1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मराठ्यांविरुद्ध आगळीक

गेल्या अंकांत आम्हीं रा. राजवाड्यांचे इतिहाससंशोधक ह्या पदवीला न शोभणारे कांहीं दोष दाखविले. मानवी इतिहासांतील अमुक एक संस्कृति दुसरीहून श्रेष्ठ आहे, अमुक एक धर्म इतरांहून श्रेष्ठ आहे किंबहुना एकाच देशांतील अमुक एक जाति अथवा उपजाति तिच्या समकालीन व समानशील दुस-या जातीहून अथवा उपजातीहून बरी किंवा वाईट आहे म्हणून वाक्तांडव करणें हें इतिहाससंशोधकाचें मुळींच काम नव्हे. पण ह्या फंदांत पडण्याची राजवाड्यांना आनुवंशिक खोड लागली आहे, हा त्यांचा सामान्य दोष आहे. रा. चिं वि. वैद्य ह्यांनीं संशोधनाहून अधिक श्रेष्ठ दर्जाचें म्हणजे इतिहास लिहिण्याचें अथवा ऐतिहासिक मीमांसा करण्याचें काम स्वीकारूनहि त्यांनीं जो उपद्व्याप केला नाहीं, तो ह्या संशोधकानें चालविला आहे; म्हणून अशा अनाठायीं उपद्व्यापांचा वेळींच निषेध करणें आमचें कर्तव्य आहे. रा. वैद्य देखील अमुक कोणी आर्य म्हणून श्रेष्ठ व इतर कोणी अनार्य म्हणून कनिष्ठ, अमुक जाति क्षत्रिय व इतर शूद्र वगैरे ठरविण्याच्या अनैतिहासिक भानगडींत गुरफटलेले दिसून येतात. तरी त्यांच्यांत एक प्रकारची जी प्रशंसनीय समोतल वृत्ति व प्रामाणिक जाबाबदारी दिसून येते ती राजवाड्यांच्या गांवींहि नाहीं. त्यामुळें, उपरिनिर्दिष्ट सामान्य दोषांहूनहि विशेष निषेधार्ह अशा कित्येक घोडचुका त्यांनीं आपल्या प्रस्तावनेंत केल्या आहेत. त्यांपैकीं पहिली ही कीं, महाराष्ट्रांतील मराठे व कुणबी ह्यांमध्येंच त्यांनीं भिन्नता कल्पून स्वस्थ न राहतां, महारट्टे, विरट्टे आणि रट्टे इ. मराठ्यांमध्येंच एक प्रकारचा उच्चनीच भाव निर्माण करून सर्व मराठा समाज हा हीन क्षत्रिय, अराष्ट्रीय १६०० वर्षें परतंत्र राहिलेला अतएव नादान आहे असें ठरविण्याचा प्रयत्न केला आहे.
गोदावरी कांठावरील मराठे महारठ्ठे म्हणवितात व तुंगभद्रेवरील लोक आपल्यास नुसते रठ्ठे किंवा रड्डी म्हणवितात येवढ्यावरूनच त्यांच्या मूळ दर्जांत भिन्नता मानण्याची आम्हांस मुळींच आवश्यकता दिसत नाही. हल्लीं ब्रिटिश सरकार एखाद्य जमीनदारालाहि “महाराज” बनवीत आहेत व तंजावराकडील श्री शहाजीच्या वंशजांनाहि ते राजे म्हणावयालाहि कांकूं करीत आहेत. म्हणून येवढ्याशा उपपदावरून वंशदृष्ट्या दरभंग्याचे ब्राह्मण महाराज तंजावरच्या हल्लींच्या क्षत्रिय शिवाजी राजाहून वरिष्ठ आहेत असा सिद्धान्त ठोकून देण्याला राजवाडे तयार होतील काय? “वर्णानां ब्राह्मणो गुरुः” ह्या न्यायानेंच जर दरभंग्याचे महाराज दर्जानें श्रेष्ठ ठरतील म्हणावें, तर पूर्णावतार गणलेल्या क्षत्रिय श्रीकृष्णाहूनहि त्याचा एखादा ब्राह्मण पाणक्याहि श्रेष्ठच मानावा लागेल; महारठ्ठे आणि रठ्ठे ह्यांच्या दरम्यान विराठे हा एक तिसरा भेद राजवाड्यांनीं आपल्या व्युत्पत्ति सृष्टींतून नवीनच निर्माण केला आहे. कारण काय, तर वाईला विराटनगरी असेंहि कोणी म्हणत असत आणि तेथें जवळपास विराटगड म्हणून एक डोंगर आहे ! एवढा शोध केल्याबरोबर त्यांना असा संशय येऊं लागला कीं विराटे व बेरड हे एकच असतील ! काय हें राजवाड्यांचें भाषाव्युत्पत्तिशास्त्रावरील प्रभुत्व !! ह्यावरून पांडवांचा व्याही विराट हाहि एक बेरड ठरला म्हणावयाचा ! फार तर काय, पुरुषसूक्तांतील विराट् पुरुष हाहि एका प्राचीन बेरडांच्या टोळीचा नायकच होता म्हणावयाचा ! बेरड ह्या शब्दाची खरी व्युत्पत्ति येणेंप्रमाणें आहे. हा कानडी शब्द मूळ बेडरू अथवा ब्याडरू असा अनेकवचनी आहे. त्याचें एकवचन ब्याड असें आहे. तो संस्कृत व्याध शब्दापासून किंवा तेलगू पेड म्हणजे महार अथवा मोठा (उरीया बोडो; संस्कृत ब्रहत् मोठा म्हातारा, जुना) ह्यापासून आला असला पाहिजे. तें कांहीं असो. विराट आणि बेरड ह्या दोन शब्दांचा मुळींच कांहीं संबंद नाहीं, हें राजवाड्यांनीं कानडी भाषेकडे यत्किंचितहि लक्ष पुरविलें असतें तर समजून आलें असतें. रड्डी हे आज एक हजाराहून अधिक वर्षें महारठ्यांहून अलग झालेले आहेत; त्यांची भाषा कानडी किंवा तेलगू, तर महरठ्यांची मराठी; जैन धर्मांतून रड्डी हे लिंगायत धर्मांत गेले आहेत; तर महारठ्ठ बुद्ध धर्मांतून शैव धर्मांत गेले आहेत. इत्यादि महत्त्वाच्या घडामोडीमुळें ह्या दोघांत आतां पुष्कळ फरक दिसून येणें साहजिक आहे. तरी पण राजवाड्यांसारख्या शोधकाला त्यांचें मुळांतलें निरतिशय साम्य स्पष्ट दिसूं नये हें आश्चर्य होय. असले नसते भेद दक्षिणेकडील क्षत्रियांत त्यांनीं रचिले आहेत, इतकेंच नव्हे तर, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, पल्लव इत्यादि अनेक शतकें दक्षिणेंतच वसाहत करून राहणा-या राजवटींतील मराठ्यांच्या विशिष्ट घराण्यांना केवळ आपल्या भिंवईची भीति घालून, बिचा-या इतर सामान्य मराठ्यांच्या पंक्तींतून उठवून निराळ्या पाटांवर बसविलें आहे. नागपूरच्या आजच्या जिवंत राजे भोसल्यांनीं डॉ. कुर्तकोटींच्या शापाला भिऊन आपला दर्जा घालविला, तर आमच्या ह्या हजारों वर्षांपूर्वींच्या स्मृतिशेष राजघराण्यांनीं राजवाड्यांच्या कृपाप्रसादानें उत्तम क्षत्रियत्वाचा मान मिळविला ! कोण हे कुर्तकोटी आणि राजवाडे ह्यांमधील अंतर !!
आम्ही खालील कोष्टकांत पंधरा निवडक राजवटींतील घराण्यांची तपशीलवार माहिती देतों. ह्या सर्व घराण्यांत पिढ्यानपिढ्या रोटीव्यवहार तर काय, पण बेटीव्यवहारहि झालेले ऐतिहासिक दाखले आहेत. ह्या सर्व घराण्यांनीं राजवैभव भोगिलें आहे. इतकेंच नव्हे तर कांहींनीं पातशाही गाजवून, कांहींनीं तर नर्मदेच्या पलीकडील मोठमोठ्या नामांकित उत्तर क्षत्रियाचीं सिंहासनें कैक वेळां पालथीं घातलीं आहेत. ह्यांचे शरीरसंबंध उत्तरेकडील क्षत्रियांशींच नव्हे तर दक्षिणेकडील साधारण साधारण मराठ्यांशीं केव्हां प्रत्यक्ष तर केव्हां पर्यायानें, झाले असले पाहिजेत. प्रत्यक्ष राजांच्या परस्पर विवाहाचे दाखले इतिहासांत जसे मिळतात तसे त्यांचे किंवा त्यांच्या नातलगांचे दाखले मिळविणें सोपें नाहीं;  तरी अशा दाखल्यांच्या अभावावरूनच ह्या राजघराण्यांचा वंशदृष्ट्या दर्जा इतर मराठ्यांहून श्रेष्ठ मानणें हें मराठा समाजाला तरी खपणार नाहीं. इतकेंच नव्हे तर असला भेद राजघराण्यांनाहि रुचणार नाहीं. चालुक्य, राष्ट्रकूट इ. ज्यांनीं ज्यांनीं राज्यें मिळविलीं तेवढेच राष्ट्रभक्त व श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ व अराष्ट्रीय ठरविणें, हा कोठला न्याय? श्री शिवाजीला स्वराज्य संपादण्यांत यश मिळालें नसतें, तर तेहि कनिष्ठच ठरले असते ना? ह्यांनीं किंवा इतरांनीं जें यश संपादिलें तें काय एकएकट्यानें संपादिलें किंवा आपल्या समानशील जातभाईंच्या जोरावर मिळविलें? हीं चार दोन घराणीं वगळलीं असतां बाकीं सर्व मराठा समाज पोटावारी भाडोत्री लढणाराच ठरतो काय? आणि असे पोटाची खळगी भरणारे उत्तरेकडील क्षत्रियांत नाहींत किंवा नव्हते काय? ज्या मराठा समाजानें जवळ जवळ दोन हजार वर्षें राजवैभव भोगिलें, आणि मध्यंतरी आलेली मुसलमानांची लाट परतवून स्वराज्यहि स्थापिलें, त्यांच्यांतील पुढा-यांना तेवढे निवडून श्रेष्ठ मानणें आणि त्यांच्यांतील अनुयायांना पारतंत्र्याखालीं चिरडलेले असें समजून कनिष्ठ मानणें, हा शुद्ध विपर्यास आहे. अशानें कोणाची फसगत होण्याचा संभव नाहीं.


(कोष्टका साठी येथे क्लिक करा)

 

आडनांव अपभ्रंश अथवा पर्याय वंश गोभ देवक राजधानी
१.स्वातिवाहन शातिवाहन सातव, शालिवाहन सालव? शेष कौंडिण्य पैठण
२ चोळ  कांची, सेलम
३ गंग गोंक, कंक, निकम सूर्य मानव्य म्हैसूर
४ चालुक्य चाळके, साळुंखे सूर्य चंद्र काश्यप वसिष्ठ कमळ, साळुंखीचें पीस वातापि, धनकटक
५ राष्ट्रकूट राठोड सूर्य चंद्र कौशिक, अत्रि, गौतम मर्यादवेल, शंख मान्यखेट, मालखेड
६ पल्लव पालव, सालव सूर्य भारद्वाज कळंब कांची
७ यादव जाधव सोम कौंडिण्य कळंब, पांच पालवी देवगिरी
८ भोज भोय, होयसळ, भोइरे, भोइटे, भोसले सूर्य वसिष्ठ शालंकायन शंख, रूई सातारा, कोल्हापूर, मुधोळ, म्हैसूर
९ काळभ्र कळभूर्य, काळभोर, कलच्छुरी चंद्र त्रिपुर, मदुरा
१० सेंद्रक सिंधु, शिंदे, छंद सूर्य शेष कौंडिण्य कळंब, रूई, अगाडा छिंदवाडा, कलादगी
११ शिलाहार शेलार सोम दाल्भ्य कमळ कोल्हापूर
१२ सात्वत सांवत, सातपुते सोम कौंडिण्य सांवतवाडी
१३ परमार पवार सूर्य भारद्वाज कळंब फलटण
१४ कदंब कदम सूर्य भारद्वारज हळद गोंवें, बनवासी
१५ मौर्य मोरे सोम बृहदश्वा मोराचें पीस जांवळी

वरील पंधरा नांवें आणि त्यांचे अपभ्रंश आजकालच्या सामान्य मराठ्यांत सर्रास आढळतात. ह्याशिवाय मराठ्यांत अद्यापि कितीतरी सुप्रसिद्ध आणि तेजस्वी घराणीं आढळतील कीं ज्यांनीं, सरदा-या, सरंजाम, जहागि-या मागें उपभोगिल्या आहेत व आतांहि उपभोगीत आहेत. ह्यांपैकीं कित्येक घराणीं पूर्वीं नुसत्या देशमुख्या, पाटीलक्या करून हल्लीं तीं राजपदारूढ झालीं, तर ह्याच्या उलट कांहीं उच्च पदावरून उतरून आतां नुसते नांगराचे धनी बनले आहेत. पुष्कळ वेळां आपापसांत युद्धें करून वैभवाचा नाश करून घेतला आहे, तर पुष्कळ वेळां आपल्या हाडवै-यांशीं जूट करून त्याहून अधिक जबरदस्त अशा तात्पुरत्या संकटांतून आपला निभाव करून घेतला आहे; आणि जरी यदाकदाचित् बादशाही दरबारांतील वजन मराठ्यांच्या हातून गेलेलें दिसलें, तरी थंड देशांत ज्याप्रमाणें वरती बर्फाचें दाट आवरण पडलें असूनहि त्याचेखालीं पिकें सुरक्षित वाढत असतात, त्याप्रमाणें डोक्यावरील बादशाही छत्राची कशीहि क्रांति होवो, महाराष्ट्रांतील मराठ्यांच्या स्थानिक स्वातंत्र्याला कायची मूठमाती कधींच कोणाला देतां आली नाहीं. ह्याचें कारण मराठा म्हणजे केवळ आपल्या तलवारीवरच अवलंबून राहणारा अन्योपजीवी प्राणी नसून, त्याच्या आड जर कोणी येईल तर तो कांहीं काळ नांगराचा फाळ मोडूनहि त्याची तलवार करून आपलें स्वत्व व आपला इतिहास राखील असा आहे. ह्या गुणांत जसा गोदेच्या कांठचा महरठ्ठा, तसाच तुंगेच्या कांठचा रड्डीहि कोणास हार जाणार नाहीं. कलकत्ता युनिव्हर्सिटीचे प्रो. सेन ह्यांनीं मराठ्यांची राज्यपद्धति “Administrative system of the Marathas” ह्या नांवाचा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यांतील Village System ह्या भागांत अशी स्पष्ट कबुला दिली आहे कीं, “मराठा शेतकरी हा बंगाल्याप्रमाणें ज्या पायाची लाथ बसली तो पायच पुनः चाटण्यास तयार असणारा भ्याड प्राणी नाहीं. पेशव्यांचें राज्य काबीज झाल्यावर जे युरोपिअन अंमलदार शेतावर जात त्यांच्याशीं खेडवळ मराठेहि दिलदार आणि स्वतंत्र बाण्यानें आपला आब राखून कसे वागत ह्याचें प्रत्यक्ष एलफिन्स्टनहि फार कौतुक करीत असे.” पान १७९ वर एलफिन्स्टनच्या शब्दांतच त्याचा खालील अभिप्राय दिला आहे. These (Village) communities contain in miniature all the materials of a state within themselves and are almost sufficient to protect their members if all other Governments were withdrawn. “खेड्यांतील पाटलाचें राज्य म्हणजे एक आपल्यापुरतें लुटुपुटीचें संस्थानच असे. वरील सरकार जरी लयास गेलें तरी हें संस्थान आपलें रक्षण करून घेण्यास समर्थ असे.” पण आमच्या संशोधकांस ह्या हाडींमाशीं खिळलेल्या स्थानिक स्वातंत्र्याची कांहीं किंमतच नाहीं. ज्यानें उठावें त्यानें अटकेवर घोडा नाचवावा, तरच तो स्वतंत्र; मग त्यांत दुस-याच्या स्वातंत्र्याची आहुति पडली, किंबहुना आपल्या शेजा-यांची व स्वकीयांचीहि आबाळ झाली तरी बेहेत्तर ! अशा अपद्रवी दिमाखखोर कर्झनशाहिपेक्षां आपल्या पायांवर उभारून आपली पगडी तोलून धरणा-या गणराज पद्धतीची किंमत बंगाल्यांनीं व युरोपिअनांनीं वाखाणावी आणि आमच्या स्वकीय इतिहाससंशोधकांनीं मात्र तिला हेटाळावें ह्याचें इंगित काय? गणराज पद्धतीचा पाया बळकट बसल्याशिवाय साम्राज्यपद्धतीची इमारत तिच्यावर उठविणें शक्य नाहीं. दक्षिणेंतील मराठ्यांनीं म्हणजे सर्वसामान्य मराठा समाजानें (केवळ शहाजी-शिवाजी अशा अपवादांनींच नव्हे) ह्या गणराज पद्धतीचा पाया सह्याद्रीच्या कणखर पाठीच्या कण्यावर बसविला. इतकेंच नव्हे तर त्या पायावर वरील कोष्टकांत दाखविलेल्या मराठे घराण्यांनीं मोठमोठीं राज्यें व साम्राज्यें स्थापिलीं. चालू सहस्त्रकांत जसा मराठ्यांचा दरारा आहे तसा किंबहुना त्याहूनहि जास्त गेल्या सहस्त्रकांत दक्षिणेंतील मालखेड्याच्या राष्ट्रकूट ऊर्फ राठोड्याचा दरारा अखिल भारतांत होता, हें रा. वैद्य विस्तारानें व अभिमानानें एकपक्षीं प्रतिपादितात; तर दुसरे पक्षीं राजवाडे मराठ्यांना नादान ठरवितात ! राजवाड्यांनीं आपला कावा साधण्यासाठीं रट्टे हे दक्षिणेंतील अधम क्षत्रिय आणि राठोडे मात्र उत्तम क्षत्रिय असें ठरविलें आहे; तर वैद्यांनीं आपल्या मध्ययुगीन भारतांत सर्व मराठ्यांना एकजात उत्तम क्षत्रिय ठरविलें आहे. इतकेंच नव्हे तर परवां ‘केसरी’ पत्रांतून मराठे हे क्षत्रियच आहेत असें रा. वैद्यांनीं पुन: आपले सिद्धान्त प्रसिद्ध केले आहेत. ह्या दोघां चितपावन ब्राह्मणांतच अशी लठ्ठालठ्ठी सुरू झाली आहे हें काय मराठ्यांचें भाग्य कीं दुर्भाग्य ! आपल्या मतें पिसें | परी तें आहे जैसें तैसें || हें तुकोबांचें म्हणणेंच खरें ! दुसरें काय !!

मराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं

मराठ्यांतील प्रसिद्ध राजघराणीं (PDF साठी वर क्लिक करावे)

वरील नांवांचीं प्रतिष्ठित राजघराणीं महाराष्ट्रांत व खालीं दक्षिण हिंदुस्थानांत गेल्या दोन हजार वर्षांत लहानमोठी राजसत्ता गाजवून गेलीं आहेत. त्यांच्यांत परस्पर शरीरसंबंध झालेले शिलालेखी पुरावे आहेत. हीं सर्व नांवें आजच्या मराठ्यांत राजरोस आढळतात. तरी वंशदृष्ट्या ते परस्परांपासून कितीतरी भिन्न आहेत. सातव, साळवी, शिंदे हे नागवंशी, तर साळुंके, राठोड, पवार हे सूर्यवंशी; जाधव, शेलार, मोरे हे सोमवंशी; शेलार, शेळके हे धनगरहि आणि अहीर हे गवळीहि आहेत. चोळ हे द्रावीड, तर गंग हे मोगल असावेत. गाँग-डोकें, शिरोभाग असा तिबेटी आणि ब्रम्ही शब्द आहे. गंगा हें नदीचें नांव ह्याच शब्दापासून असावें. चोळ शिवायकरून बाकी सर्व उत्तरेकडून खालीं दक्षिणेंत आले असावेत असा अंदाज आहे. धारशिवाय सर्व राजधान्या गोदावरीच्या दक्षिणेस दंडकारण्यांत व त्याच्याहि खालीं आहेत. ह्या बहुतेकांच्या भाषा कानडी, तेलुगू किंवा तामीळ ह्या द्राविडी आणि सर्व चालीरीति तशाच होत्या. कारण मराठीचा उत्कर्ष होण्यापूर्वींच राजकीयदृष्ट्या ह्यांचा अपकर्ष होऊन चुकला होता. कांचीचे पल्लव (पालवे) हे पार्थ ( Parthians ) = पेहेल्लव असावेत असा आजमास आहे. कुंतल देशांतील कुरुंब (कुरुब) म्हणजे धनगर राजघराण्याशीं व धनकटक (गुंटूर जिल्हा) येथील चालुक्य सम्राटांशीं पल्लव घराण्याचे शरीरसंबंध होत असत असा पुरावा डॉ. भांडारकरांनीं दिला आहे. ह्या सर्व गुंतागुंतीवरून मराठ्यांची पूर्वपीठिका अचूक ठरविणें जवळजवळ अशक्यच  असा भास झाल्यास नवल काय?
वर जो सूर्य, चंद्र इत्यादि वंशांचा उल्लेख आला आहे, त्या त्या वंशाचा संबंध सांगूनच हें प्रकरण संपत नाहीं. ह्या सर्व भौतिक वस्तूंचा अथवा देवकांचा प्रदेश मराठ्यांच्या आडनांवांत झालेला अद्यापि आढळत आहे. मराठ्यांत सुर्वे, सोमवे, नागवे अशीं उपनांवें आहेत. तीं सूर्यवंशे, सोमवंशे, नागवंशे ह्या शब्दांचे अपभ्रंश असावेत, किंवा सुरवसे, सोमवसे अशी जीं दुसरी नांवें आहेत तीं सूर्यवंशी, सोमवंशी (सुरवंसे, सोमोसे) इत्यादींचे अपभ्रंश असून सुर्वे, सोमवे, नागवे, हे सूर्यवाहन इत्यादींचे अपभ्रंश असणें अधिक संभवनीय आहे. शालिवाहन, शातवाहन ह्यांचे अपभ्रंश साळवे, सातव, असे आढळतात, त्यांवरून ही दुसरी व्युत्पत्ति अधिक संभवनीय दिसते. सुर्वा, सातवा, साळवा ह्या एकवचनांचीं सुर्वे इत्यादि अनेकवचनी रूपें आतां प्रचारांत आहेत हें उघड आहे. देवकांचें चिन्ह अथवा चित्र निशाणावर असणें हें आतां आणि पूर्वींहि प्रसिद्धच आहे. प्राचीन चालुक्यांच्या निशाणावर वराह, तर आतांच्या इंदूरच्या होळकरांच्या निशाणावर बैल, आणि ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या ध्वजस्तंभावर शेष आढळतो. इतकेंच नव्हे तर इंग्लंड, जर्मनी आणि रशिया ह्यांच्या ध्वजांवर अनुक्रमें सिंह, गरुड आणि अस्वल हीं दिसतात; आणि जपानची बादशाही सूर्यवाहन ऊर्फ सुर्वे आहे !
राठोड ह्याची व्युत्पत्ति राष्ट्र + कूड = राठ + उड = राठोड असें वर सांगितलें; आणि असा एक रट्टांचा संघ असावा असें अनुमान निघतें असें आम्ही वर म्हणालों. त्याचप्रमाणें नलावडे, नायकोडे, गाइकवाड अशींहि आडनांवें प्रसिद्ध आहेत. नायकोडे हा मूळ नाग + वाड = नाकोड, किंवा नाक + कूड = नाकोड असा प्रयोग झालेला असावा. वाड हा शब्द राजपुतान्यांत मारवाड = मरु+वाड, मेवाड = मध्यवाड, ह्या देशवाचक आणि मेरवाड ह्या जातिवाचक नांवांत आढळतो. कर्नल टॉडनें आपल्या राजस्थानची बखर ह्या ग्रंथांत भाग १ ला, पान १२५ वर रजपूत वैश्यांच्या ज्या ८४ जातींची यादी दिली आहे त्यांपैकीं ३५ जातींच्या नांवाचा शेवटचा भाग वाळ असा आहे. जसें, ओस्वाळ, भागेरवाळ, दिसवाळ, पुष्करवाळ, दोहिळवाळ इत्यादि. हा वाळ शब्द आणि वरील वाड शब्द हे दोन्ही मुळांत एकच आहेत. ह्यावरून नलवडे, नायकोडे हे देशी मराठ्यांचे संघ असावेत असें दिसतें. नायक हा शब्द मूळ नाग किंवा नाक असा असून त्याचें पुढें नायक असें संस्कृतीकरण झालें आहे. नल लोकांचे राष्ट्र हल्लींच्या कर्नूल जिल्ह्याच्या आसपास कृष्णा व तुंगा ह्या नद्यांच्या संगमाजवळ प्राचीन काळीं होतें. नळ ह्या नांवाचा डोंगर आतां तेथें आहे. त्याचें नांव ह्या लोकांच्या नांवावरूनच पडलेलें दिसतें. रामायणांत नळ, नीळ, जांबुवंत ह्या वानरांच्या जाती होत्या असा उल्लेख आहे. आतां, नळगिरी, नीळगिरी अशीं नुसतीं डोंगरांची नांवें उरलीं आहेत. ह्यावरून हीं प्राचीन आर्येतर राजकुलें किंवा राजकारणी राष्ट्रें असावींत; ह्यांनीं आर्यांच्या दक्षिणेकडील वसाहतीचे बाबतींत मोठी मदत केलेली असावी. रट्टवाड किंवा रट्टकूड ह्यांच्या प्रमाणेंच नलवडे आणि नायकोडे ह्यांचे निराळे संघ असावेत. रड्डी हें जातिवाचक नांव मद्रासकडे आडनांवाच्या रूपानेंहि आढळतें. सर्वांत मोठा चमत्कार हा कीं, रट्टी हें आडनांव इटालियन लोकांतहि आढळतें. रोमचा पोप ११ वा पायस ह्याचें पूर्वाश्रमींचे नांव अबेटा अकिली रट्टी असें होतें ! असा हा नांवांचा गोतवळा दीर्घसूत्री आहे !!

मराठेतर कोण ?

‘विजयी मराठा’कारांनीं गेल्या अंकीं ब्राह्मणेतर कोण ह्या प्रश्नाची मीमांसा केली आहे. आतां मराठेतर कोण ह्या विषयावर मीं माझे विचार प्रसिद्ध करावेत असा त्यांचा आग्रह आहे. आणि ह्यासाठीं गेल्या केसरींतील रा. बामणगांवकर त्यांचा मराठेतर हिंदू हा लेख मजकडे पाठविला आहे. हा लेख पाहिल्यानंतर ह्यांतील बरेच विचार मला पसंत आहेत. परंतु मी जर माझे निर्भीड विचार प्रसिद्ध करीन तर त्यांतील कांहीं भाग माझे मित्र बामणगांवकरांना पसंत पडणार नाहीं, तर कांहीं भाग स्वतः वि. मराठाकारांनाहि कदाचित् रुचणार नाहीं. पण राजकारणांतील विचार एका सख्ख्या भावाचेहि जर दुस-यास पटत नसतात, मग माझेच तेवढे सर्व विचार इतरांस पटतील अशी आकांक्षा मीं कां बाळगावी ? बामणगांवकर किंवा वि. मराठाकार हे जसे माझे मित्र आहेत तसेंच ब्राह्मणांतहि माझे पुष्कळ जिवलग मित्र आहेत. मतभेद होतात ते केवळ विचार चुकल्यानें होतात किंवा वाईट हेतूमुळेंच होतात असें नसून दृष्टीचा ठाव बदलल्यामुळेंहि होतात, हें जर खरें असेल तर एकाच विषयाकडे पाहावयाचें झाल्यास निरनिराळ्या माणसांनीं दृष्टीचा ठाव बदलून पाहिल्यास सत्य लवकर दिसूं लागतें, हें मित्रांना सांगणें नको. अमित्रांना, त्यांचें स्वतःचेच विचार जरी कोणीं बोलून दाखविले तरी ते वादच वाढवतील. अशासाठीं प्रयत्न नाहीं. ज्या राष्ट्रीय पक्षाकडे माझा स्वतःचा ओढा आहे, त्यांतच रा. बामणगांवकर तूर्त वावरत आहेत. फरक इतकाच कीं मी कोणत्याच पक्षाच्या चाबकाला पाठ देण्यास तयार नाहीं-कारण कोणताच पक्ष अलिकडे एक वर्षभरहि एका ठिकाणीं उभा राहून आपल्या ध्येयांची साक्ष आपल्या वर्तनानें इतरांस पटविण्याची दगदग करीत नाहीं; रा. बामणगांवकर अशा स्थितींतहि, “राष्ट्रीय” पक्षांतच आपला मोक्ष अद्यापि शोधीत आहेत, ह्यावरून त्यांचा सत्यशोधकपणा माझ्यापेक्षां अधिक चिंवट आहे, हें मला कबूल करणें भाग आहे. तरी ते आपल्या सुंदर लेखाच्या पहिल्याच वाक्यांत “ब्राह्मण तेवढा वगळावा व अहिंदू तेवढा मिळवावा, ह्या अहिंदू वृत्तिपर पक्षाची प्रतिष्ठा झाली आहे” असें जें जगाला भासवीत आहेत त्या भासाला सर्व ब्राह्मणहि बळी पडतील कीं नाहींत, ह्याची मला शंका येत आहे. कारण माझे मित्र रा. अ. ब. कोल्हटकर ह्यांनीं स्वतः ब्राह्मण असूनहि जी ब्राह्मणेतरांसंबंधीं दृष्टि ठेवली आहे; तिच्यांत मला जास्त बाणेदारपणा दिसत आहे. श्री. अच्युतरावांनीं आपल्या ता. ३ एप्रिलच्या “चाबुकस्वारांत” ब्राह्मणेतर पक्षाच्या केवळ नांवाउलटच आक्षेप घेतला आहे; ध्येयाउलट मुळींच नाहीं. पुण्यांत जीं त्यांचीं सडेतोड भाषणें अलीकडे झालीं आणि विशेषतः प. लो. वा. छत्रपति आणि विद्यमान श्री. सयाजीराव महाराज ह्यांची प. लो. वा. टिळक व रानडे ह्यांच्याशीं त्यांनीं जी नुकतीच मार्मिक तुलना केली, तीं त्यांचीं भाषणें व तो ओजस्वी लेख ज्यांनीं वाचला असेल त्यांना असें खास दिसेल कीं, अच्युतरावांमध्यें आक्षेप घेण्यासारख्या ब्राह्मण्याचे जंतु आतां कांहींच शिल्लक उरले नाहींत. असल्या ब्राह्मणांना ब्राह्मणेतर पक्षांत येण्याला कांहीं अडथळा राहिला असेल तर तो त्यांच्या स्वतःचाच. पण नांवाची सबब सांगून कोल्हटकर अद्यापि दूर आहेत. तर बामणगांवकर मात्र स्वतः ब्राह्मणेतर असूनहि मराठा आणि मराठेतर ह्या नाजूक विषयांत गढले आहेत. असो. दोघांचा उद्देश स्तुत्य आहे, असें मला वाटत आहे. कोणत्याहि विषयासंबंधीं केवळ शुष्क निर्विकारपणा दाखवून स्वस्थ न राहतां, त्याबद्दल सहानुभूती दाखविल्याशिवाय त्याचें मर्म कळत नाहीं, हें रा. कोल्हटकरांनीं आपल्या खोल धोरणी स्वभावानें सिद्ध केलें आहे. ह्याचा दाखला ब्राह्मणेतरांबद्दलची त्यांची धडाडीची सहानुभूतीच होय. बामणगांवकरांची धडाडी कोल्हटकरांच्याहून रतीभरहि कमी नाहीं. उणीव आहे, ती केवळ निष्काम सहानुभूतीचीच. ती असती तर त्यांच्या प्रस्तुत लेखाच्या पहिल्याच घासांत असा मक्षिकापात झाला नसता. हिंदू असोत, अहिंदू असोत, ब्राह्मण जातीच्या अन्यायाला वैतागून ब्राह्मणेतर पक्ष जो आजकाल इतर सगळ्या जगाला कवटाळींत आहे, त्यांत जर कोणाची अधिक चूक होत असेल तर ब्राह्मणेतरांपेक्षां ती ब्राह्मणांचीच अधिक आहे असें वि. मराठाकारांनीं आपल्या गेल्या अंकांत दखविलें आहे. तें रा. बामणगावकरांनीं पाहावें. माझा प्रस्तुत विषय मराठेतर एवढाच आहे. म्हणून मी वि. मराठाकारांच्या विचारांची पुनरावृत्ति करीत नाहीं. तरी पण वि. मराठाकारांना मला एवढेंच जाणवावयाचें आहे कीं, जें पाप ब्राह्मणांनीं केलें म्हणून “ब्राह्मण” नांवाची एक नवीन अस्पृश्य जात ब्राह्मणेतर पक्षांनीं निर्माण केली आहे, तेंच पाप आजकालचे मराठे करूं लागले आहेत; म्हणून मराठेतर पक्ष लवकरच निघेल अशी जी धोक्याची सूचना रा. बामणगांवकर देत आहेत, तिचा सर्व मराठ्यांनीं आदरपूर्वक विचार करावा. जर तसा विचार करतील तर मजसारख्या
ति-हाइताला असल्या जातीजातींतील तंटे तोडण्याची रिकामटेकडी मध्यस्थी करण्याचें कारणच उरणार नाहीं.
रा. कोल्हटकर आपल्या वर निर्दिष्ट केलेल्या लेखांत म्हणतात, “ब्राह्मणेतर पक्षास “जरीपटका संघ” हें नांव आम्हीं मागें सुचविलें होतें. दे. भ. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनीं “बहुजन पक्ष” असें नांव ठेविलें होतें. पण नांव कोणतेंहि असो, सध्यांचें ब्राह्मणेतर हें निरर्थक नांव ह्या पक्षास शोभल नाहीं, व तें बदलण्याचा विचार ह्या बैठकींत होईल अशी आम्हांस आशा आहे.” ब्राह्मणेतर ह्या नांवाचा वीट देशभक्त बामणगांवकरांना पुढें येणार नाहीं ह्याची हामी ते देतील काय? मीं स्वतः जी बहुजन पक्ष अशी शब्दयोजना सहा वर्षांपूर्वीं केली ती केवळ एक पोकळ नांव प्रचारांत आणण्यासाठीं नव्हे; किंबहुना जातिभेदाचा मला स्वभावतःच वीट आला आहे, त्याचें केवळ प्रदर्शन करण्यासाठींहि नव्हे; तर केवळ जातींच्या पायांवरच एखादी चळवळ करूं गेल्यास आज नाहीं  उद्यां समंजस माणासांना तिचा वीट येणें क्रमप्राप्तच आहे, निदान क्षम्य तरी आहे असें मला तेव्हां वाटलें व अद्यापि वाटत आहे. शिवाय दुसरी एक मला ह्याहूनहि वाईट शंका येत आहे ती ही कीं, रा. बामणगांवकरांनीं अत्यंत सद्धेतूनें हें धोक्याचें शिंग फुंकलें आहे, त्याचें वारें कानांत शिरल्यामुळें कांहीं वांसरांनीं जर कदाचित् महाराष्ट्रांत मराठेतर पक्ष निर्माण केला, तर त्याचा प्रतिध्वनि लिंगायतेतर समाज ह्या रूपानें कर्नाटकांत उमटणार नाहीं ह्याची तरी हमी बामणगांवकर घेतील काय? नाहीं तर गणपतीची सोंड मागें लागल्यानें माकड निर्माण होऊन, तें बामणगावकरांच्या ह्या नवीन गेणेशोत्सावाचा बेरंग करील ! मग राष्ट्रवीर बामणगांवकरांनीं पुनः केसरीकडे धांव घेतल्यास कर्नाटकांतील लिंगायत बंधू आतांप्रमाणें स्वस्थ बसतील काय?
जातिवाचक राजकारण म्हणजे एक मनोरंजक आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ आहे. तो खेळ युरोपांत जशी सुधारलेलीं (?) राष्ट्रें ऊर्फ जाती आजवर खेळत आलीं आहेत, तसेंच मागासलेल्या हिंदुस्थानांतील जाती उर्फ राष्ट्रेंहि आज खेळावयाला लागलीं आहेत. ह्या खेळांस पाश्चात्यांनीं पौरस्त्यांस मुळींच हंसावयास नको. मग एतद्देशीयांनीं कां हंसावें बरें? हा मनुष्यस्वभावाच्या आंधळेपाणाचा बोधकारक खेळ आहे. ह्या खेळांत ज्या राष्ट्रावर अथवा जातीवर डाव येत असतो, त्याला एकट्यालाच वगळून बाकीच्या सगळ्या खेळगड्यांनीं तात्पुरतें एकत्र होऊन त्या बिचा-या आंधळ्याला जीव नकोसा करून टाकावयाचें असतें. ब्राह्मणेतर अहिंदूंना  तेवढेंच मिळवूं पाहतात, असें जें बामणगांवकर म्हणतात, त्यावरून त्यांनीं हा खेळ कधीं खेळला नसावा अशी शंका येत आहे. गेल्या दोन शतकांत नुसत्या युरोपांत जीं स्थानिक युद्धें झालीं, त्यांत हा डाव आळीपाळीनें इंग्लंड व फ्रान्स ह्या डोईजड राष्ट्रांवर जेव्हां येत असे तेव्हां बाकीचीं सर्व डोईजड न झालेलीं राष्ट्रें एकत्र होत असत. इंग्लंडचें किंवा फ्रान्सचें डोकें हलकें झाल्याबरोबर डाव बदलत असे. ह्या खेळाला मराठींत साधें बालबोध आंधळी कोशिंबीर हें नांव असून तिकडे “बॅलन्स ऑफ पॉवर” हें भपकेदार नांव असे. पण अर्थ एकच; आणि डाव अंगावर घेण्याचें कारणहि केवळ डोईजडपणाच ! गेल्या दोन चार शतकांत ह्याच कारणामुळें हा डाव ब्राह्मणांवर आला होता, तो आतां हातघाईवर आला आहे. न जाणो, उद्यां मराठ्यांवर आणि परवां लिंगायतांवरहि येईल. बामणगांवकरांनीं मात्र उगाच खेळांत घाई करूं नये, नाहींतर खेळांत रडी झाली ह्या सबबीवर ब्रिटिश एंपायर ऊर्फ मतलबी एंपायर भलत्यांचेच डोळे बांधतील व आपण मजा पाहतील.

ब्राह्मणेतर पक्ष निघण्यापूर्वीं सुमारें १० वर्षांमागें रा. विजयी मराठाकार मजकडे आले होते. तेव्हां मीं ह्या खेळाचें रहस्य सांगून म्हटलें होतें कीं, सावध न राहिल्यास हा डाव महाराष्ट्रापुरता तरी मराठ्यांवर येण्याच संभव आहे. विजयी मराठाकार हें विसरण्याइतकें बेसावध नाहींत. म्हणूनच कादचित् ते आजहि मजकडे आले असतील. असो. बामणगांवकर म्हणतात कीं महाराष्ट्रांत मराठा जात बहुसंख्याक आहे. गोष्ट अगदीं खरी आहे, पण डाव येण्यास बहुसंख्या हें कारण नसून डोईजडपणा हें कारण असतें. एरवीं ब्राह्मणांवर आज डाव कां आला असता? ते काय बहुसंख्यांक आहेत? इतकें कशाला? आज नर्मदेच्या दक्षिण देशांत जसा हा डाव ब्राह्मणांवर आला आहे, तसाच उत्तरदेशांत तो मुसलमानांवर आला आहे. मग ते काय बहुसंख्याक आहेत? मुळींच नसून, त्यांचें डोकें मात्र मतलबी एंपायरांनीं अगदीं जड करून सोडलें आहे, हेंच कारण होय. तशांत खिलाफतवाल्यांनीं तर त्यांना हरभ-याच्या झाडावर चढविल्यामुळें हें आधींच जड झालेलें डोकें त्यांच्या खांद्यावरून त्यांच्या पायांत येऊन, त्यावरच ते अलीकडे क्वेट्टा, कलबुर्ग, कलकत्ता येथें अडखळल्यानें रक्तबंबाळ होत आहेत. महाराष्ट्रांत ब्राह्मण रक्तबंबाळ होत नाहींत ह्याचें कारण ते रक्ताला फार भितात. त्यांचें डोकें कितीहि जड झालें तरी राजकारण हा केवळ एक शिळोप्याचा खेळ - क्वचितपक्षीं पोटाचा धंदाहि आहे, हें त्यास माहीत आहे. करमणुकीसाठीं – किंबहुना पोटासाठीं, प्रत्यक्ष उत्तमांग जें डोकें तेंहि गमावून घेण्याइतके कांहीं ब्राह्मण बेसावध नाहींत. फार झालें तर किर्र म्हणून ते हार खातील आणि फक्त एकदां डोळे बांधण्यास सांगतील.
ह्या डावांत मराठेतरांनीं मात्र केवळ आपण अल्पसंख्याक आहोंत याच सबबीवर बेसावध राहूं नये. त्यांनीं मराठ्यांच्याच मागें मागें धांवावें असेंहि मीं म्हणणार नाहीं. ब्राह्मणेतर पक्षाच्या चाबकाच्या जोरावर यांच्या रंगणांत फिरणारे मराठेहि जर तसें म्हणत नाहींत, तर माझ्यासारख्या स्वतंत्राला तरी म्हणण्याचें काय कारण? ह्या दृष्टीनें ह्या खेळाकडे पाहत असतां मला सर्वांत जास्त भीति वाटते, ती विनाकारण अस्पृश्य मानलेल्या माझ्या हिंदु बंधूंकरितांच होय. खरोखर पाहतां हिदुंस्थानांत हे “अस्पृश्य”च बहुसंख्याक आहेत. ह्यांचें डोकें कधींच जड झालेलें नाहीं. ह्यांच्याविषयीं मला जें वाईट वाटतें, तें ह्यासाठीं कीं, ह्या बिचा-यांना ब्राह्मण काय, ब्राह्मणेतर काय, ख्रिस्ती काय, मुसलमान काय, मजूर काय, भांडवलदार काय, स्वकीय काय, परकीय काय, कोणीहि प्रामाणिकपणानें ह्या राजकारणाच्या खेळांतच घेण्यास तयार नाहींत; म्हणून मी स्वतः जरी जातवार प्रतिनिधित्वाच्या उलट होतों, तरी ह्यांच्यासाठीं मी त्या तत्त्वाचा पुरस्कार करीत आहें. पण चेम्सफर्ड आणि माँटेग्यु हा परकीय भटजी शेटजीनीं ही मज गरिबाची विनंति धिःकारली; आणि त्यांनीं उलट मुसमाना व अँग्लोइंडियन ह्या अल्पसंख्याक डोईजडांपुढें आपली मान वांकविली ! म्हणून खरे “मराठेतर कोण?” ह्या प्रश्नाचें जर माझ्या मनांतलें उत्तर कोणी विचारील तर मी स्पष्ट सांगेन कीं ते मुसलमान, अस्सल युरोपियन, आणि त्यांच्या अद्यापि मागें लागलेले अर्धवट अँग्लोइंडियन हेच होत ! अशांना भिऊन किंवा भुलून जर कोणी हल्लीं चालूं असलेल्या ब्राह्मणेतर पक्षांतच फूट पाडण्याचा प्रयत्न करील, आणि त्या प्रयत्नांत जर प्रामाणिकपणा असेल तर अशा प्रामाणिक मित्रांना मी नम्रपणानें सांगेन कीं आपला नेम चुकला; जे अप्रामाणिक असतील त्यांची गोष्टच वेगळी.
“अस्पृश्यां”विषयीं लिहीत असतां रा. बामणगांवकरांनीं माझी व. प. लो. वासी श्रीशाहू छत्रपतींची तुलना केली आहे. त्यांनीं हा मुद्दा अजिबात गाळला असता तर बरें झालें असतें. अस्पृश्यतानिवारणाचें काम खालून टेकडीवर धावत जाण्याप्रमाणें केवळ शक्तीचें आहे. येथें लोकमान्यतेची अगर राजमान्यतेची शक्ति हाच मुख्य मुद्दा आहे. ह्या दोन्ही शक्ति अंगीं नसतां माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीनें हें काम शिरावर घेणें म्हणजे धाडस आहे. असलें धाडस फार तर क्षम्य आहे, आणि त्याबद्दल माझ्या टीकाकारांनीं आजवर मला क्षमा केली किंवा कांहीं जहाल सोंवळ्या पक्षांनीं माझी गय केली हें मी माझें भाग्यच समजतों. तात्पर्य काय, कीं हा प्रश्न व्यक्तींचा नसून शक्तीचा आहे. उशीरां कां होईना, लोकमान्य-गांधीजींनीं हें काम अंगावर घेतलें, म्हणून ह्याला दहा डी. सी. मिशनचें बळ आलें आहे. श्री शाहूमहाराज तर बहुजनसमाजांत लोकमान्यच नसून, प्रत्यक्ष छत्रपति श्रीशिवरायाचा अंश असल्यानें जी कामगिरी त्यांचेकडून झाली ती अशी त्यांच्या शत्रूंनींहि दृष्टीआड करूं नये. अलीकडे म्हैसूरच्या महाराजांनीं चरख्याची प्रतिष्ठा आपल्या पूजेंत केली आहे, असें ऐकतों. माझ्या हिंदू बंधूंनीं आपल्या तेहतीस कोटी मूर्तींचें उद्यापन करून त्यांना चरख्याची खरी (दिखाऊ नव्हे) पूजा केल्यास, खरोखरीच एका वर्षांत स्वराज्य मिळेल, आणि ते टिकाऊ दिसेल असें मलाहि इतर पुष्कळांप्रमाणें वाटतें. पोषाखाची विषारी भुरळ टाकून बहुजनसमाज हा सात्त्विक धर्माचा तप आरंभीला तर महात्मा गांधीजींच्या जन्माचें सार्थक होईल. इतकेंच नव्हे तर मी हेंहि म्हणण्याचें धाडस करितों कीं, असलीं साधेपणाचीं तपें केवळ गांधीजींसाख्यांनींच करण्यापेक्षां म्हैसूर महाराजांप्रमाणें सर्वच महाराजांनीं चालविल्यास, आपलीं सर्व लष्करें आणि दुकानें घेऊन इंग्रजांना दुसरा देश आजच पाहावा लागेल. त्याला वर्षाची तरी मुदत कशाला पाहिजे? परंतु जोंपर्यंत काश्मीरांतल्याप्रमाणें केवळ राज्यारोहणाप्रीत्यर्थ लक्षावधि रुपयांचा चुराडा होतो, तोंपर्यंत गांधीजींसारख्यांनीं जन्मचे जन्म घेतले तरी, स्वराज्याचींहि वर्षाचीं वर्षें मुदतबंदीच होत राहील; हातीं प्रत्यक्ष कांहींच लाभावयाचें नाहीं ! जी गोष्ट खादीची, तीच अस्पृश्यता निवारणाचीहि आहे हें जाणून, इतर सर्व मतभेद बाजूस सारून, रा. बामणगांवकरांनीं दिवंगत श्रीशाहू छत्रपतींच्या श्रेयाला काट मारूं नये येवढेंच माझें म्हणणें आहे.
विजयी मराठाकारानीं ब्राह्मणेतर मीमांसा चालविलेली पाहून बामणगांवकारंकडून मराठेतर मीमांसा सुरू करण्यांत आली आहे ! मला वाटतें आतां ही “इतर” मीमांसा आमच्या देशांत पुरे झाली. डोईजडपणाची मेख मनुष्यस्वभावांतच ईश्वरानें जणूं मारली आहे. तिला ब्राह्मण काय, इतर काय, किंबहुना मराठेतरांप्रमाणें तिसरे कोणी काय, बळी पडण्याचा सारखाच संभव आहे. हा “इतर” रोग नुसत्या मीमांसेनें बरा होणें नाहीं. तसें असतें तर वर्णव्यवस्थेच्या विषाचें पीक आमच्या ह्या हतभागी देशांत इतकें माजलें नसतें. मीमांसा आणि मीमांसाविद्यालयें आमच्या देशांत थोडीं का आहेत? निदान पुणें शहराच्या पश्चिमभागीं अशा विद्यालयांच्या पाट्या गल्लोगल्लीं चमकत आहेत. आणि म्हणूनच हल्लीं ब्राह्मणेतर पक्ष हिंदुस्थानांत फोफावत आहे. हा “इतर” रोग समूळ उखडून टाकावयाचा असल्यास ही मीमांसेची सारंगी हिंदूंनीं हिंदीमहासागरांत फेकून द्यावी, किंवा तिच्याशिवाय चैनच पडत नसेल तर एखाद्या इतिहासमंडळाच्या प्रदर्शनांत भावी पिढीच्या कल्याणासाठीं धोक्याचें चिन्ह म्हणून ठेवावी, आणि सर्व पक्षांनीं हातीं चिकीर्षेची कुदळ घ्यावी असें माझें प्रांजल मत आहे. मग कोणी कांहीं म्हणो !

मराठे हिशेबी नाहींत

प्रश्न - ब्राह्मण व मराठे यांच्या अंगांत गुणदोष कोणते आहेत ?
उत्तर - मराठ्यांत हिशेबीपणा नाहीं; ब्राह्मणांत तो गुण आहे. ब्राह्मणांत काटकसर आहे, मराठ्यांत ती नाहीं. तुम्ही पाहा, मराठा कुटुंबामध्यें दोन पिढ्यापेक्षां श्रीमंती राहूं शकत नाहीं. ब्राह्मणांत शिस्त आहे, मराठ्यांत ती नाहीं. कर्मठपणा हा गुण ब्राह्मणांत आहे तसेंच ते प्रगतिप्रिय आहेत. आजपर्यंतची सर्व सामाजिक सुधारणा ब्राह्मणांनींच केली. पण ब-याच ब्राह्मणांमध्यें दिलदारपणा कमी आहे. विद्यापीठामध्यें परीक्षा पास होण्यास लागणारी बुद्धि त्यांच्यामध्यें असेल, पण खरी पल्लेदार बुद्धि, दूरदृष्टि त्यांच्यांत नाहीं. मीं ही टीका केल्याबद्दल ब्राह्मणांनीं मजवर रागावूं नये. मला मराठे लोकांतहि दोष दिसतात. ब्राह्मणांच्या मानानें एकंदरींत मराठे पुष्कळच खालावलेले आहेत. खानदानी मराठ्यांमध्यें दोनतीनशें वर्षांपूर्वीं दिलदारपणा फार होता. पण आज तो कोठें राहिला आहे? पूर्वी जो जातिवंतपणा होता तो आतां राहीला नाहीं. स्वतंत्रवृत्तीचा बाणा होता तो गेला. ब्राह्मणांच्याविषयीं म्हणावयाचे तर आतांच सांगितलेले सर्व गुण त्यांच्या अंगीं आहेत खरे; पण त्यांचा फायदा दुस-यास देण्याची बुद्धि त्यांच्यामध्यें नाहीं. तसेंच त्यांच्यामध्यें एक प्रकारचा अहंकार असल्यामुळें बाकीचे लोक त्यांजकडे मत्सरबुद्धीनें पाहतात. हा अहंकार त्यांच्यामध्यें नाहीं असें सर्वांच्या प्रत्ययास आलें पाहिजे.

प्रश्न - एकंदरींत ब्राह्मणांच्या अंगीं वसत असलेली अहंकारवृत्ति ब्राह्मण-ब्राह्मणेतरांमधील एकीच्या आड येते म्हणावयाची?
उत्तर - ब्राह्मणांचे गुण मीं मनमोकळेपणानें सांगितले तेव्हां त्यांच्या दोषांविषयीं थोडें बोललों त्याबद्दल ते गैरसमज करून घेणार नाहींत अशी आशा वाटते. ब्राह्मणांच्या ठायी जसे मला कांही दोष दिसतात तसे ते मला मराठ्यांच्या अंगीहि दिसतात. मराठे निर्बुद्ध निस्सत्व होऊन बसले आहेत असें मला वाटतें. ब्राह्मणांजवळ बुद्धि आहे, पण ती पल्लेदार नाही. हिशेब आहे पण केवळ स्वतःपुरता आहे. संकुतित मनोवृत्ति व स्वार्थपरायणता हेहि ब्राह्मणांच्या अंगचे महत्त्वाचे दोष आहेत असें मला वाटतें. पण मराठ्यांत जो एक गुण नाहीं ते ब्राह्मणांत आहे असें वाटतें. संघटनेचें सामर्थ्य मराठ्यांतून पार निघून गेलें आहे. ब्राह्मण अद्यापि संघटनाकुशल आहेत. हा ब्राह्मणांचे दृष्टीनें फार महत्त्वाचा मुद्दा आहे. महार-मांगांमध्यें आज जी जागृति जी संघटना आहे तितकीसुद्धां मराठ्यांत नाहीं. मराठ्यांत संघटना होईना व ब्राह्मणांची संघटना त्यांच्या स्वतःपलीकडे जाईना. तेव्हां सांगा पाहूं महाराष्ट्राचा उत्कर्ष व्हावा कसा? ब्राह्मणांनीं मराठ्यांना उदाहरण घालून द्यावें व दोघांनीं मिळून व्यापार व शेती, जातिनिष्ठा विसरून करावी यांतच उभयतांचें कल्याण आहे.

प्रश्न - सनातनी पक्षाविषयीं आपणांस काय वाटतें ?
उत्तर - सनातनी म्हणजे ब्राह्मण. सनातन्यांमध्यें ब्राह्मण, मराठे हे दोघेहि आहेत खरे; पण त्यांचे नेते ब्राह्मण व अनुयायी मराठे आहेत. सनातनी ब्राह्मणेतर सनातनी ब्राह्मणांच्या सैन्यांतील केवळ बाजारबुणगे आहेत. म्हणून या वादाची खरी जबाबदारी ब्राह्मणांवर आहे. सनातन्यांनीं जो जोर धरला त्याची सर्व जबाबदारी ब्राह्मणांवर आहे. ब्राह्मणेतर बोलून चालून निर्बुद्ध. सनातनी म्हणून जी आजकाल शिकवणूक आहे ती निव्वळ ब्राह्मणांची. हे ब्राह्मण म्हणजे निव्वळ भिक्षुक नसून त्यांत गृहस्थी बाण्याचे लोकसुद्धां आहेत. त्या सर्वांस माझें नम्रपणें एवढेंच सांगणें कीं, ‘बाबांनो भारताचें भवितव्य काय तें लक्षांत आणाल कीं नाहीं ? या दृष्टीनें विचार कराल कीं नाहीं ?’

प्रश्न - आपण मराठ्यांमध्यें घटना नाहीं म्हणतां, पण एवढीं एकापेक्षां एक प्रबळ मराठी संस्थानें मराठयांचा पाठपुरावा करावयास असतांना मराठ्यांत घटना नाहीं हें संभवतें तरी कसें ?
उत्तर - अहो, तेंच तर मोठें अरिष्ट आहे. ही संस्थानें आमची उन्नति कधींहि घडवून आणणार नाहिंत. ती सदैव आमच्या उत्कर्षाच्या आडच असावयाची. एका माळी परिषदेंत ते लोकसुद्धां असेंच म्हणाले कीं, मराठे लोकांस मदत करणारीं संस्थानें किती ते पाहा! तशीं आमच्यांत कोठें आहेत ? मीं त्यांस उत्तर दिले कीं, म्हणून तर तुम्ही तुमच्या पायावर उभे आहांत. मराठे लोकांचीं संस्थानें असल्यानें मराठे परावलंबी होऊन बसलेले आहेत. मराठ्यांमध्यें संघटना नाहीं. तेव्हां एखादा चांगला संस्थानिक झाला तरी त्याच्या औदार्याचा नीट फायदा संघटनेच्या अभावी मराठ्यांना मिळूं शकत नाहीं.

प्रश्न - मराठे लोकांचा सरकारी नोक-यांमधून मोठ्या प्रमाणावर भरणा केला जातो ही गोष्ट मराठे लोकांच्या उत्कर्षाच्या दृष्टीनें आपणांस कितपत साह्यभूत वाटते?
उत्तर - सरकारी नोक-यांमधून मराठ्यांना ज्या सवलती मिळतात त्यांपासून मराठ्यांचा फायदा होईल असें मला तरी वाटत नाहीं. सरकारी नोकरी म्हणजे हजरजबाबीपणा. नोकरीपेशामध्यें स्वतंत्रपणाला वाव नाहीं. नोक-यांनीं परवशता वाढते. नोकरपेशे ब्राह्मण होवोत किंवा मराठे होवोत, ते गुलाम झाले, त्यांची स्वतंत्र वृत्ति मावळली असें समजावें. नोकरीपेशाच्या दृष्टीनें गुलामगिरी हा शब्दसुद्धां नरम वाटूं लागतो. नोकरी म्हणजे वेश्यावृत्ति, तीपासून कोणत्याहि जातीचा फायदा होणें शक्य नाहीं. हं! सरकारी नोक-यांच्या द्वारें जनहित करण्याची सोय असती तर गोष्ट वेगळी होती. मग नोक-यांपासून त्या मिळणा-या जातीचें हित झालें असतें. पण जेथें धडधडीत वरिष्ठांचें ऐकून समाजाचा गळा कापण्याचा धंदा चालतो तेथें नोक-यांनीं कोणाचेंहि खरें हित साधणें शक्य नाहीं. अशा नोक-यांमधून जातवारी असावी असें म्हणणें म्हणजे एखाद्या जनानखान्यांत आमच्याहि मुली ठेवा असें म्हणण्यासारखें आहे.

प्रश्न - अस्पृश्यतेच्या प्रश्नाला हल्लीं जें तीव्र स्वरूप आलें आहे, त्याविषयीं आपणांस काय वाटतें ?
उत्तर - माझें असें मत आहे कीं, सर्वांनीं मिळून हा अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवावा. नाहीं तर तो एक कायमचा काटा होऊन बसेल. आपण तर स्वखुषीनें अस्पृश्यांस स्वतंत्र केलें नाहीं तर त्यांस आपल्या उलट जावयास तयार केल्यासारखें होईल व ते तसे तयार झाले व आम्हांला विरोध करून पुढें येऊं शकले तर त्यांस नांव ठेवण्यास आपणास कांहींहि हक्क नाहीं. म्हणून आपण उदार दृष्टीनें अस्पृश्यांस आपणांत अगदीं मिळवून घेतलें पाहिजे; इतकें कीं, त्यांचा वेगळा नामनिर्देशसुद्धां करावा लागूं नये. असें जर आपण केलें नाहीं तर अस्पृश्यांचा मुसलमानासारखा सवतासुभा होईल व तो झाल्यास अखेरपर्यंत जाचक होऊन बसेल. तेव्हां आपण आत्महिताच्या दृष्टीनें विचार केला तरी अस्पृश्यांस वर आणणें आपलें कर्तव्य ठरतें. राजकारणामध्यें ब्राह्मणेतर, मुसलमान हे जसे सवतेसुभे आतांपर्यंत झाले आहेत तशीच अस्पृश्यांची ही तिसरी मेख तयार होत आहे याचा सर्वांनीं, विशेषतः ब्राह्मणांनीं, विचार करावा सनातन्यांचा बोजा ब्राह्मणांवर आहे. त्यांची सर्व जबाबदारी ब्राह्मणांवर आहे, तेव्हां त्यांनीं आपलें कर्तव्य नीट रीतीने पार पाडावें.

प्रश्न - तरुण महाराष्ट्रीयांस संदेश म्हणून कांहीं सांगाल काय?
उत्तर - आतांपर्यंत झालें तें सर्व लक्षांत घेऊन तरुण पिढीनें आपण केवळ हिंदी आहोंत एवढें ध्यानांत ठेवावें. एकी करावयाची तीसुद्धां महाराष्ट्रापुरती न करतां प्रांतिक भेद व मात्सर्य यांना आपणांमध्यें येऊं देऊं नये. महात्मा गांधी तर विश्वकुटुंबीच आहेत. तरुणांनीं आपला दिलदारपणा विश्वकुटुंबियत्वाला शोभेल असाच ठेविला पाहिजे. भवितव्य जर एवढें विशाल आहे तर तरुणांनीं मी ब्राह्मण, मी ब्राह्मणेतर असे सटरफटर भेद लक्षांत कां आणावे ? हा सटरफटरपणा टाकला पाहिजे. हिंदुस्थाननें जगाला धडा घालून दिला आहे. असें एका तोंडानें म्हणावयाचें आणि आपल्यांतच सोंवळेपणा ठेवायचा हा म्हाता-यांचा दुटप्पीपणा आहे, त्यापासून तरुणांनीं सावध राहावें. जुन्याचा सर्वच त्याग करावा असें कोणीहि म्हणत नाहीं. पण तें नव्याच्या कसाला लावावें. तें म्हाता-यांकडून होत नाहीं. या दिव्यांतून तरुण पार पडले म्हणजे म्हतारे त्यास आशीर्वाद देण्यास पुढें येतीलच. तेव्हां तरुणांनीं विनय न टाकतां शिस्तीनें व श्रद्धेनें सुधारणेच्या कामाला पुढें यावें हा माझा त्यांस नम्रपणाचा संदेश आहे.

मराठे आणि पेशवे

मराठ्यांना साम्राज्याची कल्पना कोणीं दिली, ह्याची पंचाईत बंगाल्याला कशास पाहिजे ? ती मराठ्यांमध्यें स्वयंभू आहे. प्राचीन काळापासून त्या कल्पनेचा इतिहास राजपूत किंवा मराठा ह्या शब्दांतच संक्षेपानें लिहिला आहे. उत्तरेकडील अशोक-मौर्याप्रमाणें राष्ट्रकूट-चालुक्य-यादवांदिकांनीं दक्षिणेंतून दिल्ली कैक वेळां मुळासकट हालविली आहे. जुन्या गोष्टी राहूं द्या. आधुनिक साम्राज्याच्या कल्पनेचा बार शिसादे ऊर्फ भोसले घराण्यानें भरलें आहे. भट घराणें हीहि भोसले घराण्याची एक शाखा आहे. बाजीराव आणि नाना अशीं दोन अपत्यें असतांना भाग्यशाली शाहूमहाराजांना निपुत्रिक कोण म्हणेल ? ज्या विधीनें शाहूचीं औरस मुलें पाळण्यांतच मारलीं, त्यानेंच ह्या दोन मानसपुत्रांना त्यांच्या मांडीवर बसविलें. ब्राह्मणांस आनंद वाटावयास नको किंवा मराठ्यांना राग यावयाला नको. हिंदुस्थानांतील फार दिवसांच्या वर्णविषाचा विध्वंस करण्याची विधिनिर्मितच ही एक युक्ति होती. बाजीरावानें नुसत्या लढवय्येपणांत यश मिळविलें, पण कर्जाखालीं चिरडून मेला. नानासाहेब दीर्घसूत्री व हद्दीबाहेर कपटी होता. कपटाची सूतशेखरमात्रा तो रोज पसा पसा खाऊं लागला. स्वतःच्या भावाच्या कर्तबगारीवरही विश्वास नाहीं, असा हा ब्राह्मणी औरंगजेब आपल्या कपटाच्या थडग्यांत गुदमरून मेला. नादीरशहाच्या स्वारीचा कडू धडा शाहूला व बाजीरावाला मिळाला होता, तरी शाहूमहाराज मेल्याबरोबर ज्या नानाला दाही दिशा मोकळ्या झाल्या असतांहि त्यानें पुढील ११ वर्षें उत्तर हिंदुस्थानांतील मुलुखगि-यांत जाऊन भाग घेऊन पानिपतचें अरिष्ट टाळलें नाहीं, याबद्दल सरदेसायांनीं आपल्या पुस्तकांत फार दोष दिला आहे. पण ह्या दोषाची खरी मीमांसा करण्याचें धैर्य सरदेसायांस नाहीं, तर जदुनाथांत कोठून येईल ? ती मीमांसा हीच कीं, सर्व सत्ता तत्वदृष्ट्याच नव्हे तर तपशीलदृष्ट्याहि केवळ भट घराण्यांतच नव्हे तर खुद्द आपल्याच मुठींत नेहमीं दाबलेली रहावी, अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा नानास भोंवली. अबदाल्लीनें १७४८ पासून १७६१ पर्यंत दिल्लीवर अनेक स्वा-या केल्या. बादशहा मरणान्त वेदनेनें हृदय फोडणा-या किंकाळ्या कुमकेसाठीं फोडूं लागला, मल्हाररावाची लबाडी उघडकीस आली. महादजीशिवाय राणोजी-शिंद्यांचीं जयाप्पा दत्ताजी, शेवटीं जनकोजीचींही पुत्ररत्नें ह्या रणकुंडांत गडप झालीं; शिंदे होळकरांच्या पाळतीवर ठेविलेले स्वतः नानाचेच दिल्लींतील सरदार आणि वकील अनुक्रमें अंताजी माणकेश्वर आणि हिंगणे यांनीं अमूल्य संधी वांया दवडली जात आहे, ती न जावी म्हणून स्वतः नानानेंच यावें म्हणून निर्वाणीचीं पत्रें अनेक पाठविलीं. ह्या कामगिरीवर पाठविलेला रघुनाथराव पूर्ण नालायक ठरून त्याच्या दुहीमुळें शिंदे-होळकर प्रत्यक्ष शत्रु बनले आणि अखेरीस गोविंद बुंदेल्यांनींहि हात टेकले, तरी नाना पुणें आणि कोल्हापूरच्या दरम्यानच लुडबुडतो व अखेरीस पानिपतचें प्रायश्चित्त मिळाल्यावर पश्चात्ताप करण्यालाहि त्याला वेळ न मिळतां तो ऊर फुटून पर्वतीच्या टेकडीवर मरतो, ह्या सर्वांतलें इंगित काय ? तें सरदेसायांनीं किंवा जदुनाथांनीं इच्छा व धैर्य असल्यास सांगावें नाहींतर तोंड आपटावें. इंगित हेंच कीं, नानाचे अतिदीर्घसूत्री
कपट ! न जाणो येवढें अवाढव्य कपटजाळही केवळ साम्राज्य स्थापण्याच्याच सदिच्छेनें नाना आपल्या आत्म्याभोंवतीं गुरफटून घेतलें असेल म्हणून मी देखील ह्या ऐतिहासिक पुरुषाला दोष देत नाहीं. पण तो अपेशी झाला, येवढें तरी आजकालचे ब्राह्मण आणि त्याच्या पिंज-यांतले बंगाली साक्षीदार कबूल करतील काय ?
सरदेसायांची दृष्टि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादानें विकृत झालेली नाहीं, हें त्यांच्या पुस्तकावरून स्पष्ट दिसत आहे, तरी ते आपल्या विचारसरणीच्या अगदीं अखेरपर्यंत न जातां मध्येंच कोठेंतरी मुक्काम करतात, ह्यांत किंचित धरसोडपणा दिसतो. असो. म. रियासतमध्यें भाग ३ पान ९३ वर सरदेसायांनीं खालील उद्गार अटकेवर झेंडा ह्या मथळ्याखालीं काढला आहे. कोणास वाटेल कीं, हा रघुनाथरावाविषयीं किंबहुना भट घराण्याविषयीं असावा, पण नाहीं. तो उद्गार असा : “सर्वस्व खर्चीं घालून राष्ट्रकार्य करण्याची खरी प्रवृत्ति त्या वेळीं एकट्या शिंद्याशिवाय दुस-या कोणत्याहि सरदाराचे ठिकाणीं राहिलेली दिसत नाहीं. म्हणूनच पुढील सर्व उद्योगाचा भार एकट्या शिंद्यावर पडला; आणि महादजीसारखा पराक्रमी पुरुष पानिपतच्या संकटांतून ईशदयेनें वांचला नसता, तर शिंद्यांचे ह्या उद्योगाचा व त्यांच्या घराण्याचा इतर कित्येक शूर घराण्याप्रमाणें मागमूसहि राहिला नसता.” जाड टाइप मीं एवढ्याचसाठीं घातला आहे, कीं हा ब्राह्मणांचा उद्गार बंगाल्याच्या डोळ्यांत भरावा म्हणून बाकी शिंद्यासारखीं आणखी किती तरी शूर पण इमानी मराठा, व ब्राह्मण घराणीं त्या वेळीं [कदाचित् आतांहि असतील] होतीं, हें सरदेसायांनीं कबूल केलेंच आहे, पण त्यांच्या धरसोडीमुळें अधिक स्पष्ट केलें नाहीं. असो.
पहिला शाहू सन १७४९ त सातारच्या रंगमहालांत वारला नाहीं; तर सन १७६१ त पर्वतीवर वारला ! नाना हे मराठेशाहींत घुसडलेलें शाहूंचे पिल्लूं होतें. त्याचें बरेंवाईट शाहूचे माथ्यावर लादणें इतिहासकारास भाग आहे. पहिला बाजी स्वरूपानें फार देखणा होता. तसाच पानिपतास मारला गेलेला विश्वासरावहि खूपसूरत होता. नातवावर आजाची छाया पडली होती, असें सरदेसाई म्हणतात. शाहूची छाया त्याचा नातू जो नाना त्यावर पडली होती, असें मी म्हणतों. स्वतः लढाईवर न जातां, घरबसल्या रणसंग्रामाची दुरून मुकादमी ऊर्फ भरीव अथवा पोकळ मुत्सद्देगिरी करणें, ही शाहूची खोड नानाला लागली; व ह्या खोडीमुळें ओघानेंच ह्या आजानातवाला दुसरी एक अक्षम्य खोड लागली, ती ही कीं, हाताखालचे पहिल्या नंबरचे मातब्बर सरदार आपसांत भांडूं लागले तर सत्ताबलानें दोघांस नरम करून, पण शाबूत राखून, पुनः कामास न लावतां, त्यांच्यांत कोंबडें झुंझ लावून कोण जिंकेल त्याच्या गळ्यांत बायकाप्रमाणें स्वयंवर माळ घालायची ! ह्या खोडीमुळेंच चंद्रसेन जाधव रुसला व त्रिंबकराव  दाभाड्याचा खून झाला ! हिचा वर्ण नाहीं तरी गुण मात्र नानाला लागला. पुढें नानानें उचललेल्या अक्षम्य खोडीमुळें रघूजी भोसले रुसला; मल्हारराव होळकर व मुरारराव घोरपडे बिथरले; जयाप्पा, दत्ताजी व जनकोजी शिंद्यासारखीं अमूल्य रत्नें बिनमोबदला हारपलीं. हे सारे मराठे होते, पण बंगाल्यांत रघूजीचा सरदार भास्करराव कोल्हटकर चित्पावन ना ?  अलीवर्दीखानानें त्याचा खून करविला, त्याचा सूड उगविण्यास नानानें सढळ हातानें कां मदत केली नाहीं ? आजानातवांच्या ह्या समान खोडींत एक महदंतर होतें. शाहूनें जें हें दौर्बल्य अथवा कपट दाखविलें, त्याच्या मुळाशीं भोसले घराण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा वाढवावी, असा हेतू होता, असें शाहूचा कोणी शत्रूहि म्हणणार नाहीं. पण नानांनीं आपल्या गळ्याभोंवतालीं कपटाचें जें अवाढव्य जाळें गोंवून पानिपतचें पिशाच्च उठविलें व त्याच्या तोंडांत पेटलेल्या अग्नीकुंडांत सर्व महाराष्ट्राची व शेवटीं आपलीहि आहुती दिली, त्या कृत्याबद्दल त्याच्या मित्रासहि काय म्हणतां येईल, हें सांगवत नाहीं. ह्याला इतिहासांत म्हणा किंवा काव्यांत म्हणा, एकच उपमा आहे. नंद घराण्याचा सर्वस्वीं नाश करून पेटलेल्या कुंडांत, मिळमिळीत सौभाग्याला कंटाळलेली झळझळीत विधवा जी मुरादेवी, तिचीच ! मुरादेवी व नानासाहेबामध्येंहि जर कांहीं फरक असेल तर तो इतकाच कीं, बाईच्या कृत्याला यश तरी आलें पण बुवांच्या वांट्याला तेंहि आलें नाहीं ! नसो, पण दोघांचेहि हेतू सार्वजनिक व साम्राज्य संपादक असण्याचा संभव आहे. म्हणून साधनाच्या अभावांचा फायदा दोघांनाहि देऊन तूर्त त्यांना मुक्त करणें मला भाग आहे. निदान ह्यांत मनाचा थोरपणा तरी आहे.
शाहू सन १७६१ त वारला त्याच न्यायानें शककर्ते शिवाजीमहाराज सन १६८० तन वारतां ते वानवडी येथें सन १७९४ त महादजीच्या मरणानें मेले. किंबहुना मारले गेले असावे, असें मला दिसतें. जदुनाथ सरकारला तसें न दिसल्यास माझा काय इलाज ? मोठीं माणसें मरणानंतर पुष्कळ दिवसांनीं मरतात व कीर्ति अजरामर करितात; व लहान माणसें मराणाआधींच मरतात व कीर्ति तर जन्मलेलीच नसते; ही स्थिति व्यक्तींचीच नसून मराठ्यासारख्या अद्यापि जिवंत राष्ट्राचीही आहे, हें जदुनाथाला मीं सांगावें काय ? कुठें मराठ्यांचें फारा शतकांचें साम्राज्य ! कुठें त्यांच्या प्रतिभाशाली कल्पना ! कुठें त्यांचीं चिरस्मरणीय व वंदनीय कृत्यें ! कुठें  त्यांचा दरारा ! एकूण कुठें हा महाराष्ट्र महोदधि आणि कुठें ह्या महोदधीवर उठलेली भट घराण्याची एक भाग्यशाली पण अपयशी लाट ! आणि लाट सागराला कारण, असें प्रतिपादणारा कुठें ह्या बंगाल्याचा द्राविडी प्राणायाम !
जदुबाबू ! महाराष्ट्रभूमि खडकाळ आहे. तिच्यावर चार चार हजार फूट सखल उंच द-याखोरीं आहेत. बंगाल-बिहारप्रमाणें सपाट, मऊ मेणानें पसरलेली व आयतें पीक देणारी नव्हे. पूर्वींचे मराठे राहत. ज्यांनीं परवां साम्राज्य उभारलें ते मावळे नाचणीच्या शिळ्या भाक-या खाणारे व रानडुकरांचीं हाडें चोखणारे होते; आयता रसगुल्ला खाणारे बंगाली बाबू नव्हते. नुसत्या लेखणीनें शांतीचे ढोंग माजविणा-या हल्लींच्या युरोप-अमेरीकेंतहि साम्राज्यें मिळत नाहींत, तर ३०० वर्षांपूर्वींच्या हिंदुस्थानांत तें कसें शक्य आहे ? तरवारीच्या सावलीखालीं लेखणी कागदावर चुरचुर चालते, पण ती तशा उन्हांत व खडकाळ जमिनीवर चालेल का ? महात्मा गांधीजींचीं अनत्याचारांवरील पुराणें ऐकूण जदुनाथ इतक्या लवकर मराठ्यांचा दरारा विसरले काय ? मग काय, आतां बंगालच्या लेखणीनें व गुजराथ्यांच्या सोवळ्यानें किंबहुना महात्माजींच्या केवळ श्रद्धापूर्ण आशीर्वादानेंहि आम्हांला राजकीय मोक्ष मिळणार आहे काय ? पुढच्या गोष्टी पुढें. कारण महादजी शिंद्यानंतर जुन्या युगावर पडदा पडून नवें चालूं झालें आहे. तें असो. पण मागच्या राजकारणाची मीमांसा करतांना जदुनाथानें शिवरायाचें ध्येयहि टाकाऊं ठरविलें, हा कोण ऐतिहासिक अत्याचार ! इतकेंच करून स्वस्थ न राहतां पेशव्यांनीं कल्पना दिली, साम्राज्य दिलें, संपत्ति दिली इ. इ. तिलांजलि देतांना नदीवरचा भट जसा अर्थ समजतांच मंत्र बडबडतो, तशी जुन्या युगाची तिलांजलि देतांना जदुबाबू भाळ्या भोळ्यांना चुकीचा संकल्प सांगत आहेत, त्याचें वर्णन मी कोणत्या शब्दांत करूं ! केवळ शक्य तितक्या सौम्य शब्दांत सांगावयाचें झाल्यास “मराठ्या आजोबाला बंगाली नातू शिकवूं लागला” हें माझें वर्णन आहे. पण नातवाला अक्कलदाढ येईपर्यंत आजोबालाहि धीर आहे, हें मला माहीत आहे. पुरे !

  1. मराठींत कानडी शब्दांचा भरणा
  2. मध्यभाग
  3. मराठ्यांची पूर्वपीठिका
  4. मग महारामांगांचे काय हाल वर्णावेत !
  • 61
  • 62
  • 63
  • 64
  • 65
  • 66
  • 67
  • 68
  • 69
  • 70
Page 66 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी