1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत

विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतानिवारणाचे व अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्या उन्नतीचे कार्य हाती घेतले होते ते धर्मकार्य म्हणूनच. त्यासाठी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम मोठे जोरात चालले असताना शिंदे यांच्या आयुष्यातील पहिली शोकात्म घटना घडली. ती म्हणजे, ज्या प्रार्थनासमाजाचे ते आंतरिक प्रेरणेने प्रचारक बनले होते, त्याच्याशी त्यांचा क्रमशः दुराव निर्माण होत गेला व अंतिमतः त्याचे पर्यवसान प्रार्थनासमाजाशी त्यांचे असलेले संबंध संपुष्टात येण्यात झाले. ज्या प्रार्थनासमाजाचे प्रचारकपद अत्यल्प वेतनावर पत्करून आयुष्यभर धर्मप्रचाराचे काम करण्याचा निर्णय त्यांनी स्वार्थत्यागपूर्वक घेतला होता, त्याच्याशी त्यांचा प्रचारक या नात्याने असलेला संबंध कायमचा संपुष्टात आला. एवढेच नव्हे, तर पुढील काळात विठ्ठल रामजी शिंदे यांची दखल घेण्याचेच मुंबई प्रार्थनासमाजाने बंद केले. प्रार्थनासमाजासी वियुक्त होण्याचा हा प्रसंग शिंदे यांनी मोठ्या धैर्याने सहन केला. याची प्रमुख दोन कारणे संभवतात. एक म्हणजे, परमेश्वरावर असलेला त्यांचा अढळ विश्वास व दुसरे, आपण अस्पृश्यतानिवारणाचे जे कार्य करी आहोत ते ईश्वराचेच काम आहे, ते धर्मकार्यच होय ही त्यांची दृढ श्रद्धा.

मुंबई प्रार्थनासमाज व विठ्ठल रामजी शिंदे यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला त्याची कारणे मुख्यतः मुंबई प्रार्थनासमाजातील मंडळींचै सामाजिक सुधारणेबद्दल असणारा दृष्टिकोण व त्यांची कार्यपद्धती यामध्येच पाहावा लागतो. शिंदे यांनी अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याच्या कार्यात जी धडाडी दाखविली व त्यांनी त्या कामात स्वतःला जे झोकून दिले ते प्रार्थनासमाजीय मंडळींना फारसे भावण्याजोगे नव्हते. वस्तुतः अस्पृश्य मानलेल्या वर्गाबद्दल प्रार्थनासमाजीय मंडळींना कळकळ होती व त्यांची सुधारणा व्हावी, त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांच्या ठिकाणी उन्नत धर्मबुद्धी जागृत करावी असे प्रार्थनासमाजातील धुरिणांना वाटत होते खरे; मात्र याबाबतीत प्रत्यक्ष कृती करण्याच्या संदर्भात त्यांचे धोरण मवाळ, सावधपणाचे होते. लोकांकडून आक्षेप येणार नाही, प्रवाद निर्माण होणार नाही याची ही मंडळी नेहमी दक्षता घेत होती. मुंबई प्रार्थनासमाजाने दिवसा नोकरीधंदा करणा-यांसाठी काही रात्रीच्या शाळा १८७६ मध्ये उघडल्या होत्या. १८९० मध्ये महार, चांभार वगैरे जातींच्या लोकांकरिता मदनपु-यात एक स्वतंत्र शाळा स्थापन करण्यात आली होती. श्री. बाबण बापू कोरगावकर यांच्या प्रेरणेने ही शाळा स्थापन करण्यात आली होती. मुंबई म्युनिसिपालटीत ड्रेनेज खात्यात काम करणा-या एकजणाला बढती पाहिजे होती. म्हणून त्याला बढतीचे आमिष दाखवून कोरगावकरांनी त्याच्याकरवी ही शाळा चालविली होती. त्या वेळेला लोकमतच असे होते की, शाळेतील सवर्ण मुलांची अस्पृश्यवर्गीय मुलांबरोबर खाऊ स्वीकारण्याचीही तयारी नव्हती. त्या वेळच्या वातावरणाची कल्पना एका प्रसंगावरून येऊ शकते. समाजाच्या वार्षिक उत्सवामध्ये रात्रीच्या शाळेतील मुलांच्या बक्षीस समारंभात सर्वांना एकत्र करून त्यांना उपदेश करून मिठाई वाटण्याची पद्धत होती. अस्पृश्य शाळेतील विद्यार्थांस वेदीच्या उजव्या बाजूस बसविण्यात आले. रात्रशाळेच्या स्पृश्य मुलांना वेदीच् डाव्या बाजूस बसलेल्या काही स्पृश्य विद्यार्थ्यांनी मिठाई घेतली नाही, तर घेतलेल्यांनी ती फेकून दिली.ही घटना १८९० मधली.१ याघटनेवरून अस्पृश्यांकडे बघण्याचा स्पृश्यांचा दृष्टिकोण कस अवहेलनेचा होता याची कल्पना येऊ शकते. अस्पृश्यांसमवेत भोजन करणे, त्यांना स्पर्श करणे ह्या गोष्टी तर अमलात आणण्याची कोणी कल्पनाही करू शकत नव्हते.

उन्नत धर्माच्या प्रसारकार्यामध्ये अस्पृश्यवर्गीयांना सामील करून घ्यावे, त्यांच्यापर्यंत ब्राह्मधर्माचा संदेश पोहोचवावा असे सातारा प्रार्थनासमाजाचे जुने कार्यकर्ते श्री. सीताराम यादवराव जव्हेरे यांना कळकळीने वाटत होते व ह्या मंडळींना ब्राह्म समाजाच्या अनेक स्थानीय समाजांपैकी सातारा येथील श्री. जव्हेरेंचे कार्य हे या दृष्टीने मोलाचे होते. मात्र धर्मविषयक प्रवचन ऐकण्यासाठी अस्पृवर्गायांना एकत्र जमविणे ह्यापलीकडे जाऊन अस्पृश्यतानिवारण्याचे काम करण्यापर्यंत सातारा प्रार्थनासमाजाचीही मजल जाऊ शकत नाव्हती. एकंदरीतच मुंबई प्रर्थनासमाजाने अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेसाठी चालविलेले हे काम मुंगीच्या गतीनेच चालले होते असे म्हणावे लागेल. ह्याला कारण अस्पृश्यतेच्या संदर्भात असलेले त्या काळातील लोकमत. ह्या लोकमताला मान देण्याची प्रार्थनासमाजीय धुरिणांची असलेली वृत्ती होय. आपल्या मताचा प्राभाव समाजावर पाडून समाजाला आपल्या मताकडे ओढू घ्यावे, त्यांनी आपले अनुयायी करावे व समाजमनामध्ये पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा ही धडाडी ह्या धुरिणांमध्ये नव्हती.

न्या. रानडे यांच्यासारखा लोकोत्तर पुरुषाची एकंदरीत सामाजिक सुधारणेबद्दल मनोवृत्ती काय होती हे पाहिले असता प्रार्थनासमाजाच्या दृष्टिकोणाचीही आपल्याला कल्पना येऊ शकते. पुणे येथील प्रार्थनासमाजाच्या वतीने धर्मविषयक व अन्य महत्त्वाच्या प्रश्नांबाबतची चर्चा करण्यासाठी संगतसभा भरत असे. १८८०-८१ मध्ये ह्या संगतसभेत झालेल्या चर्चेला पुढील वृत्तात द्वा. गो. वैद्य यांनी प्रार्थनासमादाचा इतिहास ह्या आपल्या पुस्तकात उदधृत केला आहे.

वडिलांच्यासंबंधाने व परस्परांसंबंधाने कर्तव्ये इत्यादी
बळवंतराव गोडबोलेः अमुक एक गोष्ट अशा प्रकारची आहे, तिच्यासंबंधाने आपण अशा रीतीने वागणे अगर न वागणे हे आपले कर्तव्य आहे व त्याप्रमाणे वागल्यास अगर न वागल्यास परमेश्वराचे आपण दोषी होऊ, अशा रीतीची आपली खात्री झाल्यावर आपल्या वडिलांची समजूत आपल्याहून निराळी आहे, यामुळे आपल्या अशा वागण्याने अथवा न वागण्याने त्यां वाईट वाटणार आहे अशा आपत्तीचे प्रसंगी आपण केवळ वडिलांस संतोषविण्याकरिता आपल्या समजुतीविरुद्ध त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणे हाच आपला धर्म आहे की काय?

रा. ब. रानडेः आपली समजूत जरी एक प्रकारची झाली, तरी तिजप्रमाणे आपण एकदम आचरण करू नये. त्या समजुतीप्रमाणे आपले विचार आहेत असे बोलावे. आपल्याप्रमाणे आपल्या वडिलांचे व दुस-यांचे विचार होण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या विचारांप्रमाणे पुष्कळांचे विचार झाल्यावर त्याप्रमाणे इतरांनी दुस-या काही कारणांनी आचरण न केले तरी आपण करावे. पण जोपर्यंत पुष्कळांची समजूत आपल्या समजुतीहून निराळी आहे तोपर्यंत आपल्या समजुतीप्रमाणे आचरण करणे बरोबर नाही.

कित्येक२: प्रत्येकाने आपल्या समजुतीप्रमाणे वागावे. आपल्याहन दुस-याची समजूत निराळी असली तरी ती बदलण्याचा आपण प्रयत्न करावा, परंतु त्यांची समजूत बदलेपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. अशी वाट पाहत राहिल्याने सुधारणेचे पाऊल कधीच पुढे पडावयाचे नाही. प्रत्येक मनुष्य परमेश्वरापाशी आपल्यापुरता बांधलेला आहे.

प्रश्नः अमुक गोष्ट जनसमूहाच्या हितास आवश्यक आहे असे आपल्याला दिसल्यावर व ती न करणे हे ईश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध आहे असे वाटल्यावर ती जर पुष्कळ लोकांच्या समजुतीविरुद्ध किंवा रूढीविरुद्ध असेल तर ती आपण करावी की नाही?
 
रा. ब. रानडेः ती करतीलते धन्य, पण न करतील ते दोषी नाहीत.

कित्येकः लोकविरुद्ध असली तरी केला असता ती गोष्ट होणे साध्य आहे, अशी स्थिती असल्यास ती करावी हेच धर्मदृष्टीने आपले कर्तव्य; साध्य नसल्यास साध्य होण्याची वेळ नजीक आणण्यासाठी झटणे हे कर्तव्य होय.३

न्या. रानडे यांचा सामाजिक सुधारणा करण्याचा जो दृष्टिकोण ह्या चर्चेतून दिसून येतो तोच सामान्यतः प्रार्थनासमाजाच्या धुरीण मंडळींचा होता.

आपल्याला विचारपूर्वक जे वाटते ते बोलावे व आपण जे बोलतो त्याप्रमाणे कृती करावी असा विठ्ठल रामजी शिंदे यांचा निश्चित स्वरूपाचा दृष्टिकोण होता. म्हणून शिंदे यांचा विद्यार्थिदशेपासून उक्ती व कृतीमध्ये संगती व ऐक्य असावे असा सदैव आग्रह असल्याचे दिसून येते. जेथे ते पाहावयास मिळत नाही तेथे तेथे त्याबद्दल ते नापसंती प्रकट करतात. २९ मे १८९८ रोजी मुंबई प्रार्थनासमाजाबद्दलचा अभिप्राय रोजनिशीत नोंदविताना त्यांनी म्हटले आहे, “समाजाचे (प्रार्थनासमाजात कसल्याही प्रकारचे जातिभेद असता कामा नये, असे असता इतर सुधारकांत व (प्रार्थना) समाजात मला काही भेद दिसत नाही. म्हणजे दोघेही अद्याप जातिभेद उघड उघड झुगारण्यास तयार आहेतसे दिसत नाही.”४ विचाराला कृतीचे जोरदार पाठबळ असल्याशिवाय सुधारणेचे पाऊल पुढे पडणार नाही अशीच कृतिवीर अण्णासाहेब शिंदे यांची भूमिका अखेरपर्यंत होती. १९३७ साली वाई प्रांतातील पसरणी येथील सभेतील भाषणात महात्मा जोतीराव फुले यांच्या कृतियुक्त सुधारणेचा गौरव करताना ते म्हणाले, “त्यांनी निंदा-अपमान सोसून धैर्याने, कृतीने समाजाची सुधारणा घडवून आणली. नुसती व्याख्याने देऊन किंवा जाडे ग्रंथ लिहून, त्यात विचार मांडून सुधारणा होते असे नाही. प्रत्यक्ष विचाराप्रमाणे कृती हवी. तरच सुधारणा घडून येते.”

घरातील जातिभेदविरहित वातावरण आणि वारकरी संप्रदायाचे उदारमतवादी संस्कार यांमुळे, तसेच त्यांच्या ठिकाणच्या विवेकशीलतेमुळे अस्पृश्यवर्गाच्या सर्वांगीण उन्नतीबद्दल शिंदे यांच्या मनात विद्यार्थिदसेपासूनच कळकळ निर्माण झाली होती. त्यांच्या या मनोधारणेला पुढे धर्ममताचाही आधार मिळाला.

“सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेद न राखिता परस्पराशी बंधुभावाने वागावे हे ईश्वरास प्रिय आहे आणि हे मनुष्याचे कर्तव्य आहे,” हे प्रार्थनासमाजाचे एक तत्त्व आहे. हे तत्त्व सत्य म्हणून जर आपण स्वीकारले असेल तर त्याला अनुसरूनच भेदभाव न करता इतरांशी वागावयास पाहिजे असे शिंदे वाटत होते. जातिभेदच काय, अस्पृश्यता पाळणे हे या तत्त्वाशी विसंगत आहे अशी त्यांची श्रद्धा होती. या भूमिकेनुसारच अस्पृश्यत नष्ट करणे व अस्पृश्य बांधवांची उन्नती करणे हे त्यांना धर्मकार्यच वाटत होते. सत्यावर आणि ईश्वरावर शिंदे यांची आत्यंतिक श्रद्धा होती. १९०८ साली मुंबई प्रार्थनासमाजात वार्षिक उत्सवात ‘ईश्वर आणि विश्वास’ ह्या विषयावर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी म्हटले आहे, “ईश्वर सत्त्वप्रवर्तक आहे असे नुसते मत असून चालत नाही, तर तो सत्याचा आणि शुभाचा प्रवर्तक आहे, म्हणूनच मी सत्याचा आग्रह धरून राहिलो तर, माझे कितीही हाल झाले तरी हानी-माझी किंवा कोणाचीही-मुळीच होणार नाही, असा विश्वास पाहिजे.अशा विश्वासामुळेच ईश्वराचा व आपला खरा आणि निकट संबंध जडतो, बुद्धीने जडत नाही.”५

महात्मा गांधींचा सत्याबद्दलचा आग्रह त्यांच्या जीवनकार्यातून जस दिसून येतो त्या प्रकारचाच सत्याबद्दलचा आग्रह आणि आपण धर्मकार्य म्हणून जे कार्य स्वीकारले त्यावरील निष्ठा शिंदे यांच्या कार्यातून आणि विचारांतून दिसून येते. आपले कार्य म्हणून जे कार्य स्वीकारले त्यावरील निष्ठा शिंदे यांच्या कार्यातून आणि विचारांतून दिसून येते. आपले कार्य आणि ईश्वरावरील अढळ निष्ठा शिंदे यांच्या ठिकाणी एकरूप झालेल्या होत्या. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य धर्मकार्य म्हणून त्यांनी अत्यंत स्वाभाविकपणे स्वीकारले होते. ते कार्य उताविळीने करावे अशी उत्कंठा त्यांना लागून राहिली होती. समाज काय म्हणेल असा विकल्प त्यांच्या मनात आला नव्हता. उलट समाजमनाचा पालट करून, अस्पृश्यता नष्ट करणे त्यांना निकडीचे वाटत होते. म्हणून त्यांनी ह्या कामाला धाडाडीने हात घातला.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारकपद स्वीकारल्यापासून धर्मकार्याचा झपाट्याने विस्तार केला. प्रांतभरच्या कामामध्ये वेगवेगळ्या शहरांतील स्थानिक प्रार्थनासमाजामध्ये उत्साह निर्माण केला. मुंबई प्रार्थनासमाजात कामाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने वाचनवर्ग, तरुण ब्राह्मसंघ यांसारख्या चळवळी आणि संस्था सुरू केल्या, हे आपण पाहिले आहेच. या सा-याचा परिणाम म्हणून प्रार्थनासमाजाच्या कार्याबद्दल उत्साहाची भावना सार्वत्रिकपणे निर्माण झाली. १९०६ साली मिशनची स्थापना केल्यानंतर त्याही कामाचा शिंदे यांनी झपाट्याने विस्तार केला. महाराष्ट्रभर अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत अपूर्व जागृती निर्माण होण्यात त्यांच्या कामाचे पर्यवसान झाले. मिशनच्या स्थापनेनंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये ते जे दौरे काढत त्यामध्ये प्रार्थनासमाजाच्या प्रचारकार्याच्या जोडीने स्वाभाविकपणेच मिशनचेही कार्य करीत. फरक एवढाच पडलेला असणार की मुंबई शहरातील प्रार्थनासमाजाच्या नैमित्तिक विधिसंस्कारादी कामासाठी ते जितका वेळ देऊ शकत होते तेवढा वेळ देणे शक्य होत नसणार. प्रार्थनासमाजाच्या पगारी प्रचारकाने मिशनच्या कामाचा एवढा उठाव करावा व त्यामध्ये आपली कार्यशक्ती आणि बराचसा वेळ खर्च करावा याबद्दल प्रार्थनासमाजातील काही मंडळींच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली. वस्तुतः विठ्ठल रामजी शिंदे व मुंबई प्रार्थनासमाज यांच्यामध्ये हा जो दुरावा निर्माण झाला त्याची कारणे मुंबई प्रार्थनासमाजाच्या मवाळ, पांढरपेशा धोरणाताच पाहावी लागतात. शिंदे यांनी आपल्या खाजगी डायरीत १७ जानेवारी १९३५ रोजी एक नोंद केली आहे. ती अशी, “माझे व मुंबई प्रार्थनासमाजाचे सहकार्य आज जवळ जवळ २०-२५ वर्षे बंद पडले होते. कारण १) राजकारण, २) मी स्वतंत्र ‘अस्पृश्या’ साठी मिशन काढले, ३) माझा स्वतंत्र व सरळ बहाणा.”६

प्रार्थनासमाजाच्या काही पुढारीमंडळींच्या असंतोषाचा परिणाम म्हणून शिंदे यांच्या धर्मविषयक प्रचारकार्यावर नियंत्रण राहावे म्हणून प्रार्थनासमाजाच्या मॅनेजिंग कमिटीने एक पोटकमिटी नेमून स्वतंत्र नियम तयार केले व तिच्या तंत्राने त्यांनी वागावे असा निर्णय घेण्यात आला. शिंदे यांच्य स्वतंत्र प्रकृतीला ते पटेनासे झाले. खरे तर पैशाची फारशी तरतूद नसतानाही त्यांनी धर्मकार्याचा जोमाने विस्तार चालविला होताच. अधी काम करावे, मग अनुभव घ्यावा आणि मग योग्य वेळी नियम करावे हा स्वाभाविक क्रम त्यांना बरा वाटत होता. एकीकडे पैशाची तरतूद नाही, दुसरीकडे कामाचा नीट अंदाज नाही अशा स्थितीत शाब्दिक नियमांचे नियंत्रण त्यांना अप्रस्तुत वाटू लागले.

शिंदे यांचे मित्र वासुदेवराव सुखटणकर १९०७च्या सुमारास जर्मनीमध्ये बॉन विद्यापीठात पीएच्. डी. चा अभ्यास करीत होते. शिंदे त्यांना इकडील वर्तमान वस्तुनिष्ठपणे कळवून त्यांचा अभिप्राय मागवीत होते व सुखटणकरही आपले मत मनमोकळेपणाने शिंदे यांना कळवीत असत. प्रचारकाने सभासदाच्या घरी गृहृसंस्कार चालविण्याचे काम ठरविलेल्या संस्कारासंबंधीनेच करावे अशा अर्थाचा एक नियम होता. ब्रह्मसमाजाच्या स्वातंत्र्याला हा नियम बाधक होता म्हणून तो वगळावा असे सुखटणकरांचे मत पडले. शिंदे यांना तर नियमांचा हा सारा घाटच अनावश्यक व चालत्या गाडीला खीळ घालणारा वाटून त्यांचे मन उद्विग्न झाले. शिंदे यांनी आपल्या कामाची डायरी ठेवावी, वरचेवर अहवाल द्यावा वगैरेही अपेक्षा करण्यात येऊ लागल्या. शिंदे डायरी ठेवण्याचे हे काम स्वयंस्फूर्तीने कामाच्या ओघात व कामाचा भाग म्हणूनही पहिल्यापासूनच करीत होते. धर्मकार्यार्थ केलेला प्रचारदौरा, त्यामध्ये व्याख्याने देऊन, उपासना चालवून वगैरे केलेले धर्मसाधन या संबंधीचा भाग सुबोधपत्रिकेमधून वरचेवर प्रसिद्ध होत होता. त्यांच्या या प्रसिद्ध होणा-या वृत्तान्तावरून शिंदे यांच्या प्रचाराचे काम किती सखोलपणे, व्यापक पातळीवर व वरच्या दर्जाने चालले होते याची कल्पना येऊ शकते. परंतु शिंदे यांच्या मिशनच्या कामाबाबत अनुत्साही असलेली प्रार्थनासमाजातील मंडळी असंतुष्टच होती. शिंदे हे स्वयंस्फूर्तीने उत्तम दर्जाचे काम करीत असताना त्यांनी ही कामे अमक्यावेळी व अमक्याच पद्धतीने करावीत हा सुसुरू केलेला नियमाचा जाच त्यांना अनावश्यक वाटू लागला. त्यांचे व समाजा मंडळींचे मतभेद वाढीला लागले.

शिंदे यांच्या निकट नसणारी समाजातील मंडली तर असंतुष्ट होतीच, पण शिंदे यांच्या जिव्हाळ्यातील काही मंडळींनाही शिंदे यांचे धोरण नापसंत होते. श्री. बापू कोरगावकर हे शिंदे यांचे जवळचे स्नेही व खरेखुरे हितचिंतक होते व मनोधारणेने ते एकनिष्ठ ब्राह्म होते. त्यांनीही शिंदे यांना आपला मतभेद पत्राद्वारे कळविला. नाशिक येथील सॅनिटेरियमध्ये कोरगावकर प्रकृतिस्वास्थ्यासाठी १९०७च्या मार्चपासून राहिलेले होते. १९ मे १९०७ रोजी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये ते म्हणतात, “डिप्रेस्ड क्लास मिशनच्या कामाचे मला काहीच महत्त्व वाटत नाही, असे तुम्ही म्हणता ते मी कबूल करीत नाही. पण आपल्या वेळाचा तुम्ही अपव्यय करित असे मला वाटते. जे तुम्ही म्हणता ते मात्र खरे आहे. मनुषाचे सामर्थ्य फार परिमित नव्हे तर अत्यंत अल्प आणि समाजोन्नतीची कामे एकापेक्षा एक पडली आहेत की कोणीही मनुष्य एकटा एकही काम नीट करू शकणार नाही. आपल्या (प्रार्थना) समाजाने जी कामे आधीच उचलली आहेत तीच त्यातील कर्तबगार माणसांच्या मानाने त्यास अधिक आहेत, घेतलेली कामे समाधानकारकरीत्या उचलली आहेत तीच त्यातील कर्तबगार माणसांच्या मानाने त्यास अधिक आहेत, घेतलेली कामे समाधानकारकरीत्या चालू राहिल्यास त्यातील सभासदांनी आपली शक्ती दुसरीकडे लावणे बरोबर नाही असे माझे मत आहे. कर्वे, वेलीणकर यांची कामे जशी जोराने चालू आहेत तशी आपल्या समाजाची चालू आहेत असे तुम्हास वाटते काय? डिप्रेस्ड क्लास मिशनचे काम तुम्हास अधिक महत्त्वाचे व प्रिय वाटत असेल; परंतु तुम्ही अगोदरच एका सर्वात श्रेष्ठ व इतर सर्व कामास चालना देणारे अशा कामास आपण वाहून घेतले आहे त्याची वाट काय? ब्राह्मधर्मासारख्या सर्वव्यापक धर्माच्या प्रचारकाचे काम जे तुम्ही पत्करले आहे तेच जर नीट कराल तर मला वाटते तुमच्या डिप्रेस्ड क्लास मिशनचे काम करण्यास दुसरी माणसे उत्पन्ना होतील व झाली पाहिजेत. सध्याचा तुमचा मार्ग घोड्याच्या पुढे गाडी ठेवण्यासारखा दिसतो. ते काही असो, समाजाचे ज्या कामाकरिता तुम्हास नेमले आहे व जे काम करण्याचे तुम्ही स्वीकारले आहे, त्या कामाकडे तुमचा जावा तितका वेळ व लक्ष जात नाही असे मला एकट्याला नव्हे, तर निदार बहुतेक सभासदांस वाटत आहे. मला समाजाचे काम फारच महत्त्वाचे वाटते म्हणून जर मी ऑफिसात जाऊन ऑफिसच्या कामाची हेळसांड करून समाजाचे काम करीत असलो तर तुम्ही मला कामचोर नाही का म्हणणार? आणि माझे असे करणे ईश्वराला तरी आवडले काय? आता तुम्हास असे वाटत असेल की, डिप्रेस्ड क्लास मिशन हे समाजाचेच एक काम आहे, परंतु मी म्हणतो की, याचा निर्णय समाजाने केला पाहिजे, तुम्हास असे वाटून उपयोग नाही, असो.”७

Read more: मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत

मुंबई ते ऑक्सफर्ड

‘पर्शिया’ ह्या बोटीने मुंबईचा किनारा साडेतीन वाजता सोडला आणि तासाभरात विठ्ठलरावांना मुंबई शहर दिसेनासे झाले. आणखी अर्ध्या तासाने डोंगरही दिसेनासे झाले. वरती आकाश आणि खाली पाणी असा निसर्गाचा वैविध्यरहित परंतु भव्य देखावा दिसू लागला. विठ्ठलरावांच्या मनाला अजून स्वस्थपणा आलेला नव्हता. बोटीच्या पिछाडीस बसून पाऊण तास त्यांनी चिंतन केले.

‘पर्शिया’ बोट बरीच मोठी असली आणि तिच्यामध्ये ५३० प्रवाशांची सोय असली तरी ह्या फेरीमध्ये तिच्यात केवळ ७५ प्रवासी होते. त्यांपैकी हिंदुस्थानातील सातजण होते. विठ्ठलरावांच्या केबिनमध्ये कलकत्त्याचे श्री. मित्र, मुंबईचे श्री. कोतवाल नावाचे पार्शी गृहस्थ व लाहोरचे श्री. जलालुद्दिन मिर्झा हे मुसलमान गृहस्थ होते. हैदराबादचे श्री. नायडू व आग्र्याचे आणखी एक मुसलमान गृहस्थ व एक भारतीय ख्रिश्चन अन्य केबिनमध्ये होते. कोतवाल हे व्यापारी सोडले तर इतर पाचजण हे कायद्याचा अभ्यास करण्यासाठी चालले होते. ह्या सगळ्यांमध्ये व्यावहारिकदृष्या बिनकिफायतीच्या धर्मशिक्षणासाठी जाणारे लोकविलक्षण गृहस्थ विठ्ठल रामजी शिंदे हेच होते.
 
विठ्ठल रामजींच्या ठिकाणी धर्मांबद्दल तीव्र आस्था, नवे जाणून घेण्याची उत्कट जिज्ञासाबुद्धी आणि चर्चा करण्याची दांडगी हौस होती. संध्याकाळी पाचच्या सुमाराला त्यांच्या केबिनमधील सोबती श्री. जलालुद्दिन मिर्झा ह्यांच्यासमवेत धर्मासंबंधी तासभर संभाषण केले. संभाषणामुळे दोघांचेही समाधान झाले.१ दुस-या दिवशी म्हणजे २२ सप्टेंबरला सकाळीच शेजारच्या खोलीतील हैदराबादचे नायडू यांच्याबरोबर ब्रह्मधर्मासंबंधी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विवेचन केले. २३ तारखेला सकाळी मित्र यांच्याबरोबर त्यांचे धर्मासंबंधी बोलणे झाले.

बोटीने हिंदुस्थानचा किनारा सोडल्याला तीन दिवस झाले तरी कुटुंबीय मंडळीच्या वियोगाचे त्यांना झालेले दुःख ओसरले नव्हते. २३ तारखेस सायंकाळी ते झोपले असताना स्वप्नात घरची मंडळी भेटली. उठल्यावर त्यांना वाईट वाटू लागले.२

बोटीवरील वातावरण आणि स्वतःची मनःस्थिती ह्याबद्दल त्यांनी म्हटले आहे, “सभोवती लोकांची इतकी गर्दी असून, सुख-दुःखाचे दोन शब्दही कोणाशी बोलण्यास मन धजत नाही. आणि आत तर विरह धुमसत असतो. अशा स्थितीत, बायरन कवीने एके ठिकाणी वर्णिलेला हा गर्दीतला एकांतवास निर्जन एकांतवासापेक्षाही फार दुःसह होतो. पण अशी स्थिती बहुतकरून आमच्याच लोकांची होते. गोरे लोक लगेच एकमेकांशी मिसळून अनेक प्रकारचे खेळ खेळत दिवस काढतात. लहान मुले, पोक्त बाया आणि मोठे धटिंगण ह्यांचा दिवसभर धांगडधिंगा चालू असतो. ह्या गुलहौशी पाश्चात्त्य लोकांनी सर्व जगभर-जमिनीवरच नव्हे तर पाण्यावरही- आपले घर पसरून टाकिले आहे, तेणेकरून हे कोठे गेले तरी ह्यांचा उल्हास कमी होत नाही. आम्हाला येथे धरून आणल्याप्रमाणे होते. असो. हा प्रकार रजोगुणाचा झाला, पण मनाची जर सात्त्विक वृत्ती होऊन ते धर्माच्या उच्च वातावरणात वावरू लागले तर हीच परिस्थिती त्यास अत्यंत अनुकूल होते. लाटांचे एकसारखे उत्क्रमण, वायूचे सतत वाहणे, अपार आकाशमंडळात फाकणारी निःसीम प्रभा वगैरे पाहून विश्वाचे आनंत्या व सृष्टिव्यापाराचे सातत्य आणि अखेरीस परमेश्वराचे सर्वत्र भरलेले मंगल वास्तव्य साक्षात दृगोचर होते.३

विठ्ठल रामजींनी निघताना आपल्या सामानामध्ये एकतारा घेतलेला होता. प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतल्यापासून एकतारा घेऊन भजन करण्याचा त्यांचा परिपाठ होता. बोटीवर ते एकतारा घेऊन भजन करीत असत.४ रोज सायंकाळी भजन व प्रार्थना करण्याचा क्रम बोटीवर त्यांनी चालू ठेवला. २६ सप्टेंबरला एडनजवळची टेकडी दिसू लागली. पाच दिवस दगड आणि माती नजरेस न पडल्यामुळे ही टेकडी दुरून दिसताच त्यांना अतिशय आनंद झाला. सात वाजता बोट बंदरास लागली. किरकोळ वस्तू विकणारी सोमाली शिद्दी मुले धमाल उडवीत होती. विठ्ठल रामजींनी त्यांच्याकडून १ शिलिंगाला एक शिंपल्याचा हार व टिक्का विकत घेतला. साडेनऊ वाजता बोट सुरू झाली. शिंदे यांच्या ठिकाणी चर्चेचा उत्साह असल्याने पाच सोबत्यांसह त्यांच्या खोलीत सभा झाली. श्र. कोतवाल यांनी व्यापारासंबंधी माहिती दिली तर विठ्ठल रामजी शिंदे हे विश्वात्मक एकेश्वर धर्मासंबंधी बोलले. २७ तारखेला सकाळी समुद्र इतका शांत होता की त्यांना वाटले सायंकाळच्या वेळेला तळेही इतके शांत नसेल. मंद वारा वाहत होता. समुद्रावरचा हा देखावा त्यांना रमणीय वाटला. सभेचा उपक्रम चालूच होता. दुपारी दोन वाजता त्यांच्या खोलीत सहा सोबत्यांची सभा भरली. मित्र आणि नायडू यांची भाषणे झाली. नायडूंनी सुमारे तासभर भाषण करून हैदराबाद संस्थानातील आधुनिक शिक्षणप्रसार, तेथील लोकस्थिती, राज्यव्यवस्था, दरबार, नबाबसाहेब व प्रधानमंडळ ह्याबद्दल सविस्तर माहिती चांगली सांगितली.५

१ ऑक्टोबरला रात्री बारा वाजता बोट पोर्टसैदला पोहोचली. त्या वेळी विठ्ठल रामजी शिंदे गाढ झोपेत होते. चार वाजता त्यांना जाग आली. अंधारात पोर्टसैद पाहिले. मोती बुलासाची त्यांना आठवण होऊन फार वाईट वाटले. सकाळी सहा वाजता डेकवर जाण्यापूर्वी बोट बंदरातून निघाली होती. ते उठले आणि त्यांनी आजूबाजूला पाहिले तेव्हा बोटीवर कोळसा घेण्याची गडबड चाललेली दिसली. चमत्कारिक भयाण देखावा दिसत होती. विठ्ठल रामजींच्या मनात आले अशा परदेशात आमचा मोती स्वस्थ निजला होता.६

विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्या ठिकाणी शिस्त, निष्ठा आणि जबाबदारीची जाणीव उत्तम प्रकारची होती. बोटीवरून त्यांनी बाबा, जनाबाई ह्या कुटुंबीयांना तसेच प्रार्थनासमाजातील आणि बाहेरच्या मित्रमंडळींना नियमितपणे पत्र पाठविण्यास सुरूवात केली. द्वा. गो. वैद्य हे सुबोधपत्रिकेचे संपादक होते. पत्रिकेसाठी नियमितपणे लेख पाठविण्याचे विठ्ठलरावांकडून त्यांनी कबूल करून घेतले होते. त्याप्रमाणे बोटीवरूनच प्रवासवर्णनपर लेख पत्रिकेसाठी पाठविण्यास त्यांनी सुरूवात केली. एकंदरीत समुद्रप्रवासाचे आणि एडन बंदर, सुवेज कालवा इत्यादिकांचे शब्दचित्रमय व माहितीपर वर्णन सुबोधपत्रिकेत केले आहे. २ ऑक्टोबरला दुपारी त्यांची आगबोट कॅडिया व क्रीट बेटाजवळ आली. दोन-दोन पुरुष उंच अशा लाटा येत होत्या, त्यामुळे बोट फारच हालू लागली. दुस-या दिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना इतालीचा किनारा दिसू लागला. इतालीच्या किना-यावरील मेलिटो, रेजियो ही शहरे दिसू लागली. संध्याकाळच्या वेळेला स्ट्रंबोलीचा ज्वालामुखी पर्वत दिसू लागला. सहा वाजण्याच्या सुमारास ह्या पर्वताच्या शिखरातून निघणारा धुराचा लोटही दिसत होता. ४ तारखेस जलप्रवासानंतर त्यांची आगबोट मार्सेय ह्या फ्रान्समधील बंदरावर पोहोचली. सकाळची न्याहरी आटोपून विठ्ठरावांनी आणि त्यांच्या सोबत्यांनी पर्शिया बोटीचा निरोप घेतला व साडेनऊ वाजता युरोपच्या किना-यावर पाय ठेवला.

विठ्ठलराव आणि त्यांचे पाच सोबती हे मिळूनच लंडनला जाणार होते. मार्सेयमध्ये त्यांना बारा तासच राहावयास मिळणार होते. ह्या सगळ्यांनी थॉमस कुक कंपनीच्यामार्फत तिकीट काढले होते. त्यांचे दुभाषे बंदरावर ह्या प्रवाशांची वाट पाहात होते. त्यांनी ह्या सगळ्या प्रवाशांचे सामान ताब्यात घेतले. हॉटेलची व्यवस्था केली. विठ्ठलराव आणि त्यांचे सोबती जेवण करून शहर पाहण्यासाठी म्हणून बाहेर पडले. मार्सेय हे फ्रान्सचे दुस-या क्रमांकाचे शहर. फ्रान्समध्ये फ्रेंच भाषेशिवाय इतर भाषेत बोलावयाचे नाही हा प्रघात जुनाच. इंग्रजीची मातब्बरी फ्रान्सात कुणास वाटत नाही. मि. कोतवाल यांना थोडीशी फ्रेंच भाषा अवगत होती. त्यासंबंधी विठ्ठल रामजींनी लिहिले आहे, “आमच्या व्यापारी पार्शी सोबत्यास फ्रेंच भाषेत थोडीशी जीभ हालविता येत होती त्याचा आम्हांस अतोनात फायदा झाल.”७

स्वच्छता, सौंदर्य, फ्रेंच नखरा आणि नटवेपणा याबद्दलच्या फ्रान्सच्या लौकिकाला शोभेल असेच मार्सेयचे रूप असल्याचे त्यांना जाणवले. त्यांच्या स्वतःच्या पोशाखाबद्दलच्या प्रतिक्रियेचा जो अनुभव पुढची दोन वर्षे युरोपात त्यांना येत राहिला त्याची पहिली प्रचीती मार्सेयमध्येच अनुभवावी लागली. युरोपातील हवामानाच्या दृष्टीने कोट, विजार वगैरे पाश्चात्य धाटणीचा पोशाख करणे जरी त्यांना भाग होते तरी देशीपणाचा किमान भाग टिकवावा म्हणून त्यांनी डोक्यावर पाश्चात्य धर्तीची हॅट न घातला फेटाच वापरावयाचा ठरविले होते. गुलाबी रंगाचा फेटा बांधून ज्या वेळेला मार्सेयमध्ये ते आपल्या सोबत्यांबरोबर रस्त्यातून जाऊ लोगले त्या वेळेला त्यांना पाहण्यासाठी स्त्री-पुरुषांची मोठी गर्दी जमत असे. बायका आपल्या लहान मुलांस कडेवर घेऊन त्यांच्याकडे बोट दाखवू लागल्या. तरुण मुली घरात पळत जाऊन इतरांस बाहेर बोलावून त्यांना पाहत उभ्या राहत. ह्या त्रासामुळे त्यांचे सोबतीही कुरकुरू लागले. खरे त्यांच्या फेट्यासंबंधी चर्चेला सुरुवात बोटीवरच झाली होती. मार्सेय बंदरावर बोटीवरून उतरताना त्यांच्याबरोबर
येणा-या एका इंग्रज सिव्हिलियनाने त्यांच्याजवळ जाऊन मोठ्या आस्थेने विचारले की, “काय हो, हे तमुच्या डोक्यावरचे तुम्ही लंडनपर्यंत कायम ठेवणार की काय? लंडनची मुले वात्रट आहेत. ती तुम्हांस त्रास देतील.” शिंदे त्याला म्हणाले, “विलायतेस पोलीसची व्यवस्था चांगली आहे ना?” यावर तो सिव्हिलियन निरुत्तर झाला.

फ्रेंच लोकांचा उल्हासीपणा आणि सुखोपभोग घेण्याची वृत्ती रस्त्यावरून फिरतानाही ध्यानात येत होती. हॉटेलसमोरच्या स्वच्छ सुंदर प्रशस्त जागी रस्त्याला लागूनच खुर्च्या टाकून रस्त्यावरची मौज पाहत चकाट्या पिटीत लोक उपाहार घेताना दिसत असत. विठ्ठल रामजींना दुसरा एक आल्हाददायक प्रकार दिसला. रस्त्याच्या दोन्ही बाजूस लावलेली झाडे उंच व दाट होऊन एकमेकांत इतकी मिसळून गेलेली होती की, भर दोन प्रहरीदेखील ह्या रुंद रस्त्यात गर्द छाया होती. अशा ठिकाणास तेथे ‘बुलवर्ड’ असे म्हणतात. जागजागी विश्रांती घेण्यास बाके ठेवलेली आढळली. ह्या रस्त्यामधून लोक हिंडताना अथवा बाकावर बसलेले दिसून येत.

विठ्ठल रामजी आणि त्यांचे सोबती मार्सेय येथे ‘नॉटर डेम द ला गार्ड’ हे उंच टेकडीवर असलेले, येशू ख्रिस्ताची आई मेरी हिचे देऊळ पाहावयास गेले. येशू ख्रिस्त मुलास खेळवीत आहे, दुःखितांचे अश्रू पुसत आहे अशी येशू ख्रिस्ताच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवरची सुंदर चित्रे देवळामध्ये टांगलेली होती. हे देऊळ पाहत असताना तुळजापूरची भवानी, सौंदत्तीची यल्लमा, कोल्हापूरची महालक्ष्मी या देवस्थानांची त्यांना आठवण येऊन त्यांच्या मनात काही विचार आले. ख्रिस्त्याने हिंटूस हीदन, ऑयडोलेटर (मूर्तिपूजक) इत्यादी नावे ठेवून कितीही हिणविले असेल तरी त्याने आपली आकारप्रियता येथे पूर्ण व्यक्त केली आहे. ही उणीव आपल्यास पूर्ण ब्रह्मज्ञानी, अद्वैती इत्यादी इत्यादी जाड्या संज्ञा देऊनही त्याच्या पाठीची लिंगपूजा अद्याप सुटली नाही आणि इकडे पाश्चात्त्य पॅगनचा ख्रिस्ती झाला तरी मूर्तिपूजा आणि विभूतिपूजा याने कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने घेरले आहेच.”८ ह्या देवळात गणपती, मारुती आणि देवी ह्यांच्या मूर्तीचा शेंदूर, तेल आणि बेढब वस्त्रालंकार यांच्याखाली मूळच्या रूपाच्या लोप झालेला असतो. देवळाच्या भिंतीवर चित्रे गावठी जिनगरांनी काढलेली असतात आणि त्यांचे विषय कोठे मारुतीने कुंभकर्णाच्या बाबतीत चित्रकार व शिल्पकार ह्यांची मदत घ्यावयाची झाल्यास सौंदर्यशास्त्री आणि नीतिशास्त्री ह्यांच्या सल्ल्याने घ्यावयास पाहिजे. आमच्यात कलाकौशल्य कमी नाही. आम्ही नीतीने कमी नाही, की आमची पुराणे, दंतकथा, इतिहास यामध्ये उदात्त विषयाची वाण नाही. तेव्हा गौतमबुद्धाचा स्वार्थत्याग, बाबा नानकाची सुधारणा, कबीराची सत्यप्रीती आणि तुकोबाची भक्ती इत्यादी अनेक सुबोधपर विषयांची निवडणूक करून रविवर्म्यासारखा मार्मिक चित्रकारांनी त्यावर आपले चातुर्य खर्चिले, तर आमच्या देवळांच्या सौंदर्यात पावित्र्यात किती भर पडेल बरे.”९

जेवण आटोपल्यावर ‘पॅलेस डी ला शांप’ नावाचा, टेकडीत पहिले दोन मजले कोरलेला व बाकीचे मजले त्यावर बांधलेला महाल त्यांनी पाहिला. सुंदर व तरुण स्त्रियांची चित्रे आणि शिल्पे पाहून ते प्रभावित झाले.

रात्री जेवण आटोपून विठ्ठल रामजी आणि त्यांचे सोबती रेल्वेने पॅरीसला जाण्यास निघाले. डी जॉन स्टेशनापासून पॅरीसपर्यंत वाटेत शेते, कालवे, द-या, बोगदे, गावे इत्यादिकांचा सुंदर देखावा गाडीतून दिसत होता. त्यांना जाणवले, फ्रेंच लोकांची सौंदर्याभिरुची त्यांच्या शेतातूनही दृष्टीस पडते. ह्यांची शेते म्हणजे केवळ बागाच! फ्रान्सची शेते सकाळच्या वेळी गाडीतून धावत असताना प्रथमच पाहून एखाद्या नवख्यास इतर ठिकाणी राजा होण्यापेक्षा फ्रान्स मध्ये शेतकरी होणे बरे, असे वाटल्यास त्यात नवल काय.

सकाळी दहा वाजता ते पॅरीसला पोहोचले. पॅरीस येथे त्यांचा मुक्काम जेमतेम बारा तासांचाच होता. मुद्दाम बांधलेले मोठेमोठे सुंदर महाल पाहत ते ऐतिहासिक राजपुरुषांची थडगी असलेली स्मशानभुमी पाहवयास गेले. तेथे नेपोलियनचे भव्य कबरस्तान पाहिले. ‘द बिग व्हील’ ह्या नावाचे प्रचंड राक्षसी चक्र बघितले. सुप्रसिद्ध एफेल टॉवर अर्धा चढून गेल्यावर जोराचा पाऊस व सोसाट्याचा वारा सुरू झाल्यामुळे वरपर्यंत जाण्याचा विचार त्यांनी रहित केला. हा मनोराही १८८९च्या प्रदर्शनासाठी बांधलेला होता. हा मनोरा पाडावा यासंबंधी त्या वेळी वाद चालला होता. पाडावा असे म्हणणा-यांचा एक मुद्दा असा होता की, मनोरा बेढब झाला आहे.

रात्री साडेनऊ वाजता पॅरीसचा मुक्काम संपवून विठ्ठल रामजी बोटीने निघाले. रात्री एक वाजता कॅले येथे पोहोचले. तेथून निघून सात ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता लंडन येथे पोहोचले.

लंडनला आल्यानंतर टालबट रोडवरील ८२ क्रमांकाच्या घरात रोमेशचंद्र दत्त यांच्या
बि-हाडी विठ्ठल रामजी उतरले. रोमेशचंद्र दत्त हे बंगालमधील अगदी प्रारंभीचे आय़. सी. एस अधिकारी, थोर लेखक व अभ्यासू होते. १८९९ मध्ये राष्ट्रसभेचे अध्यक्षही झाले होते. १८९७ मध्ये आय. सी. एस अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर लंडन विद्यापीठात भारतीय इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे त्यांचे चाहते होते. त्यांच्या इच्छेवरून दत्त हे १९०४ साली संस्थानच्या मुलकी सेवेत रुजू झाले व १९०९ साली ते संस्थानचे दिवाण म्हणूनही नियुक्त झाले. १० संस्थानचा व रोमेशचंद्र दत्त यांचा स्नेहाचा संबंध ध्यानात घेऊन कारभा-यांपैकी कोणीतरी शिंदे हे लंडनला गेल्यावर त्यांची दत्त यांच्या बि-हाडी राहण्याची व्यवस्था केली असावी. दत्त हे हवा पालटण्याकरिता बाहेरगावी गेलेले होते. त्यांच्याच बि-हाडी शिंदे राहिले होते. लंडनच्या मुक्कामात युनिटेरियन समाजाचे सेक्रेटरी कोपलंड बोवी यांची त्यांनी भेट घेतली. ८ ऑक्टोबरचा सगळा दिवस युनिटेरियन प्रॉव्हिन्शियल असेम्ब्लीच्या वार्षिक सभेमध्ये घालविला. दोन दिवस लंडनमध्ये मुक्काम करून ११ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता रेल्वेने ऑक्सफर्डला जाण्यासाठी निघाले व तासाभराने ऑक्सफर्डला पोहोचले. मुंबईहून सुरू झालेला त्यांचा प्रवास संपला. तो सुखाचा झाला ह्याबद्दल त्यांनी परमेश्वराचे मनोमन फार आभार मानले.

संदर्भ
१.    शिंदे यांची १९०१ सालातील छोटी डायरी, शिंदे यांची कागदपत्रे.
२.    तत्रैव.
३.    विठ्ठल रामजी शिंदे, ‘जलप्रवास’, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. ५.
४.    शिंदे यांची १९०१ सालातील छोटी डायरी, शिंदे यांची कागदपत्रे.
५.    तत्रैव.
६.    तत्रैव.
७.    विठ्ठल रामजी शिंदे, ‘मासेय शहर’, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. ९.
८.    तत्रैव, पृ. १३-१४.
९.    तत्रैव, पृ. १४-१५
१०.    दा. ना. आपटे, (लेखक व प्रकाशक), श्री सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र, खंड २, बडोदा, १९३६, पृ. ७४०-७४५.

मिशनसंबंधी आक्षेप व समस्या

दुष्काळाच्या आपत्तीतून मांग लोकांना सर्व प्रकारचे साहाय्य करण्याचे काम १९२१च्या मार्चमध्ये जवळ जवळ संपत आले. नगर जिल्ह्यातून आलेली दुष्काळपीडित माणसे परत गेली. दुष्काळनिवारक कमिटीचेही विसर्जन करण्यात आले आणि ह्या कामातून मोकळे झाल्यावर विठ्ठल रामजी शिंदे हे अहल्याश्रमाची इमारत उभी करण्याच्या कामला नेटाने लागले. अमृतलाल ठक्कर ऊर्फ ठक्करबाप्पा हे अण्णासाहेबांचे मुंबईपासूनचे सहकारी होते. अहल्याश्रमामध्ये उभ्या मोठ्या करावयाच्या विविध इमारतींचे नकाशे तयार करण्याचे काम ते स्वतःच इंजिनियर असल्यामुळे त्यांनी मोठ्या दक्षतेने करून दिले. आता युद्ध संपले होते. मिशनचे हितचिंतक रँ. र. पु. परांजपे हे शिक्षणमंत्री झाले होते. अहल्याश्रमाच्या बांधकामासाठी


रु. ऐंशी हजार एवडी मोठी मदत मुंबई सरकारच्या वतीने त्यांनी मंजूर केली. इमारतीसाठी पाया खणून झाला. ज्यांच्या पहिल्या देणगीने अहल्याश्रमाच्या कल्पनेला चालना मिळाली व आता त्या कल्पनेला मूर्त स्वरूप येऊ लागले होते त्या श्रीमंत तुकोजीराव होळकरांना पायाचा दगड बसविण्यासाठी निमंत्रण करावे म्हणून शिंदे श्रीमंत तुकोजीराव होळकरांना भेटण्यासाठी इंदुरास गेले, परंतु तेथे तुकोजीरावांवर अनपेक्षितपणे संकट कोसळलले होत्. त्यांना पदच्युत करण्याची धामधूम चालली होती. अर्थात त्यांना निमंत्रण न करताच शिंदे परत आले.


अहल्याश्रणाच्या रूपाने मिशनच्या कार्याला स्थायी स्वरूप येत असताना अण्णासाहेब शिंदे यांच्यावर कठोर स्वरूपाची, एवढेच नव्हे तर अत्यंत अशोभनीय स्वरूपाची, टीका अस्पृश्यवर्गाकडूनच होऊ लागली. याचे दृश्य कारण एवढेच की मिशनच्या मोठमोठ्या इमारती होऊ लागल्या होत्या. मिशनचे एके काळचे विद्यार्थी ज्ञानदेव घोलप मूकनायक ह्या साप्ताहिकांचे संपादक म्हणून काम पाहत होते. १९२१ साली त्यांनी प्रत्येक अंकातून अत्यंत निर्दय स्वरूपाचा हल्ला शिंदे यांच्यावर सुरू केला. त्यांची आणि एकंदर अस्पृश्यवर्गातील पुढा-यांची मुख्य तक्रार अशी होती की, मिशन मिळवीत असलेल्या पैशाचा योग्य उपयोग करीत नाही. इमारती बांधण्यामध्ये एवढा मोठा पैसा व्यर्थ खर्च होत आहे. २७ मार्च १९२०च्या मूकनायकमध्ये खालील पत्र प्रसिद्ध झाले आहे. “निराश्रित साह्यकारी संस्था स्थापन होऊन आज तेरा वर्षे झाली. बहिष्कृतांना शिक्षण देऊन त्यांच्यात जागृती उत्पन्न करणे हे मिशनचे ध्येय आहे. या कामी लोक आणि सरकारकडून मिशनला हजारो रुपये मिळत आहेत, परंतु त्या मानाने मिशनचा उद्देश कितपत सिद्धीस गेला याची आम्हास मोठीच शंका आहे. एवढेच नव्हे तर मिशनच्या कार्यावरून तिच्या हेतूविषयी बहिष्कृतवर्गात अविश्वास उत्पन्न झाला आहे. असो. ज्या अर्थी बहिष्कृतवर्गाच्या नावावर मिळणा-या हजारो रुपयांचा मिशन चुराडा उडवीत आहे त्या अर्थी रा. शिंदे काहीही म्हणोत हे पैसे आपल्या पदरात पडतात की नाही, हे पाहणे बहिष्कृतवर्गाचे कर्तव्य आहे. अतएव मिशनच्या कामाची चौकशी करण्याकरिता एक कमिटी नेमणे अत्यंत आवश्यक आहे.- मिशनचा हितेच्छूक.”


माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणेच्या अनुरोधाने शिंदे यांच्या भूमिकेबद्दल अस्पृश्यवर्गीयांचा गैरसमज झालेला होता. शिंदे यांनी स्वतः साऊथबरो कमिशनला दिलेले लेखी निवेदन व प्रत्यक्ष साक्ष यांमध्ये अस्पृश्यवर्गांला स्वतंत्र, राखीव मतदारसंघ असावा व मतदानपात्रतेच्या संदर्भात अटी शिथिल कराव्यात, त्यांना मुंबई इलाख्यात एकंदर सात जागा द्याव्यात, अशीच आग्रहपूर्वक मागणी केली होती. त्यांनी अस्पृश्यवर्गाच्या हिताच्या मागण्या केल्या ह्या बाबींकडे त्यांच्या आक्षेपकांनी पूर्ण दुर्लक्ष केले. निवडणुकीची धामधूम संपली व सरकारने शिंदे आणि आंबेडकर यांच्या मताची आणि मागणीची अजिबात पर्वा न करता अस्पृश्यवर्गातून एकच सदस्य-तोही सरकारने नियुक्त केलेला-कौन्सिलात जावा असा निर्णय घेतला. सरकारच्या ह्या निर्णयाबद्दल त्याला टीकेचे लक्ष्य न बनवता शिंदे यांच्यावरच अस्पृश्यवर्गातील शिकलीसवरलेली मंडळी सर्व प्रकारे हल्ला करून लागली. ज्यांच्या उन्नतीसाठी आपण दीड तप अतोनात परिश्रम घेतले व ज्यांच्या उन्नतीसाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न केले, त्याच वर्गाचा आपल्यावर आता विश्वास राहिला नाही, तेच आपली निंदानालस्ती करून लागले आहेत ह्या विपरीत वस्तुस्थितीने अण्णासाहेबांच्या मनाला स्वाभाविकपणेच वेदना झाल्या. त्यांनी म्हटले आहे, “ज्यांच्यासाठी मी जीवाचे आणि घरादाराचे रान केले तेच माझ्यावर असंतुष्ट होते. कारण काय तर आता मोठमोठ्या इमारती होऊ लागल्या.”१


मातृसंस्थेतील लोक या वादाच्या मुळाशी जाईनात. या लोकांचे व्यर्थ लाड करून नयेत असा वरवरचा उपदेश करून ते अण्णासाहेब शिंदे यांचीच समजूत घालू लागले. मिशनच्या जनरल सेक्रेटरीशिपचा राजीनामा त्यांनी मुंबईला इंदूरहूनच पाठविला होता. मूकनायकाच्य प्रत्येक अंकात बोर्डिंग चालविण्यात होणारा अनाठायी खर्च, विद्यार्थ्यांकडे होणारे दुर्लक्ष, त्यांच्या जेवणाची गैरव्यवस्था, त्यांना मिळणारी कठोर वागणूक इत्यादी बाबींच्या संदर्भात अत्यंत कठोर शब्दांत आरोप करणारे लेखन येऊ लागले. मुंबई येथील डी. सी. मिशनच्या कामाचा राजीनामा वामनराव सोहोनींनी दिला होता. त्यांच्याऐवजी श्री. कृ. गो. पाताडे हे तेथे गेले होते व वसतिगृहाची पाहत होते. त्यांच्याबद्दल सातत्याने मूकनायकांमधून टीका येऊ लागली.२


वस्तुतः श्री. गणेश आकाजी गवई व पं. नं. भटकर हे मिशनच्या वसतिगृहातून वरिष्ठवर्गाचे शिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेसाठी झटू लागले होते. ह्या दोघांचीही भूमिका अण्णासाहेब शिंदे यांच्याबद्दल प्रारंभी कृतज्ञतेची व नंतर विरोधकाची दिसून येते. अस्पृश्यांच्या उच्च शिक्षणासाही हयगय करून विद्यार्थिगृहे व उद्योगशाळा काढण्यात मिशन पैशाचा अपव्यय करीत आहेत, अशा प्रकारची तक्रार ह्या पुढारीवर्गाकडून होऊ लागली होती. खरे तर, मिशनने होतकरू, अभ्यासू विद्यार्थ्याला सातत्याने प्रोत्साहनच दिले होते. मिशनच्या बोर्डिंगमध्ये असलेले विद्यार्थी पां. नं. भटकर हे १९१८ सालच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत नापास झाले होते. मिशनच्याच प्रयत्नाने ते नोकरीस लागले. १९१९ साली पुन्हा कॉलेजच्या पहिल्या परीक्षेस बसले व पास झाले. आपल्याला कॉलेज कोर्स पुरा करावयाचा असेल तर मिशन मदत करावयास तयार आहे, मग चार सोडून आठ वर्षे लागली तरी हरकत नाही; फक्त बोर्डिंगात राहून अभ्यास केला पाहिजे, असे त्यांना सांगण्यात आले होते. भटकर यांना स्वतः शिंदे यांनी श्रीमंत सयाजीराव महाराजांकडे नेऊन २५ रुपयांची दरमहा स्कॉलरशिप मिळवून दिली होती. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. ३० मे १९२०च्या सुबोधपत्रिकेत ह्या संदर्भातील वस्तुस्थिती नमूद करताना म्हटले आहे, “मिशन स्थापन झाल्याला आज अवघी तेरा वर्षे झाली. इतक्या अवकाशात ज्यांची मजल मॅट्रिकपर्यंत पोहोचली अशा विद्यार्थ्यांची माहिती वर थोडक्यात दिली आहे... आज मुंबई बोर्डिंगात नऊ-दहा मुले हायस्कूनचे शिक्षण घेत असून लवकरच मॅट्रिकच्या परीक्षेला बसतील अशी त्यांची तयारी आहे, ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे मिशन उच्च शिक्षणाच्या कितपत विरोधी आहे या आरोपाचा निकाल लागेल. रा. गवई व रा. भटकर ह्या मॅट्रिक पास झालेल्यांची रा. शिंदे यांच्याच खटपटीने सेंट झेवियर्स आणि फर्ग्युसन कॉलेजात पुढील अभ्यासाची सोय झाली असून तिचा त्यांनी फायदा घेतला नाही. बोर्डिंगे व शाळागृहे इत्यादिकांची किती जरुरी आहे हे आंधळ्यालाही दिसण्यासारखे आहे, असे असून आमच्या अस्पृश्य बांधवांना या गोष्टी निरर्थक वाटतात व ह्या गोष्टीवर पैसा खर्च करणे म्हणजे खराबी करणे वाटते. पैस कुणाचा, खर्च कोण करतो, निषेध करतो कोण! सर्वच काही चमत्कार.


“... आज उच्चवर्णाच्या लोकांनी नीच मानलेल्या लोकांचा जो पक्ष घेतला आहे तो त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी व त्यंना मार्ग दाखविण्यासाठी आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. अस्पृश्यांनी स्वतःचा उद्धार आपला आपणच केला पाहिजे. स्वतः त्यांनी आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे असे आम्ही पुष्कळ वेळा म्हटले आहे. परंतु ही मंडळी स्वतः थोडी चळवळ करू लागली की, तीस प्रारंभ उच्च वर्णाच्या द्वेषाच्या द्वारे होत असतो, हे एक नवीनच विघ्न उपस्थित होते. दुसरी एक खेदाची गोष्ट आम्ही अनुभवली आहे की, अस्पृश्यवर्गीयांपैकी काही मंडळी पुढे गेली म्हणजे मग त्यांना आपल्या मागासलेल्या बंधूंची आठवण पडत नाही, ते आपल्यापैकीच आहेत हे ते विसरतात. पुढे गेलेल्यांमध्ये मागे राहिलेल्या संबंधाने जागृत सहानुभूती कशी उत्पन्न करता येईल हा फार महत्त्वाचा प्रश्न नीच मानलेल्या जातींची कळकळ बाळगणा-यांपुढे आहे.”३


कोनशिला समारंभासाठी श्रीमंत तुकोजीराव होळकर येऊ शकणार नाहीत हे स्पष्ट झाल्यावर अण्णासाहेबांनी म्हैसूरचे युनराज कांतिरवमहाराज यांना पाचारण करण्याचे ठरविले व त्यांनीही मोठ्या आनंदाने कोनशिला समारंभाचे निमंत्रण स्वीकारले. ५ सप्टेंबर १९२१ ह्या गणेशचतुर्थीच्या दिवशी समारंभ निश्चित झाला. अहल्याश्रमाच्या पटांगणात भव्य मंडप घालण्यात आला. सर कांतिरव नृसिंहराज वाडियर यांनी अध्यक्षस्थान मंडित केले. गावातील प्रमुख मंडळींनी व प्रेक्षकांनी मंडप खचून भरला. समारंभाच्या प्रारंभी प्रास्ताविक केल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली. ती म्हणजे, मिशनचा कारभार प्रामुख्ये अस्पृश्यवर्गीय मंडळींवर सोपविण्यात येणार आहे. ह्याबाबत सुबोधपत्रिकेने वृत्तान्त दिला आहे तो असा : “गेल्या सोमवारी पुणे शहरी अहल्याश्रमाची कोनशिला बसविण्याचा समारंभ म्हैसूर युवराजांच्या हस्ते झाला. त्या वेळी रा. शिंदे यांनी फार सुंदर व जागृतिकारक भाषण केले. ज्यास आज बहुजन समाज अस्पृश्य समजत आहे त्यांच्या उद्धारकार्याला आपल्याला स्वतःला वाहून घेतले व त्यांच्याच चळवळीचे फळ म्हणून त्या लोकांमध्ये आता जागृती उत्पन्न झाली असता, रा. शिद्यांच्या हेतूचा अस्पृश्यातील काही लोक विपर्यास करू लागले आहेत. त्यांच्याविषयी रा. शिंदे यांचे उद्गार सर्व अस्पृश्यांनी लक्षात घेण्यासारखे आहेत. नि. सा. मंडळीचा उद्देश अस्पृश्यांत स्वाभिमान उत्पन्न करून त्यांस स्वालंबी करण्याचा होता व आहे. ही विचारजागृती होत असल्याची चिन्हे दिसत आहेत व त्याबद्दल शिंद्यानी संतोष प्रदर्शित केला आहे. हे  मिशन ह्याच मंडळींसाठी आहे व त्यांनीच ते चालवावे हे केव्हाही योग्यच. रा. शिंदे यांची त्यास तयारीही आहे. परंतु आम्हाला तर असे वाटते की, मिशनसारखी संस्था स्वतंत्रपणे चालविण्याची पात्रता अद्याप आमच्या अस्पृश्य गणल्या गेलेल्या बांधवांत आली नाही. हा त्यांचा दोष नव्हे, बहुतकाल अज्ञानाच्या स्थितीत राहिल्यामुळे ही स्थिती प्राप्त झाली आहे. ह्यासाठी जागृतीचे कार्य वरिष्ठवर्गाकडून होणे इष्ट व अगत्याचे आहे. वरिष्ठवर्गाने या वर्गाविषयी अन्याय केला आहे तो वरिष्ठवर्गाच्याच गळी उतरविला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की, निराश्रित साह्यकारी मंडळीसारखी संस्था सहकारी तत्त्वावर चालणे शक्य आहे. परंतु केवळ सर्व सत्ता आपल्या हाती असावी व त्या संस्थेस वाहून घेतलेल्यांनी ह्या नव्या जागृत होऊ पाहणा-या लोकांच्या हाताखाली वागावे असे कोणी म्हटले तर ते अत्यंत अप्रयोजक होय. ज्याच्यासाठी ही सर्व खटपट आहे, त्याच्यामध्ये जागृती झाली तर ही मंडळी स्वतःच्या पायावर उभी राहून कार्यक्षम होऊ लागली की नि.सा. मंडळी आपोआपच आपले दप्तर आवरायास लागेल.”४ शिंदे यांच्या प्रास्ताविकानंतर गोपाळ कृष्ण देवधर वगैरे काही वक्त्यांची भाषणे झाली. मुलांचे प्रेक्षणीय खेळ झाले. युवराजांनी जाऊन कोनशिला बसविली. त्यानंतर त्यांचे शुभेच्छादर्शक भाषण झाले. आभार मानल्यावर सभा बरखास्त झाली.


सुमारे वर्ष-दीड वर्ष विठ्ठल रामजी शिंदे व डी. सी. मिशन ही संस्था यांवर काही अस्पृश्यवर्गीय मंडळी व नेते यांच्याकडून टीकेचा भडिमार चालला होता. कार्यबद्धतीवर आक्षेप घेण्यात येत होते. हेतूबद्दल शंका प्रकट केली जात होती. तेव्हा याबाबतचे सत्यही वस्तुनिष्ठपणे उघडकीस यावे अशा प्रकारची योजना विठ्ठल रामजी शिंदे यांनी ह्या प्रसंगीच केली होती. समारंभानंतर जवळच्या इमारतीमध्ये ब-याचशा खुर्च्या घालून एका गुप्त बैठकीची व्यवस्था अगोदरच ठेवण्यात आली होती. या बैठकीत अस्पृश्यांच्या तक्रारी, मागण्या व सूचना काय आहेत हे युनराजांच्या कानावर प्रांजळपणे घालण्यात यावे, अशा प्रकारचे आवाहन सर्व अस्पृश्यवर्गीयांना केले होते. स्पृश्यवर्गापैकी या बैठकीस कोणीही हजर राहून नये; मिशनच्या चालकांपैकी कोणीही ह्या गुप्त सभेच्या जवळ फिरकू नये असा कडेकोट बंदोबस्त अस्पृश्य स्वयंसेवकांकरवीच ठेवण्यात आला होता. मुख्य समारंभानंतर या व्यवस्थेनुसार युवराज गुप्त बैठकीच्या ठिकाणी गेले. अस्पृश्यांचे म्हणणे ऐकून युवराजांनी आपले जे मत होईल ते वर्तमानपत्रातून जाहीर करावे अशी त्यांना विनंती करण्यात आली होती. योजनेनुसार बैठक झाली. युवराजांनी मंडळींचे म्हणणे ऐकून घेतले, पण बैठक आटोपल्यानंतर “जाहीर करण्यासारखे काहीच आढळले नाही. सर्व ठाकठीक आहे” असा अभिप्राय युवराजांनी प्रकट केला. निश्चित स्वरूपाचे कोणतेही आक्षेप विठ्ठल रामजी शिंदे अथवा मिशन संस्था यांवर विरोधकांना घेता आले नाहीत हाच ह्या घटनेचा इत्यर्थ होता.


विठ्ठल रामजी शिंदे यांना अस्पृश्यवर्गीयांकडून ज्या काळात विरोध सुरू झाला त्याच काळात मुंबई येथील मातृसंस्था आणि शिंदे यांच्यामध्येही विसंवाद निर्माण झाला होता. शिंदे यांनी मिशनच्या जनरल सेक्रेटरीशिपचा राजीनामा आधीच दिला होता. कमिटीने ते काम गिरिजाशंकर त्रिवेदी यांजकडे सोपविले, तरीही विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणजे घटनामंत्र्याचे काम करावे असा एक्झिक्युटिव्ह कमिटीने ठराव केला. खरे तर संघटनेचेच काम दगदगीचे होते. ह्या व आतापर्यंत केलेल्या अविश्रांत परिश्रमामुळे व प्रतिकूल वातावरणामुळे विठ्ठल रामजी हे काम करावयास वस्तुतः कंटाळले होते. इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते म्हणून पुणे शाखेच्या स्थानिक सेकेटरीचा अधिकारही आपण सोडावा असे त्यांना वाटत होते, परंतु पुणे शाखा त्यांना ह्या जबाबदारीतून तूर्त तरी मोकळे करावयास तयार नव्हती. म्हणून काही काळ तरी ही जबाबदारी शिंदे ह्यांना पत्करावीच लागली.


प्रार्थनासमाजीतल धुरीण मंडळी तसेच मिशनमधीलही विठ्ठल रामजींचे काही सहकारी एका बाबतीत त्यांच्या धोरणाबद्दल असंतुष्ट होते. ती बाब म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांनी मिशनच्या कार्यकारी मंडळावर जहाल विचारसरणीची काँग्रेसमधील मंडळी निवडून येऊ दिली अथवा घेतली. विठ्ठल रामजींनी मुंबईमध्ये सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली मार्च १९१८ मध्ये भव्य प्रमाणावर अस्पृश्यता निवारक परिषद भरविली होती. ह्या परिषदेस काँग्रेसच्या टिळकांसह जहाल पुढा-यांना त्यांनी सामील करून घेतले होते. परिषदेच्या आधी पंधरा दिवसच सुबोधपत्रिकेच्या अंकामध्ये शिंदे यांना धोक्याचा इशारा देणारा इंग्रजी मजकूर लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले होते की, “ह्या परिषदेला मदनमोहन मालवीय, एवढेच नव्हेतर श्री. बी. जी. टिळक यांची सक्रिय सहानुभूती मिळविण्याचे प्रयत्न चालल्याचे ऐकले. काँग्रेसने याबाबतीत साहनुभूतीपर ठराव मागच्या अधिवेशनात मंजूर केला असल्यामुळे अशी सहानुभूती मिळविणे हे चांगले आहे. संस्थेचे जनरल सेक्रेटरी अलीकडे ह्याच दिशेने हालचाल करताहेत. आम्हाला असेही समजले की, राष्ट्रीय नेत्यांचे पाठबळ मिळविण्याच्या उताविळीने प्रमुख राष्ट्रीय मंडळींना डी. सी. मिशनच्या कार्यकारी मंडळामध्येही सामील करून घेण्यापर्यंत जनरल सेक्रेटरींची मजल गेली आहे... परंतु सहानुभूती मिळविणे ही एक गोष्ट, तर संपूर्ण यंत्रणाच राजकीय उलाढाल करणा-यांच्या हातात ठेवणे ही वेगळी गोष्ट. जनरल सेक्रेटरीच्या विरोधात पुष्कळ म्हणता येईल, बोलता येईल अशी परिस्थिती आहे. मला खात्रीने असे वाटू लागले आहे की, ते संस्थेचे कार्यकारी प्रमुख असण्यापेक्षाही प्रचारक व चळवळे अधिक आहेत आणि मिशनसारख्या रजिस्टर्ड संस्थेचा कारभार चालण्याच्या दृष्टीने ही गोष्ट योग्य आहे असे म्हणता येणार नाही.”

Read more: मिशनसंबंधी आक्षेप व समस्या

मिशनमधील दोन समारंभ

मिशनचा पहिला बक्षीस समारंभ
२६ सप्टेंबर १९०९ रोजी श्रीमंत सयाजीरावमहाराज ह्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शाखेचा पहिला बक्षीस समारंभ मोठ्या थाटाने पार पडला. ह्या प्रसंगी डॉ. भांडारकर, नामदार गोखले, लेडी म्यूर मॅकेंझी, भोरचे अधिपती, सरदार नौरोजी पदमजी वगैरे प्रतिष्ठित मंडळी समारंभास अगत्यपूर्वक उपस्थित राहिली होती. हा समारंभ इस्लामिया स्कूल हॉलमध्ये साजरा झाला. उपस्थितांची भरपूर गर्दी होती. कमिटीचे अध्यक्ष डॉ. मॅन ह्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

ह्या समारंभाच्या निमित्ताने एक वादग्रस्त प्रश्न उदभवला होता. महार जातीचे पुढारी श्री. शिवराम जानबा कांबळे ह्यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत सयाजीरावमहाराजांना एक मानपत्र देण्याचा विचार त्या मंडळींनी केला होता व हे मानपत्र केवळ महार जातीकडून देण्यात यावे असा त्यांचा आग्रह होता. इतर अस्पृश्य जातींनाही त्यात भाग घ्यावासा वाटत होता. समारंभाचा दिवस जवळ आला तरी हा वाद मिटण्याचा रंग दिसेना. म्हणून मुंबईहून जनरल सेक्रेटरी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना बोलाविण्यात आले. सर्व वर्गाच्या पुढा-यांना बोलावून त्यांनी सांगितले, “मिशनचे रजिस्टर्ड ट्रस्टडीड आहे. त्याबहुकूम मिशनलाच अशा प्रकारचा जातिविशिष्ट काम करण्याच अधिकार नाही. मिशनच्या कार्यामध्ये जी वरिष्ठवर्गीय माणसे आहेत ती सर्व जातींची व धर्मांची आहेत; पण त्यांनाही सार्वत्रिक उदार धर्माच्य पायावरच मिशनचे कार्य करावे लागत आहे. स्वतः महाराजसरकारांनाही जातिविशिष्ट मानपत्र रुचणार नाही. ह्या उप्पर महार लोकांचा आग्रहच असेल तर आणि महाराज असे मानपत्र स्वीकारीत असतील तर ह्या मंडपाचे बाहेर अन्य ठिकाणी व अन्य वेळी कुणीही मानपत्र द्यावे. येथेच आणि आताच द्यावयाचे असेल तर सर्व अस्पृश्यवर्गाने एकत्र येऊन द्यावे. त्यांनी हा एकत्रितपणा दाखविला नाही तर त्यांच्यासाठी काम करण्यामध्ये वरिष्ठवर्गालाही विघ्ने येऊ लागतील.”१

हा प्रसंग अनेक दृष्टींनी बोलका आहे. अस्पृश्य मानल्या गेलेल्या वेगवेगळ्या जातींमध्ये सवतासुभा करण्याची प्रवृत्ती त्या वेळी बलवत्तर होती. त्याचप्रमाणे मिशनचे काम हे व्यापक पायावर व जातिनिरपेक्ष भूमिकेवरू चालले पाहिजे हा शिंदे ह्यांचा आग्रह ठाम स्वरूपाचा होता. अखेरीस सर्वांची समजूत पटून मिळूनमिसळून हा समारंभ साजरा झाला. त्यानंतर सेक्रेटरी मुदलियार ह्यांनी अहवाल वाचला. लेडी म्यूर मॅकेंझी ह्यांचे सुंदर व जोरदार भाषण झाले. अखेरीस महाराजांनी यथोचित भाषण करून एक हजार रुपयांची देणगी दिली. श्रीमंत सयाजीरावमहाराजांना ह्याप्रसंगी मानपत्र देण्यात आल्यावर महार, मांग व चांभार जातींच्या तीन बायकांनी महाराजांना आरती ओवाळली. तेव्हा महाराजंनी प्रत्येकीच्या तबकात एक एक सोन्याची गिनी टाकली.

मिशनचा वाढदिवस
सप्टेंबर, ऑक्टोबर हे दोन महिने पुणे शाखेच्या दृष्टीने धामधुमीचे गेले. बक्षीस समारंभानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे १८ ऑक्टोबर १९०९ रोजी डिप्रेस्ड क्लासेस मिशन डे साजरा करण्यासाठी पुणे शहरातील किर्लोस्कर थिएटरात एक प्रचंड जाही सभा भरविण्यात आली. पुणे शहरात अशा प्रकारची ही पहिलीच जाहीर सभा होती. मिशनला चोहीकडून जरी मदत मिळाली तरी पुण्यासारख्या जुन्या वळणाच्या शहराची मदत अद्याप मिळावयाचीच होती. मिशनच्या कार्याला पुणेकरांची सहानुभूती मिळाली व साहाय्य मिळावे ह्या हेतूने हा समारंभ शिंदे ह्यांनी घडवून आणला. प्रिं. र. पु. परांजपे ह्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. ह्या समारंभात महारांचे पुढारी श्रीपतराव थोरात, सुप्रसिद्ध वकील ल. ब भोपटकर, मुसलमानांचे पुढारी इस्माईल बहादूर, हंपी येथील शंकराचार्यांचे पतिनिधी श्री. हरकारे, न. चिं. केळकर, प्रो. धर्मानंद कोसंबी अशा विविध जातिधर्मांच्या पुढारी मंडळींची जोरदार भाषणे झाली. अध्यक्षांचे आभार मानताना प्रो. धोंडो केशव कर्वे ह्यांनी आपली शंभर रुपयांची देणगी दिली. हरकारे ह्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी हंपीच्या शंकराचार्यांची ह्या कामाला प्रत्यक्ष सहानुभूती असल्याचे सांगून तिचे द्योतक म्हणून त्यांच्या आज्ञेनुसार ३०० रुपयांची देणगी दिली. ह्या सभेचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अण्णासाहेब शिंदे ह्यांना विशेष वाटत होते. त्यांनी म्हटले आहे, “ह्या सभेमुळे ह्या इतिहासप्रसिद्ध शहराचे हृदयकपाट उघडले.”२

पहिल्या सहा महिन्यांच्या अहवालाच्या अखेरीस मासिक वर्गणीदारांची जी यादी प्रसिद्ध झाली आहे तिच्याकडे नजर टाकल्यास शिंदे ह्यांचे मत रास्त होते असे वाटते. प्रिं. सेल्बी, प्रो. वडहाऊस, सी. एक किंकेड ह्या युरोपियन लोकांनी दरमहा वर्गणी द्यावयास सुरुवात केली होती. त्याप्रमाणे प्रा. एच. जी. लिमये, प्रो. व्ही. के राजवाडे, प्रो. गो. चि. भाटे, श्री. जी. व्ही. लेले, श्री. ह. ना. आपटे ही मंडळीही वर्गणीदार झाली होती. प्रिं. र. पु. परांजपे, रावबहादुर का. बा. मराठे, श्रीमती रमाबाई रानडे, ल. म. सत्तूर, प्रो. के आर. भातखंडे, प्रो. गो. कृ. देवधर ह्या मंडळींची तर प्रार्थनासमाजाबद्दल व प्रार्थनासमाजाने चालविलेल्या अशा प्रकारच्या कामाबद्दल आधीपासून सहानुभूती होती. अण्णासाहेब शिंदे हे फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते. विद्यार्थिदशेत त्यांचे मित्र असलेले केशवराव कानिटकर हे आता तेथे प्राध्यापक झाले होते. प्रिंग. र. पु. परांजपे ह्यांच्यासारखी इतर प्राध्यापक मंडळीही उदारमतवादी होती. त्यामुळे अस्पृश्यतानिवारणविषयक कामामध्ये फर्ग्युसन कॉलेजमधील मंडळींचे शिंदे ह्यांना नेहमीच साहाय्य होताना दिसून येते. वर्गणीदार व देणगीदारांच्या यादीमध्ये श्री. के. ए. सावंत, व्ही. एम्. सातपुते, वाय. आर्. जाधव ह्यांसारखी मराठावर्गातील मंडळींची नावेही आढळतात. एकंदरीत मिशनच्या कामासाठी शिंदे यांना पुणे शहरातील ब्राह्म, मराठा, अस्पृश्य जातीतील प्रमुख मंडळींचे, तसेच इंग्रज सनदी व लष्करी अधिका-यांचे साह्या मिळू लागले.

येथेच शिंदे यांच्या दृष्टिकोणाचा व कार्यपद्धतीचा एक विशेष ध्यानत घेऊ.
अस्पृश्यवर्गाची सर्वांगीण उन्नती करण्याच्या हेतूने विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनसाठी भारतातील मवाळ-जहाल राजकीय पुढारी, लहानमोठ्या संस्थानांचे अधिपती आणि अस्पृश्यवर्गातील विविध जातींचे पुढारी यांचे साहाय्य घेतले. त्याशिवाय कलेक्टर, कमिशन ख्रिस्ती मिशन-यांचे साहाय्य घेतले ही बाब विशेष लक्षणीय म्हणावी लागेल. त्यामागे शिंदे यांची विशिष्ट भूमिका होती असे दिसते.
महात्मा फुले व केशवचंद्र सेन यांचे आकलन करताना शिंदे यांनी म्हटले आहे, “आपल्या देशोद्धाराच्या कठीण संग्रामातत्यांनी निष्कपटी ख्रिस्ती मिशन-यांचे व उदारधी सरकारी सत्ताधा-यांचे साहाय्य घेण्याचे नाकारण्याचा तोरा दोघांनीही कधी मिरविला नाही.”३ शिंदे यांची राजकीय मते जहाल होती, परंतु इंग्रजांचा द्वेष करावा अशी भावना त्यांच्या मनात कधीही नव्हती. अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीचे कार्य हे देशोद्धाराचे कार्य आहे, देशाच्या घडणीचे कार्य आहे, ही जाणीव त्यांना होती. त्यामुळे स्वतःची प्रतिष्ठा ठेवून इतरांबद्दल म्हणजे परधर्मीयांबद्दल, परकीय राज्यकर्त्यांबद्दल आदराची भावना ठेवून माणुसकीच्या पातळीवरून व्यवहार करणे शिंदे यांच्याबाबती स्वाभाविक होते. प्रार्थनासमाजाचे मुखपत्र असलेल्या सुबोधपत्रिकेच्या टीकेचा रोख सदैव पाश्चात्त्य मिशनरी व येथील जहाल राजकारणी यांच्याकडे असे. शिंदे यांचे तसे नव्हते. आत्माभिमान ठेवून राष्ट्रउभारणीच्या कामी इंग्रजांचे सहकार्य घेण्याची भूमिका त्यांनी अगदी १९०६ पासूनच ठेवली. इंग्रजांबद्दल अशा प्रकारची भूमिका ठेवणारे राजा राममोहन रॉय, जगन्नाथ शंकरशेट, महात्मा फुले, केशवचंद्र सेन आणि महात्मा गांधी या विभूतींबद्दल शिंदे यांच्या मनात आदराची भावना होती, त्याचे हेही एक कारण होते.

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २३७-२३८.
२.    तत्रैव, पृ. २३८.
३.    विठ्ठल रामजी शिंदे, ‘महात्मा फुले व केशवचंद्र सेन,’ शिंदे लेखसंग्रह, पृ. २३७. १९२६ साली श्री. शिवाजी हायस्कूल, पुणे येथे दिलेले व्याख्यान.

मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल

डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केल्यानंतर अस्पृश्यतानिवारणकार्यास वेगाने चालना देण्याच्या दृष्टीने विठ्ठल रामजी शिंदे यांनी विविध पातळ्यांवर जोरदार प्रयत्न सुरू केले. अस्पृश्यता नष्ट करण्याचा आणि अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याचा प्रश्न अखिल भारतीय पातळीवरी महत्त्वाचा प्रश्न आहे, हे ध्यानात घेऊन महाराष्ट्रात त्याचप्रमाणे अन्य प्रांतांतही ह्या कार्याचा प्रचार करण्याच्या दृष्टीने त्यांनी योजना आखली. ह्या कामाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या वेळेस अस्पृश्यतानिवारक परिषदेचे अधिवेशनही डिसेंबर १९०७च्या सुरत येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनापासून सुरू केले. त्यांच्या ह्या धोरणामुळे देशभरातील नेत्यांना अस्पृश्यतानिवारणकार्याची निकड जाणून देण्याचे कार्य घडू लागले. त्यांनी आयोजित केलेल्या ह्या परिषदांचे आरंभीचे अध्यक्ष सत्येंद्रनाथ टागोर (सुरत, १९०७), रावबहादूर मुधोळकर (बांकीपूर, १९०८), गोपाळ कृष्ण गोखले (मद्रास, १९१०), लाला लजपतराय (कराची, १९१२), सयाजीराव गायकवाड (मुंबई, १९१८), म. गांधी (नागपूर, १९२०) ह्यांसारख्या मान्यवर व्यक्ती होत्या. शिंदे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळेच लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. अँनी बेझंट, म. गांधी इत्यादी अखिल भारतीय पातळीवरील नेत्यांचे लक्ष ह्या कामाकडे आकृष्ट करून घेऊन त्यांची सहानुभूती संपादन करता आली.

मिशनच्या स्थापनेनंतर अगदी दोन-तीन अस्पृश्यांच्या प्रश्नाबाबत वेगाने लोकमत जागृत होऊ लागले. ह्या कामाबद्दल योग्य अशा प्रकारचा दृष्टिकोण निर्माण होऊ लागला, याचा पडताळा मिळू लागला. अस्पृश्य मानलेल्या जातीच्या उन्नतीसंबंधी लाला लजपतराय यांनी त्यांच्या पंजाबी पत्राच्या ६ मे १९०९च्या अंकात एक लेख लिहिला व या लोकांना सांप्रत अन्यायाने व निदर्यपणे वागविण्यात येते हे गैर असून देशाचा एक भाग लंगडा-पांगळा ठेवणे हे देशोन्नतीस विघातक असल्याचे बजावले. अस्पृश्यता टिकवून ठेवणे हे राजकीयदृष्ट्या तर हानिकारक आहेच. परंतु राष्ट्र या नात्याने आपला सुरक्षितपणा अस्पृश्यतेच्या प्रश्नावर अवलंबून आहे;  राष्ट्राची प्रगती खालपासून वरपर्यंत झाली पाहिजे असे प्रतिपादन करून किरकोळ राजकीय फायद्यापेक्षा राष्ट्रउभारणीच्या दृष्टीने अस्पृश्यता नाहीशी करणे निकडीचे आहे, असे लाला लजपराय यांनी प्रतिपादन केले. अखिल भारतीय पातळीवर नेत्यांची भूमिका कोणत्या प्रकारची बनत चालली होती, याची कल्पना लजपतराय यांच्या लेखातून प्रकट होते.१ ऑक्टोबर १९०९च्या तिस-या आठवड्यात मुंबई येथे टाऊन हॉलमध्ये अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. ह्या सभेमध्ये न्या. चंगावरकर, ना. गोखले यांची भाषणे झाली. दोघांनीही आपल्या भाषणात अंत्यजांचा मानलेला अस्पृश्यपणा हीच अस्पृश्याविषयक प्रश्नाबाबत जाचक बाब आहे, असे सांगून अस्पृश्यांचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उदार धर्मतत्त्वाचा आधार घेतला पाहिजे असे या भाषणात प्रतिपादन केले. ही गोष्टही विशेष महत्त्वाची म्हटली पाहिजे, कारण ना. गोखले आपली भूमिका सामान्यतः धर्मनिरपेक्ष भूमिकेवरून मांडीत असत, ते म्हणाले, “….त्यांचा समाजातील दर्जा वाढवून, त्यांस शिक्षण देऊन त्यांच्या भौतिक उन्नतीची तजवीज झाली म्हणजे संस्कृत झालेल्या बुद्धीस योग्य अशी उदार धर्मतत्त्वे त्यांस शिकविली पाहिजेत आणि अशी तत्त्वे प्रार्थनासमाजाच्या धर्मात आहेत.” मिशनच्या कार्याला साहाय्य करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, “हा उत्कट देशप्रीतीचा व उदार मनेवृत्तीचा प्रश्न आहे. आपल्या मायभूमीवर ज्याचे खरे प्रेम असेल व सर्वत्र न्याय व्हावा, अशी इच्छा असण्याइतकी ज्यांची उदारबुद्धी असेल, त्यांस या कामी होईल तेवढे साहाय्य करावे असे वाटल्यावाचून राहणार नाही आणि तेस वाटणा-या प्रत्येक मनुष्यास थोडेबहुत साहाय्य करता येईल. रा. शिंदे यांच्या गरजा पुष्कळ व नानाप्रकारच्या आहेत. या कामी आपले सर्व आयुष्य वेचणारे असे प्रथम आस्थेवाईक मिशनरी मिळाले पाहिजेत. नंतर समाजाकडून पैशाची चांगली मदत व्हावयास पाहिजे.... माझे स्वतःचे मत असे आहे की, आपल्या समाजाच्या विवेकबद्धीस खरोखरीच चेतना मिळाली आहे. पूर्वीची रात्र संपून नवीन अरुणोदयाची प्रथमची छटा आपणास दिसावयास लागली आहे.”२ ना. गोखले यांना प्रस्तुत भाषणात मिशनच्या कार्याला साहाय्य करावे असे कळकळीचे आवाहन केले. मिशनने सुरू केलेले कार्या शिंदे यांचेच कार्य होय असे त्यांनी ओघाने नमूद केले. अस्पृश्यतेच्या प्रश्नाबद्दल श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी जे साहाय्य आरंभापासून केले आहे त्याबद्दलही त्यांना धन्यवाद दिले. लाला लजपतराय, ना. गोखले, अँनी बेझंट, श्रीमंत सयाजीराव गायकवाड ह्या नेत्यांचे विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतानिवारणकार्याच्या संदर्भात यशस्वीपणे साहाय्य मिळविले.

अस्पृश्यतानिवारणकार्याबद्दल सरकारचे-पर्यायाने सरकारी अधिका-यांचेही-साहाय्य व सहानुभूती मिळणे शिंदे यांना महत्त्वाचे वाटत होते. इंग्रज अधिका-यांचे साहाय्य मिळाल्याचा परिणाम समाजातील उच्च स्तरांवरील लोकस अधिकारीवर्ग तसेच संस्थानिक यांवर मोठ्या प्रमाणावर पडू शकतो हे शिंदे यांनी अजमावले होते. सरकारी पातळीवरून ह्याबाबतीत प्रयत्न करावयाचा झाल्यास कलेक्टर, कमिशनर ह्यांसारख्या वरिष्ठ इंग्रज अधिका-यांची सहानुभूती असणे उपयोगाचे ठरणार होते, स्वतः शिंदे यांनी इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेतले होते. ख्रिश्चन धर्माची उदार शिकवण कशी आहे, हेही त्यांना माहीत होते. ख्रिश्चन धर्मातील उदार मानवतावादी संस्कारामुळे इंग्रज अधिका-यांची अस्पृश्यताविषयक प्रश्नाला सहानुभूती मिळविणे शिंदे यांना शक्य होत असे. मिशनरी म्हणून शिंदे यांच्याबद्दल इंग्रज अधिका-यांना आदरबुद्धी वाटणे स्वाभाविक होते. शिंदे यांनी ह्या कामाचा प्रसार करताना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन इंग्रज कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली स्थानिक प्रतिष्ठित मंडळींची कमिटी ह्या कामासाठी स्थापन करण्याची पद्धती सुरू केली. केवळ कलेक्टरच्याच पातळीवर नव्हे, तर गर्व्हनरशीसुद्धा शिंदे यांनी ह्या कामासाठी संबंध स्थापित केले व सर जॉर्ज क्लार्क यांसारख्या गव्हर्नरची ह्या कामी सहानुभूती संपादन केली. सर क्लार्क यांनी ह्या कामाचे महत्त्व ओळखून आपल्या कन्येला मिशनला आर्थिक साहाय्य करता यावे यासाठी गाण्याचा जलसा आयोजित करण्याला परवानगी दिली, हा भाग आपण पाहिलेला आहेच.

मिशनच्या वेगवेगळ्या शाखांना कलेक्टर, इंग्रज अधिकारी हे भेट देऊन साहाय्य करीत व उत्तेजन देत. इगतपुरी येथील मिशनच्या शाळेला १ मे १९०९ रोजी नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर मि. जॅक्सन यांनी भेट दिली. गणेश आकाजी गवई यांनी शाळेबद्दलची माहिती इंग्रजीमध्ये भाषण करून सांगितली. कलेक्टर मि. जॅक्सन यांनी सरकारकडून शाळेला मदत मिळेल असे आश्वासन देऊन शाळेच्या खर्चासाठी दहा रुपये देणगी दिली.३ मुंबई येथे २४ मे १९०९ रोजी प्रो. देवल यांनी आपल्या सर्कशीच्या एका दिवशीच्या प्रयोगाचे उत्पन्न मिशनला देण्याचे मान्य केले. पोलीस कमिशनर मि. एडवर्डस् व सर भालचंद हे प्रयोगाच्या वेळी उपस्थित राहिले. दापोली येथील मिशनच्या शाळेला फेब्रुवारी १९०९ मध्ये दक्षिण भाग कमिशनर मि. एस. सी. गिब यांनी सपत्नीक भेट दिली व संस्थेला दहा रुपयांची देणगी दिली. कलेक्टर ए. एफ. मेकॉनिकी यांनीही या शाळेस भेट देऊन रुपयांची देणगी देऊन आपली सहानुभूती प्रकट केली.४ धारवाड येथेही कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थानिक प्रतिष्ठितांची कमिटी स्थापन केली.

मिशनच्या कार्याला प्रारंभ झाल्यानंतर सामाजिक सुधारणेला अनुकूल असणा-या उदारमनस्क स्त्री-पुरुषांची सहानुभूती ह्या कामी प्रकट होऊ लागली. पुण्यास प्रारंभिक काळातच कॅम्पामध्ये दिवसाची शाळा, कॅम्पातील मोफत वाचनालय, गंजपेठ व मंगळवार पेठ येथील रात्रशाळा ह्या मिशनच्या वतीने सुरू झाल्या होत्या. १९०९ सालीच कॅम्पातील दिवसाच्या शाळातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या १२७ झाली. ह्या सर्वंच शाळांमधून होणा-या उपक्रमांना शहरातील प्रतिष्ठित स्त्री-पुरुष उपस्थित राहत असत व समयोचि स्वरूपाची भाषणे करीत असत. अशा प्रतिष्ठित व्यक्तिंमध्ये रा. ब. का. बा. मराठे, श्रीमती रमाबाई रानडे, प्रो. धोंडो केशव कर्वे, प्रिन्सिपॉल परांजपे, प्रो. केशवराव कानिटकर, प्रो. वा. ब. पटवर्धन इत्यादी मंडळींचा समावेश होतो. ह्या मंडळींनी भेटी दिल्या व देणग्यांच्या रूपाने अर्थसाहाय्य दिले. मुलांसमोर उपदेशपर भाषणे केली. १९०९च्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, या तीन महिन्यांतच मिशनला सहाशे साडेअठ्ठावन रुपये आर्थिक साहाय्य म्हणून मिळाले. पुणे शहर हे तर परंपरानिष्ठांचे मुख्य ठाणेच. वर नमूद केलेल्या उदारमनस्क व्यक्तींनी मिशनला साहाय्य करणे हे स्वाभाविकच होते. परंतु परंपनिष्ठ समजल्या जाणा-या व्यक्तीही आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून अस्पृश्यवर्गीयांशी प्रेमाने व बरोबरीच्या नात्याने वागू लागले, असे चित्रही दिसू लागले होते. ८ ऑगस्ट १९०९च्या सुबोधपत्रिकेत ‘भारतपुत्र’ या टोपणनावाने लिहिलेले एक पत्र प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये रा. किसन फागुजी बनसोडे पाटील व रा. गणेश आकाजी गवई हे पुणे येथे आले, तेव्हा केसरी ऑफिस, भालाकार व मुमुक्षूकार रा. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांची घरी भेट घेतली. त्या वेळी त्यांनी स्पर्शास्पर्शाचे भेद न दाखविता इतर हिंदूंप्रमाणे व प्रेमाने वागविले असे कळते. २८ जुलै १९०९ रोजी रा. नरसिंह चिंतामण केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात ‘अंत्यज जातीची उन्नती’ या विषयावर रा. बनसोडे व रा. गवई यांची भाषणे झाली. या प्रसंगी अध्यक्ष केळकर यांनी हिंदूंनी तुम्हा लोकांना अस्पृश व नीच मानले ते योग्य नाही अशा आशयाचे भाषण केले व भालाकार भोपटकरांनी अध्यक्षांचे आभार मानले.५

पुण्यातील ल. रा. पांगारकर यांच्यासारख्या कर्मठ, सनातनी गृहस्थाच्या वृत्तीतही बदल झाला ही स्पृहणीय गोष्ट म्हणावी लागेल. ल. रा. पांगारकर यांच्या १८९७च्या रोजनिशीतील एक नोंद खालीलप्रमाणे आहे. “तारीख २७/२/९७. मातोश्री आईस सडकून ताप आल्याकारणाने मोठ्या हिकमतीने तांग्यात घालून बसती केल्यासारखे करून तांगा भऱदिवशी पुण्याबाहेर हाकलला. तांगेवाल्याला ५ रु. बक्षीस दिले. रँडची धामधूम चालू. लोक भयभीत झालेले. महार-मांगांचे हात आईच्या देहाला आता लागणार नाहीत असे वाटून अत्यंत समाधान झाले. आईला सुखरूप घेऊन पौडास आलो.”६ अशा प्रकारची कर्मठ मनोवृत्ती असणा-या पांगारकरांच्या मनोभूमिकेत झालेल्या एवढा बदल अत्यंत स्पृहणीय म्हणावा लागेल.

अस्पृश्यतानिवारणकार्याच्या जोडीनेच आनुंषागिक स्वरूपाच्या दुस-या एका कामाला शिंदे यांनी आरंभ केला होता. हे कार्या म्हणजे मुरळी सोडण्याच्या प्रथेला प्रतिबंध बसावा, यासाठी सरकारचे साहाय्य घेऊन स्थापन केलेली ‘पश्चिम हिंदुस्थानातील मुलांचे रक्षण करणारी संस्था.’ ह्या संस्थेचे उद्देश व कार्य लक्षात घेऊन ह्या अनीतिमूलक प्रथेच्या विरुद्ध सरकारने कायदाही केला. शिंदे यांनी १९०७ साली सुरू केलेल्या या चळवळीस चांगले यश मिळत चालले. मुरळी सोडलेल्या मुलींना समाजामध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळावे यासाठी अशा मुलींची लग्ने लावून समाजात पुनःस्थापित करण्याच्या दृष्टीनेही शिंदे यांनी प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ केला होता. १८ एप्रिल १९०९ रोजी खडकी येथे गणपतराव हणमंतराव गायकवाड या सधन तरुणाचा शिवूबाई या नावाच्या मुरळीबरोबर विवाह लावण्यात विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. अस्पृश्य समाजातील विविध जातींतील मुली प्रधान्याने मुरळी म्हणून या देवाला वाहिल्या जात असत, म्हणून विविध अस्पृश्य समाजातील विविध जातींतील मुली प्राधान्याने मुरळी म्हणून या देवाला वाहिल्या जात असत, म्हणून विविध अस्पृश्य जातींतील लोकांचे या प्रथेविरुद्ध लोकमत संघटित करणे व मुरळी सोडलेल्या मुलींची लग्ने लावून समाजात त्यांना पुन्हा प्रतिष्ठेचे जीवन जगण्यास मदत करणे हे विठ्ठल रामजी शिंदे यांना आवश्यक वाटत होते. त्या दृष्टीने अस्पृश्यवर्गीयांचे लोकमत जागृत करण्याचा प्रयत्नही केला जात होता. ५ जून १९०९ रोजी कोल्हापूर येथे ‘मिस् व्हायोलेट क्लार्क निराश्रित वसतिगृहा’च्या आवारात विठ्ठल रामजी शिंदे यांचे गोविंदराव सासने यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान झाले. ह्या सभेत सर्वानुमते पुढील ठराव मंजूर करण्यात आला. “ता. १८/४/१९०९ रोजी खकडी येथे रा. रा. गणपतराव गायकवाड यांचा शिवूबाई नावाच्या मुरळीबरोबर जो विवाह झाला तो कोल्हापूच्या अस्पृश्य मानलेल्या म्हणजे   महार, मांग, ढोर, चांभार वगैरे जातींच्या लोकांस पसंत असून त्यांची संमती आहे.” हा ठराव चोख नरसिंग महार यांनी मांडला व सखाराम राणेजी मांग यांनी त्यास अनुमोदन दिले. पुष्टी देणा-यांत चांभार व अन्य जातींचे लोकही होते. या सभेबद्दलची माहिती गणपत कृष्णाजी कदम यांनी पत्र लिहून सुबोधपत्रिकेतून प्रसिद्ध केली.७

महार जातीचे पुढारी श्री. शिवराम जानबा कांबले यांनीही या प्रश्नामध्ये गंभीरपणे लक्ष घातले. जेजुरी येथे खंडोबाच्या देवळात दरवर्षी जत्रेच्या वेळी मुरळी सोडण्यात येत असत. ह्या प्रथेविरुद्ध लोकमत जागृत करण्यासाठी कांबळे यांनी १९०९ साली जेजुरी येथे महार लोकांची एक मोठी परिषद भरवून लोकांनी आपल्या मुरळ्या करू नयेत आणि जे लोक मुरळ्यांबरोबर लग्न करण्यास प्रवृत्त होतील त्यांना जातीकडून अडथळा होऊ नये असा सर्व गावच्या महारांकडून ठराव पास केला. मुरळी प्रथेविरुद्ध जे लोकमत जागृत होत होते, त्याचा परिणाम जेजुरी येथील खंडोबाच्या यात्रेच्या वेळी पास केला. वर्षीच दिसून आला. त्या वर्षी एकही मुरळी सोडण्यात आली नाही.८ मात्र अशी प्रथा बंद करण्याच्या सुधारणेला निरपवादपणे सार्वत्रिक मान्यता मिळणे ही गोष्टही कठीणच होती. शिवबाई या मुरळीचे लग्न गणतपराव गायकवाड यांच्याशी लावण्यात आल्याने येसूबीन काशीराम बटलर महार गोसावी हा गृहस्थ संतप्त झाला. गायकवाडांच्या घरी तो गेला. शिवुबाईला ओढून त्याने रस्त्यावर आणले व गायकवाड बायकोला सोडविण्यास आले असता त्यांनाही मारहाण केली. येसूबीन काशीरामवर गुन्हा शाबीत होऊन खडकी कँटोंबन्मेंट मॅजिस्ट्रटने त्याला दीड महिना सक्तमजुरीची शिक्षा दिली ही गोष्ट अलाहिदा.९

पारंपरिक रूढीच्या विरोधात केलेल्या सुधारणांविरुद्ध येसबीन काशीरामसारखे केवळ अस्पृश्यवर्गातच पुरुष होते असे नव्हे. शिंदे यांनी सुरू केलेल्या अस्पृश्यतानिवारणाच्या चळवळीस सुशिक्षितवर्गातून व विशेषतः ब्राह्मणवर्गातून पाठिंबा मिळत असला तरी अस्पृश्यवर्गाबद्दल पारंपारिक तुच्छतेची भावना टिकवून धरणारे प्रतिगामी वृत्तीचे लोक समाजामध्ये होते. सातारा येथे निराश्रितांच्या उन्नतीसंबंधात रा. सीतारामपंत जव्हेरे यांनी कळकळीने कार्य सुरू केले होते. अस्पृश्यवर्गीयांच्या उन्नतीचा विचार करण्यासाठी नोव्हेंबर १९०९ मध्ये भरलेल्या एका सभेत लो. टिळकांचे सहकारी, सुप्रसिद्ध पुढारी श्री. दादासाहेब करंदीकर यांनी भाषण केले. त्यांच्या भाषणातून ब्राह्मण्याबद्दलचा अहंकार व अस्पृश्यवर्गीयांबद्दलचा तुच्छताभाव तीव्रपणे प्रकट होत होता. ते म्हणाले, “आम्ही जातीने ब्राह्मण, आम्ही श्रेष्ठ, तेव्हा आम्ही ब्राह्मण तुम्हाला (निराश्रितांना) मिठ्या मारू लागू असे काही होणे नाही. तुम्हाला शिकविणे, तुमच्या उन्नतीचा खल करणे हे ठीक आहे. आणखी असे की, रा. जव्हेरे हे बोलूनचालून पडले ब्राह्मणेतर. त्यांची जात सोनार आहे, हे तुम्हाला माहीत नसल्यास सांगून ठेवतो. त्यांच्यासारख्यांनी तुमच्या संबंधाने स्पर्शास्पर्शाचा भेद राखला नाही, तर त्यांची गोष्ट निराळी व आम्हा ब्राह्मणांची गोष्ट निराळी.”१०

अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक चळवळीसंबंधी धूर्तपणाने गैरसमज होईल अशा प्रकारची कृतीही काही परंपरानिष्ठ मंडळी करीत होती असे दिसते. १९१० साली खुद्द पुणे शहरातच अस्पृश्यतानिवारणकार्याचा पुष्कळ बोलबाला होऊ लागला होता. १९०५ सालीच विठ्ठल रामजी शिंदे यांच्या रीतसर शाखा पुण्यास स्थापन झाली व श्री. ए. के. मुदलियार ह्यांच्या कळकळीच्या प्रयत्नामुळे पुण्यातील कामाला जोराची चालना मिळाली. १९०९ साली श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मिशनचा बक्षीस समारंभ मोठ्या थाटाने पार पडला. प्रो. धोंडो केशव कर्वे, प्रो. वा. ब. पटवर्धन, रँ. र. पु. परांजपे वगैरेंसारखा प्रतिष्ठित मंडळींनी अस्पृश्यतानिवारण चळवळीला जोरदार व सक्रिय पाठिंबा देण्यास सुरुवात केली. अशा त-हेने अस्पृश्यतानिवारणकार्याचा प्रभाव पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात पडला होता. त्याची दखल न घेणे हे परंपरानिष्ठांनाही अशक्य होऊन बसले. परंतु मनातून ही चळवळ नापसंत असलेले लोक ह्या चळवळीबद्दल समाजमनाचा प्रतिकूल ग्रह व्हावा अशाप्रकारे धूर्तपणाचे वर्तन करीत होते, असे दिसते. ज्ञानप्रकाशने लिहिलेल्या स्फुटामध्ये वक्तृत्वोत्तेजक सभेने ह्या संबंधात जो एक विषय दिला आहे, त्याचा समाचार घेतला आहे. स्फुटात म्हटलेले आहे की, “यंदाच्या पुण्याच्या वक्तृत्वोत्तेजक सभेमध्ये निराश्रितासंबंधीचा एक विषय आहे, पण त्याची योजना करताना पुणेकरांची सावधगिरी व धूर्तता प्रत्यक्षपणे अनुभवास येते. पुढली वाक्ये पहा. “निष्कृष्ट जाती असे ज्यास वक्तृत्वोत्तेजक सभेमध्ये म्हटले त्यांच्याशी एकदम व्यवहार सुरू करा असा आज कोणाचा आग्रह आहे? असे कोणी प्रतिपादिले आहे? असे जर कोणी प्रतिपादित नाही, तर लोकांना घाबरविण्यात हशील ते काय? दुसरे असे की, ठिकठिकाणच्या वरिष्ठ जातींमधील बरीच सुशिक्षित मंडळी आज ह्म चळवळीस आपली सहानुभूती दाखवीत आहेत. निदान प्रस्तुत चळवळीचे आपण हितचिंतक नाहीत असे तरी म्हणवीत नाहीत. अशी वेळी ह्म उद्धाराच्या चळवळीचा दुरुपयोग होण्याचा संभव आहे, असा एकदा लोकांचा खरा-खोटा समज झाला की, तो टाळण्याचा उपाय कोणी करत बसणार नाही. ह्या सावधगिरीने चालत्या गाड्यास अनायासे खीळ बसणार आहे आणि दुदैवाने असा जर परिणान झाला तर त्याचे सर्व श्रेय पुणेकरांस बिनबोभाट मिळणार आहे.”११

अस्पृश्यतानिवारणकार्यास सुशिक्षितवर्गाचा पुणे-सातारा यांसारख्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असला तरी ह्या चवळवळीबद्दल अहंकारबुद्धीने उघडपणे नापसंती प्रकट करणारे दादासाहेब करंदकरांसारखे प्रतिष्ठित लोकही समाजात होते, तर ह्या चळवळीबद्दल गैरसमज उत्पन्न होऊन तिच्या कार्याला खीळ बसेल अशा प्रकारची कारवाई छुपेपणाने करणारी वक्तृत्वोत्तेजक सभेतील बुद्धिमंत होते. समाधानाची गोष्ट एवढीच की, ह्या कार्यास उघडपणे वा छुपेपणाने विरोध करणा-या मंडळींची संख्या मात्र सुदैवाने अल्प प्रमाणात होती. एकंदरीत भारतीय निराश्रित मंडळीने आपल्या कार्याला आरंभ केल्यापासून तीन-चार वर्षांतच सांस्कृतिक वातावरण फार मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले. अस्पृश्यतानिवारणासंबंधीच्या विचाराला, अस्पृश्यवर्गीयांच्यात शिक्षणप्रसार वाढविण्याच्या कार्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली व अस्पृश्यवर्गीयांबद्दलच्या आत्मीयतेच्या भावनेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, १६ मे १९०९.
२.    तत्रैव, २४ ऑक्टोबर १९०९.
३.    तत्रैव, १६ मे १९०९.
४.    तत्रैव, २३ मे १९०९.
५.    तत्रैव, ८ ऑगस्ट १९०९.
६.    ल. रा. पांगारकर, चरित्रचंद्र, नाशिक, १९३८, पृ. ९६.
७.    सुबोधपत्रिका, १३ जून १९०९.
८.    ज्ञानप्रकाश, ५ मे १९१०.
९.    तत्रैव.
१०.    सुबोधपत्रिका, १४ नोव्हेंबर १९०९.
११.    ज्ञानप्रकाश, २७ एप्रिल १९१०.

  1. मिशनच्या स्थापनेचा संकल्प
  2. मिशनची स्थापना
  3. मिशनची पुनर्घटना
  4. मिशनची घटना व पुणे येथील अंगभूत शाखा
  • 110
  • 111
  • 112
  • 113
  • 114
  • 115
  • 116
  • 117
  • 118
  • 119
Page 115 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी