1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

रोग निवारक प्रयत्न एक निकडीची विनंती

पुणे शहरात म्युनिसिपालिटी व इतर परोपकारी संस्थांकडून अनेक स्तुत्य प्रयत्न चालले आहेत. पण सरकारी किंवा निमसरकारी प्रयत्नाला खाजगी प्रयत्नाच्या जोडीची आवश्यकता भासल्यावरून लष्करमध्येही असा प्रयत्न सुरू करून एक आठवडा झाला. औषधे, वैद्यांचा सल्ला, थोडीबहूत पैशाचीही मदत मिळते. पण स्वयंसेवकांचीच मदत मात्र मिळेनाशी झाली आहे. कारण लष्करात बकाली वस्ती असल्यामुळे अशा कामाचे येथे कोणास अद्यापि अंगवळण नाही. निराश्रित साहाय्यकारी मंडळीच्या खालील शाळांचे ठिकाणी (१) ६७०, ताबूत स्ट्रीट, (२) नवा मोदीखाना येथे म्यूलकोअरला लागून डॉ. मुदलीयारचे घराशेजारी, (३) नानाच्या पेठेतील भोकरवाडीच्या मैदानात आणि लष्कर येथील
कामाठीपु-यात, शिवाय (४) १२ वी गल्ली नंबर १४९६ येथे सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाजाच्या माडीवर, अशा चार ठिकाणी तूर्त औषधे ठेवण्यात आली आहेत. शिवाय ती स्वयंसेवक मिळतील तशी घरोघरीही पोहोचविण्यात येत आहेत. ह्याशिवाय कँटोनमेंट म्युनिसिपालिटीचे मार्फत ५ आय. एम. एस. ऑफिसर्स, बरोबर मजुरांच्या डोक्यावर औषधांच्या मोठ्या पेट्या घेऊन स्वत: रोग्यास पाहाण्यास घरोघर हिंडत आहेत. डॉक्टरांनी कोणा गरीबास घरी पाहण्याची आवश्यकता असल्यास त्यांची वर्दी मार्केटपुढील म्युनिसिपल दवाखान्यात किंवा ६७०, ताबूत स्ट्रीट मधील शाळेत सकाळी ८ च्या आत पोहोचल्यास अशा घाईत शक्य तेवढी तजवीज होण्याचा संभव आहे. रोगाचे मान हटत आहे. तरी अद्यापि घरोघर बरेच रोगी पडून आहेत. त्यांना वेळेवर मदतीची आवश्यकता आहे. औषधाशिवाय अगदी अनाथ आजा-यास दूध किंवा कांजीसाठीही मदत करण्यात येईल. अनाथ अथवा लाचार झालेल्या नातलगांच्या मृतासाठी मर्तिकाचे सामान फुकट देण्याचीही व्यवस्था होईल. पण अशासाठी योग्य दाखला खाली सही करणाराकडे मिळाला पाहिजे. म्हणजे शक्त्यनुसार मदत होईल.

अशा आपत्तीत देखील गरीब लोकांमधील अंधविश्वास, अंधसंशय आणि अंधभीती आणि बेपर्वाई इ. अडचणीची व्यंगे नाहीशी झाली नाहीत व ती एकदम नाहीशी होणेही कठीण आहे. म्हणून तोपर्यंत अशा समाजसेवेची अत्यंत जरूरी आहे, हे जाणून स्वयंसेवकांनी व धनिकांनी आपण होऊनच पुढे यावे व मदतीची याचना करण्यास आम्ही त्यांच्या दारी येण्याची वाट पाहू नये, अशी कळकळीची विनवणी आहे.

विठ्ठल रामजी शिंदे,
जनरल सेक्रेटरी,
निराश्रित साहाय्यकारी मंडळी.

६७०, ताबूत स्ट्रीट, पुणे लष्कर,
ता. १२ ऑक्टोबर १९१८.

राष्ट्रीय निराशा

लंडन
ता. २७-६-१९०२

आजचा दिवस म्हणजे इंग्लंडच्या इतिहासात अत्यंत बहारीचा होणारा होता. पण विलक्षण दैवदुर्विलासामुपे त्या बहारीचा तूर्त पूर्ण विरस झाला आहे! त्यामुळे ह्या राष्ट्रास किती खेद वाटत आहे आणि काही लोकांचे किती खासगी नुकसान झाले आहे, ह्याचा नुसता अंदाज लागणेही अशक्य आहे.

ह्या राज्यारोहणाचा डंका आज जवळजवळ वर्षभर सा-या जगभर गाजत होता. तेव्हापासून त्याची सारखी जय्यत तयारी चालली होती. नुकत्याच संपलेल्या बोअर युद्धामुळे तर इंग्रजी साम्राज्याचा अगदी कळस होऊन गेला आहे. लढाई मिटविण्याच्या कामी स्वत:बादशहांनी खटपट केल्यामुळे ते अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. ह्या अनेक कारणांमुळे हा समारंभ अपूर्व होणार होता. ह्याआठवड्याचे आरंभी जगातील देशोदेशींचे राजे अगर त्यांचे प्रतिनिधी लंडन शहरी दाखल झाले. पाहुण्यांची इतकी गर्दी झाली की ह्या अफाट शहरीदेखील ह्या आठवड्यात जागा मिळण्याची मारामार पडू लागली. दिवसा लंडनमध्ये समारंभ पाहून राभी ऑक्सफर्डमध्यें निजावयास जाण्याची देखील काही लोकांस योजना करावी लागली!

गेल्या आठवड्यातच बाशहांची प्रकृती किंचित नादुरूस्त झाली होती. पण ती इतक्या विकोपास जाईल असे कोणास वाटले नवह्ते. गेल्या सोमवारी दोनप्रहरी आमची गाडी ऑक्सफर्डहून लंडन येथील पाँडिगटन् स्टेशनावर १२|| वाजता पोहोचली असता तेथे काही विशेष गडबड दिसू लागली. शहराचे स्वरूप तर अगदी पालटलेले होते. माळा, निशाणे आणि तोरणे ह्यांनी सर्व शहर जणू हासत होते. आळीती गोजिरवाणी मुले आपले चिमुकले बावटे कंटाजनांच्या आत खुपसून आगगाडीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस उभी होती. इतक्यात वुइंडसर किल्ल्यातून एक गाडी मोठ्या तो-याने फुसफुसत स्टेशनात आली. तिच्या एंजिनवरचा दैदिप्यमान मुकूट पाहून हिला इतका गर्व का झाला होता हे सहज कळले. भाग्यशाली एडवर्ड बादशहांची स्वारी आगगाडीतून घोड्याच्या गाडीत बसताना त्यांच्या राजनिष्ठ प्रजेने एकच आनंदाचा टाहो फोडिला!

शहराच्या रस्त्यातून ह्याच दिवशी इतकी गर्धी उसळलेली होती की, पायवाटेने कोठे जाऊ लागल्यास अतिशय वेळ लागू लागला. ता. २६-२७ रोजी छबिन्याचा रस्ता सकाळी ८ पासून बंद होईल असे शहर पोलीसाने जाहीर केले. ज्यांच्याजवळ बसावयाच्या जागेचे तिकीट होते त्यासच रस्त्यात येण्याची परवानगी होती. सुमारे ७ मैल लांबीच्या रस्त्यात नानात-हेची शोभा व रोषणाई केली होती. जागोजाग ३-४ मजले उंच प्रेक्षक बसण्याकरिता सुंदर पाय-या केया होत्या. प्रेक्षकांच्या जागेचे तिकीट १ पासून तो ७ गिनीपर्यंतचे (समारे १०० रूपये) होते. निरनिराळ्या वसाहतीमार्फत जागोजाग भव्य व सुंदर कमानी उभारिल्या होत्या. अमेरिकेतील कानडा देशातून इंग्लंडास धान्याचा मुख्य पुरवठा होत असतो म्हणून कानड्याचे कमानीवर त्या देशात पिकणारी सर्व धान्य, भाजीपाला, फळफळावळ आणि खाद्य प्राणी ह्यांचे प्रदर्शन केले होते.

मंगळवारी (ता. २४) दोनप्रहरी लंडनच्या रस्त्यात विपरीत देखावा दिसला. भराभर जादा पत्रकांचे अंक खपू लागले! जो तो कोप-यावर उभा राहून आतील मजकूर आधाशासारखा वाचू लागला! घटकेपूर्वी ज्या राष्ट्राचा आनंद पोटात मावेनासा होऊन त्यास काय करू आणि काय न करू असे झाले होते, त्यासच आता निराशेचा असा जबर धक्का बसला की, त्याने ते काही वेळ सुंद होऊन गेले. आदले दिवशी बादशहाच्या आजाराने उलट खाल्यामुळे आज त्यावर अत्यंत कठीण शस्त्रक्रिया करण्याची पाळी आली. बादशहास आपल्या आजारापेक्षा आपल्या प्रजेची अशी खडतर निराशा झाली आणि त्यांचे इतके जबर नुकसान झाले ह्याची वेदना अधिक दु:सह झाली. आणि “मी मेलो तरी बेहत्तर पण वेस्टमिनिस्टर मठापर्यंत जाईन” असे त्यांच्या तोंडचे वाक्य पार्लमेंमध्ये ना. वाल्फर साहेबांनी सांगितले! समारंभाची तर गोष्ट राहिलीच. पण बादशहाच्या प्रकृतीकडे सर्वांचे चित्त लागले आहे. आज दोन दिवस सर्व कामे तशीच तहकूब पडली आहेत, काय करावे हे कोणासच सुचत नाही. पुष्कळ पाहुणे व प्रेक्षक आणि राजांच्या स्वा-या विन्मुख परत गेल्या, असो, आता ही निराशेची कहाणी ह्यापुढे मी शब्दांनी सांगण्यापेक्षा आपण कल्पनेने जाणावी!

जुन्या युगातील एकछत्री राजसत्ता व खासगी स्वामीनिष्ठा आणि नव्या युगातील सार्वजनिक प्रजासत्ता व स्वातंत्र्यप्रीती ह्या परस्पर भिन्न वस्तूंचे बेमालूम मिश्रण इंग्लंडच्या हल्लीच्या राज्यघटनेत आहे! ही घटना आमच्या रामराज्याहून जशी निराळी आहे तशीच हल्लीच्या युनायटेड स्टेटसमधील केवळ लोकनियुक्त राज्याहूनही निराळी आहे. राजकीय मानसशास्त्रातील हे एक अपूर्व कोडेच आहे म्हणावयाचे! हे कोडे आज एक दोन दिवसांत जेस नजरेस आले तसे कधीच आले नसेल. कित्येक अमेरिकन लोक ही धेडगुजरी राज्यपद्धती पाहून हासतात. पण एवढी गोष्ट निर्विवाद आहे की, इंग्रजी साम्राज्याची बळकटी ह्या कोड्यातच आहे. येथवर तर शहाण्या इंग्रज मुत्सद्यांनी हे गाडे सुरळीत आणले. पुढे काय ठेविले आहे ते हरी जाणे!

रावसाहेब थोरात ह्यांच्या “बोधामृत”ला प्रस्तावना

रावसाहेब थोरात ह्यांनी सुरू करून वाढविलेले नाशिक येथील “मराठा विद्यार्थी वसतिगृह” ज्यांनी समक्ष पाहिले आहे, त्यांनाच रावसाहेबांच्या कर्तृत्वाची व तडफेची कल्पना येणार आहे. विद्यार्थ्यांना वश करून घेऊन त्यांच्यात स्फूर्ती आणणे हा त्यांचा विशेष गुण आहे. ह्या गुणाचेच रहस्य पुढील “बोधामृत” लेखात अस्पष्ट का होईना पण चमकत आहे. नुसती जेवणाखाण्याची आणि राहण्याची सोय करूनच विद्यार्थी-वसतिगृहाची उभारणी होत नसते. कारण विद्यार्थी केवळ वनस्पती नाहीत. ते होतकरू माणसे असून त्यांना विद्यालोलुप बनवावयाचे असते. बोधामृतासारखा खासगी पत्रव्यवहार ठेवून त्यांच्या मनाची मशागत करावयाची असते. ही गोष्ट रा. थोरात जाणून आहेत असे दिसते. वसतिगृहात आपल्या आप्तेष्टांची भरती होऊ न देण्याचा निश्चय फार स्तुत्य आहे. एकंदरीत विद्यार्थीच आपले सगेसोयरे आणि त्यांच्या ठिकाणीच आपला आराम, अशी जीविताची वृत्ती ठेवणारे पुरुष मराठे लोकांत जास्त निर्माण होतील तर श्रीशिवाजीच्या वंशजांस मागासलेले म्हणवून घेण्याची जी आज चटक लागली आहे ती टिकण्याचा संभव नाही. रावसाहेब थोरात आपला वानप्रस्थाश्रम आजन्म सांभाळोत, अशी ईश्वराजवळ प्रार्थना करून ही अल्प प्रस्तावना पुरी करतो.
भोकरवाडी, पुणे. ता. १९ जुलै १९२१ -–विठ्ठल रामजी शिंदे.

रामजी बसाप्पा शिंदे ह्यांचा मृत्यू

आम्हांस कळविण्यास फार वाईट वाटते की, रा. रा. वि. रा. शिंदे ह्यांचे तीर्थरूप रा. रा. रामजी बसाप्पा शिंदे ह्यांना आपल्या वयाच्या ७४ व्या वर्षी गेल्या सोमवारी तारीख २७ जून रोजी देवाज्ञा झाली. हे आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर काही दिवस हिंडत फिरत होते. परंतु नंतर त्यांची प्रकृती क्षीण होत जाऊन गेल्या सोमवारी त्यांचा अंत झाला. रा. रामजी बसाप्पा हे मूळचे अगदी जुन्या वळणातले. तरीपण आपल्या चिरंजीवाच्या विचारांचा त्यांचा मनावर इष्ट परिणाम इतका झाला होता की, त्यांची जुन्या विचारांवरील श्रद्धा उडाली होती. एवढेच नव्हे तर गेल्या एप्रिल महिन्यापर्यंत  निराश्रित मिशनचे हिशेब ठेवण्याचे काम ते मोठ्या दक्षतेने करीत होते. त्याचप्रमाणे निराश्रित बायांना एकत्र करून त्यांस पुराण सांगणे व उपदेश करणे हेही काम ते वारंवार करीत असत. त्यांच्यासारख्या जुन्या वळणातील इसमाने ह्या कार्याला आपल्याला वाहवून घेणे ही एक विशेष गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. रा. विठ्ठलराव ह्यांच्या मातोश्री व तीर्थरूप दोन तीन महिन्यांच्या अंतराने परलोकवासी झाल्यामुले ह्यांच्यावर संसाराचा सर्व बोजा आता पडला आहे. रा. रा. रामजी बसाप्पा ह्यांच्या आत्म्यास शांती व त्यांच्या मुलास हे पितृवियोगाचे दु:ख सहन करण्यास बळ परमेश्वर देवो अशी आमची प्रार्थना आहे.

राज्यारोहण

लंडन शहर हे ब्रिटिश साम्राज्याची राजधानी होय, किंबहुना ते काही दृष्टीने सर्व जगाची राजधानी असे म्हटल्यासही विशेष अतिशयोक्तीचे होईल असे नाही. त्या ठिकाणी आज किंबहुना आताच आमचे प्रिय व पूज्य बादशहा पाचवे जॉर्ज ह्यांच्या राज्याभिषेकाचा महोत्सव चालू आहे. त्यातच आम्ही सामील होण्यासाठी येथे जमलो आहो. पण अशा वेळी साधारण माणसाची वृत्ती कोणत्या त-हेची होण्याचा संभव आहे, हे लंडन येथीलच एका विनोदी पत्राने एका चित्राच्या द्वारे दाखविले आहे. हे चित्र असे आहे की, राज्याभिषेकाचा छबिना पहावयास प्रेक्षकांसाठी रस्त्यावर ठिकठिकाणी जागा तयार करीत असलेल्या सुतारांपैकी एका ओबडधोबड सुतारास एक पार्लमेंटचा सभासद भेटून म्हणतो की, अशा वेळी मला ब-याच गोष्टींविषयी बोलावयाचे आहे. सुतार त्यास निक्षून सांगतो की, तशा काही तू भानगडीत पडू नकोस. तुझे आज कोणीच ऐकणार नाही, ह्यावेळी ऐकण्यात येणारा शब्द काय तो हाच माझ्या हातोड्याचा, असे म्हणून तो आपले खिळे ठोकीत आहे. ह्यावरून कोणत्याही महोत्सवाचा वेळ प्रत्यक्ष आला म्हणजे सामान्य लोकांचे लक्ष अगदीच वरवरच्या गोष्टीकडे जाते, हे दाखविले आहे. तुकारामबोवांनी तर ह्याहीपेक्षा निर्भिडपणाने म्हटले आहे की, “आली सिंहस्थ पर्वणी । न्हाव्या भटा झाली धणी ।।” पर्वकाळ प्रत्यक्ष आला असता कोणासही तत्त्वविवेचन किंवा धर्मानुभव कथन अशा गंभीर गोष्टीमध्ये मन घालण्यास फुरसत मिळत नाही. लंडन शहरातील सुतारांच्या ठोक्यांनी लंडन शहर आता जसे दणाणून गेले आहे, तसाच सगळा गंगाकिनारा न्हाव्यांच्या आरोळ्यांनी आणि भटांच्या संकल्पांनी गजबजून जातो, परंतु आम्ही येथे जरी ह्या महोत्सवानिमित्तच जमलो आहो, तरी सुताराच्या ठोक्यांनी आमचे कानठाळे बसण्याची भीती नाही, म्हणून ह्या प्रसंगाविषयी एक दोन तात्त्विक विचार आमच्या मनात येण्यास अवसर आहे, आणि त्यासंबंधी सावधान असणे आमचे कर्तव्य आहे. (फुट नोट- गुरुवार ता. २२-०६-१९११ रोजी झालेला उपदेश.)

थोडासा संसारामध्ये दुःखाचा चटका बसल्याबरोबर आमच्यापैकी कित्येकजण मुळी ईश्वरच नाही, ह्या विश्वाला कोणी नियंताच नाही असा सिद्धांत ठोकून देतात, ही गोष्ट लक्षात घेतली असताना एकाद्या राज्यसंस्थेमध्ये थोडासा दोष आढळल्याबरोबर किंवा तिच्यामुळे एकाद्या व्यक्तीस किंवा व्यक्तीसमूहास नुकसान पोहोचल्याबरोबर तो राजाच नको किंवा अजीबात राजकीय संस्थाच नको असे म्हणणारे काही संतापी लोक आढळतात, ह्याविषयी विशेष नवल मानण्यासारखे काही नाही. उलट अशा लोकांची शांतपणे, शक्य असल्यास समजूत घालून त्यांना आळा घालणे हेच थोर पदावर चढलेल्या पुरुषास भूषणावह आहे. मनुष्यप्राण्याची हल्ली जी उन्नती झाली आहे, तिच्या इतिहासाकडे मागे दूरवर दृष्टी देऊन पाहिल्यास राजकीय संस्था ही ह्या उन्नतीचे एक मोठे साधन आहे असे कळून येण्यास काही अडचण पडणार नाही. केवळ तात्त्विक दृष्टीने पाहता राजकीय संस्था जरी मनुष्यप्राण्याच्या उन्नतीचा एक शाश्वतचा भाग नसला तथापि तो बराच चिरकाल टिकणारा एक भाग आहे हे कोणासही नाकबूल करता येत नाही. मनुष्यप्राणी समाज करून राहू लागल्या दिवसापासून तो आजपर्यंत ही संस्था अबाधित राहिली आहे, इतकेच नव्हे तर ती पुढेही ज्याची नुसती अटकळही करता येत नाही इतका वेळ टिकणार आहे, ह्यावरून तिची चिरकालिक आवश्यकता आहे, हे उघड आहे, आणि पूर्णतेच्या काळाबद्दल हल्ली आम्हांला जी स्वप्ने पडत आहेत, की त्या काळी पूर्ण स्वतंत्र, नीतिमान आणि कर्तृत्ववान होऊन हल्लीच्या सारख्या कृत्रिम राजबंधनाची आवश्यकता राहणार नाही, सगळे सारखेच ज्ञानवान आणि हिंमतवान पवित्र झाल्याने कोणाचे ठायी दुस-याला अपाय करण्याची मुळी इच्छाच संभवणार नाही – मग एकापासून दुस-याचे संरक्षण करण्याची किंवा दोघांमध्ये मध्यस्थी करण्याची गोष्टच राहीली – ती स्वप्ने पडण्याइतकी आमची उन्नती होण्यास देखील ही मध्यंतरीची चिरायुषी राज्यसंस्थाच कारण होय. म्हणून आमची तिच्याविषयीची पूज्यबुद्धी आणि कृतज्ञताबुद्धी असली पाहिजे, आणि अशा महोत्सवाचे वेळी ती भावना उचंबळून आली पाहिजे. 

राज्यसंस्थेविषयी हा सामान्य विचार झाला, परंतु ज्या विशिष्ट राज्यसंस्थेशी आमचा संबंध जडला आहे तिच्यासंबंधीही आमची पूज्यबुद्धीच असली पाहिजे. हा जो आमचा पाश्चात्यांशी योगायोग घडला आहे तो दोन-तीन पिढ्यांमागे आमच्या पूर्वजांना अगदी एक मंगल दैवी कृत्यच वाटत होता. ह्या दोन-तीन पिढ्यांमध्ये आमच्या पूर्वजांपेक्षा आम्हांला बरेच निराळे अनुभव आले आहेत. त्यांना जे केवळ मनोवृत्तीच्या झटक्यासरशी आणि कल्पनेच्या तरंगामुळे वाटले ते आम्हांला तशाच्या तसेच वाटणे साहजिक नाही. तथापि सूक्ष्म विचार करून पहातानाही ह्या घडून आलेल्या योगायोगाची शुभता आणि महत्त्व ही आमच्या वडिलांपेक्षा आम्हांला मुळीच कमी दिसून येत नाही. आमच्या वडिलांमध्ये व आम्हांमध्ये जर कोणता फरक असेल तर तो हाच की, आमचे व्यक्तिविषयक आणि राष्ट्रीय गुण आणि दोष कसाला लागण्याचा त्याच्यावर प्रसंग आला नाही म्हणून त्यांना ह्या योजनेची शुभता फार मोहक वाटली आणि आम्हांला तर असे प्रसंग आज पावलोपावली येत असल्यामुळे साहजिकपणे ही शुभता तितकी मोहक वाटत नाही. पण ह्यावरून प्रकृत योगायोग मुळी शुभच नाही, असे म्हणणे हे केवळ अधार्मिक वृत्तीचे द्योतक होय. ज्याची धर्मबुद्धी जागी आणि उजळ आहे त्याला ही योजना त्याच्या आजा-पणजाइतकी मोहक जरी वाटली नाही तरी त्यांच्याइतकी शुभ खात्रीने वाटेल आणि ह्या योजनेची शोभनता उजागरीला येण्याला त्याला स्वतःचीच नैतिक तयारी अधिक नेटाने करण्याचा उत्साह येईल.

इंग्लंडच्या इतिहासाकडे पाहिले तर तो एक मानवी इतिहासाचा सुंदर भाग आहे आणि त्यात जरी काही काही दोष आढळून आले तरी त्या दोषांतही काही महत्त्वाची रहस्ये आहेत असे आढळून येईल. अशा इतिहासाच्या ओघाशी आपल्या भावी राष्ट्रीय चरित्राचा मिलाफ झाला ही गोष्ट कोणाही विचारी पुरुषास अभिमान बाळगण्यासारखीच आहे. तसे न करता जो कोणी रुसून फुगून बसेल किंवा वितुष्ट वाढवील तर तो चालून आलेल्या संधीचा फायदा घेण्याला स्वतः अपात्र आहे असे होईल.

राज्यशासनावर आज जे विराजमान होणार आहेत त्या भाग्यवान पाचव्या जॉर्ज बादशहाशी आम्ही व्यक्तिशः स्नेहसंबंध आणइ आदरबुद्धी राखली पाहिजे. त्याच्या अवाढव्य राज्यछत्राखआली जी असंख्य प्रजा आहे त्यातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाची फेड करणे त्याला जरी शक्य नाही, तथापि ह्या प्रत्येक व्यक्तीने त्याजवर आपल्या अंतःकरणाचे द्वारा प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करणे शक्य आहे. त्याच्या शिरावर आज जो मुकुट ठेवण्यात येत आहे, त्याच्या जबाबदारीचे ओझे त्याच्या एकट्यावरच नसून असंख्य प्रजाजनांवर आहे, ही जी सुधारलेल्या प्रजेला शोभणारी भावना तिचा पाया वरील व्यक्तिगत प्रेमामध्ये बळकट रोवलेला आहे. म्हणून विश्वनियंत्या परमेश्वराजवळ आम्ही सर्वांनी ह्या चक्रवर्तीचे आयुष्य, बळ आणि संपत्ती वृद्धिंगत होवो अशी मनोभावे प्रार्थना केली पाहिजे.

  1. राजा राममोहन व बुवाबाजी
  2. राजा राममोहन रॉय
  3. राजशासन
  4. राजशासन
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
Page 11 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी