1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो कां ?

(सु. प. ०८-०४-१९०६)

ह्या विषयावर ‘स्पष्टवक्त्या’नें उपस्थित केलेल्या वादासंबंधी माझे मत आपण विचारून बरेच दिवस झाले. आज प्रसिद्धपणे ह्या विषयावर अशी वाच्यता करण्याची मला स्वतःला मोठीशी आवश्यकता दिसत नाही. तथापि तुमचा इतका सद्हेतुपूर्वक आग्रह आहे, ह्यामुळे फायदा होईल असे इतर काही मंडळीलाही वाटत आहे, आणि ह्यात फायदा नाही तरी तोटाही नाही असे स्वतः मलाही वाटत असल्यामुळे खालील चार ओळी आपल्याकडे पाठविल्या आहेत.

(१) समाज अप्रिय असल्यास तो का ? हा विषय घेऊन त्याचा खल करीत बसण्यापेक्षा समाजाची प्रगती होत नसल्यास ती का ? ह्या विषयाचा खल होणे अधिक योग्य व इष्ट होते असे मला वाटते. तथापि प्रस्तुतच्या वादात पहिल्या नावाखाली दुस-या विषयाचा बराचसा भाग येऊन गेला आहे. एकाद्या संस्थेची लोकप्रियता व तीची प्रगती ह्यांचा वस्तुतः अगदी आवश्यक कार्यकारणसंबंध असतोच असे नाही. ख्रिस्ती समाजाची गेल्या शतकात ह्या देशात आम्ही ह्या गोष्टीकडे किती जरी डोळेझाक केली तरी—पुष्कळ प्रगती निदान प्रसार तरी झाला आहे. ह्यावरून त्याची लोकप्रियता वाढली म्हणून प्रसार झाला असे मुळीच नाही. उलटपक्षी, राजकीय सुधारणा व काही अंशी सामाजिक सुधारणा इत्यादी गोष्टींची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे पण त्या मानाने त्यांची प्रगती होते असेही म्हणवत नाही. तिस-या पक्षी आर्यसमाज पूर्वीप्रमाणेच आताही अप्रिय आहे पण त्याची वाढ पुष्कळ झाली आहे. चवथ्या पक्षी केवळ लोकप्रियतेच्याच जोरावर भराभर वाढलेल्या पण दुसरे काही सत्त्व नसल्यामुळे आता हटत चाललेल्या ब-याच चळवळींचा उल्लेख करिता येईल. असो. एकंदरीत प्रियता व प्रगती ह्यांचे काही म्हणण्यासारखे साहचर्य नाही. म्हणून प्रगतीची बाजू अगदी एकीकडे ठेवून केवळ प्रिय व अप्रियतेचाच येथे मला विचार विषयाच्या नावामुळे नाईलाजाने करावा लागत आहे.

(२) अप्रिय ह्या शब्दाने दोन अर्थ मनात येतात, एक समाजाचा लोक अगदी द्वेष करितात असा आणि दुसरा, समाज लोकांना प्रिय नाही असा. म्हणजे लोकांची समाजाकडे ओढ नाही असा. आणि दुसरा समाज लोकांना प्रिय नाही असा. पहिल्या अर्थान्वये समाज अप्रिय आहे असे माझ्या जरी अल्प अनुभवावरून दिसत नाही तरी काही अप्रबुद्ध विद्यार्थी व अशिक्षित माणसे प्रसंगविशेषी समाजाचा—त्यातील काही व्यक्तींविषयी तिटकारा दाखवीत असतील. मागे आरंभी समाजाचा द्वेष लोकांनी केला असेल, पण हल्ली केवळ द्वेषाचा प्रकार क्वचितच आढळतो. दुस-या अर्थाने समाज अप्रिय आहे व हे साहजिकच आहे.

(३) आता ह्या अप्रियतेच्या कारणासंबंधी ज्या कोट्या नेहमी लढविण्यात येत आहेत त्या मला स्वतःला अगदी व्यर्थ दिसत आहेत. त्यांत दोन मुख्य आहेत, त्या ह्या. समाजाचे विचारविधी, अध्ययन, अध्यापन, उपदेशाचे वेळी घेतलेले वेचे ह्यांमध्ये देखील परावलंबीपणा व परकीयानुकरण आहे म्हणून समाजाकडे लोकांचे मन घेत नाही. ही कोटी दोन्ही बाजूंनी बरोबर नाही. एक तर वस्तुस्थिती अशी आहे की, समाजातील स्वकीय आणि परकीय विचारांच्या विधींची आणि वेच्यांची जर खरोखर गणती केली तर पहिली बेरीज दुसरीपेक्षा कितीतरी मोठी होईल ! इतकी की समाजाने जरी सार्वत्रिक धर्म स्वीकारला आहे तरी व सर्व साधू व सर्व धर्मपंथ समाजाला सारखेच मान्य असावयाला पाहिजेत तरी, संवय, परिस्थिती, शिक्षण, आनुवंशिक संस्कार इ. च्या जोराने समाज ह्या बाह्य गोष्टीत अद्यापि केवळ हिंदूच आहे असे म्हणावे लागेल. म्हणजे ब्राह्मधर्म जरी सनातन व सार्वत्रिक आहे तरी हिदुस्थानातील ब्राह्म लोक अथवा इंग्लंडातील युनिटेरियन लोक ह्यांच्या सामाजिक पद्धती व गृहकर्मे ही तद्देशीयच आहेत व तसे नसणे शक्यही नाही. इंग्रजी वाङ्मयाची व शिक्षणपद्धतीची छाप सर्व हिंदुराष्ट्रावरच बसून गेल्यामुळे इतर बाबतींप्रमाणे समाजरचनेतही एक दुस-याचे अवलंबन कदाचित जास्त करीत असेल. तथापि दोन्ही देशांतील उदार धर्माचे समाजात अद्यापि पुष्कळच एकदेशीयता आहे. नुकताच युनिटेरियन लोकांच्या इनक्वायरर पत्रात, उपासनेच्या वेळी जे पीठावरून पवित्र ग्रंथांतील उतारे वाचावयाचे ते बायबलातूनच घ्यावेत की दुस-या कोणत्याही प्रासादिक ग्रंथातून घ्यावेत अशाविषयी पुष्कळ पत्रव्यवहार होऊन शेवटी बहुमताचा कल हल्लीची एकदेशीयता सोडली पाहिजे असे जोराने प्रतिपादण्याकडेच होता. दुस-या बाजूने ह्या कोटीचा पोकळपणा असा दिसून येतो की समाजात जे वेचे घेण्यात येतात किंवा विवेचन करण्यात येते त्यांत समाज स्वकीयांचे अनुकरण करीत आहे की परकीयांचे ही काही ऐकणा-यांनी शोधून पहाण्याची मुख्य गोष्ट नव्हे. तर समाज केवळ नक्कल करीत आहे की मनोभावाने म्हणा किंवा प्रसंगवशात प्रेरित झाला आहे ही आहे. केवळ नक्कलच असल्यास ती स्वकीय काय परकीय काय, जुनी काय नवी काय, सारखीच अप्रीतीला कारण झाली पाहिजे. पण उलट जर ख-याखोट्याचा विचार न करिता केवळ स्वकीय परकीयावरच प्रीती अप्रीतीचे तरंग उठू लागले तर तो दोष वस्तुस्थितीचा नसून लोकदृष्टीचा म्हणावा लागेल, किंबहुना स्पष्टवक्त्यांच्या कोटीचाही म्हटल्यास चालेल. ह्या प्रकारचा समाजावर जो अनुकरणाचा आक्षेप आहे तो वस्तुतः व विचारतः दोन्ही दृष्टीने माझ्या अल्पमतीला बरोबर पटत नाही.

(४) दुसरा आक्षेप समाज मतांप्रमाणे कृती करीत नाही. म्हणून अप्रिय झाला आहे. ह्या बाबतीत मी समाजाची मुळीच तरफदारी करीत नाही व कोणी सभासदाने कधी केली आहे असे मला आठवत नाही. उलट मताबरोबर कृती न ठेवल्यास समाजाची प्रगती कधीच न होता कृतीविना उगाच मतांचाच गोंधळ माजविल्यास समाज नष्ट होईल हे तो जाणून आहे, व ह्या बाबतीत कोणी कितीही फुकाचे स्पष्ट भाषण करून काही अधिक मिळेल असे होणार नाही. पण मताप्रमाणे कृती अधिक केल्याने समाज लोकांत अधिक प्रिय होईल ही आशा मात्र मला व्यर्थ दिसते. वरच्याप्रमाणेच ही कोटी देखील मला विचारतः व वस्तुतः निराधार दिसते. चोरी करणे हे वाईट असे लोकांचे खरोखर मत आहे. मी उद्या चोरी करणे चांगले असे प्रतिपादू लागलो तर अप्रिय होईन आणि परवा जर खरोखरीच चोरी केली तर मी प्रिय होईन काय ? बरे जातिभेद मोडणे व चोरी करणे ह्या दोन गोष्टींत लोकमतांच्या दृष्टीने सादृश्य नाही असे म्हटले, कारण जातिभेद मोडणे चांगले एवढे म्हटल्याने कोण अप्रिय होत नाही, मात्र प्रत्यक्ष मोडू लागल्याने होतो तर तेथेही वरची कोटी कशी लागते ? ज्या लोकांना आमची मतेच अप्रिय आहेत त्यांना आम्ही कृतीने कसे प्रिय होणार ? त्यांची मतांसंबंधी अप्रीती खरी असेल तर आम्ही कृती करू लागल्यावर तर ते आमचा अगदी द्वेष करू लागतील. लोकांची अप्रिती जर खरी अंतःकरणापासून नसली, वरवर दाखविण्यातच असली तरीदेखील आम्ही कृतीने कसे जास्ती प्रिय होऊ ? ज्यांच्यात मतांबद्दल प्रीती दाखविण्याइतके धैर्य नाही किंवा सरळपणा नाही त्यांची कृती पाहून काय वाट होणार ? काय झाली त्याचा थोडासा अलीकडे अनुभवही आहे. आता जे लोक भित्रे आहेत पण सरळपणे आपला भित्रेपणा मनात किंवा जनात कबूल करतात अशांना समाज मुळी अप्रिय नाहीच. ज्या अंशाने समाजाची कृती त्या अंशाने हे समाजाचे अभिनंदन करतात व जेथे कृती होत नाही तेथे अनुकंपा दाखवितात. असो. एकंदरीत ह्या बाबतीत लोकप्रीतीचा हिशेब करीत बसणे अप्रयोजक आहे. आता वस्तुतः ही ह्या कोटीची निराधारता आहे ती अशी. प्रार्थनासमाजापेक्षा ब्राह्मसमाजात कृती अधिक आहे व अशी प्रसिद्धीही आहे म्हणून ब्राह्मसमाज बंगाल्यात अधिक प्रिय आहे काय ? उलट तो तिकडे किती अधिक द्वेषाला मात्र पात्र झाला आहे हे तिकडे त्यांची जी अप्रबुद्ध माणसांकडून नालस्ती करण्यात येते त्यावरून दिसते, व चांगल्या प्रबुद्ध माणसांचाही त्याच्यावर असा आक्षेप येतो की समाज कृती करून एकलकोंडा झाला हे फार वाईट झाले. तुकाराम म्हणतात, “लोक जैसा ओक धरिता धरवेना” हे खरे आहे. ह्यावरून समाजाने कृती करण्यात हेळसांड करावी असे माझे मुळीच म्हणणे नाही. कृतीवरच सर्व प्रगती अवलंबून आहे असे वर म्हटले आहेच. जसजशी कृती व सत्प्रयत्न जास्त करू तसतशी सभासदांची व हितचिंतकांची संख्या वाढेल म्हणजे समाज मोठा होईल किंवा प्रगती होईल की जशी आर्यसमाजाची होत आहे. पण ह्या पलीकडे बहुजनसमाजात तो कधी प्रिय होईल असा तूर्त संभव दिसत नाही.

(५) मग ह्या अप्रियतेचे कारण काय असावे बरे ? ह्यात काय मोठेसे गूढ आहे असेही नाही. ह्याची चर्चाही नको होती. आरंभीचा नेणतेपणामुळे जो द्वेष होता तो बहुतेक नाहीसा झाला आहे. मागे उरलेली पंगू अप्रियता अशी रहाणारच. तिचे कारण मानवी स्वभावाचा स्वयंभू सुस्तपणा हेच होय. समाज जसजसा आपली स्वतः सुस्ती टाकून प्रयत्न करील तसतसा तो स्वतः मोठा होईल, पण दिवा किती मोठा केला किंवा लहान केला तरी त्याने प्रकाशित केलेल्या प्रदेशापलीकडे जसे नैसर्गिक अंधःकाराचे अपार वलय रहाणारच. तसे ह्या समाजाभोवती ह्या प्राकृत अप्रियतेचे वलयही रहाणारच. आणि जेव्हा ह्या समाजाचाच जीवनाग्नी विझून जाऊन मागे, जसे उत्तरेस शीख समाजाचे व दक्षिणेस लिंगायत समाजाचे केवळ जड शरीर मात्र उरले आहे तसे ह्याचेही उरेल, तेव्हा तद्वतच हाही प्रिय आहे की अप्रिय आहे व तो का ? इ. सर्व वाद मिटून जाईल. बरे उलटपक्षी ह्याचा भडका हिंदुस्थानवर होऊन ईश्वरी योजनेने ह्याच्या जीवनज्वाला जरी चारी खंडांत पसरू लागल्या तरी म्हणजे हे अप्रियतेचे वलय नाहीसे होईल थोडेच. ख्रिस्ती समाजाचे उदाहरण आपल्यापुढे आहे व तो इतका जरी पसरला आहे तरी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या भोवतालच्या प्रदेशात तो अप्रिय असणारच व आहेही. तोच बुद्धधर्म बिचारा थंड झाला आहे, त्याचे कोणीही वाटेस जात नाही.

(६) ह्यावरून लोकप्रीतीचा मी वाजवीपेक्षा अधिक अनादर करतो असे नाही. उलट प्रत्येक व्यक्तीने आपल्या तत्त्वास व कर्तव्यास बाध न येईल अशा रीतीने शक्य तेवढी लोकप्रीती अवश्य संपादन करावी व हे ज्यांना साधते ते धन्य होत असे मला वाटते आणि ते न साधल्यामुळे ते उगाच लोकप्रीतीचा अनादर करतात किंवा अशा विरळा धन्य पुरुषाला नावे ठेवितात त्याचे करणे कोल्ह्याने द्राक्षे आंबट ठरविण्याप्रमाणेच होय हेही मी कबूल करतो. पण ही सर्व व्यक्तीची गोष्ट झाली. समाजाला, विशेषेकरून धार्मिक समाजाला असे प्रिय होणे शक्य नाही. एकादा गायनसमाज प्रिय होईल. एकादी साहित्यपरिषद प्रिय होईल. पण धार्मिक समाज प्रिय होणार नाही. कारण झाला तर तेवढा प्रीतीचा प्रदेश—ती प्रीती खरी असेल तर—त्या समाजात समाविष्ट होतो व त्याच्या भोवतालचे वलय पूर्वीपेक्षा अधिकच मोठे होते एवढेच मला म्हणावयाचे.

शेवटी माझ्या समाजबंधूंनी आपल्या अंतर्याम-देवतेने प्रकाशित केलेली पायवाट धीराधीराने क्रमीत पुढे जावे, भोवतालच्या तमोवलयाकडे पाहून उगाच वेळोवेळी आपले व आपल्या सोबत्याचे पाय गाळू नयेत किंवा ह्या रात्रीच्या विस्तीर्ण आकाशातील दूरदूरच्या मोहक ता-यांची गणना करण्यात किंवा तद्विषयक वाद माजविण्यात आपला अमोल वेळ दवडू नये ही एक विनवणी आहे.

प्रस्तावना.

एके रविवारीं सायंकाळीं मुंबई येथील प्रार्थनामंदिरामध्यें रा. रा. शिंदे यांच्या प्रेमळ प्रार्थनेचा जो माझ्या मनावर परिणाम झाला, तो मी कधींही विसरणार नाहीं. प्रार्थना ऐकत असतांना एक दोन क्षणच कां होईना, माझ्या अंतःकरणाचें परिवर्तन झालें; व मी ईश्वराच्या समागमांत आहें, प्रत्यक्ष मला त्या परमात्म्याचा साक्षात्कार प्रथम झाला असें वाटलें. तेव्हांपासून रा. शिंदे यांच्याविषयीं माझ्या मनांत जी पूज्यबुद्धि उत्पन्न झाली आहे, ती उत्तरोत्तर वाढतच आहे. ती प्रेमळ प्रार्थना ऐकल्यापासून रा. शिंदे यांचें होतां होई तों प्रत्येक व्याख्यान कसें बसें टिपून घेऊन किंवा त्यांचे घरीं जाऊन त्यांच्याकडून मजकूर सांगवून घेऊन, तें वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करावयाचें अशी मीं माझ्याशीं गांठ बांधून ठेविली; व त्याप्रमाणें प्रथम जगदवृत्त पत्रांत व नंतर ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, सुबोधपत्रिका या पत्रांत मी तीं प्रसिद्ध करूं लागलों. त्यांचीं व्याख्यानें ज्ञानप्रकाशांत प्रसिद्ध होत असतां त्याच वेळीं प्रार्थनामंदिरांतील दुस-या विद्वान गृहस्थांचेही सुंदर उपदेश प्रसिद्ध होऊं लागले; तेव्हां ते सर्व एकत्र करून पुस्तकरूपानें छापवावे असें मला वाटलें. पण मी अननुभवी म्हणून तें काम माझ्यानें झेंपणार नाहीं म्हणून माझे अनुभवी मित्र, सुबोधपत्रिकेचे संपादक रा. रा. व्दारकानाथ गोविंद वैद्य यांच्या पोक्त सल्यानें आम्ही दरवर्षीं ‘धर्मपर व्याख्यानें’ या नांवानें एक पुस्तक प्रसिद्ध करूं लागलों. आतांपर्यंत अशीं तीन पुस्तकें प्रसिद्ध झालीं आहेत;  व चवथ्याचें काम सुरू आहे. या चारी पुस्तकांतील रा. शिंद्यांचीं व्याख्यानें व त्यांचे उपदेश प्रस्तुत पुस्तकांत घेतले आहेत;  मात्र ‘ बहाई समाजाचा संदेश’  हें व्याख्यान घेतलें नाहीं; तें, ‘धर्मपर व्याख्यानें’ पुस्तक पहिलें यामध्यें आहे.

एकदां माझ्या एका मित्राशीं बोलत असतां ते सहज म्हणाले ‘रा. शिंदे हे इंग्लंडमधून सुबोधपत्रिकेंत जीं पत्रें लिहीत तीं उत्तम असून मला फार आवडत.’ तेव्हांपासून मी तीं पत्रें वाचावयास मिळावींत म्हणून खटपट करूं लागलों. रा. रा. वैद्य यांचेकडे गेलों व समाजांतील पत्रिकेच्या जुन्या फाइली वाचण्याची परवानगी मागितली  व  ती त्यांनीं ताबडतोब मोठ्या आनंदानें दिली. दोन वर्षांचीं तीं पत्रें वाचून माझ्या मनांत आलें कीं, हीं पत्रें कोणीं छापून काढल्यास त्यांपासून परदेशीं जाऊं इच्छिणा-या नवख्या मनुष्यास समुद्रावरील प्रवासाविषयीं व युरोप आणि फ्रान्स या देशांतील निदान कांहीं महत्त्वाच्या गोष्टींविषयीं तरी उपयुक्त माहिती होईल. पुढें मी कोल्हापूर येथील ब्राह्मसमाजाच्या वार्षिकोत्सवाकरितां तेथें गेलों असतां, तेथें ज्याचा स्वतःचा छापखाना आहे, अशा माझ्या एका मित्राजवळ ही गोष्ट काढली;  व त्यानें रा. शिंदे यांचे सर्व लेख व व्याख्यानें स्वतःच्या खर्चानें छापून प्रसिद्ध करण्याचें कबूल केलें. कोल्हापुराहून आल्याबरोबर मी त्या कामास लागलों व रा. वैद्य यांच्या परवानगीनें जुने अंक शोधून काढून व जे सांपडले नाहींत ते समाजांतील फायलीवरून उतरून घेऊन प्रथमच्या दोन फार्मांचा मजकूर कोल्हापुरास पाठविला; पण माझ्या मित्राकडून बोलल्याप्रमाणें तें काम झालें नाहीं. ही निराशा झाली खरी, पण त्यामुळें मनांतला निश्चय म्हणून ढळला नाहीं. पुढें शेठ दामोदर सांवळाराम यंदे यांची रा. रा. लक्ष्मणराव नायक बी. ए. यांच्यासह दोन तीन वेळां गांठ घेऊन हा योग जुळून आला आहे.
सोईकरितां या पुस्तकाचे तीन भाग केले आहेत. पहिला भाग लेख. यामध्यें रा. शिंदे यांनीं इंग्लंडमधून पाठविलेल्या पत्रांचा व हिंदुस्थानामध्यें लिहिलेल्या लेखांचा समावेश केलेला आहे. अशा प्रकारचे एकंदर ३० लेख या भागांत घेतले आहेत. पैकीं मुरळी हा लेख मूळ इंग्रजींत आहे त्याचें भाषांतर केलें आहे. कौटुंबिक अथवा सार्वजनिक उपासनेच्या वेळीं जें प्रवचन रा. शिंद्यांनीं केलें, त्या सर्व प्रवचनांचा समावेश तिस-या भागात केला आहे. त्यांशिवाय त्यांनीं जीं वेळोवेळीं भाषणें केलीं त्यांचा समावेश ‘व्याख्यानें’ या नांवानें दुस-या भागांत केला आहे. दुस-या भागांत १६ व्याख्यानें व तिस-या भागांत ३७ उपदेश आहेत.

लेख, व्याख्यानें व उपदेश मिळून ह्या पुस्तकांत ८३ विषय आले आहेत. या विषयांपैकीं चार पांच विषयांची भाषा रा. शिंदे यांच्या इतर विषयांची भाषासरणी आणी शैली यांच्याशीं जमत नाहीं, कारण ती भाषा त्यांच्या वाणींतून किंवा लेखणींतून उतरली नाहीं. तर त्यांच्या मराठी भाषणाचे उतारे कोणी तरी स्वतःच्या भाषेंत वर्तमानपत्रांत छापलेले, तसेंच येथें घेतल्यामुळें हा भाषेचा किंचित् विजोड दिसून येण्यासारखा आहे.

सर्व विषय मला रा. शिंदे यांना वाचून दाखवितां आले नाहींत, तेव्हां त्यांमध्यें चुकाराहण्याचा संभव आहे, त्याबद्दल मी जबाबदार आहें. तसेंच कांहीं मराठी लेख घाईमुळें व पुस्तक विस्तारास्तव या पुस्तकामध्यें घालतां आले नाहींत, व इंग्रजीमध्यें त्यांचीं जीं पुस्तकें छापून तयार आहेत त्यांचेंही मराठी भाषांतर करणें झालें नाहीं, त्याबद्दल मला फार दिलगिरी वाटते. सध्यां माझ्या स्मृतीमध्यें जे त्यांचे दुसरे मराठी व इंग्रजी लेख आहेत, त्यांचीं नांवें खालीलप्रमाणें :-- (१) धर्मविकासाच्या तीन स्थिति. (२) सामाजिक उपासना-राष्ट्राची एक मोठी गरज. (३) लोकशिक्षण. (४) बहाई समाजाचा संदेश. (५) नीच मानलेल्या जातींच्या कर्तव्याची दिशा. (६) नि. सा. मंडळीच्या महाराष्ट्र परिषदेंतील प्रास्ताविक भाषण. (७) साधनाश्रमाचा पाया. (8) The Brahma Samaj and The Prophets of the world. (9) Elevation of the Depressed classes. (10) Mission for the Depressed classes. (11) The untouchable India.  सुदैवानें दुसरी आवृत्ति काढण्याचा प्रसंग आल्यास त्यांत यांचा समावेश होईल.

ह्या संग्रहास जोडलेलें चरित्र रा. शिंदे ह्यांच्या व माझ्या एका मित्रानें, मीं त्यांस पुरविलेल्या माहितीवरून लिहिलें आहे. रा. शिंदे ह्यांचें विस्तृत चरित्र देण्याचें हें स्थळ नव्हे व हा काळही नव्हे, म्हणून तें त्रोटकच दिलें आहे.

शेवटीं माझें मित्र रा. रा. व्दारकानाथ गोविंद वैद्य यांनीं मोठ्या आनंदानें पत्रिकेच्या फायली मला वाचावयास दिल्या, वेळोवेळीं या पुस्तकाबद्दल ज्या महत्त्वाच्या सूचना केल्या व पत्रिकेंतील व्याख्यानें व लेख ह्या संग्रहांत दाखल करण्यास जी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे रा. रा. लक्ष्मणराव नायक बी. ए. यांनीं हें पुस्तक छापून देण्यास शेठ दामोदर सांवळाराम यंदे यांना माझ्या तर्फे विनंति केली व दुसरीही पुष्कळ मदत केली त्याबद्दल त्यांचे, शेठ यंदे यांनीं हें पुस्तक छापून प्रसिद्ध केलें त्याबद्दल त्यांचे व रा. रा. नारायण शंभू वराडकर  यांनीं  प्रूफें तपासण्यास मला मदत केली म्हणून त्यांचे, मी अत्यंत आभार मानितों.

शेवटीं ज्या प्रेममय परमात्म्यानें आपल्या प्रसादानें व आशीर्वादानें माझ्या अंतःकरणामध्यें हें काम हातीं घेण्यास प्रेरणा केली, व तें मजकडून कसेंबसें शेवटास नेवविलें, त्याबद्दल  त्या  जगच्चालक परमेश्वराचे उपकार मानून व अनन्य भावानें शरण जाऊन ही प्रस्तावना पुरी करितों.

 

पॅरिस शहर.

समता-स्वतंत्रता-बंधुतेचा झेंडा मिरविणारी, सौंदर्याची जी खाण त्या पॅरीसपुरींत आम्ही सकाळचे १० वाजतां उतरलों.  पॅरीस शहर पॅरिस शहराप्रमाणेंच आहे - ह्यापेक्षां ज्यास्त कांहीं वर्णन करवत नाहीं.  पुष्कळ लोकांनीं ह्याचें वर्णन केलें असल्यामुळें, येथें त्याचें वर्णन करण्याचें विशेष प्रयोजन नाहीं.  शिवाय जेवण वगैरे आटपून आम्ही गाडींत बसून बाहेर पडलों, तोंच आम्हांस पावसानें गांठलें.  आम्ही मुख्य रस्त्यानें प्रदर्शनाकरितां मुद्दाम बांधलेले मोठेमोठे सुंदर महाल पाहत प्रथम 'पॅलेसडी न्याशनल इन्व्हालिड्' म्हणजे जेथें प्रसिद्ध ऐतिहासिक राजपुरुषांचीं थडगीं आहेत, अशा राजवाड्यांत गेलों.  वीरमणि नेपोलियनाचें येथें भव्य कबरस्थान आहे.  हौदासारखी सुमारें २० फूट व्यासाची वर्तुलाकार जागा जमिनींत सुमारें २० फूट खोल सुरेख बांधून काढिली आहे.  ह्या हौदाच्या मध्यभागीं नेपोलियनाचें भव्य थडगें आहे.  त्याचा रंग दाट काळसर तपकिरी आहे.  हौदाच्या छातीइतक्या उंच कठड्यावरून खालीं डोकावून त्याकडे पाहावें लागतें.  हा दिवस आदित्यवारचा असल्यामुळें, येथें हजारों लोकांची गर्दी जमली होती.  हें ठिकाण गंभीर असल्यामुळें इतकी गर्दी असूनही चहूंकडे शांत होतें; त्यामुळें देखावा अधिकच गंभीर दिसला !  थडग्याभोंवतीं भिंतीच्या कोनाड्यांतून ७।८ पुतळे उभे आहेत.  तशींच सभोंवतीं निशाणें, भाले व कांहीं हत्यारें ठेविलीं आहेत आणि त्यानें जिंकलेल्या मुख्य मुख्य लढायांचा भोंवतालीं उल्लेख केला आहे.  पण शेवटीं ह्या जग जिंकू पाहणार्‍या जेत्यास काळानें चीत करून आपल्या सर्वभक्षकतेचें स्मारक येथें त्याच्या थडग्याच्या रूपानें स्थापित केलें आहे.

दि बिग् व्हील - ह्यानंतर आम्ही 'राक्षसी चक्र' पहावयास गेलों.  आपल्याकडे जत्रेच्या ठिकाणीं जसे उंच पाळणे उभारून त्यांत लोकांस बसवून हालवितात, त्याच नमुन्याचें पण अत्यंत प्रचंड हें वरील चक्र आहे.  ह्याचा व्यास २००।२५० फूट असावा.  सुमारें १०० फूट उंचीच्या दोन्हीकडच्या दोन दोन तिर्कस खांबांवर ह्या राक्षसी चक्राचा राक्षसी कणा ठेविला आहे.  ह्या चक्राच्या परिघांत सुमारें २० मोठ्या लांकडी पेट्या अथवा खोल्या बसविल्या आहेत.  प्रत्येक खोली १५ हात लांब, ५ हात रुंद आणि ५ हात उंच आहे.  एका खोलींत २० माणसें बसतील इतकी जागा असते.  आंत एक टेबल व दोन खुर्च्या ठेविलेल्या असतात.  हें चक्र पांच पांच मिनिटांनीं एकदां थांबतें.  तेव्हां खोलींत बसलेलीं माणसें बाहेर येतात व नवीं आंत जातात.  एका फेरीस एका माणसास एक फ्रँक म्हणजे सुमारें १० आणे पडतात.  खोलीच्या बाजू तावदानाच्या असल्यामुळें चहूंकडचा पारीस शहराचा देखावा दिसतो आणि जेव्हां चक्राच्या वरच्या टोंकावर जातों तेव्हां आम्ही आकाशांत
२००-२५० फूट उंच असतों.  ज्या सळ्यांवर ह्या खोल्या अडकविल्या असतात, त्या फार जाड नसल्यामुळें केव्हांच मोडतील कीं काय अशी विनाकारण भीति वाटत असते.  हें चक्र जेव्हां प्रथम सुरू केलें तेवहां ह्यास हालविणार्‍या यंत्राचा कांहीं भाग बिघडला होता, तो दुरुस्त करून चक्र पुन्हां चालू करण्यास १२ तास लागले, तोंपर्यंत २०० फुटांवरच्या खोलींत बसलेल्या माणसांची काय भयंकर अवस्था झाली असेल ह्याची कल्पना हें चक्र प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय सहज होण्यासारखी नाहीं.

नंतर आम्ही एफे नांवाचा प्रसिद्ध मनोरा पहावयास गेलों.  हा ७००-८०० फूट उंच असावा असें म्हणतात.  वरील चक्रापेक्षांही हें काम अचाट आहे.  हा सर्व मनोरा लोखंडाचा आहे.  दर माणसीं दोन फ्रँक दिल्यास खोलीसकट मनोर्‍याच्या शिखरावर उचलून नेतात.  वरून खालीं पाहण्याची देखील छाती होत नाहीं.  आम्ही अर्धा मनोरा चढून गेल्यावर पाऊस सोसाट्यानें पडूं लागला व वारा सोसाट्याचा सुटला म्हणून वर जाण्याचा नाद सोडून खालीं उतरलों.  हें असलें अचाट कृत्य इतका खर्च करून केलें असून तें कायम ठेवावें कीं पाडावें ह्याविषयीं म्युनिसिपालिटी वाद करीत आहे.  हा मनोरा १८८९ च्या प्रदर्शनासाठीं बांधला.  हा पाडावा असें म्हणणार्‍यांचा एक मुद्दा असा आहे कीं, मनोरा बेढब झाला आहे !  कमाल आहे फ्रेंच सौंदर्याची !!  नुकत्याच झालेल्या प्रदर्शनासाठीं बांधलेल्या भव्य व सुंदर इमारती पाडण्याचें काम चाललें आहे.

९॥ वाजतां पारीसहून निघून रात्रीं १ वाजतां कॅले येथें पोंचलों.  इंग्लिशचॅनेल ओलांडण्यास १ तास लागला.  येथें समुद्र नेहमीं खवळलेला असतो.  आमच्या बरोबरच्या बहुतेकांस वांत्या झाल्या, मलाही फार मळमळलें.  ता. ७ रोजीं सकाळीं ७ वाजतां लंडन येथें पोंहोंचलों.  तेथें ३ दिवस राहून ता. १० संध्याकाळी सुखरूप ऑक्सफर्ड येथें पोहोंचलों, येथें माझा प्रवास संपला.  तो सुखाचा झाला, ह्याबद्दल परमेश्वराचा मी फार आभारी आहें.

पृथ्वीच्या पोटांत ४४० यार्डांखालीं

ऑक्सफर्ड
(सुबोधपत्रिका, ता. १८-०१-१९०३)

मुलांनो, दगडी कोळसा तुम्हांला पाहून, निदान ऐकून तरी माहीत असेलच. लोखंड आणि दगडी कोळसा म्हणजे इंग्रज लोकांचे हाड आणि मांस असे म्हणण्यास काही हरकत नाही. ह्या कोळशाच्या खाणी सुदैवाने ह्या लहानशा बेटात इतक्या विपुल पसरल्या आहेत की, ह्या राष्ट्राच्या जगड्व्याळ गरजा भागूनही त्या दरवर्षी अगणित खंडी बाहेरदेशी पाठविता येतात. आफ्रिकेतील हि-यांच्या खाणी घेऊन येथील कोळशाच्या खाणी घ्या, असे कोणी म्हटल्यास हे लोक कबूल होणार नाहीत! तर अशा ह्या अमोल द्रव्याची एकादी खाण आपण पाहू चला.

आपण सध्या मँचेस्टर शहराच्या उत्तरेकडे सुमारे ५ मैलांवर आलो आहो. हे पहा एक मोठे आवार आणि त्यातील पटांगण. मधोमध सुमारे २०-२५ फूट उंचीवर एक भले मोठे चक्र उभे फिरत आहे. त्या चक्रावरून भली भक्कम लोखंडी काढणी पृथ्वीच्या पोटात गेली आहे. बरोबर त्या चक्राच्या खाली जमिनीत सुमारे १० फूट लांब, रूंद, चौकोनी आडाप्रमाणे एक खळगा आहे. एकंदरीत हा सर्व देखावा एकाद्या साधारण रहाटगाड्यासारखा दिसतो. त्याशिवाय सभोवती ह्या पटांगणात दुसरे काहीच विशेष दिसत नाही आणि मी तर तुम्हांस येथे कोळशाची एक आश्चर्यकारक खाण दाखविण्यास आणिले! मुलांनो, निराश होऊ नका. आपल्या पायाखालीच पृथ्वीच्या पोटात सुमारे पाव मैलाखाली एक ३-४ मैल लांबीची भली मातब्बर खाण पसरली आहे बरे! ती पहा, आपणांस खाली नेण्याकरिता पाताळातून एक पिंज-यासारखी खोली आडाच्या तोंडाशी आली. मी तुमच्यासाठी मॅनेजर साहेबांच्या परवानगीची वगैरे सर्व व्यवस्था केली आहे. पहा, आम्ही परकीय पाहुणे म्हणून येथील लोक एकादी गोष्ट किती आदराने दाखवितात. आमचेबरोबर सांभाळण्यास एक स्नेही व स्वत: मॅनेजरही खाली उतरत आहेत, तर तुम्हांस भिण्याचे काही कारण नाही. पण थांबा, उतरण्यापूर्वी आधी तुमचे चांगले कपडे काढून जुने कपडे चढवा. कोळशाच्या धुळीमुळे ते खराब झाले तरी हरकत नाही. तुमच्या जवळ आगकाड्या अगर दुसरा कसलाही ज्वालाग्राही पदार्थ असल्यास तो वरच ठेवा. तो खाली तुमच्याजवळ निघाल्यास खाडकन् सर्वास कैदेची शिक्षा होईल हो !

चला, तर आपण पिंज-यात जाऊ. हे पहा आता ७ वाजून १५ मिनिटे झाली आहेत. आमच्यासकट एवढा मोठा पिंजरा, एकादा धोंडा जसा पडावा, तसा एका मिनिटात खाली जाईल. पहा, आपल्यास हा वेग दु:सह होऊ लागला आहे नव्हे! पोटात कालवते, उरात धस्स होते, डोके भणभणते, आमच्यात एकादी मुलगी असती, तर तिने किंकाळीच फोडली असती, आता आम्ही तळाशी पोहोचलो देखील! घड्याळात पहा ७-१६ मिनिटावर थोडी सेकंदे झाली आहेत! तरी आम्ही नवखे असल्यामुळे, पिंज-यास तितका वेग दिला नव्हता. कानात कशा कळा येऊ लागल्या आहेत, ऐकू अगदीच कमी येते! काते समजले काय! आम्ही पृथ्वीवर होतो, त्यापेक्षा आता १३२० फूट खाली आल्याकारणाने कानातील पडद्यावर हवेचे तितके जास्त दडपण पडत आहे व एका मिनिटातच हा फरक पडल्यामुळे किंचित कळा येऊ लागल्या आहेत. लवकरच ह्या दडपणाची सवय होऊन पूर्ववत ऐकू येईल.

हे खाणीचे तोंड एकाद्या अवीट बोगद्यासारखे दिसत आहे. कामदार, मजूर, घोडी व खटारे ही सर्व सारखीच भासत आहेत. सूर्याची येथे खबरही नाही, तथापि त्यावाचून काही अडलेले नाही. चहूकडे ग्यासचे तोडे पेटले आहेत. त्या उजेडात भिंती आणि छत ह्यांचा, गुळगुळीत पांढ-या विटांनी मढविलेला अर्धगोल स्पष्ट दिसत आहे. एकंदरीत आपल्यास आज एका नव्याच सृष्टीचा शोध लागल्याचा भास होत आहे. बाजूच्या तबेल्यात जाऊन आपण मूळ खाणीकडे जाण्याची तयारी करू या. ह्या तबेल्यात हल्ली अठरा घोडे कामावरून येऊन चंदी चरत उभे आहेत. येथे अत्यंत अवश्य तितकाच प्रकाश आहे. भिंतीवर कायसे हालत आहे, ते पाहिले काय? अहो ती झुरळे! उबट हवा, अंधार, माणसांची फारशी वहिवाट नाही अशा ठिकाणी ह्या अमंगळ प्राण्यांचा सुकाळ असणारच. मुलांनो! आपल्या शरीरात आळश व मनात अज्ञान साचू दिल्यास त्यात ह्या प्राण्यांहून किती तरी जास्त अमंगळ विचारांची हेंदर वाढते बरे ! असो.

खाणीचा गर्भ येथून सुमारे २ मैल लांब आहे. येथून पुढे कोठेही तुम्हांला प्रकाशाचे एक किरण अगर आगीची एकादी ठिकगीही नजरेस पडणार नाही. कारण खाणीतील वातावरणात कोळशाचा पेट घेणारा वायू केव्हा केव्हा बराच मिसळत असल्यामुळे त्याचा यत्किंचितही अग्नीशी संयोग झाल्यास मोठा प्रळय घडेल. पण कामक-यास दिसले तर पाहिजच म्हणून प्रत्येकाजवळ एक बत्ती दिलेली असते. ती अशा सुरक्षितपणे कंदिलात बसविलेली असते की, आतील ज्योतीचा बाहेरील वायूशी संयोग होत नाही. कामदार लोकांजवळ वुल्फ लॅप नावाचा नवीन निघालेला कंदील असतो. एकादे ठिकाणी जर ग्यास बराच सुटला असला, तर ह्या कंदीलातील दिवा आपोआपच नाहीसा होतो. व त्याप्रमाणे खबरदारी राखण्यास सापडते. हा दिवा पुन: आपोआपच पेटण्याचीही त्यात व्यवस्था असते. पहा मुलांनो, पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, असली महाभूते हल्लीच्य काळी माणसांची अगदी खेळणी झाली आहेत !

आपणही प्रत्येकजण एका हातात एक कंदील व दुस-या हातात टेकण्यास आखुडशी एक काठी घेऊन निघू या. बोगदा पुढे अगदी लहान होईल. तेथे तर आपणांस अगदी ओणव्याने जावे लागेल, तेव्हा काठीचा उपयोग होईल. ह्या खाणीचे नाव ‘डो’. हिच्यातील कोळशाचा मुख्य थर आठ फूट जाड व ५६० यार्ड लांब आहे. कोळशाच्या गाड्या ओढण्याला वाटेने लोखंडी रूळ टाकले आहेत. खुणेची घंटा वाजवून पाहिजे त्या ठिकाणी वर्दी पोहोचविण्यास भिंतीवर विजेची तार आहे. समोर एक कोळशाची ट्रेन येत आहे, म्हणून आपण जपून एका बाजूस उभे राहू या. एका खटा-यावर ३ घनफुटांची एक पेटी आहे. तीत सुमारे ७ हंड्रेडवेट कोळसा भरला आहे. असे १८ खटारे एकच घोडा रूळावरून ओढीत खाणीच्या तोंडाशी जात आहे. नंतर तितकेही खटारे आपण वर प्रथम पाहिलेल्या रहाटगाडग्याने वर ओढून घेतात. प्रत्येक रात्री अशा १८ खटा-यांच्या २६ सफरी होतात. दिवसा त्याच्या दुप्पट! आणि असेच नेहमी.

चला आपण पुढे जाऊ. थोडे वर वळून पहा कोळशाचे कसे पहर सुटलेले आहेत ! ते खाली कातरून पडू नयेत म्हणून भिंतीत भक्कम तुळ्या मारलेल्या आहेत. तथापि येथे कधी कधी कोण भयंकर अपघात होत असतील! आमच्या बरोबर असलेल्या स्नेह्याने आपल्यावर आलेल्या एका अरिष्टाचे नुकतेच वर्णन केले. ते कादंबरीकाराच्या कल्पनेतही येणार नाही. असो. आता येथे एक उंच डिगर लागली आहे. घोड्याचा येथे निभाव लागत नाही म्हणून खटारे पाठविण्याची कशी करामत लढविली आहे पहा. डिगरीवरून कोळशाच्या भरलेल्या गाड्या खाली धावत जाताना जी शक्ती उत्पन्न होते तिचाच उपयोग रिकाम्या गाड्या दुस-या बाजूने डिगरीवर ओढण्यात केला जात आहे. आणि ह्या प्रकारे ह्या  ३६ गाड्यांची घडोमोड एकटाच मनुष्य एका साध्या यंत्राच्या साहाय्याने मध्ये उभा राहून चालवीत आहे !

आणखी थोडे पुढे जाऊ या. येथे जागा फार कठीण आहे. घोडा फिरण्याला जागा नाही. वाफेचे यंत्र चालविणे म्हणून त्याहून धोक्याचे. म्हणून येथे एक मनुष्य पाण्याच्या जोराने यंत्र हाकीत आहे. आपण अंग सांभाळून ह्या कचाट्यातून पुढे थेट खाणीच्या गर्भात जेथे कोळसा उकरण्याचे काम चालले आहे तिकडे जाऊ या. आपल्या बरोबर खाणीतील दगाफटक्यासंबंधी जबाबदार तपासणीदार आहे. खाणीतील सुरूंग उडविण्याचेही काम त्याचेच आहे. इतरांनी खणून तयार केल्यावर हा तो भरून उडवितो. त्याचे आधी कोठे ग्यास बाहेर पडत आहे की काय, ह्याबद्दलची आपल्या दिव्याने तपासणी करतो. एका बाराने जवळ जवळ १० टनांचा कोळसा कातरला जातो. खाणीच्या मुळाशी काही विशेष पाहण्यासारखे काम चाललेले नसते. कोळसा उकरणे व भरणे, आणि निरूपयोगी जी भुकटी राहते ती वाटेतून दुसरीकडे रचणे ही खटपट चाललेली असते. पण ह्या चरकात जे प्राणी गुंतले असतात त्यांची स्थिती मात्र पाहण्यासारखी आहे. अंगावर केवळ लाज राखण्यापुरता कपडा, नखशिखांत कोळशाच्या भुकटीचा लेप, घामाच्या सारख्या धारा चाललेल्या. त्या रेघांतून ह्यांची जी अंगकांती, दिसते तेवढ्यावरूनच हे प्राणी, वरील जगात गाडीतून हिंडणा-या लॉर्ड साहेबांचे नातलग आहेत असे ओळखावयाचे.

मुलांनो, आमचे मानवी वैभव व ऐहिक ऐश्वर्य ह्यांची जी एकंदर इमारत आहे, तिचा पाया अशा काबाडकष्टाच्या आणि धोक्याच्या खंदकात रोविला आहे बरे! त्या पायाशी आम्ही नाही तरी आमचेसाठी दुसरे कोणी तरी निरंतर राबत असतात. आम्हीही आमचेपरी जर मनाने, नीतीने आणि शरीरानेदेखील असे न राबू तर आम्ही खातो ते अन्न आणि भोगितो ती सर्व सुखे निव्वळ हरामाची आहेत हे मी सांगावयास पाहिजे काय! ह्या खाणीत येऊन तुम्ही जे निरनिराळे सृष्टिनियमाचे व मानवी करामतीचे अदभुत चमत्कार पाहिले त्याबद्दल तुम्हांस आश्चर्य व आनंद झाला असेलच. पण त्यात काही विशेष नाही. ही दोन्ही जंगली माणसासही होण्यासारखी आहेत. पण अशी कृत्ये पाहून जर आम्हांस सर्व मानवी कुटुंबाबद्दल कृतज्ञता व धन्यता वाटली नाही आणि स्वत:ला नवा दम आणि ईर्षा आली नाही, तर आपण जगच्चालकाचे पदरी मोठे करंटेच म्हणावयाचे !

आता इतक्या खोलात, इतके विपुल जळण, तळघरात साठवून ठेवल्याप्रमाणे कोणी साठविले असावे, हे कोडे तुम्हांला पडले असेल. लक्षावधी वर्षापूर्वी पृथ्वीच्या पाठीवर जी दाट झाडी लागून गेली होती ती भूकंपाच्या जबर धक्क्यासरशी खाली खचून, अत्यंत दाबामुळे आता दगड होऊन राहिली आहे. ह्यासंबंधी माहिती मोठी चटकदार आहे. ती तुम्ही आपल्या वडिलास अगर शिक्षकास विचारा, सोडूं नका.

पितृशासन

(रविवार ता. ४-९-१० रोजीं मुंबईच्या प्रार्थनामंदिरांत झालेल्या उपदेशाचा सारांश.)

तारीख ७ ऑगष्ट रोजी शासनयोगाविषयी विचार करीत असताना पितृशासन, गुरूशान, आणि राजशासन असे शासनाचे तीन भाग आपण केले होते, त्यांपैकी आज पितृशासनाविषयी थोडासा विचार करू. प्राचीन काळी मनुष्यसमाजाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये पितृशासनाचेच प्राबल्य सर्वस्वी आढळून येत असे. आर्यांची वेदकालीन सुधारणा होईपर्यंतही त्यांच्यात पिता म्हणजे कुटुंबाचा पती, गुरू, उपाध्याय आणि राजा हे सर्वच अधिकार चालविणारी व्यक्ती असे. रोमन लोकांच्याही जुन्या कायद्यात पित्याला कुलपतीची सर्व अनियंत्रित सत्ता गाजवावयास मिळत असे. मुलाच्या मालमत्तेवरच नव्हे तर त्याच्या प्राणावरही त्याची सत्ता चालत असे. पुढे समाज जसजसा विकसित होत गेला तसतसा ज्ञानदानाचा अधिकार गुरूकडे आणि नागरिकशासनाचा अधिकार राजाकडे अशी विभागणी होत गेली. पण शासनाचे मूळ म्हणजे पितृत्व हेच होय आणि गुरू अथवा राजा हा परंपरेने एक प्रकारे पिताच होय.

मनुष्य मनुष्यावर जे शासन चालवीत असतो त्याचा विचार करीत असता सकृद्दर्शनी मनुष्यातील हे शासन आणि मनुष्याचे स्वत्व (अथवा व्यक्तित्व) ह्यांमध्ये विरोध असावा असा भास होतो. मनुष्यसमाजात आढळून येणारे रूढीचे अवार्य प्राबल्य, अल्पसंख्येचा बहुसंख्येवर किंवा बहुसंख्येचा अल्पसंख्येवर चालणारा जुलूम, परंपरागत चालत आलेल्या तत्त्वज्ञानाचे, हटवादाचे, सांकेतिक आणि प्रासंगित नीतीचे, शिष्टसंप्रदाचे इत्यादी अनेक प्रकारची दडपणे, ही सर्व लक्षात आणिता मनुष्य हा एक पारतंत्र्याखाली स्वत:स सतत चिरडून घेणारा स्वत्वशून्य प्राणी असावा असे वाटते. ह्या दृष्टीने पाहता इतर सर्व खालील प्राणी पुष्कळ स्वतंत्र आणि स्वावलंबी आहेत हे पाहून त्यांची धन्यता वाटू लागते. पण हा अगदी वरवरचा विचार होय. किंचित खोल विचार केल्यास ह्याच्या अगदी उलट प्रकार दिसून येऊन, “धन्य धन्य हा नरदेहो| येथील अपूर्वता पहा हो| जो जो कीजे परमार्थ लाहो| तो तो दावे सिद्धीते|” हा रामदासांनी काढलेला उद्गार अगदी यथार्थ आहे अशी खात्री पटते. सूज्ञ, समर्थ आणि आत्मनिष्ठ माणसाची स्वतंत्रता कोणीकडे? पशू शरीराने कितीही बळकट असला तरी निसर्गाचा केवळ दास आहे. पण ज्या मनुष्याची ब्राह्मी स्थिती-

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं | समुद्रमाप:प्रविशंति यद्वत् |
तद्वस्कामा यं प्रविशंति सर्वे | स शांतिमाप्नोति न कामकामी ||

ह्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे भगवद्गीताकारांनी वर्णिले आहे, त्याचा निसर्गच उलट दास आहे.

पण एवढे मोठे स्वत्व आणि व्यक्तित्व अंगी येण्याच्या पूर्वी मनुष्यास अगोदर शासनाच्या तीव्र मुशीतून बाहेर निघावे लागते. शासन व स्वत्व ह्यांच्यामध्ये विरोध नसून शासन हे स्वत्वाची अपरिहार्य पूर्वतयारीच आहे असे समजावे. पशू आणि मनुष्य ह्यांची तुलना करून पाहता इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्याची बाल्यावस्था इतकी दीर्घकालीन का असावी ह्याचे इंगितही वरील शासनाच्या आवश्यकतेमध्येच आढळून येते. जनावरांची पिले थोड्या आठवड्यांनी किंवा महिन्यांनी आपल्या पायांवर उभी राहून आपल्या आईबापांपासून सडसडीत मोकळी होतात. पण सबंध बारा वर्षांचे एक तपही मनुष्याच्या बाल्यावस्थेस पुरेसे होत नाही. ह्याचे कारण त्याला पुढे जे तेजस्वी पौरूष्य मिळावयाचे असते ते होय. ते पौरूष्य प्राप्त होण्याच्यापूर्वी त्याला खाली सांगितल्याप्रमाणे बाळपणाच्या पाय-या पितरांच्या शासन छत्राखली चढाव्या लागतात:

कौमारं पंचमाब्दांतं पोगंडं दशमावधि |
कैशोरमा पंचदशाद्यौवनं हि तत:परम् ||

पाच वर्षाचा होईपर्यंत कुमार, दहापर्यंत पौगंड, पंधरापर्यंत किशोर आणि त्यानंतर पंधरा वर्षे तारूण्याची गेल्यानंतर पुरूषास पोक्तपणा येतो. ह्या पंधरा वर्षांच्या बाल्यावस्थेत त्याला ज्या प्रकारचे शासन मिळेल त्यावर त्याचे भावी स्वत्व अवलंबून राहणार हे उघड आहे. म्हणूनच मनुष्यास पशूपेक्षा दीर्घकाल पितृशासनाखाली रहावे लागते. पशूचा पालक केवळ त्याची माता असते म्हणजे आपल्या अपत्याच्या शारीरिक दुबळेपणाच्य अवस्थेत त्याचे कसेबसे पोषण करून थोड्याच काळानंतर पशूची माता त्याला अफाट जीवनकलहाच्या लाटांवर लोटून देते. पण मनुष्याचे ह्याप्रमाणे एकाच पालकाच्या मदतीने भागत नाही. कुमारदशेची पाच वर्षे आईच्या संगोपनाखाली काढल्यावर पुढे पौगंड आणि किशोरदशेची दहा वर्षे मुलाला आपल्या बापाच्या पालकत्वाखाली घालवावी लागतात. म्हणून पशूला नुसती आई तर मनुष्याला आई आणि बाप अशा दोन पितरांची नैसर्गिक योजना झाली आहे.

ह्याप्रमाणे आपल्या अपत्यास स्वत्वाचे अथवा मनुष्यत्वाचे प्रदान करण्यासाठीच जर पितृशासन हे आहे तर स्वत्वाची पूर्ण तयारी होण्यापूर्वी कोणाही व्यक्तीस पितृत्वाची अवस्था प्राप्त होणे हे अत्यंत अनिष्ट आहे हे निराळे सांगावयास नकोच. स्वत:चीच किसोरदशेतून सुटका होते न होते तोच ज्यांच्यावर पितृत्वाची पाळी येते, त्यांच्याकडून होणा-या पितृशासनाची महती गावी तितकी थोडीच. ह्या न्यायाने पाहू गेले असता जे राष्ट्र पिढ्यानपिढ्या आज कित्येक सहस्त्र वर्षे हे भ्रृण हत्येचे पातक करीत आले, इतकेच नव्हे तर त्याने त्या पातकास आपल्या शास्त्रातही भरपूर आधार करून ठेविला आहे, ते राष्ट्र कायमचे स्वत्वहीन बनले तर त्यात नवल ते काय ?

पितरांनी आपल्या अंगी पूर्ण व्यक्तित्व संपादन केल्यानंतर पुढे आपल्यास जे शासन द्यावयाचे तेही त्याचे ठिकाणी जे काही बीजभूत व्यक्तित्व असेल त्याचाच पूर्ण परिपाक व्हावा एवढ्याकरिताच; केवळ आढ्यता मिळविण्याकरिता नव्हे. शासनाच्या अतिरेकामुळे किंवा दुरूपयोगामुळे अपत्यातील व्यक्तित्वाची बीजे करपून जाणार नाहीत किंवा चिरडून जाणार नाहीत अशी सतत खबरदारी पितरांनी घ्यावी. इतकेच नव्हे तर त्या बीजांची वाढ झपाट्याने व्हावी म्हणून सर्व वाटा पदोपदी कुशलतेने मोकळ्या ठेवणे ह्याकडेही नजर दिली पाहिजे. अपत्याच्या इच्छेवर शासनाचे जे काय दडपण टाकावयाचे असेल ते त्यास पुढे प्रौढपणी आत्मसंयमन करण्याची संवय व्हावी एवढ्याचसाठी. ह्यापरते अधिक दडपण शासनक्रियेत मुळीच असता कामा नये. शासन म्हणजे दडपम अशी शिशूची भावना सहसा होऊ न देता उलट शासन म्हणजे एक प्रकारचे उत्तेजन आहे अशी भावना जो शास्ता शिशूंच्या ठायी करीत राहील तोच खरा कुशल, आणि पूज्यपादारविंद पिता होय.

ह्यावरून पितृत्वाची जबाबदारी किती थोर; किती कठीण आणि किती पवित्र आहे, हे दिसून येईल. अपत्ये म्हणजे देवाने आपणांस दिलेली खेळणी नव्हेत, किंवा आपल्या निपुत्रिक मित्रापुढे दिमाखाने दाखविण्याचे दागिने नव्हेत किंवा (आपण मरून गेल्यावर) मागे तिळांजळीच्याद्वारे स्वर्गात आपणांस जीवन पोहोचविणारे गुमास्ते नव्हेत, किंवा आपल्यामागे काही तरी लागलेली लिगाडे नव्हेत, तर अत्यंत मंगल ईश्वरी नियमाप्रमाणे ती आपल्यामागे उरणारी आपली किर्ती होत, आपले खरे अमृतत्व होत, ‘स्त्रिया पोरे वंचक चोरे’ या रानटी वचनात काव्य नाही ते नाहीच, उलट अडाणीपणा मात्र भरलेला आहे. कारण पोरे बापडी कधीच चोरे असू शकणार नाहीत. ती, आम्ही चोर आहो की साव आहो, हे कसोटीस लावून दाखविणारे देवदूत आहेत :

तू माझी माउली मी वो तुझा तान्हा | पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ||
तू माझी माउली मी तुझे वासरू | नको पान्हा चोरू पांडुरंगे ||
तू माझी हरिणी मी तुझे पाडस | तोडी भवपाश पांडुरंगे ||
तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज | चारा घाली मज पांडुरंगे ||
नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ | मागे पुढे उभा सांभाळिसी ||

ही नामदेवाची प्रेमळ प्रार्थना आम्ही ईश्वराजवळ किती सहज रीतीने करू बरे? पण ईश्वरास प्रेमाचा पान्हा मागण्यापूर्वी आम्ही आपल्या तान्हुल्यांना स्वत्वाचा पान्हा दिला आहे की नाही, हे पहावयाला नको का? नुसते लाड, कोडकौतुक आणि फुकट मिळालेल्या धनाचा वारसा दिल्याने आम्ही अपत्यांना स्वत्वाचा पान्हा दिला असे होत नाही. तो देण्यास चुकून, पु: ईश्वरास प्रेमपान्हा आम्ही कोणत्या तोंडाने मागावा? ईश्वरापुढे आम्ही प्रेमपान्हा मागत असू, वा नसू आमच्या पुढे आमची अपत्ये तो नित्य मागत असतात ह्यात संशय नाही. किशोरदशा संपेतोपर्यंत अपत्यांना स्वत्वाचा पानहा मातापित्यांनी स्वत: देऊन पुढे त्याला तरूणदशा प्राप्त झाल्यावर गुरूगृही गुरूशासनासाठी धाडावयाचे असते. त्यापूर्वी उपनयन होऊ शकत नाही. ह्यानंतर गुरूने आपली जबाबदारी कशी पाळावी आणि पुढे पोक्त आणि पौरूषशाली व्यक्तीस राजदरबारी पाठविल्यावर तेथे त्यास तिसरे शासन कसे मिळावे ह्याचा विचार पुढें क्रमाक्रमानें करूं.

  1. परमार्थाची प्रापंचिक साधने
  2. नैराश्यवाद
  3. निवृत्ती व प्रवृत्ति आणि अवतारवाद व विकासवाद
  4. निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
  • 99
  • 100
  • 101
  • 102
  • 103
  • 104
  • 105
  • 106
  • 107
  • 108
Page 104 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी