1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मूर्ति-पूजा

देव्हारा  :   येथपर्यंत मी जें लिहिलें त्या माझ्या बालवयांतल्या चेष्टा होत्या.  हा प्राथमिक शाळेंतला १२ वर्षांच्या वयांतला काळ होता.  ह्या काळांतही मी घरीं देवपूजा केव्हां केव्हां फार मन लावून करीत असें.  देव्हार्‍यावर देव पुष्कळ असत.  शिवाय इतर कोनाड्यांतूनही पूजनीय वस्तु पुष्कळ ठेविलेल्या असत.  उदाहरणार्थ, आमचा देव्हारा म्हणजे देवधरांतल्या भिंतींत माझ्या कंबरेइतक्या उंचीवर एक मोठा चार फूट रुंद व तितकाच उंच आणि ३।४ फूट खोल असा कोनाडा होता.  त्यांत प्रथम देवांच्या मूर्ति आणि पितरांचे टांक नीट मांडावयाचे असत. त्यापुढें शाळिग्राम, निरनिराळ्या नद्यांतले गोटे, त्याचेहीपुढें घंटा, धूपारती, कापुरारती, निरांजनें, पळी, पंचपात्री आणि उजवीकडे एका अडणीवर मोठा शंख आणखी एक लहान शंख वगैरे ठेवलेले असत.  उजवीकडे आंत पुन्हां एका खिडकींत श्रीयल्लमाची चवरी आणि आमच्या आजीची ताळी वगैरे जवाहीर असे.  डावीकडील एका लहानशा देवळींत एक समई आणि जवळ एक काशीहून आणलेला गंगोदक बंद करून ठेवलेला तांब्या अशा किती तरी वस्तूंचा सुंदर संभार असे.

पूजेचा उत्साह :  मनाला आलें कीं, ह्या सर्व देवदेवता आणि इतर वस्तु धुऊन पुसून व्यवस्थेनें मांडून त्यांवर गंधाक्षता, कुंकुं, हळद, फुलें यथासांग लावून पूजा करण्यांत त्या बाळपणीं देखील मला मोठें सुख आणि ईर्षा वाटे.  ती माझ्या वडील भावाला वाटत नसावी आणि हा आम्हां दोघां भावांमधील भेद बहुतकरून माझ्या बाबांच्या लक्षांत आला असावा; म्हणून ते मलाच पूजा करावयास सांगत असावेत.  ह्यावरून माझ्या स्वभावांतील उत्साह हा गुणही दिसून येतो.  विशेष सणावारीं घरीं कांहीं गोडधोड नैवेद्याचें झालें, म्हणजे माझ्या बाळभक्तीला तर पूरच येत असे.  मानवी जातीप्रमाणें व्यक्तींतही सकाम भक्ति अगोदर असणारच.  मग मला ह्यांत लाज आणणारें कांहीं विशेष नाहीं.

आध्यात्मिकता :  मूर्तिपूजा मुलांना आणि बायकांना देखील आवश्यक नाहीं, असें माझें आतां धर्माचा इतिहास शास्त्रीय दृष्टीनें वाचून ठाम मत झालें आहे.  तरी त्या वेळीं मूर्तिपूजेंत माझी मोठी करमणूकच होई.  आपण कांहीं विशेष गोष्ट करीत आहों असें वाटे.  ती गोष्ट आध्यात्मिक होती, हें त्या वेळीं वाटणें शक्यच नव्हतें.  तरी मला जो उत्साह आणि निरतिशय आनंद वाटत होता, तो केवळ नैवेद्याच्या लोभामुळेंच होता असेंही नव्हतें.  माझ्या बाबांचा दरारा घरीं फार होता, तरी माझ्या आईवर लहानपणींही मी इतका दाब टाकीत असें कीं, हट्ट धरला असता तर देवांच्याही अगोदर मला केलेले गोड पदार्थ खावयाला मिळाले असते.  बाबांनींही ज्या अर्थी पूजेची मजवर सक्ति कधीं केली नाहीं त्या अर्थी पूजा करण्यांत मला तितक्या कोवळ्या वयांतही ९।१० वर्षांचा असतांना तेव्हां न सांगतां येण्यासारखें कांहीं तरी आंतरिक सुख होत असावें.  नाहीं तर माझ्यासारख्या त्या वेळच्या काफिर अरबाला अगर तुफान पठाणाला ह्या हिंदु पूजेची दगदग सहनच झाली नसती !  ''व्यतिषजति पदार्थान् आंतरः कोऽपि हेतुः'' ह्या पूजेंत माझी कोवळी आध्यात्मिकताच असेल, नसेल कशावरून !

हा जो मीं वरील तर्क रचला आहे त्याला कारण पुढें जें लिहीत आहें त्यांत दिसणार आहे.  तो चुकीचा ठरला तर माझी चूक कबूल करावयाला मी केव्हांही तयार आहें.  कारण हें जें सारें प्रकरण मी लिहीत आहें तें मी मोठा धार्मिक होतों असें भासविण्यासाठीं नसून, पुढें प्रौढपणीं माझ्यांत ज्या धार्मिक भावना स्पष्ट झाल्या त्याचेंच हें प्राथमिक अस्पष्ट रूप होतें, हें दाखविण्याचा माझा शास्त्रीय प्रयत्‍न आहे.

शिवलिंगपूजा  :  इंग्रजी तिसर्‍या-चौथ्या इयत्तेंत असतांना मी १४।१५ वर्षांचा होतों.  त्या वेळीं माझ्या भावनाशील अंतःकरणांत स्पष्ट रूपानें भक्तिभावनांचा उद्रेक मला दिसून आला.  ह्या वेळीं माझी मराठी वाङ्‌मयांत चांगली प्रगति होत होती.  मी पौराणिक पोथ्या वाचीत होतों.  विशेषतः मी शिवलीलामृत ह्या लहानशा पोथीचें पारायण आवडीनें करीत असें.  हें मी स्नान करून जेवणापूर्वी करीत असें.  शिवाय श्रावणमासांत शिवलिंगाचें अर्चन मी मोठ्या भक्तिभावानें करूं लागलों.  पाटावर शिवलिंग ठेवून मी त्यावर बेलपत्राचीं सहस्त्रदळें वाहात असें.  म्हणजे बरोबर जरी हजार पानें नसलीं तरी पुष्कळशी पत्री मी स्वहस्तें तोडून आणून माझ्या आवडत्या शिवलिंगावर अर्पीत असें आणि विष्णुसहस्त्रनामाप्रमाणें शिवनामाचा जप करीत असें.

शिव व विष्णु  :  हिंदु धर्मांतील शिव आणि विष्णु ह्या मुख्य दैवतांपैकीं मला पहिलेंच विशेष आवडे.  अजूनही मला विष्णुमंदिरापेक्षां एखाद्या शिवालयांत जाऊन बसणें अधिक पसंत आहे.  ह्याचें कारण विष्णु सापेक्षतः अधिक अर्वाचीन आणि त्यांत शिवालयापेक्षां भजनपूजनाचा व स्त्रीपुरुषांचा अधिक गोंगाट असतो.  शिवालयें प्राचीन आणि निवांत असतात.  गाभार्‍यांत मूताअचा सुळसुळाट आणि उपकरणांचा दणदणाट नसतो.  हरिचरित्रांत मी कृष्णाचे जे चाळे वाचीत असें त्यापेक्षां शंकर-पार्वतीचे गोष्टींत अधिक साधेपणा आणि भोंळेपणा मला त्या लहान वयांतही दिसत असे.  ह्यामुळें कृष्णापेक्षां भोळा सांब मला अधिक आवडे !

पुराणिकाचा थाट  :  ह्या दोनचार वर्षांत मी शाळेंतील माझ्या सोबत्यांस जमवून सुट्टीचे दिवसांत हरिविजयांतील गोवर्धनाख्यान, रामविजयांतील कुंभकर्णवध किंवा पांडवप्रतापांतील हरिश्चंद्राख्यान असले भक्तिरसोत्पादक अध्याय वाचून पुराणिकाप्रमाणें अर्थ सांगत असें.  विशेषतः शेवटच्या आख्यानाचे वेळीं श्रोते आणि वक्ता आम्ही दोघेही करुण रसानें व्याकुळ होऊन रडत बसल्याचें मला आतां नीट आठवत आहे.  तसेंच विठोबाच्या मठांत मागें वर्णन केलेल्या सप्‍ताहांत अगदीं लहानपणीं मी जो तमासगिराप्रमाणें जात होतों तो ह्या वेळीं प्रेमानें वश होऊन भाग घेऊं लागलों.  पुढें बाबा गुरुचरित्र वाचून दत्तमंदिरांत जाऊं लागले.  तेव्हां त्या चरित्रांतील कथा मला रामरावणाच्या युद्धापेक्षां, किंबहुना कृष्णगोपींच्या लीलेपेक्षां अधिक मानवी तर्‍हेच्या व करुण भक्तीला पोषक असलेल्या अधिक आकळूं लागल्या.  दत्तमंदिरांतील करुणाष्टकें बाबांच्या तोंडून ऐकणें मला फार आवडे.  ह्या माझ्या बुद्धिविकासाबरोबर जो धर्मभावनांचा विकास होऊं लागला त्यांतील शास्त्रीय संबंध जरी त्या वेळीं मला कळून येणें शक्य नव्हतें, तरी वस्तुस्थिति तशी होती खरी !

गोड फरक :  पोथ्या वाचणें हा तिसर्‍या प्रहरचा आणि भजनास जाणें हा एक सायंकाळचा, कांहीं अंशीं फावल्या वेळेचा प्रकार होता.  तरी श्रावण महिन्यांत स्नान करून जेवणाचे पूर्वी मी श्रीशिवलीलामृताच्या पारायणाचा, नामजपाचा, लिंगार्चनाचा आणि उपवास करून रामतीर्थास (१॥ मैल डोंगरांत) जाऊन येण्याचा जो नाद घेतला त्यांत खरा भक्तिभाव होता.  हा माझ नवीन नाद पाहून आईबाबांना कौतुकच नव्हें तर आश्चर्य वाटे.  श्रावणमासांत डोंगरांत आपल्या वानरसेनेला घेऊन जाऊन रामेश्वराहून परत येतांना जिवंत विंचवांची माळ घरीं आणून लहान बहिणींना भेडसावणारा पठाण पोर्‍या, आतां सरळ मार्गानें उपाशी एकाकी रामेश्वराला जाऊन त्याचा अंगारा आणून वडिलांनाही लावतो हा कोण गोड फरक !  हा फरक आपल्या मुलाच्या स्वभावांत पडत आहे, हें पाहून कोणा प्रेमळ आईबापांना कौतुक वाटणार नाहीं !  

हा जो परिपाक माझ्या स्वभावांत दिसूं लागला तो कांहीं तिसर्‍या चौथ्या इयत्तेंत एकदम आला असें नव्हे.  माझ्या भावाच्या मृत्यूबद्दल शोक, घरांतील दारिद्र्य, आईबाबांचा उदासीनपणा वगैरे अनेक नैसर्गिक कारणें ह्या अंतरपालटाचीं होतीं.  तिसर्‍या, चौथ्या इयत्तेंत मला माझ्या वर्गांतील हुषारीमुळें सोबत्यांमध्यें आणि वर्गामध्यें जें यश आणि प्रभुत्व मिळालें त्याचाही हा सात्त्विक परिणाम होता.  इतर मुलांप्रमाणें मी यशामुळें आढ्य, हेकेखोर व जुलमी न होतां माझ्या सोबत्यांना घेऊन जरी बराच वेळ धांगडधिंगा घालीत असें, तरी पुन्हां कांहीं वेळ पोथ्या वांचण्यांतही घालवीत असें, ही विशेष ध्यानांत घेण्यासारखी गोष्ट आहे, असें मला वाटत आहे.  पण तेव्हां मात्र मी केवळ अनभिज्ञ, मुग्ध आणि भावनाशील होतों !

भक्ति व यश  :  शाळेला मी नियमानें जात होतों.  कारण नंबर पहिला असल्यानें वर्गाचा सेक्रेटरी मलाच व्हावें लागे.  मार्कपत्रकें, हजेरीपत्रकें नीट ठेवणें वगैरे शिक्षकांच्या हाताखालचीं सटरफटर कामें सेक्रेटरी या नात्यानें मला करावीं लागत, म्हणून शाळेंत उशीर करून जाणें किंवा गैरहजर राहणें हें शक्यच नसे.  तरी मी शाळेस जाण्यापूर्वी आईला किंवा बाबांना न सांगतां, अथवा जातां जातां शाळेपूढच्या मारुतीचें दर्शन न घेतां कधींच जात नसें !  पुढें बबलादीचे सिद्ध पुरुष २।३ वर्षे घरीं येऊं लागले.  त्यांचेवरही माझी श्रद्धा बसली.  तसा त्यांच्यांत मजविषयीं प्रेमळपणा होता.  त्यांचा प्रसाद म्हणून बराच अंगारा मी एका पेटींत घालून ठेवीत असें.  ह्यांतच रामेश्वराचा, मारुतीचा, दत्ताचा वगैरे अंगारा असे.  शाळेंत जाण्यापूर्वी सर्व देवांचीच नव्हे तर बबलादीच्या सर्व सिद्ध पुरुषांचीं नांवें घेऊन आणि कपाळाला हा मिश्र अंगारा लावून मी शाळेंत जाई आणि मला वाटे कीं, ह्या माझ्या भक्तीमुळें मला वर्गांत रोज इतरांपेक्षां जास्त मार्क मिळून माझा नंबर नेहमीं पहिला राही.  वस्तुतः हा माझा धर्मभोळेपणा होता.  कारण खरा प्रकार असा कीं, हा माझ्या भक्तीचा नवीन उद्रेक होण्यापूर्वीच १।२ वर्षे माझी हायस्कुलांत प्रगति होऊन माझी प्रसिद्धि झाली होती.  भक्ति प्रथम असो किंवा यश प्रथम असो; ह्या दोन्हींचें कांहीं वर्षांनीं पुढें साहचर्य घडलें ही गोष्टही खोटी नाहीं.

पांचव्या इयत्तेंत असतांना मला खरूज फार लागली व घरीं आम्ही सर्वजण बेजारलों.  तेव्हां श्रीयल्लमाचे यात्रेला जाण्याचा मींच घरीं आग्रह धरला आणि तो बाबांनीं पारही पाडला.  या गोष्टीवरून जरी ह्या माझ्या धर्माच्या दुसर्‍या विकासांत कांहीं अंशीं सकामपणाची झांक मारते, तरी एकंदरींत त्या वेळच्या माझ्या भक्तिभावनांतून बर्‍याच अंशानें सहजमधुरता होती असें मला वाटतें.  एरवीं माझ सोबती जे अभ्यासांत, खेळांत आणि इतर करमणुकींत माझ्या प्रभावळींत गुरफटले ते माझ्या धार्मिक छंदांतही तसेच गुरफटले नसते.

अधिक स्फोट  :  हा जो मजमध्यें भक्तीचा उद्रेक झाला म्हणून मीं वर म्हटलें तो जसा अकस्मात् एखादा भूकंप व्हावा तशा प्रकारें मी हायस्कूलमध्यें असतांना झाला असें मुळींच नव्हे.  हायस्कूलमध्यें गेल्यावर मी नव्या जगांत गेल्यासारखें मला कां वाटूं लागलें, घरची स्थिति बदलल्यामुळेंही माझ्या स्वभावांत फरक कसा झाला वगैरे वेळोवेळीं माझ्या स्वभावविकासाची मीमांसा शास्त्रीय दृष्ट्या मीं केली आहे.  धर्मभावनेविषयीं माझ्या स्वतःच्या शास्त्रीय दृष्टीचें थोडें दिग्दर्शन मीं केलें आहे.  यावरून धार्मिक भावना ह्या इतर भावनांहून अगदीं तत्त्वतः भिन्न आहेत असें मी समजत नाहीं.  माझी पुढची कहाणी ऐकून वाचक गोंधळूं नयेत, म्हणून ह्याचा थोडावा जास्त स्फोट करणें मला येथें जरूर दिसतें.

बालस्तावत् क्रीडासक्तस्तरुणस्तावत् तरुणी-रक्तः ।
वृद्धस्तावत् चिंतामग्नः परेब्रह्मणि कोपि न लग्नः ॥

असें प्रत्यक्ष आद्य शंकराचार्य म्हणतात; पण मला तर वाटतें कीं, लहानपणीं मुलांची खेळाची आवड, तरुणपणीं तरुणीसंबंधी उदात्त रस आणि म्हातारपणीं एखाद्या ऐहिक बाबतींतील सात्त्विक चिंतामग्नता, ह्या तिन्ही भावनांहून भक्तीची भावना तत्त्वतः अगदीं भिन्नच आहे असें म्हणतां येत नाहीं.  ह्या भावनांत जी वयपरत्वें अंतःकरणांची परिणति होत जाते तीच किंचित् आणखी थोडी जास्त शुद्ध, जास्त व्यापक आणि जास्त जोरदार झाली कीं तिला आम्ही भक्ति हें नांव देतों.  ज्या सहज आनंदानें मूल खेळतें, तरुण रमतो आणि वृद्ध सात्त्विक चिंतेनें व्याकुळ होतो तोच आनंद ईश्वराच्या उत्तमोत्तम भक्तींत आहे, हें माझें मत कित्येकांना विपरीत वाटेल.  ऐहिक रस आणि पारमार्थिक रस ह्यांना मी एकाच माळेंत गोंवतों, ही माझी कोणाला अक्षम्य भूल वाटणें साहजिक आहे.  परंतु ऐहिक काय किंवा पारमार्थिक काय, रस तो रसच.  तो कांहीं अरस होणार नाहीं.  ह्याच दृष्टीनें वेदान्तानेंही ईश्वराची 'रसोहि सः' अशी व्याख्या केली आहे आणि सत, चित् आणि शेवटचें आनंद हें त्याचें स्वरूप सांगितलें आहे.  मग मी भक्तिभावनेची इतर स्वाभाविक भावनांमध्येंच गणना करतों ह्यांत काय पाप घडतें ?  ह्या न्यायानें पाहतां बाळपणींचा मी खेळकर, पोरपणींचा मी खोडकर किंबहुना कादंबर्‍या वाचून अकालींच शृंगार रसाच्या वेदनांनीं विव्हळ होणारा, पुढें पोक्तपणीं अनेक राजसी भावनांचे हेलकावे खाऊन, शेवटीं वृद्धपणीं महारापोरांच्या घरच्या चिंतेंत असो किंवा स्वतः माझ्या घरच्या मुलाबाळांच्या चिंतेंत असो, प्रसंगोपात्त मग्न झालों असलों तरी ह्या सर्व निरनिराळ्या भावनांत आणि माझ्या धार्मिक आयुष्यांतील उत्तमोत्तम भक्तिभावनेंत तत्त्वतः भिन्नता माझ्या तरी अनुभवास आली नाहीं.  मी मोठा झाल्यावर प्रार्थनासमाजांत असतांना आवड, प्रेम आणि भक्ति ह्या विषयांवर एका कौटुंबिक उपासनेच्या प्रसंगीं प्रवचन करीत असतांना जे विचार प्रकट केले आहेत ते विचार आतां मी येथें भक्तिभावनेविषयीं जी मीमांसा करीत आहें तिच्या उलट आहेत हें खरें; पण हल्लींची माझी दृष्टि आधुनिक शास्त्रांतील विकासवादाला अधिक सुसंगत आहे असें वाटतें.  ह्यामुळें हायस्कूलमधलाच काय पण पुढचाही माझ्या धर्मभावनांचा सर्व विकास माझ्या आयुष्यांतील इतर सर्व अनुभवांशीं आणि तदनुसार घडलेल्या वागणुकीशीं तत्त्वतः मुळींच विसंगत नाहीं, असें माझें आतां मत झालें आहे.

साधुसमागम  :  पोरवयांतल्या सहजभक्तीच्या आठवणी सांगतांना मीं माझ्या पूजाअर्चांच्या, पोथीवाचनाच्या, नामजपाच्या, भजनाच्या व यात्रादिकांच्या वगैरे आठवणी सांगितल्या, पण आणखी एका मुख्य विषयाच्या आठवणी सांगणें जरूर आहे.  ती गोष्ट संतसमागम ही होय.  आतां ह्या पोरवयांत मला खरे संत व खोटे संत ह्यांत फरक तो काय कळणार ?  मी करीत होतों त्या भक्तीचा विषय जरी मूर्तिच होत्या आणि ती भावना जरी पोरकट होती, तरी त्या सर्व भावना त्या वेळच्या मानानें अगदीं शुद्ध, निष्कपट आणि जोरदार होत्या एवढीच गोष्ट मुद्द्याची आहे.  त्याचप्रमाणें ज्या ज्या कांहीं पुरुषांच्या समागमामुळें मला ह्या वयांत धार्मिक आनंद होत असे, त्या त्या पुरुषांचा खरा साधुपणा किंवा विज्ञान कोणत्या दर्जाचा होता हा मुद्दा गौण आहे.  माझी श्रद्धा व प्रेम त्या त्या माणसावर बसत असे हाच मुद्दा मुख्य आहे.  ह्याच दृष्टीनें पुढच्या आठवणींचें महत्त्व आहे.  एरवीं त्यांत कांहीं विशेष अर्थ नाहीं.  बाबांना देवळांचा व भजनांचा जबर नाद होता, तसाच भटकणार्‍या साधु-बैराग्यांचा आणि सिद्ध-महंतांचाही नाद होता.  त्यांनीं नादावून घरीं आणलेल्या असल्या माणसांवरच साधु समजून माझीही श्रद्धा बसत असे.

जटाधारी गोसावी  :  अघोरी पंथांतल्या एका जटाधारी गोसाव्याकडे बाबा एका काळीं फार जात येत असत.  त्या वेळीं मी हायस्कुलांत जात होतों कीं त्यापूर्वीचा हा काळ होता हें मला नीट स्मरत नाहीं.  हा एका ठिकाणीं गुप्‍त होऊन दुसरीकडे प्रगट होतो, अशी कांहीं भाविक लोकांची समजूत झाली असावी.  साधारणपणें हा बुवा गांवाबाहेर कोठल्या तरी झाडाखालीं धुनी पेटवून रात्रंदिवस अंगाला राख लावून बसलेला असे.  तो बसल्या जागचा कधीं उठतच नसे अशीही लोकांची समजूत असे.  ह्याची मुद्रा प्रसन्न, बोलणें हेंगाडें व मराठीच का असे ना, पण प्रेमळ असे.  हा एकाएकीं एके दिवशीं दोन प्रहरीं आमच्या गोठ्यांतल्या एका अंधारी कोपर्‍यांत उभा असलेला आम्हांला दिसला.  बाबा जरी विश्वासू आणि आदरशील होते, तरी भलत्यासलत्या चमत्कारावर भुलून जाण्याइतकी त्यांची श्रद्धा आंधळी नव्हती.  म्हणून त्या बोवाचें हें चमत्कारिक येणें बाबांना आवडलें नाहीं.  त्यांनीं त्याला आपल्या ठिकाणीं पोंचविलें.  तरी पण विशेष न रागावतां त्या बुवाला रोज दोन प्रहरीं एक भाकरी व थोडी भाजी पाठविण्यास बाबांनीं आईस सांगितलें.  हें अन्न रोज नेऊन पोंचविण्याचें काम मजकडे होतें आणि तें मी आनंदानें करीत असें.  ह्यांत मला आनंद कां वाटावा बरें ?  लहान मुलाला असलीं कामें नियमानें करण्याची हौस असणें मुळींच साहजिक नाहीं.  मला तर त्या साधूकडे जाऊन त्याचा समाचार घेणें, तो भुकेलेला गोसावी तें अन्न आतुरतेनें घेई म्हणून विशेषतः कळकळीनें तें पोंचविणें, अन्न ज्या ताटांतून नेत असें त्यांत तो साधु चार दाळिंबाचे दाणे, खोबर्‍याचा लहानसा तुकडा किंवा थोडीशी खडीसाखर प्रसाद म्हणून कांहीं तरी आपल्याजवळचें घालून ताट परत करीत असे- तो प्रसाद मी श्रद्धेनें घरीं भावंडाना आणून वांटणें वगैरे गोष्टी त्या लहान वयांत भक्तीच्याच द्योतक होत्या !  केवळ भुकेलेल्यास अन्न देण्याची परोपकारी भावना किंवा साधुसमागमाची जाणूनबुजून आवड राखण्याच्या आध्यात्मिक भावनेला माझें तें लहान वय पात्र नव्हतें.  पण ह्या दोन्हींच्या मधली एक स्थिति मी तेव्हां अनुभवीत होतों हें खरें.  तिला काय नांव द्यावें हें मला आतां देखील नीट समजत नाहीं !

इतर बैरागी  :  मराठा जातींत कोणी तरी गोसावी गुरु करून घेण्याची परंपरा चालत आली आहे.  नाशिक जिल्ह्यांतील त्र्यंबकेश्वर येथील विठ्ठलपुरी नांवाचे गोसावी माझे वडिलांचे गुरु होते.  ते वृद्ध होते.  त्यांचे शिष्य गोसावी ह्यांचा उपदेश मला आणि माझ्या भावाला बाबांनीं कान पुंफ्कण्याचा विधि करून देवविला होता.  हे गोसावी एक दोन वर्षांनीं आमचे घरीं फिरतीवर येऊन संभावना घेऊन जात.  त्या वेळीं त्यांच्याशीं माझा लळा विशेष असे.  तुळजापूरचे भोपे भवानराव कदम आमचे घरीं कुळदेवतेचा नवस वगैरे काय असेल तें घेऊन जाण्यास मधून मधून येत.  तेही मला फार आवडत.  पुढें इंग्रजी शाळेंत असतांना नाशिककडचे भगवानदास आणि माधवदास नांवाचे दोन वैष्णव बैरागी आमचेकडे वरचेवर येत असत.  हे नुसते पांथस्थ या नात्यानें जमखंडीच्या कोठल्या तरी देवळांत उतरून बाजारांत भिक्षा मागून एक वेळ जेवून राहात.  आमच्याकडून त्यांना कसलीही अपेक्षा नसे.  तरी त्यांचा व आमच्या घरचा फार लोभ जडला होता.  त्याचें विशेष कारण मी इंग्रजी शाळेंत जाणारा, मोठा समजूतदार, प्रेमळ मुलगा हें ओळखून, बाबा असोत नसोत, माझ्या भेटीला घरीं येऊन माझ्याशीं त्यांनीं परिचय वाढविला होता.  शेवटीं इंग्रजी ६ व्या ७ व्या इयत्तेंत असतांना बबलादीच्या सिद्धांचें येणें-जाणें फार वाढलें.

योग्य पारख :  देवपूजा, भजन, पोथीवाचन आणि साधूंची आवड वगैरे जे धार्मिक भावनांचे प्रकार आठवतील तसे मीं सांगितले त्यांवरून व आमच्या घराण्यांतील आजी आणि आई ह्यांचीं व्रतें आणि उपास ह्यांविषयीं जी मीं हकिकत दिली तिच्यावरून आमच्या घराण्यांत हिंदु धर्माची जुनी परंपरा, आचारविचार आणि बाळबोधपणा कसा रुजला होता हें दिसून येतें.  पण ह्यापेक्षां विशेष गोष्ट सांगावयाची ती ही कीं, जुन्या धर्माचे इतके तपशिलवार आचार आमचे घरीं चालत होते तरी केवळ कर्मठपणा, धर्मभोळेपणा, दंभ आणि दुराग्रहाचा पगडा आमच्या घरीं आई-बाबांच्या वर्तनांत मला केव्हांच दिसून आला नाहीं.  एखाद्या ढोंगी साधूचें कपट दिसून आलें किंवा कोणाही सांप्रदायिक अतिथीचा स्वार्थी मतलब दिसून आला कीं, बाबांचा निःस्पृहपणा उग्र स्वरूप धारण करीत असे.  आल्या अतिथीची आमचे घरीं जरी शक्तिनुसार संभावना होण्याला कधीं चुकत नसे, तरी त्यानें एखादें दुर्वर्तन केलें किंवा त्याचा लोभी आणि मतलबी डाव दिसला तर लागलीच त्याची उलट दिशेनें संभावना करावयाला बाबा कधीं मागें घेत नसत !  ह्यामुळें भलत्यासलत्या सालोमालो भटक्याला आमचे दारांत पाय ठेवण्यापूर्वी विचार करावा लागत असे.  आईच्या भक्तींत कोणताही वरपंग नव्हता.  माझ्या वडिलांच्या स्वभावांतच माझ्या भावी सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचीं बीजें पूर्णपणें आढळतात.  आईनें व्रतें जरी बरींच केलीं तरी अमक्या वेळीं अमका नवस केलाच पाहिजे, अमक्याला अमकें दान दिलेंच पाहिजे, असा हट्ट कधींच केला नाहीं.  दोघांच्याही धर्मभावना साध्या, सहज आणि निर्हेतुक होत्या.  आणि त्यांतच माझ्या 'भावी' धर्माचा माझ्या सर्व सामाजिक सुधारणांचाही उगम आहे.

मिशनची घटना


मिशनची घटना  :   येणेंप्रमाणें मुंबई येथील मध्यवर्ती संस्थांची कामें होऊं लागून एका नमुनेदार मातृसंस्थेची उभारणी झाली.  यापुढें या संस्थेच्या प्रत्यक्ष शासनाखालीं प्रांतिक मुख्य शाखांची घटना करावयाला जनरल सेक्रेटरी लागले.  ह्या मिशनच्या सनदेचे जे नियम होते त्यांच्या अन्वयें मिशनच्या शाखांचे तीन प्रकार ठरले होते.  पहिला प्रकार अंगभूत शाखांचा.  ह्या शाखा मिशनची जी मध्यवर्ती कार्यवाहक कमिटी होती तिच्या प्रत्यक्ष अंमलाखालीं चालावयाच्या होत्या.  जमाखर्चाची सर्व जबाबदारी आणि इतर कारभार मध्यवर्ती कमिटीच्या संमतीनें चालावयाचा होता.  प्रांतिक शाखांचे मुख्य चालक आणि त्यांच्या मदतनीस कमिटीचें सभासद हें मध्यवर्ती कमिटीच्या संमतीनें नेमले जात.  हा चालक स्वतःला वाहून घेऊन काम करणारा असल्यास त्याच्या पगाराची जबाबदारी मध्यवर्ती कमिटीकडे असे.  बाकीचा सर्व खर्च चालविण्याची जबाबदारी ह्या मुख्य चालकांवर आणि त्याच्या कमिटीवर असे.  वर्षअखेर जमाखर्चाचा खर्डा स्थानिक ऑडिटरनें मंजूर केल्यावर तो खर्डा आणि वार्षिक अहवाल मध्यवर्ती कमिटीच्या पसंतीला मुंबईस पाठवण्यांत येई.  वेळोवेळीं या शाखांची आणि त्यांच्या आश्रयाखालीं चाललेल्या इतर शाखांच्या संस्थांची तपासणी जनरल सेक्रेटरीकडून होत असे.  ह्या शाखांची वर्षअखेर जी शिल्लक असे तींपैकीं जास्तींत जास्त १००० रु. मध्यवर्ती कमिटीच्या द्वारें मातृसंस्थेकडे येत.  याशिवाय विशिष्ट हेतूनें दिलेले कायमचे निधि असतील तर हे ट्रस्टफंड या नात्यानें वरील ट्रस्टींकडे येत.

दुसरा प्रकार संलग्न शाखांचा.  ह्या शाखांची जमाखर्चाची आणि कामाची जबाबदारी प्रत्यक्षपणें मध्यवर्ती कमिटीकडे नसे.  मात्र कामाचें धोरण मिशनच्या हेतूला धरून चाललें आहे कीं नाहीं हें जनरल सेक्रेटरी वेळोवेळीं तपासून पाहात.  मिशनच्या वार्षिक सर्वसाधारण अहवालांत सामील करण्यासाठीं अशा शाखांच्या जमाखर्चाचा तक्ता आणि कामाचा अहवाल जनरल सेक्रेटरीच्या ऑफिसांत वेळेवर येत असे.

तिसरा प्रकार सहकारी शाखांचा.  ह्या बहुतेक स्वतंत्रपणें चालत.  सामान्य धोरण आणि परस्पर सहानुभूति असली कीं अशा शाखा मिशन मान्य करीत असे.

मातृसंस्थेचे आद्य ट्रस्टी - (१) नामदार गोकुळदास कहानदास पारेख, बी.ए. एलएल.बी.; (२) शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला व (३) श्री. विठ्ठल रामजी शिंदे, बी.ए. ता. १ जानेवारीपासून ३१ डिसेंबरपर्यंत मिशनचें दप्‍तरी वर्ष ठरलेलें असे.

पुणें शाखा  :   मि. ए. के. मुदलियार हे पुणें शाखेचे सनमान्य सेक्रेटरी.  ह्यांनीं पाठविलेल्या पहिल्या सहामाही अहवालाचा पुढील सारांश आहे :   १९०८ सालच्या एप्रिलमध्यें पुणें येथील कांहीं अस्पृश्य पुढार्‍यांच्या कळकळीच्या विनंतीवरून मिशनचे जनरल सेक्रेटरी वि. रा. शिंदे यांनीं पुण्यास भेट दिली.  मिशनची पहिली अंगभूत शाखा पुण्यास असावी असा त्यांचा विचार ठरला.  पुढें दोन महिन्यांनीं रा. शिंदे यांनीं आपले मदतनीस रा. सय्यद अबदुल कादर यांना पुण्यास पाठविलें.  त्यांनी २२ जून १९०८ रोजीं पुणें लष्कर, सेंटर स्ट्रीट, येथील एका घरांत या शाखेची पहिली दिवसाची शाळा उघडली.  पैशाची व्यवस्था तात्पुरतीच होती.  शाळेचें सामान कांहींच नव्हतें.  एका अस्पृश्यवर्गीय पुढार्‍याकडून एक टेबल व खुर्ची तात्पुरती मिळाली होती.  पुढील सर्व व्यवस्था करण्याचें काम रा. ए. के. मुदलियार यांचेवर सोंपवून रा. सय्यद मुंबईस परत गेले.  वर्तमानपत्रांतून जाहिराती देऊन पहिल्या महिन्यांत ५७७ रु. जमविण्यांत आले.  बॅ. एच. ए. वाडिया या उदार गृहस्थानें १०० रु. ची पहिली देणगी दिली.  नंतर मि. डब्ल्यू. टी. मॉरिसन, आय. सी. एस. मध्यभाग कमिशनर, व डेक्कन कॉलेजचे प्रोफेसर वुडहाउस यांनीं प्रत्येकीं ३० रु. देऊन सुरुवातीच्या अडचणी भागविल्या; पण शिकविण्यास शिक्षक कोणी मिळेना.  म्हणून मातृसंस्थेंतून मुंबईहून ए. व्ही. गुर्जर या नांवाच्या गृहस्थास पाठवावें लागलें.  खर्चाची रात्रदिवस तळमळ लागली असतां मुंबईचे त्या वेळचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांजकडे पुणें शाखेचे चिटणीस रा. मुदलियार यांनीं एक विनतीपत्र पाठविण्याचें धाडस केलें.  मिशनचे चालक कोण आहेत आणि त्यांचें कार्य कसें चालू आहे याची योग्य ती चौकशी केल्यावर गव्हर्नरसाहेबांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीकडून रा. मुदलियार यांस ता.१८-८-१९०८ रोजीं खालील उत्तर आलें, ''आपल्या गेल्या महिन्याच्या १९ तारखेच्या पत्रास नामदार गव्हर्नरसाहेबांच्या आज्ञेनें कळविण्यांत येतें कीं, आपले मिशन मदतीला लायख आहे आणि तें यशस्वी होवो अशी गव्हर्नरसाहेबांची इच्छा आहे.  मदतीसंबंधी आपणांस कळविण्यांत येते कीं, गव्हर्नरसाहेबांनीं आपली कन्या मिस व्हायोलेट क्लार्क यांना पुढील महिन्यांत एक जाहीर गायनाचा जलसा करण्याची परवानगी दिली आहे.  जलशाच्या उत्पन्नांतून मिशनला बरीचशी शिल्लक उरेल अशी आशा आहे.''

मदतीसाठीं जलसा  :  हा प्रसिद्ध गायनवादनाचा जलसा पुणें येथें सप्टेंबर महिन्यांत करण्यांत आला.  प्रत्यक्ष गव्हर्नरसाहेबांचा आणि पुणें येथील सैन्यविभागाचे कमांडर मेजर आल्डरसन यांचा आश्रय होता, म्हणून ह्या इलाख्यांतील बर्‍याच राजेरजवाड्यांनीं आणि शेठ-सावकारांनीं मुक्त हस्तें उदार आश्रय दिला.  सर्व खर्च वजा जातां ३,४६७ रु. १३ आणे पै ही शिल्लक ह्या मिशनला मिळाली.  ती मातृसंस्थेच्या अध्यक्षाकडे मुंबईस पाठविण्यांत आली.  राजेरजवाडे आणि प्रसिद्ध पुढारी गृहस्थांच्या नजरेला ह्या मिशनचें कार्य आल्यामुळें ह्या प्रसंगाचें महत्त्व दिसून येण्यासारखें आहे.

या जलशाच्या कांहीं देणगीदारांचीं नांवें -
श्रीमंत सर सयाजीराव महाराज गायकवाड   ... ५०० रु.
श्रीमंत सर शाहू छत्रपतीमहाराज ... ... ... ... २०० रु.
आमोदचे ठाकूरसाहेब ... ... ... ... ... ... .. १०० रु.
साचीनचे नबाबसाहेब ... ... ... ... ... ... .. १०३ रु.
धरमपूरचे अधिपति ... ... ... ... ... ... ...    १० रु.
नामदार आगाखान ... ... ... ... ... ... ... . ५०० रु.
भोरचे अधिपति ... ... ... ... ... ... ... ...  २०० रु.
केरवाडचे ठाकूरसाहेब ... ... ... ... ... ... .. १०० रु.
इचलकरंजीचे अधिपति ... ... ... ... ... ... .   २५ रु.

जलसा झाल्याबरोबर रा. शिंदे हे मुंबईहून पुण्यास आले.  त्यांनीं पुणें शहरांतील आणि आसपासच्या खेड्यांतील अस्पृश्य मानलेल्या लोकाची माठी सभा भरविली आणि गव्हर्नरसाहेबांचा ठराव पसार करून त्यांच्याकडे पाठविला.  ह्यानंतरही श्रीमंत लोकांकडून कांहीं देणग्या येऊं लागल्या.  त्यांत सर जेकब ससून यांजकडून रुपये ५०० आणि मुधोळच्या अधिपतींकडून रु. १०० आले.  डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. एफ. जी. सेल्बी, अध्यक्ष, मि. ए. के. मुदलियार, सेक्रेटरी, मि. अर्जुनराव, आर. मुदलियार, खजिनदार ह्यांनीं मातृसंस्थेच्या अनुमतीनें कमिटी नेमून जोरानें काम चालविलें.  १९०८ अखेर ह्या शाखेच्या पुढील संस्था होत्या :  (१) पुणें, लष्कर, दिवसाची शाळा, (२) पुणें, लष्कर, रात्रीची शाळा, (३) पुणें, लष्कर, वाचनालय, (४) गंज पेठ, रात्रीची शाळा, (५) मंगळवार पेठ, रात्रीची शाळा.  शेवटची शाळा रा. शिंदे यांनीं १९०५ सालीं उघडून पुणें प्रा. समाजाकडे चालविण्यास दिली होती.  ती आतां मंगळवार पेठेंत नेऊन मिशनच्या कार्यांत सामील करून घेण्यांत आली.

१९१० च्या जूनमध्यें संपणार्‍या दुसर्‍या वर्षाच्या अखेरीस ह्या शाखेच्या कामाचा जोर आणि विस्तार बराच वाढला होता.  नवीन जोरदार कमिटी खालीलप्रमाणें नेमण्यांत आली :-

डॉ. हॅरोल्ड एच. मॅन, शतकी कॉलेजचे प्रिन्सिपॉल, अध्यक्ष, प्रिन्सिपॉल आर. पी. परांजपे, उपाध्यक्ष, रा. बी. एस. कामत, कॅ. एच. सी. स्टीव्ह, दि. ब. व्ही. एम. समर्थ, रा. एम. डी. लोटलीकर, (सेक्रेटरी, पुणें प्रा. समाज) खजिनदार, रा. ए. के. मुदलियार, सेक्रेटरी.

शिक्षणाखेरीज इतर कामें झालीं त्यांत शिमग्यांतील ओंगळ प्रकार बंद व्हावेत म्हणून ठिकठिकाणीं जाहीर सभा भरून प्रयत्‍न करण्यांत आले.  त्यांत प्रसिद्ध समाजसेवक श्री. गोपाळ कृष्ण देवधर ह्यांनीं प्रमुख भाग घेतला.  ह्या प्रकाराविरुद्ध प्रचारार्थ कांहीं गाणीं श्री. मुदलीयादर यांची कन्या कु. ठकूताई हिनें केलीं होतीं.

पहिला बक्षिससमारंभ  :  २६ सप्टें. १९०९ रोजीं श्रीमंत महाराज सर सयाजीराव यांच्या हस्तें आणि अध्यक्षत्वाखालीं हा समारंभ मोठ्या थाटानें पार पडला.  इडारचे अधिपति श्रीमंत प्रतापसिंग, लेडी म्यूर मॅकेंझी, भोरचे अधिपति रावसाहेब, नामदार गोखले, डॉ. भांडारकर, सरदार नौरोजी पदमजी वगैरे थोर मंडळी प्रमुख स्थानीं बसली होती.  इस्लामिया स्कूल हॉलमध्यें चिक्कार गर्दी भरली होती.  कमिटीचे अध्यक्ष डॉ. मॅन यांनीं पाहुण्यांचें स्वागत केलें.  ह्या वेळीं एक वादग्रस्त प्रश्न उद्‍भवला.  महार जातीचे पुढारी शिवराम जानबा कांबळे यांचे नेतृत्वाखालीं एक मानपत्र महाराजांना देण्याचा विचार ठरला; पण हें मानपत्र महार जातीकडूनच जावें असा त्यांचा आग्रह पडला.  इतर अस्पृश्य जातींनाही त्यांत भाग घ्यावासा वाटला.  हा वाद लवकर मिटेना आणि समारंभाचा तर दिवस आला, म्हणून मला मुंबईहून बोलावण्यांत आलें.  सर्व वर्गांच्या पुढार्‍यांना बोलावून त्यांना मीं सांगितलें कीं, ''मिशनचें रजिस्टर्ड ट्रस्टडीड आहे.  त्याबरहुकूम मिशनलाच अशा प्रकारचा जातिविशिष्ट काम करण्याचा अधिकार नाहीं.  मिशनचे कार्यामध्यें जीं वरिष्ठवर्गीय माणसें आहेत तीं सर्व जातींचीं व धर्मांचीं आहेत; पण त्यांनाही सार्वत्रिक उदार धर्माच्या पायावरच मिशनचें कार्य करावें लागत आहे.  स्वतः महाराजसरकारांनाही जातिविशिष्ट मानपत्र रुचणार नाहीं.?  ह्याउप्पर महार लोकांचा आग्रहच असेल तर आणि महाराज असें मानपत्र स्वीकारीत असतील तर ह्या मंडपाचे बाहेर अन्य ठिकाणीं व अन्य वेळीं कुणींही मानपत्र द्यावें.  येथेंच आणि आतांच द्यावयाचें असेल सर्व अस्पृश्यवर्गानें एकत्र होऊन द्यावें.  त्यांनीं हा एकत्रपणा दाखविला नाहीं तर त्यांच्यासाठी काम करण्यामध्यें वरिष्ठ वर्गालाही विघ्नें येऊं लागतील.''  सर्वांची समजूत पटून मिळूनमिसळून मानपत्रसमारंभ झाला.  ह्यानंतर सेक्रेटरी मुदलियार यांनीं अहवाल वाचला.  लेडी म्यूर मॅकेंझी यांचे सुंदर व जोरदार भाषण झालें.  शेवटीं महाराजांनीं यथोचित भाषण करून १००० रु. ची देणगी दिली. तो कायमनिधि समजून सयाजीराव गायकवाड स्कॉलर्शिप या नांवानें होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलर्शिप देण्याचें ठरलें.  श्रीमंत सयाजीरावमहाराजांना ह्या प्रसंगीं मानपत्र देण्यांत आल्यावर महार, माग व चांभार जातींच्या तीन बायकांनीं महाराजांना आरती ओवाळली.  तेव्हां महाराजांनीं प्रत्येक आरतींत एक एक सोन्याची गिनी टाकली.

पुण्याचा पाठिंबा  :  ता. १८ ऑक्टो. १९०९ रोजीं हा डिप्रेस्ड् क्लास मिशन डे साजरा करण्यासाठीं पुणें शहरीं किर्लोस्कर थिएटरांत एक प्रचंड जाहीर सभा भ्भरविण्यांत आली.  पुणें शहरांत अशा प्रकारची ही पहिलीच सभा होती.  मिशनला चोहींकडून जरी मदत मिळाली तरी पुण्यासारख्या जुन्या वळणाच्या शहराची अद्याप मिळावयाची होती, म्हणून हा समारंभ घडवून आणला.  प्रि.र. पु. परांजपे ह्यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें.  महारांचे पुढारी श्रीपतराव थोरात, सुप्रसिद्ध वकील ल. ब. भोपटकर, मुसलमानांचे पुढारी इस्माइल बहादूर, हंपी येथील शंकराचार्यांचे एजंट रा. हरकारे, रा. न. चिं. केळकर, प्रो. धर्मानंद कोसांबी यांनीं जोरदार भाषणें केली.  अध्यक्षांचे आभार मानतांना प्रो. धोंडो केशव कर्वे यांनीं आपली १०० रु. ची देणगी दिली.  रा. हरकारे यांनीं आपल्या भाषणाचे शेवटीं हंपीचे शंकराचार्यांचे प्रत्यक्ष सहानुभूतीचें द्योतक म्हणून त्यांचे आज्ञेनुसार ३०० रु. ची देणगी दिली.  ह्या सभेमुळें ह्या इतिहासप्रसिद्ध शहराचें हृदयकपाट उघडलें.

मुरळी-प्रतिबंधक सभा   :   २५ एप्रिल १९१० रोजीं जेजुरीच्या यात्रेंत ही सभा पुणें शाखेकडून भरविण्यांत आली.  खडकीचे लक्ष्मणराव सत्तूर, मुंबईहून मी स्वतः व स. के. नाईक ह्या सभेस मुद्दाम हजर होते.  मुरळी सोडण्याची दृष्ट चाल महाराष्ट्रांत प्रसिद्धच आहे.  मुरळी सोडण्याचा धार्मिक विधि आणि तिचा प्रसार ह्या खंडोबाचे देवळांतूनच होतो.  ही चाल बंद पाडण्यांत यावी असा ह्या सभेचा हेतु होता; पण अस्पृश्यवर्गीय जनतेला मान्य होण्यासारखा तो काळ नव्हता.  कित्येक लोक दारूनें झिंगून सभेला विरोध करूं लागले.  सभा चालविणें अशक्य झालें.  मिशनमधील भजन करणार्‍या विद्यार्थ्यांकडून गाणीं म्हणविण्यांत आलीं.  मग सभेला रंग येऊन ती यशस्वी रीतीनें पार पाडली.  पुढें जी मुरळीप्रतिबंधक चळवळ मोठ्या प्रमाणावर झाली तिचें मूळ ह्या सभेंत आहे.

मेघवृष्टीनें प्रचार  :   येथपर्यंत अंगभूत शाखांतील केंद्रीभूत कार्याचें वर्णन केलें.  आतां मेघवृष्टीनें सर्व देशभर जें कार्य झालें त्याचें कथन करतों.  हीं दोन भिन्न कार्ये समांतर आणि सारखीं चालू ठेवणें अवश्य असतें.  १९१० सालीं या कार्यांत मुंबई सोशन रिफॉर्म असोसिएशनचें सहकार्य लाभलें.  मिशनच्या संस्थापनेचा दिवस ता. १८ ऑक्टो. १९०६ हा होता.  ह्याचें स्मरण सर्व देशभर व्हावें म्हणून ठिकठिकाणीं जाहीर सभा भरवण्यांत आल्या.  त्यांचा रिपोर्ट मागवण्यांत आला त्याचें कोष्टक पुढील पानावर आहे.

वसतिगृहाची स्थापना  :  भगिनी जनाबाई ह्या ३ नोव्हेंबर १९१२ रोजीं वर्‍हाडांत हिंडून तेथील परिस्थिति पाहून फंड जमविण्यासाठीं दौर्‍यावर निघाल्या.  अमरावती, यवतमाळ, यूगांव, रामसौर, खामगांव, मलकापूर, धुळें वगैरे ठिकाणीं फंड जमवून त्या मुंबईस परत आल्या.  खर्च वजा जाऊन त्यांनीं सुमारें ६०० रु. फंड जमवला होता.  त्यानंतर मी स्वतः पुन्हां अमरावती, यवतमाळ येथें जाऊन व्याख्यानें देऊन यवतमाळ येथें एक अस्पृश्यवसतिगृह काढण्याची तयारी करून आलों.  यवतमाळचे रा. ब. मुंबुले वकील, जमीनदार लांडगे, जिनिंग फॅक्टरीचे द्रवीड यांचे साहाय्यानें तेथें एक बोर्डिंग स्थापण्यांत आलें.  त्याची व्यवस्था भगिनी जनाबाई यांच्याकडे सोंपवून त्यांना तिकडे पाठविण्यांत आलें.  कोल्हापूरचे रा. जी. के. कदम, वकील ह्यांनाही त्यांच्या मदतीस देण्यांत आलें होतें.

चंदावरकर यांचा दौरा  :  १९१४ च्या डिसें. पासून १९१५ च्या एप्रिलअखेर निराश्रित साहाय्यकारी मंडळीचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांनीं सदर मंडळीचे कार्यांत प्रत्यक्ष हातभार लावण्यासाठीं दक्षिण हिंदुस्थानांत विस्तृत दौरा काढला.  मद्रासच्या डी. सी. एम. च्या शाखेनें अखिल भारतीय मिशनच्या वतीने डिसेंबर १९११ सालीं ऍंडरसन हॉलमध्यें परिषद भरविली.  तिचें अध्यक्षस्थान चंदावरकरांनीं पत्करलें.  पुढें त्याच महिन्यांत मद्रासचे गव्हर्नरांचे अध्यक्षतेखालीं एक मोठी जाहीर सभा भरविण्यांत आली.  त्या वेळीं सर नारायण चंदावरकरांनीं भाषण करून मिशनच्या मुंबईकडील कार्यासंबंधीं माहिती कळविली.  गव्हर्नरसाहेबांनीं मिशनच्या कार्याचा गौरव करून मदतीचें आश्वासन दिलें.  त्यानंतर सर नारायणराव कोईमतूर, पालघाट, तेलीचेरी इत्यादि ठिकाणीं हिंडले व गोरगरिबांत मिसळून त्यांनीं त्यांची स्थिति बारकाईनें निरखिली.  परत आल्यावर आपल्या निरीक्षणासंबंधींचीं पत्रें त्यांनीं टाइम्स ऑफ इंडिया व सोशन रिफॉर्मरमध्यें प्रसिद्ध केलीं.  मंगळूरचे के. रंगराव, पालघाटचे श्री. शेषय्या आणि वल्लभराजा, कालिकतचे मि. रामण्णी, मि. मोमन् मि. मंजरी रामय्या, तेलीचेरीचे मि. केळू वगैरे कार्यकर्तांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांनीं त्यांना उत्तेजन दिलें.  ही सर्व उत्साही मंडळी जरी थोडी असली तरी त्यांच्या कार्याचें महत्त्व फार होतें.  ह्या दौर्‍याचा परिणाम दक्षिणेकडील कार्यांत फार मोठा झाला.

तक्ता  पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.

वेड्यांचें इस्पितळ  :  अस्पृश्यांनीं ठराविक रस्त्यावरून चालावयाचें नाहीं व इतर रस्त्यांवरून चालतांना आपल्या जातीचा पुकारा करीत चालावयाचें, हा प्रकार मलबारवांचून इतर कोणत्याही प्रांतांत नाहीं.  मलबारांत जातीजातीच्या सूक्ष्म भेदांचें अवडंबर फार असून कडक नियम पाळण्यांत येतात.  हें पाहून स्वामी विवेकानंदांनीं मलबार हें एक वेड्यांचें इस्पितळ आहे, असें म्हटलें आहे.  अस्पृश्यांस भीक मागण्याचीही परवानगी नाहीं, प्रामाणिकपणें काम करण्याची मुभा नाहीं, याबद्दल सर नारायणरावांनीं कडक टीका करून त्यांना उद्योग करण्याची तरी परवानगी देण्यांत यावी, अशी करुणा भाकली.  मलबारांत नायादी म्हणून नीचतम मानलेली एक जात आहे.  या लोकांशीं सर नारायणरावांनीं भाषण केलें.  त्यांच्या भाषणांत 'वैराग्य' सारखे पुष्कळ शब्द आलेले पाहून सर नारायणरावांस फार आश्चर्य वाटले.  नीचांतला नीच, अक्षरशत्रु, चांभारापासूनही शंभर चार्ड दूर राहावें हा त्याचा अधिकार.  आपली अस्पृश्यता पुकारीत भीत भीत जो गांवांत येतो त्यांच्या तोंडीं इतके संस्कृत शब्द !  त्यांचीं नांवें उच्चवर्णीयांसारखीं हें कसें, ह्याचें सर नारायण ह्यांस फार आश्चर्य वाटलें.  चौकशीअंतीं त्यांस असें कळून आलें कीं, नायादी लोकांचें मूळ नंबुद्री ब्राह्मणापर्यंत पोंचतें !  कांहीं नंबुद्री ब्राह्मण कुटुंबाचे हातून कांहीं प्रमाद घडले, म्हणून त्यांस बहिष्कृत करण्यांत आलें.  त्यांचें पतन होत होत त्यांस आज नायादी जातीची स्थिति प्राप्‍त झाली.  सर नारायण ह्यांनीं मलबारांत केलेला प्रवास अस्पृश्योद्धाराचे बाबतींत बराच जागृतीस कारण झाला.

माझ्या खोड्या

आग्रहीपणा :  दंगा, मारामारी आणि स्वैर खेळ हे बालपणाचे जन्मसिद्ध हक्क होत आणि ते मी माझ्या परीनें-आमचे बाबांचा आम्हांवर कितीही दाब असो- बजावयाला कांहीं कमी केलें नाहीं.  अगदीं लहानपणीं मी शेजारच्या मुलांना मारून आईकडे कागाळ्या आणीत असें,  हें मला अद्यापि आठवतें.  आमचे आजोबा असतांना आमच्या वाड्यांच्या बाहेरच्या पटांगणांत कांहीं भाडोत्री कुळें राहात असत.  त्यांत पाटोळे नांवाचें एक गरीब कूळ असे.  त्यांचा रामू नांवाचा एक माझ्याच वयाचा लहान मुलगा असे.  सहज खेळतां खेळतां मीं त्याच्या डोक्यावर हात ठेवण्याचा हट्ट घेतला; पण हात ठेवूं न देण्याचा त्यानेंही हट्ट घेतला.  कारण हट्ट करणें हा दोघांचाही सारखाच जन्मसिद्ध हक्क होता ना !  शेवटीं आम्हां लहानग्यांची मारामारी झाली.  रामू आपल्या आईकडे रडत गेला. तरी मी त्याच्या मागें लागलोंच होतों.  शेवटीं ह्या खटल्याचें अपील आमचे आईकडे आलें.  कारण रामूची आई माझ्या आईची मोठी मैत्रीण होती.  आईनें हा खटला साहजिकच आजोबांकडे वर्ग केला.  आजोबांनीं आम्हां दोघां हेकेखोरांना आपल्या समोर घेतलें आणि दोघांना खाऊ देऊं केला; पण खाऊपेक्षां मला दावेदाराचे डोक्यावर हात ठेवण्यांतच जास्ती ईर्षा वाटत होती.  रामू खाऊला कबूल झाला आणि मीं त्याच्या डोक्यावर हात ठेविला.  खटल्याचा निकाल लागला.  बरा म्हणा वाईट म्हणा हा आग्रहीपणा माझ्यांत केव्हां केव्हां चमकतो !

गांवढळ खोड :  म्हातारबा सुतार म्हणून माझ्या वडिलांचे एक मित्र असत.  त्यांचीं दोन मुलें रामू आणि कृष्णा हीं अनुक्रमें माझ्या आणि माझ्या वडील भावाच्या वयाचीं असत.  मी मराठी शाळेंत असतांना आमची चौघांची फार गट्टी असे.  एकदां आम्ही चौघे एकीकडे व दुसर्‍या आळींतील मुलें दुसरीकडे, ह्यांची आमच्या घराच्या पश्चिमेस असलेल्या तळ्यांत एक मोठी मारामारी झालेली आठवते.  तळ्यांत पाणी नसे.  त्यांत खेळण्यास विस्तीर्ण जागा असे; पण एकदां रामूची आणि माझीच मारामारी जुंपून आम्ही दोघेही आमच्या आळींतील मोठ्या रस्त्यांत भलीं मोठी खोल गटारें होतीं त्यांत घाणींत पडलों.  रामूच्या आईनें आम्हांला दोघांना धुतलें, पुसलें, खडे व कांटे रुतले होते ते काढले.  माझ्यापेक्षां रामूला जरी मार जास्त लागला होता, तरी त्याच्या आईनें माझेंच कौतुक करून मला आईकडे पाठविलें.

विहिरीच्या जुन्या भिंतीवर एक प्रकारची बारीक लव्हाळ्याप्रमाणें वनस्पति चिकटून वाढत असे.  ती वाळल्यावर आम्ही काढून आणीत असूं.  ती प्रतिपक्षाच्या मानेला न कळत फासल्यावर तेथें आग सुटे.  हा खरोखर आमचा दुष्टपणा आणि भ्याडपणाही खरा; पण म्हणतात ना, प्रेमांत आणि युद्धांत सगळेंच कांहीं शोभतें.  मग त्याला आम्हीच कसे अपवाद ?  शिमगा आला म्हणजे ह्या बालयुद्धाला नवीन जोम येई.  पण जसजसा मी वरच्या वर्गांत जाऊन ब्राह्मणांच्या मुलांना हाताशीं घेऊं लागलों तसतसा हा गांवढळपणा कमी झाला.  तरी माझ्या कांहीं वैयक्तिक खोड्यां चालूच होत्या.

रामतीर्थ  :  जमखंडीच्या पश्चिमेस रामतीर्थ म्हणून एक रम्य ठिकाण आहे.  तेथें दर श्रावणी सोमवारीं जत्रा भरत असे.  इ.स. १८५७ सालच्या बंडानंतर जमखंडीचे यजमान श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन ह्यांनीं ह्या ठिकाणींच आपली वस्ती मांडली.  पूर्वी येथें रामेश्वराचें एक जुनें रम्य देऊळ होतें.  पुढें २५।३० वर्षांत येथें विस्तीर्ण राजधानीचें स्थान झालें.  पश्चिमेस डोंगराखालीं कडपट्टी म्हणून एक लहान खेडेगांव आहे.  तेथें बसवण्णाचें पुरातन प्रसिद्ध लिंगायत देवालय आहे.  येथें मोठी यात्रा भरत असे.  अप्पासाहेबांनीं रामतीर्थ लोकप्रिय करण्यासाठीं ही यात्रा वर डोंगरांत आपल्या राहण्याच्या जागीं कांहीं वर्षे नेली.  रामतीर्थास जाण्याला एक वरची डोंगराची व दुसरी खालची सपाट-गाड्यां वगैरे जाण्याची-अशा दोन वाटा असत.  ह्या दोन्ही वाटा सोडून अगदीं डोंगराच्या माथ्यावरून मेलगिरी लिंगाप्पाच्या देवळामागून रामेश्वराच्या देवळाला जाण्याची मीं नवीन टूम काढली.  ह्याचें कारण पावसाळ्यांत डोंगरावरची व भोंवतालच्या दूरवर मैदानी प्रदेशांतील शोभा फार सुंदर दिसे.

विंचवांशीं खेळ  :   ह्या डोंगरावर विंचू फार असत.  ते भले मोठे काळे तांबडे असत.  काळ्या विंचवाला इंगळी म्हणतात.  ती चावली कीं प्राणान्तच  !  हे विंचू धरून त्यांची एक मोठी माळ करण्याची आम्हांला खोड लागली.  दगड उचलला कीं, खालीं विंचू आढळावयाचाच.  मी तर विंचू धरण्यांत मोठा धीट व पटाईत झालों.  पुढें पुढें विंचवाच्या नांगींतलें विष काढून त्याला अगदीं तळहातांत घेऊन मी इतर मुलांना चकीत करीत असें.  विंचू नजरेस पडला कीं, तो आपली नांगी आधीं वर करतो.  ती मी मोठ्या शिताफीनें चिमटींत घट्ट पकडीत असें.  मग नखावर त्याच्या नांगीचें टोंक घासलें म्हणजे त्यांतून विषाचा एक लहानसा बिंदु बाहेर निघे.  तो पुसून टाकला कीं, विंचवाचें सर्व तेजच नाहीसें होई.  तो आपोआपच नांगी खालीं टाकी.  मग त्याला कोणीही खुशाल हातावर घ्यावें.  पण निस्तेज विंचवालाही हातांत घेण्याचें धैर्य कोणास होत नसे.  मग माझ्या फुशारकीला कोठली सीमा उरणार !  घरांत किंवा आमच्या शाळेंत एखादा मोठा विंचू निघाला कीं मुलें मजकडे येत.  मी चटकन तो धरून त्याचें विष काढून हातावर घेई.  अशा गडबडींत एखादे वेळीं चुकून मला विंचू चावतही असे; पण अभिमानास पेटून त्या वेदना मी मुकाट्यानें सहन करीत असें.  कोण हा अर्कटपणा !

सहिष्णुता  :  दुखणें आलें किंवा जबर इजा झाली तर इतरांप्रमाणें मी विव्हळत नसें; स्वस्थ घुमेपणानें पडें.  ''विठ्या, काय तूं बेरड आहेस रे !''  असें आई म्हणे.  तिकडे माझें लक्षच नसे.  ही स्पार्टन सहिष्णुता माझ्यांत जन्मतः नसून ती माझ्या मानीपणानें मीं आणली होती.  शिक्षकांनीं छडी मारली कीं, साधारण मुलें मोठ्यानें किंकाळी फोडीत.  इंग्रजी शाळेंत गेल्यावर मला तर शिक्षकाच्या हातून मार खाण्याची कधीं अपवादादाखलही पाळी आली नाहीं.  सहनशीलपणा वाढवावा म्हणून मी शिक्षक नसतांना त्यांची छडी घेऊन एखाद्या मुलाच्या हातांत देई आणि माझ्या तळहातावर व मनगटावर जोरानें मारण्यास सांगें.  किती मारलें तरी मी हात खालीं घेत नसें.  हात हिरवा-निळा झालेला लपवून ठेवण्याचा जो त्रास होई तेवढाच काय तो !

इंग्रजी सहाव्या किंवा सातव्या इयत्तेंत असतांना घडलेली एक गोष्ट.  आमचें नेहमींचें मित्रवलय बसलें होतें.  मी दुःख किती सहन करतों, तें पाहण्यासाठीं व्यंकू कुलकर्णी ह्यानें एक जळती उदकाडी माझ्या उजव्या हाताच्या पंजाच्या मागील भागावर ठेवली.  ती एकदम न ठेवतां हळूच जवळ आणतां आणतां लावली.  उद्देश हा कीं, पहिला चटका लावल्याबरोबर मी कचरतों कीं काय हें पाहावें.  माझ्या तोंडांतून एखादा शब्द किंवा डोळ्यांवरून कसलेंही चिन्ह दिसलें कीं मी हरलों असें समजावयाचें ठरलें होतें.  शेवटीं जळती उदकाडी बराच वेळ ठेवली तरी हूं का चूं नाहीं.  उदकाडीच विझूं लागली.  उतक्यांत माझ्या आईनें अकस्मात् येऊन तें पाहिलें.  ती खूप रागें भरली !  माझ्या उजव्या हाताचे मागें तो लहानसा व्रण अद्यापि स्पष्ट दिसत आहे.  ह्या अर्वाच्यपणास काय म्हणावें !

विक्षिप्‍तपणा :  विक्षिप्‍तपणाचें धाडस माझ्या स्वभावांतच उपजत पेरलेलें दिसतें. कारण कॉलेजांत गेल्यावरही बर्‍याच वेळां मी चमत्कारिक वागलों आहें.  पन्हाळगड-विशाळगडची सफर मीं फर्ग्युसन कॉलेजांत असतांना केली.  तेव्हां किल्ल्याच्या अवघड जागीं चढून जाऊन बसणें मला आवडावयाचें.  इंग्लंडांत असतांना इंग्लिश लेक्समध्यें मी एकदां डॉ. कारपेंटर-आमच्या मँचेस्टर कॉलेजचे प्रिन्सिपाल-ह्यांचा पाहुणा होतों.  बरोबर कॉलेजमधील ७।८ सहाध्यायी होते.  एके दिवशीं ठरलें कीं, सूर्योदय पाहाण्याला रात्रीं उठून एका डोंगराच्या शिखरावर जावयाचें.  सूर्योदयापूर्वी तेथें पोंचण्यासाठीं भल्या पहाटे उठून मी निघालों.  डोंगरांत कांहींशी वाट उंच गेल्यावर मोठा पाऊस आला.  रात्र अंधारी होती.  सगळी मंडळी परतली; पण मला परतावेंसें वाटेना.  मी एकटाच तसा पुढें चाललों.  पाऊस थांबेना.  वाट दिसेना.  मुलूख अगदींच अपरिचित.  बरोबर कोणीच नाहीं.  शेवटीं जवळच एक लहानशी गुहा लागली.  तींत शिरून मीं पावसापासून आश्रय घेतला.  सुदैवानें जवळ काड्यांची पेटी होती. काडी ओढून पाहतां गुहा फार लहान होती, असें दिसलें.  उजाडेपर्यंत रात्र तेथेंच काढावी लागली.  सकाळीं उठून एकटाच भुतासारखा घरीं आलों.  मिसेस कारपेंटर चिंतेंत बसल्या होत्या.  हें माझें करणें त्यांना फार धाडसाचें वाटलें; पण मला त्यांत कांहीं विशेष वाटलें नाहीं.  

ह्याच वेळीं डॉ. कारपेंटर आणि आम्ही सर्व मंडळी इंग्लिश लेक्स् डिस्ट्रिक्ट (सरोवर प्रातीं) मध्यें वजभोजनास गेलों असतांना डोंगरांत एका रम्य जंगली ठिकाणीं फराळास उतरलों.  जो तो स्वच्छंदानें हिंडूंफिरूं लागला.  मला एक उंच झाड दिसलें.  त्यावर चढण्याची मला हुक्की आली !  लागलीच मी चढलोंही; पण उतरतां येईना.  कारण पायांत बूट घालून मी कसा तरी वर चढलों, पण उतरतांना बुटांसह पाय घसरूं लागले.  बूट नसते तर उतरणें सोपें होतें; पण मंडळींत बूट काढणेंही बरें नव्हतें.  लागलों घुटमळायला.  अखेर एका फांदीच्या शेवटीं जाऊन ती वांकवून मीं खालीं उडी घेतली.  त्या वेळीं तर मिसेस कारपेंटरनीं किंकाळीच फोडली.  पुन्हां असल्या चेष्टा करूं नकोस, म्हणून त्यांनीं मला गंभीरपणानें बजावलें.  स्कॉटलंडांतील सरोवर प्रांतांत तर मी एकटाच रोज २०।२५ मैल सरोवरावरून बोटींतून जाई आणि उंच डोंगराच्या अगदीं शिखरावर एकटाच तासन तास जाऊन बसें.  भीति वाटत नसे.  भिण्यासारखें कांहीं नव्हतेंही.  हॉटेलांत श्रीमंती चोंचले करणार्‍या मंडळींत न मिसळतां कोठें तरी अगदीं एकान्तवासांतील गरिबाच्या झोंपडींत मी उतरत असें.  सॅवरडेनॉन नांवाच्या खेड्यांत एका गरीब कुटुंबांत मी उतरलों होतों.  तेथील लहान मुलांना घेऊन मी लॉक लोमंड सरोवरावर एकदां फिरत होतों.  मनांत आलें कीं पोहावें.  कपडे काढून घेतली उडी !  जरी उन्हाळा होता तरी सरोवराचें पाणी इतकें थंड होतेकीं, मी पडल्याबरोबर गारठलों.  अंगाची मूठ वळावयाला लागली.  पायाला गोळे येऊं लागले.  मग पोहतों कसचा !  मोठ्या प्रयासानें मी कांठला लागलों.  लहान मुलें घाबरून गेलीं.  हा जिवावरचा प्रसंग गुदरला !

शर्यत  :  मी मराठी शाळेंत असतांना १०।१२ वर्षांचा होईपर्यंत तर फारच उतावळा, चळवळ्या व खोडकर होतों; पण माझा वडील भाऊ नेहमीं पाठीराखा असे.  म्हणूनच बाहेर गेलेला मी सुरक्षित घरीं येत असें.  एरवीं आईला मोठी काळजीच असे.  चैत्र महिन्यांत रामतीर्थांत श्रीमंत अप्पासाहेब गुरांचें जंगी प्रदर्शन करीत.  त्या वेळीं मोठमोठ्या शक्तिवान् बैलांची ओझ्यानें भरलेल्या गाड्यां ओढण्याची शर्यत होत असे.  ती पाहण्यास गांवोगांवच्या लोकांची मोठी गर्दी जमे.  एकदां ही शर्यत पाहण्यासाठीं मी आणि माझा भाऊ गेलों होतों.  गर्दीत आम्हां मुलांस कसें दिसणार ?  म्हणून आम्ही एका मोठ्या झाडावर चढलों; पण त्या झाडावर अगोदरच पुष्कळ माणसें चढून पाहात होतीं.  त्या झाडाच्या एका मोठ्या उंच आणि लांब फांदीवर इतकीं माणसें गर्दी करून बसलीं कीं, शेवटीं भार सहन न होऊन ती सबंध फांदी माणसांसह तुटून खालीं पडली.  खालीं देखील माणसांची गर्दीच होती.  त्यामुळें मोठा हाहाःकार झाला.  मीही उंचीवरून खालीं पडलों.  गर्दीत पडलों म्हणून हातपाय मोडले नाहींत; पण विलक्षण ओरखडलें होतें.  इतक्यांत पोलिसांची धराधरी चालली.  मग मी जीव घेऊन पळत सुटलों.  माझें लग्नांतलें मोठें लांब लाल पागोटें झाडाच्या फांदींत अडकलेलें व लग्नांतला लांब चिटाचा अंगरखा फाटलेला.  शिवाय धोतर पायांत अडकत होतें.  पोलीस तर धरावयास जवळ आलेला.  अहाहा !  काय तो प्रसंग !  पण सर्वांना चुकवून पगोटेंही झटकन ओढून घेऊन शेंडी सावरीत मीं जी धूम ठोकली ती दीड मैल मागें न पाहतां घरापर्यंत मजल गांठली; पण मरण अद्यापि पुढेंच होतें.  घरी बाबांनीं फाटके कपडे पाहिल्यावर काय दशा होईल ती आठवून पोलिसपेक्षांही ह्या नवीन धास्तीनें काळीज धडधडूं लागलें.  घरीं प्रवेश करण्याची छाती कांहीं होईना.  बाबा आहेत काय, कोठें बसले आहेत ह्याचा कानोसा वाकून पाहून घेतल्यावर चोराप्रमाणें मी आंत शिरलों.  बाबा घरीं नाहींत हें पाहून हायसें वाटलें व सर्व श्रमांचा परिहार झाला !

विशेष करामत :  शिमग्यांत एकदां अशीच खोड मोडली.  शिमग्याचे दिवसांत चांदण्या रात्रीं, बाबांचा डोळा चुकवून उनाडक्या करीत आम्ही फिरत असूं.  विशेष करामत म्हणजे वेश्यांच्या आळींत बदफैली लोकांच्या नांवानें शिमग्यांतल्या अचकट-विचकट म्हणी म्हणत, अभद्र ध्वनि काढीत मध्यरात्र उलटून जाईपर्यंत हिंडावयाचें आणि पुन्हां धुळवडीच्या सकाळीं भुताटकी करावयाची, ती निराळीच !  एकदां मी कांहीं मुलांबरोबर एका वेश्येच्या घराजवळ वाईट गाणीं म्हणत बोंबलत गेलों.  मुलांच्या नादीं लागून तिच्या दाराशीं मी दंगामस्ती करूं लागलों.  आंतून बाळा काणे नांवाचा एक तरुण ब्राह्मण त्रासून आला व त्यानें मलाच पकडलें.  त्याच शिक्षकानें मला शाळेंत घालण्याचा प्रथम मुहुर्त करण्याचा धडा घालून दिला, असें मागें सांगितलेंच आहे.  तो फार रागीट व दांडगा होता.  उभ्या वर्गांत तो मुलांना मारूं लागला तर एकाच हातानें न मारतां दोन्ही हातांनीं गुराला मारल्याप्रमाणें झोडपीत सुटे.  ही त्याची मारकट प्रसिद्धि मला माहीत होती.  अशा यमाच्या हातीं सांपडल्यानें माझी गाळण उडाली.  त्यानें संतापून माझें डोकें धरलें होतें.  त्याच्या हातांत माझा रुमालच ठेवून मी खालीं झुकांडी देऊन निसटलों व सूंबाल्या केला.  बाळा काण्यांच्या हातून सुटलों, पण रुमालाशिवाय घरांत बाबांपुढें कसें जाणार !  शेवटीं माझा वडील भाऊ काण्यांकडे गेला.  मी रामजीबोवांचा मुलगा असें कळल्यावर त्या यमाचीच उलट गाळण उडाली.  रुमाल परत देऊन झालेली गोष्ट बाबांना कळवूं नको, अशी उलट माझ्या भावाचीच तो गयावया करूं लागला.  अशानें हा प्रसंग टळला !  मी मोठा झाल्यावर शिमग्यांतले अनाचार व अत्याचार बंद करण्यासाठीं होलिकासंमेलनाची महाराष्ट्रभर मोठी चळवळ केली.  तींत बरेंच यशही आलें,  मुंबईत ह्या कार्याचा आद्य व मुख्य प्रवर्तक मीच हें सर्व खरें; पण बाळपणाच्या माझ्या लीलांची वाट काय ?  मोठेपणीं होलिकासंमेलनांत साळसूदपणें लंबीं व्याख्यानें देतांना मध्येंच एखादे वेळीं बाळा काणे आठवल्याबरोबर माझी बोबडीच वळे.  एवढ्या प्रसिद्ध वक्त्याच्या तोंडाला मध्येंच कां खीळ पडली असें श्रोत्यांस वाटे; पण अंदरकी बात राम जाणे !

माझ्या एकान्त सहली

एकान्तांतील सहली  :   जमखंडी हा गांव तिन्ही बाजूंनीं डोंगराच्या बगलेंत आहे.  विशेषतः दक्षिणेस मुधोळ संस्थानच्या वाटेवर तर एक सुंदर लांब दरी आहे.  तिच्यांत कट्टेगिरी नांवाचा दुसरा एक विस्तीर्ण तलाव आहे.  पावसाळ्यांत हा भरून वाहूं लागला, म्हणजे त्या सर्व प्रदेशास सुंदर वन्य शोभा येत असे.  मी जरी नेहमीं माझ्या सवंगड्यांच्या घेर्‍यांत अडकलेला दिसें, तरी एखाद्या दरींतून, डोंगराच्या माथ्यावरून, पूर्व व उत्तर या बाजूनें पिकलेल्या शेतांतून किंवा जमखंडींतील मोतीबागेंतून एकटेंच हिंडणें मला फार आवडत असे.  जमखंडीचे उत्तरेस ४-४॥ मैलांवर कृष्णेचें भव्य पात्र आहे.  तें माझ्या नित्याच्या आटोक्याच्या बाहेरचें असे; पण तेथेंही केव्हां केव्हां मी माझी गोपाळमंडळी घेऊन जात असें.  माझ्या हृदयाचा परिपोष माझ्या एकान्तांतील सहलींमुळेंच विशेष झाला.  निर्जन डोंगरांतून व दरींतून हिंडत असतांना मीं वाचलेल्या कादंबरींतला नायक मीच बनत असें.  मात्र नायिक नसल्यामुळें माझा विप्रलंभ शृंगार लंगडालुळा पडत असे.  जमखंडींत वसंत ॠतूंत कांहीं आंबरायांना मोहोर येऊन झाडावरच्या कोकिळा मदोन्मत होत !  उन्हाळा तेथें कडक भासे.  सायंकाळच्या क्लांत समयीं मीं मोतीबागेंतल्या कारंज्याजवळच्या बकुळीच्या झाडाखालीं बकुळीच्या मधुर सुगंधाच्या फुलांच्या माळा विणीत बसलों असतां --

कारंजाचे तुषार वाटति अग्निकणांचे परी,
पुष्पांचा तो सुगंध माझ्या शूळ निपजवी शिरीं
कोकिळकूजित ऐकुनि वाटे वीज कडाडे वरी

वगैरे संगीत सौभद्र नाटकांतून ऐकलेल्या पीडा मलाच होऊं लागत !  पण सुभद्रेचा मागमूस कोठेंच नसे !  सुभद्रा खोटी असली तरी सृष्टिदेवीचे हावभाव नजरेपुढें खरेच असत.  मोठा झाल्यावर कालिदास, बाणभट्ट आणि त्याहीपुढें वर्डस्वर्थ आणि स्कॉटस् ह्या कवींनीं व कादंबरीकारांनीं जें दिव्यामृत पाहिलें त्याचेंच बाळकडू मला ह्या ओबडधोबड कादंबर्‍यांनीं व नाटकांनीं पोरवयांतच पाजिलें होतें.  मग त्यांचा मी आभारी कां असूं नये ?

पहिला ठसा :  पण सर्वांच्याही पूर्वी मला हृदयदान दिलें.  तें माझ्या पवित्र आईनेंच !  तिच्याच पुण्यप्रभावानें मला सर्व जडरसांतून तारण मिळून माझ्या हृदयाचा परिपाक प्रथम धर्माच्या भक्तिरसांत व नंतर तत्त्वज्ञानाच्या शांत रसात झाला.  माझ्या वेळच्या मराठी पांचवया क्रमिक पुस्तकांत 'सहल करून येणें' हा एक धडा होता.  तो मला फार आवडत असे.  त्या आवडीचे साक्षात्कार माझ्या स्वतःच्या सहलींत मला घडत.  पण ह्या सगळ्याची पूर्वतयारी माझ्या आईच्या रानावनाच्या गोड गोष्टींत आणि बाबांच्या प्रेमळ सहवासांतच झाली.  पुढें कादंबर्‍यांनीं आणि पौराणिक पोथ्यांनीं जी काय भर टाकली असेली ती केवळ शब्दसंपत्तीची आणि जड रसांचीच होय.  दैवी कोमल भावनांचा पहिला ठसा माझ्या आईचाच  !

वनभोजन :  वर्षांतून निदान एकदां तरी- विशेषतः पावसाळ्याच्या अखेरीस बाबा आम्हां सर्वांना घेऊन कोठें तरी वनभोजनाला जात असत.  जमखंडी गांवाला (आमचे वाड्यांला) लागून पश्चिमेला एक डोंगर आहे.  हा जवळ जवळ ७००-८०० फूट तरी उंच असावा.  ह्याच्या अत्यंत उंच शिखरावर एक लहानसें शिवालय आहे.  त्याचें कानडींत नांव मेलगिरी लिंगाप्पा (उंच गिरीवरचा लिंग) आहे.  येथून जमखंडी गांवचाच नव्हे, तर आसमंतांतील निदान २०।२५ मैलांचा देखावा पावसाळ्यांत सुंदर दिसतो.  देऊळ उंच चबुतर्‍यावर बांधलेलें आहे.  त्याचे मागें एका खडकांतील गुहेंतून निर्मळ पाण्याचा झरा पावसाळ्यांत वाहतो.  एरवीं रुक्ष असलेला हा उंच डोंगर पावसाळ्यांत हिरवागार दिसतो.  हें उंच आणि एकान्त ठिकाण बाबांना पसंत असे.  आमच्या घरच्या सर्व मंडळींना व आपल्या एकादोघा जिवलग मित्रांनाही बरोबर घेतल्याशिवाय त्यांना वनभोजन यथासांग झालेसें वाटत नसे.  ह्या कल्पनेंत आईची त्यांना पूर्ण सहानुभूति व साह्य असे.  बहुतेक सगळा दिवस आमचा मोठ्या आनंदाचा जाई.  ही रसिकता बाबांमध्यें कोठून आली ह्याचें मला आतां आश्चर्य वाटतें.  ह्यामुळें मजमध्यें सृष्टिशोभेची रुचि व अवलोकनशक्तीचीं बीजें रुजलीं आणि माझ्या ग्रहणशील मनावर चांगला परिणाम झाला.

माझें वाचन

खाजगी वाचन  :  आधुनिक विद्यार्थ्यांच्या मनाची वाढ शाळेबाहेरच्या वाचनावर अवलंबून आहे.  आधुनिक शिक्षणाला विद्यार्थ्यांच्या खाजगी वाचनाची जोड मिळाल्याशिवाय तें सर्व निरुपयोगी ठरतें, हें आतां सर्वमान्य तत्त्व झालें आहे; पण माझ्या हायस्कुलच्या काळांत हें तत्त्व आमच्या शिक्षकांना नुसतें माहीतही नव्हतें, मग मान्यता बाजूसच राहिली.  आमची शाळा बहुतेक खेडवळ.  मग तेथें पुस्तकालय कोठून असणार ?  त्या वेळीं मराठींतील वाङ्‌मय मुळीं जर संपुष्टांत होतें, तर माझ्या वाचनाचा मुद्दा कसा निघणार ?  तरी मी इंग्रजी तिसर्‍या-चौथ्या इयत्तेंत जाईपर्यंत मराठींतल्या त्या वेळच्या अद्‍भुत कथानकाच्या व उघड शृंगाराच्या कादंबर्‍या बर्‍याच वाचल्या होत्या.  माझ्याइतक्या कादंबर्‍या त्या वेळच्या माझ्या सोबत्यांपैकीं कोणींच वाचल्या नव्हत्या.  मला अगदीं लहानपणीं तोंडी गोष्टी ऐकण्याचा फार नाद असे.  हा नाद माझ्या आईनेंच मला बाळपणीं अद्‍भुत व करुण रसांच्या गोड गोड गोष्टी सांगून लावून ठेविला होता.  पुढें घरीं कोणी आल्यागेल्याजवळ गोष्टी सांगण्याचा मी तगादा लावीत असें.  ह्या बाहेरच्या लोकांनीं मला ज्या गोष्टी सांगितल्या त्या मात्र सर्वच लहान मुलांनीं ऐकण्यासारख्या नव्हत्या.  कांहींत बीभत्सपणा उघड असे.  त्या वेळचें गांवढळ जगच तसें होतें.

कादंबरी-वाचन  :  पुढें मराठी ४।५ इयत्तेंत असतांना गुलबकावली, वेताळ-पंचविशी, बत्तीस पुतळी, शुकबहात्तरी वगैरे पुस्तकें माझ्या हातांत येऊं लागलीं.  इंग्रजी शाळेंतील खालच्या वर्गांत असतांना विचित्रपुरी, मंजुघोषा, मदनमंजरी, वसंत-कोकिला, शृंगारसुंदरी हीं आणि अशीं कित्येक पुस्तकें मी आधाशाप्रमाणें केव्हांच वाचून टाकीत असें.  हीं पुस्तकें मला कोठून मिळत ह्याचेंच मला आतां आश्चर्य वाटतें.  'इच्छा तेथें वाट सांपडते' ही इंग्रजी म्हण माझ्या अनुभवास, ह्या कादंबरी-वाचनाच्या बाबतींत त्या वेळीं फार येत असे.  पुढें पुढें ६।७ व्या इयत्तेंत गेल्यावर अरेबियन नाइट्सचें भाषांतर, नारायणराव गोदावरी, वेषधारी पंजाबी अशा प्रकारचीं पुस्तकें मिळूं लागलीं.  हरि नारायण आपटे ह्यांचीं पुस्तकें व 'करमणूक' हें पत्र मी पुण्यांत कॉलेजांत जाईपर्यंत मिळणें शक्यच नव्हतें.  किंबहुना तीं त्या वेळीं अस्तित्त्वांतच नव्हतीं.  मराठी शाळेंतील बीभत्स गोष्टी आणि इंग्रजी शाळेंतल्या उघड शृंगाराच्या घवघवीत वर्णनाच्या कादंबर्‍या यांमुळें माझ्या कोमल आणि भावनाशील मनावर कांहीं अंशीं अनिष्ट परिणाम झाला, हें मला पुढें कळून आलें.  १४।१५ व्या वर्षाच्या आंतच माझ्यांत अकालीन शृंगार रसाचा प्रादुर्भाव झाला असावा, असें मला वाटतें.

वाचनाचें वेड :  करुण शृंगार, वीर, रौद्र इत्यादि रसही समजूं लागून माझ्या बुद्धीप्रमाणेंच हृदयाचाही परिपोष होऊं लागला.  तरी पण त्या काळच्या वाङ्‌मयांतील तुटपुंजेपणामुळें मी अकालीं शृंगारमय होणें साहजिक होतें, तरी इष्ट नव्हतें.  शिमग्यांतील हुरूट मुलांच्या नादीं लागून चांदण्या रात्रीं वेश्यांचीं दारें ठोठावून बीभत्स गाणीं म्हणण्यांत जरी मला तादृक अपाय झाला नसला, तरी पुढें प्रतिष्ठितपणें वसंतकोकिला आणि मदनमंजरी असल्या तीनतीनशें पानांच्या संस्कृतपूर्ण मराठी भाषेंतल्या एकरंगी कादंबर्‍या वाचून मला अपाय झाला.  ह्याच सुमारास जमखंडीस नवीन अलल डुरर नाटकेंही येऊं लागलीं होतीं.  पुढें वरच्या इयत्तेंत गेल्यावर वाईकर संगीत मंडळीचें रत्‍नावली आणि अण्णा किर्लोस्करांचीं शाकुंतल व सौभद्र हीं नाटकें पाहण्यावर जो आळा बसला, तो कादंबर्‍या वाचण्यावर बसेना.  कारण नाटकाला तिकीट काढावें लागे; पण कादंबर्‍या फाटक्या असल्या तरी फुटक वाचावयास मिळत.  गुळास मुंगी चिकटते त्याप्रमाणें कोठून तरी शोधून आणिलेल्या कादंबरीस मी चिकटलेला दिसे.  तरी शाळेंत सगळ्या सातही इयत्तेंतून माझा नंबर पहिल्याचा दुसरा कधीं झाला नाहीं.  म्हणून माझें कादंबर्‍यांचें वेड तेव्हां कोणाच्या डोळ्यांवर आलें नाहीं.  शिवाय हेंही लक्षांत घेतलें पाहिजे कीं, माझें खाजगी वाचन केवळ फोलकट कादंबर्‍यांतच न संपता श्रीधर, मुक्तेश्वर, महिपतीसारख्या मराठी कवींच्या पौराणिक पोथ्याही मी वाचीत असें.

पोथीवाचन  :  माझ्या बाबांनीं शाळेंतील अभ्यासाविषयीं जरी माझी म्हणण्याइतकी विचारपूस केली नाहीं, तरी त्यांच्या त्या वेळच्या मताप्रमाणें जे धार्मिक लहानमोठे ग्रंथ त्यांना आढळले, त्यांचें पाठांतर मजकडून बाबा लक्षपूर्वक करून घेत असत, हें मला आता आठवतें.  त्यामुळें पुढें हायसकुलांत गेल्यावर माझ्यामध्यें आपोआप भक्तीचा उद्रेक झाला.  हायस्कुलांत जाण्यापूर्वी किंवा गेल्यावर आरंभींच्या वर्षी बाबा माझेकडून रोज आंघोळ केल्यावर जेवणापूर्वी देवीदास कवीकृत 'व्यंकटेशस्तोत्र' वाचून घेत असत.  हा लहानसा १०८ ओव्यांचा ग्रंथ अतिशय सुंदर आणि रसाळ आहे.  मी नित्य तो आवडीनें वाचीत असें.  त्यांतल्या कांहीं ओव्या माझ्या मुखोद्‍गत झाल्या होत्या.  दर शनिवारी विशेषतः श्रावणमासीं संध्याकाळीं दिवा लागल्यावर बाबा स्वतः तुळशीकट्टयावर बसत आणि माझेकडून शनिमाहात्म्य वाचून घेत.  कदाचित् साडेसातीचा फेरा आला, म्हणून शनिग्रहाच्या शांतीसाठीं त्यांनीं हे पठणश्रवण सुरू केलें असावें.  बाबांना ज्योतिषाचा नाद होता आणि त्यांचा त्यावर विश्वासही होता.  दर शुक्रवारी कसली तरी पोथी वाचवून नंतर फुटाण्याचा प्रसादर वांटण्यांत येत असे.  आपल्या वडिलांच्या श्राद्धाचे दिवशीं आणि अक्षय्यतृतियेच्या दिवशीं बाबा मजकडून गयासूर आख्यान नांवाची एक पोथी वाचून घेत असत.

धार्मिक पंथ :  बाबांच्या संग्रहीं जशा शिळाप्रेसवर छापलेल्या हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप, करवीरमामात्म्य, गुरुचरित्र वगैरे पोथ्या असत त्याप्रमाणें श्रीज्ञानेश्वरीची एक हस्तलिखित मोठी पोथी आणि तुकारामाची रूपावलि, मनचर्येचे अभंग, गौळणी वगैरे हस्तलिखित गाथांचा पुष्कळ संग्रह असे.  तसेंच दत्तसांप्रदायाचीं अष्टकें, देवींच्या आरत्या, अनुभविक साधूंचीं पदें, भजनी भारूड वगैरे कानडी किंवा मराठी पदांचा त्यांना जसजसा शोध लागे तसतसा ते आमचेकडून लिहून ठेवीत असत.  ह्यामुळें माझ्या धर्मबुद्धीच्या विकासालाच नव्हे, तर मराठी व कानडी भाषेच्या अभ्यासालाही मोठी मदत झाली !

  1. माझें बि-हाड
  2. माझें प्राथमिक शिक्षण
  3. माझे सोबती
  4. माझे बाबा
  • 35
  • 36
  • 37
  • 38
  • 39
  • 40
  • 41
  • 42
  • 43
  • 44
Page 40 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी