जलप्रवास

विभाग पहिला : प्रवासवर्णन  

प्रयाण
आगबोट पर्शिया
तरूण भार्या, तान्हे बालक, वृद्धही माता-पितरे|
अनाथ भगिनी, बंधु धाकुटा, आश्रित बांधव सारे||
आलो टाकुनिया| पदरी घेई वयामया||१||

शनिवार तारीख २१ सप्टेंबर १९०१ रोजी सकाळचे १०|| वाजता रा. कोरगावकरांचे घरातून निघालो तेव्हापासून वियोगाच्या तीव्र वेदनांस सुरूवात झाली. बॅलर्ड पियरवर माझ्या आधी बरीच मित्रमंडळी जमली होती. गुरूजन आशीर्वाद देऊ लागले. मित्रमंडळ अभिष्टचिंतन करू लागला. काहीजण प्रवासात उपयोगी अशा महत्त्वाच्या सूचना करू लागले. अशी एकच गर्दी उडाल्यामुळे मी भांबावल्याप्रमाणे झालो होतो. अशा स्थितीत मी काहींचा मुळीच निरोप घेतला नसेन, काहींस मी उत्तरे दिली नसतील. त्या सर्वांची मी आता प्रांजलपणे क्षमा मागीत आहे. १२ वाजता प्लेग-डॉक्टरची तपासणी सुरू झाली. १२|| वाजता मी सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन निघालो. दारावर आत सोडताना रखवालदाराने थोडासा दांडगाईचा प्रसंग आणिला, पण हिंदुस्थानातील निदान २ वर्षेपर्यंत तरी ही अखेरची असल्यामुळे मी ही कौतुकाने सहन केली! तपासणी एका मिनिटातच आटोपली. एकदा आत गेल्यावर जाणारांची आणि पोचविण्यास आलेल्यांची नुसती नजरानजरही होत नाही, म्हणून दोघांसही फार वाईट वाटते. मी मचव्यात बसल्यावर, मला न भेटलेल्या बाहेरच्या तिघा मित्रांकडून, पुन: भेटून जाण्याबद्दल ३ चिठ्या आल्या. पण इतक्यात मचवा निघाल्यामुळे, माझा नाइलाज झाला. हळूहळू माझा मायदेश डोळ्यांदेखत अंतरू लागला. परदेशगमनाचा विचार प्रथम आल्यापासून तो आतापर्यंत मी सारखा धांदलीत असल्यामुळे स्वीकृत गोष्टीचे पूर्ण स्वरूप डोळ्यांपुढे आले नव्हते, ते मी मचव्यात स्थिरपणे बसल्यावर प्रत्यक्ष दिसू लागल्यामुळे ह्या पाच मिनिटांत मनाच्या ज्या कित्येक कधीच न अनुभविलेल्या भावना झाल्या, त्या लिहून व्यक्त करणे केवळ अशक्य आहे! वियोग मूर्तिमंत पुढे उभा राहून माझ्या जिवलग माणसांची उदास व खेदमय दिसणारी चित्रे मला एकामागून एक दाखवू लागला. अशाच कष्टमय स्थितीत मला दोन वर्षे काढावी लागतात की काय अशी धास्ती पडली. पण अखेरची मनाची भावना प्रार्थनामय झाली. विरहवेग कमी होऊ लागला. किंचित शांत दृष्टीने किना-याकडे पाहू लागलो, तो ह्या प्रवासाची मनात प्रेरणा होण्यास जी पर्यायाने कारण झाली आहे, ती मुंबई युनिव्हर्सिटी जणू काय हात वर करून आशीर्वाद देत आहे, असे दिसले.

याप्रमाणे मी १ वाजता पर्शिया आगबोटीवर दाखल झालो. नंतर एका तासाने माझे सर्व सामान मला मिळाले. २|| वाजता आम्ही सर्व मिळून जेवणास बसलो. जेवण चालले असता आगबोट सुटून केव्हा चालू लागली होती हे काही वेळ कळलेच नाही. एंजीनची धडधड लांबून किंचित ऐकू येत होती. ग्लासातील पाणी देखील सहज दिसण्यासारखे हालत नव्हते. ३ वाजता जेवण आटपून घाईने डेकवर येऊन पाहतो तो कुलाब्याचा दीपस्तंभही मागे राहिला होता.

३|| वाजता १० लाख वस्तीच्या मुंबई शहरास मला क्षितिजात शोधून काढावे लागले! ४| वाजता मुंबईजवळच्या डोंगरांचाही कोठे मागमूस लागेना!! सभोवार क्षितिजाचे विशाल वलय पसरलेले, वरती ढग, खाली लाटा, याशिवाय आसमंतात दृश्य पदार्थ काय तो आगबोटीतून निघणारा धुराचा लोट हाच होता. खरोखर हा देखावा साक्षात दगडालाही कवित्वाची स्फूर्ती करणारा आहे! बोटीच्या अगदी पिछाडीच्या टोकावर-म्हणजे मजकडून होईल तितके करून माझ्या देशाजवळ- मी सुमारे एक तासभर हा देखावा पाहात चित्राप्रमाणे तटस्थ उभा होतो. बोट वेगाने चालली असता पाणी दुभंगून तिच्या मागे कोनाकृती धार दिसत होती. बाजूने पाण्याचे तुषार उडून त्यावर ऊन पडून त्यातून इंद्रधनूष्य दिसे. संध्याकाळनंतर रात्री चांदणे पडले आणि समुद्राने आपला पेहराव बदलला. दुसरे दिवशी पहाटेस उठून पोशाक करून डेकच्या अगदी आघाडीस गेलो. हा देखावा कालच्यापेक्षाही अधिक मोहक व प्रेरक होता. आकाश अगदी निरभ्र असल्याकारणाने समुद्र त्याच्या रंगाने रंगला होता, आणि बोटीतून धूर निघालेला दिसत नसल्यामुळे, चहूंकडे ऐक्य नांदत होते. अत्यंत पुरातन सागर महामुनी शांत व गंभीर रूप धारण करून ‘एकमेवाद्वितीयम्’ ह्या महामंत्राचा आपल्याशीच पाठ करीत संध्यावंदन करीत बसलेले दिसले. त्यास पाहून प्रत्यक्ष पापमूर्तीचाही संत बनेल ह्यात शंका नाही!!

पर्शिया आगबोट:- कॅलिडोनिया, अरेबिया ह्याप्रमाणेच पर्शिया आगबोटही फार मोठी आहे. ही लांबीने सुमारे एक फर्लांग म्हणजे १/८ मैल व रूंदीने मध्ये २२ यार्ड आहे. ऊंचीने ४/५ मजली इमारतीइतकी भरेल. वजन ७,००० टनांपर्यंत नेऊ शकते. हिजमध्ये ५३० प्रवाशांची सोय आहे. पण ह्या खेपेस प्रवासी फार थोडे म्हणजे केवळ ७५ च होते. हिचा वेग दर तासास १५ मैल पडतो. पहिले दिवशी ३१८, दुसरे दिवशी ३५८, तिसरे दिवशी ३५५ मैल ह्याप्रमाणे ही चालते. हिला दोन धुराडी आहेत. समुद्र खवळून केव्हा केव्हा तुषार आत येतात, म्हणून आगबोटीच्या बाजूस पुष्कळ आणि मोठ्या अशा खिडक्यांची योजना करिता येत नाही. ह्यामुळे चोहीकडे वारा खेळावा, विशेषेकरून खालच्या मजल्यात हवा पोचावी म्हणून अशी योजना केली असते की, मोठाले २|३ फूट रूंदीचे बंब खालपासून वरपर्यंत नेऊन त्यांची तोंडे पुष्कळशी पसरट करून हवेत निरनिराळ्या दिशेने वळवून दिलेली असतात. तेणेकरून वारा कसाही वाहत असला, तरी त्यांच्या तोंडांत सापडून खाली उतरतो. असे बंब सुमारे ४० आहेत. प्रकाशासाठी खालच्या मजल्यात २४ तास एकसारखे विजेचे दिवे जळत असतात. बोटीला एकंदर पाच मजले आहेत. तळमजला पाण्याखाली आहे. त्यामुळे त्यात अंधार असतो. त्यात जड सामान आणि माल भरलेला असतो. दुस-या मजल्यास लोअर डेक म्हणतात. दुस-या वर्गाचे ह्या डेकवरील मुंबईपासून लंडनपर्यंत एका जागेचे भाडे ५२२-५० रूपये पडते. पाण्यावरचा हा पहिलाच मजला असल्याकारणाने, प्रकाश आणि हवा येथे पुरेशी नसतात. वरचेवर एखादी लाट खिडकीवरून जाते म्हणून ती नेहमी जाड भिंगाने बंद ठेवावी लागते. तिस-या मजल्यास मेनडेक म्हणतात. मी ह्यात दुस-या वर्गाचे तिकीट घेतले आहे, त्यास लंडनपर्यंत ६०० रूपये भाडे पडले. ह्यातील खोलीत अधिक सोयी असून, खिडकी नेहमी उघडी ठेविता आल्यामुळे, हवा व प्रकाश मुबलक असतात. शिवाय अंथरूणावर पडल्या ठिकाणाहूनच खिडकीतून समुद्राचा सर्व देखावा नजरेस पडतो. चवथ्या मजल्यास डेक किंवा अपर डेक म्हणतात. येथे दुस-या वर्गाच्या जागा नाहीत. मंडळीस हिंडण्यास, फिरण्यास, आराम खुर्च्यांवर बसण्यास किंवा काह खेळ खेळण्यास दोन्ही बाजूंस दोन ग्यालरीसारख्या ४० यार्ड लांब व ५|६ यार्ड रूंद अशा खुल्या जागा आहेत. मध्ये सुमारे १० यार्डांची चौरस धूम्रपानाची खोली आहे. पहिल्या वर्गाच्या मात्र ह्या मजल्यातही खोल्या आहेत. एका प्रवाशास सबंध एक खोली मिळते. तिचे भाडे लंडनपर्यंत सुमारे ८२२ रूपये पडते. पाचवा मजला उंच गोपुरासारखा आहे. येथे कोणी जात नाहीत. पण येऊन सर्व क्षितिज नजरेस पडते.

केबिन:- एक एक खणाची एक खोली असते. तीन केबिन म्हणतात. लोअर डेकवर एका केबिनमध्ये तिघांची व मेनडेकवर एकीत चौघांची सोय केलेली असते. प्रत्येकाच्या जाग्यास बर्थ म्हणतात. त्यावर नंबर मांडलेला असतो. असे एकंदर ५३० नंबर आहेत. प्रत्येकाकरिता एक गादीवर चादर आंथरलेली, एक ब्लँकेट, एक पासोडी, दोन मोठ्या व मऊ उशा आणि एक मोठा टॉवेल इतके सामान भिंतीत अडकविलेल्या दोन गजांवर व्यवस्थेने ठेवून एक अंथरूण बनविलेले असते. ही दोन खाली आणि दोन त्यावर असतात. भिंतीत एक शिसवीचे टेबल असते, त्यात एकावर एक असे चार खण असतात. समोर दुसरे एक टेबलासारखे असते त्यावर एक मोठा गोल आरसा लटकलेला असतो. त्याचेखाली एक फडताळ असते, ते उघडल्याबरोबर तोंड धुण्याचे एक जाड चिनी भांडे बाहेर येते. त्याचे मागेच दोन पेल्यांतून दोन साबण ठेवलेले असतात. दोन्ही बाजूंस दोन स्वच्छ रूमाल टांगलेले असतात. तोंड धुणे आटपल्यावर फडताळ उचलून झाकल्याबरोबर त्यातील पामी खाली जाऊन सर्व पूर्वीप्रमाणे पेटीसारखे दिसते. आरशाच्या मागे एक काचेचा तांब्या व दोन ग्लास पिण्याचे पाणी भरून ठेवलेले असतात. अशा पेट्या दोन असतात. बारीक सामान ठेवण्यास चार जाळ्या आणि कपडे ठेवण्यास १२ खुंट्या असतात. एक विजेची बत्ती असते, ती संध्याकाळी आपोआप लागते. तिच्याखाली एक बटण असते. ते फिरविल्यास आपल्या मर्जीप्रमाणे ती विझविता येते. शिवाय एक मेणबत्तीचे शेड असते. वरती माळ्यावर चार लाईफ बेल्टस् असतात, २ इंच जाड व १ फूट लांब असे कॉर्कचे तुकडे दुहेरी एकत्र बांधून आपल्या पोटाभोवती बांधण्यास एक पट्टा तयार असतो. अपघाताचे वेळी हा पट्टा बांधून पाण्यात पडल्यास मनुष्य बुडत नाही.

डायनिंग सलून:- हा एक सुरेख दिवाणखाना आहे. त्यात दोन्हीकडे चार चार खुर्छ्या ठेविलेल्या अशी पाच टेबले एकापुढे एक मांडली आहेत. अशा पाच टेबलांच्या दोन्ही बाजूंस दोन रांगा असून मध्ये एक मोठे न्याहारीचे टेबल ठेविलेले आहे. सकाळी ६|| वाजता चहा, रोटी, लोणी, फळे इ. असतात. ८|| स न्याहारी, १||  ला मुख्य जेवण, ४|| वाजता फराळ, ६|| ला चहा आणि रात्री ९|| वाजता फराळ, असा नेहमीचा क्रम असतो. ह्या सर्व प्रसंगी सर्व मंडळी हॉलमध्ये जमते, आणि आपापल्या ओळखीप्रमाणे जागा पसंत करते. सकाळचा चहा व रात्रीचा फराळ सोडून बाकी सर्व प्रसंगी जेवणास कोणते पदार्थ तयार केले आहेत त्यांची यादी कार्डावर छापून ती कार्डे टेबलांवर मांडलेली असतात. प्रत्येक टेबलाजवळ एक स्टुअर्ड (वाकनीस) उभा असतो. क्रमाने सर्व पदार्थ आपलेकडे हा वाकनीस आणितो. आपल्यास लागेल तो लागले तितका आपण घ्यावा. प्रत्येक वेळी सात किंवा अधिक पदार्थ असतात. कलकत्त्याची कढी, फ्रान्सचे वाटाणे, यारमाउथचे मासे, इटलीची आमटी, सार्डिनियाचे अमुक आणि रंगूनचे तमुक, अशी यादीतील चटकदार नावे वाचून नवख्यास मोठी मौज वाटते. तरी प्रत्यक्ष पदार्थ पाहीपर्यंत नुसत्या यादीवरून काही कल्पना होत नाही. हा सर्व थाट आणि हे प्रकार पाहून नवीन  मनुष्य सहजच वाजवीपेक्षा अधिक खातो आणि दोन दिवसांनी कू लागल्यावर म्हणतो की आपल्यास बोट लागली!

स्नानगृह:- एका खोलीत एक हौद कंबरेइतका खोल असतो. त्यात एक ऊन पाण्याची व एक थंड पाण्याची अशा दोन तोट्या असतात. हा दोन्ही मोकळ्या करून आपल्यास लागेल तसे गरम पाणी करून घेता येते. पण हे पाणी खारे असते म्हणून एका वेगळ्या पिंपात गोडे पाणी ठेविलेले असते. हौदातल्या पाण्याने स्नान केल्यावर या गोड्या पाण्याने अंग धुवावे. खा-या पाण्यात आपला नेहमीचा साबण चालत नाही म्हणून, खा-या पाण्याचा साबण किंवा सीसोप वेगळा मिळतो तो येताना आपण आणावा. येथे मिळत नाही.

करमणूक:- धूम्रपानाचे खोलीत बुद्धिबळाचा आणि दुसरा कसलासा खेळ मांडलेला असतो. शिवाय पत्ते गंजीफा मिळतात. इतर २|३ प्रकारच्या व्यायामाच्या खेळांचीही योजना आहे. डेक स्टुअर्ड एका बाजूस क्रिकेट खेळण्यास जागा करून देतो, तरट हांतरून पिच तयार करतो. पहिल्या वर्घाकरिता पियानो वगैरेची अधिक व्यवस्था असते. लायब्ररीतून आपलय् नावावर पुस्तके वाचण्यास मिळतात. त्याबद्दल वर्गणी भरावी लागते.

नोकर:- पाच पाच केबिनला एक स्टुअर्ड इंग्लिश मनुष्य असतो. तो रोज सकाळी संध्याकाळी आमची खोली झाडून साफ करितो, सामान व्यवस्थेने टेवितो, पांघरूणाच्या घड्या घालतो, बूट साफ करितो आणि दुसरे काहीही सांगितलेले काम करितो व माहिती देतो. आम्ही मागितल्यास आमचे जेवण खोलीतच आणून देतो. दाराजवळ एक बटन असते, ते वाटेल तेव्हा दाबल्यास वरची घंटा वाजते आणि एक स्टुअर्ड खाली येऊन सांगितलेले काम करून जातो. सर्व गोरे नोकर कोणते काहीही काम मोठ्या तत्परतेने, आदबीने व खुशीने करतात, मग ते काम गो-या प्रवाशाने सांगितलेले असो, किंवा काळ्याने असो, महत्त्वाचे असो किंवा हलके असो, जरूरीचे असो किंवा कसेही असो, करण्याची त-हा एकच. पण स्नानगृहात काळे नोकर आहेत ते वरचेवर कुरकुरतात! आणि आमच्यापेक्षा साहेब लोकांची कामे मात्र लवकर करितात. गोरे नोकर कामे लवकर करितात. इतकेच नव्हे तर अशा ऐटीत करतात की त्यांच्याकडे पहातच बसावेसे वाटते.
सोबती:- ७५ प्रवाशांपैकी आम्ही हिंदुस्थानचे रहिवासी नेटिव्ह ख्रिश्चन सोडून सातजण, कलकत्त्याचे एक कायस्थ गृहस्थ, लाहोरचे आणि आग्र्याचे दोन मुसलमान गृहस्थ, निजाम हैदराबादचे एक नायडू, मुंबईचे एक पारशी आणि एक मुसलमान व पुण्याचा मी असे सातजण आहो. सातहीजण तरूणच आहो. वरील पारशी गृहस्थ व्यापारास जात आहेत. बाकी सर्वजण विद्यार्थी आहो. पैकी पाचहीजण कायद्याचा अभ्यास करावयास जात आहेत. मी एक मात्र आपला विक्षिप्तच. प्रत्येक बोटीतून अलीकडे हिंदुस्थानची जी तरूण मंडळीच विलायतेस जात आहेत, त्यावरून हिंदुस्थानचे इंग्लंडशी विद्यार्थ्यांचे नाते कसे आहे, ते दिसून येते. पण ह्या सर्व बाबतीत गतानुगतिकत्वच दिसून येते. असो, आम्हा सर्वांचा चांगला स्नेह झाला होता. पैकी पाचजण तर नेहमी एकत्रच होतो. त्यामुळे प्रवासात एकांतवास मुळीच भासत नाही.

प्रकृती:- अद्यापपर्यंत उत्तम आहे. दुसरे व तिसरे दिवशी दोनप्रहरी एक तासभर बरेच मळमळले. औषध घेतल्यावर तेही राहिले. बाकी सर्व ठीक आहे. मात्र माझ्या घड्याळाची प्रकृती मोठ्या गमतीने बिघडली आहे! आगबोटीतल्या घड्याळाशी ताडून पाहता माझे घड्याळ दुसरे दिवशी १० मिनिटे पुढे गेले आणि तिसरे दिवशी २५ मिनिटे पुढे गेले. मग मी त्याचा मागचा काटा फिरवून हळू चालेल असे केले. तरी चौथे दिवशी ते आपले ४० मिनिटे पुढे! मला वाटले घड्याळाला आगबोट लागली! पण लवकरच माझ्या लक्षात खरा प्रकार आला. त्यावेळी आमची आगबोट मुंबईपासून सुमारे १,००० मैल आली होती आणि रोज ३६० मैल पश्चिमेकडे जात होती त्यामुळे असा फरक पडत आहे, हे लक्षात येऊन माझा मीच खजील झालो!

आगबोटीत पोस्ट ऑफिस व दवाखाना ही आहेत. एकंदरीत तिकिटाचे पैसे दिले आणि आपल्याजवळ भरपूर पोशाक असला म्हणजे येथे कसलीही वाण पडत नाही. इतकी जर सर्व कडेकोट तयारी आहे तर धर्मसंबंधीही काही व्यवस्था केली आहे की कसे? ह्याबद्दल मी एका रविवारी शोध केला. पण त्यासंबंधी कधी विशेष गरज लागत नाही म्हणून व्यवस्था केली नाही असे कळले. मलाही बोटीवरचा रविवार आणि इतर वार ह्यांमध्ये कोणत्याच बाबतीत फरक आढळून आला नाही. बोटीवरच्या अधिका-यास यासंबंधी काळजी नसली तरी विश्वाच्या अधिका-यास ती आहे व त्याने पूर्ण व्यवस्था करून ठेविली आहे. मनुष्याने मात्र आपल्या स्वत:वरची आणि आपल्या बोटीवरची नजर काढून बोटीभोवतालच्या प्रदेशावर टाकावी म्हणजे पंचमहाभूतांचे अष्टौप्रहर सतत हरिकीर्तन चाललेले कानांला ऐक येईल, डोळ्यांना दिसेल, रोमरोमांचास भासेल व सेवटी अंतरात्माही परमात्म्याच्या समागमात धन्य होईल.

समुद्रावरच्या एकंदर प्रवासात मुंबईपासून एडनपर्यंतचाच प्रवास काय तो विशेष कंटाळवाणा होतो. सभोवतालची परिस्थिती अगदीच नवी असल्याने पहिला दिवस केव्हाच निघून जातो. पण दुस-या दिवशी दोनप्रहरपासून हळूहळू कंटाळा येऊ लागतो. पाहिलेले तेच तेच नजरेस पडू लागल्यामुळे मनाचा उत्साह नाहीसा होतो. अष्टौप्रहर अंग हालल्याने तोंडाला प्रकृतीच्या मानाप्रमाणे कमजास्त मळमळ सुटते. नवीन सोबत्यांशी अद्यापि चांगली घसण न पडल्यामुळे एकांतवास वाटू लागतो. सभोवती लोकांची इतकी गर्दी असून सुखदु:खाचे दोन शब्दही कोणाशी बोलण्यास मन धजत नाही आणि आत तर विरह धुमसत असतो. अशा स्थितीत, बायरन कवीने एके ठिकाणी वर्णिलेला हा गर्दीतला एकांतवास निर्जन एकांतवासापेक्षाही फार दु:सह होतो. पण अशी स्थिती बहुतकरून आमच्याच लोकांची होते. गोरे लोक लगेच एकमेकांशी मिसळून अनेक प्रकारचे खेळ खेळत दिवस काढतात. लहान मुले, पोक्त बाया आणि मोठे धटिंगण ह्यांचा दिवसभर धांगडधिंगा चालू असतो. या गुलहौशी पाश्चात्य लोकांनी सर्व जगभर- जमिनीवरच नव्हे तर पाण्यावरही- आपले घर पसरून टाकिले आहे, तेणेकरून हे कोठे गेले तरी ह्यांचा उल्हास कमी होत नाही. आम्हांला येते धरून आणल्याप्रमाणे होते. असो, हा प्रकार रजोगुणाचा झाला, पण मनाची जर सात्विक वृत्ती होऊन ते धर्माच्या उच्च वातावरणात वावरू लागले, तर हीच परिस्थिती त्यास अत्यंत अनुकूल होते. लाटांचे एकसारखे उत्क्रमण, वायूचे सतत वाहणे, अपार आकाशमंडळात फाकणारी नि:सीम प्रभा वगैरे पाहून विश्वाचे आनंत्य व सृष्टिव्यापाराचे सातत्य आणि अखेरीस परमेशाचे सर्वत्र भरलेले मंगल वास्तव्य साक्षात दृग्गोचर होते आणि वर्डस्वर्थने सांगितल्याप्रमाणे, ‘भेटीच्या अशा उदात्त प्रसंगी विचाराला अवकाशच नाही’, व परमात्म्याशी जीवात्म्याचे तादात्म्य होऊ लागते! पृथ्वीवर अशा ब्रह्मोपासना विरळ!

ता. २६ (सप्टेंबर) रोजी सकाळी एडन जवळची टेकडी दिसू लागली. ५ दिवसांत दगड आणि माती आमच्या मुळीच नजरेस न पडल्यामुळे ही टेकडी दुरून पाहून आम्हांस अत्यानंद झाला. एडन बंदर उंच उंच टेकड्यांचे कडे उंचवर निमुळते होत गेले आहेत. चोहोंकडे वाळुकामय प्रदेश दिसतो, झाडझुडूप किंवा एखादे हिरवे पानही कोठे दिसत नाही. बंदरात शिरल्यावर बोटीवर क्वारंटाईनचे निशाण फडकू लागले. व्यापारी लहान लहान होड्यांतून आपला माल विकण्यास अगदी बोटीजवळ येऊ लागले. व्यापारी गोरे अरब असत, व होड्या हाकणारी पोरे सोमाली शिद्दी असत. क्वारंटाईनमुळे ह्यांस बोटीवर येण्यास किंवा आम्हास त्यांचेकडे जाण्यास परवानगी नव्हती. म्हणून खालूनच ते आपला माल दाखवीत व किंमती ओरडून सांगत. ह्यांस मुसलमानी साफ बोलता येत होते. होडी हाकणारी सोमाली पोरे केव्हा केव्हा आपला जिन्नस दाखवून, केव्हा केव्हा आपल्या इंग्रजी भाषेने आणि केव्हा केव्हा आपल्या विद्रूप अंगविक्षेपाने गि-हाइकाचे चित्त वेधीत. अरबांचा पोषाक बोहरी लोकांसारखा होता, ह्यांस दाढ्या नव्हत्या, पण कानांवर केसांची लांब झुलपी होती. सोमाली पोरे अर्धी नागवीच होती आणि तीही स्वत:चा काही माल विकीत. येथे विक्रीचे जिन्नस म्हणजे मडमांच्या गळ्यांतले पिसांचे हार, सुटी लांबरूंद सुंदर पिसे, सांबरांची शिंगे, माशांचे सांगाडे, शहामृगाची अंडी वगैरे प्राणिज कच्चा माल होता. ह्या जिनसांवरून व त्यांच्या विकण्याच्या त-हेवरूनही ह्या लोकांची कंगाल स्थिती दिसून येत होती. माल खपेनासा झाला म्हणजे ही शिद्दी पोरे ८|१० मिळून बँडचे चालीवर इंग्रजी गाणी गाऊ लागत, ती ऐकून मोठी गंमत वाटे. कोणी त्यांजकडे पेनी टाकीत. अशा प्रकारे हा संगीतव्यापार बोट निघेपर्यंत २|३ तास चालला होता. पूर्वी प्रवासी लोक लहान लहान नाणी समुद्रात फेकीत असत व ही पोरे चटकन पाण्यात बुडी मारून ती नेमकी बाहेर काढीत, पण वरचेवर फार अपघात होऊ लागल्यामुळे, ह्या प्राणघातकी करमणुकीसंबंधाने वर्तमानपत्रांतून फार अपघात होऊ लागल्यामुळे, ह्या प्राणघातकी करमणुकीसंबंधाने वर्तमानपत्रांतून गवगवा होऊन सरकारांनी ही चाल सक्तीने बंद केली, वगैरे हकीकत मी ऐकिली होती. आता तसला काही प्रकार दिसला नाही.

सकाळी ९|| वाजता आगबोट बंदरातून निघाली, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोर्पस नावाचे ३|४ फूट लांब मासे पुष्कळसे दिसले. ते पाण्यावर ३|४ फूट उंच उड्या घेत एकमेकांमागून धावत जात, काही बोटीबरोबर धावत येत. मध्यसमुद्रात ह्या प्राण्यांचा हा खेळ पाहून मनास करमणूक झाली, आणि अशा प्राथमिक कोटीतल्या प्राण्यांसही करमणुकीची आवश्यकता आहे व त्यांनीही आपापले खेळ बनविले आहेत, हे पाहून मोठे कौतुक वाटले. आमची बोट ४|| वाजता बाबेलमांडेबच्या सामुद्रधुनीत शिरली. ह्या अरबी शब्दाची व्युत्त्पत्ती बाब+इल्+मंदब् अशी आहे. बाब=दार, इल=चे मंदब्=रडणे, अश्रू. एकंदरीत रडण्याचे दार असा या पदाचा अर्थ होतो. ह्या ठिकाणी आशियाचा व आफ्रिकेचा असे दोन्ही किनारे जवळ जवळ आल्याकारणाने आगबोटीस जाण्या-येण्यास हे ठिकाण फार धोक्याचे झाले आहे. थोड्याच वर्षांपूर्वी येथे एक आगबोट दगावली आहे, आणि असे अपघात आणखी कितीतरी झाले असतील म्हणून अरबी लोकांनी पूर्वीपासूनच ह्या स्थलास वरील अन्वर्थक नाव देऊन भयसूचक कायमचे चिन्ह करून ठेविले आहे. ४|| वाजता आम्ही तांबड्या समुद्रात शिरलो. इतर ठिकाणांपेक्षा येथे तांबड्या रंगाचे विशेष चिन्ह नसून ह्यास तांबडा समुद्र अगर इंग्रजीतील Red Sea ही दोन्ही नावे अरबी भाषेतील कुलझम् ह्या नावावरून पडली आहेत. कुलझम् ह्याचे अफाट, खोल, तांबडा इत्यादी अर्थ आहेत. अरबस्थानच्या व इजिप्तच्या किना-यावरच्या गावांची व इतर स्थळांची नावे बहुतकरून अरबीच आहेत. ह्यावरून अरबी लोकांनी एकेकाळी व्यापार, विद्या व राज्यकारभार इ. गोष्टींत आपले नाव व सत्ता बरीच गाजविली आहे हे दिसून येते. पण बंदरावर विकावयाला आणलेल्या जिन्नसांवरून पाहता हे आता फार मागासलेले दिसतात. तांबड्या समुद्रात उष्मा फार होतो. वारा अगदीच बंद असल्याने खोलीत मुळीच बसवत नाही, समुद्र एकाद्या डबक्याप्रमाणे शांत असतो. कपडे सर्व साहेबी थाटाचे असल्याने अंगातून घामाची संतत धार चाललेली असते. आशिया मातेचा लवकरच निरोप घ्यावयाचा असतो म्हणून जणू ती आम्हास उष्णोदकाचे सचैल स्नानच घालीत असते.

ता. ३० सप्टेंबर सकाळी ६ वाजता आम्ही सुवेज येथे पोचलो. व्यापाराच्या आणि जलपर्यटनाच्या बाबतीत ह्या कालव्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या सोयी व सुधारणा झाल्या आहेत. ह्याची लांबी म्हणजे तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र ह्यांमधील अंतर सुमारे ८२ मैल आहे, आणि रूंदी म्हणजे आशिया आणि आफ्रिका ह्यांमधील अंतर १५० पासून २०० फुटांच्या आतच आहे. ह्यामुळे एकाच वेळी एकच बोट जाऊ शकते. आगबोटीला जाण्याला पाणी २५|३० फूट तरी खोल असले पाहिजे. तितक्या खोल पाण्याचा १०० फूट रूंद भाग कालव्याच्या मधोमध १०० यार्डांवर एकएक बोट तरंगत ठेवून आखून दिल्याप्रमाणे केला आहे. समोरून जर ट्रॅम आली तर अरूंद गल्लीत बाजूला उभी करण्यास जसा रस्ता करून दिलेला असतो तशी येथेही समोरून आगबोट आल्यास उभी करण्यास जागजागी बाजूला तळी खणली आहेत. हा कालवा दोन मोठ्या सरोवरांतून व कित्येक लहान लहान सरोवरांतून जातो. हा सर्व प्रदेश सपाट मैदान आहे, आणि समुद्रसपाटीवर ह्याची उंची ५|१० फुटांच्या आतबाहेर तकी आहे. ह्यावरून परमेश्वराच्याच मनात येते कालवा व्हावा असे होतेसे दिसते. तरी त्याची ही इच्छा ओळखण्यास मास्यूलेसेप-ज्या फ्रेंच गृहस्थाने हा कालवा खणला-सारख्या धोरणी व साहसी मनुष्याला आपली सर्व अक्कल खर्छ करावी लागली!

आमची आगबोट सुवेज बंदराच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. लगेच इजिप्त सरकाराकडून तीन लष्करी कामगार क्वारंटाईन कामासाठी बोटीवर आले, ते पोर्टसेडपर्यंत बोटीवरच होते. त्यांपैकी एकास विचारता त्याने सांगितले की, कालवा अगदी अरूंद असल्यामुळे, बोटीतून कोणासही सजर मध्येच उतरून देशावर जाता येते. त्यांनी तसे जाऊ नये म्हणून देखरेखीस तिघांस ठेविले आहे. एडनमध्ये तर बोट बंदरापासून लांबच होती. सुवेज आणि मार्सेयच्या दरम्यान उतरणा-यास सुवेज येथेच उतरून घेऊन तेथे काही वेळ क्वारंटाईनमध्ये ठेवून मग सोडतात. पोर्टसेडपासून मार्सेयपर्यंतही एक कामगार होताच. ह्याप्रमाणे आम्ही हिंदुस्तान सोडून आलो, तरी युरोपच्या दारापर्यंत प्लेगच्या उपाधीने आमची पाठ सोडिली नाही. असो.

पृथ्वीवर जी काही अचाट मानवी कृत्ये आहेत त्यांत सुवेजच्या कालव्याची गणना आहे. हा कालवा तयार करण्यास क्रोडो रूपये लागले आहेत, इतकेच नव्हे तर तो दुरूस्त ठेवणे अतोनात खर्चाचे काम आहे. दोन्ही काठची जमीन अगदी वाळूची असल्याने काठ पसरून आत येतात. आणि कालवा वरचेवर उथळ होतो, म्हणून गाळ काढण्याचे काम नेहमी चाललेले असते. गाळ यंत्रानेच काढण्याची एक चमत्कारिक योजना केली आहे. एका आगबोटीवर एक रहाटगाडगे उभे केले आहे. ज्या वाफेच्या यंत्राने ही बोट हळूहळू पुढे सरकते, त्याच्याच शक्तीने हे रहाटगाडगे हालते, आणि रहाटाचा खालचा भाग जसजसा गाळातून वर येतो, तसतसा प्रत्येक गाडग्यातून पाणी नितळून जाऊन गाळ वरती जातो. रहाटाच्या टोकापासून तो किना-यापर्यंत एक उतरता पूल जोडून दिला आहे. तो बोटीबरोबरच हालतो. त्यात प्रत्येक गाडग्यातील गाळ पडून तो घसरत किना-यावर जाऊन पडतो. कोळशाची आणि लोखंडाची खाण व काड्यांच्या पेट्या इतके मिळाले की हे पाश्चात्य लोक शुद्ध दगडाकडून अत्यंत प्रचंड कामे करून घेतात. आणि हे लोखंडी राक्षस त्यांच्या आज्ञा कशा तत्परतेने व दक्षतेने वेळेवर आणि व्यवस्थेशीर करितात, हे पाहून आम्ही नुसते तोंडात बोट घालून पहात राहतो!!

कालव्यात पाणी शांत असते, पण ह्या अरूंद कालव्यात आमच्या एवढ्या मोठ्या बोटीचा २०-२५ फूट उंच भाग पाण्यात बुडतो. त्यामुळे आगबोट हालू लागली म्हणजे पाण्यात खळबळ उडते. ही धोक्याची जागा आहे म्हणून कालव्यातून बोट तर तासाला फक्त ४|५ मैल चालते. एक भिकारी काही तरी मिळेल या आशेने किना-यावरून धावत होता, तो बोटीबरोबर बरेच अंतर धावू शकला. कालव्यातून आगबोट नेण्याबद्दल कंपनीला भाडे भरावे लागते. आणि येथे मोठी रहदारी असल्याने कंपनीचे रोजचे उत्पन्न लक्षावधी रूपयांचे आहे. रात्र झाल्यावर आमच्या समोरून ‘रीम’ नावाची एक मोठी फ्रेंच आगबोट आली, तिला वाट देण्यास आमची गजगामिनी ‘पर्शिया’ एक बाजूस वळून मर्यादेने उभी राहिली. ‘रीम’ आमचे जवळून जाताना मध्ये अंतर फार तर २०|२५ फुटांचे होते. दोन्ही बोटीवरच्या लोकांनी जवळून जाताना टाळ्यांचा आणि ‘हुर्रे’ चा मोठा गहजब केला. इतक्या आकुंचित व धोक्याच्या जाग्यातून एवढ्या प्रचंड बोटी अशा संथपणाने गेल्या, हे पाहून आश्चर्य वाटले. त्या जिवंत असून अगदी समजूतदार असत्या तरी ह्यापेक्षा जास्त जपून गेल्या नसत्या!

ता. १ ऑक्टोबर ४ वाजता मी जागा झालो, आणि पाहतो तो आगबोट केव्हाच पोर्टसैद बंदराला लागली आहे. अंगावर ओव्हरकोट चढवून मी लगेच डेकवर चढलो. तेथे अगदी सामसूम होते. रात्रीच्या काळोखात बंदरावरून बोटीत कोळसा भरण्याची खाली गडबड चालली होती, चहुकडे भयाण देखावा पसरला होता, अशा वेळी अशा परक्या स्थळी निद्रिस्त झालेल्या बिचा-या मोतीची मूर्ती डोळ्यांपुढे उभी राहिली आणि औदासीन्याने मनास घेरल्यामुळे उजाडेपर्यंत झोप लागली नाही.

एडनपर्यंत हवा मुंबईतल्यासारखीच असते. तांबड्या समुद्रात वारा खेळथ नसल्यामुळे व दोन्ही बाजूंस रूक्ष डोंगर आणि वाळूची मैदाने असल्यामुळे ह्या ठिकाणी मुंबईपेक्षाही अधिक उष्मा होतो. पण सुवेजला पोहोचल्याबरोबर हवेत फरक भासू लागला. सुवेज येथे सकाळी ८ वाजता पारा ७५ अंशांवर होता, व दोनप्रहरी कालव्यात ८१ वर होता. भूमध्ये समुद्रात अधिकच थंडी वाजू लागली. पुष्कळ गरम कपडे घातले तरी थंडी राहीना. त्यामुळे इंग्लंडात पोहोचल्यावर माझे कसे होईल ह्याबद्दल धास्ती वाटू लागली. ता. २ ऑक्टोबर रोजी दोनप्रहरी वारा सोसाट्याचा सुटल्यामुळे समुद्र खवळला होता. लाटा दोनॉदोन पुरूष उंच येत होत्या. आगबोट इतकी हालू लागली की, एके ठिकाणी सरळ उभे राहता येईना. खालच्या मजल्याच्या खोलीतल्या खिडकीवरून प्रत्येक लाट जोराने आपटून जात असे, त्यामुळे पाणी आत येते की काय असे वाटे, पण जाड काचेचे भक्कम झाकण असल्यामुळे एक थेंबही आत येत नाही. अशा वेळी अंथरूणावर नुसते बसवतही नाही. कारण, बसले की तोंडाला मळमळ सुटून डोके फिरू लागते. कोणी चालू लागला तर दारू पिऊन झिंगल्याप्रमाणे झुकांड्या खात जातो. म्हणून अंथरूणावर अगदी पडून राहणेच बरे.

ता. ३ संध्याकाळी ४ वाजता आम्ही इताली आणि सिसिली मधील मेसिनाचे सामुद्रधुनीतून जाऊ लागलो. एडन, सुवेज आणि सिसिली येथील वेळा अनुक्रमे सुमारे २,३,४ तास मुंबईच्या वेळेच्या मागे असाव्या, असे माझे घड्याळावरून दिसले. दोन्ही बाजूंच्या किना-यांवर उंच डोंगर आहेत. त्यांच्या पायथ्याशी समुद्र व डोंगर ह्यांच्यामधील अरूंद प्रदेशात दोनह्कडे लहान लहान खेडी व शहरे ह्यांच्या एकसारख्या रांगा लागून गेल्या आहेत. डोंगराच्या काही अवघड ठिकाणी देखील कड्यातून गावे वसलेली दिसली. अगदी काठावरच एक देऊळ होते, त्याचा घाट व शिखर ही थेट हिंदू देवळाप्रमाणेच दिसत होती. पावसाळ्यात डोंगरातील ओढ्यांचे पाणी गावांतून पसरू नये म्हणून वरपासून खालपर्यंत दोन्हीकडे भिंती बांधून वळणावळणाने सपाट उतरणी करून दिल्या आहेत. त्या दुरून फार सुंदर दिसतात. नकाशात इताली देशाचे जे निमुळते स्पार्टिव्हेंटो भूशिर दिसते, त्याच्या अगदी टोकालाच एक उंच तुकडा तुटला आहे. तो वाटोळा असल्याने बुरूजाप्रमाणे दिसतो. समुद्रकाठाने जाणारी एक आगगाडी ह्याच बुरूजाच्य बोगद्यातून बाहेर पडताना दिसली. इतालीचे किना-यावर मेलिटो, रेजिओ आणि सिला ही शहरे आणि सिसिलीचे किना-यावर मेसिना हे मोठे शहर नजीकच दिसते. ह्या ठिकाणी समुद्राची रूंदी २|३ मैल असेल. पण समुद्रसपाटीमुळे त्याहूनही कमीच असेल, असे दिसते, चांगला पोहणारा दुस-या बाजूस पोहून सहज जाईल.

वेळ संध्याकाळचा असल्यामुळे व समुद्र फार शांत असल्यामुळे ह्या ठिकाणी दोहोंकडच्या शहरांचा व उंच डोंगरांचा देखावा फार मनोहर होता. कुलाब्याच्या दांडीसारखा सिसिलीचा एक लांब, सपाट, चिंचोळा जमिनीचा भाग इतालीजवळ गेला आहे. त्यास वळसा घालून आगबोट पुन: उघड्या समुद्रात शिरल्यावर डावीकडे लिपेरी बेटे आणि स्ट्रँबोलीचा ज्वालामुके पर्वत दिसू लागतो. हाच देखावा पाहून बायरन् कवीस कवितेची स्फूर्ती झाली असावी. वारा मंद व शीतल वाहत होता. स्वर्गातून परमेश्वराने शांतीचा जणू निरोपच धाडिला होता! सूर्य अस्तास जात असताना पश्चिमेकडच्या ढगांतून तापलेल्या लोखंडाप्रमाणे तांबडा लाल दिसत होता. तो सगळा क्षितिजाखाली गेल्यावरही त्याचे चपटे प्रतिबिंब काही वेळ दिसत होतेच. अफाट समुद्रावर स्वच्छ आकाशात ह्या शांत वेळी सूर्यास्ताचा देखावा पाहण्याची भारी मौज असते. बुडताना त्याची आरक्त किरणे लाटांवरून लांबपर्यंत पसरल्यामुळे समुद्र जणू सोन्याच्या रंगाने उचंबळतो की काय असे दिसते! ६ वाजता स्ट्रँबोली ज्वालामुखी पर्वतांच्या शिखरातून निघणारा धुराचा लोळ दिसू लागला. ह्या डोंगराच्या नजीक आलो, त्यावेळी अगदी काळोख पडल्यामुळे ह्याचा देखावा स्पष्ट दिसला नाही. ता. ४ रोजी संध्याकाळी ४|| वाजता आम्ही कार्सिका व सार्डिनीया बेटांमधील बोनिफोसिया सामुद्रधुनीत आलो. दोन्ही बेटांच्या किना-यावर मुळीच कोठे वस्ती दिसली नाही. ता. ५ ला सकाळी मार्सेय येथे पोचलो.   

ह्या १४ दिवसांच्या जलप्रवासात मला विशेष म्हणण्यासारखा कंटाळा वाटला नाही किंवा दुसरा कसला त्रास झाला नाही. एकाद्या लहानशा खेड्यातल्याप्रमाणे अगर एकाद्या मोठ्या राजवाड्यातल्याप्रमाणे हे आमचे दोन आठवडे गेले. हल्लीचे काळी आगबोट म्हणजे नुसते प्रवासाचे उत्तम साधन आहे, इतकेच नव्हे तर परदेशात कामधंदा करून थकलेला मनुष्य आणि एका स्थळी बराच वेळ राहून कंटाळलेला खुशालचेंडू ह्या दोघांसही आरामाचे आणि चैनीचे स्थान आहे. पण जलपर्यटनात एवढी मोठी सुधारणा नुसत्या गेल्या शतकात कशी घडून आली, ह्याचे वर्णन एका पुस्तकात मी वाचले, त्याचा दोन शब्दांत सारांश देतो.

पाण्यावरून गलबत हाकारण्याच्या कामी प्रथम ज्या काही अडचणी आल्या त्यांत लोकांचे अज्ञान, दुराग्रह आणि पोरकट भीती ह्याच फार मोठ्या होत्या. काही धाडसी शोधक लोकांनी चांगले प्रयोग करून ही गोष्ट फायदेशीर आहे, असे दाखविल्यावरही सरकार आगबोटी वापरण्यास लवकर परवाने देईना व लोकही धजेनात. इ. सन १८९२ त मि. हेन्री बेल नावाच्या मनुष्याने ‘कॉमेट’ नावाची पहिली आगबोट क्लाईड नदीवरून हाकारली. तिच्या एंजिनाची शक्ती नुसती ४ घोड्यांइतकी होती. वेग १ तासाला ७|| मैलांचा होता. आणि वजनही फार कमी होते. अमेरिकेतील ‘सव्हाना’ शहरापासून ‘सव्हाना’ नावाची पहिली आगबोट ता. २८ मे १८१९ रोजी निघाली. ती ता. २९ जून १८१९ रोजी लिव्हरपूर शहरास पोचली. हल्ली इंग्लंड आणि अमेरिका ह्यांमध्ये ‘क्युनार्ड’ कंपनीच्या टपाल नेणा-या ज्या मोठ्या आगबोटी आहेत, त्यंत ‘कँपानिया’ आणि ‘लुकानिया’ फार मोठ्या आहेत. कँपानिया १२,९५० टन माल नेऊ शकते. तिची शक्ती ३०,००० घोड्यांची आहे आणि ती दर तासाला २३ मैल चालते. लुकानिया ही अमेरिकेहून इंग्लंडला एकदा ५ दिवस १५ तास ३७ मिनिटे इतक्या वेळात आली. आजपर्यंतच्या प्रवासात हा सगळ्यात जलद प्रवास आहे. ‘क्युनार्ड’ कंपनी आणि ‘व्हाईट स्टार’ नावाची जर्मन कंपनी ह्यांमध्ये अटलांटिक महासागरातून टपाल नेण्याच्या कामी मोठी चुरशीची स्पर्धा लागली आहे. लुकानिया जन्मेपर्यंत मेलचे काम ‘व्हाईट स्टार’ कडेच होते. आगबोटीला अधिक वेग देण्याचे कामी आता जर्मन लोकांची सरशी होऊ लागली आहे. ‘केसर विलहेल्मडर ग्रॉसी’ नावाची आगबोट ही एके दिवशी ५८० नॉट्स म्हणजे ६५२ मैल चालली. हा सर्वात जास्त वेग आहे. पण लुकानिया बोटीच्या वर दिलेल्या वेळात तिला अद्यापि इंग्लंड व अमेरिकेच्या मधला प्रवास करता आला नाही. ‘डचंलड’ या जर्मन बोटीची शक्ती सर्वांत जास्त म्हणजे ३५,००० घोड्यांइतकी आहे. ‘सेल्टिक’ नावाची नुकतीच बेलफास्ट येथे केलेली बोट सर्वांत जास्त लांब म्हणजे ७०४ फूट आहे. ‘फर्स्ट बिस्मार्क’ ही सर्वांत अधिक श्रीमंती थाटाची बोट आहे. म्हणून ती विलासी स्त्रियांची मोठी आवडती आहे. दक्षिण महासागरात तितकी स्पर्धा नसल्यामुळे पी. अँड ओ. च्या आगबोटींची शक्ती ११,००० घोड्यांपेक्षा जास्त नाही. मी येताना ‘पर्शिया’ आगबोटीचा सर्वांत जास्त वेग म्हणजे एके दिवशी ती ४३१ मैल चालली, हाच होय.

कँपानियासारख्या प्रचंड आगबोटीला दररोज ४५० टन कोळसा लागतो म्हणजे प्रत्येक ३ १/५ मिनिटाला एक टन पडतो! ह्या आगबोटीची किंमत ६,००,००० पौंड म्हणजे जवळ जवळ एक कोट रूपये आहे!! एडिसनचे असे म्हणणे आहे की, अमेरिका आणि इंग्लंड ह्यांमधील प्रवास फार तर ३|४ दिवसांत करता येईल! ह्याचे नाव प्रगती!!!

दर रविवारी बोटीवर धर्मसंबंधी काही होत नाही, असे जे मागे मी लिहिले आहे ते, चुकीचे आहे. ता. २९ सप्टेंबर आदित्यवारी ‘पर्शिया’ आगबोटीवर सार्वजनिक ईश्वरोपासना झाली, ती स्वत:कमांडरानेच चालविली. पुरूष व स्त्रिया मिळून ४० जण हजर होते. उपासनेनंतर समुद्रावरील धर्मकृत्यांकरिता म्हणून तेथल्या तेथेच सुमारे २० रूपये जमले. असो. कोणत्या तरी रीतीने ह्या लोकांची धर्मबुद्धी प्रकट होत आहे.