपवून सर्वसाधारण समाजात छपून गेल्यास हल्लीच्या राज्यात कोणी पर्वा करीत नाहीत. हे जरी आपल्या मूळ गावीच बहिष्कृत स्थितीत राहिले तरी, व पूर्वीदेखील, हिंदुस्थानातल्या इतक्या कडक रीतीने यांना अस्पृश्य मानण्यात येत नसे. तरी पण त्यांना गावात येण्याला व इतर धंदे करण्याला व लोकांत मिसळण्याला परवानगी नसे. म्हणून अजूनी हे मागासलेल्या विपन्नावस्थेत खितपत पडलेले मी प्रत्यक्ष गावोगावी मुद्दाम जाऊन पाहिले. ब्रह्मदेशात कडक अस्पृश्यता नव्हती- निदान हल्ली नाही - हे खरी असले, तरी तेथील बहिष्कृतांचा व अंतःकृतांचा भेटीव्यवहार पूर्वी होत नसे व आताही होत नाही; मग रोजीव्यवहार व बेटीव्यवहाराची गोष्ट नको. हल्लीदेखील कोणी उघडपणे आपले मूळ वरील चार-पाच प्रकारांपैकी एकात आहे, असे सांगेल, तर त्याच्याशी ब्रह्मदेशातील पुराणमतवादी बहुसंख्या नुसता भेटीव्यवहार करण्यासही तयार नाही. म्हणजे गृह्य आणि सामाजिक प्रसंगी समानतेने बहिष्कृतास आमंत्रण करण्यास अंतःकृत वर्ग अद्यापि तयार नाही. ब्रह्मदेशातील पुराणमतवाद हिंदुस्थानातल्यापेक्षा कमी दृढमूल आहे व तो जो झपाटयाने मावळत आहे, तरी पण तो मुळीच नव्हता किंवा नाही असे नाही. म्हणून तेथील बहिष्कृतवर्ग हा एक संशोधनीय विषय आहे.
वरील पाचही प्रकारचा बहिष्कृतांचा इतिहास माझ्या अल्पशा संशोधनात जो आढळला, तो संक्षेपाने पुढे देत आहे. ब्रह्मदेशाचा इतिहास अद्याप तयार व्हावयाचा आहे. उपलब्ध साधनासामग्रीचा भारतीय सामाजिक इतिहासाशी निकट संबंध भासत आहे आणि तो रंजक व तसाच बोधकही आहे.
फयाचून : ह्या नावाचा अर्थ 'देवळी गुलाम' असा आहे. ब्रह्मदेशातील देवस्थाने अत्यंत पवित्र मानली जातात; इतकी की, युरोपियांनादेखील पादत्राण घालून देवळातच नव्हे तर भोवतालच्या विस्तीर्ण आवारातही पाय टाकण्याची छाती होत नाही. अशा बाबतीत युरोपियनांचेही खून पडले, म्हणून पादत्राण घालून मंदिरातच नव्हे तर प्राकारातही प्रवेश करण्यासंबंधी सरकारी ठराव आणि वटहुकूम मोठमोठया पाटयांवर आवारापासून काही अंतरावर जाहीर केलेले आढळतात. देवळे पवित्र तरी देवळी गुलाम अपवित्र, हे मोठे कोडेच मला पडले ! शोध करिता देवळी गुलामच नव्हे तर देवळात वाहिलेल्या इतर पदार्थ, फळे, फुले, सुगंधी पदार्थ व नैवेद्य इत्यादी सर्वच वसतू मनुष्यांना अग्राह्य आहेत. ह्या न्यायाने फयाचून म्हणून जो देवळी गुलामवर्ग आहे तो पूर्वी अग्राह्य असला पाहिजे. तो कालांतराने त्याज्य व नंतर अपवित्र मानला असणे अगदी संभवनीय आहे. ह्या गुलामवर्गात पूर्वी बहुतेक धरून आणलेले राजकैदी असत. ह्याचे एक उदाहरण अत्यंत हृदयद्रावक पण अगदी इतिहासप्रसिध्द आहे, ते असे :
दक्षिण ब्रह्मदेशात मोलमेन शहराचे उत्तरेस २०-२२ मैलांवर किनाऱ्यालगत थटून म्हणून एक इतिहासप्रसिध्द प्राचीन राजधानीचा गाव आहे. तेथे इ.स.च्या ११ व्या शतकाच्या मध्यसमयी मनुहा नावाचा तेलंग राजा राज्य करीत होता. ह्या प्रांतात द्रविड देशातून कांची येथून गेलेला 'हीनयान' बौध्द धर्म जोरात होता. उत्तरेकडे ऐरावती नदीचे काठी पगान येथे अनिरुध्द नावाच्या ब्रह्मी जातीच्या राजाने जेव्हा पहिली ब्रह्मी बादशाही स्थापिली, तेव्हा दक्षिणेत थटून येथे मनुहा राज्य करीत होता. अनिरुध्दाला उत्तरेकडील भ्रष्ट बौध्द धर्माची सुधारणा करावयाची होती. थटूनकडून नामांकित बौध्द भिक्षू पगान येथे जाऊन अनिरुध्दाच्या राष्ट्रीय कार्यात मार्गदर्शक झाला. त्याने थटून येथे बौध्द त्रिपिटक ग्रंथाच्या प्रती आहेत, त्या मिळविण्याचा अनिरुध्दास मंत्र दिला. सामोपचाराने मागूनही मनुहा त्रिपिटक ग्रंथ देत नाही; म्हणून त्यावर रागावून अनिरुध्दाने मनुहाच्या राज्यावर मोठी चाल करून त्रिपिटकच नव्हे, तर त्याचे अक्षरशः सर्वस्व हरण केले. म्हणजे त्याच्या राज्यातील सर्व मौल्यवान चिजा ऐनजिनशी आपल्या राज्यात नेल्या, इतकेच नव्हे, तर प्रजाही गुलाम म्हणून आपल्या राज्यात नेली. तेव्हापर्यंत दक्षिण ब्रह्मदेशातील संस्कृती दक्षिण हिंदुस्थानातील आंध्र आणि द्रविड देशांतून दक्षिण ब्रह्मदेशात हीनयान बौध्द संस्कृतीचे मार्गाने गेली होती. ती ह्या युध्दापुढे उत्तर ब्रह्मदेशात पसरू लागली. थटूनचे बौध्द ग्रंथ, बौध्दभिक्षू, आचार्य आणि कारागीर नेले इतकेच नव्हे, सर्व राजघराणे आणि दरबारही गिरफरदार करून पगान येथे नेण्यात आले. शेवटी त्या थटून राजघराण्यासह सर्व नामांकित प्रजेला पगान येथे बांधलेल्या नवीन असंख्य पगोडांमध्ये बहिष्कृत देवळी गुलाम म्हणून कायमचे वंशपरंपरा नेमण्यात आले. मी थटून आणि पगान ही जुन्या संस्कृतीची दोन्ही ठिकाणे शिल्पशास्त्र, समाजशास्त्र आणि धर्मशास्त्र अशा तिनही दृष्टीने निरखून पाहिली. दक्षिण ब्रह्मदेशात ब्रिटिशांचा अंमल जसा इ.स. १८२५ चे सुमारास बसला, तसाच तो उत्तर ब्रह्मदेशात १८८५ साली बसून सर्व ब्रह्मदेश नव्या मनूत आला. ह्या साठ वर्षांच्या अंतरामुळे मला दक्षिण देशात बहिष्कृतवर्ग कोठेच आढळला नाही. तो पाहण्यास मला उत्तरेकडे मनुहा पगानला जावे लागते. पगान येथील बहिष्कृत वाडयात मनुहा राजाचे घराणे, वाडा व त्याचा हृदयस्पर्शी लवाजमा अद्यापि आहे. शेवटचा पुरुष उ बा ल्विन हा २६ वर्षे वयाचा पाणीदार तरुण व त्याची खानदानी वृध्द आई यांना मी डोळयांनी पाहिली. त्यांची गाऱ्हाणी ऐकली. न्यऊ या बंदराजवळ श्रेझीगो नावाच्या मोठया राष्ट्रीय पगोडाजवळ फयाचूनांचे एक वेगळे खेडे आहे. त्याचा थजी ऊर्फ पाटील म्हणून ब्रिटिश सरकारने उ बा ल्विनची नेमणूक केली आहे. कारण तो मोठया राजवंशातील पिढीजाद फयाचून आहे.
फयाचून हे लोक लहानमोठया देवळांत हल्ली फुले, माळा, उदकाडया मेणबत्त्या विकण्यासाठी दुकाने मांडून बसलेले आढळतात. हा धंदा किफायतीचा असल्याने अलीकडे फयाचून नसलेल्या इतर अंतःकृत लोकांचीही अशी दुकाने आहेत. उलट फयाचूनही आपले मूळ लपवून व हा धंदा सोडून अंतःकृत वर्गात सर्रास मिसळत आहेत. ह्यामुळे खरा फयाचून कोण, हे ओळखून काढणे मोठे मुष्किलीचे काम आहे. विशेष तपशील निरीक्षण नं. ४ यात पुढे दिला आहे.
तुबायाझा : या नावातील मूळ शब्द वर सांगितल्याप्रमाणे 'अशुभ राजा'. ह्यासंबंधी मी एक दंतकथा ठिकठिकाणी ऐकली ती अशी : एकदा एका ब्रह्मी राजाची एक गर्भवती राणी अत्यवस्थ आजारी पडली. ती मेलीच, असे समजून तिला स्मशानात पाठविले. थडग्यात उतरविताना ती जिवंत आहे, असे आढळले. स्मशानात नेलेली राणी राजाने पुन्हा स्वीकारणे शक्यच नव्हते. तिला थडगे खणणाऱ्या संडाला जातीतच ठेवून दिले व तिचे पोटी पुढे जो राजपुत्र झाला त्याला 'अशुभ राजा' हे नाव पडले. त्याला संडालांचे मुख्य पद मिळून, स्मशानातील धार्मिक संस्कारात बौध्द फौंजीला (भिक्षूला) जी दक्षिणा मिळेल तितकीच ह्या राजवंशालाही मिळावी, असे राजशासन मिळाले. ही दंतकथा मला पगाम येथील तुबायाझाच्या खेडयातील पाटलाने व सगाईन येथील एका सभ्य गृहस्थानेही स्वतंत्रपणे सांगितली. कथा खरी असो नसो, ब्रह्मी चंडाल ऊर्फ संडाला लोक राजवंशाशी आपला संबंध कसा पोहोचवितात, हे ह्यावरून दिसते. मलबारातील पुलया, चिरुमा ह्यांचाही अन्य रीतीने राजवंशाशी कसा संबंध येतो, हे मी हिंदुस्थानात पाहिलेले मला स्मरले. तुबायाझा हे बहिष्कृत असले तरी कधी जित नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे. संडाला, डूनसंडाला लोक मणीपूरच्या बाजूने हिंदू संस्कृतीच्या राजाने प्राचीन काळी ब्रह्मदेशात नेले असावेत. याशिवाय माझा दुसरा तर्क धावत नाही. अलीकडे दक्षिण हिंदुस्थानातील लक्षावधी परैया, पुलया इत्यादी अस्पृश्य जातींचे लोक पोट भरण्यासाठी, ब्रह्मदेशात अगदी हीन धंदा करून राहिले आहेत. ते मुळीच बहिष्कृत नाहीत. पण हे प्राचीन काळी गेलेले संडाला मात्र अद्यापि तुरळक तुरळक आपल्या जुन्या वतनाच्या गावी थडगे खणण्याचे आपले जुने वतनच चालवीत असलेले आढळतात; त्या अर्थी हे प्राचीन हिंदी संस्कृतीचे वतन प्राचीन हिंदी राजांनीच स्थापिले असेल असे माझे मत आहे. विशेष तपशिलासाठी पुढे निरीक्षण नंबर १ व ३ पाहा.
प्रकरण तिसरे
हा काळ हिंदुस्थानच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्याच काळात ह्या प्रचंड देशात अनेक दृष्टींनी अनेक क्रांत्या झाल्या. त्या अशा :
१. येथूनच हिंदुस्थानच्या ऐतिहासिक काळाला सुरुवात झाली. ह्यापूर्वीच्या प्रागैतिहासिक काळातील घडामोडी बहुतेक निश्चित पुराव्याच्या अभावी अनुमानानेच ठरवाव्या लागतात.
२. ह्या काळी हिंदुस्थानचे आद्ययुग अथवा युगे संपून, मध्ययुगाला सुरुवात होते. ह्या मध्ययुगाचा अंमल जवळजवळ दीड हजार वर्षे म्हणजे हिंदुस्थानवर मुसलमानांच्या स्वाऱ्या होऊन त्यांचे अधिराज्य व त्यांच्या संस्कृतीचा परिणाम होऊ लागेपर्यंत चालू होता.
३. वैदिक आणि तत्सम इतर बाह्य संस्कृतींचा जो बरा वाईट परिणाम हिंदी समाजस्थितीवर ह्या काळापर्यंत होत होता, त्याला येथून पुढे बौध्दजनांनी चालविलेल्या सुधारणांचा विरोध होऊ लागला. ह्या कलहात जी कालेवरून तडजोड झाली तिला बौध्द-ब्राह्मणी संमिश्र संस्कृती असे नाव देता येईल. ह्या मिश्रसंस्कृतीचा काळ म्हणजे हे मध्ययुग होय.
४. ह्याच युगात संस्कृत वाङमयाच्या जोडीला उत्तरदेशात पाली व प्राकृत, तशीच दक्षिण देशात तामीळ, कानडी इत्यादी तद्देशीय वाङमयाची भर पडली.
५. ह्या युगापूर्वीच उत्तर हिंदुस्थानात बाहेरून आलेल्या आर्य, शक वगैरे प्रतापी अभिजात मानववंशांची व त्यांच्या संस्कृतीची पूर्ण प्रतिष्ठा झाली होती. ह्या वंशांचा व संस्कृतींचा ह्या मध्ययुगाच्या आरंभापासून दक्षिण हिंदी द्वीपकल्पात जोराचा शिरकाव होऊन सुमारे ख्रिस्ती शकाच्या आरंभीच म्हणजे अर्धसहस्त्रकातच हे 'दक्षिणापथ' नावाचे द्वीपकल्प भरतखंडात - एकजीव झाले नाही तरी - सामील झाले.
६. ह्याच मध्ययुगाच्या आरंभी अलेक्झांडरच्या स्वारीमुळे उत्तर हिंदुस्थानाचा पश्चिम आशियाशीच नव्हे तर पूर्व युरोपखंडाशीही संबंध जडला. इतकेच नव्हे, तर या स्वारीला ज्या मौर्य साम्राज्याने यशस्वी रीतीने मागे हटविले; त्या प्रतापी आणि अस्सल हिंदी साम्राज्याने उत्तर आणि दक्षिण ह्या दोन भिन्न व तुटक हिंदी देशभागांची एका छत्राखाली संयुक्त घटना (फेडरेशन) केली. इतकेच नव्हे तर पूर्वेकडे ब्रह्मदेश, सयाम, मलाया द्वीपकल्प आणि दक्षिणेकडे सिंहलद्वीप येथपर्यंत आपल्या संस्कृतीचे हात पसरिले.
७. ह्या मध्ययुगापूर्वी भारतात, निदान आर्यावर्तात, ब्राह्मणी संस्कृतीचाच वरचष्मा होता. ही संस्कृती बहुशः 'आध्यात्मिक', भावनात्मक, वाङमयविषयक ऊर्फ शाब्दिक होती. मौय साम्राज्याचा व्यवहारवाद आणि बौध्दजनांचा शुध्द बुध्दिवाद ह्यांचे सहकार्य ह्या मध्ययुगात घडून ह्या नवीन शक्तींशी ब्राह्मणी संस्कृतीला तडजोड करावी लागली.
८. ह्याच मध्ययुगात हिंदी समाजाची पुर्नघटना वर्णाश्रमधर्म वगैरेसारख्या अल्पसंख्याप्रेरित भावनात्मक पायावरून अर्थशास्त्राच्या आणि बहुजनसत्तेच्या नवीन पायावर झाली.
९. ह्याच मध्ययुगात हिंदी समाजस्थितीची सुधारणा व लोकस्थितीची ऐहिक भरभराट जशी झाली तशीच भावी दुर्बलतेची आणि परवशतेची बीजेही कायमची पेरली गेली !
येणेप्रमाणे हा काळ चांगलाही आणि तितकाच वाईटही आहे. कारण ह्या सबंध काळात बौध्द आणि ब्राह्मणी संस्कृतीची सारखी तडजोड चालली होती आणि अशा मिश्रणाचा परिणाम भरतखंडाच्या भवितव्यतेवर पुढील म्हणजे अर्वाचीन युगात अनिष्टच झाला, ह्यात नवल नाही !
असो. आम्हाला ह्या कालात आमचा प्रस्तुत विषय जी अस्पृश्यता तिचा विकास कसा झाला हे पाहावयाचे आहे.
अस्पृश्यतेचा व्याप आणि घटना कमी-अधिक मानाने सर्व जगभर आहे हे वर सांगितलेच आहे; तरी हिंदुस्थानात ह्या घटनेला विशेष स्थैर्य आणि यश आले आहे ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. आणि हिच्या कारणांचा शोध व मीमांसा शक्यतोवर करणे जरूर आहे. हिंदुस्थानातही त्यातल्या त्यात उत्तरेपेक्षा दक्षिण भागात अस्पृश्यतेचा पाया अधिक खोल व दृढ रोविला असून त्याचा परिणाम कितीतरी अधिक तीव्र दिसतो, ह्याचे काहीतरी विशेष कारण असले पाहिजे. कदचित आर्यांच्या आगमनापूर्वीही ह्या देशात ही संस्था होती किंवा काय अशी शंका मनात येते. पण ह्या शंकेचे समाधान होण्यासारखा एकही पुरावा मिळण्याचे काही साधन आता उरले नाही. उत्तर हिंदुस्थानातील अस्पृश्यतेचा जो विकास आम्ही वर पाहिला, आणि त्यासंबंधी आर्यांच्या वाङमयातून बौध्द काळाच्या मागे मागे जाऊन जे मिळालेले उल्लेख वर उध्दृत केले आहेत; त्यावरून एक अनुमान असे निघत आहे की, आर्यांपूर्वी ह्या देशात कायमची वसती करून राहिलेल्या धनसंपन्न मानवजाती होत्या. त्यांच्या सहवासाने कदाचित अस्पृश्यतेचा शिरकाव आर्यांच्या समाजघटनेत झाला असावा. हा सहवास जसजसा जास्त काळ व जास्त प्रमाणावर झाला, तसतसा हा शिरकाव जास्त झालेला दिसत आहे. एरव्ही आर्य ग्रंथांतून शोध घेत जसजसे मागे जावे तसतसे अस्पृश्यतेचे दाखले कमी कमी का आढळावे, ह्या गोष्टीचा उलगडा नीट होत नाही.
मी दक्षिण हिंदुस्थानात तामिळ देशात समाजशास्त्राचे संशोधन करीत असता बऱ्याच मुदलियार, पिल्ले वगैरे द्राविड पंडितांनी मला सांगितले की आर्यांप्रमाणे अत्यंत प्राचीन काळी द्राविड देशातही एक प्रकारचे चातुरर््वण्य होते. १. किनाऱ्यावर राहणारे, २. अंतर्देशातील मैदानात राहणारे, ३. जंगलात झाडीतून राहणारे व ४. डोंगरपठारावर राहणारे, असे हे चार भिन्न समाज होते. सांपत्तिक दृष्टया ह्यांच्यात उच्चनीच भाव होता, पण आर्यांप्रमाणे तो भेद सामाजिक होता की नाही हे तेव्हा मला समजले नाही. बिशप कॉल्डवेल ह्यांनी 'द्राविड भाषांचे तौलनिक व्याकरण' (Camparative Grammar of Dravidain Languages) ह्या नावाचा जो एक अत्यंत परिश्रमाने लिहिलेला अमूल्य ग्रंथ आहे, त्यात Depressed Classes म्हणजे दलितवर्गासंबंधी एक निबंध आहे. त्यात बिशप कॉल्डवेल म्हणतात, ''द्राविड देशात जे लोक आपल्यास शूद्र म्हणवितात, ते स्वतःस शूद्र म्हणजे आर्येतर एवढयाच अर्थाने समजतात; नीच ह्या अर्थाने नव्हे. मात्र शूद्र म्हणजे द्राविड देशाचे अस्सल रहिवासी असाही एक अर्थ शूद्र म्हणून घेण्यात आहे. मानवी अस्पृश्य ह्यांना ते शूद्र हे बहुमानाचे नाव देत नसत. मुदलियार ह्या शब्दाचा यौगिक अर्थच 'मूळचा' असा आहे. ह्यावरून अस्पृश्य जे पारिया लोक त्यांना परके समजण्यात येत असे, असे दिसते. ह्यावरून प्राचीन द्राविडांतही अस्पृश्यता स्वतंत्र रूपाने होती अशी शंका येते. पण ह्या कल्पनेस शिलालेखी अगर वाङमयीन आधार नाहीत.''
अस्पृश्यता रूढ होण्याची दोन स्वाभाविक कारणे उघड आहेत. पहिले जातिद्वेष अथवा वर्णद्वेष आणि दुसरे वृत्तिमत्सर. उत्तर हिंदुस्थानात आर्यांचा जम हळूहळू बसू लागल्यावर त्यांनी जेव्हा वर्णांची व्यवस्था लाविली तेव्हा त्या व्यवस्थेत शुभ्र, ताम्र, पीत आणि कृष्ण (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) अशा भिन्न वंशांचा समावेश यथानुक्रम करून घेतला आहे. सर्व ब्राह्मण पांढरे, सर्व क्षत्रिय तांबडे अथवा जांभळया वर्णाचे, सर्व वैश्य पिवळे आणि शूद्र तितके एकजात काळेच होते, असे माझे म्हणणे नाही. कातडीच्या रंगावरून वर्णांची लाविलेली उपपत्ती इतिहासज्ञ कै. राजवाडयांची आहे, माझी नव्हे. मला ती पसंत नाही. मात्र हे सगळेच रंग आताच्या ह्या सगळयाच वर्णांत व पोटजातीत आढळतात, त्या अर्थी ते पूर्वीही आढळले असावेत असा माझा तर्क आहे. रामकृष्ण काळे होते. न जाणे, वसिष्ठ, वाल्मीकी, कश्यप हेही काळे असतील. तेव्हा शुभ्रकाय ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामध्ये एतद्देशीय तांबडया, पिवळया, काळया ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यांचा गुणकर्मानुसार परिस्थितिवशात् शिरकाव झाला असावा; आणि ज्यांच्या गुणकर्मांचा - केवळ बाह्य रंगाचाच नव्हे - तिटकारा आला, अशा घोर जंगली जातींना दूर ठेवण्याची प्रवृत्ती पूर्वीच्या आर्येतरांच्या सहवासाने आर्यांचीही झाली असावी, असे मला वाटते. पण पुढे अर्थशास्त्राच्या पायावर आर्यांमध्ये निरनिराळया वृत्तींचा ऊर्फ धंद्यांचा विकास झाला तसतशी वर्णद्वेषात वृत्तिमत्सराची भर पडून पूर्वीच दूर ठेवलेल्या जातींमध्ये वृत्तिबहिष्कृत अशा लोकांची भर पडू लागून अस्पृश्यतेचा विस्तार होऊ लागणे संभवते. पुढे आर्यांच्या वसाहती दक्षिण हिंदुस्थानात जसजशा होऊ लागल्या, तसतसा वर्णद्वेष आणि वृत्तिद्वेष ह्या जोडगोळीमुळे दक्षिणेकडे अगोदरच असलेल्या अस्पृश्यतेचा अधिक ऊत आला असावा हे उघड दिसते. एरव्ही दक्षिणेकडील व उत्तरेकडील अस्पृश्यतेत इतका तीव्र फरक का असावा, हे कळत नाही.
प्रो. टी. डब्ल्यू. ऱ्हिस डेव्हिड्स या विद्वान शोधकांनी आपल्या Buddhist India (बौध्दकालीन हिंदुस्थान) ह्या पुस्तकात (प्रकरण ४, पान ५३-५५) आर्यांच्या वर्णव्यवस्थेत बौध्दकाळी आर्थिक वृत्तिव्यवस्थेची भेसळ कशी होऊ लागली हे पाली भाषेतील निरनिराळया जातक ग्रंथांतून मार्मिक उतारे देऊन स्पष्ट केले आहे. पुढे दिलेल्या भाषांतरित उताऱ्यावरून त्यांचा आशय स्पष्ट होईल.
''भरतखंडावर स्वारी करणाऱ्या ज्या आर्य जमाती त्यांच्या नायकांशी आपला वंशसंबंध जोडणारे 'क्षत्रिय' हे तत्कालीन समाजाचे म्होरके होते.... यज्ञयाग करणाऱ्या पुरोहितांच्या वंशावर हक्क सांगणाऱ्या ब्राह्मणांची पायरी त्यांचयानंतरची होती. त्यांच्याखाली शेती कसणारा सामान्य जनसमाज म्हणजे वैश्यवर्ग होता. सर्वांच्या शेवटी अनार्य वंशात जन्मलेल्या शूद्रांची गणना होत होती. हे लोक मजुरी, हस्तकौशल्याची कामे किंवा सेवाचाकरी करीत. हे वर्णाने इतरांपेक्षा अधिक काळे होते...
एवढयानेच हे परिगणन संपले असे नाही. चारही वर्णांच्या तळाशी म्हणजे शूद्रांच्या खालच्या पायरीवर हलक्या जमाती व हलक्या धंद्यांचे लोक ('हीन जातीय' आणि 'हीन शिप्पाणि') असत. 'हीन जाती' मध्ये चटया विणणारे, फासेपारधी व गाडया तयार करणारे यांचा समावेश होत असे. हे लोक हिंदुस्थानातील मूल वंशांपैकी असून वंशपरंपरेने ही तीन कामे करणारे होते. 'हीन शिल्पी' - बुरूड, न्हावी, कुंभार, कोष्टी, चांभार इ. - जे असत त्यांच्यामध्ये जन्मतः निश्चित झालेला पृथक्पणा नसे. या 'हीन शिल्पां'पैकी एखादा धंदा सोडून दुसरा धंदा त्यास स्वीकारता येत असे व कित्येक तसे करीतही असत. उदाहरणार्थ, पाचव्या जातकामध्ये प्रेमसंबंधात निराश झालेला एक क्षत्रिय, बिलकुल मानहानी किंवा दंड सोसावा न लागता, कुंभाराचा, बुरुडाचा, वेतकाम करणाऱ्याचा, माळयाचा आणि स्वयंपाक्याचा - इतके धंदे एकामागून एक करताना दिसतो. सहाव्या जातकामध्ये एक वैश्य शिंप्याचा व कुंभाराचा धंदा करीत असलेला आढळतो; असे असूनही त्याच्या नातेवाईकांची त्याजविषयीची आदरबुध्दी ढळलेली दिसत नाही.
अखेर, या 'हीन जाती' व 'हीन शिल्पां'पेक्षाही तिरस्कृत असलेल्या चंडाल व पुल्कस या मूलवासीयांच्या जमाती जैन व बौध्द ग्रंथांतून उल्लेखिलेल्या दिसून येतात.''
ह्या उताऱ्यावर दिसून येते की आर्यांच्या चातुवण्यात आपसात वाटेल तशी अदलाबदल झालेली चालत असे; पण चातुर्वण्याबाहेर ज्या बहिष्कृत व तिरस्कृत जाती असत त्यांचा आत शिरकाव होत नसे.
ह्याच भागात प्रो. ऱ्हिस डेव्हिड्स ह्यांनी पान ५६, ५७ वर खालील दहा उदाहरणे जातकांच्या संदर्भासह दिली आहेत.
१. एका क्षत्रिय राजपुत्राने आपल्या प्रीतिपात्रासाठी कुंभार, बुरूड, मालाकार इत्यादिकांची वृत्ती पत्करली तरी त्याचा सामाजिक दर्जा कमी झाला नाही.
२. दुसऱ्या राजपुत्राने आपल्या राज्याचा वाटा आपल्या बहिणीला बहाल करून आपण वैश्यवृत्ती स्वीकारली.
३. तिसऱ्या राजपुत्राने एका व्यापाऱ्याजवळ राहून हाताने काम करून पोट भरले.
४. एका उमरावाने पोटासाठी तिरंदाजी केली.
५. एका ब्राह्मणाने वैश्यवृत्तीने पैसे मिळविले.
६. दुसऱ्या दोन ब्राह्मणांनी तसेच पोट भरले.
७. दुसरा एक ब्राह्मण एका तिरंदाजाचा मदतनीस झाला.
८, ९. ब्राह्मणांनी शिकारी आणि फासेपारध्याची वृत्ती चालविली.
१०. एक ब्राह्मण सुतार झाला.
ब्राह्मण उघडपणे शेतकी करून शेळया मेंढरे राखीत असत. क्षत्रियाने टाकलेल्या बायकोशी ब्राह्मणाने विवाह केला (जातक ५.२८०). अनुलोमच नव्हे तर प्रतिलोम विवाहही होत असत. म्हणजे वरिष्ठ वर्णाच्या बायका कनिष्ठांशी लग्न करून राहात. वर उदघृत केलेले उम्मग्ग जातकातील श्रीकृष्णाने जांबवतीशी केलेल्या विवाहाचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. तरी शेवटी, सर्वश्रेष्ठ क्षत्रियापासून तो अतितिरस्कृत चंडालापर्यंत जरी भेदभाव डळमळीत होता, तरी भेदाचा खुंटा हालून हालून अधिक बळकटच होत होता अशी प्रो. डेव्हिड्सलाही कबुली द्यावी लागली आहे. (पान ६०).
गौतम बुध्दाच्या वेळची डळमळीत स्थिती मौर्य साम्राज्याच्या वेळी अस्पृश्यांपुरती तरी बळकट झालेली दिसते. मोठमोठया शहरांत, विशेषतः पाटलीपुत्र (पाटणा) नगराच्या निरनिराळया भागांत, निरनिराळया धंद्यांच्या लोकांची वस्ती वसल्याची वर्णने मेगास्थेनीसच्या लेखांतून आणि कौटिलीय अर्थशास्त्र ह्या ग्रंथांतून आढळतात. ह्या ग्रंथाचे अधिकरण दुसरे, प्रकरण २२, भाग चौथा, पान ५४ वर स्पष्ट उल्लेख आहे की :
पाषंडचंडालानां स्मशानान्ते वास: ।
हे पाषंड कोण नीटसे समजत नाही. बौध्द, जैन नसावेत. ते चार्वाक, लोकायतिक, पाशुपत असावेत; पण ते बहिष्कृत असल्यास मोठे आश्चर्य होय. पण चंडालांची वस्ती मात्र गावाबाहेरील स्मशानाच्या पलीकडे असल्याचा हा पुरावा महत्त्वाचा आणि स्पष्ट आहे.
आर्यांची भारतीय ग्रामसंस्था फार प्राचीन आहे. आर्य हे ह्या देशात उपरे असल्यामुळे त्यांचा अभिजात आर्येतरांशीच केवळ नव्हे, तर अनभिजात आर्येतरांशीही व्यवहार फटकून राहण्यापेक्षा मिळते घेऊन राहण्याचाच जास्त होता, व असणे जरूर होते; कारण ते जरी उपरे होते तरी दक्षिण आफ्रिकेतील हल्लीच्या शुभ्रकायांप्रमाणे त्यांच्या वसाहती मूळ देशांशी संबंध ठेवणाऱ्या दीर्घसूत्री व दृढ नव्हत्या. हिंदी आर्यांना येथील भिन्न भिन्न आर्येतरांशी नमते घेऊन वेळोवेळी समरस झाल्याशिवाय त्यांच्या ग्रामसंस्थांची उभारणी होणे शक्य नव्हते. ते उपरे असले तरी भारतवर्षात कायम राहण्यास आले होते. मूळ देशांशी यांचे लागेबांधे नसून त्यांच्यामागे इंग्रज राज्यकर्त्यांप्रमाणे 'होम चार्जेस' (Home charges) चा ऊर्फ घरच्या देण्याचा ससेमिरा नव्हता. त्यामुळे आद्य आर्यांनी भारतवर्षात आर्येतरांशी जे मुदतबंदी मजुरीचे आणि अलुत्याबलुत्याचे नियम केले ते हल्लीच्या गौरकायांपेक्षा अधिक सढळ हाताने, अधिक संभावितपणाने केलेले आढळतात, हे खालील उताऱ्यावरून दिसते.
नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो, नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो,
नमो निषादेभ्यः पुज्जिष्ठेभ्यश्च वो नमो, नमः श्वनिभ्यो मृगयुभ्यश्च वो नमः ॥
माध्यन्दिन (शुक्लयजुर्वेद) संहिता, १६.२७.
यज्ञकर्माला निरनिराळी कर्मज, खनिज, प्राणिज सामग्री लागत असे, तिच्यासाठी मोठमोठे ॠत्विज वर सांगितलेल्या सच्छूद्रांच्याच नव्हे, तर निषाद, पुक्कस, श्वनी म्हणजे कुत्रे पाळणारे आणि मृगयु म्हणजे भिल्ल, इत्यादी जंगली लोकांच्याही पाया पडत. नवरात्रात, 'घटाला वावरी', दिवाळीत 'रँगोळी' असा मोठयाने आवाज काढून रस्त्यातून ओरडत जाणाऱ्या वैदू बायांशी किंबहुना 'शॉन (शेण) घ्या वं शॉन' असे ओरडणाऱ्या भोकरवाडीतील मांगिणीशी देखील सदाशिव पेठेतील ब्राह्मणांचया बायका किती आर्जवाने वागतात, त्याचे वरील यजुर्वेदातल्या नमस्कारांशी फार सादृश्य भासते. परंतु बौध्द आणि जैन धर्माच्या प्रसारामुळे व सहवासामुळे यज्ञक्रिया संपुष्टात आल्यावर पुढे लवकरच म्हणजे मनुस्मृतीच्या काळात सुतारलोहारादी कुशल पांचाळांची मान्यता जरी वाढलेली दिसते तरी अकुशल श्रम करणाऱ्या व अंगी विशेष क्षात्रतेज नसलेल्या आर्येतरांची गणना अस्पृश्यांत होऊन त्यांना गावाबाहेर डांबून ठेवण्यांत आलेले आढळते. बौध्द आणि जैन धर्म जरी जातिभेद मानीत नसत, तरी त्यांच्या अमदानीत अनेक नवीन जातिसंघांना पूर्वीपेक्षाही अधिक मान्यता मिळून अशोक मौर्याच्या साम्राज्यानंतर कुशलांची वैश्य वर्गामध्ये विशेष चढती आणि अकुशलांची सामान्य शूद्रांत गणती होऊन जातिभेदाचे पर्याय फार वाढले. बौध्दांच्या व जैनांच्या उदार विचारांमुळे यज्ञविषयक हत्या व अत्याचार यांना जरी आळा बसला, तरी सामाजिक रचनेची संकीर्णता कमी न होता उलट फार वाढली यात शंका नाही. विशेषतः ग्रामबाह्य, हीन मानलेल्या जातींचे सारे व्यवहार हत्या व हीन कर्माशीच अधिकाधिक निगडित होत गेल्यामुळे, त्यांची अस्पृश्यता व बहिष्कार उत्तरोत्तर दुणावत व दृढावत जाणेच क्रमप्राप्त होते. बौध्दांची अहिंसा व जैनांचा कडकडीत शाकाहार ह्यामुळे ह्या दोघांही उदारधींचा ओघ अस्पृश्यतानिवारणापेक्षा दृढीकरणाकडेच होणे स्वाभाविक होते. उलटपक्षी यज्ञयागादी हत्येच्या अत्याचारात वावरणाऱ्या ब्राह्मणांचा सहवासच ह्या बहिष्कृत वर्गाशी अधिक असण्याचा संभव जास्त आहे, हे शूलगवादी गृह्यसूत्रांतील विधींवरून व हल्लीच्या मरीआईच्या भयंकर जत्रांवरून स्पष्ट दिसते. मरीआईच्या जत्रेत ज्याप्रमाणे रेडयाचे डोके कापून ते गावाभोवती फिरवून शिवेवर नेऊन पुरतात किंवा वाटून खातात; तशाच प्रकारचा विधी गृह्यसूत्रांत 'शूलवग' नावाचा होता. असो. एकपक्षी बौध्द जैनांचा सोवळेपणा, औदासीन्य आणि वैराग्य आणि दुसरेपक्षी ब्राह्मणधर्मीयांचा हत्याप्रिय कर्मठपणा - ज्याला राजवाडयांनी आचरटपणा हे निरुक्तसिध्द समर्पक नाव दिले आहे - ह्या दोन भिन्न प्रवृत्तींचा मिलाफ होऊन बिचाऱ्या अस्पृश्यांचा बुडता पाय बहिष्काराच्या चिखलात कायमचा जो रुतला, तो रुतलाच !
मौर्य साम्राज्याच्या विस्तारामुळे आर्यांचे आणि तत्समांचे सामाजिक वर्चस्व नर्मदेच्या उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे विशेष आढळते. त्यामुळे जरी बौध्द आणि जैन ह्या उदार धर्मांचा दक्षिणेकडे प्रसार झाला तरी त्याबरोबरच मायावी आर्य राज्यव्यवस्था, कृत्रिम वर्णव्यवस्था आणि स्वार्थी ग्रामसंस्था आणि ह्या सर्वांची विषारी नांगी जी अस्पृश्यता; तिचा विशेष विकास उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे अधिक झालेला समाजशास्त्राच्या दृष्टीने पाहणाऱ्यास स्पष्ट दिसत आहे. ह्या बाबतीत प्रसिध्द समाजशास्त्री हेन्री मेन व सेन्सस रिपोर्टर आर. व्ही. रसेल ह्यांच्या ग्रंथांतील काही उल्लेख फार महत्त्वाचे आहेत, त्यांचे भाषांतर पुढे देतो.
''मद्रासेकडे मिराशी वतनबाबीचा जो कायदा आहे तो प्राचीन ग्रामसंस्थेचा कदाचित अवशेष असावा. ह्या कायद्यान्वये जमिनीच्या मालकीचा हक्क फक्त काही थोडया वरिष्ठ जातींना देण्यात आला. पुढे भोवतालच्या पडीक जमिनी वाहण्याचा मक्ता ह्या थोडया आद्य मालकांकडेच राखून ठेवण्यात आला. ह्यांनीच प्रथम ही नवीन जमीन लागवडीस आणल्याशिवाय इतरांना अशा जमिनी संपादन करण्याचा हक्कच नसे. पारिया किंवा इतर अस्पृश्यवर्गांना तर जमिनीच्या मालकीचा हक्कच नाही.'' (Russel's Tribes and castes of the Central provinces. पान ४१.) - ह्या आद्यमालकांना हल्ली मुदलियार असे नाव आहे. मोदल (मुद्दल) हा शब्द तामीळ भाषेतील विशेशण असून त्याचा अर्थ पहिला, अव्वल, पूर्वीचा असा आहे. मोदलियार हे अनेकवचनी रूप आहे. ह्यावरून मोदलियार म्हणजे प्रथम वसाहत करणारे शिष्टजन असा अर्थ होतो. ह्यावरून ही ग्रामसंस्था आर्यांच्याही आधीची द्राविडी दिसते. मलबारात नंबुद्री ब्राह्मण हे आर्य आहेत. त्यांनी हीच द्राविडी संस्था अधिक बळकट करून सारी जमीन आपल्याच मुठीत वळून, तद्देशीयांना पशूंप्रमाणे त्याच जमिनीवर राबविण्याची जी अमानुष रूढी पाडली आहे ती अद्यापि जारी आहे. रसेलने सर हेन्री मेन याच्या प्रसिध्द 'ग्रामसंस्था' (Village Community) ह्या ग्रंथातून पान १२७ वर पुढील निर्णायक उतारा दिला आहे.
''मध्य आणि दक्षिण हिंदुस्थानात अशी कित्येक खेडी (गावे) आहेत की ज्याच्या शिवेला लागूनच काही जातींची वस्ती आहे. ह्या जातींच्या माणसांचा संबंध ह्या गावातील कोणत्याही स्वाभाविक व सांघिक स्थितीशी येणे शक्य नसते. हे लोक निसर्गतःच अस्पृश्य समजण्यात येतात. त्यांना गावात मज्जाव असतो किंवा काही राखीव जागेतच जाण्यास त्यांना परवानगी असते. तेव्हाही त्यांचा स्पर्श टाळण्यात येतो. स्वतःच्या शरीरावर आपल्या मूळ जातित्वाची स्पष्ट चिन्हे वाहण्याची त्यांच्यावर सक्ती असते. त्यांचा गावात जरी शिरकाव नसतो तरी गावाच्या बऱ्यावाईटाशी अभेद्य संबंध असलेला एक चिकटवलेला भाग म्हणून ह्या लोकांची वस्ती असते. त्यांची वृत्ती (कामे) निश्चित असते. त्यापैकी गावांच्या परस्पर मर्यादांचा निश्चय करणे हा एक त्यांचा मुख्य अधिकार असतो. ह्या बाबतीत त्यांचा निकाल शेवटला समजण्यात येतो. ह्यावरून ह्यांचा वंश भिन्न असून गावात राहणाऱ्या वसाहतवाल्यांनी त्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत हे उघड दिसते.''
सर हेन्री मेन हे ह्या देशात परके असल्याने वर वर्णिलेला प्रकार 'कित्येक' खेडयांत आहे असे त्यांनी म्हटले आहे. कारण त्यांना सर्व खेडी पहाणे शक्य नव्हते. वस्तुतः वरील प्रकार सर्वच खेडयात आहे. म्हणूनच गाव आहे तेथे महारवाडा आहे अशी मराठीत म्हण पडली आहे. ह्या प्राचीन ग्रामसंस्थेचे दृश्य जितके अद्यापि महाराष्ट्रातील खेडयात स्पष्ट दिसते त्याहून अधिक स्पष्ट हिंदुस्थानात किंबहुना सर्व जगात कोठे आढळणार नाही. उत्तरेकडील मौर्यांच्या साम्राज्यपीठाचा अपहार शुंग आणि कण्व ह्या ब्राह्मणी नोकर घराण्यांनी केल्यामुळे व ही दोन्ही घराणी दुर्बळ व राजकारणात गैरवाकब ठरल्यामुळे ती अल्पकाळात नष्ट झाली. अशोकाच्या मागे लवकर दक्षिणेस शातवाहन नावाचे बादशाही घराणे उदयास आले. त्याने मगध देशापर्यंत आपल्या राज्याची हद्द उत्तरेकडे नेली व दक्षिणेस त्याच्या शिवेवर तिन्ही बाजूंना समुद्राचे वलय होते. अशा अर्थाचे किंचित अतिशयोक्तीचे शिलालेख आढळतात. मौर्याइतके बादशाही सामर्थ्य शुंग व कण्व ह्यांच्यात नव्हते म्हणून दक्षिणेकडील शातवाहनांना बादशाही स्थापण्यास संधी मिळाली. ती त्यांनी उत्तरेपर्यंत भिडवली. हे शातवाहन ऊर्फ साळवी मराठी मुलखातून रट्ट अथवा महारट्ट आणि तेलगू व कानडी मुलखांतून रड्डी ह्या नावाने अद्यापि प्रसिध्द आहेत. जमिनीची बहुतेक सर्व मालकी अथवा मिराशी ह्या अफाट प्रदेशात ह्यांच्याकडेच आहे. कृष्णा आणि तुंगभद्रा ह्यांच्या मधला, आणि उत्तरेला माळव्यात थेट शोणभद्रेच्या खोऱ्यापर्यंत, सर्व मध्यदेश ह्यांचया निशाणाखाली आला. ह्याला महाराष्ट्र असे मधून मधून लोक संबोधीत असत. ह्यएन संग ह्या चिनी प्रवाशाने 'महोलोख' म्हणून जे नाव योजिले ते ह्याच महाराष्ट्र शब्दाचा अपभ्रंश असून त्या प्रवाशाने ज्या राष्ट्राची स्वभावलक्षणे वर्णिली आहेत ती सर्व मराठयांना व रड्डींना तंतोतंत जुळतात. ह्याच महाराष्ट्रात हेन्री मेनने वर वर्णिलेली ग्रामसंस्था अद्यापि जीव धरून आहे. ह्यातील कोणत्याही खेडयात जा, तेथे महार (माल), मांग (मादिग), चांभार (समगार) ह्यांचे प्रत्येक गावानजीक वाडे आणि बलुत्याचे वगैरे बावन हक्क आणि कामे अद्यापि कोणाही संशोधकाला तपशीलावर स्पष्ट दिसतील. खेडयांतील पाटील ऊर्फ गौडा (ग्रामडा) - ग्रामणी असेही वेदकालचे नाव पुष्कळ ठिकाणी आढळते - हा हल्ली मराठी, तेलगू, कानडी, गुजराथी, अथवा हिंदी ह्यांपैकी कोणतीही भाषा बोलत असो, त्याचा धर्मपंथ आज वैष्णव, शैव, नाथपंथी, मानभावी, लिंगायत, जैन, किंबहुना मुसलमानीही असो, परंतु त्याचा वंश रट्टच आढळणार. ह्या रट्टांचे अथवा रेड्डींचे व त्यांच्या प्रभावळीत गोविलेल्या महार, मांग, चांभार ह्या भिन्न वंशांचे सहवास, सहकार्य व सहवीर्य पुरातन काळापासून आजवर अखंड चालत आलेले आहेत. सहवीर्य ह्या शब्दावरून रड्डींचा व ह्या बहिष्कृतांचा शरीरसंबंध होत असावा असे सुचविण्याचा माझा इरादा नाही. तसा पुरावा मिळाल्यास तसेही विधान मी आनंदाने करीन. महार, मांग व रेड्डींनी शूरत्वाची कृत्ये सहकार्याने केली, एवढाच येथे अभिप्राय आहे. केवळ आडनावांचाच प्रश्न असता तर रट्टांच्या कुळींची नावे 'अस्पृश्यांनी' आश्रम-आश्रितसंबंधाने घेतली असावीत असे सांगून कोणीही मोकळा होईल. पण देवके, दैवते, सोएर-सुतक, स्मशानविधी, पाचवी, सट, बारसे, लग्नविधी व तत्संबंधी पुरातन चालीरीती, इ. समाजशास्त्राने महत्त्वाची मानलेल्या जाळयांची गुंतागुंती ह्या आश्रय-आश्रितांमध्ये निरखीत जाऊन जर कोणी त्यांचा माग काढीत मुळाकडे धैर्याने मागे मागे जाऊ लागला; तर तो शातवाहनांच्याच काय, पण गौतम बुध्दाच्याही मागे प्रागैतिहासिक काळात जाऊन भिडेल. सारांश काय, तर महाराष्ट्रातील ग्रामसंस्था वेदांपेक्षाही जुनी असून शकेल, किंबहुना ती आर्यांचीच विशेष आहे की तत्पूर्वीच्या द्राविडांच्या समाजव्यवस्थेतही अंतर्भूत होती, ह्याचा ठाम निर्णय करणे अशक्य होईल.
आर्यांच्या वर्णव्यवस्थेशी भारतीय अस्पृश्यतेच्या उगमाचा व विकासाचा जितका संबंध आहे, त्याहूनही जास्त आर्यांच्या व कदाचित द्राविडांच्याही ह्या सर्वगामी ग्रामसंस्थेशी आहे. दुसऱ्या भाषेत हीच गोष्ट सांगावयाची झाल्यास, परजातिद्वेष हे राजकीय अथवा सामाजिक कारण जितके ह्या अस्पृश्यतेच्या मुळाशी व वाढीशी संबध्द आहे, त्याहूनही जास्त स्वकीय वृत्तीचा लोभ आणि परकीयांचा मत्सर हे आर्थिक कारण भारतीय अस्पृश्यतेच्या मुळाशी, विशेषतः दक्षिण भारतातील अस्पृश्यतेच्या वाढीशी व दृढतेशी गुंतलेले आहे, असे दिसते. जेथे जेथे उपऱ्या नेत्यांनी तद्देशीयांच्या जमिनी व राज्ये बळकावली आहेत, तेथे तेथे असल्या ग्रामसंस्था ऊर्फ मालकी व बलुत्यांचे विपरीत संबंध निर्माण झाले आहेत. आधुनिक मुदतबंदी मजुरीची पध्दत आणि वसाहतीतील आगमनिर्गमाचे सर्व कायदेकानू असल्या ग्रामसंस्थांची म्हणजे स्वकीय वृत्तिलोभाची व परजातिद्वेषाची स्पष्ट घेतके होत, ह्यात काय संशय आहे ?
भारतीय वर्णव्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे त्रैवर्णिक आर्य समजले जातात; आणि शूद्र हा मागाहून ह्या व्यवस्थेत आर्यांनी आपलासा करून घेतलेला भिन्न वंश, सामान्यतः सर्व भारतात - विशेषतः दक्षिण भारतात - द्राविडवंशी समजला जातो. हा भेद केवळ मानीव वर्णव्यवस्थेच्या दृष्टीने झाला. पण ग्रामसंस्थेच्या आर्थिक दृष्टीने पाहता मालकी अथवा मिराशी आणि बलुते ह्यांचा निकष लागला तर आर्य आणि द्राविड ह्यांची सर्वत्र भेसळ झालेली आढळेल. पुष्कळ ठिकाणी द्राविडवंशी शूद्र समजले जाणारे ग्रामणीचा ऊर्फ मालकीचा किंवा मिराशीचा हक्क भोगणारे संपन्न अवस्थेत आढळतात, तर उलटपक्षी वर्णगुरू म्हणविणारे ब्राह्मण जोशी, वैद्य, देवपूजक, गुरव इत्यादिकांच्या हीन वृत्तीवर किंवा बलुत्याच्या हक्कावर तृत्प असतात. तसेच काही अर्धवट रजपूत मध्यप्रांतात हाळब, रामोशी, जागले, चौघुले ह्या नात्याने अशांच्या हीनवृत्ती चालवून गुजराण करताना आढळतात. पण ह्यांपैकी कोणीही अस्पृश्य झाले नाहीत, किंवा अशा हीनवृत्तींना कायमचे चिकटले नाहीत. हल्लीच्या अस्पृश्य जातीच मात्र ह्या वर्तनावर पाणी सोडून स्वतंत्रपणे कोणी निर्वाह चालवू म्हटल्यास त्याच्यावर वरिष्ठ वर्गांकडून जबरी होते. बाहेर तर काय, प्रत्यक्ष हिंदुस्थानातील युरोपिअनाने चालविलेल्या चहाच्या व निळीच्या मळयांवर मुदतबंदीने राबणाऱ्या एखाद्या मजुराचा खून झाला तरी त्याची लवकर दाद लागत नाही; त्याचप्रमाणे एखाद्या महाराने मेलेले ढोर ओढण्याचे नाकारले म्हणून त्याचा खून झाल्याच्या आरोपावरून हायकोर्टापर्यंत खटले चालूनही पुराव्याच्या अभावामुळे कोणास शासन न झाल्याची उदाहरणे अद्यापि आढळतात ! एकंदरीत ह्या ग्रामसंस्थेमुळे वरील चार वर्णांपैकी समजले जाणाऱ्या सर्व ग्रामस्थांचा योगक्षेम नीट चालून, ग्रामबाह्यांच्या मात्र उन्नतीच्या सर्वही वाटा बंद झाल्या आहेत. ''असुनि जन्मभूमी ज्याची होत बंदिशाळा । परवशतापाश दैवे ज्यांच्या गळां लागला ॥'' ही चोराची उलटी बोंब पुनः ह्याच वरिष्ठांच्या तोंडून त्यांच्या दुष्कर्मविपाकामुळे हल्ली ऐकू येत आहे !
अस्पृश्यांची बलुती आणि बावन वतने म्हणजे वेदांत वर्णिलेला शुकनलिकान्याय होय. पिंजऱ्यातला पोपट दार उघडले की पळून जाईल, पण पारध्याची नलिका आपल्याच पायाने घट्ट धरलेला पोपट प्रत्यक्ष पारधी येऊन ओढू लागला तरी ती सोडीत नाही असे जे हरिदास रसभरीत रीतीने सांगत असतात, त्यात मोठे धार्मिक तत्त्व आहे. ह्या बलुत्यांच्या हक्कापायी भारतीय अस्पृश्य जातींची मानसिक अवनती किती झाली आहे आणि मुदतबंदी मजुरीचा प्रयोग निदान हिंदुस्थानात तरी किती पूर्ण यशस्वी झाला आहे, ह्याची ही क्षुद्र बलुती स्पष्ट द्योतके आहेत. अलीकडे अस्पृश्यांनी अस्पृश्योध्दारासाठी ज्या परिषदा भरविल्या आहेत व जे प्रयत्न चालविले आहेत, त्यातून चालू असलेली त्यांच्यातील सुधारकउध्दारकांची खेचाखेची म्हणजे वरील शुकनलिकान्यायच होय. डॉ. आंबेडकर ह्यांचे बिल ह्या वतनी न्यायामुळेच पास होत नाही. ह्याला कारण स्वतः अस्पृश्यच !
ह्या पृथ्वीवर सर्व मनुष्यजातीच्या इतिहासात जरी कोठे कधी कोणावर प्रचंड बहिष्कार घालण्यात आला असेल आणि जो पुरातन काळापासून चालत येऊन आज पूर्ण दशेला पोहचला असेल, तर तो ह्या भरतखंडातील नीच मानिलेल्या जातीवरचा भयंकर बहिष्कारच होय ! भारतवासियांनो, स्वार्थाला, मानवजातीला आणि ईश्वराला स्मरून हा घातकी, पाती आत्मबहिष्कार नाहीसा करा.
मायो
सुमारे* एक हजार वर्षांपूर्वी गुजराथ देशाची पाटण नामे राजधानी होती. तेथे इ.स. १०९४-११४३ पर्यंत सिध्दराजा नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने एकदा सहस्त्रलिंग नावाचा एक मोठा तलाव बांधण्यास सुरुवात केली. पण काही केल्या तलावात पाणी म्हणून ठरेना. तेव्हा धर्माचार्याच्या सूचनेवरून राजाने कोणा तरी एकास बळी देण्याचे ठरविले. देवो दुर्बल घातक ...., बली देण्याकरिता मायो नावाच्या एका धेडास आणून उभे करण्यात आले. शिरच्छेद करतेवेळी ''शेवटची काय मागणी असेल ती माग !'' अशी आज्ञा होताच मायो गहिवरून म्हणाला, ''महाराज, माझा हा नीच देह सार्वजनिक हिताकडे लागणार ह्याबद्दल मला आनंदच होत आहे. माझ्या तिरस्कृत जातिबांधवांवर आपण एवढीच कृपा करावी की, आजपर्यंत त्यांना शहरापासून दूर अंतरावर जंगलात राहावे लागत आहे आणि त्यांच्या नीचपणाची खूण म्हणून त्यांना निराळाच पोशाख करावा लागत आहे. तसे ह्यापुढे होऊ नये, त्यांना शहराजवळ राहण्याची परवानगी असावी.''
----------------------------------------------------------
* मासिक मनोरंजन, १९०८
* मुंबई गझेटियर, काठेवाड, पुस्तक ८, पान १५७ मा.म.२१.
-----------------------------------------------------------
सिध्दराजाने ही विनंती मान्य केली आणि मायोने आनंदाने प्राण सोडला.
वाचकहो, ही साडेसातशे वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट वाचून आपल्याला आज काय सुचते ? आपल्या ह्या चमत्कारिक देशात जातिभेदरूपी सहस्त्रलिंग म्हणजे दुहीच्या हजारो खुणा किंवा लहरी दाखविणारा जबरदस्त तलाव आहे. आज हजारो वर्षे ह्यातले पाणी स्थिर आहे, पण ह्याच्या तळाशी गाळामध्ये मायोचे असंख्य, नीच मानिलेले जातिबांधव जिवंत आणि वंशपरंपरेने रुतले आहेत. मायोच्या स्वार्थत्यागाने किंवा सिध्दराजाच्या मेहेरबानगीने ह्या जाती जरी नगराजवळ राहू लागल्या आहेत, तरी नगरवासी होण्यास, अर्थात सुधारलेल्या जगात राहण्यास त्यांना अद्यापि ह्या विसाव्या शतकातही परवानगी मिळालेली नाही. ह्यांना अद्यापि अस्पृश्यच ठेवण्यात आले आहे.
अंत्यज हे कोण आहेत ?
महार, मांग, धेड, पारिया, नामशूद्र इत्यादी ज्या अगदी नीच मानिलेल्या जाती सर्व हिंदुस्थान देशभर आढळतात, त्यांना ओळखण्याकरिता अद्यापि चांगलेसे एक सर्वसाधारण नाव प्रचारात आलेले नाही, आणि तसे एखादे नवीन नाव कल्पून प्रचारात आणणे हेही काही सोपे नाही. मुंबई शहरात म्युयनिसिपालिटीच्या ह्या लोकांकरिता ज्या स्वतंत्र शाळा आहेत, त्यांना 'निराश्रित शाळा' असे नाव देण्यात आले आहे. त्याला अनुसरून ह्या शहरात 'प्रार्थना समाजा'च्या लोकांनी ह्या लोकांच्या साहाय्याकरिता जे एक मिशन काढिले आहे, त्याच्या शाळेलाही 'निराश्रित शाळा' असे म्हटले आहे, परंतु खरे म्हटले असता निराश्रित हे नाव ह्या मंडळीस अगदी अन्वर्थक आहे असे नाही. Depressed Classes ह्याचे मराठीत शोभेलसे रूपांतर होण्यासारखे नाही. ह्या सर्व वर्गांचे एक मुख्य आणि साधारण लक्षण अथवा खूण म्हटली म्हणजे 'अस्पृश्यता' ही होय. ह्यांना शिवून घेण्यात येत नाही. म्हणून ह्यांना अस्पृश्य ह्या नावाने ओळखावे, तर तो शब्दही चांगलासा प्रचारात नाही व तितका साधा आणि सोपाही नाही. पंचम हे अलीकडे मद्रास इलाख्यात ह्या वर्गाला नवीन नाव देण्यात आले आहे, आणि ते यथार्थ असून त्यात कोणत्याही प्रकारचा तिरस्कार ध्वनित होत नाही. पण ते नाव ह्या प्रांती प्रचारात नाही. अंत्यज हा शब्द मात्र बराच व्यवहारातला आहे. पण हे लोक खरोखरच सर्वांच्या शेवटी जन्मले, अशातला मुळीच प्रकार नव्हे. म्हणून हे नाव त्यांच्यापैकी पुष्कळांना आवडण्यासारखे नाही. तथापि वरील सर्व अडचणींचा विचार करिता एकंदरीत तूर्त लेखनव्यवहाराच्या सोईसाठी अंत्यज हेच नाव नाइलाजाने पसंत करावे लागत आहे, आणि अंत्यज म्हणजे त्यांचा दर्जा हिंदू समाजात अगदी खालच्या प्रतीचा अथवा शेवटचा समजला जात आहे असे लोक, एवढाच अर्थ प्रस्तुत विषयासंबंधी ह्या नावाचा घेतला आहे.
व्याप्ती
आता प्रथम ह्या अफाट हिंदुस्थानातील अनेक धर्मांच्या, असख्ंय जातींच्या जनसमूहामध्ये ह्या अंत्यज वर्गांची व्याप्ती किती आहे, व अंत्यज ह्या सदराखाली कोणकोणत्या जाती येण्यासारख्या आहेत व त्या कोणत्या कारणांनी येतात, ह्याचा विचार करू. एकंदर हिंदी जनसमूहाकडे पाहिले असता त्याच्यामध्ये इतका विचित्रपणा व विस्कळीतपणा दिसून येतो की, कोणत्याही दृष्टीने एका विवक्षित कारणासाठी ह्या जनसमूहाचे नीटसे वर्गीकरण करू म्हटले असता जवळजवळ अशक्यच वाटते. तथापि, आपण हल्ली प्रचारात असलेले सर्व जातिभेद व वर्गभेद घटकाभर बाजूस ठेवून केवळ विद्या, आचार, विचार व गृहस्थिती इत्यादी मिळून एकंदरीत सामाजिक दर्जाच्या दृष्टीने पाहता ह्या अफाट जनसमूहाचे ठोकळमानाने पाच वर्ग करता येण्यासारखे आहेत.
१ ला. वरिष्ठ वर्ग : त्यात मोठमोठे अधिकारी, सरदार, मानकरी, मोठमोठे व्यापारी वगैरे बडया लोकांचा समावेश होतो.
२ रा. मध्यम वर्ग : ह्यात साधारण नोकऱ्या करणारे, कलाकौशल्याची काम करून उदरनिर्वाह करणारे, लहान-लहान दुकानदार व आपल्या मालकीची शेती करणारे वगैरे पांढरपेशांचा समावेश होतो.
३. रा. कनिष्ठ वर्ग : आपल्या पोटासाठी केवळ काबाडकष्ट करणारे, उदाहरणार्थ न्हावी, धोबी, साळी, माळी, स्वयंपाकी, पाणक्ये, शागीर्द, कुणबी इत्यादिकांचा ह्या वर्गात समावेश होतो.
वर सांगितलेल्या तिन्ही वर्गांचा हिंदी समाजात समावेश होतो. लग्नकार्य झाले तर ब्राह्मण सरदार आणि युरोपियन अधिकाऱ्यांपासून तो अगदी कनिष्ठ नोकरांपर्यंत सर्व एकाच दिवाणखान्यात जमू शकतात. एखादी सभा अगर व्याख्यान झाले तर वरील तिन्ही वर्गांपैकी कोणीही सारख्याच हक्काने येऊ शकतो व त्यांना कोणीही मनाई करू शकत नाही. रोटीबेटीव्यवहाराचा भाग मात्र निराळा. त्या दृष्टीने पाहता हिंदी समाजातच काय, पण हिंदुसमाजात व त्यातल्यात्यात कोणत्याही एका नाव घेण्यासारख्या मुख्य जातीतदेखील एकोपा नाही. पण सार्वजनिक किंवा एखाद्या विशेष खासगी प्रसंगी एकत्र बसणे, उठणे हा जो साधारण सार्वजनिक व्यवहार आहे, त्यात वरील तिन्ही वर्गांचा सारखाच समावेश होतो. इतकेच नव्हे, तर अगदी कनिष्ठ वर्गातला एखादा न्हावी, धोबी जर आपल्या अंगच्या करामतीने आपली विद्याचारसंपन्नता वाढवील, तर त्याला सभेसारख्या सार्वजनिक ठिकाणीच नव्हे, तर लग्नकार्यासारख्या घरगुती प्रसंगीही मानपान देण्यास हल्ली जुन्या चालीचादेखील कोणी गृहस्थ कचरत नाही. उलट, जर कोणी वरच्या वर्गातल्या मनुष्याने आपल्या बेअकलीपणाने आपली सर्व विद्याचारसंपन्नता घालविली, तर तो वरील मानपानास खास मुकतो; पण तोसुध्दा एकत्र बसण्या-उठण्याच्या सामाजिक हक्काला मुकत नाही.
४ था. हीन वर्ग : ह्यात महार, मांग, पारिया, शिक्लिया, नामशूद्र, डोंब, धेड, मेहतर, मिरासी, इत्यादी अनेक नीच मानिलेल्या जातीचा समावेश होतो. हा वर्ग हिंदी समाजाला लागून पण समाजात नाही असा आहे. समाज ह्यांजवर काही बाबतीत अवलंबून आहे व ह्या वर्गाची उपजीविकाही समाजावरच चालते. हा वर्ग हिंदी साम्राज्याची कर देणारी रयत आहे. हिंदी राष्ट्राचा योगक्षेम चालवीत आलेला हा घटक आहे; पण असे असून हिंदी समाजात वरील तीन वर्गांप्रमाणे ह्याचा मुळीच समावेश होत नाही. हा वर्ग हीन आहे म्हणून समाजबाह्य आहे. किंवा समाजबाह्य आहे म्हणून हीन आहे, ह्याचा विचार पुढे करू. पण सध्या वस्तुस्थिती एवढीच ध्यानात घ्यावयाची आहे की, राष्ट्राचा हा एक घटक असून समाजबाह्य आहे.
५ वा. अलग वर्ग : ब्रिटिश राज्य व एतद्देशीय संस्थाने ह्यांच्या सरहद्दीवर डोंगरांतून व जंगालांतून राहणारे कोंग, शिकलगार, चिगलीबगली, भिल्ल, खोंड, संताळ वगैरे अर्धवट रानटी जातीचां ह्यात समावेश होतो. हिंदी राष्ट्राशीच मुळी ह्या वर्गाचा अद्यापि संबंध जडला नाही. हे वर्ग सरकारची रयत नाहीत. आपल्या पंचायती ते स्वतःच करितात. शिकारीवर पोट भरले नाही तर परकीयाप्रमाणे आपल्याजवळचा काही ओबडधोबड माल गावखेडयांतून विकून परत जंगलांत शिरतात व तेथे परस्परांशी व सर्व हिंदी समाजाशी अगदी तुटून राहतात.
वर जे स्थूलमानाने आपण पाच वर्ग केले, त्यांत ह्या विशाल भरतखंडातील हल्ली राहत असलेल्या सर्व मनुष्यप्राण्यांचा समावेश होत आहे. प्रस्तुत विषयाच्या दृष्टीने पाहता ह्या पाच वर्गांचे तीन मुख्य भेद होतात. ते असे :
पहिले तीन म्हणजे वरिष्ठ, मध्यम, कनिष्ठ हे वर्ग हिंदी साम्राज्यांतर्गत असून समाजांतर्गतही आहेत, म्हणून ते तिन्ही मिळून एक मुख्य भेद समजण्यास काही हरकत नाही. चवथा जो हीन वर्ग, तो हिंदी साम्राज्यांतर्गत आहे. तथापि समाजबाह्य आहे म्हणून तो निराळा दुसरा मुख्य भेद समजला पाहिजे. पाचवा जो अलग वर्ग तो साम्राज्यबाह्य आणि समाजबाह्य आहे म्हणून तो तिसरा मुख्य भेद होय.
आता मधला मुख्य भेद जो साम्राज्यांतर्गत असून समाजबाह्य आहे, त्यालाच आपण प्रस्तुत लेखाच्या केवळ सोयीसाठी प्रचारात असलेले अंत्यज हे नाव दिले आहे. ह्याच वर्गाच्या अवनत स्थितीसंबंधी आमचा आजचा लेख आहे. ह्या गरीब जाती खरोखरच अंत्यज आहेत असे आम्हांला मुळीच वाटत नाही, इतकेच नव्हे, तर ह्या अमंगल आणि अन्यायमूलक नावाचा प्रचार होता होईल तो लवकर बंद व्हावा अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच ह्या निबंधाच्या मथळयात ह्या नावाचा प्रवेश होऊ न देण्याची आम्ही काळजी घेतली आहे.
मूळ
आपल्या देशात महार, मांग, चांभार, पारिया इत्यादी ज्या अनेक नीच मानिलेल्या जाती आहेत, त्यांची बरोबर मूळपीठिका शोधून काढण्यास येथे अवकाश नाही, आणि प्रस्तुत तशी जरुरीही नाही. ह्यासंबंधी प्राचीन शास्त्रांत आणि हल्ली पाहण्यात व ऐकण्यात येणाऱ्या काही थोडया ढोबळ गोष्टींचा निर्देश केला म्हणजे पुरे आहे. आमच्या आद्य श्रुतीमध्ये व त्यानंतरच्या भगवद्गीतेमध्ये चारच वर्ण सांगितले आहेत. मध्यंतरीच्या स्मृतीमध्ये मनूने १० व्या अध्यायात स्पष्ट म्हटले आहे :
ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यस्त्रयो वर्णा द्विजातयः ।
चतुर्थ एकजातिस्तु शूद्रो नास्ति तु पंचमः ॥४॥
अर्थ : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीन वर्ण दोनदा जन्मतात, म्हणजे एकदा सृष्टिक्रमाने व मागून उपनयनसंस्काराने. शूद्र सृष्टिक्रमाप्रमाणे एकदाच जन्मतो, ह्या चारीपेक्षा पाचवा असा वर्णच नाही.
म्हणजे चंडाल म्हणून जो वर्ग आहे, तो वरील चार जातींचीच कशीतरी भेसळ होऊन झाला आहे, हे त्याच अध्यायातील पुढील श्लोकावरून उघड होते.
शूद्रादायोगवः क्षत्ता चंडालश्चाधमो नृणाम् ।
वैश्यराजन्यविप्रासु जायन्ते वर्णसंकराः ॥१२॥
अर्थ : शूद्र पुरुष आणि त्याच्यावरील वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण जातींतील स्त्री ह्यांच्यामध्ये प्रतिलोम म्हणजे उलटया शरीरसंबंधामुळे जी प्रजा होते तिला अनुक्रम अयोगव, क्षत्ता आणि चंडाल अशी नावे आहेत, त्यात शूद्र आणि ब्राह्मणी ह्यांची संतती जी चांडाल; तिला अत्यंत नीच मानून अस्पृश्य ठेवण्यात आले आहे.
मनूने वर्णसंकराचा जो निषेध केला आहे, तो प्रतिलोमाचाच म्हणजे खालच्या जातीचा पुरुष आणि वरच्या जातीची स्त्री ह्यांच्या संबंधाचाच केला आहे. ह्याच्या उलट जो अनुलोमसंकर त्याचा निषेध केला नाही. स्मृतीत स्पष्ट म्हटले आहे :
शूद्रायां ब्राह्मणाज्जातः श्रेयसा चेत्प्रजायते ।
आश्रेयान्श्रेयसी जातिं गच्छत्यासप्तमादयुगात ॥
शूद्रो बा्रह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम ।
क्षत्रियाज्जातमेव तु विद्याद्वेश्यात्तथैव च ॥६५॥
अर्थ : शूद्र कन्येला ब्राह्मणापासून कन्या झाली, त्या कन्येला पुनः ब्राह्मणापासून कन्या झाली आणि अशा सात पिढया झाल्यावर जी संतती होईल, ती अगदी ब्राह्मणच उपजली असे होय. ह्याप्रमाणे शूद्राचा ब्राह्मण व ब्राह्मणाचा शूद्र बनतो.
ह्यातील तत्त्व असे मानिले गेले आहे की, स्त्रीपेक्षा पुरुषाचे अर्थात क्षेत्रापेखा बीजाचे सामर्थ्य श्रेष्ठ, म्हणून प्रतिलोमापेक्षा अनुलोम संकर श्रेष्ठ आणि प्रतिलोमातही शेवटी शूद्र आणि ब्राह्मणी ह्यांच्यांतील संकर तर अत्यंत अधम होय. तो करणे गुन्हा समजून त्याला अस्पृश्यत्वाची शिक्षा दिली आहे.
गुन्हा आणि कडेलोटाची शिक्षा
असो. हा गुन्ह्याचा विचार एकीकडे ठेवला तर वस्तुतः पाहता शुद्र पुरुष व ब्राह्मणकन्या ह्यांची संतती केवळ शूद्र संततीपेक्षा अधिक श्रेष्ठ असली पाहिजे. मात्र येथे ब्राह्मण, शूद्र इत्यादी जातींचा दर्जा ठरवावयाचा तो केवळ गुणधर्माप्रमाणेच ठरविला पाहिजे. ह्या दृष्टीने पाहता, आज अंत्यज मानिलेले सर्व लोक वर सांगितल्याप्रमाणे जर खरोखरच शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्रिया यांच्या संबंधापासून उत्पन्न झालेले असते आणि त्यांना आजपर्यंत असली जबर शिक्षा भोगावी लागली नसती, तर त्यांची स्थिती आजच्या केवळ शूद्रांपेक्षा खात्रीने उच्च दिसू आली असती.
मद्रासेकडील कर्नल आलकाटच्या पारिया शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेतील इतरांच्या मानाने दिसून येणारी प्रगती आणि वऱ्हाड व मध्यप्रांतातील रेल्वेची कंत्राटे वगैरे घेऊन, पुढे सरसावलेल्या काही महार मंडळीची अलीकडे झालेली सुस्थिती, ह्या गोष्टी लक्षात घेता असे दिसून येते की, ह्या तिरस्कृत वर्गांना योग्य रीतीने थोडीशी सवलत किंवा मदत मिळाली असता त्यांच्या अंगी बराच काळ दबून गेलेले चांगले गुण लवकर विकास पावू लागतात, पण तसा सुयोग फारच विरळा. एकंदरीत ह्या विस्तीर्ण देशातील ह्या हतभागी लोकांची अवाढव्य संख्या लक्षात घेतली असता, ह्यांची स्थिती सर्व बाजूंनी केवळ शूद्रांपेक्षा अत्यंत हीन झाली आहे, हे उघड होते.
ह्यावरून दोन प्रकारची अनुमाने निघतात. एक असे की, सांप्रत अस्पृश्य असलेल्या लोकांच्या सर्वच पूर्वजांनी काही वरील प्रतिलोमसंकराचा गुन्हा केलेला नसावा. ह्यांच्यांतील बरेच लोक - विशेषतः दक्षिणेकडील जाती - केवळ एतद्देशीय अर्धवट रानटी अनार्य लोक असावे आणि त्यांचा वरील कोणत्याही श्रेष्ठ वर्णाशी कसलाही शरीरसंबंध झालेला नसावा आणि ज्या अर्थी भिल्ल, गोंड, वडारी इत्यादी जाती अद्यापि जरी रानटी स्थितीत असूनही त्यांच्या अस्पृश्य समजण्यात येत नाही, त्या अर्थी, ह्यांच्यांतील पुष्कळांना ही धर्मशास्त्राची शिक्षा लागू पडत नसावी. दुसरे अनुमान असे की, ज्यांच्या पूर्वजांनी हा गुन्हा केला असेल, त्यांना आजपर्यंत झालेली ही अस्पृश्यत्वाची शिक्षा वाजवीपेक्षा अत्यंत कठोर झाली आहे. त्यांची स्थिती केवळ शूद्रांच्यापेखा स्वभावतः बरी असावी, ती तशी नसून उलट इतकी हीन झाल्यामुळे नुसते त्यांचेच नव्हे तर राष्ट्राचेही जबर नुकसान झाले आहे.
शिक्षेचा सूड
आर्य-अनार्यांचा विरोध उत्तर हिंदुस्थानापेक्षा दक्षिणेतच जास्त दिसून येतो. त्यात कर्नाटकाच्या खाली दक्षिणेस जसजसे जावे, तसतसे तर हा स्पृश्यास्पृश्यविधी अधिक तीव्र होत जातो. रंग, चेहरा, चालीरीती वगैरेवरून पाहता कर्नाटकातील व्हलिया (महार), मादिग (मांग), इत्यादी त्या जाती आहेत; त्यांचा वरच्या जातींशी फारच कमी संकर झालेला असावा असे दिसते. हे आपल्याला मूळचे एतद्देशीय समजतात. ह्यांना जंबू असेही नाव आहे. ह्यांचा मूळ पुरुष जंबू नावाचा होता. पूर्वी पृथ्वीचा हा भाग दलदलीचा आणि डळमळीत होतो. तो* जंबूने आपल्या मुलास जिवंत पुरून स्थिर केला अशी ह्या लोकांमध्ये दंतकथा आहे. ह्या दंतकथेत जरी विशेष तथ्य नसले तरी आर्य लोकांनी ह्यांच्यापासून जमीन हिसकावून घेऊन तिला पुढे जंबुद्वीप हे नाव दिले असावे, हे काही अंशी संभवते. ह्या लोकांचा आर्यांच्या तीन वर्णांशी जरी फार क्वचितच संकर झालेला दिसतो, तरी जेव्हा जेव्हा तो झाला तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम फारच भयंकर झाला असावा, हे खालील आख्यायिकेवरून दिसून येते.
ह्या व्हलिया जातीत* पोतराज (रेडयाचे राजे) ह्या नावाची एक शाखा आहे. कर्नाटकातील बहुतेक लहान मोठया गावांत जेव्हा पटकी वगैरे भयंकर व्याधीच्या शमनार्थ द्यामव्वाची (दुर्गादेवीची) जत्रा गावकऱ्यांकडून करण्यात येते; तेव्हा ते पोतराज - मुख्य हक्कदार - जत्रेतले अध्वर्यूच असतात. जत्रेत पुष्कळ रेडयांचा वध होत असतो, त्यांतील मुख्य रेडयाचे शिर डोक्यावर घेऊन ह्या पोतराजास गावपंचांस बरोबर घेऊन नगरप्रदक्षिणा करावयाची असते. ह्या पोतराजाच्या उत्पत्तीसंबंधी अशी एक चमत्कारिक दंतकथा आहे की, याच्या मूळ पुरुषाने आपण ब्राह्मण आहोत असे भासवून द्यामव्वा नावाच्या एका ब्राह्मणीशी विवाह केला. पुढे जेव्हा तिला पोतराजाची हीन जात कळून आली, तेव्हा तो भिऊन रेडयाचे रूप घेऊन पळाला. द्यामव्वाने आपल्या घरास आग लावून पोतराजाचा पाठलाग केला व त्याचा वध केला.
इ.स. १९०८ च्या सुमारास अस्पृश्यतेसंबंधी मी माझा मराठीतील पहिला विस्तृत निबंध लिहिला. तो 'बहिष्कृत भारत' ह्या मथळयाखाली इ.स. १९०८ च्या डिसेंबर महिन्याच्या 'मनोरंजन' मासिकात सचित्र प्रसिध्द झाला. तोच पुढे श्रीमंत गायकवाड महाराजांच्या आज्ञेने पुस्तकरूपाने प्रसिध्द झाला. ह्यापूर्वी इ.स. १९०४ सालापासून ह्याच विषयावरील माझे इंग्रजीतील लेख, आकडे व इतर प्रमाणांसह, 'टाइम्स ऑफ इंडिया', 'सोशल रिफॉर्मर' वगैरे पत्रांतून प्रसिध्द होत होते. अस्पृश्यतानिवारणासाठी आमच्या देशांत गेल्या शतकापासून कोणते व कसे प्रयत्न झाले ह्याचा समग्र पण संक्षिप्त इतिहास मी इ.स. १९२३ साली लिहिला, तो मराठी 'ज्ञानकोशा'त प्रसिध्द झाला आहे. तथापि, अस्पृश्यतेची उत्पत्ती, विकास आणि ती घालविण्याचा पध्दतशीर उपाय ह्या विषयावर समाजशास्त्राच्या दृष्टीने सोपपत्तिक विचार अद्यापि झाला नाही. निदान तो कोणी केलेला माझे तरी आढळात नाही.
हिंदुस्थान सरकारने खानेसुमारीचा अहवाल, डिस्ट्रिक्ट आणि इंपीरियल गॅझेटिअर्स, एथ्नॉग्राफिक सर्व्हे इ. ग्रंथावली सुरू केल्यापासून, काही प्रसिध्द पाश्चात्य समाजशास्त्रांचे लक्ष भारतीय वर्णव्यवस्थेकडे लागले आहे. इबेट्सन, सिनार्ट, नेसफील्ड, रिस्ले, रस्सल इ. शोधकांनी जातिभेदाची मीमांसा करताना ओघाने 'अस्पृश्यां'विषयी काही प्रासंगिक विचार प्रकट केले आहेत; पण प्रत्यक्ष अस्पृश्यता ही संस्था जगात कशी निर्माण झाली, व तिचा विकास विशेषतः भरतखंडात कोणकोणत्या कारणांनी व टप्प्यांनी घडून आला ह्या चित्तवेधक विषयासंबंधी म्हणण्यासारखी एकादी उपपत्ती कोणी ठरविलेली माझ्या आढळात अद्यापि आलेली नाही. मुंबई विश्वविद्यालयातील तरुण पदवीधरांकडून वेळोवेळी अस्पृश्यता ह्या विषयावर एक पारितोषिक निबंध मागविण्यात येत असतो. परीक्षणासाठी हे निबंध मजकडे येत असतात. त्यावरून पाहता वृध्दांप्रमाणेच तरुणांनीही ह्या विषयाच्या उपपत्तीकडे आजवर दुर्लक्षच केलेले मला आढळले. रा. सातवळेकरांनी 'स्पर्शास्पर्श' नावाचे एक सुंदर पुस्तक संस्कृतातील उतारे देऊन प्रसिध्द केले आहे. काही विद्वान ख्रिस्ती मिशनऱ्यांनी विवक्षित 'अस्पृश्य' जातींची स्थिती प्रत्यक्ष निरीक्षण करून निःपक्षपाताने प्रसिध्द केली आहे. तथापि, अशा त्रुटित ग्रंथांतूनही एखादी ऐतिहासिक उपपत्ती ठरविण्याचा नुसता प्रयत्नही झालेला दिसत नाही. एकंदरीत, नव्या, जुन्या, तरुण, वृध्द, स्वकीय, परकीय इ. कोणत्याही विद्वानांच्या डोळयांवर हा विषय शास्त्रीय दृष्टीने अद्यापि यावयाचाच आहे. व्यावहारिक गोंधळ मात्र बराच गाजत आहे. त्यात सरकारचा डफ, काँग्रेसचे तुणतुणे, हिंदु-मुसलमानांचा नाच आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतरांच्या टाळया, ह्यांचा एकच कल्लोळ माजला आहे. ह्या गोंधळाचा प्रस्तुत प्रयत्नांशी मात्र कसलाही संबंध पोचत नाही, हे टीकाकारांनी कृपा करून ध्यानात राखावे. हा प्रयत्न केवळ शास्त्रीय दृष्टीने व निर्विकार मनाने करण्यात आला आहे. वाचकांनीही केवळ त्याच प्रकाराने त्याचा स्वीकार करावा.
मजकूर लिहिण्याच्या कामी वगैरे माझे परलोकवासी मित्र कृष्णराव गोविंदराव पाताडे ह्यांची फार मदत झाली. पण हा प्रथम भाग प्रसिध्द झालेला पाहण्यासाठी ते जगले नाहीत; ह्याबद्दल मला फार खेद होत आहे. ह्या ग्रंथाचा बराच भाग माझेजवळ बरेच दिवस लिहून पडला होता. तो प्रसिध्द करण्याचे श्रेय नवभारत ग्रंथमालाकारांनी स्तुत्य चिकाटी दाखवून आपल्याकडे घेतले, हे जाहीर करणे माझे कर्तव्य आहे. या विषयाचे माझे अध्ययन अद्याप चालूच आहे. अद्यापि पुढील दोन खंड दुसऱ्या पुस्तकाच्या रूपाने लिहावयाचे आहेत.
श्रीमंत सर सयाजीराव महाराज गायकवाड ह्यांनी हा अल्पग्रंथ त्यांना अर्पण करण्याची परवानगी दिली, याबद्दल मी त्यांचा फार ॠणी आहे.
विठ्ठल रामजी शिंदे
गुरुवार, २० जुलै इ.स. १९३३
अहल्याश्रम, नानाची पेठ,
पुणे शहर.
'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळा'ची स्थापना झाल्यावर मला आपल्या ब्राह्म समाजाच्या सफरीवर बंगाल्यात सन १९०८ चे सुमारास एकदा जावे लागले. अर्थात मला तेथे ठिकठिकाणी 'अस्पृश्यांच्या' आपत्तीबद्दल व्याख्याने द्यावी लागली. तेथील ब्राह्मसमाजातील काही सभासदांनी लगेच इकडील आपल्या मिशनच्या धर्तीवर तिकडे शाळा काढल्या. प्रथम प्रथम ह्या कामाचा आमच्या मिशनशी संबंध होता. पण तिकडील कार्याचा अंतर्भाव लवकरच ब्राह्मसमाजाच्या इतर सामाजिक कामात करावा लागला; त्यामुळे आमच्या ह्या अखिल भारतीय मंडळाशी त्या कामाचा दप्तरी संबंध आम्हाला तोडावा लागला. तरी पण मी जेव्हा जेव्हा बंगाल्यात जाई, तेव्हा तेव्हा ते काम मुद्दाम पाहून येई. इ.स. १९२३ साली मी बंगाल्यात गेल्यावेळी जेसोर आणि खुलना जिल्ह्यांतील आमच्या काही हायस्कुलांत राहून ती नीट तपासून आलो होतो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात साधारण ब्राह्मसमाजाने, 'ब्राह्मसमाज हिंदुस्थानात स्थापन होऊन शंभर वर्षे पूर्ण झाली' म्हणून बंगाल्यात, विशेषतः कलकत्त्यात, एक अपूर्व महोत्सव केला. त्या निमित्ताने पूर्व आणि उत्तर बंगाल्यात एक मोठे प्रचारक दळ काढण्यात आले होते. ते काम मजकडे आले म्हणून मी विशेषतः ज्या खेडयांतून 'नामशूद्र' नावाच्या अस्पृश्यवर्गाच्या शाळा व इतर प्रागतिक कामे चालली होती तेथे हे दळ नेले. त्या वेळी आज सुमारे वीस वर्षे चाललेल्या ह्या शिक्षणविषयक कामाची प्रगती झाली आहे, हे मला प्रत्यक्ष पहावयास मिळाले.
----------------------
* म. शिंदे यांच्या कागदपत्रातील हस्तलिखित लेख
----------------------
मुंबईकडील आणि बंगालकडील कामात हा एक विशेष फरक आहे की, मुंबईकडे आमची सर्व कामे ह्या मिशनकडूनच प्रत्यक्ष होतात. पुणे शाखेतच मात्र कमिटीत व प्रत्यक्ष काम करणाऱ्यांत 'अस्पृश्य' वर्गाच्या सभासदांची बहुसंख्या आहे. अलीकडे तर त्यांचीच सत्ताही चालू आहे. तरी अद्यापि इकडील मिशनमध्ये प्रत्यक्ष 'अस्पृश्य' वर्गांच्या होतकरू पुढाऱ्यांनी म्हणण्यासारखे लक्ष पोचविलेले किंवा अंग मोडून काम करीत असल्याचे दिसत नाही. बंगाल्यात उलटा प्रकार ओढळतो. पूर्वीपासूनच तिकडील सर्व शाळा (आणि इतर कामेही) 'अस्पृश्य' वर्गांनीच काढल्या व चालविल्या आणि ब्राह्मसमाजाने त्यांना तसे करण्यास प्रेरणा व साह्य केले. ह्या फरकाचे कारण हेच की, तिकडील नामशूद्रांची स्थिती इकडील मांगांहून पूर्वीपासूनच पुष्कळच उच्च दर्जाची होती. डोम, पोड, होर वगैरे इतर खरोखरीच अवनत वर्गांची स्थिती नामशूद्रांपेक्षाच नव्हे; तर आमच्या महार-मांगांहून अद्यापि कितीतरी अधिक खालावलेली आहे. दक्षिण हिंदुस्थानात बिल्लव, तिय्या, एजवा नावाच्या अस्पृश्यांची स्थिती ज्याप्रमाणे इतर 'अस्पृश्यांहून' पुष्कळ सुधारलेली आहे, त्याचप्रमाणे बंगालच्या नामशूद्रांचा प्रकार आहे. दक्षिणत बिल्लव, तिय्या, परय्या चिरुमा, वगैरेंना जसे अद्यापि शिंवून घेत नाहीत व इतर वरिष्ठ वर्गाप्रमाणेच ह्या गरिबांना निर्दयपणानेच वागवितात, त्याचप्रमाणे नामशूद्रही हा भेद पाळतात. फार काय, आम्ही मुंबई इलाख्यात जेव्हा प्रथम कामाला सुरुवात केली, तेव्हा चांभार, ढोर, वगैरेंनी स्वतः वरिष्ठ समजून आमच्या मिशनचा फायदा घेण्यास बरेच आढेवेढे घेतले. बहुतेक महारच शाळांतून व बोर्डिंगातून येत. आणि तेही मांग, भंगी ह्यांच्याशी समानतेने वागण्यास कां कू करीत. अजून तरी मिशनकडे सर्व 'अस्पृश्यांचे' पूर्ण लक्ष न लागण्याच्या अनेक कारणांपैकी ह्या अस्पृश्यवर्गातील आपसांतील जातिभेदच एक मुख्य कारण आहे, हे मिशनबाहेर राहून नीट ध्यानात धरणे शक्य नाही. असो. हा प्रांतिक जातिभेदाचा फरक कसाही असो, बंगाल्यात, विशेषतः पूर्व बंगाल्यात, आज नामशूद्रांच्या उच्च शिक्षणाची जी झपाटयाने प्रगती चालली आहे, त्याची दुसरी कारणे म्हणजे बंगाल प्रांताचे शिक्षणखाते व कलकत्ता युनिव्हर्सिटीचे लोकसत्तावादी धोरण ही दोन मुख्य होत. शिक्षणाच्या दृष्टीने, मग ते प्राथमिक असो वा उच्च असो, बंगाल आणि मद्रास हे दोन्ही प्रांत मुंबईच्या कितीतरी पुढे आहेत. त्यातल्या त्यात मुंबई युनिव्हर्सिटी ही स्त्री-शूद्रांच्या बाबतीत तरी फार ओढग्रस्त आणि मागासलेली आहे. उच्च शिक्षण महाग आणि दुर्मिळ करण्यात तिचा हातखंडा ! अस्पृश्यांना व स्त्रियांनाच काय पण जंगली जाती, गुन्हेगारी जाती, किंबहुना आंधळे, बहिरे, मुके ह्यांनाही ब्राह्मणादी कुशाग्र बुध्दीच्या पुरुषांबरोबर एकाच जात्यात भरडण्याची ह्या युनिव्हर्सिटीला खोड लागली आहे. ती जाईपर्यंत 'अस्पृश्यांची' निराळी हायस्कुले इकडे निघणे शक्य नाही. मद्रासमध्ये स्त्रियांकरिता वेगळी कॉलेजे आहेत. काही तर स्त्रियांनीच चालविली आहेत. मद्रासकडे पडदा नाही, तसेच बंगाल्यात जातिभेद तीव्र नाही. पूर्वी बौध्द धर्म आणि आता वैष्णव व अलीकडे ब्राह्मसमाजाचा जोराचा परिणाम तेथे झाला असल्यामुळे दक्षिणेकडील भयानक अस्पृश्यतेच्या गोष्टी बंगाल्यातील नामशूद्रांनाही अरेबिअन नाईट्सप्रमाणे सहज विश्वासार्ह वाटत नाहीत. अशा अनेक कारणांमुळे, विशेषतः पूर्व बंगाल्यातील नामशूद्रांनी, आता शिक्षणातच नव्हे तर इतर बाबतींतही आपले पाऊल सारखे पुढे चालविले आहे. तशात नामशूद्र हाच तिकडील कुणबी वर्ग. मुसलमानांच्या पूर्वी आणि मुसलमान रियासतीतही त्यांची लष्करात फार भरती होत असे. आताही हिंदु-मुसलमानांच्या मारामारीत नेभळे आणि चळवळे हे दोन्ही प्रकारचे बंगाली नामशूद्रांनाच शरण येतात. मुसलमान तर ह्यांच्या कधीच वाटेला जात नाहीत. हे नामशूद्र थोडयाच शतकांपूर्वी बौध्द क्षत्रिय होते. ही सर्व पूर्वपीठिका आठविल्यास खालील कोष्टकातील आकडे पाहून आश्चर्य वाटण्याचे कारण उरणार नाही.
पूर्व बंगाल्यातील नामशूद्रांचे उच्च शिक्षण (हायस्कूल)(PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
ह्या आकडयांत मुलींची संख्या दिलेली नाही. शिवाय सचीदाहा शाळेत फ्री बोर्डिंग ४० मुलांचे आहे. तसे सर्वत्र नसले तरी ह्या सर्व खेडयांतून जेवण-राहण्याची सोय जवळच असते. ह्या तेरा हायस्कुलांची माहिती केवळ पूर्व बंगाल्यातील चार जिल्ह्यांतील आहे. ह्याहून अधिक शाळा व मिडल स्कूल्स कितीतरी आहेत. ही सर्व निव्वळ नामशूद्रांनी आपल्या हिमतीवरच चालविली आहेत ! पैकी चार ठिकाणी तर मी स्वतः जाऊन राहिलो आहे. अर्थात यांना आमच्याकडे 'हायस्कुले' म्हणजे उंच शाळा कोणीच म्हणणार नाही. वावरातून पत्र्यांची एक पडळ बांधली आणि सुमारे शंभर मुले जमविली की झाली हायस्कुलची तयारी ! ३० पासून ६०-७० पर्यंत पगारावर ८-१० मास्तर स्वजातीयातून सहज मिळतात. त्यांत तीन-चार तरी ग्रॅज्युएट असतातच. एल.एल.बी.चा अभ्यास करणारा एखादा पोक्त अनुभवी हेडमास्तर होतो. ५-१० खेडयांतून आसपासची अर्धवट इंग्रजी शिकलेली मुले जमतात. कोणी जागा, कोणी पत्रा, कोणी लाकडे, कोणी ढेकळे देऊन कमिटीचे सभासद होतात. सल्लामसलत, पैशांची जुजबी मदत आणि देखरेख करण्यास ब्राह्मसमाज तयार आहेत. मॅट्रिकची परीक्षा पास झाली की, त्याला प्रवेश द्यावा; ह्यापेक्षा युनिव्हर्सिटी अगर विद्याखाते उगीच त्यांच्या मागे काही भगभग लावीत नाही. आमचेकडे हायस्कूल म्हटले की, निदान एक लाखाची काळया दगडांची उंच इमारत पाहिजेच. अर्थात हेडमास्तरने क्लासात तरी बूट, पाटलोण आणि झिळमिळयांच्या कोकींचे प्रदर्शन केलेच पाहिजे. ह्या बहिरंगाप्रमाणेच शिक्षणाचा आतील साज सजवावा लागतो. अलीकडे तर अमुक एवढी लॅबोरेटरी आणि तमुक तेवढी लायब्ररी दाखविल्याशिवाय युनिव्हर्सिटीकडून हायस्कूललाच प्रवेश मिळत नाही; मग विद्यार्थ्यांना कोण पुसतो ? विद्यार्थ्यांसाठी विद्यालय नसून विद्यालयासाठीच जेथे विद्यार्थी जमतात, तेथे विद्यालयांची इज्जत आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची ऐपत ह्यांमध्ये कोणताच ऐहिक संबंध नसल्यास काय नवल !
निव्वळ शिक्षणाच्या खोल दृष्टीनेच पाहू गेल्यास बंगाल्यातील अशा हायस्कुलांतील शिक्षण फार कमी दर्जाचे दिसते, हे मला कबूल केले पाहिजे. पण एक लाखांच्या उंच इमारतीतले शिक्षण ह्या एक हजार रुपयांच्या झोपडीपेक्षा शंभरपटीने अधिक असेही खास नाही. शिक्षणाचा उपकरणांशी संबंध नाही आणि शिक्षकांच्या दर्जाशी आणि त्यांच्यात व शिष्यांत जी सहानुभूती असणार तिच्याशी अलबत जास्त. ही दुसरी मिळकत म्हणजे सहानुभूती मला ह्या शाळांतून विपुल दिसली. आमच्या इकडच्या हायस्कुलाच्या राजमहालात एखादे नोकरवाडीतले पोरगे गेले तर पहिल्या दिवशी ते भेदरून जाते. टिकून राहिलेच तर सहामाही परीक्षेच्या कोऱ्या कागदांचाही खर्च त्याला न झेपल्यामुळे त्याला हा नाद सोडावा लागतो. हे शिष्य-शिक्षक नाते कमी सांगावे, तितके अधिक बरे.
वीस वर्षांतील ही प्रगती पाहून मला सर्व बाजूंनी समाधानच झाले, असे म्हणवत नाही. तरी संख्येच्या व इतर दर्शनी बाजूंनी नामशूद्र ग्रॅज्युएट सामान्य बंगाली ग्रॅज्युएटसारखाच दिसतो, हे खरे. असे शे-दोनशे तरी ग्रॅज्युएट आमच्या इकडे मराठयां आढळतात. तसेच तिकडे नामशूद्रांत आढळतात. पण आमच्या इकडे शिवाजी मराठा हायस्कूल हे एकच एक साऱ्या इलाख्यात मराठयांनी चालविलेले तर तिकडे चारच जिल्ह्यांत १३ हायस्कुले मला दिसली. आमच्या ह्या हायस्कुलात सर्व शिक्षक मराठे नाहीत. ते कधी मिळतील ते सांगवत नाही. पण तिकडील शाळेत बहुतेक सर्व नामशूद्र !! एकंदरीत इकडील मराठयांपेक्षा उच्च शिक्षणात तिकडील नामशूद्रांची स्थिती बरी म्हणविते आणि ही सर्व धाव गेल्या वीस वर्षांत त्यांनी मारली, हे विशेष !