1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

माझे खेळ

प्रकरण १३ वें
जमखंडी गांव हा खेडेवजा आणि इंग्रजी शाळा नुकतीच झालेली. तेथें अलिकडच्या हायस्कूलाप्रमाणें क्रीडांगणें, व्यायामाचे निरनिराळे प्रकार, ड्रिलमास्तर हे कोठून यावयालाॽ आम्ही आपल्याच मनानें कोठेंतरी गांवाबाहेर जाऊन खेळून येत असूं.

सोंगट्यांचा खेळ
अगदीं प्रथम माझा वडील भाऊ असतांना आमच्या घरीं बैठा खेळ म्हणजे सोंगट्यांचा. गंजिफा, बुद्धिबळें, सोंगट्यांचे हस्तिदंती फासे वगैरे खेळांची सर्व साधनें आमच्या बाबांनीं घरीं करून ठेविली होती. पण ते स्वतः कधीं खेळतांना आम्ही पाहिलें नाहीं. हें सामान मात्र भरपूर घरीं होतें. हा एक बाबांचा, रसिकपणाचा मासलाच म्हणावयाचा. दिवाळीच्या सणांत तर आमच्या घरी सोंगट्यांची मजलसच भरे. नरकचतुर्दशीच्या आदले रात्रीं पासून तो भाऊबिजेची रात्र उजाडेपर्यंत कवड्यांचा खळखळाट अष्टौप्रहर चालत असे. हा खेळ मोठ्या ईरेचा. मनुष्य कितीहि शांत असला तरी तो चिडून भांडल्याशिवाय ह्या खेळाची समाप्ति म्हणून व्हावयाची नाहींच. एका एका बाजूला दहा-दहा बारा-बारा गडी बसलेले, संध्याकाळी सुरू होऊन उजाडेपर्यंत आम्ही खेळांत गढून जात असूं. भांडण केव्हां केव्हां हातघाईवरहि यावयाचें.

एक मल्लयुद्ध
माझा स्वभाव विशेष तापट असे. एकदा आलगूरचे आमचे मामा ( हे वयानें माझ्या वडील भावाहून फार तर १।२ वर्षांनीं मोठे असतील) एकीकडे आणि मी व माझा भाऊ एकीकडे असें सोंगट्या खेळत होतों. मामा फार विनोदी, रडी खेळणारे, चिडखोरांना अधिक चिडवून मजा बघणारे अगदीं पहिल्या नंबरचे. खेळ बाजूसच राहून आमचें भांडण जुंपलें. शब्दयुद्ध संपून मल्लयुद्ध सुरूं झालें. मामा म्हणजे पट्टीचा पहिलवान! आम्ही दोघेच काय, दहा असलो तरी ते दाद कसची देतात. दुस-याला चिडवून स्वतः कधींच चिडत नसत. हे पाहून तर आम्ही अधिकच चिडूं. शेवटीं प्रकरण अगदीं निकरावर जाऊन स्वयंपाक घरांतून आईला आमचेकडे यावें लागलें. गलीव्हरच्या अंगावर लिलिपुटाप्रमाणें आम्ही दोघे बंधु मामांच्या पाठीवर चढून लाथा व बुक्यांचा मारा चालविला आहे. तो खालीं तसाच वाकून हांसत आम्हांला अधिकच खिजवीत आहे. हा प्रकार पाहून आई म्हणाली, ‘अरे हा कसला नवीनच डाव आज काढला आहे रे!’ तीही आपल्या भावाचें पाठबळ न घेता आमचीच बाजू घेऊन मामाला म्हणे, ‘तूं मोठा असून तुला कळत नाहीं काय रे, लहान मुलांशीं असले प्रसंग करायलाॽ’ खरे पाहातां चूक आम्हांकडेच असावयाची. पुढें मी हायस्कुलांत गेल्यावर अगदीं मॅट्रिक होईपर्यंत आमचे घरीं ह्या खेळाचा अड्डाच जमत असे.

पटाईत वृत्ति
दिपवाळी आली कीं माझ्या अभ्यासाच्या खोलीला चुना, रंग वगैरे मी स्वतः व माझे सोबती लावीत असूं. वर छत, झालर आणि रोषनाई आमच्या ऐपतीप्रमाणें करीत असूं. दुस-यांच्या घरींही असे अड्डे होत, तेव्हां अरसपरस जावें यावें लागे. रात्रीं किती भांडणें झालीं, बोलाचाली केली, तरी उजाडल्यावर रात्रीचा प्रकार जणूं काय स्वप्नांत झाल्याप्रमाणें आम्ही सर्वच विसरून जात असूं! सहाव्या सातव्या यत्तेंत असतांना, तेरदालचे विष्णु देशपांडे, रामु पाटील, अंतु हनगंडी, ममलीचे हणमंत कुलकर्णी, त्याचा भाऊ रामू शिवाय जमखंडीचे भिमु निवर्गी, व्यंकू कुलकर्णी, सीनु करकंबकर, रामु जासूद वगैरे १५।२० जण ह्या खेळांत जमूं. मी व तेरदालचे देशपांडे हे नेहमी विरुद्ध पक्षाला असूं. दोघेही सारखेच चिडखोर आणि हेकेखोर. खेळापेक्षां भांडणांतच वेळ आणि शक्ति जास्त खर्चत असूं. शेवटीं शेवटीं जुळवून कवड्या टाकण्याची पद्धत निघाली. व्यंकू कुलकर्णी म्हणजे प्रत्यक्ष शकुनीमामाच. कवड्या जुळवून वाटेल तो फासा हमखास टाकण्यांत त्याचा हातखंडा. त्याच्या खालोखाल मीही जुळवण्यास शिकलों. दहा, पंचवीस, सहा, बाराच काय पण साधे तीन आणि चार हेही आम्ही जुळवून नेमके पाडीत असूं. केव्हां केव्हां बाहेरचे लोक डाव पाहावयाला बसत असत. रंग बहारीचा चढे. पत्ते, गंजीफा फार क्वचित् खेळत असूं. बुद्धिबळाला तर हातच लावीत नसूं. तो गर्दीचा खेळ नव्हे. तितकी गंभीरताही आमच्यांत नव्हती.

‘किर्र’ खेळ
मैदानी खेळ आट्यापाट्या, हुतूतू, खो खो वगैरे खेळत असूं. शिवाय किर्र म्हणून एक खेळ विशेष चुरशीचा असे. यांत हारलेली बाजूचे गडी एकामागें एक कंबरेला धरून वाकून उभे राहात आणि विजयी बाजूचे गडी लांबून धांवत येऊन त्यांच्यावर स्वार होत. ते बराच वेळ बसले आणि भार सहन होईनासा झाला म्हणजे खालच्यापैकीं कोणी तरी “किर्र” म्हटलें कीं खालीं उतरून पुनः उडी घेत. पण जर कां वर बसलेल्यापैकीं एकाचा जमिनीला पाय लागला कीं त्यांच्यावर डाव येऊन त्यांच्या पक्षाला खाली वांकावें लागे. ब्राह्मणांचीं मुलें हा खेळ खेळावयाला किंचीत् कचरत असत.

सुरपारंब्या
झाडावरचा सूर हा खेळ फार मौजेचा वाटे. जमखंडी गांवाभोंवतीं डोंगराच्या दरींतून तळ्यांच्या कांठीं ब-याच रम्य आंबराया असत. तेथें सायंकाळच्या वेळीं निवांत असे. आमची वानरसेना हा खेळ खेळावयास एकादे विस्तीर्ण शाखेचें ठेंगणें आंब्याचें झाड गाठीत असे. सर्वांनीं झाडावर चढावयाचें. एकानें खालीं उतरून, एक दांडकें आपल्या उजव्या तंगडीखालून दूर फेंकावयाचें. ज्याच्यावर डाव आलेला असे तो तें आणीपर्यंत टाकणारा झाडावर चढे. तें दांडक ठरलेल्या कोंडाळ्यांत ठेवून डाव आलेला गडी झाडावरच्यांना शिवण्याचा प्रयत्न करी. त्याची नजर चुकवून कोणीतरी दांडक्यावर नेमकी उडी टाकून तें दांडकें पुनः पूर्वीप्रमाणें फेकून तो झाडावर चढे. कोणातरी एकाला शिवेपर्यंत त्याच्या वरचा डाव जात नसे. हा खेळ मुख्यतः गुराखी मुलांचा असे. ह्याला वडाचें झाड चांगलें. त्याच्या फांद्या लांबवर गेलेल्या, लाकूड चिवट असल्यानें मोडण्याची भीति नाहीं. आंब्याचें पोकळ झाड असतें. शिवाय आंब्याच्या मोसमांत आंबराईत राखण बसे. वडाला नेहमीं मुक्तद्वार. शिवाय पारंब्या खालीं लोंबत असल्यामुळें त्या धरून खालीं उड्या घेण्यास किंवा खालूनच उलटें झाडावर चढण्यास फार सोयीचें हेंच झाड. मात्र घरीं येईपर्यंत अंगावरचे कपडेच काय, पण कातडेंही जागजागीं फाटलेलें असल्यामुळें घरच्या मंडळीपासून फाटका आणि ओरखडलेला भाग लपवून ठेवण्यांत दुसरा एक खेळच खेळावा लागत असे. हात पाय मुरगळलेला, डोकीला खोंक पडलेली, पाठ खरचटलेली, शिरा ताणलेल्या व हाडें न् हाडें खिळेखिळीं झालेलीं - अशा स्थितींत घरीं आलेल्या गड्याला पुनः एक आठवडा तरी आंबराईच्या दिशेने पाहाण्याची सुद्धां इच्छा होते कशालाॽ पण दुस-या आठवड्यांत पुनः हीं माकडें झाडावर आहेतच तयार! जित्याची खोड मरे तोंपर्यंत जात नाहीं. पण आमची खोड मॅट्रिक झाल्यावर पार गेली. कॉलेजांत जाणें म्हणजे बालपणालाच नव्हे तर जन्मभूमीलाही मुकणें होय! जळो तें कॉलेज आणि मरोत ते प्रोफेसर!!


सुरपाट्या
सुरपाट्या हा तर अगदीं राजमान्य राष्ट्रीय खेळ. तो आम्हां खेडवळांचा क्रिकेटच. जमखंडीच्या पूर्वेस नंदिकेश्वराचें एक जुनें देऊळ आहे आणि वायव्येस सुमारें एक मैलावर अबुबकराचा दर्गा आहे. ह्या दोन ठिकाणच्या प्रशस्त पटांगणांत आमची टोळी सुरपाट्या खेळण्यास जात असे. एकदां जाण्याची घडी पडली म्हणजे तीन तीन महिने ती मोडत नसे. त्या आंगणांत खेळून खेळून पाटीचे आडवे आणि सुराचा एक लांब उभा असे खाचरच पडत. ह्या दोन जागा म्हणजे आमच्या वतनाच्या झाल्या होत्या. तेथें दुसरे कोणी फिरकावयाचें नाहीं. इंग्लंडमध्यें ज्याप्रमाणें ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा वचक व दबदबा असतो; तसें जमखंडीस आम्हा विद्यार्थ्यांच्या कळपांचें वजन असे. ह्या टोळीचा मी नायक म्हणून प्रसिद्ध असे. गांवचे लोक विशेषतः आमची शिक्षक मंडळी आमच्या खेळाचें कौतुक करीत असत. एकदां जमखंडीचे वृद्ध यजमान श्रीमंत अप्पासाहेबांनीं उन्हाळयांत साखरपाणी करून मोठ्या आवडीनें आम्हां विद्यार्थ्यांना आपल्या हातांनीं साखरपाण्याचे पेले पाजले!


आमचा कंपू
आमचा कंपू घेऊन मी दरसाल उन्हाळ्यांत आणि पावसाळ्यांत कोठेंतरी नदीच्या कांठीं किंवा डोंगरांच्या दरींत वनभोजनाला जात असे. आमच्यांत लिंगायत, मराठे, ब्राह्मण, मुसलमान सर्व जातींचे विद्यार्थी असत. जातीभेद कसला तो आमच्या गांवीही नव्हता. तसलीं सोवळीं पोरें आमच्या वा-यालाही उभीं राहत नसत. आणि आम्ही त्यांना आमच्यांत घेत नसूं. जनुभाऊ करंदीकर असल्या सोंवळ्याचा होता. तो आमच्यांत फारसा मिसळत नसे. आमचा सर्व कंपू नेहमीं आमच्या वाड्यांत रात्रंदिवस पडलेला असे. बाहेरच्या मोठ्या अंगणापासून आंत स्वयंपाकघर व देवघरापर्यंत ह्या टोळांचा धुडघूस चाले. मात्र बाबांला सर्व भीत. त्यांचेसमोर पुस्तकांत नाक खुपसून बसूं. ते बाहेर गेले कीं घेतला वाडा सर्व डोक्यावर अन् काय. माझ्या दोन बहिणी जनाक्का व तान्याक्का ह्या लहान अल्लड असत. त्याही आमच्या धांगडधिंग्यांत सामील होत. माझ्या आईला कोणीच भीत नसत. तिला सर्व आपलींच पिलें वाटत. तिला स्वतः वीस झालीं. ही बाहेरची वीस! कित्येक वेळां स्वयंपाक घरांतील खाण्याच्या पदार्थांवर हल्ला होई. आमच्या गरिबींतले शिळे तुकडे तेरदालचा विष्णु आणि जमखंडीचा सीनु ही श्रीमंतांचीं मुलें असूनही मिटक्या मारीत खात. मग आईला मायेचें भरतें कां येऊं नये! हे माझ्या भावी सामाजिक सुधारणेचे पाळण्यातले पाय बरें! भावी चारित्र्याचे नमुने पुस्तकांतील रेखीव धड्यांत अगर वर्गांतल्या निर्जीव बाकावर बनत नसून, ते आंगणांतल्या जिवंत धांगडधिंग्यांत आणि समानशील सवंगड्यांच्या धसमस्करीच्या जिव्हाळ्यांत जन्म पावत असतात.

चित्रकला नाद
आमचा सर्व वेळ अभ्यासांत, किंबहुना खेळांतच जाई असें नव्हे. नित्य कांहींतरी नवीन कल्पना निघे, आणि आम्ही सर्वच त्यांत रमत असूं. चित्र काढण्यांत आमच्यांतला रामू रानडे याचा हात चांगला चाले. आमच्या टोळीला लागला चित्रें काढण्याचा नाद! आमच्या सोप्यांत आणि तुळशीकट्यावरच्या भिंतीवर चमकावयाला लागली रामाची, मारुतीची, देवदेवींची चित्रें. तुळशीकट्यावरची भिंत चुन्याची होती. तिचेवर मी लाईफ साईज रामपंचायतन रंगीत काढलें होतें. तें बरींच वर्षें राहिलें होतें. घरांत आलेत्यांना तें दर्शनी भागीं असल्यामुळे दिसे. आतां आठवल्यावर मला त्याची लाज वाटते (कारण त्याच दर्जाची ती आमची कला होती!). पण त्या वेळीं मला त्या चित्राचा मोठा पोरकट गर्व वाटत होता. ह्यावरून मी लहानपणीं किंचित् बढाईखोर असेन असें वाटतें.

कारागिरी
दुस-यांदा एक वेळ गणेश चतुर्थी आली. आणि आमच्या टाळक्यानें घेतलें, गणपती प्रत्येकांनें स्वतः करावयाचा! मग चाललें हें माकडमंडळ जमखंडीच्या पूर्वेस २–२॥ मैलांवर एक डोंगर आहे, तेथून शाडू माती आणावयाला. बरीच शाडूं आणून जो तो चढाओढीनें गणपती करूं लागला. ‘विनायक प्रकुर्वाणो रचयामास वानरम्’ असाही प्रकार अर्थात पुष्कळांचा झाला. तरी प्रत्येकाला आपलीच कृति पसंत पडून आपापली पाठ आपणच थोपटून घेतली. खरें पाहातां रामू रानड्याचा गणपती मात्र त्यांतल्यात्यांत गणपतीसारखा दिसत होता. कांहीं असो. त्या गणेशचतुर्शीतं सर्वांनीं स्वकृत गणपतीचीच पूजा केली ही कांहीं थोडी गोष्ट नव्हे!

आमचे कारखाने
आणखी एकदां साबण करण्याची टूम निघाली. जो तो चुना आणि तेल ह्यांत हात घालून बसला. वड्या तयार केल्या पण त्या वाळेचनात! वाळल्या तर पुनः ओल्याच होईनात. कपड्याला लावूं गेलों तर कपडा फाटे पण डाग कांहीं जाईना. साबणाचे नवे डाग कपड्याला पडूं लागले. चहूंकडे छीथू झाली आणि आमच्या पियर्स सोप कंपनीचें दिवाळें निघालें. ह्याचप्रमाणें शिसपेन्सिली, दगडीपेना ह्यांचे आमचे कारखाने जसे निघाले, तसेच बुडाले. भागीदार आमचे आम्हीच असल्यानें कोण कोणावर फिर्याद करतो. केली तरी पुनः हसेंच होणार नाॽ तरी एका गोष्टींत आमचा हातखंडा असे. आमची शाई नेहमीं आम्हीच करीत असूं. बाभळीच्या शेंगा शिजवून त्यांत हिरडा व हिराकस घालून आम्ही शाईच्या बाटल्या कोनाड्यांत शिल्लक असतच. मात्र ह्या शाईच्या कारखान्याच्या भरभराटीमुळें, शाई वेळोवेळीं घरभर सांडे आणि यामुळें बिचा-या आमच्या आईला सारवणाचा नवीनच त्रास उद्भवे. असो! ह्या गालबोटामुळें आमच्या यशाची शुभ्रता जास्त उठावदार दिसूं लागली. मग आईच्या त्रासाला कोण जुमानतोॽ

माझे आजोबा

भाग पहिला : 'पूर्वज'

पहिल्या आठवणी

अर्थात् माझ्या घराण्यांतील मीं पाहिलेला सर्वांत वडील मनुष्य म्हणजे माझे आजे बसवंतराव.  त्यांचे मेहुणे व्यंकटराव (व्यंकप्पा) हे माझ्या आजीचे सख्खे भाऊ.  हे माझ्या आजीपेक्षां मोठे होते.  पण हे आजोबांपेक्षां लहान कीं मोठें हें मला ठाऊक नाहीं.  हे आमच्या आजोबांच्या आश्रयाखालीं आमचेच घरीं राहात असत.  त्यांची मला फारच अंधुक आठवण आहे.  आमचे घरी एक मोठा काळा म्हातारा पाठाळ बैल यल्लमादेवीला वाहिलेला (कंठाळीचा बैल) होता.  त्यावरून त्याला कठल्या बैल असें नांव होतें.  त्याचेवर ओझें लादून व्यंकप्पा आमचे मळ्यांतून रोज घरीं येत.  हीच माझ्या आयुष्यांतील अगदी पहिली आठवण होय. व्यंकप्पा फार सात्त्विक, साधे व सहनशील होते.  आमचे आजे बसवंतराव नेहमीं त्यांची चेष्टा करीत व तिकडे केवळ दुर्लक्ष करून व्यंकप्पा केव्हांतरी गंभीरपणानें उत्तर देत.  ह्यावेळीं मी फार तर तीन किंवा चार वर्षांचा असेन.

जमखंडी माझ्या जन्मभूमीचा गांव.  हा कृष्णानदीचे दक्षिणेस ४॥ मैलांवर, विजापूरचे पश्चिमेस ३६ मैलांवर व कुडची (एस्.एम्.आर्.) स्टेशनापासून ३३ मैलांवर आहे.  विजापूरपैकीं लिंगायत तेली जातीच्या देसायांचा हा मूळ गांव.  पटवर्धनांनीं त्यांच्यापासून हा प्रांत जिंकून घेतला.

अप्पा दप्तरदार नांवाचे एक श्रीमंत ब्राह्मण गृहस्थ जमखंडीचे यजमान रावसाहेब (गोपाळराव) पटवर्धनांचे वेळीं होते.  त्यांचा कदाचित् आश्रय आमच्या आजोबांस असावा.  कारण त्यांचाच मळा जमखंडीचे पूर्वेस आलगुरच्या वाटेवर दोन मैलांवर होता.  तो आमच्या आजोबांकडे लागवडीस पुष्कळ वर्षे होता.  आमचे राहाते घराची जागाही ह्या दप्तरदारांनींच दिली असें मी ऐकत होतों.  पण माझ्या जन्मानंतर हा जुना संबंध कदाचित् आधींच पुष्कळ वर्षे तुटलेला असावा.  हा मळा मात्र माझे जन्माचे वेळींही आमचेकडेच होता.  ह्या मळ्याला 'अप्पांचा मळा' असें माझे लहानपणीं म्हणत असत.  आतां तो अगदीं उध्वस्त झाला आहे. 
                      

चंद्रोजीराव : आजोबांचे वडील चंद्रोजीराव हे मारले जाऊन त्यांच्या सर्व घराण्याचा नाश झाला !  ते विजापूरपैकीं सुरापूरचे राहणारे.  ही लढाई परशुरामभाऊ पटवर्धन ह्यांनी जिंकली, असे इतिहासकार खरेशास्त्री ह्यांनीं एका केसरीचे अंकातं लिहिलें आहे.  चंद्रोजीराव शिंदे हे जर सुरापूरचे जहागिरदार असतील तर हें शक्य आहे.  पण तें आतां कळण्यास मार्ग नाहीं.  सौंदत्ति येथें १२ व्या शतकांत शिंदे घराण्याचें राज्य होतें.  त्या घराण्यांतील कोणी पुरुष सुरापूरचा जहागिरदार असल्यास चंद्रोजीरावाचा संबंध शोधून काढण्यास जागा आहे.  पण माझे वडील जिवंत असतांना मला आपल्या वंशावळीचा शोध करण्याचा विचारही सुचला नाहीं.  आतां तर गोष्टी फारच जुन्या ठरल्या !

माझे आजोबा एका नदीचें कांठीं अगदीं लहानपणीं पोरके आढळले.  ही नदी कृष्णा असावी.  पुढें त्यांना जमखंडीचें देसायानीं पाळलें.  कारण पोर पाणीदार व होतकरू होतें.  देसाई हे लिंगायत असल्यानें त्यांनीं या मुलाला लिंगायत होण्याला सांगितलें, तेव्हां हा तर मराठा; मांस खाणारा म्हणून ह्याला हें धर्मांतर न आवडून तो देसायांच्या घरांतून निघून कदाचित वर सांगितलेल्या दप्तरदाराचा मळा करून स्वतंत्र राहूं लागला असावा.

आमचे घरीं त्यावेळीं फक्त आमच्या आजोबांना व बाबांना मराठी येत होतें.  बाबांचें मराठी शिक्षण मुलकींत मराठी भाषेंत त्यावेळचे मानानें उत्तम झालें होतें.  आजोबांना लिहतांवाचतां येत होतें असे मला वाटत नाहीं.  कारण मीं त्यांना वाचतांना कधी पाहिलें नाहीं.  ते फार पाणीदार व कर्तृत्ववान् पुरुष होते.  शरीर सडपातळ, उंच, वर्ण चांगला गोरा, डोळे लाल, भिंवया कोरलेल्या, एकंदर उठावदार आकृति होती.  त्यांचा पोशाख अस्सल दरबारी मराठेशाहीचा — तंगदार पांढरी विजार, घोळदार अंगरखा, बत्ती पांढरी बिन पिळाची, मिशा झुपकेदार शुभ्र लांब व ताठ. एकंदर रुबाब मनांत भरण्यासारखा होता.  पुरुष हिकमती व विनोदी होता.

एक हिकमत :  ह्याबद्दलची एक गोष्ट आमची आई सांगत असे ती अशी - आजोबा एकदां प्रवासाला गेले असतां एका घरीं उतरण्यास जागा मागूं लागले. पण त्या घरची बाई मोठी खाष्ट होती.  तरी तेथेंच उतरण्याचा आजोबांनीं निश्चय केला.  नाहीं होय म्हणतांना बाईनें गोठ्यांत उतरण्यास जागा दिली.  सायंकाळी बाईनें आपल्या मुलास न्हाऊं घालून पाळण्यांत निजविलें.  एक झोका देऊन बाई आंत कामास गेली; पण मूल कांहीं केल्या रडण्याचें थांबेना.  बाई झोके देऊन जाई, पण मुलानें केवळ आकांत मांडला.  पुन्हां बाई येऊन मुलास हातांत घेई, आंजारी गोंजारी  पण जशी जशी ती त्यास रंजविण्यास इकडे तिकडे खालवर करी, तसतसें तें पोर अधिकच चरफडूं लागलें.  शेवटीं घाबरून आजोबांकडे मुलास कांहीं उपचार सुचल्यास करण्याकरितां बाई दीन वाणनें आली.  आजोबांनीं मुलास मांडीवर घेऊन त्याचे पोटावरून व पाठीवरून हात फिरविला, तोंच मूल स्वस्थ झालें व हसूं खेळूं लागलें.  हा चमत्कार पाहून बाईला फारच आश्चर्य वाटलें व आनंद झाला.  ती आजोबांच्या पायां पडूं लागली.  तिनें लगेच घरांत चांगलीशी जागा देऊन आजोबांस दोन दिवस सत्कारानें मेजवानी दिली.

आजोबांची करामत अगदीं साधी होती.  न्हालेल्या मुलाला पाळण्यांत घालून बाई आंत गेल्यावर, आजोबा पाळण्याजवळ जाऊन मुलाच्या कुल्यांत अगदीं नाजूक जागीं एक सराट्याचा लहानसा कांटा खोवून ठेवून आल्यानें मुलाची तळमळ उडली होती.  जेव्हां बाईनें मूल आजोबांच्या मांडीवर दिलें, तेव्हां आजोबांनीं मुलाचे पाठीवरून हात फिरवीत असतां बाईची नजर चुकवून तो सराट्याचा कांटा काढून घेतल्याबरोबर मग मूल कशाला रडतें !  बाईला मात्र आजोबा मोठे अवलिया वाटले.

बसप्पा अथणी :  ते मोठे धोरणी व बहुश्रुतही होते.  बसप्पा अथणी नांवाचा एक श्रीमंत लिंगायत वाणी गृहस्थ माझ्या बाबांचा मोठा मित्र होता.  व्यापारांत खोट आल्यानें दिवाळें निघण्याची पाळी आली.  म्हणून जंगलांत फांस लावून आत्महत्या करण्यास तो निघाला असतां, माझे वडील रामजी बाबांनीं त्यास आडविलें व त्यास धीर देऊन घरीं आणलें. आणि आमचे घरांतील हजारों रुपये नगद व आमचे आईचे मौल्यवान् दागिने बसप्पाचे पदरांत टाकून त्याचा जीव व अब्रू वांचविली.  पण पुढें हें विश्वासाचें कर्ज संपूर्ण फेडलें नाहीं.  हा सर्व प्रकार वृध्द आजोबांना मुळींच आवडला नाहीं.  एकंदरींत आमच्या वडिलांचा अव्यवहारी, उदार व विश्वासू स्वभाव आजोबांना पसंत नव्हता.  आपला मुलगा संसारांत फसून दुःखांत दिवस काढणार हें त्यांचे भाकीत पुढें अक्षरशः खरें ठरलें.  तरी आजोबा जिवंत असेपर्यंत आमचें घराणें चांगल्या सुबत्तेंत होतें.

बेहिशेबी उधारी :  बसप्पाच्यानें कर्ज फेडवेना म्हणून त्याच्या दुकानांतून आमचे घरीं सर्व वाणसौदा उधार येत होता.  बसप्पा वरचेवर आमचे वडिलांकडे बसावयास येत असत. तेव्हां आजोबा मला जवळ बोलावून माझ्या हातावर साखरी काजू ठेवून खालील स्वकृत कानडींतील एक फटका शिकवीत आणि हा फटका म्हणत बसप्पाजवळ जाण्यास मला सांगत.

ग्यांगड ग्यांगण्णा ।  आडकी संगण्णा ।
वंद क्कोट्टु मूरु बरी उण्णा ॥१॥

ह्याचा थोडक्यांत अर्थ असा आहे कीं, संगण्णा नांवाचा वाणी एक देऊन तीन आपल्या वहींत लिहितो.  हा टोमणा बसप्पाच्या उधारी खात्यावर होता.  अशी खोटी उधारी लिहून बसप्पा कर्ज फेडणार हा ध्वनि त्या फटक्यांत होता.

बसप्पा ज्या ज्या वेळीं घरीं येई त्या त्या प्रत्येक वेळीं तो माझ्या हातावर थोडी खडीसाखर ठेवी.  मी लहानपणीं मोठा गुटगुटीत व गोजीरवाणा होतों, असें सांगतात. घरीं येत ते सर्व माझ्यावर प्रेम करीत.

एके दिवशीं आजोबांनीं शिकविलेला हा नवीन कानडी फटका माझ्या बोबड्या शब्दांत म्हणत वेडेवांकडे हातवारे करीत मी बसप्पाजवळ गेलों. जवळच माझे बाबा बसले होते.  ते रागानें म्हणाले, ''अरे विठ्या, कायरे, हें कोणीं तुला शिकविलें ?  ऑं !'' ''मला आजोबांनीं शिकविलें.''  असें म्हणून मी धूम ठोकून आजोबांचे कुशींत दडून बसलों.

लष्करी पेशा :  आजोबांनीं कधीं कोणाची खाजगी नोकरी केलेली मला माहीत नाहीं.  त्यांचा धंदा शेतकीचा.  पण तीही त्यांनीं प्रत्यक्ष हातानें केली असेलसें वाटत नाहीं.  मात्र ते मान्यतेनें व सुखवस्तु असे राहात असत.  मी जेथें जन्मलों तें राहातें घर आजोबांच्या म्हातारपणीं माझ्या बाबांनीं बांधलें होतें.  आमची जागा व वाडा 'लक्कन केरी' नांवाच्या तळ्याचे कांठी होती.  हें तळें फुटून आमचें जुनें घर त्या पुरांत बुडालें.  नंतर तें पुन्हां कदाचित् आमचे वडिलांनीं माझे जन्माचें पूर्वी बांधलें असावें.  माझ्या आजोबांचा रयतावा चांगला होता.  लोक त्यांना सुभेदार म्हणत.  सन १८५७ सालचे बंडापूर्वी रामचंद्रराव अप्पासाहेब यांचे वेळीं तासगांवाहून मराठ्यांचीं कांहीं घराणीं जमखंडीच्या रिसाल्यांत आलीं होतीं.  त्यांना सुभेदार असें म्हणत.  त्यांतच आमचे आजोबांची गणना होत असावी.  ह्यावरून त्यांनीं लष्करांत कोठेंतरी सुभेदारी केली होती, असा तर्क करण्यास जागा आहे.

आजोबांचे वेळीं आमच्या घराण्यांत लष्करी पेशा होता, ह्याचा एक पुरावा मीं लहानपणीं प्रत्यक्ष पाहिला.  इ.स.१८५७ सालच्या बंडांत इंग्रजी लष्कर जमखंडीस आल्यावर लोकांकडून आपलीं खाजगी हत्यारें जमिनींत पुरून ठेवली.  तशीं आमच्या वाड्यांतही आमचीं हत्यारें पुरलीं होतीं.  पुढें हत्यारांचा कायदा झाल्यानें हीं हत्यारें तशींच पुरलेलीं होती.  आजोबा वारल्यावर मी इंग्रजी शाळेंत असतांना माझ्या वडिलांनीं आमच्या वाड्याच्या एका जुन्या भागाची जमीन उकरून हीं हत्यारें पाहिलीं.  तलवारी व कट्यारी अगदीं गंजून निकामी झाल्या होत्या.  ढाली वगैरेंचे लोखंडी खिळेच गंजलेले सांपडले.  त्या हत्यारांत बंदुकी अजिबात नव्हत्या.

आजोबांविषयीं एक आख्यायिका आमची आई सांगे.  ती अशी कीं, एकदां आजोबांनीं गोसाव्याचें सोंग घेऊन कांहीं महत्त्वाचे कागदपत्र व टपाल दुसरीकडे लांबचा प्रवास करून पोंचविलें.  शिवाय आजोबांच्या लष्करी साहसाच्या, तरुणपणाच्या व फाकडेपणाच्या कांहीं गोष्टी आम्हांला आम्ही लहान असतांना सांगून आई आमची करमणूक करीत असे.

शेवटीं शेवटीं आजोबांना वृध्दपणामुळें अगदीं दिसेनासें झालें.  ते आपल्या खोलींतून बाहेर सोप्यांत जेथें माझा पाळणा बांधला असे तेथें भिंतीला टेकून माझा पाळणा हालवीत बसत.  त्यांना मुळींच दिसत नसे.  मला थोडें थोडें समजत असे.  मी त्यांचा लाडका होतों.  मला साखरफुटाणे व साखरेंतले काजू आजोबा खावयास देत, म्हणून मी नेहमीं त्यांच्या आजूबाजूला लाडीगोडी करीत असें.  त्यावेळीं आजोबा मला कांहींतरी मजेदार गोष्टी व बालगीतें शिकवीत.

माझा जन्म :  आजोबा सुमारें १८७८-७९ इसवींत वारले असावे, असा माझा तर्क आहे.  त्यावेळीं माझ्या बाबांनीं संस्थानाची नोकरी सोडली असें आई म्हणत होती.  मी इ.स. १८७३ एप्रिल महिन्याचे २३ तारखेस जन्मलों असा माझ्या जन्मपत्रिकेंत उल्लेख आहे.

एक स्वप्न :  ह्यावेळची एक गोष्ट आठवते, तिजवरून आजोबांचा मी किती लाडका होतों हें दिसतें.  आजोबा वारण्याचे सुमारास मला देवी काढल्या होत्या.  त्यावेळीं मी ५ किंवा ६ वर्षांचा होतों. अद्यापि शाळेंत जात नव्हतों.  देवी टोचल्यानें माझे दंड सुजले होते.  आजोबांच्या मृत्यूमुळें घराणें शोकांत होतें.  माझ्या दंडांवरील जखमांची हयगय होऊन ते सुजून त्यांत किडे पडलेले कोणीं पाहिलेंच नव्हतें.  दहावे दिवशीं दसपिंडीच्या विधीकरितां आम्ही घरांतील सर्व मंडळी कृष्णानदीवर जाणार होतों.  आदले दिवशीं रात्रभर माझा हात दुखून मला झोंप कशी ती आली नाहीं.  माझी आई दिवसां नेहमीं कामांत असे.  तिला गाढ झोंप लागली होती.  तिला स्वप्न पडलें.  त्यांत आजोबा माझ्या पाळण्याजवळ मला कुरवाळीत म्हणाले, ''पकुल्या, तुझ्या दंडांत किडे पडले.  अजून तुझेकडे लेकाचे कुणीच पाहात नाहीं कीं रें !''  हें वाक्य ऐकून आई जागी होऊन पाळण्यांत मला पाहूं लागली, तों माझे दंडांत खरेच किडे बुजबुजत असलेले दिसले.  तिनें लगेच बाबांना जागें केलें.  नंतर उन्ह पाण्यानें माझे दंड धुवून त्यांत टरपेंटाईन घातल्यावर सर्व किडे बाहेर येऊन माझे हात हलके झाले.  दुसरे दिवशीं सकाळीं आईचे स्वप्नाबद्दल आश्चर्य करीत सर्व मंडळी नदीवर दसपिंडीच्या विधीला गेली.  मीही त्यांच्यांत होतों.

जनाक्का :  आजोबा वारण्यापूर्वी १-२ महिने माझी बहीण जनाक्का जन्मली होती.  आजोबांना दिसत मुळींच नव्हतें.  ते एक दिवस पाळण्याजवळ येऊन तान्ह्या जनाक्काला हातानें चांचपून पाहूं लागले आणि उद्गारले कीं, ''हां !  बिद्री कासव्वाने अदाळ.''  जमखंडीपैकीं बिद्री नांवाचा एक पेट्याचा गांव आहे.  तेथील कासव्वा (काशीबाई) नांवाची एक ब्राह्मणाची बाई आजोबांच्या ओळखीची असे.  ती फार लठ्ठ असे.  जनाक्का लहानपणी फार बाळशामुळें लठ्ठ असे; म्हणून कासव्वाप्रमाणे आहे असा आजोबांचा उद्गार होता.

माझी आई

प्रकरण ५ वें
[जन्म (अदमासें) १८४० — मृत्यु ८ फेब्रुवारी १९१०]

येथवर आठवणी लिहून कोणाचीच जन्माची किंवा मृत्यूची तिथि, महिना अगर निदान वर्ष तरी मीं कां लिहिलें नाहीं याचें कारण तें मला माहीत नाहीं. माझ्या बाबांचा चौकसपणा, सुसंस्कृतपणा इतका होता कीं, त्यांनीं आमच्या घरच्या पुरोहितांकडून घरच्या सर्व मुलांची जन्मपत्रिका ज्योतिषशास्त्रान्वयें वर्तवून ठेविल्या आहेत. सुदैवानें तेवढ्या तरी आम्हीं अद्यापि जपून ठेवल्या आहेत. मीं मोठा झाल्यावर मला आपली जन्मभूमि बदलावी लागली. इतकेंच नव्हे तर मी एवढी मोठी परीक्षा इतक्या मागल्या काळांत पास होऊनही आपल्या संसारांत लक्ष न घालतां आजन्म दारिद्र्याचें व्रत घेतलें. त्यामुळें व्यवहारांत मी बाबांपेक्षांही अधिक नालायक व निष्काळजी ठरलों. बाबांनीं कर्जाखालीं खानदानी घालविली तर मीं त्यांच्यापेक्षां सुशिक्षितपणाचा कांदा त्या मीं ती कधींच मिळविली नाहीं. किंबहुना खानदानीनें राहण्याला मी अपात्र ठरलों. तशांत कांहीं वर्षें मुंबईंत व नंतर पुण्यांत नेहमीं बदलणा-या भाड्याचे घरांत रहावें लागल्यामुळें बाबांच्या पोथीपुस्तकांची व कागदपत्रांची मी अक्षम्य हयगय केली आणि दैवहत असा मीं आतां आठवणी लिहीत बसलों आहें! फार तर काय मीं माझा स्वतःचा पत्रव्यवहारही जपून ठेवला नाहीं. ही चूक मला खेद देत आहे.

बाबांचें लग्न
माझी आई आलगूर या गांवीं जन्मली. ती आपल्या आईबापांची बहुतेक पहिलीच मुलगी असावी असें तिच्या बोलण्यावरून दिसतें. नंतर कांहीं मुलांनंतर आतां हयात असलेले आमचे मामा रामजीबावा व शेवटची मुलगी आमची मावशी तानूबाई ही होय. आमच्या आईची पहिली मुलगी बाळाबाई हिचेपेक्षां माझा मामा रामजी हा लहान असावा असें दिसतें. सोमा मुलगा अगदीं लहान असतांना आलगूरचे आजोबा एक वर्ष गुडघी रोगानें आजारी पडले. आणि त्या आजारांत चूल व मूल यांची सर्व जबाबदारी माझ्या अगदीं लहान असलेल्या आईवर पडली असें वर सांगितलेंच आहे. आईचें लग्न ह्या आजारापूर्वीं झालें कीं मागावून झालें हें कळत नाहीं. माझ्या बापाच्या घरची स्थिति जर चांगली होती आणि बाबा जर शिकलेले व हुशार होते तर माझ्या आजोबांनीं अशा गरीब व लंगड्या मनुष्याशीं सोयरीक कां केली बरेंॽ यावरून वाटतें माझ्या आई-बाबांचें लग्न अगदीं लहानपणीं म्हणजे माझ्या बाबांच्या शिक्षणापूर्वीं झालें असेल. म्हणजे माझी आई सात वर्षांची व बाबा बारा वर्षांचे असतील हा सर्व केवळ अजमासच आहे. या अजमासाला आणखी एक कारण आहे. माझे बाबा लहानपणीं फार खोडकर असत. विशेषतः त्यांना झाडावर चढण्याचा नाद असे. माझ्या आजोबांच्या मळ्यांत एक मोठे केवड्याचे झाड होतें. केवडा काढावयास जाऊन बाबा लहानपणीं त्या झाडावरून पडून मरतां मरतां वाचले. तेव्हांपासून आमच्या आईनें हरताळिकेचें व्रत घेतलें असें ती लहानपणीं सांगत असे. तिचें लग्न होण्यापूर्वी जर बाबा पडले असते तर तिनें हें व्रत घेण्याचें कारणच नाहीं. लग्नाचें वय मुलीचें ७।८ व मुलाचें १२।१३ हें सामान्यतः असतें. निदान ह्यापेक्षां जास्त तितक्या मागल्या काळांत असणें संभवनीय नाहीं. झाडावरून पडण्यालाही १२ वर्षांचें वय – २।३ वर्षे पुढें मागें संभवतें.

यमुनाबाई
माझे बाबा आपल्या आईप्रमाणें काळे व रूपानेंही आपल्या आईचे चेह-याचे होते. माझी आई तिच्या आईप्रमाणें फारशी गोरी नसली तरी थोडी उजळ निमगोरी आणि चेह-यानें आपल्या बापासारखी होती. अर्थात् आईला लिहितांवाचतां येणें शक्य नसलें तरी वैष्णव ब्राह्मणाचें वळण, सात्विक राहाणी, शाकाहार, घरकामांत कष्टाळूपणा व हुषारी वगैरे गुणांनीं मंडीत होती म्हणून बाबांच्या वडिलांनीं हा जोडा पसंत केला असावा. ह्या दोन्ही घराण्याचें ब्राह्मणी वळण व माझ्या बाबांचें सुशिक्षण यामुळें माझें शिक्षण इतकें झालें. इतकेंच नव्हे तर शेवट पर्यंत माझा सहवासही ब्राह्मणाशींच घडला.  आईची कानडी भाषा अगदीं शुद्ध वैष्णव ब्राह्मणाची तर बाबांची मराठी भाषा कर्नाटकांतील शुद्ध देशस्थ ब्राह्मणाची. त्याचप्रमाणें पेहराव; व तशाच संवयी. गोपीकृष्णावरची किती सुंदर सुंदर कानडी गाणीं व पुरंदर विठ्ठलाचीं भजनें आई म्हणून पाळण्यांत लहानपणीं आम्हांला निजवीत असे. तिचा गळा अकृत्रिम फार गोड, म्हणण्यांत स्वाभाविक करुणरसाचा उठाव असे. मोठेपणींही आम्हाला हीं गाणीं व गोपीकृष्णाच्या गोष्टी सांगून आम्हां भावंडांना असह्य कठीण दारिद्र्याच्या वेदना हळूवार करीत असे. व्रतें, उपवास व इतर गृहकृत्यें ब्राह्मणाप्रमाणें करण्याला आई आलगुरांत लग्नापूर्वींच शिकली असावी. शिवाय बसवंतरावाच्या सुशिक्षित व पाणीदार मुलाला दिली म्हणून कदाचित् ह्या कुळकर्ण्याकडच्या बाया मंडळींनी या लहान यमुनेला अधिकच काळजीनें घरगुती वळण लावणें शक्य आहे. कारण माझी आजी गंगाबाई हिच्या अंगांत कांहीं हें वळण देण्याची करामत नव्हती. इकडे बसवंतराव जरी मोठे पाणीदार व रुबाबदार मराठे होते, तरी त्यांच्यांत आमच्या बाबांना कारकुनी बाण्याचें वळण लावणें शक्य नव्हतें. केवळ ह्या कोवळ्या जोडप्याला ब्राह्मणी संस्कृति सहानुभूतीनें व योग्य दक्षतेनें तीं एकमेकांस विवाहपाशानें बद्ध होण्यास योग्य ठरली. ही एक भाग्याची विधिघटनाच नव्हे तर काय! माझ्या आईबापांचा वैवाहिक संबंध अगदीं आदर्शवत् मला ३७ वर्षे पहावयास मिळाला. माझ्या आजीचे दागिने तितक्या मागील काळीं कर्नाटकी ब्राह्मणेतरांप्रमाणें किंचित् ग्राम्य असत. पण माझ्या आईचे दागिने मराठा पद्धतीचे व सर्व सोन्यामोत्याचे वजनदार जडावाचे होते. केवळ सांपत्तिक दृष्ट्या पाहातांही माझे वडील कर्ते झाल्यावर आजोबापेक्षां अधिक संभावित व श्रीमंत स्थितीला पोहोंचले. पण आजा आजीचे मागें त्यांनीं आपल्या निष्काळजीपणानें म्हणा किंवा धार्मिकपणानें म्हणा आपल्या घराची धूळधाण केली, इतकेंच नव्हे तर, आम्हांला अन्नालाही महाग केलें. फार काय आईची जोड व एक प्रकारचा निर्बंध नसता तर बाबा कदाचितं आम्हांला कोणावर तरी टाकून बैरागी होऊन गेलेही असते. म्हणून आम्हीं सर्वस्वी आईचें ऋणी आहोंत.

सासुरवास
माझ्या आईच्या अंगी ही दैवी पात्रता येण्याला तीन प्रकारचे टाकीचे घाव तिला अगदीं लहानपणापासून तो अगदीं मरणाचें दारापर्यंत जवळ जवळ ७० वर्षें सोसावें लागले. प्रथम तिचे माहेरचें दारिद्र्य आणि बाप लंगडा व आई कर्तृत्वहीन असल्यामुळें, माझ्या आईचे झालेले हाल. दुसरें तिचा परकियांचें म्हणजे वैष्णव ब्राह्मणांचें लागलेलें वळण आणि तिसरें तिला कठीण सासुरवास. पहिल्या दोन्हींची कल्पना वरील माहितीवरून येण्यासारखी आहे. तिसरा जो सासुरवास त्याच्या गोष्टी आईनें आमच्या लहानपणीं ज्या उठतां बसतां सांगितल्या त्या ऐकून आमचें कोवळें हृदय तर करपत होतेंच; पण अद्यापि त्यामुळें सामान्यतः स्त्रीजातीचे हाल विशेषतः हिंदुस्थानच्या कन्यांचें दुर्भाग्य कळून येतें. आमच्या आजीचा-संताबाईचा-स्वभाव खाष्ट होता हें वर सांगितलें. ती फार क्रूर होती अशांतला प्रकार नव्हता, पण अगदीं हेकड, सहानुभूतिशून्य आणि पक्षपाती होती. तिला दोनच मुलें होतीं व त्यांतल्या त्यांत तिचें प्रेम तिच्या मुलीवर, आंबाबाईवर - जास्त होतें. गरिबीमुळें ही मुलगी आमच्या घरींच राहात असल्यामुळें सासूच्या कहरांत नणंदेची भर पडत असे. त्यामुळें ती सुनेला मरे मरेतों राबवी हें त्याकाळीं साहजिक असें.

आमचा रयतावा
आमचे घरीं रयतावा मोठा होता. दावणींत आठ बैल औताचे तर असतच. शिवाय गाई, म्हशी आणि वासरांचें खिल्लार असे. आजी रानांत गड्यांच्या बरोबर सर्व काम स्वतः करी. तिचा भाऊ व्यंकप्पाही राबत असेच. माझ्या आईला शेतांत मात्र जावें लागत नसे, पण घरकामाचा बोजा लहानपणापासून एकटीवरच पडे. नणंद होती तिचा उपयोग चहाड्या सांगण्यापुरताच. आजोबा, आजी, बाबा, नणंद, आंबाबाई, केव्हां केव्हां तिचा नवराही, व्यंकप्पा, त्याचा मुलगा शिद्दु, आम्ही दोन तीन मुलें, आंबाबाईची मुलगी भागूबाई, दोन चार गडीमाणसें शिवाय अतिथी, बैरागी, पाहुणे; इतका हा नेहमींचा राब ! सकाळीं चार वाजल्यापासून दळणाची घरघर सात वाजेपर्यंत चाले. मग पाणी विहीरींतून आणणें, स्वयंपाक, भांडीं धुणें, जेवण होतें न होतें तोंच सूत कातणें, मग इतक्या बैलांच्या शेणाच्या गोव-या करणें, शिवाय रात्रीचा स्वयंपाक. श्रीमंत आप्पासाहेबांचे राहणें जमखंडीहून १॥ मैलावर डोंगरांत रामतीर्थ नांवाचे ठिकाणीं असे. तें काम आटोपून यावयाला रात्रीं ११!१२ वाजत, तोंपर्यंतही घरचें काम आटपत नसे. बाबा कामावरून लौकर येत नसत. पुन्हा भल्या सकाळीं दळणाला उठावें लागत असे. बाबांचे आणि आजोबांचें वैभव असतां तरुण सुनेला इतकें काम कांॽ तर त्या काळची साधी आणि कष्टाळू राहणी, आणि विशेषतः आजीचा हेकडपणा. आजोबांना हा सासुरवास आवडत नसे. पण नित्याची कटकट करणेंही त्यांच्या सुखवस्तु स्वभावाला आवडत नसे. नशीब आईचें!

हालअपेष्टा
नुसता कामाचाच भार नसे. आईला एकदां जी अगदीं लहानपणीं सासरीं आणली होती ती माहेर ६ मैलांवर असूनही २।४ वर्षांत एकदांही तेथें पाठविण्याची मारामार पडूं लागली.  कारण माहेरचीं माणसें गरीब, आईचे बाळंतपणही करण्यास असमर्थ. घरांत वस्त्रालंकाराची रेलचेल असूनही आईला ती घरांत घालून कौतुक करण्याची सहृदयता आजींत नसे. इतकेंच नव्हे तर आपल्या लाडक्या मुलीला तितकेच दागिने नाहींत म्हणून कांहीं अंशीं मत्सरही आड येत असावा. हिंदु सासूरवासाचीं नाजूक कारणें इतकीं आहेत कीं जुन्या वळणांतील सर्व लोकांना सुद्धां त्यांची मीमांसा करतां येत नसते. आमच्या बाबांचाही स्वभाव, फार रागीट असे. मुलें होऊं लागेपर्यंत एक प्रकारचा जाच व मुलें होऊं लागल्यावर तो एक दुसराच भार. आमच्या आईला एकंदर वीस मुलें झालीं ( एक खंडीभर अशी म्हण आहे.) त्यांपैकीं एकाच वेळीं पांचांहून जास्त केव्हांच नव्हती. ह्यावरून निदान पंधरा तरी मुलांचा शोक आईला करावा लागला. आणि आमच्या आईच्या प्रेमाला सीमाच नाहीं. विशेषतः दोन मुलें मोठीं होऊन वारलीं. माझा मोठा भाऊ त्याचें नांव परशुराम (लाडकें नांव भाऊच होतें) हा आठरा वर्षांचा होऊन वारला. आणखी सर्वांत धाकटी बहीण चंद्राबाई नांवाची सुमारें १४।१५ वर्षांची होऊन वारली. भाऊ पटकीनें दोन दिवसांत तडकाफडकी वारला. त्याचा शोक तिनें कित्येक वर्षें इतका केला कीं दगडालाही पाझर फुटावा. पुढें आईचें म्हातारपणी चंद्राबाई क्षयानें झिजून वारली. तिचा शोक आईला मरेपर्यंत पुरून उरला! घरचें काम इतकें पडे की, त्याचा एकदां हृदयद्रावक परिणाम घडला. मी ५ वा मुलगा, माझ्या अगोदरचा कृष्णा म्हणून एक मुलगा होता. तो रंगानें उजळ आणि पिंडानें गुटगुटीत होता. सुमारें ६ महिन्यांचा असतां तो आईच्या अंगाखालीं चिरडून झोपेंतच मेला तें तिला कळलेच नाही. त्याला पाजीत असतां आईला गाढ झोंप लागून, मुलाचा दम कोंडून सकाळीं मेलेला आढळला! मग त्या आकांताला व आईच्या हालाला कोण सीमा असणार !! हा प्रकार इ. स. १८७०।७१ मध्ये घडला असला पाहिजे. आजा आजी असेंतोंपर्यंत म्हणजे इ.स.१८८० पर्यंत तरी आईला स्वातंत्र्य म्हणजे काय तें माहीत नव्हतें. कोणत्या अस्सल हिंदु सुनेला हें स्वातंत्र्य असणार! आणि आजी गेल्यावर लवकरच आमच्या घरची सुबत्ताही तिचे बरोबरच गेली. कारण बाबांनीं माझ्या जन्माचे अगोदरच म्हणजे इ. स. १८७३ चे सुमारासच सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. इतकेंच नव्हे तर त्यांनीं त्यानंतर कोणताच किफायतीचा धंदा केला नाहीं. गड्यामाणसांवर शेती कसची चालते. खर्च बिनहिशोबी. एकूण आईला घरीं स्वातंत्र्य मिळतें न मिळतें तोंच आठरा विश्वें दारिद्र्यानें गाठलें!

तान्याक्का
माझी आजी संताबाई वारल्यावर दोनतीन वर्षे माझ्या आईचीं फार हालांत गेलीं. त्यावेळीं माझी बहीण मुक्ताबाई (जनाक्काच्या पाठीवरची, आठवी मुलगी) हिचे जन्मापूर्वीं (आई गरोदर होती) जवळ जवळ एक वर्षभर आई हिंवतापानें बेजार होती. त्यावेळीं मी नुकताच मराठी शाळेंत जावयास लागलोंच असेन. बहुतकरून तें १८८०–८१ साल असावें. आईला रोज दोनप्रहरीं कडकडून हींव भरत असे. तिला तहान फार लागे. तेव्हां पाणी तापवून देण्यालाही घरीं कोणी नसे. बाबा कोठें तरी बाहेर जात असत, मला माहीत नाहीं. माझी बहीण जनाक्का २।३ वर्षांची असेल. अशानें आई फार खंगली होती. शेवटीं अशांतच बाळंतपण आलें. आई सर्व महिने आजारी असल्यामुळें जन्मलेलें मूल तान्याक्का अर्थात अशक्त व रोगीच असणार. या आजारामुळें तान्याक्काच्या मेंदूवरही परिणाम झाला होता. ती फार भोळसर होती.

जनाक्का
माझा भाऊ परशुराम ह्याच्या पाठीवर आम्ही चौघे मुलेंच झाल्यामुळें व सातवी मुलगी जनाक्का जन्मल्यामुळें ही आमच्या घरांत पहिलीच मुलगी जणूं, म्हणून जनाक्का ही आमच्या सर्वांची लाडकी होती. विशेषतः ती माझ्या बाबांची मोठी लाडकी होती. ती लहानपणीं अंगानें गुटगुटीत, बुद्धीनें चुणचुणीत, आणि भांडखोर व बोलकी असे. दिवसांतूनच काय पण तासांतूनहि आम्ही कितीदां तरी भांडत असूं. कारण दोघांचाही स्वभाव तापट, हावरा, अधाशी, खोडकर व दोघेंही आम्हीं बाबांचे लाडके, त्यामुळें आमच्या कागाळ्यांना सीमाच नसे ! आमची वर्दळ आईकडे गेली कीं, स्वयंपाकघरांतलें काम सोडून तिनें आम्हांला धमकावयाला सोप्यांत बाहेर यावें. पण आईचा स्वभाव शांत व सहनशील असल्यानें आम्हां दोघालांही तिच्या रागाचा धाक मुळींच वाटत नसे. पण बाबांचा नुसता त्यांच्या नांवाचाही आम्हांस जबर धाक असे. ते घरीं असेतोंपर्यंत त्यांच्यासमोर उभे राहण्याचीही आम्हांला छाती होत नसे. ते बाहेर गेलें कीं, ताबडतोब आमच्या धांगडधिंग्याला सुरवात होई. माझा मोठा भाऊ माझ्या आईसारखा शांत व मवाळ होता. तो आमच्यांत फार मिसळत नसे. धाकटी तान्याक्का थोडी मोठी झाल्यावर आमचेबरोबर खेळावयास येई. पण ती फारच भोळसर असल्यामुळें आम्ही सांगूं तें तें ती मुकाट्यानें करी. दोन भाऊ व दोन बहिणीच काय तीं आम्ही भावंडें घरीं लहानपणीं एकत्र समागमांत होतो. माझा मोठा भाऊ इ.स.१८८५ सालीं पावसाळ्यांत पटकीच्या रोगानें वारला. त्यावेळीं गांवांत ही साथ बरीच होती. म्हणून जमखंडीच्या गांवक-यांनीं मरीआईची मोठी यात्रा केली. त्यावेळीं कित्येक रेडे, पुष्कळशीं बकरीं व कोंबड्यांची तर गणतीच नाहीं, इतक्या प्राण्यांचा वध झाला!

आमचा वाडा
इतकीं मुलें लहानपणीं वारण्याचें कारण आमच्या वाड्याची आरोग्याच्या दृष्टीनें परिस्थिती वाईट होती. आमचे घराचे पश्चिमेला लागून एक मोठें तळें होतें. त्याच्या खालच्या सखल भागांत आमचा वाडा असे. सांडपाणी जाण्याला कोठें वावच नव्हता. दक्षिणेलाहि आमच्या घराचे मागें उंचवटाच होता. स्वयंपाकघरांत एक न्हाणी होती व बाहेर सोप्याचे खालीं, मोठ्या दरवाजाला लागूनच एक दुसरी न्हाणी होती. पण दोहींचेंही सांडपाणी दोनचार हातांवर जमिनींतच जिरत असे. अर्ध्या घरांत अंधार, ओल व कोंदट हवा असे. मोठा मुख्य दरवाजा उत्तरेकडे तोंड करून होता. व त्याच्या आंत थोडें आंगण व थोडी पडवी होती. हवा आणि उजेड यावयाला काय ती एवढीच वाट होती. दक्षिणेच्या बाजूला तीन खिडक्या होत्या. त्या लहानच होत्या व त्या बाजूला गांवचे लोक शौचास बसत, म्हणून त्या आम्हांला झाकाव्या लागत. उजेडाला साणी राखली होती. त्यांतून दोनप्रहरीं ऊन पडे, पण हवा येणें शक्य नसे. आरोग्याचे दृष्टीनें हें घर अतिशय वाईट असे. मोठ्या दाराच्यापुढें सुमारें एक एकराचें आंगण असे. त्यांत उकिरडे, कडब्याच्या गंजी, गोव-याचे हुडवे, शेणाचे ढिगारे असत. वायव्य कोनास एक पेवाचा पायखाना असे. त्याचा उपसाही वेळेवर होत नसे. एवढेंच बरें होतें कीं, आमच्या वाड्याच्या दक्षिण, पश्चिम व उत्तर बाजूनें ब-याच अंतरापर्यंत दुस-या कोणाचींही घरें नसत. पश्चिमेच्या बाजूला तर मोठें विस्तीर्ण तळें (लक्कन केरी नांवाचें) आणि त्याच्या पश्चिमेस मोठा डोंगरच होता. आमचा वाडा गांवाच्या पश्चिम हद्दीवरचा शेवटचाच होता. वाड्याबाहेर जरी मोकळी हवा मुबलक होती तरी आंतली स्थिति अपायकारक होती. बाळंतपणांत बाळंतिणीचे खोलींतच एक खड्डा खणून त्यांतच बाळंतिणीला १०।१२ दिवस न्हाऊ घालीत. अशा स्थितींत इतकीं मुलें लहानपणींच वारलीं हें आश्चर्य नसून आम्हीं ५।७ जण तरी कसें वांचलों हेंच आश्चर्य होय.

आईच्या गोष्टी
दर दुसरें वर्षीं आमच्या आईचें बाळंतपण हें ठरलेलेंच असे. आणि त्यावेळीं मागलें मूल कांहीं जिवंत नसे. बाळंतपण किंवा मुलांचा आजार व मरण याखालीं माझ्या आईची सर्व शक्ति खचली. तरीपण मुलांचा कंटाळा किंवा संसाराचा तिटकारा-किंबहुना दुःखाचा किंवा निराशेचा एक उद्गारही कधीं आईच्या तोंडांतून आमच्या कानांवर आला नाहीं. उलट दारिद्र्याच्या असह्य वेदना, नव-याचा रागीट स्वभाव व मुलांचा जोजार सोसूनही; आम्हा लहानग्यांना नेहमीं आपल्या माहेरच्या सुखदुःखाच्या गोष्टी रसिकपणानें सांगून आई आमची गोड करमणूक करीत असे. आईच्या गोष्टी व गाणीं हाच आमचा मोठा मेवा होता. तिची आनन्दी आणि विनोदी वृत्ती हीच आमची विश्रांति होती. तिच्या गोष्टीची आम्हांला पुढें पुढें चटच लागली. इतकी कीं, जर भूक लागली असली, स्वयंपाकला अवकाश असला किंबहुना, भाकरीबरोबर खावयास चांगली भाजी नसली तर आम्हीं आईच्या काठवटीभोंवतीं जमून तिला गोष्टी सांगण्यास लावीत असूं. मग तिनें आम्हांस अशा प्रेमळ कहाणींत गुंतवावें कीं, स्वयंपाक केव्हां झाला, आम्हीं काय खाल्लें कीं मुळींच कांहीं खाल्लें नाहीं याचें आम्हांस भानच रहात नसे. बाबा एखादे वेळीं रात्रीं उशीरा घरीं आले कीं, आमच्या गोष्टीची मेजवानी लांबे! केव्हां केव्हां आम्हीं वन्समोअरही म्हणत असूं! एकंदर आईच आमची खेळखडी होती. आम्हांला बाहेरच्या खेळगड्याची जरुरीच लागत नसे. आमचा वाडा एकीकडचा, अंधारी व भयाण असल्यानें लोकांच्या नजरेंत तो भुताटकीचा एक मोठा अड्डाच होता. शिवाय आमचे आजूबाजूचे सर्व घरांतून, किंबहुना आमचे सर्व मराठा जातींतही आमच्या इतकें सुशिक्षित व वजनदार घराणें नसल्यानें भोंवतालच्या लोकांना आमचा मोठा दरारा वाटत असे.

आत्मसंतोष
आमच्या बाबांचा स्वभाव रागीट, सडेतोड, करारी असल्यानें व आमची आई आपल्या आईप्रमाणेंच, कधीं आपल्या दाराच्या बाहेर कामाशिवाय पाऊलही टाकणारी नसल्यामुळें आमचे घरीं शेजा-याचा विनाकारण सुळसुळाट कधीं नसे. कितीही त्रास असो व कसलाही प्रसंग येवो, बाबा घरीं असोत नसोत, आई आम्हां चौघां पिलांस एकाद्या पक्षिणीप्रमाणें पंखाखालीं घेऊन आनन्दानें बसे. व आम्हांलाही तिच्या पंखाशिवाय दुसरा आसरा नको असे. आजा-आजी असेतोंपर्यंत ज्या वाड्यांत मोठ्या दणक्यानें रयतावा चालत असे तेथें त्यांच्यामागें थोड्याच वर्षांत सर्व वैभव होरपळून; रानांत शेत नाहीं, गोठ्यांत गुरें नाहींत, घरांत माणसेंही नाहींत अशी ओसाड स्थिति झाली. तरी बाबांना संसाराची काळजी म्हणून कसली ती लागेना, किंवा आईच्या स्वभावांत कडूपणाची कधीं छटा दिसून आली नाहीं. ह्या धन्य संतोषाचा माझ्या मनावर जो परिणाम झाला, मला जे बाळकडू मिळाले तेच माझे अमुल्य भांडवल. माझें पुढील आयुष्याचे तारूं अनेक तुफानांत जें सुरक्षित चाललें त्याला आधार काय ती माझ्या आईबापाची धन्य आत्मसंतुष्ट वृत्ति.
सोळा वर्षें माझ्या बाबांनीं अगदीं कांहीं धंदा रोजगार न करितां घरीं निजून काढलीं. या सोळा वर्षांत घरची शेती-भाती, गुरें, गडी-माणसें आईच्या अंगावरची सर्व चिजवस्तु फुटक्या घड्यांतील पाण्याप्रमाणें गळून व झिरपून माझ्या नजरेसमोर गेली. मी अगदीं लहान असतांना माझ्या हातांत सोन्याचीं कडीं, कमरेस सोन्याची झिळीमिळी करगोटा, गोठ्यांत मोठमोठे धिप्पाड बैल आणि शेतांत फार दिवसांचे इमानी नोकर पहात असे. दोहोंकडच्या आजाआजीच्या कुशींत लडिवाळप्रमाणें लोळलों होतों. सणवार, उत्सव, समारंभ पाहात असे. घरांत पाहुण्यांची व आश्रितांची मांदी जमत असे. घरीं पुराणिक, पुरोहित, भजनीमंडळी, साधु, संत, फकीर, बैरागी, तडीतापडी यांची रीघ लागे. हळूहळू मी नुसत्या दोनतीन भावंडांतच सुख मानून माझ्या आईभोंवतीं घिरट्या घालून सुखानें राहण्यास शिकलों. हा कोणाचा प्रभावॽ केवळ माझ्या आईच्या दैवी संतोषाचा!

वाशांचें सरपण  
बाबा देवळांतून, मठांतून, कोठें तरी भजनाला जात. घरीं आले तर निजून रहात. जागेपणीं त्यांचेसमोर उभे रहाण्याची आम्हां कोणाची छाती नसे. मग आम्ही चार मुलें व आई हेंच पंचायतन आत्मसंतोषाचें दिव्य आगर होतें. आमच्या भोंवतालचें भंगुर वैभव कसें पार नाहींसें झालें याचें एकच हृदयद्रावक उदाहरण सांगतों. आमच्या रहात्या घरांतील माया तर सर्व गेलीच; पण आमच्या बाहेरच्या विस्तीर्ण आंगणांत चौफेर कुळवाडी होती. म्हणजे भोंवतालीं खोल्यांतून गरीब भाडोत्री कुटुंबें रहात असत. त्यांच्यापासून बाबा कांहीं भाडें घेत असतील असें मला वाटत नाहीं. कारण त्यावेळीं घराला भाडें घेणें लाजीरवाणीच गोष्ट समजत. हळूहळू हीं सर्व कुळें परागंदा झालीं. त्यांच्या धाबीवजा खोल्यांच्या दुरुस्तीचा त्राण आमच्यांत उरला नाहीं. स्वतः आमच्या चुलीस जळणाचीही पंचायत पडूं लागली. मग काय विचारतां ! या पडक्या खोल्यांच्या मोठ्या तुळ्या व वासे आम्ही एका सोळा वर्षांत सरपण करून जाळलें. 'विठू, वासे आण' म्हणून आईनें सांगण्याचा अवकाश कीं, धांवलोंच मी, एका हाताने शेंडी व दुस-या हातानें लंगोटीचें शेपूट ओढीत वासे ओढावयाला. पांडवप्रतापांतील द्रौपदीवस्त्रहरणाचें चित्र मी पोथींतून पाहिलेंच होतें. दुःशासनाचा आविर्भाव आणून मी आमच्या जुन्या वाड्यांतील आंगणाचे बाजूच्या धाब्याचे वासे ओढीत असे आणि मोठ्या फुशारकीनें आईला जळण आणून देत असे. हा माझ्या बाबांचा संसार !

करवीरची यात्रा
घरचें आणि संसाराचें कांहीं होवो, बाबांच्या देवदेवतेमध्यें व भजनपूजनांत कांहीं खंड पडला नाहीं. आजी वारल्यावर दोनतीन वर्षांनी बाबांला दत्ताच्या उपासनेचा नाद लागला. घरीं श्रीगुरुचरित्राच्या पोथीचें पारायण चाललेलें. बाहेरची भाविक मंडळी ऐकावयास येत व बाबा मोठ्या खड्या आवाजांत पोथी वाचून अर्थ सांगत. जमखंडींत काण्णवआळींत एक दत्ताचें देऊळ आहे. तेथें बाबा सायंकाळीं भजनाला जात. याचवेळीं नरसोबाची वाडीची आणि कोल्हापूरच्या यात्रेची टूम निघाली. त्यावेळीं अद्यापि आमच्या घरची गाडीबैल, गडीमाणसें होतीं. बाबा, आई, आम्ही चार भावंडें कदाचित् एकादें पांचवें तान्हें मूल, शिवाय जिऊबाई नांवाची काण्णवआळींतील एक विधवा ब्राह्मणाची बाई ( ही आमच्या घरची पुरोहित चंद्रभट डेंगरे यांची बहीण होती) व आमचा तुकाराम नांवाचा मराठा गडी इतके जण आमच्या स्वतःच्या गाडींतून कोल्हापूरचे महालक्ष्मीचे यात्रेस निघालों. वाटेंत अथणी, शेडवाळ, कागवाड, कुरुंदवाड, मिरज, सांगली, हातकणंगळें वगैरे लहानमोठीं गांवें पाहिलीं. नरसोबाच्या वाडींत श्रीदत्ताची यात्रा केली.
एका ब्राह्मणाचे घरीं उतरून देवाचा नैवेद्य व ब्राह्मणभोजन केलें. कोल्हापुरास गांवाबाहेर पूर्वेकडे एकवेरीचें देऊळ आहे. त्याच्या ओवरींत तीन दिवस उतरलों होतों. कोल्हापूरचें राजधानीचें वैभव आणि आंबाबाईचें भव्य देऊळ, त्याचें महाद्वार, कोल्हापुरांतील पाण्याचे नळांना सुंदर गायमुखें लावलेलीं, रंकाळे व पदमाळे हे तलाव या सा-यांचा मनावर चांगला ठसा उमटला. एकवेरीं देवळांतील आंगणांत एक मोठा विस्तीर्ण चबुतरा आहे. त्यावर खेळत असतां तेथील एका मुलाशीं भांडण होऊन माझी मारामारी झाली. तेव्हां "विठ्या, तूं कोठें गेलास तरी तुझी आगळीक कांहीं थांबत नाहीं ना रे." असें म्हणून आईनें मला त्या मारामारींतून सोडविलें.

माझा हायस्कूलचा काळ

भाग तिसरा : 'दुय्यम शिक्षण'
प्रकरण ११ वें
(१८८५ – १८९१ अखेर)
ही सात वर्षें माझ्या आयुष्यांतली महत्त्वाची होतीं. मागें म्हटलेंच आहे कीं इ. स. १८८५ च्या पावसाळ्याचे आरंभीं माझा वडील भाऊ वारल्यामुळें माझ्या भावंडांत मीच वडील मुलगा झालों. आणि माझ्या स्वभावांत एकदम विलक्षण फरक पडला! बाळपणाचा हूडपणा कमी होऊन मी गंभीर, विचारी व अभ्यासी बनलो. आईबाबांचा शोक, घरची झपाट्यानें खालावत चाललेली सांपत्तिक स्थिती, माझ्या आईला वरचेवर झालेल्या मुलांचे बाळपणातले मृत्यू आणि बाबांचा हताश उदासीनपणा ह्यांचा परिणाम मजवर दिवसेंदिवस अधिकाधिक घडत चालला. ह्यावेळीं मला ११ वें वर्ष संपून १२ वें नुकतेंच लागलें होतें.

शिक्षकवर्ग
जमखंडी हा लहान संस्थानी गांव. त्यावेळीं संस्थानचे उत्पन्न ४।५ लाखाचें असावें. शहरची वस्ती १५ हजारांची. शाळाखात्याची स्थापना नुकतीच झाली असावी. अशा ठिकाणचें हायस्कूल कोणत्या दर्जाचें असावें ह्याची कल्पना सहज होते. मी हायस्कुलांत गेलों तेव्हां तें हायस्कूल झालें नव्हतें. फार तर पांच यत्ता असतील. फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्न्याक्युलर स्कूल असे. रा. त्रिंबकराव खांडेकर ह्यांना पुण्याहून हेडमास्तराचे जागेवर आणिलें होते. त्यांची स्वतःची मॅट्रिकची तरी परीक्षा झाली असेल कीं नाहीं हें माहीत नाहीं. पण त्यांचा स्वभाव सुशील, नीतिमान, नेमस्त, गंभीर आणि करारी होता. नवीन इंग्रजी शिकलेल्यांचा उथळपणा त्यांच्यांत मुळींच नव्हता. जमखंडी गांवांत व दरबारांत त्यांच्या ह्या स्वभावामुळें लोक व स्वतः यजमानही वचकून होते. असिस्टंट शिक्षकांत विशेष कोणी म्हणण्यासारखे शिकलेले किंवा फारसे बुद्धिवान नव्हते. मी पांचव्या यत्तेंत गेल्यावर ह्या शाळेचा दर्जा वाढून त्याच वर्षीं वरील वर्गांत बाहेरील पदवीधर शिक्षक आणावे लागले. मी सहाव्या यत्तेंत गेल्यावर जमखंडीच्या शाळेंतून मुलें प्रथमच मॅट्रिकच्या परिक्षेस पाठविण्यांत आलीं. तिस-या वर्षीं आम्हां चौघांना जमखंडी हायस्कूलांतून पाठविण्यांत आलें. त्याच सुमारास आमच्या शाळेला युनिव्हर्सिटीकडून हायस्कूलचा दर्जा प्राप्त झाला. सहाव्या यत्तेंत रा. वासुदेवराव चिरमुले बी. ए. हे पहिले पदवीधर नवीन नेमण्यांत आले. रसायणशास्त्राच्या प्रयोगाचेहि कांहीं सामान शाळेला मिळालें. एकंदरींत आतांप्रमाणें त्यावेळीं तशा मागासलेल्या प्रांतांत इंग्रजी शिक्षणाचा दर्जा असावा तसा नव्हता. आगगाडी (सदर्न मराठा रेल्वे) मी पांचव्या यत्तेंत जाईपर्यंत झाली नसावी. आणि ती झाली तरी कुडची, जे अगदीं जवळचें स्टेशन, त्यापासून जमखंडी तेहतीस मैल पूर्वेकडे लांब आहे.

विषयांची गोडी  
पहिल्या वर्षीं इंग्रजी हा विषय मला नवा असल्यामुळें व शिक्षक चांगला सहानुभूतीचा नसल्यामुळें मला तें वर्ष फार जड कसें गेलें ह्याचें वर्णन मागें आलेंच आहे. पण दुस-या वर्षापासून मला इंग्रजी भाषेची व सर्वसामान्य शाळेंतील इतर विषयांची गोडी लागली. तेव्हांपासून शिक्षक जरी विद्वान नव्हते तरी सहानुभूतीनें शिकविणारे मिळाले. माझी हुषारी पाहून ते माझें कौतुक करूं लागल्यामुळें मला उत्तेजन मिळालें. Nothing succeeds like success (यशासारखें यशस्वी कांहींच नाहीं) ही इंग्रजी म्हण मला तेव्हां जरी माहीत नव्हती तरी तिचा अनुभव मला जास्त येऊं लागला. मराठी शाळेंत असतांना आम्ही वर्गांत जमिनीवर बसत असूं. तरटाच्या लांब पट्या हांतरावयाला असत. इंग्रजी शाळेंत आम्हांला बाकावर बसावयास मिळालें. मागे टेकावयाला उंच व जाड उतरत्या पाठीची मेज (डेस्कस्) असत. शाळेची इमारत शहराच्या मध्यभागीं भर बाजारांत उंच अशा जोत्यावर टुमदार पण मनांत भरण्याजोगी होती. मराठी शाळेंत सकाळ संध्याकाळ दोन वेळां जावें लागत असे. तें इंग्रजी शाळेंत आल्यापासून दोन प्रहरीं ११ पासून सायंकाळीं ५ पर्यंत एकदाच जावें लागे. मे महिन्याची लांब सुट्टी मिळे. मराठी शाळेच्या शिक्षकांचे पंतोजीपणाचें मुख्य लक्षण म्हणजे त्याच्या हातांतील वेताची एक लांब छडी आणि तिचे केवळ मास्तराच्या लहरीप्रमाणें आमच्यावर होणारे उदार प्रयोग! इंग्रजी शाळेंत हा प्रकार बदलला. एकंदरींत मी एका नवीन जीवनप्रवाहांत पडल्याप्रमाणें वाटलें. खरोखरच मनूच पालटला म्हणावयाचा!

ग्रहणशीलता
इंग्रजी तिस-या यत्तेपर्यंत आम्हांला जुन्या काळची इंग्रजी क्रमिक पुस्तकें म्हणजे 'हावर्ड' ची मालिका. आतांच्या आकर्षक रीडर्सप्रमाणें त्यांत चित्रें वगैरे कांहीं नव्हतीं. तरी तिस-या यत्तेपासून इंग्रजी राहाटीचे धडे वाचावयाला मिळे. त्यामुळें माझ्या ग्रहणशील बुद्धीच्या डोळ्यांपुढें एका नवजीवनाचे नव्या रंगाचे पडदे दिसूं लागले. इंग्रजी शेताचें वर्णन, इंग्रजी झाडाझुडपांचीं नांवें, इंग्रजी खेडीं, इंग्रजी कुंपणावरील निराळी जंगली वेली, फुलें वगैरे नवीन देखावे मला नवीन हर्ष देऊं लागलें. त्यामुळें धडे मला फार आवडूं लागले. विषय आवडला म्हणजे जो सुलभ होतो. इतकेंच नव्हे तर परिणामकारीही होतो. हा अनुभव माझा बालपणापासूनचा आहे. तिस-या यत्तेचे शिक्षक रा. आप्पा काळे हे होते. त्यांच्या शिकवणींत एकपट रसिकता असली तरी माझ्या हृदयांत नूतन चेंडूप्रमाणें उशी घेऊन द्विगुणीत व चौगुणित होई. अशा रीतीनें शिक्षकाच्या सहानुभूतीला शिष्याच्या ग्रहणशीलतेची जोड मिळत चालली. इंग्रजी अभ्यास मी चौथ्या यत्तेंत गेलो. तर माझे आवडीचे शिक्षक आप्पा काळेहि चौथ्या वर्गावर शिक्षक झाले. इंग्रजी पुस्तक 'सॅंडफर्ड ॲन्ड मर्टन' हे लावण्यांत आलें. हें मला फार आवडलें. विचार नवीन व उदार, भाषा बालबोध, मधून मधून इंग्रजी पोषाखांची चित्रें, इंग्रजी राहणीची व वनश्रीचीं शब्दचित्रें आणि छायाचित्रें. ह्यामुळें इंग्रजी राहणीविषयीं कुतूहलता मजमध्यें दिवसेंदिवस वाढूं लागलीं. इतकी कीं पुढें मी मोठा झाल्यावर दैववशात् इंग्लंडांतील उत्तमोत्तम विश्वविद्यालयांत ऑक्सफर्ड येथें दोन वर्षें राहावयास मिळालें. तेव्हां तेथील खेड्यापाड्यांत जाऊन शेतांत, कुंपणांत फिरून मी जे देखावे पाहिले व अनुभव घेतला; त्यांची पूर्वस्वप्नेंच जणूं मला माझ्या जमखंडी सारख्या खेडवळ शाळेतील क्रमिक पुस्तकें वाचीत असतांना पडत होतीं. बुद्धीची पूर्व भूमिका हृदय झाल्याविना तिचा खरा परिषोष होत नसतो, हें मला माझ्या लहानपणाच्या अनुभवानें खरें आहे असें आतां पटतें. पांचव्या यत्तेंत 'लॅंब्स टेलस' हें पुस्तक लावलें होतें. त्यांत कवीकुलगुरु शेक्सपीयर्सची भेट झाली. शिकविण्यास ठाकूर नांवाचे पुणेरी शिक्षक होते. सहाव्या यत्तेंत 'रीडींगज् फ्रॉम दि स्पेक्टेटर' हें पुस्तक चिरमुले ह्यांनीं शिकविलें. हे तर ग्रॅज्युएट बी. ए. होते. ह्यांत ॲडिसनच्या ख-या बालबोध इंग्रजीचा व ताज्या विचारांचा मासला कळला. अशा रीतीनें माझ्या हृदयांत इंग्रजी भाषाच नव्हे तर संस्कृतीचाहि पक्षपाताची बीजें इतक्या कोंवळेपणांतच रुजूं लागलीं. पण आश्चर्य हें कीं हें सर्व मला बहुतेक त्या वेळीं न कळतच सहज घडत होतें ! पांचव्या यत्तेंत संस्कृत, भूमिती आणि बीजगणित; सहावींत रसायण, यंत्रशास्त्र, भूगोल, खगोल, इ. आधुनिक शास्त्रांची मूलतत्त्वें ह्यांचा उपक्रम झाला. एकाद्या मनो-यावर चढत असतां प्रत्येक मजल्या भोंवतालचें क्षितीज अधिकाधिक विस्तीर्ण होऊन ज्याप्रमाणें जास्त प्रदेश दृष्टीच्या टापूंत येतो व आनंद वाढतो; त्याप्रमाणें माझा हा हायस्कूल अभ्यासक्रम मला फार चित्तवेधक, सहज व बोधकारक झाला. इतका कीं त्यामुळें माझ्या घरांतील भयानक दारिद्र्याच्या वेदना मला कधींच भासल्या नाहींत, कीं माझ्या शिशूदशेच्या सहजानंदांत कधी खंड म्हणून पडला नाहीं. ह्या माझ्या सदानंदी उत्साहामुळें माझ्या आईबाबांचें दुःखही हलकें झालें. विशेषतः माझ्या आईला आपलें कठीण कष्ट सह्य झालें. ह्या गोष्टीचा मला आतां अभिमान वाटत आहे. सकृद्दर्शनी प्रेम आमची खेडवळ शाळा, तो जुना काळ; इंग्रजी विद्येचा आमचा देशांत कोठे नवा आनंद झालेला, तशांत माझें कोवळें वय ह्या सर्व गोष्टी विचारांत घेतां, मी जें वर म्हटलें आहे कीं इंग्रजी संस्कृतीचा मजमध्यें पक्षपात रुजूं लागला, हें कांहीं आढ्यतेचें व अतिशयोक्तीचें दिसतें खरें. माझें म्हणणें येवढेंच कीं पुढें माझ्यावर ह्या संस्कृतीनें जो अमोघ मोहपाश टाकला आणि माझ्या सर्व आयुष्याचा प्रवाह पार बदलून टाकिला, त्या भावी परिणामाचे डोहाळे जणूं मला ह्या माझ्या भोळ्या शाळेंत भासूं लागले. Love at first impression म्हणजे सकृद्दर्शनी प्रेमाच्या झटक्याचाच हा एक मासला माझ्या प्रत्यक्ष अनुभवास आला, हें सांगण्यांत माझी कांहीं स्वयंमन्यता असेलसें मला तरी वाटत नाहीं.

मराठी अभ्यास
कांहीं असो. मी केवळ इंग्रजीला हुरळून तन्मय झालों; आणि माझ्या मातृभाषेला व संस्कृतीला पारखा झालों असें मुळींच नव्हे. चवथ्या पांचव्या यत्तेंत आम्हांला नवनीतांतील कांहीं कविता लावल्या होत्या. त्यांत विशेषें करून रघुनाथ पंडिताचे नलदमयंतीआख्यानानें मजवर जो ठसा उमटविला तो अद्यापि ताजा आहे. ह्या सुंदर काव्यांतील कविता मी घरीं माझ्या आईला व बहिणींना म्हणून मोठ्या रसिकतेनें त्यांचा अर्थ सांगत असें. मराठीवरील माझें अकृत्रिम प्रेम वाढण्यास शाळेपेक्षा किंबहुना अधिकच साधनें माझ्या घरींच होती, हें सांगण्यास मला गर्व आणि कृतज्ञता हीं दोन्हीं सारखीच वाटतात ! श्रीधर, महिपती, तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे मराठी कवी आणि प्रासादिक संतांच्या ग्रंथांचें पारायण माझें बाबा स्वतःच घरीं करीत असत. त्यांच्या संग्रहीं ह्या जुन्या पोथ्या ब-याच होत्या व त्या वाचून ते नेहमीं इतरांस पुराणिकाप्रमाणें अर्थ सांगतांना मी ऐकत असें. इतकेंच नव्हे तर चवथ्या पांचव्या यत्तेंत माझे मराठी सुधारल्यावर मी स्वतः रामविजय, हरीविजय, पांडवप्रताप, भक्तीविजय वगैरे ग्रंथ नित्य वाचून आपल्या वर्गांतल्या मुलांना अर्थ सांगत असें. त्यावेळीं मराठींत गद्य वाङ्मय अद्यापि तयार झालें नव्हतें. पण आम्हांला त्याची वाण भासली नाहीं. इतकेंच नव्हे तर आतां जी आधुनिक वाङ्मयाची गबाळ वाढ झाली आहे तिच्यामुळें बाळबोध मराठीच्या परिचयांत विशेष भर पडली किंवा फायदा झाला, असें मला मुळींच वाटत नाहीं. हें माझें मत ब-याच आधुनिकांना पसंत पडेलसे वाटत नाहीं. असो !

संस्कृत अभ्यास
सहावींत व सातवींत माझा संस्कृतशी संबंध घडला. आमच्या शाळेंत रा. गणेशशास्त्री जोशी म्हणून एक जुने शास्त्री संस्कृत वाङ्मय जुन्या त-हेनें शिकविण्यास होते. मॅट्रिकचा अभ्यास करितांना एक्स्ट्रा रीडींग म्हणजे शाळेंतील वर्गांत नेमलेल्या अभ्यासापलीकडे कांहीं वाचणें बरें असतें. तें आम्ही वाचावयास शास्त्रीबोवांचे घरीं कांहीं विद्यार्थी मिळून जात असूं. त्यांतही माझा पहिला नंबर पाहून शास्त्रीबोवा, मी जातीनें मराठा म्हणून कोणताहि भेद मनांत न आणतां रसिकतेनें रघुवंश, कादंबरी, शाकुंतल वगैरे वाङ्मय आम्हांला शिकवत असत. सकाळीं आम्ही त्यांचेकडे जात असूं. ते गोठ्यांत गाईचें शेण काढीत असतां किंवा धोतराचे सोगे वर बांधलेलें, तोंडांत तंबाकूचा बार भरून त्याच्या मधुन मधुन पिचका-या मारीत, अगदीं उघडे बोडकें बसलेलें कधीं कधीं इकडे तिकडे फिरत असतां, आम्हांला रघुवंशांतील श्लोक सांगत. विशेषतः बाणाची कादंबरी त्यांनीं आम्हांला अशी शिकवली कीं, ती त्यांचीं हसत मुद्रा, सूक्ष्म विनोद, प्रेमळ बोल मला अद्यापि आठवतात. अच्छोद सरोवरातील शिवालयांतील महाश्वेतेचें संगीत भजनासारख्या देखाव्याची वर्णन करण्याची पाळी आली कीं गणेशशास्त्रांच्या स्वाभाविक रसिकतेला पाझर फुटे. श्रृंगार, वीर करुणादि नऊ रसांचे अभ्यंग स्नान आम्हांलाहि घडे. ॲडिसनचे 'सर रॉजर्ले डी कॉव्हरले' वाचीत असतां जो मी इंग्लंडांतील खेड्यांतील देखाव्यांत रमे, तोच एकदम दीड हजार वर्षांमागच्या श्रीहर्षाचें चरित्र शास्त्रीबोवांच्या मुखांतून ऐकतांना मागील भारतीय वैभवाच्या शिखरावर भ्रमण करूं लागे. आणि ही स्थळ-कालान्तरें करणारा मी स्वतः त्यांवेळीं १७।१८ वर्षांचाच होतों!

रसिकता
गणित असो वा शास्त्र असो, भाषा असो वा व्याकरण असो, परकीय इंग्रजी असो वा मृत संस्कृत असो कीं मातृभाषा चालू मराठी असो; माझी गति सारखीच अकुंठित चाले. सर्व हायस्कूलच्या क्रमांत मला अभ्यासाचें श्रम म्हणून कधीं भासलेंच नाहींत. ह्याचें कारण माझ्या बुद्धीचें तेज नसून मी बुद्धीनें साधारणच आहे - केवळ माझ्या हृदयाची निर्मळ रसिकताच होय, हें मला येथें नमूद करावयाचें आहे. आणि ही रसिकता मला शाळेपेक्षां घरांतच अधिक, गुरूंपेक्षां माझ्या आईबापांकडूनच जास्त मिळाली हें खास. माझ्या घरीं जातिभेद नव्हता. तसा माझ्या हृदयांत संस्कृतीभेदाचा किंवा पक्षपाताचा कृत्रिमपणाही नव्हता. सौंदर्य जेथें भेटेल तेथें ऊर्ध्वहस्तानें स्वीकारण्यास मी लहानपणापासून एका पायावर तयार आहे. मग तें इंग्लंडांतलें असो कीं स्वदेशांतलें असो, शहरांतलें असो कीं खेड्यांतले असो, संस्कृत असो की प्राकृत असो, तें सहज व स्वाभाविक मात्र असलें कीं पुंरे. मी त्याला बिलगलोंच समजावें. ह्या माझ्या मुग्ध श्रृंगारी स्वभावामुळें, केवळ कपटी व्यवहाराच्या दृष्टीनें पाहातां प्रपंचांत माझें ब-याच अंशीं नुकसान झालें आहे. आणि कांहीं जणामध्यें मजसंबंधीं दुराग्रहहि पसरला आहे. तरी पण 'स्वभावो दुरतिक्रमः' ह्या न्यायानें मी आपला माझ्याच चालीनें चाललों आहे आणि ही चाल मीं हायस्कूलांतच नव्हे तर अगदीं माझ्या पाळण्यांतच किंबहुना माझ्या मातृगर्भातच शिकलों असेन. नसेन कशावरूनॽ एरवी ती अशी दुरतिक्रम झाली नसती.

माझं प्राथमिक शिक्षण (धूळपाटी)

प्रकरण १० वें
मी ५ किंवा ६ वर्षांचा झालों असतां, माझे आजोबा बसवंतराव वारले. तेव्हांपासून ११ वर्षांचा होईपर्यंत म्हणजे इ. स. १८७९ पासून १८८४ पर्यंतचीं ५ वर्षें ही माझ्या प्राथमिक शिक्षणाचीं होतीं. मला प्रथम एका गांवठी शाळेंत घालण्यांत आलें होतें. हल्लीं जमखंडीस ज्या घरांत रा. सदाशिवराव पेंडसे वकील रहात आहेत, तेथें ही खाजगी शाळा होती. पंतोजीचे नांव हरिपंत फडके किंवा असेंच कांहींसें होतें. ह्या शाळेंत फक्त लिहिणें, वाचणें, मोडी अक्षर वळविणें, हस्तलिखितें वाचणें, हिशोब करणें वगैरे केवळ व्यावहारिक साधे विषय होते. त्यावेळीं संस्थानांत सरकारी शाळा होत्या कीं नव्हत्या हें माहीत नाहीं. असत्या तर मला या गांवठी शाळेंत कां ठेवलें कळत नाहीं. निदान इंग्रजी शाळा तरी त्या पूर्वकाळीं नसावी. शाळाखात्याची घटना त्यावेळीं नुकतीच चालली असावी. या गांवठी शाळेंत मी प्रथम माझी धुळाक्षरें कशीं शिकलों तें आठवतें. एक लाकडी सुमारें दीड हात लांब व एक वीत रुंद असे. तिला पाटी म्हणत असूं. वेळूची एक बारीक लेखणी असे. तिनें या पसरलेल्या धुळींत धुळाक्षरें कोरीत असूं. म्हणूनच ह्या मुळाक्षरांना धुळाक्षर हें नांव पडलें आहे. ह्यावेळीं दगड स्लेटींचा प्रचार अद्यापि जमखंडीस दिसत नव्हता. शाळेंत घालण्याचा माझा मुहूर्त समारंभ झाला. पाडवा चैत्री, दसरा, पंचमी आणि अक्षयतृतीया हे साडेतीन शुभमुहूर्त गणले जात. कोणत्याही गोष्टीस सुरवात करावयाची ह्या मुहूर्तावर करीत असत. रा. बाळा काणे या नांवाचा एक ब्राह्मण खासगी शिक्षकाचा धंदा करीत असे. माझे वडिलांनीं त्याला घरीं बोलावून आणून माझ्या शिक्षणाच्या आरंभाचा एक लहानसा विधि करवला. सोप्यांत दोन पाट मांडून मला व काणेमास्तरांना समोरासमोर बसवून मध्यंतरीं ही धुळपाटी ठेवून तिची पूजा करण्यांत आली. नंतर शिक्षकांनीं हात धरून माझा पहिला धडा 'श्रीगणेशायनमः' माझ्याकडून गिरविला. माझ्या वडील भावाचा हा विधि मला आठवत नाहीं. आणि माझ्या पाठीवर ८।१० मुलें जरी झालीं तरी तीं बाळपणींच वारलीं, जनाक्का व तान्याक्का ह्या मुली होत्या व एकनाथ हा शाळेंत जाण्याइतका होईपर्यंत युगांतरच झालें होतें. म्हणून मजशिवाय हा विधि पुनः कधीं आमचे घरीं झाला नाहीं हें सांगावयास नकोच.

मौजीबंधन
बाबांना धार्मिकविधि समारंभाची श्रद्धा होती व आपल्या घरीं पुरोहितास आणून सर्व संस्कार यथासांग व्हावेत असें त्यांना पूर्वीपासूनच वळण लागलेलें होतें. आमचीं लग्नें होण्यापूर्वीं माझ्या भावाची व माझी विधीपूर्वक मुंज (मौजीबंधन) करण्यांत आली. ह्यावरून आमचें घराणें क्षत्रिय होतें अशी भावना आमच्या बाबांमध्यें विशेष होती असें दिसतें. ती त्यांच्या तात्कालिक ब्राह्मणी शिक्षणामुळेंच आली असावी. पण वरील दोन्ही उपनयन समारंभाच्यावेळीं माझे आजोबा जिवंत नव्हते. मुंजीच्या वेळीं आजीही जिवंत नसावी. आमचे लग्नानंतरही एकदोनदां श्रावणीचे दिवशीं स्वतः बाबा व आम्ही दोघे मुलगे, ह्यांचा पुरोहिताला आणून विधिपूर्वक होमहवन करून नवीन यज्ञोपवीत येण्याच्या थाटाचा समारंभ होत असलेला मला आठवतो. पुढें लवकरच दारिद्र्यानें गांठून बाबा उदासीन झाले, त्यामुळें असले श्रावणीचे वार्षिक समारंभ अर्थात् बंद पडले. जमखंडी गांवांत इतर मराठे कोणी अशी श्रावणी करीत नसत. तरी पण मी १८९८ इ. सनांत पुणें येथील प्रार्थना समाजांत सभासद होईपर्यंत माझ्या अंगांत जाणवें हें होतेंच व त्याचा विधि इतर हिंदुप्रमाणें मी थोडाबहुत तोंपर्यंत पाळीत असें. आमची श्रावणी चालली असतां होमाचेवेळीं आमचे पुरोहित जे मंत्र म्हणत ते वैदिक असत किंवा पौराणिक असत हें मला माहीत नाहीं. पण नवरात्रांत रोज आमच्या घरीं नऊ दिवस महापूजा होत असत. त्यावेळीं मंत्रपुष्पाच्या वेळीं पुरोहित वेदमंत्र म्णत असत हें आता मला आठवतें. हा मंत्र क्षत्रियांच्या घरीं म्हणण्यासाठीं रचला असावा. इतक्या जुन्या काळीं जमखंडीसारख्या ब्राह्मणी रियासतींत आमच्या घरीं क्षत्रिय-ब्राह्मणांचा इतका सलोखा असतां पुढें पुढें ब्राह्मणब्राह्मणेतर वाद कसा माजला हें आश्चर्य आहे.
प्राथमिक शाळेंत माझा अभ्यास बरा होता. पण अभ्यासाकडे त्या वयांत लक्ष फारसें न लागणेंच साहजिक होतें. चौथ्या इयत्तेपासून माझें गणित व भाषा बरीं आहेत, हें शिक्षकाच्या नजरेस आलें. मोडी अक्षर म्हणण्यासारखें वळणदार नव्हतेंच. बाबांनीं आमच्या शाळेंतील अभ्यासाकडे खासगी लक्ष विशेष दिलेलें मला आढळलें नाहीं. मराठी चौथी इयत्ता संपल्यावरही एकदम इंग्रजी हायस्कुलांत जाण्यास हरकत नव्हती. पण मला मराठी पांचव्या यत्तेंत एक वर्ष घालवावें लागलें. मराठी शाळेचे हेडमास्तर विष्णुपंत गवंडे यांचा उल्लेख वर आलाच आहे. ह्यांनीं मला मुद्दाम पांचव्या यत्तेंत घेतलें. त्यामुळें मला फायदाच झाला. मराठी कवितेंत आणि गणितांत त्यावेळच्या मानानें माझी बरीच प्रगती झाली. पांचव्या पुस्तकांतील कुशलवाख्यान आणि मोरोपंताच्या धेनुहरणाच्या आर्या ह्यांचा अर्थ व व्याकरण मला चांगला कळत असे. कविताही चांगल्या सुरावर मी ऐटित म्हणत असे. कोणी शाळा पाहावयास आल्यास माझ्या कविता म्हणून घेत असत. अशा प्रकारें पंतोजीचा मी लाडका असे. ह्याचा मला अभिमान असें. मोरोपंताच्या कठीण व संस्कृतमिश्र आर्यांचा अर्थ मी घरींदेखील कोणाला तरी मोठ्या आढ्यतेनें करून दाखवीत असे. ह्यामुळे मी बाबांचाही लाडका झालों. ते कोणी आपले प्रतिष्ठित मित्र आल्यास मला कविता म्हणून अर्थ करण्यास सांगत.

अक्काची माया
माझ्या आईबाबशिवाय माझ्या आतेचा मी लाडका होतों असें मागें सांगितलेंच आहे. वडील भावापेक्षांही मजवरच अक्काचे (आतेला म्हणजे आपल्या नणंदेला आमची आई अक्का म्हणे, म्हणून आम्हीही अक्काच म्हणत असूं) प्रेम कां गुंतावें हा एक प्रश्न आहे. एकतर माझ्या भावापेक्षां मी जरी देखणा नसलो तरी अधिक चुणचुणीत असे. आणि माझ्या भावाला द्यावयाला त्याला अनुरूप अशी मुलगी माझ्या आतेला नव्हती. आणि आमच्या घराण्यांत आपली एक तरी मुलगी खुपसण्याची तिची बळकट इच्छा. कांहीं झालें तरी अक्काचे मजवर अकृत्रिम प्रेम होतें ह्यांत संशय नाहीं. अशांत माझी तिसरी यत्ता मराठी शाळेंतली पास होऊन मी चौथींत गेलों तेव्हां माझ्या अक्काच्या आनंदाला आणि गर्वाला सीमाच नाहीशीं झाली. तिनें लागलींच छोटुसिंगास साखर वाटली. बिचारी अक्का ! पुढें मी बी. ए. झालों, विलायतेला जाऊन आलों हें पाहाण्यास राहाती तर तिनें काय केलें
असतें! 
अक्काचें मजवर इतकें प्रेम होतें तरी मी कांहीं फारसा तिचेकडे जात नसे. कारण मी तिकडे गेलों कीं, "धोंडीचा नवरा आला" असा गलबला त्या आळींतील पोरी आणि थोरेंहि करीत तें मला ऐकणें आवडत नसे. तरी मुख्य सणाचे प्रसंगीं जावे लागतच असें. दस-यादिवशीं सोनें वाटावयाला, संक्रांतीचे दिवशीं तिळगुळ द्यावयाला जाणें भागच होतें. दस-याचे दिवशीं गेलो म्हणजे अक्काच्या देव्हा-यावरच्या सा-या कडाकण्या मी खाऊन फस्त करीत असे. ती तर मी केव्हां येऊन खाईन ह्याची वाटच पहात बसे. माझा हट्ट  एकदां अक्का कोंकटणूरच्या यल्लमाच्या यात्रेला निघाली होती. त्यावेळीं मी फार तर ४।५ वर्षांचा असेन. अक्का आमचे घरीं निरोप घ्यावयाला आली होती. ती जाऊं लागली तेव्हां तिचेबरोबर मीही यात्रेला येणार असा मी हट्ट घेतला. कांहीं केल्या हा हट्ट मी सोडीना. बाहेर रस्त्यापर्यंत मी तिचे मागें रडत लागलों. तिनें मला उचलून खांद्यावर घेतलें व परत घरीं आणून सोडूं लागली. त्यावेळीं मी इतका अनावर झालों कीं खांद्यावर बसल्या बसल्या मी मोठ्या आवेशाने पाय झाडीला; तो तिच्या पुढच्या दांतांला लागून वरचे दोन्ही दांत तात्काळ पडले आणि अक्काचें तोंड रक्तबंबाळ झालें. तरी बिचारीला राग तो म्हणून कसलाही आला नाहीं. उलट ही गोष्ट माझ्या बाबांना न कळण्याची खबरदारी घेण्याविषयीं तिनें माझ्या आईची गयावया केली.

  1. भावी सामाजिक सुधारणेची तयारी
  2. प्रिव्हीयसचें वर्ष
  3. प्रस्तावना
  4. पोरवयांतील माझी धर्मभावना
  • 84
  • 85
  • 86
  • 87
  • 88
  • 89
  • 90
  • 91
  • 92
  • 93
Page 89 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी