1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

कर्नाटकाची दुर्दशा

(७) कानडी भाषा ज्या देशांत बोलली जाते त्या कर्नाटकाची जितकी दुर्दशा हल्लींच्या काळीं झाली आहे तितकी हिंदुस्थानांत काय किंवा बाहेर काय, दुस-या कोणत्याहि देशाची किंवा राष्ट्राची झालेली नसेल. हा देश अथवा राष्ट्र आज हैद्राबाद आणि म्हैसूर ह्या दोन संस्थानांतून आणि मुंबई व मद्रास ह्या दोन इंग्रजी इलाख्यांतून विभागून ह्याचे चात तुकडे पडले आहेत. वरील राजकीय भेदच नसून ह्या भागांत हिंदु, मुसलमान, लिंगायत, जैन, इ. धार्मिक भेद आणि ब्राह्मण ब्राह्मणेतर इ. नवीन तटहि फार माजले आहेत. ह्यामुळें म्हैसूरची स्वतंत्र युनिव्हर्सिटी आणि एका स्वतंत्र हिंदु संस्थानाची सत्ता आणि संपत्ति ह्या स्वतंत्र युनिव्हर्सिटीस मिळूनहि कानडी भाषेच्या ख-या उत्कर्षाचीं चिन्हें दिसत नाहींत, अशी रड त्या युनिव्हर्सिटीच्या अहवालांतून ऐकूं येत आहे. जर पुणें पीठानें केवळ युनिटरी (एकमुखी) होण्याचा नाद निदान आरंभींचीं कांहीं वर्षें तरी सोडून कर्नाटकाला आपल्या पंखाखालीं घेतलें तर महाराष्ट्रानें कर्नाटकाचें जुनें भाषाऋण फेडण्याचा निदान प्रयत्न केल्याचें तरी श्रेय मिळविल्यासारखें होईल. मुंबई इलाख्यांतल्या कर्नाटकांतले विद्यार्थी म्हैसूर विद्यापीठांत शिकावयास जाण्याचा जसा संभव नाहीं, तसाच तूर्त कर्नाटकास पुण्याप्रमाणें स्वतंत्र पीठ उभारण्याची संधि व सामर्थ्य येण्याचाहि संभव नाहीं. हिंदु-मुसलमानांची एकी दूरच आहे. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राची तरी एकी करण्याचें श्रेय पुण्यानें संपादावें.
(८) मीं केवळ कानडी आणि मराठी ह्यांचा भाषाविषयक संबंध आणि त्यांचें उच्च आणि शास्त्रीय अध्ययन ह्याच दृष्टीनें हा लेख लिहिला आहे. राजकारण, प्रांताभिमान, दरबारांतील शिरकाव, सरकारी नोक-या मिळण्याचा संभव वगैरे ख-या विद्येशीं संबंध नसलेल्या अवांतर गोष्टींकडे - जरा ह्यांचाच हिंदी विद्यापीठांतून सुळसुळाट फार आहे तरी - ह्या लेखांत मीं पूर्ण दुर्लक्ष केलें आहे. ह्यामुळें ह्याची व्यावहारीक बाजूनें किंमत आणि प्रासंगिकताहि फार कमी ठरणार आहे. फार तर काय, पण कर्नाटकांतील नमूद केलेलीं कॉलेजें आणि कदाचित् पोटाच्या मागें लागलेला पांढरपेशा वर्गहि पुणें पीठापेक्षां मुंबई पीठाकडेच येतीं बरींच वर्षें धांव घेत राहिल हेंही मी जाणून आहें. तरी पुण्यानें हें धाडस करून आणि एकमुखी होण्याचा नाद सोडून एक प्रकारें स्वार्थत्याग करून दाखविल्यास, मला अशी आशा वाटते कीं, महाराष्ट्राची आणि कर्नाटकाची कांहीं वेळ तरी एकी झाल्यानें, पुण्यानें खरोखर कोणत्याही स्वार्थाचा त्याग केला नसून आपला उत्तम प्रकारें स्वार्थच संपादिला असें त्याला परिणामीं दिसून येईल.

कबीर

रामानंदाचा शिष्य कबीर ह्यांचा जन्म काशी येथें इ. स. १३९८ सालीं झाला. हा एका ब्राह्मण विधवेच्या पोटीं जन्मला, म्हणून लाज राखण्यासाठीं तिनें त्याला एका तळ्याच्या कांठीं ठेवून दिलें. त्या मुलाची जोपासना एका मुसलमान मोमिनानें केली. हा पुढें मोठा निस्पृह एकेश्वरवादरी निघाला. त्यानें हिंदु आणि मुसलमान ह्या दोन्ही धर्मांच्या खोट्या कल्पनांचा जोरानें निषेध चालविला. त्यामुळें दोही समजांतून त्याला विशेषत: खालच्या जातींतून पुष्कळ शिष्य मिळालें. ह्याचा दोहोंकडून विशेषत: मुसलमानांकडून छळहि फार झाला. शेख ताक्की नांवाचा एक मुसलमान पीर शिकंदर लोदीचा गुरु होता. त्या पिराच्या शिकविणीविरुद्ध कबिरानें फार कडक टीका केली म्हणून ताक्कीनें आपला शिष्य बादशहा याच्याकडून कबिराचा फार छळ मांडिला; पण त्या सर्व दिव्यांतून कबीर निभावला. त्याच्या रामैनी, साक्या व दोहरे प्रसिद्ध आहेत. विशेषत: फटके तर सर्व हिंदुस्थानभर हरिदासांच्या तोंडून ऐकण्यांत येतात. कबीर हा हिंदी वाङ्मयाचा जनक म्हटलें तरी चालेल. मुसलमानापेक्षां हिंदु धर्माकडेच ह्याचा ओढा जास्त होता. त्याचे शिष्यहि आतां हिंदुच आहेत. पण पुष्कळ दिवस कबिराची कडक शिकवण म्हणजे केवळ अरण्यरुदनच होतें. तरी पण कोणी ऐकोत न ऐकोत, कबिराचा संदेश चढत्या सुरांत सारखा पसरतच होता. त्याचा उपदेश रोखठोक, सडेतोड आणि अक्षरशत्रूलाहि सहज पटणारा होता. पुढें त्याला शिष्यसमुदाय पुष्कळ मिळाला; तरी त्यानें कोणत्याहि प्रकारचा ढंग काढून त्यांना भुलविण्याचा व आपल्या स्वत:चे देव्हारे माजविण्याचा प्रयत्न केला नाहीं, ही विशेष ध्यानांत घेण्यासारखी गोष्ट आहे. तो मेल्यावर हिंदु आणि मुसलमान ह्या दोघांनाहि तो आपलासा वाटला. हल्लीं जरी ह्याचें नांव आणि उपदेश सर्व दर्जांच्या लोकांमध्यें प्रिय आहे, तरी ह्याच्या प्रत्यक्ष पंथाचा प्रसार खालच्या वर्गांतच चालू आहे.

ओढिया जगन्नाथ

वरील विचित्र क्षेत्राचा दाखला देऊन हें विवेचन आटपूं. ह्या स्थलाची मूळ पीठिका म्हणजे इतिहास-संशोधकांचा गर्व हरण करणारें एक अजब कोडेंच आहे. कोणी म्हणतात हें पूर्वींचें एक बौद्ध क्षेत्र आहे. कोणी म्हणतात प्रागैतिहासिक शाक्त तांत्रिकांचें मूळस्थान आहे. कोणी म्हणतात प्राचीन कलिंग राष्ट्राचें हें कारस्थान आहे. हल्लीं तर ही पुरीच्या राजाची चिमुकली राजधानी आहे. ४००|५०० वर्षांपूर्वीं येथूनच श्रीचैतन्यदेवांनीं शुद्ध वैष्णवधर्माची उठावणी करून सर्व बंगाल देशाचा उद्धार केला, पण येथील हल्लींचें ओंगळ स्वरूप पाहून भागवत धर्माची अवनति किती होणें शक्य आहे, ह्याची ओझरती तरी कल्पना प्रेक्षकांस आल्याशिवाय राहात नाहीं. अशा अवनतीचा हें क्षेत्र एक बिनतोड वस्तुपाठ आहे. रोज लागणारा मणभर भाताचा भोग, त्रिकाल पूजा, मासिक उत्सव, वार्षिक रथोत्सव, बारा वर्षांचा महोत्सव, क्षेत्राचा मालक राजा, चालक पंड्ये, त्यांचे देशोदेशीं हिंडणारे एजंट, देवळाचा विस्तीर्ण बेढब व बीभत्स देखावा, विचित्र इतिहास आणि अज्ञेय मूळ, एक का दोन चमत्कार, जें डोळ्याला दिसेल तें मनाला वेडच लावतें! नेपाळची तंत्रविद्या, काशीची वेदविद्या, हरिद्वारचें वैराग्य, सोमनाथाची श्रीमंती, पंढरीचा भोळा भाव, मलबारचा लपंडाव, तामिळदेशची देवदासी-थोडक्यांत आटोपावयाचें म्हणजे पुरी येथें कोठलें काय आढळत नाहीं! मला वाटतें चोहिकडील ह्या गोष्टी येथूनच बाहेर कदाचित् गेल्या असाव्यात. येथें पाहूं गेल्यास ह्या विचित्र लक्षणांचा केवळ कडेलोट आहे! सोरटी सोमनाथ गिझनीच्या महमुदानें फोडला, काशी विश्वनाथ औरंगजेबानें दाबून टाकिला, तामीळ देशांतील भव्य देवळें इंग्रजी विद्येनें निस्तेज केलीं, शंकर, रामानुज वगैरे आचार्यांचा वेदान्त त्यांच्याबरोबरच गेला, महावीर जिन देशांतच दडला, गौतम बुद्ध पूर्वेकडे हद्दपार झाला, आणि वेदविद्या केवळ पाश्चात्त्यांच्या ज्ञानकोशांत निजली आणि आमच्या वांट्याला अद्यापि ओढिया जगन्नाथ मात्र भागवत धर्माच्या अवनतीची साक्ष देत पूर्व समुद्रावर उभा आहे! त्याला आमचा दुरूनच नमस्कार! ह्या अवनतींतूनहि भागवत धर्माचें पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न चालू राजशकाच्या आरंभापासून कसकसे करण्यांत आले, हें आपण पुढें पाहूं.

ऐतिहासिक विवेचन

(५) हें विवेचन बाह्य पुराव्यांनींच होणारें आहे. पण अशा पुराव्यांची तूर्त तरी अत्यंत वाण आहे.
प्रथम आपण ही भाषा प्रांतीय (Territorial) आहे कीं जातीय (National) आहे, हें पाहूं. कोंकणांतच ही भाषा आढळते, येवढ्याच आकुंचित अर्थानें ही भाषा हल्लीं प्रांतिक गणली जात आहे. पण मुळांत ही भाषा कोंकणी नव्हती. म्हणजे कोंकण प्रांताशीं हिचा पूर्वापार संबंध नाहीं. हजार-बाराशें वर्षांपूर्वीं ही भाषा कोंकणांत प्रचारांत असणें संभवनीय नाहीं. त्या वेळीं हा सारा किनारा कानडीनें हस्तगत केलेला होता, हें इतिहासावरून व उपलब्ध शिलालेख व ताम्रपटांवरून दिसतें. भूगर्भशास्त्राच्या दृष्टीनें जरी कोंकण हा प्रांत अर्वाचीन आहे, तरी ह्या कोंकणपट्टीचें व्यापारी दळणवळण फिनिशियन नांवाच्या अति प्राचीन दर्यावर्दी राष्ट्रानें पाश्चात्त्य इजिप्त, असीरिया, व त्याच्याहि पलीकडच्या प्राचीन राष्ट्रांशीं ठेविलें होतें, असे दाखले बरेच मिळतात. कापसाचें व रेशमाचें तलम कापड, मिरीं, वेलदोडे व इतर मसाले, मयूर, वानर इत्यादि प्राणी वगैरे माल, या फिनिशियनाकडून द्राविड सुसंपन्न देशांतून पाश्चात्त्य राजवटींना पुरविण्यांत येत असे;  व त्यासाठीं पश्चिम किना-यावर नामांकित बंदरेंहि असत. इतका प्राचीन काळ सोडून, केवळ मध्ययुगीन संस्कृति जरी विचारांत घेतल्या तरी, ठाण्यापासून खालीं गोकर्णापर्यंत कानडीचें, तेथून खालीं दक्षिण कानडा जिल्ह्यांतील कासरगोड तालुक्यापर्यंत तुळु भाषेचें व त्याच्याहि खालीं सबंध केरळ देशांत तामिळचें (जिचें परिणत स्वरूप सुमारें तीन शतकांपूर्वीं हल्लींच्या मल्याळीं भाषेंत होऊं लागलें), अशीं ह्या किना-यावर निरनिराळ्या भाषांचीं साम्राज्यें होतीं. मौर्य, कदंब, चालुक्य इत्यादि उत्तरेकडील राजवट्यांचा पसारा इ. स. पूर्वीं निदान २०० वर्षांपासून पुढें ह्या किना-यावर होऊं लागला. तोंपर्यंत द्राविडी भाषांच्या साम्राज्याच्या केसालाहि धक्का नव्हता; व पुढेंहि कित्येक शतकें राजकीय साम्राज्य ढांसळलें तरी, भाषाविषयक द्राविडचा अम्मल जनतेमध्यें चालू होता. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे कोंकणी ही कोंकणांत प्रांतिक अथवा स्थानिक भाषा नसून उपरी आणि जातीय भाषा आहे हें सिद्ध होतें. आतां ती कोणत्या जातीची किंवा राष्ट्राची भाषा होती, हा प्रश्न उरला.

उपसंहार

येथपर्यंत मराठी वाङ्मयाचा जुन्या नव्या काळांतील वरील दोन महत्त्वाच्या विषयासंबंधीं ग्रंथांचा आणि घडामोडींचा विचार झाला. आतां पुढें काय करावयाला पाहिजे, ह्याविषयीं उपसंहारादाखल एक दोन मुद्द्यांसंबंधीं विचार करून हें भाषण पुरें करितो. तत्त्वज्ञानाचा जो साक्षात्कारी भाग आहे त्यासंबंधीं कोणी कोणाला सांगून शिकवून तो होण्यासारखा नाहीं. जो दुसरा तार्किक भाग आहे त्यांत खरी भरीव ग्रंथनिर्मिति व्हावयाची तर तिच्या पूर्वीं निरनिराळ्या विषयांवर प्रायोगिक व वैज्ञानिक अध्ययन पुरेसें झालें पाहिजे. पण ह्या बाबतींत आमची विद्वान् मंडळी आणखी किती काळ पाश्चात्त्यांच्या श्रमावर हात टेकून राहणार हें कळंत नाहीं. बंगाल्यांतील सर जगदीशचंद्र बोस, डॉ. पी. सी. रॉय, मद्रासकडील डॉ. रामन् ह्यांचीं उदाहरणें महाराष्ट्रापुढें आहेतच. प्रत्यक्ष तत्त्वज्ञानांतच प्रो. राधाकृष्णन् यांनीं स्वदेशीं व परदेशीं बरीच कीर्ति मिळविली आहे. पण तीसुद्धां पौरस्त्य तत्वज्ञानाचें नुसतें समर्थन (Apologia) म्हणूनच मिळविली आहे. अलीकडे मराठींतून त्यांच्या ग्रंथांचा अनुवाद होत आहे. ‘Hindu View of Life’ ह्या त्यांच्या चार सुंदर ‘हिबर्ट लेक्चर्सचा’ मराठींत अनुवाद श्रीयुत बाबूभाई मेहता ह्या गुजराथी गृहस्थानें नुकताच प्रसिद्ध केला आहे. श्री. नरसिंह चिंतामण केळकर ह्यांनीं आपला ‘भारतीय तत्त्वज्ञान’ हा ग्रंथ ह्याच वर्षीं प्रसिद्ध केला आहे. पण तो केवळ “संकलनात्मक आणि संक्षिप्तच झाला आहे”. प्रसिद्ध षड्दर्शनाशिवाय आणखी सहा सातच दर्शनांचें दिग्दर्शन केळकरांनीं केलें आहे; पण पाली ब्रह्मनाल सूत्रांत श्रीगौतमबुद्धांनीं आपलें दर्शन सांगण्यापूर्वीं त्या वेळीं भारतांत निदान ६४ तरी भिन्न भिन्न दर्शनें होतीं असें स्पष्ट म्हटलें आहे. तात्यासाहेबांनीं ह्या प्रदेशावर कांहीं प्रकाश पाडला असता तर त्यांच्या पुस्तकांत कांहीं नाविन्य आलें असतें. मराठींत स्वतंत्र दर्शनांचा योग केव्हां येईल तेव्हां येवो, तोपर्यंत विश्वविद्यालयांतील विद्वानांनीं भारतीय तत्त्वज्ञानाचें शास्त्रीय शोधन करून कालानुक्रम आणि विषयानुक्रम निर्विकारपणानें जुळवून तत्त्वज्ञानाचा एक नवीन इतिहास तरी लिहिणें फार अगत्याचें आहे. नवी दृष्टी नसली तरी पुढील अध्ययनाला एक नवीन दिशा दाखविण्याचें श्रेय ह्या प्रयत्नानें मिळेल. समाजशास्त्राच्या बाबतींत मुंबई विद्यापीठानें बरींच वर्षें एक संस्था रडतकढत चालविली  आहे. पण तिचें दृश्य फळ कांहींच दिसत नाहीं. निदान मराठी वाचकांना तरी कांहीं लाभ झालेला दिसत नाहीं. स्वतंत्रपणानें काम करणा-यांपैकीं रा. सा. ना. गो. चापेकरांच्या ‘बदलापूर ग्रंथाचा’ उल्लेख वर झालाच आहे. ते म्हणतात त्याप्रमाणें हें बदलापूर गॅझेटच तयार झालें आहे. त्यांचें मन:पूर्वक अभिनंदन करून मला आमच्यांतील तरुण विद्वानांना एक नम्र सूचना करावयाची आहे कीं, अशा प्रकारची अखिल भारतांतून विषयवार आणि आंकडेवार कसोशीची माहिती ब्रिटिश सरकार आणि संस्थानें ह्यांनीं आज ५-६ दशवार्षिक खानेसुमारींतून अगदीं पुरून उरण्यासारखी मिळवून ठेविली आहे. Ethnography Survey, Philological Survey वगैरेंचे द्वारें आज ५०-६० वर्षें अलोट खर्च आणि श्रम करून सामग्री मिळविण्याचें काम चाललें असून, त्याचे साह्यानें पाकसिद्धीचे कामाला मात्र अदयाप कोणीच पुढें येत नाहीं हें कसें? भरतखंड म्हणजे एक अपरूप मानवी म्यूझियम आहे. मराठ्यांना महाराष्ट्रांत ही विपुल सामग्री हाताशीं तयार आहे. ह्या बाबतींत माझे मित्र श्री. दिवेकरशास्त्री आणि श्री. श्री. म. माटे ह्यांनीं जे श्रम केले आहेत त्यांचा उल्लेख करणें जरूर आहे. विशेषतः श्री. माटे यांचा ‘अस्पृष्यांचा प्रश्न’ हा ग्रंथ सुंदर असून समतोल आहे ह्याबद्दल मी त्यांचें अभिनंदन करितों. महाराष्ट्रांतील ग्रामसंस्था, महाराष्ट्राची वसाहत, जमीनधारापद्धति असा एक एक सुटसुटीत विषय घेऊन त्यांतच आयुष्य वेंचणाराला पुरेशी सामग्री वाट पाहात आहे.

महाराष्ट्रांतील समाजरचनेवर लिहिणारांनीं ह्यांतील ग्रामसंस्थेपेक्षां जातिसंस्थेकडेच अधिक नजर पुरविली आहे; आणि तीहि माझी जात थोर, तुझी जात नीच या अशास्त्रीय भावनेनें. यांतील कित्येक जाती अथवा जमाती आपआपल्या अंतर्बाह्य आचारांत किती स्वयंनिर्मित होत्या हें कुणाच्या लक्षांत यावें तितकें येत नाहीं. वैयक्तिक किंवा सामाजिक गुन्हे अथवा दोष घडल्यास त्यांच्या निवाड्यासाठीं किंवा बंदोबस्तासाठीं ह्या जाती सरकारी न्यायखात्याकडे जात नसत. अशी पंचाईत जातगंगा करी किंवा क्षेत्राच्या ठिकाणीं ग्रामाधिकारी जोशी असत त्यांच्याकडूनहि हा मनसुबा होत असे. त्या जोश्याची निवड गांवच्या गोताकडून होत असे. ते गोत म्हणजे गांवच्या सर्व जातींच्या प्रमुखांचें पार्लमेंट असे, असे कज्जे अलीकडे शंकराचार्यांच्याकडे जातात. पण शंकराचार्यांचे ग्रामाधिका-यांच्या अधिकारावर अतिक्रमण आहे आणि तो ग्रामाधिकारी दोनशें वर्षांपूर्वीं चालवूं देत नसत, हे धुळ्याचे वकील भास्कर वामन भट ह्यांनीं भा. इ. सं. मंडळाचें त्रैमासिक वर्ष १३ अंक ३ यांत सप्रमाण दाखविलें आहे. मंडळाचें संशोधक श्री. शंकरराव जोशी यांच्याकडे अशा कज्ज्यांचीं दोषपत्रें आणि शुद्धिपत्रें बरींच पाहावयास मिळतील. तसेंच गांवपाटील आणि जातपाटील यांचे अधिकार आणि कार्यक्षेत्रें कशीं भिन्न होतीं हेंहि श्री. शंकरराव जोशी ह्यांनीं स्पष्ट दाखविलेलें आहे. त्रैमासिक वर्ष २ पृष्ठ १३४-३५ ह्यांत म्हटलें आहे कीं, “न्यायमनसुबी सरकारांत न्यावयाचें प्रयोजन नाहीं. सर पाटील याहि करावा. बदअंमल कोली लोकामधें जाला तरी त्याचा न्याये दिवाणांत न आणावा. अलिकडे दिवाणांत नेतात ते न न्यावे.” हें पत्र समस्त अष्टागर प्रांतांतील कोळी ज्ञातीबद्दलचें आहे. मी कर्नूल जिल्ह्यांत हिंडत असतांना तेथील धनगर जातीमध्यें अद्यापि हाच प्रकार पाहिला.

महाराष्ट्रांतील जातिसंस्था आणि ग्रामसंस्था ह्यांचा कारभार मध्ययुगांत देखील लोकसत्तात्मक होता.

राज्यक्रांति झाली तरी या लोकसभेवर परिणाम होत नसे. हल्लींच्या इंग्रजशाहीनें मात्र ही सत्ता नामशेष करून टाकली आहे.

विद्याखातें, कायदे करणारें विधिमंडळ, निवाडा करणारें न्यायखातें आणि अंमलबजावणी करणार प्रधान मंडळ, ही वस्तुत: परस्परांहून भिन्न व स्वतंत्र असावयास पाहिजेत. पोलीसखातें व लष्करखातें एवढेंच काय तें सरकारकडे असावें, असें प्रसिद्ध समाजशास्त्री हर्बर्ट स्पेन्सर ह्यांनीं आपल्या ‘Proper Functions of the State’ या निबंधांत कंटरवानें सांगितलें आहे. तरी पाश्चात्त्य राज्यसंस्थेनें लोकांचे सर्वच हक्क आपल्या मुठींत वळले आहेत, आणि हेंच अतिक्रमण सर्वत्र चालूं आहे. नवभारत, ग्रंथमालेंतील ‘महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास’ चे लेखक प्रो. पेंडसे ह्यांनीं ह्या विषयाचें विवेचन केलें असतें तर बरें झालें असतें. मराठ्यांचें आणि पेशव्यांचे दफ्तर आणि ठिकठिकाणीं अद्यापि सांपडणारीं कागदपत्रें ह्यांचा उपयोग करून न घेतां श्रुति स्मृति आणि वारक-याचें भारुड ह्यांतच हे प्रोफेसर गुरफटलेले आहेत. कोळी जसा आपल्या जाळ्यांतच गुंतून मेलेला आढळतो, तशी महाराष्ट्राच्या इतिहासाची गत या ग्रंथप्रिय लोकांनीं केलेली दिसते. समाजशास्त्राच्या भावी अभ्यासूंनीं ह्या कवचाच्या बाहेर यावें, तेव्हांच खरा इतिहास कळेल, आणि नवीन समाजशास्त्र बनेल.

मोंगलाईनंतर श्रीशिवछत्रपतीनें हिंदुपदपादशाही स्थापन केली तेव्हांपासून सामाजिक स्वातंत्र्यावर राजाचें आक्रमण सुरू झालें. आपल्या घराण्यांतील लग्नापुरती त्यांनीं पांच कुळी निर्माण केली. शेवटच्या प्रतापसिंह महाराजांनीं मराठा ज्ञातीवर नियंत्रण घालण्यासाठीं एक शिरस्तापत्र तयार केलें. त्यावर भोसले, महाडीक, शिरके, मोहिते आणि गुजर ह्या पांच कुळींतील ४३ प्रमुख मराठ्यांच्या सह्या आहेत. ह्याची अस्सल प्रत भा. इ. सं. मंडळांत आहे. मराठ्यांनीं आपसांतच शरीरसंबंध करावा. मध्यंतरी पेशवाईमुळें मराठे ज्ञातींतील शिरस्ते विसकळीत झाले होते. ते सुरळीत चालावेत. हीं दोन कलमें स्पष्ट उल्लेखिलीं आहेत. आश्रित ब्राह्मणांनीं मराठ्यांचें पौरोहित्य ते सांगतील त्याप्रमाणें करावें, न केल्यास दुस-या ब्राह्मणाची नेमणूक व्हावी. ह्याबाबत शेवटचें अपील छत्रपतीकडे यावें असा निर्बंध आहे.

अस्पृश्यतेचा छडा लावण्यांत-निवारणाचा भाग तर राहूं द्या -- मला स्वत:ला जो जन्मभर अनुभव आला आणि आनंद झाला तो लक्षांत घेतां मला आणखी जन्म मिळाले तरी ते ह्याच शोधनांत आणि सेवाशुश्रूषेंत खर्चीन अशी उमेद वाटत आहे. एकच इशारा द्यावासा वाटतो. अशीं कामें पूर्वग्रह अजिबात टाकून दिल्याशिवाय कोणीं केव्हांहि हातीं घेऊं नयेत. ३६ वर्षांपूर्वीं ‘हिंदु धर्म आणि सुधारणा’ या ग्रंथाच्या विद्वान् कर्त्यांनीं आपल्या ग्रंथाच्या शेवटच्या प्रकरणांत असा निष्कर्ष काढिला कीं, ब्राह्मण जातीनें हजारों वर्षें विद्याव्यासंगाचे अतिश्रम केले, इतकेंच नव्हे तर कनिष्ठ जातींचा उद्धार सतत स्वार्थत्याग करून चालविला. त्यामुळें त्यांच्या बुद्धीला वैक्लव्य झालें आहे. आणि त्यांच्या संख्येचा नव्हे तर गुणांचाहि झपाट्यानें –हास होत आहे. त्यानंतर ३६ वर्षांनीं आज पाहावें तों श्री. गो. म. जोशी ह्यांनीं आपल्या हिंदु-समाज-रचनाशास्त्र ग्रंथांत अगदीं उलट प्रकारचा छातीठोक सिद्धान्त काढला आहे तो असा - सृष्टीच्या घडामोडींत ब्राह्मण जात एकच आज ४ हजार वर्षें टिकून राहिली आहे. तीच जात सुप्रजनन करण्यास लायक आहे. श्री. गोळे मागें म्हणून गेले कीं कनिष्ठ जातींवर विद्याव्यासंगाची आणि लोकसेवेची सारी जबाबदारी सोपवून ब्राह्मणांनीं स्वस्थ खेडेगांवांत जाऊन राहावें आणि आपली तनदुरुस्ती आणि मनदुरुस्ती करावी. ह्याच्या उलट जोशी आज म्हणतात. ब्राह्मणांनीं आपलीच संख्या शक्य तितकी वाढवावी आणि कनिष्ठांची शक्य तितकी घटवावी. आम्हीं कोणाचें ऐकावें?  आपल्या मतें पिसें परि तो आहे जैसें तैसें || तुका म्हणे वादें | वाया गेलीं ब्रह्मवृंदें || हा खरा प्रकार आहे असें समजून दोघांकडेहि दुर्लक्ष करावें झालें !

माझी तरुणांना हात जोडून विनंती आहे कीं, बाबांनो, तुम्ही आपले सर्व पूर्वग्रह पुन: सोडून द्या; आणि तुमच्यासाठीं आधींच मिळवून ठेविलेल्या माहितीला तुमच्या स्वत:च्या स्थानिक निर्विकार अनुभवांची जोड देऊन, अशी कांहीं नवी दिशा दाखवा कीं जेणेंकरू आमचे पूर्वग्रह नाहींसे होतील, आणि नवीन आशा उत्पन्न होईल. परमेश्वर करो आणि हे मराठी वाङ्मयाचे पांग फिटोत !

  1. इतिहास
  2. इतर पंथ
  3. आवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे
  4. आधुनिक रूपान्तरें
  • 77
  • 78
  • 79
  • 80
  • 81
  • 82
  • 83
  • 84
  • 85
  • 86
Page 82 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी