1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

पुनर्घटना

ह्यापुढें तीन महिन्यांनीं पुणें शाखेचे नवीन नेमलेले जॉइंट सेक्रेटरीज रा. कृ. गो. पाताडे (स्पृश्य), रा. डी. व्ही. गायकवाड व रा. रा. स. घाडगे (अस्पृश्य) यांनीं पुणें शाखेचा ता. १ एप्रिल १९२१ ते ८ जुलै १९२३ पर्यंतचा सव्वादोन वर्षांचा मराठींत अहवाल प्रसिद्ध केला आहे.  त्यांत पान ६ वर खालील मजकूर आहे.

ता. २९ मार्च १९२३ रोजीं व्ही. आर. शिंदे यांनीं आपलें एक सविस्तर निवेदन ज्ञानप्रकाश व केसरी इत्यादि पत्रांतून प्रसिद्ध केलें.  थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे अस्पृश्य बंधूंना ह्या मिशनमध्यें स्वराज्याचे सर्व हक्क देऊन त्यांच्या आत्मोद्धाराची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर टाकणें हें या पुनर्घटनेचें मुख्य लक्षण आहे.  ता. २९ एप्रिल १९२३ रोजीं पुणें शाखेच्या सर्व वर्गणीदारांची साधारण सभा बोलावली.  त्या सभेनें पूर्वीच्या कमिटींत भर घालून तिजमध्यें अस्पृश्यवर्गाच्या सभासदांचें बहुमत राहील असें केलें व तिजला नवीन नियमांची सनद करण्याचा अधिकार दिला.  ह्या नव्या सनदेचा खर्डा ता. १५।४।२३ रोजीं भरलेल्या साधारण सभेंत पास केला.  अशा रीतीनें पुनर्घटनेचें काम चाललें असतां कांहीं विघ्नसंतोषी मंडळींकडून अडथळे येऊं लागले.  इतकेंच नव्हे तर कांहीं विद्वान् सभासदांनीं अस्पृश्यांपैकीं कांहीं सभासदांना चिथावून अडवणुकीचाही मार्ग पत्करला.  सनदशीर प्रयत्‍न करण्याचें अंगवळण आमच्या लोकांत अगोदरच कमी.  तशांत ज्या वर्गासाठीं हें मिशन आहे त्याच्यांतच दुही माजवून दिल्यावर ह्या कामीं अत्यंत हिरमोड करणारे अडथळे येऊं लागले.  परंतु श्री. अण्णासाहेब शिंदे ह्यांनीं निर्भीडपणें रेखाटलेलें धोरण अस्पृश्य वर्गांना इतकें प्रिय झालें कीं, महारमांग, चांभार, भंगी जातींचे पुढारी देखील आपसांतील पुष्कळ दिवसांचे बखेडे विसरून आपला फायदा ओळखून झीज सोसून कामें करूं लागले.  बहुतेक दररोज रात्रीं कमिटीच्या सभा होऊं लागल्या.  विरुद्ध पक्षाची कारवाईही कांहीं वर्तमानपत्रांतून चमकुं लागली.  मिशनमध्यें कधींच लक्ष न घातलेलीं माणसें आणि कांहीं अस्पृश्यवर्गीय व्यक्तीही ह्या विरोधांत दिसूं लागल्या.  ता. २९ मार्च १९२३ च्या सभेला ७७ सभासद व सभासद नसलेले १२ गृहस्थ हितचिंतक म्हणून हजर होते.  ता. १५ एप्रिल १९२३ च्या सभेला (जींत नवीन घटना पास व्हावयाची होती) फक्त सभासदांनाच घेण्याचें ठरल्यामुळें ज्यांना हजर राहण्याचा अधिकार नव्हता असे कित्येक लोक सभेच्या वेळेपूर्वीच अहल्याश्रमाच्या आजूबाजूला टेहळूं लागले.  हे डावापेंच कार्यकारी मंडळींना ठाऊक असल्यानें २५ स्वयंसेवकांची तुकडी बंदोबस्तासाठीं ठेवली होती.  नियमांची सनद मंजूर झाल्यावर २२ सभासदांचें नवीन कार्यकारी मंडळ निवडण्यांत आलें.  त्यांत अस्पृश्यवर्गाचे दोनतृतीयांश सभासद असून महार, चांभार, मांग, भंगी, मुसलमान या वर्गांचे प्रत्येकीं दोन आणि पारशी मराठा, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या जातींचा प्रत्येकीं एक असे जातवारीनें कमिटीनें १४ सभासद घेण्याचें ठरवलें.  ८ अधिकार्‍यांपैकीं ६ व तीन ट्रस्टींतील १ अस्पृश्यवर्गांतील निवडण्यांत आले.

याप्रमाणें पुणें शाखेचे मुख्य अधिकार आणि कार्याची जबाबदारी अस्पृश्य पुढार्‍यांवर ता. १५।४।२३ पासून सोंपएयांत आल.  या पुनर्घटनेला अद्यापि कांहीं लोक नाकें मुरडीत आहेत.  पण अशा अपशकुनांकडे रा. शिंदे यांनीं लक्ष दिलें असतें तर त्यांच्या हातून हें मिशन निघालेंच नसतें.  अस्पृश्यवर्गाचे कांहीं पुढारी ह्या स्वराज्याचे हक्कासाठीं फार उतावीळ होऊन आपल्या परिषदांतून इतका वेळ प्रतिकूल टीका करीत असत.  परंतु ते आतां मिशनचे कृतज्ञ अनुयायी साह्यकारी बनले आहेत.  श्री. अ. को. घोगरे, कांबळे, थोरात, घाडगे, उभाळे, सदाफुले, आदिकरून पोक्त आणि अनुभवशीर मंडळींनीं पुनर्घटनेस मनःपूर्वक मदत केली हें ह्या मिशनला अत्यंत भूषणावह आहे.''

अधिकारसंन्यास  :   येणेंप्रमाणें पुनर्घटना होऊन पुणें शाखेच्या सर्व अधिकार्‍यांची निवडणूक झाल्यानंतर माझें कार्य आटोपलें आणि मीं मातृसंस्थेंतील व इतर शाखांतील सर्व अधिकार खालीं ठेवले आणि फक्त मिशनचा संस्थापक ट्रस्टी एवढाच माझा अधिकार उरला.  माझ्या व माझ्या बहिणीच्या अल्प वेतनाची नेमणूकही मीं सोडली आणि आम्ही पुन्हां एकवार उघडे पडलों.  पुणें शाखेच्या नव्या अधिकार्‍यांनीं मला एखादें लहानसें पेन्शन द्यावें असा विचार काढला; पण कांहीं मिशनर्‍यांनीं काम सोडलें होतें आणि त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळाली नव्हती.  मग मींच काढलेल्या मिशनमधून आणि मींच मिळवलेल्या पैशामधून मीं रिकामपणीं पेन्शन घेणें हा विचारही मला दुःसह झाला.  कांहीं अंशीं शारीरिक विश्रांति आणि मानसिक शांति मिळाली हेंच पुरें झालें.  झालेली पुनर्घटना मातृसंस्थेला कळवून तिची संमति घेऊन पूर्वीप्रमाणें सहकार्य चालवणें हें या पुणे शाखेचें आणि मातृसंस्थेचें काम होतें.  या बाबतींत यापुढें मला कांहींच अधिकार उरला नव्हता; पण खेदाची गोष्ट ही होती कीं, मातृसंस्थेनें पुनर्घटनेस मुळींच संमति दिली नाहीं.  मातृसंस्थेनें केलेल्या नियमांतील पुनर्घटनेप्रमाणें पुणें शाखेची ही नवी घटना स्पृश्य आणि अस्पृश्य वर्गांच्या सहकार्याची असूनही मातृसंस्थेची संमति न मिळाल्यानें पुणें शाखेच्या नव्या अधिकार्‍यांना आश्चर्य वाटलें.  इतकेंच नव्हे, तर पुढील सर्व काम वादग्रस्त होऊन परस्परांचा तीव्र निषेध सुरू झाला आणि पुढील दोन तीन वर्षांत वर्तमानपत्रांत निष्कारण वाद माजला.  पुणें शाखेचे मोठमोठे फंड उदा. मिस् क्लार्क मेमोरियल फंड मातृसंस्थेच्या ट्रस्टीकडे अनामत होता.  शिवाय ह्या पूर्वीच्या काळांत मातृसंस्थेचा जनरल सेक्रेटरी आणि पुणें शाखेचा स्थानिक सेक्रेटरी हे दोन्ही अधिकार माझ्यामध्येंच एकवटलेले असल्यामुळें पुणें शाखेच्या बाहेरच्या कामाचा बराचसा खर्च साहजिकपणें पुणें शाखेच्या खजिन्यांतूनच झाला होता.  हा नवीन अकल्पित वाद निघाल्यामुळें मातृसंस्थेकडे एका दृष्टीनें कर्जाऊ असलेल्या ह्या रकमांची परतफेड पुणें शाखेला मिळण्यास विरोध होऊं लागला; पण ह्या सर्व वादाचा तपशील येथें देणें केवळ अशक्यच नव्हे तर अनिष्ट आहे.  तो सर्व देणें म्हणजे ग्रंथविस्तार अधिक होईल आणि तो कितीही तिर्‍हाईतपणें देऊ गेल्यास दोहों पक्षांसही मान्य होणार नाहीं.  म्हणून या विषयाची अत्यंत कष्टानें रजा घेत आहें.

पुनर्घटना १५ एप्रिल १९२३ रोजीं पूर्ण झाली आणि पुढच्या २३ एप्रिल १९२३ रोजीं माझा ५१ वा वाढदिवस आला.  पुणें शाखेंतील सर्व अधिकारी व शिक्षकवर्ग व विद्यार्थीवर्ग या सर्वांनीं मिळून माझा तो वाढदिवस साजरा केला.  मला निरोप देतांना आनंद व खेद या भावनांनीं जमलेल्या सर्व मंडळींनीं मला एक मानपत्र दिलें.  उदास वृत्तीनें मीं त्याचा स्वीकारही केला.  ''जोडोनिया धन उत्तम वेव्हारें ।  उदास विचारें वेंच करी ॥''  हा तुकारामांचा अनुभव मला प्रत्यक्ष आला.

पांचवें परिवर्तन  :   माझ्या जन्मापासून प्रत्येक १० वर्षांनीं एक असें माझ्या आयुष्यांत परिवर्तन घडत आलें आहे, याची मीमांसा मीं मागें केलेलीच आहे.  त्याप्रमाणें आज हें पांचवें परिवर्तन घडून आलें.  सुमारें ४ महिने पुण्यास स्वस्थ राहिलों.  ह्यापुढें साहित्यसेवा करावी असे विचार मनांत येऊं लागले.  या वेळीं आर्य-द्रवीड-वाद या संशोधन विषयाकडे माझें लक्ष लागलें होतें.  इंदूर, बडोदा वगैरे संस्थानांतून आणि म्हैसूर वगैरेच्या युनिव्हर्सिट्यांतून कागदपत्रांचा पुरावा मिळवून हिंदुस्थानच्या पुरातन इतिहासाची सामुग्री मिळवण्याचा प्रयत्‍न चालवला होता.  त्या वेळीं बडोदा येथें एक साहित्यसंमेलन झालें.  त्याला हजर राहून श्रमंत सयाजीरावमहाराजांची मीं प्रत्यक्ष भेटही घेतली होती.  मी बडोद्यास कायमचा जाऊन रहात असेन तर बडोद्याची मोठी सेंट्रल लायब्ररीच नव्हे तर संस्थानचे सर्व नवे-जुने कागदपत्र शोधून पाहण्याचा पूर्ण अधिकार महाराजांनीं मला देऊं केला होता.  इंदूर, धार, ग्वाल्हेर आणि रजपूत संस्थानें ह्यांच्याशीं पत्रव्यवहारही मीं सुरू केला होता.  डॉ. व्रजेन्द्रनाथ शील हे ब्राह्म-समाजाचे मोठे विद्वान् गृहस्थ म्हैसूर युनिव्हर्सिटीचे व्हाइस चॅन्सेलर होते.  कविसम्राट् रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या विश्वभारतीलाही मीं लिहलें होतें.  पण एवढें मोठें काम माझ्या एकट्याच्या आवांक्याबाहेरचें होतें.  रोख पैशाचा पूर्ण अभाव असल्यानें ह्या कामांत शेवटीं मुळींच यश आलें नाहीं.  'उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथाः' हेंच शेवटीं खरें ठरलें !

चार महिन्यांनंतर माझे जुने मित्र कलकत्त्याच्या साधारण ब्रह्म समाजाचे प्रचारक बाबू हेमचंद्र सरकार यांची मुंबई येथे राममोहनदास आश्रमांत गांठ पडली.  मिशनच्या कटकटींतून मी मोकळा झालों हें ऐकून त्यांना मोठा आनंद झाला.  मी चार महिने कलकत्त्यास साधारण ब्राह्म समाजाच्या साधनाश्रमांत येऊन स्वस्थ राहावें अशी त्यांनीं माझ्या मागें निकड लावली.  हो ना म्हणतां म्हणतां मी १९२३ च्या सप्टें. मध्यें माझी पत्‍नी आणि धाकटा चिरंजीव रवींद्र यांस घेऊन कलकत्त्याला गेलों.  तेथें चार महिने बंगाल येथील Backward Classes Mission ची प्रशंसनीय कामगिरी ठिकठिकाणीं खेडोपाडीं जाऊन पाहिली.  मी फिरतीवर असतांना माझी पत्‍नी सौ. रुक्मिणीबाई मलेरियानें फार आजारी पडली.  स्वतः हेमबावूही ट्रॅमगाडींतून पडून त्यांचा पाय दुखावल्यामुळें अंथरुणावर पडून होते.  १९२४ सालाच्या जानेवारींत साधारण ब्राह्म समाजाचा माघोत्सव सुरू झाला.  याच सुमारास इंग्लंडहून रेव्हरंड डॉ. ड्रमंड (मँचेस्टर कॉलेजचे प्रि. डॉ. ड्रमंड यांचे चिरंजीव व माझे गुरुबंधु) विलायतेंतील ब्रिटिश ऍंड फॉरीन् मिशनचे प्रतिनिधि म्हणून कलकत्त्यास आले.  त्यांना सर्व हिंदुस्थान फिरून पहावयाचा होता.  दक्षिण आणि पश्चिम हिंदुस्थानांतील त्यांच्या सफरीवर मीं त्यांचेबरोबर जावें, मुख्य मुख्य ठिकाणीं नेऊन ब्राह्म समाजाच्या पुढार्‍यांचा व त्यांचा परिचय करून द्यावा आणि मँचेस्टर कॉलेजांतील पुढील हिंदी विद्यार्थ्यांची निवड करण्यांत मदत करावी आणि डॉ. ड्रमंड स्वदेशीं गेल्यावर मी पश्चिम नैर्ॠत्य किनार्‍यावरील मंगलूरच्या ब्राह्म समाजाचे आचार्य म्हणून तेथें राहावें असें कलकत्त्यांतील साधारण ब्राह्म समाजाच्या कमिटीनें ठरवलें आणि मी माझ्या कुटुंबाला घेऊन १९२४ च्या फेब्रुवारींत पुण्यास परत आलों.

परत प्रवास

शेवटचा निरोप  :  ३१ ऑगस्ट १९०३ रोजीं सकाळीं मी होवर्न येथून निघालों.  लंडनला आणि इंग्लंडलाही शेवटचा रामराम केला.  जर्मन समुद्रांतून हॉलंडची राजधानी ऍम्स्टरटॅम येथें इंटरनॅशनल लिबरल रिलीजस कॉन्फरन्सकरतां गेलों.  तेथें मी ता. ४ सप्टेंबरपर्यंत होतों.    

एक अडचण  :  विलायतेला येतांना मला बोटीच्या प्रवासाबद्दलचा खर्च श्रीमंत सरकार सर सयाजीरावमहाराजांनीं दिला होता.  स्वदेशीं परत जाण्याचा खर्च मिळण्यापूर्वी माझ्या कॉलंजांतील अभ्यासाबद्दल कॉलेज अधिकार्‍यांकडून रिपोर्ट मागविण्याबद्दल हुकूम महाराजांकडून झाला होता.  त्याप्रमाणें हा इंग्रजींतला रिपोर्ट अध्यापकांकडून महाराजांकडे गेला.  त्याअन्वयें मीं महाराजांकडे अर्ज केला असतां त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीकडून पत्र आलें कीं, मी स्वदेशीं परत गेल्यावर बडोदें संस्थानांत नोकरी करण्याबद्दलचा करार लिहून देईन तर हा खर्च मिळेल.  मी ता.१ मे १९०३ रोजीं महाराजांना खुलाशाचें सविस्तर पत्र लिहिलें कीं, 'मला जी युनिटेरियन स्कॉलरशिप मिळाली होती तिची एक शर्त अशी होती कीं, मी आजन्म स्वतःला धर्मप्रचारासाठींच वाहून घेईन. यदाकदाचित् माझ्या योगक्षेमाची कोणीं जबाबदारी घेतली नाहीं, तर या प्रचाराला प्रतिकूल होणार नाहीं असेंच एखादें काम करून उदरनिर्वाह करीन; पण प्रचार सोडणार नाहीं.  महाराजांनीं हें सर्व पसंत केलें होतें.  म्हणून आतां कोणती हरकत न घेतां स्वदेशीं परत जाण्याला मला ते मदतच करतील.'  हें पत्र पावतांच महाराजांनीं टॉमस कुक कंपनीकडे तारेनें तिकीट देण्याबद्दल हुकूम केला असल्याचें त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरींनीं मला कळविलें.

ऍम्स्टरडॅमचा खर्च  :  कॉलेजला उन्हाळ्याची सुटी झाल्याबरोबर माझें इंग्लंडांतील काम संपलें म्हणून स्वदेशीं निघतां आलें असतें; पण ऍम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषदेला मला ब्राह्मसमाजानें हिंदुस्थानचा प्रतिनिधि निवडल्यामुळें आणि ती परिषद सप्टेंबरमध्यें भरणार असल्यानें दरम्यानचा तीन महिन्यांचा खर्च आणि जादा प्रवासखर्च यांचीं पंचायत पडली.  युनिटेरियन स्कॉलरशिप मला दरसाल १०० पौंडांची होती.  तीच अपुरी होती.  मीं फार काटकसरीनें राहून माझ्या खर्चाची कशीबशी तोंडमिळवणी केली होती.  ऍम्स्टरडॅमच्या जादा खर्चाविषयीं माझे मित्र श्रीयुत बा. बा. कोरगांवकर यांनीं वर्गणीचे परिश्रम करून ता. २५ जुलै १९०३ रोजीं पत्रानें १३ पौंड ६ शिलिंग ८ पेन्सचा (म्हणजे २०० रुपयांचा) चेक पाठविला.  कलकत्त्याहून हेमचंद्र सरकारकडूनही निदान तितकीच रक्कम मिळेल असें कळविलें.  अशा रीतीनें माझी अडचण भागली.

ऍम्स्टरडॅमची परिषद  :  ता. १ सप्टेंबर रोजीं इंग्लंडहून निघालेल्या पाहुण्यांची बोट ऍम्स्टरडॅमला पोहोंचली.  तींतच मी होतों.  नदीच्या कांठांवरच्या सुंदर अम्सटील हॉटेलांत आमची व्यवस्था झाली होती.  व्याख्यानें, उपासना, मेजवान्या यांची एकच गर्दी उसळली होती.  डच लोकांनीं फारच संस्मरणीय स्वागत केलें.  मीं वाचलेला हिंदुस्थानांतील उदारधर्म हा निबंध ह्या परिषदेचें 'लिबर्टी' नांवाचें जें पुस्तक प्रसिद्ध झालें त्यांत प्रसिद्ध झाला आहे.

व्होलंदाम  :  ता. ४ सप्टेंबर रोजीं ऍम्स्टरडॅमहून व्होलंदाम नांवाचें एक जुनें खेडें पाहाण्यास निघालों.  बरोबर सुमारें निरनिराळ्या राष्ट्रांची २०० पाहुणे मंडळी होती.  आम्हा पाहुण्यांची व्यवस्था ठेवण्यास डच मंडळी आली होती.  सुमारें दोन वाजतां व्होलंदाम येथें पोहोंचलों.  हें खेडें समुद्रकिनार्‍याला एका धक्क्याच्या आश्रयाखालीं आहे.  समुद्रसपाटीपेक्षां या खेड्यांची सपाटी ४।५ फूट तरी खालीं असावी.  आमची इतकी गर्दी पाहाण्यासाठीं खेड्यांतील सर्व माणसें मुला-लेकरांना घेऊन दाराबाहेर उभी होतीं.  डच लोकांची स्वच्छतेसंबंधीं मोठी ख्याति आहे.  त्याप्रमाणें दोन प्रहरीं घरें धुण्याचें काम चाललें होतें.  आम्हीं कित्येक घरांत शिरून त्यांच्या चुली आणि निजावयाच्या जागा पाहिल्या.  साधेपणा, स्वच्छपणा व टापटीप पाहून आनंद झाला.  ह्या लोकांच्या पायांत ओबडधोबड लांकडी जोडे होते.  घरांत शिरतांना ते आपले जोडे बाहेर ठेवीत.  आम्हांला बुटांसह आंत जाण्याला लाज वाटूं लागली.  तरी आम्हांस हे लोक आंत जाण्यास खुशीनें परवानगी देत.  धक्क्यावर एक दोन मैलांवर आम्ही हिंडलों.  एदाम या खेड्यांत आम्ही आगगाडींतून उतरल्यावर व्होलंदामपर्यंत सुमारें दोन मैल एका कालव्यांतून जुन्या चालीच्या बोटींतून आम्ही कांहींजण निघालों.  या बोटींना एक लांब लांकडी दांडा लावला असून त्यास खांदा देऊन माणसें बोट पुढें ढकलीत असत.  संध्याकाळीं ५ पर्यंत इकडे तिकडे हिंडल्यावर आगबोटींतून आम्ही परत ऍम्स्टरडॅमला परत आलों.  अशा रीतीनें अगदीं आनंदाने ऍम्स्टरडॅम येथील परिषदेचा शेवट झाला.

कलोन कॅथेड्रल  :  ता. ५ सप्टेंबर रोजीं सकाळीं कलोन येथें पोहोंचलों.  हॉटेल एविग् लॅम्पमध्यें उतरलों.  लगेच न्याहारी करून येथील प्रसिद्ध कॅथेड्रल पाहाण्यास गेलों.  एवढी सुंदर इतिहासप्रसिद्ध इमारत असूनही बाजारांतील गर्दीच्या भागांत ती कोंडल्यासारखी झाली आहे.  मी चौकांतून तिच्याकडे पाहात राहिलों.  हातांत कॅमेरा होता.  पण चित्रासारखा किती तरी वेळ आ वासून पाहात राहिलों असतां, मलाच किती तरी लोक पाहून गेले असावेत.  आश्चर्याचा आवेग उतरल्यावर मी हळूहळू इमारतींत शिरलों.  बांधकाम गॉथिक थाटाचें आहे.  काळ्या कुरुंदाचा दगड वापरला आहे.  उंच निमुळत्या कमानी एकावर एक लागलेल्या असून गॉथिक शोभेची येथें परमावधि झाली आहे.

ता. ७ सोमवारीं १९०३ रोजीं स्वित्झरलंड आणि जर्मनीच्या हद्दीवरील बाझल शहरांत थोडा वेळ राहून त्याच रात्रीं ११ वाजतां आल्पूस पर्वतांतील ल्यूसर्न या नांवाच्या अत्यंत रमणीय गांवीं पोहोंचलों.  हा गांव ह्याच नांवाचे सरोवराचे कांठीं आहे.  चार दिवस विश्रांतींत आणि एकान्तवासांत घालविले.  मौंट पिलाटुस नांवाच्या आल्प्स् पर्वताच्या शिखरावर मी एकटाच सफर करून आलों.  समुद्रसपाटीपासून हें ठिकाण ७००० फूट उंच आहे.  जर्मनी सोडून स्वित्झर्लंडकडे जातांना आल्प्स पर्वतांतून सेंट गॉथर्ड नांवाचा १० मैल लांबीचा एक बोगला आहे.  त्यांतून आमची गाडी गेली.

ता.११ सप्टेंबर रोजीं मी कोलंबसाच्या जिनोवा या गांवीं गेलों.  ता.१२ रोजीं कॅम्पो सँटो नांवाची अत्यंत सुंदर स्मशानभूमि पाहिली.  इटालियरन शिल्पकलेची येथें लयलूट झालेली दिसली.  नंतर पांच दिवस मीं रोम शहरीं घालविले.  मुंबई विद्यालयांत माझा आवडीचा विषय रोमचा प्राचीन इतिहास असल्यानें हे पांच दिवस माझे मोठ्या बोधाचे गेले.  ता. १५ रोजीं रविवारीं व्हटिकन् नंवाचा पोपचा राजवाडा पाहिला.  तिसरे दिवशीं पोप पायसचें प्रत्यक्ष दर्शन घेतलें.  दूर अंतरावरून आलेली शेंकडों भक्तमंडळी यांच्या दर्शनासाठीं रांगेनें बसलेली होती.  पोपची स्वारी जवळ येतांच ही मंडळी त्याच्या चरणाचे चुंबन घेत.  माझ्यापुढें आल्यावर मीं हिंदुस्थानचा रहिवासी म्हणून त्यांनीं आपल्या हातांतील आंगठी माझ्यापुढें चुंबनासाठीं पुढें केली.  मीं चुंबन घेतलें.

मोझेसचा पुतळा  :  सिस्टाइन चॅपेल नांवाच्या एका दालनांत हा प्रसिद्ध भव्य पुतळा एका उंच कट्टयावर ठेवला होता.  मायकेल् ऍंजेलो नांवाच्या प्रसिद्ध शिल्पकाराला हा महत्त्वाचा पुतळा कोरण्याला ४० वर्षे लागलीं असें सांगतात.  दुसरी कडे सेंट पॉलचा लाइफ साईझ पुतळा हातांत नंगी तलवार घेऊन उभा आहे.  इटालियन लोकांच्या चित्रकलेंतील वैभवाला ह्या शहरीं नुसता पूर आला आहे.  २००० वर्षांपूर्वीच्या प्राचीन इमारतींचे अवशेष मोठ्या आतुरतेनें पाहिलें.  फॅबियन ऍंफिथिएटर नांवाची एक अर्धवर्तुळाकार प्रचंड इमारत पाहून गतवैभवाची कल्पना आली. ह्यांत ग्लॅडिएटर नांवाच्या मल्लांचें प्राणांतिक मल्लयुद्ध होत असे.  पादाक्रांत परकीय कैद्यांना (ह्यांत राजेही असत) ह्या इमारतीच्या भुयारांत आणून ठेवीत असत.  प्रसंगविशेषीं जनतेची करमणूक व्हावी म्हणून ह्या कैद्यांना बाहेर काढून आपसांत लढवीत असत.  तो भयंकर रक्तपात पाहून प्रेक्षकजन आनंद मानीत व मल्लयुद्ध जिंकणार्‍यावर खूष होत.  हें रोमन स्वराज्याचें लक्षण !

नेपल्स  :  ता. १८ रोजीं मी नेपल्सला गेलों.  ह्या बंदलाचा देखावा फारच सुंदर आहे.  मुंबईच्या मलबार हिमप्रमाणें समुद्रकांठावरील एका टेकडीवरून उंच उंच एक रस्ता आहे.  अपोलो बंदराप्रमाणें येथें धक्काही फार सुंदर आहे.  मात्र लोकांचा- विशेषतः व्हिक्टोरियावाल्यांचा-अप्रामाणिकपणा वेळोवेळीं नजरेस आला.  एकदोनदां तर माझ्या प्राणावरच बेतली होती.  माझ्या हॉटेलांतील खिडकींतून धुमसत असलेल्या व्हेसुवियस ज्वालामुखीचा देखावा फार भीषण दिसत होता.

पाँपी  :   दोन हजार वर्षांपूर्वी भूकंपामुळें व ज्वालामुखी पर्वताच्या तप्‍तरसामुळें हें शहर दडपून गेलें होतें.  त्याचें आतां उत्खनन होऊन त्याला आतां प्रेक्षणीय स्वरून आलें आहे.  हें नेपल्सपासून सुमारें ४।५ मैल अंतरावर आहे.  हें पाहण्यासाठीं मी ता. १९ शनिवारीं गेलों.  गरम राखेचा ढीग वर पडल्यानें त्याच्या खालीं जीं माणसें, जनावरें व इतर वस्तु सांपडल्या त्यांचे हुबेहूब सांगाडे तेथील म्युझिअममध्यें दाखविण्यांत येतात.  हे खरे सांगाडे नसून राखेखालीं ह्यांचे जे सांचे बनले होते त्यांत प्लॅस्टर ऑफ पॅरिस ओतून उत्खननकारांनीं कौशल्यानें हे सांगाडे बनविले आहेत.  कित्येक इमारतींती भिंतीवरचे रंग व चित्रें अगदीं ताजीं दिसलीं.  रस्ते व दुतर्फा ओटे फरसबंदी होते.  यावरून जड चाकांच्या चाकोर्‍यांच्या खोल खुणा दिसल्या.  एका दिवाणखान्याच्या भिंतीवर कांहीं बीभत्स चित्रें दिसलीं.  त्यांवरून त्या ऐश्वर्याच्या काळांत रोमन लोकांची नीति कशी खालावली होती हें कळलें.

ता.२१ सप्टेंबर १९०३ रोजीं सोमवारीं नेपल्सहून रुबाँ-टीनो नांवाचे आगबोटीनें मी हिंदुस्थानास येण्यास निघालों व ता. ६ ऑक्टोबर रोजीं ४ वाजतां तिसरे प्रहरीं मुंबईला परत स्वदेशीं आलों.  

स्वागत  :  मुंबई बंदरावर कित्येक मंडळी माझ्या स्वागतार्थ जमली होती.  मी विलायतेला निघाल्यावर मुंबई प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष शेट दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला ह्यांनीं परत आल्यावर मिशनरी म्हणून माझ्या राहण्याची स्वतंत्र सोय व्हावी व इतरही कामाची तजवीज व्हावी, म्हणून प्रार्थनामंदिराचे आवारांत एक राममोहन राय आश्रम म्हणून तीनमजली इमारत मी येण्यापूर्वीच बांधून ठेवली होती.  इमारतीच्या लगतच भगवानदास माधवदास नांवाचे गुजराथी समाजबंधु राहात होते.  त्यांच्या बंगल्यांत माझ्या स्वागतासाठीं समाजबंधूंचे संमेलन झालें.  डॉ. भांडारकर, चंदावरकर, माडगांवकर वगैरे मंडळी व सर्व वडीलथोर माणसें हजर राहून त्यांनीं आनंदानें स्वागतपर भाषणें केलीं.  माझे वृद्ध मित्र रा. दिनानाथराव माडगांवकर यांनीं माझ्या स्वागतासाठीं एक पद मुद्दाम रचलें होतें.  त्यांत खालील चरण होते -

तरुण असतां स्वार्थत्यागी तुम्ही दिसतां भले ।
प्रभुवरकृपें धर्माभ्यासीं तुम्हां यश लाभलें ॥
तरि तुमचिया हस्तें धर्मप्रचार बरा घडो ।
तनुमन तसें देवापायीं सदा तुमचें जडो ॥१॥

परिशिष्ट १ - मँचेस्टर कॉलेजचे दोन दाखले

Manchester College

Oxford, March 4, 1903.

The following is the report of Mr. V. R. Shinde presented to the Committee in June 1902 :-

Mr. V. R. Shinde, for want of previous preparation has had considerable difficulty in following the lectures on the New Testament.  He has not attended the classes in the Old Testament.  He has written two philosophical essays, showing original thought, one on Self-realization and the other on the Genesis of Free-will.  He wrote excellent fortnightly papers during the Lent term on subjects connect with the History of Religion in India.  During the Summer term he read Pali, weekly with Mr. Carpenter, and made excellent progress through his knowledge of Sanskrit.  He has sent in a very thoughtful essay on Theories of Incarnation in "Vishnavism and Buddhism."

In the present session he has attended classes in philosophy with Mr. Upton, in Old Testament with Mr. Addis and in Doctrainal Theology with me.  With his general conduct in the College we are more than satisfied.

(Sd/Dr.) James Drummond
Principal.

-----------------------------


Manchester College

Oxford, March 1st, 1903.

Mr. V. R. Shindde, B.A., has attended my lectures on the History of Religion, during two academical years with great diligence and faithfulness.  He has prepared a series of papers on subjects prescribed for his study with industry, care and insight; and has shown much ability in his power to condence into short compass the results of considerable reading.  The work of the second year which I have had from him, has been naturally in advance of that of the first, and has been in every way satisfacroty to me.  The subjects have included, Hinduism, Mohammedanism, Zoroastrianism and the Religions of China.  I may add that during on term, Mr. Shinde read with me every week, in the early Pali Texts of Buddhism and showed that his Sanskrit knowledge would enable him to make rapid advance in this branch of study.

(Sd/Dr.) J. Estlin Carpenter,
Case Lecturer in
Comparative Religion.

पदवीग्रहण

सवलत  :  बी.ए. मध्यें माझे ऐच्छिक विषय इतिहास आणि कायदा हे होते.  माझा विशेष कल तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे असतांना लॉजिक आणि मॉरल फिलासफी, न्यायशास्त्र आणि नीतिशास्त्र हे विषय न घेतां, मीं इतिहास आणि कायदा हे विषय घेतले ह्याचें कारण बी.ए. च्या कायद्याच्या पेपरमध्यें शेंकडा ६० वर मार्क मिळाल्यास फर्स्ट एलएल.बी. ची परीक्षा पास झाली असें गणण्यांत येत होतें.  म्हणून मीं या सवलतीचा फायदा घेण्यासाठीं ही निवड केली.  दुसरें कारण असें कीं, माझें शिक्षण पुरें झाल्यावर कुठल्याही सरकारी नोकरींत अडकवून घेण्यापेक्षां सार्वजनिक कार्यांत पडण्याचा माझा इरादा होता.  त्यासाठीं स्वतंत्रपणें वकिली करणें भाग होतें.  त्याशिवाय भावी आयुष्यांत माझा इतिहासाकडेच कल असल्याचें पुढें आढळून आलें.  विचारांच्या दोन पद्धति आहेत.  एक तत्त्वज्ञानाची मोघम पद्धत; तींत ज्ञात कारणावरून अज्ञात कारणांचा शोध करीत जाणें.  दुसरी पद्धती नवी असून अधिक परिणामकारी म्हणून मला तीच जास्त पसंत पडली; पण ही पसंती पुढील शिक्षणाचे काळांत झाली.

डेक्कन कॉलेज  :  कायदा ह्या विषयावरील व्याख्यानें त्या वेळीं डेक्कन कॉलेजांत होत होतीं.  त्यासाठीं आम्हांला फर्ग्युसन कॉलेजांतून डेक्कन कॉलेजांत जावें लागे.  त्या वेळीं जनुभाऊ करंदीकर, माधव नारायण हुल्याळ इतकी मंडळी जमखंडीकरांचे शनिवारांतल्या वाड्यांत राहात होती.  तेथून फर्ग्युसन कॉलेजांत जाऊन तेथून डेक्कन कॉलेजांत आठवड्यांतून दोनदां पायीं चालत जावें लागे.  टांग्याचें भाडें जबर पडत असल्यानें आणि त्या वेळीं पुण्यांत सायकलींचा सुळसुळाट झाला नसल्यानें मला पावसांत भिजत, उन्हाळ्यांत शिजत एवढा मोठा पल्ला गांठावा लागे.  पण त्याचें मला कांहीं वाटत नसे.  संगमावरून होडी चालू असे.  तींत बसून शेतावरून डेक्कन कॉलेजला जाण्यास एक जवळचा वाट होती.  एकदां असें झालें कीं, कॉलेजवरून परत येण्यास रात्र पडली आणि होडी बंद झाली होती.  मी एकटाच होतों.  अंगावरचे सारे कपडे डोक्याला गुंडाळून मी पोहत संगमावर आलों.  याचें माझ्या मित्रांना फार आश्चर्य वाटलें.  पावसाळ्यांत नदीला पूर आल्यावर फर्ग्युसन कॉलेजपासून होळकर ब्रिजवरून डेक्कन कॉलेजांत जाऊन, परत येते वेळीं बंडगार्डनवरून यावें लागे.

निकाल  :  १८९७ सालीं पुण्यास प्रथम प्लेगचा कहर सुरू झाला.  त्या वेळीं शाळा-कॉलेजें बंद झाल्यानें, माझ्या घरच्या मंडळींना घेऊन जमखंडीस जावें लागलें.  या सुमारास मुंबईस हिंदुमुसलमानांचा दंगा सुरू झाल्यानें पुण्यास सार्वजनिक गणपतीचा उत्सव लो. टिळकांनीं राष्ट्रीय पायावर सुरू केला.  पहिल्या उत्सवाचे वेळीं पुण्यालाही हिंदु-मुसलमानांचा दंगा झाला.  दंगे, उत्सव, प्लेग आणि प्लेगमधील अधिकार्‍यांचे खून अशा अनेक धामधुमींत आमच्या अभ्यासाची फार आबाळ झाली.  मी व माझे बरेच मित्र १८९७ सालीं बी.ए. परीक्षेंत नापास झालों.  पुन्हां १८९८ सालीं माझी बी.ए.ची परीक्षा एकदांची पास झाली आणि कायद्याच्या पेपर्समध्यें फर्स्ट क्लासचे मार्क पडून फर्स्ट एलएल.बी. ही परीक्षाही पास झाली.

पिळवणूक  :  अलीकडच्या युनिव्हर्सिटींतील परीक्षेच्या चढाओढीच्या पद्धतीचा मला पूर्ण तिटकारा आला होता.  अशा पद्धतीनें जे स्कॉलर ठरतात ते पुढील आयुष्यक्रमांत मोठ्या विद्वत्तेचीं कामें कां करीत नाहींतं ?  याचें कारण ऐन तारुण्यांत त्यांची अनैसर्गिक पिळवणूक होऊन ते खच्ची होतात.  नुसत्या शर्यतीनें कोण विद्वान् होईल ?  विद्वत्ता हा नैसर्गिक विकास आहे.  शर्यतीचे घोडे आणि औताचे घोडे यांचे तुलना केली तर अश्वशक्ति (Horse Power) कोणाची व कां जास्त असते हें कळून येईल.  युरोपांतल्या नाणावलेल्या ऑक्सफर्ड व केंब्रिजसारख्या जुन्या विश्वविद्यालयांतून या चढाओढींची पद्धत हिंदुस्थानइतकी हानिकारक दिसून येत नाहीं.  हें जरी विलायतेंत गेल्यावर मला दिसून आलें, तरी ही पद्धत अनिष्ट आहे हें कळून येण्यासाठीं मला विलायतेला जाण्याची जरूर नव्हती.  तिचे अनिष्ट परिणाम मीं स्वदेशींच भोगले होते.  माझा बी.ए.परीक्षेंतील शेवटचा पेपर संपल्यावर मी युनिव्हर्सिटीसमोरील पटांगणाचे भिंतीवर बसून राजाबाई टॉवरकडे तोंड करून मनापासून शिव्यांची लाखोली वाहिली.  हा टॉवर म्हणजे मला प्राचीन बाबिलोनिया शहरांतील बॉल मरढॉक नांवाच्या उग्र देवतेचा पुतळाच भासला.  त्या पुतळ्याच्या हातांत एक तापलेला लाल तवा असून गांवांतील मातांनीं आपल्या प्रथम जन्मलेल्या मुलास त्यांत टाकून आहुति देण्याची चाल होती.  तशीच चाल ह्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेच्या खाईंत आपल्या  पोटच्या पोरांस होरपळून काढण्याची आहे.

यापुढें दोन वर्षे मी सेकंड एलएल.बी. चा अभ्यास केला.  श्रीमंत सयाजीराव महाराजांनीं दयाळूपणें आली स्कॉलरशिप सुरू केली होती; पण खरें पाहतां माझें लक्ष अभ्यासाकडे मुळींच नव्हतें.  ह्याला घरगुती कारणें आणि बाहेर प्लेगसारखी व्याधि तर होतीच; पण खरीं कारणें काय होतीं तें पुढें पाहूं.  त्यामुळें माझ्या शिक्षणांतच नव्हे तर भावी आयुःक्रमांत मोठी क्रांति घडून आली.

प्रो. मॅक्समुल्लर :  ठराविक अभ्यासक्रमाची मला जरी शिसारी आली होती तरी मनांतील विचारविकासाच्या चक्रांची गति मुळींच मंदावली नाहीं.  मिल्ल-स्पेन्सरच्या विचारांमुळें जो बंडखोरपणा माझ्या मनांत व भोंवतालीं माजला होता त्यांत माझ्या आत्म्याची भूक शमविण्याची शक्ति नव्हती.  नास्तिकपणाच्या वाळवंटांत मनाची तहान भागणें शक्य नव्हतें.  अशा क्रांतीच्या वेळीं ज्या एका नवीन तत्त्वज्ञानपद्धतीची व तत्त्ववेत्त्याची गांठ पडली तो प्रो. मॅक्समुल्लर होय.  धर्मावरील त्याचीं विस्तृत व्याख्यानें, भाषा शास्त्राचें अलोट ज्ञान, पौरस्त्य विचारांबद्दल त्याची समतोल वृत्ति आणि संस्कृत भाषेबद्दलची गाढ सहानुभूति इत्यादि गुणांनीं तो मला एक नवीनच आप्‍तपुरुष भासूं लागला.

रा. कळसकर  :  ता. १२ मे १८९८ रोजीं आमच्या बिर्‍हाडीं बारामतीचे रा. रा. कळसकर बारामतीच्या महाराष्ट्र व्हिलेज एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आले होते.  त्यांचे साहस, उद्योग व स्वार्थत्याग हे मी ऐकूनच होतों.  त्यांचे भाषण ऐकून तर त्यांनी महार-मांग या खालावलेल्या जातींविषयीं किती कळकळ दाखविली, त्यांनीं काय काय केलें व आणखी किती करण्यासारखें आहे, हें सर्व मनांत येऊन मला स्वतःची मनःपूर्वक लाज वाटून तिटकारा आला.

ता. २९ मे १८९८ रविवारीं सकाळीं आठ वाजतां रा. कळसकर, हुल्याळ व मी पुण्याच्या प्रार्थनासमाजांतील उपासना पाहण्यास गेलों होतों.  पुण्यांतल्या मंदिरांतली उपासना मीं आजच प्रथम पाहिली.  गेल्या डिसेंबरांत मुंबईच्या प्रार्थनासमाजांतील उपासना पाहून मला तितकेंसें बरें वाटलें नव्हतें.  उलट किंचित् दुराग्रह झाला होता.

प्रार्थनासमाज  :  मंदिरांतील उपासना पाहून माझ्या मनांत मोठा पूज्यभाव उत्पन्न झाला.  ह्याचें एक कारण हें कीं, मुंबईपेक्षां हें मंदिर फारच साधें आहे.  दुसरें कारण असें कीं, माझें मुंबईला प्रथमच जाणें असल्यानें तेथल्या उपासनेंत ख्रिश्चन चर्चमधल्या Prayer चा भास दिसला.  माझ्यासारख्या गांवढळास नव्यानें दीक्षा घ्यावयाची असल्यास माझी खात्री आहे कीं, तो मुंबईच्या भपकेदार देवळांत कधींच ती घेणार नाहीं.  पुणें येथील उपासनेचे चालक सातारचे सबजज्ज रा. ब. काशीनाथ बळवंत मराठे हे होते.  त्यांची प्रार्थना व व्याख्यान ह्यांनीं माझें मन फार वेधलें.  ह्या वेळीं माझें मन श्रद्धेनें फार पवित्र झालें होतें.  मीही सर्वांबरोबर प्रार्थनेचीं पदें अनन्यभावानें गायिलीं.  येथेंही हिंदुधर्माचें निर्मळ स्वरूप दिसलें.  प्रपंच साधून परमार्थ कसा करावा ह्याची रा. ब. मराठे ह्यांनीं चित्तवेधक रीतीनें फोड केली.  माझी बहीण चि. जनाक्का आपल्या मैत्रिणींबरोबर प्रार्थनेसाठीं हुजूरपागेंतून आली होती.  तिलाही ही उपासना फार आवडली.  तिला दर रविवारीं उपासनेस जावेंसे वाटलें.  मलाही तसेंच वाटलें.  दोन्ही भावंडांचा हा स्वतंत्र झालेला निश्चय पाहून तो अधिकच दुणावला.  येणेंप्रमाणें ज्या प्रार्थनासमाजाला अजाणपणें प्रथम हेटाळलें त्याकडेच लक्ष वेधलें गेलें.

याप्रमाणें माझ्या अभ्यासांत बरेवाईट व्यत्यय येऊन माझी अभ्यासूवृत्ति सुटत चालली.  रा. कळसकर यांचे खेड्यांतील समाजाच्या शिक्षणाचे प्रयत्‍न पाहून तसेंच आपण कांहीं तरी करावें याविषयीं आमच्या मंडळांत चर्चा सुरू झाली.  मी, रा. हुल्याळ, शासने, कानिटकर वगैरे तासचे तास बसून वाटाघाट करूं लागलों.  याबरोबरच प्रार्थनासमाजाशीं माझा निकटचा संबंध येऊं लागला.  समाजाच्या एका उत्सवास मी रोज जाऊ लागलों.  रा. रा. गणपत भास्कर कोटकर नांवाचे एक वृद्ध पेन्शनर गृहस्थ यांचा माझा दाट परिचय घडूं लागला.  त्यांच्या उपासना फार प्रेमळ असून गहिंवर आणणार्‍या असत.  मधून मधून समाजाचे प्रचारक रा. शिवरामपंत गोखले हेही मला आपले अनुभव सांगत.  त्यांच्या साधेपणाची छाप चांगली बसे.  समाजाचे सेक्रेटरी रा. केशवराव गोडबोले यांचा नियमितपणा व निष्ठावंत कार्यतत्परता यांचा फार परिणाम होई.  न्या. मू. रानडे आणि सर्वांत अधिक उठावदार म्हणजे परमपूज्य गुरुवर्य डॉ. भांडारकर यांचाही थोडाफार समागम घडूं लागला.  समाजांत गाण्याचा पुढाकार घेणारे वृद्ध पेन्शनर गणपतराव आंजर्लेकर यांची संगत घडूं लागली.  या सर्व वृद्ध मंडळींनीं मला भारून टाकून माझ्या तारुण्याचा आडमूठपणा, विचारांचा उच्छृंखलपणा व अनुभवांचा हिरवटपणा या भोवर्‍यांतून माझी सुटका करून शुद्ध उदार धर्माच्या शांत प्रवाहांत मला आणून सोडलें.

परिचय  :  उत्सवांत शेवटीं प्रीतिभोजन होत असतें.  तें एका वर्षी गणपतराव कोटकरांच्या राहत्या घरांत झालें.  गव्हर्नरच्या बंगल्याच्या उत्तरेकडील बोटॅनिकल गार्डनजवळ शांतिकुटीर नांवाची रा. कोटकरांची साधी झोपडी आहे, तींत हें प्रीतिभोजन घडलें.  मी अद्याप सभासद झालों नसतांही मला बोलावणें आलें.  ह्या भोजनांत पुणें समाजांतील सर्व वृद्ध मंडळी व मुंबई समाजांतील तरुण मंडळी एकत्र जमली होती.  फराळ, भजन, प्रार्थना, उपदेश, भोजन, संभाषण आणि सहल वगैरे प्रकार दिवसभर झालें.  हें प्रत्यक्ष दृश्य अनुभवून समाज म्हणजे नुसती एक रविवारची सभा नसून देवाच्या कन्यापुत्रांचें एक शुद्ध कुटुंब आहे हें माझ्या प्रचीतीस आलें.  समाजाविषयीं सर्व संशय व तेढ दूर झाली.  गणपतराव काटकर आणि सातारच्या समाजाचे श्री. सितारामपंत जव्हेरे यांच्या समागमांत समाजाचा इतिहास व तत्त्वांचा परिचय घडला.

सभासद दीक्षा :  समाजाच्या पुस्तकालयांतून ब्राह्मसमाजांतील कांहीं ग्रंथ वाचावयाला मिळाले.  प्रतापचंद्र मुझुमदार यांनीं सुंदर इंग्रजींत लिहिलेलें केशवचंद्र सेन यांचें चरित्र वाचून माझी चित्तवृत्ति भडकून गेली.  त्यांतलें विशेष प्रकरण Baptism of Fire (अग्निस्नान) हें वाचून तर प्रार्थनासमाजाचा नुसता सभासद न होतां, आजन्म वाहून घेतलेला प्रचारक कसा होईन याची दुर्दम्य तृष्णा लागून राहिली.  रात्रंदिवस तेच तेच विचार, त्याच त्याच तरुण आणि वृद्ध मंडळींच्या गांठीभेटी घडल्यानें समाजाशिवाय कांहीं दिसेनासें झालें.  डेक्कन कॉलेजांत बी.ए.च्या वर्गांत असलेले श्री. नानालाल दलपतराम कवि (हल्लींचे गुजराथचे कविवर्य), न्यू इंग्लिश स्कूलचे मारवाडी जातीचे एक पदवीधर तरुण शिक्षक श्री. मोतीबुलासा, डॉ. भांडारकरांचे कनिष्ठ चिरंजीव देवदत्त रामकृष्ण भांडारकर, डॉ. वासुदेव अनंत सुकथनकर, श्रीयुत लक्ष्मणराव ठोसर वगैरे तरुण मंडळी समाजांत आडवारीं वरचेवर जमूं लागली. त्यांतच कोटकरांसारखी वृद्ध मंडळी मिळूनमिसळून वागूं लागली.  परिणाम हा घडला कीं ही सर्व मंडळी समाजाची रीतसर दीक्षा घेऊन सभासद झाली.  मीही यांपैकींच होतों.

पहिली उपासना  :  १८९८ सालीं बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८९९ व १९०० हीं दोन वर्षे मला सेकंड एलएल.बी. च्या टर्म्स भरण्यासाठीं मुंबईस राहावें लागलें.  त्या वेळीं मी मुंबई समाजांत दर रविवारीं जाऊं लागलों.  तेथें रा. द्वारकानाथ गोविंद वैद्य, रा. वामन सदाशिव सोहोनी, रा. बा. बा. कोरगांवकर ह्यांचा परिचय झाला.  त्यांपैकीं कोरगांवकर हे पोक्त असून वैद्य व सोहोनी हे तरुण होते.  कोरगांवकरांचे घरीं माझें विशेष जाणें-येणें होतें.  प्रथम प्रथम पुणें समाजाच्या व्यासपीठावरून आणि नंतर मुंबईच्या व्यासपीठावरून उपासना व उपदेश करण्याची मला पाळी येई.  पुण्याच्या व्यासपीठावरून मीं प्रथम उपासना चालवली त्या वेळीं उपदेशाकरितां ''धाई अंतरींच्या सुखें ।  काय बडबड वाचा मुखें'' हा तुकारामाचा अभंग घेतला होता.  डॉ. भांडारकर, रा. ब. का. ब. मराठे, केशवराव गोडबोले, शिवरामपंत गोखले इत्यादि वडील मंडळी उपासनेस हजर होती.  माझा पहिलाच प्रसंग असून उपदेश फार चांगला वठला म्हणून डॉ. भांडारकरांनीं जवळ येऊन माझी पाठ थोपटली व सहृदय अभिनंदन केलें.  हें वर्तमान मुंबईस कळल्यावर तेथूनही मला उपासनेच्या पाळ्या येऊं लागल्या.

सुटीमध्यें जमखंडीस आल्यावर मी आमच्या घरीं दर रविवारीं सकाळीं मोठ्या थाटानें उपासना करूं लागलों.  त्या वेळीं बाहेरील मंडळीसुद्धां जमूं लागली.  मी प्रार्थनासमाजाचा सभासद झालों हें माझ्या आईबाबांना फार आवडलें.  प्रार्थनासमाज म्हणजे बाबांच्या भागवतधर्माचीच एक सुधारून वाढविलेली आवृत्ति असें त्यांना वाटूं लागलें.  कारण तुकाराम, एकनाथ, रामदास ह्यांच्या अभंगांचीं निरूपणें उपदेशाचे वेळीं होत असल्यानें वरील गोष्टींची साक्ष पटत होती.  त्यामुळें बाहेरून येणार्‍या मंडळींनाही हा प्रकार विशेष असा वाटला नाहीं.  माझे मित्र मीरासाहेब हथरूट या मुसलमान गृहस्थास व लिंगायत, ब्राह्मण इत्यादि जुन्या मित्रांस ह्या प्रकाराचे कौतुक वाटलें.

रा. सुकथनकर  :  मी इंटरच्या वर्गांत असतांना कोल्हापूरच्या वासुदेव अनंत सुकथनकर नांवाच्या एका गरीब सालस विद्यार्थ्याची गांठ पडली.  सदाशिव पेठेंत आम्ही पालकर यांचे वाड्यांत असतांना ते आमच्याच जागीं राहूं लागले.  ह्यांच्याशीं फारच मैत्री जमल्यावर पुढें हेही माझ्याबरोबर प्रार्थनासमाजांत जाऊं येऊं लागून शेवटीं सभासदही झाले.  सन १८९५ सालीं पुण्यास काँग्रेस भरली त्या वेळीं अमेरिकेंतील डॉ. जे. टी. संडरलंड ह्यांचीं पुण्यास व्याख्यानें झालीं असा उल्लेख येऊन गेला आहेच.  अमेरिकेंतील युनिटेरियन समाजाकडून प्रतिनिधी म्हणून युरोप-अमेरिका येथील उदारधर्माच्या समाजांचे हिंदुस्थानांतील प्रार्थना व ब्राह्म इत्यादि उदारधर्माच्या समाजांशीं अधिक दळणवळण व सहकार्य करण्यासाठीं काय उपाय करावा यास्तव सूचनावजा रिपोर्ट करण्यासाठीं हे हिंदुस्थानांत आले होते.  त्यांना भेटण्यासाठीं माझेबरोबर सुकथनकर हेही असत.

रा. मोतीबुलासा  :  सन १८९९ च्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूलचे पदवीधर तरुण शिक्षक रा. मोतीबुलासा बी.ए. ह्यांस मँचेस्टर येथें हिंदी विद्यार्थी म्हणून तौलानिक धर्माच्या अध्ययनासाठीं पाठविण्याची नेमणूक झाली.  विलायतेस रवाना झाल्यानंतर वाटेंत पोर्टसय्यद येथें वातज्वराचा विकार होऊन त्यांचे आकस्मिक निधन झालें.  ही बातमी ऐकून पुणें व मुंबई येथील प्रार्थना-समाजिस्टांना फार वाईट वाटलें.  विशेषतः समाजाचे गुरुवर्य डॉ. भांडारकर यांच्या मनाला ती गोष्ट फारच लागून राहिली.  मोतीबुलासांच्या दुखवट्यानिमित्त पुणें प्रार्थनासमाजांत डॉ. भांडारकरांनीं एक विशेष उपासना चालविली.  त्या वेळीं त्यांनीं मोठे कळकळीचे दुःखोद्‍गार काढले.  त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुधार चालली होती.  ह्या प्रकाराचा माझ्या हृदयावर जोराचा परिणाम झाला.  गुरुवर्य व्यासपीठावरून उतरतांच मी त्यांचेजवळ जाऊन, 'मोतीबुलासांच्या निधनानें रिकाम्या पडलेल्या जागेसाठीं मला जर गुरुवर्यांनीं पात्र ठरविलें तर मी विलायतेस जाण्यास तयार आहें' असें सांगितलें.  तें ऐकून गुरुवर्यांस आनंदाचें भरतें आलें व त्यांनीं मला मोठ्या प्रेमानें कुरवाळलें.

अटींचा खुलासा  :  मँचेस्टर कॉलेजांत हिंदी विद्यार्थ्याला पाठवावयाचें झाल्यास त्याला बर्‍याच अटी असतात.  अशा विद्यार्थ्याची वरिष्ठ विद्यालयीन शिक्षणांत बरीच प्रगति व्हावयाला पाहिजे असते.  इतकेंच नव्हे तर ब्राह्म व प्रार्थनासमाजाच्या कार्याविषयीं त्याच्यामध्यें पात्रता दिसून कांहीं थोडेंबहुत कार्यही व्हावयाला पाहिजे असतें.  या सर्व गोष्टी ध्यानांत घेऊन तो विद्यार्थी ज्या भागांतला असेल त्या भागांतील सभासदांनीं आणि कार्यवाहकांनीं त्याची एकमतानें शिफारस करायला पाहिजे.  डॉ. संडरलंडच्या सूचनेनुसार अशा विद्यार्थ्याची निवड करण्यासाठीं आदि ब्राह्मसमाज, साधारण ब्राह्मसमाज आणि नवविधान ब्राह्मसमाज या कलकत्त्यांतील तिन्ही शाखांच्या प्रतिनिधींची ब्राह्मसमाज कमिटी या नांवानें नेमलेली एक एक समिति आहे.  वरील प्रांतिक सभासदांची शिफारस या समितीकडे जाऊन तिनें ती पसंत करावयास पाहिजे असते.  विलायतेंतील ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशन ही संस्था अशा पसंत झालेल्या विद्यार्थ्यास वर्षाला १०० पौंडांची स्कॉलरशिप दोन वर्षे देत असते.  पण विलायतेला जाण्याचा प्रवासखर्च या विद्यार्थ्यानें आपला आपणच पाहावयाचा असतो.  इतकेंच नव्हे, तर कॉलेजांतील शिक्षणांतून परत स्वदेशीं आल्यावर सदर विद्यार्थ्यानें ब्राह्मसमाजाच्या प्रचाराचें कार्य आजन्म करावयाचें असतें.  निदान ह्या उद्देशाला विसंगत असें उदर भरण्याचें दुसरें कार्य करावयाचें नसतें.  उलट अशा विद्यार्थ्याच्या योगक्षेमाबद्दल ब्रिटिश कमिटी, कलकत्त्यांतील कमिटी किंवा दुसर्‍या कोणींही कायदेशीर हमी घेतलेली नसते.  अशा प्रकारच्या मजकुराचा स्पष्ट छापील खुलासा विद्यार्थ्याचे हातीं देण्यांत येतो.  अशा बंदोबस्तानें विद्यार्थ्याची जबाबदारी तावूनसुलाखून निघते.  ह्या सर्व बारीकसारीक अटींचा, माझ्या घरगुती परिस्थितीचा व होऊं घातलेल्या दुसर्‍या एलएल.बी.च्या परीक्षेचा कोणताही अडथळा मनांत येऊं न देतां, किंबहुना त्याचा विचारही न करतां केवळ परमेश्वरी आदेश समजून मी गुरुवर्य भांडारकरांकडे माझा निश्चय गंभीरपणें प्रकट केला.  गुरुवर्यांनींही तो तितक्याच झटकापटकीनें स्वीकारला.

व्यत्यय  :  डॉ. भांडारकरांनीं मनांत आणल्यावर प्रांतिक सभासदांची, कलकत्त्याच्या समितीची, नंतर ब्रिटिश कमिटीची व अखेरीस मँचेस्टर कॉलेज कमिटीची पसंती ह्या ओघाओघानेंच मिळाल्या.  मध्यें एकच व्यत्यय घडला तो हा कीं, न्या. मू. रानडे यांनीं रा. परांजपे नांवाच्या दुसर्‍या एका ब्राह्मण तरुणाची पसंती करून शिफारस केली, पण त्याची निवड झाली नाहीं.  कारण आतांपर्यंत समाजाशीं त्याचा संबंध जडलेला नव्हता.  ह्याच परांजप्यानें पुढें वर्धा येथें हनुमानगडावर एक नवीन धर्मप्रथा काढली.

दयाळू महाराज  :  येथवर झालें तें ठीक झालें.  पण ''सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः !''  प्रवासखर्चाची सोय काय हा मुख्य प्रश्न येऊन पडला.  निदान दीड दोन हजार रुपये तरी पाहिजे होते.  याशिवाय माझा पोषाखखर्च, मी परत येईतों माझ्या परिवाराचा योगक्षेम याचीही सोय व्हायला पाहिजे होती.  सर्वांत मोठी अडचण प्रवासखर्चाची होती.  पण त्याहून दुसरी अडचण अशी होती कीं, माझ्या बी.ए. च्या व एलएल.बी.च्या परीक्षेसाठीं ५ वर्षे मला श्रीमंत सयाजीरावमहाराजांनीं सुमारें दीड हजार रुपये दिले होते आणि मँचेस्टरची स्कॉलरशिप घेतल्यानें गायकवाडींतच काय पण कुठेंही नोकरी करणें अशक्य होतें आणि ती न केल्यास घेतलेली स्कॉलरशिपची रक्कम परत करण्याचा कायदेशीर करार होता.  अशा प्रचंड फिकिरींत मी पडलों.  पण ईश्वरी कृपेनें मला यांतूनही एक वाट दिसली; ती ही कीं श्रीमंतांकडे समक्ष जाऊन झालेला प्रकार सरळपणें निवेदन करून त्यांची मदत मागावी.  त्याप्रमाणें वेळ न दवडतां मी बडोद्यास महाराजांकडे गेलों.  भेट झाली.  महाराज खरे दिलदार. ते हंसून म्हणाले, ''काय शिंदे, आमच्या पैशांची काय वाट ?''  मीं अत्यंत नम्रपणानें उत्तर केलें, ''महाराज, पत्करलेलें कार्य ईश्वराचें आहे आणि तें आपल्यास पसंत पडण्यासारखेंच आहे.  धर्मसुधारणा, समाजसुधारणा इत्यादि प्रागतिक गोष्टींचे बाळकडू आपण आजपर्यंत पुष्कळच पाजीत आलेले आहांत.  आतां तर विलायतेंतील युनिटेरियन समाजानें माझा अर्ज पसंत केल्यावर ही चालून आलेली संधि आपण दवडणार नाहीं अशा भरंवशावरच आपणांकडे आलों.  मला प्रवासास लागणारे सुमारें दीड हजार रुपये जर आपण कृपाळूपणें द्याल तर अर्थातच माझे मागचे दीड हजार रुपयांचे ॠण फिटलें असेंच मी समजेन.''  ॠण फेडण्याचा हा अजब प्रकार पाहून दयाळू महाराज हंसले आणि म्हणाले, ''बरें आहे.  शिंदे, तुम्ही यशस्वी होऊन या !''  सेकंडक्लास डेकचें जाण्यायेण्याचें भाडें देण्याची हुजूराज्ञा झाली.

हें कळल्यावर समाजाचे मित्रमंडळीस फार आनंद झाला.  बाकीची लहानमोठी तयारी होण्याला फारशी अडचण पडली नाहीं.  ही इतर तयारी करण्यास माझे मुंबई समाजांतील मित्र रा. कोरगांवकर यांनीं प्रामुख्यानें भाग घेतला.  इतरांनीं त्यांना सढळ हस्तें मदत केली.  हा बनाव सुमारें १९०० सालच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत झाला असावा.  सेकंड एलएल.बी. च्या माझ्या चारही टर्मस् भरल्या होत्या. कायदा बहुतेक वाचला होता, तरी वरील दगदगीमुळें माझी खात्रीनें पास होण्याची तयारी नव्हती.  परीक्षेचा फॉर्म भरून मुंबई युनिव्हर्सिटीकडे मीं फी देखील पाठविली होती.  पण ज्या गोष्टीकडे मनापासून कल नव्हता तिची दगदग मी कसचा वाहतों !  कायदा मागें पडला तो कायमचाच.  त्याचें स्थान दैवी कायद्यानें पटकावलें.

आश्वासन  :  हा सर्व घडत असलेला महत्त्वाचा प्रकार मी माझ्या वृद्ध वडिलांस अद्याप कळविला नव्हता.  याचें मुख्य कारण हा योग जमून येईल अशी मला खात्री वाटत नव्हती.  शिवाय त्या वेळीं विलायतेला जाणें आणि त्यांतले त्यांत मागासलेल्या देशांतील माझ्यासारख्या गरीब खेडवळानें जाणें हें फारसें संभवनीय नसल्यानें आईबाबांची सहजासहजीं अनुकूलता मिळेल असें मला वाटेना.  उच्च शिक्षण दुर्मिळ असलेल्या त्या वेळीं बी.ए., एल.एल.बी. वगैरे परीक्षा होऊन बडोद्यासारख्या संस्थानांत माझी चांगली वर्णी लागण्याचा काळ इतका जवळ आला असतांना त्या सर्वांवर निःशंक पाणी सोडून विलायतेसारख्या दूर देशांत जाण्याचा मार्ग मीं पत्करावा आणि तोही ऐहिक स्वार्थासाठीं नसून परत आल्यावर फकिरी पत्करण्यासाठीं !  हें जेव्हां आईबाबांना कळेल तेव्हां त्यांना काय वाटेल याचें दारुण चित्र मला दिसूं लागलें.  शेवटीं मला जेव्हां त्यांना सर्व प्रकार कळविणें भाग पडलें तेव्हां वडिलांना धक्का बसून ते कित्येक आठवडे आजारी पडले.  पण आश्चर्य हें कीं, माझ्या आईनें धीर सोडला नाहीं.  ती त्यांची वरचेवर समजूत घालूं लागली.  आपल्या निराशेचें दुःख आवरून धरून दोघेंही मीं स्वीकारलेल्या मार्गांत मला यश मिळावें अशी प्रार्थना करूं लागले.  इतकेंच नव्हे तर परत आल्यावर मीं जें व्रत पतकरलें होतें त्यांत आपणही भाग घेऊं असें आश्वासूं लागले.  मला धन्यता वाटूं लागली.  

प्रत्यक्ष मँचेस्टर कॉलेजची टर्म १९०१ च्या ऑक्टोबर महिन्यांत सुरू होणार होती.  तोंपर्यंत ५।७ महिन्यांचा अवधि होता.  या अवधींत मी पुण्याच्या किबेवाड्यांतील नूतन मराठी विद्यालयाच्या हायस्कुलांत इंग्रजी ६ व्या व ७ व्या इयत्तेंत इतिहास व इंग्रजी काव्य या विषयांचा शिक्षक म्हणून काम पत्करलें.  त्या वेळीं ह्या शाळेजवळच असणार्‍या जमखंडीकरांच्या वाड्यांत मी राहात असें.

शेवटीं सप्टेंबर महिना आला.  आईबाप, बहिणभाऊ, पत्‍नी व मुलगा ही सर्व मंडळी जमखंडीकरांच्या वाड्यांत मजबरोबर राहात होती.  आम्ही सगळे मिळून मुंबईस गेलों.  'पर्शिया' नांवाच्या आगबोटीनें माझा प्रवास व्हावयाचा होता.

शनिवार ता. २१ सप्टेंबर १९०१ रोजीं सकाळचे १०॥ वाजतां रा. कोरगांवकरांचे घरांतून निघालों; तेव्हांपासून वियोगाच्या तीव्र वेदना सुरू झाल्या.  बॅलार्ड पिअरवर माझ्या आधीं बरीच मित्रमंडळी जमली होती.  गुरुजन आशीर्वाद देऊं लागले.  मित्रमंडळ अभीष्टचिंतन करूं लागलें.  कांहींजण प्रवासांत उपयोगी अशा महत्त्वाच्या सूचना करूं लागले.  अशी एकच गर्दी उडाल्यामुळें मी भांबावल्याप्रमाणें झालों होतों.  १२ वाजतां प्लेग डॉक्टरची तपासणी सुरू झाली.  १२॥ वाजतां मी सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन निघालों.  दारावर आंत सोडतांना रखवालदारानें थोडासा दांडगाईचा प्रसंग आणला.

पण हिंदुस्थानांतील निदान दोन वर्षेपर्यंत तरी ही दांडगाई अखेरची असल्यानें मीं ती कौतुकानें सहन केली.  तपासणी एका मिनिटांतच आटोपली.  एकदां आंत गेल्यावर जाणारांची आणि पोचविण्यास आलेल्यांची नुसती नजरानजरही होत नाहीं, म्हणून दोघांसही फार वाईट वाटतें.  मी मचव्यांत बसल्यावर मला न भेटलेल्या बाहेरच्या तिघां मित्रांकडून पुन्हां भेटून जाण्याबद्दल तीन चिठ्या आल्या.  पण इतक्यांत मचवा निघाल्यानें माझा नाइलाज झाला.  हळू हळू माझा मायदेश डोळ्यांदेखत अंतरूं लागला.  वियोग मूर्तिमंत पुढें उभा राहून माझ्या जिवलग माणसांची उदास व खेदमय दिसणारीं चित्रें मला एकामागून एक दाखवूं लागला.

निवडणूक

१९२० सालीं माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांची धामधूम उठली.  वरील सुधारणान्वयें नोव्हेंबर महिन्यांत पहिली निवडणूक होणार होती.  मराठ्यांमध्यें जे दोन भिन्न पक्ष पडले होते त्या दोहोंची एक संयुक्त सभा जेधे मॅन्शनमध्यें झाली.  त्या सभेचें मला बोलावणें आलें.  पुढील निवडणुकींत मीं उभें राहावें असें दोघांचें मत पडलें.  मराठ्यांसाठीं सात राखीव जागा सरकारनें ठेवल्या होत्या.  ''त्या राखीव जागेसाठीं मी उभा राहणार नाहीं.  त्यांतील जातीयवाचक तत्त्वाच्या मी विरुद्ध आहें'' असें मी बजावलें.      पुणें शहरच्या उघड्यां जागेसाठीं सर्व पक्षांनीं मिळून मदत केल्यास मीं उभा राहण्याचें कबूल केलें.  माझें म्हणणें कळवण्यासाठीं 'बहुजनपक्ष' या नांवानें मीं माझा सविस्तर जाहीरनामा प्रसिद्ध केला.  त्यांतील पुढील उतार्‍यावरून माझें मत समजेल - हिंदुस्थानांतील एकंदर बहुजनपक्ष लोकसंख्येचे केवळ राजकीय दृष्ट्या दोन मुख्य भाग पडत आहेत.  ते हे कीं (१) विद्याबल, द्रव्यबल किंवा अधिकारबलानें पुढारलेला वर्ग.  (२) आणि दुसरा यांतील कोणतेंच बल अंगीं नसल्यानें व नाइलाजानें मागासलेला वर्ग किंवा बहुजनसमाज.  ह्या दुसर्‍या वर्गांतच अत्यंत तिरस्कृत अशा अस्पृश्यवर्गाचा अंतर्भाव होतो.  हल्लींच्या राजकीय सुधारणेचा नुसता अरुणोदय होतो न होतों तोंच ह्या दोन भागांत मोठा विरोध भासूं लागला आणि या विरोधानुसारे बहुजनसमाजाचा अथवा मागासलेल्या वर्गाचा एक नवीन पक्षच होऊन चुकला आहे.  ह्यालाच ब्राह्मणेतरपक्ष असें नांव दिलें जातें.  पण नाइलाज आणि बलहीनता हीं जी मागासलेल्या वर्गाची मुख्य लक्षणें तीं ह्या वर्गाच्या पक्षास 'ब्राह्मणेतरपक्ष' असें जातिविशिष्ट नांव दिल्यानें अगदीं काटेकोर रीतीनें सार्थ होत नाहींत.  म्हणूनच ह्या नवीन पक्षास बहुजनपक्ष अथवा जनपदपक्ष असें अगदीं सार्थ व निर्विकल्प नांव दिल्यानें त्यावर कसलाही आक्षेप आणण्यास जागा उरणार नाहीं.

कार्यपद्धति  :  हा नवीन पक्ष जरी इतरांशीं स्वतंत्रपणानें वागणारा आहे तरी जेथें जेथें त्याचा हितसंबंधाचा प्रश्न उभा राहील, तेथें तेथें त्याचा समानतेचा दर्जा संभाळून जी कोणी व्यक्ति असो अथवा पक्ष असो त्याला सक्रीय साहाय्य करण्यास तयार असेल त्याच्यासाठीं तेवढ्यापुरतें सहकार्य करावयाला हा पक्षही तयार राहील.  कारण ह्या पक्षाच्या पायाखालीं केवळ पोकळ भावना नसून भरीव हितसंबंध आहेत.  ह्या पक्षांत खालील वर्ग मोडतात.

१ ला, शेतकरी वर्ग  :  ह्यांत डोईजड जमीनदारांचा किंवा पिढीजात जहागीरदारांचा समावेश मुळींच होत नाहीं.  जो आपल्या मालकीचें अथवा कौलाचें शेत आपणच वाहतो आणि त्या कामासाठीं पुरेशा मजूरदारांना समान दर्जानें योग्य वेतन देऊन संभाळतो तोच शेतकरी जाणावा.

२ रा, शिपाईवर्ग  :  ह्यांत सरदारांची गणना मुळींच नाहीं.  पण सामान्य शिपायाचे हितसंबंध आमच्या पक्षानेंच राखले पाहिजेत.  कारण ते मागासलेलेच आहेत.  कुणबी हा ह्या सर्वांचा खरा पोशिंदा आणि मोठमोठे ऐतखाऊ जमीनदार व जहागिरदार हे केवळ त्याचे पोष्य होत.  तसेंच हातावर शिर घेऊन लढणारा एकांडा शिलेदार हाच खरा क्षत्रिय.  तो केवळ पट्टेवाला चपराशी नव्हे.

३ रा, शिक्षकवर्ग  :   ह्यांत सोंवळे शास्त्री, हक्कदार पुरोहित किंवा बलुते जोशी हे किंवा इतर ऐतखाऊ यांची गणना करतां येत नाहीं.  वाङ्‌मयाचें किंवा उद्यमाचें व्यावहारिक शिक्षण देण्याला जे कोणी लायख आहेत व जे आपल्या वृत्तीचा पिढीजात हक्क न सांगता बाजारभावाप्रमाणें चालू वेतन घेण्यास तयार आहेत त्यांची जात, धर्म कांहीं असो, त्यांचे हितसंबंध ह्या पक्षानें राखणें जरूर आहे.

४ था, उदमी  :   सुतार, सोनार, शिंपी, तेली, तांबोळी, गवळी इत्यादि लहान लहान धंदे करून राष्ट्राची सेवा करणारे जे अशिक्षित व अनधिकारी वर्ग आहेत तेही राष्ट्राचे धारक असून त्यांचा दर्जा शेतकरी किंवा शिपाई यांपेक्षां रतिभरही कमी नाहीं.

५ वा, दुकानदार  :  ह्यांत व्याज देऊन दुसर्‍याचें भांडवल वळवून आणून त्यावर गबर होणारे पेढीवाले किंवा कंपनीवाले वर्ज्य आहेत.  परंतु उदमी लोकांच्या व मजुरांच्या साहाय्यानें जी राष्ट्रीय संपत्ति शेतकर्‍यानें निर्माण केली व शिपायांनीं राखली तिची देशभर वांटणी होण्याला बिनव्याजी भांडवलवाल्या दुकानदारांची तितकीच जरुरी आहे.  हा वर्ग डोईजड होऊन बहुजनसमाजाचें रक्त बिनहक्क शोषणार नसेल तर ह्यालाही पुढें आणण्यासाठीं आमच्या पक्षानें झटणें अवश्य आहे.

६ वा, मजूरवर्ग  :  ह्यांत बाजारभावाप्रमाणें वेतन घेऊन अंगमेहनत करणारेच नव्हेत तर बुद्धिचातुर्य लढवणारे वकील, डॉक्टर यांचाही समावेश होण्याचा संभव आहे.  परंतु हा दुसरा वर्ग आपल्या विद्याबळामुळें आपल्या गरजेपेक्षां जास्ती धनसंचय करून अधिकारपदावरही सहजच जाऊन बसतो.  इतकेंच नव्हे तर आपल्या विद्येच्या व चळवळी स्वभावाच्या जोरावर बहुजनसमाजाचें पुढारीपणही बहुतेक हिस्से त्याच्याच वांट्याला येतें.  असे लोक तत्वतः मजूर असले तरी वस्तुतः मागासलेले नसल्यामुळें त्यांच्या हितसंबंधांची जबाबदारी त्यांच्यावरच टाकणें बरें.  बाकी उरलेल्या खर्‍या अंगमेहनती मजुरांची दाद आमच्या पक्षाशिवाय इतर कोठेंच लागणें शक्य नाहीं.  मजूरही डोईजड झाल्यास त्यांची समजूत करण्याचा अधिकार बहुजनपक्षालाच आहे.

७ वा, अस्पृश्यवर्ग  :  अस्पृश्यपणामुळें हा वर्ग मागासलेलाच आहे; एवढेंच नव्हे तर चिरडला गेला आहे.  धर्माचीं, परंपरेचीं, रूढीचीं अगर दुसरीं कोणतींही खरीं-खोटीं कारणें सांगत न बसतां अस्पृश्यता व असहाय्यता नष्ट करून त्यांना अगदीं समान दर्जानें बहुजनसमाजांत एकजीव करणें हें ह्या पक्षाचें केवळ पवित्र कार्य आहे.  पुष्कळशी संधि वायफळ वादांत, ढोंगी ठरावांत व मतलबी सहानुभूतींत अगोदरच दवडली गेली असल्यामुळें ह्या वर्गांतील व्यक्तींना साहजिकच भलतेंच वळण लागूं लागलें, म्हणून आमच्या पक्षानें सावध राहिलें पाहिजे.

८ वा, स्त्रीवर्ग  :  चालू राज्यक्रांतींत आमच्या देशांतील स्त्रीवर्गाच्या हातीं कांहींच लाभलें नाहीं.  आमचा पक्ष विद्वानांचा नाहीं; वक्तयांचा नाहीं; ओरडणारांचा नाहीं; म्हणून तो स्त्रीवर्गाला विसरणारा आहे असें थोडेंच होणार आहे ?  स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा.  त्यांची हयगय करूं तर पाळण्यांतच आमचें थडगें डोलूं लागेल हें आम्ही पूर्ण जाणून आहोंत.

येथवर आम्ही केवळ वर्गवारीनें हितसंवर्धनाचें निरीक्षण केलें.  पण ज्यांची वर्गवारी मुळींच करतां येत नाहीं असे पुष्कळ हितसंबंध आहेत.  सक्तीच्या शिक्षणाचा, मद्यपाननिषेधाचा, धार्मिक विधि व सामाजिक परंपरा पाळण्याचे बाबतींत स्वयंनिर्णयाचा इत्यादि कोणताही पक्ष घ्या.  हे सर्व राष्ट्रीय असूनही स्वतःस 'राष्ट्रीय' म्हणवून घेणाराच पक्ष जेव्हां त्यांच्या आड येतो आणि 'प्रागतिक' म्हणवून घेणारा आपले हात टेकतो तेव्हां बहुजनसमाजास जागें करून त्याला स्वतःच्या पायावर उभें करण्याचें कठीण काम करण्यासाठीं आमच्यासारख्या एखाद्या स्वतंत्र व नवीन पक्षाला पुढें येणें जरूर आहे.  राष्ट्रहिताची ज्याला चाड असेल त्याच्या हिताला आमचाही विरोध नसेल.  ते सर्व आम्हांला सामील होतील, निदान साहाय्य तरी करतील अशी आम्हांला उमेद आहे.''

विठ्ठल रामजी शिंदे
नानाची पेठ, भोकरवाडी
पुणें, ता. १ सप्टें. १९२०

निवडणुकीच्या बहुतेक खर्चाची तरतूद करण्याची जबाबदारी बडोद्याचे माझे परमपूज्य मित्र रा. खासेराव जाधव यांनीं स्वतः पत्करली.  इतकेंच नव्हे तर ते अंगमेहनतीनें स्वतः मतें मिळविण्यासाठीं पुण्यास दोन महिने येऊन राहिले.  पुण्याच्या जागेकरितां रा. नरसोपंत केळकर (जहालांमार्फत), मवाळांमार्फत शेठ मानूरकर आणि स्वतंत्रपणें रा. वासुदेवराव गुप्ते व मी असे चार उमेदवार उभे होतों. पैकीं वासुदेवराव गुप्ते यांना कोल्हापूरचे श्रीमंत शाहुछत्रपति यांचा पूर्ण पाठिंबा होता.  स्वतः महाराज आणि त्यांचे दिवाण रा. ब. सबनीस हे पुण्यास येऊन राहिले होते.  मला पाठबळ देण्यासाठीं मेहेरबान खासेराव जाधवांच्या अध्यक्षतेखालीं भवानी पेठेंत एक प्रचंड जाहीर सभा भरली.  तींत आपली बाजू मांडण्यासाठीं रा. नरसोपंत केळकरांनीं आपलें भाषण केलें.  ''त्यांचे वाडवडील शेतकरी होतें.  ते 'मराठा' पत्राचे संपादक होते, म्हणून मराठेच आहेत.''  ही बातमी ऐकल्यावर श्रीमंत शाहूमहाराजांचें मला स्वदस्तरचें एक सविस्तर पत्र आलें.  त्याचा सारांश खालीलप्रमाणें आहे.  

छत्रपतींचें पत्र  :  रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांस सप्रेम लोकांची वृद्धि असावी ही विनंती.  मला मनापासून आपलें अभिनंदन करण्याची परवानगी द्या.  आपण शहरातर्फे निवउून यावें अशी माझी आशा आहे.  रा. नरसिंह चिंतामण केळकर म्हणतात कीं ''मी मराठा आहे, म्हणून मला निवडून द्यावें.  कारण मी 'मराठा' वर्तमानपत्र चालवतों.''  त्याच्यावर मी म्हणतों कीं माझ्या बैलाचें नांव 'ब्रिटानिया' ठेवलें आहे, माझ्या आवडत्या घोड्यांचें नांव 'टर्किश फ्लॅग' ठेवलें, माझ्या गाईचेचं नांव 'जपानिका' ठेवलें म्हणून का मी जपानी अगर टर्की लोकांचा पुढारी होणें योग्य होईल ?  वि. रा. शिंदे मराठे वर्गापैकीं आहेत.  जपानांतील सामुराई (क्षत्रिय) वर्गानें आपलें उच्च स्थान सोडून सर्व लोकांस आपल्या बरोबरीचें केलें व देशोन्नति केली तसें शिंद्यांनीं केलें आहे.  मी पुण्यास लवकर येणार आहें.  भेटीअंतीं सर्व खुलासा होईल.  परमेश्वर आपणांस इलेक्ट करो.

ता. क. जहाल असो किंवा मवाळ असो.  जपानी असोत किंवा टर्किश असोत, आमचें धोरण असेंच कीं, ज्यांत जनतेचें धोरण त्यांशीं आम्ही सहाय्य करणेचें व आमचा पक्ष स्वतंत्रच राहावयाचा.  सत्यपक्षांशीं नेहमीं साहाय्य करण्याचें हेंच ना आम्हीं आमचें ध्येय ठेवण्याचें ?  ह्यांत काय चुकत असल्यास लिहून कळवावें.  आपण, वृद्ध, अनुभवशीर आहांत, म्हणून मी आपल्या उपदेशाची अपेक्षा करीत आहे.

ता. क. आम्ही कोणांतच मिळूं इच्छित नाहीं.  सत्य असेल तेथें मिसळल्याशिवाय राहणार नाहीं.  हेंच ना आम्हीं मुलांनीं ध्येय ठेवायचें ?  लोभ करावा ही विनंती.

( सही ) शाहू छत्रपति
स्टेशन बंगला, ता. ३०।८।२० इसवी

आपण आम्हां सर्वांचे विनंतीस मान देऊन इलेक्शनला उभें राहण्याचें कबूल केलें याबद्दल आम्हांस आपले उपकार वाटत आहेत.  आपल्यासारखे मोठे योग्य पुरुष मराठा समाजाला काय तर कोणत्याही समाजाला लाभले तर फारच उत्तम आहे.  इलेक्शनच्या कामीं माझ्या हातून जी सेवा होईल ती मी मोठ्या आनंदानें करीन.

( सही ) शाहू छत्रपति


भवानी पेठेंतील मारामारी  :  शाहू छत्रपति पुण्यास आले.  शिवाजी मराठा शाळेनें त्यांचे अध्यक्षतेखालीं भवानी पेठेंत एक मोठी जाहीर सभा बोलाविली.  त्यांत सर्व पक्षांची व इतरही मराठे मंडळी हजर होती.  छत्रपतींनीं मराठा क्षात्रजगदगुरु नेमण्याचा विचार चालविला होता.  मींही कांहीं बोलावें असा आग्रह केल्यावरून मीं उठून सांगितलें, ''धार्मिक बाबतींत कांहीं वाद निघाल्यास त्यांत अखेरचें मत अभिषिक्त राजानें द्यावें अशी परंपरा पहिल्या शाहूमहाराजांपासून आहे, असें इतिहास सांगतो.  आतां छत्रपति शाहू महाराजांनीं दुसर्‍या कोणास जगदगुरु न नेमतां त्याचे सर्व अधिकार आपणच चालवावेत.''  यानंतर माझ्या मागून रा. भास्करराव जाधव यांचें भाषण झालें.  त्यावर बराच वाद माजून सभेंत गोंधळ उडाला.  चांगली मारामारी झाली.  सभा उधळली.  शेवटीं या सभेचा परिणाम माझ्या निवडणुकीवर झाला.  कारण ज्या सर्वपक्षाच्या मराठ्यांनीं मिळून मला उभे केलें होतें, त्यांच्यांत भयंकर फूट पडली.

याच सुमारास अखिल राष्ट्रांत महात्मा गांधींच्या कौन्सिलप्रवेशावर बहिष्काराची चळवळ मोठ्या जोरांत चालली.  म्हणून रा. नरसोपंत केळकर यांनीं आपली उमेदवारी मागें घेतली आणि अखेरीस मलाही या निवडणुकींत अपयश आलें.  तथापि माझे मित्र खासेराव जाधव ह्यांनीं घरोघर हिंडून मतें मिळवण्यासाठीं जी अंगमेहनत केली आणि हजारों रुपयांची झीज सोसली त्याबद्दल त्यांचे उपकार मी कधीं विसरणार नाहीं.  'विजयी मराठा'कार श्रीपतराव शिंदे, रा. रा. गंगारामबुवा काळभोर, रा. जेधेबंधु आणि लष्करांतील माझे पारशी मित्र डॉ. मोदी यांनीं जी निष्काम मदत केली त्या सर्वांचा मी ॠणी आहें.

नागपूर व हुबळी शाखा

नागपूर शाखा  :   मुंबई इलाख्यांत मुंबई, पुणें, हुबळी वगैरे अंगभूत शाखा आणि त्यांच्या उपशाखांचें येणेंप्रमाणें बस्तान बसल्यावर माझें लक्ष नागपूर येथें सर्व मध्यप्रांतासाठीं मिळून एक अंगभूत शाखा काढण्याकडे लागलें. कोल्हापूरचे वकील रा. गणपत कृष्णाजी कदम ह्यांनीं ह्या कामीं स्वतःला वाहून घेण्याचें कबूल केलें.  अमरावती, अकोला, यवतमाळ वगैरे ठिकाणीं संलग्न शाखांची कामें ह्यापूर्वीच चालू होतीं.  राजधानीचें ठिकाण नागपूर येथें ह्या प्रांताची मध्यवर्ती शाखा उघडून ह्या संलग्न शाखा तिच्याकडे सोंपवून एक प्रांतिक नवीन अंगभूत शाखा उघडण्याची वेळ ठेपली होती.  १९१४ च्या उन्हाळ्यांत मी एकटाच नागपूरला गेलों.  नागपूर शहराची परिस्थिति पाहून निधि मिळविण्याचा अंदाज करणें हा उद्देश होता.  तेथील प्रागतिक पक्षाचे वृद्ध पुढारी रा. ब. वामनराव कोल्हटकर यांच्या घरीं मी उतरलों.  त्यांनीं माझें फार प्रेमळपणें स्वागत केलें. उन्हातान्हांतून मला घरोघर नेऊन त्यांनीं आपल्या वजनदार मित्रांचा परिचय करून दिला; थोडीबहुत आरंभींची मदतही मिळवून दिली.  ह्या गोष्टीनें उत्तेजन मिळून पुढें लवकरच रा. कदम यांना बरोबर घेऊन मध्यप्रांतांतील हिंदी जिल्ह्यांतून पूर्वतयारीसाठीं आणि निधि जमवण्यासाठीं एक विस्तृत दौरा मीं काढला.  भंडारा, बालाघाट, जबलपूर, रायपूर, बिलासपूर आणि उत्तर हिंदुस्थानांत सागर व दमोह वगैरे ठिकाणीं माझीं आणि रा. कदम यांचीं व्याख्यानें झालीं.  सुमारें ४००० रु. ची मदत मिळाली.  दमोहहून कदमांना नागपूरकडे परत पाठविलें आणि मी पुढें एकटाच भोपाळ, देवास, इंदूर आणि धार या संस्थानिकांच्या भेटी घेऊन आणि सहानुभूति घेऊन मुंबईला परत आलों.  नागपूर येथें पुन्हां जाऊन एंप्रेस मिलचे मॅनेजर सर बेझनजी यांची गांठ घेऊन त्यांच्या मालकीची पांचपावली येथील चाळींपैकीं एक चाळ मिशनकडे घेतली.  सर मोरोपंत जोशी, ना. मुधोळकर वकील, वामनराव कोल्हटकर, डॉ. ल. वि. परांजपे, नामदार नियोगी वगैरेंची एक कमिटी नेमण्यांत आली.  पुढें लौकरच प्लेगची सांथ उद्‍भवून कामांत मोठाच अडथळा आला.  रा. कदमांकडून हें काम निभवेना म्हणून स्थानिक कमिटीच्या तक्रारीवरून त्यांना कमी करून त्यांच्या जागीं रा. सय्यद अबदुल कादर यांची हुबळीहून सहकुटुंब रवानगी करण्यांत आली.  त्यांनीं पांचपावली येथें वर सांगितलेल्या चाळींत एक वसतिगृह म्हणून तेंच आपलें राहण्याचें ठिकाण मुक्रर केलें आणि तेथून अमरावती, अकोला, यवतमाळ वगैरेंकडील संस्थांची देखरेख आपल्याकडे घेतली.

हुबळी शाखा  :   रा. सय्यद यांची रवानगी हुबळी येथून नागपूरला करण्यांत आल्यानें त्या शाखेची जबाबदारी घेण्याला कोणा तरी तज्ज्ञ अधिकार्‍याची नेमणूक करणें भाग पडलें.  रा. दामोदर नारायण पटवर्धन ह्यांची तयारी पुणें येथील कामांत पूर्ण झाल्याचें दिसून आलें.  हुबळी येथील आश्रमांत सहकुटुंब जाऊन राहण्याची आणि तेथील वसतिगृहाची जबाबदारी घेण्यास रा. दामोदरपंत आणि त्यांच्या सुशील पत्‍नी सौ. अन्नपूर्णाबाई यांनीं आनंदानें कबुली दिली.  दामोदरपंतांची इतकी तत्परता दिसून आली कीं, त्यांनीं आपल्या वृद्ध आईलाही बरोबर नेलें.  हा प्रांत कर्नाटकांतील असल्यानें येथील सर्व कामें कानडींतच चालत.  रा. सय्यद व त्यांची सुशिक्षित पत्‍नी कल्याणीबाई यांना मूळचेंच कानडी येत असल्यानें त्यांची योजना त्या शाखेला करण्यांत आली होती.  शाळेच्या आणि वसतिगृहाच्या संख्येंत रा. सय्यद यांनीं दवाखान्याचीहि भर घातली होती.  त्यांच्यामागें रा. पटवर्धनांनीं हुबळी येथील स्थानिक कामांतच नव्हे तर धारवाड, बेळगांव, विजापूर वगैरे ठिकाणीं आपल्या उपशाखाही उघडल्या.  हुबळी म्यु. पालिटीकडून एक पुरेशी मोकळी जागा ९९ वर्षांच्या करारानें, सवलतीच्या भाड्यांनें घेतली.  मिशनच्या जागेपुढेंच एक दुसरें खाजगी हायस्कूल होतें.  त्याच्या एका कोपर्‍यांतील उघडी जागा मिशनकडे घेऊन त्यावर मिशनची एक लहानशी इमारत रा. सय्यद यांनीं बांधली होती.  त्यांत दवाखान्याची आणि शाळांची योजना केली होती.  रा. पटवर्धनांनीं ती पूर्ण केली.  तीन चार महिन्यांत रा. पटवर्धन कानडी शिकले आणि लौकरच त्या मागासलेल्या प्रांतांत त्यांनीं आपला जम चांगल्या रीतीनें बसविला.  तो इतका कीं, पुढील म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीमध्यें हुबळी शहरचे म्युनिसिपालिटीवर सरकारतर्फे त्यांची नेमणूकही झाली.

मांगांची वसाहत  :  पुण्यास जी महाराष्ट्र परिषद झाली तींत सातार्‍याहून मांग लोकांचे पुढारी श्रीतपराव चांदणे यांचा परिचय झाला होता.  मांग लोकांवर पोलिसांचा जो हजेरीचा कहर होत होता त्यासंबंधीं त्यांनीं ह्या परिषदेपुढें जोराची तक्रार केली होती.  ऑगस्ट १९१३ मध्यें पुणें येथें मिशनचें जें शिष्टमंडळ गेलें त्यावर मि. चांदणे यांना मुद्दाम नेण्यांत आलें होतें.  त्यांनीं गव्हर्नरसाहेबांपुढें खालील तक्रारी मांडल्या :-

(१) मांग गरीब असून त्यांना विशेष धंदा नाहीं.  (२) गुन्हेगार असा आळ त्या सर्वांवर अन्यायानें आला आहे.  (३) सातारा जिल्ह्यांत बरीच पडीक जमीन आहे.  ती सवलतीच्या दरानें मांगांना देण्यांत यावी.  (४) शेतकीचा धंदा मांगांना फार योग्य आहे.  (५) सातारा जिल्ह्यांत कोठें तरी प्रशस्त जागा घेऊन मांगांसाठीं एक शेतकी खेडें (वसाहत) डि. सी. मिशनकडून स्थापण्यांत यावें.  मिशनच्या मध्यवर्ती कमिटीनें ह्याविषयींची चौकशी करण्यासाठीं पुण्यांत खास कमिटी नेमली.  तिनें २६ जून १९१४ रोजीं खालील ठराव केला  :-

(१)  निदान १०० कुटुंबांची सोय होईल, अशी एक वसाहत प्रयोगादाखल सातारा जिल्ह्यांत उघडावी.  (२) रा. शिंदे यांनीं तिच्यासाठीं योग्य असा एक मनुष्य शोधून काढावा.  (३) सरकारकडून पुणें व सातारा जिल्ह्यांतील जंगलखात्यांतून नांगरटीसाठीं निवडून काढलेल्या जागांची यादी मागवावी आणि त्यांपैकीं ४०० एकर एकत्र असलेली जागा रा. शिंदे यांनीं निवडून काढावी.

डॉ. मॅन आणि मीं या कामीं मध्यभागाचे कमिशनर मि. मेकॉनकी यांची गांठ घेतली.  जमाबंदीखात्याचे मुख्य कौन्सिलर मि. लँबसाहेब व पोलिसखात्याचे इन्स्पेक्टर जनरल कनेडीसाहेब यांचेकडे रा. चांदणे यांना नेऊन त्यांच्या कार्याला वरील अधिकार्‍यांची पूर्ण सहानुभूति आधींच मिळवून ठेवली होती.  गव्हर्नरांपासून तों जिल्ह्याच्या कलेक्टरांपर्यंत पूर्ण सहानुभूति आणि मदतीचें आश्चासन मिळाल्यावर मी व डॉ. मॅन प्रत्यक्ष चौकशीसाठीं सातारा जिल्ह्यांतील तालुकानिहाय गांवें पाहण्यास निघालों.  शेतकीच्या प्रश्नावर चौकशीच्या कामीं मला मदत करण्यास विठ्ठल नामदेव काळे या तज्ज्ञ गृहस्थांस मीं बरोबर घेतलें होतें.  सातारा जिल्ह्यांत आम्ही एकंदर तीन सफरी केल्या आणि खालील तीन खेडीं वसाहतीसाठीं केंद्र बनविण्याची चौकशी करण्याचें ठरविलें.   (१) एरंडोली-मिरजेच्या पश्चिमेस ९ मैलांवर, (२) कुपवाड-बुधगांव स्टेशनच्या दक्षिणेस ३ मैलांवर व सांगली, मिरज आणि बुधगांव संस्थानच्या हद्दीच्यामध्यें.  याच खेड्यांत सुमारें १२०० एकर जमीन जंगलखात्याकडून मिळण्यासारखी असून त्यांपैकीं १५० एकर जमीन नांगरटीसाठीं अगदीं उत्तम आणि ३०० एकर साधारण प्रतीची आहे. (३) पळूस-कुडलरोड ह्या स्टेशनपासून तीन मैलांवर सांगली व औंध या संस्थानचे हद्दीमध्यें.

हीं तीन केंद्रें पहाण्यापूर्वी सातारा जिल्ह्यांत आम्हांला १००० मैल प्रवास भर उन्हाळ्यांत करावा लागला.  त्या काळीं सातार्‍यांत बैलगाडीचे रस्तेही चांगले नव्हते.  बराच भाग पायीं जावें लागलें.  तिसर्‍या सफरींत वसाहतकमिटीचे चेअरमन डॉ. मॅन हे मजबरोबर होते.  त्यांना शेतकीचा उत्तम अनुभव असल्यामुळें आणि ते स्वतः मजबरोबर कांहीं ठिकाणीं पायीं आल्यामुळें चौकशींत कसलीही कसून उरली नाहीं.  वसाहतीचें खेडें शेतकीच्या आणि उद्योगधंद्याच्या दृष्टीनें वसविण्यांत येणार होतें.  खर्चाचा आरंभींचा अंदाज किमानपक्षीं २०,००० रु. चा होता.  कुपवाडचें केंद्र पसंत करण्यांत येऊन सरकाराकडे रीतसर अर्जही गेला.  इतक्यांत महायुद्धाची धाड आली.  आमच्या चौकशीचा फायदा सरकारास मिळाला.  महायुद्धास कामीं आलेल्या शिपायांच्या कुटुंबांस मदत म्हणून वरील शेतकीच्या जमिनीची जरूर लागेल म्हणून आम्हांला ती तूर्त देतां येत नाहीं असें उत्तर आलें.  मांगांच्या तोंडचा घांस शिपायांना मिळाला.  पण अखेरीस काय झालें तें असो.  कुपवाडच्या जमिनीच्या कांहीं भागावर हल्लीं डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन कॉलेजची इमारत उभी दिसते.  उन्हातान्हांतून चौकशीची धांवपळ केली कुणीं ?  ती कशासाठीं केली ?  आणि अखेरीस नशिबानें यशाची माळ कोणाच्या गळ्यांत घातली ?  सावकाशपणें विचार करून वाचकांनींच काय वाटेल तें वाटून घ्यावें.

१९१४ च्या मध्याला युरोपांत महायुद्ध सुरू झालें.  त्यानें बहुतेक जगालाच आग लावली.  ते सुमारें चार वर्षे चाललें.  त्या घाईंत मिशनला कोणतीच नवी गोष्ट करतां येईना.  अशा वेळीं वर्‍हाड आणि मध्यप्रांत शाखांची घटना करण्याचें नवें काम अर्धेमुर्धे होऊन पडलेलें पूर्ण करावें लागलें.  या कामासाठीं कोल्हापूरचे वकील गणपतराव कदम हे पुढें आले होते.  आजपर्यंत अशी नवीन शाखा काढण्याचे पूर्वी ज्यांच्याकडे त्या कामाची जबाबदारी द्यायची, अशा प्रचारकाची पूर्वी तयारी केली जात असे.  रा. कदमांची अशी तयारी करण्याला वेळ नव्हता.  तशांत नागपूरला त्या वेळीं प्लेगचा कहर उडाला होता.  अशा स्थितींत युद्धाचा वणवा पेटला.  अनेक अडचणींमुळें कदमांकडून हें काम झेंपेना.  खरें पाहतां मध्यप्रांतांत नागपूर हें ठिकाण अशा कामाला फार अनुकूल होतें.  वर्‍हाड आणि मध्यप्रांतांत लोक सधन आहेत.  जमीनदारपद्धति तेथें असल्यानें अशिक्षित लोकांतील पुष्कळ लोक सधन आहेत.  महाराष्ट्रांतून सुशिक्षित लोक नशीब काढण्यास तिकडे जाऊन सुसंपन्न स्थितींत राहून सुधारणेला अनुकूल आहेत.  वर्‍हाड-मध्यप्रांतांतील अस्पृश्यवर्गही इतर प्रांतांपेक्षां सांपत्तिक दृष्ट्या चांगल्या स्थितींत आहे.  मुंबईस ह्या मिशनचें बोर्डिंग निघाल्यावर बहुतेक वर्‍हाडांतील विद्यार्थ्यांचा भरणा या संस्थेंत झाला.  यावरून या प्रांताची अनुकूलता मिशनच्या चालकांनीं ओळखली होती.  म्हणून त्यांनीं येथें उपक्रम सुरू केल्यावर वर सांगितलेल्या अडचणींतूनहि वाट काढून मिशननें आपलें ठिकाण येथें दृढ केलेंच.  रा. सय्यद आणि त्यांची सुशिक्षित पत्‍नी कल्याणीबाई ह्यांनीं अत्यंत परिश्रम घेऊन हें आरंभींचें श्रेय मिळविलें.  पुण्याची शाखा रा. सय्यद ह्यांनींच प्रथम उघडली.  नंतर ती रा. ए. के. मुदलियार यांच्याकडे देण्यांत आली.  रा. सय्यदांच्या बळावरच हुबळीची कर्नाटक शाखाही स्थापण्यांत आली आणि आतां अडचणीमुळें नागपूराही सय्यदांनाच सहकुटुंब पाठवावें लागलें ही गोष्ट रा. सय्यद यांना मोठी भूषणावह आहे.  काम काढल्यावर पैशाची मदत कशीबशी मिशनला मिळे पण लायक आणि वाहून घेतलेल्या माणसांचा तुटवडा मिशनला नेहमींच भासे.  सत्त्वाची पदोपदीं परीक्षा करणार्‍या ह्या कठीण कामाला वाहून घेण्याला स्त्री-पुरुष मिळावयाचे तर ते वेडेपीरच असले पाहिजेत.  असले वेडेपीर पुरेसे मिळाले नाहींत तरी जे मिळाले तेंच मिशनचें भाग्य समजावें.  वाहून घेणारा माणूस मिळण्यापूर्वीच मिशनच्या कार्यक्षेत्रावर नवीन अगभूत शाखांचा उदय होत असे, आणि त्याला कोठून तरी, कसा तरी कामचलाऊ मनुष्य मिळत असे.

  1. धर्मसेवा
  2. दौरा
  3. दुस-या गटाची तयारी
  4. दुष्काळ व इतर कामें
  • 40
  • 41
  • 42
  • 43
  • 44
  • 45
  • 46
  • 47
  • 48
  • 49
Page 45 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी