1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

अंतर्बाह्य खळबळ

एक प्रश्न  :  पहिल्या सहा वर्षांत मिशनची वरील वाढ झाली हें खरें !  पण ती होत असतांना अनेक अडचणी, विघ्नें, गैरसमज आणि परीक्षेचे प्रसंग आले हेंही खरेंच.  वाढ झपाट्यानें होऊं लागली असतां पहिला प्रश्न असा उद्‍भवला कीं, हें मिशन मुंबई प्रार्थनासमाजानें आपल्या ताब्यांत आणि जबाबदारीखालीं आपलेंच एक अंगभूत काम अशा दृष्टीनें चालवावें कीं, तें सर्व राष्ट्राचें काम आहे म्हणून सर्वांचें सहकार्य मिळवून शक्य तेवढी त्याला बाहेरूनच मदत करावी ?  डॉ. भांडारकरांचें मत पहिल्या बाजूनें पडलें.  आरंभीं मिशनच्या मध्यवर्ती कमिटीवर सर्व अधिकारी आणि सभासद प्रार्थनासमाजाचेच पुढारी होते.  अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या प्रोत्साहनानें आणि बळावरच मीं हें काम काढलें होतें.  पुढें बरींच वर्षे समाजाची सहानुभूति आणि मदत मिशनला बिनतक्रार व आनंदानें मिळत होती.  मिशनचा सामाजिक हेतु समाजाला पूर्णपणें मान्य होता.  इतकेंच नव्हे तर मिशनचें कार्य धर्माच्या पायावरच चालवावयाचें होतें.  तो पायाही समाजाला मान्य होता.  मात्र अस्पृश्यवर्गांतून समाजाला सभासद मिळावे असा हेतु समाजानें कधींच बाळगला नाहीं आणि तशी तक्रारही कधीं कोणी बाहेरच्यांनीं केली नाहीं.  म्हणून साहजिकच डॉ. भांडारकरांना वाटूं लागलें कीं, प्रार्थनासमाजानें हें काम आपल्याच जबाबदारीवर चालवावें.  बंगल्यांत ब्राह्म समाजानें आणि पंजाबांत आर्य समाजानें ह्या मिशनचें काम इतरांची मदत घेऊन पण स्वतःचच नियंत्रणाखालीं चालविलें होतें. म्हणून डॉ. भांडारकरांचे मतांत कांहीं वावगें होतें असें नाहीं.  पण ह्या मिशनचें काम नेहमीं वाढतें राहणार. प्रश्न जरी हिंदूंपुरता असला तरी अस्पृश्यतानिवारणाची जबाबदारी ब्रिटिश सरकार आणि हिंदुस्थानांत राहणार्‍या प्रत्येक जातीच्या आणि धर्माच्या माणसावर पडते, हें आम्हीं वेळोवेळीं सर्वांना बजावूनच काम चालविलें होतें.  पैशाची मदत जर सर्वांकडून घ्यावयाची तर त्याचा विनियोग आणि सर्व कामांच्या जबाबदारीचा वांटा खुशीनें घेतील त्यांना देण्यांतच शहाणपणा आहे, हें आम्ही जाणूनच होतों.  म्हणूनच सर नारायणराव आणि कमिटीचे इतर सभासदांना मिशनच्या कामांत सर्वांना मोकळीक ठेवावी असें वाटलें.  डॉ. भांडारकरांनाही लवकरच तें पटलें आणि हा वाद फारसा माजला नाहीं.

माझी स्थिति  :  काम झपाट्यानें वाढूं लागल्यामुळें अर्थातच माझा वेळही ह्या कामांत अधिक अधिक जाऊं लागला.  मी मूळ प्रांतिक समाजाच्या कामाला वाहिलेला.  अल्प का होईना पण माझ्या योगक्षेमाची तरतूद समाजानें केलेली.  अर्थातच समाजाच्या कळकळीच्या सभासदांना - विशेषतः ज्यांनीं मला मदत केली होती त्यांना - सहाजिकपणें ह्या बाबतींत वैषम्य वाटूं लागलें.  हळू हळू हा विषय वादग्रस्त होऊं लागला, आणि त्यांत कोणाचा काय इलाज !  जनतेची सेवा हीच ईश्वराची सेवा असें ब्राह्म आणि प्रार्थना समाज नेहमीं ओरडून सांगत आहे.  हरिजनसेवा करण्यांत प्रार्थना समाजाची सेवा मी विशेष उत्कटतेनें करीत आहें असेंही मनःपूर्वक वाटत होतें.  पण मीं मिशनमध्यें वेळ न खर्चतां समाजालाच चिकटून रहावें असा व्यक्तिशः मजसंबंधी वाद सुरू झाला; तेव्हां माझी स्थिति नाजूक झाली.  मला दगदग चिंता पडत होती; त्यांत आत्मसमर्थनाचा बोजा माझ्यावर येऊं लागला.  तो जड वाटूं लागला.  मिशनांचीं आणि समाजाचीं दोन्हीं कामें मी सांभाळीतच होतों.

माझ्या पाठीमागें माझे परम मित्र वासुदेवराव सुखटणकर हे मँचेस्टर कॉलेजांत धर्मशिक्षणार्थ गेले.  इंग्लंडांत दोन वर्षे राहून व जर्मनींत आणखी दोन वर्षे राहून १९०७ सालीं ते मुंबईस परत आले आणि प्रार्थना समाजाच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनीं अंगावर घेतली.  पण योगायोग असा झाला कीं, त्यांनीं हें काम वर्ष-सहा महिन्यांतच सोडून दिलें.  म्हणून माझ्यावर प्रार्थना समाजाच्या कामाचा बोजा पडल्यानें मीं तिकडे अधिक लक्ष पुरवावें हें म्हणणें सकृद्दर्शनीं सयुक्तिक होतें.  तरी पण समाजांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बहुतेक सभासद यांना कळून चुकलें होतें कीं, मिशनच्या कामांतून माझी सुटका होणें केवळ अशक्य होतें.  म्हणून त्यांनीं कोणत्याही प्रकारची हरकत घेतली नाही; इतकेंच नव्हे तर सालोसाल अधिक नेटानें सहकार्य केलें.

टिळकांस शिक्षा :  वादाचें तिसरें एक कारण उद्‍भवलें.  हिंदुस्थानच्या राजकारणांत राष्ट्रीय पक्ष आणि प्रागतिक पक्ष असे दोन भेद पडून एकाचें लक्ष समाजसुधारणेकडे आणि सरकारशीं जुळतें घेऊन काम करण्याकडे अधिक तर दुसर्‍याचें लक्ष राजकीय यशाकडे आणि तेंही सरकारशीं विरोध करून, निदान फटकून राहून, मिळण्याकडे होतें.  आणि मला तर माझ्या कामांत मग तें प्रार्थना समाजाचें असो, मिशनचें असो कीं इतर कोणतें असो, होतां होईल तों सर्वांचें सहकार्य मिळविणें अवश्य होतें.  इतकेंच नव्हे तर माझेंही मतस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्य कोणतीही आपत्ति आली तरी पूर्ण राखून ठेवण्याच्या हक्काला मीं कधींही बाधा येऊं दिली नाहीं.  पडेल तो त्याग करणें, येतील त्या संकटांना तोंड देणें, ह्या बाबतींत घरादाराचाही मुलाहिजा न राखणें ही गोष्ट वेगळी.  पण स्वतःचें व्यक्तिस्वातंव्य घालवून घेऊन, आपलें व्यक्तित्वच नष्ट करून घेणें ही गोष्ट वेगळी.  राजकारणांत माझें मत आणि कल पूर्णतः राष्ट्रीय बाजूकडे होता.  तथापि मी कोणत्याही पक्षाशीं तादात्म्य पावलों नाहीं.  पण मत स्पष्ट सांगावयाला आणि तदनुरूप वागायला मी कधींही कचरलों नाहीं.  माझीं मतें प्रार्थना समाजावर लादण्याचा आणि प्रार्थना समाजाचीं राजकारणांतील प्रागतिक बाजूचीं मतें इतरांवर लादण्याचा मीं कदापिही प्रयत्‍न केला नाहीं.

पण एकदां एक चमत्कारिक योग आला.  १९०७ च्या सुमारास लोकमान्य टिळकांनीं मद्यपाननिषेधाची प्रचंड धामधूम उठविली.  तींत सर्व पक्षांनीं आणि कांहीं ख्रिश्चन मिशनरीसारख्या लोकांनीं भाग घेतला.  अशाच वेळीं सुरत येथें झालेले काँग्रेस अधिवेशन लोकमान्यांनीं उधळून लावून काँग्रेसला आपल्या कक्षेंत खेंचलें.  त्यामुळें ते सरकारच्या विशेष डोळ्यांवर आले.  लवकरच त्यांच्यावर खटला होऊन त्यांना सहा वर्षे कारावासाची जबर शिक्षा झाली.  शिक्षा फार निष्ठुर झाली, म्हणून पुष्कळांना तिचा फार चटका लागला.  मद्यपाननिषेधाची चळवळ आणि त्यांत कुठें कमीजास्त बोलल्याबद्दल ही शिक्षा.  त्याबद्दल मलाही फार वाईट वाटत होतें.  शिक्षा झाल्यावर लवकरच रविवारचा दिवस आला.  त्या दिवशींच साप्‍ताहिक उपासना चालविण्याची माझी पाळी होती.  प्रार्थनेच्या वेळीं मीं गहिंवरून लोकमान्यांचा उल्लेख केला.  एवढ्या मोठ्या कारावासांत ह्या जनतेच्या पुढार्‍याला आयुरारोग्य लाभो, शरिराला विश्रांति आणि मनाला शांति मिळो, इतकेंच नव्हे तर त्याचें कोठें कांहीं चुकत असलें तर उच्च सत्याचा त्याला मार्ग दिसो अशी मीं स्पष्ट शब्दांत प्रार्थना केली.  ह्याबद्दल समाजांत खळबळ उडाली.  सर नारायणराव चंदावरकर व डॉ. भांडारकर वगैरे गुरुजनांनीं मला समक्ष बोलावून घेऊन खुलासा मागितला.  मीं नम्रतापूर्वक सांगितलें कीं, ''मला आपण विश्वासानें आचार्य आणि प्रचारक नेमलें आहे.  समाजांत सर्व प्रकारचीं, सर्व मतांचीं आणि सर्व दर्जांचीं माणसें आहेत, हें मी पूर्ण जाणून आहें.  ईश्वरापुढें उभा राहून प्रार्थना करीत असतां भारताचें संकलित भवितव्य ओळखून प्रार्थना करणें माझें जरूर आणि पवित्र कर्तव्य आहे.  ह्यांत ब्रिटिश सरकारची कदर ओळखून माझें आध्यात्मिक कर्तव्य करणें भाग आहे.  ह्यांत मीं कच खाल्ली तर मी स्वतःशींच अपात्र ठरेन.  आपला विश्वास असेल तर मला ह्या जागेवर ठेवा.  पण माझ्या कामांत स्वतः मला आणि माझ्या ईश्वराला जबाबदार राहूं द्या.''  हें निर्वाणीचें उत्तर ऐकून गुरुजनांनीं चांगला विचार केला आणि हें संकट तात्पुरतें मिटलें ह्याबद्दल मी गुरुजनांचा निरंतर आभारी राहिलों.

एक काहूर  :  पण ह्यानंतर दुसरेंच एक प्रचंड काहूर अकस्मात् उठलें.  १९०७ सालीं महाराष्ट्रांत एक अशांतीची वावटळ सुटली.  ती वर्ष दोन वर्षे चालली.  तींत १९०८ सालीं नाशिक जिल्ह्यांत एक अत्यंत खेदजनक प्रकार घडला.  त्या जिल्ह्याचे लोकप्रिय कलेक्टर जॅक्सन ह्यांचा खून एका माथेफिरूनें केला.  सरकारी अधिकार्‍यांना आणि समंजस लोक-पुढार्‍यांना मोठा धक्का बसला.  थोड्यांच महिन्यांपूर्वी ह्याच कलेक्टरांच्या उदार सहाय्यानें नाशिक येथें आमच्या मिशनची स्थानिक कमिटी स्थापिली गेली होती.  अमरावतीचे तरुण महार पुढारी यांनीं ह्या कमिटीच्या स्थापनेसाठीं नाशिक जिल्ह्यांत हिंडून, व्याख्यानें देऊन लोकमत तयार केलें होतें.  ह्यापूर्वी नामदार गव्हर्नरसाहेब सर जॉर्ज क्लार्क यांनीं आपली कन्या मिस् व्हायोलेट क्लार्क यांच्याकरवीं मोठा जाहीर जलसा भरवून मिशनला मोठी देणगी देऊन आपली सक्रीय सहानुभूति दाखविली होती.  मोठमोठे संस्थानिक, हिंदु, पारशी, ख्रिस्ती वगैरे लोकांचे पुढारी ह्यांचे लक्ष मिशननें वेधलें होतें.  इतकेंच नवहे तर जिल्ह्याचे कलेक्टर, असिस्टंट कलेक्टर वगैरे युरोपियन अधिकारी मिशनला मदत करूं लागले होते.  डॉ. हॅरोल्ड एच. मॅन, कर्नल स्टीन, मिस्टर सेज्विक वगैरे सारखे मुलकी आणि लष्करी अधिकारी पुणें शाखेच्या कमिटीवर सभासद होऊन निधि जमविण्याच्या कामीं मदत करीत होते.  अशा शुभ वेळीं ह्या भयंकर खुनामुळें मोठा अपशकून झाला.  वसतुतः ह्या खुनाचा मिशनच्या कार्याशीं काडीमात्र संबंध नव्हता.  तथापि स्थानिक अधिकार्‍यांत खळबळ उडणें साहजिक होतें.  पुणें शाखेकडून मला आणि अध्यक्ष चंदावरकरांना तांतडीचीं पत्रें आलीं.  साहजिकच चंदावरकरांना चिंता लागली.  त्यांना मीं समक्ष भेटून ताबडतोब पुण्यास जाऊन सर्व संशय निवारण करून येतों असें आश्वासन देऊन मी पुण्यास गेलों.  त्या वेळीं सर जॉन म्यूर मॅकेंझी मुंबई सरकारच्या कार्यकारी मंडळाचे मुख्य सभासद होते.  पुढें ते कांहीं वेळ तात्पुरते गव्हर्नरही झाले.  त्यांची पत्‍नी लेडी म्यूर मॅकेंझी या आमच्या मिशनच्या महिला कमिटीच्या अध्यक्ष होत्या.  मी मिशनच्या सोज्वळपणाबद्दल ह्या दोघा नवराबायकोची खात्री पटविली होती.  माझ्या मुलाखतींत सर जॉन यांनीं स्पष्ट सांगितलें कीं, ''सर नारायण चंदावरकरांचे नांवामुळें आणि तुमच्या कामाच्या तपशीलवार माहितीमुळें तुमच्याबद्दल तिळमात्रही संदेह आमच्या मनांत येणार नाहीं हें पक्कें ध्यानांत ठेवा आणि तुमचें काम निर्वेधपणें पुढें चालवा.  झालेल्या गुन्ह्याबद्दल सरकार योगय तो बंदोबस्त करील.  त्याची झळ तुम्हांला लागणार नाहीं.''  माझा जीव खालीं पडला.  पुणें शाखेच्या कमिटीला नवीन धीर आणि नवीन जोम आला.  कमिटीचे अध्यक्ष डॉ. मॅन हे दमदार कार्यकर्ते.  सर नारायणरावांप्रमाणेंच ते मिशनच्या कामीं जातीनें लक्ष घालीत.  त्यांना कोणत्याच प्रकारचा संशय आला नव्हता.  पण मी मुंबईस परत येऊन पाहतों तों सर नारायणराव यांच्या राजीनाम्याचें पत्र माझ्या टेबलावर आढळलें.  मी ताबडतोब त्यांच्याकडे जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला.  अशा धामधुमीच्या वेळीं नामदार गव्हर्नरांची भेट घेणें उचित नव्हे; ही लाट उसळून गेल्यावर त्यांच्याकडे एक शिष्टमंडळ नेऊन घडलेल्या शोचनीय प्रकारांचा त्यांत संबंध न दाखवतां मिशनच्या अनेक गरजा त्यांचेपुढें ठेवून सरकारी रीत्या त्यांची सहानुभूति मिळविण्याचा आम्हीं प्रयत्‍न करावा.  असा प्रेमळ आणि पोक्त सल्ला सर जॉन म्यूर मॅकेंझी यांनीं दिला वगैरे मजकूरही मीं सर नारायणरावांस सांगितला.  मग त्यांनीं राजीनाम्याचा आग्रह धरला नाहीं.

दुष्ट वार्ता  :   पुढें १९०९ सालच्या आरंभीं मी मुंबईस असतांना मिस् व्हायोलेट क्लार्क ह्यांच्याकडून एक खाजगी पत्र आलें.  ह्या उदार स्त्रीनें जलसा करून मिशनला देणगी दिल्यापासून मिशनचें कार्य प्रत्यक्ष पाहावें अशी इच्छा धरली होती.  प्रतिष्ठित स्त्रियांच्या कमिटीकडून आणि निराश्रित सेवासदनाच्या प्रचारकांकडून अस्पृश्यवर्गाच्या कंगालखान्यांतून या गरीब लोकांची जी प्रेमळ शुश्रूषा व निःस्वार्थ सेवा चालली होती तिचा तपशील ह्या उदार स्त्रीचे कानांवर गेला असला पाहिजे, म्हणूनच तिनें मजला खाजगी पत्र लिहून गरिबांच्या घरोघर जाऊन हीं सेवेंची कामें आपल्याला समक्ष पाहाण्यास मिळतील काय असा प्रश्न केला होता.  अर्थात् मीं अनुकूल उत्तर दिलें.  लवकरच १९०९ च्या मार्चमध्यें मिशनच्या शाळेचा बक्षिससमारंभाचा बेत ठरविण्यांत आला.  एल्फिन्स्टन रोडजवळील मिशनच्या ठिकाणाच्या बाजूस एक विस्तीर्ण पटांगण होतें.  तेथें भव्य मांडव घालण्यांत आला.  सामाजिक मेळा, स्त्रियांची सभा, प्रीतिभोजन वगैरे पूर्वीचीं कामें देखील आटोपून घेण्यांत आलीं.  मुख्य बक्षीससमारंभाचे दिवशीं अध्यक्षस्थान स्वीकारून आपल्या कन्येच्या हस्तें मुलांना बक्षिसें वांटण्याचें गव्हर्नरसाहेबांनीं कबूल केलें होतें.  पण दैवदुर्विलास कांहीं निराळाच होता.  आम्ही ह्या समारंभाची वाट पहात असतां त्याच दिवशीं एक भयंकर व्याधी अचानकपणें होऊन ही प्रेमळ तरुण कुमारी ख्रिस्तवासी झाली अशी दुष्ट वार्ता गांवभर पसरली.  आश्चर्य आणि दुःख यांनीं आम्हां सर्वांस घेरलें आणि ईश्वरी इच्छेस मुकाट्यानें मान द्यावा लागला.  अर्थात् मिस् क्लार्क यांना गरिबांचीं दुःखें समक्ष बघण्यास संधि मिळाली नाहीं.  पुढें कांहीं दिवसांनीं सर जॉर्ज यांच्या पत्‍नीही निवर्तल्या, म्हणून रजा घेऊन ते कांहीं दिवस एडन येथें रहावयास गेले.  त्यांच्याकडे रीतसर मिशनचे दुखवटे गेले.  त्यांच्या जागीं सर जॉन म्यूर हे तात्पुरते गव्हर्नर झाले.  पुढें ढकलण्यांत आलेला बक्षीससमारंभ ता. १२ ऑक्टोबर १९०९ रोजीं श्रीमंत सर सयाजीराव गायकवाड यांच्या हस्तें मुंबई येथील टाऊन हॉलमध्यें टोलेजंग सभा भरवून उरकण्यांत आला.  त्याचें वर्णन मागें आलेंच आहे.

पुढें ना. गव्हर्नरसाहेब एडनहून आल्यावर त्यांचें पुन्हां लग्न झालें.  त्यानिमित्त मुंबईच्या भायखळा येथील इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या पटांगणांत मुंबई अस्पृश्यवर्गीय स्त्रियांची जाहीर सभा भरली.  ही सभा ता. ५ नाव्हेंबर १९१० रोजीं भरली.  तिचें अध्यक्षस्थान मुंबईच्या सेवासदनाच्या कार्यकर्त्या सौ. यशोदाबाई ठाकून यांनीं मंडित केलें होतें.  ना. गव्हर्नरसाहेबांच्या लग्नाचा अभिनंदनपर ठराव पास होऊन त्यांच्याकडे पाठविण्यांत आला.

शिष्टमंडळ  :  सर जॉन म्यूर मॅकेंझींनीं सुचविल्याप्रमाणें मिशनचें एक वजनदार शिष्टमंडळ ता. २५ ऑगस्ट १९१० रोजीं मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांचेकडे पुण्यांतील गव्हर्नमेंट हाउसमध्यें गेलें.  त्यांत सौ. सईबाई परांजपे - प्रि. र. पु. परांजपे यांच्या पत्‍नी, डॉ. हॅरोल्ड एच. मॅन, बॅ. एच. ए. वाडिया, दि. ब. गोडबोले, प्रो. धों. के. कर्वे आणि मी इतकी मंडळी हजर होती.  प्रथम सौ. सईबाईंनीं भाषण करून शिष्टमंडळाचे मुख्य सभासद लेडी म्यूर मॅकेंझी ह्या विलायतेला गेल्यानें त्यांना हजर राहतां आलें नाहीं याबद्दल खेद व्यक्त केला.  नंतर मीं भाषण करून मिशनचा सविस्तर लेखी अर्ज सादर केला.

त्या अर्जामध्यें पुढील विशेश मागण्या करण्यांत आल्या:  (१) ना. गव्हर्नरांनीं मिशनच्या घटनात्मक नियमाप्रमाणें मिशनचे पेट्रन म्हणून पांच हजार रुपये देऊन उदार आश्रयदाते व्हावें.  (२) मुंबई सरकारनें मातृसंस्थेला उदार ग्रँड-इन-एड (वर्षासन) द्यावी.  (३) मिशनचा ५००० रु. फंड वेगळा काढून ठेवला आहे.  त्यापासून मुंबई इलाख्याच्या मध्यभागाच्या ३ जिल्ह्यांतून सरकारी मान्यता दिलेल्या शाळांतून अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीं शिष्यवृत्त्या देण्याचें ठरविलें आहे.  ह्या खर्चाचा १३ खर्च मुंबई सरकारनें ग्रँट म्हणून दरसाल द्यावा.  (४) ह्या फंडाला मिस् व्हायोलेट क्लार्क मेमोरियल शिष्यवृत्त्या फंड हें नांव देण्याला परवानगी असावी.  (५) मुंबई इलाख्याच्या शिक्षणखात्यानें इलाख्यांतील दुय्यम शाळांतून अस्पृश्य विद्यार्थ्यांचा अधिक प्रवेश व्हावा आणि त्याविषयींचे सविस्तर अहवाल शिक्षण खात्यानें प्रसिद्ध करावे असे त्या खात्याला हुकूम सुटावे.  इलाख्यांतील म्युनिसिपालिट्यांना आणि इतर स्थानिक संस्थांना अस्पृश्यांसाठींही नवीन शाळा काढण्यासाठीं आणि जुन्या शाळांतून हजेरीची संख्या वाढविण्यासाठीं सूचना देण्यांत याव्यात.

वरील मागण्यांना नामदार गव्हर्नरसाहेबांनीं आपल्या मगदुराप्रमाणें उत्तरें दिलीं.  त्यांनीं सूचना केली कीं, लोकमतावर परिणाम करण्याचें मिशनचें काम सर्वांत महत्त्वाचें आहे आणि शिक्षणाचे बाबतींत नुसतें वाङ्‌मयीन शिक्षण देऊन न राहतां औद्योगिक शिक्षणाकडे मिशननें लक्ष पुरवावें.  ह्यानंतर डेप्युटेशनच्या सभासदांना गव्हर्नरसाहेबांनीं अल्पोपहार दिला आणि प्रत्येक प्रेमळपणानें स्वागत केलें.

गौरवपूर्ण उल्लेख  :  मिशनच्या मागण्यांचा अर्ज आणि त्याला गव्हर्नरनें दिलेलें समर्पक उत्तर ह्यांच्या निराळ्या प्रती छापून जिल्ह्यांतील अधिकार्‍यांकडे पाठवून द्याव्यात आणि मिशनच्या मागण्यांकडे जिल्ह्यांतील म्युनिसिपालिट्यांचें लक्ष वेधवावें असा मुंबई सरकारनें लवकरच ठराव पास केला.  इतकेंच नव्हे तर स्वतः गव्हर्नरसाहेबांनीं पुणें येथील फर्ग्युसन कॉलेजास भेट दिली त्या वेळीं जें भाषण केलें त्यांत कॉलेजच्या तरुण विद्यार्थ्यांचें लक्ष ह्या मिशनच्या कार्याकडे वळविलें.  ते म्हणाले, ''हिंदुस्थानांतील निरनिराळ्या मिश्र जातींना एकत्र करून लवकरच हिंदुस्थानांत एकराष्ट्राची उभारणी करावी हा सरकारचा हेतु आणि कर्तव्य आहे.  हें कार्य सर्वत्र चालू झाल्याचीं लक्षणें हल्लीं दिसत आहेत.  त्यांत भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे कार्यामुळें हिंदुस्थानांत विश्वबंधुत्व निर्माण होत आहे.  त्याचा मी येथें विशेष उल्लेख करतों.  इंग्लंडांतील पुष्कळ कॉलेजांकडून अशा मिशनसाठीं मिशनर्‍यांचा पुरवठा होत आहे.  तुम्ही देखील ह्या बाबतींत आपला शक्य तो वेळ पुरवून पुणें येथील कार्याला मदत कराल तर बरें होईल.''

मिशनचा बक्षीससमारंभ :  मिशनच्या ४ थ्या बक्षीस-समारंभानिमित्त ५ दिवस उत्सव करण्यांत आला.  त्यांत चोखामेळ्याचे प्रसिद्ध हरिदास धोंडीबा सासवडकर यांची कन्या प्रसिद्ध कीर्तनकार सौ. बायजाबाई हिचीं तीन कीर्तनें करण्यांत आलीं.  भायखळा येथील मदनपुरा मोटारस्टँडवर भव्य मंडप घालण्यांत आला होता.  त्यांत मुंबई येथील सर्व जातींचे गिरणीकामगार आणि अस्पृश्यवर्ग ह्यांच्या स्त्रीपुरुषांची अलोट गर्दी जमली होती.  बाईचीं कीर्तनें बहुजनसमाजास इतकीं आवडलीं कीं, तिसरे दिवशींची रात्रीची गर्दी अनावर झाली.  मांडवाचे खांब पाडून गर्दी आंत शिरूं लागली.  मांडव जमीनदोस्त झाल्यानें कीर्तन बंद करावें लागलें.  दुसरेच दिवशीं मुख्य समारंभाचा दिवस असून ना. गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क हे अध्यक्षस्थान स्वीकारणार होते.  आयत्या वेळीं त्यांची कन्या वारल्यामुळें गेल्या वर्षी विरस झाला होता.  त्याची पुनरावृत्ति ह्या वर्षी हा मंडप पडल्यामुळें होते कीं काय अशी भीति वाटूं लागली.  मिशनचे उत्साही कार्यकर्ते रा. अमृतलाल ठक्कर, त्या वेळचे मुंबई कार्पोरेशनचे इंजिनियर यांनीं रात्रीचा दिवस करून शेंकडों मजूर लावून पहिल्यापेक्षांही चांगला मंडप दुसरे दिवशीं दुपारचे आंत उभा करून बैठकीची जय्यत तयारी करून दिली.  गांवांतील नामांकित लोकांची गर्दी उसळली होती.  सर नारायणराव यांनीं गव्हर्नरसाहेबांचें योग्य स्वाकत केलें.  

संशयाचें निराकरण  :  नामदार गव्हर्नरांनीं या वेळीं केलेल्या सहानुभूतिपर भाषणाचे खालील उद्‍गार चिरकाल संस्मरणीय राहतील.  ''ह्या मिशनचें काम दुहेरी.  एका बाजूस वरिष्ठ वर्गाचें लक्ष अस्पृश्यवर्गाच्या दुःखाच्या कहाणीकडे वेधणें, दुसर्‍या बाजूला ह्या अस्पृश्यांना शिक्षण देऊन वर आणणें.  माझ्यापूर्वीचे एक प्रसिद्ध गव्हर्नर मौंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन ह्यांनीं आपल्या मार्च १८२४ च्या खलित्यांत अस्पृश्यांविषयीं असें स्पष्ट म्हटलें कीं, ह्या अस्पृश्य वर्गाचे लोक संख्येनें अत्यंत मोठे आणि अत्यंत तिरस्कृत गणले गेले आहेत.  ब्रिटिश सरकारनें जर ह्यांना शिक्षण दिलें तर ते उपयुक्त ज्ञानामध्यें शिखरावर बसतील; पण इतर वरिष्ठ वर्गांचा त्यांच्याबद्दलचा तिरस्कार कायम राहील आणि शिक्षण घेऊन हे ज्ञानसंपन्न झाले असतां ह्यांचा तिरस्कार करणार्‍या बहुजनसमाजाला एका बाजूस ठेवून ह्या तिरस्कृत पण नवीन सुशिक्षितांना आम्हांला हाताशीं धरावें लागेल.  ८७ वर्षांपूर्वीच्या मोठ्या मुत्सद्द्याचे हे उद्‍गार आहेत.  ह्या तिरस्कृत वर्गास जर आम्ही शिक्षण देऊं तर प्रत्यक्ष शिक्षणाचाच वरिष्ठ लोक तिरस्कार करूं लागतील अशी भीति ह्या मुत्सद्द्याला पडली होती.  आतां भारतांत किती बदल झाला आहे.  तेव्हां भारतीयांच्या मनांत कोणत्याही प्रकारचा किंतु येऊं न देतां शिक्षण द्यावें लागत होतें.  आतां कांहीं झालें तरी शिक्षणाचा मगदूर आणि पात्रता न पाहतां शिक्षण घ्या अशी एकच ओरड सुरू झाली आहे.  आतां तुमच्या मिशनची इच्छा आहे कीं, अस्पृश्यवर्गांनाही त्या शिक्षणाचा पूर्ण वांटा मिळावा.''

ह्यानंतर नामदार गव्हर्नरसाहेबांनीं आपली पूर्ण सहानुभूति व्यक्त करून भाषण संपविलें.  गेल्या वर्षी मि. जॅक्सनसाहेबांच्या खुनामुळें मिशनसंबंधीं कांहीं सरकारी अधिकार्‍यांच्या मनांत जो व्यर्थ गैरसमाज पसरला होता, त्यांच्या कानावर प्रांताधिपतींचे हे रोखठोक उद्‍गार जाऊन त्यांच्या संशयाचा निरास झाला अशी मिशनच्या चालकांची अखेरची खात्री झाली.

कठीण परीक्षा  :  ह्याच वेळीं प्रचारकांनीं अमक्या अमक्या नियमाप्रमाणें वागावें, वेळोवेळीं कामाचे अहवाल पाठवावेत, रोजनिशी ठेवावी वगैरे किरकोळ वाद धुमसतच होते.  अहवाल तर वर्षाकांठीं मी लिहीतच होतों आणि वेळोवेळीं वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करीत होतों.  माझ्या कार्यास अशा प्रसिद्धीची जरूरीच असे.  पण हीं कामें लेखी नियमांच्या चौकटींत बसविणें आणि त्यावर आग्रह धरणें हें मला केव्हां केव्हां परवडत नसे.  ह्यामुळें मी वेळोवेळीं रंजीस येऊं लागलों.  समाजाचें काम मीं माझें आध्यात्मिक काम म्हणून पत्करलें होतें.  एखाद्या ऐहिक नोकरीप्रमाणें लेखी राजीनामा देऊन तींतून सुटून जाणें मला इष्ट वाटेना.  ज्या नोकरीचा मीं अर्ज केला नव्हता ती कशी संपणार ?  विश्वासानें मला हांक मारली होती ती मी तितक्याच विश्वासानें कसल्याही ऐहिक अटी न घालतां स्वीकारली होती.  म्हणून हा प्रसंग अंतस्थ खळबळीचा होऊन राहिला.  ह्यांतून मला एकच मार्ग दिसूं लागला.  तो हाच कीं, समाजानें मला जें अल्पसें वेतन देऊं केलें तें बंद करावें; पण समाजाची नोकरी सोडूं नये.  मी नेहमीं फिरतीवर हिंडत होतों.  घरीं पत्र लिहिलें कीं, माझ्या पश्चात् कोणी हे वेतन आणून दिल्यास घरच्या मंडळींनीं तें स्वीकारूं नये.  थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे १९१० सालच्या नोव्हेंबर महिन्यांत समाजाचा व माझा प्रचारक या नात्यानें संबंध सुटला, असा समाजाच्या कमिटीनें ठराव करून मला कळविलें.  माझें मन शांत झालें.  मिशनची निराश्रित सेवासदनाची दयाराम गिडूमल यांची देणगी ह्याच सालीं दीड महिना अगोदर बंद झाली होती.  म्हणून माझी बहीण जनाबाई यांचेंही वेतन बंद झालें.  तरी त्यांनीं पूर्वीप्रमाणेंच काम चालूं ठेवलें.  समाजाचे प्रचारक या नात्यानें मीं आपलें काम १९०३ नोव्हेंबरपासून १९१० नोव्हेंबरअखेर सतत ७ वर्षे केलें.  त्यांत मीं मोठी पात्रता दाखविली असें मला मुळींच वाटत नव्हतें.  कामच असें होतें कीं, त्यांत आत्मसंतोषाला जागाच नाहीं.

मातापित्यांचा अंत  :  माझ्या घरीं मी आणि जनाबाई एवढींच काय तीं मिळवतीं माणसें.  काम अमर्याद आणि मिळकत मात्र अत्यंत मर्यादित आणि अनिश्चित.  अशा स्थितींत घरच्या माणसांचे हाल होणें हें साहजिकच होतें.  आम्ही बाहेरगांवीं मोकळ्या हवेंत राहिलेलों.  मुंबईसारख्या दाट वस्तीमध्यें घरच्या मंडळींची प्रकृति नीट राहीना.  १९०६ सालीं धाकटी बहीण चंद्राबाई नगर येथें वारली.  माझ्या पत्‍नीवर बाळंतपणात अत्यंत कठिण शस्त्रक्रिया करावी लागली.  पांचसहा महिन्यांनीं नवीन जन्मलेलें मुल वारलें.  माझ्या मातोश्रीला कॅन्सरचा असाध्य रोग जडला.  १९१० सालीं माझ्या पत्‍नीचा आजार बळावून अस्थि-क्षय (Bone Tuberculosis) झाल्यानें तिला सुमारें ६ महिने खाटेशीं जखडून ठेवावें लागलें.  १९१० सालीं फेब्रुवारी ८ ला माझ्या मातोश्रीचा अंत होऊन तिची त्या अत्यंत कठिण व्याधींतून मुक्तता झाली. तिचा ध्यास घेऊन माझे बाबाही त्याच सालांत जूनच्या २७ तारखेस कालवश झाले.

मातापित्यांचें कार्य  :  वार्धक्यांतील आणि व्याधीच्या वेदना सोसूनही माझी आई व बाबा महारवाड्यांत घाणेरड्यां वस्तींत स्वतः राहून मला मदत करीत असत.  मला मात्र प्रार्थनासमाजाच्या कामाकाजाच्या कामासाठी राममोहन राय आश्रमांत राहावें लागे.  पुढें मिशनची आथ्रिक स्थिति सुधारून सुसंघटित वसतिगृहें सुरू झालीं.  पण त्यापूर्वी अस्पृश्यांचीं पोरकीं आणि होतकरू मुलें आमच्या निराश्रित सेवासदनांत येत.  तीं वयानें लहान असत.  त्यांचें संगापन करण्याचें काम माझ्या आईनें आनंदानें पत्करलें होतें.  मिशनच्या विद्यार्थ्यांसाठीं हितचिंतकांकडून जे जुने कपडे येत त्यांत कांहीं चांगली लुगडीं येत. तीं कापून त्यांचे लहान लहान परकर, पोलकीं, अंगडीं, टोपडीं वगैरे करण्याचें काम आई काटकसरीनें करीत असे.  टायपिस्ट आणि कारकून हे पुढें मिशनला मिळाले.  पण त्यापूर्वी मिशनच्या सन्माननीय खजिनदाराच्या हाताखालीं पद्धतशीलर हिशोब लिहिणें, ऑडिटसाठीं पावत्यांची जंत्री करून ठेवणें वगैरे तपशिलाचें व दगदगीचें काम माझे बाबा चोख करीत.  ह्या कामांत जमखंडी संस्थानांत त्यांची ख्याति चांगली असे.  हीं कामें करीत असतांना ह्या दोघांच्या पवित्र मनाला वेतनाच्या विचाराचा स्पर्शही झाला नाहीं.  पण ह्यापेक्षां विशेष म्हणजे मिशनच्या कामीं माझ्या सत्त्वाची एकसारखी पारख चालली असतां मला माझ्या आईबापांचा मोठा आश्रय असे.  तो असा एकदम तुटल्यामुळें मी एखाद्या पोरक्याप्रमाणें हवालदील झालों.

अशी ही अंतर्बाह्य खळबळ उडून मी वर सांगितल्याप्रमाणें १९१० नोव्हेंबरांत प्रार्थना समाजाच्या वेतनाच्या बंधनांतून सुटलों.  त्या वेळेपर्यंत मी राममोहन आश्रमांत राहात होतों.  मीं होऊनच वेतन नाकारलें; आश्रमाचा फायदाही मी होऊनच नाकारावा हें स्पष्ट दिसलें.  आश्रम ज्या उदार गृहस्थानें समाजाला दिला त्या शेठ दामोदरदासांनीं मीं आश्रम सोडून जाऊं नये अशी मला गळ घातली.  पण शरिराच्या स्वास्थ्याला मानसिक शांतीचीच अधिक जरुरी असते.  म्हणून मी वांद्रा येथें मोकळ्या हवेंत एक लहानशी जागा भाड्यांनें घेतली आणि आश्रमाला रामराम ठोकला.  परंतु समाजांतील सलोखा मीं बिघडूं दिला नाहीं.  समाजाचे चिटणीस, माझे मित्र रा. द्वा. गो. वैद्य ह्यांनीं माझ्या योगक्षेमाची जबाबदारी व्यक्तिशः आपल्यावर घेतली.  समाजांतील आणि बाहेरच्या कांहीं थोड्यां चाहत्या मंडळींकडून खासगी रीतीनें वर्गणी जमा करून माझ्या या मित्रानें पुढें दोन वर्षे माझी तरतूद राखली.  कोणाकडून वर्गणी जमविली हें त्यानें मला मुळींच कळूं दिलें नाहीं.  मात्र माझ्या स्वातंत्र्याला आणि सुधारणाकार्याला बाध न येईल अशा करारानें ही मदत करावी अशी अट मीं घातली होती.  ती ह्या भल्या मित्रानें पूर्णपणें पाळली.  अशा रीतीनें ६०० रु. दरमहा नियमानें येऊं लागले, आणि माझ्या संसाराचें गाडें चाललें.

मुंबईतील स्थानिक कार्यक्रम

परत आल्यावर मुंबईंतील कामाचा कार्यक्रम मी ठरवूं लागलों.  धर्मकार्याचीं दोन मुख्य अंगें आहेत.  पहिलें आचार्यकार्य; दुसरें प्रसारकार्य.  ज्यांनीं धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतलेली असते अशांच्या धर्माचरणाची व्यवस्था राखण्यासाठीं प्रयत्‍न करणें, त्यांतील प्रमुख भाग म्हणजे दर आठवड्यांला साप्‍ताहिक उपासना चालविणें, घरोघरीं भेटी देऊन कौटुंबिक धर्माचरणाची निगा ठेवणें, समाजांत जे निराश्रित आणि अपंग असतील त्यांची शुश्रूषा करणें; नामकरण, उपनयन, विवाह, अंत्येष्टि इत्यादि गृहविधि चालविणें, सभासदांतील परस्पर-परिचय वाढवून समाज दृढ व्हावा म्हणून वेळोवेळीं स्नेहसंमेलनें करणें इत्यादि इत्यादि.  स्त्रियांसाठीं दर शनिवारीं आर्य महिलासमाज, मुलांसाठीं रविवारचे धर्म व नीति शिकवण्याचे वर्ग, तरुणांसाठीं तरुण ब्राह्म मंडळ, वृद्धांसाठीं संगतसभा आणि बाहेरच्यांसाठीं व्याख्यानें हा क्रम आठवडाभर चाले.  ह्यांत मी आल्यावर पुढील नवीन संस्थांची भर टाकली.

पोस्टल मिशन  :  मी विलायतें असतांना तेथील स्त्रियांनीं चालवलेलें युनिटेरियन पोस्टल मिशन हें कार्य निरखून पाहिलें होतें.  माझे मित्र वासुदेवराव सुखटणकर या वेळीं पुण्यास होते.  त्यांच्याकडून अशाच थाटावर ब्राह्म पोस्टल मिशन ही घटना मीं स्वदेशीं येण्यापूर्वीच करवली होती.  ब्राह्मधर्माच्या तत्त्वावर आणि उपासनापद्धतीवर लहान लहान पुस्तकें छापवून तीं टपालमार्गे लोकांस वांटून त्यांवर वाचकांकडून जीं प्रश्नोत्तरें येतील त्याबाबत सतत पत्रव्यवहार ठेवून सवडीप्रमाणें वाचकांस भेटीस बोलावून धर्मप्रसार करण्याच्या पद्धतीला पोस्टल मिशन हें नांव आहे.  या कामांत युनिटेरियन लोकांकडून त्यांचीं लहानमोठीं पुस्तकें व द्रव्यनिधीची ही मदत मीं मिळविली.  मी स्वदेशीं आल्यावर सुखटणकर माझ्याजागीं विलायतेला गेले.  त्यांचें पुण्यांतील कार्य मुंबईला आणून मीं तें वाढविलें.  ह्या कामीं माझे मित्र व समाजाचे सभासद सय्यद अब्दुल कादर यांची मोठी मदत झाली.  ह्या मिशनसंबंधानें पहिल्या १० वर्षांची जी माहिती प्रसिद्ध झाली आहे ती फार बोधपर आहे.  त्या सातआठ वर्षांच्या अवधींत एकंदर ३४३८ ब्राह्मधर्मावरील पुस्तकें, १२७०० लहानसान पत्रकें, ६३३ युनिटेरियन पुस्तकें व ५००० युनिटेरियन पत्रकांचा प्रसार करण्यांत आला.  ह्यांतील पुष्कळशीं फुकट वांटण्यांत आलीं.  कांहींची अल्प किंमत घेण्यांत येत असे.  जे कोणी पुस्तकांची मागणी करीत अगर पत्रव्यवहार करीत त्यांचीं नांवें एका पुस्तकांत दाखल करण्यांत येत असत व त्यांच्याशीं पत्रव्यवहार करून उदार धर्मवार्ता त्यांस कळावी, अशी व्यवस्था करण्यांत आली होती.  मी दोन वेळां मुंबई इलाख्यांतील कांहीं ठिकाणीं प्रवास करून व्याख्यानें दिलीं.  ह्या दोन्ही सफरींचा खर्च युनिटेरियन असोसिएशननें त्या वेळीं दिला होता.  पुढें प्रार्थनासमाजाशीं धर्मप्रचारक या नात्यानें असलेला माझा संबंध सुटल्यानंतर हें काम बंद पडलें.

उदार धर्मग्रंथ वाचनवर्ग (Liberal Religious Reading Class)  :  हायस्कुलांतील व कॉलेजांतील तरुण विद्यार्थ्यांना मौलिक धर्मग्रंथांचे वाचन करण्याची संवय लागावी म्हणून हा वर्ग काढण्यांत आला.  ह्या वर्गांत महाराष्ट्रीय, गुजराथी, ख्रिश्चन आणि मुसलमान अशा भिन्न विद्यार्थ्यांचा समावेश होत असे.  म्हणून हा वर्ग इंग्रजींत चालवावा लागे.  हा वर्ग दर बुधवारीं सायंकाळीं प्रार्थनामंदिरांत भरत असे.  ह्याच्या प्रसिद्धीसाठीं वेळोवेळीं जाहीर व्याख्यानें करावीं लागत.  डॉ. आर्मस्टाँगचें God & Soul, इमर्सनचीं पुस्तकें, प्रो. डॉयसेनचें Philosophy of Upanishad  अशा पुस्तकांचें अध्ययन चालत असे व डॉ. भांडारकर समाजांतील फ्री लायब्ररीमधून ह्या वाचनाला पोषक अशीं इंग्रजी पुस्तकं विद्यार्थ्यांना वाचण्यास देत असत.

तरुण ब्राह्मसंघ (Younh Theists Union)  :  इकडील प्रांतीं ब्राह्मधर्माचा स्वीकार आणि प्रसार प्रार्थनासमाजाकडून आतांपर्यंत कित्येक वर्षे चालला असला, तरी ब्राह्मधर्माच्या तत्त्वाप्रमाणें सभासदांचे गृह्यसंस्कार व विधि चालवण्याचें काम त्या मानानें फार चाललेलें असे.  तत्त्वाप्रमाणें विधि चालविण्याला अनुष्ठान हें नांव असे.  ह्या अनुष्ठानाचा परिणाम ब्राह्मकुटुंबांतील तरुणांपासूनच घडविण्याचा प्रयत्‍न करणें बरें आणि त्यासाठीं तरुणांनीं ब्राह्मधर्मानुसार उपासना चालवण्यास शिकावें, परस्परांत स्नेहवर्धन करावें, गृहसंस्काराच्या वेळीं एकमेकांत मिसळावें, आपल्या घरीं असे संस्कार चालविण्याचा आग्रह धरावा वगैरे हेतु साध्य करण्यासाठीं सन १९०५ सालच्या दसर्‍याच्या दिवशीं मीं ही महत्त्वाची संस्था स्थापन केली.  प्रार्थनासामाजांत समाविष्ट झालेल्या तरुणांनीं कट्टर अनुष्ठानाला तयार व्हावें, म्हणून मीं ह्या संघाच्या घटनेचे नियम मोठ्या कसोशीनें तयार केले.  बाहेरच्या तरुणांनीं हे नियम पाळण्याची प्रतिज्ञा घेतल्यास त्यांनाही आंत येण्यास वाव असे.  ह्याविषयीं सविस्तर हकिकत द्वा. गो. वैद्यकृत प्रार्थनासमाजाचा इतिहास या पुस्तकाच्या १७३ ते १७७ पृष्ठांवर आहे.  वरील कार्याशिवाय लोकशिक्षण आणि परोपकाराची कृत्यें करण्यासाठीं प्रार्थनासमाजाच्या खालील संस्था होत्या.  मुंबई शहरांत निरनिराळ्या १०।१२ ठिकाणीं मजुरांसाठीं रात्रीच्या शाळा चालत.  त्यांतील दोन शाळा अस्पृश्यांसाठीं होत्या.  त्यांची देखरेख मला ठेवावी लागे.  पंढरपुरांत बालहत्त्याप्रतिबंधकगृह म्हणून एक नमुनेदार संस्था समाजाकडून चालविण्यांत येत आहे.  समाजाचें मुखपत्र सुबोध-पत्रिका मराठी आणि इंग्रजी दर आठवड्यांस प्रसिद्ध होत आहे.  त्याचाही मला नेहमीं परामर्ष घ्यावा लागे.  अशीं निरनिराळीं स्थानिक कामें चालवून शिवाय मुंबई प्रांत आणि त्याबाहेरही मला वरचेवर प्रवास करावा लागे.

घरची स्थिति  :  याप्रमाणें समाजाच्या कामाचा आराखडा ठरला; पण घरची व्यवस्था अद्याप झाली नव्हती.  माझे आईबाप आणि पत्‍नी सौ. रुक्मिणीबाई माझ्या जन्मभूमीच्या गांवींच राहात असत.  जनाक्का, तान्याक्का व चंद्राक्का या तीन बहिणी पुण्यास हुजूरपागेंत शिकत होत्या.  लहान भाऊ एकनाथ कोल्हापुरांत माझे मित्र गोविंदराव यांचेकडे शिकत होता.  त्याची मुलगी सुशीला आणि माझ्या आलगूरच्या मामाची मुलगी मथुरा या दोन मुली जमखंडीस आमच्याच घरीं राहून शिकत होत्या.  पहिला मुलगा लहानपणींच वारल्यामुळें दुसरा मुलगा प्रताप या वेळीं ३।४ वर्षांचा होता.  या सर्व विखुरलेल्या कुटुंबाचा पोशिंदा मी एकटाच असल्यानें आणि माझें काम तर देशभर पसरलेलें असल्यानें कुटुंबाची एकत्र राहण्याची सोय कोठें करावी, असा मला मोठा पेंच पडला.  

जमखंडीचा दौरा  :  हा विचार ठरविण्यासाठीं माझा पहिला दौरा मीं जमखंडीकडेच ठरविला.  पुण्यास राहणारे वृद्ध ब्राह्मप्रचारक राजश्री शिवरामपंत गोखले यांना मीं बरोबर घेतलें आणि मार्च महिन्याच्या सुमारास जमखंडीस गेलों.  ब्राह्मधर्माचा प्रचार जमखंडीस अगदीं नवा होता असें नाहीं.  विलायतेस जाण्यापूर्वी दर रविवारीं आमचे घरीं ब्राह्मोपासना होत होत्या.  आईबाबांना त्या इतक्या आवडल्या होत्या कीं, मी विलायतेला गेल्यावरही त्यांनीं हा क्रम चालू ठेवला होता, असें त्यांच्याकडून येणार्‍या पत्रांवरून कळलें.  पण नुसत्या उपासना वेगळ्या आणि या नवीन सुधारकी धर्माच्या तत्त्वांची मांडणी जाहीर रीतीनें करणें वेगळें.  सुमारें दोन आठवडे राहून प्रा. समाजानें पुरस्कारलेल्या सहा मूळतत्त्वांची छाननी करण्यासाठीं सहा निराळीं जाहीर व्याख्यानें मीं दिलीं.  ठिकाण पोस्ट ऑफिससमोरच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर म्युनिसिपालिटीच्या दिवाणखान्यांत होतें.  नाविन्यामुळें बरीच गर्दी जमे.  माझ्याबरोबर आलेले वृद्ध शिवरामपंत ब्राह्मण असूनही माझ्याकडे राजरोस जेवतात ह्या गोष्टीचा गवगवा गांवभर झाला होता.  त्यामुळें व्याख्यानाची प्रसिद्धि करण्यास हस्तपत्रिकांची निराळी योजना करण्याची जरुरी भासली नाहीं.  जमखंडी हा गांव आगगाडीपासून दूर, विचारांत मागासलेला आणि आचारांत अत्यंत सोंवळा असल्यामुळें ह्या व्याख्यानमालेंमुळें त्याच्यावर आकाशांतली कुर्‍हाडच पडली म्हणावयाची.  ह्यापूर्वी ह्या गांवचा मी किती जरी लाडका असलों तरी माझीं आत्यंतिक सुधारक तत्त्वें आणि तीं मांडण्याची सडेतोड पद्धति हीं कोणाच्याही गळीं सहजासहजीं उतरण्यासारखीं नव्हतीं.  लोकमत हळूहळू प्रक्षुब्ध होऊं लागलें.   त्या आगींत तेल ओतण्याचें श्रेय जमखंडी हायस्कुलांतील एका उपद्व्यापी शिक्षकानें आपल्याकडे घेतलें.  हे सद्‍गृहस्थ व्याख्यान ऐकावयास स्वतः सर्वांच्या अगोदर आणि पुढें येऊन जणुं अगदीं भाविकपणें माना डोलावीत बसत; पण त्यांनीं अगोदरच नियोजित केलेली वानरसेना रस्त्यांत गोंगाट करण्यास सज्ज असे.  सर्वांत शेवटीं जातिभेद या विषयावर जेव्हां व्याख्यान सुरू झालें तेव्हां खालील रस्त्यावरील वाननसेनेनें गोंगाट करून तृप्‍त न राहतां दगडांचा आणि कचर्‍याचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.  अशा प्रकारें शेवटची आरती होऊन ही सभा संपली.        

सामाजिक प्रकोप  :  माधवराव गाडगीळ या नांवाचे एक सरकारी अधिकारी होते.  त्यांना मात्र हीं सर्व तत्त्वें पटलीं.  त्यांनीं शिवरामपंत गोखले यांना आपल्या घरीं ब्राह्मोपासनेस जाहीर रीतीनें बोलावून इतर लोकांसही आमंत्रण केलें.  त्यांचें घर भरबाजारांत मारुतीचे देवळाजवळ होतें.  उपासनेस इतर कोणी आलें नाहीं, तरी वरील उपद्व्यापी मास्तर आणि त्यांची वानरसेना हजर राहिली.  त्यांनीं आमचा बराच छळ केला.  घर भरबाजारांत असल्यानें शौचकूपाची जागा किंचित् लांब होती.  बिचार्‍या वृद्ध शिवरामपंतांना वरचेवर लघवीचा उपद्रव होत असल्यानें त्यांना येथें जावें लागलें.  ते आंत गेल्याबरोबर द्वाड पोरांनीं बाहेरून दरवाज्यास कडी लावली.  शिमग्याचे दिवस असल्यानें ह्या पोरट्यांच्या लीला सशब्द होऊं लागल्या.  त्या गोंधळांत बिचार्‍या शिवरामपंतांच्या आरोळ्या आम्हांस ऐकुं येत नव्हत्या.  शेवटीं कोणी एकानें शिवरामपंतांचा हा निरोप आणून दिल्यावर गाडगिळांनीं आपल्या अधिकाराच्या जोरावर त्यांची कशीबशी सुटका करून त्यांना सुखरूप घरीं पोचविलें.  या गोष्टीचा पुकारा गांवभर झाल्यानं शिमग्यांतला रात्रीचा दंगलीचा मोर्चा आमच्या राहत्या घरावर होऊं लागला.  धुळवडीच्या आदल्या रात्रीं तर असा कहर उडाला कीं, आमच्या बाबांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.  प्रकरण येथपर्यंत आल्यावर आमच्या घरच्या मंडळींनीं कोठें राहावें हा प्रश्न आपोआप सुटला.  असा सामाजिक प्रकोप होण्याचें आणखी एक कारण असें झालें कीं, जमखंडीच्या महारांच्या शाळेंत एक महाराची १० वर्षांची लहान मुलगी होती.  तिला मुरळी सोडण्यांत आलें होतें, असें ऐकल्यावर तिला मीं घरीं बोलावून घेतलें आणि तिच्या पुढील शिक्षणाची चांगली व्यवस्था ठेवण्याबद्दल तिच्या आईबापांस बजावलें.  निदान मुरळीचा धंदा चालूं नये, अशी मीं ताकीद दिली.  सुधारणेची मजल व्याख्यानांतच न आटोपतां ती प्रत्यक्ष कृतींत उतरूं लागलेली पाहून जीर्णमतवादी समाजाला कां चीड येऊं नये ?  ज्यांनीं मराठासमाजाचे एक सन्मान्य पुढारी म्हणून जातपंचायतीचे खटले निकालांत काढावयाचे त्यांच्यावरच हा प्रसंग गुदरावा ही घटना विचाराला निर्णयकारक होती.  माझ्या बाबांनीं आपल्या लहानशा नोकरीची पेन्शन घेऊन आलें सारें चंबगबाळें घेऊन मुंबईस येण्याचें ठरवलें.  मी हें सर्व आतां विनोदानें लिहीत आहें; पण माझ्या मानी बाबांना आपली पिढीजात जन्मभूमि सोडून आपलें सर्व उरलेंसुरलेलें खटलें आंवरून प्रेमळ मित्रांची व नातलगांची अखेरजी रजा घेऊन तडकाफडकीं मुंबईची वाट धरतांना काय वाटलें असेल, हें ते किंवा देवच जाणे !

मुधोळ  :  शिवरामपंत आणि मी मुधोळास गेलों.  हा गांव जमखंडीचे दक्षिणेस बारा मैलांवर आहे.  श्रीमंत घारपडे यांची ती मराठी राजधानी आहे.  पण मागासलेपणांत तिचा नंबर जमखंडीचे वर लागतो.  मायभूमीहून वरील आहेर घेऊन आलेल्या माझ्यासारख्या वीराचा सत्कार अधिक काय व्हावयाचा !  गांवांत विशेष खळबळ उडली नाहीं.  त्यांचे एक कारण जाहीर व्याख्यानाची प्रथाच तेथें नवी होती.  न जाणें माझीं व्याख्यानें कळलींही नसतील.  जमखंडींतील उपद्व्यापी मास्तरांप्रमाणें स्वयंस्फूर्तीनें पुढें येण्याइतका तेथें कोणी कळवळ्याचा माणूस नव्हता.  माझ्याबरोबर माझ्या दोन बहिणी जनाक्का व चंद्राक्का ह्यांना पुण्यांतील शाळेंत जावयाचें होतें, म्हणून त्याही बरोबर होत्या.  त्यामुळें मी दुसरीकडे कोठें दौरा न नेतां पुण्याहून मुंबईस आलों.

ब्राह्मधर्मसूचि ग्रंथ

या विषयाची रजा घेण्यापूर्वी या परिषदेच्या कामांतूनच निघालेल्या Theistic Directory ऊर्फ ब्राह्मधर्मसूचि ग्रंथ ह्याविषयीं थोडी माहिती देऊन हा भाग पुरा करूं.  भारतांतील निरनिराळ्या ब्राह्मसमाजांच्या कार्याची आणि प्रगतीची माहिती जमा करून सालोसाल प्रसिद्ध करण्याचें काम कलकत्त्याचे भाई प्रतापचंद मुझुमदार यांनीं प्रथम १८७२ च्या सुमारास सुरू केलें आणि Theistic Annual या नांवाखालीं १८७९ पर्यंत चालू ठेवलें.  पुढील वर्षी एका त्रैमासिकाच्या रूपानें त्यांनीं हेंच काम चालविलें.  पुढें मिस् एस. डी. कॉलेट ह्या उत्साही इंग्रज स्त्रीनें १८७६-८७ पर्यंत Bramho Year Book या नांवानें हेंच काम अधिक पद्धतशीर चालविलें.

प्रकाशन  :  त्यापुढें १८८८ सालीं ब्राह्मपरिषदेचें काम सुरू झालें.  १९०५ सालीं काशीच्या परिषदेंत या सुचिग्रंथाच्या कामासाठी मीं पुन्हां उचल केली.  परिषदेकडून मीं एकमतानें ठराव पास करून घेतला व समक्ष माहिती करून घेण्यास बंगालची सफर काढली.  जाहीर सर्क्युलरें काढून व खासगी पत्रव्यवहार करून कित्येक वर्षे प्रयत्‍न करूनही समाधानकारक माहिती मिळेना, म्हणून हा प्रयत्‍न मला दोनदां सोडून द्यावा लागला.  शेवटीं १९१२ सालं मीं हा प्रयत्‍न पुन्हां केला.  ज्या अर्थी निरनिराळ्या स्थानिक ब्राह्मसमाजांच्या इतिहासाची मनोवेधक माहिती मला आधींच मिळाली होती व ती मीं छापूनही काढली होती त्या अर्थी हें काम असें अर्धवट टाकणें मला पसंत पडलें नाहीं.  भारताच्या दूरदूरच्या कानाकोपर्‍यांतील कार्यवाहकांना मिळालेलें अपयश देखील उद्‍बोधक होतें.  ही माहिती ठिकठिकाणच्या प्रत्यक्ष कार्य करणार्‍यांनीं आणि डोळ्यांपुढें घडलेल्या गोष्टींची साक्ष देणारांनीं लिहून पाठविली होती.  समुद्रापलीकडील इतर देशांतील उदारधर्माची चळवळ करणारांनीं आपापल्या माहितीची आणि संदेशांचीही यांत भर टाकली.  म्हणून मीं हें अत्यंत परिश्रमानें तयार केलेलें सुमारें ३७५ पानांचें इंग्रजी पुस्तक १९१२ च्या डिसेंबर महिन्यांत प्रसिद्ध केलें.  ह्याला सर नारायण चंदावरकरांनीं आपली सुंदर प्रस्तावना जोडली आहे.  त्यांत त्यांनीं म्हटलें आहे कीं, ''भरतखंडांत ब्राह्म आणि प्रार्थनासमाजांनीं चालविलेल्या एकेश्वरी धर्माची एकचित्र माहिती ह्या समाजाच्या सभासदांनां व हितचिंतकांनाच नवहे तर ज्या कोणाला ह्या चळवळीकडे चिकित्सक दृष्टीनें पाहावयाचें असेल तर अशा बाहेरच्यांना देखील ही माहिती अत्यंत उपयोगी ठरेल.  आधुनिक सुशिक्षित हिंदुलोक धर्माचे बाबतींत अत्यंत उदासीन आहेत, असा आक्षेप वरचेवर करण्यांत येतो; पण तो सर्वांशीं खरा नाहीं.  हिंदुमहामंडळ, आर्यसमाज, थिऑसफी आणि इतर धर्मांच्या चळवळी यांचें कोणीं निरीक्षण केल्यास नवीन चैतन्याची साक्ष सहज पटण्यासारखी आहे.  आधुनिक विचारी जगांत दोन भिन्न प्रमुख शक्तींचें कार्य चालू आहे.  एक धर्मकारण व दुसरें अर्थकारण.  ह्या दोन शक्ति सर्व सुधारलेल्या जगास हालवून सोडीत आहेत.  नुसत्या अर्थाच्या मागें लागलेला मनुष्य अथवा संस्था असणें शक्य नाहीं.  जसजशी श्रीमंती वाढते तसतसा कंगालपणाही त्याचबरोबर वाढतो आणि त्याच्या मागोमाग युद्ध हें ठेवलेलेंच !  दुसरें सत्य हें कीं, मतमतांतरांचा गलबला चालला असतां त्यांतूनच एक मूलभूत सामान्य तत्त्व बाहेर डोकावतें.  बंगाल्याकडील राममोहन राय, महर्षि देवेंद्रनाथ, ब्रह्मानंद केशवचंद्र आणि आमचेकडील सर रामकृष्णपंत भांडारकर यांनीं या सामान्य तत्त्वाचा स्वीकार केला असून त्याचा पुकारा ते आधुनिक जगास करीत आहेत.  त्यांची जबाबदारी किती मोठी आहे हें हा सूचिग्रंथ दाखवीत आहे.  ह्या ग्रंथांत वर्णिलेली परिस्थिति वाचून नेहमीं आनंदच होईल असें नाहीं.  तथापि ब्राह्मधर्माचा प्रचार अधिक नेटानें करणें कसें अवश्य आहे हें पटतें आणि ब्राह्मधर्मानुयायी होणें हें सुखांतलें मोठें सुख आणि भाग्यांतलें मोठें भाग्य आहे याची खात्री पटते.''

माझे मित्र द्वा. गा. वैद्य व वामनराव सोहनी यांनीं या पुस्तकप्रकाशनाच्या कामीं फार मदत केली.  या पुस्तकाचे दोन निराळे भाग असून पहिल्या भागांत जगांतील उदारधर्माच्या निरनिराळ्या पंथांचें कार्य, परोपकारी प्रयत्‍न व त्या त्या चालकांकडून लिहून आलेल्या निबंधांचा समावेश करण्यांत आला आहे.  अशा चालकांकडून जी माहिती मिळाली नाहीं अशीं प्रकरणें मीं स्वतःच लिहून काढलीं आहेत.  पश्चिम हिंदुस्थानांतील प्रार्थनासमाजाची चळवळ, एकेश्वरी धर्मपरिषद, भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी, इराणांतील बहाई धर्माची चळवळ, युरोपांतील व अमेरिकेंतील युनिटेरियन आणि युनिव्हर्स्यालिस्ट समाज हीं प्रकरणें माझींच आहेत.  बंगाल्यांतील ब्राह्मसमाज ह्यावरील लेख प्रसिद्ध पं. शिवनाथशास्त्रीं यांनीं स्वतः लिहिला आहे.  मँचेस्टर कॉलेजांतील माझे सहाध्याची झेनो सूके टोया साकी यांनीं जपानमधील उदारधर्म हें प्रकरण तयार केलें आहे.  दुसर्‍या भागांत बंगाल, बिहार आणि ओरिसा ह्या प्रांतांतील १०१ ब्राह्मसमाज, मद्रास प्रांतांतील ३२ ब्राह्मसमाज, मुंबई प्रांतांतील १६ प्रार्थनासमाज, पंजाब आणि संयुक्त प्रांतांतील १८ ब्राह्मसमाज आणि लंडन येथील रे. चार्ल्स व्हायसे यांचें   अशा एकूण १६८ संस्थांची तपशीलवार माहिती आणि सविस्तर इतिहास आला आहे.  सेक्रेटरीचें नांव आणि पत्ता, सभासदांची संख्या, अनुष्ठानिक किती व इतर किती यांचा निर्देश, हितचिंतकांची संख्या, आठवड्यांतून सभा किती वेळां भरते, पोटसंस्थांचा तपशील, स्वतंत्र मंदिर आहे कीं नाहीं, वर्तमानपत्रें, मासिकें कोणतीं आहेत, प्रचाराची तजवीज काय वगैरे सर्व माहिती अत्यंत कसोशीनें गोळा केलेली आहे.  एकंदरींत हें पुस्तक प्रचाराचें काम करणारासच नव्हे तर इतर जिज्ञासूंना देखील एक अमोलिक ठेवाच वाटण्यासारखें आहे.

पुस्तकाचा छपाईखर्च, माझ्या प्रवासाचा आणि पत्रव्यवहाराचा खर्च अनुक्रमें ब्राह्मो पोस्टल मिशन व बनारस येथील परिषदेच्या शिलकेंतून भागविण्यांत आला.  कोणत्याही स्थानिक समाजावर ह्याचा बोजा पडलेला नाहीं.  नुसती माहिती पुरविण्यास ज्यांनीं विलंब केला किंवा मुळींच दिली नाहीं अशांकडून पैशाची मदत कोण अपेक्षील ?  हीं पुस्तकें ब्राह्मधर्मप्रचारकांना फुकट वांटण्यांत येतील, टपालहंशील देखील पडणार नाहीं, फक्त त्यांनीं मागणी करावी, असें वेळोवेळीं जाहीर करूनही कोणा एकाकडून मागणी देखील आली नाहीं.  हा अव्यवहारीपणा पाहून आश्चर्याचा मोठा धक्का बसला !  पाश्चात्य कार्यकर्त्यांना मात्र ह्या प्रयत्‍नाचें महत्त्व फार वाटलें व त्यांनीं त्याची वेळोवेळीं मुक्तकंठानें प्रशंसा केली.  अशी माहिती वेळोवेळीं प्रसिद्ध करण्याची इष्टता होती; पण ती आशा आजवर समाधानकारक रीतीनें पूर्ण झालेली नाहीं, हें निराळें सांगावयास नकोच.  शेंकडों प्रती धूळ खात पडलेल्या असून त्या ठेवण्यास जागा नाहीं.  ब्राह्मधर्म ही प्रार्थना करणारी संस्था आहे, प्रयत्‍न करणारी नव्हे, असें केव्हां केव्हां विनोदानें सांगण्यांत येतें.  त्यांत सत्याचा अंश बराच आहे, असें हा ग्रंथ जोरानें पुकारीत आहे.

प्रीव्हियचें वर्ष

कॉलेजचा पसारा  :  मी फर्ग्युसन कॉलेजांतील पहिल्या म्हणजे प्रीव्हियसच्या वर्गांत इ.स.१८९३ सालाचे आरंभीं गेलों; तेव्हां तें कॉलेज फलग्रेड कॉलेज झालें होतें कीं नाहीं हें मला आठवत नाहीं.  निदान बी.ए. चा वर्ग त्या वेळीं असला तरी तो सुरू होऊन फार वर्षे झालीं असतील, असें मला वाटत नाहीं.  कॉलेज पुणें शहरांत शनिवार पेठेंतील गद्रे ह्यांच्या वाड्यांत भरत होतें.  त्यांतच न्यू इंग्लिश स्कूलही भरत होतें.  त्याला लागूनच होळकरांचा मोठा वाडाही आहे.  तो मी पुढें इंटरमिजिएट वर्गांत गेल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे आला होता.  त्या वेळीं शिक्षणासाठीं ह्या मंडळीच्या एवढ्याच इमारती होत्या.  खेळण्यासाठीं पुढें लवकरच नारायण पेठेंतील नदीजवळचा कबूतरखानाही मिळाला असावा.  कारण आम्ही इंटरमिजिएटमध्यें असतांना तेथें फटबॉल खेळत होतों.

व्याख्यानपद्धति :  प्रीव्हियसचा क्लास त्या वेळीं गद्रेवाड्यांच्या समोरच्या मोठ्या दिवाणखान्यांत भरत असे.  आमच्या वेळीं देखील हा भव्य दिवाणखाना भरेल इतके सुमारें ६०।७५ विद्यार्थी तरी असत.  ह्या वर्गांत पोटतुकड्यां नव्हत्या.  त्यामुळें हा क्लास म्हणजे एक मेंढवाडाच दिसत असे.  मराठी प्राथमिक शाळा सोडून जमखंडीस हायस्कुलांत गेल्यावर मला जसें नव्या जगांत व संस्कृतींत स्थित्यंतर झाल्याप्रमाणें वाटलें तसेंच तेथें वाटलें.  कॉलेजांतल्या शिक्षणाच्या फरकाचें मुख्य लक्षण म्हणजे व्याख्यानपद्धति ही होय.  शें-पन्नास मुलांनीं एका उंच पीठावर बसलेल्या अगर उभ्या असलेल्या शिक्षकाचें निरूपण अगर प्रवचन ऐकत बसणें म्हणजे हायस्कूलमधल्या वैयक्तिक शिक्षणपद्धतीला मुकणेंच होय.  हायस्कुलाच्या वर्गांत तीस मुलांपेक्षां अधिक शिष्यसमुदाय असणें इष्ट नाहीं.  कॉलेजांत ह्या संख्येला आळाच नसतो.  त्यामुळें शिक्षकाचा शिष्याशीं व्यक्तिगत संबंध तुटतो आणि विद्यार्थी धागा तुटलेल्या पतंगाप्रमाणें शिक्षकापासून किती लांब गेलेला असतो, हें शिक्षकास कळणें अशक्य होतें.  तथापि आम्ही व्याख्यान ऐकणारे सभ्य गृहस्थ (Gentlemen) झालों, ही भावना कॉलेजांत गेल्याबरोबर प्रसवून एक प्रकारची आढ्यता येत असेल खरी; पण तिनें खरा आध्यात्मिक किंवा बौद्धिक लाभ घडत नाहीं, हें माझ्या अनुभवास लवकरच येऊं लागलें.  आमच्या ह्या नवीन आढ्यतेची एक मौजेची गोष्ट आठवते.  ती अशी-

मॅग्नाचार्टा  :  शेंपन्नास मुलांची हजेरी रोज घेणें अवश्य होतें.  कारण विश्वविद्यालयाच्या परीक्षेला बसण्यापूर्वी अमुक दिवसांची हजेरी (टर्म) कॉलेजांत भरली आहे, असा दाखला विद्यार्थ्याला विद्यालयास द्यावयाचा असतो.  प्रोफेसरचा वेळ हजेरी घेण्यांत जाऊं नये म्हणून हें काम ह्या कॉलेजच्या श्री. दीक्षित नांवाच्या एक अनुभविक कारकुनाकडे असे.  हे भले धिप्पाड गृहस्थ न्यू इंग्लिश स्कूलमध्यें ड्रिलही शिकवीत असत.  त्यामुळें हे लष्करी कुर्र्‍यांत हजेरी घेत.  ह्यांचा आवाज दणकट व चर्या उग्रट म्हणून त्यांची वागणूक विद्यार्थ्यांशीं-विशेषतः बाहेरगांवच्या नवख्यांशीं-थोडीशी चढेलपणाची व उर्मटपणाची होती.  प्रत्येक विद्यार्थ्याचें नांव पुकारल्यावर विद्यार्थ्यानें Present Sir असें सभ्यपणाचें उत्तर द्यावयाचें असतें.  ही स्वारी विद्यार्थ्याचें नांव पुकारतांना त्याच्या मागें मिस्टर हें सभ्यतादर्शक उपपद लावण्याचा कंटाळा दाखवूं लागली; पण विद्यार्थ्यांना आपण सभ्य गृहस्थ आहोंत ही जाणीव होती.  'मिस्टर' नांवामागें न ऐकुं आल्यानें Sir (महाराज) हें Present (हजर) ह्या उत्तरांपुढें लावण्याची ही सभ्य मंडळी टाळूं लागली.  शेवटीं हें प्रकरण प्रिन्सिपॉलपर्यंत जाऊन ह्या ड्रिल (कवाईत) शिकविणार्‍या कारकूनजीला विद्यार्थ्यांच्या नांवामागें मिस्टर हें पद जरूर लावण्याचा धडा शिकावा लागला !  आणि अशा प्रकारें आम्हां विद्यार्थ्यांनाही आम्ही सभ्य गृहस्थ आहोंत ह्याबद्दलचा मॅग्नाचार्टा-पुराव्याचा पट्टा-मिळाला !

लाजाळू वृत्ति  :  सभ्य गृहस्थपणाचें तिसरें लक्षण म्हणजे हायस्कूलप्रमाणें कॉलेजांत शिक्षकांपुढें ५।६ तास रोज डांबून बसण्याची आवश्यकता नव्हती.  दोन तीन तास दोन तीन विषयांवर व्याख्यानें ऐकलीं कीं, आम्ही सभ्य गृहस्थ झालों मोकळे !  मग वाटल्यास पुस्तकांत डोकें खुपसून बसा, किंवा खेळाच्या मैदानांत बागडा किंवा गांवांतून उनाडक्या करा.  कोणा विचारणाराच नसे.  सभ्यपणाच्या लक्षणांच्या एकाहून जास्त माळा इतरांप्रमाणें माझ्याही गळ्यांत जरी पडल्या होत्या, तरी मी इतरांसारखा व इतका एकदम कांहीं 'सभ्य गृहस्थ' होण्याइतका धीट बनलों नाहीं.  भेदरट, लाजाळू, अनोळखी असा मी सर्वांत मागच्या बांकावर बसत असें आणि ही संवय पुढें अनेक कारणांनीं शेवटपर्यंत मला कायम जडली.

आमच्या कॉलेजचें त्या वेळीं विद्यार्थिवसतिगृह नव्हतें.  तें पुढें १८९५ सालीं कॉलेजची स्वतःची इमारत चतुःशृंगीच्या माळावर उभारल्यावर झालें.  तें झाल्यावरही माझ्यामध्यें निरंतर सुख मानून वास करणार्‍या माझ्या दारिद्र्य मित्रानें तेथें राहण्याची मला मनाई केली.  अर्थात् मग मला शहरांत जेथें जागा मिळेल तेथें माझ्या बिर्‍हाडाची सोय करावी लागली.

पेंच-प्रसंग  :  मला स्कॉलरशिप तर अवघी दरमहा १० रुपयांची !  प्रिन्सिपॉलनें माझ्या फीमाफीचा अर्ज तर देखतहुकूम धुडकावून लावला.  दरमहा ५ रुपये कॉलेजची फी.  तीही सगळ्या टर्मची आगाऊ ३० रुपये भरावयाची होती.  शिवाय कॉलेजचीं पुस्तकें व इतर उपकरणें घ्यावयाचीं होतींच.  मग खोलीभाड्यांला व खाणावळीला काय उरणार ?  मीं ही सर्व आवश्यक सोय कशी लावली ह्याचा उलगडा मला आतां किती आठवण करून पाहिलें तरी सुचत नाहीं.  मीं त्या वेळीं काय केलें तें एक हरीच जाणे !  विशेष पेंच का कीं, ज्या आगरकरमहाशयांनीं मला नादारी दिली नाहीं, त्यांच्या सुधारकांतील लेख वाचून माझी अलीकडे कित्येक दिवसापूर्वीपासूनच त्या हरीवरील श्रद्धा ही बरीच कमी कमी होत आली होती; पण ज्या अर्थी मी जगून वांचून राहिलों आणि बी.ए. व अर्धा एल.एल.बी. झालों त्या अर्थी ह्या सर्व सोयी झाल्या हें तर खासच आणि ज्या अर्थी तुरुंगांत कधीं गेलों नाहीं व आजारीही फारसा पडलों नाहीं त्या अर्थी मी कांहीं तरी उपाय केले असावेत.

वरील प्रश्नास उत्तर म्हणजे त्या वेळची स्वस्ताई आणि त्यापेक्षांही निखालस उत्तर म्हणजे गरजा आणि उणीवा सहन करण्याची माझी अपार तयारी.  माझ्या आईबाबांनीं विशेषतः ही माझी तयारी सगळ्या आयुष्यभर पुरून मागें मुलांबाळांस लागल्यास उरेल इतकी केली होती.  मी पुण्यास आल्याबरोबर जरी कॉलेजांतला 'सभ्य गृहस्थ' बनलों नाहीं, तरी कशीही वेळ आल्यावर वर्षअखेर परीक्षा उतरण्याची तयारी ठेविली.

तिघेजण  :  कोठून ओळख निघाली किंवा काढली तें कोंहीं आतां आठवत नाहीं; पण लवकरच सदाशिव पेठेंतील ताडपत्रीकरांच्या वाड्यांतील ढेलजेंतील दोन खाणांची एक खोली आम्हां तिघां जमखंडीच्या विद्यार्थ्यांना भाडें कांहीं न पडतां राहावयास फुकट मिळाली.  हे तिघे विद्यार्थी म्हणजे जनुभाऊ करंदीकर (रा.जनार्दन सखाराम करंदीकर), विश्वनाथ पोंक्षे आणि मी स्वतः !  ह्याच खोलींत केव्हां केव्हां अभ्यास करावयाला व विशेषतः आम्हां सर्वांच्या आवडीचें वर्गांत लावलेलें इंग्रजी पुस्तक जेन ऑस्टिनची कादंबरी 'प्राइड ऍण्ड प्रेज्युडीस' हें आमच्याबरोबर वाचावयाला वाईचे केशव रामचंद्र कानिटकर 'फर्ग्युसन कॉलेज' चे भावी प्रसिद्ध प्रिन्सिपॉल, हेही येत असत.  बाहेरगांवचा (पुण्याचा नव्हे हो) हाच काय तो सोबती आणि मित्र आम्हां जमखंडीकरांना लाभला आणि तो अद्यापि टिकला आहे; पण खुद्द पुण्याच्या एकाही विद्यार्थ्यानें अंगाशीं लावून घेतलें नाहीं.  ह्याचें नांव पुणें !

कॉलेजखर्च  :  राहण्याची सोय झाल्यावर अर्थात् खाणावळही पाहिलीच.  दरमला ५ रुपयांत, कदाचित् ४॥ ही असतील, खाणावळ भागे.  भात, चपाती, वरण, भाजी, तूप, साखर सर्व कांहीं बेतानें, पण असेच.  दूध नाहीं तरी पुण्याचें नमुनेदार पारदर्शक ताक तरी असेच !  आंघोळीला पाणी पुण्यांतील तेव्हांच्या हौदांत गल्लोगल्लीं थंडगार मुबलक मिळे.  वाटेल तितक्या बादल्या टाळक्यावर ओतून घेतल्या तरी कोणी विचारीत नसत.  पाण्याच्या बाबतींत पुण्याइतका सुखी गांव त्या वेळीं सार्‍या जगांत कोठें नसेल !  बाकीचा चिल्लर खर्च आम्ही तिघांमध्यें अगदीं गोडीगुलाबीनें सहज वांटून घेत असूं.  एकंदरींत त्या वेळचा माझा कॉलेजचा खर्च हल्लींच्या माझ्या मुलाच्या हायस्कूलच्यापेक्षां निम्म्याहूनही कमी येत असावा.  एरवीं माझें शिक्षण झालेंच नसतें !  

काटकसर  :  कॉलेजांत दरवर्षी दोन मोठ्या सुट्या होत्याच.  त्या वेळीं घरीं येण्याजाण्याचा जो आगगाडीचा खर्च होई तो खाणावळीचा जो खर्च वांचे त्यांतून होई.  कुडची स्टेशनावरून जमखंडीस जावयाला ३३ मैलांचा गाडीचा रस्ता आहे.  कित्येक वेळां माझा सर्व बोजा घेऊन हा सर्व रस्ता मीं पायींच प्रवास केलेला मला नीट आठवत आहे.  बैलगाडींत एका स्वारीला चार आण्यांपासून फार तर आठ आण्यांपर्यंत खर्च येई.  तो वांचविण्यासाठीं मला हे ३३ मैल पायींच रखडावें लागे.  आजची तरुण मंडळी मुंबईत अर्धा मैल जावयाचें झाल्यास निदान एक आणा ट्रामला खर्चून वर दोन आण्यांचा चहा पितात.  एवढ्यांतच हात आटोपले तरी त्यांना काटकसरी म्हणण्यास मी तयार आहे.

मला दरमहा दहा रुपयेप्रमाणें एक वर्षांत १२० रुपये स्कॉलरशिप मिळे.  त्यांत साठ रुपये तर कॉलेजची फी झाली.  बाकीच्या साठ रुपयांत जितके महिने मी पुण्यास राहात असें तितके ५ रु तरी खाणावळीस द्यावे लागत.  सुट्टींतले वांचलेले रुपये गांवी जाण्यायेण्यास, खोलीभाड्यांस आणि दिवाबत्ती, न्हावी, धोबी वगैरे खर्चास आवश्यक असत.  मग माझ्या कॉलेजच्या पुस्तकांना मीं पैसे कोठून आणिले ह्याचा मला कांहींच थांग लागत नाहीं.  जरूर तेवढींच पुस्तकें आमचीं स्वतःची निरनिराळीं असावींत; बाकीचीं कांहीं तिघांत मिळून होतीं.  तरी एवढीं जरूर ती पुस्तकें आम्हीं कशीं विकत घेतलीं असतील, हें मला आतां कांहींच आठवत नाहीं.  मात्र मीं तीं किंवा त्यांची किंमत कोणापासून चोरली नव्हती एवढेंच स्पष्ट आठवतें.  अशा कठीण कात्रींत माझीं कॉलेजचीं पहिलीं तीन वर्षे, म्हणजे इंटरमिजिएटची दुसरी परीक्षा पास होईपर्यंत मीं कसे दिवस काढलें तें ईश्वर जाणे !

पैशांची टंचाई  :  माझी प्रिलिमिनरी म्हणजे कॉलेजांतील पूर्वीची चांचणी परीक्षा पास झाली.  अर्थात् मला मुंबईच्या विश्वविद्यालयांतील पहिल्या प्रीव्हियस परीक्षेला बसावयाचें होतें.  त्या परीक्षेची फी २० रुपये होती.  ती कोठून आणावयाची हा मोठा तांतडीचा प्रश्न पडला.  परीक्षेचा फॉर्म (अर्जाचा नमुना) भरण्याचे दिवस आले; पण वीस रुपये कांहीं मजजवळ येईनात.  मी गांगरलों !  वेळ कठीण आला.  प्रीव्हियसच्याही पूर्वीची एक अधिकच परीक्षा मजपुढें आली म्हणावयाची !  शेवटीं हताश होऊन बसलों असतां एका गृहस्थानें एक विचार सुचविला.  नरहरपंत नांवाचे एक गरीब ब्राह्मण गृहस्थ भटकीसाठीं ताडपत्रीकरांच्या वाड्यांत जात-येत असत.  त्यांचा व आम्हां विद्यार्थ्यांचा परिचय झाला होता.  मी मराठा असून इतका शिकलों ह्याचें त्यांना कदाचित् कौतुक वाटत असावें.  मी ह्या पेंचांत पडलों असें पाहून त्यांनीं मला रावबहादूर नवलकर नांवाच्या एका प्रभू सुधारक गृहस्थाकडे नेलें.  त्यांनीं मला परीक्षेच्या फीकरितां दोन रुपये दिले व माझी फार निकडीची गरज आहे.  म्हणून मला ताबडतोब मदत करावी अशा अर्थाची एक चिठ्ठी, आपल्या कांहीं मित्रांचीं नांवें मला कळवून, त्यांना दाखविण्यासाठीं दिली.  परंतु ही चिठ्ठी घेऊन इतक्याजणांकडे जाणें मला फारच अवघड वाटूं लागलें.  एक तर हीं माणसें फार मोठमोठीं होतीं आणि त्यांचे बंगले शोधून काढून त्यांच्यापुढें जाऊन उभा राहिलों तरी ते मला कसे वागवितील ह्याची मला फारच भीति वाटूं लागली.  कारण अशा प्रकारच्या याचनेचा माझ्या आयुष्यांतला हा अगदीं पहिलाच प्रसंग होता.  रावबहादूर नवलकरांच्या घरींदेखील मला रा. नरहरपंतांनींच बळेंबळें नेलें होतें.  त्यांनींच मला भरीस भरवून रावबहादूर महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, सरदार कुप्पुस्वामी मुदलियार, वकील राजन्ना लिंगो वगैरे मोठमोठ्या माणसांकडे पाठविलें.  इतर कांहींजणांकडे ही चिठ्ठी घेऊन मी उन्हातान्हांतून दीववाणा होऊन फिरलों; त्या सर्वांचीं नांवें आतां आठवत नाहींत.  रुपये सारे १४ च जमले.  फी भरण्याची घाई तर अगदीं गळ्याला फांसासारखी लागली.  अशा स्थितींत कधीं न विसरण्यासारखी गोष्ट घडली ती अशी.

डॉ. शेळके  :  वरील चौदा रुपये जमविण्याकरितां मी ज्या गृहस्थांकडे गेलों त्यांत मराठा जातीचा कोणीच गृहस्थ नव्हता.  प्रत्यक्ष म्हस्केसाहेबांकडे मी मुळींच गेलों नाहीं.  कारण त्यांनीं आपल्या संस्थेंतून स्कॉलरशिप दिली, ह्याचेंच मला असह्य ओझें झालें होतें.  फीला पुनः पैसे पाहिजेत, हें दैन्य त्यांचेपुढें दाखविण्याचें धैर्य मला मुळींच होईना.  सबंध वर्षभर मीं जे काटकसरीचे हाज सोसलें त्यापायीं मदत मागण्यास जर मी त्यांचेकडे कधींच गेलों नाहीं, तर मग आतां तरी कसे जावयाचें !  शेवटीं नरहरपंतांनीं डॉ. शेळके नांवाच्या एका मराठा जातीच्या गृहस्थाच्या घरीं जाण्याचा आग्रह केला.  शुक्रवार पेठेंत बाळंत स्त्रियांसाठीं जो दवाखाना आतां आहे तेथें पूर्वी म्युनिसिपालिटीचा एक दवाखाना होता.  त्यांत शेळके हे डॉक्टर होते.  हे मूळचे कोल्हापूरचे.  तेथें त्यांचें एक घर आहे.  ह्यांचेपुढें मी नवलकरांची चिठ्ठी ठेवल्याबरोबर त्यांनीं जें मला खरपुस तासडलें तें मला आमरण आठवेल !  ''मराठ्यांच्या कुळांत जन्मून असें हें भिक्षापात्र मिरविण्याची तुला लाज वाटत नाहीं ?  जवळ पैसे नसल्यास गुरें राखावींत.  कशास शिकावें ?....'' वगैरे वगैरे.  ती चिठ्ठीच नव्हे तर मजजवळचे १४ रुपयेही ह्या मराठा जमदग्नीपुढें ठेवून तेथून निसटावें असें मला झालें.  माझ्या अंगाला घाम आला.

सौ. बहिणाबाई  :  बाकीचे ६ रुपये आणि मुंबईला जाण्याचा खर्च ह्याबद्दल मला जी अनपेक्षित मदत झाली ती अशी - तेरदाळचे रा. विष्णुपंत देशपांडे हे माझे अत्यंत जिवलग बाळमित्र.  माझ्यावर आलेली ही अडचण त्यांच्या लक्षांत आली.  ते घरचे जरी श्रीमंत होते तरी ते स्वतः वयांत न आल्यानें त्यांचे हातीं पैसे खेळत नव्हते.  त्यामुळें त्यांना तळमळ लागली.  त्यांची प्रेमळ पत्‍नी सौ. बहिणाबाई यांना ही तळमळ पाहवेना.  त्यांनीं आपल्या माहेराकडून दिवाळींतील भाऊबीजेच्या ओवाळणींत मिळालेले २० रुपये रा. विष्णुपंतांमार्फत मला पोंचविले.  जुन्या वळणांतील ही साध्वी बाई आपल्या नवर्‍याचा मी मोठा भाऊ असें समजून मजसमोर अद्यापि कधींही उभी राहिली नाहीं.  असा हा खर्‍या कळकळीचा अपूर्व मासला होता.  मात्र ह्यापुढें मीं स्वतःसाठीं कोणापुढें भीक अशी कधींच मागितली नाहीं.  तरी आतांपर्यंत माझा व माझ्यावर अवलंबून असलेल्यांचा योगक्षेम चालला ह्याचें श्रेय डॉ. शेळके ह्यांनाच देणें मला बरें वाटतें !  परोपकारासाठीं पुढें लाखों रुपये जमविण्याची पात्रता व इच्छा मला आली ह्यांतही कदाचित् डॉ. शेळके ह्यांचाच हा विरोधी आशीर्वाद कारण झाला असेल, नसेल कशावरून ?  

आमच्या वेळेला आतांप्रमाणें प्रीव्हियसची परीक्षा कॉलेजांत घेत नसत.  तिचेसाठीं आम्हांला मुंबईलाच जावें लागलें.  त्या निमित्तानें मला ह्या मोहमई ऊर्फ मुंबईचें प्रथम दर्शन घडलें.  ह्या प्रथम दर्शनाचा परिणाम मुळींच अनुकूल नव्हता.  आम्ही अगदीं ऐन परीक्षेच्या वेळींच मुंबईस आलों आणि जागेपणाचे बहुतेक तास अभ्यासांत किंवा परीक्षेचे पेपर्स लिहिण्यांतच जात.  त्याशिवाय मुंबईची कोंडलेली गर्दीची वस्ती, समुद्रकांठची घामट हवा, मुंबईच्या लोकांचा आत्मशून्य वरपांगी स्वभाव इत्यादि अनेक कारणें होतीं.  कांदेवाडींत खत्रे यांच्या चाळींत दोन खणांचे एका खोलींत आम्ही कांहींजणांनीं जागा घेतली.  त्या वेळीं ह्या दोन खणांना चार रुपये भाडें पडलें.  तें आम्हांला किती जास्त वाटलें !  पण आतां त्याच जागेला १२ रु. पेक्षां जास्त भाडें पडत असावें.  रात्रंदिवस जागून कशीतरी परीक्षा देऊन मी फार वेळ न दवडितां सुट्टींत जमखंडीस गेलों.  परीक्षेंत पास झाल्याचा निकाल जमखंडीस समजला.  माझ्यापेक्षां माझ्या आईबाबांनाच फार आनंद झाला !

पूर्व बंगालची सफर

ता. १ सप्टेंबर रोजीं बाबू हेमचंद्र सरकारनें मजसाठीं पूर्व बंगाल, उत्तर बंगाल, बिहार, संयुक्त प्रांत आणि पंजाब ह्या पांच निरनिराळ्या भागांत शतसांवत्सरिकानिमित्त प्रचार करून ह्या वर्षअखेर पुण्यास जावें असें ठरवलें.  माझें उतारवय, आज तीन महिनें इन्फ्लुएंझाच्या व्याधीमुळें आलेली अशक्तता वगैरे अनेक कारणांमुळें मी किंचित् नाखुष होतों; पण बंगाल्याबाहेर पडण्याला कोणी बंगाली मिशनरी तयार होत नाहीं, हें पाहून नाइलाजानें तें कार्य मला पत्करावें लागलें, तरी तें मला आत्मिकदृष्ट्या प्रिय होतें.  पूर्व बंगाल्यांत संतत धार पावसाळा, नद्यांना आलेले महापूर, मलेरिया, मला न रुचणारें अन्न, न समजणारी भाषा, ह्यावरून निदान बंगाल्यांतील कामांतून जरी सुटका झाली असती तरी बरें झालें असतें.  पण तसें न होतां इतर सात प्रचारकांना बरोबर घेऊन पूर्व बंगाल्यांतील चितगांगपासून उत्तर बंगाल्यांतील दार्जिलिंगपर्यंत जावें, असें ठरलें.  (१) रमेशचंद्र मुकर्जी  (२) बारिसालचे राजकुमार घोष व त्यांचा मुलगा जतींद्रकुमार,  (३) अनिलचंद्र चौधरी,  (४) सुधीरकुमार बोस,  (५) बभ्रुवाहन ठाकूर,  (६) माधवचंद्र विश्वास आणि मी असे आठ जण श्रियाळदास स्टेशनवरून निघालों.

बंगाल्यांतील महापूर  :   जेसोर जिल्ह्यांतील मलिहाट, मशीहाट व राजापूर, खुलना जिल्ह्यांतील मदारतोली, रुच्चिददाहा, जालोकाटी व कुरीयाना वगैरे बंगाल बॅकवर्ड क्लास मिशनच्या ठिकाणीं ही सफर नेऊन आम्हीं ब्राह्म समाजाचा संदेश पोंचवला.  भैरव नदीला मलिहाटजवळ मोठा पूर आला होता.  प्रभात, नदीप्रवाह व नदीकिनारा यांचा सुंदर देखावा दिसला.  भात, अंबाडी, आळू, कोचुरीचीं रानें माजलीं होतीं.  खेडीं किंचित् उंचवट्यावर असल्यानें तेवढींच पाण्यावर होतीं.  बाकी सर्व जलमय दिसलें.  एका ठिकाणाहून १०० यार्डांवरील ठिकाणीं जाण्यास पडावाची जरुरी लागे.  शेतकांतील पिकांवर दहा दहा फूट पाणी पावसाळ्यांत सतत चार महिने राहात असतें.  पिकें मार्च-एप्रिलमध्येंच पेरावीं लागतात.  पूर ओसरून गेल्यावर तीं आपोआपच वाढलेलीं दिसतात.  एक गांव सोडून दुसर्‍या गांवीं जाईपर्यंत तेथील मंडळी बायकां-मुलांसहित आमची वाट पाहात उभी असत.  टाळ, खोल (मोठे मृदंग), बाजाची पेटी इत्यादि भजनाचीं साधनें असत.  मोठा झेंडा व लहान लहान निशाणें प्रत्येकाचे हातीं फडकत असत.  होडींतून प्रवास करतांना सतत भजन चालू असे.  किनार्‍यावर उतरल्यावर ठिकाणावर पोंचेपर्यंत नगरसंकीर्तनं सुरू होई.  ठिकाणीं पोंचल्यावर उपासनेला सुरुवात होई.  नंतर भोजन, संभाषण व भेटी वगैरे होत.  हें सर्व पावसांत भिजतच चालू असे.

एक कोनशिला समारंभ  :  ह्या प्रांतीं मी दुसर्‍यांदा आलों होतों.  माझ्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या कामाचा पुष्कळ परिचय ह्या प्रांतीं अगोदरच झाला होता. त्यामुळें मी जेथें जाईं तेथें बंगाल्यांतील नमःशूद्र नांवाच्या अस्पृश्य मानलेल्या जातींच्या बायकामुलांच्या झुंडीच्या झुंडी मला पाहण्यास येत.  ता. ५ रोजीं माशाहाटी येथें अस्पृश्यांच्या हायस्कूलच्या इमारतीच्या पायाचा दगड बसवण्याचा समारंभ होता.  तो माझ्या हस्तें झाला.  त्या वेळीं सुमारें २००० लोकसमुदाय लोटला होता.  माझें हिंदींत भाषण झालें.  हायस्कूलचे हेडमास्तर शरच्चंद्र मुझुमदार हे एके काळीं नास्तिक होते; पण ब्राह्मसंगीत ऐकून ते एकेश्वरी झाले.  लवकरच तेथें ब्राह्ममंदिर उपस्थित झाल्यावर आपण तेथें आचार्याचें काम करूं असें ते म्हणाले.  दिवसा प्रचारकार्य करून आम्ही चांदण्या रात्रीं बोटीचा प्रवास करीत असूं.  पुष्कळ वेळां वाट माहीत नसल्यानें प्रवसास विलंब लागे.  सच्चिद्दाह येथें नमःशूद्रांचीं दोन हायस्कुलें आहेत.  तेथील काम आटोपून सकाळीं ९॥ वाजतां बारिसाल जिल्ह्यांतील जालोकाठी या गांवीं जाण्यास मोठी स्टीमर घेतली.

पूर्व बंगाल्यांत बारीसाल, चितागाँग आणि कोमिल्ला ह्या तीन ठिकाणीं सुसंघटित समाज आहेत.  शतसांवत्सरिक उत्सवाचे एका सेक्रेटरींनीं आमचें जसें संचारपथक करून पूर्व बंगाल्यांत पाठवलें होतें तसेंच दुसरें एक पथक पश्चिम बंगाल्यांत पाठवलें होतें.  हीं दोन्हीं पथकें ठरलेल्या दिवशीं ठराविक कार्यक्रम आटोपून डाक्का येथें जमणार होतीं.  डाक्का ब्राह्म समाज कलकत्ता ब्राह्मसमाजाच्या खालोखाल मोठा आहे.  पूर्व संकेताप्रमाणें मोठमोठ्या ब्राह्म समाजांनीं आपापले ह्या सालचे वार्षिकोत्सव त्यांच्या गांवीं हीं पथकें जेव्हां येतील त्या वेळीं ठरविले होते.  त्यामुळें आम्हांस ह्या मोठ्या गांवीं तीन चार दिवस तरी राहावें लागे.  दरम्यान लहानसान ब्राह्म समाजांत भेटी द्यावयाच्या होत्या.

राममोहन रॉयचें स्वप्न  :   बारिसाल समाजानें आमच्या पथकाशिवाय बाबू बिपिनचंद्र पाल ह्या मोठ्या वक्त्याला व राजकीय पुढार्‍याला व ब्राह्म समाजाच्या सभासदाला मुद्दाम आमंत्रण करून आणवलें होतें.  १८ सप्टेंबर रोजीं उत्सवाच्या शेवटच्या दिवशीं ब्राह्ममंदिरांत मोठी जाहीर सभा करण्यांत आली.  त्या वेळीं ''विश्वजननी धर्म'' (Universal Religion) या विषयावर माझें व पालबाबूंचें सायंकाळीं व्याख्यान प्रसिद्ध झालें होतें.  माझें प्रथम पाऊण तास इंग्रजी भाषण झालें.  मी प्रथम महाराष्ट्रांतील पंढारपूरसंप्रदायाची संक्षिप्‍त माहिती सांगितली.  मुंबई प्रार्थना समाजानें संत तुकारामास सुशिक्षितांच्या नजरेसमोर कसें आणलें आणि विद्वानांकडून त्याला मान्यता कशी देवविली हें मीं सांगितलें.  रोम शहरांत पोपच्या राजवाड्यांजवळ सिस्टाइन चॅपेल नांवाच्या लहानशा दालनांत मोझेसचा एक संगमरवरी भव्य बैठा पुतळा आहे.  मायकेल ऍंजेलो या शिल्पकाराला हा पुतळा कोरण्यास चाळीस वर्षे लागलीं.  मोझेसची मूर्ति ऍंजेलोच्या मनांत अगोदर भरली होती.  अशी त्याची प्रथम मनोमन मूस तयार झाल्यावर ऍंजेलोनें संगमरवरी दगडाच्या ठोकळ्यांतून चाळीस वर्षे कलाकुसरी करून ती जणूं पोखरून बाहेर काढली.  जणुं काय ती आंत दडूनच बसली होती.  तद्वत् ब्राह्म समाजाची ही मूस ईश्वरानें राममोहन रॉयच्या मनांत आधींच ओतली होती.  ती पुढें राममोहन रॉयनीं व अनेक ब्राह्म समाजाच्या बंधुभगिनींनी सकल ब्राह्म सामाजिक कुसंस्काररूपी दगड दूर करून गेल्या शतकांत उघड केली.  हें आविष्करण अद्यापि चालूच आहे.  ताजमहालाचें स्वप्न शहाजहानास अगोदरच पडलें होतें.  तें पुढें २०,००० माणसांनीं २२ वर्षे खपून मूर्त स्वरूपास आणिलें.  ब्राह्म समाज हें राममोहन रॉयचें एक मानसिक संगमरवरी स्वप्नच होय.  ईजिप्‍तांतील मनोरे, हिंदुस्थानांतील मोठमोठीं देवळें, हीं सर्व हजारों कैद्यांकडून व वेठीस धरलेल्या मजुरांकडून उभारलेलीं आहेत.  तीं त्यांच्या अन्यायाचीं स्मारकेंच आहेत.  ब्राह्म-ब्राह्मिकांनीं ब्राह्म समाजाच्या उभारणीसाठीं स्वार्थत्यागपूर्वक कष्ट व छळ सोसले.  आतां त्यांचे वंशज व बाहेरचे लोक त्या स्मारकाचा उपभोग फुकट घेत आहेत.  ह्या सुंदर उपमा श्रोतृवृंदास फास आवडल्या.  पुष्कळांनीं तसें उघड येऊन सांगितलें.  सतीषचंद्र चक्रवर्ती आणि बिपिनचंद्र पाल ह्यांनीं मला निर्भर चित्तानें कवटाळलें.

चित्तागाँग  :   ता. १९ सप्टेंबरला ८। वाजतां मेघनाद नदीच्या पात्रांतून चांदपूरला निघालों.  सकाळीं १० वाजतां पद्मा नदीच्या अफाद पात्रांत शिरलों.  सागराप्रमाणें ही विशाल व भयानक आहे.  पुष्कळदां हिनें हाहाःकार केला आहे.  पात्रांत     भयंकर मगर आहेत.  पाण्यानें तुडुंब भरलेल्या पात्राची रुंदी २।३ मैल तरी असावी.  नलगुरी बंदराजवळ तर पात्र ६ मैल रुंद होतें.  चांदपूरचें काम आटोपून ता. २१ ला सकाळीं चित्तागाँगला (चैत्यग्राम) आलों.  येथें नवविधान व साधारण ब्राह्म समाज अशा दोन पंथांचीं मंदिरें आहेत.  अर्थात् आम्ही साधारण ब्राह्म समाजाचे पाहुणे होतों.

हेमलताबाई  :   सप्टेंबर २४ ला मिस्टर देवेन्द्रनाथ भट्टाचार्य यांच्या पत्‍नीनें चित्तगाँगमध्यें साधारण ब्राह्म समाजांत उपासना चालवली.  देवेन्द्र हे प्रथम जुन्या मताचे ब्राह्मण होते.  प्रथम ते ब्राह्म झालेले सौ. हेमलताबाईंना आवडलें नाहीं.  ते पुढें घरींही प्रार्थना करूं लागले.  तेव्हां तर त्या अधिकच भ्याल्या.  पण शेवटीं जेव्हां देवेन्द्रांच्या संतापी बापानें देवेन्द्राला त्याचा दायभाग देण्याचें नाकारून तो एका जुन्या देवळाला दिला, तेव्हां हेमलताबाईंनीं दायभागाचा धिक्कार करून त्या स्वतः ब्राह्मो झाल्या.  त्यांची उपासना व चरित्र ऐकून मी द्रवलों.  त्यांना इंग्रजी येत नव्हते.  मला आता गरजेपुरतें बंगाली येऊं लागलें होतें.  ता. २६ला नवविधान ब्राह्म समाजाच्या मंडळीनें मला आपल्या मंदिरांत जाहीर उपासना करण्यास बोलावलें.  बंगाल्यांत पुष्कळ ठिकाणीं ह्या दोन पंथांचें आपसांत मुळींच पटत नाहीं.  मी साधारण पक्षाचा असूनहि मला हें आमंत्रण आलें हें अपूर्व होतें.  केवळ मी महाराष्ट्रांतील ब्राह्मो प्रचारक म्हणूनच हा सन्मान होता.  मीं 'समन्वय' (Harmony) ह्या विषयावर इंग्रजींत प्रवचन केलें.  उपासना हिंदींत केली.

ता. २७ सप्टेंबरला राममोहन रॉय पुण्यतिथि साजरी करण्यांत आली.  ता. २९ ला 'नीला' स्टीमरनें कॉक्सबझार गांवीं निघालों.  एका तासानें आमची नदी बंगालच्या उपसागरास मिळाली.  समुद्रास पाहून आनंद झाला.  पुढें कुतुबदीया व मस्कली बेटांजवळील खाडींतून दिसणारा देखावा बहारीचा होता.  कॉक्सबझार ब्राह्म समाजांत जोगेंद्रसेन वकील, ऑनररी मॅजिस्ट्रेट हे एकच ब्राह्म सभासद असूनही आमचे स्वागतार्थ दिंडी, पताका, खोल घेऊन मुलांबाळांसह आले होते.  सुमारें १०० माणसें बंदरावर आलीं होतीं.  हा बंदराचा गांव बंगालच्या उपसागराच्या पश्चिम किनार्‍यावर पूर्व किनार्‍यावरील जगन्नाथपुरीच्या समोर आहे.  येथें ब्रह्मी लोकांची वस्ती फार आहे.  हा आराकान प्रांत पूर्वी ब्रह्मदेशाचा भाग होता.  आतां फक्त एक डोंगराची रांग आड आहे.  येथें पूर्वी बौद्धविहार होता.  समुद्रकिनार्‍यावरील वालुकामय वाळवंट फार नयनमनोहर दिसत होतें.  पाण्याच्या कांठाशीं आमची उतरण्याची सुंदर सोय केली होती.  रात्री चांदण्याच्या होत्या.  तेथें तीन दिवस आम्हीं फार विश्रांतींत घालवले.    

हा पहा ब्राह्म धर्माचा विजय !  :   ता. १ ऑक्टोबरला मी हायस्कूल विद्यार्थ्यांसमोर थोडेंसे बोललों.  राममोहन रॉयची बाळपणची गोष्ट सांगून ''गोष्टींतल्या मुलाचें नांव कोण सांगेल ?''  असा सवाल केला.  एका मुसलमान मुलानें राममोहन हें नांव मोठ्या उत्साहानें सांगितलें.  मी उद्‍गारलों, ''हा पाहा ब्राह्म धर्माचा विजय !  मुसलमान मुलासही राममोहनांचें नांव माहीत आहे !''  (पण हिंदूंना माहीत नव्हतें याची वाट काय ?)  ता. २ ला चित्तागाँगला परतलों.  येथें मला सनस्ट्रोक (मस्तिष्कताप) झाला.  दासबंधूंची मोठी कन्या अमिया हिनें अर्धा तास खंड पाण्याची धार मस्तकावर धरून सुमारें एक तास वारा घालून मला बरें केलें.  ता. ३ ऑक्टोबर रोजीं पहारतली, ता. ४ ला बरोमा, ता. ५ ला फेनी या गांवीं जाऊन ता. ७ रोजीं नोआखली येथें आलों.  फार पावसामुळें विशेष काम झालें नाहीं.

नोआखली  :  नोआखली हा जिल्ह्याचा गांव आहे.  मेघनाद व पद्मा ह्या दोन नद्यांच्या आक्रमणामुळें ३४ भाग वाहून गेला आहे.  बाकीचाही त्याच पंथास लागला आहे.  दक्षिण-पूर्व व कांहीं उत्तर भाग भयाण, ओसाड व भिजलेल्या चिखलाचा, ८।१० मैलपर्यंत दिसतो.  पात्राजवळ जाऊन पाहिलें असतां जमीन कात्रून पाण्यांत टाकण्याचा, नद्यांचा सतत उपक्रम नजरेस येतो.  तेथें ब्राह्ममंदिर आहे.  पण नगराप्रमाणें मंदिरही कातरलें जाऊन जवळजवळ ओस पडलें आहे.  रायबहादूर राधाकांत आईस हे एकटेच ब्राह्म.  तेहि अनुष्ठानिक नाहींत.  हे आमच्यासाठीं कोमिल्लाहून आपल्या चिरंजिवाचे येथें आले होते.  ब्राह्म समाज म्हणजे वकील, डॉक्टर, सरकारी अधिकारी वगैरे उपर्‍या सुशिक्षितांचा, स्थानिक फारच कमी.  हे शाळूसोबती चोहींकडे पांगून मंदिरें ओस पडल्याचीं उदाहरणें उत्तर प्रांतांत तर आहेतच, पण खुद्द बंगाल्यांत तर अधिकच आहेत.  ता. ८ ऑक्टोबरला रात्रीं ७ वाजतां कोमिल्ला येथें पोचलों.        

माझें बंगालींत भाषण  :   सायंकाळीं मला नित्याप्रमाणें थकवा व कणकण भासली.  त्यावरून आज तीन महिने माझ्या मनावर व शरिरावर जो ताण पडत आहे तो आतां कमी केला पाहिजे असें मला वाटलें.  पण व्याख्यानास उभें राहिल्यावर मी हें सर्व विसरतों.  सायंकाळचें व्याख्यान इतकें वठलें कीं, दुसर्‍या दिवशीं गांवच्या मंडळींनीं येऊन दुसरें व्याख्यान देण्याचा आग्रह केला, विषय World and Work of Brahma Samaj हा होता.  प्रथम बंगालींत मी पांचसात मिनिटें बोललों.  अशा तर्‍हेनें परकीयानें स्वभाषेंत नांदी केल्यानें श्रोतृवृंद खूष होतो.

उल्हास दत्त  :   पूर्व बंगाल हा जहाल राष्ट्रीयतेचा प्रांत आणि कोमिल्ला हें ठिकाण त्याचा आत्मा.  येथें मला उल्हास दत्त हे ज्वलज्जहाल तरुण भेटले.  हे तरुण विद्यार्थी असतांना आमच्या घरीं मुंबईस यांचा फार घरोबा असे.  क्रांतिकारक चळवळ करून ते अंदमानची ५।६ वर्षे हवा खाऊन आले होते.  मला भेटतांच त्यांनीं मोठ्या आग्रहानें आपल्या घरीं मातापितरांकडे नेलें.  बाप जहाल मताचा सुधारक असूनही वेदाचा अभ्यासी होता.  आई साधीभोळी व प्रेमळ होती.  तिनें माझ्या आईची आठवण करून दिली.  माझ्या आईनें उल्हासला खाऊं घातलें होतें.  म्हणून त्याच्या आईनें मला गोडगोड जेवण खाऊं घातलें.

अभयाश्रम  :  १० ऑक्टोबरला अभयाश्रम नांवाची प्रसिद्ध नमुनेदार संस्था पाहिली.  गांवाबाहेर सुमारें २ मैलांवर ७ एकर जमीन घेऊन तेथें सुंदर निरनिराळ्या पर्णकुट्या बांधल्या आहेत.  १०।१२ विद्वान् तरुण राष्ट्रकार्यास सर्व जीवित अर्पण करून ब्रह्मचर्यव्रत घेऊन राहिले आहेत.  खादीचें मुख्य भांडार व प्रसार येवून होतो.  खादी रंगवण्याचें काम येथेंच चालतें.  महात्मा गांधींचीं बहुतेक तत्त्वें येथें पाळण्यांत येतात.  सर्व वातावरण आध्यात्मिक, निर्भय व स्वाधीनतेचें आहे.  मोठ मोठे विद्वान् उघड्यां हवेंत हातानें परिश्रम करतात.  मात्र स्त्रियांना येथें शिरकाव नाहीं.  दुर्भाग्य !!  मग अभयाश्रम कसा ?

ता. ११ ला दार्जिलिंगला जाण्याकरितां निघालों.  आमची यजमानीण मिसेस् सुशीला दत्त हिनें फारच प्रेमानें पाहुणचार केला.  तिच्या लेकीसुनांनीं आम्हां सर्वांस घरच्यासारखें वागवलें.  त्यांनीं कांहीं मिराबाईंचीं सुंदर पदें मला उतरून दिलीं व चाली शिकविल्या.  सून हिरण्यमी व नाती ज्योतिकणा व ज्योत्स्ना ह्या वेळोवेळीं आम्हांस गाऊन दाखवीत असत.  पुढें हीच ज्योतिकणा दत्त मोठी क्रांतिकारक निघाली.  येथें मीं माझ्या पथकांस डाक्क्याकडे जाण्यास सोडलें व मी हिमालयास जाण्यास निघालों.

रात्रीं १ वाजतां चांदपुरास आगबोटीवर चढलों.  ता. १३ ला दार्जिलिंग स्पेशलनें (आगगाडी) ६॥ वाजतां सिलिगुरी येथें हिमालयाच्या पायथ्याशीं पोचलों.  कांचनगंगेनें दर्शन देऊन स्वागत केलें.  दार्जिलिंग-हिमालयन रेल्वेंतून सकाळीं सात वाजतां निघून १० वाजतां कर्सिऑंग स्टेशनवर पोचलों.  हें स्थळ ६००० फूट उंच आहे.

  1. निवेदन
  2. निधीची योजना
  3. काठेवाडचा दौरा
  4. इमारतींची योजना
  • 45
  • 46
  • 47
  • 48
  • 49
  • 50
  • 51
  • 52
  • 53
  • 54
Page 50 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी