1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

चळवळीचा कोंडमारा

ब्रिटीश इलाख्यांतील चळवळीला कसें स्वरूप आलें आहे व तिला दडपण्यासाठीं कसे निकराचे उपाय योजले जात आहेत हें सांगण्याचें हें स्थळ मुळींच नव्हे. ब्रिटिश सरकार अखेर स्वातंत्र्यप्रिय असल्यामुळें तें चळवळ झाल्यावरच ती दडपण्याचे उपाय योजते पण आमचे कांहीं संस्थानिक पाहावे तर ह्या परकीय सरकारापेक्षांहि अधिक शहाणे होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे दिसतात ! प्रजेमध्यें विशेषतः खेड्यांतील जनावरवजा कुणब्यांमध्यें पुढें दहा वर्षांतहि कधीं कांहींच चळवळ होऊं नये अशा प्रकारची दूरदृष्टि कांहीं संस्थानिकांची माझ्याच संचारांत मला प्रत्यक्ष अनुभवास येऊं लागली आहे. नांवें सांगण्याची जरूर नाहीं. जरूरच पडल्यास ज्याचीं त्यांनाच मी अतिनम्रपणानें कळवीन, त्याची येथें वाच्यता नको. कोंडमा-याचे दिवस गेले. आतां वातावरणाला गवसणी घालणें शुद्ध वेडेपणाचें ठरेल. हजारों वर्षें आपल्या बायकांना पडद्यांत दाबणा-या तुर्कस्थानांत केमालपाशांनीं ह्या पडद्याच्या फाडून चिंधड्या केल्या ! आमचेकडे पाहावें, तर कांहीं सुशील आणि प्रजाहितैषि संस्थानी राज्यकर्त्यांनीं व त्यांच्या सुशिक्षित सल्लागारांनीं, नव्या जुलमी कायद्याच्या चिंध्या गोळा करून त्यांची वाकळ तयार करून तिच्याआड मुक्या शेतक-यांना लपविण्याचा प्रयत्न चालविला आहे, त्याला काय म्हणावें ? विनाशकाले विपरित बुद्धि म्हणावें, दुसरें काय ? अशा स्थितींतहि सांगली दरबारनें ह्या परिषदेच्या कार्यांत नसतीं विघ्नें आणलीं नाहींत याबद्दल परिषद त्यांची आभारी आहे. खरें पाहिलें असतां सर्व संस्थानांच्या दरबारांनीं आपापले योग्य अधिकारी प्रतिनिधी म्हणून पाठविले असते तरी परिषदेनें त्यांचा आभारपूर्वक स्वीकारच केला असता किंवा करील. दिवस सहकार्याचे आहेत. दडपशाहीचे नाहींत. सहकार्य करील तोच टिकेल. अत्याचार व दडपशाही हीं दोहोंपक्षीं नरकाचींच द्वारें ठरणार ह्यांत काय संशय !  संशयात्मा विनश्यति !!
येथवर शेतक-यांच्या हीनस्थितीचा विचार झाला. एका दृष्टीनें पाहतां हिंदुस्थानांतल्या - विशेषतः हिंदी संस्थानांतल्या शेतक-यांची स्थिति अस्पृश्य वर्गाहून अधिक कींव येण्यासारखी झाली आहे. कारण ब्रिटिश मुलखांतील अस्पृश्य वर्गाची निदान थोडी तरी जागृती झाली आहे. पण संस्थानांतील शेतकरी वर्गाची तेवढीहि जागृति झाली नाहीं; मग उन्नतीचा मार्ग तर दूरच ! हिंदुस्थानांतील अस्पृश्य वर्गाची हलाखी पाहून मोठी चीड येते. पण संस्थानांतील शेतक-यांची स्थिति निराशाजनक होत चालली आहे. चीड येण्यापुरती तरी थोडी आशा दिसावयाला पाहिजे ना ? म्हणून अलीकडे अस्पृश्यांइतकी तरी जागृती शेतक-यांत व्हावी म्हणून कांहीं समाजसेवकांचें लक्ष विशेषतः खेड्यांतील कुणब्यांची स्थिति सुधारणेकडे व ग्रामसंघटनेकडे लागलें आहे. पुण्यांतील म्युनिसिपालिटीचे चीफ ऑफिसर रा. आप्पासाहेब भागवत, श्री. बाबुकाका कानिटकर, सातारा येथील शाहू छत्रपति बोर्डिंगचे चालक श्री. भाऊसाहेब पाटील, माझे मित्र प्रसिद्ध गोसेवक शेख नजमुद्दीन कमरुद्दीन, भोर संस्थानांतील कारागृहांत अद्यापी विश्रांति घेणारे रा. शेटे व पोतनीस हीं उदाहरणें प्रमुख आहेत. संस्थानांत अशींच उदाहरणें जास्त आढळावींत हा ह्या परिषदेचा हेतु आहे. आपले आजचे साधुवृत्तीचे स्वागताध्यक्ष माझे बाळमित्र श्री. विष्णुपंत ऊर्फ अप्पासाहेब देशपांडे ह्यांनीं अविश्रांत श्रम करून ही परिषद घडवून आणिली; ह्या गोष्टीचा अभिमान सांगलीकरांनाच नव्हे, तर इतरहि संस्थानचे राजे व प्रजा म्हणविणारे यांना असावयास पाहिजे. कांहीं संस्थानांत अलीकडे प्रजापरिषदा होऊं लागल्या आहेत हें मोठें सुचिन्ह होय. पण संस्थानांतील प्रजा शेंकडा ९५ हूनहि जास्त शेतकरीच असल्यानें प्रजापरिषदांचें कामहि त्याच प्रमाणांत खेड्यांतच होणें जरूर आहे. महात्मा गांधींचा उदय होईपर्यंत आमच्या काँग्रेसचेंहि लक्ष खेड्यांतील लोकांकडे लागलें नव्हतें. इतकेंच नव्हे तर शहरांत राहणा-या मजुरांकडे व अस्पृश्य वर्गांकडे प्रत्यक्ष काँग्रेसचाच कानाडोळा व प्रसंगविशेषीं विरोधहि होता. महात्माजींनीं उलथापालथ केली, तेव्हां कोठें ब्रिटिश सिंह जागा झाला आहे ! आतां संस्थानांतील कार्यकर्त्यांना जागें करावयाचें असल्यास संस्थानी प्रजापरिषदांनीं आपल्या राजांचाच नव्हे तर राजधानींतील महाजनांचाहि नाद सोडून, सरळ खेड्यांतील कुणब्यांकडे जावें. येरवीं त्यांच्या चळवळीला ना बूड ना पाया अशी स्थिति होईल.

गुरु गोविंदसिंग

मुसलमानांची पूर्वपीठिका सांगतांना त्या धर्मामध्यें तलवारीच्या शक्तीचा समावेश महमुदाच्या काळापासूने कसा झाला होता, हें वर सांगितलेंच आहे. हा समावेश मुसलमानी धर्माचें वैशिष्ट्य आहे. मुसलमान आपला धर्म केवळ तलवारीच्या जोरावरच पसरून तृप्त न राहतां तलवारीच्या जोरावर आपला पशूपणाहि जेव्हां व्यक्त करूं लागले, तेव्हां शीख गुरूला हें तलवारीचें तत्त्व केवळ स्वसंरक्षणार्थ स्विकारावें लागलें, व ही तेजस्वी कामगिरी गुरु गोविंदानें बजावली.
पांचवा गुरु अर्जुन ह्याचा सेलीम बादशहानें फार क्रुरपणानें वध केला. नववा गुरु तेजबहाद्दर ह्याला औरंगजेबानें दिल्ली येथें ठार मारलें; आणि त्याच्या शरीराचे चार तुकडे करून चारी बाजूंच्या वेशीवर टांगले. ह्या भयंकर कृत्याचा परिणाम तेजबहाद्दराचा तेजस्वी मुलगा गोविंदराय ह्याच्या मनावर कायमचा झाला. त्यानें शीख लोकांचें स्वसंरक्षणाला समर्थ असें एक पथक--लढाऊ राष्ट्र--तयार करण्याचा घोर पण केला व तो पूर्णपणें सिद्धीस नेला. गुरु गोविंद हा शिखांचा दहावा आणि शेवटला गुरु होय. हा लहानपणापासून धनुर्विद्येंत फारच निष्णात होता. ह्या वेळीं पंजाबांत जरी मोंगली सत्ता स्थापन झाली होती, तरी निरनिराळ्या डोंगरी मुलखांतून लहान लहान रजपूत राजे आपापल्या किंल्ल्यांतून आपली शिबंदी फौज ठेवून आपला स्थानिक अम्मल चालवीत होते. अशांपैकीं भीमचंद नांवाच्या एका रजपूत राजाशीं गुरु गोविंद ह्याच्या वेळोवेळीं झटापटी होत. ह्या झटापटींच्या व्दारें शिखांना लष्करी वळण लागलें! गुरु गोविंदानें ह्याप्रकारें आपल्या धार्मिक कामाशिवाय राजकीय तयारीची चळवळ चावविली, हें त्यांच्या सामान्य पंगू शिष्यवर्गाला बरें वाटत नसे. त्यांनीं त्यांच्या वृद्ध आईच्यामार्फत पुष्कळ रदबदली करून पाहिलें. पण गोविंदानें आपला बाणेदार निश्चय रतिभर ढळूं दिला नाहीं. त्याच्या मसनदांपैकीं (एजंट) बरेच जुलमी व बंडखोर झाले होते. अशा अपराध्यांना योग्य शिक्षा देऊन सर्वांना त्यानें आपल्या हुकमतीखालीं आणिलें. गोविंद नुसता मिणमिणीत गुरु नसून झणझणीत बादशहाहि होता, असें त्या वेळच्या उद्दाम बादशाहीला भासूं लागलें.

एकदा कांहीं शिखांनीं येऊन गुरु गोविंदाजवळ फिर्याद दिली कीं, तुर्कांचा छळ फार झाल्यामुळें गुरूच्या दर्शनाला येणेंहि पुष्कळांना शक्य होत नाहीं. तुर्कांचा अर्थात् गुरूलाहि त्वेष आलाच होता. म्हणून त्या गनिमांच्या कायमच्या बंदोबस्तासाठीं व शीख राष्ट्राच्या संरक्षणासाठीं त्यानें पुढील बेत केला. वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीं आपल्या सर्व शिखांचा दरबार आनंदपूर येथील आपल्या राजधानींत भरविला. वैशाख शुद्ध पौर्णिमा हा हिंदुस्थानांतील सर्व द्राविड क्षत्रियांचा मोठा राष्ट्रीय सण फार पुरातन काळापासूनचा आहे. बुद्धाचा जन्म आणि निर्वाणप्राप्ति ह्याच दिवशीं मानण्यांत येते. सर्वजण जमल्यावर गुरु गोविंदानें आपली तलवार म्यानांतून उपसली आणि गुरूसाठीं कोण निष्ठावान् शिष्य आपल्या प्राणांची आहुति देण्यास तयार आहे ?  असें खडसून विचारलें !  सर्वजण घाबरून गेले. एकदा, दोनदा व तीनदा गुरूनें हा भयंकर सवाल केल्यावर दयाराम नांवाचा लाहोरचा एक शीख पुढें येऊन त्यानें आपली मान पुढें केली. गुरूनें त्यास पडद्याआड नेलें. रक्ताचा ओघ पडद्याबाहेर दिसूं लागला. रक्तानें भरलेली तलवार घेऊन बाहेर येऊन गुरूनें आणखी कोण शिष्य मजसाठीं आपलें शिर अर्पण करण्यासाठीं तयार आहे, असें दरडावून विचारलें. दिल्लीचा दुसरा धर्मदास नांवाचा पुढें आला. एकामागून एक असे द्वारकेचा मुहकमचंद, बेदरचा साहेबचंद, जगन्नाथचा हिंमत पुढें आले असतां अशा पांचहि शिखांना पडद्याआड करीतोंपर्यंत दरबारांतून बरेचसे ऐतखाऊ शीख नाहींसे झाले होते. पण उरले ते करारी व निधड्या छातीचेच राहिले होते. मग गुरु गोविंदानें मोठ्या आवेशानें पडदा एकीकडे सारून ते पांचहि कट्टे शिष्य एका रांगेनें बसलेले जमलेल्या मंडळींना दाखविले. त्यांच्याऐवजीं पडद्याआड प्रत्येक वेळीं त्यानें एकेक बकरा कापून त्याचें रक्त दाखविलें होतें. तो सर्वांना उद्देशून मोठ्यानें ओरडून म्हणाला, “शिष्यांनो, आद्य गुरु बाबा नानकाचे वेळीं अंगद हा एकच शिष्य मिळाला ! आतां मला पांच शिष्य मिळाले आहेत !! ह्या पांचांनीं आज नव्या शीख राष्ट्राचा पाया आपलें रक्त अर्पण करून घातला आहे.” सर्वांनीं विस्मित होऊन त्या पंचांना धन्यवाद देऊन साष्टांग प्रणिपात केला. गुरु पुढें म्हणाला, “बाबा नानकाच्या वेळेपासून गुरूनें चरणतीर्थ देण्याची वहिवाट चालत आली आहे. त्यापुढें शिखांचा खालसा (संस्थान) तलवारीच्या आणि शौर्याच्या बळावरच चालणें शक्य आहे. म्हणून मी आतांपासून तलवारीनें हालविलेलें पाणी पाजून शीख दीक्षा देण्याची चाल पाडतों. आतांपर्यंत जे शीख होते म्हणजे शिष्य होते, ते ह्यापुढें सिंग (सिंव्ह) म्हणजे राजे होतील ! ह्यापुढें सर्वांनीं एकच धर्म स्वीकारावा. चारी जाती अतःपर नष्ट झाल्या. सर्व आम्ही आतांसारखे भाऊ झालों. कोणी वरिष्ठ नाहीं, कोणी कनिष्ठ नाहीं; गंगा अगर दुसरें कोणतेंहि तीर्थ कोणी मानूं नये. राम, कृष्ण, ब्रम्हा, दुर्गा इ. देवतांचा त्याग करून केवळ नानक आणि शीख गुरूवरच निष्ठा ठेवावी. ह्या वेळीं सुमारें वीस हजार माणसांनीं उभे राहून ह्या नवीन जहाल धर्माची दीक्षा घेतली. त्यांत कित्येक वैश्य, क्षत्रिय व इतर शून्य मतांचे हिंदूहि होते. बाकी केवळ तमासगीरच होते.

गुरु गोविंदानें ह्यानंतर त्या पांच शिष्यांना श्रीसत् अकालच्या नांवानें खड्गधारेनें हालविलेल्या पाण्याची अभिषेक दीक्षा दिली. त्यानंतर त्यांच्यापुढें स्वतः आपण उभा राहून त्या पांचांनीं आपणांस अकाली धर्माची दीक्षा देण्यास नम्रपणानें विनंती केली. सर्वांस आश्चर्य वाटलें!!  त्यांना सर्वांना गुरु गोविंदानें समजावून सांगितलें. अतःपर गुरूंची परंपरा बंद करण्यांत आली आहे ! खालसा हाच गुरु आणि गुरु हाच खालसा !!!  म्हणून मलाहि तुम्हीच आतां खालशांत सामील करून घेणें इष्ट आहे ! त्या पांचांना “ पंचिप्यारा” पांच लाडके असें नांव पडलें. केस, कंगवा, कृपाण, कच्छ (आंखूड चोळणा) आणि कडे हीं शिखांचीं पांच लक्षणें प्रत्येक शिखानें धारण करणें, तेव्हांपासून अवश्य झालें आहे. ही गोष्ट इ. स. १६९९ सालीं घडली. हे पांचहि लाडके अगदीं हलक्या जातींतले व कुळांतलेच होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या त्रैवर्णिकांपैकीं कोणीहि हरीचा लाल नव्हता, ही ध्यानांत ठेवण्यासारखी मर्मी गोष्ट आहे. इतकेंच नव्हे तर स्वराज्य अथवा ऐहिक स्वातंत्र्य मिळवायचें आणि टिकवावयाचें असल्यास तलवारीचें बळ आपल्या मनगटानें चालविणेंच अवश्य आहे हा गुरु गोविंदाचा धडा महात्मा गांधीनेंहि शिकण्यासारखा आहे !

ह्यानंतर गुरु गोविंदसिंगास औरंगजेबाच्या प्रचंड सत्तेशीं अविश्रांत आणि आमरण झुंजावें लागलें. त्यांत त्यानें आपल्या सर्वस्वाची आहुति कशी दिली, हें कथानक अखिल मानव जातीच्या इतिहासांत अत्यंत हृदयविदारक आणि स्फूर्तिकारक आहे. आपली राजधानी टाकून आपल्या कुटुंबाला घेऊन तो देशोधडीला लागला. बायकामुलांची ताटातूट झाली. त्याचे दोन तरुण मुलगे लढाईंत पडले. वृद्ध आई व पत्नी हाय हाय करून मेल्या. त्याचे दोन लहान नातू एका ब्राह्मणाच्या घरीं दडून होते. पण क्षुल्लक बक्षिसाच्या आशेनें त्या नीच ब्राह्मणानें, सरहिंदचा सुभेदार वझिरखान ह्याच्या हवालीं त्यांना केलें. मुसलमान होत असल्यास जिवंत ठेवूं, नाहीं तर त्या दोन्ही अर्भकांस ठार मारण्यांत येईल, असें वझिरखानानें फर्माविलें. पण त्या शूर अर्भकांनी आनंदानें मरण पत्करले !!!  तरी पण अखेरपर्यंत गुरु गोविंद औरंगजेबाच्या हातीं लागला नाहीं. इ. स. १७०७ सालीं औरंगजेब वारल्यावर त्याचा मुलगा बहादूरशहा तक्तावर बसला. त्यानें गुरु गोविंदसिंगाशीं सलोखा केला, व त्याची मदत मागितली. पुढें गुरु गोविंदसिंग दक्षिणेंत निजामशाहींत नांदेड गांवीं एक शीख मंदीर आहे, तेथें जाऊन आपल्या अंतकाळची वाट पाहात राहिला. नांदेडचें मूळचें नांव ‘ नऊ नंद डेरा ’ असें होतें. तेथें एके दिवशीं गुरु एका जमातीला उपदेश करीत असतां एका अफगाण माथेफिरूला तो न आवडून त्यानें एकदम गुरूच्या अंगावर वार केला. त्यामुळें गुरु कांहीं दिवस अत्यवस्थ आजारी होता. बहादूरशहानें आपल्या दरबारी वैद्यास जखम बरी करण्यास दिल्लीहून पाठविलें. ती बरी होत आली होती; पण एके दिवशीं अंगांत शक्ती नसतांहि एक धनुष्य खेंचण्याचा बळेंच प्रयत्न केल्यामुळें त्याच्या जखमेचे टाके तुटले. पुढें दुखणें असाध्य होऊन हा हिंद देवीचा अत्यंत तेजस्वी सत्पुत्र इ. स. १७०८ सालीं कार्तिक शुद्ध पंचमीचे दिवशीं निजधामास गेला.

आमची भागवत धर्माच्या विकासाची गोष्टहि येथेंच संपली. पुढें रणजितसिंगानें शिखांचें स्वतंत्र राज्य स्थापिलें. इतकेंच नव्हे तर आजकालच्या अकाली शिखांनीं ब्रिटिश बादशाहीचेहि डोळे उघडविले. पण ह्या गोष्टी आमच्या प्रस्तुत टापूच्या बाहेरच्या आहेत. ब्राह्मसमाज, आर्यसमाज, व इतर मंडळ्या भागवत धर्माचा अद्यापि विकासहि करीतच आहेत. भागवत धर्म सनातन आहे, त्यांचें काम निरंतर चालणारच. पण हल्लीं युगांतर झालेलें आहे, म्हणून आजकालचीं वर्तमानें अद्यापि इतिहासाच्या ताब्यांत आलेलीं नाहींत. म्हणून यांची गणना आमच्या मुख्य विषयांत होणें इष्ट नाहीं. म्हणून येथेंच थांबणें बरें.

गुप्तांचा काळ

पुढें कुशानांचा –हास होऊन सुमारें १०० वर्षें अराजक माजलें. शेवटीं चंद्रगुप्त ह्या नवीन राजानें इ. स. ३२० वें वर्षीं पाटलीपुत्र येथील गादीचा जीर्णोद्धार केला. ह्या वेळेपर्यंत साम्राज्याचें ऐश्वर्य वायव्येस पेशावर येथें कुशानांच्या व दक्षिणेंत कृष्णेच्या कांठीं धनकटक येथें शातवाहनांच्या राजवटींत होतें. मध्यंतरीच्या अराजकानंतर चंद्रगुप्तानें पुनः पूर्वींचें मागधी साम्राज्य स्थापिलें. हें घराणें धर्मानें वैष्णव होतें. तरी ह्या घराण्यानें बौद्ध धर्माचा छळ न करतां त्याला आश्रय दिला, त्याचा मानमरातब राखला. केव्हां केव्हां कांहीं राजे बौद्धांना आपले खासगी गुरु करीत. तरी मुख्य राजधर्म वैष्णवच होता. ह्या घराण्यांत पुढें समुद्रगुप्त व विक्रमादित्य असे एकाहून एक प्रतापी व शहाणे राजे झाले. ह्यांचा काल हिंदुस्थानच्या इतिहासांतला सोन्याचा काल समजण्यांत येत आहे. भव्य देवळें, सुंदर मूर्ति, ह्यांचाच नव्हे तर संस्कृत भाषा, वाङ्मय, नाटकें इत्यादि साहित्याचाहि प्रसार ह्या काळांत फार झाला. कालिदास आणि नऊ कविरत्नें ह्याच वेळीं होतीं. महाभारत, रामायण, मनुस्मृति वगैरे ग्रंथांना हल्लींचें स्वरूप ह्याच काळीं प्राप्त झालें. एकंदरींत आतां ब्राह्मणी हिंदुधर्मानें बरीच उचल केली. बौद्ध धर्महि जोरांत होता, पण तो आंतून पोखरला जात होता. बौद्धांच्या संघांमध्यें पूर्वींचा जोम राहिला नव्हता. राजाश्रयामुळें त्याला जें दोंद सुटलें तेंच त्याला घातक झालें. मौर्यांचा –हास झाल्यापासून बौद्ध संघांत ब्राह्मणांचाच बहुतेक शिरकाव होऊं लागला होता. नागार्जुन ह्या विद्वान् ब्राह्मणानें महायान पंथ काढला, तेव्हांच बौद्ध धर्माला ब्राह्मणी स्वरूप प्राप्त झालें. संस्था काय किंवा व्यक्ति काय, ती वाढीला लागते, तेव्हांच तिच्यांत विनाशाचींहि बीजें शिरतात. एकंदरींत महायान स्वरूपांत बौद्ध धर्म भाळ्याभोळ्या बहुजनसमाजाला पूर्णपणें मोकळा झाला, हें खरें; पण त्याचा भरीवपणा जाऊन तो पोकळ होऊं लागला, हेंहि खरें. भक्तीबरोबर त्याच्यामध्यें भोळेपणा शिरून त्याच्या मागोमाग भामटेगिरी व ऐतखाऊपणाचाहि सुकाळ होऊं लागला. ब्राह्मण जात केव्हांहि चतुर आणि समंजस. “अशोकाच्याच वेळीं बौद्धांचा संघ बहुतेक सर्व ब्राह्मणांनींच आक्रमिला होता; हल्लीं जसें ब्रिटिश सरकारचें राजयंत्र आंतून ब्राह्मणांनीं व्यापिलें आहे, तसेंच भरभराटीचेहि काळीं बौद्धांचे संघ ब्राह्मणमयच बनले होते.” (History of Aryan Rule) पान १४८ इ. वि. हॅवेलचें असें जें म्हणणें आहे, तें “धूर्त चिटणिसापुढें काय कलेक्टर बापुडें” ह्या सत्यशोधकी म्हणण्याप्रमाणेंच मोठें मार्मिक आहे, यांत शंका नाहीं.

क्रियापदांच्या विभक्ति

 सर्वनामाचीं रूपें लागून ज्याप्रमाणें नामाची विभक्ति होते, त्याप्रमाणें इरु, अस, ह्या धातूंचीं निरनिराळीं रूपें कोणत्याहि धातूच्या भूतकाळवाचक कृदंताला लागून त्या त्या धातूचीं निरनिराळ्या काळांचीं अथवा अर्थांचीं रूपें सिद्ध झालीं आहेत, असें कानडींतील रूपांचें सूक्ष्म निरीक्षण केलें असतां आढळून येतें. हा प्रकार संस्कृतांत, विशेषतः प्राकृतांतहि आढळतो. पण मराठींतला जुना वर्तमानकाळ जाई, पाहे, असा जाऊन त्याचेऐवजीं वर सांगितल्याप्रमाणें कृदन्ताला ‘अस’ धातूचीं रूपें लागून होणारा जातो, पाहतो, असा नवीन वर्तमान आला; ह्याचें कारणहि कानडी प्रचारच असावा. कानडींत धातूंचें ‘त’ प्रत्ययांत कृदंत होऊन त्याला ‘इरु’ म्हणजे ‘अस’ धातूचीं तीनहि काळांचीं रूपें लागतात. मराठींत पूर्वीं भविष्यकाळाचीं निराळीं रूपें नव्हतीं. हल्लींच्या भविष्यकाळाचें कानडींतल्या भविष्यकाळाशीं खालीलप्रमाणें साम्य आहे. त्यावरून भविष्यकाळाचा ‘ल’ कानडींतून आला असावा असें वाटतें. मी करीन = नानु माडुवेनु; आम्ही करूं = नाऊ माडुवेवु. तो, ती करील = आवनु माडुवेनु, आवळु माडुवळु, तें करील = आदु माडुवदु.
मराठींतील द्वितीय पुरुषाचीं रूपें मात्र संस्कृताशीं अधिक जुळतात. वर्तमान काळाचें उदाहरण :- मूळ माडू = कर धातु. तिचें माडुत असें कृदन्त होतें. माडुत (करीत) इद्धानें (आहे), माडुताने, करीत आहे = करितोय = करितो असा नवीन वर्तमान, कृदन्त आणि अस धातूचें रूप मिळून कानडींत भूतकाळहि असाच ‘अस’ धातूच्या साह्यानें होतो; पण मराठींत मात्र बंगालीप्रमाणें ‘ल’ प्रत्ययाच्या साह्यानें भूतकाळ होतो. कानडींत ह्या ‘त’ चा ‘द’ होतो, व नंतर त्याच्यांत इरू = अस धातूच्या रूपांचा एकजीव होऊन भूतकाळचें रूप सिद्ध होतें. “बाहेर पातली मुनीश्वर दुहिता” ह्यांतील पातली ह्या मराठी शब्दाचें पोदळ ह्या त्याच अर्थीं भूतकालवाचक कानडी शब्दाशीं किती साम्य आहे हें ध्यानांत घेण्यासारखे आहे. ह्यावरून हा भूतकाळाचा ‘ल’ हि कानडीच्या भूतकाळाचे प्रत्यय न, द, र, यांवरूनच आला असावा असें वाटतें. संस्कृतांत आख्यात प्रत्ययांना लिंगविकार होत नाहीं. त्याचप्रमाणें संस्कृतावरून झालेल्या मराठींतील क्रियापदाच्या काळांच्या जुन्या रूपांतहि लिंगविकार नाहीं. पण नवीन काळांत हा लिंगविकार आहे. त्याचें कारण केवळ कृन्दत विशेषणाला लिंगविकार होतो, येवढेंच नसून, कानडींत हा लिंगविकाराचा प्रचार आहे हेंहि असावें. सुंदर, तिखट, वाईट, इ. अकारान्त विशेषणाला लिंगविकार होत नाहीं, मग अकार कृन्दताला तरी कां व्हावा? संयुक्त क्रियापदांचा प्रचार मराठीप्रमाणेंच कानडींतहि आहे. करून सोड = माडी बिडू; जेवण करून घे = ऊट माडीको; करून टाक = माडी वगी इ. आणखी ब-याच संयुक्त क्रियापदांचा प्रचार कानडीशीं विशेष जुळता आहे. नये हें क्रियापद केवळ बारदू या कानडी शब्दाची नक्कल आहे.
बा = ये; आणि रदुअदे हा नकारार्थी प्रत्यय आहे.

कौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया

वर्धा शिक्षण परिषदेंत ज्याचा विचार व योजना झाली तें केवळ पोटार्थी शिक्षण होय. तें महत्वाचें नाहीं असें नाहीं, पण पोट म्हणजेच मनुष्य नव्हे, पोट भरलें कीं सर्व संपलें असें नसून, उलट पोट भरल्यावर मानवी जीवित सुरू होतें. त्याचा आज विचार करणें कर्तव्य आहे. श्री ख्रिस्तांनीं वर्णिलेल्या दहा धन्यावस्था (Beautitudes) उद्बोधनाचे वेळीं वाचण्यांत आल्या त्यांचें संपादन म्हणजे आत्मीय शिक्षण होय. तें प्राचीनकाळीं गुरुकुलांतून देण्यांत येत होतें असें सांगतात. त्या कुलांची कौलिकता कोणत्या दर्जाची होती हें पाहूं. हीं कुलें निबिड अरण्यांत असत. आजच्यासारखीं गर्दीचीं शहरें प्राचीन काळीं मुळीं नव्हतींच. जीं त्या वेळीं होतीं, त्यांच्या उपाधीपासूनहि हीं ऋषिकुलें दूर असत. ह्यां कुलांत ऋषीबरोबर त्याची पत्नी किंबहुना पत्न्याहि असत. त्यांची सेवा शिष्यांना अगदीं घरच्याप्रमाणें करावी लागे. ह्या घरोब्याचा मोठा इष्ट परिणाम निरनिराळ्या ठिकाणांहून आलेल्या शागिर्दांवर कळत न कळतहि घडत असे. शिक्षण देणें हें खरोखरी आईबापांचेंच काम. अगदीं प्राचीन काळीं आईबापेंच हें करीत असले पाहिजेत. पुढें जसजशी समाजाची घटना विकीर्ण होत चालली, तसतसा श्रमविभाग अवश्य होऊन, आईबापांची जागा शिक्षणापुरती गुरु व त्याच्या पत्नीकडे गेली. तरी शाळांचें घरगुती स्वरूप कायमच राहिलें. मात्र एक व्यंग राहिलें, तें हें कीं शिष्यवर्गांत मुलींना स्थान मिळेनासें झालें. त्या आईबापांकडेच राहून, चूल, मूल, दूध-दुभतें, जळण-काटूक वगैरे हस्त व्यवसायांत वाकब होत असल्या तरी विचार व्यवसायाला त्या मुकल्या. इतक्या कीं, पुरुषांप्रमाणें विज्ञानांत व अध्यात्मांत स्त्रियांना गतीच नाहीं; व ब्राह्मणादि वरिष्ठ वर्गाच्या स्त्रियाहि जातीनें अथवा वर्णानें शूद्रच असा समज बळावला. स्त्रियो वैश्या तथा शूद्राः स्तेपि यांति परां गतिम् । हा गीतेचा उदारभावहि गीतेपूर्वींचा अनुदार भावच प्रकट करितो. गीतेचा हा उदारभावदेखील इंग्रज राणीच्या जाहीरनाम्याप्रमाणें पोकळ आशीर्वादच ठरला. कारण मनुस्मृतींसारख्यांनी अधिकृत हातांनीं तोहि काढून घेतला; आणि होतां होतां हीं पूर्वींचीं गुरुकुलेंहि बंद झालीं. शेवटीं वैचारिक शिक्षण म्हणजे केवळ ब्राह्मणांचाच मिराशी हक्क झाला. क्षत्रियांना त्यांत कमीपणा आणि वैश्यांना अजागळाप्रमाणें व्यर्थपणा वाटूं लागला ! एकूण अध्यात्म म्हणजे केवळ पोट भरण्याचा धंदा झाला. आणि ख-या शिक्षणाचें दिवाळें वाजलें !
पाश्चात्य देशांत मध्ययुगांत ऑक्सफर्ड, केंब्रिंज, सालामांका वगैरे गुरुकुलें निघालीं. पण तीं संन्याशांनीं काढलीं होतीं. त्यांत स्त्रियांना शिष्य म्हणूनच नव्हे तर गुरुपत्नी म्हणूनहि शिरकाव नव्हता. गाईला आत्मा नाहीं. स्त्री म्हणजे एक मानवी गाय हाच समज तिकडेहि होता. ह्या शतकाचे आरंभीं हें प्रवचन करणारा ऑक्सफर्ड येथें शिकत होता. तेव्हां स्त्रियांचीं कॉलेजेस् ऊर्फ हॉल्स होते. पण त्यांना पदव्या मिळणें अशक्य होतें. त्यांना पास झालेल्यांना पदव्या मिळाव्यात असा विचार थोड्या दिवसांपूर्वीं पुढें आला होता तेव्हां पुरुष विद्यार्थ्यांनीं इतका गिल्ला केला कीं कॉलेजच्या खिडक्यांना एकहि तावदान राहिलें नाहीं, असें कळलें. पास झालेल्या विद्यार्थिनींच्या भग्न आशाच जणूं ह्या वक्त्यानें पाहिल्या ! ऑक्सफर्डमध्यें अंशतः तरी तेव्हां शिक्षणांत कौलिकता दिसली. पदव्यांत असहकार असला तरी प्रत्यक्ष शिक्षणांत कांही अंशीं सहशिक्षण होत होतें. अध्यापक गृहस्थाश्रमी होते. इतकेंच नव्हे तर त्यांच्या पत्नीच्या व सर्व कुटुंबाच्या सहवासाचा इष्ट परिणाम तरुण विद्यार्थ्यांवर घडत असलेला स्पष्ट दिसला. फार काय, वर्षांतून दोनदां सुटी सुरू होण्यापूर्वीं, वार्षिक पदवीदान समारंभाचे वेळीं आणि Eight’s week म्हणजे आइसीस नदीवरील बोटींच्या शर्यतीचे वेळीं ऑक्सफर्ड शहरीं विद्यार्थ्यांच्या स्त्री-नातलगांचा मोठा सामाजिक मेळा भरविण्यांत येत असतो. त्या वेळीं तरुणतरुणींचा गोड मिलाफ फार फलदायक होतो, ह्यांत संशय नाहीं. ह्या बाबतींत युनिटेरिअन् मॅंचेस्टर कॉलेजांतील सामाजिक जीवित केवळ आदर्शभूत आहे. कॉलेजचे विद्यार्थी फार तर १५-२० च असतात. त्यांना अध्यापक ५-७ ! त्यांच्या बायका, बहिणी, मुली ह्या सर्वांशीं तेथील प्रौढ विद्यार्थ्यांचा हमेशा संबंध येतो. अध्यापकांचे घरीं पाळीपाळीनें सर्व विद्यार्थ्यांना चहाचें अगत्याचें आमंत्रण असतें. दर रविवारीं कॉलेजचे देवळांत जाहीर उपासना असते. शिवाय प्रत्येक टर्ममध्यें एक सामाजिक संमेलन असतेंच. ह्यामुळें शाळा म्हणजे मुदतीचा कैदखाना नसून सुधारून वाढविलेलें कुटुंब हा अनुभव विद्यार्थ्यांना वरचेवर येतो. ह्यामुळेंच येथील विद्यार्थी भावी पाळकपणाच्या जबाबदार वृत्तीला पात्र होतात. तें असो.
आमचेकडे काय चाललें आहे ? आमचीं कॉलेजें म्हणजे विद्यार्थ्यांची खिल्लारें. वसतीगृहें म्हणजे घोड्यांच्या पागा. प्रोफेसरांच्या बायका असतात. पण, त्यांच्या गोठ्यांत गाईहि असतात. विद्यार्थ्यांपासून दोन्ही सारख्याच दूर. विद्यार्थिनी वसतीगृहें एका कोप-यांत लाजून बसल्यासारखीं त्याच आवारांत असतात. पण त्यांच्या रस्त्यावर इकडून विद्यार्थ्यांना येण्याजाण्याला सक्त मनाई आहे अशा ठळक पाट्या लटकत असतात. जणूं इतरांना मोकळीच ! मग बिचा-यांना घरोबा कोठून मिळणार? दुधाची तहान ताकावर भागविण्याकरितां हे कमनशिबी प्राणी – मुलें-मुली - रेस्टॉरंट व सिनेमांत घुसतात. मग नवमतवाद बोकाळतो ! त्याचें कारण “उच्च” शिक्षणाचा पाया शुद्ध नाहीं हेंच. आई जेवूं घालीत नाहीं, बाप भीक मागूं देत नाहीं, अशी अनवस्था होते. फुकट्या उपदेशानें पोट कसें भरणार ? ह्याला उपाय काय? उपाय उघड व सोपा आहे. पुरुषविद्यार्थ्यांबरोबरच स्त्रीविद्यार्थ्यांचें शिक्षण झालें पाहिजे. तें हल्लीं कसेंबसें अंशतः चाललें आहे. मनापासून व पूर्णपणें, प्रवाहानें नव्हे; जाणूनबुजून जबाबदारपूर्वक चाललें पाहिजे. सहशिक्षण ही शिक्षणशास्त्राची आवश्यक शर्तच आहे. येथें टाळाटाळी काय उपयोगाची ? आईबापांच्या घरीं ज्या साहचर्यानें मुलांमुलींना भावंडपणा येतो, तोच अति कुशलतेनें, दक्षतेनें, विशेषतः सहानुभूतीनें अध्यापकांनीं आपल्या संस्थांतून आणिला पाहिजे. पण भावंडपणा मातृपितृपणाशिवाय कसा येणार ? मायेशिवाय रड नाहीं, जाळाशिवाय कढ नाहीं. पुरुषांचे शिक्षण पुरुष चालवितात. तसेंच स्त्रियांचें शिक्षण चालविण्याकरितां कांहीं स्त्रिया एम्. ए., बी. टी. टी. डी. चे झगे घालून दिमाखानें पुढें येत आहेत. फार ठीक. पण हा अर्धवटपणा पूर्वीं एकपक्षी होता तो आतां दोहोंपक्षीं झाला. दोन निम्मे एक गणितांत होतो तसा शिक्षणांत कसा होईल ? आंकडे निर्जीव व मानीव आहेत, तसे मानवी आहेत. नव्हत तेथें दोन अंक म्हणजे एक पूर्ण अंक ऊर्फ घटक चयार होतो. म्हणून सहाध्ययनाबरोबर सहाध्यापन आवश्यक आहे.
शिक्षकाची पत्नी म्हणजे शिकलेली बी. टी. पाहिजे असें नव्हे. ती नसलेलीच बरी. ती सहानुभूतीची स्त्री असली कीं पुरे. वकिलीच्या धंद्याला वकिलीण, डॉक्टरीच्या धंद्याला डॉक्टरीण पाहिजे असें नाहीं. पण शिक्षकाला त्याच्या पत्नीच्या साहचर्याची आवश्यकता आहे. शिक्षण कौलिकच पाहिजे. एरवीं शिक्षणाला हल्लींप्रमाणें गिरणीचें स्वरूप येतें. आम्ही खातों ते तांदूळहि हातानें सडावेत, नाहींतर त्यांतील कस व गोडी जाते, असें गांधी म्हणतात. पण विद्यार्थ्यांची गोडी व कस पार पिळून निघत आहे. ती वांचविणारा गांधी कधीं येणार ? विश्वविद्यालयांतून मातृभाषांचें माध्यम पाहिजे असें इतर ओरडतात. पाहिजे हें खरेंच. पण जेथें माताच नाहीं, तेथें नुसता भाषेचा कोण अट्टाहास ! मातेनें भाषा येईल, कां भाषेनें माता येईल ? शाळा म्हणजे कुटुंब होईल, त्या दिवशींच राष्ट्र म्हणजे बृहत् कुटुंब, तेव्हांच स्वराज्याची पोकळ बडबड थांबेल?
हे शिक्षणावरील विशेष आणि मूलभूत विचार आज प्रकट करण्याचें कारण कीं येथें पुणें शहरांतील तीन निरनिराळ्या वसतीगृहांतील पुरुष विद्यार्थी, आणि प्रार्थनासमाजाच्या मताचीं चार निरनिराळीं कौटुंबिक उपासनामंडळें सर्व दिवसभर धर्मसाधनासाठीं जमलीं आहेत. पुरुषविद्यार्थ्यांप्रमाणें तितकींच स्त्रीविद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची सोय अद्यापि कोणी करीत नाहीं हें मोठें दुर्दैव. आणि जरी तशी सोय झाली तरी त्यांचा सहयोग होण्याचे दिवस अजून आले नाहींत. अशी सहवसतीगृहें झालीं तरी, त्यांच्यावर दिवसरात्र देखरेख करणारे गुरु व गुरुपत्नीचें दांपत्य आपल्या प्रेम-पंखाखालीं आत्मीय शिक्षणाचें काम करूं लागल्याशिवाय धर्मशिक्षणाच्या वल्गना ज्या अलीकडे चालल्या आहेत त्या अगदीं व्यर्थ आहेत. असें कधीं होईल तेव्हां होवो; तूर्त हीं गृहें व हीं उपासनामंडळें ह्यांचा परस्पर परिचय व्हावा, स्नेह वाढावा, आणि सर्वांचें एक जिवंत जागृत आत्मियकुल बनावें, ह्या पवित्र हेतूनें आजचें हें संमेलन भरविण्यांत आलें आहे. लहानथोर स्त्रीपुरुष आज जवळ जवळ २०० चा जमाव ह्या (फर्ग्युसन कॉलेजजवळील) टेकडीवर उघड्या हवेंत जमला, ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. विश्वधर्माचा हा विजय आहे. तिसरे प्रहरीं संगत-सभा होईल त्यांत कांहीं तरी निश्चय करून पुढील वर्षीं सहकार्य सुरू व्हावें, म्हणजे बरें.

  1. कोंकणी व मराठी परस्पर संबंध
  2. कोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति
  3. केवळ ब्राह्मणेतर द्वेष
  4. केबा
  • 74
  • 75
  • 76
  • 77
  • 78
  • 79
  • 80
  • 81
  • 82
  • 83
Page 79 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी