माझं प्राथमिक शिक्षण (धूळपाटी)

प्रकरण १० वें
मी ५ किंवा ६ वर्षांचा झालों असतां, माझे आजोबा बसवंतराव वारले. तेव्हांपासून ११ वर्षांचा होईपर्यंत म्हणजे इ. स. १८७९ पासून १८८४ पर्यंतचीं ५ वर्षें ही माझ्या प्राथमिक शिक्षणाचीं होतीं. मला प्रथम एका गांवठी शाळेंत घालण्यांत आलें होतें. हल्लीं जमखंडीस ज्या घरांत रा. सदाशिवराव पेंडसे वकील रहात आहेत, तेथें ही खाजगी शाळा होती. पंतोजीचे नांव हरिपंत फडके किंवा असेंच कांहींसें होतें. ह्या शाळेंत फक्त लिहिणें, वाचणें, मोडी अक्षर वळविणें, हस्तलिखितें वाचणें, हिशोब करणें वगैरे केवळ व्यावहारिक साधे विषय होते. त्यावेळीं संस्थानांत सरकारी शाळा होत्या कीं नव्हत्या हें माहीत नाहीं. असत्या तर मला या गांवठी शाळेंत कां ठेवलें कळत नाहीं. निदान इंग्रजी शाळा तरी त्या पूर्वकाळीं नसावी. शाळाखात्याची घटना त्यावेळीं नुकतीच चालली असावी. या गांवठी शाळेंत मी प्रथम माझी धुळाक्षरें कशीं शिकलों तें आठवतें. एक लाकडी सुमारें दीड हात लांब व एक वीत रुंद असे. तिला पाटी म्हणत असूं. वेळूची एक बारीक लेखणी असे. तिनें या पसरलेल्या धुळींत धुळाक्षरें कोरीत असूं. म्हणूनच ह्या मुळाक्षरांना धुळाक्षर हें नांव पडलें आहे. ह्यावेळीं दगड स्लेटींचा प्रचार अद्यापि जमखंडीस दिसत नव्हता. शाळेंत घालण्याचा माझा मुहूर्त समारंभ झाला. पाडवा चैत्री, दसरा, पंचमी आणि अक्षयतृतीया हे साडेतीन शुभमुहूर्त गणले जात. कोणत्याही गोष्टीस सुरवात करावयाची ह्या मुहूर्तावर करीत असत. रा. बाळा काणे या नांवाचा एक ब्राह्मण खासगी शिक्षकाचा धंदा करीत असे. माझे वडिलांनीं त्याला घरीं बोलावून आणून माझ्या शिक्षणाच्या आरंभाचा एक लहानसा विधि करवला. सोप्यांत दोन पाट मांडून मला व काणेमास्तरांना समोरासमोर बसवून मध्यंतरीं ही धुळपाटी ठेवून तिची पूजा करण्यांत आली. नंतर शिक्षकांनीं हात धरून माझा पहिला धडा 'श्रीगणेशायनमः' माझ्याकडून गिरविला. माझ्या वडील भावाचा हा विधि मला आठवत नाहीं. आणि माझ्या पाठीवर ८।१० मुलें जरी झालीं तरी तीं बाळपणींच वारलीं, जनाक्का व तान्याक्का ह्या मुली होत्या व एकनाथ हा शाळेंत जाण्याइतका होईपर्यंत युगांतरच झालें होतें. म्हणून मजशिवाय हा विधि पुनः कधीं आमचे घरीं झाला नाहीं हें सांगावयास नकोच.

मौजीबंधन
बाबांना धार्मिकविधि समारंभाची श्रद्धा होती व आपल्या घरीं पुरोहितास आणून सर्व संस्कार यथासांग व्हावेत असें त्यांना पूर्वीपासूनच वळण लागलेलें होतें. आमचीं लग्नें होण्यापूर्वीं माझ्या भावाची व माझी विधीपूर्वक मुंज (मौजीबंधन) करण्यांत आली. ह्यावरून आमचें घराणें क्षत्रिय होतें अशी भावना आमच्या बाबांमध्यें विशेष होती असें दिसतें. ती त्यांच्या तात्कालिक ब्राह्मणी शिक्षणामुळेंच आली असावी. पण वरील दोन्ही उपनयन समारंभाच्यावेळीं माझे आजोबा जिवंत नव्हते. मुंजीच्या वेळीं आजीही जिवंत नसावी. आमचे लग्नानंतरही एकदोनदां श्रावणीचे दिवशीं स्वतः बाबा व आम्ही दोघे मुलगे, ह्यांचा पुरोहिताला आणून विधिपूर्वक होमहवन करून नवीन यज्ञोपवीत येण्याच्या थाटाचा समारंभ होत असलेला मला आठवतो. पुढें लवकरच दारिद्र्यानें गांठून बाबा उदासीन झाले, त्यामुळें असले श्रावणीचे वार्षिक समारंभ अर्थात् बंद पडले. जमखंडी गांवांत इतर मराठे कोणी अशी श्रावणी करीत नसत. तरी पण मी १८९८ इ. सनांत पुणें येथील प्रार्थना समाजांत सभासद होईपर्यंत माझ्या अंगांत जाणवें हें होतेंच व त्याचा विधि इतर हिंदुप्रमाणें मी थोडाबहुत तोंपर्यंत पाळीत असें. आमची श्रावणी चालली असतां होमाचेवेळीं आमचे पुरोहित जे मंत्र म्हणत ते वैदिक असत किंवा पौराणिक असत हें मला माहीत नाहीं. पण नवरात्रांत रोज आमच्या घरीं नऊ दिवस महापूजा होत असत. त्यावेळीं मंत्रपुष्पाच्या वेळीं पुरोहित वेदमंत्र म्णत असत हें आता मला आठवतें. हा मंत्र क्षत्रियांच्या घरीं म्हणण्यासाठीं रचला असावा. इतक्या जुन्या काळीं जमखंडीसारख्या ब्राह्मणी रियासतींत आमच्या घरीं क्षत्रिय-ब्राह्मणांचा इतका सलोखा असतां पुढें पुढें ब्राह्मणब्राह्मणेतर वाद कसा माजला हें आश्चर्य आहे.
प्राथमिक शाळेंत माझा अभ्यास बरा होता. पण अभ्यासाकडे त्या वयांत लक्ष फारसें न लागणेंच साहजिक होतें. चौथ्या इयत्तेपासून माझें गणित व भाषा बरीं आहेत, हें शिक्षकाच्या नजरेस आलें. मोडी अक्षर म्हणण्यासारखें वळणदार नव्हतेंच. बाबांनीं आमच्या शाळेंतील अभ्यासाकडे खासगी लक्ष विशेष दिलेलें मला आढळलें नाहीं. मराठी चौथी इयत्ता संपल्यावरही एकदम इंग्रजी हायस्कुलांत जाण्यास हरकत नव्हती. पण मला मराठी पांचव्या यत्तेंत एक वर्ष घालवावें लागलें. मराठी शाळेचे हेडमास्तर विष्णुपंत गवंडे यांचा उल्लेख वर आलाच आहे. ह्यांनीं मला मुद्दाम पांचव्या यत्तेंत घेतलें. त्यामुळें मला फायदाच झाला. मराठी कवितेंत आणि गणितांत त्यावेळच्या मानानें माझी बरीच प्रगती झाली. पांचव्या पुस्तकांतील कुशलवाख्यान आणि मोरोपंताच्या धेनुहरणाच्या आर्या ह्यांचा अर्थ व व्याकरण मला चांगला कळत असे. कविताही चांगल्या सुरावर मी ऐटित म्हणत असे. कोणी शाळा पाहावयास आल्यास माझ्या कविता म्हणून घेत असत. अशा प्रकारें पंतोजीचा मी लाडका असे. ह्याचा मला अभिमान असें. मोरोपंताच्या कठीण व संस्कृतमिश्र आर्यांचा अर्थ मी घरींदेखील कोणाला तरी मोठ्या आढ्यतेनें करून दाखवीत असे. ह्यामुळे मी बाबांचाही लाडका झालों. ते कोणी आपले प्रतिष्ठित मित्र आल्यास मला कविता म्हणून अर्थ करण्यास सांगत.

अक्काची माया
माझ्या आईबाबशिवाय माझ्या आतेचा मी लाडका होतों असें मागें सांगितलेंच आहे. वडील भावापेक्षांही मजवरच अक्काचे (आतेला म्हणजे आपल्या नणंदेला आमची आई अक्का म्हणे, म्हणून आम्हीही अक्काच म्हणत असूं) प्रेम कां गुंतावें हा एक प्रश्न आहे. एकतर माझ्या भावापेक्षां मी जरी देखणा नसलो तरी अधिक चुणचुणीत असे. आणि माझ्या भावाला द्यावयाला त्याला अनुरूप अशी मुलगी माझ्या आतेला नव्हती. आणि आमच्या घराण्यांत आपली एक तरी मुलगी खुपसण्याची तिची बळकट इच्छा. कांहीं झालें तरी अक्काचे मजवर अकृत्रिम प्रेम होतें ह्यांत संशय नाहीं. अशांत माझी तिसरी यत्ता मराठी शाळेंतली पास होऊन मी चौथींत गेलों तेव्हां माझ्या अक्काच्या आनंदाला आणि गर्वाला सीमाच नाहीशीं झाली. तिनें लागलींच छोटुसिंगास साखर वाटली. बिचारी अक्का ! पुढें मी बी. ए. झालों, विलायतेला जाऊन आलों हें पाहाण्यास राहाती तर तिनें काय केलें
असतें! 
अक्काचें मजवर इतकें प्रेम होतें तरी मी कांहीं फारसा तिचेकडे जात नसे. कारण मी तिकडे गेलों कीं, "धोंडीचा नवरा आला" असा गलबला त्या आळींतील पोरी आणि थोरेंहि करीत तें मला ऐकणें आवडत नसे. तरी मुख्य सणाचे प्रसंगीं जावे लागतच असें. दस-यादिवशीं सोनें वाटावयाला, संक्रांतीचे दिवशीं तिळगुळ द्यावयाला जाणें भागच होतें. दस-याचे दिवशीं गेलो म्हणजे अक्काच्या देव्हा-यावरच्या सा-या कडाकण्या मी खाऊन फस्त करीत असे. ती तर मी केव्हां येऊन खाईन ह्याची वाटच पहात बसे. माझा हट्ट  एकदां अक्का कोंकटणूरच्या यल्लमाच्या यात्रेला निघाली होती. त्यावेळीं मी फार तर ४।५ वर्षांचा असेन. अक्का आमचे घरीं निरोप घ्यावयाला आली होती. ती जाऊं लागली तेव्हां तिचेबरोबर मीही यात्रेला येणार असा मी हट्ट घेतला. कांहीं केल्या हा हट्ट मी सोडीना. बाहेर रस्त्यापर्यंत मी तिचे मागें रडत लागलों. तिनें मला उचलून खांद्यावर घेतलें व परत घरीं आणून सोडूं लागली. त्यावेळीं मी इतका अनावर झालों कीं खांद्यावर बसल्या बसल्या मी मोठ्या आवेशाने पाय झाडीला; तो तिच्या पुढच्या दांतांला लागून वरचे दोन्ही दांत तात्काळ पडले आणि अक्काचें तोंड रक्तबंबाळ झालें. तरी बिचारीला राग तो म्हणून कसलाही आला नाहीं. उलट ही गोष्ट माझ्या बाबांना न कळण्याची खबरदारी घेण्याविषयीं तिनें माझ्या आईची गयावया केली.