1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

कोंकणी व मराठी परस्पर संबंध

 (१) आर्य आणि अनार्य (आर्येतर हिंदी) ह्यांच्या संस्कृतींची तुलना हा मुख्य विषय. त्यांच्या भाषांची तुलना हें त्यांच्या अध्ययनाचें एक मुख्य साधन. मराठी ही एक आर्यभाषेशीं संबंध असलेली प्रचलित भाषा, आणि कानडी ही तामिळशीं संबंध असलेली एक चालू भाषा. ह्यांचा निकट संबंध महाराष्ट्रांत गेल्या सहस्त्रकांत जुळला कसा, हें मीं इ. स. १९२३ चे अखेर ‘केसरी’ पत्रांत लेखद्वारा दाखविलें आहे. कारण हा निकट संबंध सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीनें विशेषतः तौलनिक-भाषा दृष्टीनें फार महत्त्वाचा आहे. त्याच दृष्टीनें कोंकणी व मराठीचाहि संबंध महत्त्वाचा आहे.
(२) कोंकणी (मालवण, गोंवा, मंगळूर इ. ठिकाणची) ही मराठीची उपभाषा गणली जात आहे. पण इतिहासाच्या दृष्टीनें हें विधान फारच कसोशीनें पारखणें जरूर आहे. मराठी, जी हल्लीं प्रौढ ग्रांथिक भाषा झाली आहे तिचा एक हजार वर्षांपूर्वींचा इतिहास माहीत नाहीं. किंबहुना तो होता कीं नाहीं हेंहि निश्चयानें आज सांगवत नाहीं. कोंकणी तर अशा प्रौढपणाला कधीं पोंचलीच नाहीं. पोर्तुगीजांच्या राक्षसी अत्याचारांतून ती आज जिवंत आहे, हेंच मोठें भाग्य. अशा परिस्थितींत ह्यांची तुलना करावयाची ती दोहोंच्या व्याकरणांवरूनच. कोंकणीचें सारस्वत नाहीं निदान तें उपलब्ध नाहीं. जें स्वल्प आहे, तें अगदीं अलीकडचें. कोंकणीचीं लहान लहान व्याकरणेंहि एकदोन शतकांतलींच, व तींहि सहज मिळत नाहींत. अशा अनेक अडचणी आहेत.

(३) डॉ. सबॅतियन रुदाल्फ दालगादो, D.D., D.C.L., G.C. हे एक सर भांडारकरांच्या तोडीचे नामांकित पंडित होऊन गेले. पूर्वाश्रमीचे सारस्वतब्राह्मणकुलोत्पन्न. शेवटीं ते रोमन कॅथॉलिक पंथाचे मोठे धर्माचार्य झाले. सुमारें पंचवीस वर्षांपूर्वीं त्यांनीं एक मोठा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यांत त्यांनीं २१७७ अस्सल कोंकणी म्हणी संपादन केल्या आहेत. (कोइँब्रा, पोर्तुगाल, इ. स. १९२२). हें एक वाङ्मयच म्हणावयाचें. ह्यांना पूर्व आशियांतील पुष्कळच प्रचलित भाषा अवगत होत्या. त्यांचा प्रवासहि विस्तृत होता. ह्यांनीं एक कोंकणी-पोर्तुगीज कोश (Glossari Lasso Asiatico-Coimbra Portugal, 1921 A.D.) पांच वर्षांपूर्वीं प्रसिद्ध केला. पण हे ग्रंथ परकीय भाषेंत आणि रोमन लिपींत आहेत. इ. स. १९१२ मध्यें “Influence of the Portugese Vocabulary on the Asiatic Languages” ह्या नांवाचा एक तौलनिक भाषाविषयक ग्रंथ ह्यांनीं प्रसिद्ध केला. ह्यावरून त्यांचें अनेक भाषाप्रभुत्व कळतें. कोंकणीच्या पूर्वापार संबंधाविषयीं ह्या पंडितानें आपल्या वरील ग्रंथांच्या प्रस्तावनांतून जे सिद्धान्त ग्रथित केले आहेत, त्यांचा सारांश असा :-
१. खुद्द गोमांतकांत नागर लोक जी भाषा बोलतात तीच खरी कोंकणी भाषा. उत्तरेकडे कुडाळीवर मराठीचा संस्कार, आणि दक्षिणेकडे मंगळूरांतील कोंकणीवर कानडीचा संस्कार, जास्त झाला आहे.
२. खुद्द गोमांतकांतहि हल्लींचे गोवनी भाषेंत एकदशांश शब्द पोर्तुगीज आहेत.
३. ही कोंकणी भाषा संस्कृत नाटकांतील बालभाषेसारखी आहे.
४. हिच्यांत कारकें, काळ, व धातुसाधितें विपुल आहेत; म्हणजे ही Inflective आहे. म्हणून ही संस्कृतजन्य भाषा आहे. द्राविड अथवा आर्येतर म्हणजे Agglutinative नाहीं.
५. व्याकरणदृष्ट्या ही मराठीहूनहि संस्कृतच्या अधिक जवळ आहे.
६. चालू मराठीपेक्षां जुन्या मराठीशीं हिचें सादृश्य अधिक आहे.
७. उच्चाराच्या दृष्टीनें (Phonology) ही गौडी भाषा आहे. विशेषतः बंगालीसारखी आहे.
८. ही मराठीची शाखा किंवा अपभ्रंश नव्हे.
९. सारस्वत ब्राह्मणांची जी भाषा नष्ट झाली असें कांहीं युरोपिअन प्राच्य भाषावेत्ते समजतात, ती हीच असावी. बिहार प्रांतांतील तिरहुतहून जे गौड सारस्वत कोंकणांत आले त्यांनीं ही कोंकणांत सुरू केली असावी. इ. इ.

(४) अलीकडे मुंबईचे रावसाहेब डॉ. चव्हाण ह्याच विषयावर व्याख्यानें देत असतात. ते हींच मतें प्रतिपादित आहेत. डॉ. दालगादो ह्यांचे ग्रंथ पोर्तुगीज भाषेंत आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार रा. सा. चव्हाण इंग्रजींत करीत आहेत, हा एक आम्हांवर उपकारच आहे. मराठींत करते, तर बहुजनसमाज ह्या उपकारांचा अधिक वांटेकरी झाला असता. तौलनिक व ऐतिहासिक व्याकरणांत अधिक खोल शिरून ह्या विषयावर त्यांनीं अधिक प्रकाश पाडावा अशी त्यांना विनंती आहे.

कोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति

(६) कोंकण ह्या नांवाच्या व्युत्पत्तीसंबंधीं ब-याच विद्वानांनीं आपले बरेच तर्क प्रसिद्ध केले आहेत. ते तर्क पुढीलप्रमाणें मी देत आहें. त्याची व्याप्ति हल्लींच्या कोइमतूर व सालेम ह्या तामिळ जिल्ह्यांत अशी प्राचीन नकाशांत ठरलेली होती. पण कोंग राष्ट्राचे लोक कदाचित् फिरते व कांहीं अंशीं जंगलीहि असावेत. त्यामुळें त्यांच्या राष्ट्राची व्याप्ति ह्या वर सांगितलेल्या हद्दीबाहेरहि पसरलेली असावी. गंग नांवाचें जें राजघराणें उत्तरेकडून येऊन म्हैसुरास प्रतिष्ठा पावलें, त्या राजांना कोंगणी वर्मा असा किताब होता, हें एल्. राइस आणि फ्लीट ह्यांच्या शोधांवरून उघड होतें. वर्मा हें क्षत्रियवाचक केवळ उपपद आहे. पण कोंगणी ह्या अस्सल द्राविडी पदांतील कोंगाण हेंच पद मुख्य आहे. कोंग ह्याचें संस्कृत केलेलें रूप गंग असणें मुळींच अशक्य नाहीं. कोंगण ह्या नांवांत काँग हें आर्येतर जातिवाचक नांव आहे. आण म्हणजे देश असा द्राविड शब्द आहे; त्याचें मूळ स्वरूप आळ् असें आहे. काड आणि काण असेहि अरण्य अगर शेत ह्या अर्थीं कानडींत व तुळु भाषेंत शब्द आहेत, ह्यावरून कोंगाण अथवा कोंकाण हें नांव सिद्ध होतें. ही व्युत्पत्ति जितकी सोपी आहे तितकीच उघड आहे. हिला हरकत काय ती एवढीच कीं, ह्या कोंग राष्ट्राची व्याप्ति प्राचीन नकाशांतून किना-यापासून किंचित् आंत देशावर ठरविण्यांत आली होती. परंतु ही हरकत भाषाशास्त्राची नसून भूगोलशास्त्राची आहे. आणि प्राचीन नकाशे आतांप्रमाणें पूर्णत्वाला पोंचले नव्हते. खालील माहितीवरून ही भौगोलिक हरकतहि निवारतां येण्यासारखी आहे. कोंग जातीचे लोक किना-यावरहि देशांतल्याप्रमाणें पसरलेले आढळतात. ह्या जंगली जातीची एक गुन्हेगार टोळी जमखिंडी संस्थानच्या तुरुंगांत धरून ठेवलेली मीं माझ्या बाळपणीं प्रत्यक्ष पाहिली आहे. शातवाहनाचें राज्य (इ. स. १५० नंतर) बुडाल्यावर त्यांचा दक्षिणेकडील बराच भाग गंग राजांनीं हस्तगत केला. त्याला गंगावाडी ऊर्फ गंगाडी (कोंगाडी) असें नांव होतें, असें एल्. राइस म्हणतो. कोंगाडी ह्या नांवाची एक जंगली जात ठाण्याकडे अद्यापि आढळते. ठाकरवाडी (ठाकरडे), नाईकवाडी (नायकोडे), असे लोक किना-याच्या प्रांतीं आढळतात. हे लोक दिसतात तसे मुळापासून जंगली नसून विपद्ग्रस्त असावेत. कोंकण हा प्रांत मुळांत महार, मांग, भिल्ल, ठाकूर, कोळी, कोंग इत्यादि एके काळीं राज्य केलेल्या लोकांचा होता. कदंबांनीं महारांपासून चालुक्यांनीं मांगांपासून, मौर्यांनीं कोळ्यांपासून राज्यें घेतल्याचे वगैरे जे पुरावे आहेत त्यांतच शोध केल्यास कोंगाचाहि पत्ता मिळणें अशक्य नाहीं. कोडग, कूर्गकोरग, ह्या जंगली व सुधारलेल्या जाती किना-यावर प्रसिद्धच आहेत. कोंग ह्या जातींचा “आण” म्हणजे देश जो कोंगाण, ह्याचा अपभ्रंश कोंकण ह्या नांवानें प्रसिद्ध आहे. चिरकाण, बागलाण, तुरकाण, वगैरे नांवांतहि हाच आण शब्द आहे, व तो अति प्राचीन द्राविड शब्द आहे. पण कोंग राष्ट्र हें द्राविड आहे, कीं कोळ, भिल्ल, माँग इत्यादि पूर्वेकडून द्राविडांच्याहि पूर्वीं आलेल्या अथवा येथीलच मूळ रहिवाशांपैकीं आहे हें ठरविण्यास मात्र पुरावा नाहीं. ते आर्य नाहींत एवढेंच तूर्त म्हणतां येईल. कोंकणाला अपरांत असें दुसरें संस्कृत नांव आहे. परंतु त्याचा प्रस्तुत विषयाशीं कांहींच संबंध नाहीं. म्हणून त्या संस्कृत नांवाचा येथें पाल्हाळ नको.
(७) तें कसेंहि असो, कोंग राष्ट्राशीं किंवा इतर कोणत्याहि एतद्देशीय रहिवाशांशीं चालू कोंकणी भाषेचा संबंध उत्तरेकडील कोणत्या तरी प्राकृताशीं पोंचतो : आणि विशेषेंकरून तिच्यांत कांहीं फार जुनीं संस्कृत रूपें मराठीहूनहि जास्त आढळतात. त्यावरून विशेषत: ही भाषा कोंकणांतली स्थानिक नसून उपरी आहे, एवढें तरी सिद्ध होतें.

केवळ ब्राह्मणेतर द्वेष

मागील तीन अंकांत रा. राजवाड्यांनीं जवळ जवळ अखिल महाराष्ट्राची नाचक्की केली आहे हें दाखविलें. त्यांचें संशोधन म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादावरील एक चित्पावनी पांचवा वेदच म्हटलें तरी चालेल. ह्या आधुनिक परशुरामानें २२ वे वेळां पृथ्वी निःक्षत्रिय करून सबंध महाराष्ट्राला आग लावण्याचा घाट घातला आहे. पान १९८ वर, विश्वामित्रावरहि ह्मण करण्याच्या महत्वाकांक्षेनें ह्या ब्राह्मणानें वर्णव्यवस्थेच्या उपक्रमाची एक नवीनच सृष्टी निर्माण केली आहे. ती अशी : “ (१) प्रथम ब्राह्मण उर्फ ब्रह्मन् हा एकच शुक्लभाश्वर वर्णी वर्ण होता. (२) त्याला रक्तलोहित वर्णी क्षेत्र उर्फ क्षत्रिय लोक भेटून ब्रह्मक्षत्र नामक द्वैवर्ण्य बनलें. (३) पुढें विश लोक सामावून त्रैवर्ण्य उत्पन्न झालें. (४) शेवटीं उत्तर कुरूंत व उत्तर मद्रांत कृष्णवर्ण शूद्रांचा समावेश होऊन जगप्रसिद्ध चातुर्वर्ण्य झालें.” रा. राजवाड्यांच्या मतें ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हेही जणूं रक्तानें भिन्न आहेत असें त्यांच्या ह्या लिहीण्यावरून दिसतें. ब्राह्मण हेच आर्य बाकीचे कोणीतरी. कदाचित चित्पावन तेवढेच आर्य असतील ! एकूण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तिघे एकजात आर्य हें मतहि राजवाड्यांच्या सोंवळ्याला चालत नाहिंसें दिसतें ! इतकेंच नव्हे, तर त्यांच्या स्वप्नसृष्टींत आर्याचा असा एक काल होता कीं आर्यांचे सारे आदमी (औरती नव्हेत, त्या शूद्राहूनहि अधम) गण्या, गोप्या, ढौल्या, दगड्या-चट सारे, पळीपंचपात्री वाजविणारे सफेतीहून पांढरे ब्राह्मणच होते. ह्यांत ते एकच गोष्ट सांगावयाला विसरले कीं हे सगळे आदमी चित्पावनच होते. असो. ह्या एकजात पांढ-यांनीं हळूहळू रंगितांच्या औरती लाटल्या आणि जीं पोरटीं झालीं, तीं बापाच्या वाणाचीं समजण्यांत आलीं. ह्यालाच पितृसावर्ण्य असें जाडें नांव आहे. पुढें गौतम बुद्ध नांवाच्या एका सोंगाड्या संन्याशानें फार घाण केली. कां, तर त्यानें आर्यांची कंदुरी आणि रक्ताभाताचा नैवेद्य बंद केला. तो स्त्रिया व शुद्रांना वेदांतील गुपित सांगूं लागला ! तो चित्पावन असता तरी आमच्या ह्या परिसरामाला खपतें. पण तो एक दुष्ट क्षत्रिय होता. दुष्ट कसा म्हणाल तर त्याला पळीपंचपात्रीचा वीट आला होता. आणि त्यांने स्त्री-शूद्रांना (जे भाळे भोळे गौतमाच्या काळापूर्वीं ब्राह्मणांच्या पायांवर लोटांगण घालीत होते,) ब्राह्मणांच्या पायांवरून उचलून त्यांच्या स्वतःच्या तंगडीवर उभे राहण्यास शिकविलें ! त्यामुळें हल्लींच्या जाती झाल्या, असें हे परिसराम संशोधक सांगतात. बौद्धधर्मामुळें सबगोलंकार झाला अशी कोल्हेकुई आजवर ऐकूं येत होती, तर आतां आपल्या परिसरामाला बौद्धामुळें जातिभेद माजला असें म्हणण्याची उलटी वाचा फुटूं लागली आहे. काळीज उलटें तेथें वाचा कशी सुलटी असावी !
“बौद्धामुळें आपल्या आयाबहिणींची चालरीत सारी गेली” अशी पांढ-या ब्राह्मणांस काळजी पडली म्हणून त्यांनीं मातृसावर्ण्याचा कायदा केला, असा राजवाड्यांनीं शोध लावला आहे ! जणूं ते करतील तीच पूर्वदिशा; निदान राजवाड्यांची अशी समजूत दिसते. ते म्हणतात कीं बुद्धाच्या काळापर्यंत पांढरा नर व मादी ह्यांचे पोटीं जी प्रजा होई तिचा वाण पांढरा समजला जाई. म्हणजे पितृसावर्ण्याचा कायदा होता. पुढें बुद्धानें जें पाखंड माजविलें त्यामुळें ब्राह्मणांना आपल्या आयाबहिणींची नीति सांभाळण्याकरितां अशा प्रजेचा वाण ठरवावा लागला. म्हणजे संस्कृत भाषेंत सांगावयाचें झाल्यास मातृसावर्ण्याचा कायदा करावा लागला. हा ब्राह्मणी कायदा कधीं कोणीं केला असो वा नसो, पण त्याबद्दल प्रायश्चित् बौद्ध धर्माला काय म्हणून ? चोर सांपडत नाहीं तर संन्याशाला बळी देण्याचाच हा न्याय दिसतो ! ज्याअर्थीं बौद्ध हे सोंगाडे संन्याशी त्याअर्थी त्यांना सुळीं देण्यांत पुण्यच आहे ! ते ब्राह्मण असते तर त्यांच्याकडे वांकड्या डोळ्यांनीं पाहण्याचीहि कोणी छाती करूं नये असें मनुस्मृति म्हणाली असती. त्यांनीं शूद्र स्त्रीशीं दंगामस्ती केली म्हणून काय झालें ? पण तेंच उलट जर एखाद्या शूद्रानें एखाद्या ब्राह्मणीवर हात टाकला तर त्याला नुसती देहान्त शिक्षाच नव्हे तर त्याच्या पुढील पिढ्यांना यावच्चंद्रदिवाकरौ अस्पृश्यपणाची सजा ! आणि ह्याचें कारण काय तर राजवाडे म्हणतात बौद्ध धर्म !! राजवाड्यांच्या विचारांचा व भाषेचा ग्राम्यपणा हुबेहूब दाखवावा म्हणून आम्हीं मुद्दाम ह्या रकान्यांतील भाषा त्यांना आवडेल अशी स्वीकारली आहे. अमेरिकेंतील निग्रो स्त्रीपुरुषांसंबंधी तेथील हल्लींचे पांढरे नराधम जे लिंचिंगचे रूपानें अत्याचार व अनाचार करितात, तेच बुद्ध पूर्वकालीं व किंचित् उत्तर काळींही ब्रम्हावर्तांत चालूं होते; व ते अजीबात बंद करण्यासाठीं पितृसावर्ण्याचे ऐवजीं मातृसावर्ण्याचा कायदा करून ब्राह्मणांनीं मोठें पुण्य जोडलें, असा राजवाड्यांच्या पराशर स्मृतीचा भावार्थ दिसतो.
हिंदुस्थानांतील मानववंशमीमांसेची अशी मखलाशी करूनच राजवाड्यांनीं ब्राह्मणांचा वरिष्ठपणा स्थापण्याचा हा प्रयत्न केला आहे असें नव्हे तर, भाषा विकासमीमांसेंतहि त्यांनीं असाच पक्षपात दाखविला आहे. त्यांच्या मतें संस्कृत भाषा काय ती ब्राह्मणांनाच येत होती व तीही ब्राह्मण पुरुषांलाच. बाकी चट् सा-या मानव प्राण्याची आणि ब्राह्मणांच्या बायकांची देखील त्या भाषेंत जीभच वळत नव्हती; म्हणून ते सर्व प्राणी हेंगाडी प्राकृत त्यांना ‘शौद्री’ बोली बोलत असत, असा शेरा दिमाखानें मारला आहे. जैन बौद्ध क्षत्रियांनीं आपला धर्म, स्त्रिया, वैश्य आणि शूद्रांमध्यें अफाट पसरला. इतकेंच नव्हे तर विद्येंत मागासलेल्या दक्षिण प्रांतीं जंगली जातींतहि ह्या बौद्ध जैन प्रचारकांनीं अत्यंत विरक्त आणि दिगंबर राहून आपल्या उदार धर्मांप्रमाणें आपल्या संस्कृत वाङ्मयाचा आणि विविध साहित्याचा किती झपाट्यानें प्रसार केला हें ज्यांना समजून घ्यावयाचें असेल त्यांनीं आम्हीं गेल्या अंकांत सांगितलेले विजयनगरचे प्रोफेसरद्वय रामस्वामी अयंगार आणि बी. शेषगिरीराव ह्यांचें गेल्या वर्षीं प्रसिद्ध झालेलें पुस्तक वाचावें; म्हणजे राजवाड्यांची वरील गर्वोक्ति किती फोल आणि दुःखावर डाग देण्यासारखी क्रूर आहे हें स्पष्ट दिसेल.
रा. राजवाड्यांच्या चातुर्वर्ण्यासंबंधीं कल्पना फारच गांवढळपणाच्या व अनैतिहासिक आहेत. ते म्हणतात त्याप्रमाणें चातुर्वर्ण्याची संस्था केवळ हिंदुस्थानच्या हद्दीवरील उत्तर कुरूंतच हिंदी आर्यांमध्यें होती असें नसून, ही संस्था इराणांतील आर्यांमध्यें, व शिवाय हिंदुस्थानाबाहेर राहणा-या प्राचीन शक पार्थवांमध्येंहि रूढ होती. अथ्रवण = ब्राह्मण, रथयेष्ठारः = रठ्ठे (ऊर्फ क्षत्रिय), वास्त्रियस् = विश, हूतोक्ष = हूईटी (शूदोई शूद्र) असे वर्ण व तद्वाचक वरील शब्द हिंदुस्थानाच्या बाहेरिल झेंद अवेस्ता भाषेंत होता. ह्यावरून शूद्र हे देखील (निदान ह्या शब्दांनीं ओळखलें गेलेलें राष्ट्र तरी) खात्रीनें अनार्यच होते कीं नाहीं याचा संशय येत आहे. उलटपक्षीं ब्राह्मण आणि सूर्यवंशी क्षत्रिय हे वर्ण द्राविड अथवा अनार्य होते असें पार्जीटरचें मत आहे. शूद्र हा शब्द वेदांत आढळत नाहीं. तो पुरुषसूक्तांतच “पद्भयां शूद्रो अजायत” असा आढळतो. पण पुरुषसूक्त हा वेदांतील अगदीं अलीकडचा भाग असून तो प्रक्षिप्त असावा असाहि कांहीं ख-या संशोधकांचा तर्क आहे. “कंदाहारांत शूद्रोई नांवाचें एक राष्ट्र होतें व दक्षिण सिंधू नदीचे तीरावर शूद्रोस ह्या नांवाचें एक शहर होतें” असें लासन् नांवाच्या जर्मन वैदिक संशोधकाचें म्हणणें आहे. परंतु ब्राह्मण तेवढेच आर्य आणि शूद्र म्हटलें कीं सारे अनार्यच-नव्हे तर कुत्र्यांहून देखील कमी-अशा ज्या गांवढळांची समजूत आहे, त्यांच्यापुढें जर्मन पंडितांचेंच काय पण प्रत्यक्ष स्वर्गांतील बृहस्पतीचेंहि मत आणून ठेविलें तरी त्यांचा ब्राह्मणेतरद्वेष कसा कमी व्हावा ! अशाच ब्राह्मणांनीं आज दोन हजार वर्षें हिंदुस्थानांत ब्राह्मण आणि शूद्र ह्या दोनच जाती आहेत, परशुरामानें २१ वेळां पृथ्वी निःक्षत्रिय केली, वैश्यांची तर उत्तमांत गणनाच नाहीं; वगैरे वगैरे मतें ब्राह्मणेतरांच्या रोमरंध्रांतून समरस करून दिलीं आहेत.
ज्यांच्या डोळ्यांत क्षत्रिय व वैश्य भरत नाहींत त्यांनीं “अतिशूद्र” ह्या नांवानें “अस्पृश्य” गणलेल्या महारामांगांना बरें पाहावें ही तर अशक्यच गोष्ट. जणूं काय महारांमांगांना चार शिव्या हासडल्याशिवाय शहाजीचें चरित्र पुरें होतच नाहीं. म्हणून, पान १४१ वर राजवाड्यांच्या लेखणींतून खालील मुक्ताफळें गळून पडलीं आहेत. “त्रैवर्णिक ज्याला दासकर्म म्हणत, तें अर्धरानटी शूद्र उच्च व सुखाचें कर्म समजत. सध्यां महारमांग लोक यूरोपियनांच्या रेल्वेवर खडी फोडण्यांत जसा अभिमान बाळगितात व ग्रामसंस्थेंत महारकी करीत बसण्यापेक्षां खडी फोडण्याची कामगिरी करण्यांत उच्चतर व किफायतशीर धंदा मिळाला म्हणून संतोष मानतात, तसाच अभिमान व संतोष त्रैवर्णिकांची वेठबिगार करण्यांत त्या कालच्या अर्धरानटी शूद्रांना वाटे.” बिचा-या महारामांगांनो ! खरेंच कां अझुनी तुम्ही इतके नादान आहांत !! आजकालच्या महारामांगांच्या सात्त्विक महत्त्वाकांक्षा ज्या राजवाड्यांना दिसत नाहींत, त्यांनीं वेद कालच्या “शूद्र” नांवाच्या बाणेदार राष्ट्राचा उकिरडा कां फुंकावा हें गूढ आम्हांला कळत नाहीं. पान १४० वर त्यांनीं वैश्यांचीहि अशीच नाहक कुरापत काढली आहे.
ते म्हणतात, वैश्य हे “स्वास्थ्याच्या काळांत ब्रह्मक्षत्रियांहून जास्त पटाईत असत; परंतु डावपेंचाच्या व ठोकाठोकीच्या कामांत पंगू असत. ह्या पंगू पण द्रव्योत्पादक टोळीला ब्रह्मक्षत्रियांनीं विश हें नांव ठेविलें, परंतु त्यांचें मूळ नांव पणी असावें, व हे पश्चिमेकडील पणी लोकांचें - ज्यांना आधुनिक युरोपिअन लोक फिनीशिअन्स व प्राचीन रोमन प्यूनिक म्हणतात - सवंश असावेत, किंवा पूर्वेकडील पीतवर्ण चिनी लोकांशीं वंशसंबद्ध असावेत.” पण ही सर्व मीमांसा वैश्यांना पंगू म्हटल्याशिवाय राजवाड्यांना करतां आली नसती काय? पंगूंत पंगू जात ब्राह्मणांची; पण तीच आज, ज्या जातींत पूर्वीं हर्षवर्धनासारखे सम्राट् निपजले तिला म्हणते पंगू! ‘लंगडं तें लंगडं, पण गांवदरीला बी चरत न्है’ अशी एक कुणब्यांत म्हण आहे, ती राजवाड्यांना लागू पडते. पणी शब्दावर जी त्यांनीं व्युत्पत्तीची कोटी लढविली आहे तीहि अशीच लंगडी दिसते. कारण पृथु नांवाचें प्राचीन राष्ट्र भारतीय युद्धाच्या पुष्कळ पूर्वीं हिंदुस्थानच्या सरहद्दीवर होतें. त्याचें मूळचें नांव पर्णी असें होतें, असें प्राचीन रोमन इतिहासकार स्ट्रॅबो ह्याचें म्हणणें आहे. ह्यावरून पणी हे फिनिशिअन्स किंवा पंगू वैश्य नसून पृथु, पार्थव, अथवा पल्लव नांवाचे शूर क्षत्रिय वर्णाचें व बहुतकरून आर्यवंशाचें एक राष्ट्र होतें; इतकेंच नव्हे तर त्या पर्णी अथवा पल्लवांनीं, रोमन लोकांच्या ज्या स्वा-यावर स्वा-या ख्रिस्ती शकापूर्वीं इराणावर झाल्या त्या मागें हटवून सुमारें ५०० वर्षेंपर्यंत भूमध्य समुद्रापासून तों पंजाबापर्यंत एक मोठें साम्राज्य चालविलें. त्याच पल्लवांशीं मराठ्यांचें अतिसाम्य आहे हें मागील अंकांत सांगितलेंच आहे. त्याचा विस्तार करण्यास येथें स्थळ नाहीं. पुढें केव्हांतरी ह्या साम्याचा विस्तारपूर्वक विचार करूं.
थोडक्यांत समारोप करावयाचा झाल्यास राजवाड्यांना कोणाचेंच बरें पाहावत नाहीं असें दिसतें ! दुर्योधनाप्रमाणें त्यांना स्वतःशिवाय सर्व जग वाईटच दिसत असावें काय? जातीनें जरी ते ब्राह्मण म्हणवितात तरी ज्याच्या त्याच्यावर ते आपली लाठी उगारल्याशिवाय संशोधनाचें (?) एक पाऊलहि टाकण्याची त्यांची पात्रता दिसत नाहीं. शठं प्रति लाठ्यं हा क्षत्रियांचा गुण. जैन बौद्धांनीं तोहि टाकून दिला. पण निरुपद्रवी किंबहुना निराश्रितांवरहि राजवाड्यांची लाठी चालते; मात्र ते ब्राह्मण व त्यांतल्या त्यांत चित्पावन नसावेत इतकेंच त्यांचें पाहणें असतें! हा कसला गुण अथवा कोणता वर्ण !! अतिशूद्रालाहि हा गुण साधणें कठीण !! ह्या उर्मटपणालाच राजवाडेसाहेब राष्ट्रीयपणा असें समजत असावेत. नाहीं तर ब्राह्मणापेक्षां वैश्य पंगू असें त्यांना कां वाटलें असतें? राष्ट्रीयपणाचें हें एक विशिष्ट लक्षण अशी गैरसमजूत विशेषतः महाराष्ट्रांत अलीकडे पसरूं लागली आहे. हा लाठी-प्रयोग निदान राधामाधवविलासचंपूंत तरी नसेल असें आम्हांस वाटलें होतें; पण विपरीत प्रकार येथेंहि दिसल्यामुळें आम्हांला टीकेची लाठी उचलावी लागली, ह्याबद्दल आम्ही दिलगीर आहों. ब्राह्मण येथून तेथून सर्वच वाईट असें कोणीहि ब्राह्मणेतरांनीं म्हणूं नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. पण राजवाड्यांसारख्यापुढें आमचा नाइलाज होतो. चित्पावनांतहि भूषणभूत रत्नें गेल्या पिढींत झालीं; पुढें होतील. प्रागतिक म्हणजे केवळ पोटार्थी नव्हे हें आगरकरांनींच आपल्या त्यागानें दाखविलें; राष्ट्रीय म्हणजे उर्मट नव्हे हें गोखल्यांनीं आपल्या विनयानें शिकविलें; फार काय पण संशोधक म्हणजे केवळ उकिरडा उकरणारा नव्हे, हें श्री. चिं. वि. वैद्य अद्यापि आपल्या जबाबदार परिश्रमानें सिद्ध करीत आहेत. पण असे अपवाद थोडे. उलट ब्राह्मण म्हणविणा-यांत चहूंकडे “वाचि वीर्यंद्विजानो” ऊर्फ लाठीप्रयोगाचाच सुकाळ झाल्यानें त्या संसर्गामुळें राजवाड्यांच्या लेखणीनें दोन हजार वर्षांपासून इतिहासांत प्रसिद्ध झालेल्या मराठ्यांवर अराष्ट्रीयत्वाचा वार केला ना ! आणि तोहि शहाजी शिवाजीच्या नांवानें ! अर्वाचीन मराठ्यांवरचा राग त्यांनीं गौतम, महावीर इत्यादि प्राचीन क्षत्रिय आचार्यांवर काढून, त्यांच्या प्रचारकांची गणना सोंगाड्या संन्याशांत तरी निदान इतक्या उद्दामपणानें करावयाला नको होती. समजा, एखाद्या जैनाला राग येऊन, त्यांनीं राजवाड्यांना ‘हिजडे संशोधक’ म्हटलें तर त्यांना व त्यांच्या जातभाईंना तें आवडले काय?
विक्षिप्तपणा, उर्मटपणा, एकपक्षीयता इत्यादि विक्षोभकारी दुर्गुण नसते तर राजवाड्यांच्या लेखणीचा आजकाल होत आहे त्यापेक्षां किती तरी पटींनीं जास्त गौरव झाला असता. संशोधनाच्या कामीं त्यांनीं जी दगदग सोशिली आहे व जी सेवा बजावली आहे तीहून जास्त फारच थोड्यांनीं बजावली असेल, हें आम्हीं त्यांना प्रत्यक्ष पाहिलें नाहीं तरी त्यांच्या परिश्रमावरून म्हणूं शकतों. प्रस्तुत ग्रंथांतहि त्यांनीं जी वर्णनीय तडफ दाखविली आहे, तिचेबद्दल आम्हीं त्यांचें अभिनंदन प्रथमच केलें आहे. पुढल्या पिढ्यांनीं त्यांना कलमबहाद्दर म्हणून आठवावें; हा कोणी एक कलमकसाई होता असें हिणवूं नये, एवढीच आमची इच्छा आहे, आणि ह्या इच्छेनेंच त्यांच्या लेखणीच्या वारांनीं ज्या कोणा मुक्या-पांगुळ्यांना जखमा झाल्या असतील त्यांची आम्ही ह्या टीकेच्या मिषानें शुश्रूषा केला आहे. “आर्तत्राणाय वः शस्त्रं न प्रहर्तु मनागसि” इतकें सुचवून राजवाड्यांची आम्ही रजा घेतों.

केबा

केबा : पूर्वींप्रमाणें हे महारोगी, अपंग, बेवारशी भिकारी लोक अजून मोठमोठ्या देवळांच्या वाटेवर याचना करीत बसलेले आढळतात. असे अपंग याचना करीत बसलेले मीं इतालीसारख्या प्राचीन अमदानींतल्या रोम व इतर क्षेत्रांचा ठिकाणीं यूरोपांतहि प्रत्यक्ष पाहिले. आमच्या हिंदुस्थानांतल्या क्षेत्रांतल्या भिका-यांचा येथें उल्लेखहि करण्याची मुळीं गरज नाहीं. हा वर्ग समाजबाह्य आहे ह्यांत कांहींच नवल नाहीं. मात्र मंडालेपासून ८।१० मैलांवर असलेल्या मेंढाई नांवाच्या खेड्याजवळ केबांची मीं एक स्वतंत्र लहानशी वसाहतच पाहिली. ती मीं पुढें विस्तारानें वर्णिली आहे.
चौथा वर्ग जो माफीच्या गुन्हेगारवर्गाचा तो हल्लीं ब्रिटिश अमदानींत कोठेंच आढळणें शक्य नाहीं. पूर्वींच्या स्वराज्यांत ‘राजा कालास्य कारणम्’ हें तत्त्व जोरावर होतें. राजाची वैयक्तिक मर्जी संपादन केल्यावर प्याद्याचा जसा फर्जी तसाच सात खून करून आपली हुशारी दाखविणाराला माफी मिळून उलट शहर कोतवाली मिळविणारांचीं बरींच उदाहरणें पाहण्यासाठीं ख-या संशोधकाला ब्रह्मदेशापर्यंत फार लांब जावयासहि नको. हल्लींच्या कोठल्या लोकछंदानुवर्ति ब्यूरॉक्रसीच्या सी. आय. डी. मध्येंहि असले पाणीदार माफीबहाद्दर शोधीत बसल्यास मिळणार नाहींत अशी कोण हमी घेईल ? मात्र पूर्वींच्या ब्रह्मी स्वराज्यांत अशा लोकांना दरबारांत जरी वेतन मिळे तरी तेवढ्यावरून समाजांत त्यांना मान्यता न मिळतां उलट बहिष्कार पडे असें ब्रह्मदेशाच्या वाङ्मयांत वाचिलें आहे. पॅगवे हे अशा पोलीस व जेलर लोकांना नांव पडण्याचें कारण ह्यांच्या गालांवर ह्यांनीं पूर्वीं केलेल्या गुन्ह्यांची कायमची निशाणी म्हणून एक गोलाकार शिक्का मारलेला असे. अलिकडच्या  कांहीं गुन्हेगारांना पाश्चात्य सुधारलेल्या सोन्याच्या तलवारी नजर करण्यांत आल्या आहेत हा जुन्यानव्यांत एक फरक ध्यानांत धरण्यासारखा आहे. एरवीं पाणीदार गुन्हेगारांना उगाच शिक्षेंत खितपत न टाकतां आतांप्रमाणेंच पूर्वींहि कोठें कोठें समाजकार्याला लावण्यांत येत होतें हें ह्या ब्रह्मदेशांतील उदाहरणावरून उघड होतें.
असो. येथपर्यंत मीं ह्या चार पांच बहिष्कृत वर्गांचा उल्लेख व वर्णन केलें. ब्रह्मदेशांत जाईपर्यंत व गेल्यावरहि कित्येक आठवडे येथें आमच्या देशांतल्याप्रमाणें ग्रामबहिष्कृतवर्ग असेल अशी कल्पनाहि माझ्या मनाला शिवली नाहीं. पण वर सांगितल्याप्रमाणें अकस्मात मीं जेव्हां असे वर्ग कांहीं विवक्षित प्राचीन ठिकाणींच आढळण्यासारखे आहेत असें ऐकल्यावर मीं त्यांचा जारीनें शोध चालविला. पण दक्षिण ब्रह्मदेशांतील पुराणमतवादी अशिक्षित ब्रह्मी लोकांकडून मला त्यांची थोडीबहुत माहिती मिळाली. पण तीहि उडवाउडवीनेंच मिळूं लागली. म्हणून उत्तर ब्रह्मदेशांत बौद्धधर्माचें खरें साधन पाहावयास गेलों असतां खालील पांच खेडीं मीं ह्या निरनिराळ्या वर्गाची वस्तुस्थिति प्रत्यक्ष घरोघर जाऊन निरीक्षण करण्याकरितां निवडून काढिलीं. त्यांपैकीं तु. डै डो. ह्या (हलालखोर) वर्गांचें मात्र प्रत्यक्ष पाहण्यास मला वेळ मिळाला नाहीं. पण बाकीच्या चार ठिकाणीं मात्र मी चांगला सुशिक्षित जाणत्या ब्रह्मी दुभाष्याला घेऊन घरोघरीं फिरून ह्या निराळ्या वर्गांतल्या वृद्ध आणि वजनदार लोकांना भेटून त्यांनीं दिलेलीं उत्तरें व शिवाय प्रत्यक्ष स्थिति निरखून पाहून खालचीं सविस्तर टिपणें लिहिलीं आहेत तीं माझ्या रोजनिशीवरून येथें थोडक्यांत उतरून घेत आहे. प्रोम शहराजवळील खेड्यांत मात्र माझी जी खडतर निराशा झाली ती पुढें दिलीच आहे.
येथें मला एक गोष्ट नमुद करणें अवश्य वाटत आहे कीं, ही ह्या बहिष्कृत वर्गांची स्थिति आतां अगदीं झपाट्यानें सुधारत आहे. आणखी १०।१५ वर्षांत मला दिसलीं तितकीं तरी ठिकाणें व कुटुंबें मीं पाहिलेल्या स्थितींत पुढील संशोधकांस आढळतील कीं नाहीं ह्याची मला जबर शंकाच वाटत आहे. फार तर काय आतां आतांहि ह्या बहिष्कृत वर्गांना त्यांच्या मूळ नांवानें संबोधण्याचें मोठें शिताफीचें व धैर्याचें काम आहे. ब्रह्मी लोकांचा स्वभाव अत्यंत चिडखोर, उतावळा व तामसी आहे. थोड्या कारणावरून ते वर्दळीला येऊन हातघाई करितात. त्यामुळें दुभाष्याचें काम करून ही नसती उठाठेव करण्यास मला शांत व समंजस माणसें मिळणेंहि बरेच वेळां मुष्किलीचें झालें व पुष्कळदां अर्ध्या दमाच्या दुभाष्यांनीं माझी ऐन वेळीं निराशा करून माझा बेत ढासळून टाकला. म्हणून माझा सर्व भार माझ्यावर किंवा वाटाड्यावरच न टाकतां अगोदर अनेक उपायांनीं खालील ठिकाणच्या लोकांचा विश्वास मला संपादावा लागला. ब्रह्मी लोक जितके उतावळे तितकेच भोळे व दिलदारहि आहेत. विश्वास बसल्यावर ते आपलें सर्व हितगुज - आपल्या उलट असलें तरी मोकळ्या मनानें सांगतील, हा भरंवसा मला अंतःकृत आधुनिक सुशिक्षणानें अर्धवट भाजून निघालेल्या ब्रह्मी लोकांच्या समागमानें जो आला नाहीं, तो तेथील बहिष्कृतांच्या समागमांत आला. हिंदुस्थानांत काय किंवा कोठें काय वरिष्ठ म्हणून गाजणा-यापेक्षां त्यांनीं पायाखालीं तुडविलेल्या कनिष्ठ वर्गांतच त्या राष्ट्राच्या ख-या माणुसकीचीं व स्थानिक स्वभावाचीं लक्षणें सुक्ष्म संशोधकांस जास्त आढळून येण्यासारखीं आहेत हें मीं माझ्या निरनिराळ्या देशांतील आजन्म घेतलेल्या अनुभवांवरून म्हणूं शकतों !

कुशान-काळ

पुढें मौर्यांचा अस्त होऊन, कुशान ह्या तुर्की राजकुलाचा उदय झाला. ह्यांची पेशावर आणि तक्षशिला येथें राजधानी होती. हे परकीय जातीचे होते तरी पण धर्मानें बौद्धच होते. तसेंच कंदाहार (गांधार) येथील ग्रीक राजांनींहि बौद्ध धर्मच स्वीकारला होता. ह्या सुमारास सर्व मध्य एशियाभर बौद्धांचा विस्तार होता. अशोकाच्या काळापर्यंत प्रत्यक्ष बुद्धाच्या मूर्ति बनवून त्याची पूजा करण्याची वहिवाट नव्हती. भव्य स्तूप आणि विहार होते, तरी त्यांतून अश्वत्थ वृक्ष, बुद्धाच्या पादुका वगैरे चिन्हांचीच पूजा होत असे. हत्ती, मोर, वानर, बोकड, बैल इ, प्राण्यांचीं सुंदर उठावदार चिंत्रें, यक्ष, गंधर्व, किन्नर इ. देवादिकांच्या मूर्तीदेखील बुद्ध गुरूची पूजा करीत आहेत, असे देखावे कोरलेले असत. पण पुढें कुशान आणि यवन ह्या परकीय लोकांनीं आपल्या पूर्वसंस्कारानुरूप बुद्धाच्याच सुंदर मूर्ति कोरण्यास सुरुवात केली. इतकेंच नव्हे तर देव म्हणून त्यांनीं त्यांची पूजाहि चालविली. ह्यामुळें बौद्ध धर्माचें रूप विकृत झालें. कुशान सम्राट् कनिष्क ह्यानें एक मोठी परिषद भरविली. त्यांत बुद्धालाच परमेश्वर मानणा-या पक्षाचा जय होऊन, बुद्धाच्या राजरोस मूर्ती करण्याला परवानगी मिळाली. ह्या पंथालाच महायान हें नांव पडलें. कंदाहारी घाट ग्रीस देशांतील कलेच्या वळणावर बांधेसूद व प्रमाणबद्ध असा होता. त्याचा छाप हिंदुस्थानांतील भावी शिल्पकलेवर व मूर्ति कलेवर पडला. पण ह्या बाबतींत तज्ज्ञ लोकांत मोठा वाद माजून राहीला आहे. फर्ग्युसन वगैरे ग्रीक ( पाश्चात्त्य ) पक्षाचें मत आहे कीं, हिंदुस्थानांत ही चित्रकला पश्चिमेकडून आली व ती अगदीं पूर्णतेला पोंचली नाहीं. उलट ई. वि. हॅवेल ह्या तज्ज्ञाचें मत आहे कीं, हिंदुस्थानांतील चित्रकला स्वतंत्र असून ती गुप्तांच्या काळीं पूर्णतेला गेली इतकेंच नव्हे तर तिच्यांतच कलेचा खरा प्राण आहे. प्रमाणबद्धपणा, नीटनेटकेपणा हीं केवळ कलेंची शरीरें होत. प्रेरणा हीच तिचा प्राण होय. पाश्चात्त्यांची धाव शरीरापर्यंतच पोंचते. आत्मप्रतीति पौरस्त्यांनाच घडली आहे, वगैरे.

  1. कुणब्यांची जूट
  2. कानडी विरुद्ध मराठी
  3. कानडी लिपि
  4. कानडी क्रियापदें
  • 75
  • 76
  • 77
  • 78
  • 79
  • 80
  • 81
  • 82
  • 83
  • 84
Page 80 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी