दौरा

नाशिक  :  अशा वेळीं माझ्या मुलाच्या मृत्यूमुळें वैतागून मीं मनःशांतीसाठीं महाराष्ट्रांत व कर्नाटकांत दौरा काढला.  'केवळ विश्वासासाठीं' या मथळ्याखालीं हा दौरा सुबोध-पत्रिकेंत प्रसिद्ध झाला आहे.  बरोबर मीं डॉ. रुबेन व स्वामी स्वात्मानंदजी यांना घेतलें.  प्रथम ठाण्यास उतरलों.  तेथें डॉ. संतुजी रामजी लाड यांचे घरीं राहून उपासना चालवली.  जाहीर व्याख्यान झालें.  त्यांत तेथील सभासद रा. गुप्‍त यांनीं भाग घेतला.  त्यानंतर नाशिक येथें तेथील सुप्रसिद्ध वकील माझे मित्र रा. नीळकंठराव पाटणकर यांचेकडे उतरलों.  जाहीर व्याख्यानें व खाजगी संभाषणें सुरू झालीं; पण सर्वांत डॉ. रुबेनचें भजन लोकप्रिय ठरलें.  भजनमार्गांत फारसा शुष्क बुद्धिवाद किंवा खरा प्रयत्‍नवाद आम्हां हिंदु लोकांना मानवत नाहीं.  भक्तिरसाच्या पुरांत वाहात जाणें आम्हांला आवडतें.  रुबेननें एकतारीवरील भजनांत कांहींही मत प्रतिपादलें तरी चालेल, एरव्हीं खटखट नको, असें एका पुढार्‍यानें स्पष्ट सांगितलें.  रा. पाटणकरांचे ओळखीनें व सुचनेवरून नाशिक जिल्ह्यांतील आसवलें येथें राहणार्‍या अस्पृश्यवर्गांतल्या एका श्रीमंत पुढार्‍याकडे गेलों, पण आम्हां तिघांचा विचित्र वेष पाहून आम्ही कांहीं तरी मागावयाला भिकार-बैरागीच आलों, अशी समजूत करून घेऊन मुख्य मालक आम्हांस घराबाहेर भेटावयासच आला नाहीं.  आम्ही कंटाळून नदीवर जाऊन स्नान वगैरे उरकलें.  खावयास आमच्याजवळ उन्हाशिवाय कांहींच नव्हतें.  मुकाट्यानें आम्हीं अहमदनगरची वाट धरली.  पुढें रा. पाटणकरांनीं या गृहस्थाची चांगलीच हजेरी घेतली.  वर्तमानपत्रीं याची चर्चा झाली; पण सर्व व्यर्थ !  अहमदनगरचें काम आटोपून आम्ही बारामतीस आलों.  डॉ. रुबेननीं अहमदनगराहूनच कामाची रजा घेतली आणि त्यांची जागा रा.लक्ष्मण मनकू सत्तूर यांनीं घेतली.  बारामतीला ब्राह्मधर्माचा प्रसार अगदीं नवीन होता.

एक पंढरीमाहात्म्य  :  बैलगाडीनें आम्ही तिघे पंढरपुरास गेलों.  येथें प्रार्थनासमाजाच्या बालहत्या-प्रतिबंधक गृहांत उतरलों.  तेथील हायस्कूलचे प्रमुख रा. मोडक आमच्या परिचयाचे होते.  स्वात्मानंदजींचें व माझीं अशीं दोन व्याख्यानें या दोन दिवशीं स्वारीनें जाहिराती लावून आपल्या शाळेंत केलीं; पण आयत्या वेळीं पाहातों तों या स्वारीचा डाव भलताच होता.  अर्धा तास उलटून गेला, तरी शाळेंत एक चिट्पांखरूंही आलें नाहीं.  हेडमास्तांनीं आपल्या विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणीं नाकेबंदी केल्यामुळें आमचा हा कोंडमारा झाला.  अक्षरशः रिकामीं बाकें आमच्याबरोबर दिसूं लागलीं.  स्वामी स्वात्मानंदजी मोठे करारी.  ''शिंदेजी, आज हम व्याख्यान करेंगे.  आप सुनीये.  कल आप कीजिये और मैं सुनोगा.''  असें म्हणून त्यांनीं संपूर्ण व्याख्यान दिलें.  दुसरे दिवशीं मींही तसेंच केलें.  हें पंढरीमाहात्म्य.  'हा तो कांहीं नव्हे निराशेचा गांव ।  भले पोटीं वाव राखिलीया  ॥

पुढें सोलापुरास सरकारी वकील रा. नागेश पै यांचेकडे उतरलों.  तेथील रिपन क्लबांत व्याख्यान झालें.  येथें पंढरपुराच्या उलट प्रकार घडला.  व्याख्यानावर चांगली चर्चा झाली.  विजापुरांत रा. आजरेकर वकिलांच्याकडे उतरलों.  तेथील एका थिएटरांत व्याख्यान झालें.  आमच्याबरोबर ब्राह्मो पोस्टल मिशनच्या पत्रिकांचा व पुस्तकांचा गठ्ठा होताच.  ही सामुग्री आम्ही सढळ हातानें वांटीत चाललों.  हुबळीस सर नारायण चंदावरकरांचे व्याही रा. नारायणराव शिरूर यांचा कळकळीचा पाहुणचार घेतला.  म्युनिसिपल हॉलमध्यें व्याख्यान झालें.  धारवाडांत उतरण्याची विवंचना पडली.  तेथील माझे बालमित्र रा. जनार्दन सखाराम करंदीकर यांची गांठ पडली.  त्यांनीं उतरण्याची व कामाची उत्तर सोय केली.  बेळगांवास आम्ही मणेरीकर यांचेकडे उतरून त्यानंतर पुण्याहून मुंबईंत आलों.

तातंडीची तार  :  घरीं परत येईतोंपर्यंत मंडळीचा आजार वाढला होता.  अशा घाईंत काशी येथील भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेची कामगिरी अंगावर घ्यावीच लागली. पुढील नाताळांत तें काम आटोपून बंगाल-बिहार-आसामच्या लांब दौर्‍यावर निघालों.  शेवटीं बदरीसाल येथें जाहीर व्याख्यान करीत असतां घरून एक तांतडीची तार हातीं आली.  मुंबईस सौ. रुक्मिणीबाई हिच्यावर कामा हॉस्पिटलमध्यें एक कठीण ऑपरेशन झालें आणि अहमदनगर येथें बहीण चंद्राबाई मृत्युशय्येवर पडली आहे, असा मजकूर तारेंत होता.  डॉ. वैकुंठ कामत ह्यांनीं ही तार केली होती.  जवळजवळ तीन हजार मैलांचा दौरा टाकून मी तांतडीनें घरीं निघालों.  रात्रीं १२ वाजतां मी अहमदनगर येथें पोंचलों.  प्रिय भगिनीचें शेवटचें दर्शन घेऊन मी पुन्हां येतों असें आश्वासन देऊन पत्‍नीच्या समाचारास मुंबईला गेलों.  दुसरे दिवशीं चंद्राबाईच्या निधनाची बातमी आली.  १९०६ चा फेब्रुवारी ता. २ हा दिवस.  ह्याचें नांव प्रचारकार्य !

उदार धर्म वाचनवर्ग  :  ता. १२ फेब्रुवारी १९०४ रोजी ब्रिटिश ऍंड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचे सेक्रेटरी यांचेकडून पत्र आलें.  त्यांत सेंट्रल पोस्टल मिशन, लंडन या संस्थेनें प्रार्थनासमाजामार्फत ह्या मिशनचें कार्य यशस्वी रीतीनें चालविल्याबद्दल शिंदे आणि सुखटणकर यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला.  यानंतर ता. १८ आक्टोबर १९०४ रोजीं वरील संस्थेकडून दुसरें पत्र येऊन त्यांत ह्याच कामाचा विस्तार करण्यासाठीं उदार धर्मवाचक ग्रंथांचा एक विशेष वर्ग वालवून त्यांत विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना पारितोषिकें देण्याची व्यवस्था केल्यास तूर्त १०० रु. ची देणगी पाठवूं काय, असें विचारलें होतें.  कलकत्त्यास हेमचंद्र सरकारनें असा वर्ग काढला होता व त्यांना अशी देणगी देण्यांत आली होती.  उदार धर्मवाङ्‌मयाचा प्रसार हिंदुस्थानांत अधिक प्रमाणावर करण्यासाठीं ब्रिटिश ऍंड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचा प्रतिनिधी या नात्यानें काम चालवल्यास माझीं इतर कामें संभाळून मीं तयार आहें कीं नाहीं हें विचारलें होतें.  तयार असल्यास वाङ्‌मयाचा सांठा गरजेप्रमाणें अधिक पुरवण्याची हमी घेतली होती.  त्यासाठीं जो खर्च होईल तोही वेळोवेळीं रोख पाठविण्याची कबुली दिली होती.  त्यांना मीं उत्तर कळवलें कीं, 'मी हा विशेष वर्ग चालवण्याचें कार्य आधींच सुरू केलें आहे.  ह्या वर्गांतील हजेरीपटावर सुमारें ३० अंडरग्रॅज्युएटस्चीं नांवें आहेत.  तूर्त विद्यार्थी युनिव्हर्सिटीच्या परीक्षेंत गुंतले असल्यामुळें हा वर्ग बंद ठेवण्यांत आला आहे.  योग्य वेळीं सालोसाल तो पुढें चालू होईल, ही व्यवस्था कित्येक वर्षे चालू ठेवण्यांत आली.  त्यामुळें तरुणांचें लक्ष समाजाचे कामाकडे विशेष लागलें.