1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

लिंगायत धर्म

वर श्रीनामदेवमहाराजांची पुण्यतिथि कां करणें अवश्य आहे या संबंधांत ‘महाराष्ट्रांतील भागवत धर्माचा संस्थापक कोण?’ ह्या विषयावर विचार करून त्या धर्माचें संक्षिप्त वर्णन केलें. आणखी दोन पंथांचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्रांतील चालू भागवत धर्माचा विषय पूर्ण झाला असें म्हणतां येणार नाहीं.

ख्रिस्ती शकाच्या पहिल्या सहस्त्रकांत महाराष्ट्रांत विशेषत: बौद्ध आणि जैन ह्या दोनच धर्मांचा जोर होता. बौद्ध व जैन धर्माला जसजशी उतरती कळा लागली, तसतसा शैव धर्माचा प्रसार वाढूं लागला; बहुजनसमाजांत-विशेषत: मराठ्यांत-गोरखनाथ पंथाची वाढ होऊं लागली. मच्छिंद्रनाथानें हा पंथ प्रथम काढला. त्याचा पराक्रमी शिष्य गोरखनाथ हा पूर्वीं बौद्ध होता. त्याच्यानंतरचा नाथपंथ म्हणजे बौद्ध आणि शैव धर्माचें मिश्रण होय. हा पंथ खालीं मलबारपर्यंत पसरला होता. अद्यापि सह्याद्रीच्या अनेक उंच शिखरांवरून ह्या नाथपंथाचीं ठाणीं जागजागीं आढळतात.

आर्यांचे जसे वेद, तसे द्रविडांचे आगम नांवाचे पुरातन ग्रंथ आहेत. ह्या ग्रंथानुधारें शैव धर्मानें बाराव्या शतकामध्यें एक नवीन उचल केली. कल्याणी येथें कलच्छुरी वंशाचा बिज्जल नांवाचा जैन राजा राज्य करीत असतां (इ. स. ११५७-११६७) बसव नांवाचा ब्राह्मण त्याचा प्रधान होता. तो मूळ विजापूर जिल्ह्यांतील बागेवाडी गांवचा होता. ह्यानेंच लिंगायत धर्माची स्थापना केली. कोणी म्हणतात-एकोराम, पंडिताराध्य, रेवण, मरूळ, विश्वाराध्य, ह्या पांच आराध्य जातीच्या ब्राह्मणांनीं हा पंथ काढिला. त्याला बसवानें राजाश्रय दिला. हा आश्रय बिज्जल राजाचा विचार न घेतांच दिल्यामुळें त्या राजानें बसवावर स्वारी केली. ह्या कटकटींत बसवानें राजाचा खून केला. पुढें बसवाचाहि अंत झाला. हा सुधारक धर्म असल्यामुळें बौद्ध धर्माचीं कांहीं लक्षणें ह्यांत उतरलीं आहेत. ह्यांत जातिभेद, मूर्तिपूजा, मंदिरांतील आराधना, तीर्थयात्रा, वगैरेंचें फारसें बंड प्रथम नव्हतें. बायकांना समान हक्क असून, त्याहि लिंगधारणा करितात. विधवांना विवाहाचा मुळींच प्रतिबंध नाहीं. कोणत्याहि जातीच्या माणसाला दीक्षा देऊन लिंगायत करतां येतें. ह्यांत देवळांपेक्षां मठांचेंच विशेष प्राधान्य आहे, व गुरूंचेंच महत्त्व विशेष असून, गुरु म्हणजे जंगम, (हलतेंचालतें) लिंग म्हणजे ईश्वराचें चिन्ह असें समजण्यांत येतें. ह्या धर्माचा ब्राह्मणी धर्माशीं कडकडीत विरोध असल्यामुळें ह्याची एकंदर घटना सामान्य हिंदुधर्माहून अगदीं अलग झाली आहे.

लकबा

वरील संयुक्त क्रियापदांप्रमाणें आणखी किती तरी भाषेच्या लकबा कानडींतून मराठींत आल्या असाव्यात. पायांत जोडा, अंगांत अंगरखा, गळ्यांत माळ घालणें, तोंडांत मारणें, पाठीस लागणें, (अपराध) पोटांत घालणें, डोळ्याआड करणें, जीवावर येणें, इत्यादि ढबा केवळ कानडी आहेत. त्याला वाचायला येतें, हें वाक्य कानडींतल्या अवनिग ओदलिक्के बरूत्तदे ह्या वाक्याचें शब्दशः भाषांतर आहे. भक्ति करीत जा, सांगत बैस, तो असेंच सांगत आला आहे, ह्या लकबाहि कानडीच दिसतात. वरलीकडे म्हणजे पश्चिमेकडे; खालतीकडे म्हणजे पूर्वेंस हे प्रयोग, मेक्क (मेलादिक) आणि (कीळदिक) ह्या तामील प्रयोगाच्या हुबेहुब प्रतिमा आहेत. वीस (द्विदश), तीस (त्रिदश) इत्यादिप्रमाणें कानडींत ही दहाचीच दुप्पट तिप्पट करून मोजण्याचा व्यवहार आहे, इतकेंच नव्हे तर सत्तर न म्हणतां मराठे कुणबी तीन वीसा अन् दहा असें जें म्हणतात त्याचें मूळ कानडींतील मूर इपत्तु रदुहूत्त ह्या शब्दांत तंतोतंत आहे.
कानडींतल्या आणखी एका लकबेचा फार जोराचा छाप मराठीवर पडल्याचें उदाहरण म्हटलें म्हणजे मराठी शब्दाचें अंत्यस्वर ‘उ’ होणें. त्याचें कारण कोणी सांगतात कीं, अशा शब्दांपुढें संस्कृतांत विसर्ग होता, त्याचा ‘ओ’ झाला आणि मग त्याचा ‘ऊ’ झाला. कोणी म्हणतात कीं, कवितेंतील यमक साधण्यासाठीं हा उकारान्त होतो. पण पुढील जुन्या गद्य पंचतंत्रांतील उतारा पाहिला असतां हीं दोनहि कारणें लागू होत नाहींत असें दिसेल. “कव्हणी एके नगरी देव शर्मा म्हणिजे ब्राह्मणु; तयाचिये भार्येसि प्रसूति जाली. एकु पुत्र, एकु मुंगस, पुणु तयासि विश्वास तीना..... थोरू विलापू करूं आदरिला...” हा उकारान्त अनिश्चित रीतीनें होत असे आणि तो आतां प्रचारांतून पार गेला आहे; त्यावरून ही एक कानडीवरून घेतलेली ढब होती आणि ती आतां नाहीं एवढेंच अनुमान निघतें.

राष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म

मागील व्याख्यानांत भागवत धर्माचा निरनिराळ्या स्वरूपानें कसा पाया पडला ह्याची विस्तारानें परिस्फुटता केली. कोणत्याहि धर्माचा आरंभ होतो. तो एका विशिष्ट जातीच्या अगर भाषेच्या राष्ट्रामध्यें स्थानिक स्वरूपानें प्रथम होतो. हिंदुस्थान देश तर अशा अनेकविध राष्ट्रांचा एक प्रचंड समुदाय होय. गौतम बुद्धानें जरी आपला सुधारलेला धर्म मुळांतच सार्वत्रिक रुपानें जाहिर केला आणि ज्यांनीं आपल्या सर्वस्वाचा त्याग केला होता अशा प्रतिभासंपन्न प्रचारकांना चारी बांजूनीं दूरवर पाठविलें आणि स्वत: आपण सतत ५१ वर्षें संचार केला, तरी त्याच्या भिक्षुसंघाप्रमाणें परिभ्रमण करणारे त्याच्या काळीं इतरहि पुष्कळ भिक्षुसंघ होते; त्या सर्वांवर वरचढ होऊन हिंदुस्थानाबाहेरहि प्रसार होण्यासारखी अनुकूल परिस्थिति प्राप्त होण्याला आणखी दोन शतकें लागलीं. भरतखंडाचा पश्चिम एशिया आणि पलीकडे ईजिप्त आणि ग्रीस इ. संस्कृतींशीं परिचय झाला. तो प्रथम अलेक्झांडराच्या हिंदुस्थानावरील इ. स. सव्वातीनशें वर्षांपूर्वी झालेल्या स्वारीमुळेंच, असें जें समजण्यांत येतें तें बरोबर नाहीं. इराणांत त्याच्याहि पूर्वीं २०० वर्षें सायरस आणि डायरियस वगैरे ऐश्वर्यवान् आर्य वीरांनीं बादशाही स्थापिली, सायरसनें बाबिलोनिया जिंकला, त्याचा मुलगा कॅबेसिसनें ईजिप्तवर आणि पुढें डारियसनें हिंदुस्थानावर स्वा-या करून नाईल नदीपासून तों सिंधू नदीच्या अलीकडेपर्यंत पर्शिंयाचें जगांतील जेव्हां पहिलें भाग्यशाली साम्राज्य स्थापिलें, तेव्हांच भरतखंडाचा पश्चिमेकडील संबंध जडला होता. अलेक्झांडरच्या टोळधाडीमुळें कायमचा अनिष्ट असा हिंदुस्थानावर कांहींच परिणाम घडला नाहीं. उलट त्यामुळें हिंदुस्थानांत जागृति होऊन पूर्वीं कधीं नव्हतें असें ह्या देशांत एकछत्री साम्राज्य मात्र उदयास आलें. अलेक्झांडरची पाठ वळली न वळली तोंच पंजाबांत दबा धरुन बसलेला आर्य छावा चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचा पाताळयंत्री चाणक्यमंत्री ह्यांनीं उचल खाल्ली. त्यांनीं अस्ताव्यस्त पसरलेल्या आर्य वीरांमध्यें नवीन दम भरून त्यांच्या साह्यानें, पाटलीपुत्र येथें धुंदींत लोळणा-या नंद राजाला गारद करून, मगध देशाचें राज्य काबीज केलें. विंध्याद्रीच्या उत्तरेकडे हिमालयापर्यंत आणि आसामपासून सिंधूच्याहि पलिकडे आपली निरंकुश सत्ता स्थापन केली. चंद्रगुप्ताची तलवार आणि चाणक्याची लेखणी ह्या अद्धितीय जोडीनें ह्या नवीन बादशाहीची उत्तम घडी बसविली. पुढें चंद्रगुप्ताचा प्रतापी व पुण्यशील नातू महात्मा अशोक इ. स. पूर्वीं २६८ व्या वर्षीं गादीवर बसला. त्यानें दक्षिणेंतहि आपली सत्ता वाढवून आपला वचक आसेतुहिमालयापर्यंत बिनतोड बसविला, आणि सर्व भरतखंडाला एकजीव बनविलें; इतकेंच नव्हे तर बाहेर पूर्वेकडे व पश्चिमेकडे दूरवर पसरलेल्या दरबारांतूनहि आपलें प्रत्यक्ष दळणवळण आणि वजन वाढविलें !

एवढी जय्यत तयारी झाल्यावर अशोकानें एकदम बौद्ध धर्माचा स्वीकार केला व त्याचा सर्व जगांत प्रसार करण्याच्या कामीं आपली सर्व बादशाही सत्ता व संपत्ति अगदीं श्रद्धापूर्वक अर्पण केली. बुद्धाचा शुद्ध स्वार्थत्यागी, आणि उदार धर्म व त्याच्या प्रसारार्थ सज्ज असलेली अशोकाची निस्सीम भक्ति आणि अतुल शक्ति हा योगायोग नुसत्या भारताच्याच नव्हे तर अखिल जगाच्या इतिहासांत अश्रुतपूर्व क्रांति करणारा झाला ह्यांत संशय नाहीं ! स्वातंत्र, शांती आणि प्रगतीच्या ध्वजा खांद्यावर घेऊन पीतांबरधारी बुद्धभिक्षू पूर्वेकडे चीन, जपान, कोरिया, उत्तरेकडे तिबेट आणि मध्य आशिया, पश्चिमेकडे मेसापोटेमिया आणि ईजिप्त व दक्षिणेकडे सिंहलद्वीप इ. भागांत उतरले. मगध देशांत चंद्रगुप्ताचे वेळींच स्वतः चंद्रगुप्त आणि चाणक्य ह्यांनीं जैन धर्माचा स्वीकार केला होता. इतकेंच नव्हे तर म्हतारपणीं मुलावर राज्य सोपवून चंद्रगुप्त हा भद्रबाहू ह्या जैन संन्याशाबरोबर दक्षिणेंत धर्मप्रसारार्थ म्हैसूरजवळ श्रावणबेल्लगोळा येथें आमरण राहिला अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. ह्याप्रकारें मौर्य घराणें ही एक पुण्यकीर्ति राजर्षींची खाणच होती. भागवत धर्माचे जे निरनिराळे प्रकार पूर्वीं राष्ट्रीय स्वरूपांत होते, त्यांना ह्या राजर्षींनीं अगदीं सार्वत्रिक स्वरूप दिलें व त्यांचा पाया स्वातंत्र्याच्या आणि लोकसत्तेच्या पायावर उभा करून आपण केवळ त्याचे नम्र सेवक बनले ! शेवटीं अशोकानें राज्यकारभाराची दगदग सोडून आपल्या आजाप्रमाणें संन्यासदिक्षा घेतली. त्याचा सख्खा भाऊ, बहीण आणि मुलांनीं तर हीच दीक्षा घेऊन ते सर्व स्वतः धर्मप्रसाराच्या कामाला लागले. सिंहलद्वीपांतील बौद्धमठ त्याचा भाऊ महेंद्र ह्याच्याच नांवानें प्रसिद्ध आहे.
ह्याप्रकारें बुद्धधर्माचा व जैनधर्माचा आणि पुढें त्यांच्याच चाको-यांतून शैव आणि वैष्णवधर्माचा जो देशोदेशीं प्रसार झाला त्याचा शिरकाव निरक्षर आणि अज्ञ अशा बहुजनसमाजांच्या कानाकोप-यांत कोणत्या बहुविध साधनांनीं झाला, त्याचा तपशिल आतां पाहूं.

रामानंद

दक्षिणेंत श्रीरामानुजाचार्यांनीं श्रीवैष्णव पंथाची स्थापना केल्यावर त्याच्या शाखा त्यांनीं सर्व हिदुंस्थानभर पसरल्या. तो स्वत: सर्व देशभर तीर्थयात्रा करून आला. म्हैसूरचा जैन राजा विष्णुवर्धन याला वैष्णव धर्माची दीक्षा दिल्यावर त्याच्या आश्रयानें त्याच्या राज्यांत मलेकोट येथें एक प्रसिद्ध वैष्णव देऊळ व मठ स्थापिला. ह्याच ठिकाणीं रामानंद ह्या गौड ब्राह्मणाचा जन्म झाला, असें मॅकालिफ म्हणतो. सर भांडारकर म्हणतात, हा प्रयाग येथें इ. स. १३०० च्या सुमारारस जन्मला. ह्यानें स्थापिलेल्या पंथाचें मुख्य उपास्यदैवत कृष्ण नसून राम आहे, हा एक विशेष आहे. ह्यानें केलेल्या तीर्थाटनांत ह्याचा मुसलमानांशीं व बौद्धांशीं संबंध आला असावा असें दिसतें. ह्यामुळें त्याच्य पंथांत जातिभेदाला मुळींच महत्त्व नाहीं. शिवाय ह्यांची सर्व शिकवण हिंदी भाषेंत झाल्यामुळें बहुजनसमाजांत ह्याचा प्रसार फार झाला. ह्याच्या प्रसिद्ध तेरा शिष्यांपैकीं पीपा राजपूत, कबीर मोमीन, सेना न्हावी, धन्ना जाट, रोहिदास चांभार आणि पद्मावती ही एक बाई होती. हा इ. स. १४११ सालीं १११ वर्षांचा होऊ वारला. ह्याच्या शिष्यांपैकीं कित्येकांनीं पुढें आपापले नवीन वैष्णव पंथ सर्व उत्तर हिंदुस्थानभर काढलें. ह्यांचीं कामें हिंदी भाषेंतच चालल्यानें देशी भाषेचा प्रसार झाला.

राधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे.

जयराम पिंड्ये नांवाच्या कवीनें केलेला वरील चंपू ऊर्फ श्री शहाजी राजे ह्यांची प्रशस्ति शोधून काढण्याचें श्रेय प्रसिद्ध शोधक रा. राजवाडे ह्यांनीं मिळविलें आहे, त्याबद्दल कोणीहि इतिहासभक्त ह्या शोधकाचा सदैव ऋणीच राहील. हा चंपू प्रसिद्ध करतांना राजवाडे ह्यांनीं मराठींत एक विद्वत्तापूर्ण बारीक टाइपाच्या २०० पानांची प्रस्तावना जोडली आहे. शोधकाच्या विद्वत्तेची किंबहुना मार्मिकतेचीहि शंका घेणें कोणासहि सोपें जाईल असें वाटत नाहीं. पण मूळ चंपू ७६ पानांचा व त्याची प्रस्तावना २०० पानांची हा प्रकार ‘मिया मूठभर तर दाढी शेरभर’ असा झाला आहे. जयराम कवीनेंहि उघडपणें श्री शहाजी प्रशस्ति ह्या नांवानें काव्य न लिहितां, त्याला राधामाधव-विलासाची प्रस्तावना जोडून, श्री शहाजीच्या कीर्तीला विनाकारण दुय्यमपणा आणिला आहे. मनुष्याची स्तुति केली असतां ती कोणी वाचणार नाहीं, म्हणून कवीनें राधाकृष्णाच्या स्तुतींत श्री शहाजीची स्तुति मिसळून देण्यांत श्री शहाजीचें महत्त्व वाढेल असें कवीचें लाघव आहे, अशी संपादकानें क्लुप्ति लढविली आहे. मूळ चंपूच्या आधारें शहाजी राजे ह्यांच्या चरित्राचें मराठींत विवरण करण्यांत संपादकानें चरित्रनायकाविषयीं आपला योग्य आदर व अभिमान व्यक्त केला आहे. ह्या मार्मिक विवरणाप्रीत्यर्थ प्रस्तावनेचीं १२५ पानें म्हणजे ६२ रकाने खर्ची पडले आहेत, ह्यांत फारसें कांहीं वावगें नाहीं. आधुनिक काळांतील पहिलें हिंदु स्वराज्य स्थापण्याचें मुख्य श्रेय श्री शिवछत्रपतींना देऊन, त्याच्या पूर्वतयारीचें  श्रेय त्यांच्या जनकांना ह्या तडफदार शोधकानें दिलें आहे, ह्यांतहि कांहीं आश्चर्यकारक नाहीं. आश्चर्य इतकेंच कीं, मध्यंतरीं श्री रामदासाच्या नांवानें किंचित् तुणतुणें वाजविण्याची हुक्की ह्या जाड्या शोधकालाहि आली आहे. रामदास आणि श्री शिवप्रणीत स्वराज्य यासंबंधीं चालू प्रख्यात वादाचा दाब राजवाड्यांच्या इतरत्र थैमान करणा-या लेखणीवरहि पडून तिनें आपली दुडकी चाल ह्या खडकाळ प्रदेशांत किंचित् आवरलेली आहे, हें त्यांतल्या त्यांत समाधान मानण्यासारखें आहे ! परंतु जणूं काय ह्या प्रदेशांतील कांटेरी लगाम आपल्या नाच-या लेखणीला आवडला नाही हें पाहून, प्रस्तावनेच्या बाकी उरलेल्या ७०।७५ पानांत मालकानें तिला केवळ स्वैर संचार करूं दिला आहे, असें म्हटले असतां फारशी अतिशयोक्ति होईल, अशी आम्हांला भीति वाटत नाहीं. हीं पाऊणशें पाने ह्या विद्वान शोधकानें स्वतंत्र ग्रंथद्वारां लिहिलीं असतीं तर चंपूच्या, अगर श्री शहाजीच्या, किंबहुना राजवाडे ह्यांच्याहि कीर्तीला मुळींच कमीपणा आला नसता. इतकेंच नव्हे तर दक्षिणेंतील मानववंश, तौलनिक भाषा, व्युत्पत्ति, कालमान, देशरूढी वगैरे गंभीर विषयांवर ह्या नाणावलेल्या लेखकांचे अधिक जबाबदार विचार आम्हांला वाचावयास मिळाले असते, अशी आशा करण्यांत आम्ही त्यांचा कसलाहि उपमर्द करीत नाहीं. कुठली राधा, कुठला माधव, त्यांचा कसला विलास, त्यांत जुन्या मतांच्या पिड्यांनीं श्री शहाजीचें चरित्र कालविलें म्हणून नव्या मताच्या राजवाड्यांनींहि त्याच कालवणांत वरील महत्त्वाच्या विषयांवरील आपल्या घाईनें बनविलेल्या मतांची खिचडी कालवावी, हें लेखकाचें नसले तरी निदान वाचकांचें मोठें दुर्दैव आहे. राजवाडे म्हणजे कांहीं असे तसे शोधक नव्हत. त्यांचीं कांहीं मतें आदरणीय नसलीं, तरी लोकांना वाचनीय वाटणारच ! मग एका जुन्या चरित्राच्या लांबट प्रस्तावनेंत त्यांनीं आपलीं इतकीं महत्त्वाचीं व अवजड मतें अशा आगंतुक रीतीनें का घुसडलीं हें समजण्यालाहि वाचकाला किंचित् संशोधनच करावें लागत आहे. एकंदरींत सर्वच प्रकरण ‘आठ हात लांकूड, तर नऊ हात ढलपी’ अशा न्यायाचें झाल्यानें पुढेंमागें हें एक मिश्रजात ऐतिहासिक काव्य म्हणून प्रसिद्धीला येईल कीं काय न कळे.
शेवटच्या ४३ रकान्यांतील राजवाड्यांच्या प्रत्येक विधानाचें परीक्षण करणें म्हणजे त्यांच्याहूनहि प्रचंड ग्रंथाचा विस्तार करावा लागेल. त्यांचीं सर्वच विधानें खोटीं आहेत, किंवा खरीं आहेत असें म्हणण्याचें धाडस कोणासहि करतां येणार नाहीं. कां, तर पुष्कळ ठिकाणीं त्यांनीं आपले पुरावे दिले आहेत व तेहि बरेच परिश्रम करून दिले आहेत. त्यांचीं विधानें निरुत्तर खात्री करणारीं नसलीं, तरी विचाराला प्रेरक आहेत, इतकें प्रांजलपणें कबूल करून प्रस्तावनेच्या ह्या भागासंबंधीं आम्हांला जें जें कांहीं सामान्यत्वें व विशेषकरून आक्षेपार्ह वाटतें तें वाचकांपुढें ठेवण्याची रा. राजवाड्यांची परवानगी घेतों.
आमच्या मतें सर्वसामान्य आक्षेप असा आहे : इतिहासकार किंवा संशोधक ह्यानें आपल्या स्वतःच्या लाडक्या भावना, पक्षपात, धर्म, समजुती, सामाजिक अथवा वैयक्तिक लकबा, ह्यांपासून स्वतःस निदान इतिहास हा विषय हातीं असे तोंपर्यंत तरी, अलग ठेवावें. रा. राजवाडे ह्यांनीं ही खबरदारी घेतली आहे असें दिसत नाहीं. ज्यांना हा ताटस्थयोग साधत नाहीं, त्यांनीं इतिहासाचा नादच सोडावा ! नाहीं तर नदीच्या उगमांतच विष कालविण्याच्या पातकाचे धनी त्यांना व्हावें लागेल ! आर्य म्हणजे कोणी एक अति श्रेष्ठ मानववंश, अनार्य म्हणजे त्याच्या उलट चट सारे हलके वंश, आर्यांची वर्णव्यवस्था म्हणजे एक अजब चीज, जणूं तिच्यांत कांहीं दैवी जादू भरली आहे, ती भौतिकवृत्तिपर नसून आध्यात्मिक वृत्तिदर्शक अथवा स्थितिदर्शक आहे, ह्या वर्णव्यवस्थेच्या गुरुस्थानीं ब्राह्मण हे अगदीं मुळापासून होते, व ते अद्यापि तसेच आहेत; क्षत्रिय आणि वैश्य, हे वर्ण त्यांच्या तुलनेनें हीन दर्जाचे आहेत इतकेंच नव्हे तर ब्राह्मणांपासून रक्तानें व वृत्तीनें (मग ती वृत्ति भौतिक असो वा आत्मिक असो) हे प्रथमपासूनच अलग आहेत, ह्या व अशा इतर कल्पना आमच्या अवाढव्य देशांत बद्धमूल झाल्या आहेत व आमच्यांतील अनेक पुरातन मिश्र संस्कृतीमुळें, किंबहुना ख-या संस्कृतीच्या अभावामुळें अशा ह्या अनैतिहासिक कल्पनांना अगदीं सोवळें धार्मिक स्वरूप प्राप्त झालें आहे. ह्यामुळें विशेषतः धार्मिक अथवा सामाजिक विषयावर तात्त्विक विचार करावयाचा झाल्यास आमच्या देशांत खरे अधिकारी पुरुष विरळाच सांपडतील. आर्यांशिवाय द्राविड नाग, मुद्गल (मोगल) इत्यादि अनार्य वंश आर्यांच्या पूर्वीं अथवा मागून ह्या देशांत आले किंवा आले होते; व ते कित्येक बाबतींत आर्यांहून जास्त, तर कित्येक बाबतींत आर्यांहून उच्चतर अथवा सुसंस्कृत अशा स्थितींत होते. अथवा शक, पल्लव, जाठ इत्यादि वंश आर्यांच्या घरींच राहणारे, किंबहुना तदंगभूतहि असतील असा संभव आहे; ह्यामुळें हिंदी आर्यांचा प्रदेश कल्पनेनेंहि नक्की रेखाटतां येत नाहीं. मग वस्तुतः निश्चित करण्याचें धैर्य इतिहासाचा गंधहि ज्यांना नाहीं, त्यांच्याशिवाय इतरांस होणें शक्य नाहीं. आर्यांची व्याप्ति निश्चित ठरवितां आली, तरी रक्तानें अस्सल आर्य हिंदुस्थानांत आज शंभरांतच नव्हे तर हजारांत तरी एक नेमका निवडून काढतां येईल कीं नाहीं, ह्याची शंका आहे. रक्तानें आर्य कोणास म्हणतां येईल, हें ठरविणें ज्यांना हल्लींचें मानववंशशास्त्र माहीत नाहीं त्यालाच सोपें जाईल. अशीं अज्ञानी धन्य माणसें आपल्यास आर्यच काय, तर ब्राह्मण अथवा क्षत्रिय ही पदवी छातीवर हात ठेवून स्वीकारण्यास लाखानेंच नव्हे तर कोटिशःहि पुढें येतील. आणि ह्या अनैतिहासिक चढाओढीस शंकराचार्य म्हणविणारे, ज्ञानी डोळे झांकून हातभार लावतील ह्यांत कांहीं आश्चर्य नाहीं. आश्चर्य आहे तें हे कीं, इतिहासकार म्हणविणारीं कांहीं मोठमोठीं धेंडें ह्या भानगडींत आजवर पडत आलीं आहेत. फार तर काय, प्रसिद्ध पंडित शिरोभूषण भाषाशास्त्र पारंगत मॅक्स मुल्लर हे जर आज जिवंत होऊन आर्य कोण, अनार्य कोण हे ठरवूं लागले, तर केवळ भाषांच्या अनिश्चित पुराव्यावरूनच त्यांनीं ज्यांचें आर्यानार्यत्व ठरविलें तें प्रस्तुत मिळणा-या इतर पुराव्यावरून अबाधित ठेवतील कीं नाहीं ह्याची वानवाच आहे !
मानव वंशांविषयीं सिद्धान्त ठोकून देणें दिवसेंदिवस इतकें कठीण होत चाललें असतांहि आमच्या देशांतील विशेषत: आमच्या महाराष्ट्रांतील कांहीं इतिहास संशोधक कित्येक जातींच्या उगमाविषयीं बिनधोक सिद्धान्त प्रसिद्ध करीत आहेत; आणि अशा शोधकांत राजवाडे ह्यांची गणना होत आहे ह्याचें आम्हांस आश्चर्य वाटत आहे. बरेच परिश्रम करून ही मराठ्यांची पूर्वपीठिका ठरविण्यांत त्यांना पूर्ण यश आलें आहे असें आम्हांस वाटत नाहीं. मराठे हे मूळचे फार प्राचीन काळीं हिंदुस्थानाबाहेर राहणारे व पुष्कळ दिवसांपूर्वीं फिरत फिरत दक्षिणेंत येऊन वसाहत करून राहिले, किंवा मूळचे दक्षिणेंतच राहणारे ही देखील सहजासहजीं ठरवितां येण्यासारखी गोष्ट नाहीं. भाषाशास्त्राचा पुरावा गणनेंत न घेतला, तरी शरीरमापनशास्त्र आणि पुरातन वैवाहिक चालीरीती कांहीं अशा सर्वत्र आढळतात कीं, कदाचित् ते दक्षिणी द्रविड असतील, अशी शंका घेण्यास जागा मिळते. देवकांची चाल, मातुल कन्येशीं विवाह वगैरे गोष्टींत त्यांचें दक्षिणेंतील इतर द्रविडांशीं साम्य आढळतें; पण इतर पुष्कळ गोष्टींत ह्यांचें शकांशीं विशेषतः पल्लवाशीं फार साम्य असल्यामुळें हे बाहेरून येऊन येथील द्रविडांत मिसळले असावेत, असा अधिक संभव आहे. हे लोक क्षत्रिय आहेत ह्यांत शंका नाहीं. वंशदृष्ट्या शकांचा आर्यांतच समावेश होत असल्यानें ह्या मुद्यावर म्हणण्यासारखा मतभेद माजविला नाहीं तर तूर्त चालवून घेतां येईल. पण मराठ्यांना दक्षिणेकडील क्षत्रिय कल्पून ते उत्तरेकडील क्षत्रियापेक्षां दर्जानें हीन आहेत, अशी राजवाड्यांनीं आपली भावना करून मराठ्यांवर इतिहासकाराला न शोभण्यासारखी जी आग पाखडली आहे, ती मात्र प्रमाणाबाहेर आहे. रावबहादूर चिं. वि. वैदयांनीं “मध्ययुगीन भारत, भाग २ रा परिशिष्ट ५” ह्या आपल्या नवीन ग्रंथांतील भागांत राजवाड्यांची ही चूक दुरुस्त करण्याचा जोराचा प्रयत्न केला आहे. त्याकडे वाचकांना हवाला देऊन तूर्त काम भागण्यासारखें आहे. दक्षिणेकडील क्षत्रिय जे मराठे त्यांच्यांतहि पुनः महाराष्ट्रिक, बिराटे, आणि रट्टे जे आहेत, ते परस्परांहून भिन्न आहेत, असा राजवाडे ह्यांनीं शेरा दिला आहे. त्यासंबंधीं वैद्यांनीं ज्याअर्थीं कांहींच उल्लेख केलेला नाहीं, त्याअर्थीं ह्या मुद्यांचा जास्त विचार करणें जरूर आहे.

  1. राजकीय स्वरूप
  2. मूर्तिकार ब्राह्मणच!
  3. मुख्य मुद्दा
  4. मुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें
  • 57
  • 58
  • 59
  • 60
  • 61
  • 62
  • 63
  • 64
  • 65
  • 66
Page 62 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी