माझें वाचन

खाजगी वाचन  :  आधुनिक विद्यार्थ्यांच्या मनाची वाढ शाळेबाहेरच्या वाचनावर अवलंबून आहे.  आधुनिक शिक्षणाला विद्यार्थ्यांच्या खाजगी वाचनाची जोड मिळाल्याशिवाय तें सर्व निरुपयोगी ठरतें, हें आतां सर्वमान्य तत्त्व झालें आहे; पण माझ्या हायस्कुलच्या काळांत हें तत्त्व आमच्या शिक्षकांना नुसतें माहीतही नव्हतें, मग मान्यता बाजूसच राहिली.  आमची शाळा बहुतेक खेडवळ.  मग तेथें पुस्तकालय कोठून असणार ?  त्या वेळीं मराठींतील वाङ्‌मय मुळीं जर संपुष्टांत होतें, तर माझ्या वाचनाचा मुद्दा कसा निघणार ?  तरी मी इंग्रजी तिसर्‍या-चौथ्या इयत्तेंत जाईपर्यंत मराठींतल्या त्या वेळच्या अद्‍भुत कथानकाच्या व उघड शृंगाराच्या कादंबर्‍या बर्‍याच वाचल्या होत्या.  माझ्याइतक्या कादंबर्‍या त्या वेळच्या माझ्या सोबत्यांपैकीं कोणींच वाचल्या नव्हत्या.  मला अगदीं लहानपणीं तोंडी गोष्टी ऐकण्याचा फार नाद असे.  हा नाद माझ्या आईनेंच मला बाळपणीं अद्‍भुत व करुण रसांच्या गोड गोड गोष्टी सांगून लावून ठेविला होता.  पुढें घरीं कोणी आल्यागेल्याजवळ गोष्टी सांगण्याचा मी तगादा लावीत असें.  ह्या बाहेरच्या लोकांनीं मला ज्या गोष्टी सांगितल्या त्या मात्र सर्वच लहान मुलांनीं ऐकण्यासारख्या नव्हत्या.  कांहींत बीभत्सपणा उघड असे.  त्या वेळचें गांवढळ जगच तसें होतें.

कादंबरी-वाचन  :  पुढें मराठी ४।५ इयत्तेंत असतांना गुलबकावली, वेताळ-पंचविशी, बत्तीस पुतळी, शुकबहात्तरी वगैरे पुस्तकें माझ्या हातांत येऊं लागलीं.  इंग्रजी शाळेंतील खालच्या वर्गांत असतांना विचित्रपुरी, मंजुघोषा, मदनमंजरी, वसंत-कोकिला, शृंगारसुंदरी हीं आणि अशीं कित्येक पुस्तकें मी आधाशाप्रमाणें केव्हांच वाचून टाकीत असें.  हीं पुस्तकें मला कोठून मिळत ह्याचेंच मला आतां आश्चर्य वाटतें.  'इच्छा तेथें वाट सांपडते' ही इंग्रजी म्हण माझ्या अनुभवास, ह्या कादंबरी-वाचनाच्या बाबतींत त्या वेळीं फार येत असे.  पुढें पुढें ६।७ व्या इयत्तेंत गेल्यावर अरेबियन नाइट्सचें भाषांतर, नारायणराव गोदावरी, वेषधारी पंजाबी अशा प्रकारचीं पुस्तकें मिळूं लागलीं.  हरि नारायण आपटे ह्यांचीं पुस्तकें व 'करमणूक' हें पत्र मी पुण्यांत कॉलेजांत जाईपर्यंत मिळणें शक्यच नव्हतें.  किंबहुना तीं त्या वेळीं अस्तित्त्वांतच नव्हतीं.  मराठी शाळेंतील बीभत्स गोष्टी आणि इंग्रजी शाळेंतल्या उघड शृंगाराच्या घवघवीत वर्णनाच्या कादंबर्‍या यांमुळें माझ्या कोमल आणि भावनाशील मनावर कांहीं अंशीं अनिष्ट परिणाम झाला, हें मला पुढें कळून आलें.  १४।१५ व्या वर्षाच्या आंतच माझ्यांत अकालीन शृंगार रसाचा प्रादुर्भाव झाला असावा, असें मला वाटतें.

वाचनाचें वेड :  करुण शृंगार, वीर, रौद्र इत्यादि रसही समजूं लागून माझ्या बुद्धीप्रमाणेंच हृदयाचाही परिपोष होऊं लागला.  तरी पण त्या काळच्या वाङ्‌मयांतील तुटपुंजेपणामुळें मी अकालीं शृंगारमय होणें साहजिक होतें, तरी इष्ट नव्हतें.  शिमग्यांतील हुरूट मुलांच्या नादीं लागून चांदण्या रात्रीं वेश्यांचीं दारें ठोठावून बीभत्स गाणीं म्हणण्यांत जरी मला तादृक अपाय झाला नसला, तरी पुढें प्रतिष्ठितपणें वसंतकोकिला आणि मदनमंजरी असल्या तीनतीनशें पानांच्या संस्कृतपूर्ण मराठी भाषेंतल्या एकरंगी कादंबर्‍या वाचून मला अपाय झाला.  ह्याच सुमारास जमखंडीस नवीन अलल डुरर नाटकेंही येऊं लागलीं होतीं.  पुढें वरच्या इयत्तेंत गेल्यावर वाईकर संगीत मंडळीचें रत्‍नावली आणि अण्णा किर्लोस्करांचीं शाकुंतल व सौभद्र हीं नाटकें पाहण्यावर जो आळा बसला, तो कादंबर्‍या वाचण्यावर बसेना.  कारण नाटकाला तिकीट काढावें लागे; पण कादंबर्‍या फाटक्या असल्या तरी फुटक वाचावयास मिळत.  गुळास मुंगी चिकटते त्याप्रमाणें कोठून तरी शोधून आणिलेल्या कादंबरीस मी चिकटलेला दिसे.  तरी शाळेंत सगळ्या सातही इयत्तेंतून माझा नंबर पहिल्याचा दुसरा कधीं झाला नाहीं.  म्हणून माझें कादंबर्‍यांचें वेड तेव्हां कोणाच्या डोळ्यांवर आलें नाहीं.  शिवाय हेंही लक्षांत घेतलें पाहिजे कीं, माझें खाजगी वाचन केवळ फोलकट कादंबर्‍यांतच न संपता श्रीधर, मुक्तेश्वर, महिपतीसारख्या मराठी कवींच्या पौराणिक पोथ्याही मी वाचीत असें.

पोथीवाचन  :  माझ्या बाबांनीं शाळेंतील अभ्यासाविषयीं जरी माझी म्हणण्याइतकी विचारपूस केली नाहीं, तरी त्यांच्या त्या वेळच्या मताप्रमाणें जे धार्मिक लहानमोठे ग्रंथ त्यांना आढळले, त्यांचें पाठांतर मजकडून बाबा लक्षपूर्वक करून घेत असत, हें मला आता आठवतें.  त्यामुळें पुढें हायसकुलांत गेल्यावर माझ्यामध्यें आपोआप भक्तीचा उद्रेक झाला.  हायस्कुलांत जाण्यापूर्वी किंवा गेल्यावर आरंभींच्या वर्षी बाबा माझेकडून रोज आंघोळ केल्यावर जेवणापूर्वी देवीदास कवीकृत 'व्यंकटेशस्तोत्र' वाचून घेत असत.  हा लहानसा १०८ ओव्यांचा ग्रंथ अतिशय सुंदर आणि रसाळ आहे.  मी नित्य तो आवडीनें वाचीत असें.  त्यांतल्या कांहीं ओव्या माझ्या मुखोद्‍गत झाल्या होत्या.  दर शनिवारी विशेषतः श्रावणमासीं संध्याकाळीं दिवा लागल्यावर बाबा स्वतः तुळशीकट्टयावर बसत आणि माझेकडून शनिमाहात्म्य वाचून घेत.  कदाचित् साडेसातीचा फेरा आला, म्हणून शनिग्रहाच्या शांतीसाठीं त्यांनीं हे पठणश्रवण सुरू केलें असावें.  बाबांना ज्योतिषाचा नाद होता आणि त्यांचा त्यावर विश्वासही होता.  दर शुक्रवारी कसली तरी पोथी वाचवून नंतर फुटाण्याचा प्रसादर वांटण्यांत येत असे.  आपल्या वडिलांच्या श्राद्धाचे दिवशीं आणि अक्षय्यतृतियेच्या दिवशीं बाबा मजकडून गयासूर आख्यान नांवाची एक पोथी वाचून घेत असत.

धार्मिक पंथ :  बाबांच्या संग्रहीं जशा शिळाप्रेसवर छापलेल्या हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप, करवीरमामात्म्य, गुरुचरित्र वगैरे पोथ्या असत त्याप्रमाणें श्रीज्ञानेश्वरीची एक हस्तलिखित मोठी पोथी आणि तुकारामाची रूपावलि, मनचर्येचे अभंग, गौळणी वगैरे हस्तलिखित गाथांचा पुष्कळ संग्रह असे.  तसेंच दत्तसांप्रदायाचीं अष्टकें, देवींच्या आरत्या, अनुभविक साधूंचीं पदें, भजनी भारूड वगैरे कानडी किंवा मराठी पदांचा त्यांना जसजसा शोध लागे तसतसा ते आमचेकडून लिहून ठेवीत असत.  ह्यामुळें माझ्या धर्मबुद्धीच्या विकासालाच नव्हे, तर मराठी व कानडी भाषेच्या अभ्यासालाही मोठी मदत झाली !