ब्राह्मसमाज व आर्यसमाज (ह्यातील हल्लीचे साम्य, भेद व पुढे ऐक्यार्थ यत्न)

सन १८३० साली राजा राममोहन रायांनी बंगाल्यात ब्राह्मसमाज काढिला. स्वामी द्यानंदजींनी येथे १८७५ चे सुमारास आर्यसमाज स्थापला. ह्या दोन महापुरूषांच्या सामर्थ्याने व त्यांच्या अनुयायांच्या उद्योगामुळे हिंदुस्थानात शुद्ध, स्वतंत्र आणि उदार धर्माच्या प्रसारार्थ गेल्या शतकात प्रचंड यत्न झाला व तो अद्यापि वाढतच आहे. मुंबई इलाख्यातल्या काही ब्राह्ममताच्या समाजास जरी प्रार्थनासमाज हे नाव आहे, व क्वचित उपासनासमाज असेही नाव आढळते, तथापि वस्तुत: सर्व ब्राह्मांची स्वीकृत मते व इष्ट हेतू एकच असल्याने संज्ञेच्या सोयीसाठी सर्वांस ब्राह्मसमाज ह्या एकाच साधारण नावाने ओळखल्यास काही बाधा नाही. तसेच, पंजाबात जरी काही अंतस्थ कारणामुळे आर्यसमाजातही दुही आणि तट पडले आहेत, तरी सर्व ‘आर्यांचा बहाणा एकच असल्याने आर्यसमाज हे साधारण नाव त्यांनाही सारखेच लागू पडते.’

आता ह्या दोन मोठ्या सुधारकचमूंत-

प्रधान गोष्टींत साम्य

काय आहे ते थोडक्यात पाहू. ईश्वर आहे इतकेच नव्हे तर, ईश्वर म्हणजे केवळ एक अंध आणि अहेतुक शक्ती नसून, ती जिवंत, जागृत, सर्वत्र व्यापारमय वस्तू आहे. विश्वविकासात त्याचा मंगल हेतू आहे, व अवीट प्रमाणावर त्यांच्या योजनेला यशच येत चालले आहे. थोडक्यात सांगावयाचे तर तो पुरूष आहे- पुरूषोत्तम म्हणण्याचे कारण, आमच्यासारख्या अपूर्ण पुरूषांहून त्याची भिन्नता दाखविण्यासाठी. अर्थात तो एकच अद्वितीय आहे. केवळ चिन्मय असल्याने त्यास अवयवाची जरूरी नाही.

आत्मा- आम्हा जीवांमध्ये अहकारमूलक जो आत्मा आहे तोही वस्तू आहे, केवळ भास नव्हे. ईश्वराचे ठायीच त्याची वसती आणि वाढ आहे. त्याला नाश नसून तो सदैव प्रगमनशील आहे.

उपासना- आम्ही जी ईश्वराची उपासना करावयाची ती बाह्मोपचारिक नसावी, किंवा तिच्यात विधिसंस्काराचे वृथा अवडंबर नसावे. म्हणजे एकपक्षी मुळी ईश्वरच निरवयव, निराकार असल्याने त्याची कोणत्याही सृष्ट पदार्थाने मूर्ती घडविता येत नाही व दुस-या पक्षी त्याचे सूक्ष्म स्वरूप व त्याचा आपल्याशी सर्व बाजूने असलेला निकट संबंध ह्यांचे ग्रहण आपल्या मनानेच करून घेण्याचा कमीअधिक मानाने सर्वच माणसांचा अधिकार आहे, म्हणून त्याच्या उपासनेस कसल्याही जड साधनांची गरज नाही.

ह्याप्रमाणे एक ईश्वर, सतत विकास पावणारा आत्मा, आध्यात्मिक उपासना, इत्यादी धर्माच्या पारमार्थिक तत्त्वसंबंधी ब्राह्म आणि आर्य ह्या दोघांचे साम्यच नव्हे, तर ऐक्य आहे. इतकेच नव्हे तर धर्म म्हणजे वरील शुद्ध विचार इतके ठरवून स्वस्थ न बसता त्यांच्या पायावरच आपले ऐहिक आचार करण्याचा दोघांचाही आग्रहपूर्वक यत्न आहे. म्हणून सामाजिक बाबतीत सर्व माणसांचे बंधुत्वाचे नात आहे, त्यांचे हक्क सारखे आहेत, गुण-कर्मादी आगंतुक गोष्टीशिवाय वस्तुत: त्यांच्यांत भेद नाहीत, रूढीमुळे जे पाळण्यात येतात ते पाळू नयेत, केवळ जड हेतूने सामाजिक सुधारक ज्या काही सुधारणा आज घडवू पाहतात, त्या सर्व धर्माच्या उच्च पायावरून घडून याव्यात, अशी दोघांचीही सारखी खटपट आहे.

राजकीय बाबतीतही, राजा म्हणजे केवळ देव नव्हे, तो माणसांचाच प्रतिनिधी आहे. माणसांमध्ये जी धर्मबुद्धी आहे तिच्याच आश्रयाने सर्व राजकारण आटपावे, असे दोघांसही वाटते.

ह्याप्रमाणे तात्त्विक व व्यावहारिक धर्माचा जो प्रधान भाग त्याविषयी कोठे फारसा भेद येत नाही. भेद येतो तो येथे की, ज्या साधनांनी हे धर्मज्ञान मनुष्यास होते, अशी समजूत असते, त्या साधनांविषयी आग्रह धरण्यात. ह्या गौण गोष्टीस वेळोवेळी फाजिल प्राधान्य दिल्यामुळे धर्माच्या नकाशात किती चित्रविचित्र रंग भरले आहेत व किती हिडिस हेंदर साचली आहे, हे सांगण्यास येथे स्थळ नाही.

गौण भाग

वर जो साधनाविषयी आग्रह सांगितला, तो चार प्रकारचा. एक विभूतीप्रामाण्य, दुसरा ग्रंथप्रामाण्य, तिसरा मठ (Church) प्रामाण्य व चौथा रूढीप्रामाण्य. ज्या हिंदुधर्मातून ब्राह्म आणि आर्य हे पुढे आले त्यांची स्थापना ख्रिस्त-बुद्धासारख्या एकाच विभूतीकडून नियमित काली झाली नसल्यामुळे मूळ जुन्या हिंदुधर्मातच इतर धर्माप्रमाणे विभूतीविषयी हटवाद नाही. अवतारवादाविषयी जो आग्रह आहे तोही ब्राह्मांप्रमाणेच आर्यांनी सोडून दिला आहे. त्याचप्रमाणे तिसरा आणि चौथा आग्रह (अगर आचार्यपीठ) जो मठ आणि रूढीसंबंधाचा तोही आर्यांनी बिनबोभाट बाजूस ठेविला आहे. बाकी एक जो आग्रह उरला आहे आणि जो ब्राह्य आणि आर्य ह्यांच्यामधील अल्प आणि दिवसेदिवस कमी-कमी होत जाणा-या भेदाला कारण झाला आहे, तो ग्रंथप्रामाण्यासंबंधी होय. ह्या उरलेल्या आग्रहाची जागाही किती आकुंचित झाली आहे पहा. जुन्या मताप्रमाणे श्रुती, स्मृती, पुराणे आणि तंत्रे ही सारी पुस्तके हिंदू उपासनेला व व्यवहाराला प्रमाण मानली आहेत. क्वचित जरी काही हिंदू धर्माभिमान्यांनी ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ अशी हिंदू धर्माची व्याख्या केली आणि आर्यसमाजाला हिंदूत गणले, तरी तेवढ्यावरूनच हिंदुसमाजाला वेदच मान्य आहेत असे होत नाही. उलट आर्यांनी मात्र चार वेदांशिवाय बाकी सर्व पुस्तकांचा अधिकार बेलाशक झुगारून दिला आहे. बाकी उरले ते चार वेदांचे प्रामाण्य.

येथवर जे ब्राह्म आणि आर्य संगतीने चालले ते आता एकमेकांकडे टवकारून पाहून लागतात. जणू काय ह्या गोष्टीचा उलगडा झाल्याशिवाय पुढे त्यांना पाऊल टाकणे शक्यच नाही. जणू काय आतापर्यंत त्यांची संगती झाली ती ह्या गोष्टीच्या अज्ञानामुळेच. जणू काय बाह्य जगाचा जो विरोध आहे तो दोघांसही पुरेसा नाही. असो.

उगाच काही तर्कट लढवून दोघांचे नसते साम्य दाखवून ह्या खोट्या साम्याचा गळेबंद दोघांच्या गळ्यांत नकळत अडकविण्याचा माझा उद्देश नाही. तर जो भेद आहे तो कायमचा व अखेरचा आहे काय? आम्ही जे भेदाचे मोठमोठे डोंगर ओलांडून आलो, ते आता ह्या भेदाच्या सापासारख्या दिसणा-या दोरीला भिऊन निरनिराळ्या दिशेने एकमेकांपासून दूर पळावे काय? ह्याचा विचार दोघांनी करावा एवढाच आजचा हेतू आहे.

वेद शब्दाचा अर्थ करण्यात आमचे आर्य बंधू जे अलौकिक विचारस्वातंत्र्य दाखवितात, जे मनाचे औदार्य आणि प्रचाराची प्रगती दाखवितात, इतकेच नव्हे, तर आधुनिक सुधारणा आणि आधुनिक परिस्थिती ह्यांचा त्यांना कोठेच अडथळा न येता पुन: वेदाच्या प्रामाण्याविषयी त्यांचा जो आग्रह आहे तो पाहून वेदप्रामाण्यासंबंधाने त्यांची लौकिकापेक्षा काही तरी निराळी समजूत असावी असे वाटते. म्हणजे वेदाचे जे अर्थप्रामाण्य मानतात ते बाह्य नव्हे तर अंतरप्रामाण्य असले पाहिजे, आर्यांशी पुष्कळ वेळ बोलल्यावर शेवटी त्याची मजल येथवर जाते की वेद म्हणजे ही बाहेरली पुस्तके नव्हत तर सनातन ईश्वरीज्ञान होय. ह्या ठिकाणी आता

ब्राह्मांची प्रामाण्यबुद्धी

कशी आहे ती थोडक्यात सांगणे भाग आहे. ब्राह्मास त्याच्या बाहेर प्रमाणभूत वस्तू अशी काय ती एक ईश्वरच. त्याच्या प्रामाण्याचा बोध जो ब्राह्मास होतो तो बाहेरून नव्हे, तर त्याच्या अंतर्यामातून आणि विवेकबुद्धीतून. ह्यावरून ब्राह्मांना प्रमाणभूत असे काहीच नाही. ते स्वैर आहेत असे होत नाही. उलट ब्राह्मांचे असे म्हणणे आहे की, ज्यांना हे अंतरप्रामाण्य मान्य नाही किंवा पुरेसे ते ज्यास भासत नाही, तेच बाहेरच्या अनेकविध प्रामाण्यांच्या भानगडीत पडतात. आता जर कोणी ब्राह्मांस विचारतील की, अंतरप्रामाण्यात सर्वत्र सारखेपणा व निश्चितपमा कोठे आढळतो? तर त्यांचे सांगणे असे पडते की, बाह्य पुस्तकात व आचारात तर आतल्याहून अधिक धरसोड, उडवाउडव आणि अफरातफर आढळते आणि ती निवारण्यास पुन: आपल्या शुद्ध व सात्त्विक बुद्धीचाच उपयोग करावा लागतो, असो. ब्राह्मांनाही अंतरप्रामाण्य कबूल आहे हे निर्विवाद आहे. इतकेच नव्हे, तर ह्या दृष्टीने त्यांना हिंदूंचे वेदच काय पण निरनिराळ्या राष्ट्रांत निरनिराळ्या काळी ईश्वराकडून मानवी बुद्धीला ज्या ज्या प्रेरणा मिळाल्या आहेत त्या सर्व सारख्याच पूज्य व स्वीकरणीय आहेत. ईश्वरी शब्दांस रूकार देण्याचा मनुष्यास जो अनुपम अधिकार आहे, त्याच्या बळावर त्यानेच निरनिराळ्या काळी जे उदगार काढले आहेत त्यांना ईश्वरी म्हटले काय, मानवी म्हटले काय त्यांची योग्यता जास्त होत नाही की कमी होत नाही! ईश्वरी सत्य जे आहे ते सनातनच आहे पण त्याचा वेळोवेळी जो मानवी शब्दांनी स्फोट होतो तो देशकालांनी परिच्छिन्न असतो म्हणून शब्दांविषयी आग्रह न धरता सत्याविषयी आदर धरणे हेच प्रामाम्यबुद्धीचे खरे लक्षण आहे.

समेट

वर जो आपण धर्माचा प्रधान भाग पाहिला आणि त्यात ब्राह्मांचे व आर्यांचे ऐक्य आहे हे दाखविले त्या भागाचे आचरण करण्यात आपली शक्ती खर्च करावी की तो भाग अमुक ग्रंथात आहे आणि अमुक ग्रंथात नाही ह्याचा निर्णय करण्यात खर्चावी? केवळ सत्य आणि केवळ असत्य असा कोणताच ग्रंथ नाही, आणि मध्यंतरी कोणत्या ग्रंथात किती सत्य आहे हे पाहण्याचे काम, ज्यांनी आपले सर्व आयुष्य निरपेक्षपणे विद्याव्यासंगात वाहिले आहे अशा पंडितांचेच आहे. ते काम धर्मप्रचारकांनी आपल्याकडे घेतले. इतकेच नव्हे, तर अमुक एकच श्रुतिग्रंथ सर्वांशी प्रमाण आहे असा आग्रह धरला तर त्याच्यावर तीन प्रकारची जबाबदारी येते. पहिली ही की, ज्या ग्रंथाचे प्रामाण्य त्यास स्थापावयाचे आहे त्यातील सर्व विधाने हल्ली विकास पावलेल्या बुद्धीस पटतात हे दाखविण्याची. हिच्यामुळे त्या पुस्तकातील सर्व कथाभागाचा आणि त्या वेळच्या समजुतीचा आताच्या चालीरीतीला लागू पडेल असा अर्थ करण्यात येतो. दुसरी जबाबदारी ही की, आता अवगत झालेले सर्व सत्य त्यात आहे हे दाखविण्याची. ह्यामुळे मांसभक्षण व मद्यपान यांचाही निषेध वेदात आहे असे दाखविण्यात येते. तिसरी अत्यंत जोखमीची जबाबदारी ही की ह्याशिवाय इतर श्रुती आहेत त्या प्रमाण नव्हेत हे सिद्ध करण्याची. ही तिसरी जबाबदारी अत्यंत शोचनीय आहे. हिला कोणत्याही श्रुतीत आधार नसून प्रत्येक ग्रंथाभिमानी ती बळेच आपल्यावर ओढून घेतो.

वर सांगितलेल्या ह्या तीन जोखमा आमचे आर्य बंधू आपल्यावर विनाकारण घेतात. वेदप्रामाण्यासंबंधी त्यांनी थोडा खोल विचार केला तर त्यांच्यात व ब्राह्मांत फार मोठा भेद राहणार नाही. जरी किंचित राहिला तरी, प्रधान भागात जे त्या दोघांचे ऐक्य आहे आणि गौणभागातही त्याचा पुष्कळ भेद नाहीसा झाला आहे हे पाहून दोघांनीही आपला धर्मसुधारणेचा एकत्र इष्ट हेतू आता अधिक एकीने करायला पाहिजे आहे.

ब्राह्मांनी श्रुती अगदी टाकल्या आहेत असे नाही, तर उलट सर्वच जगातल्या श्रुती त्यांनी स्वीकारल्या आहेत हे वर सांगितले. पण ह्यापेक्षाही आर्यांनी हे ध्यानात घ्यावे की ब्राह्मांस वेदाचा जो शेवटचा व उत्तम भाग उपनिषदे ही पूर्ण मान्य आहेत, इतकेच नव्हे तर भगवदगीता आणि आधुनिक तुकाराम, नानक, चैतन्यादी साधूंचे प्रयत्नही ब्राह्मांस पटत आहेत, आणि त्यांच्याच वचनाच्याद्वारे मंदिरात उपेदशही होत असतात. ह्यापुढे ब्राह्म आणि आर्य ह्यांमधील भेद जर झपाट्याने कमी व्हावा असे दोघांना वाटत असेल तर दोघांनी परस्परांचे रहस्य जाणले पाहिजे. ते असे. ब्राह्मांनी आपल्या सार्वत्रिक व सनातनधर्माची तत्त्वे हिंदुस्थानवासीयांस विशेषे लवकर कळवावी आणि आर्यांनी ह्याच सनातन धर्माची तत्त्वे वेदांतून काढताना शब्दांची वाजवीपेक्षा जास्त ओढाताण करू नये. इतकेच नव्हे तर हा सनातनधर्म सर्वत्र आहे, हे सहज कळविण्यासाठी ती सर्व धर्मग्रंथांतून होता होईल तितकी काढावीत. ह्याशिवाय दोघांचे व्हावे तसे ऐक्य होणार नाही किंवा धर्माची सुधारणा करणे हा दोघांचा हेतू तोही पूर्ण तडीस जाणार नाही.

ब्राह्म आणि आर्य हे दोघेही जर उदार मताचे आणि प्रगतीपर आहेत, तर दोघांचे ऐक्य केव्हा तरी झालेच पाहिजे. इंग्लंड, अमेरिकेतील युनिटेरिअन लोक, युरोपातील उदार प्रॉटेस्टंट आणि हिंदुस्थानातील ब्राह्म हे भूगोलात व इतिहासात एकमेकांपासून इतके दूर असूनही आणि त्यांच्या आताच्या चालीरीती व मूळचा धर्मही इतका अत्यंत भिन्न असूनही ह्यांच्यात अलीकडे किती तरी ऐक्यभाव व प्रेम वाढत आहे आणि परस्परांस मदत करीत आहेत. पण आर्य आणि ब्राह्म हे सख्खे बंधू, एकाच धर्मातले, एकाच देशाच्या उद्धारासाठी झटणारे असूनही हे परस्परांपासून नेहमी इतके स्वतंत्र, कित्येकदा अगदी उदासीन व क्वचित प्रसंगी एकादा
दुस-याला टाकूनही बोलतो ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे!

नावारूपाने दोघे जरी आज एक होणे शक्य नसले तरी जे पुष्कळ कार्य दोघांस जोडीने करता येईल त्यात कोणीही तटस्थ राहू नये.