1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

महाराष्ट्र सुधारक आगळा

साखरेचा मासा पाणियात पोहे| ऐसे कधी होय सांगा वेगी||१||
मेणाची न्हाणूली आगीमध्ये न्हाये| ऐसे कधी होय सांगा वेगी||२||
स्वप्नींची अंतूरी जागेपणी पाहे| ऐसे कधी होय सांगा वेगी||३||
बहुरूपी राजा परचक्र साहे| ऐसे कधी होय सांगा वेगी||४||
अज्ञानाची पूजा मोक्षासि खोळंबा| कधी सोडाल बा सांगा वेगी||५||

राममोहनाने बंगाल्यात भक्तीची व ज्ञानाची आणि त्या पायावर सुधारणाकर्माची घटना केली. तिचे नाव ब्राह्मसमाज. ही चळवळ महाराष्ट्रात इ. स. १८६७ साली प्रार्थनासमाज आणि १८७३ साली सत्यशोधक समाज उर्फ सार्वजनिक सत्यधर्म ह्या नावाने सुरू झाली. पण ह्या दोहीनाही यावे तसे यश आले नाही. कारण केवळ महाराष्ट्रातील अपवित्र दुही. बंगाली राष्ट्र एकजिनशी आहे. महाराष्ट्रात जातींचीच नव्हे तर वर्गांची बजबजपुरी अजूनी गाजत आहे. न जाणो हे दोन्ही नवशिके समाज कदाचित मावळतील, पण ही बजबजपुरी किती दिवस राहील हे सांगवत नाही. निदान ह्या दुंडा राक्षसीला घालवून देण्यात दोन्ही समाज आज तरी पंगू झालेले भासत आहेत. जोपर्यंत ज्ञान, भक्ती आणि कर्म ह्यांची सांगड जमत नाही आणि ह्या सांगडीवर बसून बहुजनसमाज भवनदी तरत नाही, तोपर्यंत असल्या शाब्दिक चळवळी झाल्या काय व गेल्या काय सारखेच. अशा चळवळी साखरेच्या माशाप्रमाणे गोड असतील पण भवनदीत टिकाव कसा लागेल! इतर चळवळी सांगावयाला नकोच. त्यांचा नुसता चिवडा झाला आहे. त्यात लहान मोठे पडले आहेत. पण त्यांनाही निश्चयाने धार्जिणे नाही. कमी अधिक तकलुपी आहे.

(चाल-न्याहारीचा वकुत होईल)
ऐका हो कीर्ती ह्यांची| हल्लीचे चिवडेवाले||धृ||
भले भले किती तरि मोठे| नामांकित नाणवलेले
लोकमान्य लोकांशीही| रायांशी लाडके साले
असले हे गोड दुधारी| राजकारणाचे भाले
हे राज्यचक्र फिरविती
संसारही पण सुधरीती
तारिती धर्म-नय-नीति

सारेचि काही हे करिती| हल्लीचे चिवडेवाले||१||
वार्तापत्राचा निकटा| जनमना लाविती चटका
काव्य नाट्य साहित्याची|कधि मधी गोडशी गुटिका
साह्यार्थ जुन्या धर्माच्या| कधि वेदांताचा फटका
रायांच्या अवती भवती
अल्पांच्या पुढती पुढती
बहुजनात सवेचि शिरती
हे सर्वगामी फिरती| हल्लीचे चिवडेवाले||२||
लोकांचे शिक्षणरूपी| घेतात पसारभर पोहे
ग्रामोद्धाराचे त्यात| मिसळती फुटाणे पाहे
चालत्या राजकारणाची| चटणी तर सवंग आहे सत्याचे चिवडे केले
आग्रह-पाटित ते भरले
सर्वाहि पुढे फिरवीले
हल्लीचे चिवडेवाले| धावती कसे लवलाही||३||
जे सत्याग्रहार्थ झटले| ते कारागृहात कुजती
लोकांचे सेवक कोण| कोठले| कुणा माहीती
जे खरे लोक उपदेष्टे| गत झाल्या त्यांच्या गोष्टी
उरले हे छंदी फंदी
चालत्या क्षणाचे बंदी
जन, त्यांचे चरण मी बंदी
सत्याग्रह चिवडा चंदी| त्यासाटी सदा भुकेले||४||
युगि युगांतरी जे येती| ते नव्हत कधी हो असले
अल्लाचे प्यारे होती| लोकातील साळे भोळे
त्या काव्य कुशलता नाही| ना पंडितगिरिचे चाळे|
त्यांचेच आज करू स्मरण
फेडू की प्रेमाचे रीच
मग मरूनि जाऊ ते मरण
ह्या जगताचे पुरे, पुरे सोहाळे हल्लीचे चिवडेवाले||५||

ह्या चिवडेवाल्यांची चलती आजकाल सर्व जगभर आहे. ह्यांची धूळ देवधर्म सांदीत लोटीत आहे. कोठे देवालाच धुडकावून तर देवाला तमाशातले सोंग देऊन हे चिवडाचंदी दैत्य मतलब साधीत आहेत. ह्या नगा-याच्या घाईत राममोहनांची सारंगी ऐकू येत नाही, जोतिबाच्या तुणतुण्याला कोण पुसतो?

महाराष्ट्र सुधारक आगळा

सत्याचा पालनवाला| हा धन्य जोतिबा झाला
पतिताचा पालनवाला| हा धन्य महात्मा झाला
जन्माचा मलाकार
कर्माची खडी तलवार
जनतेचा जागा शेर
त्या समान कोण तो बोला| हा धन्य जोतिबा झाला||१||
बोलीचा रोकडा मेख| चालीचा कणखर रेख
सत्याचा पाठीराखा| धर्माचा की जिव्हाळा
धन्य धन्य जोति फुलारी
शाद्बिकांसि झाला भारी
दीन दुबळ्यांचा कैवारी
किती वानू त्याच्या लीला| हा धन्य जोतिबा झाला ||२||
किती झाले जे छळ सगळे| परि हासुनि ते गिळियेले
लोकभ्रम निर्दाळीले|वर्णाश्रम केला उजळा
कुणि शिकुन शहाणे ठरले
कुणि विकुन पुढारी बनले
कुणि भिकून महात्मे झाले
सच्चा हा सेवक आगळा| हा धन्य जोतिबा झाला||३||
वेदांनी देव चोरियला| बुव्वांनी धर्म बाटविला
शहाच्यांशी संशयो झाला| मग धन्य ज्योति उदेला
महाराष्ट्र हा ज्ञानेशाचा
महाराष्ट्र हा तुक्याचा
जोतिबा हा लोकांचा
परि सरळा सेवक विरळा| महाराष्ट्र सुधारक आगळा||४||

इतका जर जोतिबा मोठा होता तर तो मागे कसा पडला बरे? आजकाल पुढे यावयाला इंग्रजी चांगले आले पाहिजे आणि इंग्लंडला जाऊन आले पाहिजे. जोंतिबाची ही बाजू लंगडी होती. त्याला संस्कृत येते, निदान तो ब्राह्मण जन्मून जादूटोणा जरी करिता, तरी तगला असता. तळेगाव ढमढेरे येथील न्हावी लोकांमध्ये त्यांनी मोठी चळवळ केली. स्वावलंबन शिकविले. विधवांचे वपन करू नये ही त्यांची शिकवण. पण भुजबळ नावाच्या एका जादूटोणेवाल्याला हे खपेना. त्याने जोतीला चांगला शह दिला. तेव्हा सनातन्यांनी विधवांचा पक्ष सोडून भूजबळाला पुढे केले. वगैरे वृत्तांत हल्लीच्या समाजसेवकांना स्पृहणीय आहे.

महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन

यंदा रा. विठ्ठलराव शिंदे ह्यांस कीर्तन करण्याची विनंती करण्यात आली होती. खरे पाहता त्यांचा हा प्रथमच प्रयत्न होता. असे असूनही कीर्तन एकंदरीने चांगल्या रीतीने पार पडले हे कळविण्यास फार आनंद वाटतो. मागच्या साथीवर कीर्तनाचे यशापयश थोड्या अंशी अवलंबून असते. ती साथ असावी तशी नसूनही बुवांच्या प्रयत्नास यश आले. ह्या प्रसंगासाठी मंदिर सालाबादप्रमाणे विशेष रीतीने पुष्पमालांनी शृंगारले होते. बुवा अननुभवी आहेत हे माहीत असूनही कीर्तनास बरीच मंडळी आली होती. मात्र स्त्रियांचा जमाव दरसालपेक्षा थोडा कमी होता असे वाटते. असो. बुवांनी मंगल चरणानंतर परमेश्वरास वंदन करून सद्गुरू रामकृष्णपंत व आपले तीर्थरूप रा. रा. रामजी बसाप्पा ह्यांच्या चरणांचे वंदन करून व त्यांचा आशीर्वाद घेऊन कीर्तनास प्रारंभ केला. विषयोपदेशासाठी त्यांनी-

कारे हरी अंतरी आठवाना ||धृ०||
संसारदायक साधकबाधक|
सर्व चिंता दिगंता पाठवाना||१||
परात्परेश्वर चिंतुनी सादर|
मदमत्सर सागर आखाना||२||
केशव पंडित स्वामी अखंडित|
मने मनी लोचनी सादवाना||३||

हे केशव स्वामीचे पद घेतले होते. संसारामध्ये साधकबाधक, लाभदायक आणि त्रासदायक अशा दोन्ही बाजूंचा अनुभव येत असतो. आणि तो करीत असता काळाचा फेरा केव्हा येईल ह्याचा नेम नसतो, आणि लोक तर धर्मसाधनामध्ये निमग्न न राहता भलत्यासलत्या मार्गाचे अवलंबून करीत असतात आणि असुरी संपत्तीचा मात्र पदरी मनमुराद संचय करतात. देवधर्माच्या कार्यात मग्न राहिल्यासारखे करून खुद्द देवाला सांदीमध्ये ठेवून भलत्याच वस्तूवर देवत्व आरोपून वेडे वेडे प्रकार करतात. हे पाहूनच एकदा नाथांनी पुढील उद्गार काढले.

दादा या जनांसी काय बा झाले? ||धृ०||
शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडुनी उंच बसविले,
अंकलारूनी वस्त्र गुंडाळिले, त्यासी भलतेचि नाव ठेविले रे ||दादा||
शुद्ध उदके करूनी भिजविले, गंध पुष्पे लावुनि झाकिले,
धूप दावुनि दोष उजळिले, हात दाखवुनि चालविले रे ||दादा||
मागे पुढे करूनि भोवंडिले, आपआपणा नाही उमजले,
एका जनार्दनी व्यर्थ गेले रे ||दादा||

परंतु लुंग्यासुंग्या देवाच्या मागे न लागता एका परमेश्वराच्याच सेवेमध्ये रत राहण्याचा व त्यालाच शरण जाण्याचा जरी निश्चय केला तरी मन काही ठिकाणावर राहत नाही. दंभ होतो व त्या दंभाच्या भरामध्ये आपण आपल्याकडे भलताच मोठेपणा घेऊन आपणच देव होऊन बसतो! ज्यांना जागृती होते तेच पुढील पद्यातील अर्थाचे उद्गार काढतात व धन्यतेच्या स्थितीचा त्यांना लाभ होतो.

मेरा हिरा हरा गया कचरनमो||धृ०||
कोई गंगा कोई जमुना जावे|
कोई मथुरा कोई काशी मो||१||
कोई सुरत कोई मुरत पूजे|
कोई पाणी कोई पथर नमो||२||
सुरनर मुनिजन हिरा पावे|
भूल गये सब नरवर नमो||३||
धर्मदास प्रभू हिरा पावे|
बांधलीया जिने आंचल नमो||४||

बाळकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला हे आख्यान लाविले होते. ह्या आख्यानाच्या रूपकाच्या दृष्टीने बुवांनी अर्थ करून श्रीकृष्णाने भागवत धर्म संस्थापिला, तो सद्धर्मगोप्ता होता, तो भागवत धर्माचा, भक्तिमार्गाचा प्रस्थापक कसा होता हे दाखविले.

मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार

सुबोध पत्रिकेत ब्राह्मधर्माच्या प्रचाराविषयी एका ति-हाईताचे विचार नुकतेच प्रसिद्ध होत होते. केवळ मराठी भाषेच्या दृष्टीनेच ह्या प्रचार कार्याविषयी काही माझे अल्प अनुभव व विचार प्रसिद्ध करणे अप्रासंगिक होणार नाही, ह्या आशेने हा लेख मी लिहीत आहे. पण मी ति-हाईत नसून एक प्रचारक आहे. एवढाच जर दोष असेल किंवा माझ्या प्रचारकपणामुळेच काही विचारांत दोष असतील तर ते पाहण्याची माझी इच्छा. एरव्ही मुद्द्यावर वादविवाद वाढविण्याची मात्र माझी इच्छा नाही.

(१) अलीकडे केवळ अभिमानाच्या दृष्टीनेच मराठीची बाजू वाचकांपुढे काही तेजस्वी पुरुष मांडीत आहेत. त्यांना माझे एवढेच सांगणे आहे की, कोणत्याही गोष्टीचा योग्य अभिमान बाळगणे दुर्गुण नसून उलट सद्गुणच आहे. पण धर्माच्या बाबतीत अभिमान ही चीज निर्भेळ विघ्न आहे. निदान तुलसीदासाने तरी “नरक मूल अभिमान” असा सिद्धांत केला आहे, तो मी तूर्त खरा धरून चालतो. आमचा ब्राह्मसमाज जातिभेद मानीत नाही व धर्मभेदही मानीत नाही, मग तो भाषाभेद कोठून मानणार ? शिवाय ब्राह्मसमाज ही एक प्रांतिक किंबहुना राष्ट्रीय संस्था नसून ती सार्वत्रिक असल्याने अखिल ब्राह्मसमाजाला भाषेचा अभिमान धरून चालणार नाही, हे उघड आहे. तथापि, आजच्या लेखापुरते मला ह्या सार्वत्रिक ब्राह्मधर्माचे औपपत्तिक विवेचन करावयाचे नसून त्या धर्माचा प्रांतिक व लौकिक प्रसार कसा होईल, ह्या व्यावहारिक विषयाचा संक्षिप्त विचार करावयाचा आहे. ह्या आकुंचित दृष्टीने पाहता महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून ह्या धर्माचा मराठीतून प्रसार करण्याचा प्रयत्न व्हावा आणि इंग्रजी, संस्कृत किंबहुना राष्ट्रीय गणलेल्या हिंदी भाषेलाही गौणत्व असावे असे मला वाटते. परंतु अनेक ख-या खोट्या कारणांमुळे हे प्राधान्य व हे गौणत्व आमच्या महाराष्ट्रात असावे तितके अद्यापि आलेले नाही. त्यामुळे आमचा प्रसार व्हावा तितका न होण्याची जी कारणे आहेत त्यातच (सुबोध पत्रिका, १७ ऑक्टोबर, १९२६) मराठी जी लोकभाषा तिची हेळसांड हेही एक कारण असावे, असेही मला वाटते.

(२) अव्वल इंग्रजशाही सुरू झाल्याबरोबर हिंदुस्थानात ज्या सार्वत्रिक चळवळी सुरू झाल्या, त्यांपैकी ब्राह्मसमाज ही एक अत्यंत प्रमुख चळवळ होय. कोणी ज्ञानकोशकार काही म्हणोत, माझे हे वरील विधान समतोल मनाला पटेल असे वाटते. अव्वल इंग्रजीतल्या काही चळवळींप्रमाणे ब्राह्मसमाजाला इंग्रजी भाषेचे साहाय्य अद्यापि घेणे भाग आहे. असहकाराला निदान काही काळ वाहिलेल्या काँग्रेसलाही जर अद्यापि इंग्रजी भाषेची मध्यस्थी पत्करावी लागते, तर अखिल ब्राह्मसमाजाने ती पत्करल्यास काय नवल ? तथापि, प्रांतोप्रांती ब्राह्मधर्माचे जे कार्य चालले आहे, त्यात मात्र अद्यापि इंग्रजीचा जो अनाठायी तोरा मिरविण्यात येतो, तो पाहून मात्र माझे हसे आवरत नाही. हा माझाच दोष असल्यास तो मी कबूल करण्यास तयार आहे. मुंबई, मद्रास व कलकत्ता ह्या बकाली वस्तींच्या व्यासपीठांवरून अजून हिंदी लोकांचे इंग्रजी वक्तृत्व चमकते, ते काही अंशी अपरिहार्य असेल; पण असल्या परकीय भाषेतल्या वक्तृत्वाचे मासले मला स्वतःला लंडन, पॅरिस, एडिम्बरो, आमस्टरडॉम, कलोन, जिनीवा, रोम अथवा नेपल्स वगैरे बकाली वस्तींच्या शहरी मागे कित्येक दिवस राहूनही का दिसले नाही, ही विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. इकडे पाहावे तर महाराष्ट्रातील जिल्ह्याचे शहरीही जरी मी प्रचारास गेलो तरी केव्हा केव्हा मी इंग्रजीत व्याख्यान द्यावे अशी सूचना होत असते, ह्याचे इंगित काय ? एकदा तर समाजाशी संबंध नसलेल्या एका असहकारी महाराष्ट्रीय मित्राने ही सूचना केली ! तेव्हा केवळ मला मराठीत बोलता येते हे दाखविण्यासाठी मला मराठीतच बोलावे लागले आणि श्रोतृसमाज सर्व मराठीच असल्याने माझे बोलणे सर्वांस कळले.

(३) कोणी म्हणतील की महाराष्ट्रात ब्राह्मधर्माचे कार्य विशेषतः मुंबई शहरातच आहे आणि तेथे पार्शी, मुसलमान, गुजराथी लोकांचाच श्रोतृसमाज असणार आणि स्वभाषा मराठी असली तरी मुंबईतील मराठ्यांच्या बायकामुलांनाही आजकाल इंग्रजी येत असल्याने, सर नारायणसारख्या एकाद्या नामांकित वक्त्याचे इंग्रजी ऐकल्याने आपले इंग्रजीही सुधारण्याचा संभव आहे. पण मी स्वतः इंग्रजीच्याच काय परंतु अरबी किंवा आफ्रिकी भाषेच्याही उलट नाही. वक्त्याला श्रोतृवृंदांची भाषा येत नसल्यास त्याच्याच भाषेत व्यवहार होणे शक्य आहे व इष्ट आहे. परंतु केव्हा केव्हा आमच्या उत्सवातून केवळ इंग्रजी एक व्याख्यान असावे, असा संप्रदाय पडला आहे. म्हणूनच कोणीतरी गोमागणेश इंग्रजी वक्ता पाहण्याची जी तारांबळ उडते तिचा ब्राह्मधर्माशी काय संबंध आहे, हे मात्र मला समजत नाही. समाजात जे लोक वाट चुकुन येतात ते देखील इंग्रजी अगर कोणत्याही परकीय भाषेत प्रगती व्हावी म्हणून नव्हे तर खरोखर आपल्या धर्मबुद्धीतच प्रगती व्हावी म्हणून येतात व आलेही पाहिजेत. केवळ वक्तृत्व ऐकण्यास कोणी नेहमी येत आहे असा संशय आल्यास आम्ही प्रचारकांनी त्याला वक्तृत्व सभेकडची वाट दाखवावी, निदान अशांच्यासाठीच इंग्रजी वक्ते शोधीत बसू नये असे मला वाटते.

(४) जो युक्तिवाद संभाषणाला तोच लेखनालाही लागतो. हिंदुस्थानातील बहुतेक सर्व प्रांतांचा मला जो प्रत्यक्ष थोडाबहुत अनुभव आहे, त्यावरून मी जर असे सामान्य विधान केले की, बंगालप्रांत व काही अंशी आंध्रप्रांत खेरीज करून बाकी सर्व प्रांतांत आम्हा ब्राह्मप्रचारकांकडून चालू लोक-भाषांची फारच हेळसांड झालेली आहे, तर त्यात अतिशयोक्ती झाल्याचे कोणी मला दाखवून दिल्यास मी आभारी होईन. विशेष ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की ह्या हेळसांडीमुळे इंग्रजीचा फायदा किंबहुना तद्देशीय प्रांतिक भाषांचा तोटाही झाला नसून केवळ त्या त्या प्रांती ब्राह्मधर्माच्या प्रचाराचे रोपटे मात्र झपाट्याने कोमेजू लागले आहे. ह्या विधानास महाराष्ट्रातील प्रार्थनासमाजाचे प्रवर्तकही मुळीच अपवाद ठरणार नाहीत, अशी मला भीती वाटते. एकच उदाहरण घेऊ.

मराठीत प्रार्थनासमाजाचे पुरेसे वाङ्मय नाही असे कोण कळकळीचा मराठा ब्राह्म म्हणणार नाही ? पण नुसते म्हणून काय ? येत्या वर्षी मुंबई प्रार्थनासमाजाचा हिरकणी वाढदिवस साजरा होणार आहे. म्हणून एक इंग्रजीत पुस्तक तयार होणार आहे. गोष्ट उत्तम आहे. इंग्रजी वाचकांची सोय झाली. पण मराठी वाचकांसाठी तशी निदान दहा तरी पुस्तके तयार होतील, तर ती कमीच, आणि ती तशी न होतील तर हे इंग्रजी पुस्तक आणखी दहा वर्षांनी प्रसिद्ध झाले तरी इंग्रजी वाचक दम धरतील अशी मला आशा आहे. मात्र तितक्याच खर्चात तीन मराठी पुस्तके वाटण्यास लहान प्रमाणावर व लौकिक स्वरूपात प्रसिद्ध व्हावीत, असा माझा अनुभव मला ग्वाही देत आहे.

(५) जुन्या किंवा दिमागखोर लोकांना न जुमानता तुर्कस्थानात कोमालपाशाने कुराणाचे धर्ममंदिरातून वाचन अरबी भाषेतून न होता तुर्की भाषेतून करविण्याची तजवीज चालविली आहे. धर्ममंदिरात बायबलचे वाचन लॅटिन भाषेत झाले पाहिजे असा दुराग्रह धरण्यात रोमन कॅथॉलिक पंथाचा नंबर अद्यापि पहिला आहे. पण रोम येथील हल्लीचे पोपने इटाली भाषेसंबंधी आपली अनुकूलता दाखविली आहे. त्याहीपेक्षा अधिक अनुकूलता मराठीसंबंधी दाखविण्यास आमच्या प्रार्थनासमाजाला आज काय हरकत आहे ? कलकत्त्यास ब्राह्मसमाजातील इंग्रजीचा मोह बाबू प्रतापचंद्र मुजुमदाराबरोबर मावळून गेला तरी आमचा अद्यापि रेंगाळत आहे.

(६) प्रार्थनासमाजाचे काम बायकामुलांमध्ये होत नाही ह्या बाबतीत नुकताच सुबोध पत्रिकेच्या एका अंकात इंग्रजी बाजूकडे कळकळीने खेद प्रदर्शित झाला होता. हा सुंदर लेख मराठीकडे आला असता तर अधिक बायकामुलांना कळला असता, ब्राह्मधर्माची एकंदर ठेवणच मुळी बायकामुले आणि बहुजनसमाज ह्यांना सहज गम्य नाही.--निदान ती बंगाल्याबाहेर तरी—अशी माझी खडतर खात्री होऊन चुकली आहे. अशा अडचणीत परकीय भाषेचे तट्टू उधळू लागले म्हणजे बिचा-या बायकामुलांची—विशेषतः अशिक्षित वर्गाची—जी दाणादाण होते ती त्याच्या वंशास गेल्याशिवाय कळणे दुरापास्त ! सा-या कानडी प्रांतात मंगळूर येथे एकच ब्राह्मसमाज आहे. मला जरी कानडीत उत्तम बोलता येत नाही, तरी मी कशी तरी त्या भाषेत गरज भागवीत असे. पण समाजातील काही मंडळी मला इंग्रजीतच नव्हे तर मराठीतही बोलण्याचा आग्रह करीत असत. त्याचे कारण त्यांना मराठी समजत असे हे नसून मला कानडीपेक्षा मराठी चांगले बोलता येते हेच होते. म्हणूनच आपल्या कानांची कीव न करता बोलण्याच्या जीभेचे कौतुक करण्यात जी नादलुब्धता आजकालच्या असहकाराच्याही काळात सर्वत्र दिसत आहे, ती आमच्या प्रचारकार्यातून तरी अजीबात निघाली पाहिजे, असे मला वाटते. शेवटी पुष्कळशी खबरदारी करून ब्राह्मधर्माच्या ठोकळ तत्त्वांची जाहिरात कानडी जाणणारांत व्हावी म्हणून मी एक कानडीतून लहानसे चोपडे प्रसिद्ध करविले. पण समाजाबाहेरील परकीय वाचणा-यांपेक्षा आतील स्वकीय वाचणा-यांमध्येच स्वभाषेची कळकळ कमी असल्यामुळे त्या प्रती तशाच पडून आहेत. वीस वर्षांपूर्वी मुंबई प्रार्थना मंदिराच्या वरल्या माळ्यावर अशाच एका मराठी चोपड्याचा गठ्ठा धूळ खात पडलेला पाहिला, तेव्हा माझे मनात हेच विचार आले होते.

(७) शेवटी एका नाजूक मुद्द्यावरील माझे किंचित विक्षिप्त मत कळवून आटोपते घेतो. हल्ली आम्ही इंग्रजी शिकलेले लोक मराठी म्हणून जी भाषा बोलतो व लिहितो ती अशिक्षित बहुजनसमाजास—विशेषतः खेड्यात राहणा-यांस—कळत नाही. ह्याचे कारण, आमचे शब्द जरी मराठी असतात तरी विचार इंग्रजी किंवा संस्कृत असल्यामुळे आमची एकंदर वाक्यरचना व संप्रदाय केवळ परकीय व आबालबोध असतात. “अबालबोध” हा अवघड शब्द मी येथे मुद्दाम वरील दुबळेपणाच्या उदाहरणार्थच योजिला आहे. खरी मराठी भाषा ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंतच होती. ती प्रथम मोरोपंताने बिघडविली. बिघडता बिघडता लोकहितवादी आणि ज्योतीबा फुले ह्यांचेपर्यंत ती कशीबशी जीव धरून होती. पण चिपळूणकरांनी व आगरकरांनी तिचा गळाच चेपला ! टिळकांनी व हरिभाऊ आपट्यांनी तोंडात शएवटचे दोन पाण्याचे घोट सोडले. पण ते शेवटचेच ठरले. आजकाल चिपळूणकरांचा इंग्रजी-संस्कृत कित्ताच आम्ही सर्वजण आधाशासारखे मिरवीत आहो; त्यामुळे आम्ही एकाद्या खेड्यातील पिंपळाचे पारावर आमच्या मराठीचा होर्मोनियम सुरू केल्याबरोबर खेडवळ समाज अर्थ न कळल्यामुळे आम्हांला पाहून आपल्या कानांपेक्षा डोळ्याचेच पारणे अधिक फेडीत असतो व ते आम्हांला कोणी विनोदाने सुचविले तरी आम्हांला समजतही नाही. प्रार्थनासमाजात काही मराठी वाङ्मय आहे, मुळीच नाही असे नाही. पण ते बहुजन समाजात फुकट वाटले तरी कळण्यासारखे नाही. आमच्या समाजात पूर्वी सदाशिवराव केळकरांशिवाय व आता काही अल्पांशाने हल्लीच्या सुबोध पत्रिकांशिवाय इतरांना मराठी येत होते, किंवा येत आहे असे मला दिसत नाही. ही भाषेची उणीव भरून आल्याशिवाय आणि ख-या बालबोध मराठी सुलभ ग्रंथांचा प्रसार होण्यापूर्वीच महाराष्ट्रात ब्राह्मधर्माचा प्रसार कधी होईल हा प्रश्न विचारणे म्हणजे लग्नापूर्वीच मुलाचे नाव काय ठेवू असे विचारण्यासारखेच विनोदाचे ठरेल.

मरण म्हणजे काय?

एक पाहतसा एकांची दहने| सावध त्या गुणे कांरे न व्हा||१||
मारा हाक देवा भय अट्टाहासे| जव काळा ऐसे जाले नाही||२||
-तुकाराम
मनुष्यजात-सर्व प्राणिमात्रही-ज अगणित काल एकेकांशी दहने पहात आली आहे. पण ती त्या गुणे व्हावी तितकी सावध झालेली दिसत नाही. उलट हल्लीचा दुष्काळ, प्लेग आणि बंधुघातकी संग्राम इ. मुळे ह्या जातीकडून मरणाची ‘अतिपरिचयादवज्ञा’च होत आहे असे म्हटले तरी चालेल. तथापि जेव्हा एकाद्या महात्म्याच्या मरणामुळे ह्या मरणगुरूची मुलाखत घडते, तेव्हा पुन: आश्चर्य व प्रेरणा, भय आणि बोध इ. विषयक ह्याचा प्रभाव तीव्र वेगाने भासू लागतो. ज्या गुणावरून आमचा साधाभोळा तुकोबा आम्हांला सावध करू पाहत आहे, त्याच गुणाचा उल्लेख आधुनिक पंडितशिरोमणी भट्ट मोक्षमूलर हे धर्माचे मूळ धुंडीत असताना असा करीत आहेत:- “माणसाला (प्रथम) भयाने अट्टाहासे हाक मारण्याला लावणारी, त्यास जबरीने विचार करावयाला लावणारी-जर कोणती गोष्ट असेल तर ती नि:संशय मरण ही होय, आणि जगातल्या ज्ञानाच्या अतिशय महत्त्वाच्या व अक्षय भागापैकी काही भाग मरणाच्या दर्शनामुळेच प्रथम कसा लाभला, हे आता आपण पाहू.”

पण हे मरण म्हणजे केवळ भयावहच आहे असे नव्हे, तर ते आश्चर्यावहही तसेच आहे. किंबहुना आश्चर्याची परमावधीच ही. पशुपक्षीदेखील हे आश्चर्य पाहून थक्क होतात. आपला हालताचालता सवंगडी एकाएकीच अगदी स्तब्ध झाला हे पाहून मुकी जनावरे, पण तीदेखील कशी तटस्थ राहतात आणि त्यांची ती तटस्थवृत्ती पाहूनही किती आश्चर्य वाटण्यासारखे आहे. एक जनन शिवायकरून ह्या जगतात मरणाइतके दुसरे गूढ कोडे काय असू शकेल! ह्या घडीपर्यंत तो प्राणी ह्या शरीरात ठाणे देऊन भोवतालच्या अनंत विश्वात टेहळणी करीत होता, तो आता कोठे नाहीसा झाला! तो आहे की नाही, का असून नसल्यासारखा आहे! सुखदु:खाच्या त्याच्या वेदना कशा, त्याचा अनुभव काय, त्याची स्थिती कशी? हे व असे इतर प्रश्न विचारणे सोपे आहे, पण त्यास समाधानकारक उत्तर कसे मिळणार? पुनर्जन्म, पुनरूत्थान इ. मधुर मुग्ध कल्पनांनी का खरे सांत्वन होणार आहे? आत्मा अमर आहे, ह्या उपजत श्रद्धेचे अवलंबन करू म्हटले तर तीमुळेच ना ह्या सर्व आश्चर्याला अवकाश? ती नसती तर पाण्यात विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे हे शरीर पंचत्वाप्रत पावले आणि बाकी शून्य उरले म्हणून केव्हाच स्वस्थ बसता आले असते. पण तसे नाही. शरीर नाहीसे झाले तरी काही शिल्लक रहात असावी, पण त्या काहीच्या व आमच्यामध्ये ह्या मरणाने घनघोर अंधकाराचा पडदा सोडिला आहे. इतर पडद्याच्या आड एकादा पदार्थ झाला तर तो पदार्थ नाही दिसला तरी त्याला आच्छादणारा पडदा तरी दिसतो. पण येथे पदार्थही दिसत नाही व स्वत: पडदाही दिसत नाही! ही किती आश्चर्याची गोष्ट.

पण आश्चर्य ही ज्ञानाची पहिली पायरी होय. तीव्र आश्चर्य वाटले की आपण ज्ञानाच्या आई आणि मरण ही त्या आश्चर्याची आई. ह्यावरून मरण म्हणजे केवळ भयावह नाही, केवळ आश्चर्यावह नाही, तर ज्ञानावहही आहे. ते आमच्या ठायी प्रेरणा करते, आमच्या कानात महाबोधाची फुंकर मारते! तो महाबोध कोणता म्हणाल तर मोक्षमुलर सांगतात, ‘जेव्हा एकादा आपल्यासारखाच मित्र एकाएकी गार होतो तेव्हा जवळ उभा असलेल्यास (आमच्या प्राथमिक पूर्वजास) समजून येते की पूर्वी काहीशी वस्तू त्याच्या ठायी असे ती आता येथे नाही. काहीसे निघून गेले.’ आत्म्यासंबंधी व तद्वारा सर्व धर्मसंबंधी ही आद्य श्रुती होय. स्पेन्सरसारखे समाजशास्त्री व टायलरसारखे मानवविकासशास्त्रीदेखील धर्माचे मूळ शोधीत असता हीच साक्ष देतात की धर्म साक्षात्काराचे आदी साधन म्हणजे प्राथमिक पुरूषास झालेले मरणाचे प्रथम दर्शन हेच होय. ह्यावरून मृत्यू हा आम्हांला आमच्याविषयी आत्मबोध व भोवतालच्या अनंताविषयी परमात्मबोध करून देणारा आदी धर्मगुरू होय असे होते. ज्याप्रकारे आरोग्य नाहीसे झाल्याविना आम्हांला आरोग्याची प्रतीती होत नाही त्याचप्रकारे कदाचित ह्या मरणरूपी आदिगुरूच्या साहाय्यावाचून आम्हांस आत्मप्रतीतीच झाली नसती. असो, जरी मरणाचे योगाने एवढे मोठे मोठे लाभ झाले आहेत, तथापि स्वत: मरण म्हणजे काय हा आमचा पूर्वीचा प्रश्न अद्यापि तसाच राहिला आहे!

ह्या गहन प्रश्नाचे उत्तर असे सहज मिळणारे नाही. जरी मिळालेतरी ते पटणार नाही. मरण ह्याचा खरा अर्थ समजण्यास अगोदर जीवन ह्याचा खरा अर्थ कळला पाहिजे. तो खरोखर कळणे किती कठीण आहे! हे जीवन म्हणजे काय, उगम कोठून, अंत कोठे, आधार कसा,चालक कोण, त्याचा हेतू काय वगैरे गोष्टी कळण्यास किती कठीण, जवळजवळ अशक्यच नाहीत काय? असे असून काही वेदांती म्हणतात की, हे दृश्य जीवन, हे मायिक जग, हे व्यवहारिक सत्य कळण्यास फार कठीण नाही, हे पुष्कळांस समजते पण ते गूढ ब्राह्मिक जीवन (Esoteric Advait) ते तात्त्विक जग मात्र फार थोड्या अधिकारी पुरूषांसच कळण्यासारखे आहे. पण आम्हांला तर ह्याच्या उलट प्रकार भासत आहे. केवल व अनंत अशी वस्तू ह्या विश्वात एकच असणार, अनेक केवलांची व अनंताची बुद्धीस कल्पनाही करवत नाही. म्हणून ज्ञानवादाने नुसते अद्वैत प्रतिपादणे हे आमच्या मताला मोठेसे कठीण दिसत नाही. तत्त्वज्ञानात साधारण गती झाल्याबरोबर ‘एकमेवाद्वितीयम्’ हा महासिद्धांत उघड दिसू लागतो. पण खरी अडचण येते ती ह्या दृश्य जगाचीच मीमांसा करतेवेळी, आणि तिच्यासंबंधी तर काही वेदांती ही केवळ माया आहे. पोकळ भास आहे असे सांगून थोडक्यात आटपू पाहतात. ‘ब्रह्म सत्यं’ हे कबूल पण जगत् मिथ्या हे कसे? खरा अद्वैत सिद्धांत जो सर्व विचारी मनास ग्रहण करावाच लागतो, तो कायम ठेवून जगत् जे ब्रह्माचेच कार्य, त्याची समाधानकारक मीमांसा करणे हे फार कठीण येथेच मोठा अधिकार पाहिजे. दृश्य जग म्हणजे आमच्यासारख्या जीवांच्याच जीवनाचे बनले आहे. ह्या जीवनाची मीमांसा कशी करावी? ह्याचे लक्षण काय? ह्याच्यापाशी प्रस्तुत मरणाचा कसा संबंध आहे? ‘मरणं प्रकृति: शरीरिणां विकृतिर्जीवितमुच्यते बुधै:|’ म्हणजे देही जो आत्मा त्याच्या आयुष्यात देहाचे मरण ही साहजिक घडणारी गोष्ट आणि देहाचे जीवित तोच मात्र एक विकास आहे, असे कालिदास सांगतो आणि मोक्षमूलर आपल्या पत्नीस लिहिलेल्या एका पत्रात म्हणतो, * “आम्ही तर मरणाच्या अटीवरच ह्या पृथ्वीवर जन्मतो, आणि शेवटी मरणच आम्हांस विधात्याकडे नेते” व तो आपल्या एका मित्राच्या पत्रात म्हणतो, S“मरण म्हणजे एका जीवनातून दुस-या जीवनात जाण्यासाठी एक पूल बांधला आहे.” इजिप्शियन लोकांच्या अतिप्राचीन थडग्यात जी नानाविध सामग्री आढळते त्यावरूनही असे सिद्ध होते की, ते लोक मरण म्हणजे जीवनक्रमातलाच एक विशेष प्रसंग मानीत असत. असो, पण अशा ह्या मरणाचा अधिक विचार करण्यापूर्वी विशुद्धि माग्ग नावाच्या बौद्ध ग्रंथात ८ व्या भागात मरणाचे जे दोन प्रकार सांगितले आहेत त्यांचा उल्लेख करणे बरे. ते प्रकार म्हणजे एक अकाली मरण, दुसरे साहजिक मरण हे होत. जीवनशक्तीचा पूर्ण विकास होण्यापूर्वीच अगर तो होऊन त्याचा पूर्ण उपयोग होण्यापूर्वी बाळपणी अगर तरूणपणी जे मरण घडते ते अकाली होय. ख-या रीतीने पाहिले असता हे मरणच नव्हे, हा अपघात. येथे कर्माची काय गहन गती असते अगर दुस-या शब्दांनी म्हणावयाचे झाले, तर ईश्वरी कसली गूढ योजना असते, हे सांगणे आमच्या ज्ञानाबाहेरची गोष्ट आहे. असंख्यात बालमृत्यू झाले, अगणित अर्धवट वाढीचे तरूण गेले आणि जूलिअस सीझरसारखे किंवा जीजस ख्रिस्तासारखे पूर्ण विकासलेले महात्मेही मध्येच विराम पावले, ही सर्व अपघाताचीच कोटी. विश्वाच्या ह्या अवीट वखारीत ही अशी मोडतोड का होते, इतका कच्चाच माल तयार होऊन बाहेर आणखी कोठे व कशासाठी जातो व शेवटी
ब-याचशा पक्क्या मालाची अपघाताने अशी धूळधाम का उडते ह्या गोष्टीचा खुलासा त्या एका विश्वकर्म्याशिवाय इतरांस होणे हल्लीच्या स्थितीत तरी शक्य नाही. नसो, पण ज्याअर्थी हे अपघात म्हणजे मुळी ख-या रीतीने मरणाच्या कोटीतच येत नाहीत त्याअर्थी मरण म्हणजे काय ह्याविषयी विचार करीत असता अशा अपघाताची नीट उपपत्ती झाली नाही म्हणून काही हरकत नाही. कारण ती होण्यासारखी असली तरी करू पाहणे अप्रासंगिक होणार आहे. तर आपण दुस-या व ख-या प्रकारचे मरण जे साहजिक मरण ज्याच्यासंबंधानेच कालिदासाचे व मोक्षमूलरचे उद्गार वर दिले आहेत, आणि जे म्हणजेच आमच्या मायिक अथवा दृश्य (Phenomenal) जीवनाचा अंत आणि ब्राह्मिक अथवा तात्त्विक (Nuomenal) जीवनातला एक अति महत्त्वाचा प्रसंग होय. जे मरण जुलीअस सीझरला आले नाही तरी आगस्टस सीझरला आले, जे मरण येशूख्रिस्ताला आले नाही तरी गौतमबुद्धाला आले आणि जे मरण आता आमच्या महर्षी देवेंद्रनाथाला आले आहे, त्याचविषयी आता आपण काहीसा विशेष विचार करू या.

वर म्हटले आहे की, मरणाचा खरा अर्थ कळण्यास अगोदर आपल्यास जीवनाचा खरा अर्थ कळला पाहिजे. आता आपण अशी कोणती एक वस्तू आहे ती शोधू की, जी ह्या जीवनात सारभूत आहे, की जिच्यासाठीच आम्ही ह्या जीवनास चिकटून राहतो आहो, इतकेच नव्हे तर ह्या जीवनातून आम्ही ह्या जीवनास चिकटून राहतो आहो, की जिच्यासाठीच आम्ही ह्या जीवनास चिकटून राहतो आहो, इतकेच नव्हे तर ह्या जीवनातून बाहेर गेलेल्यासही जिच्यामुळे आपण आपल्याकडे ओढीत आहो. एकदम सांगून टाकावयाचे म्हटले तर ती वस्तू प्रेम ही आहे. ह्या प्रेमाविण जीवन जीवनत्वास मुकते आणि मागे नुसते अस्तित्व मात्र उरते, तुम्ही म्हणाल प्रेमाशिवाय कर्तव्य हे क जीवनाचे अंग आहे. पण कर्तव्य म्हणजे काय? केवळ नियम पाळणे. चंद्र, सूर्य, सारी जड सृष्टी सतत नियम पाळीत आहे आणि ती म्हणजे नुसत्या अस्तित्वापलीकडे काय आहे? तुम्ही म्हणाल जाणीव हेही एक दुसरे अंग आहे, पण जाणीव म्हणजे काय? केवळ बिंबप्रतिबिंब भाव. स्वच्छ आरशातही हा भाव असतो. म्हणजे आरशात जशी बाह्य वस्तूचे प्रतिबिंब दाखविण्याची शक्ती आहे तशी मनात जी शक्ती आहे ती जाणीव आणि हा आरसा, अथवा ही प्रतिहत पारदर्शकता म्हणजे काय, तर केवळ अस्तित्व! केवळ अस्तित्वमय कर्तव्यातून जीवनमय कर्तव्यात आम्हांस कोण आणून सोडतो! एक प्रेम. केवळ अस्तित्वमय जाणिवेतून म्हणजे बिंबभावातून जीवनमय जाणीवेत अगर ज्ञानात आम्हांस कोण आणते? एक प्रेम! तर जीवनाचे खरे लक्षण आणि सार, प्रेम हेच नव्हे काय?

पण प्रेम ह्या शब्दाची व्यवहारात केव्हा केव्हा अगदी भलत्याच अर्थी योजना होत असते. एकाद्याचे एकाद्या वस्तूवर प्रेम जडते म्हणून तो त्या वस्तूचा अपहार करतो असे आम्ही म्हणतो. पण येथे जी आसक्ती जडते ती प्रेम नव्हे, तर निव्वळ क्षुधा म्हणजे प्रेमाची अगदी उलट बाजू होय. प्रेमी मनुष्याने आपल्यास एक पदार्थ आवडतो म्हणून तो गिळून बसणे, हे प्रेम नव्हे, तर त्याप्रीत्यर्थ त्याने स्वत:स अर्पण करणे हे प्रेम होय. प्रेमाच्या विषयापुढे प्रेमी आपल्या स्वत:स विसरतो किंवा त्याशी तादात्म्य पावतो म्हणावयाचा. मोक्षमूलरने आपल्या प्रिय पत्नीस लिहिलेल्या दुस-या एका पत्रात म्हटले आहे:

S “आम्ही व इतर आत्मे ह्यांमध्ये जे कित्येक उपाधीचे पडदे पडले आहेत ते एकीकडे सारणे म्हणजेच प्रेम करणे होय. ईश्वराचे ठिकाणी आम्ही सर्वांचा जो ऐक्यसंबंध आहे व जो ह्या संसारात अनेक अदृष्ट कारणांमुळे तुटलेला असतो तो पुन: जोडणे म्हणजे तेच प्रेम होय.”

हे प्रेमच जीवनाचे लक्षण किंवा मुख्य हेतू होय. ह्याशिवाय जीवन हे जीवनत्वास मुकते असे वर म्हटलेच आहे. जीवनाच्या अगदी प्राथमिक कोटीतही हे काष्टातल्या अग्नीप्रमाणे गुप्त रूपाने असतेच. पशुकोटीत ते प्रथम अगदी स्थूलमानाने प्रकट होते. अत्यंत हिंस्त्र वाघीण, पण तिच्या पिलास क्षुधा लागल्याबरोबर तिला वेदना होते व आपले भक्ष्य ती त्यांच्यापुढे ठेवून आपण स्वस्थ बसते. मग मुलास जखम झाली असता मानवी आईच्या नेत्रांत अश्रू यावेत, मुलास दुखणे आले असता आईने पथ्य सांभाळावे ह्यात काय नवल? ह्या प्रकारे बालक व जननी ह्यांमधलाच द्वैताचा पडदा दूर होऊन जीवनाचे कार्य आटपते असे नव्हे तर व्यक्तीच्या जीवनाचा विकास जसजसा अधिक होतो तसतसा व्यक्ती आणि कुटुंब, व्यक्ती आणि जात, व्यक्ती आणि राष्ट्र, आणि अखेरीस व्यक्ती आणि विस्व ह्यांमधील पडदा क्रमाक्रमाने गळून पडतो. अशाप्रकारे व्यक्तीची मर्यादा अनंतत्वाप्रत पावल्यावर तिच्या आतापर्यंतच्या मर्यादित जीवनाचा शेवट अगर कळस होऊन अत:पर तिच्या अमर्याद जीवनास सुरूवात होते. मग त्या सुखाचे सोहाळे काय वानावेत! त्याला उपमा कसली द्यावयाची आहे.

तुकोबा म्हणतात:
आपुले मरण पाहिले म्या डोळा| तो जाला सोहळा अनुपम्य ||धृ||
आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने| सर्वात्मकपणे भोग झाला||१||
एकदेशी होतो अहंकारे आथिला| त्याच्या त्यागे जाला सुकाळ हा ||२||
फिटले सुतक जन्ममरणाचे | मी माझ्या संकोचे दूरी जालो ||३||
नारायणे दिला वसतीस ठाव | ठेवुनिया भाव ठेलो पायी ||४||
तुका म्हणे दिले उमटुनी जगी | घेतले ते अंगी लावुनिया ||५||

ह्याप्रमाणे मरण म्हणजे मुक्तीचे द्वार. आणि ते वर म्हटल्याप्रमाणे आम्ही आपल्या डोळ्यानेही पाहू शकतो. मरण म्हणजे देहाचे विसर्जन अवश्य झालेच पाहिजे असे नाही. किंवा विसर्जन झाले म्हणूनही काही वाईट झाले असे नाही. देहीच विदेही दशा भोगीत असता देह गेला काय राहिला काय सारखेच. मरण म्हणजे मर्यादित अथवा एकदेशीय जीवनाचा अंत किंवा केवळ कळस, अथवा आत्म्याचे पूर्णपणे जागे होणे. देह व इंद्रियगण ही सर्व त्या आत्म्यास जागे करण्याचे उपाय होत. एकाद्या सार्वभौम राजेंद्रास जागे करावयाचे झाल्यास प्रात:काळी त्याची पट्टरामी येऊन प्रथम पाय चेपू लागते, कंचुकी मंदमंद वारा घालितो व बंदीजन त्याच्या पूर्वजाचे यश मंजूळ स्वरात गाऊ लागतात. पण राजेश्वर एकदाचे खडखडी जागे झाले की, बंदीजनांचे गायन व सर्व उपचार बंद होतात, मग त्याला त्या गायनाचा गोंगाट नकोसा होतो. त्याचप्रकारे आत्म्याला एकादाचा पूर्ण प्रेमबोध मिळाला की, मग त्याला ह्या मर्यादित जीवनाच्या अंथरूणात पडून रहावयास नकोसे वाटते. ही हाडाकातड्याची झोळ झुगारून द्यावीसे वाटते. इंद्रियगण व त्यांचे विषय जी जागृतीची साधने त्यांचीही त्याला जरूरी राहत नाही. एकनाथांनी मार्मिकपणे म्हटले आहे:-

*नवा ठाई फाटला झगा | तो नये तुझे उपयोगा||
विषय भोगीत अंगा| तो मज दान पिंगळिया||
तेणे टळेल तुझी पीडा | चुकेल मीतूपणाचा झगडा||
स्वरूपी होईल आनंद गाढा | श्रीजनार्दन प्रसागे ||
एका जनार्दनी प्रेम बोध | प्रगट होय संवाद ||
पिंगळा भाकितसे प्रबोध | परोपकार जाणे गा राया ||
(डुगडुग्या, भजनी भारूड संग्रह.)

असो. एकूण मरण म्हणजे काही अशुभ व दु:खाचा प्रसंग नव्हे तर स्वरूपी होणार ‘गाढा आनंद’, असे एकनाथ स्वामी सांगतात. नारायणाने अंगी लावून घेतले म्हणून अनुपम सोहळा असे तुकाराम साधू म्हणतात. तोच अर्थ इंग्रजीत Restoration of union असे भट्ट मोक्षमूलर सांगतात! पण असे मरण यावयाला आम्ही आपले जीवन कसे घालविले पाहिजे हे आता निराळे सांगावयास नकोच. गौतमबुद्धाला असे मरम अथवा निर्वाण प्राप्त झाले. आमच्या महर्षी देवेंद्रनाथालाही हेच मरण आले. प्रयत्न केल्यास आम्हा सर्वांनाही हाच निर्वाणाचा सोहळा गाजावा असा ईश्वरी संकेत आहे. जयजयकार असो त्याच्या मंगल योजनेचा!

मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना-३

देवाची पूजा हे भूताचे पाळण| मत्सर तो शीण बहुतांचा||१|
                                           -तुकाराम

ईश्वरावर श्रद्धा बसण्यास आपण भूतमात्राचे ठिकाणी आदरबुद्धी ठेविली पाहिजे व त्यावरील भक्ती दृढ करण्यास मनुष्याशी स्नेहभाव अखंड वाढविला पाहिजे, ह्या दोन गोष्टींविषयी मागे विचार केला आहे. ईश्वराबद्दल आपल्या मनात श्रद्धा उत्पन्न होऊन त्याची भक्ती बाणल्यानंतरची तिसरी गोष्ट म्हटली म्हणजे त्याची पूजा, उपासना, आराधना करणे ही होय. म्हणजे सदैव त्याच्या इच्छेला आपली इच्छा अनुसरून राखणे हे होय. श्रद्धेचे पर्यवसान भक्तीत आणि भक्तीचे सेवेत झाले तरच ती स्थिती खरी म्हणता येईल. आता ही पूजा करण्यास गंध, पुष्प, धूप, दीप इत्यादी पूजेच्या उपकरणांची, किंवा भव्य मंदिर, सुस्वर गायन, नामांकित वक्तृत्ववान उपासक ह्या बाह्य साधनांची, किंबहुना गहन विचार, गूढ ज्ञान, सूक्ष्म कल्पना आणि साक्षात्कार इत्यादी अंत:साधनांचीही आवश्यकता आहे असे मुळीच नाही. प्रपंचात राहून आपले नित्याचे व्यवहार करीत करीतच ईश्वरोपासना साधणे हे अगदी शक्य आहे. ‘देवाची पूजा हे भूताचे पाळणे’ असे तुकारामबुवा म्हणतात “ईश्वरावर प्रीती, पूज्यबुद्धी व अनन्यभाव ही ठेवून त्याप्रमाणे त्याचे मनाने भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे हीच त्याची खरी उपासना होय.” असे प्रार्थनासमाज सांगत आहे. म्हणून आपण आज परमार्थाचे तिसरे प्रापंचिक साधन (मनुष्यसेवेच्याद्वारे ईश्वरोपासना) कसे घडते ह्याचा विचार करू.

ईश्वरविषयक पद्ये गाऊन, ब्रह्मांडी आत्मा नेऊन मुक्तदशेप्रत जाऊन, सर्वसंगपरित्याग करून, मन निश्चल करून, ईश्वराची पूजा होईल. ईश्वरपूजेचा हा मार्ग आम्हांला नापसंत आहे किंवा कमी महत्त्वाचा वाटतो असे मुळीच नाही. पण मनुष्याची सेवा केल्यानेही (निष्कामपणे लोककल्याणासाठी झटल्याने) ईश्वरोपासना उत्तम रीतीने घडते हेच आज सांगावयाचे आहे.

श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्|
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्||

वगैरे नवविधा भक्तीचे सर्व प्रकार ह्या सेवाधर्मानेही घडतात. पण मनुष्याची सेवा करीत असताना त्याचा पायपोस डोक्यावर घ्यावा लागल्यामुळे अंगामध्ये जशी आणि जितकी कसलेली विनम्रता बाणते, तशी आणि तितकी मंदिरामध्ये कितीही प्रेमळ प्रार्थना ऐकल्याने बाणणार नाही. आपल्या धनदौलतीचे व इतर बडेजावीचे विस्मरण झाल्याशिवाय, मनातील ताठा व अहंभाव पूर्ण नाहीसा झाल्याशिवाय ह्या सेवासदनामध्ये मुळी शिरकावच होणे कठीण पडते मग एकदा शिरकाव होऊन सेवा करीत राहिल्यावर मन नम्र झाल्याशिवाय राहील असे होणार नाही. नम्रतेशिवाय आणखी दुसरे सेवाधर्माने मिळणारे फळ म्हणजे मनाची अखंड शांती हे होय. केवळ ज्ञानाने, अनुभवाने, तर्काने किंवा श्रवणाने मिळणारी शांती केव्हा ना केव्हा भंग पावणारी असते, पण सेवाधर्माने प्राप्त झालेली शांती अखंड आणि अभंग अशी असते. कारण, शांतीचा भंग करणा-या सर्व काही कारणांना न जुमानण्याची सवय ह्या सेवाधर्मातच लागण्याचा संभव आहे. सेवाधर्मानेच लागण्याचा संभव आहे. सेवाधर्मानेच मनाला एकाग्रता येते. ध्यान करीत असताना अंत:करण शुद्ध होते खरे, पण केवळ ध्यानाने त्यास तशी सवय लागत नाही. आत्मपरीक्षणाच्या तीव्र कसोटीस उतरण्याला सेवाधर्म हाच एक मार्ग आहे. आपण बरे करीत असताना लोक मत्सराने किंवा अज्ञानाने वाईट का म्हणतात! किंवा आपण धडधडीत वाईट करीत असताना लोक बळेच मतलबान किंवा भोळेपणाने आपले विनाकारण देव्हारे का माजवितात! ह्या दोन्ही परस्पर भिन्न अनुभवांचा विचार करून, अशा ह्या व्यर्थ निंदास्तुतीपासून आपल्याला दूर कसे ठेवावे हे सेवेशिवाय साधणार नाही. ह्यावरून सेवेमध्ये भक्तीचे नऊच नव्हे तर अनेकविध सारेच प्रकार आणि त्यांची फळेही लाभतात हे दिसून येईल.

स्वत:च्या आप्तांच्या, जातीच्या, किंवा देशाच्या उत्कर्षाकरिता झटणे हाही सेवाधर्मच होय. पण त्यामधील स्वत:चा मध्यबिंदू पुसून टाकून केवळ नि:स्वार्थपणाने जर आम्ही सेवा करू तर ती अधिक श्रेष्ठ होईल. ह्या सेवेची किंमत आणि तिचे महत्त्व तिच्या प्रमाणावर नसून तिच्या प्रकारावर आहे. म्हणजे पुष्कळ लोकांचे आपण कल्याण करीत असू, पण ते “आपले” लोक आहेत अशा भावनेने जर करीत असू तर त्याची किंमत एकाच मनुष्यावर पण नि:स्वार्थपणाने केलेल्या उपकारापेक्षा कमी मानता येईल. स्वार्थाने आणि अहंभावाने एकाद्या संग्रामात मिळविलेल्या द्ग्विजयाची किंमतही एका अनाथ विधवेस दु:खातून मुक्त करणे, निराश्रित वृद्धाची आजारात शुश्रुषा करणे, अनीतीच्या आडवाटेने अडखळणा-यास सरळ वाट दाखविणे, किंबहुना तान्हेलेल्यास पेलाभर पाणी देणे ह्या साध्या दिसणा-या गोष्टीहूनही कमी आहे.

ईश्वराची आराधना करणे म्हणजे तो मनुष्यासारखा स्तुतिप्रिय आहे, किंवा मनुष्याप्रमाणेच काही तरी इकडचे तिकडे त्याला खूष ठेवण्याची जरूरी आहे, अशातला मुळीच प्रकार नाही, किंवा वरील जे उपकाराचे प्रकार सांगितले ते वेळप्रसंग पडल्यास त्यांची फेड इतरांकडून आपणास व्हावी अशा बुद्धीने करावेत असेही नाही तर दुस-याची दु:खे आणि गरजा पाहून आपल्यामध्ये अनुकंपेची जी प्रेरणा होते, ती ईश्वरानेच केलेली एक सूचना असे समजून ती मानली पाहिजे, एरवी ईश्वराच्या स्तुतीचे उगीच अवडंबर माजवून त्याची आज्ञा न पाळल्यास त्याची उपासना केली असे कधीच होणार नाही. अशी फाजील स्तुती व तोंडपुजेपणा साधारण मनुष्यालाही आवडत नाही, मग सर्वज्ञ परमेश्वरास तो कसा गोड लागेल?

ह्या वरील विवेचनावरून प्रपंच आणि परमार्थ ह्यांमध्ये एकवाक्यता कशी आहे हे दिसून येईल. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ ही निरनिराळ्या स्थळी आहेत ही जशी अडाणी समजूत आहे, तशीच प्रपंच आणि परमार्थ हे दोन भिन्न मार्ग आहेत, ही अडाणी समजूत आहे. हे दोन भिन्न नसून एकच आहेत.

  1. मनुष्यजन्माची सार्थकता
  2. मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती-४
  3. मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
  4. मँचेस्टर कॉलेज
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
Page 15 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी