शिव-भागवत आणि बुद्ध-भागवत ह्यांच्यासंबंधीं जें ऐतिहासिक विवेचन वर केलें आहे त्यावरून विष्णु-भागवतांच्या उत्पत्तीविषयीं बराच मजकूर वर येऊन गेलाच आहे. कृष्णानें स्थापलेल्या धर्मसुधारणेला पूर्वीं ‘सात्वत धर्म’ एवढेंच नांव होतें. कृष्ण हा बुद्धाप्रमाणेंच वेदाला फारसें न मानणारा पण शिव देवतेला मानणारा एक भाग्यवान् मुत्सद्दी पुरुष होता. नीतिधर्मापेक्षां युक्तिधर्माविषयीं त्याची प्रसिद्धि जास्त आहे. भारतीय युद्धासारख्या अवनतीच्या काळांत त्यानें मोठीच राष्ट्रीय कामगिरी केली असणें अगदीं शक्य आहे. पण बुद्धासारखें जगदुद्धाराचें काम त्याच्या हातून झाल्याचा पुरावा नाहीं. तो आर्य होता, कीं सुमेरुवंशीय होता, कीं द्राविड होता, हें निश्चित कळण्यास मार्ग नाहीं. कृष्ण हें व्यक्तीचें नांव नाहीं. कृष्णायन ऊर्फ कण्हायन नांवाचें गोत्र होतें. नांवाप्रमाणें तें खरेंच काळें असल्यास तें आर्यवंशीय नसावें हें उघड आहे. कृष्ण म्हणून कोणी एक वैदिक ऋचा करणारा ऋषिहि होता. ८ व्या मंडळांतील ७४ वें सूक्त त्यानें रचिलें आहे. तो आंगिरस म्हणजे (घोर अभिचार करणा-या कुळांतला) होता. तो ब्रह्मज्ञानी, राजकारणी, अथर्ववेदी क्षत्रिय असावा, “तद्धैतद घोर: आंगिरस: कृष्णाय देवकीपुत्राय उक्त्वोवाच अंपिरास: एव स: बभूव” हें वाक्य छांदोग्य उपनिषदाच्या तिस-या अध्यायाच्या १७ व्या खंडांतील ६ श्लोकांत आहे. ह्यावरून घोर आंगिरसाचा एक शिष्य देवकीपुत्र कृष्ण होता, असें दिसतें. हा कृष्ण व वेदांतील ऋचा करणारा कृष्ण एकच असावा, असें कांहीं खात्रीनें सांगतां येत नाहीं. पण देवकीपुत्र कृष्ण यादव कुळांत जन्मला व त्यानें कांहीं एक नवीन गुप्त धर्म स्थापन केला. त्याचा प्रसार वृष्णि कुळांतील यादवांनीं प्रथम आपल्यापुरतांच केला असें दिसतें. ज्या कृष्णानें हिंदुस्थानांतील धर्माच्या इतिहासांत ही सुधारणा केली त्याचें नांव वासुदेव असें असून तो देवकीचा मुलगा होता. तो स्वत: आर्य असो किंवा अनार्य असो, ती सुधारणा त्यानें आर्य लोक हिदुंस्थानांत आल्यावर केली; व ती बुद्धापूर्वीं कांहीं शतकांपूर्वीं केली, हें इतिहाससिद्ध आहे; आणि तो कृष्ण शिवोपासक असल्यामुळें त्याचा एकान्तिक ऊर्फ एकेश्वरी धर्म शिव-भागवत धर्मच असण्याचा संभव आहे. बुद्धाच्या काळापूर्वीं वासुदेव हीच एक उपास्य देवता झाली नसली, तरी निदान वासुदेव हा एक वंदनीय महापुरुष झाला होता, असें कांहीं पाली ग्रंथांतील उल्लेखांवरून दिसतें. तरी पण हा वासुदेव – कृष्ण विष्णूचा अवतार हें मत मात्र नारायणीय पर्वाचा महाभारतांत शिरकाव होईपर्यंत अस्तित्वांत नव्हतें. तें मत बुद्धानंतरचेंच नव्हे-अशोकाच्याहि नंतर जी शुंग नांवाच्या ब्राह्मणी धर्माच्या कुळानें राज्याची व धर्माची क्रांति मगध देशांत केली तिच्यानंतरचें असावें, हें खालीं सांगितलें आहे.
हल्लींच्या सरकारनें झालें तरी ह्या व्यापाराचें विषारी जाळें एकदम पसरलें असें मुळींच नाहीं. संधि पाहून आणि गरज भासेल तसेंच हें अनिष्ट जाळें सरकाराला कदाचित् नाखुशीनेंच पसरावें लागलें असेल. पण “हांसत कर्म करावें भोगावे रडत तेंच परिणामीं” असा अनुभव सरकाराला येत असेल अशीच आमची अटकळ आहे. ह्या बाबतींत सरकारावर उगाच रुसवाफुगवा करून लभ्यांश नाहीं हें सर्व खरें. अद्यापि मध्यप्रांतांत व मद्रास इलाख्यांत कित्येक ठिकाणीं दारूच्या पैदाशीवर, विशेषतः जंगली व संस्थानी रियासतींत सरकारांनीं प्रतिबंध ठेवलेला नाहीं. सरकारहि मधून मधून विक्रीच्या दारूचा कस होतां होईल तों अगदीं सौम्य ठेवून दारुड्याच्या प्रकृतीची काळजी घेण्याची व्यवस्था राखीत आहे. परंतु त्यांच्या अज्ञानामुळें होणा-या द्रव्यहानीची काय वाट? ज्या दारूची मूळ किंमत दोन-चार आणेहि नसेल तिच्यावर कर बसवून तिची किंमत २-४ रुपयांवर नेलेली असूनहि दारूबाजीचा विस्तार इतका अवाढव्य झालेला सरकारच कबूल करीत आहे. मग सरकार ही दारूची पैदाशीच आपल्या समार्थ्यानें कां बंद करीत नाहीं? पैदास बंद झाल्यावर विक्रीचा प्रश्नच राहात नाहीं. केवळ औषधोपचारासाठीं ‘लायसन्स’ देऊन इतर विषांप्रमाणेंच दारू हा एक पदार्थ विष समजून औषधांपुरता त्याचा खप ठेवण्याला जनतेकडून हरकत होईल असें वाटत नाहीं. तसे न करतां केवळ उत्पन्नाच्या सबबीवर सरकारनें हा विषाचा बाजार मोकळा ठेवला म्हणजे केवळ आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोगच नव्हे काय? कोणी म्हणतात, आतां काय, स्वराज्य ७ महिन्यांत मिळावयाचें आहे. पण स्वराज्य आज मिळून तरी हातीं काय लागणार आहे?
वरील सर्व विचारसरणी आपल्यापुढें मांडण्यांत माझा मुख्य मुद्दा हा आहे कीं, शेतक-यांनो, तुम्ही राजकारण हा आपला दुय्यम उद्देश ठेवा आणि तुमची स्वतःची आर्थिक व सामाजिक ऊर्फ विधायक घटना करणें हाच मुख्य उद्देश ठेवा; व त्या कार्याला कोणाचीहि वाट न पाहतां आपल्याच पायांवर उभे राहून ताबडतोब लागा. ह्या विधायक संघटनेचीं कांहीं ढोबळ अंगें आहेत, त्यांचा आतां खुलासा करतों.
हिंदुस्थान आणि हिंदु धर्म म्हणजे एक विचित्र मायपोट आहे. जें हिंदुस्थानांत नाहीं तें जगांत इतरत्र कोठेंच नाहीं असें म्हटल्यास अतिशयोक्ति फारशी होईल असें वाटत नाहीं. हिंदुस्थानांत ज्या वेळोवेळीं राज्यक्रांत्या झाल्या आहेत, त्या केवळ खड्या सैन्याच्या जोरावर झाल्या आहेत, असें मुळींच नाहीं. अशा सैन्यापेक्षां पेंढारावरच येथील राजांची व सम्राटांची विशेष मदार असे. जसें राजकारण, तसेंच धर्माचरण, तसेंच समाजकारण आणि तशाच थाटाचा सर्व सार्वजनिक व्यवहार! एखाद्या पुरातन क्षेत्रांतल्या जीर्ण देवालयाचीं सर्व लक्षणें सूक्ष्म निरखून पाहिल्यास, तें स्थान एखाद्या पुरातन अनार्य वर्ण गुरूंचा मठ असावा, कीं राजाचा किल्ला असावा कीं
व्यापा-यांची अथवा पांचालांची उतारपेठ असावी कीं कांहींच नसून केवळ पेंढा-यांचें संकेत-स्थान असावें कां आणखी कांहीं तरी असेंच गौडबंगाल असावें हें कांहींच कळेनासें होतें. धर्म हा एक समाजशास्त्राचा भाग आहे. परकीय पंडित हिंदुस्थानांतील धर्मासंबंधीं नाना तर्कवितर्क चालवून हा विषय कुरतडीत बसतात! पण हिंदुधर्माची मीमांसा ‘जेथल्या बोरी तेथल्याच बाभळी’ ह्या न्यायानेंच झाल्यास अंशत: कांहीं तरी कार्यभाग होईल. एरव्हीं ग्रंथविस्तारच पाहून घ्यावा!
वरील माहितीवरून वासुदेव ह्या व्यक्तिविशिष्ट नांवाचा आणि कृष्ण ह्या आडनांवाचा क्षत्रिय कुळांतला, कोणी महापुरुष, गौतम बुद्धाप्रमाणेंच पण त्याच्या पुष्कळ पूर्वीं एक मुत्सद्दी (संत नव्हे) एका नवीन धर्माचा संस्थापक होऊन गेला असें सिद्ध होतें. तो शैव होता. ह्यावरून शिवोपासना त्याच्याहि पूर्वींची ह्या देशांत होती असें मानणेंहि क्रमप्राप्तच आहे. त्याचा धर्म एकान्तिक ब्रह्मवादी अहिंसावादी, यज्ञयागादि बाह्य विधीला अजीबात फांटा न देणारा, तरी पण वेदप्रामाण्याचें बंड न माजविणारा असा होता. जनक-भीष्मादि क्षत्रिय राजे, व्यासादिक संहिता संपादक क्षत्रियच नव्हत, तर याज्ञवल्क्यादि उपनिषदें आणि स्मृत्या रचणारे ब्राह्मणहि ह्या नूतन धर्माचे अनुयायी होते. पुढें पुढें तर पुस्करसंहिता, परम संहिता, सात्वत संहिता नांवाची पांचरात्र ऊर्फ सात्वत दर्शनें लिहिणा-या ब्राह्मणांनीं तर जवळ जवळ हा धर्म आपलासाच केला; इतकेंच नव्हे, ते आपलें वर्चस्वहि स्थापूं लागले; आणि मूळ स्थापक आणि आदि प्रचारक कृष्ण, भीष्मादिकाच्या क्षत्रिय जातीला कमी मानूं लागले. पण ह्या ब्राह्मणकृत पांचरात्र संहिता भगद्गीता काळानंतरच्या असाव्यात; कारण ह्यांत वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, आणि अनिरुद्ध अशीं जीं मुख्य एकान्तिक देवतेचीं चार पृथक् रूपें (व्यूह) सांगितलीं आहेत त्यांचा भगवद्गीतेंत कोठेंच उल्लेख नाहीं. इतकेंच नव्हे तर भगवद्गीतेच्या काळापर्यंत क्षत्रियांचेंच वर्चस्व अबाधित असून तेच भूदेव, धर्मसंस्थापक आणि मोक्षदाते होते ह्या गोष्टीला गीतेच्या १० व्यां अध्यायांतील विभूति-संग्रहांतील “नराणां च नराधिपम्” ह्या उक्तीचा आधार तेलंगांनींहि दिला आहे. तथापि गीता-काळाच्य किंचित् पूर्व किंवा कदाचित् तिचेच काळीं अशोक मौर्याच्या नंतर ब्राह्मणी धर्माची जी प्रचंड लाट उसळली आणि बौद्ध व जैन धर्मांवर तिचे प्रत्याघात पडूं लागले, त्या काळापासून सात्वत धर्म पूर्ण ब्राह्मणांच्या कबजांत जाऊन त्याला केवळ सांप्रदायिक रूप प्राप्त झालें. इतकेंच नव्हे तर ज्या अशोकाच्या मौर्य कुळानें शिकंदराच्या परचक्राला न जुमानतां भरतखंडांत पहिलें आसेतुहिमाचल प्रचंड आणि वैभशाली साम्राज्य उभारलें, त्याच कुळानें अकबराप्रमाणें तुलनात्मक धर्माचें नवें बंड उभें केलें, सर्व धर्माला सारखें महत्त्व दिलें, आणि विशेषत: बौद्ध धर्माला आश्रय दिला; ह्या सर्व गोष्टी ब्राह्मण धर्माच्या पुरस्कर्त्यांना अर्थातच फार असह्य झाल्या; म्हणून त्यांनीं “नंदान्तं क्षत्रियकुलं” हें थोतांड उभें करून मौर्य कुळाची नालस्ती आरंभिली आणि अशोकाच्या तुलनात्मक धर्माची कामगिरी तर नि:शेष गारद करून टाकली!