1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

ब्रिटिश म्युझिअम

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. ७-२-१९०२

‘कालो ह्ययं निरवधिविपुला च पृथ्वी’

ह्या विपुल पृथ्वीवर निरवधी कालातून ज्या अनेक सुधारणांचा आजवर अवतार झाला आणि समाप्ती झाली, त्या सर्वावर शिरोमणी होऊन बसलेली जी आधुनिक सुधारणा तिच्या साम्राज्याखाली आम्ही आहो. जगाच्या इतिहासात ज्यांनी हजारो वर्षे आपले प्रताप गाजविले, अशा गत सुधारणांपैकी काहींचे हल्ली फार थोडे अवशेष राहिले आहेत. काही नुसत्या नामशेष झाल्या आहेत, आणि काहींचा तर विस्मृतीच्या  अभेद्य अंधार-पटलातून अद्यापि पत्ता लागला नाही. मागील सुधारणा जगाच्या रंगभूमीवरील एकेका कोप-यात आपापले प्रकाश पाडून अस्तास गेल्या, पण हल्लीचा सुधारणा-सहस्त्ररश्मी सर्व भूगोलावर आपला प्रकाश पाडून वरती तारामंडलात चंद्र, मंगळ इत्यादी खगोलांकडे आपली किरणे सोडीत आहे. तथापि आमचे डोळे दिपून जाऊ नयेत. स्वकालीन सुधारणेविषयी पक्षपात घडून अंगी स्वयंमन्यता शिरू न दिली पाहिजे. कालचक्राच्या वाढत्या कलेकडे नजर दिली असता, शास्त्र, कला, वाड्मय इ. बाबतीत मागच्यात न सापडणारा असा एकादा जाज्वल्य विशेष गुण आधुनिकेत आहे, असे जरी म्हणता येत नाही, तरी एक भेद फार लक्षात ठेवण्यासारखा आहे. मागील सुधारणांचा प्रदेश आकुंचित होता, इतकेच नव्हे, तर त्यास परस्परांची खबरच नव्हती. ऐतिहासिक-प्रवृत्ती आणि तुलनात्मक शास्त्रीय पद्धती हे दोन गुण हल्लीप्रमाणे व हल्लीच्या प्रमाणाने मागे नव्हते, असे म्हटल्यास आत्मस्तुतीच्या विशेष दोष घडेल असे वाटत नाही. ह्या प्रभेदाचे मूर्तिमंत स्वरूप पहावयाचे झाल्यास वर निर्दीष्ट केलेले ब्रिटिश म्युझिअम हे अत्यंत उत्तम स्थान आहे. तर ते आपण पाहू या.

लंडन शहराचे मध्यभागी ब्लूमसबरीमध्ये ब्रिटिश म्युझिअमची विशाल इमारत आहे. इमारत अत्यंत सुंदर व त्याहूनही अफाट आहे खरी, पण तिच्याकड पहाण्यास व तिचे मोजमाप घेण्यास आपणास सध्या वेळ नाही, तर आपण थेट मध्य दालनात जाऊ या. अगणित पैसा अगदी पाण्याप्रमाणे ओतून ह्या लोकांनी जे हे विचित्र आणि विविध विषयांचे अदृष्टपूर्व संग्रहालय करून ठेविले आहे, ह्याचा हेतू केवळ चार रिकामटेकड्यांनी येथे सहज वाट चुकून येऊन आपल्या आळसावलेल्या मनाची चार घटका करमणूक करून घ्यावी एवढाच असेल अशी कल्पनादेखील मनात आणू नका.

उलट ते पहा, मोठे मोठे प्राचीन इतिहासशास्त्री, शोधक, लेखक, पंडित एकेका कोप-यातून एकाद्या पदार्थाकडे किती खोल दृष्टीने टक लावून पहात आहेत! तर आपण त्यास कसलाही त्रास पोहोचू नये म्हणून पाऊल न वाजविता हळूच आत शिरू या. चित्त वेधून जाऊन अंत:करण तल्लीन होणे ही खरोखर ज्ञानप्राप्तीच्या वेळेची स्वाभाविक अवस्था होय. अगदी लहान मुले अशीच बिनश्रमाने पण मोठ्या कौतुकाने मानवी ज्ञानाचा मोठ्या महत्त्वाचा भाग केवळ पूर्ववयातच शिकतात. तशातलाच काहीसा (प्रकृतीच्या मानाने अर्थात कमी-जास्ती) प्रकार आपलाही येथे होईल, करमणूक तर होईलच होईल. पण नकळत ज्ञानप्राप्ती काय झाली, ते आपल्यास बाहेर पडल्यावर कळेल.

आता आपण मध्य दालनात उभे आहो. सभोवती प्रागैतिहासिक कालाचा देखावा पसरला आहे. ह्या कालाचे मुख्यत: चार भाग होतात.

(Palaeolithic Age) “पूर्वपाषाणयुग”- ह्या पहा आमच्या पूर्वजांच्या सापडलेल्या काही अत्यंत जुन्या वस्तू. आमचे बंधू जे इतर प्राणी त्यांच्यापासून आमचे पूर्वज येथे नुकतेच विभक्त झाले आहेत. संसारयात्रेत अगर जीवनकलहात त्यांनी आपल्या शरीराबाहेरची प्रथम जी उपकरणे उपयोगात आणिली ती हत्यारे ही होत. अर्थात ती दगडाचीच असावयाची. ही नदीच्या प्रवाहातून व गुहांतून सापडली आहेत. कारण आम्ही त्यावेळी गुहांतूनच राहत होतो. ही हत्यारे किती वेडीवाकडी ओबडधोबड आहेत! त्यातच पहा काही लहान मोठी हाडे मिसळून ठेविली आहेत. ती हल्ली लुप्तप्राय झालेल्या त्यावेळच्या पाणघोड्यांची व सांबरांची असावीत. हे लोक इंग्लंडात व वेल्समध्ये कोणकोणत्या प्रदेशात रहात होते, हे दाखविण्यासाठी तो पहा भिंतीवर त्यावेळचा इंग्लंडचा नकाशा टांगला आहे. आम्ही त्यावेळी भांडी वापरीत होतो की नाही, ते सांगता येत नाही. तसेच आमच्या हत्यारांस मुठीही नाहीत. थोडेसे पुढे चला, तुम्हांला मुठी दिसतील. शेवटी येथे पहा किती सुंदर हस्तीदंती व शिंगटांच्या मुठीत ही कट्यारे बसविली आहेत. ह्या मुठीवरून त्या त्या प्राण्यांची किती हुबेहूब चित्रे उठविली आहेत. ही ह्या युगातली नव्हेत बरे! ही पहा ह्या मोठ्या तावदानाच्या पेटीत आमच्या राहत्या गुहेची तळजमीन, जशीच्या तशीच आणून ठेविली आहे. ही फ्रान्सात सापडली.

(Neolithic Age) “उत्तर-पाषाणयुग”-येथील हत्यारे चांगली घासलेली पुसलेली पाणीदार आहेत. ज्या प्राण्यांची हाडे येथे दिसतात, त्यांपैकी काही अद्यापि सापडतात. येथे पहा काही हत्यारे करण्याचे कारखाने सापडले आहेत. कारण येथे अर्धवट बनविलेली पुष्कळ हत्यारे व हत्यारे बनविण्याची काही यंत्रे व सामान सापडले आहे. तशीच येथे थडग्यांत सापडलेली काही भांडी आहेत. बहुतकरून आत मृतांची राख असावी.

(Bronze Age) “काशाचे युग”- इतक्या प्राचीन काळी लोखंडाच्याही पूर्वी ही मिश्र धातू कशी आढळते, हा एक चमत्कारच आहे. येथे भांड्यांत व हत्यारांत पुष्कळ सुधारणा झाली आहे. त्यांचे कट्यारे, कोयते, सु-या, बर्च्या, तरवारी इ. अनेक प्रकार आढळतात. तसेच हे पहा सोन्याचे दागिने. पण रूपे मात्र अद्यापि नाही सापडले. ती पहा भिंतीवर टांगलेली काशाची सुरेख ढाल. तशाच येते काशाची हत्यारे बनविण्याच्या कितीतरी मुशी जमा करून ठेविल्या आहेत! इकडे पहा स्विट्झरलंड व सव्हाय ह्या देशांतील सरोवरांच्या मध्यभागी पाण्यात डांब रोवून त्यावेळी बांधलेल्या घरांचे काही अवशेष ठेविले आहेत. ही चटकन् पाहिजे तेव्हा मासे धरता यावेत म्हणून केलेली योजना बरे! ह्यावरून युरोपातील पूर्वीच्या लोकांची रहाटी कशी होती ते कळते. ह्या घरांचे अवशेष आतापर्यंत जसेच्या तसेच कसे राहिले, ह्याबद्दलचा चमत्कार ध्यानात ठेवण्यासारखा आहे, तो हा-ही घरे आगीने जळून ह्यातील धातूचे व दगडाचे सामान पाण्यात बुडून व चिखलात रूतून शोधकांस सुरक्षित सापडले आहे. प्रथम आगीची क्रिया घडून वर चिखलाचे दाट दडपण पडल्यावर मग त्यास वज्रलेपच झाला म्हणावयाचा!

(Early Iron Age) “लोखंडी युग”—ह्यात  आपल्यास माहीत असलेले बरेच पदार्थ आहेत. शिवाय आपण इतिहासाच्या अगदी जवळ येऊन भिडलो तर दुसरीकडे जाऊ या. हे पहा आंदमान आणि निकोबार बेटांतील रानटी माणसांचे हाडाचे दागिने व हार. ही हाडे यांच्या आप्तांची आहेत. ही वापरल्याने कित्येक आजार बरे होतात, अशी ह्यांची कल्पना आहे. येते भयंकर मुखवटे ठेविले आहेत. रोग्यास बरे करण्याकरिता सिलोनातील पंचाक्षरी हे मुखवटे आपल्या डोक्यावर घालून नाचत असत. रामबाण उपाय! दुस-या बाजूस ऑस्ट्रेलिया व आसपासच्या बेटांतील काही विक्षिप्त मुखवटे ठेविले आहेत. हे घातले असता त्यावेळी पारधीत हटकून यश येत असे! इकडे हे वैझान बेटातील देवाच्या मूर्ती, झगे व अक्राळ विक्राळ पिसांचे मुकुट ठेविले आहेत, ते पहावतदेखील नाहीत! तसेच मिशनरींनी दक्षिण पॅसिफिक महासागरातील दूरदूरच्या बेटांतून आणिलेल्या अनेक मूर्तींचा व चमत्कारिक पदार्थांचा बहुमोल संग्रह करून ठेविला आहे.

आता अमेरिकन दालनात चला, उत्तर अमेरिकेत वर अगदी थेट सरोवरापर्यंत अगदी प्राचीन काळीदेखील भांडी होती असे दिसते. दगडांची हत्यारे व भांडी यांचे प्राचीन युरोपच्या मासल्याशी किती साम्य आहे पहा! येथील प्राचीनांना तांब्याशिवाय दुसरी धातू माहीत नव्हती. त्याची घडीव भांडी थडग्यांतून व जुन्या इमारतीच्या पायाखाली सापडली आहेत. ही पहा शिंपांची नाणी, गारेच्या बर्च्या, बाणांची टोके-आणि विसरू नका-तंबाकूच्या चिलमी तावदानात सुरेख मांडून ठेविल्या आहेत. पण ह्या नव्या जगाचा जुन्या जगाशी पूर्वी कधीकाळी कसला तरी संबंध होता की नाही हे कोडे अद्यापि उकलले नाही.

इतका वेळ पाहिलेल्या गोष्टींवरून प्रागैतिहासिक सुधारणांची थोडी तरी कल्पना तुमचे मनात आली असेल. आता आपण ऐतिहासिक कालाकडे वळू या. ह्या ठिकाणी मिसर, आसिरिया, बाबिलोनिया, ग्रीक, रोमन इत्यादी गतराष्ट्रांच्या सुधारणांचे अवशेष राखून ठेविले आहेत. ही ह्या सुधारणांची जणू प्रेतेच आहेत! काहींचे बरेच भाग शाबूत आहेत. काही काळरूपी गिधाडाने अगदी छिन्नविच्छन्न करून टाकिली आहेत. ही पहा इजिप्शिअन ग्यालरी. आपण वेदांस अती प्राचीन मानितो, किंबहुना जगाच्या सुधारणेस येथूनच आरंभ झाला असे म्हणतो. इतकेच नव्हे तर वेद अनादि आहेत असे मानण्यापर्यंतही आमची मजल जाते. पण ह्या बाबतीत ज्यांनी परिश्रम केले आहेत ते वेदांस ख्रिस्ती शकापूर्वी १५०० वर्षांपेक्षा अधिक मागे नेत नाहीत. त्यांचे म्हणणे खरे असेल तर आम्हांपासून वेदांचा उदय जितका दूर आहे, तितकाच जवळजवळ इजिप्शिअन सुधारणेचा उदय वेदापासून मागे दूर आहे असे म्हणावे लागते. कारण ख्रिस्तीशकापूर्वी ४५०० वर्षांच्याही मागचे इजिप्शिअन लेख आणि राखून ठेविलेली प्रेते आढळतात. इजिप्तच्या प्राचीन इतिहासात जे राज झाले त्यांची एकंदर तीस घराणी आहेत. ह्यांनी इ. स. पूर्वी ४४००-३४० पर्यंत राज्य केल्याचे लेख आढळतात. प्राचीन शाही (इ. स. पूर्वी ४४००-२४६५), मधली शाही (इ. स. पूर्वी २४६५-१२००), नवी शाही (इ. स. पूर्वी १२००-३४०) असे ह्याचे भाग पडतात. पहिल्या तीन घराण्यांतील राज्यांची नुसत्या नावापलीकडे काही माहिती मिळत नाही. चौथ्या घराण्याने आपल्या वैभवाची कायमची स्मारके करून ठेविली आहेत. दुसरा राजा खुफू (इ.स. पूर्वी ३७३३-३७००) याने गीझे येथील (Great Pyramid) मोठा मनोरा बांधिला. त्याचे काही दगड उत्तरेकडील खोलीत ठेविले आहेत. पहिल्या खोलीत कालानुक्रमाने ममी व ममीच्या पेट्या मांडून ठेविल्या आहेत. ममी म्हणजे इजिप्शिअन लोकांनी पुरातन काळी अनेक प्रकारचे मसाले तयार करून त्यात सुरक्षित स्थळी राखून ठेविलेली प्रेते होत. ह्या लोकांमध्ये ही चाल इ. स. पूर्वी ४५०० (कदाचित ह्यापेक्षाही पूर्वी) वर्षापासून इ. स. नंतर ५०० वर्षांपर्यंत होती. निजलेल्या मनुष्याचा आत्मा जसा पुन: परत येतो तसा मृत शरीरातही आत्मा परत येणार आहे अशी ह्य लोकांची समजूत होती. म्हणून इतके श्रम करून व अक्कल खर्चुन ते आपल्या नातलगांची प्रेते जपून ठेवणे हे आपले कर्तव्य मानीत ममी करण्याच्या निरनिराळ्या त-हा होत्या. प्रेताची आतडी बाहेर काढून एका घटामध्ये घालून त्याच्या शेजारी ठेवीत, आणि प्रेतास प्रथम अनेक प्रकारच्या क्षारांचे आणि अत्तरांचे लेप देऊन वर सुरेख तागाच्या पट्ट्यांनी त्यास लपेटीत. कधी-कधी ४०० यार्ड लांब पट्ट्या लागत असत! गुंडाळताना प्रेतास सपशेल उताणे निजवीत. ममी तयार झाल्यावर त्यास त्याच्याच आकाराच्या लाकडी अगर दगडी पेटीत घालून ती बंद करीत, वरती रंग देऊन प्रेताचे चित्र काढीत, व लेख खोदीत. ब-याच पेट्यांवरचा रंग व चित्रे अद्यापि जशीया तशीच आहेत. पिवळा रंग हा ह्यांचा मोठा आवडीचा दिसतो.

इजिप्शिअन लोकांची अत्यंत पुरातन थडगी म्हणजे मास्टाबा अथवा पिरामिड (मनोरे) हे होत. खाली प्रथम देवळाच्या आकाराची एक खोली करून तिच्या एका भागात मयताची मूर्ती बसवीत. तिच्याच खाली जमिनीत तळघर करून त्यात त्याची ममी ठेवीत. कित्येक ठिकाणी खडकातून अशी पुष्कळ घरे खोदून त्यात एका कुटुंबातील अगर घराण्यातील सर्व ममींची योजना केली जात असे. ह्या घरांच्या भिंतीवरून मयताच्या करमणीसाठी त्याच्या चरित्रातील घरगुती आणि सामाजिक प्रसंगांची सुंदर चित्रे काढीत. उत्तरेकडील दालनात ह्या भिंतीवरचे पदर चित्रासकट जसेच्या तसेच काढून लाविले आहेत ते पहा, म्हणजे ५-६ हजार वर्षापूर्वीची इजिप्शिअन राहाटी तुम्हांला कळेल. त्याच भिंतीवर ‘एबिडॉस’ची फळी लाविली आहे. तिच्यावर इ. स. पूर्वी ४४००-१३३३ पर्यंतच्या सर्व राजांची नावे कोरली आहेत. हा एक फार महत्त्वाचा ऐतिहासिक देखावा आहे. तसेच मयतासाठी त्याच्याजवळ मद्य, खाद्य व अंगाला लावण्यास उटी वगैरे जरूरीचे पदार्थ निरनिराळ्या पात्रांत भरून ठेविलेले असत. नंबर ४ च्या खोलीत कित्येक सुंदर खुजे, पेले, वाडगे ठेविले आहेत. कित्येकांवर त्यांच्या मालकांची अगर तत्कालीन राजांची नावे आहेत. ह्यांपैकी जेव्हा काही पात्र सापडली तेव्हा अद्यापि त्यांतील पदार्थ द्रवस्थितीत सापडला! ह्याशिवाय मयतांच्या आवडीची वाद्ये व इतर जिनसा आणि त्याच्या नातलगांच्या व मित्रांच्या देणग्याही सर्व ते आपल्या जवळच ठेवती. मेन-काऊ-रा नावाच्या न्यायी आणि द्याळू राजाच्या ममीवर पुढील शब्द लिहिले आहेत-‘ऑसिरिस, उत्तर दक्षिणाधिपति चिरंजीव स्वगोत्पन्न “दैवी चमत्कार”’ ह्या रूपाने तुझी आई नट ही तुजवर पसरली आहे. हे मेन-काऊ-रा, तू अजातशत्रू देव होशील असा तिने आशीर्वाद दिला हे. ह्या खोलीच्या शेवटी अखेरच्या न्यायप्रसंगाचे चित्र दाखविले आहे ते पहाण्यासारखे आहे. वर सर्व देव आपापल्या दर्जाप्रमाणे न्यायासनावर बसले आहेत. त्यांच्यापुडे मयत जो अनी त्याच्या अंत:करणाचे (Conscience) वजन करण्याचे काम चालले आहे. एका पारड्यात एक लहानसे पीस ठेविले आहे. व दुस-यात अनीचे अंत:करण आहे. हलक्या पिसाशी तुलना होणार मग अर्थात न्याय कसोशीने होईल यात शंका नाही. अँन्युबीस तराजू पारखीत आहे. समोर विधी उभा आहे, मागे नशीब व जन्मदेवता अगर सटवाई उभी आहेत, डावीकडे स्वत:अनी नम्रपणे उभा आहे, उजवीकडे थॉत् निकाल नमूद करीत आहे. पाठीमागे अमिमाईड राक्षस गिळण्यास टपला आहे. त्याचे डोके सुसरीचे, मध्यभाग सिंहाचा आणि मागील बाजू गेंड्याची आहे. हा देखावा पाहून जो पाप करील तो मात्र खरा निगरगट्ट म्हणावयाचा!

तिस-या खोलीत काही जनावरांच्या ममी करून ठेविल्या आहेत, बैल, सुसर, कुत्री, माकडे इ. प्राणी देवादिकांना फार प्रिय झाल्यामुळे, कालंतराने ते स्वत:च पूज्य होऊन बसले, अर्थात त्यांच्याही ममी करणे भाग पडले. कानडी मुलखात जसे ‘बसवण्णाचे’ फार माहात्म्य आहे तसे इजिप्तची पहिली राजधानी मेफिस् येते ऍफिस् वैलाची मोठ्या थाटाची पूजा होत असे. ज्यू लोकांच्या सैन्याच्या वासराची उत्पत्ती या ऍफिसपासूनच झाली असावी.

असो, ह्याप्रमाणेच असिरियन, बाविलोनियन, ग्रीक, रोमन, फिनिअन व एद्रुस्कन वगैरे राष्ट्रांचे गतवैभव येते साक्षात दिसत आहे. तसेच निरनिराळ्या दालनांतून हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती, महमदी व यहुदी धर्मांचे प्रदर्शन केले हे. आमच्या तेहतीस कोटी देवता, पुराणांतील कथाप्रसंग, पूजेचे संभार, तुलसीवृदांवने आदिकरून हिंदू धर्माची सौम्य, मधूर, उग्र, अशी सर्व स्वरूपे येते एके ठिकाणीच दिसतात. ह्या प्रकारे आपण प्रागैतिहासिक कालातून प्राचीन कालात व प्राचीनातून अर्वाचीनात हिंडता हिंडता शेवटी खालच्या अवाढव्य पुस्तकालयात उतरतो. हा जगातील एक अत्यंत मोठा ग्रंथसंग्रह. येथे केवळ छापील पुस्तकांची संख्या वीस लक्षांवर आहे. हस्तलिखित पुस्तकात हिंदू, अरबी, फारशी, चिनी, जपानी, इ. ५०,००० प्रतींचा संग्रह आहे. चिनात छापण्याची कला कशी उद्भवली व नंतर तेथे आणि दुसरीकडे तिचा हळूहळू कसा विस्तार झाला, हे दाखविण्यासाठी त्या त्या काळाची छापील बुके अनुक्रमे लावून ठेविली आहेत. पंधराव्या शतकापासून तो अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत पुस्तक बांधण्याच्या कलेचा कसा विकास झाला, हे दाखविण्याकरिता शेवटच्या सहा कपाटांत निवडक बांधणीची मोठमोठी पुस्तके जुळवून ठेविली आहेत. मध्यभागी सहा कपटांत इ. स. पूर्वी ३०० वर्षांपासून तो इ. स. नंतर १५०० वर्षांपर्यंत लेखनकलेचा इतिहास दाखविण्याकरिता त्या त्या काळच्या हस्तलिखित प्रती अनुक्रमे मांडून ठेविल्या आहेत. प्राचीन काळी इजिप्त देशात पेपिरस नावाच्या बोरूच्या झाडाच्या सालीचा एक प्रकारचा कागद बनवीत असत. इजिप्तचे प्राचीन लेख ह्याच कागदावर लिहिले आहेत. सर्वात जुना उपलब्ध लेख इ. स. पूर्वी ३५०० वर्षांचा आहे!...... ह्याशिवाय वर्तमानपत्रे आणि मासिके ह्यांची एक निराळी खोली आहे. नवीन होणा-या पुस्तकांचा  ह्या संग्रहात समावेश व्हावा म्हणून संयुक्त राज्यातील प्रत्येक प्रकाशकाने आपल्या नवीन पुस्तकाची एकेक प्रथ एडिंबरोची लायब्ररी, आणि ब्रिटिश म्युझिअम येथे पाठवावी, असा पार्लमेंटाने सक्तीचा कायदा केला आहे. ह्याप्रकारे म्युझिअम पाहून दारात आल्यावर तोंडातून आपोआप उद्गार येतो की “कालो ह्ययं निरवधिविपुला च पृथ्वी”.

ब्राह्मसमाज व आर्यसमाज (ह्यातील हल्लीचे साम्य, भेद व पुढे ऐक्यार्थ यत्न)

सन १८३० साली राजा राममोहन रायांनी बंगाल्यात ब्राह्मसमाज काढिला. स्वामी द्यानंदजींनी येथे १८७५ चे सुमारास आर्यसमाज स्थापला. ह्या दोन महापुरूषांच्या सामर्थ्याने व त्यांच्या अनुयायांच्या उद्योगामुळे हिंदुस्थानात शुद्ध, स्वतंत्र आणि उदार धर्माच्या प्रसारार्थ गेल्या शतकात प्रचंड यत्न झाला व तो अद्यापि वाढतच आहे. मुंबई इलाख्यातल्या काही ब्राह्ममताच्या समाजास जरी प्रार्थनासमाज हे नाव आहे, व क्वचित उपासनासमाज असेही नाव आढळते, तथापि वस्तुत: सर्व ब्राह्मांची स्वीकृत मते व इष्ट हेतू एकच असल्याने संज्ञेच्या सोयीसाठी सर्वांस ब्राह्मसमाज ह्या एकाच साधारण नावाने ओळखल्यास काही बाधा नाही. तसेच, पंजाबात जरी काही अंतस्थ कारणामुळे आर्यसमाजातही दुही आणि तट पडले आहेत, तरी सर्व ‘आर्यांचा बहाणा एकच असल्याने आर्यसमाज हे साधारण नाव त्यांनाही सारखेच लागू पडते.’

आता ह्या दोन मोठ्या सुधारकचमूंत-

प्रधान गोष्टींत साम्य

काय आहे ते थोडक्यात पाहू. ईश्वर आहे इतकेच नव्हे तर, ईश्वर म्हणजे केवळ एक अंध आणि अहेतुक शक्ती नसून, ती जिवंत, जागृत, सर्वत्र व्यापारमय वस्तू आहे. विश्वविकासात त्याचा मंगल हेतू आहे, व अवीट प्रमाणावर त्यांच्या योजनेला यशच येत चालले आहे. थोडक्यात सांगावयाचे तर तो पुरूष आहे- पुरूषोत्तम म्हणण्याचे कारण, आमच्यासारख्या अपूर्ण पुरूषांहून त्याची भिन्नता दाखविण्यासाठी. अर्थात तो एकच अद्वितीय आहे. केवळ चिन्मय असल्याने त्यास अवयवाची जरूरी नाही.

आत्मा- आम्हा जीवांमध्ये अहकारमूलक जो आत्मा आहे तोही वस्तू आहे, केवळ भास नव्हे. ईश्वराचे ठायीच त्याची वसती आणि वाढ आहे. त्याला नाश नसून तो सदैव प्रगमनशील आहे.

उपासना- आम्ही जी ईश्वराची उपासना करावयाची ती बाह्मोपचारिक नसावी, किंवा तिच्यात विधिसंस्काराचे वृथा अवडंबर नसावे. म्हणजे एकपक्षी मुळी ईश्वरच निरवयव, निराकार असल्याने त्याची कोणत्याही सृष्ट पदार्थाने मूर्ती घडविता येत नाही व दुस-या पक्षी त्याचे सूक्ष्म स्वरूप व त्याचा आपल्याशी सर्व बाजूने असलेला निकट संबंध ह्यांचे ग्रहण आपल्या मनानेच करून घेण्याचा कमीअधिक मानाने सर्वच माणसांचा अधिकार आहे, म्हणून त्याच्या उपासनेस कसल्याही जड साधनांची गरज नाही.

ह्याप्रमाणे एक ईश्वर, सतत विकास पावणारा आत्मा, आध्यात्मिक उपासना, इत्यादी धर्माच्या पारमार्थिक तत्त्वसंबंधी ब्राह्म आणि आर्य ह्या दोघांचे साम्यच नव्हे, तर ऐक्य आहे. इतकेच नव्हे तर धर्म म्हणजे वरील शुद्ध विचार इतके ठरवून स्वस्थ न बसता त्यांच्या पायावरच आपले ऐहिक आचार करण्याचा दोघांचाही आग्रहपूर्वक यत्न आहे. म्हणून सामाजिक बाबतीत सर्व माणसांचे बंधुत्वाचे नात आहे, त्यांचे हक्क सारखे आहेत, गुण-कर्मादी आगंतुक गोष्टीशिवाय वस्तुत: त्यांच्यांत भेद नाहीत, रूढीमुळे जे पाळण्यात येतात ते पाळू नयेत, केवळ जड हेतूने सामाजिक सुधारक ज्या काही सुधारणा आज घडवू पाहतात, त्या सर्व धर्माच्या उच्च पायावरून घडून याव्यात, अशी दोघांचीही सारखी खटपट आहे.

राजकीय बाबतीतही, राजा म्हणजे केवळ देव नव्हे, तो माणसांचाच प्रतिनिधी आहे. माणसांमध्ये जी धर्मबुद्धी आहे तिच्याच आश्रयाने सर्व राजकारण आटपावे, असे दोघांसही वाटते.

ह्याप्रमाणे तात्त्विक व व्यावहारिक धर्माचा जो प्रधान भाग त्याविषयी कोठे फारसा भेद येत नाही. भेद येतो तो येथे की, ज्या साधनांनी हे धर्मज्ञान मनुष्यास होते, अशी समजूत असते, त्या साधनांविषयी आग्रह धरण्यात. ह्या गौण गोष्टीस वेळोवेळी फाजिल प्राधान्य दिल्यामुळे धर्माच्या नकाशात किती चित्रविचित्र रंग भरले आहेत व किती हिडिस हेंदर साचली आहे, हे सांगण्यास येथे स्थळ नाही.

गौण भाग

वर जो साधनाविषयी आग्रह सांगितला, तो चार प्रकारचा. एक विभूतीप्रामाण्य, दुसरा ग्रंथप्रामाण्य, तिसरा मठ (Church) प्रामाण्य व चौथा रूढीप्रामाण्य. ज्या हिंदुधर्मातून ब्राह्म आणि आर्य हे पुढे आले त्यांची स्थापना ख्रिस्त-बुद्धासारख्या एकाच विभूतीकडून नियमित काली झाली नसल्यामुळे मूळ जुन्या हिंदुधर्मातच इतर धर्माप्रमाणे विभूतीविषयी हटवाद नाही. अवतारवादाविषयी जो आग्रह आहे तोही ब्राह्मांप्रमाणेच आर्यांनी सोडून दिला आहे. त्याचप्रमाणे तिसरा आणि चौथा आग्रह (अगर आचार्यपीठ) जो मठ आणि रूढीसंबंधाचा तोही आर्यांनी बिनबोभाट बाजूस ठेविला आहे. बाकी एक जो आग्रह उरला आहे आणि जो ब्राह्य आणि आर्य ह्यांच्यामधील अल्प आणि दिवसेदिवस कमी-कमी होत जाणा-या भेदाला कारण झाला आहे, तो ग्रंथप्रामाण्यासंबंधी होय. ह्या उरलेल्या आग्रहाची जागाही किती आकुंचित झाली आहे पहा. जुन्या मताप्रमाणे श्रुती, स्मृती, पुराणे आणि तंत्रे ही सारी पुस्तके हिंदू उपासनेला व व्यवहाराला प्रमाण मानली आहेत. क्वचित जरी काही हिंदू धर्माभिमान्यांनी ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ अशी हिंदू धर्माची व्याख्या केली आणि आर्यसमाजाला हिंदूत गणले, तरी तेवढ्यावरूनच हिंदुसमाजाला वेदच मान्य आहेत असे होत नाही. उलट आर्यांनी मात्र चार वेदांशिवाय बाकी सर्व पुस्तकांचा अधिकार बेलाशक झुगारून दिला आहे. बाकी उरले ते चार वेदांचे प्रामाण्य.

येथवर जे ब्राह्म आणि आर्य संगतीने चालले ते आता एकमेकांकडे टवकारून पाहून लागतात. जणू काय ह्या गोष्टीचा उलगडा झाल्याशिवाय पुढे त्यांना पाऊल टाकणे शक्यच नाही. जणू काय आतापर्यंत त्यांची संगती झाली ती ह्या गोष्टीच्या अज्ञानामुळेच. जणू काय बाह्य जगाचा जो विरोध आहे तो दोघांसही पुरेसा नाही. असो.

उगाच काही तर्कट लढवून दोघांचे नसते साम्य दाखवून ह्या खोट्या साम्याचा गळेबंद दोघांच्या गळ्यांत नकळत अडकविण्याचा माझा उद्देश नाही. तर जो भेद आहे तो कायमचा व अखेरचा आहे काय? आम्ही जे भेदाचे मोठमोठे डोंगर ओलांडून आलो, ते आता ह्या भेदाच्या सापासारख्या दिसणा-या दोरीला भिऊन निरनिराळ्या दिशेने एकमेकांपासून दूर पळावे काय? ह्याचा विचार दोघांनी करावा एवढाच आजचा हेतू आहे.

वेद शब्दाचा अर्थ करण्यात आमचे आर्य बंधू जे अलौकिक विचारस्वातंत्र्य दाखवितात, जे मनाचे औदार्य आणि प्रचाराची प्रगती दाखवितात, इतकेच नव्हे, तर आधुनिक सुधारणा आणि आधुनिक परिस्थिती ह्यांचा त्यांना कोठेच अडथळा न येता पुन: वेदाच्या प्रामाण्याविषयी त्यांचा जो आग्रह आहे तो पाहून वेदप्रामाण्यासंबंधाने त्यांची लौकिकापेक्षा काही तरी निराळी समजूत असावी असे वाटते. म्हणजे वेदाचे जे अर्थप्रामाण्य मानतात ते बाह्य नव्हे तर अंतरप्रामाण्य असले पाहिजे, आर्यांशी पुष्कळ वेळ बोलल्यावर शेवटी त्याची मजल येथवर जाते की वेद म्हणजे ही बाहेरली पुस्तके नव्हत तर सनातन ईश्वरीज्ञान होय. ह्या ठिकाणी आता

ब्राह्मांची प्रामाण्यबुद्धी

कशी आहे ती थोडक्यात सांगणे भाग आहे. ब्राह्मास त्याच्या बाहेर प्रमाणभूत वस्तू अशी काय ती एक ईश्वरच. त्याच्या प्रामाण्याचा बोध जो ब्राह्मास होतो तो बाहेरून नव्हे, तर त्याच्या अंतर्यामातून आणि विवेकबुद्धीतून. ह्यावरून ब्राह्मांना प्रमाणभूत असे काहीच नाही. ते स्वैर आहेत असे होत नाही. उलट ब्राह्मांचे असे म्हणणे आहे की, ज्यांना हे अंतरप्रामाण्य मान्य नाही किंवा पुरेसे ते ज्यास भासत नाही, तेच बाहेरच्या अनेकविध प्रामाण्यांच्या भानगडीत पडतात. आता जर कोणी ब्राह्मांस विचारतील की, अंतरप्रामाण्यात सर्वत्र सारखेपणा व निश्चितपमा कोठे आढळतो? तर त्यांचे सांगणे असे पडते की, बाह्य पुस्तकात व आचारात तर आतल्याहून अधिक धरसोड, उडवाउडव आणि अफरातफर आढळते आणि ती निवारण्यास पुन: आपल्या शुद्ध व सात्त्विक बुद्धीचाच उपयोग करावा लागतो, असो. ब्राह्मांनाही अंतरप्रामाण्य कबूल आहे हे निर्विवाद आहे. इतकेच नव्हे, तर ह्या दृष्टीने त्यांना हिंदूंचे वेदच काय पण निरनिराळ्या राष्ट्रांत निरनिराळ्या काळी ईश्वराकडून मानवी बुद्धीला ज्या ज्या प्रेरणा मिळाल्या आहेत त्या सर्व सारख्याच पूज्य व स्वीकरणीय आहेत. ईश्वरी शब्दांस रूकार देण्याचा मनुष्यास जो अनुपम अधिकार आहे, त्याच्या बळावर त्यानेच निरनिराळ्या काळी जे उदगार काढले आहेत त्यांना ईश्वरी म्हटले काय, मानवी म्हटले काय त्यांची योग्यता जास्त होत नाही की कमी होत नाही! ईश्वरी सत्य जे आहे ते सनातनच आहे पण त्याचा वेळोवेळी जो मानवी शब्दांनी स्फोट होतो तो देशकालांनी परिच्छिन्न असतो म्हणून शब्दांविषयी आग्रह न धरता सत्याविषयी आदर धरणे हेच प्रामाम्यबुद्धीचे खरे लक्षण आहे.

समेट

वर जो आपण धर्माचा प्रधान भाग पाहिला आणि त्यात ब्राह्मांचे व आर्यांचे ऐक्य आहे हे दाखविले त्या भागाचे आचरण करण्यात आपली शक्ती खर्च करावी की तो भाग अमुक ग्रंथात आहे आणि अमुक ग्रंथात नाही ह्याचा निर्णय करण्यात खर्चावी? केवळ सत्य आणि केवळ असत्य असा कोणताच ग्रंथ नाही, आणि मध्यंतरी कोणत्या ग्रंथात किती सत्य आहे हे पाहण्याचे काम, ज्यांनी आपले सर्व आयुष्य निरपेक्षपणे विद्याव्यासंगात वाहिले आहे अशा पंडितांचेच आहे. ते काम धर्मप्रचारकांनी आपल्याकडे घेतले. इतकेच नव्हे, तर अमुक एकच श्रुतिग्रंथ सर्वांशी प्रमाण आहे असा आग्रह धरला तर त्याच्यावर तीन प्रकारची जबाबदारी येते. पहिली ही की, ज्या ग्रंथाचे प्रामाण्य त्यास स्थापावयाचे आहे त्यातील सर्व विधाने हल्ली विकास पावलेल्या बुद्धीस पटतात हे दाखविण्याची. हिच्यामुळे त्या पुस्तकातील सर्व कथाभागाचा आणि त्या वेळच्या समजुतीचा आताच्या चालीरीतीला लागू पडेल असा अर्थ करण्यात येतो. दुसरी जबाबदारी ही की, आता अवगत झालेले सर्व सत्य त्यात आहे हे दाखविण्याची. ह्यामुळे मांसभक्षण व मद्यपान यांचाही निषेध वेदात आहे असे दाखविण्यात येते. तिसरी अत्यंत जोखमीची जबाबदारी ही की ह्याशिवाय इतर श्रुती आहेत त्या प्रमाण नव्हेत हे सिद्ध करण्याची. ही तिसरी जबाबदारी अत्यंत शोचनीय आहे. हिला कोणत्याही श्रुतीत आधार नसून प्रत्येक ग्रंथाभिमानी ती बळेच आपल्यावर ओढून घेतो.

वर सांगितलेल्या ह्या तीन जोखमा आमचे आर्य बंधू आपल्यावर विनाकारण घेतात. वेदप्रामाण्यासंबंधी त्यांनी थोडा खोल विचार केला तर त्यांच्यात व ब्राह्मांत फार मोठा भेद राहणार नाही. जरी किंचित राहिला तरी, प्रधान भागात जे त्या दोघांचे ऐक्य आहे आणि गौणभागातही त्याचा पुष्कळ भेद नाहीसा झाला आहे हे पाहून दोघांनीही आपला धर्मसुधारणेचा एकत्र इष्ट हेतू आता अधिक एकीने करायला पाहिजे आहे.

ब्राह्मांनी श्रुती अगदी टाकल्या आहेत असे नाही, तर उलट सर्वच जगातल्या श्रुती त्यांनी स्वीकारल्या आहेत हे वर सांगितले. पण ह्यापेक्षाही आर्यांनी हे ध्यानात घ्यावे की ब्राह्मांस वेदाचा जो शेवटचा व उत्तम भाग उपनिषदे ही पूर्ण मान्य आहेत, इतकेच नव्हे तर भगवदगीता आणि आधुनिक तुकाराम, नानक, चैतन्यादी साधूंचे प्रयत्नही ब्राह्मांस पटत आहेत, आणि त्यांच्याच वचनाच्याद्वारे मंदिरात उपेदशही होत असतात. ह्यापुढे ब्राह्म आणि आर्य ह्यांमधील भेद जर झपाट्याने कमी व्हावा असे दोघांना वाटत असेल तर दोघांनी परस्परांचे रहस्य जाणले पाहिजे. ते असे. ब्राह्मांनी आपल्या सार्वत्रिक व सनातनधर्माची तत्त्वे हिंदुस्थानवासीयांस विशेषे लवकर कळवावी आणि आर्यांनी ह्याच सनातन धर्माची तत्त्वे वेदांतून काढताना शब्दांची वाजवीपेक्षा जास्त ओढाताण करू नये. इतकेच नव्हे तर हा सनातनधर्म सर्वत्र आहे, हे सहज कळविण्यासाठी ती सर्व धर्मग्रंथांतून होता होईल तितकी काढावीत. ह्याशिवाय दोघांचे व्हावे तसे ऐक्य होणार नाही किंवा धर्माची सुधारणा करणे हा दोघांचा हेतू तोही पूर्ण तडीस जाणार नाही.

ब्राह्म आणि आर्य हे दोघेही जर उदार मताचे आणि प्रगतीपर आहेत, तर दोघांचे ऐक्य केव्हा तरी झालेच पाहिजे. इंग्लंड, अमेरिकेतील युनिटेरिअन लोक, युरोपातील उदार प्रॉटेस्टंट आणि हिंदुस्थानातील ब्राह्म हे भूगोलात व इतिहासात एकमेकांपासून इतके दूर असूनही आणि त्यांच्या आताच्या चालीरीती व मूळचा धर्मही इतका अत्यंत भिन्न असूनही ह्यांच्यात अलीकडे किती तरी ऐक्यभाव व प्रेम वाढत आहे आणि परस्परांस मदत करीत आहेत. पण आर्य आणि ब्राह्म हे सख्खे बंधू, एकाच धर्मातले, एकाच देशाच्या उद्धारासाठी झटणारे असूनही हे परस्परांपासून नेहमी इतके स्वतंत्र, कित्येकदा अगदी उदासीन व क्वचित प्रसंगी एकादा
दुस-याला टाकूनही बोलतो ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे!

नावारूपाने दोघे जरी आज एक होणे शक्य नसले तरी जे पुष्कळ कार्य दोघांस जोडीने करता येईल त्यात कोणीही तटस्थ राहू नये.

धर्म-१

हल्लीचे काळी धर्माच्या बाबतीत अंतस्थ भेद आणि भ्रांती ह्यांचा जितका सुळसुळाट माजलेला आहे तितका जीवनाच्या इतर कोणत्याही बाबतीत आढळून येणार नाही. एका पक्षाचे म्हणणे असे की, जीवनयात्रा सुव्यवस्थित होऊन ती प्रामाणिकपणे चालविता यावी ह्याकरिता धर्माचा सर्वस्वी त्याग करणे जरूर आहे. कारण गत युगातून चालत आलेली धर्म ही एक केवळ अनिष्ट परंपरा असल्यामुळे त्याच्यायोगे आमच्या विचारात गोंधळ उडून जातो. आयुष्याची यत्नशक्ती कुंठित होते आणि परस्परांमध्ये अत्यंत तीव्र द्वेष माजतो. एकंदरीत आमच्या जीवनक्रमावर त्याचे मोठे दडपण पडते. उलपक्षी इतरांचे म्हणणे असे की, प्रस्तुत युगामध्ये ज्या आध्यात्मिक गरजा भासत आहेत आणि समाजामध्ये जो गोंधळ माजलेला आहे तो लक्षात आणला असता धर्मच हा एक केवळ दृढ आधार आहे. व्यक्तीची उन्नती आणि अखिल मानवजातीचे अंतस्थ ऐक्य साधणारी, मानवी जीवित्वाचे रहस्य दाखविणारी आणि अनंत व सनातन वस्तूशी जीवनाचा संबंध जोडणारी जर कोणती एकादी बाब असेल तर ती धर्मच होय.

ह्या दोन्ही पक्षांची स्वमताविषयी कळकळ सारखीच दिसून येते. निषेधपक्षाला केवळ “नास्तिक” हे नाव देऊन त्याची अवहेलना करून चालत नाही. कारण जीवितामध्ये सत्यवृत्तीचा फैलाव व्हावा, ह्याविषयीची खरी कळकळ ह्या निषेधपक्षाच्या अनुयायांपैकी पुष्कळांमध्ये आढळून येते. दोन्ही पक्षांच्या अभिमानाचा डाग अंगास न लागावा म्हणून वादाच्या मुख्य मुद्याचा नि:पक्षपाताने विचार करणे जरूर आहे. आणि तत्त्वज्ञानाचे तर हे मुख्य काम आहे.

धर्माची जी आजकाल अवनती झाली आहे तिचेविषयी खरे तत्त्वज्ञानी कधीही बेपर्वा राहणार नाहीत. इतिहासाचे अवलोकन केले असता, जेव्हा धर्माचे अनियंत्रित साम्राज्य चालू होते अशा प्राचीन काळी मानवी जीविताचा जो प्रकार होता तो आता पार बदलून गेला आहे, असे दिसून येते. विश्व आणि मानवी जीवित ह्यांचा त्या काळी अदृश्य आणि निसर्गातीत जगाशी जो संबंध कल्पिण्यात येत असे त्याच्याच मानाने विश्वाची आणि जीविताची किंमत करण्यात येत असे. आमच्याभोवती जे भौतिक जग विस्तारलेले आहे त्याची किंमत आधुनिक काळ्या प्रगतीमुळे आम्हांला जास्त कळू लागली आहे आणि जसजसे ह्या भौतिक जगतासंबंधी आमचे प्रयत्न अधिकाधिक वाढत आहेत, तसतशी श्रद्धेच्या जगाला अधिकाधिक उतरती कळा लागत आहे. हल्लीच्या ज्या परिणत अवस्थेला आम्ही येऊन पोहोचलो आहोत, तिच्या तीन पाय-या आढळून येतात. आधुनिक ज्ञानाचा पहिला आविर्भाव होऊन गेल्यावर दैवी शक्तिविषयी जो आदरभाव कायम राहिला तो तिचा व्याप नैसर्गिक सर्व व्यापारात जो दिसून येत असे त्याविषयी जितक्या अंशाने राहिला तितक्या तिच्या अतिंद्रीयपणाविषयी राहिला नाही. त्यानंतर दुसरी पायरी काव्य आणि मीमांसा ह्यांनी स्थापिलेल्या अद्वैत सिद्धांताची होय. तिच्याद्वारे जगत आणि ब्रह्म ह्यांमधील अभेद स्थापण्यात आला.

त्यानंतरची तिसरी पायरी ही की, अमर्याद निसर्गाचा छडा लावीत लावीत राजकीय आणि सामाजिक जीविताचा विस्तार करीत करीत शेवटी मनुष्याला आपल्या कर्तबगारीची साहजिकपणे इतकी घमेंड वाटू लागते की अतिंद्रिय जगताविषयीची त्याची भावना जवळजवळ मावळून गेली आणि अशा जगताविषयीचे सर्व विचार म्हणजे केवळ निष्फळ आणि अनाठायी असे प्रतिपादणारा अज्ञेयवाद बळावू लागला. जीवितासंबंधी हा जो फरक आढळून आला आहे तेवढ्यावरूनच धर्मावरील आमचे लक्ष कमीअधिक डळमळू लागले आहे. पण आधुनिक युग धर्माला ह्याहूनही अधिक विघातक होत आहे. ते असे की, धर्मविकासाचा पाया जीविताच्या ज्या तत्त्वावर रोवलेला आहे त्या तत्त्वाच्या मुळावरच ह्या युगाचे कार्य आणि त्याची मुख्य धोरणे ह्यांच्या कुठारेचा रोख आहे. सर्व विश्वाचा आपण मध्यबिंदू अशी जी मनुष्याची आजवर समजूत होती त्या समजुतीला आधुनिक भौतिक शास्त्राने पार हुसकून लाविले आहे. इतकेच नव्हे तर, स्वत: निसर्गाचा आत्माही त्याने हिरावून घेतला आहे. मानवी इतिहास आणि मानवी स्थितीमध्ये अविश्रांत घडून येणारा बदल ह्यांच्या अवलोकनामुळे तर केवळ सत्य म्हणून काही पदार्थ आहे किंवा नाही ह्याविषयीची श्रद्धाच मुळी डळमळू लागली आहे. तसेच ख्रिस्ती धर्माच्या उगामाविषयी पाहू गेले असता ह्याविषयीची परंपरागत मते आणि ऐतिहासिक शोधामुळे ख्रिस्ती धर्मासंबंधी हल्ली झालेल्या भावना ह्यांमध्ये मोठी तफावत पडत चालली आहे. भौतिक सृष्टीवर परिणाम घडवून तिच्यावर अंमल गाजविण्याची शक्ती वाढविणे ह्यातच मानवी ध्येयाची पराकाष्टा आहे असे आधुनिक संस्कृतीमुळे वाटू लागले आहे. ह्या अपौरूषेय आदर्शाच्या दृष्टीने पहाता ख्रिस्ती धर्माचे रहस्य जी आध्यात्मिकता जीविताचा एक गौण आणि काल्पनिक भाग आहे, असे कित्येकास वाटू लागले आहे. आधुनिक जगताच्या ह्या निरनिराळ्या प्रवृत्ती एकवटून त्यांचा एकमेकाला दुजोरा मिळतो. त्यामुळे मानवी जीविताच्या केंद्रस्थानापासून धर्माचे उच्चाटन होते आणि त्याच्या सिद्धांताविषयी पूर्वीची अभेद्य स्थिती नष्ट होऊन धर्म म्हणजे सोडविण्यास कठीण असा एक प्रश्न आहे, अशी एकाद्याची साहजिक वृत्ती होते. त्यामुळे धर्म ही स्वत:सिद्ध बाब आहे अशा समजुतीमुळे मानवी जीविताला पूर्वी जे स्वास्थ्य आणि सुरक्षितता आली होती ती आता नष्ट होऊ लागते. ह्यायोगे आधुनिक विचारी मनुष्याच्या अंत:करणामध्ये धर्मबुद्धीचा झरा, त्यांच्या अंतर्जीविताचा एक अवश्य परिणाम ह्या रूपाने फुटून वर येत नसेल तर धर्माचे दुर्बोधत्व त्याना दु:सह होत असेल त्यात काय नवल? धर्माच्या निर्जीव चालीरीतीचे दडपड त्यांच्या अंत:करणप्रवृत्तीला ह्याप्रकारे दु:सह होऊन शेवटी एकाएकी जी क्रांती घडून येते तिच्यामुळे सत्याचा बचाव करण्यासाठी धर्माचा त्याग करणे हा एकच मार्ग आहे असे वाटू लागते. धर्म म्हणजे फलज्योतिष किंवा किमया ह्यासारखाच गतकाळी उदयास आलेला एक भ्रांतिमूलक प्रकार आहे आणि उत्तरोत्तर विस्तारणा-या ज्ञानप्रकाशापुढे त्याचा अंती पूर्ण निरास व्हावयाचा आहे, असे वाटू लागते.

धर्माचा वर सांगितल्याप्रमाणे केवल निषेध केल्याने जीविताचे कोडे सर्व सरळ आणि सुलभ रीतीने सुटत नाही असा अनुभव आल्याने धर्माला अनुकूल असे बरेच कार्य होते आणि दुसरे असे की, धर्माचा पाया डळमळला असता त्याच्याबरोबर ज्या पुष्कळ गोष्टी आधुनिक मनुष्यालाही टाकाव्या असे वाटत नाही. त्यांचाही पाया डलमळू लागतो. काय असेल ते असो ही गोष्ट खरी की, सत्याच्या खोल पायाशी मनुष्याचा संबंध धर्मामुळेच जडलेला आहे. सर्व जीविताला जो एक विशेष आदर्श लाभलेला आहे तो धर्मामुळेच आणि धर्मामूळेच जीविताची किंमत आहे. जीवित म्हणजे केवळ स्वसंरक्षण ही जी अहंकारमूलक हीनवृत्ती आणि अशाच प्रकारचे दुसरे नीच हेतू ह्या सर्वांस दाबात ठेवून मनुष्यजातीची आध्यात्मिक संघटना धर्मानेच केली आहे. हे कार्य अनावश्यक आणि निष्फळ असे मुळीच म्हणता येणार नाही. धर्मतत्त्वाचा त्याग केला तरी ह्या कार्याची जोडणी अन्य कोणत्या तरी त-हेने करणे आवश्यक झाले असते. अशा रीतीने जीविताची पुनर्घटना करू लागले असता, धर्माचा निषेध किती लंगडा आहे, हे खेदपूर्वक कळून येते. मानवी मन थोर आणि उदार आहे, असा त्याचा गौरव करणे, ज्ञानाची शक्ती किंवा बाह्य घटना ह्यांच्याद्वारे उन्नती होते अशी अंधश्रद्धा बाळगणे, एकाद्या गोष्टीची कारणे सांगितली असताना त्यांचा त्याग करून पुन्हा त्याच गोष्टीच्या कार्याला नकळत वश होऊन एकंदरीत विचारांचा गोंधळ माजविणे इत्यादी प्रकारे धर्माचा आवेशाने निषेध केल्यामुळे ज्यांच्या मनोवृत्तीचा तोल आणि विवेकाचा नि:पक्षपातीपणा नष्ट झाला आहे, त्यांचीच दिशाभूल होणे शक्य आहे. मानवी जीविताचा विश्वाशी अंतरबाह्य सर्व संबंध तोडून टाकल्यावर मागे अवशेष काय उरले हे पाहिले असता असेच आढळून येईल की, धर्माचा सर्वस्वी त्याग करून वागू लागलो तर एकंदर मानवी अस्तित्वाला भयंकर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

पण वरील विचार करून धर्माच्या निषेध पक्षापासून आम्ही सावध असावे असे जरी असले तरी तेवढ्यावरून धर्माची जी परंपरा चालत आलेली आहे तिलाच आम्ही चिकटून राहावे असे होत नाही. जीवितामध्ये ज्या मोठमोठ्या घडामोडी होऊन राहिल्या आहेत त्यांचा तसा अर्थ करून त्यांना वाटेस लावणे शक्य नाही, किंवा त्यांचे महत्त्वही कमी होणार नाही. त्यांची खरी कदर ओळखून धर्माशी त्यांचा समेट करणे जरूर आहे. ह्या फेरफाटामुळे युगधर्म आणि सनातनधर्म ही धर्माची मुलतत्त्वे आणि त्यांची बाह्य अंगे ह्यामधील सीमा अनिश्चित झाल्या आहेत. विशेषत: केवळ हटवादाच्या दृष्टीने धर्माचा विचार करणे आता अशक्य झाले आहे. कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट धर्मामध्ये जो विरोध पडला तो आधुनिक ज्ञानाच्या पूर्वयुगातून निर्माण झाला होता. ह्या विरोधाच्या वेळी धर्माचा जो प्रश्न होता त्याहून भिन्न हल्लीचा प्रश्न आहे ख्रिस्तीधर्माची मांडणी बहुजनसमाजाच्या तंत्राने व्हावी की थोर पुरूषांच्या तंत्राने व्हावी असा त्यावेळी प्रश्न होता आणि आता पहावे तर ख्रिस्तीधर्माच्या अस्तित्वावरच गदा आली आहे. मानवी प्रयत्नाचाओघ अन्य दिशांनी वाहत चालल्यामुळे ख्रिस्तीधर्माच्या मूळ तत्त्वाचीच धडगत लागेनाशी झाली आहे. कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट ह्या स्वत: प्रत्येकामध्ये दोन निरनिराळे विरोध चालू आहेत. कॅथॉलिक धर्मामधील दोन भेद असे की, एकाच्या दृष्टीने मठाचा अधिकार ही महत्तवाची गोष्ट वाटते तर दुस-यास व्यक्तीची आधअयात्मवृत्ती हीच महत्त्वाची बाब वाटते. आधुनिक संस्कृतीमुळे हा भेद प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने अधिकच वाढला आहे. विशेषत: जर्मन देशाच्या बाहेर कॅथॉलिक धर्माची आध्यात्मिकता वाढविण्याची एक जोराची चळवळ सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रॉटेस्टंट धर्मामध्ये जो विरोध चालू आहे तो असा की, एका बाजूने सोळाव्या शतकामध्ये धर्माधिका-यांची सत्ता चालू होती, तीच कायम ठेवण्याचा प्रयत्न चालला आहे आणि दुस-या बाजूने आधुनिक संस्कृतीला अनुलक्षून धर्माला उत्तरोत्तर सनातन आणि स्वतंत्र स्वरूप देण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु जोपर्यंत पक्षाभिमान आणि हटवाद ह्यांमुळे मुख्य धोरण लोकांच्या मनात येत नाही तोपर्यंत ह्या विरोधाचे स्पष्ट स्वरूप त्यांना दिसून येणार नाही. आणि त्यांचे कार्यही जोराने चालत नाही. ह्यामुळे  परस्परांहून भिन्न मते आणि भिन्न पक्ष उदयाला येतात. ह्या भिन्न मतांची आणि पक्षांची उभारणी गतकालाच्या अनुरोधाने न होता प्रस्तुत समयाला उचित होईल असे करणे हे आधुनिक तत्त्वज्ञानाचे अवश्य कर्तव्य आहे.

आम्हांला जगताचा ज्या ज्या प्रकारे अनुभव येतो त्या त्या प्रकारांची प्रांजलपणाने मीमांसा करणे एवढेच तत्त्वज्ञानाचे कर्तव्य आहे असे नव्हे तर धर्मविषयांचे विवरण करून तत्संबंधी काही विधानपूर्वक सिद्धांत ठरविणे हेही तत्त्वज्ञानाचे काम होय. ह्या ग्रंथामध्ये सांगितलेली जी जीवनमीमांसा तिचे मुख्य लक्षण ब्रह्मवाद, त्याचीही निश्चितपणे चर्चा व्हावयास पाहिजे आणि तत्त्वज्ञानाची वर सांगितलेली कामगिरी बजावण्याकरिता ब्रह्मवादाची पात्रता काय हे दाखविण्यात आले पाहिजे.

ब्रह्मवादाच्या दृष्टीने इतिहासाला धर्माच्याबाबतीत फारसे प्राधान्य देता येत नाही. ऐतिहासिक विचारपद्धतीवरच विशेष मदार ठेवणे हा एक कोतेपणाच आहे. आध्यात्मिक जीवनाच्या कसाला उतरावयाचे झाल्यास इतिहासावर विशेष भार न ठेवता स्वतंत्ररीतीने आपले सत्यत्व सिद्ध करावयास पाहिजे असा ब्रह्मवादाचा आग्रह आहे. इतक्या स्वतंत्र रीतीने धर्माचे सत्यत्व सिद्ध होत असेल तरच ऐहिक उत्क्रांतीमध्ये जे मायिक सत्य भासमान होत आहे त्याचा दुजोरा अतिंद्रिय सत्याला मिळून तेवढा अतिंद्रिय सत्याचा भाग मानवतेच्या आटोक्यात आला असे होईल.

११. भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळाची स्थापना

पूर्वतयारी  :  अमावास्येची काळोखी रात्र.  १९०५ सालचे उन्हाळ्यांतले दिवस.  अहमदनगरच्या समाजाच्या उत्सवासाठीं मी तेथें गेलों होतों.  नेहमींचीं दगदगीचीं कामें करून मीं नुकतेंच कोठें जमिनीला अंग टेकलें होतें.  अवचित अस्पृश्यवर्गाचें एक शिष्टमंडळ रात्रीं १२ वाजतां मला भेटण्यास आलें.  भिंगार म्हणून अहमदनगराहून चार मैलांवर एक खेडेगांव आहे.  तेथील स्थानिक अस्पृश्यांनीं अशा वेळीं एक मोठी जाहीर सभा बोलावली होती.  तिचें अध्यक्षस्थान स्वीकारून मीं चार शब्द सांगावे म्हणून आमंत्रण करण्यासाठीं हें शिष्टमंडळ अपरात्रीं आलें होतें.  नित्याप्रमाणें माझे बरोबर स्वामी स्वात्मानंद हेही होते.  मी त्यांना म्हणालों, ''चला स्वामिजी, जाऊं या.''  ''काय हो, कोण हे लोक ?  काय ही सभा !  आगाऊ तपास केल्याखेरीज एकाएकीं कसें जावयाचें ?''  स्वामीजी किंचित् त्रासून उद्‍गारले.  ''स्वामिजी, सत्कार्याला काळ वेळ, मुहूर्त लागत नाहीं.  तुमच्या शंकेला उत्तर सभेच्या ठिकाणीं गेल्याशिवाय मिळणार नाहीं.  भलताच कांहीं प्रकार घडला, तर तुमच्या हातांत दंडा आहेच.  आणखी मग काय पाहिजे ?''  

स्वामिजींना चेव आला.  ''बेशक चलीये !''  म्हणून ते टांग्यांत बसले.  गांवाच्या हद्दीवर महारवाड्यांत उतरलों.  मोठमोठे हिल्लाळ पेटलेले होते.  लहानथोर, बायकामुलें गजबजलेली सभा वाट पहात बसली होती.  आम्ही गेल्याबरोबर टाळ्यांच्या प्रचंड गजरांत स्वागत झालें.  खेडेगांवांतल्या मागासलेला समाजाचा एवढा जमाव जमलेला पाहून स्वामिजी आश्चर्य पावले.  ''ही सभा अशा अवेळीं कां बोलाविली ?''  असें स्वामिजींनीं चालकांना विचारलें.  ''साहेब, आम्ही गरीब लोक.  दिवसभर कष्टांत राबावें लागतें.  आम्हांला हिच्याशिवाय दुसरी वेळ कोणती ?  तशांत आम्ही सर्व चालकमंडळी शेजारच्या जिल्ह्याच्या गांवच्या परकीय साहेबांच्या घरगुती कामांत गुंतलेलों.  आम्हांला या वेळेपूर्वी हूं की चूं करण्यास वेळ मिळत नाहीं.  आपल्यास तसदी दिली याची माफी असावी.''  माझ्या अंतःकरणांत चक्क उजेड पडला.  ह्या लोकांची हजारों वर्षांची कहाणी अभ्यासून माझें मन हळुवार झालें होतें.  अधिक खुलासा नको होता.  स्वामीजींच्याही सर्व शंका तत्काळ मिटल्या.  कामास सुरुवात झाली.  

किसन फागू बंदसोडे आणि वर्‍हाड-नागपूरकडील इतर अस्पृश्य पुढारी यांनीं सोमवंशी हितचिंतक समाज ही संस्था त्या प्रांतीं काढली होती.  त्यांच्या सूचनेवरून अहमदनगर येथील अस्पृश्यांचे पुढारी श्रीपतराव थोरात (बटलर), पांडुरंग लक्ष्मण डांगळे (हेडमास्तर), रावजी सदोबा गायकवाड (शिक्षक नगर म्यु. पालिटीची शाळा) वगैरेंनीं ही सभा बोलविली होती.  ह्या मंडळींचे आत्मसुधारणेचे कामीं पुण्यांतील पुढारी शिवराम सदोबा कांबळे यांच्या मदतीनें ठिकठिकाणीं चार पांच वर्षे प्रयत्‍न चालले होते.  मोहपा (नागपूर) येथील मंडळीकडून आलेलें छापील जाहीरपत्रक जमलेल्या सभेस वाचून दाखविण्यासाठीं त्यांनीं माझे हातीं दिलें.  त्यांतील उद्देश मला फार बोधपर वाटले.  हजारों वर्षे वरच्या जातीचा जुलूम सहन करूनही वरिष्ठ वर्गांचीं मनें विनाकारण न दुखवितां, किंबहुना कोणत्याही प्रकारें त्यांच्या वाटेस न जातां, अस्पृश्यवर्गांनीं आपल्या स्वतःच्या हिताचे प्रयत्‍न करावे अशा अर्थाचा एक उद्देश सभेला मी नीट समजावून सांगत असतां हें उद्धाराचें काम आपण स्वतः अंगावर घेऊन, या कामांत स्वतःचें भावी चरित्र वाहून घ्यावें अशी प्रेरणा मला जोरानें होऊं लागली.  इतर सर्व कामें टाकून एका घडीचाही वेळ न दवडतां ह्या कार्यास लागावें.  असा संकल्प परमेश्वराला स्वरून ह्याच रात्रीच्या मुहूर्तावर केल्याचें मला पक्कें आठवतें.  ह्या अपूर्व सभेची आठवण ठेवून मीं काढलेल्या मिशनचें धोरण आणि पद्धत सहिष्णुतेच्या जोरावर मीं पुढें चालवली.  सूडबुद्धि आणि अत्याचार यांपासून ह्या हताश झालेल्या लोकांना सतत दूर ठेवावें आणि स्वतःही दूर राहावें या तपश्चर्येला हें जाहीरपत्रक मला ध्रुवाच्या तार्‍यासारखें मार्गदर्शक झालें.

लोकजागृति  :  नगरहून परत आल्यावर मुंबई येथील सामाजिक मंडळापुढें (Social Reform Association) माझें एक इंग्रजींत व्याख्यान करविण्यांत आलें.  त्यांत मी हिंदुस्थानांतील बहिष्कृत वर्गांच्या अडचणी, त्यांची प्रांतवार संख्या, त्यांच्या निवारणार्थ वरिष्ठ वर्गाकडून होणारे निरनिराळे प्रयत्‍न आणि स्वतः तया लोकांकडूनच स्वोद्धारार्थ होणारे प्रयत्‍न, ह्यांची मीं प्रथमच व्यवस्थेशीर मांडणी केली.  हें व्याख्यान ह्या मंडळास आणि त्या मंडळाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांस इतकें आवडलें कीं, इंडियन सोशल रिफॉर्मर या पत्रामध्यें हें व्याख्यान प्रसिद्ध करून त्याच्या पुस्तकरूपानें स्वतंत्र प्रती काढून या वाटण्यांत आल्या.  त्या व्याख्यानाचा शेवटीं जो खालील निष्कर्ष सांगितला तो ध्यानांत घेण्यासारखा आहे.  ''मीं ह्याप्रमाणें, वरिष्ठ वर्गांचा परोपकारी प्रयत्‍न आणि ह्या गरीब लोकांचा स्वोद्धारार्थ प्रयत्‍न ह्यांचें वर्णन केलें आहे.  जाणून अथवा नेणून हे दोन्ही प्रयत्‍न एकमेकांपासून, हल्लीं चालू असल्याप्रमाणें, पुढें अलग चालू राहिले तर ते थकून बंद पडतील, म्हणून मुंबईचें सुधारणा मंडळ आणि प्रा. समाज या दोन्ही संस्थांनीं एकत्र विचार आणि नवीन योजना करून ह्याच विषयावर १९०६ सालच्या ऑगस्टमध्यें दुसरें एक लहानसें इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केलें.  त्यांत त्यांनीं एक एतद्देशीय स्वतंत्र मिशन स्थापावें अशी जोराची जाहीर विनंती केली.  त्यांत म्हटलें कीं, 'ह्या लोकांच्या उद्धारासाठीं नुसती शिक्षणसंस्था, मग ती कितीही मोठ्या प्रमाणावर असो, स्थापून चालवयाचें नाहीं, तर त्यामध्यें जिवंत व्यक्तिगत पुढाकार आहे असें एक मिशन तयार झालें पाहिजे.  अशा मिशननें ख्रिस्ती मिशनर्‍यांप्रमाणें ह्या लोकांच्या जीवितामध्यें क्रांति व विकास घडवून आणला पाहिजे.  मुंबई शहर हें अशा कार्यासाठीं योग्य क्षेत्र आहे व मुंबई प्रार्थना समाज ही एकच संस्था अशा प्रकारचें मिशन चालविण्यास पात्र आहे.''

अस्पृश्य मानलेल्या लोकांचे वरिष्ठ लोकांच्या संख्येशीं जें प्रमाण बसतें तें १९०१ सालच्या खानेसुमारीवरून आंकडे गोळा करून पुढीलप्रमाणें प्रसिद्ध करण्यांत आलें.


अंत्यज आणि एकूण हिंदु यांची प्रांतनिहाय संख्या

तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्यांचें वर्गीकरण करतां आलें नाहीं व जे अर्धवट रानटी स्थितींत आहेत अशा हिंदु लोकांची संख्या ह्याशिवाय निराळी आहे.  ती धरली असतां एकूण हिंदूंची संख्या २०,७१,४७,०२६ इतकी होते.

हिंदुस्थानांतील निरनिराळ्या भागांतील एकूण हिंदुसंख्येमध्यें अति उच्च आणि नीच मानलेल्या जातीचें दर शेंकडा प्रमाण खालीं दिल्याप्रमाणें आढळून येतें.

तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा


ह्या आंकड्यांवरून असें सिद्ध होतें कीं, हिंदु लोकांपैकीं एकचतुर्थांश लोकसंख्या हीन मानलेल्या अंत्यज लोकांची आहे व मुसलमान लोकांपैकीं जवळजवळ एकसत्पमांश लोकसंख्या हीन मानलेल्या अर्जालू लोकांची आहे.  ह्या हीन मानलेल्या मुसलमानांची संख्या विचारांत न घेतां नुसत्या हिंदु अंत्यजांची संख्या हिंदुस्थानच्या एकंदर लोकसंख्येशीं ताडून पाहिली तरी ही तिच्या एकषष्ठांशाहूनही अधिक भरते.  म्हणजे प्रत्येक सहा हिंदी माणसांत (मग ते कोणत्याही जातीचे.  धर्माचे अगर रंगाचे असोत) एक अगदीं टाकाऊ, शिवून घेण्यास देखील अयोग्य असा मनुष्यप्राणी सांपडतो.

तिरपगडा  :  पण मुख्य प्रश्न बाजूलाच राहिला आहे.  तो हा कीं, जवळ-जवळ साडेपांच कोटी प्रजेनें अशा हीन स्थितींत राहून चालेल काय ?  हिंदुसमाज तर आपला सोवळेपणा सोडावयाला तयार नाहीं आणि तो सोंवळेपणा कायम आहे तोंपर्यंत ह्या हीन जातीला पुढें सरकावयाला जागा नाहीं; तर मग हें व्हावें कसें ?  इतक्या सगळ्यांनीं एकदम ख्रिस्ती व्हावें !  यक्षिणीची कांडी फिरून इतक्या लोकसमुदायाला एकदम कोणी ख्रिस्ती करील म्हणावें तर संभवनीय नाहीं.  तथापि हिंदु लोकांची उदासीन विस्कळितता शाश्वत राहिली तर मात्र वरील चमत्कारही घडण्याचा संभव आहे.  असा प्रकार खरोखरीच घडून आला तर राष्ट्रीय दृष्ट्या काय प्रकार होईल पहा.  हल्लीं भारतीय साम्राज्यांत खालीलप्रमाणें लोकसंख्या आहे.

(इतर १५ + हीन ५॥ मिळून) २०॥ कोटी हिंदु लोक.
(इतर ५ + हीन १ मिळून) ६ कोटी मुसलमान.

३० लक्ष ख्रिस्ती.
१ कोटी जंगली.
१ कोटी बुद्ध, जैन, शीख वगैरे

हिंदुसमाजाची उदासीनता आणि ख्रिस्ती समाजाची चळवळ आतांप्रमाणेंच कायम राहिली तर पुढें खालीलप्रमाणे गणना होण्याचा संभव आहे.

१५ कोटी हिंदु, ६ कोटी मुसलमान, ७ कोटी ख्रिस्ती, १ कोटी बुद्ध, जैन, शीख.

म्हणजे राष्ट्रीय दृष्ट्या आतां जी हिंदुमुसलमानांची दुही आहे तिच्या ऐवजीं वरील प्रकार घडलाच तर हिंदु, मुसलमान व ख्रिस्ती यांचा तिरपगडा होणार !  १५ कोटी मवाळ हिंदु आणि जवळजवळ तितकेच कडवे मुसलमान आणि ख्रिस्ती मिळून या तिघांचें सूत कसें जमणार ईश्वर जाणे !

स्थापना  :  ता. १८ ऑक्टोबर १९०६ रोजीं कार्तिकी वर्षप्रतिपदेचा शुभ दिवस उगवला.  दोनच दिवसांपूर्वी मुंबई प्रार्थनासमाजाचे उदार उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदार सुखडवाला यांनीं अशा मंडळीची स्थापना होऊन काम सुरू व्हावें म्हणून १००० रु. दिले होते.  दिवाळी-पाडव्याच्या शुभ दिवशीं सकाळीं ९ वाजतां मुंबई येथील एल्फिन्स्टन रोडलगतच्या मुरारजी वालजी यांच्या बंगल्यांत भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची पहिली शाळा उघडण्याकरितां प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष न्या. चंदावरकर ह्यांनीं जमलेल्या मुलांना पहिला धड घालून दिला.  त्यांनीं आपल्या भाषणांत पुढील सूत्रवाक्य सांगितलें.  ''ह्या नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्‍न करण्यानें आम्ही स्वतःलाच वर आणीत आहोंत.  हें पवित्र कार्य करीत असतां ह्या लोकांचा आम्ही उद्धार करणार हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणांत न शिरो आणि आम्हां सर्वांना ह्या घोर अन्यायामुळें जी अधोगती मिळाली आहे ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे, असा साधा आणि सात्त्विक भाव आम्हांमध्यें निरंतर जागृत राहो.''

मंडळीची पहिली कार्यकारी समिति - अध्यक्ष - सर नारायण गणेश चंदावरकर.  उपाध्यक्ष - शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला.  जनरल सेक्रेटरी - विठ्ठल रामजी शिंदे.  खजिनदार - रा. रा. नारायण भास्कर पंडित.  सुपरिंटेंडेंट - डॉ. संतुजी रामजी लाड.  पहिले शिक्षक - लक्ष्मणराव मल्कू सत्तूर.

त्रैवार्षिक अहवाल  :  पहिल्या तीन वर्षांच्या शेवटीं अहवाल प्रसिद्ध करण्यांत आला.  त्यांत खालील वाढ झाल्याचें आढळतें.  मुंबईंतील मध्यवर्ती शाखेच्या संस्था -

१.  परळ येथील शाळा - मराठी ४ इयत्ता व इंग्रजी ४ इयत्ता, शिक्षक ७.  पटावरील मुलांची संख्या २७५.  पुस्तक बांधणें आणि शिवणकामाचा वर्ग.

२.  देवनार येथील प्राथमिक शाळा - २ शिक्षक, ४७ मुलें, मराठी ४ इ.

३.  मदनपुरा प्राथमिक शाळा - ५ शिक्षक, १५० विद्यार्थी.  मराठी ५ इ.

४.  कामाठीपुरा गुजराथी शाळा - ही भंगी लोकांसाठीं मुंबईतील पहिली शाळा होय.  शिक्षक मिळणें दुर्मिळ झालें, तरी देखील १ शिक्षक आणि ५१ विद्यार्थी.

५.  रविवारच्या शाळा - १ परळ येथें व दुसरा मदनपुरा येथें.  धर्मशिक्षणाच्या आणि नीतिशिक्षणाच्या शाळा.

६.  भजनसमाज - १ परळ येथें व दुसरा मदनपुरा येथें.  पोक्त मंडळी भजनासाठीं आणि उपदेशासाठीं जमत आणि उपासना चालवीत.

७.  व्याख्यानें - वेळोवेळीं उपयुक्त विषयांवर.

८.  परस्पर सहाय्यक चामड्यांचा कारखाना - शशीभृषण रथ व दुसर्‍या एका जर्मन तज्ज्ञाच्या नेतृत्वाखालीं नवीन तर्‍हेचे बूट करण्याचा कारखाना काढला.

९.  निराश्रित सेवासदन - दोन तरुण गृहस्थ आणि तीन स्त्रिया यांच्या सहाय्यानें वरील सदन उघडण्यांत आलें.  या तीन स्त्रीया गरीब लोकांच्या घरीं समाचाराला जात, आजार्‍यांची शुश्रूषा करीत, निराश्रितांना सदनांत आणीत व शिवण्याचा वर्ग आणि बायकांचा वर्ग चालवीत.  तरुण गृहस्थ सर्व संस्थांची देखरेख करीत.  परळ शाळेंतील सुमारें १२ विद्यार्थ्यांच्या जेवण्याखाण्याची सोय सदनांतील वसतिगृहांत केली जाई.

१०.   Purity Servant या नांवाचें इंग्रजी मासिक दर महिन्याच्या ता. १५ ला प्रसिद्ध होत असे.  त्यांत मद्यपाननिषेध व इतर सामाजिक विषयांवर लेख येत.  आणि मिशनची सर्व बातमी प्रसिद्ध होई.  ह्याचे संपादक श्री. वा. स. सोहोनी हे होते.  ह्याशिवाय मुंबईबाहेर खालील शाखा होत्या.

१.  पुणें - (१) दिवसाची शाळा, (२) रात्रीची शाळा, (३) भजनसमाज, (४) चर्चामंडळ.  शाळांतील पटावरील संख्या, अनुक्रमें १४९,२५,३३.

२.  मनमाड - १ रात्रीची शाळा, ४५ विद्यार्थी.

३.  इगतपुरी - १ दिवसाची शाळा, ६८ मुलें.  ही शाळा दोन महार तरुणांनीं चालविली होती.  शिवाय रविवारची धर्मशिक्षणाची शाळा व धर्मसमाज चालू होते.

४.  इंदूर - १ रात्रीची शाळा, २० विद्यार्थी.

५.  अकोला - २ रात्रीच्या शाळा, ७२ विद्यार्थी, १ भजनसमाज, १ विद्यार्थी वसतिगृह

६.  अमरावती - २ रात्रीच्या शाळा, ५३ विद्यार्थी.

७.  दापोली - १ दिवसाची शाळा, ३७ विद्यार्थी. ह्याशिवाय मुलांना विद्यार्थीवेतनें मिळत.

८.  मंगळूर - १ दिवसाची शाळा, ४९ विद्यार्थी, हातमागाचा विणण्याचा कारखाना.  सर्व मुलांना दुपारचें जेवण मिळे.  ७ मुलें मोफत वसतिगृहांत राहात.

९.  मद्रास - १ पारिया जातीच्या अस्पृश्यांसाठीं दिवसाची शाळा, २३विद्यार्थी, १ चांभारांसाठीं दिवसाची शाळा, विद्यार्थी २९.

१०.  महाबळेश्वर - मे १९०९ मध्यें गव्हर्नरच्या बंगल्यावर लेडी म्यूर मॅकेंझी यांच्या आश्रयाखालीं मिशनच्या हितचिंतकांची सभा भरली.  सुपरिंटेंडेंट मेजर जेम्सन हे अध्यक्ष होते.  पूर्वी जमलेला ९०० रु. चा फंड मिशनला देण्यांत आला आणि ही शाखा उघडली.  दोरखंड तयार करणें, वेताचें विणकाम करणें वगैरे कामें होत.

११.  नाशिक - १९०९ सप्टेंबरमध्यें जनरल सेक्रेटरी ह्या जिल्ह्यांत दौर्‍यावर गेले असतांना नाशिक येथें जाहीर सभा होऊन जिल्ह्याची कमिटी नेमण्यांत आली.  जिल्ह्याचे कलेक्टर मि. जॅक्सन ह्यांस अध्यक्ष नेमण्यांत आलें.  येणेंप्रमाणें तिसरे वर्षाच्या अखेरीस ह्या मिशनच्या १२ शाखा, १६ दिवसाच्या प्राथमिक शाळा, १०१८ विद्यार्थी, सहा रविवारच्या शाळा, ५ भजनसमाज, ४ उद्योगशाळा, ७ मिशनरी कामाला वाहून घेतलेले कार्यवाह आणि एक मासिक पत्र इतकी वाढ झाली.

हिमाचल-निवास

कर्सिऑंग  :   दार्जिलिंगहून रा. ब. शरच्चंद्र दास मला घेण्यास स्टेशनवर आले होते.  स्टेशनजवळच ब्राह्ममंदिरांत माझी उतरण्याची सोय केली होती.  बाबू हेमचंद्र सरकार यांची पत्‍नी लावण्यप्रेमी बोस (माहेरचें नांव), ही (प्रसिद्ध शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांची बहीण) हिचें हें घर होतें.  हें तिच्या मागें सुमारें रु. १४००० किंमतीचें घर बाबू हेमचंद्रांनीं कर्सिऑंग येथील ब्राह्म समाजास दिलें आहे.  येथून खालीं खोल दरीचा देखावा फारच सुंदर दिसतो.  टीस्टा नदीचा आणि आमच्या पायांखालील मेघांचा विलास चांगला दिसतो.  तिसरे प्रहरीं बाबू हेमचंद्र व त्यांची मानसकन्या शकुंतला हीं आलीं.  ता. १५ ऑक्टोबरला इंग्लंडचे पाहुणे डॉ. ड्रमंड दार्जिलिंगहून आले.  त्यांच्या व्याख्यानास २०।२५ माणसेंच हजर होतीं.  घरें लांब व वस्ती उपरी म्हणून ही अवस्था !

घूम  :   माझी गाडी सायंकाळीं ५ वाजतां घूम स्टेशनवर आली.  हें जगांतील अतिशय उंचीवरचें म्हणजे ७४०७ फूट उंचीवरचें आगगाडीचें स्टेशन होय धुक्यानें दिशा धुंद झाल्या होत्या.  कडाक्याची थंडी पडली होती.  ५॥ वाजतां दार्जिलिंगला पोचलों.  देवदाराच्या झिपर्‍या झाडांनीं भरलेला तो प्रशांत गंभीर देखावा मी कधीं विसरणार नाहीं !

दार्जिलिंग ब्राह्म समाज  :   ता. १६ ऑक्टोबर.  काल संध्याकाळीं रा. सा. शरच्चंद्र दास ह्यांचे घरीं पाहुणा झालों.  यजमानीण व मुलेंमुली फार अगत्यशील होती.  रायसाहेब बाहेरगांवीं गेले होते.  आज सकाळीं ब्राह्म समाजांत पहिली उपासना मीं चालवली.  

दार्जिलिंग हा गांव बंगाली श्रीमंत आळशांचा व खुशालचंदांचा आहे.  गव्हर्नराचें व इतर श्रीमंतांचे हें उन्हाळ्यांतील हवा खाण्याचें स्थळ आहे.  अर्थात् श्रीमंत ब्राह्मो समाजिस्ट येथें ऐटदार घरें करून राहतात.  ज्ञान, भक्ति व कर्म हीं तीन्हीं ब्राह्म समाजांत पाणी भरीत आहेत, हें सर्व खरें; पण मोक्षाची गोष्ट निराळी.  मोक्षधर्म पाहावयाचा असल्यास तो कोठें तरी बाहेरच पाहावयास पाहिजे.  निदान तो दार्जिलिंगमध्यें तरी दुर्मिळ !  पाश्चात्य आसुरी संस्कृतीनें येथें हिमालय विटाळलेला आहे.  केरळकन्येनें मच्छिंद्रनाथांस योगभ्रष्ट केलें, मेनकेनें विश्वामित्रांस तपोभ्रष्ट केलें तसें येथें पाश्चात्य सुधारणेनें हिमालयास भ्रष्ट केल्याचा भास होत आहे.    

ता. १८ स तिसरे प्रहरीं टाउन हॉलमध्यें सामाजिक संमेलन झालें.  सुमारें १०० निवडक स्त्रीपुरुष जमले होते.  बनारसहून आलेले बाबू दुर्गाप्रसाद, ऑनररी मॅजिस्ट्रेट ह्यांची व ह्यांच्या पत्‍नीची ओळख झाली.  ह्या दंपतीनें मला बनारस शहरीं येण्याचा फार आग्रह केला.  ता. १९ ला मी, हेमचंद्र व त्यांची कन्या शकुंतला पुन्हां कर्सिऑंगला आलों.  येथें सुमारें एक आठवडा विश्रांति निरीक्षण व चिंतन यांत घालवला.    

कांचनगंगा  :  २१ रविवारीं भल्या पहाटे उठून चिमनी नांवाच्या गांवाजवळील घांटशिळेवरून कांचनगंगा सूर्योदयाचे वेळीं पाहण्याचा माझा निश्चय होता.  पण रात्रभर पाऊस आल्यानें निराशा झाली.  दार्जिलिंगमध्येंही कांचनगंगेनें ढगाच्या मागें लपून माझी बरीच निराशा केली होती.  माझे पंजाबी मित्र डॉ. बालमुकुंद ह्यांना बरोबर घेऊन टेकडीखालीं सुमारें १००० फूट खालीं उतरून बाबू सुशांत हलधर यांचे शेत व वाडी पाहण्यास गेलों.  वाटेनें उतरणीवरचे चहाचे मळे अति सुंदर दिसले.  बाजारचा दिवस असल्यामुळें नेपाळी व भूतानी स्त्रिया पाठीवर बांबूच्या टोपल्यांत आपलीं मुलें घेऊन येतांना दिसल्या.  त्यांचा पोषाक दुर्गापूजेच्या (नवरात्र) सणानिमित्त नवा होता व अंगावर दागिनेही होते.  बाबूंनीं आपल्या देशांत फिरून मलबेरी, आंबे, जांभूळ, पीच, पेरू, वांगीं, हीं झाडें व कोंबडीं, बदकें वगैरे प्राणी दाखवले.

ता. २२ रोजीं सकाळीं ३॥ वाजतां उठून मी व डॉ. बालमुकुंद चिमनी शिखराकडे सूर्योदयाचे वेळीं कांचनगंगेचें दर्शन घेण्यासाठीं निघालों.  सूर्योदयाचे वेळचीं लाल किरणें कांचनगंगेच्या शुभ्र बर्फावर पडल्यानें त्या प्रकाशाचें परिवर्तन होऊन कांचेच्या झुंबरांतून पाहिल्याप्रमाणें लाल, निळा, हिरवा, वगैरे रंगांचीं बहार मोठी नयनमनोहर दिसते.  हा देखावा क्वचितच पाहण्यास मिळतो म्हणून ह्यासाठीं पुष्कळ प्रयत्‍न करावा लागतो.  पाहणारा आणि कांचनगंगा ह्यांच्यामध्यें ढग आल्यानें पुष्कळ वेळां निराशा होते. हें अपूर्व दर्शन घेण्यासाठीं उत्तम ठिकाण म्हणजे घूम ह्या उंच स्टेशन जवळील उंच शिखरावरचें.  एकदां एक फ्रेंच रसिक ह्या शिखरावर गेला आणि त्याला एक अपूर्व लाभ घडला.  त्याचा कॅमेरा होता; पण ह्या दर्शनामध्यें तो इतका तल्लीन होऊन गेला कीं, त्यानें हातांतील कॅमेरा खालीं फेकून दिला.  कारण, अशा सुंदर दृश्याचा फोटो घेण्यांत वेळ दवडण्यापेक्षां त्याकडे पाहणेंच त्याला अधिक श्रेयस्कर वाटलें.  डांवटेकडीचे शिखराजवळ चिमनी हें खेडें सुमारें ६५० फूट उंचीवर आहे.  हें खेडें कर्सिऑंगपासून सुमारें पांच मैलांवर आहे.  येथेंच महानदी उगम पावून खालील सुंदर दरींतून वाहात जाते.  बरोबर सकाळीं सव्वासहा वाजतां टेकडीवर पोचलों.  सूर्योदय होतांना आम्हीं नुकताच पाहिला.  पण कांचनगंगेच्या बाजूनें पुष्कळ ढग दिसले.  आम्हीं प्रथम प्रार्थना केली.  नंतर उपाहार केला.  थकवा मुळींच वाटला नाहीं.  गुलाबी थंडी होती.  टेकडीच्या शिखरावर २ इंच जाडीचा मऊ गवताचा रंगीबेरंगी गालिचा पसरलेला होता.  दंवानें तो चिंब भिजला होता.  मी प्रार्थना करीत असतां दोन तीन जळवा पायांवर चढून तेथेंच रक्तशोषण करीत होत्या.

केशवचंद्र सेनांची कन्या  :   ब्रह्मानंद केशवचंद्र सेन ह्यांची द्वितीय कन्या सुनीतादेवी कर्सिऑंग येथें राहात होती.  हिचा पति कुमार गजेंद्रनारायण हा कुचबिहारच्या महाराजा (जो केशवचंद्र सेनांचा जांवई) चा भाऊ होता.  सुमारें २३ वर्षांपूर्वी मी कुचबिहारला गेलों असतां माझी त्यांची चांगली ओळख झाली होती.  ही बाई व तिची विधवा मुलगी मला आज १० वाजतां ब्राह्ममंदिरांत भेटावयास आल्या.  बडोद्याच्या इंदिराराजा ह्यांनीं त्यांना छळून दोघींना कुचबिहारांतून बाहेर घातलें व ब्राह्म समाजाचीही धूळधाण उडवली अशी त्यांनीं माझ्यापुढें तक्रार केली.  मायलेकींचा गंभीर चेहरा व शुभ्र पोषाख पाहून मला धन्यता वाटली.  कन्येचा नवरा कॅप्टन मुकर्जी हा कुतुल अमायराच्या वेढ्यांत मारला गेला होता.  तीही सुशिक्षित व बोलून चालून चांगली दिसली.  मी मिशनरी म्हणून त्यांनीं जातांना फुलें देऊन माझा सत्कार केला.  ता. २५ गुरुवारीं दोन प्रहरीं कर्सिऑंग सोडून, सिलिगुरी व पार्वतीपूर वगैरे करून ता. २६ सकाळीं बरौनी जंक्शनवर आलों.  सोनापुराहून गंगा उतरून बांकीपुरास जाण्यास रात्र झाली म्हणून मोकामी घाटास पोचलों.  दोन प्रहरीं मोकामीपासून पाटणा जंक्शन (बांकीपूर) कडे गेलों.    

पाटणा  :   ई. आय. रेल्वेवरून गंगातटाचा देखावा फारच नयनमनोहर दिसला.  गंगेचें महत्त्व भारतदेशास किती आहे हें तिच्या सुजल सुफल तटाकावरून फिरल्याशिवाय दिसत नाहीं.  ज्वारी, बाजरीची लागवड येथें होऊं लागलेली पाहनू आश्चर्य वाटलें.  ज्वारीचीं धाटें १५।१६ फूट उंच, तूर ७।८ फूट उंच पाहिली.  बिहारांत तांदळाची व गव्हाची लागवड मिळूनच आहे.  मिरची, तंबाखू, एरंड त्याचप्रमाणें शिसवी, आंबा, वड वगैरे झाडांवरून बंगालचा देखावा मागें पडला व बिहारचें साम्राज्य सुरू झाल्याचें दिसलें.  सायंकाळीं ६ वाजतां बांकीपूर येथील राममोहन रायांच्या सेमिनरीमध्यें (शाळेंत) उतरलों.

बुद्ध गया  :   ता. २९ व ३० हे दोन दिवस गया येथें काढून ३१ ऑक्टोबरला सकाळीं बुद्ध गयेला गेलों.  गयेच्या दक्षिणेस ७ मैलांवर प्रयांग आहे.  उद्यां येथें गव्हर्नर येणार म्हणून कमानी-मंडपाची तयारी चालली होती.  मागें २० वर्षांपूर्वी मीं पाहिला होता त्यापेखां बराच भाग उकरून पुष्कळच लहानमोठे स्तूप मोकळे केलेले दिसत आहेत.  मुख्य मंदिर भव्य, भरभक्कम व पूर्वाभिमुखी आहे.  पश्चिम भागीं एक सुंदर धर्मशाळेची प्राचीन दुमजली इमारत आहे.  ती भिक्षु अनागरिक धर्मपालाच्या परिश्रमानें बांधली गेली आहे.  तिबेट-चीनमधील बरेच भिक्षु वरच्या मजल्यांत असतात.    

विष्णुपद  :   परत येतांना विष्णुपदमंदिर फल्गु नदीचे कांठावर, उंच टेकडीवर काळ्या दगडाचें आहे, तें पाहिलें.  फल्गु नदी बुद्ध गयेहून येते.  तिला समांतरच रस्ता आहे.  विष्णुमंदिर इतर देवळांप्रमाणेंच बेशिस्त व घाणेरडें आहे.  देऊळ पुष्कळसे पैसे खर्च करून बांधलें आहे तरी तें बेढब आहे.  ओरिसांतील भुवनेश्वराच्या देवळाप्रमाणें येथें कलाकुसरी मुळींच नाहीं.  पिंडदान व श्राद्धविधीचा गोंधळ व भिकार्‍यांची गर्दी बरीच दिसली.

काशी  :  १ नोव्हेंबरला सकाळीं गयेहून काशीकडे निघालों.  १० वाजतां बनारस येथें बाबू दुर्गाप्रसाद ऑनररी मॅजिस्ट्रेट यांचेकडे उतरलों.  ह्यांची ओळख दार्जिलिंगला झाली होती.  त्यांनीं मोठ्या प्रेमळपणें स्वागत केलें.

बनारस हिंदु युनिव्हर्सिटी  :   ता. २ नाव्हेंबरला हिंदु युनिव्हर्सिटीची विस्तीर्ण जागा पाहिली.  २ मैल लांब व १ मैल रुंद असें क्षेत्रफळ आहे.  गंगा नदीच्या कांठीं ही बरीच मौल्यवान् जागा मिळाली आहे.  सुमारें १॥ हजार विद्यार्थ्यांपैकीं ७५० वर विद्यार्थी येथें बोर्डिंगांत राहतात.  सर्व हिंदुस्थानांतून व दक्षिण आफ्रिकेंतून विद्यार्थी व प्रोफेसर येतात.  तरी पण पौरस्त्य लक्षणें येथें दिसत नसून सर्व आत्मा आधुनिक पाश्चात्य थाटावर आहे हें पाहून निराशा होते.  इमारतीचा थाट हिंदु-जैन तर्‍हेचा आहे.  विविधता किंवा कल्पकता दिसत नाहीं.      

सायंकाळीं ६ वाजतां दुर्गाप्रसादांचे घरीं ब्रह्मोपासना झाली.  थोडेच लोक हजर होते.  ता.३ नोव्हेंबरला एक स्पेशल बोट दशाश्वमेध घाटावर करून दक्षिणेकडे हरिश्चंद्र घाट, अहिल्याबाईची घाट वगैरे प्रेक्षणीय स्थळें पाहिलीं.  स्मशानाच्या घाटास हरिश्चंद्र घाट हें नांव आहे.  पहारा करण्यास हरिश्चंद्र बसत होता ती देवडी अद्याप दाखवतात.  जेथे ज्या डोंबाची नोकरी हरिश्चंद्र करीत होता त्याची मोठी हवेली व घाट इतर राजेरजवाड्यांच्या हवेलीसारखीच आहे, हें पाहून आश्चर्य वाटते.  बोट सोडल्यावर विश्वेश्वराचे देवळांत गेलों.  रसते फारच अरुंद.  ४।५ फुटांचे.  दोन्ही बाजूंनीं तीन चार मजली उंच हवेल्या.  त्यांत माणसांची व गुरांची खेंचाखेंची !  त्यांतच बनारशी रेशमी वस्त्रांचीं व पितळी सामानाचीं दुकानें अशी गचडी लागून गेली होती.  मोठमोठ्या अन्नछत्रांचे दारांत शेंकाडों अतिथि, अभ्यागत, बैरागी, अनाथ, विधवा, विद्यार्थी जेवणाची वाट पहात बसलेले दिसले.  प्रत्येक छत्रांत ४।५ शें लोकांस १०॥ वाजतां अन्न मिळतें.  महिन्यांतून तीन वेळांपेक्षां हें दान मिळत नाहीं.  डाळ भात, भाज्या, दूध, दहीं भरपूर मिळतें.  रस्त्यांत भिक्षेकरी, यात्रेकरी व गिन्हाईक यांची खेंचाखेंच होते.  गंगास्नान करून, विश्वेश्वराचें दर्शन घेऊन परत चाललेली गोषांतील सुंदर स्त्री अथवा वृद्ध ब्राह्मण त्यांना धक्का देऊन जाणारी एखादी भंगीण, पूजेचें सामान घेऊन कोणी जातो तर त्याचे समोर एक बंगाली बाई एक भला मोठा मासा भाजीसाठीं घेऊन येते.  मधूनच एखादा महारोगी शिरतो.  पंजाबी, गुजराथी, तेलंगी, बंगाली, ह्यांचा रंगीबेरंगी देखावा व त्यांच्या भाषेचा हार्मोनियम नेत्रांना व कर्णांना सुखावह वाटतात.

ता.५ ला मी अलाहाबादला गेलों.  तेथें ब्राह्म समाज नसल्यानें कांहीं काम झालें नाहीं.  ता. ७ रोजीं मुंबईला आलों.  आणि ता. ८ ला पुण्यास पोचलों.  अशा प्रकारें हा तीन महिन्यांचा दगदगीचा प्रवास संपला.  ता. १४ नोव्हेंबरला भाऊबीज होती.  भगिनी जनाबईचा आज ५१ वा वाढदिवस होता.  ह्यासाठीं मी माझ्या प्रवासाचा प्रांत सोडून घाईघाईनें पुण्यास आलों होतों.  हा वाढदिवस घरांतच उपासना चालवून शांतपणें साजरा केला.

एक नमुनेदार विवाह  :    ता. २३ जून (ज्येष्ठ व॥१) १९२९ रोजीं माझे ज्येष्ठ चि. प्रतापराव ह्यांचे लग्न झालें. वधू बडोद्याच्या गायकवाड घराण्यांतील पदच्युत राजे मल्हारराव ह्यांचें पुत्र गणपतराव यांची कन्या कुमारी अनसूयाबाई (सासरचें नांव सौ. लक्ष्मीबाई) ही होती. ब्राह्म विवाहपद्धतीनें सर्व विधि श्रीशिवाजी हायस्कूलचे प्रिन्सिपॉल रा. बाबूराव जगताप यांनीं चालवला.  सत्यशोधक समाजाचे पुरोहित डुंबरे ह्या बंधुद्वयानें श्री. बाबुराव जगताप यांची साथ केली.  वडेकर लायब्ररी हॉलमध्यें ९ वाजतां वधूचें पुण्याहवाचन झालें.  मुख्य इमारतींतील दुसर्‍या मजल्यावरील प्रशस्त ड्राईंग हॉलमध्यें मध्यभागीं शुभ्र जाईच्या फुलांचा सुंदर विवाहकुंभ तयार केला होता.  अंतरपाटाचे पलीकडे वधू हातीं माला धरून उभी राहिल्याबरोबर सर्व प्रचंड प्रेक्षक समुदाय अक्षता घेऊन उभा राहिला.  मंगलाष्टकांची अहमहमिका सुरू झाली.  पाणिग्रहणानंतर सप्‍तपदी झाली.  दोनप्रहरीं १२ पासून तिसरे प्रहरीं ४ पर्यंत भोजनाचा रमणा झाला.  त्यांत स्पृश्यास्पृश्यतेचें कोणाला स्मरणही नव्हतें.  हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती, स्पृश्य अस्पृश्य व इतर अशाच मानीव भेदांचा अभेद झाला होता.  ह्या समारंभाचा समाजावर फार चांगला परिणाम झाला.  पुढें कित्येक विवाह ह्याच नमुन्यावर घडून आले.  ह्या समारंभांत माझे मित्र श्री. बाबूराव जेधे ह्यांनीं फार परिश्रम घेऊन आपलेपणानें मदत केली.

  1. हिंदुस्थान सरकारास सूचना
  2. स्थानिक समाज
  3. स्थानिक कार्य
  4. सुट्या आठवणी
  • 31
  • 32
  • 33
  • 34
  • 35
  • 36
  • 37
  • 38
  • 39
  • 40
Page 36 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी