मला शेवटीं एवढेंच सुचवावयाचें आहे कीं, आर्थिक स्वातंत्र्य व आर्थिक स्वयंनिर्णय हें साधावयाचें असल्यास तुम्हांला राजकारण, सामाजिक सुधारणा, धार्मिक स्वातंत्र्य ह्या सर्वच गोष्टींकडे लक्ष पुरविलें पाहिजे. पण त्यांच्यासाठीं तुम्ही केवळ ह्या निरनिराळ्या प्रकारच्या चळवळी चालविणारे जे कोणी बरेवाईट पुढारी असतील त्यांच्यावरच विसंबून राहूं नका, इतकेंच नव्हे तर या कार्यासाठीं केवळ पुस्तकी शिक्षणाची वाट पाहूं नका. महात्मा गांधींसारख्या दूरद्रष्ट्यांची ह्या शिक्षणावरूनच नव्हे तर अशा शाब्दिक सुशिक्षितांवरूनहि श्रद्धा पार उडाली आहे. अशा पोशाकी पंडितांना ह्या महात्म्याच्या पुढें पांच मिनिटें सरळ उभे राहण्याचीहि छाती होत नाहीं, पण तुम्ही अथवा तुमचे पुढारी म्हणविणारे कायदेमंडळाचे दलाल, अशाच पोशाकी पंडितांना आपले प्रतिनिधि म्हणून सर्व प्रकारच्या दिखाऊ दरबारांत पाठवीत. अशाच मतलबी भांडवलदारांशीं सख्य करतां, अशाच स्वार्थी भटा-भिक्षुकांचे पाय पूजतां, ह्याला काय म्हणावें? “ज्याचें त्यानें अनहित केलें तेथें कोणाचें काय बा गेलें?” असें तुकाराम रडले तें तुमच्यासारख्यांनाच पाहून रडले असावे.
असो. हल्लीं आमच्या देशांत केवळ राजकारणाच्याच हंडीला उतूं येऊं लागलें आहे. पोटापाण्याच्या गोष्टी, धंदाउदीम वगैरे आवश्यक गोष्टींकडेहि दुर्लक्ष होत आहे, मग सामाजिक सुधारणा व ख-या धर्माची चाड कोणासच नाहीं ह्यांत काय आश्चर्य? पंढरपुरांतील देवाच्या मूर्तीला ब्राह्मणाच्या सकेशा विधवांनीं स्पर्श करून पूजनाचा अधिकार मिळाला किंवा मिळाल्यासारखाच आहे. पण तुमच्या जिल्ह्यांतील काँग्रेस कमिटी आणि मुख्य म्युनिसिपालिटी अस्पृश्यांना नुसते देवळांत घ्यावयास तरी तयार आहेत काय? सातारा जिल्ह्यांतील एक शाळामास्तर माझे मित्र रा. कृष्णराव बाबर हे बेळगांवच्या ‘राष्ट्रवीर’ पत्रांत लिहितात कीं, “खेडेगांवांतील शाळांतून मराठे जातीचे पंच इतर जातींच्याच मुलींची भरती करून आपल्या जातीच्या मुलींना मात्र पडद्याबाहेर आणण्यास तयार नाहींत!” तुमच्या तालुक्यांतहि हाच प्रकार चालूं आहे काय? शेतक-यांचे प्रसिद्ध कैवारी माझे मित्र आमदार गुंजाळसाहेब मध्यवर्ती कायदेमंडळांत शारदा बिलाचा पास झालेला कायदा निदान कांहीं ब्राह्मणेतर जातींच्या मुलींना लागूं करण्यांत येऊं नये, अशी सवलत मागत आहेत. गुंजाळसाहेबांना ह्या प्रतिगामी प्रयत्नांत पाठिंबा देऊन कांहीं जाती आपल्या मुलांचे विवाह बाळपणींच उरकण्यांत गुंतल्या आहेत असें वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत आहे. शेतक-यांनो, तुमचा काय बेत आहे? इंग्लंडांत मजुरांचें राज्य झालें, रशियांत कुणब्यांचें राज्य झालें वगैरे गोष्टी तुम्ही दुरून तरी ऐकल्या असतीलच, पण तेथील मजूर आणि कुणबी तुम्हांसारखे अगदीं दुस-यावर हात टेकून बसणारे खात्रीनें नाहींत, हें ध्यानांत ठेवा. आणि त्यांना पुढें आणणारे महात्मे इकडील कांहीं पुढा-यांप्रमाणें शिळ्या कढीलाच पुनः ऊत आणून आपलें पोट भरण्यांतच पटाईत नाहींत. म्हणूनच तिकडची सुधारणा इकडे होण्यास वेळ लागत आहे. एरव्हीं काय तुम्ही आम्ही माणसें नव्हत? तुम्हांस साह्य करण्यास पुष्कळ पुढें येतील. तुम्ही मात्र त्यांचें साह्य पारखून घ्या. पण अखेर तुमचे मित्र अथवा वैरी तुम्ही स्वतःच हें गीतावचन खरें ठरणार ! माजे कांहीं विचार तुम्हांला कोयनेलापेक्षांहि कडू लागतील, अशी मला भीति वाटते ! पण त्यांचा परिणाम तरी गोड होवो.
ख्रिस्ती शतकाच्या सहाव्या शतकांत इ. स. ५७० सालीं अरबस्थानांतील मक्का येथें मुसलमानी धर्माचा संस्थापक महमद पैगंबर हा जन्मला. ह्यानें स्थापलेला इस्लाम धर्म सेमेटिक् लोकांच्या धर्माची सुधारून वाढविलेली तिसरी आवृत्ति होय. एकदेवत्व, त्याची निराकार, उपासना, मानवी समानता, स्वतंत्रता, बंधुता, वगैरे भागवत धर्माच्या मूळ तत्त्वांचा जोर जगांतील इतर धर्मांपेक्षांहि सेमेटिक् लोकांच्या धर्मांत मुळापासूनच कांहीं बाबतींत अधिक होता. पण इतर वैभवशाली मूर्तिपूजक राष्ट्रांच्या संसर्गानें मोजेसनें स्थापलेल्या इस्त्रायल धर्मांत पुढें पुढें मूर्तिपूजा, विधि, संस्कार, सोंवळेओवळें आणि जातिभेदाचें बंड वगैरे माजल्यानें, येशु ख्रिस्तानें ह्या धर्मांत सुधारणा केली. पण ख्रिस्ती धर्माचा प्रसार विशेषेंकरून युरोपांत पश्चिमेकडे झाल्यानें, पश्चिम आशियांत आणि विशेषेंकरून अरबस्थानांत महमदाचे काळापर्यंत धर्मांचा गाढ अंधकार माजला होता. महमदाच्या आत्मिक पराक्रमानें सेमेटिक् धर्माला पूर्वींचें शुद्ध स्वरूप अरबस्थानांत प्राप्त झालें. इतकेंच नव्हे तर आत्मिक आणि राजकीय सत्ता ह्या दोन्ही महमुदामध्येंच केंद्रीभूत झाल्यामुळें त्याच्या प्रयत्नाला त्याच्या ह्यातींतच राजकीय स्वरूप प्राप्त होऊन, त्याच्या धर्माचा प्रसार अरबस्थानभर व थोडास बाहेर झाला. त्याच्या मागें तर जवळ जवळ सर्व दक्षिण युरोपांत आणि पश्चिम आशियांत हिंदुस्थानाच्या सीमेपर्यंत हा धर्म लवकरच पसरला. बौद्ध धर्माची प्रेरणा गौतमानें केली व प्रसार अशोक राजानें केला; ख्रिस्ती धर्माची प्रेरणा येशूनें केली व प्रसार कॉन्स्टंटाईन बादशहानें केला; इस्लामी धर्माची प्रेरणा आणि प्रसार दोन्हीहि महमुदानेंच केलीं म्हणून त्याच्या धर्मांत आत्म्याची प्रीति आणि तलवारीची शक्ति ह्या दोन्ही तत्त्वाला मान्यता आहे. हें शीख धर्माचा विचार करतांना ध्यानांत ठेवावें लागेल. इ. स. ६६४ सालीं महलब नांवाचा एक मुसलमान सरदार मुलतानपर्यंत येऊन परत गेला. पुढें बगदादचे खलिफानें महमद कासीम नांवाच्या सरदाराला सिंध प्रांतावर पाठविलें. त्यानें दाहीर नांवाच्या राजपूत राजाला ठार मारून हा प्रांत काबीज केला. कासीमवर खलिफाची इतराजी होऊन तो मारला गेल्यानें आपसांतल्या तंट्यामुळें मुसलमानांना पुढें ३०० वर्षें हिंदुस्थानाकडे येण्यास अवसर मिळाला नाहीं.
मुसलमान संस्कृतीचा प्रवेश
ख्रिस्ती शतकाच्या सहाव्या शतकांत इ. स. ५७० सालीं अरबस्थानांतील मक्का येथें मुसलमानी धर्माचा संस्थापक महमद पैगंबर हा जन्मला. ह्यानें स्थापलेला इस्लाम धर्म सेमेटिक् लोकांच्या धर्माची सुधारून वाढविलेली तिसरी आवृत्ति होय. एकदेवत्व, त्याची निराकार, उपासना, मानवी समानता, स्वतंत्रता, बंधुता, वगैरे भागवत धर्माच्या मूळ तत्त्वांचा जोर जगांतील इतर धर्मांपेक्षांहि सेमेटिक् लोकांच्या धर्मांत मुळापासूनच कांहीं बाबतींत अधिक होता. पण इतर वैभवशाली मूर्तिपूजक राष्ट्रांच्या संसर्गानें मोजेसनें स्थापलेल्या इस्त्रायल धर्मांत पुढें पुढें मूर्तिपूजा, विधि, संस्कार, सोंवळेओवळें आणि जातिभेदाचें बंड वगैरे माजल्यानें, येशु ख्रिस्तानें ह्या धर्मांत सुधारणा केली. पण ख्रिस्ती धर्माचा प्रसार विशेषेंकरून युरोपांत पश्चिमेकडे झाल्यानें, पश्चिम आशियांत आणि विशेषेंकरून अरबस्थानांत महमदाचे काळापर्यंत धर्मांचा गाढ अंधकार माजला होता. महमदाच्या आत्मिक पराक्रमानें सेमेटिक् धर्माला पूर्वींचें शुद्ध स्वरूप अरबस्थानांत प्राप्त झालें. इतकेंच नव्हे तर आत्मिक आणि राजकीय सत्ता ह्या दोन्ही महमुदामध्येंच केंद्रीभूत झाल्यामुळें त्याच्या प्रयत्नाला त्याच्या ह्यातींतच राजकीय स्वरूप प्राप्त होऊन, त्याच्या धर्माचा प्रसार अरबस्थानभर व थोडास बाहेर झाला. त्याच्या मागें तर जवळ जवळ सर्व दक्षिण युरोपांत आणि पश्चिम आशियांत हिंदुस्थानाच्या सीमेपर्यंत हा धर्म लवकरच पसरला. बौद्ध धर्माची प्रेरणा गौतमानें केली व प्रसार अशोक राजानें केला; ख्रिस्ती धर्माची प्रेरणा येशूनें केली व प्रसार कॉन्स्टंटाईन बादशहानें केला; इस्लामी धर्माची प्रेरणा आणि प्रसार दोन्हीहि महमुदानेंच केलीं म्हणून त्याच्या धर्मांत आत्म्याची प्रीति आणि तलवारीची शक्ति ह्या दोन्ही तत्त्वाला मान्यता आहे. हें शीख धर्माचा विचार करतांना ध्यानांत ठेवावें लागेल. इ. स. ६६४ सालीं महलब नांवाचा एक मुसलमान सरदार मुलतानपर्यंत येऊन परत गेला. पुढें बगदादचे खलिफानें महमद कासीम नांवाच्या सरदाराला सिंध प्रांतावर पाठविलें. त्यानें दाहीर नांवाच्या राजपूत राजाला ठार मारून हा प्रांत काबीज केला. कासीमवर खलिफाची इतराजी होऊन तो मारला गेल्यानें आपसांतल्या तंट्यामुळें मुसलमानांना पुढें ३०० वर्षें हिंदुस्थानाकडे येण्यास अवसर मिळाला नाहीं.
शक्ति आणि शिव ह्या दैवतांचा पूर्वापार निकट संबंध आहे. सूर्य, तुफानी वारे (मरुत), वीज आणि अग्नि ह्या भौतिक शक्तींशीं शिवाचा संबंध आहे. वेदांतील रुद्र आणि मरुत् ह्या देवतांशीं जरी शिवाचा संबंध पोंचतो तरी ही देवता अस्सल द्राविडांचीच असावी. संसर्गामुळें ती आर्यांनीं द्राविडांपासून स्वीकारली असावी. आर्यांचा द्राविडांशीं समान दर्जाचा तह होऊन त्यांच्यामध्यें परस्पर शरीरसंबंध झाल्याचे पुष्कळ दाखले जुन्या पुराणांत आहेत. ऐल ऊर्फ सोमवंशी राजा ययाति ह्याच्या दोघी बायका असुर अथवा दैत्य ऊर्फ द्राविड कुळांतल्या होत्या. पहिली शर्मिष्ठा, ही असुरांचा राजा वृषपर्वन् ह्याची मुलगी. दुसरी देवयानी ही तर दैत्यांचा गुरु उशनासशुक्राचार्य ह्याची मुलगी. पहिलीच्या पोटीं द्रह्य, अनु, पुरु आणि दुसरीच्या पोटीं यदु, तुर्वसु असे मिळून पुढील सोमवंश कुळाचे पांच मूळ पुरुष जन्मले. हिडिंब नांवाच्या राक्षस राजाची मुलगी भीमानें लढाईच्या शेवटीं तह करतांना वरिली. श्रीकृष्णांनीं तर जांबवती ह्या अस्पृश्य कुळांतील तरुणीशीं तिच्या बापाचा पराजय केल्यावर विवाह लाविला. तिला मुलगा होईना म्हणून कांहीं वर्षे हिमालयांत महादेवाजवळ तप करून त्याच्या प्रसादानें सांब ह्या मुलाला मिळविलें, वगैरे माहिती महाभारतांत आहे. पण बौद्धांच्या जातक कथेंत जांबवतीची माहिती थोडी वेगळी आहे ती अशी :- वासुदेव राजा एके दिवशीं शिकारीला निघाला असतां वेशीपाशीं त्याला एक अस्पृश्य वर्गाची तरुणी दिसली, तिला त्यांनी वरिलें. पुराणांतील विषयांचें अगदीं शास्त्रीय पुद्धतीनें अध्ययन करून कलकत्त्याचे माजी जस्टिस् पार्जीटर ह्यांनीं आपल्या Ancient Indian Historical Tradition ह्या ग्रंथांत जे नवीन आश्चर्यकारक सिद्धान्त स्थापिले आहेत, त्यांतील एक असा आहे कीं, प्राचीन काळचे ब्राह्मण हे अनार्य होते. वसिष्ठ, कश्यप, भार्गव इ. प्रसिद्ध ब्राह्मण कुळें हिरण्यकशिपु ह्या दैत्य राजाचे पुरोहित होतीं (पान ३०७). इतकेंच नव्हे तर इक्ष्वाकु वगैरे सूर्यवंशी क्षत्रियहि द्राविड वंशाचे राजे होते (पान २९५). तें कसेंहि असो; ह्या क्षत्रियांचें आणि इतर द्राविडांचें उपास्य दैवत शिव हेंच होतें, हें निर्विवाद आहे. दाशरथि रामचंद्रानें शतकोटी लिंगांची स्थापना आपल्या दक्षिणेकडील मोहिमेंत केली. भारतीय युद्धांत जय मिळविण्यासाठीं कृष्णानें जसें अर्जुनास दुर्गेची प्राथना करावयास लाविलें, तसेंच रावणावर जय मिळविण्यासाठीं त्वरजा ऊर्फ तुळाजांबिका ह्या देवीची आराधना ह्या रामचंद्राला करावी लागली. राम आणि कृष्ण पुढें विष्णूचे अवतार बनले; पण स्वतः त्यांचें उपास्य दैवत विष्णु असणें शक्य नव्हतें, तें त्यांचें दैवत शिवच होतें. तहानंतर स्नेहसंबंध दृढ व्हावा म्हणून पूर्वी जसे राजे लोकांमध्यें परस्पर शरीरसंबंध ऊर्फ बायकांची देवघेव होत असे ( अकबराची हीच राजनीति होती ) तशीच देवांचीहि देवघेव होणें साहजिक आहे. ह्या न्यायानें शक्ति आणि शिव ह्या दोन देवता आर्यांनीं मोंगलां-द्राविडांपासून घेतल्या असाव्यात. द्राविड क्षत्रियांनीं विष्णु हें दैवत घेतलें असावें.
आर्यांनीं शिव ह्य देवताचा स्वीकार करण्यापूर्वी हा आर्येतरांचा होता, व ह्यांचा आर्य लोक तिटकारा करीत असत, असा पुरावा वेदांत आहे. शिश्नदेव म्हणजे ज्या निषाद आदिकरून लोकांचा देव शिश्न (लिंग) होता, त्यांचा इंद्रानें पराभव करून त्यांचीं मोठमोठीं शहरें लुटून संपत्ति आणिली, अशी इंद्राची स्तुति केलेली वेदांत आढळते. (ॠक मंडळ ७ स्तोत्र २१-५) ह्यावरून हे लोक केवळ जंगली नसून ते आर्यांपेक्षां अधिक मातबर संस्कृतीचे व संपत्तिपूर्ण शहरांत राहणारे होते असें दिसतें. आकाश हा पिता आणि भूमि ही माता आणि ह्या दोघांचा संयोगदर्शक लिंग आणि योनीची पूजा ही अतिप्राचीन कालापासून चालत आलेली गोष्ट आहे. गेल्या ५।६ वर्षांत सिंध आणि पंजाबांत जे सरकारी संशोधन खात्यानें सुमारें ५००० वर्षांपूर्वीच्या सुमिरिअन् ऊर्फ समेरु लोकांच्या वैभवशाली संस्कृतीचे अवशेष उकरून काढले आहेत, त्यांतील शिश्नाच्या आकृति हुबेहूब प्रदर्शनासाठीं ठेविल्या आहेत. तेव्हां ही शिवशक्तीची उपासना ह्या देशांत मुळापासूनच असणें संभवतें. ह्या पूजेचा ईजिप्त देशाशीं मूळ संबंध कित्येक दाखवितात तो येणेंप्रमाणें :- पिंडीवर घातलेलें पाणी वाहून जाण्यासाठीं पन्हाळ असतें. आकाशांतून भूमीवर जो पर्जन्य पडतो तें आकाश देवाचें रेत आणि तें भूमीवर पडल्यावर वाहून नेणारी पन्हाळ म्हणजे ईजिप्त देशांतील जी नाईल नदी, ती उत्तरवाहिनी आहे. चमत्कार हा कीं, जेथें जेथें हिंदुस्थानांत अगदीं जुनीं व नवीं शिवालयें जीं आजवर मीं पाहिलीं आहेत, त्यांतील पिंडीच्या पन्हाळी बहुतकरून उत्तराभिमुखच आहेत. मला दोनच ठिकाणीं एक अपवाद आढळले. म्हैसूर संस्थानांतील शिमोगा येथील व्यंकटरमणाच्या देवळाच्या ओवरींतील एक पिंडी पूर्वाभिमुख दिसली तेवढाच. पण पुजार्याजवळ शोध करतांना सांगितलें कीं, ही पिंडी नवीन असून ती म्हैसूर सरकारच्या एका अडाणी अधिकार्यानें परंपरा लक्षांत न आणतां देवळाच्या नवीन दुरुस्तीचे वेळीं अशी चुकीनें मांडली आहे. दुसरा अपवाद उज्जनी येथील प्रसिद्ध महांकाळेश्वर ज्योतिर्लिंगाचा. ह्याची पन्हाळ पूर्वाभिमुखी आहे ! तरी पण ह्या भव्य देवळाच्या आवारांतील पुष्करणीभोंवतील ओटयावरून जीं अनेक लिंगें आहेत त्या सर्वांच्या पन्हाळी निरपवाद, उत्तराभिमुखीय दिसल्या ! कैलास पर्वत उत्तरेकडे आहे म्हणून पिंडीचा प्रवाह उत्तरेकडेच असावा, असें कांहीं नाहीं. नाईल नदीच्या उत्तरवाहिनीत्वाकडेच हा संबंध अधिक चांगला जमतो. ह्या व इतर अनेक उदाहरणांवरून शिव ही देवता आणि विशेषेंकरून तत्प्रीत्यर्थ लिंगपूजा ही पश्चिमेकडील ईजिप्त, बाबिलोनिया इत्यादि देशांतून आली असावी, असा तर्क करण्यास जागा आहे, असें कांहीं विद्वान् समजतात. पण ज्या अर्थी ही लिंगपूजा महाभारत काळापासून अगदीं आतांपर्यंत ह्या देशांत चालू आहे व लिंगायतांचा तर एक विशिष्ट पंथच आपल्या देशांत आहे, त्या अर्थी ही पूजा व हा देव हीं दोन्हीं मुळांत एथलींच असावींत, किंबहुना ह्या विक्षिप्त पूजापद्धतीचें मूळ अनेक देशांत असावें असें समजणें तूर्त अधिक सुरक्षित आहे.
शिव-भागवताचा उल्लेख पतंजलीच्या सूत्रांत आहे. शांतिपर्वांतील नारायणीय उपाख्यानांत (भाग ३४९ श्लोक ६४) शिव-श्रीकंठानें ह्या मताचा प्रथम उपदेश केला, असा उल्लेख आहे. वायुपुराण (भा. २३), लिंगपुराण (भा. २४) ह्यांत उल्लेख आहे कीं, प्रत्यक्ष महेश्वरानें ब्रह्मदेवाला सांगितलें कीं, वासुदेवाच्या जन्मकाळीं आपणहि लकुलिन् नांवाच्या एका ब्रह्मचार्याच्या रूपानें अवतार घेऊं व तो कुशिक, गर्ग, मित्र आणि कौरूश्य ह्या चार शिष्यांना पाशुपतशास्त्राचा उपदेश करील. हा ह्या शिवभागवतांचा मूळ आचार्य भट्टारक लुकलीश नांवानें गुजराथ (लाट) देशांतील भडोच जिल्ह्यांत उदयास आला, व तो शिवाचा अवतार होता वगैरे गोष्टींना १० व्या आणि १३ व्या शतकांतल्या कांहीं शिलालेखांतहि आधार आहे [सर भांडारकर Vaishnavism and Shaivism पान ११६]. ख्रिस्ती शकापूर्वी दुसर्या अथवा तिसर्या शतकांतील सांची येथील शिलालेखांत देणगी देणार्यांचीं जीं नांवें आढळतात, त्यावरून भूलर ह्यांनीं असें अनुमान काढिलें कीं, विष्णु आणि शिव-भागवंतांचा संप्रदाय बौद्धांच्या व जैनांच्याहि पूर्वीचा असावा, पण या म्हणण्यांत पूर्ण सत्य नाहीं. सर भांडारकर म्हणतात कीं, विष्णूची सांप्रदायिक पूजा शिवपूजेनंतर सुरू झाली. ह्याला त्यांनीं गृहसूत्रांत रुद्राची पूजा कशी करावी, ह्याविषयीं नियम आहेत ह्या गोष्टीचा पुरावा दिला आहे. (Vaishnavism and Shaivism पान ११५). ह्यावरून आणि इतर बर्याच पुराव्यावरून शिव-पूजा ही बुद्धाच्या पूर्वीची होती, पण विष्णु-कृष्ण पूजा मात्र बुद्धानंतरची असावी असें होतें. पाली ग्रंथांमध्यें वासुदेवोपासकांचा उल्लेख आहे, तथापि पांचरात्र आणि सात्वत (भागवतांचा) संप्रदाय बौद्धानंतरचाच असावा इतकेंच नव्हे तर श्वेताश्वेतर उपनिषदांतील शिव-भक्तीचा नमुना आणि पाशुपत सांप्रदायदेखील बुद्धानंतरचेच असावेत.
रुद्र शिव हें दैवत वेदाहूनहि बर्याच प्राचीन काळापासून चालत आल्यामुळें त्याच्या स्वरूपांत ज्याप्रमाणें अनेक परिवर्तनें झालीं, त्याचप्रमाणें त्यांच्या पूजेच्या प्रकारांतहि होणें साहजिकच आहे. वेदांच्या व त्यापूर्वीच्या आर्ष काळीं आर्यांमध्यें मूर्तिपूजेचा संभवच नव्हता. तेव्हां शिव (आकाशपिता) आणि शक्ति (भूमाता) ह्यांची पूजा लिंग आणि योनि (स्त्रीपुरुषांची जननेंद्रियें) ह्या चिन्हांच्या द्वारेंच होत असावी. हें वेदांतील शिश्नदेवाच्या उल्लेखावरून दिसतें. बाबिलोनिया, ईजिप्त वगैरे प्राचीन राष्ट्रांत अशा प्रतीकांची पूजा होती. पुढें ती ह्या पुरातन महादेवाचा बर्याच कालानंतर रुद्र (भयंकर) स्वरूपांतून शिव (सौम्य) स्वरूपांत विकास झाल्यावर त्याच्या उपासनेसाठीं मनुष्याच्या आकाराच्या मूर्ति करण्यांत आल्या असाव्यात. इ.स. पूर्वी २०० वर्षांच्या सुमारास शिवाच्या लहान लहान मूर्ति करून बाजारांत विकण्यास ठेवण्यांत येत, असा पतंजलीच्या भाष्यांत उल्लेख आहे. तथापि लिंग-योनि पूजेचा त्या वेळीं अगदीं लोप झाला असावा, अशी जी सूचना गुरुवर्य भांडारकरांनीं केली आहे, ती मात्र पटत नाहीं. कारण महाभारतांत उपमन्यूनें आणि कृष्णानें शिवाची आराधना केल्याची जी गोष्ट आहे तिच्यांत उपमन्यूनें अशा पूजेचा लोकांत प्रचार असल्याचा उल्लेख केला आहे. ख्रिस्ती शकाच्या पहिल्या एकदोन शतकांतील कनिष्क, हविष्क वगैरे कुशान राजांचीं जीं नाणीं सांपडलीं आहेत, त्यांवर शिवाचीं दोन हातांची किंवा चार हातांचीं, त्रिशुल, पाशुपत (कुर्हाड) इ. आयुधें असलेलीं मनुष्यरूपीं चित्रें छापलेलीं आहेत. त्यांच्याहि बर्याच अगोदरच्या गोंडोफेरस नांवाच्या इराणांतील पार्थीयन (पल्लव) राजाच्या नाण्यांवरून शिवाच्या त्रिशूलधारी मनुष्याकृति मुद्रा आढळतात. ह्यावरून शिवाच्या ह्या मूर्ति, किंबहुना शिवाचें सौम्य आणि कल्याणकारी ध्यानहि पश्चिमेकडील ईजिप्त बाबिलोनियादि देशांतून आलें असण्याचा जितका संभव दिसतो, तितकाच संभव रुद्र-शिवाच्या स्वरूपांतील आणि उपासनेंतील घडून आलेला विकास पुरातनकाळापासून ह्याच देशांतहि घडून येण्याचा दिसतो. मात्र पुढें पुढें हिंदुस्थानांत शिवाचें हें सौम्य स्वरूप कायम राहून रौद्ररूप जसें मागें पडलें, तसेंच त्यांचा पूजेतील मूर्तिपूजा मागें पडून लिंगपूजाच चिन्हरूपानें कायम राहिली; ह्यावरून शैव भागवत पूर्वीपासूनच विशेषतः ज्ञान आणि वैराग्य मार्गाचें अभिमानी असल्यामुळें त्यांना मनुष्याकृति मूर्तिपूजेपेक्षां जगदुत्पत्तीचें एक पुरातन परंपरेचें केवळ चिन्ह अथवा द्योतक म्हणून लिंगपूजाच अधिक पसंत झाली असावी असें दिसतें. असो.
मुसलमानी अमलांत मराठी शब्दकोशांत इ. स. १४ व्या, १५ व्या आणि १६ व्या शतकांत अरबी फारसी आणि उर्दू भाषेंतील शब्दांचा किती तीव्र वेगानें शिरकाव झाला तें ध्यानांत घेतलें असतां जितांच्या भाषेवर जेत्यांच्या भाषेचा किती लवकर पगडा बसतो हें समजतें. सतराव्या शतकाचे आरंभीं महाराष्ट्रांत मुसलमानी सत्तेचा कळस झाला होता. तेव्हांच्या दरबारी व्यवहारांतून चालू असलेल्या मराठी भाषेंत निम्मेअधिक, केव्हां केव्हां तीनचतुर्थांशाहूनहि अधिक, शब्द मुसलमानी भाषेचे असत. धार्मिक ग्रंथांतून आणि बायकांच्या तोंडांत मात्र मराठी भाषा कशीबशी जीव धरून होती. तथापि पेशवाई काळांत वामन, रघुनाथ, मोरोपंत इ. संस्कृतज्ञ पंडित कवींचा उद्य होऊन चुकल्यामुळें मराठींत तत्सम शब्दाचें घोडें प्रमाणाबाहेर दामटण्यांत येऊं लागलें. १४|१५|१६ व्या शतकांत परकीय भाषेचा हल्ला जसा मराठीवर झाला तसाच एक हजार वर्षांपूर्वीं स्वकीय देशी भाषा जी कानडी तिचा हल्ला तत्कालीन महाराष्ट्रीवर झाला. फरक इतकाच कीं, मुसलमानी भाषा परकीय असल्यामुळें तिचा प्रवेश धार्मिक आणि घरगुती व्यवहरांतून होऊं शकला नाहीं. पण कानडी ही देशी भाषा असल्यामुळें तिनें नुसता राजदरबारच नव्हे तर घरगुती देव्हारा, चूल, जातें, झोंपाळा हा साराच प्रदेश हस्तगत केला. महाराष्ट्रांतील शातवाहन ऊर्फ आंध्रभृत्यांच्या राजवटीची अगदीं अखेरची मर्यादा म्हणजे इ. स. ३०४ हें साल होय. त्यानंतर जवळ जवळ दोन शतकें आभिर, राठोड (राष्ट्रकूट), शेलार आणि इतर लहानसान घराण्यांची सत्ता अथवा बंडाळी चालू होती. भाषावृद्धीचा तो कालच नव्हता. एकंदरींत इ. स. च्या पहिल्या पांच शतकांत गोदावरीच्या दोनहि तीरांवरील प्रांतांत महाराष्ट्रीचा किंवा तिला लागू असलेल्या एकाद्या अप्रौढ भाषेचा प्रचार होता म्हणावयास हरकत नाहीं. कृष्णेपर्यंत तर कानडीचाच मुलूख पसरलेला होता; किंबहुना कृष्णेच्या उत्तरेकडे आणि क-हाडच्या बाजूनें कोंकणांतहि कदाचित् कानडीच चालू असावी. ५ व्या व ६ व्या शतकांत चालुक्यांचें साम्राज्य झालें. हे आणि त्यानंतरचे सम्राट् निवळ कानडी अथवा तेलुगू होते. त्यामुळें कानडीनें हां हां म्हणतां गोदेचा किनारा गांठला. देवरकोंडें, कोईलकोंडें, गोवळकोंडें, नलगुंडें, हाणमकोंडें ह्या गांवांच्या नांवावरून हल्लींच्या निजामशाहीच्या पूर्वभागावरच नव्हे, तर इंदूर, तंदूर, माहूर, दारूर, एल्लूर (वेरूळ), कल्याणी, करहाटक, निंबाळ इत्यादि कानडी घाटाच्या नांवावरून भीमथडी आणि गंगथडीवरहि कानडीनें आपला पगडा बसविला होता हें उघड दिसतें. स्थळांचींच नव्हे तर पूर्वीं व्यक्तींचींहि पुष्कळ नांवें कानडीच असत हें खालील कांहीं प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींच्या नांवांवरून दिसून येतें. पुलकेशी (चालुक्य), बड्डिग, कक्कल (राष्ट्रकूट), धाडियप्पा, वड्डिग, जिजाऊ (यादव), विठोबा, बसवण्णा, जयप्पा (शिंदे), व्यंकोजी (भोसले) याचें कारण त्या वेळच्या कानडी राजवट्या हें उघड असतां चिंतामणराव वैद्यांसारखे शोधक आपल्या मध्ययुगीन भारतांत “त्या प्रदेशांत कर्नाटकी भाषेचा प्रसार कां व कसा झाला हें अद्यापि गूढ आहे” असें म्हणतात हेंच मोठें गूढ आहे !
बदामीचे व कल्याणीचे चालुक्य आणि नंतर मालखेडचे राष्ट्रकूट सम्राट् कानडी होते. म्हैसुरांतील गंगवाडी राजेदरबारांत तर जैन धर्माचार्यांचें मोठें प्रस्थ माजल्यानें त्यांनीं संस्कृत आणि कानडी वाङ्मयाचा प्रसार सर्व दक्षिण आणि पश्चिम हिंदुस्थानांत झपाट्यानें चालविला. त्यांनीं कानडीच नव्हे तर तामिळ, मल्याळी व तेलुगू ह्या चारहि द्राविडी भाषांची पुनर्घटना संस्कृताच्या पायावर केली. पूज्यपादासारखे विजिगीषु आचार्य इ. स. चौथ्या शतकापासून निरनिराळ्या राजवटींतून हिंडत असत व आश्रम मिळाल्याबरोबर जागजागीं मठ स्थापन करून आपला तळ रोवीत. त्यांनीं बौद्धधर्माला मागें हांकलें; इतकेंच नव्हे तर पाली आणि महाराष्ट्री भाषांनाहि दाबून टाकून विद्वानांत तसेंच सामान्य जनांत आपल्या मताच प्रसार करण्यासाठीं संस्कृत आणि कानडी व मागाहून तेलुगू वाङ्मय वाढविलें. चालुक्य राजे प्रथम प्रथम आपला जम बसण्यापुरते जैनांशीं आणि बौद्धांशीं सहिष्णुतेनें वागले. पण पुढें पूर्वेकडील वेंगी घराण्यांतील चालुक्यांनीं व कलच्छुरी घराण्यांतील राजांनीं शैवधर्माचा आणि कांचीच्या पल्लवांनीं वैष्णवधर्माचा जोराचा पुरस्कार चालविला, त्यामुळें जैनांचा बहुतेक आणि बौद्धांचा सर्वस्वीं नायनाट झाला; इतकेंच नव्हे तर ह्या नवीन धर्माचा भक्तिमार्ग बहुजनसमाजास पटण्यासारखा असल्यामुळें आधुनिक हिंदुधर्माची जरी घडी बसत चालली तरी जुन्या संस्कृत भाषेचा अवतार संपुष्टांत आला. ह्या राजकीय आणि धार्मिक क्रांतीच्या धांदलींत देवगिरी येथें यादवांचा उद्य (सुमारें १००० इ. स.) होईपर्यंत तुंगा आणि गोदा यांच्या दरम्यान कानडीचा व तिच्या आश्रयानें तेलुगूचा विजय निरंकुशपणानें चालू होता. त्यानंतर मराठीनें हल्ला चढविला. तिनें अखेरीस तेलुगूस मांजरा व सुशी नद्यांच्या पूर्वेस आणि कानडीस तर खालीं कृष्णेच्या पलीकडे घालवून प्रत्यक्ष तिच्या प्रांतीं कावेरी उतरून तंजावरावर आपला झेंडा रोविला. याचें श्रेय महादेव यादव आणि हेमाडपंत ह्यांना जितकें आहे तितकें, किंबहुना जास्तच भावार्थदीपिकेचे कर्ते ज्ञानेश्वरमहाराज यांना आहे.