1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

निवेदन

प्रचारकांच्या बदल्या  :  १९१९ च्या सुमाराला सय्यद अबदुल कादर यांनीं आपलें काम सोडलें.  ते त्यापूर्वीच आपलें नागपूर येथील काम सोडून असि. सेक्रेटरीचा चार्ज घेऊन आले होते.  १९१८ तील अस्पृश्यतानिवारक परिषदेचें काम, मुंबईस त्यांनीं फार अंगमेहनतीनें केलें.  बहुतेक मिशनच्या शाखांशीं त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला होता.  त्यांच्या कामांत त्यांच्या पत्‍नीचें सहकार्य होतें.  रा. सय्यद यांच्यानंतर लौकरच रा. वामनराव सोहोनी यांनीं आपल्या मुंबई शाखेचा चार्ज सोडला.  ह्या दोघां आद्यप्रवर्तकांचा संबंध अशा रीतीनें सुटल्यानें मला फार वाईट वाटलें.  स्वतः माझ्या मानेवरचेंच जूं मी केव्हां खालीं ठेवावें या विचारांत होतों.  म्हणून हा सहकार्‍यांचा वियोग मीं कसाबसा सहन केला.  बंगलोर शाखेंतून रा. पाताडे यांनीं १९२१ च्या सुमाराला मुंबई शाखेचा कारभार त्यांच्या स्वाधीन केला; पण १।२ महिन्यांतच त्यांना पुण्यास आणण्यांत येऊन व त्यांचे जागीं हुबळी शाखेचे दा. ना. पटवर्धन यांस मुंबईस नेमलें.  अशा या तात्पुरत्या अदलाबदलीमुळें मिशनच्या कामाची फार आबाळ होऊं लागली.

निवेदन  :   अशा या कठीण प्रसंगीं सर्व मिशनची पुनर्घटना निदान पुणें शाखेची तरी विशेष घटना करणें मला भाग पडलें.  त्याविषयीं अगोदर माझें एक प्रांजल निवेदन वर्तमानपत्रांतून जाहीर करणें इष्ट वाटलें.  त्याप्रमाणें ता. ३ एप्रिल १९२३ रोजीं केसरींत व ता. २९ मार्च १९२३ रोजीं ज्ञानप्रकाशांत मीं माझें जें निवेदन प्रसिद्ध केलें त्यांतील कांहीं भाग पुढें देत आहें -

''ही मंडळी स्थापण्याचें श्रेय ब्राह्मण धर्माला आहे.  प्राथमिक प्रयत्‍नांस पूर्ण पाठिंबा मुं. प्रा. समाजांतील प्रमुख सभासदांनीं दिला; पण हें मिशन समाजाचें अंग म्हणून न चालवतां, स्वतंत्रपणें एक राष्ट्रकार्य म्हणूनच चालवणें मंडळीस श्रेयस्कर वाटलें.  स्थापनेच्या वेळीं वरवर विचार करणार्‍या लोकांनीं अनुकूल-प्रतिकूल भविष्यें वर्तवलीं.  अस्पृश्यवर्गांत तादात्म्य पावून त्यांचा उद्धार न होतां स्पृश्य कार्यवाहकांचीच अवनति होण्याचा संभव आहे असे प्रांजलपणाचे उद्‍गार एका सच्छील गृहस्थानें काढले.  पुढें पुढें तर हा प्रयत्‍न अस्पृश्यांस वर नेण्यानेक्षां ब्राह्मणादि वरिष्ठ लोकांस खालीं ओढण्यासाठींच आहे असे उद्‍गार जाहीर सभांतून स्पष्ट निघूं लागले.  ह्या मिशनच्या कार्यवाहकांनीं अस्पृश्य-वस्तींत आपल्या कुटुंबासह त्यांच्या बायकामुलांस समान वृत्तीनें मिसळून बिनबोभाट निरपेक्ष रीतीनें काम करावें, हें ह्या मंडळीचें आद्या तत्त्व ठरलें.  ह्या तत्त्वाप्रमाणें ७ बंधु व २ भगिनी यांनीं काम केलें आहे.  त्यांपैकीं ५ मराठे, ३ ब्राह्मण व १ मुसलमान प्रार्थनासमाजिस्ट, अशी त्यांची जातवारी आहे.  हे बहुतेक ब्राह्म धर्मानुयायीच असल्यामुळें प्रथम जातिभेद टाकूनच ही मंडळी कार्यास लागली.

''ह्या मिशनचें काम पुढेंमागें अस्पृश्यांनीं स्वतः आपल्यावर घ्यावें म्हणून प्रत्येक प्रांतिक शाखेच्या मुख्य ठिकाणीं अस्पृश्य-विद्यार्थीगृह चालवण्याचा आग्रह आजपर्यंत चालू आहे.  त्याशिवाय ह्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक राहणीवर उच्च संस्कार होणें अशक्य आहे हें जाणून मुंबई, पुणें, हुबळी, नागपूर, बंगलोर, मंगलोर वगैरे ठिकाणीं अशा गृहांची योजना कमीअधिक प्रमाणांत चालू आहे.  अस्पृश्यतानिवारणाच्या प्रश्नाला आज जें स्वरूप आलें आहे याचीं कारणें पुष्कळ अंशीं ह्या वसतिगृहांतच सांपडतील.

''मंडळीच्या कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विस्तार सर्व हिंदुस्थानभर झाला आहे.  नर्मदेच्या उत्तरेकडील भागांत पूर्वेस ब्राह्म समाजानें व वायव्येस आर्य समाजानें हेंच काम चालवलेलें आहे.  अलीकडे महात्मा गांधींनीं ह्या कामाचा स्वीकार केल्यानें राष्ट्रीय सभेचाही पूर्ण पाठिंबा ह्या कामास मिळाला आहे.  तरी पण राजकारण, समाजकारण, जुन्या धर्माचें आचरण, परंपरेचें परिपालन इत्यादि परस्पर भिन्न विषयांमुळें हा प्रश्न फार गुंतागुंतीचा झाला आहे.  प्रत्यक्ष काम करणारांची स्थिति अत्यंत केविलवाणी होऊं लागली आहे.  अस्पृश्यांत जोराची जागृति होत आहे एवढेंच समाधान कार्यकर्त्यांत उरलें आहे.  ह्या मंडळीचें मध्यवर्ती ऑफिस जरी मुंबईस आहे तरी ह्या मंडळीला एखादें आश्रयस्थान ऊर्फ आश्रम बांधण्यासाठीं प्रशस्त जागा कितीही प्रयत्‍न करून मुंबईस मिळण्यासारखी नाहीं हें पाहून हा प्रयत्‍न पुण्यास केला.  ह्यासाठीं १९१२ सालापासून मला पुण्यास राहावें लागलें.  १८५२ सालीं ज्योतिबा फुले ह्यांनीं पुण्यास अशीच एक मंडळी स्थापन केली होती.  त्या मंडळीची भोकरवाडी येथील (परडी सर्वे नं. ५) सुमारें ७ एक जागा पुणें म्युनिसिपालिटीच्या ताब्यांत सरकारमार्फत आली होती.  ती जागा मिशनला मिळून तिच्यावर १ लक्ष ७ हजार रुपये किंमतीच्या पक्क्या इमारती पूर्ण झाल्या आहेत ह्याबद्दल म्युनिसिपालिटीचें व सरकारचें मिशन अत्यंत ॠणी आहे.  

'' ५ सप्टें. १९२१ रोजीं म्हैसूर युवराजांच्या हस्तें मुख्य शाळेच्या इमारतीची कोनशिला बसवण्यांत आली.  त्या समारंभाचे वेळीं अस्पृश्यपुढार्‍यांनीं आतां हें काम आपल्यावर घ्यावें अशी नम्र सूचना मजकडून करण्यांत आली.  त्यावर ज्ञानप्रकाश, मुं. क्रॉनिकल (सुबोध पत्रिका) वगैरे पत्रांनीं आपलें मत दिलें कीं, केवळ अस्पृश्यांवरच हें काम सोंपवण्याची वेळ अद्याप आली नाहीं.  वरिष्ठ व कनिष्ठ म्हणणार्‍यांनीं मिळून सहकार्यच केलें पाहिजे.  तत्त्वतः हें खरें असलें तरी ज्या अर्थी अस्पृश्यवर्गांत योग्य पुढारी निर्माण होऊं लागले आहेत आणि कौन्सिलांतून व म्युनिसिपालिट्यांतून अभिनंदनीय कामगिरी ते करूं लागले आहेत त्या अर्थी त्यांचें स्वतःचेंच मिशन चालवण्यास ते केवळ असमर्थ आहेत असें म्हणतां येणार नाहीं.  हें जाणून गेल्या दोन वर्षांत स्थानिक व्यवस्थापक कमिट्यांतून अस्पृश्यवर्गांतील पुढारी घेण्यांत आले आहेत.  इतकेंच नव्हे तर नागपूर व बंगलोरच्या शाखा ह्याच वर्गाच्या अधिकार्‍यांकडे सोंपवण्यांत आल्या होत्या.  अशा अधिकार्‍यांकडून प्रत्यक्ष काम करीत असतांना जरी कांही चुका घडून आल्या आहेत, तरी अधिक अधिक प्रत्यक्ष जबाबदारी यांचेवर टाकणें हेंच श्रेयस्कर आहे.  आम्ही स्वराज्यवादी तरी इंग्रज अधिकार्‍याकडे हीच मागणी करीत आहों.  अस्पृश्यवर्गहि तीच मागणी करीत आहे ही संतोषाची गोष्ट आहे.  हें सर्व ध्यानांत आणून ह्या मिशनच्या मुंबई येथील मातृसंस्थेच्या साधारण सभेनें गेल्या वर्षी नियमांची पुनर्घटना केली.  निरनिराळ्या स्थानिक शाखांनीं आपआपले कारभार चालवण्यासाठीं स्थानिक कमिट्या, वर्गणीदार लोकांतून, निवडणुकीच्या तत्त्वावर स्थापाव्यात, मध्यवर्ती कमिटीकडून मिशनरी मागवावे व शक्य तेथवर अस्पृश्यवर्गांतील अधिकारी नेमावे, अशी दिशा पतकरली आहे.

''इमारतीची योजना पूर्ण झाल्यानें माझी या शाखेची अंतर्व्यवस्थेची खास कामगिरी संपली आहे.  वयपरत्वें सामान्य देखरेखीपेक्षां अधिक जबाबदारी स्वतःवर ठेवणें इष्ट नाहीं.  म्हणून मी ह्यापुढें मिशनच्या ऑनररी ऑर्गनायझिंग जनरल सेक्रेटरी याच नात्यानें, मजकडून होईल तें काम करण्याची इच्छा अद्यापि बाळगून आहें. विशेषतः अस्पृश्यतानिवारणाचे जें सामाजिक काम मिशनच्या बाहेरील मंडळीही करूं लागली आहे त्यांच्याशीं ह्या मंडळीचें सहकार्य घडवून आणावें हा माझा उद्देश आहे.  ईश्वर कृपा करो.''

निधीची योजना

निधीची टंचाई  :   मिशनच्या सुरुवातीस निराश्रित सेवासदन चालू करण्यासाठीं दरमहा १०० रु. ची देणगी दयाराम गिडुमल यांनीं दिली हें मागें सांगितलेंच आहे.  ही देणगी तीन वर्षांसाठींच होती.  ह्या तीन वर्षांत मिशनची बरीच वाढ झाली; पण १९१० च्या जूनअखेर ही वर्गणी बंद झाली.  काम वाढलें पण मदत नाहीं, अशी पंचाईत पडली.  गरिबांचीं लग्नें करण्यांत लोक मोठा परोपकार समजतात; पण लग्नामुळें संसाराचा पसारा होऊन गरिबांचे फार हाल होतात.  तसाच ह्या मिशनचा प्रकार झाला.  निराश्रित सेवासदन बंद पडल्यामुळें त्यांतील कार्यकर्त्यांची इतर कामांकडे वांटणी करण्यांत आली.  श्रीमती वेणूबाईस पुण्याच्या शाखेंत पाठविलें.  भगिनी जनाबाईस प्रचारकार्यासाठीं बरोबर नेण्यांत आलें.  भगिनी तान्याबाईस परळच्या शाळेंत शिक्षकीण म्हणून ठेवण्यांत आलें.  सय्यद अबदुल कादर यांस बाहेरच्या शाखांची पूर्वतयारी करण्यांस पाठविण्यांत आलें.  पण ह्या सर्व कामांस निधीची फार जरूर लागली.  ती पुरेशी न मिळाल्यानें जनाबाईला जें अल्पवेतन होतें तेंही बंद करण्यांत आलें.  शिक्षकिणीची कायमची नोकरी सोडून त्या मिशनमध्यें आल्या होत्या; पण आतां त्यांचें काम मात्र फार वाढलें होतें आणि अल्पवेतनही बंद झालें.  त्यामुळें मोठी खाजगी आपत्ति ओढवली.  सय्यद अबदुल कादर व इतर कार्यकर्ते ह्यांचीं वेतनें बंद करणें शक्य व इष्ट नव्हतें; म्हणून आम्ही रुपीफंड, तांदूळ फंड, कपडे फंड, पेटी फंड इत्यादि युक्तया काढून भुकेच्या वेदना कशाबशा शमवू लागलों.  पुण्यास ना. गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क ह्यांच्या कन्येनें जलसा करून जी शिल्लक उरली त्यांत थोड्यां रकमेची भर घालून ५००० रु. ची रक्कम मुंबईतील ट्रस्टीकडे पाठविण्यांत आली.  पण तो कायम निधि म्हणून राखून ठेवण्यांत आल्यानें चालू खर्चास त्याचा उपयोग करतां येईना.

संस्थापनेचा दिनसमारंभ  :   ता. १८ ऑक्टोबर १९०९ रोजीं मिशनच्या संस्थापनेचा दिवस साजरा करण्यासाठीं आणि शाळांतील मुलांचा बक्षीससमारंभ करण्यासाठीं मुंबईच्या टाऊन हॉलमध्यें एक अपूर्व जाहीर सभा भरविण्यांत आली.  तिचें अध्यक्षस्थान श्रीमंत सर सयाजीराव यांनीं मंडित केलें.  त्या वेळीं मिशनचे अध्यक्ष चंदावरकर, नामदार जी. के. गोखले, मि. विमा दलाल, बडोद्याचे पं. आत्माराम ह्यांचीं भाषणें झालीं.  गांवांतील प्रमुख स्त्री-पुरुषांनीं प्रशस्त टाऊन हॉल चिक्कार भरला होता.  महाराजांनीं आपलें अध्यक्षीय भाषण संपवून आपली २००० रु. ची देणगी देऊं केली.  सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ति या नांवानें तिचा उल्लेख करण्यांत आला.  मिशनचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला ह्यांनीं ५००० रु. ची देणगी दिली.  मिशनच्या घटनेच्या नियमाप्रमाणें त्यांना आश्रयदाते करण्यांत आलें.  ह्याप्रमाणें त्या मोठ्या रकमा कायम निधीकडे गेल्यामुळें चालू खर्चाची हळहळ उरलीच.  समारंभास महिला समाजाच्या सभासद व इतर प्रतिष्ठित स्त्रिया हजर होत्या.  त्यांपैकीं कांहीं चालू संधीचा फायदा घेऊन निधि जमविण्यास पुढें आल्या.  टाऊन हॉलचे पुढचे तीन दरवाजे त्यांनीं रोखले.  एकेका दरवाज्यांत दोघां दोघां भगिनींनीं आपली शाल पसरून त्या प्रचंड समुदायांतील बाहेर जाणार्‍या प्रत्येकास कांहीं तरी देणगी टाकण्याचा त्या आग्रह करूं लागल्या.  या बाबतींत सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्यांनी पुढाकार घेतला होता.  सारा जमाव जणुं काय कैद झाल्यासारखा देखावा दिसत होता; पण कोणीही तक्रार न करतां उलट या बायांचें कौतुक करून आपखुशीनें शालींत देणग्या टाकुं लागले.  ह्या कैदेंत मुंबईचे पोलीस कमिशनर सांपडले होते.  खिसे चांचपडल्यावर आपल्या खिशांत कांहीं न सांपडल्यामुळें कमिशनरसाहेब गयावया करूं लागले.  लक्ष्मीबाईंनीं एक शिसपेन्सिल आणि कागदाचा तुकडा त्यांच्या हातं देऊन; ''झोळींत आंकडा टाका म्हणजे सुटका होईल, एरव्हीं नाहीं;'' असें सांगितलें.  कमिशनरसाहेबांनीं दुसरे दिवशीं देणगीची रोकड सेक्रेटरीकडे पाठविली.  तेव्हां, 'ही माझी खंडणी घेऊन माझी मुक्तता करा,' अशी त्यांनीं विनंती केली होती.  देणगीचा आंकडा अशा प्रकारें बराच मोठा झाला होता.

तक्ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ह्या मिशनचा बोलबाला लवकरच हिंदुस्थानचे व्हाइसराय लॉर्ड हार्डिज व त्यांची पत्‍नी लेडी हार्डिज यांचे कानीं गेली.  न मागतां लेडी हार्डिज यांनीं मोठ्या उदारपणें २००० रु. रोख पाठविले.

रुपीफंड  :   खर्चांत येणारी तूट भरून काढण्यास वेळावेळीं धडपड करूनही तूट भरून येईना; म्हणून डी. सी. एम. रुपीफंड नांवाची एक नवीन योजना १९११ च्या जुलै महिन्यांत आंखण्यांत आली.  त्या फंडाच्या उभारणीसाठीं सुमारें दहा स्वयंसेवक व त्यावर एक कॅप्टन व असे दहा कॅप्टन अशी योजना करण्यांत आली.  प्रत्येक स्वयंसेवकानें १ रुपया वर्गणी गोळा करून वर्षअखेर १०० रुपये जमवावेत.

फंडाच्या बोर्डावर खालील ६ कॅप्टन्स मिळाले.  (१) सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्यांच्या हाताखालीं १५ स्वयंसेवक, (२) पी. बी.गोठस्कर ह्यांचे हाताखालीं १६ स्वयंसेवक, (३) अमृतलाल व्ही. ठक्कर - ११ स्वयंसेवक, (४) वि. रा. शिंदे- ११ स्वयंसेवक (५) सय्यद अबदुल कादर - १७ स्वयंसेवक, (६) एल. बी. नायक - १० स्वयंसेवक.

येणेप्रमाणें ८० स्वयंसेवकांनीं ३१ डिसेंबर १९११ रोजीं संपणार्‍या सहामाहीच्या आंत प्रत्येकीं १०० रु. जमविण्याचें पत्करलें.  पण ऑगस्ट १२ पासून ३१ डिसेंबर १९११ च्या आंत ह्या स्वयंसेवकांनीं १४७१ रु. जमविले.  आकांक्षित ४००० रु. च्या मानानें हा आंकडा फारच कमी झाला.  बोर्डाची एक साधारण सभा आणि दोन सामाजिक मेळे ह्या सहामाहींत भरविण्यांत आले.  स्वयंसेवकांचा परस्पर परिचय होऊन स्नेहसंबंध वाढण्याला ह्या सभांचा फार उपयोग झाला.  मिशनला चालू सालीं १३१६ रु. १५ आ. १ पै तूट आलेली आहे आणि उत्पन्नाच्या बाबी निश्चित नसल्यामुळें पुढील सालीं अधिक तूट येणार, हें स्वयंसेवकांना पटवून देण्यांत आलें.

१९१२ सालच्या अखेरीस १२ महिन्यांत एकंदर १०१६ रु. जमा झाले.  आकांक्षित ५००० रु. पेक्षां ही रक्कम फारच कमी होती.  स्वयंसेवकांची संख्या ६० होती.  विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही कीं, जनरल सेक्रेटरींची पत्‍नी सौ. रुक्मिणीबाई शिंदे ह्यांनीं स्वयंसेविका म्हणून एकंदर ५६० रु. जमविले.  त्यांच्या कॅप्टन भगिनी जनाबाईंनीं ह्या कामीं सौ. रुक्मिणीबाईंना बरीच मदत केली होती.  एकच रुपया जमविण्याच्या उद्देशांत तो देणार्‍या व्यक्तीचें हृदय असतें हीच भावना हा फंड जमवितांना होती.  अशा दृष्टीनें पाहतां फंड जरी कमी झाला तरी सहानुभूतीनें वलय वाढलें, ही गोष्ट समाधानकारक होता.

तांदूळ फंड  :  निराश्रित सेवासदन या संस्थेंतून मिशनचें परळ येथें विद्यार्थीवसतिगृह निघालें होतें.  जेवून राहणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या १९१२ मध्यें ४० होती.  मुंबईसारख्या शहरामध्यें ह्या संस्थेचा खर्च फार येऊं लागला.  रोखीनें निधि मिळविण्याचें काम पुरें पडेना.  त्यामुळें तांदूळ फंड म्हणून एक युक्ति काढली.  गृहिणीनें रोज मूठभर तांदूळ टाकण्यासाठीं घरोघरीं तांदूळ व इतर धान्याच्या पिशव्या ठेवण्यांत आल्या.  दर आठवड्यांत स्वयंसेवकांमार्फत विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन हें धान्य वसतिगृहामध्यें आणण्यांत येई.  १९१२ सालीं ३४ फरे तांदूळ, २॥ फरे गहूं आणि ८ फरे डाळ गोळा करण्यांत आली.  किंमतीच्या दृष्टीनें मी मदत फार नसली तरी प्रत्येक मूठभर तांदळाच्या मागें एकेक स्त्रीचें मानवी हृदय होतें.  ह्या दृष्टीनें पाहतां रुपी फंडापेक्षांही या फंडानें सहानुभूतीचें वलय किती तरी वाढविलें.  अस्पृश्यता निवारण्याचे कामीं लोकमत तयार करण्याचें मिशनचें सर्वांत मुख्य काम अशा युक्तया-प्रयुक्तयांनीं बिनबोभाट चाललें होतें.

कापड फंड व पेटी फंड  :  विद्यार्थ्यांना जेवणाशिवा नवे जुने कपडे, बिछाने, भांडीं, साबण, औषधें, पुस्तकें वगैरे अनेक घरगुती वस्तूंची जरूरी लागे.  ती गरज ह्या कापड फंडानें भागविली जात असे.  सीलबंद केलेल्या लहान लहान लाकडी पेट्या, मुख्य मुख्य कचेर्‍या, खाजगी दवाखाने, वकिलांचीं घरें आणि इतर माणसांची जा-ये पुष्कळ आहे अशा ठिकाणीं ठेवण्यांत आल्या.  त्या ठिकाणीं नेहमीं असणार्‍या मिशनच्या हितचिंतकाला ह्या पेटीची जबाबदारी देण्यांत आली.  दर महिन्याच्या शेवटीं स्वयंसेवकानें जाऊन जबाबदार हितचिंतकाचे समोर ती उघडून आंतील रकमेची पावती देऊन स्वयंसेवक मिशनच्या खजिनदाराकडे हा हिशेब देई.  खजिनदाराची पावती अखेरची समजली जाई.

ह्या निरनिराळ्या फंडांची योजना मिशनच्या निरनिराळ्या शाखांतून सुरू करण्यांत आली.  तांदूळ आणि कापड फंड जमविण्याचे कामीं रुपी फंडाप्रमाणेंच सौ. रुक्मिणीबाई शिंदे यांनीं मोठें यश मिळविलें.  त्या जेथें जात तेथें कनवाळू स्त्रिया मुठीनें तांदूळ न देतां सुपानें तांदूळ भरभरून इतके देत असत कीं, विद्यार्थ्यांना ते उचलून आणणें देखील जड जात असे.

औद्योगिक शिक्षण  :  विद्यार्थी वसतिगृहें आणि उद्योगशाळा हीं मिशनचीं स्वीकृत कामें फार खर्चाचीं आणि दगदगीचीं होतीं.  मुंबईतील परळ शाळेंत बुक-बाइंडिंग व शिवण्याचें काम, मंगळूर येथें हातमागावर विणण्याचें काम, महाबळेश्वर येथें काथ्याचे दोरखंड आणि वेताच्या टोपल्या वगैरे करण्याचें काम, अशीं औद्योगिक कामें प्रथमपासून चाललीं होतींच.  १९१२ सालीं मुंबईच्या परळ येथील शाळेला एक स्वतंत्र उद्योगशाळा जोडण्याची आवश्यकता भासूं लागली. औद्योगिक शिक्षणाची मुख्य कल्पना ही आहे कीं, विद्यार्थ्यांच्या हातांना आणि डोळ्यांना व्यावहारिक वळण लागावें आणि तद्द्वारां विद्यार्थ्यांला भावी आयुष्यामध्यें कोणता तरी हस्तकौशल्याचा धंदा करतां यावा.  बहुतेक अस्पृश्यवर्ग असा कोणता ना कोणता धंदा करून आपलें पोट भरीत असतो.  म्हणून अशा धंद्याची तयारी लहानपणापासूनच केली नाहीं, तर ते पुढें पोकळ पंडित बनून आईबापांच्या आणि स्वतःच्या निराशेला कारणीभूत होतील.

वाडिया ट्रस्टींची मदत  :  ह्या कामीं पुरेसा निधि मिळावा, म्हणून मुंबईच्या एन. एम. वाडिया ट्रस्टींकडे अर्ज करण्यांत आला.  त्या फंडाचे प्रमुख ट्रस्टी सर जमशेटजी जीजीभाई आणि बॅ. एच. ए. वाडिया यांना मिशनची परळ येथील दुय्यम शाळा समक्ष दाखविण्यांत आली.  सर्व कामें बारकाईनें पाहिल्यावर औद्योगिक शाळा चालविण्यास मिशन पात्र आहे, अशी या ट्रस्टींची खात्री झाली आणि दरसाल ६००० रु. ची देणगी याप्रमाणें तीन वर्षेपर्यंत एकूण १८,००० रु. देण्याचें तयांनीं कबूल केलें.  त्याप्रमाणें हीं नवीन उद्योगशाळा निघाली.  ह्या शाळेंत सुतारकाम, चित्रकला व रंगकाम, शिवणकाम, पुस्तकें बांधण्याचें काम असे चार निरनिराळे वर्ग योग्य शिक्षकांच्या नजरेखालीं उघडण्यांत आले.  कोणत्या ना कोणत्या वर्गांत तरी शाळेंतील सर्व मुलांनीं - विशेषतः वसतिगृहांतल्या सर्व विद्यार्थ्यांनीं - दिवसांतून दोन तास हें औद्योगिक शिक्षण अवश्य घ्यावें, अशी योजना करण्यांत आली. पुणें शाखेंत विद्यार्थी वसतिगृहाची पूर्वतयारी १९१२ अखेर करण्यांत आल्यावर तेथेंही अशा शिक्षणाची तरतूद करण्यांत आली.

काठेवाडचा दौरा

काठेवाडचा दौरा  :  १९०४ च्या एप्रिल महिन्यामध्यें माझे मित्र गुजराथेचे नानालाल कवि सादरा येथें सरकारी नोकरींत होते.  उन्हाळ्याची सुटी पडल्यामुळें माझ्याबरोबर काठेवाडांत समाजाच्या प्रचारकार्यासाठीं दौरा काढण्याचें त्यांनीं ठरविलें.  मी सादरा येथें गेलों.  स्टेशनहून सादरा गांव बराच लांब असल्यानें व प्रदेश वाळवंटाचा असल्यामुळें माझी प्रवासाची उंटावरून जाण्याची व्यवस्था केली होती.  संवय नसल्यामुळें ह्या प्रवासाचा मला बराच त्रास झाला.  अंग फार हालल्यानें दोन दिवस कमरेला ठणका लागला होता.  सादर्‍याहून आम्ही दोघे प्रथम अहमदाबाद प्रार्थनासमाजांत गेलों.  तेथें व्याख्यानें आणि सभासदांशीं परिचय वगैरे करून घेण्यांत दोन दिवस गेले.  समाजाचे अध्यक्ष लालशंकर उमीयाशंकर यांची प्रथमच ओळख झाली.  त्यांनीं स्थापलेलें मोठें अनाथालय पाहिलें.  ह्या समाजाला पैशाचें भरपूर साहाय्य आहे.  प्रार्थनामंदिर प्रशस्त आणि सुंदर आहे.  सभासदांचीं संख्या पुष्कळ आहे, पण अनुष्ठानिक सभासद फारच कमी होते.  रा. रमणभाई नीलकंठ हे समाजाचे सेक्रेटरी होते.  आम्ही अहमदाबादहून राजकोटला गेलों.  प्रसिद्ध विद्वान् (प. वा.) शंकर पांडुरंग पंडित, बॅ. सिताराम नारायण पंडित आणि घनश्याम नारायण पंडित हे काठेवाडांत मोठी मान्यता पावलेले तीन पंडित बंधु राजकोटांत कायमची वस्ती करून राहात असत.  आम्ही शंकर पांडुरंग यांचे घरीं उतरलों.  रा. शंकर पांडुरंग पंडित हे प्रार्थनासमाजिस्ट होते आणि दुसरे दोघे प्रागतिक ध्येयाचे होते.  राजकोटांत राजकुमार कॉलेज व इतर तशाच मोठ्या लोकांच्या शिक्षणाची मध्यवर्ती संस्था होती.  ग्राशिया नांवाचा काठेवाडांतील जमीनदारांचा एक श्रीमंत वर्ग आहे.  त्यांचीही एक शाळा श्रीमंती थाटाची होती.  कवाईत करणें, घोड्यांवर बसणें व इतर मर्दानी खेळ खेळणें ह्या बाबतींत ह्या कुमारांची फार काळजी घेण्यांत येत असे आणि हीं कामें ह्या तरुणांना फार आवडतही असत.  क्षत्रियाला शोभणारा पेहेराव, पाणीदार वृत्ति आणि कसलेली शरीरप्रकृति पाहून आनंद झाला.  मुंबई इलाख्यांतील राजेरजवाड्यांच्या मुलांची सोय येथें एकत्र केल्यानें परस्पर-परिचय होऊन ते पुढें राजपदारूढ झाल्यावरही तो कायम राहातो.  राजकोटहून आम्ही भावनगरला गेलों.  तेथील कॉलेजांत माझें व्याख्यान झालें.  सर प्रभाशंकर पट्टणी यांचें या संस्थानांत फार वजन असे.  त्यांचीही ओळख झाली.  भावनगरहून आम्ही जुनागडला गेलों व दिवाण बेचरदास यांचेकडे उतरलों.  व्याख्यानें, भेटी व ठरीव कार्यक्रम झाल्यावर जवळच असलेल्या गिरनार पर्वतावर जाण्याचा विचार ठरला.  दिवाणांच्या ओळखीमुळें गिरनार पर्वतावर आमची राहण्याची व्यवस्था मोठ्या बडदास्तीची झाली.

गिरनार  :  'गढ जुनो गिरनार वादल थीनुं बातुं करी' ही काठीवाडी म्हण बहुजनसमाजांत प्रसिद्ध आहे.  तिच्यामुळें हा गड पाहण्याची आम्हांस फार आतुरता लागली होती.  मेघांशीं भाषण करणारा हा जुना गड गिरनार जवळजवळ चार हजार फूट उंच आहे.  त्याच्या पायथ्याशीं एका मोठ्या प्रशस्त दगडावर सम्राट् अशोक राजाचा एक प्रसिद्ध शिलालेख आहे.  गिरनारच्या पश्चिमेस गीर नांवाचें प्रसिद्ध जंगल लागूनच आहे.  त्यांत पशूंचा राजा सिंह याचें साम्राज्य आहे.  हिंदुस्थानांत याची पैदास दुसरीकडे कोठें नसल्यानें या जंगलाला मोठें महत्त्व आलेलें आहे.  जुनागडच्या प्राणिसंग्रहालयांत सुमारें १०।१२ सिंह आम्हीं पाहिले.  त्या वेळीं त्यांच्या घोर गर्जनांनीं प्रदेश निनादून गेला.  खुर्च्यांवरून आम्हांला गिरनारवर नेण्यांत आलें.  संस्थानच्या आतिथ्यालयांत आमची थाटाची सोय झाली.  शिखरावर प्रसिद्ध आणि प्राचीन अशीं कित्येक सुंदर जैनमंदिरें आहेत.  स्वामी नारायण पंथाचींही कांहीं देवळें आहेत.  येथून आसमंतांतला देखावा आत्म्याला जागृत करणारा दिसतो.  ह्या पर्वतावर मोठमोठ्या खोल गुहा आहेत.  त्यांतील एका गुहेमध्यें प्रवेश करून अंधारांतून बरेच लांबवर आंत गेल्यावर गाभार्‍यांत किती तरी निस्संग आणि विरक्त साधु राहात असलेले आम्हीं पाहिले.  पेटलेल्या धुनीचा प्रकाश अंधारांत रौद्ररसाची प्रेरणा करीत होता.  साधूंच्या मुद्रा गंभीर आणि प्रसन्न, शरीरें धष्टपुष्ट आणि तेजःपुंज, बहुतेक नग्न आणि राखेने माखलेलीं पाहून फार पाश्चर्य वाटलें.  ह्या निर्जन प्रदेशांत ह्या साधूंची खाण्यापिण्याची सोय कशी लागते, इतर योगक्षेम कसा चालतो याचें कोडें आम्हांला पडलें.  आम्हां प्रापंचिकांच्य मनांत अर्थात् असले खाण्यापिण्याचेच विचार अगोदर येणार.  साधूंना असले प्रश्न विचारल्यावर त्यांनीं नुसतें हंसून आमची बोळवण केली.  गुहेच्या आसपास ठिकठिकाणीं शुद्धोदकाचीं कित्येक टांकीं दिसलीं.  त्यांचा उपयोग हे साधु आणि जंगलांतले व्याघ्रादि वन्य पशु यांच्याशिवाय दुसरें कोण करणार ?  हे आळीपाळीनें टांक्यांवर येऊन जात असत.  त्यांच्या गांठीभेटी होऊन काय प्रकार घडत असेल हें कळण्याला मार्ग नव्हता.  अशा समागमांत आमचे चार दिवस मोठ्या समाधानाचे, एकान्तवासाचे आणि धर्मचिंतनाचे गेले आणि आम्ही जुनागडास दिवाणांच्या कोठींत परत आलों.  तेथें मियागांवचे ठाकूर, बडोदें सरकारचे मांडलिक आमचे सरपाहुणे होते.  ठाकूरसाहेबांनीं परत जातांना आपल्या मियागांव या जहागिरीच्या जागीं मीं दोन दिवस राहून जावें म्हणून मोठ्या अगत्याचें आमंत्रण केलें व तें मीं आनंदानें पत्करलें.  प्रार्थनासमाजाच्या कार्याविषयीं ठाकूरसाहेबांनीं मोठी सहानुभूति प्रकट केली.  येथून दुसर्‍या एका लहानशा संस्थानाच्या गांवीं आम्ही गेलों.  तेथें काठेवाडी जुन्या मताचे शाहिराची भेट झाली.  त्यांचीं साधीं एकतारीवरचीं व परिणामकारीं भजनें ऐकावयाला मिळालीं.  त्यांतील तेजाभगत नांवाच्या शाहिराचीं दोनतीन अनुभविक पदें मीं उतरून घेतलीं.  पुढें माझ्या कीर्तनांत त्यांचा चांगला उपयोग झाला.  दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळें रात्री फार सुखासह गेल्या.  नंतर नानालाल कवींची व माझी ताटातूट झाली.  मी एकटाच अहमदाबादेहून मुंबईकडे परतलों.

मियागांव  :  अशा प्रवासांत मला नेहमीं एक स्मरणीय अनुभव येत असे.  एकाचा उल्लेख करणें बरें.  कधीं श्रीमंतांचे घरीं थाटाचें आदरातिथ्य तर लगेच खाण्यापिण्याचे अत्यंत हाल अशा स्थितीची अलटापालट होऊन माझी चांगली कसोटी लागत असे.  उत्तम साळीचा भात भात खाऊन दुसरे दिवशीं शिळी भाकरही मिळत नसे.  अहमदाबादेस परत येतांना थोडाच वेळ राहिल्यानें आणि गाडी अवेळीं निघाल्यानें मला एक दिवसाचें उपोषण पडलें.  बी.बी.सी.आय. रेल्वेवरील मियागांव स्टेशनवर गाडी भर बारा वाजतां मला सोडून पुढें चालती झाली.  स्टेशन क्षुद्र असल्यानें तेथें कसलीच सोय नव्हती.  दोनचार मिनिटांत गाडी गेल्यावर सर्वत्र सामसूम झालें.  स्टेशनमास्तर, पोर्टर कोठें गेले तें कळेना.  उन्हांत पिण्याला पाणी मिळेना, तर खाण्याची गोष्ट काय !  दीड दिवसाच्या उपोषणानें माझ्या पोटांतील कावळे आंतडीं कुरतडूं लागले.  अर्ध्याच मैलावर एक कुग्राम होतें.  ट्रंक व बिस्तरा प्लॅटफॉर्मवरच टाकून मी तेथें भक्ष्यशोधार्थ गेलों.  त्या ओसाड खेड्यांत मला नीट माणसेंही दिसेनात.  कांहीं दारें लागलेलीं व उघडीं असतील तर माणसें नसलेलीं असा प्रकार होता.  मी एका ब्राह्मणाच्या घरीं शिरलों.  त्याच्या घरीं श्राद्ध होतें, असें कळलें.  दोन प्रहर उलटून गेले तरी हा यजमान नुकताच उठून हजामतीला बसला होता.  जेवणाची सोय होईल काय, असें विचारतां त्यानें मी ब्राह्मण आहें का, असें विचारलें.  नाहीं म्हणतांच त्यानें मला चक्क बाहेर जाण्यास सांगितलें.  हताश होऊन शेवटीं मी एका शिंप्याचे दुकानावर आलों व माझी कठीण अवस्था सांगितली.  शिंप्याला पाझर फुटला.  आपली पत्‍नी जवळच्या तळ्यावर गेली आहे; ती आल्यावर कांहीं उरलेंसुरलें मिळेल किंवा काय तें पाहूं, असा त्यानें मला धीर दिला.  शेवाळलेला घाणेरड्यां पाण्याचा घडा डोकीवर घेऊन बाई परत आली.  तिनें एका पितळींत कालचा उरलेला उसळीवजा भात व त्याहून शिळी कढी एका वाडग्यांत वाढली.  कढींत पाहतों तर चारपांच माशा पडलेल्या होत्या.  मुकाट्यानें त्या वेंचून टाकून मीं हें पक्कान्न अधाशासारखें खाल्लें; पण पाणी कांहीं केल्या पिववेना.  कसेंबसें आंचवून मी बाहेर ओटीवर शिंप्याजवळ येऊन एका चटईवर पडलों.  श्रमामुळें झोंप लागली.  अर्ध्या तासानें उठून चटईवरच पाणी प्यालों. माझ्याजवळ चटईवर एक मुसलमान गृहस्थ बसला होता.  त्याची खंती न बाळगता मी पाणी पितों हें पाहून शिंप्याचे डोळे लाल झाले.  त्यानें कांहींच मुर्वत न ठेवतां मला दुकानांतून खालीं उतरण्यास सांगितलें.  त्यांत मुसलमानाचा अपमान होऊन तोही खालीं उतरला.  तो पोलीस शिपाई होता.  मोठ्या मिनतवारीनें मी कोण, कोठचा आहें याची तो चौकशी करूं लागला.  मी रेल्वेंतला एक उतारू आहें, माझें सामान प्लॅटफॉर्मवर पडलें आहे, जात न पाळणारा मी एक मराठा आहें वगैरे माहिती मीं सांगितली.  तो म्हणाला, ''चला, जवळच आमच्या फौजदारसाहेबांचें ठाणें आहे.  तेही मराठहेच आहेत.  तुमचें सामान मी स्वतः डोक्यावर घेऊन तेथें पोंचवतों.'' तसें त्यानें केलें.  फौजदारसाहेब कोल्हापूरचे माझे चांगले परिचयाचे निघालें.  माझी कहाणी ऐकून ते कळवळले.  पडदा पालटला आणि उत्तम सोय लागली.  रात्रीं मी ठाण्यावरच राहिलों.  मियागांव तेथून सुमारें दोन मैलांवर होता.  एका पोलिसाकडून ठाकुरास निरोप गेला.  त्यांनीं ताबडतोब एक सुंदर गाडी पाठवली.  नानालाल कवीनें माझ्या येण्याबद्दलचें ठाकूरसाहेबांना जें पत्र पाठवलें होतें तें चुकून एक दिवस उशीराचें होतें म्हणून हा सर्व त्रास पडला, असें सांगून ठाकूरजींनीं माफी मागितली.  तेथें एक दिवस राहून व थाटाचा पाहुणचार भोगून मी मुंबईस परत आलों.  येणेंप्रमाणें प्रार्थनासमाजाच्या आणि पुढील डिप्रेस्ड क्लास मिशनच्या कामाकरितां काठेवाड आणि गुजराथ या प्रांतीं मीं एकंदर चार सफरी केल्या.

राममोहन आश्रम  :  १९०४ च्या पावसाळ्याच्या आंत आमचे बाबा जमखंडींतील वस्ती कायमची सोडून आणि कुटुंबांतील सारी मंडळी घेऊन मुंबईस आले.  त्यापूर्वीच राममोहन राय आश्रमामध्यें आमची राहण्याची सर्व व्यवस्था करण्यांत आली होती.  गिरगांवांतील प्रार्थनामंदिराच्या आवारांत या आश्रमाची चारमजली भक्कम इमारत आहे.  तळमजल्यांत भांडारकर लायब्ररी आहे.  दुसर्‍या मजल्यांत लाकडाच्या पडद्या लावून निरनिराळ्या खोल्या करून आमची व्यवस्था करण्यांत आली होती.  तिसर्‍या मजल्यांत एक मोठें दालन असून त्यांत समाजाचीं संमेलनें वगैरे करण्याची व्यवस्था होती.  चवथ्या मजल्यांत पुढें थोडी मोकळी जागा सोडून एक खोली काढण्यांत आली आहे.  तेथें खासगी प्रार्थनेची जागा व बाहेरून आलेल्या मिशनरींची सोय करण्यांत येते.  मुख्य इमारतीपासून स्वयंपाकाकरितां खोल्यांची अलग सोय असून स्नानासाठीं तुटक खोल्या आहेत.  एकंदर सोय चांगली आहे.  माझ्या कुटुंबांत एकंदर १०।१२ माणसें होतीं.  समाजांतील प्रचारक या नात्यानें माझी नेमणूक झाली तेव्हां माझ्या खर्चासाठीं दरमहा ६० रु. ची व्यवस्था करण्यांत आली.  शिवाय प्रवासाचा वगैरे सर्व खर्च माझा मींच पाहून घ्यावा लागत असे.  इतकेंच नव्हे तर समाजाची व तदनुषंगिक इतर कामें मीं काढल्यास त्यांच्याही खर्चाची जबाबदारी मजवरच पडे.  सात वर्षे मीं हें काम केलें, तरी माझ्या ह्या नेमणुकींत कांहीं वाढ झाली नाहीं आणि मी मागावी, असेंही मला कधीं वाटलें नाहीं.  मुंबई हा मुख्य राजधानीचा गांव.  राममोहन आश्रमाची सोंय माझ्यामुळें आणि त्याच्या पूर्वीपासूनही पाहुण्यांची ये-जा फार.  समाजाचे सभासदच नव्हत तर इतरही प्रागतिक मताचे सन्माननीय पाहुणे नेहमीं येऊन आश्रमांत उतरत.  त्यांतील कांहीं युरोप वगैरे बाहेरदेशीं जाणारे व तिकडून येणारे प्रतिष्ठित गृहस्थ असत.  त्यांच्याही सरबराईचा बोजा आम्हांवर पडे.  खर्चाचा प्रश्न बाजूला ठेवला तरी पाहुणचाराची दगदग आमच्या घरच्या कुटुंबियांवर नेहमीं पडे आणि ही कळ बोलून दाखवण्यासारखीही नव्हती.  गृहमेधाचें कठीण दिव्य मुकाट्यानें चालवावें लागे.  घरचें देखरेखीचें सर्व काम बाबांकडे होतें.  भावंडें शाळेंत असत.  तीं मोठीं झाल्यावर माझ्या कामांत सामील झालीं.  वृद्ध आईबाबाही माझ्याच नादीं लागले.  माझ्या कार्याशीं मी इतका तादात्म्य पावलों होतों कीं, माझें हें करणें न्यायाचें कीं अन्यायाचें होतें, सत्य होतें कीं असत्य होतें, ह्याचा विचार त्या वेळीं माझ्या ध्यानांतही येत नव्हता आणि घरच्या मंडळींची मनोरचना तक्रार करण्यासारखी तर कधींच नव्हती.  असा हा आमचा प्रपंचाचा अल्लारखी गाडा चालला होता.

इमारतींची योजना

याच सुमारास युरोपांतील महायुद्ध नुकतेंच संपलें होतें.  सर्व जगाला हायसें वाटलें.  ह्याच वेळीं आमच्या मिशनच्या विस्ताराचें कामही तूर्त पूर्ण झालें होतें.  सबंध दक्षिण हिंदुस्थान व उत्तरेकडे काठेवाडपर्यंत पश्चिम हिंदुस्थानाइतक्या प्रदेशांत मिशनच्या मध्यवर्ती मातृसंस्थेच्या नजरेखालीं घटनेची तयारी पूर्ण झाली होती.  पूर्वेकडील बंगाल्यांत ब्राह्म समाजाच्या सत्तेखालीं आणि मध्यसंयुक्त प्रांतीं व पश्चिमेकडे आर्यसमाजाच्या नजरेखालीं या वर्गाच्या कल्याणासाठीं ठिकठिकाणीं कामें चालू होतीं.  १९०८ सालीं मी कलकत्त्याला गेलों असतां साधारण ब्राह्म समाजाचे पुढारी पं. शिवनाथशास्त्री यांनीं साधारण ब्राह्म समाजाच्या मुख्य मंदिरांत अस्पृश्यतेच्या प्रश्नावर माझें एक खास व्याख्यान करविलें.  त्यांत मीं बंगाल्यांत ब्राह्म समाजानें हें काम सुरू करावें अशी निकराची सूचना केली.  तिचा स्वीकार करून १९०९ सालीं बंगाल डिप्रेस्ड क्लासेस मिशनची संस्थापना वरील शास्त्रीमहाशयांनीं केली.  ह्यापुढें मोर्ले-मिंटो सुधारणेचें प्रस्थान हिंदुस्थानांत सुरू झालें.  त्या धुमश्चक्रींत हिंदुस्थानांतील लहानमोठ्या सर्व जातींतून राजकारणाचा धुमाकूळ माजला.  त्याचा शेक ह्या मिशनलाही बसला.  पुणें येथील अहल्याश्रमाच्या इमारतीच्या कामांतून ह्या राजकारणी वादाचा आरंभ कसा झाला तें सांगण्याचें क्लेशकारक काम माझ्या भागास कसें आलें तें आतां सांगतों.

मद्रासहून पुण्यास परत आल्यावर महायुद्धामुळें तहकूब झालेलें इमारतीचें दगदगीचें काम मीं पुन्हां हातीं घेतलें.  या इमारतीचा नकाशा मुंबईंतील पाटकर, शहा आणि कंपनीकडून आणि खर्चाचें अंदाजपत्रक अमृतलाल व्ही. ठक्कर या मित्राकडून मोफत करून घेण्यांत आलें.  एकंदर खर्चाचा अंदाज एक लाख रुपयांवर गेला.  खालील ६ इमारतींचे नकाशे तयार झाले.

गट १ ला  :  (१) सुपरिंटेंडिंग मिशनरींची राहण्याची जागा, (२) विद्यार्थी वसतिगृहें, (३) स्नानगृहें वगैरे.

गट २ रा  :  (१) मध्यवर्ती इंग्रजी मराठी शाळा, (२) उद्योगशाळा, (३) स्नानगृहें वगैरे.

एवढ्या इमारतींसाठीं वर सांगितलेल्या ४० हजार रुपयांचें जें आश्वासन मिळालें होतें तें अगदीं अपुरें होतें.  म्हणून विद्याखात्याला अधिक मागणीचा दुसरा अर्ज पुन्हां करण्यांत आला.  त्या वेळीं लॉर्ड विलिंग्डन गव्हर्नर होते.  त्यांच्याच सहानुभूतीमुळें विद्याखात्यानें आणखी ६५,००० रु. ची ग्रँट, वरील २०,००० रु. शिवाय मंजूर केली.  परंतु नुकतेंच महायुद्ध झालें असल्यामुळें सरकारला चोहोंकडेच काटकसरीची कातर लावावी लागली.  त्यामुळें रोख मदत मिळण्याला अडचण येऊन इमारतीचें काम कांहीं दिवस तहकूब ठेवावें लागलें.  मध्यंतरी नवीनच एक आपत्ति आली.  होळकर सरकारनें दिलेली २०,००० रु. ची मदत सरकारी प्रॉमिसरीच्या नोटांत गुंतून पडली होती.  महायुद्धामुळें या नोटांची किंमत भयंकर खालीं आली होती.  ह्या नोटा लवकर विकून रोख पैसे न घेतल्यास नोटांची किंमत अधिक उतरेल अशी धास्ती पडली.  नोटा विकून रोख रु. २०,००० चे ऐवजीं १३,००० रु. च हातीं आले.  येणेंप्रमाणें ७,००० रु. ची खोट मिशनला बसली.  ही गोष्ट सरकारच्या नजरेस आणण्यांत आली.  ह्यांतील थोडीबहुत तरी रक्कम मिळावी म्हणून पुन्हां अर्ज करण्यांत आला.  तेव्हां अधिक २००० रु. चें आश्वासन मिळालें.  सुधारलेल्या कौन्सिलांत मिशनचे मित्र डॉ. र. पु. परांजपे हे शिक्षणमंत्री झाल्यावर वरील सुमारें ८०००० रु. रोख मिळाले आणि जवळजवळ १० वर्षे खोळंबून राहिलेलें हें इमारतीचें काम १९२२ च्या सुमारास संपूर्ण झालें.  इमारती बांधण्याचे कामीं सुपरिंटेंडिंग इंजिनियर रा. ब. वर्तक ह्यांच्या अनुभवाचा फायदा मिळाला.  रा. ब. वर्तक, नामदार बी. एस. कामत, रा. दादासाहेब ठकार वकील, प्रो. डी. एल. सहस्त्रबुद्धे, खजीनदार व वि. रा. शिंदे, सेक्रेटरी यांची स्वतंत्र इमारत-कमिटी नेमण्यांत आली.  इमारतीचें काँट्रेक्ट रा. पंढरीनाथ नाईक यांचेकडे देण्यांत आलें.  पाया खणण्याच्या कामीं वगैरे पुणें प्रा. समाजाचे सभासद रा. टी. डी. नाईक इंजिनियर आणि इतर बर्‍याच मित्रांची बरीच मदत झाली.  रा. गोडबोले ह्यांस वेतन देऊन सुपरवायझिंग इंजिनियर नेमलें.  पहिल्या गटाच्या तीन इमारतीचें काम मिशनच्या जागेंतील पूर्व भागामध्यें आंखल्याप्रमाणें १९२० मार्चमध्यें संपूर्ण झालें !

मिशनची शाळा प्रथम लष्करांतील कनॉट मार्केटसमोर २००८ नं. च्या बंगल्यांत व नंतर साचापीर स्ट्रीटमध्यें व त्यानंतर लष्करमधील ताबूत स्ट्रीटमध्यें अशी वेळोवेळीं बदलावी लागली होती.  जागा अपुरी झाल्यामुळें कामांत फारच व्यत्यय येत होता.  म्हणून पहिल्या गटाचा प्रवेशसमारंभ वेळ नसल्यानें न करतां घाईघाईनें चैत्री प्रतिपदेच्या मुहूर्तावर भोकरवाडीजवळील मिशनच्या स्वतःच्या इमारतींत पुणें शाखेच्या मध्यवर्ती शाळा नेण्यांत आल्या.  इमारत बांधण्याचें काम तसेंच चालू होतें.  काँट्रॅक्टरचें सामानसुमान अस्ताव्यस्त पडलें होतें.  संभोवतालच्या पटांगणांत भोकरवाडीची घाण पसलेली तशीच होती.  अशा घाईंत माझ्या घरीं दोन कौटुंबिक आपत्ति घडून आल्या.

तान्याक्काचा मृत्यु  :   याच सुमारास माझी धाकटी बहीण चि. तान्याक्का तापानें फार अत्यवस्थ होती.  आम्ही या वेळीं ताबूत स्ट्रीटमध्यें मिशनच्या शाळेंत राहात होतों.  शेवटीं ता. ३ जाने. १९२० रोजीं पहाटे चि. तान्याक्का वारल्या.  गांवांत आणि लष्करांत ही बातमी पसरल्यावर स्मशानयात्रेस सर्व जातींच्या लहानथोर माणसांचे थवेच्या थवे जमू लागले.  ब्राह्मण, मराठे, ख्रिस्ती, मुसलमान व ओळखीचे पारशी देखील आले.  अस्पृश्यांची तर गर्दीच लोटली.  भजनी मंडळ्यांचें भजन सुरू झालें.  प्रेतास खांदा कुणीं द्यावा हा प्रश्न निघाला.  मीं स्पष्ट सांगितलें कीं, ''ही बहीण माझीच नव्हे तर सर्वांची आहे.  हिनें अखेरपर्यंत महारामांगांची सेवा केली आहे.  म्हणून आपण कृतज्ञपणानें इतके जमले आहांत.  ज्याच्या मनांत असेल त्यानें निःशंकपणें प्रेतास खांदा द्यावा.''  लोक भराभर आळीपाळीनें खांदा देऊं लागले.  लष्करांतून बुधवा पेठेंत येईपर्यंत रस्त्यांतून अनावर गर्दी जमली.  बुधवार चौकांत प्रेत आल्यावर शेठ त्रिकमदास यांना माझी बहीण वारल्याचें कळलें.  हे गृहस्थ राष्ट्रीय वृत्तीचे, पण सामाजिक बाबतींत फार जुन्या मताचे होते.  म्युनिसिपालिटींत अस्पृश्यवर्गाची नेमणूक झाल्यानें ते माझ्यावर फार नाराज होते.  म्युनिसिपालिटीचे मेंबर असूनही ते कित्येक महिने हजर राहात नसत.  माझ्या राष्ट्रीयत्वाबद्दल त्यांना मोठा अभिमान वाटत असे.  माझी बहीण वारल्याचें कळतांच त्रिमकदास शेठजी आपल्या गाडींत बसून प्रेत स्मशानांत पोंचण्यापूर्वी तेथें जाऊन उभे राहिले.  प्रेताला ते सामोरे आलेले पाहून मला शंका वाटूं लागली कीं, लकडी पुलावरील स्मशानांत प्रेत जाण्याला ते मनाई करतील.  कारण ते स्मशानभूमीचे एक प्रमुख ट्रस्टी होते.  माझ्या समोर येऊन ते म्हणाले, ''श्री. शिंदे यांची बहीण ती माझी बहीण.  तिचें प्रेत जाळण्यास कोणी कदचित् हरकत घेतील; पण तसें न व्हावें.  सर्व विधि यथास्थित झालेला पाहावा, म्हणून मी येथें मुद्दाम आलों आहें.''  शेठजींची ही दिलदार सहानुभूति पाहून सर्वांना आश्चर्य वाटलें.  माझी चिंता दूर झाली.

चिमुकला बळी  :  पुढें लवकरच मिशनच्या शाळा भोकरवाडींतील नवीन इमारतींत गेल्या.  मिशनर्‍यांची राहण्याची जागा आणि वसतिगृह या इमारती कशाबशा पूर्ण झाल्या होत्या.  पण भिंती आणि गिलावा नीट सुकलेला नव्हता.  फरसबंदीचें काम, दारेंखिडक्या लावण्याचें काम घाईनें चाललें होतें.  नाइलाजानें अशा ओल्या स्थितींतच जाऊन रहावें लागलें.  भोंवतालीं साफसफाई अद्याप व्हावयाची होती.  माझी ४ वर्षांची एकुलती एक धाकटी मुलगी होती.  ती दिसण्यांत सुंदर असून माझी फार लाडकी होती.  दिवसभर उन्हांत इकडे तिकडे हिंडून, ओल्या इमारतींत राहून तिची प्रकृति बिघडली.  तिला मेनिनजायटिस् नांवाचा मेंदूचा विकास जडल्याचें आढळून आलें.  सतत एक महिना मांडीवर घेऊन मला तिची अहोरात्र शुश्रूषा करावी लागली.  वास्तुशांति न करतां आम्ही येऊन राहिलों, म्हणून ही बाधा झाली, असें भेटीला आलेल्या कांहीं अशिक्षित बायका म्हणूं लागल्या.  कांहीं उतारे सुचवूं लागल्या.  अर्थात् अशा गोष्टींवर आमचा विश्वास बसेना.  भोंवतालच्या दूषित स्थितीवरूनच आजार आला होता हेंच खरें कारण.  शेवटीं ६ जून १९२० रोजीं हा चिमुकला जीव कालवश झाला.  अशा रीतीनें घरचा बळी देऊन वास्तुशांति झाली, म्हणून माझी जुन्या वळणाची पत्‍नी शोक करूं लागली.  ही लहान मुलगी इमारतीचें बांधकाम करणार्‍या अस्पृश्य मजुरांमध्यें खेळीमेळीनें हिंडत असल्यानें त्या सर्वांना फाय प्रिय असे.  कोणी मिशन पाहण्यास आल्यास ती त्यांचेशीं चुरुचुरु बोले.  सुपरिंटेंडेंट जनाक्काची तर ती फार लाडकी होती.

अस्पृश्यतानिवारक संघ

हिंदुस्थानांतील सर्व लोकांमध्यें राजकारणाची जागृति होऊं लागली.  अशा वेळीं ह्या मिशनला कोणत्याही राजकीय पक्षाशीं तादात्म्य न पावतां केवळ तिर्‍हाईत दृष्टीनें मागासलेल्या लोकांच्या हितसंबंधाचा पुरस्कार करणें भाग पडलें.  हें राजकारणाचें काम मिशनच्या शैक्षणिक कामापासून निराळें ठेवून स्वतंत्र रीतीनें चालविणें इष्ट होतें.  त्यासाठीं एक निराळीच सहकारी संस्था काढणें जरूर पडलें.  म्हणून त्यासाठीं पुणें येथें अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक संघ (All India Untouchability League) ही संस्था स्थापण्यांत आली.  तिच्या द्वारें अस्पृश्यांसंबंधी वेळोवेळीं जे राजकीय प्रश्न निघत, त्यांचा विचार आणि पुरस्कार करणें बरें पडेल म्हणून हा स्वतंत्र संघ काढला.

मिसेस् बेझंट  :  या वेळीं डी. सी. मिशनकडे कित्येक राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख पुढार्‍यांचें लक्ष वेधलें होतें आणि ते मिशनची वर्गणी देऊन कळकळीचे सभासदही झाले होते.  याचें कारण मुंबई आणि पुणें या ठिकाणीं राष्ट्रकार्यवाहकांचें ऐक्य व्हावें आणि बहुजनसमाज आणि अस्पृश्यांनीं ह्या ऐक्यांत भाग घ्यावा म्हणून वरील संघानें केलेले प्रयत्‍न होत.  ह्या सुसंधीचा फायदा घेऊन सर्व पक्षांची आणि विशेषतः अस्पृश्य वर्गाच्या पुढार्‍यांची एक अखिल भारतीय परिषद मुंबईला घडवून आणण्याचा मी प्रयत्‍न करूं लागलों.  १९१७ सालच्या अखेरीस कलकत्ता येथें जें काँग्रेसचें अधिवेशन भरलें त्याचें अध्यक्षस्थान मिसेस् बेझंट ह्या बाईंनीं स्वीकारलें होतें.  ह्या थोर बाईंनीं डी. सी. मिशनची मुंबईतील परळ येथील शाखा व वसतिगृहाचें काम स्वतः डोळ्यांनीं पाहिलें होतें.  म्हणून काँग्रेसमध्यें अस्पृश्यतानिवारणाचा एक ठराव आणावा म्हणून मीं त्यांना निकराची विनंती केली होती.  ह्यापूर्वी मी सतत १० वर्षे अशा प्रकारची विनंती काँग्रेसला केली असतांही तिची दाद लागली नव्हती.  थिऑसॉफिस्टांनीं मद्रासकडे अस्पृश्यांसाठीं पुष्कळ काम केलें होतें.  ह्या बाईंच्या वजनामुळें माझ्या विनंतीस मान देऊन हा ठराव काँग्रेसनें प्रथमच पास केला.  

काँग्रेसचा ठराव  :  ठराव  :- ही राष्ट्रीय सभा हिंदुस्थानांतील सर्व लोकांस अशी जाहीर विनंती करते कीं, अस्पृश्यवर्गावर आजपर्यंत जो अनन्वित जुलूम होत आहे तो ताबडतोब बंद करण्यांत यावा.  हा ठराव मद्रासचे जी. ए. नटेशन् यांनीं मांडला.  कलकत्त्याचे एस. आ. बमनजी यांनीं त्यास अनुमोदन दिलें.  पुण्याचे रा. एस. के. दामले आणि कालिकतचे मि. मंजेरी रामय्या यांनीं पुष्टी दिली.  हा ठराव सर्वानुमतें पास झाला.  ह्यानंतर मोठमोठ्या राष्ट्रीय मंडळींनीं मिशनच्या कामांत सक्रीय भाग घेण्यास सुरुवात केली.

अस्पृश्यतानिवारक परिषद  :   ता. २३ मार्च १९१८ रोजीं श्रीमंत सयाजीरावमहाराज यांच्या अध्यक्षत्वाखालीं अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषदेला सुरुवात झाली.  चौपाटीजवळील फ्रेंच ब्रिजनजिकच्या पटांगणांत भव्य मंडप घालण्यांत आला होता.  हिंदुस्थानांतील प्रमुख पुढार्‍यांना आमंत्रणें गेलीं होतीं.  स्वागत मंडळाचे अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर आणि सभासद ना. सी. व्ही. मेहता, ना. व्ही. जे. पटेल, ना. बेळवी, बाबू बिपिनचंद्र पाल, एस. आर. बमनजी, जमनादास द्वारकादास, पी. के.तेलंग, आर. जी. प्रधान, लक्ष्मीदास तेरसी, बॅ. जयकर, भुलाभाई देसाई, डॉ. साठ्ये, वेलकर वगैरे बडी बडी मंडळी प्रामुख्यानें झळकत होती.  सभेचें काम ता. २३, २४, २५ असें तीन दिवस झालें.

पहिल्या दिवशीं सुमारें ५००० तर तिसरे दिवशीं ७००० चे वर इतकी चिक्कार गर्दी जमली होती.  त्यांत अर्ध्याहून जास्त अस्पृश्य स्त्री-पुरुष यांची भरती होती.  स्वागताध्यक्ष सर नारायणराव यांनीं फार कळकळीचें भाषण केलें.  ते म्हणाले,- ''इतिहास आपणांस असें सांगतो कीं, ज्यापासून राष्ट्राचा विकास होतो अशा सर्व प्रकारच्या प्रागतिक चळवळींचा उगम थोड्यांशा व्यक्तींच्या कार्यांतच आढळतो.  प्रस्तुतच्या बाबतींत त्या व्यक्ति म्हणजे ज्यांची प्रथम प्रथम अत्यंत हेटाळणी झाली ते डी.सी. मि. चे कार्यकर्ते होत.  त्यांच्या कार्यानें प्रचंड हिंदुसमाजाची सदसद्विवेकबुद्धि जागृत झाली.''  भाषण संपवितांना सर नारायणरावांनीं निरनिराळ्या संस्थानिकांचा - विशेषतः गायकवाडसरकारांचा - आपापल्या संस्थानांत अस्पृश्योद्धारार्थ केलेल्या कार्याबद्दल आभारपूर्वक उल्लेख केला.  नंतर श्रीमंत सर सयाजीराव महाराजांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें.  त्यानंतर जनरल सेक्रेटरींनीं सर्व हिंदुस्थानांतून अभिनंदनाच्या ज्या तारा आल्या त्या वाचून दाखविल्या.  महात्मा गांधी, डॉ. रवीन्द्रनाथ टागोर, करवीर मठाधिपति शंकराचार्य वगैरेंच्या तारा प्रमुख होत्या.  द्वारकापीठाच्या शंकराचार्यांकडून एक विलक्षण तार आली होती.  त्यांत ''सर सयाजीरावमहाराज, रा. वि. रा. शिंदे हे आधुनिक काळांतील महान् कलिपुरुष आहेत'' म्हणून त्यांचा तीव्र निषेध केला हाता.  त्यानंतर श्रीमंत सर सयाजीरावमहाराजांचें विचारपरिप्लुत असें भाषण झालें.

प्रमुख ठराव  :  सभेचा पहिला मुख्य ठराव बॅ. जयकर यांनीं मांडला :- ''निकृष्ट वर्गावर लादलेली अस्पृश्यता यापुढें ताबडतोब काढून टाकण्यांत यावी आणि या कार्यासाठीं प्रत्येक प्रांतांतील वजनदार व विचारी कार्यकर्त्या पुढार्‍यांनीं एक अस्पृश्यतानिवारक जाहीरनामा काढून निकृष्ट वर्गांस शाळा, दवाखाने, न्यायकचेर्‍या, सार्वजनिक खर्चानें चालविलेल्या सर्व सार्वजनिक संस्थांत तसेंच विहिरी, तळीं, म्युनिसिपालिटीचे नळ अशा सार्वजनिक पाणवठ्यांस, व्यवहाराचीं व करमणुकीचीं ठिकाणें व देवालयांसारख्या सार्वजनिक ठिकाणीं कोणत्याही प्रकारें प्रतिबंध न राहतां पूर्ण मोकळीक करून द्यावी असें ह्या परिषदेचें मत आहे.''  अशा प्रकारच्या जाहिरनाम्याचा मसुदा करून त्यावर राष्ट्रांतील पुढार्‍यांच्या सह्या घेण्याचा अधिकार मिशनच्या जनरल सेक्रेटरीस देण्यांत आला.  मसुद्याच्या शेवटीं वरील ठरावांत सांगितल्याप्रमाणें अस्पृश्यतानिवारणाचे कामीं जाहीरनाम्याचे खाली सही करणार्‍यांनीं व्यक्तिशः जबाबदारी घेण्याचें कलम मुख्य व महत्त्वाचें होतें.  हेंच कलम ह्या परिषदेच्या कार्याचें मुख्य लक्षण होतें.  ह्या ठरावास मुंबई आर्य समाजाचे प्रचारक पं. बाळकृष्ण शर्मा ह्यांनीं अनुमोदन दिलें.  हा ठराव श्रीमंत सर सयाजीरावांनीं सभेपुढें मांडल्यावर तो सर्वानुमतें पसार झाला.

श्रीमंत सर सयाजीरावमहाराजांच्या प्रकृतीला स्वास्थ्य नव्हतें.  वातामुळें गुडघे दुखत असतांही परिषदेला हजर राहून त्यांनीं आतांपर्यंत काम केलें.  त्यानंतर त्यांना मुळींच बसवेना म्हणून सभेची परवानगी घेऊन ते निघून गेले.  त्यांच्या जागीं सर नारायणरावांची योजना झाली.  त्यानंतर दुसरा ठराव सभेपुढें आला.  निकृष्ट वर्गावर लादलेले धार्मिक निर्बंध ज्या वेळीं नाहीसे होतील त्याच वेळीं त्यांच्या उन्नतीचें कार्य अत्यंत झपाट्यानें व यशस्वितेनें पार पडेल.  याकरितां ही सभा हिंदु धर्मसंस्थाधिपतींकडून खालील कामें करून घेत आहे :  (१) अस्पृश्यता नाहींशी करण्याकरितां धार्मिक आज्ञापत्रें काढणें.  (२) हिंदु धर्मावरील अस्पृश्यांची श्रद्धा दृढ करण्याकरितां धर्मशिक्षक नेमून त्यांच्यांत हिंदु धर्मतत्त्वांचा फैलाव करणें.  (३) हिंदु लोकांकडून पाळल्या जाणार्‍या सर्वसाधारण धार्मिक समारंभांत भाग घेण्याची अस्पृश्यांना परवानगी देणें.  हा ठराव पास करतांना जमनादास द्वारकादास यांनीं गुजराथींतून भाषण केलें.  त्यांच्यानंतर श्री. बिपिनचंद्र पाल यांनीं टाळ्यांचा जयघोषांत ठरावाला अनुमोदन दिलें.  गुजराथेंतील धेड जातीचे धर्मगुरु महंत मोहनदास यांनीं उपरोक्त ठरावास पुष्टी दिल्यावर हा ठराव सर्वानुमतें पास झाला.

व्यंगचित्र :  बक्षीससमारंभ हा या परिषदेचा शेवटचा कार्यक्रम होता.  मंडप इतका गच्च भरून गेला होता कीं, पुष्कळांना जागेच्या अभावीं बाहेर उभें राहावें लागलें होतें.  जमलेल्या प्रचंड समुदायापैकीं ३४ तरी अस्पृश्यांपैकीं होता.  समारंभाचें अध्यक्षस्थान लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर यांनीं स्वीकारलें होतें.  त्यांनीं आपलें भाषण थोडक्यांत व सहानुभूतीचें केलें.  जनरल सेक्रेटरींनीं त्यांचे आभार मानले.  हा तीन दिवसांचा अपूर्व समारंभ आटोपल्यावर वर्तमानपत्रकारांनीं ह्या कार्याचें निरनिराळ्या रीतीनें अभिनंदन केलें; पण 'जागरूक'कारांनीं (रा. वालचंद कोठारी) मात्र या परिषदेस ''रा. वि.रा. शिंद्यांची सर्कस'' ह्या नांवाखालीं एक व्यंगचित्र देऊन निरनिराळ्या पक्षांच्या पुढार्‍यांनीं निरनिराळ्या प्राण्यांचीं रूपें धरून परिषदेंत कशीं कामें केलीं हें दाखविलें होतें.

सही नाहीं  :  ह्यानंतर लवकरच परिषदेंतच्या जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्यांत आला.  त्याच्या शेंकडों छापील प्रती प्रांतोप्रांतींच्या पुढार्‍यांकडे सह्यांसाठीं पाठविण्यांत आल्या.  त्यांत मुख्य विशेष हा कीं, मसुद्याखालीं जाड्यां टाइपांत टीप होती.  टीप :-  ''मी खाली सही करणार ठरावांतल्या अटी स्वतः अक्षरशः पाळीन आणि मी स्वतः हरप्रयत्‍न करून दुसर्‍याकडूनही त्या पाळल्या जातील असे प्रयत्‍न सतत करीन.''  जवळजवळ ३०० च्या वर सर्व प्रांतांच्या ठळक ठळक पुढार्‍यांच्या सह्यांच्या स्वाक्षर्‍या मिळविण्यांत आल्या.  पहिली सही कविसम्राट् डॉ. रवींद्रनाथ टागोर यांची पडली.  परंतु सांगण्यास खेद वाटतो कीं, लो. टिळकांची सही कांहीं केल्या मिळेना.  ती देण्यास त्यांच्या अनुयायांकडून त्यांना संमती मिळेना.  नवलाची गोष्ट ही कीं, हे अनुयायी आपल्या सह्या देऊन चुकले होते.  जणूं काय त्यांच्या प्रमुखानें सही दिली नाहीं तर त्यांतच सर्व पक्षाची इज्जत शिल्लक राहणार होती !  एवढी एक गोष्ट सोडून दिल्यास राष्ट्रीय सभेच्या कामीं आणि अस्पृश्यतानिवारण्याच्या कामीं लो. टिळकांनीं मोठ्या मोकळ्या मनानें सारखी देवाण-घेवाण शेवटपर्यंत चालविली होती.  त्याचें एक ठळक उदाहरण आठवतें.

लोणावळें येथील परिषद  :  १९१७ सालीं कलकत्त्याच्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या ठरावानंतर त्या शहरीं पुढें ज्या प्रांतिक व जिल्हानिहाय राजकीय परिषदा भरूं लागल्या त्यांतून कलकत्त्यांतील ठरावाचा व मुंबईस भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषदेंत लो. टिळकांनीं मांडलेल्या ठरावाचा अनुवाद होऊं लागला.  पुढें लवकरच लोणावळें येथें जिल्हा राजकीय परिषद भरली होती.  आमंत्रणावरून मीही तेथें हजर होतों.  सभेंतील स्वराज्याचा मुख्य ठराव मीं स्वतः पुढें मांडावा अशी परिषदेची इच्छा दिसली.  मीं स्पष्ट सांगितलें कीं, ''अस्पृश्यतानिवारणाचा ठराव या परिषदेनें एकमतानें पास करून घ्यावा म्हणजे मीही स्वराज्याचा ठराव आनंदानें पुढें मांडीन.''  माझे मित्र प्रसिद्ध मद्यपाननिषेधक रा. शंकरराव लवाटे यांनीं माझ्या म्हणण्यास विरोध केला.  त्या वेळीं 'केसरी' पक्षांतील सगळे तरुण पुढारी माझ्या बाजूला आले व म्हणूं लागले, ''रा. लवाटे ह्यांच्याशिवाय बहुतेक मंडळी माझ्या मताला अनुकूल दिसतात, म्हणून मीं स्वराज्याचा ठरावा मांडावा.''  मीं नम्रपणें सांगितलें, ''अस्पृश्यतानिवारणाचा ठराव एकमतानें पास होण्यांतच विशेष आहे.  असा महत्त्वाचा ठराव काँग्रेसच्या मुख्य अधिवेशनांत एकमतानें पास झाला असतांना जिल्हा परिषदेंत तो नुसत्या बहुमतानें पास होणें म्हणजे राष्ट्रानें माघार घेण्यासारखें आहे.  शिवा त्यांत राष्ट्रीय सभेची शिस्तही मोडते.''  अशी भवति न भवति चालून हा प्रश्न सभेपुढें दुपारच्या अधिवेशनांत यावा असें ठरलें.  कांहीं केल्या तडजोड होईना. लो. टिळक सभेच्या बाहेर कांहीं कामांत गुंतले होते.  त्यांच्याकडे रा. लवाटे यांना नेण्यांत आलें.  टिळकांनीं पोक्त विचार करून अखेरचा सल्ला दिला कीं, ''धर्माची सबब काढून अस्पृश्यतानिवारण्याचे कामीं कुचराई करण्याचा काळ गेला आहे.  रा. शिंदे यांना अनुकूल करून घेऊन स्वराज्याचा ठराव एकमतानें पास करून घ्यावयाचा असेल तर त्यांचा अस्पृश्यतानिवारणाचा ठरावही एकमतानेंच पास झाला पाहिजे.  हें जर रा. लवाटे यांना पटत नसेल तर त्यांनीं अस्पृश्यतानिवारणाचे ठरावावर मतें घेतांना मंडप सोडून जावें हें इष्ट.  या सभेला यश यावें.''  त्याप्रमाणें लवाट्यांनीं मान्य केल्यावर वरील दोन्ही ठराव सभेंत एकमतानें पास झाले.

नागपूरचें शिष्टमंडळ  :  मागें सांगितल्याप्रमाणें मिशनच्या कामाला हिंदुस्थानांतील निरनिराळ्या पक्षांचे पुढारी आणि अखेर राष्ट्रीय सभा यांचें सहकार्य मिळालें.  सरकारची सहानुभूति आणि मिशनशीं सहकार्य हीं या पूर्वीच मिळालेलीं होतीं. यासंबंधी मुंबई सरकारनें सर्वांत आघाडी मारली हें वर आलेंच आहे.  याचें कारण मिशनचा आरंभ मुंबईलाच झाला व तेथून प्रांतोप्रांतीं वाढ सुरू झाली.  नागपूरची शाखा संघटित रूपानें स्थापित झाल्यावर १९१६-१७ च्या सालीं त्या वेळचे नागपूरचे चीफ कमिशनर सर रॉबर्टसन (प्रांताधिपति) यांच्याकडे एक शिष्टमंडळ नेण्यांत आलें.  त्याचे मुख्य सर मोरोपंत जोशी हे होते.  ह्या प्रांतांत अस्पृश्य मुलांची संख्या जरी बरीच शिकत होती तरी मुंबईतील मुलांप्रमाणें त्यांना स्वतंत्र शाळा नव्हती.  अनुभव घेऊन पाहण्याकरितां कांहीं नमुनेदार शाळा सरकारनें चालवाव्यात अशी शिष्टमंडळानें मागणी केली.  ह्या मिशनच्या शाळा व वसतिगृहें नागपूर, अकोला व यवतमाळ वगैरे ठिकाणीं होतीं.  त्यांना सरकारनें खास सवलती आणि पुरेशी मदत द्यावी अशी दुसरी मागणी होती.  महारांच्या वतनाची जी जुनी संस्था होती ती आतां निरुपयोगी ठरत असल्यानें व ती चालू असेतोंपर्यंत अस्पृश्यतानिवारणास प्रतिबंध होत आहे असा अनुभव आल्यानें ही वतनसंस्था बंद करून रोख नेमणुका द्याव्यात अशी तिसरी मागणी होती.  ह्या वतनासंबंधीं वर्‍हाड व नागपूर प्रांतांत मोठी चळवळ चालू होती.

सर रॉबर्टसनसाहेबांनीं शिष्टमंडळाचें मोठ्या प्रेमानें स्वागत केलें व त्यांच्या मागणीचा उदारपणें विचार करूं असें आश्वासन दिलें.  ह्या वेळीं एक मजेदार गोष्ट घडून आली तिचा उल्लेख करणें बरें होईल.

रंगपंचमीचा अनुभव  :  हे दिवस शिमग्याच्या सणाचे होते.  महाराष्ट्रांत आमच्या मिशनच्या विद्यमाने निरनिराळ्या जिल्ह्यांतून होलिकासंमेलनाचा थाटानें समारंभ करून होळींतील अत्याचारांना आळा घालण्याचा प्रयत्‍न केला जात असे व त्यांत यशही बरेंच येत चाललें होतें.  ह्या वेळीं मी नागपुरांत असल्यामुळें तेथील टाऊनहॉलमध्यें होलिकासंमेलनाची जाहीर सभा बोलावण्याचा मीं घाट घातला.  ह्या सभेचें अध्यक्षस्थान सर मोरोपंत जोशी यांनी स्वीकारलें.  प्रसंग नवीन असल्यामुळें गांवांतील बरीच पुढारी मंडळी हजर होती.  गर्दीही बरीच जमली होती.  सुशिक्षित समाजावर बराच परिणाम झाला.  पण बहुजनसमाजाचें मन अजून तयार झालें नव्हतें.  सभा बरखास्त होऊन मंडळी घरोघर गेल्यावर मी सायकलवर बसून पांचपावली येथें मिशनच्या ठिकाणीं जाण्यास निघालों.  दिवस रंगपंचमीचा असल्यानें भर बाजारांत दोन प्रहरीं रंगाची दंगल चालली होती.  गाड्यांवर रंगांचे हांडे भरून आल्या-गेल्यावर रंगाच्या पिचकार्‍या सुटत होत्या.  जाहीर सभेचा उपद्व्याप मींच केला असल्यामुळें लोकांच्या डोळ्यांवर मी आलों होतों.  बाजाराच्या मुख्य वेशीच्या खालीं माझी सायकल आल्यावर कांहीं टोळभैरवांनीं मला सन्मानानें पकडलें.  ''महाराज, तुम्ही मोठे सुधारक आमच्या गांवीं आलां आहांत.  तुमची योग्य संभावना करणें हें आमचें कर्तव्य आहे.''  असे म्हणून रंगाच्या बालड्यांन् बालड्यां भरून त्यांनीं मला नखशिखांत न्हाऊं घातलें.  मला सायकलवरून खालीं देखील उतरूं न देतां चौघा धठिंगणांनीं मला सायकलवरच रंगस्नान घातलें.  सर्व कपडेच नव्हेत तर शरीरसुद्धां रंगानें भिजून चिंब झालें.  स्नानविधि चालू असतां होळीचा अर्वाच्य ध्वनि दुमदुमू लागला.  इतक्या थाटानें लग्नांतसुद्धां माझें स्नान झालें नव्हतें !  स्वदेशबांधवांच्या लीला म्हणून मीं कौतुकानें हंसत हंसत हा सर्व प्रकार सहन केला.  शेवटीं मंडळींनीं परवानगी दिल्यावर तशाच स्थितींत मी बिर्‍हाडीं परत आलों.  म्हणजे सर्व गांवांत माझी वरातच निघाली म्हणायची !

दुसरेच दिवशीं गव्हर्नमेंट हाउसमध्यें आमचें शिष्टमंडळ जावयाचें होतें.  माझ्या एकुलत्या एका चांगल्या पोषाखाची अशी शोभ झाल्यामुळें प्रांताधिपतींकडे कसें जावयाचें याची मला पंचाईत पडली.  सर मोरोपंत जोशांच्याकडे हा सविस्तर निरोप पाठवून कोट, फेटा आणि धोतर मागविलें.  कपड्यांची सोय कशीबशी झाली; पण रंग पक्का असल्यामुळें तोंड, केंस व हातपायांना तो इतका चिकटला होता कीं, साबण संपला तरी रंग कांहीं जाईना.  शेवटीं नाइलाजानें तसाच गव्हर्नमेंट हाउसमध्यें गेलों.  शिष्टमंडळाचें काम सुरू होण्यापूर्वी आपल्या दिवशीं बाजारांत झालेल्या 'स्वागत समारंभाची' हकीकत मी कमिशनरसाहेबांच्या कानांवर घातली.  त्यांच्या प्रांतांतील लोकांच्या प्रेमळ पाहुणचाराचा संदेश मी ज्या ज्या प्रांतांत जाईन तेथें आनंदानें कळवीन असें मीं सांगितलें.  कमिशनरसाहेब पोट धरधरून हांसले.  मोठ्या सावधगिरीनेंच त्यांनीं माझ्याशीं हस्तांदोलन केलें.  आदल्या दिवसाचे अध्यक्ष सर मोरोपंत जोशी आपल्या मोटारींतून घरीं गेलें म्हणून वांचले.  नाहीं तर त्यांनाही प्रसाद मिळून आजचें शिष्टमंडळ 'रंगीत शिष्टमंडळ' म्हणून इतिहासांत गाजलें असतें.

  1. १ प्रस्तावना
  2. ह्या व्यापाराचें पिलूं
  3. ही कोणत्या राष्ट्राची भाषा?
  4. हर्ष आणि चालुक्य
  • 46
  • 47
  • 48
  • 49
  • 50
  • 51
  • 52
  • 53
  • 54
  • 55
Page 51 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी