1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

टिळकांच्या मानपत्रास विरोध

 ता. १/१२/१९१९ साली टिळक विलायतेहून परत पुण्यास आले, तेव्हापासून ते थेट त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या काळात त्यांना ठिकठिकाणी ब्राह्मणेतरांच्या व प्रागतिकांच्या प्रखर विरोधास तोंड द्यावे लागले. त्यांना पुणे येथील नागरिकांतर्फे मानपत्र देण्याचे जाहीर झाले होते. त्यास विरोध करणारे असे पत्रक "पुण्याच्या नागरिकांस जाहीर विनंती" ह्या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आले होते. ह्या पत्रकावर प्रमुख अशा १२५ वर नागरिकांच्या सह्या होत्या. त्यात "विजयी मराठा"कार श्रीपतराव शिंदे "जागरूक"कार वा. रा. कोठारी, केशवराव बागडे, दिनकरराव जवळकर, केशवराव ढेरे, हरिश्चंद्र नारायणराव नवलकर, मोतीचंद व्होरा, लक्ष्मण सावळाराम काटे, प्रागतिक पक्षाचे रँग्लर र. पु. परांजपे, अस्पृश्य पुढारी शिवराम जानबा कांबळे, सीताराम बाबाजी लांडगे ह्यांच्या प्रमुख सह्या होत्या. कर्मवीर शिंदे ह्यांनी आपली सही करताना हस्तपत्रिकेत पुढीलप्रमाणे मतप्रदर्शन केले होते. "सामाजिक बाबतीत रा. टिळकांचे धोरण समतेच्या व स्वयंनिर्णयाच्या तत्त्वास विघातक असल्याकारणाने त्यांना पुण्याच्या सर्व नागरिकांतर्फे मानपत्र देणे योग्य नाही. ह्या वैगुण्यामुळे ते माझ्या मते खरे राष्ट्रीय पुढारी नाहीत."

"महात्मा फुले हे असामान्य पुरुष होते. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रात ब्रह्मो समाजापेक्षाही अधिक कार्य केले आहे. ह्या समाजाचे ध्येय उच्च आहे. जोतिरावांनी लिहिलेले 'सत्यधर्म' पुस्तक हे सत्यशोधकांचे बायबल आहे. हे पुस्तक ब्रह्मो समाजाच्या प्रार्थनेच्या वेळी आम्ही घेतो. मी छातीला हात लावून सांगतो की, जोतीरावांचे चरित्रांत महाराष्ट्राचा महत्त्वाचा इतिहास ग्रथित झालेला आहे. दांभिक देशभक्तांपेक्षा त्यांची देशभक्ती फारच वरच्या दर्ज्याची आहे." (फुट नोट – विजयी मराठाकार श्रीपतराव शिंदे, लेखक मा. श्री. शिंदे, पृष्ठे ३१ व ३२. श्री. पं. सी. पाटीलकृत म. फुले चरित्र, पान २०६.)

जलप्रवास

विभाग पहिला : प्रवासवर्णन  

प्रयाण
आगबोट पर्शिया
तरूण भार्या, तान्हे बालक, वृद्धही माता-पितरे|
अनाथ भगिनी, बंधु धाकुटा, आश्रित बांधव सारे||
आलो टाकुनिया| पदरी घेई वयामया||१||

शनिवार तारीख २१ सप्टेंबर १९०१ रोजी सकाळचे १०|| वाजता रा. कोरगावकरांचे घरातून निघालो तेव्हापासून वियोगाच्या तीव्र वेदनांस सुरूवात झाली. बॅलर्ड पियरवर माझ्या आधी बरीच मित्रमंडळी जमली होती. गुरूजन आशीर्वाद देऊ लागले. मित्रमंडळ अभिष्टचिंतन करू लागला. काहीजण प्रवासात उपयोगी अशा महत्त्वाच्या सूचना करू लागले. अशी एकच गर्दी उडाल्यामुळे मी भांबावल्याप्रमाणे झालो होतो. अशा स्थितीत मी काहींचा मुळीच निरोप घेतला नसेन, काहींस मी उत्तरे दिली नसतील. त्या सर्वांची मी आता प्रांजलपणे क्षमा मागीत आहे. १२ वाजता प्लेग-डॉक्टरची तपासणी सुरू झाली. १२|| वाजता मी सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन निघालो. दारावर आत सोडताना रखवालदाराने थोडासा दांडगाईचा प्रसंग आणिला, पण हिंदुस्थानातील निदान २ वर्षेपर्यंत तरी ही अखेरची असल्यामुळे मी ही कौतुकाने सहन केली! तपासणी एका मिनिटातच आटोपली. एकदा आत गेल्यावर जाणारांची आणि पोचविण्यास आलेल्यांची नुसती नजरानजरही होत नाही, म्हणून दोघांसही फार वाईट वाटते. मी मचव्यात बसल्यावर, मला न भेटलेल्या बाहेरच्या तिघा मित्रांकडून, पुन: भेटून जाण्याबद्दल ३ चिठ्या आल्या. पण इतक्यात मचवा निघाल्यामुळे, माझा नाइलाज झाला. हळूहळू माझा मायदेश डोळ्यांदेखत अंतरू लागला. परदेशगमनाचा विचार प्रथम आल्यापासून तो आतापर्यंत मी सारखा धांदलीत असल्यामुळे स्वीकृत गोष्टीचे पूर्ण स्वरूप डोळ्यांपुढे आले नव्हते, ते मी मचव्यात स्थिरपणे बसल्यावर प्रत्यक्ष दिसू लागल्यामुळे ह्या पाच मिनिटांत मनाच्या ज्या कित्येक कधीच न अनुभविलेल्या भावना झाल्या, त्या लिहून व्यक्त करणे केवळ अशक्य आहे! वियोग मूर्तिमंत पुढे उभा राहून माझ्या जिवलग माणसांची उदास व खेदमय दिसणारी चित्रे मला एकामागून एक दाखवू लागला. अशाच कष्टमय स्थितीत मला दोन वर्षे काढावी लागतात की काय अशी धास्ती पडली. पण अखेरची मनाची भावना प्रार्थनामय झाली. विरहवेग कमी होऊ लागला. किंचित शांत दृष्टीने किना-याकडे पाहू लागलो, तो ह्या प्रवासाची मनात प्रेरणा होण्यास जी पर्यायाने कारण झाली आहे, ती मुंबई युनिव्हर्सिटी जणू काय हात वर करून आशीर्वाद देत आहे, असे दिसले.

याप्रमाणे मी १ वाजता पर्शिया आगबोटीवर दाखल झालो. नंतर एका तासाने माझे सर्व सामान मला मिळाले. २|| वाजता आम्ही सर्व मिळून जेवणास बसलो. जेवण चालले असता आगबोट सुटून केव्हा चालू लागली होती हे काही वेळ कळलेच नाही. एंजीनची धडधड लांबून किंचित ऐकू येत होती. ग्लासातील पाणी देखील सहज दिसण्यासारखे हालत नव्हते. ३ वाजता जेवण आटपून घाईने डेकवर येऊन पाहतो तो कुलाब्याचा दीपस्तंभही मागे राहिला होता.

३|| वाजता १० लाख वस्तीच्या मुंबई शहरास मला क्षितिजात शोधून काढावे लागले! ४| वाजता मुंबईजवळच्या डोंगरांचाही कोठे मागमूस लागेना!! सभोवार क्षितिजाचे विशाल वलय पसरलेले, वरती ढग, खाली लाटा, याशिवाय आसमंतात दृश्य पदार्थ काय तो आगबोटीतून निघणारा धुराचा लोट हाच होता. खरोखर हा देखावा साक्षात दगडालाही कवित्वाची स्फूर्ती करणारा आहे! बोटीच्या अगदी पिछाडीच्या टोकावर-म्हणजे मजकडून होईल तितके करून माझ्या देशाजवळ- मी सुमारे एक तासभर हा देखावा पाहात चित्राप्रमाणे तटस्थ उभा होतो. बोट वेगाने चालली असता पाणी दुभंगून तिच्या मागे कोनाकृती धार दिसत होती. बाजूने पाण्याचे तुषार उडून त्यावर ऊन पडून त्यातून इंद्रधनूष्य दिसे. संध्याकाळनंतर रात्री चांदणे पडले आणि समुद्राने आपला पेहराव बदलला. दुसरे दिवशी पहाटेस उठून पोशाक करून डेकच्या अगदी आघाडीस गेलो. हा देखावा कालच्यापेक्षाही अधिक मोहक व प्रेरक होता. आकाश अगदी निरभ्र असल्याकारणाने समुद्र त्याच्या रंगाने रंगला होता, आणि बोटीतून धूर निघालेला दिसत नसल्यामुळे, चहूंकडे ऐक्य नांदत होते. अत्यंत पुरातन सागर महामुनी शांत व गंभीर रूप धारण करून ‘एकमेवाद्वितीयम्’ ह्या महामंत्राचा आपल्याशीच पाठ करीत संध्यावंदन करीत बसलेले दिसले. त्यास पाहून प्रत्यक्ष पापमूर्तीचाही संत बनेल ह्यात शंका नाही!!

पर्शिया आगबोट:- कॅलिडोनिया, अरेबिया ह्याप्रमाणेच पर्शिया आगबोटही फार मोठी आहे. ही लांबीने सुमारे एक फर्लांग म्हणजे १/८ मैल व रूंदीने मध्ये २२ यार्ड आहे. ऊंचीने ४/५ मजली इमारतीइतकी भरेल. वजन ७,००० टनांपर्यंत नेऊ शकते. हिजमध्ये ५३० प्रवाशांची सोय आहे. पण ह्या खेपेस प्रवासी फार थोडे म्हणजे केवळ ७५ च होते. हिचा वेग दर तासास १५ मैल पडतो. पहिले दिवशी ३१८, दुसरे दिवशी ३५८, तिसरे दिवशी ३५५ मैल ह्याप्रमाणे ही चालते. हिला दोन धुराडी आहेत. समुद्र खवळून केव्हा केव्हा तुषार आत येतात, म्हणून आगबोटीच्या बाजूस पुष्कळ आणि मोठ्या अशा खिडक्यांची योजना करिता येत नाही. ह्यामुळे चोहीकडे वारा खेळावा, विशेषेकरून खालच्या मजल्यात हवा पोचावी म्हणून अशी योजना केली असते की, मोठाले २|३ फूट रूंदीचे बंब खालपासून वरपर्यंत नेऊन त्यांची तोंडे पुष्कळशी पसरट करून हवेत निरनिराळ्या दिशेने वळवून दिलेली असतात. तेणेकरून वारा कसाही वाहत असला, तरी त्यांच्या तोंडांत सापडून खाली उतरतो. असे बंब सुमारे ४० आहेत. प्रकाशासाठी खालच्या मजल्यात २४ तास एकसारखे विजेचे दिवे जळत असतात. बोटीला एकंदर पाच मजले आहेत. तळमजला पाण्याखाली आहे. त्यामुळे त्यात अंधार असतो. त्यात जड सामान आणि माल भरलेला असतो. दुस-या मजल्यास लोअर डेक म्हणतात. दुस-या वर्गाचे ह्या डेकवरील मुंबईपासून लंडनपर्यंत एका जागेचे भाडे ५२२-५० रूपये पडते. पाण्यावरचा हा पहिलाच मजला असल्याकारणाने, प्रकाश आणि हवा येथे पुरेशी नसतात. वरचेवर एखादी लाट खिडकीवरून जाते म्हणून ती नेहमी जाड भिंगाने बंद ठेवावी लागते. तिस-या मजल्यास मेनडेक म्हणतात. मी ह्यात दुस-या वर्गाचे तिकीट घेतले आहे, त्यास लंडनपर्यंत ६०० रूपये भाडे पडले. ह्यातील खोलीत अधिक सोयी असून, खिडकी नेहमी उघडी ठेविता आल्यामुळे, हवा व प्रकाश मुबलक असतात. शिवाय अंथरूणावर पडल्या ठिकाणाहूनच खिडकीतून समुद्राचा सर्व देखावा नजरेस पडतो. चवथ्या मजल्यास डेक किंवा अपर डेक म्हणतात. येथे दुस-या वर्गाच्या जागा नाहीत. मंडळीस हिंडण्यास, फिरण्यास, आराम खुर्च्यांवर बसण्यास किंवा काह खेळ खेळण्यास दोन्ही बाजूंस दोन ग्यालरीसारख्या ४० यार्ड लांब व ५|६ यार्ड रूंद अशा खुल्या जागा आहेत. मध्ये सुमारे १० यार्डांची चौरस धूम्रपानाची खोली आहे. पहिल्या वर्गाच्या मात्र ह्या मजल्यातही खोल्या आहेत. एका प्रवाशास सबंध एक खोली मिळते. तिचे भाडे लंडनपर्यंत सुमारे ८२२ रूपये पडते. पाचवा मजला उंच गोपुरासारखा आहे. येथे कोणी जात नाहीत. पण येऊन सर्व क्षितिज नजरेस पडते.

केबिन:- एक एक खणाची एक खोली असते. तीन केबिन म्हणतात. लोअर डेकवर एका केबिनमध्ये तिघांची व मेनडेकवर एकीत चौघांची सोय केलेली असते. प्रत्येकाच्या जाग्यास बर्थ म्हणतात. त्यावर नंबर मांडलेला असतो. असे एकंदर ५३० नंबर आहेत. प्रत्येकाकरिता एक गादीवर चादर आंथरलेली, एक ब्लँकेट, एक पासोडी, दोन मोठ्या व मऊ उशा आणि एक मोठा टॉवेल इतके सामान भिंतीत अडकविलेल्या दोन गजांवर व्यवस्थेने ठेवून एक अंथरूण बनविलेले असते. ही दोन खाली आणि दोन त्यावर असतात. भिंतीत एक शिसवीचे टेबल असते, त्यात एकावर एक असे चार खण असतात. समोर दुसरे एक टेबलासारखे असते त्यावर एक मोठा गोल आरसा लटकलेला असतो. त्याचेखाली एक फडताळ असते, ते उघडल्याबरोबर तोंड धुण्याचे एक जाड चिनी भांडे बाहेर येते. त्याचे मागेच दोन पेल्यांतून दोन साबण ठेवलेले असतात. दोन्ही बाजूंस दोन स्वच्छ रूमाल टांगलेले असतात. तोंड धुणे आटपल्यावर फडताळ उचलून झाकल्याबरोबर त्यातील पामी खाली जाऊन सर्व पूर्वीप्रमाणे पेटीसारखे दिसते. आरशाच्या मागे एक काचेचा तांब्या व दोन ग्लास पिण्याचे पाणी भरून ठेवलेले असतात. अशा पेट्या दोन असतात. बारीक सामान ठेवण्यास चार जाळ्या आणि कपडे ठेवण्यास १२ खुंट्या असतात. एक विजेची बत्ती असते, ती संध्याकाळी आपोआप लागते. तिच्याखाली एक बटण असते. ते फिरविल्यास आपल्या मर्जीप्रमाणे ती विझविता येते. शिवाय एक मेणबत्तीचे शेड असते. वरती माळ्यावर चार लाईफ बेल्टस् असतात, २ इंच जाड व १ फूट लांब असे कॉर्कचे तुकडे दुहेरी एकत्र बांधून आपल्या पोटाभोवती बांधण्यास एक पट्टा तयार असतो. अपघाताचे वेळी हा पट्टा बांधून पाण्यात पडल्यास मनुष्य बुडत नाही.

डायनिंग सलून:- हा एक सुरेख दिवाणखाना आहे. त्यात दोन्हीकडे चार चार खुर्छ्या ठेविलेल्या अशी पाच टेबले एकापुढे एक मांडली आहेत. अशा पाच टेबलांच्या दोन्ही बाजूंस दोन रांगा असून मध्ये एक मोठे न्याहारीचे टेबल ठेविलेले आहे. सकाळी ६|| वाजता चहा, रोटी, लोणी, फळे इ. असतात. ८|| स न्याहारी, १||  ला मुख्य जेवण, ४|| वाजता फराळ, ६|| ला चहा आणि रात्री ९|| वाजता फराळ, असा नेहमीचा क्रम असतो. ह्या सर्व प्रसंगी सर्व मंडळी हॉलमध्ये जमते, आणि आपापल्या ओळखीप्रमाणे जागा पसंत करते. सकाळचा चहा व रात्रीचा फराळ सोडून बाकी सर्व प्रसंगी जेवणास कोणते पदार्थ तयार केले आहेत त्यांची यादी कार्डावर छापून ती कार्डे टेबलांवर मांडलेली असतात. प्रत्येक टेबलाजवळ एक स्टुअर्ड (वाकनीस) उभा असतो. क्रमाने सर्व पदार्थ आपलेकडे हा वाकनीस आणितो. आपल्यास लागेल तो लागले तितका आपण घ्यावा. प्रत्येक वेळी सात किंवा अधिक पदार्थ असतात. कलकत्त्याची कढी, फ्रान्सचे वाटाणे, यारमाउथचे मासे, इटलीची आमटी, सार्डिनियाचे अमुक आणि रंगूनचे तमुक, अशी यादीतील चटकदार नावे वाचून नवख्यास मोठी मौज वाटते. तरी प्रत्यक्ष पदार्थ पाहीपर्यंत नुसत्या यादीवरून काही कल्पना होत नाही. हा सर्व थाट आणि हे प्रकार पाहून नवीन  मनुष्य सहजच वाजवीपेक्षा अधिक खातो आणि दोन दिवसांनी कू लागल्यावर म्हणतो की आपल्यास बोट लागली!

स्नानगृह:- एका खोलीत एक हौद कंबरेइतका खोल असतो. त्यात एक ऊन पाण्याची व एक थंड पाण्याची अशा दोन तोट्या असतात. हा दोन्ही मोकळ्या करून आपल्यास लागेल तसे गरम पाणी करून घेता येते. पण हे पाणी खारे असते म्हणून एका वेगळ्या पिंपात गोडे पाणी ठेविलेले असते. हौदातल्या पाण्याने स्नान केल्यावर या गोड्या पाण्याने अंग धुवावे. खा-या पाण्यात आपला नेहमीचा साबण चालत नाही म्हणून, खा-या पाण्याचा साबण किंवा सीसोप वेगळा मिळतो तो येताना आपण आणावा. येथे मिळत नाही.

करमणूक:- धूम्रपानाचे खोलीत बुद्धिबळाचा आणि दुसरा कसलासा खेळ मांडलेला असतो. शिवाय पत्ते गंजीफा मिळतात. इतर २|३ प्रकारच्या व्यायामाच्या खेळांचीही योजना आहे. डेक स्टुअर्ड एका बाजूस क्रिकेट खेळण्यास जागा करून देतो, तरट हांतरून पिच तयार करतो. पहिल्या वर्घाकरिता पियानो वगैरेची अधिक व्यवस्था असते. लायब्ररीतून आपलय् नावावर पुस्तके वाचण्यास मिळतात. त्याबद्दल वर्गणी भरावी लागते.

नोकर:- पाच पाच केबिनला एक स्टुअर्ड इंग्लिश मनुष्य असतो. तो रोज सकाळी संध्याकाळी आमची खोली झाडून साफ करितो, सामान व्यवस्थेने टेवितो, पांघरूणाच्या घड्या घालतो, बूट साफ करितो आणि दुसरे काहीही सांगितलेले काम करितो व माहिती देतो. आम्ही मागितल्यास आमचे जेवण खोलीतच आणून देतो. दाराजवळ एक बटन असते, ते वाटेल तेव्हा दाबल्यास वरची घंटा वाजते आणि एक स्टुअर्ड खाली येऊन सांगितलेले काम करून जातो. सर्व गोरे नोकर कोणते काहीही काम मोठ्या तत्परतेने, आदबीने व खुशीने करतात, मग ते काम गो-या प्रवाशाने सांगितलेले असो, किंवा काळ्याने असो, महत्त्वाचे असो किंवा हलके असो, जरूरीचे असो किंवा कसेही असो, करण्याची त-हा एकच. पण स्नानगृहात काळे नोकर आहेत ते वरचेवर कुरकुरतात! आणि आमच्यापेक्षा साहेब लोकांची कामे मात्र लवकर करितात. गोरे नोकर कामे लवकर करितात. इतकेच नव्हे तर अशा ऐटीत करतात की त्यांच्याकडे पहातच बसावेसे वाटते.
सोबती:- ७५ प्रवाशांपैकी आम्ही हिंदुस्थानचे रहिवासी नेटिव्ह ख्रिश्चन सोडून सातजण, कलकत्त्याचे एक कायस्थ गृहस्थ, लाहोरचे आणि आग्र्याचे दोन मुसलमान गृहस्थ, निजाम हैदराबादचे एक नायडू, मुंबईचे एक पारशी आणि एक मुसलमान व पुण्याचा मी असे सातजण आहो. सातहीजण तरूणच आहो. वरील पारशी गृहस्थ व्यापारास जात आहेत. बाकी सर्वजण विद्यार्थी आहो. पैकी पाचहीजण कायद्याचा अभ्यास करावयास जात आहेत. मी एक मात्र आपला विक्षिप्तच. प्रत्येक बोटीतून अलीकडे हिंदुस्थानची जी तरूण मंडळीच विलायतेस जात आहेत, त्यावरून हिंदुस्थानचे इंग्लंडशी विद्यार्थ्यांचे नाते कसे आहे, ते दिसून येते. पण ह्या सर्व बाबतीत गतानुगतिकत्वच दिसून येते. असो, आम्हा सर्वांचा चांगला स्नेह झाला होता. पैकी पाचजण तर नेहमी एकत्रच होतो. त्यामुळे प्रवासात एकांतवास मुळीच भासत नाही.

प्रकृती:- अद्यापपर्यंत उत्तम आहे. दुसरे व तिसरे दिवशी दोनप्रहरी एक तासभर बरेच मळमळले. औषध घेतल्यावर तेही राहिले. बाकी सर्व ठीक आहे. मात्र माझ्या घड्याळाची प्रकृती मोठ्या गमतीने बिघडली आहे! आगबोटीतल्या घड्याळाशी ताडून पाहता माझे घड्याळ दुसरे दिवशी १० मिनिटे पुढे गेले आणि तिसरे दिवशी २५ मिनिटे पुढे गेले. मग मी त्याचा मागचा काटा फिरवून हळू चालेल असे केले. तरी चौथे दिवशी ते आपले ४० मिनिटे पुढे! मला वाटले घड्याळाला आगबोट लागली! पण लवकरच माझ्या लक्षात खरा प्रकार आला. त्यावेळी आमची आगबोट मुंबईपासून सुमारे १,००० मैल आली होती आणि रोज ३६० मैल पश्चिमेकडे जात होती त्यामुळे असा फरक पडत आहे, हे लक्षात येऊन माझा मीच खजील झालो!

आगबोटीत पोस्ट ऑफिस व दवाखाना ही आहेत. एकंदरीत तिकिटाचे पैसे दिले आणि आपल्याजवळ भरपूर पोशाक असला म्हणजे येथे कसलीही वाण पडत नाही. इतकी जर सर्व कडेकोट तयारी आहे तर धर्मसंबंधीही काही व्यवस्था केली आहे की कसे? ह्याबद्दल मी एका रविवारी शोध केला. पण त्यासंबंधी कधी विशेष गरज लागत नाही म्हणून व्यवस्था केली नाही असे कळले. मलाही बोटीवरचा रविवार आणि इतर वार ह्यांमध्ये कोणत्याच बाबतीत फरक आढळून आला नाही. बोटीवरच्या अधिका-यास यासंबंधी काळजी नसली तरी विश्वाच्या अधिका-यास ती आहे व त्याने पूर्ण व्यवस्था करून ठेविली आहे. मनुष्याने मात्र आपल्या स्वत:वरची आणि आपल्या बोटीवरची नजर काढून बोटीभोवतालच्या प्रदेशावर टाकावी म्हणजे पंचमहाभूतांचे अष्टौप्रहर सतत हरिकीर्तन चाललेले कानांला ऐक येईल, डोळ्यांना दिसेल, रोमरोमांचास भासेल व सेवटी अंतरात्माही परमात्म्याच्या समागमात धन्य होईल.

Read more: जलप्रवास

जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा सुवर्णमहोत्सव

जमखंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा सुवर्ण महोत्सव होत आहे हे ऐकून मला फार संतोष वाटला. ह्यासंबंधी मजकडून दोन शब्द प्रसिद्ध व्हावेत म्हणून चिटणीसांचा आग्रह आहे.

हे हायस्कूल सुरू होण्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांपैकी मी एक अत्यंत जुना विद्यार्थी आहे. जमखंडी येथील प्राथमिक मराठी शाळेचे माझे शिक्षण सुरू झाल्यावेळी, शिक्षणखात्याची व्यवस्था नुकतीच झाली होती. स्वतः माझे शिक्षण पूर्वीच्या गावठी शाळेत सुरू झाले. धूळपाटीवर ‘श्रीगणेशा’ लिहिण्याची मला चांगली आठवण आहे. अशा स्थितीत तेव्हाचे कै. श्रीमंत रामचंद्रराव अप्पासाहेब ह्यांनी उदार मनाने इंग्रजी शाळेची सोय आपल्या संस्थानात अगदी मोफत केल्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सल्लागारांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. मराठी चार इयत्ता संपवून इंग्रजी शाळेत इ.स. १८८५ साली मी गेलो, तेव्हा ती शाळा अँग्लो-व्हर्नाक्युलर दर्जाची होती. सन १८९१ साली मॅट्रिकला पाठवून दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी पास झालेल्या ४ विद्यार्थ्यांमध्ये माझे नाव पहिले होते. मला मिळालेला हा इंग्रजी ज्ञानाचा लाभ, हे हायस्कूल नसते तर, मिळाला नसता. त्या वेळचे हेडमास्तर कै. श्री. त्रिंबकराव खांडेकर हे जुन्या चालीचे, गरीब, सुशील, पापभीरू आणि नमुनेदार गृहस्थ होते. त्यामुळे इंग्रजी शिक्षणाविरुद्ध दुराग्रहाला थारा मिळत नसे. माझ्या वेळी मराठी शिक्षणही इतके दुर्मिळ होते की, माझी मराठी तिसरी इयत्ता पास झाली म्हणून, माझ्या आत्याबाईने तमगी वाटेवर असलेल्या छोटूसिंगाच्या थडग्याला नवस करून पेढे वाटले. माझ्या शिक्षणाचे काही अंशी श्रेय ह्या छोटूसिंगाला जावे असा तो काल होता. माझ्या इंग्रजी शाळेत माझ्याप्रमाणे गरीब स्थितीतील, माझ्या वर्गातील लिंगायत, मुसलमान, न्हावी, धोबी वगैरे इतर जातीय मुले होती. त्यांना कोणताही पक्षपात न करता ब्राह्मण शिक्षक शिकवीत होते ह्याचे श्रेय कै. श्रीमंत अप्पासाहेबांनाच होय. (फुट नोट – परशुरामभाऊ हायस्कूल सुवर्णमहोत्सव स्मारक ग्रंथ, संपादक प्रो. रा. द. रानडे, (जमखंडी, १९३८, पृ.१-२).)

माझा प्रत्येक वर्गात नेहमी पहिला नंबर राहिल्यामुळे, म मी मॅट्रिक परीक्षेतही ह्या हायस्कूलमध्ये पहिला नंबर पटकावल्यामुळे कै. खांडेकर (हेडमास्तर) ह्यांनी माझा अभिमान बाळगून, शाळेत बोलावून नेऊन मला शिक्षकाची नोकरी दिली. ही गोष्टही स्मरणात ठेवण्यासारखी आहे. पुढे उच्च शिक्षण घेण्याकरिता मला जमखंडी सोडावी लागली. तेव्हापासून आजपर्यंत जमखंडीशी माझा अजीबात संबंध तुटला. त्यामुळे ह्या हायस्कूलचा पुढे जो विकास झाला त्याविषयी मला काही लिहिता येत नाही. मधूनमधून केव्हा तरी मी जमखंडीला जात असे. त्या वेळेस मागासलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा फैलाव कसा झाला ह्याविषयी चौकशी करीत असे, तेव्हा सुधारलेल्या परिस्थितीच्या मानाने, जमखंडी संस्थानातील शिक्षणाच्या सोयीच्या दृष्टीने, विशेष फैलाव झालेला मला दिसला नाही.

तथापि जमखंडी येथील विद्यार्थ्यांची उच्च वर्गामध्ये अलीकडे बरीच सोय लागत आहे आणि ते निरनिराळ्या विषयांमध्ये प्राविण्य संपादून विश्वविद्यालयातच नव्हे तर लोककार्यातही पुढे येत आहेत ही मोठी अभिनंदनीय गोष्ट आहे. संस्थानचे सुधारलेले धोरण आणि श्रीमंतांची कीर्ती वाढवायला, संस्थानातील उच्च शिक्षणाची तयारी आणि व्यवस्था हीच कारणीभूत आहेत. सर्व वर्गांमध्ये विशेषतः पददलित अस्पृश्य वर्गांमध्येही आणि अबलावर्गात ज्ञानाची वाढ होऊन हे संस्थान नामांकित होवो अशी माझी नेहमी ईश्वराजवळ प्रार्थना राहील.

जमखंडी संस्थान हे मुख्यतः कर्नाटक भागात असून खुद्द राजधानीतही सर्वांना कानडी येते. अलीकडे कानडी भाषेला अधिक प्राधान्य देण्याची सुवार्ता ऐकून मला फार आनंद झाला. मागासलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा फैलाव व्हावा तितका झाला नाही असे मी जे वर म्हटले, त्याचे कारणही मातृभाषेत बहुजन समाजाला शिक्षण मिळत नाही हे असू शकेल. खेड्यातील मराठ्यांना आणि मुसलमानांनासुद्धा मराठी आणि मुसलमानी भाषा येत नसेल; कारण त्यांची मातृभाषा कानडी हीच असते. हे जाणून श्रीमंतानी आपले जे धोरण उदार दृष्टीने बदलले आहे, त्यास सर्व अधिका-यांनी मनःपूर्वक पाठिंबा द्यावा, इतकेच नव्हे तर, त्याचा फायदा बहुजनसमाजाने, हरिजनानीं आणि स्त्रीवर्गाने उत्साहाने घ्यावा, त्यात ह्या संस्थानचाच नव्हे तर अखिल कर्नाटकाचा भाग्योदय आहे. श्रीमंतांचे मनःपूर्वक आभार मानून आणि त्यांना आयुरारोग्य चिंतून मी हा लहानसा लेख पुरा करतो.

जनातून वनात आणि परत

इंग्लंडच्या उत्तरभागी कंबर्लंडशायरमध्ये सरोवर प्रांत (Lake District) नावाचा प्रदेश आहे. उंच पहाड, विस्तृत सरोवरे, दाट वनराजी इ. बहुविधा सृष्टिसुंदरी तेथे नटली आहे. तशात वर्डस्वर्थ, कोलरिज्, साउदे इ. प्रासादिक कवींच्या सहवासाने हे शांतिस्थळ अधिकच पवित्र झाले आहे. उष्णकाळी इंग्लंडचे किंबहुना सा-या सुधारलेल्या जगाचे हे एक हवा खाण्याचे ठिकाण आहे. गेल्या उन्हाळ्याच्या सुटीत प्रो. कार्पेंटर साहेबांनी आमच्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांस आपल्याबरोबर आपल्या कुटुंबात पंधरा-पंधरा दिवस सदर ठिकाणी रहावयास बोलाविले होते. कॉलेजातील व्याख्यानपीठातून व मंदिरातील व्यासपीठातून दिलेल्या ईश्वरविषयक ज्ञानाची पुरवणी वरील उदात्त स्थळी प्रकटलेले स्वरूप प्रत्यक्ष दाखवून करून देण्याचाच जणू ह्या गुरूवर्यांचा हेतू होता.

गेल्या जुलैत मी तिकडे ऑक्सफर्डहून निघालो. पुढे मिळणारा धडा मनावर नीट बिंबावा म्हणूनच की काय वाटेत निराळाच अनुभव आला. आमची गाडी लांब पल्ल्याची असल्या कारणाने ती एक्स्प्रेस होती. वाटेत बर्मिंगहॅम पासून तो लँकेस्टरपर्यंत अगदी निराळा मुलूख लागला. इंग्रजाने बहुतेक सगळ्या जगाचे कंत्राट आपल्याकडे घेतले आहे. म्हणून अर्थात एवढा प्रदेश म्हणजे जगाची एक मोठी वखारच! बर्मिगहॅम, स्टॅफर्ड, शेफिल्ड, मॅचेस्टर अशी अचाट घडामोडीची शहरे आणि त्यांच्या दरम्यान इतर कारखान्यांची गावे ह्यांची कशी येथे खेचाखेची झाली आहे. दाट जंगलातून एकादी चेतलेली वाघीण जशी सुटावी तशी आमची एक्स्प्रेस हजारो जीवांना घेऊन, अशा दाट वस्तीतून लांब लांब झापा टाकीत सुटली. स्टॅफर्डहून लॅकेस्टरपर्यंत सुमारे दीडशे मैलांचा पल्ला तर तिने एकाच उडीसरशी मारला. त्यास पुरे दोन तासही लागले नाहीत.

लहान वस्तु ती स्थूल विसली| तुटकी वाटे कुणी जुडली|
सहज कुटिला सरला झाली| जवळी न बाजुस अथवा आता|
दूर न मज काही||१||

असे झाल्याने मी दुष्यंत राजाच्याच रथात बसलो आहेसे वाटू लागले. शहरे, खेडी, नद्या, नाले इ. आमच्या पायाखालून पार निघून जात. अशा वेगाने आम्ही जात असता समोरून एकादी अशीच राक्षसी आमच्या अंगावर एक मोठा फुत्कार टाकून बिजलीसारखी चमकून जाई! वाटेने मोठी स्टेशने आली म्हणजे आमच्यापुढे रूळांच्या जाळ्याचा गुंता पसरलेला दिसे, पण त्यातूनही ही नेमकी निसटून पार होई!  

बाहेर धुराने व धुळीने दिशा धुंद झाल्या होत्या. मांडीवरच्या वर्तमानपत्रावर दोन चार मिनिटांतच कोळशाची भुकटी साचे. छाती करून बाहेर डोकावल्यास चहूकडे नुसती गिरण्यांची धुराडी व त्यांतून निघणारे धुरांचे कल्लोळच दिसत. घरे, देवळे, झाडे व रस्ते ही सर्व सारखीच काळवंडून गेली होती. म्हणून त्या प्रदेशास ब्लॅक कंट्री म्हणजे काळा देश असे नाव आहे. अशा वातावरणात अष्टौप्रहर राहून निर्जीव यंत्राप्रमाणे झीज सोसणा-या हतभागी मजुरांची काय दशा असेल! आमच्या कवीनी नुसत्या कल्पनेनेच भवचक्राची चित्रे काढली आहेत. येथे मात्र ते चक्र प्रत्यक्ष भ्रमत असलेले दिसत आहे! प्रगतीची ही काळी खरबरीत बाजू पाहून माझ्या तोंडातून आपोआपच हे उद्गार निघाले:

“अहागे सुधारणे! तू दिवाणखान्यात येताना कशी नटून येतेस! तुझ्या पदरावर माशी देखील बसलेली खपत नाही. तुझा नाजूक बांधा, कोमल गात्रे, उंची पोषाक व जडजवाहीर पाहून आम्हा पौरस्त्यास कितीही कौतुक केले तरी पुरेसे होत नाही! पण हे गे काय तुझे एथळे स्वरूप! किती हे तुझे कष्ट, कोण ह्या घामाच्या धारा आणि हे हातापायाला घट्टे! येथे तुला नुसते श्वासोच्छवास करण्यालाही वेळ मिळेना. तीच तू मंडळीत बसलीस म्हणजे काय काय ढंग करतेस! येथे तुला नुसती मोकळी हवाही मिळत नाही. दुसरीकडे काय तुझ्या क्रीडा, करमणुकी, चैनीचे प्रवास, रूचीच्या आलटापालटी! नाही आम्हांला हे तुझे बहुरूपी प्रकार कळत. कार्यालयातून क्रीडालयात व क्रीडालयातून पुन: अशा कार्यालयात जाणारी जर तूच असशील तर असे वेश पालटण्यात तला किती शरम वाटत असेल? हाल आणि श्रमाची तर गोष्ट राहू दे. जगात राहण्याची कला आपल्यास चांगली साधली आहे, असे तू किती वेळां तरी म्हणतेस, पण नाही सुधारणे! तुलादेखील अद्यापि पुष्कळ सुधारले पाहिजे आहे. ते कसे ते सांगण्याची आमच्यातही शक्ती नाही, तोवर तुला तरी नावे ठेवून काय फळ! तरी दिसला तो प्रकार कळविण्याचे तूर्त आमचे काम आहे.”

ज्या सुधारणेने आपल्यावर इतके जब्बर मोहिनी-अस्त्र टाकिले आहे तिची अशी कोणती व किती व्यंगे दिसली की मी तिला इतके टाकून व टोचून बोललो? मी तर अग्नीरथातून वा-याच्या वेगाने चाललो होतो. पण तशातच ह्या सुंदरीचे कृष्ण आणि कठोर स्वरूप असे दिसून आले की वरील उद्गार मला नकळतच निघाले! एकाद्या भयंकर स्वप्नाचा काळ फार तर एक दोन  पळेच असतो, पण तेवढ्यात कितीतरी स्थितींचा आपल्यास अनुभव येतो! इतकेच नव्हे तर जागे झाल्यावरही त्याचा परिणाम मनावर घडत असतोच! ह्याचे कारण हे की स्वप्नातले देखावे आपण जागृतीत आधीच निरनिराळ्या वेळी पाहिलेले असतात. फक्त त्यांचे एकीकरण मात्र मनाच्या केंद्रस्थानी एक-दोन क्षणांतच झाल्याने आपली अशी कासाविशी होते. अशातलाच काहीसा प्रकार ह्यावेळी माझा झाला. दम न घेता सारखा दोन तास धावत होतो तरी खिडकीतून बाहेर मोकळा प्रदेश असा फार वेळ पहावयाला सापडेना. व्यापाराची घडामोड व उद्योगाची धडपड किती लगट केली तरी मागे राहीनात. एकादे पटांगण नजरेस पडल्यास त्यात धुरकट व दमट हवेत आणि कोळशाच्या राखेत कंगाल पोरे बागडत आहेत असे दिसावे! घरे पहावीत तर कबुतराच्या खुराड्यासारखी रांगेत नेमकी बसविलेली. सोय आणि सांती ह्यांमुळे माणसे इतकी सवंगली आहेत की बिचा-यांस राहता भुई पुरेना. काही हौसेने, काही केवळ निरूपायाने ती अशी दिवसेदिवस अधिकाधिक गर्दी करून राहत आहेत. एकाद्या आधुनिक मोठ्या शहरात सावकाशपणे हिंडू लागल्यास त्यातील मातबर चौक, उपवने, संग्रहालये, चित्रालये इत्यादी मोहक स्थळे नजरेस येतात आणि त्या झुरक्यासरशी शहरातील इतर ठिकाणच्या नानाविध यातनांचा विसर पडतो हे खरे. पण त्याच शहराकडे असे विहंगम दृष्ट्या पाहू गेल्यास त्याचे रूप तितके मोहक दिसत नाही. ह्यावरून मला असे वाटू लागले की,काही गोष्टी सावकाश पाहिल्याशिवाय कळत नाहीत; तर काही झटक्यासरशी पाहिल्याशिवाय कळत नाहीत. असो! अशा रीतीने मी पेनरिथ स्टेशनावर येऊन पोहोचलो. येथे दगदगीचे जग संपले आणि पुढे निराळेच जग दिसू लागले.

जन आणि वन

जगाचे दोन भाग आहेत. एक जन, दुसरे वन. ह्यासच आधुनिक शास्त्रीय नावे द्यावयाची झाल्यास एकास नीती व दुस-यास निसर्ग असे म्हणता येईल. निसर्गात नीतीचा अत्यंताभाव आहे असे नाही. उलट स्वत: नीतीचा कोणताही प्रदेश निसर्गाच्या बाहेर आहे असेही नाही. निसर्गाच्या विराट मंडळात नीतीचा लहान गोल पोकळीतल्या परमाणूप्रमाणे तरंगत आहे! हाच विषय दुस-या बाजूने निराळा दिसतो. नीतीचे अधिष्ठान मन. निसर्घाचे मूळ प्रकृती. प्रकृतीत मन मुळीच मावण्यासारखे नाही. उलट प्रकृती किती जरी अनंत भासली तरी मन तिला क्षणार्धात गिळून बसते. पण गिळते म्हणून त्यास कळते थोडेच! मन आणि माया, नीती आणि निसर्ग अथवा जन आणि वन ह्या द्वंद्वांचे परस्पर नाते काय आहे, ते कोण सांगू शकेल? ह्या द्वंद्वांचे मूळ जी महावस्तू तिचे केवळ स्वरूप कोठे दिसेल! ‘नकळे महीमा वेद मौनावले जेथे पांगुळले मन पवन’ ते ह्याच ठिकाणी! महंतांनी जर प्रांजलपणे ही कबुली दिली आहे तर आमच्यासारख्या लहानांनी काय विचक्षणा करावी! असा प्रकार असून आम्ही प्रसंगी दुस-याचे शब्द उसने घेऊन ज्ञानाची कितीतरी प्रौढी मिरवितो! वासनेचा थोडा कोठे हिसका बसला की तीनदा उलथून पडतो, तरी पुन: उठल्यावर ‘अहं ब्रह्माSस्मि’ म्हणावयाला आहेच तयार!

प्रयत्नशाली जे महावीर आहेत ते जनात राहून सुधारणा साधोत. ज्ञानशाली जे महायोगी आहेत ते वनात राहून सत्य शोधोत. विषय हेच ज्यांचे सुख ते विषयाची खटपट करोत. वाद हेच ज्यांचे ज्ञान ते वादाची घटपट करोत. मध्यंतर आम्ही साधारण माणसे विश्रांतीसाठी व उपासनेसाठी काही काळ जनातून वनात जाऊ या!

पेनरिथपासून केसिकपर्यंत सरोवर प्रांतात जाण्यास सुमारे १८ मैल आगगाडीचा एक फाटा आहे. पेनरिथ सोडल्यापासून नीतीचा गोंधळ मागे दूरदूर राहू लागला आणि निसर्गाचा सोहळा पुढे जवळजवळ येऊ लागला. दोहोंबाजूस उंच उंच पर्वत हिरव्या गवताच्या झुली पांघरून हत्तीप्रमाणे तटस्थ उभे राहिलेले आणि गंभीर दिसू लागले. अस्तास जाणा-या सूर्याची शेवटची किरणे त्यांवर रेंगाळत होती. समुद्रावरील ताजा आणि मंद वारा आणि रानातील झाडपाल्याचा वास काळ्या प्रदेशातून नुकतेच बाहेर पडलेल्या प्रवाशांस सुखवू लागले. केसिक येथे पोहोचल्यावर सुधारणेची शेवटची खूण जी आगगाडी तिलाही निरोप दिला. माहेरी आल्यावर सासरच्या गड्यास निरोप देताना कितीसे वाईट वाटते हे प्रत्येक सासुरवासिणीस माहीत आहेच.

स्टेशनावर आम्ही तिघे विद्यार्थी उतरलो. आम्ही येण्याची वेळ जरी कळविली नव्हती तरी आमचे प्रोफेसरसाहेब व आमच्या पूर्वीचे आलेले एक विद्यार्थी आम्हांस घरी नेण्याकरिता तेथे वाट पहात उभे होतेच. ऑक्सफर्ड विद्यालयात नेहमी विद्याव्यासंगात पाहिलेल्या प्रोफेसरसाहेबांची मूर्ती येथे किती निराळी दिसली! अंगात पहाडी सडा पोषाक, हातात रानटी काठी, खांद्यावरून आडवी जानव्यासारखी सोडलेली कातड्याच्या वादीस लटकलेली लहानशी दुर्बिणीची थैली, गालावर हासे, तोंडात माहितीचा पुरवठा (खिशातले गाईडबुक जणू पाठच केलेले) भाषणात विनोद, वतनात तत्परता, असे गुरूचे चालते बोलते चित्र पाहून आम्ही वाटेचे सर्व क्लेष केव्हाच विसरून गेलो. बॉरोडेल-दरीत लीथस कॉटेज हे आमचे ठिकाण येथून चार मैल होते. आमचे सर्व सामान घरी रवाना केल्यावर, डरवेंट वॉटर सरोवरावरून बोटीतून लिथस् कॉटेजला जाण्यास निघालो.

गाडीतून उतरल्याबरोबर बदललेल्या परिस्थितीत व बदललेल्या पेहरावात आपल्या गुरूस पाहून आम्ही आमचे श्रम विसरलो असे वर सांगितले, पण स्टेशनातून बाहेर येऊन सभोवती पाहतो तो गुरूंचा गुरू जो परमेश्वर त्यानेतर ह्या ठिकाणी आपला पेहराव अधिकच बदललेला पाहून आम्ही श्रमच काय पण स्वत:लाही हळूहळू विसरू लागलो. डरवेंट वॉटर सरोवर केसिक गावाला अगदी येऊन भिडले आहे. प्रोफेसर, सगळे विद्यार्थी आणि एक युनिटेरियन् आचार्य इतकेजण आम्ही एका क्रीडानौकेत बसून निघालो! सूर्यास्त होऊन गोड संधिप्रकाश पडला होता. अशा शांत समयी देव कसा दिसला! ज्याने जन निर्माण केले त्यानेच वनही केले आहे. जो समाजात वसत आहे, तोच सृष्टीतही वसत आहे. असे असता दर्शनात किती तरी हा फरक! तिकडे समाजात तो स्वरूपाने प्रकटतो. पण ते सत्त्वदर्शन कित्येकास होते? आणि ज्या थोड्यास होते ते तरी कितीदा होते? आणि जे होते ते तरी किती कष्टाने, किती अनुतापाने आणि किती आत्मदंडाने आणि इतक्याही सायासाने एकदा कृपा झाली तर ती टिकते किती वेळ! तुकोबा सांगतात की, ‘आठवचि पुरे| सुख अवघे मोहोरे’ पण ह्या आठवेच्या मार्गातच अगणित अडथळे घडलेलेही पुन्हा त्यांनीच वर्णिले आहे की, ‘कामक्रोध आड पडले पर्वत| राहिला अनंत पलीकडे’ तेव्हा जन म्हणजे अशा अडथळ्यांचा डोंगराळ प्रदेश ह्यात आधीच अदृश्य असे जे सत्त्वरूप त्याचे दर्शन होणे अति कठीण. पण येथे पहा, तोच देव कसा सुंदर रूपाने प्रकटला आहे. आठवण करण्याचेही श्रम नकोत. डोळे उघडले की पुरे, सुख अवघे मोहोरे! समाजात जो इतका दुर्लभ तो येथे किती तरी सुलभ झाला आहे. समाजात जो दुर्मिळ, त्याचा सृष्टीत हा कोण सुकाळ! शास्त्रकारास आणि स्मृतिकारास जो तेथे सहसा लाभत नाही, तो येथे पशुपक्षांस भेट देऊन रमवीत आहे! येथे येण्याचाच अवकाश की ताबडतोब भेट व लगेच सलगीदेखील! पश्चात्ताप नाही, प्रायश्चित्त नाही, इंद्रियदमन नको, देहदंडन नको, पापाची आठवणच नाही. मग क्षमेची गोष्ट कशाला! पुनर्जन्मच हा!!

समाजात सुख आहे, ऐश्वर्य आहे, प्रीती आहे, प्रगती आहे, पण तेथे पुष्कळ अंशी ह्या गोष्टी असतात. आम्ही बसलो आहो ही नाव जर पुढे न्यावयाची झाली तर आधी वल्ह्यांनी पाणी मागे ढकलले पाहिजे. आणि हाच प्रकार सर्वदा नाही तरी पुष्कळदा समाजात चालला असतो. माझे धन ते दुस-याचे ऋण, माझा आराम तो दुस-याचे कष्ट, गर्दीतून माझे पाऊल पुढे पडावे म्हणून मी इतरांस मागे रेटीत असतो. असा प्रकार असल्यामुळे समाजात शुद्ध सुख मिळणे फार कठीण होते. तेथे इतर आत्म्यामध्ये परमात्म्याचे जे प्रतिबिंब दिसते ते स्थानमानाने थोडे बहुत अशुद्धच असते. पण सृष्टीतला प्रकार वेगळा. येथे आपण व परमात्मा ह्यांमध्ये इतर कोणी येत नाही म्हणून एथली सर्व सुखे निर्भेळ असतात, निश्चित असतात, निरालंब असतात!

असो. आम्ही पाळीपाळीने दोघे दोघे वल्हवीत, भोवतालची शोभा पहात, मधूनमधून विनोद करीत, प्रसंगानुसार ह्या प्रदेशाची प्रोफेसरांच्या तोंडून चटकदार माहिती ऐकत निघालो. ह्या विस्तीर्ण सरोवराचे पाणी इतके स्वच्छ आणि शांत होते की एक मोठा आरसाच पसरलेला! केसिक गाव लवकरच वळणात लपून गेल्यावर आसमंतात कोठेही जीवांची हालचाल दिसेना. आमच्या बोटीभोवती लाटांची काय ती थोडी हालचाल होती तेवढीच. सर्वत्र एकच निर्विकल्प समाधी लागली होती. एका बाजूस सुमारे एक हजार फुटांचा एकदम तुटलेला काळाकुट्ट कडा किना-यावर तोल सांभाळून तटस्थ उभा होता. दुस-या बाजूस हळूहळू उंच उंच होत
जाणा-या पर्वतसपाटीवर दाट गवताचा हिरवा गालिचा पसरला होता. पुढे पुढे ह दोहोंकडचे डोंगर अगदीच जवळ येऊन सरोवरास कवटाळू लागले. अखेरीस सरोवर संपले व आम्ही दरवेंट नदीच्या पात्रात शिरून तसेच बॉरोडेल नावाच्या रमणीय दरीतून वर वर जाऊ लागलो. नागिणीसारखी नदी वरचेवर वळसे मारू लागली. येथे सौंदर्याची तर अगदी सीमा झाली आणि सृष्टिसुंदरीचा गर्व तिच्या पोटात मावेना असे उघड दिसू लागले. किना-यावरील झाडे, लता आणि पर्वत ह्यांच्या प्रतिबिंबाची तर काय बहार! कुलस्त्री एकांतात असताना आरशात आपले रूप पाहून आपल्यासच धन्य मानीत असलेली दिसल्यास कोणास बरे परमावधीची धन्यता वाटणार नाही! आमची नौका पुढे नेऊन ह्या तरूणीचा रसभंग करण्याचे आम्हांला जीवावर आले! आम्ही आता अगदी लीथस् कॉटेजच्याजवळ पोहोचलो. नौका एका झाडाच्या मुळाशी बांधून किना-यावर पाय ठेवितो तोच मिसेस कार्पेंटरबाईनी झोपडीच्या खिडकीतून बाहेर डोकाविले आणि आपला हातरूमाल हालवून मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले!      

बॉरोडेलमधील प्रार्थना व भेट

लीथस् कॉटेजच्या वन्य कुटिकेत आमचे जे पुढील पंधरा दिवस अति सुखाचे गेले त्याची गोड सूचना, गुरूपत्नीने वर सांगितल्याप्रमाणे प्रथमदर्शनी दुरूनच जे स्वागत केले त्यात मिळाली होती.

इंग्लिश सरोवर-प्रांत हे एक सा-या युरोपात पाहण्यासारखे स्थळ आहे आणि त्यात डरवेंटवॉटर हे सुंदर सरोवर व त्याच्या काठचे बॉरोडेल नावाचे खोरे ही तर एकाद्याला अगदी वेड लावून टाकतात. म्हणूनच मागे ह्या ठिकाणी मोठमोठे राष्ट्रीय कवी व लेखक संसार अगदी विसरून भृगासारखे गुंगत राहिले, व आता तर युरोप आणि अमेरिकेहूनही रसिकांच्या झुंडीच्या झुंडी येथे येतात! प्रख्यात सौंदर्यवादी जॉन रस्किन हा जेव्हा अगदी लहान होता तेव्हा दाईने त्यास एकदा ह्या सरोवराच्या काठी फ्रायर्स क्रॅग नावाच्या लहानशा खडकावर आणिले, त्यावेळी त्या मुलाच्या अति कोवळ्या व ग्रहणशील मनावर निसर्गाने येथे असा कायमचा छाप मारिला की, ही त्याची प्रथम भेट रस्किन मरेतोपर्यंत वारंवार उत्कंठेने आठवीत असे. आता ह्या खडकावरील झाडीत रस्किनच्या चहात्यांनी वरील भेटीच्या स्मारकार्थ एक सुंदर शिलालेख रोविला आहे!

आमच्या गुरूची कुटिका बॉरोडेल दरीच्या तोंडाशी, डरवेंट नदीच्याकाठी, डोंगराच्या बगलेत जेथून सर्व सरोवर नजरेत चांगले भरेल अशा नाक्यावर उभी आहे. त्यामुळे येता जाता, उठता बसता, कार्य करता, ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरीदेखील हो! सृष्टीचे प्रसन्न मुख आम्हांस सतत दिसत असे. जेवणाच्या पंगतीत बसलो असता एकाएकी दूर स्किडॉच्या शिखरावर सूर्यकिरणाची अपूर्व शोभा दिसे, दिवाणखान्यात क्रीडेत गुंगलो असता मध्येच सरोवरावर मेघधारा नाचू लागत तिकडे लक्ष जाई, खोलीत वाचीत बसलो असता भिंतीखालच्या नदीशी वायू अकस्मात धिंगाणा घाली, आणि पाहता पाहता गुलाम दरीतून शीळ घालीत पार निसटून जाई! ह्या प्रकारे सृष्टीबाला आमच्याशी अहोरात्र सलगी करी पण ती मोठ्याची कन्या म्हणून तिच्या प्रत्येक चेष्टेचे आम्हा सर्वांना उलट मोठे कौतुकच वाटे!

एके दिवशी संध्याकाळी जेवण आटोपल्यावर मी एका समानशील सोबत्याबरोबर बॉरोडेल दरीत शतपावलीस निघालो. अहा! ही शतपावली कधी तरी विसरणे शक्य आहे काय! ह्या डोंगरातील सडकही रूंद, प्रशस्त आणि धुतल्यासारखी स्वच्छ होती. दोहों बाजूस हजार हजार फुटांचे उंचवटे क्वचित अगदी अंगाला येऊन भिडत, क्वचित पुन्हा मागे हटत, त्यांवरून नाना जातींची झाडे पालवली होती, फुले फुलली होती, लता लोंबत होत्या, लोहाळे लगटले होते, भारतीय देखाव्यांची प्रमुख लक्षणे जी रंगीबेरंगी शोभा आणि परिमळाचा दर्प ती मात्र येथे नव्हती, तथापि सौंदर्यात उणीव भासत नव्हतीच. उजवीकडचा कडा सरळ तुटला होता. डावीकडे डरवेंट नदी खडकातून उतरत असता आपल्याशीच मंद स्वरात मंजुळ ओव्या गात होती. त्या स्वरास सृष्टि—राग म्हणतात असे माझ्या मित्राने सांगितले.

चहूकडे इतके निवांत की पातळ पानही लवत नव्हते. शांतीचे साम्राज्य जणू डोळ्यांनी निरखू लागलो. सुधारणेची कटके तिने येथून बारा कोस पळविली होती. सुधारणा, उद्धारणा वगैरे विचारांचा गवगवाही बंद पडला. बाह्य शांतीमुळे अंतरातील खोल शब्द अधिकाधिक स्पष्ट ऐकू येऊ लागले. ९|| वाजले होते तरी असा गोड संधिप्रकाश पडला होता की, वाचता सहज यावे. समोर कॅसल क्रॅगच्या निमुळत्या मनो-यावर दशमीचा चंद्र लोंबत होता. आम्ही दोघे संगतीने चललो होतो, तरी बोलक नव्हतो. स्वत: कौतुक करण्याचीही वेळ मागेच टळून गेली होती, मग संवादाला जागा कुठे राहिली! जसजसे पुढे जावे तसतशी दरी आकसू लागली. नकळतच सृष्टीने आम्हांला शेवटी अगदी अंत:पुरात नेले! तेथे जिवलग जनांचीही स्मृती उरली नाही. निकट विषयांचेदेखील भान उडाले. लौकिकातून नाहीसेच झालो!

असा कोण जादूवाला ह्या भरलेल्या अंत:पुरात होता की, ज्याने आमची अशी पाहता पाहता पराधीन अवस्था करून सोडली! वरती जो एकदा लय लागला तो खाली करण्याची काही शक्ती उरली नाही.

आनंद होत होता काय आम्हांला?
सांगवत नाही. काही वेळापूर्वी मात्र झाला होता खरा.
आम्ही काही पहात होतो काय?
नव्हतो! दिसत होते पण काहीतरी!
मागितले का काही?
छे हो! काय मागावयाचे?
जिवाला कसे होत होते?
मधूनमधून सुस्कारे बाहेर पडत होते!
ते का म्हणून?

कोणी सांगावे! काहीतरी आतून बाहेर निघत होते व काही बाहेरून आत शिरत होते-छे, मी काहीतरी वेड्यासारखे वर्णन करीत आहे.
एकूण हा प्रकार काय? आणि ते कोण?
“prayer is the burthen a sigh,
The falling of a tear,
The upward glancing of an eye,
When none but God is near.”
-(Montgomery)
(मुखी श्वास, आसवे गाळी| नेंत्री वरतीच न्याहाळी|
अशा या प्रार्थनेच्या काळी| जवळी तोचि एकला||१||)

कवीने हे वरील उद्गार कोणत्या वेळी काढले असतील ते असोत. मला तर आता असे कळून चुकले आहे की, वरील जो प्रकार घडला ती माझी प्रार्थना होती. आणि परमेश्वरावाचून जवळ कोणी नव्हते. एकूण प्रार्थनेचे काम इतके साधे व सोपे आहे काय? होय. कार्ळाइलही तेच सांगत आहे.

“Prayer is and always remains a native and deepest impulse of the soul…On the whole, silence* is the one safe form of prayer known to me in this poor, sordid era-though there are ejaculatory words too, which occasionally rise on one,with a felt propriety and variety.”
*ह्याचे भाषांतर तुकारामाच्या विचारात असे आले आहे:-
‘करावी ते पूजा मनेची उत्तम| लौकिकाचे काम काय तेथे’ ||१||

देवी! अशी प्रार्थना करावयाला व ही भेट घ्यावयाला सरोवर प्रांतापर्यंत येण्याचीच जरूरी आहे काय? नाही. जेथे कसली उपाधी नाही, अशा कोठल्याही उघड्या जागेत आणि मोकळ्या हवेतही उपासना घडण्यासारखी आहे. माणसांच्या गर्दीतही देवा तू भेटतोस. नाही कसे म्हणू! घरी आईची माया, बहिणीची प्रीती, पत्नीचा अनुराग, पुत्राचे वात्सल्य, समाजात शेजा-याची सहानुभूती, मित्रांचा स्नेह, राष्ट्रात देशभक्तांची कळकळ व संतांचा अनुग्रह आणि शेवटी जगतात महात्म्यांची निरपेक्ष अनुकंपा इत्यादी दर्शनेही तुझ्याशिवाय इतर कोणाची असू शकतील? जनात तुझा असा साक्षात्कार घडतो खरा, पण तो किती विरळा. उलटपक्षी किती कठीण अनुभव येतो! पण एथले तुझे रूप कसे अबाधित आणि अखंड आहे! हे वरचे आकाशाचे छत कधी फाटेल काय! हा खालचा सरोवराचा आरसा कधी फुटेल किंवा मळेल काय! ह्या पाखरांचे गळे कधी बसतील काय! हे पर्वताचे तट, हा वा-याचा पंखा, वृक्ष, वल्ली, दळ, पाषाण, पाणी, आकाशातील मेघ ह्यांवरूनही सर्वत्र ईश्वरा ‘तुझी कुशलधाम नामावली’ कशी सुवाच्य रेखाटली आहे! लहान बालके देखील ती वाचून आनंद पावतात! मग आम्ही का असे वारंवार विन्मुख व्हावे! हे कल्याणनिधान, आम्ही स्वत:भोवती जो क्षुद्र चिंतेचा गुंता निरंतर गोवीत असतो तो तूच करूणेने उकल, आणि आतासारखेच वेळोवेळी आपल्याकडे कृपाहस्ताने आम्हांला ओढून घे. आमच्या इच्छेनेच तुजकडे येण्याची आमची शक्ती नव्हे!

वगैरे वगैरे प्रार्थना देव भेटून गेल्यावर, उघडपणे करीत आम्ही परत कुटिकेत आलो.

Read more: जनातून वनात आणि परत

गुरूशासन

मागे पितृशासनासंबंधी विचार करीत असताना असे सांगण्यात आले होते की, प्राचीन काळी शासनासंबंधी सर्व अधिकार पित्याकडेच होते. पित्याची सत्ता पुत्राच्या मालमत्तेवरच होती, इतकेच नव्हे तर प्राणावरही चालत असे. समाज अधिकाधिक उन्नत दशेप्रत जसजसा जाऊ लागला, तसतशी मनुष्याच्या कर्तव्याची व्याप्ती आणि गरजा अधिकाधिक वाढून व साहजिकच वरील शासनाची विभागणी होत जाऊन, एका पित्याच्या ठिकाणी पिता, गुरू आणि राजा असे तीन शासनाचे अधिकारी झाले. तथापि सर्व शासन पितृमूलक आणि पुत्रवात्सल्याच्या उदार हेतूनेच प्रेरति असते आणि असावयास पाहिजे असेही सांगितले. तसेच मनुष्येतर खालील प्राण्यांमध्ये बाल्यावस्थेचा काळ फार अल्प असून, मनुष्याचे बाळपण मात्र दीर्घकालचे असते, ह्याचे कारण पशूपेक्षा मनुष्यामध्ये अधिक उन्नत स्वत्व अथवा पौरूषाचा विकास व्हावयाचा असतो, म्हणून त्याला आपल्या पितरांच्या शासनाखाली अधिक काळ रहावे लागते, असे सांगितले. बाल्यावस्थेची शेवटची पायरी किशोरदशा पंधरा वर्षापर्यंत असते, असे शास्त्र सांगते. पण इतक्या अवधीत मनुष्याची शासनाची आवश्यकता संपत नाही. ह्यापुढील दहा पंधरा वर्षांचा यौवनावस्थेचा काळही त्याला शिष्यदशेत घालवावयाचा असतो. हे पुढील शासन अधिक विशिष्ट अधिकाराचे आणि जबाबदारीचे असल्यामुळे, शिष्यास पितृकुलातून गुरूकुलात जावे लागते. आणि तेते गुरूच्या आज्ञेत राहून त्यांच्यावर निश्चल श्रद्धा आणि आदरभाव ठेवून भावी स्वत्वसंपत्तीकडे मजल मारावयाची असते.

निरनिराळ्या देशांतील प्राचीन धार्मिक वाड्मयामध्ये मुक्ती अथवा मोक्ष (Salvation) असा शब्दप्रयोग आढळतो. पण आधुनिक वाड्मयामध्ये ह्या शब्दयोजनेचे महत्त्व कमी कमी होत जाऊन स्वातंत्र्य आणि स्वत्वाची अभिवृद्धी अशी योजना अधिकाधिक आढळण्यात येते. यद्यपि हे दोन्ही प्रयोग शब्दश: भिन्न आहेत तथापि सूक्ष्म विचार केला असता अर्थत: ह्यांच्यामध्ये ऐक्य आहे, असे दिसून येईल. एकूण मनुष्यप्राणी उत्तरोत्तर परिस्थितीच्या गुलामगिरीतून सुटका पावून त्याच्या आत्म्याच्या ठायी ज्या गूढ आणि थोर शक्ती आहेत, त्यांचे संपादन करून तो पूर्ण स्वतंत्र व्हावा हाच हेतू मनुष्यजीवनाच्या विकासाचा आहे आणि म्हणून गुरूशासनाची आवश्यकता आहे. मातेच्या अंगावर केवळ शरीराचे पोषण होते. पितृगृही मनाची पूर्वतयारी होते आणि गुरूगृही बुद्धीचा विकास होतो, असे होईपर्यंत मनुष्यप्राणी नागरिकत्वाचे हक्क संपादन करून राजाची प्रजा म्हणविण्यास पात्र होत नाही.

अशा प्रकारे बुद्धीचा विकास करण्याचे कामी गुरू कसा असावा व त्याचे लक्षण काय? हे वामन पंडितांनी प्रल्हादाचे तोंडी घालून मार्मिक रीतीने वदविले आहे. हिरण्यकश्यपूने प्रल्हादास पुष्कळ दिवसांनी गुरूगृहातून बोलावून तेथे जे शिकलास त्याचे सार काय, असे विचारिता प्रल्हादाने ‘हरिभक्ती’ असे चमत्कारिक उत्तर दिले. हे शिक्षण कोणत्या गुरूने दिले असे हिरण्यकश्यपूने विचारिता प्रल्हादाने उत्तर दिले, ‘ज्या गुरूकडे मला ठेवण्यात आले होते त्यांच्यामधे गुरूपणाच नव्हता.’

सार मानित असे विषयाते| विष्णुभक्ति गमते विषयाते||
न स्वये हरि तया प्रिय वाटे| बोधिला तरि  येचि सु-वाटे||
सर्व प्रयत्ने भवती गृहाते| न सेविती भागवता महा ते||
गहव्रती ते, मति त्या जनांची| न गोष्टिही घे भव-भंजनाची||
हे तो गुरू पापतरू  म्हणावे| अंधासवे अंध तसे गणावे||
दे  प्रीति कृष्णी गुरू तोच साच| श्रुत्यर्थ इत्यर्थ असे असाच||
पशू जसे चाविति चाविल्याते| पुन: पुन्हा सेविति सेविल्याते||
कृष्णी नव्हे प्रीति कदापि त्याला| प्रल्हाद इत्यादि वदे पित्याला||

एकूण ज्या गुरूमुळे ईश्वराचे ठायी प्रीती उत्पन्न होते तेच गुरू साच. बाकी सर्व अंध किंवा पापतरू असा स्पष्ट निवाडा केलेला आहे. गुरूचे काम म्हणजे शिष्यास ध्येयदर्शन करून द्यावयाचे, पण गुरू जर स्वत: केवळ ‘गृहव्रती’. म्हणजे आपलेच पोट भरणारा असेल, तर ध्येयाची गोष्टही काढावयाला नको वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान करून देणारे काही कुशल गुरू असतात. पण ते त्यांच्या कुशलतेमुळे केवळ कुशल कारागीर होत. केवळ त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना गुरूत्व येते असे नव्हे. वस्तुस्थितीतून (Realism) वर उंच ध्येयाकडे (Ideal) शिष्याचा लय जो लावील-साध्या भाषेत सांगावयाचे म्हणजे ईश्वरपदी जो प्रीती उत्पन्न करून देईल-सांत जीवनातून अनंत जीवनाकडे, तात्पुर्तिक कर्तव्यातून चिरकालच्या कर्तव्याकडे, नैमित्तिक धर्मातून सनातन धर्माकडे जो नेईल, तोच गुरू. पण ‘न गोष्टीही घे भवभंजनाची’ असे जे पोटार्थी पंतोजी त्यांच्याकडून हे महत्कार्य कसे होणार? हल्लीच्या काळी धर्म आणि नीतिशिक्षणाविषयी जगभर शाब्दिक चळवळ चालली आहे. कित्येक लोक कित्येक उपाय सुचवीत आहेत. पण हा प्रश्न कोणत्याही बाह्य उपायांनी सुटण्यासारखा नाही. गुरू हे उपजत गुरू असावयास पाहिजेत. त्यांना ध्येयदर्शन झाल्याबरोबर त्याचे प्रतिबिंब शिष्यांत:करणामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. एरवी लिहिणे, वाचणे आणि बोलणे ह्याची कला शिकविणारे आणि तसेच इतर संसारोपयोगी हुन्नर शिकविणारे कारागीर मिळतील. पुष्कळ वेळां हेही मिळत नाहीत.

पिता, गुरू आणि राजा ही जी शासनाधिकाराची परंपरा आहे तिच्यामधील साम्यभेद लक्षात घेण्यासारखे आहेत. पिता हा केवळ त्या त्या व्यक्ती-पुरताच असतो. उलटपक्षी राजा हा कधीही एकाच व्यक्ती-पुरता नसतो. तो नेहमीच सार्वजनिक असतो. मध्यंतरी गुरू हा व्यक्ती-पुरता किंवा अनेक व्यक्तिसमूहाचा एक, असा असतो. त्याच्याशी शिष्याचा व्यक्तिश: संबंध असतो किंवा केव्हा केव्हा नसतोही. किंबहुना गुरूच्या ठिकाणी कोणती एकादी विशिष्ट व्यक्ती मुळीच नसून तेथे एकादे विद्यापीठ किंवा कोणती तरी एकादी संस्था असते. पिता आणि गुरू ह्यांमध्ये जरी हा भेद आहे तथापि त्यांच्यामध्ये हे साम्य आहे की, ज्याप्रमाणे पितापुत्राच्या मनाचा प्रत्यक्ष संबंध जडतो त्याचप्रमाणे गुरूशिष्याचाही प्रत्यक्ष संबंध (Personal touch) जडला पाहिजे. तरच गुरूशिष्याचे नाते सार्थ होते. ह्यावरून आपल्याला झालेले ध्येयदर्शन शिष्यास करून देण्याचे कामी प्रत्यक्ष संबंधाशिवाय अन्य उपाय नाही हे दिसून येईल, आणि आपल्यात ध्येयदर्शन नसेल तर शिष्याशी कितीही निकट संबंध जडला तरी त्याला प्रत्यक्षता येत नाही.

ह्या प्रत्यक्ष संबंधाच्या दोन बाजू आहेत. जसा गुरूकडून तसाच शिष्याकडूनही प्रत्यक्ष संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ असे म्हणणारे सारे प्रल्हादच असतात असेही नव्हे. भल्या गुरूची कदर न ओळखणारे फटकळ उनाड विद्यार्थी पुष्कळ आढळतील. उलपक्षी प्राचीन काळी होऊन गेलेले सॉक्रेटीस, प्लेटो, शंकराचार्य आणि बुद्ध ह्यांच्याशी तन्मयता पावून त्यांचा आदर्श तो आपलासा करून घेऊन स्वतंत्र अथवा मुक्त होणारेही काही भले शिष्य आढळतील. ह्यावरून प्रत्यक्ष संबंध जोडून ध्येयदर्शन करून देणे आणि घेणे हा परस्परावलंबी व्यवहार आहे. गुरूचे शासन आणि शिष्याची निष्ठा ही एकमेकांची कार्यकारणे आहेत.

ह्या ठिकाणी ब्राह्मसमाजाची एक सूचना ध्यानात ठेवण्यासारखी आहे. योग्य गुरूशी गाठ पडून शिष्याचे कल्याण झाल्याबरोबर त्या शिष्याकडून किंवा त्याच्या अनुयायाकडून ह्या गुरूच्या स्वरूपाविषयी गैरसमज होण्याचा पुष्कळ वेळां संभव आहे. आणि ज्या ज्या मानाने हा गुरू जास्त अलौकिक असतो त्या त्या मानाने हा वरील गैरसमजाचा संभव जास्त वाढतो. हा गुरू म्हणजे ईश्वर आणि मनुष्य ह्यांमधील कोणी अद्वितीय आणि अपरिहार्य मध्यस्थ किंवा ईश्वराचा कोणी अवतार किंवा प्रतिनिधी किंबहुना त्यास प्रतिईश्वरच समजून ईश्वर आणि तो हे दोन असून एक, आणि एक असून दोन अशा प्रकारच्या अनेक गूढ तत्त्वज्ञानाचा सुकाळ होऊ लागतो. ब्राह्मसमाजाचे सांगणे एवढेच आहे की, ईश्वराच योग्य असलेली पूजा ईश्वरास द्यावी आणि गुरूस द्यावयाचा मान तोच गुरूस द्यावा. गुरू कितीही अलौकिक असला तरी त्याचे मनुष्यत्व हिरावून घेऊन त्याला उंच ईश्वरपदाची दक्षिणा दिल्याने, ना कधी शिष्याचे, ना गुरूचे, ना जगताचे कल्याण होईल.

  1. गुरूवर्य शिंदे सूक्ती-
  2. गुरूवर्य विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचे सेवेशी-
  3. गुन्हेगार जातीची सुधारणा
  4. क्षात्रधर्म
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • 29
  • 30
  • 31
  • 32
Page 28 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी