1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

कुणब्यांची जूट

असा हा आपला विचार झाला. आपण कल्पना करूं कीं देशांत स्वराज्य झालें, जमिनींची तात्त्विक मालकी राष्ट्राला मिळाली; आणि वाहतुकीसाठीं जमीनधारणाचा हक्क श्रमजीवी कुणब्याकडे निर्विघ्नपणें आला, तरी दुसरी गोष्ट महत्त्वाची ही कीं, ह्या सर्व कुणब्यांनीं आपसांत आपली जूट व इतर जे श्रमजीवी खेड्यांतूनच नव्हेत तर शहरांतून राहात असतील त्यांच्याशीं कायमचें सहकार्य केलें पाहिजे व सहानुभूति राखली पाहिजे, शेतकरी श्रीमंत झाला कीं तोच जमीनदार बनतो, मग तो इतर गरीब शेतक-यांशीं फटकून वागतो आणि इतर श्रीमंत सत्ताधा-यांच्या पंक्तीस बसतो. म्हणून ही आपसांतील जुटीची फारच जरुरी आहे. अमेरिकेंतील शेतक-यांचें उदाहरण पुढें दिलेंच आहे. ती धोक्याची इशारत आहे. इतकेंच नव्हे तर सर्वांत मुख्य गोष्ट मला सांगावयाची आहे, ती ही कीं, शेतक-यांनो, तुम्ही नेहमीं काबाडकष्ट करणारे नांगरे म्हणूनच काळ न कंठतां राष्ट्राच्या अर्थकारणांत तुम्ही आपला एक हात अर्थउत्पादनांत गुंतवून दुसरा हात त्या उत्पन्न केलेल्या अर्थाची पुढें विल्हेवारी कशी चालली हें पाहून, ह्या अर्थगाड्याच्या बैलांची शिंग-दोरी खेंचण्याकरितां नेहमीं मोकळा ठेवणें जरूर आहे. हें जोंपर्यंत होत नाहीं तोंपर्यंत मागें गेलेल्या अनंत काळाप्रमाणें, पुढें येणा-या अनंतकाळींहि तुम्ही भारवाही, केवळ शेपूट व शिगें नसणारीं जनावरें राहणार ह्यांत काय संशय ! आणि ह्याबद्दल इतरांना उगाच वाईट वाटून तरी काय उपयोग?

कानडी विरुद्ध मराठी

(२) इतर भाषांशीं मराठीचा कसाहि संबंध असो. गेल्या दीड हजार वर्षांत कानडी आणि मराठी ह्या दोन भाषांचा एकमेकांविरुद्ध जीवनकलह किती जिवापाड चालला आहे ह्याची केवळ अंधुक प्रस्तावना मीं केसरींतील वरील लेखांत केली होती. माझ्यापेक्षां अधिक अधिकारी पंडित हा हृदयंगम भाषाविषय हातीं घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या दोनहि देशांवर उपकार करण्यास पुढें येईपर्यंत मी केवळ नाइलाजानें व भीतभीत अशा तौलनिक विवेचनाचें धाडस करीत आहें. मराठीचा जन्म व तान्हेपण कोठें आणि कसेंहि होऊन गेलें असो, तिचें सर्व वर्धन, शील, कौमार्य, चालुक्य आणि राष्ट्रकूट ह्या कानडी व तेलंगी राजवटींतून खास कर्नाटकांतच बनलें असें मीं वरील निबंधांत ध्वनित केलें आहे. जास्त निरीक्षणावरून मराठी ही कानडीची पोटची नव्हे तरी पाळलेली मुलगी आहे, असें मला वाटूं लागलें आहे. अशा रीतीनें मराठीची जशी महानुभावी जुनी “बालबोध मराठी” आणि चिपळूणकरांनीं संस्कृत शब्दालंकार आणि इंग्रजी विचारालंकार ह्यांनीं घडविलेली आजची सुसंस्कृत मराठी हीं दोन रूपें जशीं मराठी वाङ्मयांत स्पष्ट दिसत आहेत, तशीच कानडींतहि जैन कविकुलगुरूंनीं वाढविलेली हळेकन्नाड (जुनी कानडी) आणि अलीकडच्या संस्कृत इंग्रजीच्या मिश्र संस्कृतींत स्वतः वाढलेल्या “सुशिक्षितांनीं” घडविलेली नवी कानडी अशीं दोन रूपें स्पष्ट आहेत. पण कालाचा मात्र हा फरक ध्यानांत ठेवला पाहिजे कीं, जुन्या मराठीचें कौमार्य संपून ती महानुभावी वाङ्मय प्रसवूं लागण्यापूर्वी जुन्या कानडीला जवळ जवळ म्हातारपण येऊं लागलें होतें. ज्ञानेश्वराची भावार्थदीपिका इ. स. १२९० त संपूर्ण झाली. हा काळ जुन्या ऊर्फ बालबोध मराठीचा जन्मकाळ नसून तिचा वाङ्मय प्रसविण्याचा काळ होय. पण या काळाचे पूर्वीच हळेकन्नाडचे धुरंधर कवि जैन नागवर्मा, जैन अथवा लिंगायत केशव आणि ब्राह्मण रुद्रभट्ट हे होऊन गेले होते; व त्यांच्या मागें त्या जुन्या कानडीच्या तारुण्याचा भरहि मावळूं लागला होता. त्या वेळीं मराठी ही कानडीच्या दायीपणापासून जरी अगदीं वेगळी झाली होती, तरी देखील ती कानडीचा शब्दकोश, व्याकरण, छंद-रचना व व्यवहारांतल्या बोलीचे संप्रदाय ह्यांतच अद्यापि गुरफटलेली आढळते.

कानडी लिपि

कानडीचा वरचष्मा लिपीमध्येंहि दिसून येतो. ख्रिस्त शकापूर्वीं कदंब-घराण्यांतील राजांनीं आपल्या दक्षिणेंतील स्वारीबरोबर मगध देशातूंन जी एक ब्राह्मी लिपि नेली, तिचाच पुढें विकास होऊन हल्लींची कानडी व तेलुगू लिपी झाली आहे असें भूलरचें मत आहे. ११ व्या शतकांत आढळणा-या बालबोधीचें आणि हल्लींच्या कानडी वर्णमालेंतील ब-याच वर्णांचें साम्य दिसून येतें ते वर्ण ग, ण, क, द, ध, न, श, ल हे होत.

कानडी क्रियापदें

कोणत्याहि भाषेमध्यें साधारणतः नामवाचक अथवा विशेषणवाचक शब्दांची परस्पर देवघेव होते, हें युरोपांतील अथवा हिंदुस्थानांतील अर्वाचीन भाषांच्या देवघेवीवरून आपल्या सहज ध्यानांत येईल. पण क्रियावाचक शब्दांची देवानघेवाण सहसा होत नाहीं. कारण धातुवाचक शब्द त्या त्या भाषेचें सारसर्वस्व असतात. म्हणून ते वडील मुलांप्रमाणें दत्तक घेण्याला कठीण किंवा असंभवनीय असतात. परंतु कानडींतलीं पुष्कळ क्रियापदें हल्लींच्या मराठींत उजळ माथ्यानें वावरत आहेत. त्यांपैकीं विस्तारभयास्तव थोडीं देतों. कुट्ट = मारकूट, तब्बू = दाब, सरी = सरक, बडिसू = (जेवण) वाढ, बोग्गू = वाक, वडी = बडीव, तुळी = तुडव, तुंबू = भर, कलसु = कालव, उगळू = थुंक, जेज्जू = चेच, आप्पळिसू = आपट, केदरु = खरड, ओदरू = ओरड, कोरि = कोर, किलबु = कळक, तिळिसू = कळीव, हेदरु = भेदर. त्याचप्रमाणें दोन भाषांचा कांहीं तरी विशेष आनुवंशिक संबंध असल्याशिवाय खालील शब्दांची देवघेव होणें शक्य नसतें. उदाहरणार्थ, शरीराचे अवयव, जवळच्या नात्याचे शब्द, इ. भाषेच्या व्यवहाराला अशा शब्दांची अनिवार्य गरज असते. म्हणून जेव्हां दोन भाषेंत असे शब्द सामान्यपणें आढळतात तेव्हां त्यांपैकीं जी जुनी असते तिच्याशीं नवीचा निकट संबंध आहे असें मानल्याशिवाय गत्यंतरच नाहीं. त्यांपैकीं कांहीं शब्द खालीं देंतों, ते असे -
नात्याचे शब्द – अव्वा = आई (आवा, आऊ), अप्पा = बाप  (अप्पा, आबा), अक्का = मोठी बहीण, तंगी = लहान बहीण, अण्णा = मोठा भाऊ, तम्मा = लहान भाऊ, दोड्ड = दादा, नन्न = नाना, ताई = आई (ताई), तंदी = बाप (तात), आत्ते = आते, कक्क = काका, माव = मामा, अज्ज = आजा. शरीराचे अवयव – बट्ट = बोट, होट्टी = पोट, गल्ल = गाल, मांडि = मांडी, पिंड्रि = पिंड्री, कोळ्ळ = गळा, तले = टाळू, बगल = बगला, बाजू, शिरा = शीर, यदि = छाती, झिपरी = केंस, झिपरी.
अव्ययें – कडक = वर, किळक = खालीं, इत्तकडे = इकडे, आत्तकडे = तिकडे, इष्टु = इतुकें, एतुलें, लगु (लघु) = लवकर, बेगने = बिगिबिगि, लवकर इ. इ.

कानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन

मराठी व्याकरणकर्ते रामचंद्र भिकाजी जोशी हे हल्लीं आपल्या मराठी भाषेची घटना ह्या ग्रंथाची दुसरी आवृत्ति छापीत आहेत. त्यांत परिशिष्ट म्हणून वरील विषयावर एक लेख लिहावा अशी त्यांनीं मला विनंति केली. हिंदुस्थानांतील भाषांच्या व्युत्पत्तीची परिपूर्तता तौलनिक भाषाशास्त्राच्या साह्याशिवाय करूं पाहणें फार धाडसाचें, नव्हे धोक्याचें, आहे असें माझें फार दिवसांचें ठाम मत झालें असल्यानें, जोशी ह्यांचे विनंतीला मान देण्याची प्रथम मला छाती होईना. पण मजपेक्षां योग्य अधिकारी विद्वानाकडून त्यांची गरज भागेना म्हणून केवळ नाइलाजानें मीं हा लेख लिहिला. तो प्रमाणाबाहेर वाढला म्हणून त्याचा जरूर तेवढाच भाग जोशी ह्यांनीं आपल्या परिशिष्टांत घेतला आहे. विद्वान् वाचकांनीं निर्विकार मनानें ह्यांतील दोष दाखविल्यास मजवर फार उपकार होतील.

  1. कर्नाटकाची दुर्दशा
  2. कबीर
  3. ओढिया जगन्नाथ
  4. ऐतिहासिक विवेचन
  • 76
  • 77
  • 78
  • 79
  • 80
  • 81
  • 82
  • 83
  • 84
  • 85
Page 81 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी