1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

माझ्या एकांत सहली

भाग चौथा : ‘धर्म भावनेचा विकास’
प्रकरण १६ वें
एकांतांतील सहली
जमखंडी हा गांव तिन्ही बाजूंनीं वेष्टिलेल्या डोंगराच्या बगलेंत आहे. विशेषतः दक्षिणेस मुधोळ संस्थानच्या वाटेवर तर एक सुंदर लांब दरी आहे. तिच्यांत कट्टेगिरी नांवाचा दुसरा एक विस्तीर्ण तलाव आहे. पावसाळ्यांत हा भरून वाहूं लागला म्हणजे त्या सर्व प्रदेशास सुंदर वन्य शोभा येत असे. मी जरी नेहमीं माझ्या सवंगड्याच्या घे-यांत अडकलेला दिसें तरी पुष्कळ वेळां त्यांना टाकून एकटाच एकाद्या दरींतून, डोंगराच्या माथ्यावरून, पूर्व व उत्तरेच्या बाजूनें पिकलेल्या शेतांतून किंवा जमखंडींतील मोतीबागेंतून हिंडणें मला फार आवडत असे. जमखंडीचे उत्तरेस ४–४॥ मैलांवर भव्य कृष्णेचें पात्र आहे. तें किंचित् माझ्या नित्याच्या आटोक्याच्या बाहेरचें असे. पण तेथेंही केव्हां केव्हां मी माझी गोपाळ मंडळी घेऊन जात असे. माझ्या हृदयाचा परिपोष माझ्या एकांतांतील सहलीमुळेंच विशेष झाला. निर्जन डोंगरांतून व दरींतून हिंडत असतां मी वाचलेल्या कादंबरींतला नायक मीच बनत असें. मात्र मला नायिका नसल्यामुळें माझा विप्रलंभ श्रृंगार लंगडालुळा पडत असे. जमखंडींत वसंतऋतूंत कांहीं आंबरायांना अमोघ मोहोर येऊन झाडावरच्या कोकिळा मदोन्मत्त होत! उन्हाळा तेथें कडक भासे. सायंकाळच्या क्लांत समयीं मीं मोतीबागेंतल्या कारंज्याजवळच्या बकुळीच्या झाडाखालीं बकुळीच्या मधुर सुगंधाच्या फुलांच्या माळा विणीत बसलों असतां,

“ कारंजाचे तुषार वाटती अग्नी कणाचे परी,
 पुष्पांचा तो सुगंध माझ्या शूळ निपजवी शिरीं,
कोकिळ कुंजित ऐकुनि वाटे वीज कडाडे वरी”

पहिला ठसा
वगैरे संगीत सौभद्र नाटकांतून ऐकलेल्या पीडा मलाच होऊं लागत! पण सुभद्रेचा मागमूस कोठेंच नसे! सुभद्रा खोटी असली तरी सृष्टिदेवीचे हावभाव नजरेपुढें खरेच असत. मोठा झाल्यावर कालिदास, बाणभट्ट आणि त्याहीपुढें वर्डस्वर्थ आणि स्कॉटस् ह्या कवींनीं व कादंबरीकारांनीं जें दिव्यामृत पाजिलें, त्याचेंच बाळकडू मला ह्या ओबडधोबड कादंब-यांनीं व नाटकांनीं पोरवयांतच पाजिलें होतें. मग त्यांचा मी आभारी कां असूं नयेॽ पण सर्वांच्याही पूर्वीं मला हृदयदान दिलें तें माझ्या पवित्र आईनेंच! तिच्याच पुण्यप्रभावानें मला सर्व जडरसांतून तारण मिळून माझ्या हृदयाचा परिपाक प्रथम धर्माच्या भक्तिरसांत व नंतर तत्वज्ञानाच्या शांतरसांत झाला. माझ्या वेळेच्या मराठी पांचव्या क्रमिक पुस्तकांत ‘सहल करून येणें’ हा एक धडा होता. तो मला फार आवडत असे. त्या आवडीचा साक्षात्कार माझ्या स्वतःच्या सहलींत मला घडत. पण ह्या सर्वांची पूर्व तयारी माझ्या आईच्या रानावनाच्या गोड गोष्टींत आणि बाबांच्या प्रेमळ सहवासांतच झाली. पुढें कादंब-यांनीं आणि पौराणिक पोथ्यांनीं जी काय भर टाकली असेल ती केवळ शब्दसंपत्तीची आणि जड रसांचीच होय. दैवी कोमल भावनांचा पहिला ठसा माझ्या आईचाच!


वनभोजन
वर्षांतून निदान एकदां तरी - विशेषतः पावसाळ्याच्या अखेरीस बाबा आम्हां सर्वांना घेऊन कोठेंतरी वनभोजनाला जात असत. जमखंडी गांवाला (आमचे वाड्याला) लागून पश्चिमेला एक डोंगर आहे. हा जवळ जवळ ७००।८०० फूट तरी उंच असावा. ह्याच्या अत्यंत उंच शिखरावर एक लहानसें शिवालय आहे. त्याचें कानडींत नांव मेलगिरी लिंगाप्पा ( उंच गिरीवरचा लिंग) असे. येथून जमखंडी गांवचाच नव्हे तर आसमंतांतील निदान २०।२५ मैलांचा देखावा पावसाळ्यांत सुंदर दिसतो. देऊळ उंच चबुत-यावर बांधलेलें आहे. त्याचे मागें एका खडकांतील गुहेंतून निर्मळ पाण्याचा झरा पावसाळ्यांत वाहतो. येरवी रुक्ष असलेला हा उंच डोंगर पावसाळ्यांत हिरवागार दिसतो. हें उंच आणि एकांत ठिकाण बाबांना पसंत असे. आमच्या घरच्या सर्व मंडळींनाच नव्हे तर एका दोघा आपल्या जिवलग मित्रांनाही बरोबर घेतल्याशिवाय त्यांना वनभोजन यथासांग झालेसें वाटत नसे. अर्थात ह्या कल्पनेंत आईची त्यांना पूर्ण सहानुभूति व साह्य असे. बहुतेक सगळा दिवस आमचा मोठ्या आनंदाचा जाई. ही रसिकता बाबांमध्यें कोठून आली ह्याचें मला आतां आश्चर्य वाटतें. ह्यामुळें मजमध्यें सृष्टीशोभेची रुचि व अवलोकनशक्तीचीं बीजें रुतलीं. आणि माझ्या ग्रहणशील मनावर चांगला परिणाम झाला.

माझें वाचन

प्रकरण १७ वें
खाजगी वाचन
आधुनिक विद्यार्थ्यांच्या मनाची वाढ शाळेबाहेरच्या वाचनावर अवलंबून आहे. आधुनिक शिक्षणाला विद्यार्थ्यांच्या खासगी वाचनाची जोड मिळाल्याशिवाय तें सर्व निरुपयोगी किंबहुना त्याहून वाईट ठरतें, हें आतां सर्वमान्य तत्त्व झालें आहे. पण माझ्या हायस्कुलच्या काळांत हे तत्व आमच्या शिक्षकाला नुसतें माहीतही नव्हतें, मग मान्यता बाजूसच राहिली. आमची शाळा बहुतेक खेडवळ मग तेथें पुस्तकालय कोठून असणारॽ त्यावेळीं मराठींतील वाङ्मयच मुळीं जर संपुष्टात होतें तर माझ्या वाचनाचा मुद्दा कसा निघणारॽ तरी मी इंग्रजी तिस-या चौथ्या यत्तेंत जाईपर्यंत ब-याच मराठींतल्या त्यावेळच्या अद्भुत कथानकाच्या व उघड श्रृंगाराच्या कादंब-या वाचल्या होत्या. माझ्याइतक्या कादंब-या त्या वेळच्या माझ्या सोबत्यांपैकीं कोणींच वाचल्या नव्हत्या; ह्या गोष्टींचा मला तेव्हां मोठा क्षम्य अभिमान वाटत होता, हें मला आतां नीट आठवतें. ह्याचें एक कारण असें कीं मला अगदीं लहानपणीं तोंडी गोष्टी ऐकण्याचा फार नाद असे. हा नाद माझ्या आईनेंच मला अगदीं बाळपणीं अद्भुत व करुण रसाच्या गोड गोड गोष्टी सांगून लावून ठेविला होता. पुढें घरीं कोणी आल्या गेल्याजवळ गोष्टी सांगण्याचा मी तगादा लावीत असें. ह्या बाहेरच्या लोकांनीं मला ज्या गोष्टी सांगिंतल्या त्या मात्र सर्वच लहान मुलांनीं ऐकण्यासारख्या नव्हत्या. कांहींत बीभत्सपणा उघड असे. त्यावेळचें गांवढळ जगच तसें होतें.

कादंबरी वाचन
पुढें मराठी ४।५ यत्तेंत असतांना गुलबकावली, वेताळ पंचविशी, बत्तीस पुतळी, शुक बहात्तरी वगैरे पुस्तकें माझ्या हातांत येऊं लागलीं. इंग्रजी शाळेंतील खालच्या वर्गांत असतांना, विचित्रपुरी, मंजुघोषा, मदनमंजरी, वसंतकोकिला, श्रृंगारसुंदरी, हीं आणि अशीं कित्येक पुस्तकें मी अधाशाप्रमाणें केव्हांच वाचून टाकीत असें. हीं पुस्तकें मला कोठून मिळत ह्याचेंच मला आतां आश्चर्य वाटतें. ‘इच्छा तेथें वाट सांपडते’ हीं इंग्रजी म्हण माझ्या अनुभवास, तेव्हां ह्या कादंबरी वाचनाच्या बाबतींत फार येत असे. पुढें पुढें ६।७ व्या यत्तेंत गेल्यावर अरेबियन नाइटसचे भाषांतर, नारायणराव गोदावरी, वेषधारी पंजाबी अशा प्रकारचीं पुस्तकें मिळूं लागलीं. हरी नारायण आपटे ह्यांचीं पुस्तकें व ‘करमणूक’ हें पत्र मी पुण्यांत कॉलेजांत जाईपर्यंत मिळणें शक्यच नव्हतें. किंबहुना तीं त्या वेळीं अस्तित्वांतच नव्हतीं. कॉलेजांत गेल्यावर मजमध्यें दुसरेंच युगांतर झालें. पण मराठी शाळेंतील बीभत्स गोष्टी आणि इंग्रजी शाळेंतल्या उघड श्रृंगाराच्या घवघवीत वर्णनाच्या कादंब-यांमुळें माझ्या कोमल आणि जन्मतः भावनाशील मनावर कांहीं अंशीं अनिष्ट परिणाम झाला, हें मला पुढें कळून आलें. १४।१५ व्या वर्षांच्या आंतच माझ्यांत अकालीन श्रृंगाररसाचा प्रादुर्भाव झाला असावा, असें मला वाटतें.

वाचनाचें वेड
करुण, श्रृंगार, वीर, रौद्र इत्यादि रसही समजूं लागून माझ्या बुद्धीप्रमाणेंच हृदयाचाही परिपोष होऊं लागला ह्यांत कांहीं वावगें झालें नाहीं. तरी पण त्या काळच्या वाङ्मयातील तुटपुंजेपणामुळे मी अकालीं श्रृंगारमय होणें साहजिक होतें तरी इष्ट नव्हतें. शिमग्यांतील हुरूट मुलांच्या नादीं लागून चांदण्या रात्रीं वेश्यांचीं दारें ठोठावून बीभत्स गाणीं म्हणण्यांत जरी मला तादृक अपाय झाला नसला; तरी पुढें प्रतिष्ठितपणें वसंत कोकिला आणि मदनमंजरी असल्या तीनतीनशे पानांच्या संस्कृत पूर्ण मराठी भाषेंतल्या एकरंगी कादंब-या वाचून मला अपाय झाला. ह्याच सुमारास जमखंडीस नवीन अलल डुरर नाटकेंही येऊ लागलीं होतीं. पुढें वरच्या यत्तेंत गेल्यावर वाईकर संगीत मंडळीची रत्नावलि आणि अण्णा किर्लोस्कराचें शाकुंतल व सौभद्र हीं नाटकें पाहावयास मिळूं लागलीं. तरी माझ्या दारिद्र्यामुळें नाटकें पाहाण्यावर जो आळा बसला, तो कादंब-या वाचण्यावर बसेना. कारण नाटकाला तिकिट काढावें लागे. पण कादंब-या फाटक्या कां असेनात फुकट वाचावयास मिळत. गुळास मुंगी चिकटते त्याप्रमाणें कोठून तरी शोधून आणिलेल्या कादंबरीस मी चिकटलेला दिसे. तरी शाळेंत सगळ्या सातही यत्तेंतून माझा नंबर पहिल्याचा दुसरा कधीं झाला नाहीं. म्हणून माझें कादंब-याचे वेड तेव्हां कोणाच्या डोळ्यांवर आलें नाहीं. शिवाय हेंही लक्षांत घेतलें पाहिजे कीं माझें खाजगी वाचन केवळ फोलकट कादंब-यांतच न संपता श्रीधर, मुक्तेश्वर, महिपती सारख्या मराठी कवींच्या पौराणिक पोथ्याही मी वाचीत असें.

पोथीवाचन
माझे बाबांनीं शाळेंतील अभ्यासविषयीं जरी माझी म्हणण्याइतकी विचारपूस केली नाहीं, तरी त्यांच्या त्या वेळच्या मताप्रमाणें जे धार्मिक लहान मोठे ग्रंथ त्यांना आढळले त्याचे पाठांतर मजकडून बाबा लक्षपूर्वक करून घेत असत, हें मला आतां आठवून त्यांचे मला फार आभार वाटतात. त्यामुळें पुढें हायस्कुलांत गेल्यावर माझ्यामध्यें आपोआप एक भक्तीचा उद्रेक झाला. पण हायस्कुलांत जाण्यापूर्वीं किंवा गेल्यावर आरंभींच्या वर्षीं बाबा माझेकडून रोज आंघोळ केल्यावर जेवणापूर्वी देवीदास कवीकृत ‘व्यंकटेश स्तोत्र’ वाचवून घेत असत. हा लहानसा १०८ ओव्यांचा ग्रंथ अतिशय सुंदर आणि रसाळ आहे. मी नित्य तो आवडीनें वाचीत असें. त्यांतल्या कांहीं ओव्या माझ्या अगदीं मुखोद्गत झाल्या होत्या. दर शनिवारीं विशेषतः श्रावणमासीं संध्याकाळीं दिवा लावल्यावर बाबा स्वतः तुळशीकट्यावर बसत आणि माझेकडून शनिमाहात्म्य वाचून घेत. कदाचित् साडेसातीचा फेरा आला म्हणून शनिग्रहाच्या शांतीसाठीं त्यांनीं हें पठणश्रवण सुरूं केलें असावें. बाबांना ज्योतिषाचा नाद होता आणि विश्वास होता. दर शुक्रवारीं कसली तरी पोथी वाचवून नंतर फुटाण्याचा प्रसाद वाटण्यांत येत असे. आपल्या वडिलांच्या श्राद्धाचे दिवशीं आणि विशेषतः अक्षततृतीयेच्या दिवशीं बाबा मजकडून गयासूर आख्यान नांवाची एक पोथी वाचवून घेत असत.

धार्मिक ग्रंथ
बाबांच्या संग्रहीं जसें शिळा प्रेसवर छापलेल्या हरीविजय, रामविजय, पांडवप्रताप, करवीर महात्म्य, गुरुचरित्र वगैरे पोथ्या असत; त्याप्रमाणे श्रीज्ञानेश्वरीची एक हस्तलिखित मोठी पोथी आणि तुकारामाची रूपावलि, मनचर्येचे अभंग, गौळणी वगैरे हस्तलिखित गाथांचा पुष्कळ संग्रह असे. तसेंच दत्त सांप्रदायाचीं अष्टकें, देवींच्या आरत्या, अनुभविक साधूंचीं पदें, भजनी भारुड वगैरे कानडी किंवा मराठी पदांचा त्यांना जसजसा शोध लागे तसा ते सर्व आमचेकडून लिहून ठेवीत असत. ह्यांमुळे माझ्या धर्मबुद्धीच्या विकासालाच नव्हे तर मराठी व कानडी भाषेच्या अभ्यासाला मोठी मदत झाली!

माझें बि-हाड

प्रकरण २६ वें
डॉ. ग्रेडन
इंग्लंडांत परक्यांना राहण्यासाठीं उत्तम व्यवस्था असते. श्रीमंतासाठीं व सामान्यासाठीं निरनिराळ्या दर्जाचीं हॉटेलें शहरांत, गांवांत आणि प्रेक्षणीय स्थळें रानांवनांतून सुद्धां मुबलक आहेत. शिवाय खासगी रीतीनें राहण्यासाठीं मध्यमप्रतीचे लोक पाहुण्यांकडून पैसे घेऊन (Paying Guest) आपल्या घरीं वाटेल तितके दिवस सोय करतात. डॉ. आणि मिसेस ग्रेडन या दंपतीकडे मीं बहुतेक पहिली टर्म घालवली. कॉलेज वसतिगृहांत, मी उशिरां गेल्यानें जागा मिळाली नाहीं. पण पुढील अनुभवावरून, स्वातंत्र्य आणि काटकसर या दृष्टीनें बाहेर राहणेंच बरें वाटूं लागलें. ग्रेडनसारख्या संभावित कुटुंबामध्यें मला इंग्रजी चालीरीति आणि सभ्यता यांची बरीच माहिती मिळून फार लाभ झाला. सामान्य हिंदु विद्यार्थ्याला टेबलावर बसून कांटे-चमचे वापरणें, टॉय कॉलर नीट बांधणें वगैरे क्षुल्लक गोष्टीपासून तों संभावित मंडळीमध्यें बोलण्या चालण्याची ढब राखणें व दुस-याचा पाहुणचार करणें, वगैरेपर्यंतची फार खबरदारी घ्यावी लागते. शिकल्याशिवाय ही खबरदारी शक्य नाहीं. काटकसरीसाठी मला हें घर सोडून स्वतंत्र रीतीनें भाड्याची जागा घेणें पुढें काटकसरीच्या दृष्टीनें बरें वाटलें. गरीब स्थितीचें कुटुंब एक सबंध घर घेऊन आपण तळघरांत राहून इतर मजले सभ्य गृहस्थांस भाड्यानें देऊन आपली गुजराण करतात. कुटुंबांतील मालकीण (हिला Land Lady असें म्हणतात) बहुतेक अशा प्रकारचा धंदा करते. पाहुण्यांचें जेवणखाण, स्नानाची, कपडे धुण्याची व कांहीं घरगुती व्यवस्थेची जबाबदारी या बाईकडे असते.

भाड्याची जागा
ऑक्सफर्ड वूल्स्टर प्लेस नांवाच्या मध्यम वस्तीच्या भागांत नं. २३ च्या घरांतील पहिल्या मजल्यांतील दोन खोल्या मीं घेतल्या होत्या. ऑक्सफर्डचा विद्यार्थी, विशेषतः ब्राह्मसमाजाचा प्रतिनिधी म्हणून काटकसर संभाळून व्यवस्थेनें व सभ्यतेनें वागणें मला जरुर होतें. निजावयाची खोली व उठण्याबसण्याची खोली निराळी ठेवावी लागते. युनिव्हर्सिटीतील बाहेर राहणा-या विद्यार्थ्यांवर युनिव्हर्सिटीच्या शिस्तीचा डोळा असतो. म्हणून अशा घरांना युनिव्हर्सिटीकडून परवाना घ्यावा लागतो. माझ्या लॅंड लेडीचें नांव मिस पिअर्सन होतें. मिस्टर पिअर्सन ऑक्सफर्डच्या एका मोठ्या हॉटेलांत वाढप्याचें काम करीत होते. ह्यांना दोन मुलें व चार मुली होत्या. माझ्या वरच्या मजल्यांत दुसरा एक पाहुणा होता. आम्ही दोघे ६ महिन्यांचे वर तेथें राहिलों तरी एकमेकांशीं कधींच बोललों नाहीं. कारणाशिवाय एकमेकांशीं सलगी लावणें हें असभ्य समजलें जातें.

पिअर्सन
पिअर्सन हें कुटुंब अत्यंत साधें, गरीब व फार प्रामाणिक होतें. जातिभेद नाहीं तरी इंग्लंडांत वर्गभेदाचें प्रस्थ फार आहे. ऑक्सफर्डचा विद्यार्थी आणि त्यांतल्यात्यांत धर्मशिक्षणाचा विद्यार्थी, याचा दर्जा इंग्लंडांत फार मोठा समजला जातो. अमीर उमरावांच्या खालोखाल धर्माधिका-यांचा दर्जा फार मोठा मानला जातो. प्रसंगविशेषीं मोठमोठ्या लॉर्ड लोकांवरही अशा लोकांचें दडपण पडतें. ह्या कुटुंबांतील सर्व लहानथोर माणसांनीं मला नेहमीं फारच आदबीनें वागवलें. म्हणून मला शेवटपर्यंत बि-हाड बदलण्याचें कारण उरलें नाहीं. सर्वांत वडील मुलगी ॲलिस हिच्याकडे पाहुण्यांची सर्व व्यवस्था पाहण्याचें काम होतें. बोलावल्याशिवाय कोणीही खोलीच्या आंत पाय टाकत नसत. इंग्लंडांत खोल्यांचीं सर्व दारें, उन्हाळ्यांतही नेहमींच लावलेलीं असतात. कोणी कोणाकडे परवानगीशिवाय आंत येत नाहीं. पुढें दाट परिचय झाल्यावर मी होऊनच तळघरांतील स्वयंपाकघरांत मिसेस पिअर्सनकडे खेळीमेळीनें जाई. तेव्हां सर्व कुटुंबाला आपला मोठा सन्मान झाल्यासारखें वाटे. ॲलिसचें वय सुमारे बावीस वर्षांचें होतें. तिच्या पाठीवर विली व फ्रॅंक असे भाऊ होते. त्यांच्या पाठीवर नेली, मे आणि मॅगी अशा तीन मुली होत्या. मॅगी तीन वर्षांची होती.

व्यक्तित्व
मी या सर्व मुलांना घेऊन आदितवारीं फिरण्यास जात असें. ॲलिसचा एक मोठा भाऊ वारला होता. त्याचें थडगें मी पाहण्यास जावें अशी ॲलीसनें एकदा मला सूचना केली होती. ख्रिस्ती समाजाची स्मशानभूमि देखील फार सुंदर व रमणीय असते. नाहींतर आमच्या पुण्याचें ओंकारेश्वर! एके रविवारीं मी तें थडगें सर्व लहानग्यांसह पाहण्यास गेलों. थडग्यावरील गुलाबाच्या झाडाला सुंदर फूल आलें होतें. तें पाहून मी लहानग्या मॅगीला म्हटलें, ‘बाळ, तें फूल घे बघूं!’ ती म्हणाली, “No Sir, तें झाड माझ्या आईचें आहे. तिच्या परवानगीशिवाय मला हात लावतां येत नाहीं.” हें ऐकून मी मनांत चरकलो. मॅगी केव्हां केव्हां बोलावल्यावर माझ्या खोलींत येई. तिला, ‘हें टेबल कुणाचें, ही खुर्ची कुणाची’ असे प्रश्न विचारल्यास “माझ्या आईची” असें गंभीर उत्तर येई. ‘आमची’ असे उद्गार तिचे तोंडून कधींच येत नसत. गरीब स्थितींतील लहानग्या मुलीचे व्यक्तीत्वाचे हे उद्गार ऐकून इंग्रजांविषयीं मला धन्यता वाटली.

माझे सोबती

प्रकरण १२ वें
हायस्कुलांतील माझे शिक्षक व अभ्यासाविषयीं साधारण आठवणी वर दिल्या. आतां सोबती व त्यांच्याशीं करमणुकीचे प्रकार सांगितले पाहिजेत. कारण स्वभाव आणि शील बनण्यांत केवळ पुस्तकी अभ्यासापेक्षां ह्या दोहोंचा परिणाम अधिक महत्त्वाचा आहे.

माझी भावंडें
माझी इंग्रजी पहिली यत्ता मला कठीण व त्रासदायक गेली. त्यावेळीं माझा वडील भाऊ जिवंत होता त्यामुळें मला स्वतंत्र सोबती असणें साहजिक नव्हते. त्याचे सोबती असत त्यांच्याच मागें मागें दुय्यमप्रमाणें वागावें लागे. ह्यावरून माझा भाऊ मजवर वडीलपणा गाजवी असें नव्हें. तो शांत स्वभावाचा होता. बरेच वेळा मी त्याचें ऐकत नसलों तरी तो समजुतीनें माझ्याशीं वागून मला आपल्याबरोबर नेहमीं ठेवी. असा मायाळू भाऊ ह्यावर्षीं एकदम वारल्यामुळें मी एकाएकी उघडा पडल्यासारखें मला झालें. तोंपर्यंत माझ्या भावाशिवाय मी इतर कोणाशीं-मग तीं कोणी मुलें शाळेंतील असोत किंवा आळींतील इतर असोत-मिसळत नसे. हायस्कुलांत जाऊन मला माझ्या स्वतःचा शोध लागेपर्यंत माझीं भावंडेंच माझें मित्रमंडळ होतें. जमखंडी गांवांत मराठे जातींतच नव्हे तर ब्राह्मणेतर समाजांत आमच्या घराण्याचे वजन आजोबापासून चालत आलेलें होतें. तें माझ्या बाबांच्या सुशिक्षणामुळें व दरबारीपणामुळें वाढलें होतें हें मागें सांगितलें आहे. आमचा वाडा ज्या आळींत होता, तेथें मराठ्यांची जीं घरें होतीं ती अगदीं गरीब व खालच्या दर्जाची होतीं. एकाद्या किल्ल्याप्रमाणें आमचा वाडा किंचित एकलकोंडा होता. तशांत माझे प्राथमिक शिक्षण आटोपून इंग्रजी शाळेंत जाऊं लागल्यामुळें, आळींतल्या मुलांतच काय पण मोठ्या माणसांमध्येंहि माझें महत्त्व वाढत असल्याची जाणीव मजमध्यें दिसूं लागली. माझ्या भावांत अशी अहंता नव्हती. मी लहान व अल्लड, पण तो समजूतदार - त्याच्या माझ्यामध्यें पांच वर्षाचें अंतर – असल्यामुळें तो भोंवतालच्या लोकांत अधिक मिसळत असे. अशा वेळीं तो मला एकाएकीं सोडून गेला, इकडे तर शाळेंत नव्या इंग्रजी विषयाशीं माझे नीट जमेना; त्यामुळें मी त्रासलेला व बहुतेक दुर्मुखलेला असें. माझी धाकटी भावंडे म्हणजे दोन बहिणी (जनाक्का, तान्याक्का) - त्यांच्या माझ्यामध्यें अनुक्रमें ५ आणि ७ वर्षांचें अंतर होतें. अशा अनेक कारणांमुळें माझें पहिल्या यत्तेंतलें वर्ष इ. स. १८८५ बहुतेक एकलकोंडेपणांतच गेलें. आळींतील सामान्य लोकांना हीं कारणें कशी कळणारॽ ते मला मोठा गर्विष्ठ समजत. माझ्या भावाच्या तुलनेनें मी जवळजवळ लोकांत अप्रियच होतों.

माणूसघाणेपणा
मी लहानपणीं फार लाजाळू असल्यानें लोकांत न मिसळण्याचा माझा स्वभावच होता. अद्यापिहि मला एकदम एकाद्या समाजांत कारणाविना किंबहुना अगत्यानें बोलाविल्याविना जाणें आवडत नाहीं. ह्यामुळें अजून केव्हां केव्हां मजवर गर्विष्ठपणाचा - निदान मानीपणाचा आरोप येतोच. ह्यामुळें, माझ्या आतेचा कितीहि आग्रह असला तरी मी त्यांच्या आळींत कधीं फिरकत नसे. पण माझा भाऊ मात्र त्या बाजूला फार लोकप्रिय असे. तो तरुण होता. माझ्यापेक्षां रंगानें उजळ व रुपानें देखणा होता. बड्या बापाचा वडील मुलगा आणि स्वभावानें मनमिळाऊ. मग कां लोकप्रिय होणार नाहींॽ विशेषतः त्या बाजूच्या तरूण मुली त्याच्यावर फार फिदा होत्या. आणि मला हें रहस्य त्यावेळीं (माझें वय अवघे ११।१२ वर्षांचें) कळणें शक्य नव्हतें. म्हणून माझ्या भावाच्या चहाड्या घरीं येऊन मी मुग्धपणें आईजवळ सांगें. आई ते मनावर घेत नसे. आणि भावाला तर मजविषयीं कधीं रागच नसें. त्यामुळें माझ्या सासूच्या आळींतील लोक मला चहाडगा व मत्सरी म्हणत. मी जो मुलांशीही न मिसळणारा, तो मुलींत कसा मिसळणारॽ म्हणून त्या मला माणूसघाणा म्हणत. पुढें तर मोठा शिकलों, विलायतेला जाऊन आलों, बाह्य समाजांत शिरून सुधारणेचा अतिरेक केला, दारिद्र्याचें व्रत घेतलें, आणि शेवटीं कुटुंबासह महारामांगांच्या वाड्यांत त्यांची सेवा केली ! ह्यापैकीं एकाहि कारणानें मराठ्यांसारखा मागासलेला समाज मला अद्यापि विक्षिप्त समजणें साहजिक आहे. मग ह्या सर्व कारणांचा कडेलोट करणा-या मला जमखंडीतील मराठेच नव्हेत तर सर्वच लोक अद्यापि माणुसघाणा म्हणतात ह्यांत नवल कां वाटावेंॽ आतां देखील फार दिवसानें मी जन्मभूमीला गेलों तर माझ्या घराण्याचा लौकीक जाणून लोक मला गांवांत तरी घेतात. बाटका, ख्रिश्चन, बहकलेला समजून मला महारवाड्यांत बसवीत नाहींत ह्यांतच मी भाग्य समजतों ! अर्थात मराठेतर समजूतदार माणसें - मग ती ब्राह्मण असोत, लिंगायत असोत कां मुसलमान असोत, मला फार बहुमानानें वागवितात तो प्रकार वेगळा. जमखंडीतील मराठे तरी मला अद्यापि दूरदूरच करीत आहेत. 'कालोध्ययं निरवधि विपुला च पृथ्वी'!! माझा लाजाळू स्वभाव, लोकांत बसण्या उठण्याचा संकोच, माझ्या भावाच्या मृत्युमुळें झालेला विरह आणि अंगवळणी न पडलेल्या इंग्रजी अभ्यासाचा कांच इत्यादि कारणामुळें ह्यावेळीं मी फार घुम्या स्वभावाचा झालों होतों. अशा वेळीं एक लहानशीं सुंदर गोष्ट घडली ती आठवते. ती दिसण्यांत क्षुद्र असली तरी माझ्या त्यावेळच्या अंतःस्थितीवर मोठा मनोरंजक प्रकाश पाडीते, म्हणूनच केवळ येथें देतो.

गोड देखावा
माझा भाऊ वारल्यावर फार तर एक दोन महिन्यांतली ही गोष्ट. ह्या वेळीं मी बारा वर्षांचाहि नव्हतों व माझी बायको फार तर तीन वर्षांची असावी. माझी आत्या वरचेवर समाचाराला आमचे घरीं येई. ह्यावेळीं बरोबर तिनें माझ्या या लहानग्या बायकोला लुगडे वगैरे विशेष कांहीं न नेसवितां तसेंच आणिलें होतें. कारण माझें घर जरी माझ्या बायकोचे सासर तरी तिच्या आईचे माहेर होतें. किंबहुना तीच लहान पोर आईला न कळत अर्धी नागडी उघडी सहज मागें लागून आली असावी. आमच्या वाड्याच्या मोठ्या दरवाज्यांतून आंतील लहानशा चौकांत येतांना दारांत एक मोठी गुळगुळीत ओझरती फरशी होती. तिचेवरून दुडदुड धांवत येतांना हें लहान मूल पाय घसरून कोलमडून पडलें. त्यावेळीं मी जवळच एका खांबाला टेकून खालीं मान घालून दुःखी कष्टी बसलों होतो. मी चटकन् उठून तिला कवटाळून उचललें व जेथें मंडळी सर्व बसली होती त्या कट्ट्यावर नेऊन ठेविलें. हा देखावा पाहून मंडळींत हंशा पिकला. लग्नांत माझी बायको ६।७ महिन्याची होती म्हणतात. तिची मानहि नीट राहात नव्हती. लग्नांत बायको लपवून ठेवितात, तिला नव-यानें शोधून कडेवर घेऊन यावयाचे वगैरे खेळ असतात. माझ्या लग्नांत हा खेळ होणें शक्य नव्हतें. तो खेळ मी आज केला म्हणून मंडळी हांसत माझी थट्टा करूं लागली. मी स्वभावानें लाजाळू, घुम्मा व मंडळींत फारसा न मिसळणारा होतों. तरी प्रसंग पडल्यास उचित असेल ती गोष्ट करण्यास किंवा बोलण्यास मी कधीं कसली फाजील लाज अगर भीड राखीत नसे. माझी बायको अद्यापि फार लहान असल्यामुळें तिला तर लाज ती कशी माहीत नव्हती आणि ती माझी आतेबहीणच असल्यानें मी तरी काय म्हणून लाजावें, हा विचार मी कृतीनें दाखविला. हा गोड देखावा पाहून माझ्या भावाच्या मृत्युनें ज्यांचीं हृदयें दग्ध झालीं होतीं त्या माझ्या आईबापांच्या तोंडावर हासें विलसूं लागलें. माझ्या आत्येला तर माझें इतकें कौतुक वाटलें कीं त्याचें शब्दांनीं वर्णनच शक्य नाहीं. आपल्या मुलीचें पालन आपला लाडका भाचा उर्फ जांवई पुढें उत्तम रीतीनें करील ह्याचें पूर्व चिन्हच ह्या प्रसंगीं तिनें प्रत्यक्ष पाहिल्याचा तिला आनंद झाला! त्यावेळचें माझ्या बायकोचें गुळगुळीत बाळसें, कुरळ्या केसाच्या झिप-या; सहजमधुर चेहरा, अकुंठित धावपळ, आणि पडली असली तरी मी उचलल्या बरोबर तिनें हासलेलें बाळहांसें ह्या सर्वांची छबी माझ्या बाल-हृदयाच्या कॅमे-यांत तात्काळ ठसावली. ती निगेटिव्ह मी अजून राखून ठेविली आहे. कितीदां तरी एकटा असतांना ती मी काढून पाहात माझ्याशींच रमतो! प्रिन्सिपाल गोळे ह्यांनीं आपल्या "हिंदुधर्म आणि सुधारणा" ह्या पुस्तकांत बालविवाहाच्या सात्त्विक प्रेमाचें जें गौरव गाइलें आहे, त्यांतलें रहस्य असेंच असेल कायॽ

मित्रमंडळ
ह्याप्रमाणें इंग्रजी पहिल्या यत्तेंतलें माझें वर्ष बहुतेक एकलकोंडेपणांतच गेलें. दुस-या यत्तेंत गेल्याबरोबर माझ्या अभ्यासाची झपाट्याने प्रगती कशी झाली व मी एकदां जो वर्गांत पहिला नंबर पटकाविला तो शेवटीं सातव्या यत्तेंपर्यंत - नव्हे युनिव्हर्सिटीच्या मॅट्रिकमध्येंहि माझ्या शाळेंतील मुलांमध्ये अखेरपर्यंत कायम राखिला हें मी वर वर्णन केलेंच आहे. वर्गांत पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याला मित्रांची, निदान सोबत्यांची उणीव कधीं भासणें शक्यच नसते. ह्या न्यायानें माझे भोंवती सोबत्यांचा घोळका जमूं लागला. पहिले माझे गडी ब्राह्मणेतरच होते. चंदू साऴुंखे, लक्ष्मण जाधव हे दोघे मराठे, मलकाप्पा तुंगळ हा लिंगायत, पांडू हा न्हावी, आणि मियासो अथणी हा तर मुसलमान होता. पण मी जसजसा वरच्या यत्तेंत जाऊं लागलों तसतशी ही ब्राह्णेतर मित्रमंडळी साहजिक मागें गळूं लागली. तिस-या चौथ्या यत्तेंपासून माझ्या प्रभावळींत बहुतेक ब्राह्मण मुलेंच दिसूं लागलीं.

मुक्तद्वार वाडा
आमचा वाडा एकीकडे निवांत होता. अभ्यासाला बसावयाला पुष्कळ जागा होती. माझा पुस्तकांचा सांठा भरपूर, कांहीं आडलें नडलें तर सांगावयाला माझी नेहमी तयारी. माझा कोणताहि सोबती असो त्यावर पोटच्या मुलांप्रमाणेंच अकृत्रिम प्रेम करण्याची माझ्या आईबापाचीहि तयारी. शिवाय आमच्या वाड्यापुढें विस्तीर्ण आंगण, आणि वाडा गांवाच्या हद्दीवर असून जवळच डोंगर, आणि दरींतून एक सुंदर आंबराई इतकी साधनें असल्यावर माझें भोवती सोबत्यांची अष्टौप्रहर मांदी जमत असें ह्यांत काय नवल! अभ्यास करीत करीत खेळ आणि खेळ खेळतच अभ्यास हा खेडवळ विद्यार्थ्याचा निसर्गानेंच रेखून दिलेला कार्यक्रम असे. तिस-या यत्तेपासून सातवी अखेर पांच वर्षेपर्यंत आमचा वाडा म्हणजे एक अनरजिस्टर्ड शाळा, एक मोफत वाचनालय, एक मुक्तद्वार विद्यार्थि वसतीगृह, एक धांगडधिंग्याचा जिमखाना असे एक ना दोन - जें म्हणाल तें होता म्हणावयाचा !


नवीन भरणा
तिस-या चौथ्या यत्तेंत, रामू रानडे, सखाराम गोखले, वामन घारे, भिमू निवर्गी, मलकाप्पा तुंगल इत्यादि मंडळीं नेहमी माझें खोलींत पडलेली दिसें. पांचव्या सहाय्या यत्तेपासून ह्या मंडळांत नवीवच भरणा झाला. जमखंडीचें पश्चिमेस मुधोळ संस्थान १२ मैलावर आहे. तेथील इंग्रजी शाळेंत त्यावेळीं चौथीपर्यंतच यत्ता होत्या. म्हणून तेथून विष्णु देशपांडे, हणमंत कुळकर्णी, रामू पाटील व अंतू हनगंडी वगैरे हीं मंडळी जमखंडीच्या शाळेंत शिकावयास आली. थोड्याच दिवसांत हे सारे ग्रह माझ्याच मालकेंत फिरूं लागले. ही सर्व खेड्यांतील देशस्थ ब्राह्मणांची मुलें होती. त्यांच्या आईबापांनीं एका घरीं त्यांच्या जेवणारहाण्याची सोय करून दिली होती. ते सर्व आपसांत जवळचे नातलग होते. थोड्याच दिवसांत ती सर्व माझ्या भावंडाप्रमाणेंच माझ्या घरीं पडून राहूं लागलीं. इतकेंच नव्हे तर सुटीचे दिवसांत त्यांनीं मला आपल्या गावीं न्यावें; त्यामुळें त्यांच्या घराण्यांचा व माझ्या घराण्याचाहि मोठा घरोबा जमला! मुलांकडून वडिलांचा स्नेह जमणे म्हणजे वळचणीचें पाणी आढ्याला चढण्याप्रमाणेंच हा प्रकार होता. सातव्या यत्तेंत कुंदगोलहून जनार्दन सखाराम करंदीकर हे आमच्या शाळेत आलें. स्कॉलर ह्या नात्यानें हे माझे प्रतिस्पर्धि होते. पुढेंहि कॉलेजमध्यें हे व मी बी. ए. पर्यंत सारखेंच शिकत होतो.

माझे बाबा

प्रकरण ४ थें
[ जन्म (अदमासें )१८३५ — मृत्यु २७ जून १९१० ]

आजे बसवंतराव यांना दोनच अपत्यें. वडील मुलगा माझे बाबा रामजीबावा आणि धाकटी बहीण माझी आत्या (आम्ही तिला अक्का म्हणत असूं) आंबाबाई. माझे बाबांचें रूप व स्वभाव बहुतेक माझे आजीचे वळणावर गेले होते. शेतक-याचें पोर निसर्गाचे मांडीवरच खेळून वाढलेलें. लहानपणीं खोडकर होतें. तथापि पुढें कोणीं एका शास्त्रीबुवांच्याजवळ ते लिहावाचावयाला व हिशेब ठेवायला त्यावेळचे मानानें फारच उत्तम प्रकारें शिकले. ह्याचें श्रेय आजोबाला, बाबांच्या तैलबुद्धीला किंवा त्या शास्त्रीबुवांच्या चांगुलपणाला द्यावें हे ठरविण्याला आतां मार्ग नाहीं. कारकुनी शिक्षणांत तर बावांचा जमखंडीस नंबर पहिला होता ! त्यांचें मोडी अक्षर म्हणजे मोत्याचा दाणा! माझ्या वेळेला बाबा तर मुलांना मोडी कित्ते घालून देत. जमाखर्चांत जमखंडी दरबारांत त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. मामुली शिक्षण संपल्यावर जमखंडी संस्थानांत बिद्री नांवाचा एक पेट्याचा गांव आहे, तेथें त्यांना प्रथम शिक्षकाची नोकरी लागली. त्यावेळीं ब्राह्मणी संस्थानांत ह्या मराठ्याच्या मुलाला शिक्षकाची नोकरी मिळते ही सामान्य गोष्ट नव्हे. ही शाळा सरकारीच असली पाहिजे. एरवीं हा खाऊनपिऊन सुखी मराठ्याचा एकुलताएक लाडका मुलगा, खासगी शाळा काढावयाला जमखंडी हा राजधानीचा गांव सोडून बिद्रीसारख्या पेट्यांत कां जातांॽ ह्या सर्व गोष्टींत त्या शास्त्रीबुवांचे कांहीं तरी अंग आहे. त्या ब्राह्मणाचें लक्ष ओढून घेण्यासारखें कांहीं विशेष पाणी बाबांत असलें पाहिजे. हें पाणी आमच्या आजोबांकडून आलें असावें. तें मजमध्यें किती आलें हें ठरवणें माझें काम नव्हे.

पांढरपेशी शिक्षण
नुसतें कारकुनी शिक्षणच नव्हे, तर धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वैद्यकशास्त्र वगैरे सांस्कृतिक विषयांची तांत्रिक माहिती बाबांना बरीच होती. हें मला समजूं लागल्यापासून माझे नजरेस येऊं लागलें. त्यांना संस्कृत येत नव्हतें तरी मराठींतील संस्कृत तत्सम शब्दाचे कठीण अर्थ त्यांना समजत असत. इतकें त्यांचें प्राकृत पोथ्याचें वाचन झालें होतें. त्या काळच्या प्राकृत पौराणिक सर्व पोथ्यांचा व मूलस्तंभ पंचांगें वगैरे शास्त्रीय वाङ्मयांचाही संग्रह त्यांनीं चांगला केला होता. ह्यावरून त्यांची वाङ्मयभक्ति दिसते. माझे लहानपणीं एक शास्त्री पुराण सांगावयाला आमचे घरीं नेहमीं येत. ह्यावरून गुणी माणसांची संभावना करून खानदानी लौकिक राखण्याची बाबांची प्रवृत्ति चांगली दिसते. त्यांचा हात सढळ होता. किंबहुना ते बेहिशेबी मराठा होते म्हटलें तरी चालेल. कारकुनी हिशेबांत ते कोणालाहि हार न जाणारे असतां संसारांतील काटकसरींत ते फार मागासलेले होते हें मोठें आश्चर्य! सर्व जातींतील संभावीत माणसांचा ह्यांना स्नेह व लळा होता. पण ह्यांना ब्राह्मणी बहुश्रुत राहणीचेंच वळण जास्त कां लागलें ह्याचें कारण ह्यांचे गुरुजी शास्त्रीबोवाच असावेत. पण ह्या बाबतींत मला निश्चित असें कांहींच सांगतां येत नाहीं. इतिहास शोधनाची आवड उत्पन्न होण्यापूर्वींच माझ्या घराण्यांतील सर्व वडील माणसांचाच नव्हे तर वस्तुंचा, मौल्यवान कागद पत्रांचा व दप्तराचा नाश व्हावा ही मला आतां मोठी खेदाची गोष्ट वाटते ! इतिहास हा कॉलेजांतील आवडीचा विषय असून असें कां झालें याचें कारण माझी फकिरी वृत्ति.

ब्राह्मणी वळण
बैठ्या शिक्षणाचें ब्राह्मणी वळण बाबांच्या अंगांत इतकें भिनलें कीं, आजोबांचा शेतकीचा अगर शिलेदारीचा बाणा त्यांच्यांत मुळींच उरला नाहीं. फार काय तर त्यांच्या पोषाखांतही ब्राह्मणी झांक दिसे ती अशी. माझ्या आजोबांची पांढरी बिन पिळाची बत्ती किंवा पायांतली फार तंग नसलेली पण रुबाबदार विजार मी बाबांचे अंगांत कधींच पाहिली नाहीं. इतकेंच नव्हे तर ब्राह्मणाप्रमाणें ते दहा हात लांब धोतर नेसत असत व तें थोडें जुनें झालें म्हणजे, तेंच दुमडून पांघरण्याचें उपरणें करीत. ही चाल जमखंडीस सभ्य ब्राह्मणमंडळींत कदाचित अद्यापि असावी. आमचे इंग्रजी शाळेचे हेडमास्तर त्रिंबकराव खांडेकरही असेंच जोड उपरणें पांघरीत. आंगरखा मात्र बाबांचा मराठा बाण्याचा असे. तो गुडघ्याच्या खालपर्यंत घोळदार असून छातीवर बंद असत. अस्तन्यावर ब-याच चुण्या असून शेवटीं त्यांना कान असत. ते मणगटाच्यापुढें हाताच्या पंजावर अगदीं बोटापर्यंत पसरलेले असत. रुमाल कर्नाटकी त-हेचा मोठा असून ती बांधण्याची ढब ठरलेली असे. पायांत जोडाही मराठी त-हेचा असे. एकंदर पोषाख शुभ्र आणि साधा असून रुबाबदार असे. ऋतुमानाप्रमाणें ह्यांत कधीं फरक होत नसे. अर्ध्याच पोषाखानें ते कधीं बाहेर पडत नसत.

कडक स्वभाव
बाबांचा स्वभाव फार बोलका होता. ते आपल्या मित्राजवळ बोलत बसले म्हणजे मला लहानपणीं ऐकण्याची फार मौज वाटे. त्यांच्या बोलण्यांत म्हणी फार असत. मराठी, कानडी व मुसलमानी ते सफाईनें बोलत. ऐकणा-यावर त्यांची छाप तेव्हांच बसे. ते स्वभावानें किंचित् शीघ्रकोपी पण खुल्या दिलाचे व मृदु अंतःकरणाचे असत. आम्हांला लहानपणीं रागानें एकदां मारत सुटले म्हणजे बेतालपणानें फारच मारीत व मग राग ओसरल्यावर आपणच अश्रु ढाळीत. बिद्रीचे शाळेंत असतांना मुलांना फार मारत म्हणून त्यांना ती नोकरी सोडून श्रीमंतांनीं आपल्या खासगींत जवळ घेतलें असे मी एकदां ऐकलेलें स्मरतें. ते विशेषतः माझ्या मोठ्या भावाला फार मारीत. त्यांना आम्ही लहानमोठे सर्वजण फारच भीत असूं. इतकेंच नव्हे तर गांवांतही त्यांची जरब फार असे. गांवच्या पोलीस शिपायांनीं एकादी कांहीं चूक केली तर आपल्या पोटच्या पोराप्रमाणेंच त्यांना कित्येक वेळां मारलेलीं उदाहरणें घडलीं आहेत! व्यवहारांत मात्र ते फार भोळसट असत. कांहीं विक्री सौदा करावयास गेले तर व्यापा-यांच्या डोईवर देवाचा प्रसाद ठेवून धमकावून खरी किंमत सांगावयास लावीत. मग त्यांनीं सांगितलेलीच किंमत देत! त्यांनीं कधींही व्याजानें पैसे दिले नाहींत! व्याज घेणें हें मोठें पाप समजत. पण त्यांनीं बिन व्याजीं दिलेलें कर्जही कधीं कोणीं परत फेडलेलें मला आठवत नाहीं. फार तर काय, श्रीमंताशीं भांडून सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन जेव्हां ते घरीं बसले, तेव्हां ह्यांनीं कांहीं प्रकरणीं स्वतःची तसलमात २५८९ रुपये (पंचवीसशें एकूणनव्वद) सरकारांत खर्ची घातले होते. तेही त्यांनीं १५!१६ वर्षें मागितली नाहीं. पुढें आमच्या घरीं आम्ही दारिद्र्याच्या भयंकर यातना सोशीत असतां, ही तसलमात परत मागण्याच्या याद्या कितीदां तरी श्रीमंत आप्पासाहेबांकडे केलेल्या मीं पाहिल्या; पण एक कवडीही परत मिळाली नाहीं.
तरुणपणीं बाबांच्या हातांत चार पैसे खेळत म्हणून त्यांनीं प्रथम प्रथम ऐषआराम केला. पण त्यांचा धर्माकडे स्वाभाविक असलेला ओढा बळावला, विशेषतः पंढरपूरच्या वारकरी पंथाचा फारच नाद लागला. प्रथमपासूनच त्यांचा स्वभाव प्रेमळ, श्रद्धाळू, उदार आणि करारी असे. त्यांचा प्रामाणिकपणा किंबहुना सर्वच आमच्या घराण्याच्या प्रामाणिकपणाचा लौकिक जमखंडी संस्थानांत गाजत होता.

बाबांची रसवंती
मी अगदीं लहान असतांना बाबांच्या मित्रांपैकीं म्हातारबा सुतार, बसप्पा अथणी(लिंगायत) आणि बापू जामदार (मराठे) हे वरचेवर घरीं येत. नंतर मी थोडा मोठा झाल्यावर सटवप्पा सुतार आणि पांडाप्पा टर्की (ब्राह्मण वारकरी) हे येत असत. पण बाबा कांहीं फारसे कोणाचे घरीं जात नसत. आमच्या वाड्यांत सोप्याच्या उजव्या बाजूस एक चारपांच फूट लांबरुंद, स्वच्छ व प्रशस्त चुनेगच्ची कट्टा असे. ह्याला आम्ही तुळशीकट्टा म्हणत असूं. कारण पूर्वीं येथें तुळशीवृंदावन होते. ह्या कट्ट्यावर बाबा आपल्या मित्रांशीं बोलत बसत. मी आपला तेथें घुटमळत असावयाचा. कारण बाबांचें संभाषण मला आवडत असे. मला वाटतें माझे अंगीं जर कांहीं कर्तृत्व आलें असेल तर त्याचें प्रथम बीजारोपण बाबांच्या अकृत्रिम, साध्या व जोमदार रसवंतीनें केलें असावें. रूपानें, रंगानें व स्वभावानें मी अगदीं बाबांचे वळणावरचा आहें, असें मला लोक म्हणत असत.
जमखंडीस पंढरपूरचा भजनी संप्रदाय वाढविण्याच्या कामीं बाबांचा पुढाकार होता. नरसप्पा नांवाचे एक रजपूत गृहस्थ फार सात्विक होते. मी त्यांना कधीं पाहिलें नाहीं. ते जमखंडीस हा पंथ काढण्यांत मुख्य होते असें मीं ऐकलें होतें.

विठोबाचा सप्ताह
आमचे घराजवळ 'आप्पासाहेबांची विहीर' म्हणून एक पिण्याच्या पाण्याची मोठी विस्तीर्ण व खोल विहीर आहे. तिचे कांठीं सटवाप्पा सुतारांचे घर व सुतारीचा कारखाना आहे आणि त्याचे समोर रस्त्याच्या दुस-या बाजूस विठोबाचा मठ आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेपासून (ही श्रीतुकाराम बोवांची पुण्यतिथी) तों पुढच्या षष्ठीअखेर (ही श्रीएकनाथस्वामींची पुण्यतिथी) पांच दिवस आणि त्यापूर्वीं व नंतरचे दोन दिवस असा दरवर्षीं त्या मठांत भजनाचा मोठा सप्ताह साजरा केला जात असे. सात दिवस विणा रात्रंदिवस खालीं ठेवायचाच नसतो. दररोज काकडआरती, शेजारती सकाळसंध्याकाळ होई. त्यावेळीं मोठी गर्दी जमे. ३०।४० नियमित टाळकरी लंब गोलांत उभे राहात. मध्यें विणेकरी उभे राहात. दोहों बाजूंस या गोलाचे शेवटीं दोन मृदुंग्ये उभे असत. आरतीचे वेळीं भजनाच्या सोहळ्याला फार रंग येई. बीजेच्या व षष्ठीच्या आरतीचा थाट मोठा होई. कुरमुरे, नारळ व बत्तासे ह्यांनीं भरलेलीं खिरापतीचीं ताटें ऐकणारे स्त्रीपुरुष आणीत. आरतीचे वेळीं गुलाल उधळला जाई. बुक्का, उदकाड्या, कापूर यांचा घमघमाट सुटे. टाळक-यांत मुलें उभीं राहात. त्यांत मी व माझा मोठा भाऊही असें. विणेकरी हरीबा कर्जगार नांवाचे जिनगर (वारकरी) असत. आरती धरण्याचा मान बाबांचा असे. तो देखावा माझ्या डोळ्यांपुढें चित्रासारखा आहे. माझ्या धार्मिक विकासांत या भजनाचा फार मोठा परिणाम झालेला आहे. आरती संपल्यावर सायंकाळीं ६ वाजतां प्रसाद म्हणजे जेवणाच्या पंक्ति बसत. शंभर-दोनशें पात्रें तरी दररोज होत. त्यांत वाणी, मराठे, ब्राह्मण, सुतार, सोनार, जिनगर, शिंपी वगैरे जाति असत. जातीभेदाचे नियम कडक पाळण्यांत येत नसत. शेवटचे दिवशीं मोठी आरती व महाप्रसाद होऊन रात्रीं १० वाजतां दिंडीचा छबिना निघे. तो सर्व रात्रभर गांवांतून व पेठेंतून ब्राह्मण आळींत एक जुनें विठोबाचें देऊळ आहे, तेथें जाऊन सकाळीं ८!९ वाजतां परत मठांत येई.

बबलादीचे स्वामी
बाबांची मानमान्यता सर्व जातींत असे. त्यामुळें आमचे घरीं जातिभेद विशेषतः पाळण्यांत येत नसे. आमचे बाबा मराठे जातीचे सरपंच असूनही आमचे घरीं जातिभेदाची इतकी ढिलाई होती. फारतर काय ब्राह्मण, लिंगायतसुद्धां आमचेकडे येऊन जेवत. मात्र तें फार उघडपणें नसे. इतकेंच नव्हे तर पुढेंपुढें बबलादी या लिंगायत स्वामींचे आमचेकडे येणें जाणें फार झालें. तेव्हां तर उघडपणें आमच्या घरीं सर्व जातीच्या पंक्ति बसत. त्यावेळीं मी इंग्रजी ५।६ इयत्तेंत होतों. ह्या स्वामींच्यापुढें एक शिंग वाजविणारा महार असे. तोही आमचेकडे जेवत असे. बबलादीचे स्वामि एक प्रसिद्ध सिद्ध गणले जात. हे उघडपणे दारू पीत व मांसही खात. धर्माच्या नांवावर हे सगळेच उघड चालत असे. आमचें अठरा विश्वें दारिद्र्य असूनही ही टोळधाड आमचे घरीं आठ-आठ दिवस उतरत असे. खर्च कसा चाले ह्याचें मला आश्चर्य वाटतें. त्यावेळीं मला नुसती मौज वाटत असे. पुढें मॅट्रिकची परीक्षा होऊन मी पुण्यास कॉलेजांत शिकूं लागलों. तेव्हां माझे वजन घरीं भासूं लागलें. प्रत्यक्ष बाबाही मला पाहून दबत असत. पुढें या स्वामीमंडळाचें प्रस्थ कमी होऊन शेवटीं येण्याचें अजिबात बंद झालें. तुळजापूरची आंबाबाई, सौंदत्तीची यल्लमा, पंढरपूरचा विठोबा, नरसोबाचे वाडीचा दत्तात्रय, कोल्हापूरची महालक्ष्मी ह्या मोठमोठ्या क्षेत्रांतल्या प्रसिद्ध दैवतांचे संप्रदाय तर असतच. पण शिवाय वरील बबलादीचे स्वामि, रामदासी पंथ, गोसावी, बैरागी, अतिथी अभ्यागत वगैरे अनेक खुळांचा सुळसुळाट आमचे घरीं सारखा चाललेला असे. मिळकत मुळींच नाहीं उलट खर्चालाही ताळ नाहीं. ह्याचा परिणाम ठरलेला झाला तो हाच कीं; शेतें गेलीं, गुरें गेलीं, घर गेलें. दागिने गेलें सर्व सावकाराचें हातीं गेलें आणि एक दिवशीं पांघरलेल्या कपड्यानिशीं आम्ही आमच्या मोठ्या वडिलोपार्जित वाड्यांतून बाहेर पडलों व भाड्याच्या घरांत जाऊन राहिलों. त्या वेळेला मला चांगलें कळत होतें. माझी मॅट्रिकची परीक्षा होऊन मीं कदाचित् पुण्यास शिकतही असेन. या सर्व करुण रसानें भरलेल्या नाटकांत मुख्य नायिकेचें पात्र माझी आई साध्वी यमुनाबाई ही होय. आतां तिच्या आठवणीस सुरुवात करतों.

  1. माझे खेळ
  2. माझे आजोबा
  3. माझी आई
  4. माझा हायस्कूलचा काळ
  • 83
  • 84
  • 85
  • 86
  • 87
  • 88
  • 89
  • 90
  • 91
  • 92
Page 88 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी