1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद

विठ्ठल रामजी शिंदे हे पारीसहून आल्यानंतर लिव्हरपूल येथे २१ ते २४ एप्रिलमध्ये भरलेल्या त्रैवार्षिक युनिटेरियन परिषदेला उपस्थित राहिले. ह्या परिषदेचा शिंदे यांना मोठाच लाभ झाला. धर्मप्रसाराच्या कामासाठी मध्यवर्ती संस्थेची स्थापना करून तिच्या द्वारा हे काम परिणामकारकपणे करता येते याबद्दलची स्पष्ट जाणीव त्यांना झाली. त्याचप्रमाणे अशा मोठ्या परिषदा कोणत्या प्रकारे भरविल्या जातात, त्याची कार्यवाही कशी चालते हे आदर्श स्वरूपात त्यांना पाहावयास मिळाले.

इ. स. १८१३ मध्ये युनिटेरियन लोकांस कायद्याने पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. १८२५ मध्ये ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशनची स्थापना झाली. उदारमतवादी धर्माचे काम करू
पाहणा-यांनी उत्साहाच्या पहिल्या भरात युनिटेरियन मताच्या प्रसाराला जोरदार आरंभ केला. १८४०च्या सुमाराला इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंड येथे साडेतीनशेपेक्षा जास्त युनिटेरियन मंदिरे बांधण्यात आली. मात्र ह्यानंतर साठ वर्षांच्या अवधीनंतरही विसाव्या शतकाच्या प्रारंभी तीनही देशांत मिळून युनिटेरियन मंदिरांची एकंदर संख्या तीनशे चौसष्ट एवढी म्हणजे पूर्वीइतकीच राहिली. ठिकठिकाणच्या युनिटेरियन समाजाची सर्व अंतर्बाह्य व्यवस्था लोकसत्तात्मक पद्धतीने तेथील स्थानिक सभासदांकडून होत असे. मात्र ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशनची कमिटी केवळ काही व्यक्तींची, सभासदांची बनलेली असे. त्या पाठीमागे कायमस्वरूपी कोणत्याही संस्थेचे बळ नसे. या कारणाने ह्या असोसिएशनच्या कामाला बळ येत नाही अशी तेथील विचारी लोकांची धारणा बनली. तीमधून असा विचार पुढे आला की, सा-या युनिटेरियन समजाची एक मध्यसंस्था स्थापून तिच्याकडू केंद्रीय व्यवस्थेचे व प्रसाराचे काम करवून घेणे परिणामकारक ठरेल. ह्या विचारानुसार सन १८८२ मध्ये सर्व युनिटेरियन समाजाच्या प्रतिनिधींची ही परिषद स्थापन करण्यात आली. दर तीन वर्षांनी तिची एक सभा होत असे. ह्या परिषदेने स्थापनेपासूनच्या वीसेक वर्षांत उपदेशकांचा पगार वाढविणे, त्यांना पेन्शन देणे, मँचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड येथे आणणे वगैरे कामासाठी मोठमोठे फंड जमविण्याची कामे केली होती. ह्या परिषदेचीच आठवी सभा २१ ते २४ एप्रिलपर्यंत भरविण्याचे ठरविले होते. ह्या सभेपुढे एक महत्त्वाचा प्रश्न होता. परिषदेची आतापर्यंत एक कमिटी असे. सभेमध्ये अनेकविध ठराव होत, परंतु त्यांची समाधानकारकपणे अंमलबजावणी होत नसे. यासाठी कमिटीचे रूपांतर कार्यकारी संस्थेत करावे. तिच्या सेक्रेटरीने नेहमी देशभर हिंडून सर्व समाजाचा प्रत्यक्ष समाचार घ्यावा व लागेल ती मदत करावी, ह्या कामासाठी त्यांनी आपल्यास वाहून घ्यावे. त्यास पूर्ण पगार द्यावा, थोडक्यात युनिटेरियनांचा एक मोठा संघ स्थापावा, ह्या विषयांवर वर्षभर चर्चा चालली होती. तिचा वृत्तान्तही ‘दि इनक्वायरर’ या पत्रामध्ये येत असे. अखेरीस परिषदेच्या सभेचा दिवस उजाडला.

लिव्हरपूल हे इंग्लंडमधील अत्यंत श्रीमंत व पुढारलेले शहर आहे. परिषदेच्या व्यवस्थापक मंडळीने बाहेरून आलेल्या सहाशे प्रतिनिधींची उत्तम व्यवस्था आपल्या खर्चाने केली होती. टाऊन हॉलमध्ये चार दिवस सकाळी दहापासून ते रात्री दहापर्यंत सभेचे काम चालत असे. नेहमी सुमारे एक हजाराच श्रोतृवर्ग शांतपणे बसून ऐकत असे. मध्यंतरी एका जवळच्या मोठ्या हॉटेलात सर्व प्रतिनिधींचा व पाहुण्यांचा एकाच स्थळी मोठ्या समारंभाने भोजनविधी होत असे. तिस-या प्रहरी चहाच्या वेळी निरनिराळ्या भागांतून येणा-या बंधुभगिनींचा परस्परांचा परिचय होऊन अगत्यपूर्वक संभाषण होत असे. समाजात स्त्री-पुरुषांची संख्या बहुतेक समसमान होती. मुख्य दिवसाचे काम महत्त्वाचे आणि बरेच वादग्रस्त असूनही वादविवाद अगदी सुरळीतपणे झाले. परिषदेच्या प्रारंभीचे वर्णन करताना शिंदे यांनी म्हटले आहे, “पहिले दिवशी परिषदेच्या उपासनेच्या वेळी फिलार्मोनिक (Philharmonic) हॉल नावाच्या अत्यंत भव्य, सार्वजनिक मंदिरात सुमारे तेराशे स्त्री-पुरुषांची गर्दी जमली होती. प्रार्थनेच्या आरंभी Awake our souls! Away our fears! ह्या पद्याचा टाहो एकदम जेव्हा तेराशे कंठातून फुटून बाहेर आला, तेव्हा इमारतीच्या दगडांनाही जणू हरूप येऊन प्रतिध्वनींच्या मिषाने ते आम्हांस हाक देऊ लागले. जाहीर सभेत श्रोतृवृंद सोळाशेवर हजर होता. मी मागे एकदा युनिटेरियन समाज म्हणजे सुधारलेल्या जगाचे ‘प्रबुद्ध अंतर्याम’ असे म्हटले होते त्याची मला येथे चांगली प्रचिती आली. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ह्या सर्व बाजूंनी जरी जहाल सुधारकी भाषणे झाली तरी चहूकडून टाळ्यांचा गजर झाला. जणू चेतलेल्या अंतर्याम देवतेची ही गर्जनाच.”१

विठ्ठल रामजी शिंदे यांचे गुरू रेव्ह. जे. एस्लिन कार्पेंटर हे या परिषदेचे अध्यक्ष होते. प्रो. जाँ रेव्हील(पारीस), प्रो. सी. एच्. टॉय(हॉवर्ड) शिवाय रेव्ह. आर. ए. आर्मस्ट्राँग, जोसेफ वूड, एल्. पी. जॅक्स, डब्ल्यू. एच्. ड्रमंड इत्यादी अनेक नामवंत, विद्वान व निष्ठावंत युनिटेरियन हजर होते. प्रो. जाँ रेव्हील व प्रो. टॉय यांचे अध्यक्षांनी अत्यंत आदरपूर्वक स्वागत केले. युनिटेरियन परिषदेसाठी अधिक निधी जमविण्यात यावा यासाठी सभेचे अध्यक्ष प्रो. कार्पेंटर यांनी अत्यंत कळकळीचे आवाहन केले. ते म्हणाले, “समजा विविध युनिटेरियन समाजाकडून वर्षाला पन्नास हजार पौंडांचा निधी जमत असेल तर आपण पाच वर्षांमध्ये सहा वर्षांएवढा निधी जमवू शकणार नाही का? जे वर्षाला पन्नास पौंड देतात त्यांनी साठ पौंड द्यावे. जे दहा पौंड देतात त्यांनी बारा पौंड द्यावे त्यामुळे
देणा-यावर फारसा आर्थिक ताणही पडणार नाही. लक्षाधीशाने द्यावी अशा प्रकारची देणगी माझ्याकडे नाही. मात्र चार-पाच वर्षांची आणखी नोकरी असलेला माझ्यासारखा धर्मशास्त्राचा व्याख्याता वर्षाला शंभर पौंडाची मदत पाचसहा वर्षे आनंदाने करू शकेल याची मला खात्री आहे. कारण ही योजना आपले बळ एकत्र करू शकणारी, सामूहिक कृती करू शकणारी, सहानुभूती आणि गैरसमज यांची दरी भरून काढणारी; नवे चैतन्य, नवी ताकद निर्माण करून आपल्या समान ध्येयाकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणारी आहे.”२
 
सभेचे मुख्य काम जे मध्य संघ स्थापन करणे ह्याविषयी सर्व समाजांच्या मतानुरूप सविस्तर विचार करून अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार परिषदेच्या कमिटीला देण्यात आला. युनिटेरियन त्रैवार्षिक परिषदेचा सोहळा अनुभवल्यानंतर आणि प्रो. कार्पेंटर यांच्यासारख्यांची कळकळीने व्याख्याने ऐकल्यानंतर शिंदे अंतर्मुख झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर आपल्या देशातील ब्राह्म आणि प्रार्थनासमाजाच्या चळवळीचे वास्तव चित्र उभे राहिले. ह्या सभेचा वृत्तान्त कथन केल्यानंतर लेखाच्या अखेरीस त्यांनी म्हटले आहे, “वाचक हो, आणि विशेषतः ब्राह्मबंधूंनो, ह्या सातासमुद्रापलीकडच्या सात हजार मैलांवरच्या परदेशी गप्पा तुम्हाला सांगण्यास काय तात्पर्य बरे. आज आम्ही ब्राह्मबंधू युनिटेरियनांप्रमाणे सारख्याच नावेत बसून संगतीने एकाच तीराकडे निघालो आहोत. त्यांच्यासारख्याच पण शतपट अधिक अडचणी आम्हांपुढे आहेत. त्यांच्यासारखीच अधिक जबाबदारी आमच्यावर आहे. पण ते करीत आहेत त्या खटपटी नजरेने पाहून त्यांच्या अंशमात्रही खटपट करण्यास आम्ही कचरतो ह्याला काय म्हणावे! येथे कोणी नव्या पंथाचा असो की जुन्या पंथाचा असो, मानवी प्रगतीच्या बाबतीत हरत-हेने तो आपले पाऊल पुढेच टाकीत असतो. आमचे तसे आहे काय?... प्रत्येकाने आपली शिकस्त केली तरी आमच्या अवजड राष्ट्रांची गाडी हालेल की नाही, ह्याची भीती असूनही आम्ही धरसोड चालविली आहे. आमचे समाज थोडे, आमचे सभासद कमी ह्याबद्दल वाईट वाटावयाला नको. आहोत त्याच समाजांचा परस्परसंबंध समाधानकारक नाही, आहेत त्याच सभासदांच्या कर्तव्यांची वाटणी न्यायाची नाही याबद्दल मात्र आवश्य वाईट वाटले पाहिजे, वाटत नसेल तर मग सभासदांची संख्या कशी वाढेल आणि वाढून तरी काय फळ.”३

लिव्हरपूल येथील ही परिषद बघितल्याने एखादी परिषद पद्धतशीरपणे कशी आयोजित करावी याबद्दलचा वस्तुपाठच शिंदे यांना मिळाला. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात परत गेल्यानंतर अखिल भारतीय पातळीवर राष्ट्रसभेच्या अधिवेशनाला जोडून भरत असलेल्या उदारमतवादी धर्मपरिषदेचे काम जे मंदावले होते त्याला चालना देण्याचा आणि या धर्मपरिषदेत नवचैतन्य निर्माण करण्याचा त्यांनी जो पुढील काळात प्रयत्न केला त्याची प्रेरणाही त्यांना ह्या परिषदेपासूनच मिळाली असावी.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, २४ मे १९०३.
२.    दि इन्क्वायरर, लंडन, २५ एप्रिल १९०३.
३.    सुबोधपत्रिका, २४, मे १९०३.

राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज

डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या कामाचा सर्व प्रकरे विस्तार होऊ लागला. भावनगरपासून ते बंगलोर-मद्रासपर्यंत अनेक प्रमुख शहरांत मिशनच्या शाखा स्थापन झाल्या होत्या. अण्णासाहेब शिंदे मिशनच्या कामामध्ये पूर्णपणे व्यग्र होते. परंतु मिशनचे कामच अधिक प्रभावी रीतीने करता यावे यासाठी; आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या बहुजन समाजासाठी काहीएक करण्याच्या तळमळीने त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाची राष्ट्रीय स्वातंत्र्याची आकांक्षा यथातथ्य रीतीने प्रतिबिंबित होऊन कार्यप्रवण व्हावी या हेतूने विठ्ठल रामजी शिंदे यांना राजकारणात भाग घेणे आवश्यक वाटले.


१९१६ साल उजाडेपर्यंत प्रत्यक्ष राजकारणामध्ये भाग घेण्यापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले होते. राजकारणामध्ये कृतिरूपाने आजपावेतो त्यांनी भाग जरी घेतला नव्हता तरी ह्या काळामध्ये राजकारणविषयक त्यांचा बाणा स्वतंत्र होता व प्रसंगविशेषी-उदारणार्थ, टिळकांच्या शिक्षेच्या वेळी-तो प्रकट झाल्याशिवाय राहिला नव्हता. राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यापासून पहिली दहा वर्षे राष्ट्रसभा पूर्णपणे ए. ओ. ह्यूम, वेडरबर्न ह्या निवृत्त इंग्रज अधिका-यांच्या व न्या. रानडे, ना. गोखले, दादाभाई नौरोजी ह्या मवाळ पुढा-यांच्या स्वाधीन होती. ब्रिटिश साम्राज्य आणि हिंदुस्थानातील जनता यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य करण्याचीच भूमिका प्राधान्याने राष्ट्रसभेने विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये पार पाडली. १८९५ मध्ये पुण्यास भरलेल्या राष्टसभेच्या अधिवेशनापासून लोकमान्य टिळकांनी राष्ट्रसभेच्या कार्यामध्ये सकिय भाग घेण्याला प्रारंभ केला व क्रमशः १९०७ पर्यंत म्हणजे सुरतेच्या अधिवेशनकाळापर्यंत त्यांच्या पुढाकाराने काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी जहालांचा स्वतंत्र पक्ष प्रभावी ठरला. विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८९५च्या पुण्याच्या अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून काम केले होते. लोकमान्य टिळकांचा राजकारणातील जहाल पवित्रा त्यांना मान्य असला तरी सामाजिक सुधारणेबद्दल त्यांची व त्यांच्या अनुयायांची चालडकलीची वृत्ती त्यांना मंजूर नव्हती. पुण्याच्या राष्ट्रसभेच्या अधिवेशन काळात रेव्ह. जे. टी. संडरलँड यांचे युनिटेरियन ह्या पाश्चात्त्य उदारमतवादी धर्मपंथाबद्दलेच माहितीपूर्ण भाषण त्यांना ऐकावयास मिळाले.

 

प्रार्थनासमाजातील धुरिणांच्या सहवासातही ते आले. ह्या सर्वांचा परिणाम म्हणून ह्या काळापासून धर्मकार्याकडे विशेषत्वाने त्यांचे लक्ष लागले. नंतरची त्यांची काही वर्षे धर्मशिक्षण व धर्मप्रचारकार्य यांमध्येच गेली. त्यामुळे राजकारणात प्रत्यक्ष भाग घेण्याला अवसर मिळाला नाही व त्याची त्यांना जरुरही वाटली नाही. १९०३च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे प्राचारक झाल्यापासून शिंदे हे एकेश्वरी धर्मपरिषदेचे वार्षिक अधिवेशन काँग्रेसला जोडून भरविण्यासाठी आणि काँग्रेस अधिवेशनला जोडून होणा-या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनासाठी दरवर्षी उपस्थित राहत होते. मात्र १९१६-१७ पर्यंत त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेचा स्पष्टपणाने जाहीर उच्चार केलेला दिसत नाही. याचे एक महत्त्वाचे कारण हे असावे की, अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यासाठी इंग्रज सरकारच्या सहानुभूतीची त्यांना आवस्यकता वाटत होती. त्याचप्रमाणे संस्थानिक, राजकीय जहाल तसेच मवाल पुढा-यांचे सहकार्य त्यांना आवश्यक वाटत होते व अपेक्षेप्रमाणे राजकारणातीत राहून या सर्व वर्गातील पुढा-यांचे सहकार्य व ब्रिटिश सरकारीच सहानुभूती मिळवून अस्पृश्यतानिवारणाच्या कामाचा विस्तार करण्याच्या बाबतीत त्यांनी मोठेच यश मिळविले होते. परंतु १९१६-१७ च्या सुमाराला राजकीय दृष्ट्या अलिप्त राहण्याऐवजी योग्य अशा प्रकारची भूमिका घेऊन राजकीय स्वरूपाच्या हालचाली करणे, अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे बहुजन समाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांना आवश्यक वाटू लागले. कारण एवढ्या काळामध्ये हिंदुस्थानातील सामाजिक अंतःप्रवाहामध्ये बरीच उलटसुलट गतिमानता निर्माण झाली. महायुद्ध सुरू झाल्यापासून सरकारची भूमिका बदलली. राज्याकारभारात येथील प्रजाजनांचा जास्त सहभाग असावा अशी भूमिका इंग्रज सरकारने घेतली व त्या दृष्टीने राज्यकारभारात सुधारणा सुटविण्यात येऊ लागल्या. भारतमंत्री लॉर्ड माँटेग्यू यांनी ब्रिटिश सरकारचे नवे धोरणही जाहीर केले. येथील लोकांना कायदेकौन्सिलात जास्तीतजास्त प्रतिनिधित्व मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर समाजातील वेगवेगल्या थरांतून जातवार प्रतिनिधित्वाची मागणी जोरदारपणे पुढे येऊ लागली. राजकारणाचा परिणाम जीवनाच्या अन्य भागांवरही होणे स्वाभाविक होते. भारतीय राजकारणांचे हे बदललेले चित्र ध्यानात घेऊन आपल्या तत्त्वनिष्ठेला अनुसरून, विशेषतः बहुजन समाजाचे व ‘अस्पृश्यवर्गाचे अंतिम हित’ डोळ्यांसमोर ठेवून राजकीय क्षेत्रात विठ्ठल रामजींनी सक्रिय व्हावयाचे ठरविले.


वस्तुतः शिंदे यांच्या भूमिकेनुसार समाजकारण, राजकारण, अर्थकारण ही एकंदर जनतेच्या हिताच्या दृष्टीने वेगवेगळी अंगे नव्हतीच. ह्या सगळ्या अंगांचा साकल्याने विचरा केला तरच ख-याखु-या लोककल्याणाचा विचार करता येतो असी त्यांची भूमिका होती. त्यांची ही भूमिका राजा राममोहन रॉय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे त्यांनी जे आकलन केले आहे त्यातून प्रकट होताना दिसते. राजा राममोहन रॉय यांच्यासंबंधी त्यांनी म्हटले आहे. “त्याचा धर्म म्हणजे केवळ एक मत किंवा मनोवृत्तीच नसे, तर साक्षात जीवन होता; व ते जीवनही सर्व बाजूचे असे. राजकारण आणि आर्थिक अभ्युदय, धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा ह्या सर्वांसाठी त्याचे जिणे, त्याचा प्रयत्न व त्याचे मरणही घडले.”१ वृत्तीचा हा व्यापकपणा शिंदे यांच्या दृष्टीने जीवनाचा परिपूर्ण विचार करणारा होता. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात जीवनाच्या ह्या विविध अंगांना वेगवेगळ्या वेळी महत्त्व देऊन आवश्यकतेनुसार कार्य केले असे दिसते.


देशाच्या पातळीवर काँग्रेसमध्ये झालेले परिवर्तन आणि महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय परिस्थिती ह्या दोन बाबींच्या अनुषंगाने विठ्ठल रामजी शिंदे यांनी राजकारणात जो सहभाग घेतला त्याचा विचार करावा लागतो. १८८५च्या अखेरीस हिंदुस्थानमध्ये राष्ट्रसभेची स्थापना झाली तिच्यासाठी ए. ओ. ह्यूम यांसारख्या निवृत्त इंग्रजी अधिका-याने पुढाकार घेतला होता. ह्यूम, वेडरबर्न व हेन्री कॉटन यांच्यासारखे सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी आणि दादाभाई नौरोजी. न्या. रानडे उमेशचंद्र, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, न्या. तेलंग वगैरे हिंदी राष्ट्रीय पुढारी यांच्या सहकार्याने काँग्रेसची स्थापना झाली व ही स्थापना करते वेळी साम्राज्यनिष्ठेच्या पायावर आणि सनदशीर चळवळीच्या आधारावर हिंदुस्थानला जास्तीतजास्त सवलती मिळवून येथील लोकांचे कल्याण साधावे हाच तिचा उद्देश होता. इंग्रज सरकारचे राज्य हे हिंदुस्थानला मिळालेली दैवी देणगी आहे व ते कायम येते राहणार आहे ही या मंडळींची धारणा होती व इंग्रज सरकार कायमचे इथे राहण्यातच हिंदुस्थानचे कल्याण आहे अशीही त्यांची प्रामाणिक श्रद्धा होती. हिंदुस्थानच्या पूर्ण स्वातंत्र्याचा विचार या पुढा-यांच्या स्वप्नामध्येही नव्हता. ब्रिटिश साम्राज्याच्या छत्राखाली मांडलिकी स्वरूपाचे स्वराज्या मिळविण्यासाठी सनदशीर प्रयत्न करावा अशी मागणी करण्यापर्यंत पोहोचवाव्यात व त्यांचे निवारण करून येथील जनतेचे हित साधावे एवढीच काँग्रेसची माफक आकांक्षा प्रारंभीच्या काळात होती व म्हणून स्वाभाविकपणेच अर्ज-विनंत्या करण्याच्या राजकारणावर सुरुवातीची दहा वर्षे राष्ट्रसभेचा भर होता.

 

१८९५ नंतर लो. टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व काँग्रेसच्या राजकारणाचे स्वरूप बदलण्याला प्रारंभ झाला. टिळकांचा पवित्रा मवाळ पुढा-यांहून वेगळा होता. १८९५ मध्ये न्या. रानडे यांचा व त्यांच्या अनुयायांचा सार्वजनिक सभेतील निवडणुकीत पराभव करून लो. टिळकांनी तेथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले. १८९६ व १८९७ मध्ये दुष्कळाने व प्लेगने महाराष्ट्रात हाहाकार माजविला होता. प्लेगच्या बंदोबस्ताच्या निमित्ताने इंग्रज सोजिरांनी जो अन्याय पुण्यातील नागरिकांवर केला त्याविरुद्ध लो. टिळकांनी जोरदार आवाज उठविला. सार्वजनिक सभेच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी झालेल्या सभेत अच्युत सीताराम साठे यांनी पिके बुडाली असतील तर सरकारला सारा देऊ नका असा सरकारी अधिकारी व पोलीस यांच्या उपस्थितीत जाहीर सल्ला दिला. टिळकांच्या काँग्रसप्रवेशाने प्रथमच सरकारविरोधी पवित्रा घेण्यात आला. १९०५ साली टिळकांनी स्वदेशीचा पुरस्कार व परदेशी मलावर बहिष्कार ही चळवळ बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सुरू केली व लोकमानसावर ह्या चळवळीचा मोठा प्रभाव पडला. टिळकांच्या जोडीनेच काँग्रेसमध्ये बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय हे जहाल मतांचे पुढारी होते व जहालांचा एक गट काँग्रेसमध्ये प्रभावी ठरला. सुरतेच्या अधिवेशनात जहाल आणि मवाळ असे दोन स्पष्ट गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले व ह्या विरोधाने दंग्यापर्यंतची पातली गाठली असेही चित्र दिसून आले. लो. टिळकांच्या राजकारणातील ह्या जहाल पवित्र्यावर इंग्रज सरकार संतप्त झाले होते. रँड व आयर्स्ट यांसारख्या ब्रिटिश अधिका-यांचा खून करणा-या क्रांतिकारकांनाही टिळकांची फूस असावी असा वहीम इंग्रज सरकारच्या मनामध्ये होता. मात्र कोणत्याही प्रकारचा पुरावा न मिळाल्यामुळे इंग्रज अधिकारी टिळकांवर खटला भरू शकत नव्हते. अखेरीस मद्यपाननिषेध चळवळीमधील टिळकांचा सहभाग आक्षेपार्ह ठरवून २२ जुलै १९०८ रोजी सहा वर्षांची शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली व १७ जून १९१४ रोजी त्यांची सुटका झाली.


१९०८ ते १३ सालापर्यंतच्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनामध्ये आल्यानंतर पुन्हा चित्र बदलले. थोड्याच दिवसांत म्हणजे ४ ऑगस्ट १९१४ रोजी इंग्लंड जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. सर्वच जहाल-मवाळ पुढा-यांनी युद्धामध्ये इंग्रजांना साहाय्य करण्याची भूमिका घेतली. टिळकांनी ‘होमरूल’ची (स्वराज्याची) चळवळ सुरू केली. इंग्रज सरकारचा हिंदुस्थानातील जनतेकडे व पुढा-यांकडे बघण्याचा दृष्टिकोण युद्धामुळे काहीसा बदलला. इंग्रज सरकार हिंदी लोकांनी जास्तीतजास्त सवलती लवकरच देईल असा अंदाज पुढा-यांनाही दिसू लागला. याचा स्वाभाविक परिणाम १९१६च्या लखनौ येथील राष्टसभेच्या अधिवेशनता दिसून आला. टिळकांनी पुढाकार घेऊन काँग्रेस आणि लीग यांच्यामध्ये एक करार घडवून आणला. अलीकडच्या पाच-दहा वर्षांत बरेच मुस्लीम तुरुण इंग्रज सरकारच्या विरोधात गेले होते. इंग्रज सरकारची नीती फोडा आणि झोडा या स्वरूपाची असून हिंदू आणि मुसलमान प्रजेची ताकद कमी करण्याचाच सरकारचा हेतू आहे हे हिंदूंप्रमाणेच मुसलमानांना जाणवू लागले होते. अलीबंधू आणि त्यांच्या विचारांचे इतर मुस्लीम पुढारी यांचा लीगमधील एक मोठा गट काँग्रसशी युती करण्यास तयार झाला होता. हिंदी-मुस्लीम ऐक्याशिवाय स्वराज्याचा प्रश्न सुटणार नाही हे ओळखून टिळकांनी बॅ. महमदअली जीनांसारख्या तरुण राष्ट्रवादी मुस्लीम नेत्याच्या मदते लखनौ करार घडवून आणला होता. ह्या करारान्वये जातवार प्रतिनिधी संख्येचे तत्त्व हिंदू-मुसलमानांच्या संदर्भात मान्य केले होते व मुसलमानांना त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा थोड्या जास्त जागा देण्याचे औदार्य टिळकांनी दाखविले. ह्यानंतरच्या काळात टिळक हे केवळ हिंदूंचे पुढारी न राहता मुसलमान मंडळीही त्यांच्याकडे आदराने व पुढारी म्हणून पाहू लागली. या सा-या राजकीय घटनांचे पर्यवसान हिंदुस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय जागृती होण्यात झाले व स्वराज्य मिळविण्याची आकांक्षा लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. इंग्रज सरकारकडून आपल्याला स्वराज्यासाठी हक्क मिळवावयाचे असतील तर आपसामध्ये एकी करणे अतिशय महत्त्वाचे आहे अशी जाणीव सगळ्या विचारी भारतीयांमध्ये निर्माण झाली.


१९१५-१६ पर्यंत भारतीय पातलीवर राजकारणाचे चित्र अशा प्रकारे बदलत गेले असले तरी महाराष्ट्रामधील बसले होते. समज आल्यानंतर ते जेव्हा संस्थानचा काभार बघू लागले त्या वेळेला संस्थानी राज्कारभाराचे विपरीत चित्र त्यांना दिसून आले. एकंदर प्रजाजनांमध्ये ब्राह्मणांची लोकसंख्या कमी असली तरी नोकरीच्या, मोक्याच्या जागांवर ब्राह्मणांचीच बह्वंशी वर्णी लागलेली त्यांना दिसून आली. सरकारी खर्चाने चालविण्यात येणा-या राजाराम कॉलेजात प्राध्यापकही प्राधान्याने ब्राह्मण व शिक्षणाचा लाभ घेणारा विद्यार्थिवर्गही ब्राह्मणच असायचा. सरकारी खर्चाने चालविलेल्या बोर्डिंगमध्ये प्राधान्याने ब्राह्मण विद्यार्थ्यांचीच भरती केली जाते, असेही चित्र त्यांना आढळून आले. त्यापेक्षा उद्वेगजनक चित्र त्यांना दिसून आले ते हे की, ब्राह्मण व्यक्ती बहुजन समाजातील वयाने, ज्ञानाने आणि प्रतिष्ठेने वरच्या पातळीवर असणा-या व्यक्तीशी एकेरी, अवमानकारक भाषेतच व्यवहार करतात. एकंदरदीतच ब्राह्मवर्गाची बहुजन समाजाकडे बघण्याची वृत्ती तुच्छतेची व अवहेलनेची आहे, असे त्यांना दिसून आले. एवढेच नव्हे तर ही वृत्ती प्रत्यक्षात त्यांच्या अनुभवालाही आली. त्यांच्या पगारी उपाध्यायाने “तुम्ही शूद्र असल्यामुळे वेदोक्त मंत्र ऐकण्याचा तुम्हाला अधिकार नाही, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच केवळ म्हणणार,” असे निर्भीडपणे त्यांच्या तोंडावर सांगितले. यातूनच संपूर्ण महाराष्ट्रभर उद्वेगकारक प्रकरण पेटले. ते वेदोक्ताचे प्रकरण म्हणून सर्वज्ञात आहे. महाराष्ट्रातल्या सामाजिकतेचे उद्वेगजनक दर्शनही ह्या निमित्ताने घडले. केवळ सनातनी वृत्तीचे लोकच नव्हे तर लो. टिळकांसारख्या पुढा-यानेही १९०५च्या सुमारास ह्या वेदोक्ताच्या प्रकरणात शाहूमहाराजांच्या विरोधात ब्राह्मण उपाध्यायाची बाजू घेतली. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपात उमटले. संकुचित ब्राह्मणीवृत्तीच्या विरोधात सत्यशोधकी मंडळी आपली तीव्र प्रतिक्रिया प्रकट करू लागली. शाहू छत्रपतींनी सत्यशोधक समाजातील मंडळींचा ब्राह्मणविरोध वाढावा या दृष्टीने प्रोत्साहनही दिले. शाहू छत्रपती ह्याबाबतीत विशेष कार्यशील झाले. वेदोक्ताच्या निमित्ताने सामाजिक, राजकीय पातळीवर दोन फळ्या स्पष्टपणे दिसून येऊ लागल्या-एक, बहुजन समाजाचा कैवार घेणारा सत्यशोधक समाज व दोन, त्यांना विरोधी असलेला परंपरावादी कर्मठ ब्राह्मणांचा वर्ग. राजकारणाच्या पातळीवर टिळक हे स्वराज्यवादी पक्षाचे होते. इंग्रजांकडून आपण आपले स्वातंत्र्य परत मिळविले पाहिजे अशी त्यांची राजकीय विचारप्रणाली होती. मात्र सामाजिक पातळीवर ते सनातनी ब्राह्मणधर्माचे श्रेष्ठत्व मानून त्यांचा कैवार घेणारे गणले जात होते. ब्राह्मणधर्माचे श्रेष्ठत्व मानून त्यांचा कैवार घेणारे गणले जात होते. ब्राह्मणेतर मंडळींना व शाहू महाराजांसारख्या त्यांच्या पुढा-यांना असे वाटत होते की, लगेच स्वातंत्र्य मिळाले तर पुन्हा पेशवाईच्या काळात जसे ब्राह्मणी वर्चस्व होते तसेच पुन्हा प्रस्थापित होईल व हे स्वातंत्र्य बहुजन समाजाच्या अथवा ब्राह्मणेतर मंडळींना अधिक मान्य होते. ह्या इंग्रजी राज्यातच ब्राह्मणेतरांच्या स्थितीमध्ये काहीएक चांगला पालट झाला होता. म्हणून आपले धोरण इंग्रजी सत्तेला अनुकूल असावे अशी ब्राह्मणेतर मंडळींची राजकीय भूमिका होती.


वस्तुतः १९०५च्या सुमारास लो. टिळकांची जी परंपरावादी भूमिका होती ती १९१६ साली राहिलेली नव्हती. भारतीय पातळीवरचे राजकारण पुष्कळ बदलले होते. मुस्लिमांशी सहकार्य करावे व हिंदुस्थानातील प्रजाजनांमध्ये राजकीय जागृती घडवून आणावी व त्यांना स्वातंत्र्यानुकूल करावे इथपर्यंत टिळकांच्या विचारसणीची प्रगती झालेली होती. मात्र महाराष्ट्रातील टिळकविरोधाचे वातावरण तसेच कायम होते व राष्ट्रीय चळवळीतील ब्राह्मण नेतेमंडळी असे मानत होती की, ब्राह्मणेतर व प्रामुख्याने त्यामध्ये असणारा मराठावर्ग हा स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. इंग्रजांची सत्ता येथेच राहावी अशा मताचा हा वर्ग आहे.


मराठा समाजाबद्दल राजकीय वातावरणात असलेली ही कल्पना विठ्ठल रामजी शिंदे यांना रास्त वाटत नव्हती व इंग्रजी सत्तेला अनुकूल असणारा जर थोडाफार वर्ग मराठा जातीमध्ये असेल तर त्याच्या भूमिकेमध्ये पालट घडवून आणणे त्यांना आवश्यक वाटत होते. म्हणून मराठावर्गाबद्दल इतर समाजाची यथार्थ कल्पना करून देणे व इंग्रजानुकूल असणा-या थोड्याफार मंडळींचे वृत्त्यंतर घडवून आणणे, हे बदललेल्या वातावरणात शिंदे यांना फारच आवश्यक वाटू लागले.

Read more: राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज

येरवड्याच्या तुरुंगात

रविवार तारीख ११ मे १९३० रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कौटुंबिक उपासना मंडळाची साप्ताहिक उपासना श्री शिवाजी शाळेमध्ये चालविली दौ-याच्या दगदगीने ते थकलेले असल्यामुळे दिवसभर घरीच विश्रांती घेतली. दुस-या दिवशी सोमवारी वैशाख पौर्णिमा ही गौतम बुद्धांची जयंती होती. परंतु अण्णासाहेब कायदेभंगाच्या चळवळीत गुंतलेले असल्यामुळे वार्षिक सभा भरविण्याची व्यवस्था करणे शक्य झाले नव्हते. मात्र ते स्वत: एकटेच पर्वतीच्या डोंगरावर गेले. तेथे त्यांनी दोन तास ध्यान केले; शांतीचा जप केला व घरी परतले. ह्या वेळी ते वेताळ पेठेतील सणस बखळीतील घरामध्ये राहत होते.


दोन प्रहरी बारा वाजता जेवण करुन ते आपल्या दिवाणखान्यात येऊन बसतात न बसतात तो पुणे शहराचे पोलीस इन्स्पेक्टर मि. मिलर व डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर शिंदे हे दोघे त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या दिवाणखान्याच्या दारात येऊन दाखल झाले. आपल्याला अटक होणार याची कुणकुण अण्णासाहेबांना दोन तास आधीच लागली होती. मिलर हे त्यांच्या ओळखीच युपोपियन अधिकारी होतो. " I am afraid, I am coming on an upleasant" असे शब्द त्यांच्या तोंडून येताच शिंदे त्यांना म्हणाले, "तुमची मी वाटच पहात आहे. इतका उशीर का केला? अंमळ खुर्चीवर बसा. एक लहानशी कामाची चिठ्ठी लिहायची आहे. तितका वेळ द्याल काय?" त्यांनी आनंदाने कबुली दिली. चिठ्ठी लिहून झाल्यावर अण्णासाहेबांनी आपली प्रवासाची पडशी तयार केली. तीमध्ये जरुरीचे कपडे व पुस्तके घातली. भगवद्गगीता, धम्मपद, बायबल, सुलभ संगीत, छोटी डायरी, चष्मा आणि विंचरण्याची फणी हे त्यांचे प्रवासातील नित्याचे सोबती. अण्णांना अटक करण्यासाठी पोलीस अधिकारी आले आहेत हे कळताच घरात गडबड उडाली. त्यांना निरोप देण्यासाठी घरातील मंडळी पाया पडू लागली. त्यांच्या सुनेचे-लक्ष्मीबाईंचे-डोळे पाण्याने भरलेले त्यांना दिसले. जिना उतरण्यापूर्वी दारात जनाक्काने त्यांच्या पायावर डोके ठेवले.

"घाबरायचे मुळीच कारण नाही, बरे" असा कुटुंबीयांना धीर देत ते पोलीस अधिका-याबरोबर खाली अंगणात आले. बाबुराव जेधे यांचा मोठा मुलगा यशवंत समोर दिसला. त्याला ते 'मला खेडला नेत आहेत' असे म्हणाले. कारण मिलरने त्यांना तसे सांगितले होते. रस्त्यात मोटारलॉरी व चार शिपाई त्यांना घेऊन जाण्याच्या तयारीत होते. एवढ्या अवधीत रस्त्यावर गर्दी जमली. पत्नी सौ. रुक्मिणीबाई व मुलगा रवींद्र हे लॉरीपर्यत आले. रुक्मिणीबाई डोळे पुशीत होत्या. अण्णासाहेबांना घेऊन मोटार शंकरशेट रोडवरुन निघाली. पोलीस सुपरिटेंडेंटचे ऑफीस आल्यावर मोटार थांबली. मिलर खाली उतरले व त्यांनी अण्णासाहेबांना लष्करी सलाम केला व गुडबाय म्हणून निरोप घेतला. मोटार खेडची वाट सोडून चिंचवड स्टेशनवरुन खंडाळ्याकडे निघाली. पोलिसांनी खेडला नेणार ही खोटी हूल उठविली होती हे त्यांच्या ध्यानात आले.


दुपारी तीन-चारच्या सुमारास खंडाळा येथील सरकारी बंगल्यावर अण्णासाहेबांना नेण्यात आले. त्यांच्या खटल्याची सुनावणी श्री. माधव नारायण हुल्याळ बी.ए., पुणे पश्चिम भागाचे प्रांत ह्यांच्यापुढे होणार होती. अटक करावयास आल्यानंतर अण्णासाहेबांना पोलीस अधिका-यांनी वॉरंट दाखविले नव्हते व त्यांनाही विचारले नव्हते. त्यांच्यावर आरोप पिनलकोडच्या ११७व्या कलमानुसार गुन्ह्याला चिथावली देण्याचा व ४७-८ अन्वये बेकायदेशीर मिठाची विक्री केल्याचा होता. अर्ध्या तासातच खटल्याचा फार्स आटोपला गेला. हे मॅजिस्ट्रेट हुल्याळ म्हणजे त्यांच्या जमखंडी गावचे बालमित्र व कॉलेजमध्ये बी.ए.चे सहाध्यायी होते. फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना १८९८ सालच्या एप्रिल महिन्यात ते तापाने सडकून आजारी पडले होते. त्यांची जवळ राहून शुश्रूषा करण्याची इतर कोणाचीही तयार नव्हती. त्या वेळेला रामजी शिंदे यांनी १८९८ सालच्या ७ एप्रिलपासून एक आठवडा सतत त्यांच्यासमवेत राहून बारा बारा तास सलग शुश्रूषा केली होती. त्यांचा ताप अगदीच कमी होईना हे बघून गुलाबपाण्याने थबथबलेली पट्टी सतत बारा तास त्यांच्या डोक्यावर ठेवली व ह्या शुश्रूषेने त्या साथीच्या दिवसांतील तापातून माधव हुल्याळ बरा झाला होता. आज योगायोगाने चमत्कारिक स्थितीमध्ये ते एकमेकांना भेटत होते.


हुल्याळ मॅजिस्ट्रेटसमोर आरोपी म्हणून अण्णासाहेब शिंदे खोलीत शिरताच हुल्याळांनी आपणहून त्यांना नमस्कार केला. आपल्या टेबलाला लागूनच बसावयास खुर्ची दिली. प्रॉसिक्युटर, दोन पोलीस व एक मॅजिस्ट्रेट ह्यांच्याशिवाय ह्या तात्पुरत्या कोर्टात इतर कुणीच नव्हते. शेवटी गुन्हा कबूल आहे काय, असे मॅजिस्ट्रेटने विचारल्यावर अण्णासाहेब उत्तरले, "खेड येथील दहा हजार लोकांपुढील सभेत मी अध्यक्ष होतो. भाषण केले व मिठाचा लिलाव केला, वगैरे पोलिसांची हकिकत खरी आहे. पण गुन्हा केला की कसे हे सांगणे माझे काम नव्हे. तो कोर्टाने वाटेल तसे ठऱवावे." ( अण्णासाहेब शिंदे यांनी कायद्याचा अभ्यास केला होता. फर्स्ट एल् एल् बी ची परीक्षाही ते पास झाले होते. त्या दृष्टीने त्यांनी दिलेले उत्तर मार्मिक म्हणावे लागेल.) मॅजिस्ट्रेटने सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सांगितली. 'बी क्लास' अशी शिफारस केली. पण ती वॉरंटवर न लिहिता तोंडीच पोलीस इन्सफेक्टरला बजावली.


श्री. हुल्याळ फिरतीवर या बंगल्यात उतरले होते. आता मॅजिस्ट्रेटचे नाते संपले होते. मित्राच्या नात्याने त्यांच्या कुटुंबाला-सौ. रमाबाईंना-भेटण्याची हरकत आहे काय, असे त्यांनी विनोदाने विचारले. अर्थात आनंदाने भेटा म्हणून हुल्याळ त्यांना आता घेऊन गेले. भेटीस गेल्यावर सौ. रमाबाईंचे डोळे अश्रूंनी भरलेले पाहून अण्णासाहेब विनोदाने म्हणाले, "आपल्याच नव-याचा मी कैदी असून आपणच पुन्हा अश्रू गाळता." एक अंजीर खाऊन, पाणी पिऊन ते मोटारीत येऊन बसले.


तारीख १२ मे १९३० ची संध्याकाळ. सात वाजले होते. वैशाख पौर्णिमेचा चंद्र उगवला होता. ह्या वेळी अण्णासाहेब येरवड्याच्या तुरुंगाच्या दारात आत प्रवेश करण्यासाठी उभे होते. दरसालच्या नियमाप्रमाणे खरे तर बुद्ध जयंतीवर व्याख्यान देण्याची अण्णासाहेबांची ही वेळ शिवाजी शाळेच्या अंगणात त्यांनी ते दिलेही असते. पण या वर्षीचा योगायोग वेगळा. 'सर्वे सुखिन: सन्तु| सर्वे सन्तु निरामय:| सर्वे भद्राणि पश्यन्तु | एष बुद्धानुशासनम् || ह्या श्लोक म्हणून अण्णासाहेबांनी त्या प्रचंड कारागृहात पाय टाकला.


१३ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या नवाकाळ, केसरी, प्रभात इत्यादी पुण्याच्या वृत्तपत्रांत अण्णासाहेब शिंदे यांना कायदेभंग केल्याबद्दल सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावून येरवड्याच्या तुरुंगात रवानगी केली आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली. सत्याग्रह मंडळाचे मुख्याधिकारी बाळूकाका कानिटकर अजून बाहेरच होते. मंगळवार तारीख १३ मे १९३० रोजी सत्याग्रह मंडळाच्या वतीने एक जाहीर विनंतीपत्रक काढण्यात आले. १२ तारखेलाच देशभक्त अब्बास तय्यबजी यांनाही अटक झाली होती. त्यानिमित्त व अण्णासाहेब शिंदे यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली ह्याबद्दल एक दिवसाचा हरताळ पाळावा व सायंकाळी सहा वाजता शनिवारवाड्यासमोरील पटांगणात जाहीर सभेला जावे अशी विनंती छापील पत्रके वाटून करण्यात आलेली होती. ह्या पत्रकातच पुढील सूचनाही होत्या : हरताळ चालू असता १) नागरिकांनी शिस्तीने व शांततेने वागावे, २) कुणाचाही कपडा अथवा टोपी मर्जीविरुद्ध काढून घेऊ नये अथवा जाळू नये, ३) एखाद्या जातीस वाईट वाटू चीड येईल अशा त-हेचे चित्र अथवा सोंग मिरवू नये ह्या सूचनांवरुनही कायदेभंगाची ही चळवळ शांततेने व शिस्तीने चाललेली होती याची कल्पना येऊ शकते. अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या वयोवृद्ध, त्यागशील पुढा-याला सक्तमजुरीची शिक्षा झाली, याबद्दल वृत्तपत्रांतून हळहळ प्रकट करण्यात आली. वा. रा. कोठारी यांच्या दै. प्रभातमध्ये त्यांच्याबद्दलची ही बातमी देताना म्हटले आहे, "अस्पृश्यवर्गाचे पाठीराखे व ब्राह्मणेतर पक्षाचे भीष्माचार्य श्री. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांस सध्याच्या सत्रात पुणे मुक्कामी पकडण्यात आले, हे कळविण्यास फार मन:कष्ट होत आहेत. श्री. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्यासारखा निर्भय व निश्चयी पुरुष आजपर्यंत कोणत्याही सामाजिक छळास डगमगला नाही. स्वत: मराठा कुळातील असता त्यांनी अस्पृश्य लोकांशी एवढे तादात्म्य करुन घेतले की त्यांच्या जातीतले लोक त्यांचा अपमान करुन त्यांस अस्पृश्याप्रमाणे वागवीत, त्यांचे ताट बाहेर मांडीत. आता त्यांस राजकीय त्रास भोगण्याची पाळी आली असून कैदी म्हणवून घेण्याचा प्रसंग आला आहे. पण त्यांसारख्या पुढा-यास उपवास आणि पक्कवान्न, तुरुंग आणि मृदुशय्या व काटेरी जमीन ही सारखीच असल्यामुळे त्यांचे वर्तन सध्याच्या प्रसंगीही उदात्त प्रकारचे राहील ही सर्वांची खात्री आहे."


अण्णासाहेब शिंदे व अब्बास तय्यबजी यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी १३ तारखेस पुणे शहरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. सकाळी दुकाने उघडल्याबरोबर पुन्हा ती ताबडतोब बंद करण्यात आली व काही दुकाने हरताळाची बातमी आगाऊ कळल्यामुळे अजिबात उघडलीच नाहीत. हरताळनिमित्त रे मार्केट बंद ठेवण्यात आल्यामुळे मंडईत सर्वत्र शुकशुकाट होता. बुधवार, रविवार, भवानी, नाना पेठ वगैरे व्यापारी पेठांतील सर्व व्यवहार थंडावला होता. चहाची व फराळाची दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. सराफआळी, भांडेआळी, दाणेआळी या सर्व भांगात हरताळ पाळण्यात आला होता. शिंदे व तय्यबजी यांच्या अटकेमुळे पुण्यातील लोकांना कसा सात्त्विक संताप आला होता ह्याचा पडताळाच ह्या हरताळाच्या द्वारा दिसून आला.


दुपारी ४ वाजता सरकारचा निषेध करण्यासाठी आणि अण्णासाहेब शिंदे व देशभक्त अब्बास तय्यबजी यांच्या अभिनंदनासाठी एक प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक लो. टिळकांच्या पुतळ्यापासून निघून शुक्रवार पेठेतून जेधे मॅन्शनवरुन वेताळ पेठेत जाऊन तेथून रविवार, मोती चौक, बुधवार चौक ह्या मार्गाने शनिवार वाड्यासमोर सहा वाजता पोहोचली. मिरवणुकीत म. गांधीच्या तसबिरी आणि राष्ट्रीय निशाणे होती. शिवाय परकीय सरकाराची नोकरी करणे, दारु पिणे, ताडी पिणे हराम आहे, अशा प्रकारचे बोर्डही होते. हा हरताळ शांततेने पार पडला. पोलिसांनीही मधे न पडण्याचे ह्या खेपेला ठरविले होते. या मिरवणुकीत विशेषत: ब्राह्मणेतर व मुसलमान बोहरी यांचाच समाज जास्त होता. शहरात निरनिराळ्या भागांत लहान लहान तुकड्याही ब-याच हिंडत होत्या व सरकारचा निषेध आणि पुढा-यांचा जयजयकार करीत होत्या. हरताळाप्रमाणे ही मोटी मिरवणूक व छोटया मिरवणुका शांततेने पार पडल्या.


मुख्य मिरवणूक सहा वाजता शनिवारवाड्यासमोर आल्यानंतर प्रो. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा भरली. सभेला सुमारे पंधरा हजार स्त्री-पुरुषांचा मोठा जमाव हजर होता. सभेत श्री. का. गो. पाषाणकर, का. ह. जाधव, हरिभाऊ वाघिरे, पोपटलाल शहा, उमरावतीचे बामनगावकर, बाबुराव भिडे, दत्तोपंत गुप्ते, रंगोबा लडकत, व्यं. बो. हरोलीकर, बोहरी व्यापारी शेख हुसेन स्वयंसेवक अभ्यंकर वगैरे वक्त्यांची जोरदार भाषणे झाली. तेथील विणकरवर्गातील लोकांनी दारु आणि ताडी न पिण्याचा निश्चय केला असून विलायती सूट न वापरण्याची प्रतिज्ञा केली व स्वदेशी वस्तूशिवाय इतर जिन्नस घेणार नाही अशा काही विणकरांनी शपथा घेतल्या. समाजाच्या सगळ्याच थऱांत जागृतीची कशी लाट आहे हे सभेच्या निमित्ताने दिसून आले.


अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या त्यागी व सत्त्वशील पुढा-यास सहा महिन्यांची सक्तमजुरीची कडक शिक्षा दिली गेली, तसेच त्यांना 'सी वर्ग' देण्यात आला. त्याबद्दलही लोकांना आलेला सात्त्विक संताप केसरी. जागृती अशा भिन्न मतप्रणालीच्या वृत्तपत्रांतूनही सारख्याच प्रमाणात प्रकट झाला. केसरीमध्ये 'पत्रकर्त्यांच्या स्फुट सूचना' ह्या कमलाखआली अण्णासाहेब शिंदे यांच्याबद्दल अतिशय आदराने लिहिलेले दिसून येते. "श्रीयुत शिंदे हे काही पूर्वीपासून राजकीय चळवळीत नसून सुधारणेच्या विशेषतः अस्पृश्योद्धाराच्या चळवळीलाच त्यांनी स्वत:स वाहून घेतलेले आहे आणि डिप्रेस्ड क्लास मिशनला आज जी स्थिती प्राप्त झाली आहे ती त्यांच्या परिश्रमाचेच फळ होय. असे समाजसुधारकदेखील आपली सामाजिक चळवळ बाजूस सारून राजकीय चळवळीत प्रमुखत्वाने भाग घेऊ लागले आहेत, यावरुनच राजकीय चळवळीचे महत्त्व व सर्वव्यापकत्व सिद्ध होते." या स्फुटात पुढे असेही म्हटले आहे की, "दोन वर्षांपूर्वी पुणे शहरात शेतक-यांची जी परिषद जमीन महसुलाच्या बिलाचा विचार करण्यासंबंधी भरली होती, तिचे अध्यक्षस्थान श्री. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी स्वीकारले होते व त्या वेळेपासून ते सरकारच्या डोळ्यांवर येऊ लागले असावेत... शेतकरीवर्गात त्यांचे वजन मोठे असल्यामुळे त्यांची चळवळ सरकारला बरीच जाचक वाटू लागली असावी असे दिसते, किंबहुना एवढ्याच कारणावरुन त्यांच्यावर मिठाच्या कायदेभंगाचा खटला भरून सहा महिने सक्तमजुरीची जबर शिक्षा देण्यात आली असावी.

त्यांना अटक पुमे शहरातच करण्यात आली, पण येथून ४० मैल अंतरावरील खंडाळे या गावी नेऊन तेथे श्री. मा. ना. हुल्याळ यांच्यापुढे त्यांस उभे करण्यात आले." श्री. शिंदे यांचे बालमित्र व सहाध्यायी अशा या हुल्याळकरांनी साठीच्या घरास पोहोचलेल्या अशा या आपल्या लंगोटीमित्रास सक्तमजुरीची शिक्षा ठोठावून त्यांच्या लहानपणाच्या उपकारांची कृतज्ञतापूर्वक वाटते. कारण करंदीकर हे बालपणापासूनचे शिंदे यांचे मित्र होते व फर्ग्युसन कॉलेजात शिंदे, हुल्याळ यांचे सहाध्यायी होते. ह्याच हुल्याळांनी दुष्काळविरुद्ध शिरोळ तालुक्यात सक्तीची केलेली सारावसुली, महायुद्धाच्या काळात वाई तालुक्यात केलेली रिक्रुटिंगची सक्ती वगैरे स्वकीयांविरुद्ध केलेल्या दुष्कृत्याचा व त्यांच्या इंग्रजधार्जिणेपणाच्या वृत्तीचा उल्लेख करुन हुल्याळांनी अण्णासाहेब शिंदे यांना अशी जबर शिक्षा ठोठावली हे स्वाभाविक असल्याचे सुचविले. ह्या स्फुटात असे म्हटले आहे, "ज्या स्वार्थत्यागी पुरुषाने स्वार्थ-साधनाचे सर्व व्यवसाय मुद्दाम लाथाडून देऊन ब्राह्मोसमाजाच्या व अस्पृश्योद्धाच्या चळवळीस स्वत:ला आजन्म वाहून घेतले, त्याची डिप्रेस्ड क्लासेस मिशनची कामगिरी पाहू माजी गव्हर्नर विलिंग्डन व त्या वेळचे शिक्षणमंत्री ना. चौबळ, श्रीमंत सयाचीरावमहाराज गायकवाड, कै नारायण चंदावरकर अशासारख्यांनी वेळोवेळी प्रशंसापूर्वक उद्गार काढले आणि ज्याचा सध्याचा व्यवसाय म्हणजे वाड्मयसेवकाचाच होता अशा उच्च दर्जाच्या पुढा-यास नवीन नियमाने राजकीय कैद्यास मिळू शकणा-या सवलतीचा काहीच फायदा न मिळता केवळ बदमाशगिरी करुन तुरुंगात जाणा-या कैद्याच्या सक्तमजुरीची पाळी यावी यात श्रीयुत शिंदे यांना कोणत्याही प्रकारचा कमीपणा नसून मुंबई सरकारच्या अब्रूस मात्र कलंक लागणार आहे. तेव्हा स्वत: मुंबई सरकारने यात मन घालून व श्रीयुत शिंदे यांना 'अ' वर्गाच्या सवलती देऊन तरी स्वत:ची अब्रू साफ करून घ्यावी."

Read more: येरवड्याच्या तुरुंगात

मुलींसाठी सक्तीचे शिक्षण

१९१९ साली पुणे नगरपालिकेन नगरपालिकेच्या हद्दीमधील प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यासंबंधी विचार चालू केला होता. परंतु हे शिक्षण मुलांपुरतेच सक्तीचे सुरू करावे; मुलींचा इतक्यात समावेश करू नये असे मत राजकारणात जहाल असलेल्या पुढा-यांचे होते. मवाळ म्हणून ओळखले जाणारे पुढारी आणि ब्राह्मणेतर पुढारी हे मात्र सक्तीचे शिक्षण मुलांच्या जोडीनेच मुलींनाही असावे अशा मताचे होते. म्युनिसिपालटीच्या ह्या शिक्षणाविषयक योजनेत मुलींचा समावेश करून नये अशा प्रकारचे बहुमत आहे; कर देणा-यांची हीच भूमिका आहे, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न टिळक पक्षाचे बरेचसे पुढारी व टिळकांचे अनुयायी करीत होते. राजकीय जहालांच्या अथवा टिळकपक्षीयांच्य ह्या प्रयत्नाला जोरदार विरोध अण्णासाहेब शिंदे यांनी सुरू केला. सुदैवाने रँ. परांजपे, प्रिं. कानिटकर यांसारखी मोठी मंडळीही सक्तीच्या स्त्री-शिक्षणाच्या बाजूची होती. खुद्द पुणे शहरात स्त्रियांच्या सक्तीच्या शिक्षणाला विरोध केला जावा, हे सकृतदर्शनी विपरीत वाटणारे दृश्य होते. कारण याच पुणे शहरात १९व्या शतकाच्या मध्याला स्त्रियांना शाळेतून शिक्षण देण्याचा ऐतिहासिक प्रयत्न म. जोतीबा फुले यांनी केला होता. १९व्या शतकाच्या अखेरीस धोंडो केशव कर्वे ह्यांनी ब्राह्मणवर्गातील स्त्रीयांच्या शिक्षणाचा प्रयत्न यशस्वीपणे सुरू केला होता. आता त्याच पुणे शहरात वरिष्ठ व सुधारलेल्या समजल्या जाणा-या ब्राह्मणवर्गाकडूनच स्त्रियांच्या सक्तीच्या शिक्षणाला विरोध होत होता. परंपरानिष्ठ आणि सुधारकी अशा पुणे शहराचा या बाबतीत आंतरविरोध दिसून येऊ लागला, एवढे मात्र खरे.


अण्णासाहेब शिंदे हे स्त्रियांच्या सर्वांगीण उन्न्तीबाबत त्यांच्या तरुण वयापासून आस्था बाळगून होते. जमखंडीसारख्या आडवणाच्या संस्थानामध्ये त्यांच्या वडिलांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता व आपल्या मुलीला शाळेमध्ये घातले होते. स्त्री आणि पुरुष या दोहोंना समान भूमिकेतून पाहणारे विठ्ठल रामजी शिंदे यांना शिक्षणाबाबत मुले व मुली असा पक्षपात करून मुलींना मागे ठेवणे अजिबात पसंत नव्हते. पुण्याच्या जहाल मंडळींचा मुलींना सक्तीच्या शिक्षणातून वगळण्याचा प्रयत्न चालला आहे, हे ध्यानात येताच या धोरणाला विविध प्रकारे विरोध करण्यास प्रारंभ केला. मुलांप्रमाणेच मुलींना सक्तीचे शिक्षण देणे कसे आवश्यक आहे ह्याबाबत अण्णासाहेबांनी ज्ञानप्रकाशमध्ये एक लेखमाला लिहिली व तीमधून मुलांच्या जोडीने मुलींनाही सक्तीचे शिक्षण देणे कसे न्यायाचे व आवश्यक आहे याचे प्रतिपादन केले. १२ फेब्रुवारी १९२० रोजी म्युनिसिपालटीची जनरल सभा ह्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी भरणार होती. त्या दिवशी विठ्ठल राजमी शिंदे ह्यांनी स्त्रियांची एक जंगी मिरवणूक पुणे शहरातून काढली. तिच्यामध्ये प्रामुख्याने सेवासदन व डिप्रेस्ड क्लास मिशनमधील स्त्रियांनी भाग घेतला. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी श्रीमती रमाबाई रानडे यांच्या नेतृत्वाखाली सेवासदनमधून वरिष्ठवर्गाच्या स्त्रियांची एक मिरवणूक पश्चिमेकडून आली आणि बहुजनसमाजातील, विशेषतः अस्पृश्यवर्गातील स्त्रियांची मिरवणूक पूर्वेकडून आहल्याश्रमातून आली. प्रत्येक मिरवणुकीपुढे दोन-तीन बँड होते आणि मुलींच्या हातात स्त्री-शिक्षणास प्रोत्साहनकारक वाक्य असलेले फलक होते. या दोन्ही मिरवणुकीची गाठ बुधवार चौकात पडून एकत्रित मोठी मिरवणूक रे मार्केटमध्ये म्युनिसिपालटीच्या ऑफिसकडे गेली. स्त्रियांच्य मिरवणुकीचा हा अपूर्व देखावा पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी जमली. त्या दिवशीची म्युनिसिपालटीची सभा तहकूब करावी लागली.


मुलांच्या जोडीनेच मुलींना सक्तीचे शिक्षण सुरू करावे ह्या मागणीसाठी फेब्रुवारीच्या प्रारंभापासून दररोज शहरातील विविध ठिकाणी स्त्रियांच्या दोन-तीन सभा होऊ लागल्या. मुलींच्या सक्तीच्या शिक्षणासंबंधी पुण्यातील स्त्रियांचे लोकमत काय आहे हे पुणे म्युनिसिपालटीच्या अध्यक्षांना सांगण्यासाठी स्त्रियांचे एक शिष्ठमंडळ तारीख १२ रोजी म्युनिसिपालटीच्या कौन्सिल हॉलमध्ये जाऊन दाखल झाले. स्त्रियांचे शिष्टमंडळ श्रीमती रमाबाई रानडे यांच्या नेतृत्वाखाली गेले. ह्या शिष्टमंडळात सौ. गंगूबाई खेडकर, कुमारी पुतळाबाई पवार, सौ. सरस्वतीबाई रोडे इत्यादी ब्राह्मणेतर स्त्रिया व मिस् गार्डन ह्या युरोपियन बाईही होत्या. प्रथम श्रीमती रमाबाई रानडे यांनी प्रास्तविक भाषण केले. श्रीमती बनुबाई भट यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे वाचून दाखविले. म्युनिसिपालटीच्या अध्यक्षांनी या प्रश्नाचा विचार आजपासून सुरू होणार आहे, त्या वेळी सर्व बाजूंनी आम्ही विचार करू असे आश्वासन देऊन स्त्रियांच्या या शिष्टमंडळाचे म्युनिसिपालटीच्या वतीने आभार मानले.


सक्तीच्या शिक्षणाबाबत विचार करण्याबाबत पुणे म्युनिसिपालटीने प्रिं. राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती. या कमिटीने मुलींच्या सक्तीच्या शिक्षणक्षेत्रात समावेश करावयास पाहिजे असे मत दिले होते. परंतु कमिटीची ही भूमिका म्युनिसिपालटीची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत अशा कारभारी मंडळींना, त्याचप्रमाणे राजकीय जहालांना पसंत नव्हती. करदात्या लोकांचे मत अजमाविण्याचा पवित्रा घेऊन ग्रामस्थांची एक सार्वजनिक सभा भरविण्याचे ह्या मंडळींनी ठरविले व त्याप्रमाणे एक सभा ७ फेब्रुवारी १९२० रोजी सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात भरविली. परंतु त्या सभेत त्यांचा इष्ट हेतू सिद्धीस गेला नाही. म्हणून दुस-या दिवशी ८ फेब्रुवारी १९२० रोजी रविवारी सायंकाळी किर्लोस्कर थिएटरमध्ये पुणे नगरपालिकेच्या वतीने चीफ ऑफिसर शंकरराव भाहवत ह्यांच्या अध्यक्षतेखाली मतदारांची सभा भरविली. महार मंडळींनी ही सभा आपल्या बाजूने करून ह्या सभेतून आपल्या बाजूने कौल प्रकट व्हावा ह्याची योजना करून ठेवली होती असा जागरूकच्या वार्ताहराने आपल्या बातमीपत्रात नमूद केले. “जे वक्ते मुलींच्या शिक्षणासंबंधी अनुकूल बोलतील त्यांना ‘हुश हुश’ करून कसे बसविता येईल याची तालीम घेतलेली १०-१५ वर्षांची हजार-पाचशे मुले थिएटरच्या निरनिराळ्या भागांत व्यवस्थित बसविली होती.” सभेस लो. टिळक उपस्थित राहणार असे जाहीर केलेले असल्यामुळे जहाल पक्षाच्या अनुयायांनी व विद्यार्थांनी थिएटर अगदी भरून गेले होते. सभेचे अध्यक्षस्थान पुणे म्युनिसिपालटीचे चीफ ऑफिसर श्री. शंकरराव भागवत यांना देण्यात आले होते. त्यांनी प्रास्ताविक भाषण केल्यानंतर मुख्य ठराव केसरीचे संपादक कृष्णाजीपंत खाडिलकर यांनी मांडला, तो असाः “जनता साक्षर होण्यासाठी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण इष्ट आहे, हे तत्त्व आता बहुजनसंमत झाले आहे. तथापि, पुणे म्युनिसिपालटीचा सांपत्तिक स्थिती समाधानकारक नसल्यामुळे निदान मुलांस तरी सक्तीचे व मोफत शिक्षण करावे.”  खाडिलकरांनी ह्या ठरावावर भाषण करताना प्रामुख्याने म्युनिसिपालटीच्या सांपक्तिक स्थितीची अडचण पुढे केली व तूर्त मुलांनाच शिक्षण सुरू करावे अशी भूमिका मांडली. सांपत्तिक स्थितीची अडचण ही उघड उघड सबब होती हे त्यांच्या बोलण्यातूनही स्पष्ट होत होते. ह्या ठरावास अनुमोदन देताना हरिभाऊ तुळपुळे म्हणाले की, “स्वताई झाल्यावर कर देण्यास लोक तयार आहेत असे दिसल्यावर मुलींस शिक्षण देऊ.” खाडिलकर यांच्या स्त्री-शिक्षणविरोधी विधानाबद्दल श्रोत्यांनी नापसंती केली.


प्रिं. र. पु. परांजपे यांनी ह्या सभेत अशी उपसूचना मांडली की, “संपन्न लोकांवर व चैनीच्या पदार्थांवर जरूर तितके कर बसवून मुला-मुलींचे शिक्षण सक्तीचे करावे.” मुलांना आणि मुलींना सक्तीचे मोफत शिक्षण द्यावे ही गोष्ट बहुजनसंमत आहे, असे ठरावाच्या पहिल्या भागात जे म्हटले आहे, त्याचा निर्देश करून प्रिं. परांजपे म्हणाले, “ही गोष्ट जर सर्वांना मान्य आहे तर ती ताबडतोब होणे इष्ट आहे व तो स्वराज्याचा पाया आहे. शिक्षणाचा प्रश्न हा काही परकीय सत्तेच्या हातातला नाही. तो आपल्याच लोकांच्या अखत्यारीतील आहे. म्हणूनही स्त्री-शिक्षणानुकूल निर्णय होणे आवश्यक आहे. लोकमत काय आहे हे आतापर्यंत झालेल्या चवळवलीवरून दिसून आलेलेच आहे आणि लोकांच्या मताची म्युनिसिपालटीच्या सभासदांना अंमलबजावणी करत येत नसेल तर त्यांनी राजीनामे द्यावे. सरकराने बसविलेले कर देण्यास लोक नाखूष असतात, कारण त्या कराद्वारे मिळणा-या पैशाचा उपयोग कशासाठी होणार यांची लोकांना कल्पना नसते. पण येथे म्युनिसिपालटी आहेहे माहित असल्याने लोक कर देण्यास नाखूष असणार नाहीत. मनाची तयारी झाल्यावर खर्च किंवा कर ही बाब मी गौण समजतो.” जहालांना उद्देशून ते म्हणाले, “तुम्ही जर स्त्रियांना काही काळ अज्ञानात ठेवणार तर मग काँग्रेसने त्यांना ज्या मताधिकाराची मागणी केली त्या अधिकाराचा काय उपयोग? हा प्रश्न लांबणीवर टाकणे व या प्रश्नावर तडजोड करणे हानीकारक आहे”, असे त्यांनी भाषणाच्या अखेरीस स्पष्टपणे बजावले.


जहालपक्षीय कृष्णाजीपंत खाडिलक यांचे भाषण सभेने शांतपणे ऐकून घेतले होते, परंतु ना. परांजपे यांचे भाषण मात्र जहाल पक्षाच्या कंपूतील अनुयायांनी शांतपणे ऐकून न घेता कलकलाट करावयास सुरुवात केली. सगळ्यात कळस म्हणजे न. चिं. केळकर यांची कन्या सौ. कमलाबाई देशपांडे ह्या बोलावयास उभ्या राहिल्या असता त्यांना भाषण करणे अशक्य व्हावे एवढा दंगा जहाल पक्षाच्या श्रोत्यांनी केला. परंतु त्यांच्या अंगी जातिवंत सभाधीटपणा असल्यामुळे व स्त्री-शिक्षणाची आच असल्यामुळे कळकळीने त्यांची आपले भाषण पूर्ण केले. त्या म्हणाल्या, “आम्ही आपला असा कोणता अपराध केला आहे की आपण आम्हास मागे लोटीत आहात? शिक्षणाची महती व आवश्यकता आपण ठरावाच्या पहिल्या भागात कबूल करता आणि काटकसरीचा व तडजोडीचा उपाय म्हणून स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न बाजूस सारता? मनुष्य प्राण्याचा जसा जेवणाचा हक्क, तसाच शिक्षणाचा हक्क आहे. शहरामध्ये गेले कित्येक दिवस स्त्रियांच्या सभा रोज भरत असून प्रत्येक ठिकाणी शिक्षणाची मागणी केली जात आहे. स्वराज्याच्या ध्येयाकडे लक्ष ठेवून राष्ट्राच्या प्रगतीचे पाऊल पुढे टाकताना आम्ही स्त्रिया आपल्याबरोबर येणार हे पक्के लक्षात ठेवा. ही गोष्ट खरी की, आजपर्यंत पुरुषांच्या पावलामागोमाग स्त्रियांचे पाऊल पडत असे. पण यापुढे आम्ही स्त्रिया पुरुषांच्या मागोमाग न जाता पुरुषांच्या पावलाशेजारी पाऊल टाकणार.” (टाळ्या. एक गृहस्थ म्हणाले, ‘केळकरांना सांगा.’)


प्रो. सहस्त्रबुद्धे यांनी वेगळीच उपसूचना सभेपुढे मांडली. ते म्हणाले, “केवळ पैशाची अडचण असेल तर तडजोड म्हणून मुलांऐवजी मुलींनाच प्रथमतः सक्तिचे व मोफत शिक्षण द्यावे. स्त्रियांच्या रोज दोनदोन-तीनतीन सभा होत आहेत. या मागणीस आपण काय उत्तर देणार? पैशाची सबब लंगडी असून ती आपल्या कीर्तीस आणि पौरुषास साजेशी होईल काय याचा आपण विचार करावा.” ते पुढे म्हणाले, “१८८२ साली तराबाई शिंदे नावाच्या बाईने एका पुस्तकात लिहिले आहे, ‘स्त्रियांच्या उन्नतीचा प्रश्न उपस्थित झाला असता पुरुषवर्ग निरनिराळ्या सबबी सांगतील व त्यात पैशाची उणीव ही सबब मुख्य असेल.’ आज या दूरदर्शी बाईच्या विधानाचे प्रत्यंतर येत आहे. ही सबब सांगणे तलवारबहादुरास, तुमच्यासारख्या मराठ्या वीरास शोभते असे वाटत नाही.”


सहस्त्रबुद्धे यांच्या उपसूचनेला पुष्टी देण्यासाठी सौ. गंगुबाई खेडकर ह्या पुढे आल्या असता जहाल पक्षीय लोकांनी त्यांचे भाषण बंद पाडण्यासाठी दंगा सुरू केला. मागासलेल्या वर्गातील कुलीन व सुशिक्षित भगिनीसंबंधाने जहालांचे हे अत्यंत अश्लाघ्य वर्तन पाहून मागासलेल्या वर्गातील लोकांना त्वेष आला. अध्यक्षांच्या सूचनेलाही दंगेखोर श्रीत्यांनी जुमानले नाही. सौ. गंगुबाईंनी उपसूचनेला पाठिंबा देऊन आपले भाषण चार-पाच वाक्यांतच आटोपले. श्री. श्रीपतराव शिंदे यांचेही भाषण श्रोत्यांनी शांतपणे ऐकून घेतले नाही. जहालपक्षीय श्रोतेमंडळींचा हा असभ्यपणा पाहून मवाळपक्षीय व ब्राह्मणेतर श्रोतृवर्गातील तरुणांचा संताप झाला. अशा वेळी टिळक बोलण्यासाठी उभे राहिले. वस्तुतः विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांना श्रोते ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत, आपण भाषण करू नये असे सुचविले होते. परंतु अखेरीस टिळक भाषण करण्यासाठी उभे राहिले. श्रोते ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. दोन्ही पक्षांच्या चाहत्यांमध्ये मारामारी सुरू झाली. खुर्च्यावर खुर्च्या आदळू लागल्या. कोणी एकाने टिळकांच्या अंगावर अंडी फेकली. टिळकांना मार लागू नये म्हणून विठ्ठल रामजी शिंदे व त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रतापराव यांना मधे पडावे लागले. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. अखेरीस कोणताही निर्णय न घेता सभा बरखास्त करावी लागली. (जागरूक, १४ फेब्रुवारी १९२०)

मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य

१९०४च्या पावसाळ्याच्या आत शिंदे यांचे वडील रामजीबाब जमखंडीचे बि-हाड हालवून कुटुंबातील सगळ्या मंडळींना घेऊन मुंबईस आले. प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला यांच्या प्रेरणेने व आर्थिक साह्याने राममोहन राय आश्रम ही चार मजली भक्कम इमारत उभी करण्यात आली होती. प्रचारकाच्या निवासाची सोय ह्या इमारतीत करण्यात आली होती. दुस-या मजल्यावर लाकडाच्या पडद्या लावून निरनिराळ्या खोल्या करून शिंदे यांच्या कुटुंबाची व्यवस्था करण्यात आली होती. तळमजल्यात भांडारकर लायब्ररी होती.

तिस-या मजल्यावरील प्रशस्त दालनात संमेलने करण्याची व्यवस्था होती. चौथ्या मजल्यावर पुढे थोडी मोकळी जागा सोडून एक खोली काढण्यात आली. बाहेरून आलेल्या मिशन-यांची सोय करण्यात येत असे. मुख्य इमारतीपासून स्वयंपाकाकरिता खोल्यांची वेगळी सोय केली होती व स्नानासाठी थोड्याशा दूर स्वतंत्र खोल्या होत्या. एकंदरीत त्यांच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था चांगली झाली.

शिंदे यांच्या राहण्याची व्यवस्था प्रशस्त झाली. मात्र खर्चाच्या व्यवस्थेत तुटपुंजेपणा जाणवावा अशीच परिस्थिती होती. त्यांचे कुटुंब दहा-बारा माणसांचे. समाजाचे प्रचारक या नात्याने त्यांची नेमणूक झाली तेव्हा दरमहा त्यांच्यासाठी साठ रुपयांची तरतूद करण्यात आली होती. प्रचारकामासाठी करावा लागणारा खर्च यातूनच त्यांना भागवावा लागत असे. एवढेच नव्हे तर समाजाची इतर काही जास्तीची कामे त्यांनी काढली तर त्याची जबाबदारीही त्यांच्यावर पडे. एकदा केलेल्या साठ रुपयांच्या नेमणुकीत पुढच्या काळात काही वाढ झाली नाही आणि शिंदे यांना ती कधी मागावी असेही वाटले नाही. मुंबईतील राममोहन आश्रमात पाहुण्यांची वर्दळही बरीच असे. प्रार्थनासमाजाचे सभासद, प्रागतिक मताचे सन्माननीय पुढारी आणि बाहेरदेशी जाणारे व येणारे प्रतिष्ठित गृहस्थ यांसारख्या पाहुण्यांची वर्दळ असे. त्यांच्या सरबराईकडेही शिंदे यांच्या कुटुंबाला लक्ष द्यावे लागत असे. आर्थिक ओढाताणीची सवय असलेले शिंदेकुटुंब ही जबाबादारीही समाधानपूर्वक पार पाडीत असे.

मुंबईतील प्रार्थनासमाजीय मंडळींनी शिंदे यांच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे सामावून घेतले. जमखंडीसारख्या साध्या राहणीच्या खेडवळ भागातून आलेल्या या मंडळींना मुंबईसारख्या शहरी वस्तीत जुळवून घेणे प्रारंभी थोडे कठीण गेले. परंतु प्रार्थनासमाजाच्या प्रतिष्ठित कुटुंबातील मंडळी शिंदे कुटुंबीयांना मानाने वागवीत असत. भांडारकर, माडगावकर, चंदावरकर वगैरे घराण्यातील स्त्रिया शिंदे यांच्या वृद्ध आईशी मिळून-मिसळून वागत. मुंबईचा परकेपणा व तुटकपणा त्यांना जाणवू दिला नाही. वासुदेव बाबाजी नवरंगे, सदाशिवराव केळकर, द्वारकानाथ वैद्य, सौ. लक्ष्मीबाई रानडे यांची कुटुंबे शिंदे मंडळींना आपलीच वाटत एवढा त्यांच्यात घरोबा निर्माण झाला. बाबणराव कोरगावकर हे तर प्रथमपासूनच शिंदे यांची प्रेमपूर्वक काळजी घेत. वामवनराव सोहोना व सय्यद अब्दुल कादर यांच्याशी शिंद्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. काशीबाई नवरंगे, डॉ. वैकुंठ कामत वगैरे तरुण मंडळी त्यांच्या घरगुती अडचणी भागविण्यात नेहमी तत्पर असत. असा हा प्रेमळ गोतावळा त्यांच्याभोवती जमल्यामुळे मुंबई शहरातल्या राहणीचा आर्थिक तणाव त्यांना सह्य होत असे. विठ्ठलरावांना घरातील भावंडे अण्णा म्हणत असत. त्यांच्या घरोब्यातील मित्रमंडळीही त्यांना अण्णासाहेब असे म्हणू लागली. बाहेरही त्यांचा उल्लेख अण्णासाहेब शिंदे असा होऊ लागला.

मुंबई प्रार्थनासमाजाच्या स्थानिक कामाचा आराखडा शिंदे यांनी केला होता. त्याप्रमाणे ते कामास लागले. दिवसभराची कामे आटोपल्यावर सभासदांच्या भेटी घेणे, रात्रीच्या शाळांची देखरेख करणे वगैरे कामे संपवून घरी येण्यास शिंदे यांना रात्रीचे अकरा-बारा वाजत. मुंबईसारख्या अफाट वस्तीत सभासदांची घरे लांबवर पसरलेली व रात्रीच्या शाळाही दूरदूरच्या अंतरावर असत. त्यामुळे कामात वक्तशीरपणा राखणे त्यांना जड जाई. कामाची जुळणी करणे प्रारंभी कठीण जात होते. परंतु सोबती तरुणांचा उत्साह वाढत होता.

विसाव्या शतकाच्या आरंभकाळात मुंबई प्रार्थनासमाजात क्रांतिकारक बदल घडून आला. वृद्ध पिढी जाऊन तिची जागा नवीन पिढीने घेतली होती. प्रार्थनासमाजाच्या जुन्या संस्थांचे काम नव्या उत्साहाने सुरू झाले होते. व त्यामध्ये काही नवीन संस्थांची भर पडली होती. ह्यामुळे एक प्रकारे नवचैतन्याचे वारे खेळू लागले. द्वारकानाथ वैद्यांनी सुबोधपत्रिकेची जबाबदारी उचलली, तर वामनराव सोहोनी यांनी रात्रीच्या शाळा हाती घेतल्या. कोरगावकर प्रार्थनासमाजाच्या जमाखर्चाची काळजी घेऊन लागले. इतरही तरुण वेगवेगळ्या कामासाठी पुढे येऊ लागले. ह्याचा परिणाम पुढील काही वर्षे समाजाच्या वार्षिक उत्सवाच्या वेळी स्पष्टपणे दिसू लागला. दूरदूर राहणा-या सर्व कुटुंबीयांची स्नेहसंमेलने पार पडू लागली. निरनिराळ्या दर्जाच्या कुटुंबांमध्ये परिचय वाढून निरनिराळ्या कुटुंबांमध्ये कौटुंबिक उपासना होऊ लागल्या. सगळा समाज म्हणजे एक कुटुंब अशी भावना रुजू लागली. समाजाकडे बाहेरच्यांचेही लक्ष वेधू लागले. हितचिंतक सभासद होऊ लागले आणि सभासद कार्यवाह होऊ लागले. गिरिजाशंकर त्रिवेदीसारखी गुजराथी मंडळीदेखील सभासद होऊ लागली. कराचीचे डॉ. रुबेन व स्वामी स्वात्मानंदजी हे आर्यसमाजी. त्यांचे सहकार्य प्रचारकार्यामध्ये मिळू लागले. सय्यद अब्दुल कादर व त्यांची बहीण हाजराबाई हे तर शिंदे यांच्या घरोब्यातील होते. सय्यद अब्दुल कादर यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली व शिंदे यांच्या कामाशी ते सहकार्य करू लागले. केरो रावजी भोसले या मराठा तरुणाने प्रर्थनासमाजाची दीक्षा तर घेतलीच शिवाय पंढरपूर येथील अनाथ आश्रमाची जबाबदारी स्वतःकडे घेतली व पुढील काळात तो मोठ्या नावारूपास आणला.१ नवीन उपक्रमाला प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला आर्थिक पाठबळ देत राहिले. डॉ. भांडारकरांसारख्या पूज्य विभूतीचा समागम मुंबईकरांन घडून त्यांचे उन्नत आध्यात्मिक विचार ऐकावयाल मिळत. शिवरामपंत गोखले ह्या वृद्ध प्रचारकाचा रसाळ उपदेश बायकामुलांनाही आवडू लागला. मुंबई प्रार्थनासमाजात अवतरलेल्या या नवचैतन्याच्या पाठीमागे विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्रेरक, उत्साही व्यक्तिमत्त्व होते. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रभावाबद्दल वामनराव सोहोनी यांनी लिहिले आहे, “प्रार्थनासमाजाचे प्रचारक झाल्यावर त्यांनी समाजातील व समाजाबाहेरील अनेक तरुणांना एकत्रित करून प्रार्थनासमाजाच्या जीवनात नवचैतन्य उत्पन्न केले.”२ त्यांच्या ठिकाणी धर्मकार्याबद्दल आत्यंतिक निष्ठा, अमाप उत्साह होता व त्याला कुशल योजकतेची व सुसंस्कृत वर्तनाची जोड होती. समाजाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर होते. मुंबईचे ते प्रतिष्ठित नागरिक होते. सरकार दरबारात तसेच लोकमानसामध्ये त्यांना मोठी मान्यता होती. त्यांचे नेतृत्व आणि त्यांची मान्यता यांचा लाभ समाजालाही होत राहिला. आधीच्या पिढीतल्या श्रेष्ठ विभूतींनी प्रार्थनासमाजाला जे उच्च अधिष्ठान मिळवून दिले ते त्यांपैकी अद्यापि मागे उरलेल्या डॉ. भांडारकरांनी आणि नव्याने आलेल्या चंदावरकरांनी कायम ठेवले.

प्रार्थनासमाजात संचारलेल्या उत्साहाचा परिणाम १९०५ सालच्या ३८व्या वार्षिक उत्सवामध्ये स्पष्टपणे दिसून आला. स्त्री-पुरुष, लहान-थोर, तरुण-वृद्ध, सभासद आणि हितचिंतक वगैरे सर्वांनी उत्सवामध्ये जोमाने भाग घेतला. प्रीतिभोजनामध्ये प्रो. गोपाळ कृष्ण गोखले, प्रिं. र. पु. परांजपे, श्री. बंडोपंत भाजेकर अशा कितीतरी बाहेरच्या मान्यवर हितचिंतकांनी भाग घेतला. इतकेच नव्हे तर अस्पृश्य समाजातील काही मंडळी पंक्तीस हजर होती. त्यामुळे थोडीशी आतबाहेर खळबळ उडाली पण एका नव्या रास्त प्रथेला प्रारंभ झाला.

याच कालखंडामध्ये उपासना पद्धतीत महत्त्वाची भर पडली. सिंधमधून डॉ. रुबेन आणि लाहोरहून रामरखामल ही भजनाची रसिक मंडळी राममोहन आश्रमात येऊन राहत. त्यामध्ये कलकत्ता ब्राह्मसमाजातील प्रसिद्ध तरुण गायक प्रबोधकुमार दत्त मुंबईत शिक्षणासाठी येऊन राहिले होते. ह्या सर्वांचा शिंदे कुटुंबाशी निकटचा संबंध जडला. त्यांच्या सहवासामुळे प्रार्थनासमाजाच्या साप्ताहिक उपासनेच्या आधी वेदीखाली बसून अर्धा तास भजन करण्याची प्रथा पडली. त्यामध्ये सिंध प्रांतातील हिंदी भजने व रवींद्रनाथ टागोरांची सुंदर बंगाली पदे यांचा समावेश अधिकाधिक होऊन लागला. उपासनेच्या वेळी ब्राह्म-संगीत म्हणण्याच्या बाबतीत भगिनीमंडळाकडून पुढाकार घेण्यात येऊ लागला. द्वा. गो. वैद्य यांच्या पत्नी गुलाबबाई, सीतारामपंत जव्हेरे यांची दुसरी कन्या कृष्णाबाई आणि अण्णासाहेबांच्या भगिनी जनाबाई यांचा पुढाकार असे. सत्येंद्रनाथ टागोर साता-यास जज्ज असतानाच सीतारामपंत जव्हेरे यांच्या गुलाबबाई, कृष्णाबाई, इंदिराबाई या मुलींनी बंगाली गाणी घेतली होती व त्यांच्या मराठी भाषांतराचा प्रार्थनासंगीतात समावेश करण्यात आला होता. प्रबोधकुमार दत्त यांचा गळा मधुर व ब्राह्मसंगीतावर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. जनाबाईंनी बंगाली भाषेची आणि विशेषतः संगीताची त्यांच्याकडून माहिती करून घेऊन इकडील संगीतात त्याचा प्रसार केला.

रात्रींच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि बहुजन समाजात ब्राह्मोपासनेचा प्रसार करण्यासाठी ब्राह्मो पोस्टल मिशनच्या द्वारे सुलभ संगीत या नावाचे लहानसे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. या कामी सदाशिवराव केळकरांचे चिरंजीव माधवराव केळकर यांनी बरीच मदत केली. उपासनेच्या वेळचे संगीत भगिनीमंडळींनी म्हणावे आणि उपासनेच्या आधीच्या वेळचे भजन तरुणांनी म्हणावे असा प्रघात सुरू झाला. सुलभ संगीत पुस्तक लोकप्रिय झाले. डॉ. रुबेन यांच्या भजनामुळे सिंधप्रांतीय गाणी इकडील मंडळींना विशेष आवडू लागली. म्हणून त्या प्रकारच्या गाण्यांचे ‘प्रेमलहरी’ या नावाचे एक पुस्तकही प्रसिद्ध करण्यात आले. प्रार्थनासमाजाच्या उपासनेच्या वेळच्या संगीतातही लोकांना आवडावा असा फरक पडला होता.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, २६ जून १९०४. शिंदे यांनी विशेष उपासना चालवून श्री. सय्यद अब्दुल कादर व श्री. केरो रावजी भोसले यांना २१ जून १९०४ रोजी ब्राह्मधर्माची दीक्षा दिली. या प्रसंगी केलेल्या आशीर्वादपर भाषणात पं. शिवनाथशास्त्री यांनी विशेषतः सय्यदांना उद्देशून सांगितले की, त्यांनी आपले जुने संबंध व परंपरा यांपासून जाणीवपूर्वक फारकत घेण्याचे कारण नाही. तसेच महंमदाबद्दल एक धर्मप्रेषित म्हणून पूर्ण आदर ठेवून वागावे.
श्री. किसन फागुजी बनसोडे व श्री. गणेश आकाजी गवई ही अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गातीली मंडळीही शिंदे यांच्यामुळे प्रार्थनासमाजाकडे आकृष्ट झाली. प्रार्थनासमाजाचे पांढरपेशी स्वरूप काही प्रमाणात बदलण्यास शिंदे यांचा प्रभाव कारणीभूत झाला.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ३३४.

  1. मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत
  2. मुंबई ते ऑक्सफर्ड
  3. मिशनसंबंधी आक्षेप व समस्या
  4. मिशनमधील दोन समारंभ
  • 109
  • 110
  • 111
  • 112
  • 113
  • 114
  • 115
  • 116
  • 117
  • 118
Page 114 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी