परिषद फंडाकरिता मदत देणा-यांची नावे

भा. नि. साहाय्यकारी मंडळीची महाराष्ट्रीय परिषद

परिषद-फंडाकरिता मदत देणाऱ्यांची नावे 

तक्ता (तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

जमाखर्चाचा तक्ता (तक्ता क्र. १ पहा)

परिषदेला आलेल्या पाहुण्यांची यादी (तक्ता क्र. १ पहा)

तक्ता क्र. १

भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीच्या महाराष्ट्र परिषदेस आलेल्या पाहुण्यांची जिल्हावार, स्थळवार व जातावार यादी  (तक्ता क्र. २ पहा)       
 

तक्ता क्र. २
भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीच्या महाराष्ट्रीय परिषदेचे हेतू वगैरे

हेतू

महाराष्ट्रीय निराश्रितवर्गाच्या उन्नतीसंबंधी व्यावहारिक विषयांची त्यांच्या हितचिंतकांमध्ये व्यवस्थित रीतीने चर्चा व्हावी, वरील मंडळीने याच दिशेने चालविलेल्या कार्याची इतर शिक्षणविषयक व परोपकारी संस्थांच्या चालकांना माहिती मिळून, त्यांच्याशी मंडळीने सहकार्य साधावे व सर्वसाधारण लोकसमुहामध्ये या कार्याविषयी सहानुभूती वाढवावी या हेतूने वरील मंडळीच्या विद्यमाने ही परिषद ऑक्टोबर तारीख ५६७ शनिवार, रविवार व सोमवार या तिन्ही दिवशी भरविण्यात आली.

चर्चेचे विषय
१.  मंडळीला वाहिलेल्या माणसांची जरुरी.
२.  येथील शाखेसाठी बोर्डिंगची आवश्यकता.
३.  निराश्रितवर्गाच्या औद्योगिक शिक्षणाची दिशा.
४.  निराश्रितवर्गाच्या विशेष अडचणी.
५.  निराश्रितवर्गाच्या वाङमयात्मक शिक्षणाची दिशा.
६.  मुंबई व पुणे येथे मंडळीच्या स्वतःच्या इमारतीची आवश्यकता.
७.  म्युनिसिपालिटया, खासगी शिक्षणविषयक संस्था आणि परोपकारी संस्था यांच्याशी मंडळीचे सहकार्य.
८.  सरकारी विद्याखाते व देशी संस्थानिक यांच्याशी शिक्षणविषयक बाबतीत मंडळीचे सहकार्य.
९.  आध्यात्मिक व सामाजिक बाबतीत निरनिराळया धर्मपंथातील अनुयायांशी मंडळीचे सहकार्य.

वरील सर्व विषयांवर चर्चा शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी फर्ग्युसन कॉलेजच्या ऍंफिथिएटरमध्ये डॉ. सर भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  सोमवार तारीख ७ रोजी मंडळीच्या लष्करातील शाळेत श्रीमती रमाबाईसाहेब रानडे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ वर्गांतील हितचिंतक भगिनी व निराश्रित भगिनी यांची सभा भरून परिषदेचे काम संपले.

वरील दोन्ही प्रसंगी पुरुषवर्गाप्रमाणेच स्त्रीवर्गाकडून मंडळीच्या कार्याला सहानुभूती दाखविण्यात आली आहे, ही गोष्ट मंडळीच्या इतिहासात संस्मरणीय होऊन राहील.

परिषद स्वागत कमिटीचे सभासद  :  डॉ. हॅरोल्ड एच. मॅन  (अध्यक्ष), श्रीयुत वामन अच्युत देसाई, श्रीयुत प्रो. केशव रामचंद्र कानिटकर, श्री. प्रो. गोविंद चिमणाजी भाटे, श्री. प्रो. दत्तात्रय लक्ष्मण सहस्त्रबुध्दे, श्री. वासुदेव गोपाळ भातखंडे, श्री. जी. एन. सहस्त्रबुध्दे, श्री. एल. एम. सत्तूर, श्री. सीताराम यादवराव जव्हेरे, श्री. माधवराव हणमंतराव घोरपडे, श्री. ए. के. मुदलियार.

स्थानिक निराश्रितवर्गाचे प्रतिनिधी  :   श्री. शिराम जानबा कांबळे, श्री. श्रीपत रामजी थोरात, श्री. रखमाजी शिवराम कांबळे, अनंता अमृता भादेकर, दगडू, बाबाजी माने, श्री. येसू खंडूजी कांबळे, विश्वनाथ विष्णु सावळे, श्री. नथू रामजी चव्हाण, श्री. मारुती लक्ष्मण जाधव, श्री. नूरासिंग पिरू मेहतर, श्री. वजीर मन्नू.

सेक्रेटरी  :  श्री. वि. रा. शिंदे आणि श्री. दा. ना. पटवर्धन.

स्वयंसेवक मंडळी  :  श्री. व्ही. आर. मुदलियार, श्री. ए. एच. ढवळे, श्री. रा. ना. राजाज्ञा, ऍग्रिकल्चर कॉलेजमधील स्टुडंट्स मेसर्स बसानी, जडेज्या, भाटरकर, बेंडिगिरी, खोले, आगाशे, साने, सुळे, तानवडे, भांबुरा आणि मिठुजी.

शेवटी विनंती

परिषदेचे हेतू तडीस नेण्याकरिता परिषदकमिटीने शक्य तितकी खटपट केलेली आहे.  परिषदेत ज्या विषयासंबंधी एकमत दिसून आले त्या प्रकारच्या कामात तरी समाजाकडून मंडळीला मदत मिळावी व मंडळीने दर्शविलेल्या मार्गांनी इतर संस्थांनी, मंडळीशी सहकार्य साधावे आणि मंडळीच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढून, मंडळीच्या या परिषदेत चर्चा झालेल्या विषयांच्या संबंधात महाराष्ट्राने मंडळीला वाढत्या प्रमाणात मदत केलेली आहे अशी स्थिती मंडळीच्या पुढील परिषदेच्या वेळी दिसून यावी, एवढीच परिषद कमिटीची सर्वांस विनंती आहे.

भा. नि. सा. मंडळीच्या महाराष्ट्र परिषदेत वाचावयास आलेल्या निबंधांचा त्रोटक सारांश

(परिषदेत वाचावयाकरिता पुष्कळ गृहस्थांचे निबंध आले होते.  पण परिषदेत वेळेच्या अभावामुळे निबंध वाचावयास सवड झाली नाही व कित्येक वक्तयांनाही बोलावयास सापडले नाही.  मुंबईचे रा. संतूजी वाघमारे, नगरचे कै. वा. रा. डांगळे वगैरेंसारख्या सुशिक्षित अस्पृश्य बंधूंना बोलावयास अवसर द्यावयास सापडला नाही, याबद्दल आम्ही फार दिलगीर आहेत.  याबद्दल वरील बंधू राग मानणार नाहीत, अशी आशा आहे.  सेक्रेटरी प.क.)
खेडेगावांतील शाळांत निराश्रित मुलांना घेत नाहीत ही अडचण कशी दूर व्हावी  ?
(लेखक  :  राजाराम नारायण राजाज्ञे, स्कूलपंच मु. ऐतवडे, जि. सातारा)

१.  स्कूलपंचांची निवडणुक  :   दरसाल शाळेची व्यवस्था पाहणारे स्कूलपंच निवडताना शाळेत अस्पृश्य मुलांना घ्यावयास काही हरकत नाही अशा मताचे पंच निवडावे व पंचांची पुन्हा निवडणूक करतेवेळी इतर गोष्टींबरोबर त्यांनी अस्पृश्य मुलांना शाळेत घेण्याच्या बाबतीत काय केले, याचाही विचार व्हावा.  गावातील सर्व जातींच्या लोकसंख्येच्या मानाने त्यांचे प्रतिनिधीही स्कूलपंचांत असावेत.

२.  नवीन शाळा देताना त्या शाळेत अस्पृश्य मुलांना घेण्यास आमची काही हरकत नाही अशी गावकऱ्यांची लेखी कबुली घ्यावी व याविरुद्ध कोणाचे वर्तन जाहल्यास त्या गावातील शाळा उठवावी किंवा अस्पृश्यांकरिता मुलांच्या संख्येकडे न पाहता निराळी शाळा द्यावी व त्याचा खर्च लोकलबोर्डातर्फे किंवा गावकऱ्यांपासून घ्यावा.

३.  स्कूलपंचांचे काम नीट होते की नाही, या बाबतीत सरकारी कामगारांनी शाळेची स्थिती व गावातील इतर जातीच्या लोकमताबरोबर निराश्रितांचे लोकमत याचा विचार करून योग्य वेळी किंवा जरूर वाटल्यास मध्यंतरीही स्कूलपंचांची पुन्हा निवडणूक करून घ्यावी.
खेडेगावांतील महार बलुतेदारांच्या अडचणी

१.  महार बलुतेदारांना सरकारने इनाम जमिनी दिलेल्या आहेत.  पण त्याबद्दल त्यांना सरकारचावडीवरील काम करावे लागते.

२.  पूर्वीच्या इनामी पद्धतीवरून पाहता त्यांच्या कामाच्या आकाराइतका साऱ्याचा आकार माफ करून महारांना इनाम जमिनी दिल्या असाव्यात.  पण आता त्यांना ज्या जमिनी इनाम आहेत, त्यांच्या साऱ्यांच्या आकारापेक्षा त्यांच्या कामाच्या मुशाहिऱ्याची रक्कम पुष्कळ जास्त दिसून येते.

३.  पूर्वी पाटील-कुळकर्ण्यांनाही अशा इनाम जमिनी व बैते बलुते वगैरे देऊन त्यांजपासून काम करून घेतले जात असे.  पण आता सरकारने त्यांच्या जमिनी त्यांस इनाम देऊन त्यांच्या कामाच्या मानाने त्यांस नक्त नेमणूक करून दिली आहे व या नेमणुकीत वाढ होण्यासंबंधी सरकारी कायदेकौन्सिलात प्रश्न विचारले जात आहेत.

४.  महारांना बलुते मिळते ते गावकऱ्यांच्या नोकरीबद्दल, परीट, न्हावी वगैरेंना मिळते; त्याप्रमाणे मिळते व जमिनीचा सारा माफ आहे तो सरकारी नोकरीबद्दल आहे.  हा माफ असलेला सारा सरकारी नोकरीबद्दल मिळू शकणाऱ्या मुशाहिऱ्यापेक्षा पुष्कळ कमी आहे ही गोष्ट शिक्षण नसल्याने बिचाऱ्या महारांना कळत नाही, व कळली तरी आपण तक्रार केल्यास आपल्या इनाम जमिनी जातील अशी त्यांस भीती वाटते.

५.  तरी दयाळू सरकारांनी त्यांच्या इनाम जमिनी पाटील-कुळकर्ण्यांप्रमाणे त्यांनी आजपर्यंत इमानेइतबारे अल्प मुशाहिऱ्यावर केलेल्या नोकरीबद्दल, त्यांस तशाच पुढे इनाम चालू ठेवाव्या व त्यांस पडणाऱ्या सरकारी कामाबद्दल त्यांस अल्प मुशाहिरा नेमून द्यावा व अशा रीतीने कामाच्या मानाने कमी तैनात मिळत राहू नये.

६.  या बाबतीत ठिकठिकाणच्या सुशिक्षित व समंजस निराश्रितांनी व इतर सुशिक्षित वरिष्ठ जातींच्या देशबंधूंनी पुढे येऊन या अडचणींची माहिती आमच्या अज्ञानी महारांस करून द्यावी.  नामदार सभासदांनी व पुढारी वर्तमानपत्रांनी ही गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून व हिंदी साम्राज्याच्या एका अज्ञानी व दरिद्री भागाला जास्त दोन घास मिळवून दिल्याचे श्रेय द्यावे अशी त्यास विनंती आहे.

अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीचे कार्य संघटित व सुव्यवस्थित कसे होईल ?

(लेखक  :  या. शं. वावीकर, मेकॅनिकल इंजिनिअर, मुंबई.)

१.  नि. सा. मं. चे काम सुव्यवस्थित चालण्याकरिता त्याच कामास वाहिलेले, कळकळीने झटणारे लोक पाहिजेत.  मिशनरी मंडळीप्रमाणे स्वार्थत्यागपूर्वक या कामास लागले पाहिजे.  गावोगाव हिंडून, व्याख्याने देऊन, जागृती उत्पन्न करून, फंड जमा करून, सहकार्य करणारी मंडळी मिळवून ठिकठिकाणी काम सुरू केले पाहिजे.

२.  ब्रिटिश मुलुखात व देशी संस्थानांत काम करण्याची पद्धती एकच असणार नाही.  ठिकठिकाणच्या परिस्थितीच्या मानाने ध्येयाकडे लक्ष देऊन भिन्न साधने योजली तरी हरकत नाही.

३.  या अस्पृश्य लोकांची राहण्याची घरे, दिवाबत्ती, रस्ते, पिण्याचे पाणी वगैरे बाबतीत स्वच्छता राखण्यास त्यास उपदेश करून त्यांचे रस्ते, पाणी वगैरे बाबतीत सुधारणा करण्यासाठी त्या गोष्टी म्युनिसिपालिटया व सरकार यांच्या नजरेस आणाव्या.

४.  नि. सा. मं. ची एक मुख्य मध्यवर्ती महासभा असून त्या सभेच्या नियंत्रणाखाली इतर शाखा चालल्या पाहिजेत व या सभेचे एक मासिक अगर त्रैमासिक असावे.

५.  स्पर्शास्पर्शाच्या बाबतीत व्याख्यानांच्या द्वारे लोकमत तयार करून लोकांच्याकडून सहानुभूतिपूर्वक या प्रश्नाचा विचार होईल असे केले पाहिजे.  सरकारी कायद्याच्या सक्तीने हे व्हावयाचे नाही.  सर सयाजीराव म्हणतात की, माझ्या कार्यात मला लोकांची सहानुभूतीच पाहिजे.

६.  लोकांनी या वर्गास दूर ठेविले; तसेच हे आपण होऊन दूर राहिले आहेत. म्हणून त्यांनी आत्मस्थिती सुधारण्याचे उपाय योजिले पाहिजेत.  आत्मस्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणे हे मनुष्यमात्राचे आद्य कर्तव्य आहे.  प्रोटेस्टंट लोकांनी चळवळ करून, छळ सोसून आपणावरील जुलूम नाहीसा केला.  इंग्लंडात मजूरवर्गाने संघशक्तीने चळवळ करून आपल्या गरजांकडे प्रधानमंडळांचेही लक्ष वेधून घेतले आहे.  पारशी लोक धर्मप्रीतीने स्वदेश सोडून हिंदुस्थानात येऊन राहिले, पण स्वतःच्या पराक्रमावरच आज ते प्रत्येक बाबतीत पुढारी होऊन बसले आहेत.  ब्राह्मणाचे मुख्य काम अध्ययन व अध्यापन, पण ते ब्राह्मणदेखील आज अनेक इतर धंदे करीत आहेत.  मुसलमान बंधूंनी स्वतःच्या हिमतीवर आपल्या हिताचा प्रश्न लाटसाहेबांच्या कौन्सिलापर्यंत नेऊन भिडविला आहे.  ही उदाहरणे पुढे ठेवून अस्पृश्य बंधूंनीही पुढे येऊन चळवळ सुरू करावी व सर्व प्रकारच्या धंद्यांत आपला प्रवेश करून द्यावा म्हणजे स्पर्शास्पर्शाचा प्रश्न आपोआप सुटेल.

७.  नि. सा. मं. ने या लोकांकरिता  १.  परस्पर साहाय्यकारी मंडळया, २. प्रॅक्टिकल मॅन्युअल ट्रेनिंगचे वर्ग, ३. वीव्हिंग स्कूल्स वगैरेंसारख्या संस्थाही काढाव्या व त्यांना निरनिराळे धंदे शिकवावे.  सुशिक्षितांचा ऑफिसांतून प्रवेश व अशिक्षितांच्या शालागृहांत प्रवेश करवून देण्याच्या बाबतीत नि. सा. मंडळीने खटपट करावी.

अंत्यजोध्दाराच्या कार्यातील अडचणी

(लेखक  :  महंत ज्ञानगिरी गोसावी, उपदेशक, सोनई, सत्यसमाज, जि. अहमदनगर.)

१.  आमच्यातील पुष्कळ शहाणी मंडळी उपदेशांत व व्याख्यानांत ओतप्रोत सहानुभूती दाखवितात पण कृतीत ही उतरत नाही.

२.  कदाचित कोणी उदार मनुष्य बोलल्याप्रमाणे करू लागला तर हिंदू समाजातील वरिष्ठ म्हणविणाऱ्या जातीकडून त्यास छळ, उपाहास, त्रास, कष्ट, दुःखे, शिव्याशाप वगैरेंची लेखी व तोंडी लाखोली मिळते.  व या अडचणी त्याला पदोपदी भंडावून सोडतात.  यामुळे अंत्यजोध्दाराच्या बिकट कामात फार विघ्ने येतात.

३.  माझ्या वरील विधानाची सत्यता पाहावयाची असल्यास सूक्ष्मबुध्दीने खेडयांतील व कित्येक प्रसंगी शहरांतीलसुध्दा स्थितीचे निरीक्षण करावे म्हणजे त्यातील सत्यता प्रत्यक्ष दिसून येईल.

४.  निराश्रितांचे स्पर्शास्पर्शाबद्दल माझे स्वतःचे मत खालील अभंगात दिले आहे :

अस्पृश्य म्हणोनी मानितां जयासी ।  अस्पृश्यता त्यासी केवीं सांगा ॥१॥
तनु मानवाची समान सर्वांची ।  काय अस्पृश्याची खूण आहे ॥२॥
सम हस्त-पाद कर्ण-चक्षु-घ्राण ।  मन-बुध्दि-प्राण सारिखेची ॥३॥
अस्थि-मांस-रक्त-चर्माचे वेष्टण ।  सर्वांसी समान एकरूप ॥४॥
क्षुघातृषानिद्रा शरीराचे धर्म ।  अवघे हे कर्म सारिखेची ॥५॥
क्रोधमत्सरादी षड्रिपु वऱ्हाड ।  समान बिऱ्हाड वासनेचे ॥६॥
सर्व भूतांतरी एकचि श्रीहरी ।  अस्पृश्यां अंतरी कोण दूजा ? ॥७॥
ऐसीया विवेके पाहता मानसी ।  स्पृश्यास्पृश्यतेची थारा नाही ॥८॥
ज्ञानगिरी विश्वी सर्वा बंधू मानी ।  अस्पृश्य त्या कोणी दिसेनाची ॥९॥


मराठी भाषा बोलणाऱ्या चांभारांची स्थिती

(लेखक  :  सी. ना. शिवतरकर, मुंबई रोहिदास हितवर्धक समाजाचे माजी चिटणीस.)

१.  जसे महाराष्ट्रात ब्राह्मणादी उच्च जातींमध्ये पोटभेद आहेत, त्याप्रमाणे अस्पृश्य मानिलेल्या जातींमध्येही पुष्कळ पोटभेद आहेत व या पोटभेदात रोटी व बेटीव्यवहार होऊ शकत नाही.  काहींमध्ये रोटीव्यवहार होतो पण बेटीव्यवहार होत नाही.

२.  मराठी बोलणाऱ्या चांभारांमध्ये देशस्थ व कोकणस्थ असे मुख्य दोन भेद आहेत व हा प्रत्येक पोभेद स्वतःला दुसऱ्यापेक्षा वरिष्ठ म्हणवीत असतो.

३.  देशी चांभार - अर्थात देशावर राहणारे चांभार - यांची वस्तीही देशस्थ ब्राह्मणांप्रमाणे देशावरच आहे.  यांच्यात निव्वळ व्यापार करण्याकडे दृष्टी असल्यामुळे विद्येकडे फार थोडयांची दृष्टी असते.  शहरांतील काही चांभार मंडळी आपली मुले ख्रिश्चन अगर म्युनिसिपल शाळांत घालितात.  पण मुलांच्या शिक्षणाची मजल ३-४ इयत्तांच्या पुढे जात नाही.  लगेच त्याला दुकान सुधारावे लागते.  मुलांच्या शिक्षणाची ही स्थिती, मग मुलींच्या शिक्षणाची गोष्ट काढावयास नको.  माझ्या ऐकण्यात फक्त ४-५ मुली मराठी पाचवीपर्यंत शिकलेल्या आहेत, असे आहे.  इंग्रजी शिकलेले लोक देशी चांभारांमध्ये सर्व देशावर मिळून ५-१०सापडतील की नाही शंकाच आहे.  देशावर शहरांतले चांभार लोक चांभार धंद्याखेरीज इतर धंदेही करतात.  कोणी गवंडी, कोणी सुतार, कोणी टांगेवाले, कोणी इंजिनड्रायव्हार व कोणी गार्डही आहेत.  पुण्यानजीक वानवडीचे रा. शिवराम कृष्णाजी कांबळे व दौंडचे दादा मिस्त्री यांनी कंत्राटासारख्या स्वतंत्र धंद्यातही नाव मिळविले आहे.  देशी चांभार आचाराने, राहणीने व स्वच्छतेने कुणबी लोकांच्या खालोखाल आहेत. पण त्यांच्यातही शिक्षणाचा पुष्कळ प्रसार होऊन पुढारी माणसांनी पुढाकार घेऊन उपदेश करून मद्यपान वगैरे बाबतीत यातिनिर्बंध करून त्यांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. व यातीचे पैसे जमतात ते निव्वळ मठ व देवळे बांधण्याकडे खर्च न करता त्या पैशाने आपणाकरिताच का होईना, विद्यादेवीचे जंगी मठ व मंदिरे बांधून ती चालविली पाहिजेत.

४.  कोकणस्थ चांभार हे अर्थात कोकणातले.  यांचीही राहणी वर सांगितल्याप्रमाणे आहे.  यांची वस्ती मुंबईत हल्ली सुमारे सात हजार आहे.  या लोकांचा पूर्वी फलटणीमध्ये प्रवेश होऊन त्यापैकी काही सुभेदार मेजरच्या हुद्दयांपर्यंत चढलेले होते.  पण सध्या यांची लष्करात विशेष भरती नाही.  मुंबईत या कोकणी चांभार मंडळीपैकी बरेच लोक इंग्रजीही शिकलेले आहेत व ते गिरण्या, रेल्वे व खाजगी कंपन्या यांमध्ये क्लार्क आहेत.  व इतर यांत्रिक कामे - टर्नर, पेंटर, सुतार, लोहार, बॉयलर मेकिंग वगैरेही -करीत आहेत.  सारांश, कोकणी चांभारांनी आपला धंदाच न सांभाळता इतर धंद्यांतही ते पुढे येत आहेत. पण ही गोष्ट फक्त मुंबईपुरतीच आहे; इतरत्र नाही.  सर्वात सांगण्यासारखी अभिमानाची गोष्ट ही आहे की, विलायतेतदेखील नाव मिळविलेले प्रसिद्ध क्रिकेटपटू रा. बाळू बाबाजी पालवणकर व त्यांचे तिघे बंधू हेही या कोकणी चांभारांपैकीच आहेत, याबद्दल या ज्ञातीला पराकाष्ठेचा अभिमान वाटत आहे.  रा. बाळूसारखी पुष्कळ गुणी माणसे जर जातीत निपजतील तर चांभारांचाच काय, पण कोणत्याही अस्पृश्य जातीचा अस्पृश्यपणा जाण्यास फारच मदत होईल.

५.  चांभारांच्या शिक्षणाच्या बाबतीत अडचणीही पुष्कळ आहेत.  देशावर पुष्कळ शाळांतून आमच्या मुलांना शाळेत घेत नाहीत.  बाहेर बसवितात.  त्यामुळे उन्हात वगैरे बसावे लागते.  सरकारच्या कृपाळूपणाच्या हुकुमाने मास्तरांची आडकाठी नसली तरी गाववाल्यांची जबर आडकाठी असते.  त्यामुळे खेडयापाडयांतून शिक्षणाची हेळसांड होते.  बरे, शहरात तरी चांभारांनी सर्व सवलतीचा फायदा घ्यावा, तर मुलगा ७८ वर्षांचा झाला तरी तोच ते त्याला द्रव्यलोभामुळे आपला धंदा शिकविण्याकरिता घरी ठेवतात. त्याचे लग्नही घरी पैसे नसले तरी कर्ज काढून करितात.  यामुळे बालपणातच बिचाऱ्याच्या पायात बायकोची, कर्जाची व संसाराची अशा तिन्ही बेडया पडतात.  कोकणस्थ चांभारांची पुष्कळ वस्ती मुंबईत आहे पण मुंबईतील राहणी बिकट, खर्च जासत व त्या मानाने पगार थोडा.  शिवाय लग्ने व इतर कामासाठी काढलेले कर्ज यामुळे त्यांनाही आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे नीट लक्ष देता येत नाही.  मुलगा ७८ वर्षांचा झाल्याबरोबर ते त्याला गिरणीत ३॥ रुपयांवर लावतात व त्या पैशाचा उपयोग लग्नाच्या कर्जाची फेड व मदिरामंदिराच्या कर्जाची फेड याकडे करितात.  

६.  आमच्या ज्ञातीत शिक्षणप्रसारासंबंधाने चाललेल्या प्रयत्नांची थोडक्यात माहिती :  आमच्यातील मुंबईच्या कॉलेजात १, पुण्याच्या मेलट्रेनिंग कॉलेजात १, मुंबई येथील हायस्कुलांत १० व म्युनिसिपालिटीच्या व नि. सा. मंडळीच्या शाळेत मिळून सरासरी ३०० इतके विद्यार्थी सध्या शिकत आहेत.  मुंबईस रोहिदास हितवर्धक समाज नावाची एक संस्था निघालेली असून ह्या संस्थेमार्फत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडीशी मदत होत असते.  शिवाय जातीत असलेल्या वाईट चाली काढून टाकण्यासाठी ही संस्था झटत असते.  गणपती-उत्सवात व स्मशानयात्रेच्या प्रसंगी दारू पिण्याच्या चालीला या संस्थेच्या प्रयत्नाने पुष्कळ आळा पडला आहे.  गिरणीतील मजुरांत फुकट शिकविण्याकरिता या संस्थेने एक नाईट स्कूलही काढले आहे.

७.  चांभार ज्ञातीच्या गरजा  :  १.  या ज्ञातींत विद्येची आवड उत्पन्न होण्याकरिता व्याख्याने, पुराणे, भजने यांसारख्या प्रसंगी वरिष्ठ जातींच्या मंडळींनी यांना उपदेश केला पाहिजे.  २.  देशातील शाळांतून सरकारने ज्या स्कॉलरशिपा ठेविल्या आहेत, त्या, प्रत्येक अस्पृश्य जातीला एक याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात ठेवाव्या व मुंबईसही अशाच स्कॉलरशिपा म्युनिसिपालिटी किंवा सरकार यांनी किंवा दोघांनी मिळून ठेवाव्या.  ३. उच्च प्रतीच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिपा असाव्या.  ४.  या जातीच्या मंडळींना निरनिराळया सरकारी खात्यांतून इतर ज्ञातीच्या लोकांप्रमाणे नोकऱ्या मिळाव्या.  ५. ठिकठिकाणच्या चांभार पुढाऱ्यांनी आपली उन्नती करून घेण्याकरिता प्रयत्न सुरू करावे.

निराश्रितांच्या उन्नतीच्या मार्गातील मुख्य अडचण
(लेखक :  शिमराव जानबा कांबळे, पुणे येथील महार समाजाचे एक पुढारी.)

१.  निराश्रितांच्या उन्नतीच्या मार्गातील अडथळा म्हटला म्हणजे त्यांजवरील अस्पृश्यपणा होय.  हा त्यांजवर लादलेला दोष दूर करण्याचे काम सरकारचे नाही.  हे आमच्या हिंदू समाजाचे आहे व हे जर हिंदू समाजाने केले तर आमच्या सुधारणेचा मार्ग बराच मोकळा होईल.

२.  अस्पृश्यपणा घालविण्याचे काम रेल्वे, आगबोटी, इराणी दुकाने वगैरे करीतच आहेत.  पण वरिष्ठ हिंदूंनी बुध्दिपुरःसर आम्हांस शिवण्याचा प्रघात पाडला पाहिजे.

३.  धर्माभिमानी व कर्मठ हिंदूंना आमची हिच विनंती आहे की, आम्ही अज्ञानी असून अद्याप हिंदुधर्माला चिकटून राहिलो आहोत.  इतकेच नव्हे, तर वरिष्ठ जातीत ज्याप्रमाणे हल्ली धर्मावरील श्रध्दा शिथिल होत चालली आहे त्याप्रमाणे आमची गोष्ट नाही.  आम्हांला हिंदुधर्माचा पूर्ण अभिमान असल्यामुळे आम्ही धर्मांतराचा आश्रय केला नाही.  हे लक्षात घेऊन आमच्याशी न्यायाचे वर्तन सुरू करा.  आपले परमपूज्य बादशहा पंचम जॉर्जमहाराज यांचा Sympathy म्हणजे सहानुभूती हा फार प्रिय व मार्गदर्शक शब्द आहे.  आम्हांलादेखील तुमची सहानुभूती पाहिजे आहे.  एका धर्माच्या अनुयायांत परस्पर बंधुप्रेम नसणे ही मोठया खेदाची गोष्ट आहे.  आम्ही तुमच्या हिंदुधर्माचेच आहो.  त्या हिंदुधर्माचा अभिमान जर तुम्हाला असेल, तर विचार करून दयाळूपणाने आमच्यावरील अस्पृश्यपणा दूर करा.

४.  हिंदुधर्मातल्या लोकांना परधर्मी व परदेशी लोकांनी न्यायाने वागवावे असे वाटत असेल तर त्यांनी प्रथम स्वधर्मीयांनाजवळ करावे व मग सर्वांच्या संघशक्तीने वादविवाद चालू द्यावा.  तोवर इतरांना नावे ठेवण्याची पात्रता त्यांच्या अंगी नाही हे पक्के ध्यानात असावे.

५.  उदारपणाने या प्रश्नाचा विचार करून चाकरी मिळवून देण्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, धार्मिक व सामाजिक बाबतीत जर वरिष्ठ हिंदू आम्हांस मदत करतील; दुःस्थितिगर्तेत बुडालेल्या आम्हांला वर येण्यासाठी जर पुढे हात करतील; तर त्यांचा आश्रय घेऊन आम्ही आपली स्थिती सुधारून या मदतीबद्दल सदैव ॠणी राहू.

अस्पृश्य जातींच्या लोकांकरिता सक्तीच्या शिक्षणाची आवश्यकता
(लेखक :  पांडुरंगराव डांगळे, अहमदनगर येथील निराश्रितांच्या शाळेचे अनुभवी हेडमास्तर.)

१.  अस्पृश्य लोक आज अनेक शतके अस्पृश्य राहिल्याने त्यांना स्वतःच्या वाईट स्थितीबद्दल कल्पनाही नसते.  यांचया मनात त्यांच्या उन्नतीबद्दल कोणी वरिष्ठ जातीचा माणूस उदारपणाने व भूतदयेने प्रेरित होऊन चांगल्या कल्पना भरवून देऊ लागला, तर त्याला स्वजातीयांकडून फार छळ करून घ्यावा लागतो.  यामुळे वरिष्ठ जातींचे लोक या कामी यावे तसे पुढे येत नाहीत.  अस्पृश्यांपैकी कोणी त्यांना स्वतःची राहणी सोडण्याविषयी उपदेश करू लागला तर शतकानुशतके त्या सर्व सवयी अंगवळणी पडल्या असल्यामुळे त्यांना त्यांचा तो उपदेश रुचत नाही व अज्ञानामुळे आपणाभोवती जगात चाललेल्या व्यवहाराकडे कोणत्या दृष्टीने पहावे व आपण त्यातले काय ग्रहण करून त्याप्रमाणे वागावे, हेही समजत नाही.

२.  हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या मानाने पाहता त्यांच्याकरिता काम करणाऱ्या लोकांची संख्या पुष्कळ वाढली पाहिजे.  नि. सा. मंडळी व सर्वण्ट्स ऑफ इंडिया सोसायटी या संस्थांच्या सभासदांची संख्या वाढून त्यांच्यात या कामाची वाटणी व्हावयास पाहिजे.

३.  दयाळू इंग्रज सरकारने नामदार गोखले त्यांनी वरिष्ठ सरकारी कौन्सिलात ठेविलेल्या सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी निदान अस्पृश्य जातीत तरी करावी.  कारण सक्तीखेरीज सरकारने दयाळूपणाने जरी आमच्याकरिता निराळया शाळा दिल्या, तरी त्या शाळातून अस्पृश्य लोक आपली मुले नियमितपणे पाठवीत नाहीत.  याचे कारण त्यांना ज्ञानाची किंमत समजत नाही.

४.  म्हणून सरकारने निदान ४ ते १४ वर्षांच्या मुलांना सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा करावा व 'ज्यांसि आपंगिता नाही', असे जे आम्ही त्या आम्हांस हृदयी धरून आमची सुस्थिती होण्याच्या उपायांची योजना करावी. असे केल्यास सरकारने आमळांस अग्निकुंडातून बाहेर काढून आम्हावर अमृतवृष्टी केली असे होईल.

५.  आमच्या हिंदी समाजातील सुशिक्षित बंधूंना आमची ही विनंती आहे की, त्यांनी सक्तीच्या शिक्षणाबद्दल म्युनिसिपालिटया, संस्थाने व इतर सार्वजनिक संस्थांतून सारखी चर्चा चालू ठेवावी व अशा रीतीने लोकमत जागृत ठेवून पुनःपुनः ही गोष्ट दयाळू सरकारचे नजरेस आणीत जावी.

प्रत्येक जिल्ह्याच्या गावी निराश्रितांकरिता फ्री बोर्डिंगची आवश्यकता
(लेखक :  नरसू शिंदू सूर्यवंशी, असिस्टंट मास्तर, अहमदनगर.)

दयाळू इंग्रज सरकारने जरी निराश्रितांकरिता शाळा काढिल्या, तरी ह्या शाळांत येऊन शिक्षण घेणारी मुले त्या शाळांत साधारण १० वर्षांची होईपर्यंत टिकतात.  पुढे त्यांचे आईबाप, पालक पंतोजींकडे येऊन 'गरिबीमुळे मुलांस शाळेतून काढावे लागत आहे', 'मुलाचे शिक्षण पुढे चालावे अशी इच्छा आहे, पण पैशाची सवड नाही' या सबबी सांगून त्यांस शाळेतून काढतात व या रीतीने अर्धवट शिकलेली मुले लवकरच विसरतात.  तरी अशा मुलांपैकी निदान होतकरू व हुशार मुलांची पुढे विद्या चालावी म्हणून त्यांच्याकरिता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक फ्री बोर्डिंग सुरू करावे, अशी निराश्रित साहाय्यकारी मंडळीस सर्व निराश्रितांतर्फे माझी नम्र विनंती आहे.

खेडेगावांतील अस्पृश्य मुलांच्या शिक्षणाच्या मार्गातील अडचणी
(लेखक :  जनक साधू शेलार (महार), कॅबिनमन, लोणावळे.)

१.  शहरांतून ज्याप्रमाणे निराश्रितांकरिता निराळया शाळा, भजन समाज व लायब्रऱ्या आहेत, त्याप्रमाणे खेडयापाडयांतून काहीच सोयी नाहीत.  त्याचप्रमाणे शहरांतल्याप्रमाणे खेडयांतून नोकऱ्याही मिळत नाहीत.  यामुळे खेडयांतील अस्पृश्य अत्यंत गरीब असतात, त्यांच्यासाठी शाळांची व्यवस्था व्हावी.  ज्या ठिकाणी सरकारी शाळांत अशा मुलांना घेत असतील, या ठिकाणची गोष्ट अलाहिदा.  पण ज्या ठिकाणी गावकरी अस्पृश्यांना शाळेत बसू देत नाहीत, त्या ठिकाणी त्यांच्याकरिता निराळी तजवीज रात्रशाळा काढून करावी.

२.  खेडेगावांतील शाळांतून जरी अस्पृश्य मुलांना घेतले तरी निराळे बसावे लागते व मुलांच्या अभ्यासाकडे काळजीपूर्वक लक्ष पुरविले जात नाही; त्यामुळे मुलाला शाळा सोडावी लागते किंवा त्यांची 'वर्तणूक वाईट' असा शेरा मारून पंतोजीही त्यांचे नाव काढून टाकितात.

३.  अस्पृश्य लोकांना शिकून कोठे सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत काय ?  असा प्रश्न आमचेच लोक आम्हांस विचारतात.  याचे उत्तर काय द्यावे हे आम्हांस समजत नाही.  कारण नोकरी मिळण्यास कायद्याने कोणतीही हरकत नाही.  पण मिळत मात्र नाही.  मला स्वतःला एका दयाळू इंग्रज गृहस्थांनी म्युनिसिपालिटीत नोकरी दिली, पण त्यांच्या जागी एक ब्राह्मण गृहस्थ आल्याबरोबर त्यांनी एक महिन्याच्या आत मला कमी केले.  यावर अर्थातच मला आमच्या जातीच्या लोकांनी, तुम्ही शिकून काय केलेत ?  असा प्रश्न केला.  त्याचे उत्तर मी तरी काय देणार ?  त्या वेळी मी धर्मांतर करण्याइतका निराश झालो होतो पण माझ्या परमपूज्य तीर्थरूपांनी उपदेश करून माझे मन थाऱ्यावर आणिले.

४.  अस्पृश्य जातीच्या लोणावळे येथील मुलांना त्यांचे पालक मुलगे ८-९ वर्षांचे झाल्याबरोबर कोणा तरी साहेबाकडे अगर रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये क्लीनरची नोकरी लावतात व त्या मुलांना अज्ञानामुळे व वाईट संगतीमुळे जुगार, चोऱ्या करणे व दारू पिणे या सवयीही बालपणापासूनच लागतात. तरी या मुलांकरिता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व नि. सा मंडळीने मिळून रात्रीची शाळा व भजन समाज काढून त्यांची सुधारणा करावी.

मांग लोकांच्या गरजा

(लेखक :  श्रीपतराव नांदणे, मांग, मु. सातारा.)

१.  आमची मांग लोकांची संख्या सुमारे वीस लक्ष आहे.  परंतु इतर जातींस म्हणजे महार, रामोशी चांभार, कुंभार वगैरेंना मूळच्या जमिनी व इनाम जमिनी आहेत; परंतु मांग लोकांस मुळीच नाहीत.  जंगलखात्यातून मुलकी खात्याकडे ज्या जमिनी गेल्या आहेत व मुलकी जमिनी व खालसा झालेल्या जमिनी ज्या ठिकाणी शिल्लक आहेत, त्या ठिकाणी त्या मांग लोकांना देण्याची दयाळू इंग्रज सरकारने तजवीज करावी.

२.  मांग लोकांना ते कोठेही असले तरी चौकीवर हजिरी देण्याची तसदी आहे.  तरी ती जातीवर न ठेवता सरकारने माणसांवर ठेवून निदान चांगल्या माणसांवरील तरी माफ करावी, नाही तर त्यामुळे थोडक्या मंडळींकरिता सर्व जातीला त्रास सोसावा लागतो.

३.  मांग लोकांचे धंदे दोऱ्या वळणे वगैरे नीट चालावे म्हणून सरकारने त्यांना वाकाची लागवड कशी करावी हे शिकवावे व वाकाच्या दोऱ्या करण्याची यंत्रे देऊन त्यांची स्थिती सुधारण्यासाठी काही तरी उपाय योजावे, अशी सरकारास विनंती आहे.

मांग लोकांच्या अडचणी व गरजा

(लेखक  :  विश्वनाथ विष्णू साळवे, मांग, गंज पेठ, पुणे.)

१.  आमच्या मुलांकरिता बोर्डिंगशाळा काढाव्या व मोफत शिक्षण द्यावे.
२.  आमच्यासाठी निरनिराळे धंदे काढावे व आम्हास स्वसंरक्षणाचे निरनिराळे मार्ग दाखवून द्यावे.
३.  जी माणसे दिवसा काम करतात, त्यांसाठी रात्रीच्या शाळा काढाव्या.
(लेखक :  सीताराम लांडगे, म्यु. स्कूल मास्तर, गंज पेठ, पुणे.)

१.  अस्पृश्य लोकांच्या अंगी गलिच्छपणाने राहणे, पड खाणे, उच्छिष्ट अन्न खाणे, मद्यपान करणे, जुगार खेळणे, नाच, तमाशाची आवड वगैरे गलिच्छ सवयी आहेत.  त्यामुळे या लोकांबद्दल तिरस्कार उत्पन्न होतो.

२.  तरी अस्पृश्य बांधवांनी वरील सर्व व्यसने टाकून, शिक्षणाचा लाभ घेऊन आपली उन्नती करून घ्यावी.