1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मराठ्यांची सांस्कृतिक जबाबदारी

विसाव्या शतकाच्या पहिल्या आठ-दहा वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. लो. टिळकांच्या जहाल आणि प्रभावशाली नेतृत्वाने अभूतपूर्व राजकीय जागृती झाली होती. ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध संतापाची भावना निर्माण झाली. स्वातंत्र्याची आकांक्षा तीव्र स्वरूपात निर्माण होऊ लागली होती. मात्र राजकीय दृष्ट्या जहाल, स्वातंत्र्यपेमी असणारा टिळक पक्ष सामाजिक बाबतीत हिंदूंच्या रूढ अंधश्रद्धा जपणारा, शूद्रादिकांवर अन्याय करणा-या परंपरागत समाजरचनेची चौकट सांभाळणारा व प्रगतीसाठी एकही पाऊल पुढे न टाकणारा अशा अवरुद्ध स्थितीतच राहिला होता. ह्या राजकीय जहालांना स्वातंत्र्याची तीव्र ओढह होती खरे, परंतु सर्वसामान्य बहुजन समाजाच्या, शेतक-याच्या हितासंबंधी ओढ असल्याचे अगदीच दिसून येत नव्हते. उटल वेदोक्तासारखा प्रकरणावर टिळकपक्षीय ब्राह्मण मंडळींचा बहुजन समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोण तुच्छतागर्भ होता, असेच जाणवत होते. प्राधान्याने ह्या वेदोक्त प्रकरणाची प्रतिक्रिया म्हणून छत्रपती शाहूमहाराजांच्या प्रेरणेने व आश्रयानेदेखील महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाच्या विचाराचा जोरदार फैलाव होऊ लागला. वेदोक्त प्रकरणात प्रकट झालेल्या ब्राह्मणी श्रेष्ठत्वाच्या अहंकाराची प्रतिक्रिया म्हणून सत्यशोधकी विचाराला ब्राह्मणविरोधाची धार प्राप्त झाली. एवढेच नव्हे तर टिळक पक्षीयांना विरोध करण्यासाठी निर्माण झालेल्या बहुजन समाजातील नेतृत्वाला इंग्रज सत्ताधारी जवळचे वाटायला लागले व ते इंग्रजांच्या सत्तेचे गुणगान करणारे व त्यांचे पक्षपाती बनले.


ह्या वस्तुस्थितीचा एक वेगळाच अर्थ काढला जाऊ लागला. बहुजन समाजातील व विशेषत्वाने मराठा जातीतील नेत्यांचे धोरण व मनोवृत्ती ही सर्वसाधारण मराठा समाजाचीही आहे आणि मराठा समाजाला जणू काय राजकीय स्वातंत्र्याची स्पृहा नाही. त्याला इंग्रजांच्या अमलाखालीच राहणे रुचते. इतिहासकाळापासून स्वातंत्र्यप्रिय असणा-या मराठा समाजाबद्दलची ही समजूत दूर होणे अगत्याचे आहे. एवढेच नव्हे तर, एकंदर मराठा समाजामध्ये, मराठ्यांच्या नेत्यांमध्ये व सुशिक्षित मराठा तरुणांमध्ये योग्य अशा राजकीय तसेच सामाजिक व सांस्कृतिक जाणिवा जागृत होणे अगत्याचे आहे असे विठ्ठल रामजी शिंदे यांना तीव्रतेने वाटू लागले. मराठा समाज हा महाराष्ट्रातील बहुसंख्य समाज आहे. त्याच्या उन्नतीवर महाराष्ट्राची उन्नती अवलंबून आहे, अशी त्यांची धारणा होती. अशा समाजाने राजकीय विचाराच्या बाबतीत तर परिपक्व असावयास पाहिजे; शिवाय सामाजिक, सांस्कृतिक बाबतीतही त्याने योग्य दिशेने कार्यप्रवण असणे एकंदरीत राष्ट्रकार्याच्या दृष्टीने शिंदे यांना अगत्याचे वाटत होते.


अण्णासाहेब शिंदे यांचे वास्तव्य १९१२ पासून पुण्यास होऊ लागले. त्यांचे धडाडीचे अस्पृश्यतानिवारणाचे काम, त्यांची विद्वता आणि व्यासंग, विचारांचा सखोलपणा आणि समतोलपणा यांचा पुण्यातील मराठा समाजाला जवळून परिचय होऊ लागला. त्यांचे आपल्याला मार्गदशन लाभावे अशी इच्छा सुशिक्षित मराठा तरुणांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक होते. पुण्यात नुकत्याच स्थापन झालेल्या मराठा भ्रातृमंडळाच्या पदाधिका-यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना मंडळाच्या स्नेहसंमेलनप्रसंगी भाषण करण्याची विनंती केली आणि मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसंबंधी आपल्या मनात घोळणारे विचार मांडायला ही चांगली संधी आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी व्याख्यानाचे निमंत्रण स्वीकारण्याचे ठरविले.


विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक जीवन ढवळून निघाले होते. त्याचा परिणाम म्हणूनच पुण्यात मराठा भ्रातृमंडळ ह्या संस्थेची निर्मिती झाली होती.


१९१०च्या सुमारास पुण्यामधील शाळा-कॉलेजात शिकणारे तरुण मराठा विद्यार्थी काही निमित्ताने एकत्र जमत, त्यांची चर्चा होत असे. अशा विद्यार्थ्यांपैकी लक्ष्मणराव ठोसर, बाबुराव जगताप वगैरे तरुणांच्या मनात असा विचार आला की, गरीब मराठा विद्यार्थांना मदत करावी, त्यांना सहविचार करावयसा प्रवृत्त करावे या हेतूने एक संस्था स्थापन करावी. १९१०च्या सुमारास खरे तर बाबुराव गणपतराव जगताप हे हायस्कूलात जाणारे विद्यार्थी होते व लक्ष्मणराव ठोसर हे कॉलेजमध्ये शिकत होते. परंतु ह्या अगदी तरुण वयात त्यांनी पुढाकार घेऊन मराठा भ्रातृमंडळ (मराठा स्टुडंट्स ब्रदरहुड) ही संस्था स्थापन केली. ह्या सुमारास श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज हे पुण्यास वरचेवर येत असत. त्याचप्रमाणे शाहूमहाराजांचे जामात देवासचे श्रीमंत तुकोजीराव पवार व त्यांचे बंधू श्रीमंत भाऊसाहेब हेही पुण्यास येत असत. लक्ष्मणराव ठोसरांचा त्यांच्याशी परिचय झाला होता. पांडुरंग चिमणाजी पाटील हे त्या वेळी पुण्याच्या शेतकी कॉलेजात प्राध्यापक होते. त्यांचे मार्गदर्शनही जगताप, ठोसर या तरुणांना मिळाले. शेतकी कॉलेजचे प्रिन्सिपॉल हॅरॉल्ड एच मॅन यांनी मराठा भ्रातृमंडळाचे अध्यक्ष होण्यास अनुमती दिली. त्याचप्रमाणे जगदेवराव पवार, भाऊसाहेब महाराज (देवास) यांनी व फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल रँ. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी उपाध्यक्ष म्हणून राहण्यास आपली अनुमती दिली. लक्ष्मणराव ठोसर व सोपान नामाजी कु-हाडे हे या संस्थेचे सेक्रेटरी झाले. पां. चि. पाटील, रामचंद्रराव वंडेकर व अन्य प्रतिष्ठित मंडळी ही या मंडळाची सदस्य बनली. फेब्रुवारीत १९११ मध्ये मराठा स्टुडंट्स ब्रदरहुड ही संस्था स्थापन झाली.१ त्यामध्ये १५ मार्च १९१३ रोजी तिस-या वार्षिक संमेलनप्रसंगी पां. चि. पाटील यांचे ‘विलायतचा प्रवास’ या विषयावर व्याख्यान झाले. पुढील वर्षी २० जून १९१४ रोजी मंडळाच्या चौथ्या वार्षिक संमेलनप्रसंगी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सुशिक्षित मराठ्यांची नागरिक कर्तव्ये’ ह्या विषयावर व्याख्यान दिले.२


विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्रस्तुत विषयावरील व्याख्यान हे मराठा समाजातील, एवढेच नव्हे तर, एकंदरीच तरुणवर्गाला उत्तम प्रकारचे मार्गदर्शन करणारे म्हणून तर महत्त्वाचे होतेच;  त्याशिवाय विठ्ठल रामजी यांचा जातिसंस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोण काय होता, मराठा समाज व इतर जाती यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे संबंध त्यांना अभिप्रेत होते, हे कळण्याच्या दृष्टीनेसुद्धा प्रस्तुत व्याख्यान महत्त्वाचे होते. व्याख्यानाच्या प्रारंभी मराठा हे जातिविशिष्ट नाव धारण करणा-या मंडळीपुढे आपण भाषण करणे हे कितपत प्रस्तुत आहे याचा शिंदे यांनी ऊहापोह केला व एकंदर समाजातील जातिसंस्थेबाबत भूमिका मांडली, प्रारंभीच ते म्हणाले, सकृतदर्शनी पाहताच तुमची सभा केवळ एका विशिष्ट जातीपुरतीच आहे आणि स्वतः मी तर जातिभेद मानीत नाही. इतकेच नव्हे पाळीतही नाही, किंबहुना या पुरातन संस्थेचे जे काही दुष्परिणाम अद्यापि घडत आहेत ते शक्य आणि इष्ट त्या रीतीने नाहीसे करण्याचा नम्रपणाने प्रयत्न करणा-यांमध्येच मी एक आहे. म्हणून मला आपल्या सभेपुढे असे व्याख्यान देण्याचा अधिकार आहे, की नाही याचीच मुळी शंका आली. पण तुमच्या संस्थेचे उद्देश आणि घटना पाहिल्यावर ती तितकी जातिविशिष्ट नाही असे कळून आले. डॉ. हॅरॉल्ड एच्. मॅन हे अध्यक्ष व तुमच्या घटनेतील अन्य काही सभासद यांचा मराठ्यांशी जातिशः संबंध नसूनसुद्धा त्यांचा संस्थेत अंतर्भाव झाला असल्याचा त्यांनी निर्देश केला. जातीविषयक भूमिका कोणती असते व असावी ह्याबद्दलचे विवरण करताना ते म्हणाले, “पण मी जो आपल्यापुढे उभा आहे तो केवळ हितचिंतकच म्हणून नव्हे. मी स्वतः मराठा जातीत जन्मलो असल्यामुळे स्वाभाविकपणे मजमध्ये दोन प्रकारचा त्या जातीसंबंधी अभिमान वसत आहे तो मी मांडणे आवश्यक नाही. जात्यभिमान तीन प्रकारचा असतो. आपली जात कशीही असो ती आपल्याला प्रिय, तिचा दुस-याशी कोणत्याही प्रकारे संबंध न जोडता ती ‘सोवळी’ राखणे, निदान तशी राखण्याचा बहाणा करणे, तिचेच हितसंबंध पाहणे, इतकेच नव्हे तर इतर जातींचा मत्सर करणे हा एक प्रकार. हा तामसी आहे. आपली जात थोर, इतिहासप्रसिद्ध असल्यास आणि वैभवशाली असल्यास याबद्दल दुस-या कोणत्याही जातीशी मत्सर न करिता किंवा फटकून न राहता मनामध्ये संतोष मानणे, हा दुसरा प्रकार. हा राजसी आहे. ह्याशिवाय तिसरा एक अभिमानाचा प्रकार असा आहे की, आपली जात अति उच्च गणलेली असो, की अति नीच गणलेली असो, ह्या बाह्म गणनेकडे केवळ दुर्लक्ष करून दुस-या लहानथोर जातीचा अणुमात्रही हेवा न करता किंवा त्यांच्या हितसंबंधास जाणून अथवा नेणून लवमात्रही न पोहोचेल अशी खबरदारी ठेवून आपल्या जातीच्या हितसंबंधी कर्तव्यबुद्धी जागृत ठेवणे हा सात्त्विक प्रकार आहे. पहिला प्रकार गर्हणीय, दुसरा क्षम्य आहे व तिसरा स्तुत्य आहे. जातिभेद नको म्हणणा-यांनी केवळ पहिलाच प्रकार टाकणे आवश्यक आहे आणि जोपर्यंत शेवटच्या दोन्ही प्रकारचे अभिमान म्हणणा-यांनी केवळ पहिलाच प्रकार टाकणे मला हे व्याख्यान देणे वावगे होणार नाही, असे समजून मी तुमच्या सन्माननीय सेक्रेटरीच्या निमंत्रणास मान दिला.”


मराठा ह्या शब्दाचा अन्वय प्रांत, पेशा, भाषा, पिढी आणि जात ह्या पाच विषयांशी लागत असला तरी त्यासंबंधी तात्त्विक आणि ऐतिहासिक मीमांसा करण्याचा आपला उद्देश नाही; तो केवळ व्यावहारिक आणि आजकाल आवश्यक अशा राष्ट्रीय दिशेचा आहे असे सांगून खानेसुमारीच्या अहवालात ज्यांना मराठा म्हटले आहे ते वर्गीकरण त्यांनी मान्य केले. ह्या जातीने आपल्या कर्तबगारीने एका विशिष्ट प्रदेशाला स्वतःचे नाव दिले असले तरी हल्ली हे लोक मागासलेले या नावाने ओळखले जातात व ते तसे खरोखर झाले आहेत. ह्या लोकसमूहाची जातिशः जी अवनती झाली आहे, त्याची दोन अंतःस्थ कारणे त्यांनी सांगितली. पहिले, ह्या जातीमध्ये ऐक्य (सॉलिडॉरिटी) नाही व दुसरे, ह्या जातीने आपल्या नागरिक कर्तव्याची जवळ जवळ फारकतच करून घेतली आहे. पैकी दुस-या कारणाचा विचार प्रस्तुत व्याख्यानात अभिप्रेत असल्याचे त्यांनी सांगितले.


ह्या जातीची रहाटी ब्राह्मणी संस्कृतीहून निराळी दिसून येणारी अशी आहे. महाराष्ट्रातील खालच्य दर्जाच्या अन्य काही जाती ह्या रहाटीच्या वळणाखाली आल्या आहेत नागरिकत्वाचा विचार करीत असताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९१० सालच्या खानेसुमारीचा अत्यंत उदबोधकपणे उपयोग करून घेतला आहे. धंदा, शिक्षण, शिक्षणातील स्त्री-पुरुषांची प्रगती इत्यादी संबंधातील आकडेवारी त्यांनी एकंदर लोकसंख्येच्या संदर्भातही विचारात घेतली आहे. मराठे व तत्संबंधी म्हणून कुणबी, माळी, साळी, शिंपी, मराठे वाणी, मराठे गवळी, मराठे न्हावी इत्यादी संबंधीची आकडेवारी त्यांनी उपयोगात आणली आहे. त्यांनी दिलेल्या कोष्टकात मुंबई इलाख्यातील मराठे व तत्सम जातीची लोकसंख्या सुमारे ५० लाख तर ब्राह्मणांची १० लाख व लिंगायतांची १३ लाख आहे. मराठ्यांच्या लोकसंख्येची बहुलता ध्यानात घेऊन त्यांनी म्हटले आहे, “नुसत्या संख्येच्या दृष्टीने पाहिले तरी मराठ्यांचे महत्त्व बरेच आहे. कारण त्यांची संख्या ह्या इल्याख्यातील कोणत्याही जातीपेक्षा बरीच मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या जनसमूहाचा हितसंबंध तो अर्थात राष्ट्रीय हितसंबंध, असे समजून राष्ट्राच्या एवढ्या महत्त्वाच्या व मोठ्या अवयवाने मागासलेले राहणे म्हणजे पर्यायाने सर्व राष्ट्रपुरुषाने मागासलेले राहणे होय व त्याला हातभार लावणे केवळ एका विशष्ट जातीवर मेहेरबानी करणे नव्हे, तर एक महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्यच बजावणे होय.”


नागरिकता  या संज्ञेचा राष्ट्रीयतेच्या दृष्टीने काय अर्थ होतो, हे त्यांनी विशद केले. राष्ट्रीयता ही मानवजीविताच्या सामाजिक विकासाची आजची शेवटची पायरी होय. ह्या राष्ट्रीय संघटनेचा प्रथम घटक नगर हा असतो. व्यक्ती, कुटुंब, जात किंवा खेडे हा घटक होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी काही स्वतंज्ञ, कर्तबगार, जबाबदार आणि विद्याचारसंपन्न असे लोक राहतात आणि ज्या ठिकाणी व्यापाराची लहानशी का होईना स्वतंत्र पेठ असते अशा ठिकाणाला गाव किंवा नगर अशी संज्ञा देता येते. अशा कित्येक नगरांची जी एक स्वसत्तात्मक संघटना बनते तिला राष्ट्र अशी संज्ञा आहे व स्वसत्तात्मकत्व हे राष्ट्राचे मुख्य लक्षण होय असे त्यांनी सांगितले. स्वसत्तात्मकत्व हे मुख्य लक्षण कायमचेच नष्ट झाले तर त्या राष्ट्राचे राजकारण, उदीम, वाङमय, कलाकौशल्य इत्यादीकांवर नव्हे तर शेवटी त्याच्या शीलावरही परिणाम होऊन तो विवक्षित समूह राष्ट्रपदालाही मुकतो असे प्रतिपादताना त्यांनी स्वसत्तात्मकतेला राष्ट्रामध्ये आत्यंतिक महत्त्व असल्याचे सांगितले आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले ज्या अर्थी राष्ट्राचा प्रथम घटक नगर हा आहे त्या अर्थी नगरालाही, स्थानिक का होईना, पण स्वसत्तात्मकतेची जरुरी आहेच. अशा स्वसत्तात्मक नगरात केवळ राहणा-याला नागरिक ही संज्ञा मिळणार नाही, तर त्या नगराची जी संघटनात्मक जबाबदारी आणि जे हक्क असतील ते जिच्यामध्ये पूर्णपणे आहेत, तीच व्यक्ती नागरिक या सेंला पात्र होईल, याप्रकारचा विचार मांडून ते नगराचा कारभार चालविणा-या अधिकारयुक्त संस्थेचा कारभार करण्यात सहभाग असेल अथवा कोणत्या ना कोणत्या निर्णय करण्याच्या व्यवस्थेमध्ये हक्क असेल, त्या व्यक्तीलाच ख-या अर्थाने नागरिक म्हणता येईल असेच त्यांनी सुचविले आहे. अशी व्यक्ती प्रौढ, स्वतंत्र, स्वावलंबी, जबाबदार आणि हक्कदार अशी असली पाहिजे. ह्या आवश्यक असलेल्या पाच गुणांपैकी एकाही गुणाने कमा असणा-या व्यक्तीला नागरिक म्हणता येणान नाही तर केवळ रहिवासी म्हणावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


ह्या विवेचनातून त्यांनी राष्ट्रीयत्वाला महत्त्व दिले आहे. राष्ट्रयत्वाचा गाभा म्हणून स्वसत्तामत्मकत्व अथवा स्वतःचा कारभार चालविणे हे वैशिष्ट्य होय असे सांगितले आहे. या राष्ट्रीयत्वची जोपासन करण्यासाठी अथवा अंगी राष्ट्रीयत्व बाणविण्यासाठी प्रथमतः नागरिकत्व असणे आवश्यक आहे. त्याद्वाराच राष्ट्रीयत्वाचा आविष्कार करता येतो व हे राष्ट्रीयत्व मताचा, वृत्तीचा स्वतंत्रपणा, सर्व प्रकारचे निर्णय घेण्यात स्वावलंबन, जबाबदारीची यथार्थपणे जाणीव असणे आणि नागरी कारभारात निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये हक्क मिळविण्यासाठी पात्रता असणे हे आवश्यक गुण म्हणून त्यांनी प्रतिपादिले आहेत. या त्यांच्या प्रतिपादनावरून त्यांची राष्ट्रीयवृत्ती जशी प्रकट होते, त्याचप्रमाणे मराठे आणि अन्य मागासलेल्या जाती यांनी कोणत्या प्रकारची पात्रता संपादन करावी, कोणती वृत्ती अंगी बाणावावी व नागरिक व्हावे आणि पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीत राष्ट्रीय पातळीवर कर्तव्य बजवावे हेच हे तात्त्विक स्वरूपाचे विवेचन करून सुचविले आहे.


ह्या प्रकारची मांडणी केल्यानंतर मराठ्यांची नागरिक कर्तव्ये कोणती हे सांगत असताना, ती इतर जातींच्या कर्तव्याहून निराळी संभवत नाहीत असे म्हटले. ह्या चमत्कारिक देशात विद्याचारसंपन्नतेच्या दृष्टीने पाहू गेले असता महत्त्वाच्या जातींमध्येदेखील तफावत दिसते. म्हणून नागरित कर्तव्य बजावण्याच्या कामी स्वतःला पात्र करून घेण्यापूर्वी निरनिराळ्या जातीला निरनिराळ्या बाजूने तयारी करावी लागेल असे त्यांनी सांगितले. ह्या कर्तव्याच्या तयारीला लागण्यापूर्वी मराठ्यासारख्या विकत आणि मागासलेल्या ज्ञातीला अगोदर कोणती भली मोठी पूर्वतयारी करावयचा आहे, हे त्यांनी प्रतिपादले. ही पूर्वतयारी म्हणजे प्रथमतः बहुजन समाजात सामान्य प्राथमिक शिक्षणाचा फैलाव करणे ही होय. केवळ पुस्तकी ज्ञानाचे ख-या राष्ट्रीय तेजाशी जरी व्यक्तीच्या दृष्टीने म्हणण्यासारखे साहचर्य नसले तरी आधुनिक राष्ट्राच्या बांधणीला जनतेमध्ये निदान काही प्रमाणात तरी प्राथमिक शिक्षणाची अनिवार्य आवश्यकताच आहे. व्यक्तीला जसे भाषेशिवाय कोणतेही व्यवहार करणे मुळी शक्य नाही, तसेच जनतेला सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाशिवाय कोणतेच नाव घेण्यासारखे राष्ट्रीय व्यवहार करता येणे शक्य नाही, असे सांगून प्राथमिक शिक्षणाचे अपरिहार्य महत्त्व त्यांनी निदर्शनास आणले. त्यांनी दिलेल्या कोष्टकातील माहिती केवळे उद्बोधकच नव्हे, तर कुणालाही अंतर्मुख करायला लावणारी होती. १९१० सालच्या खानेसुमारीवरून शिक्षणाचे शेकडा प्रमाण त्यांनी जे दिले आहे त्यात लिहिता-वाचता येणारे ब्राह्मण पुरुष ५९, बायका ७, लिंगायत पुरुष १३, बायका २/९ आणि मराठे पुरुष ४.३/५ आणि बायका १/७. इंग्रजी लिहिता-वाचता येणा-यांचे शेकडा प्रमाणः ब्राह्मण पुरुष १, बायका १/३, लिंगायत पुरुष १/५, बायका १/९१८ आणि मराठे पुरुष १/७ आणि बायका १/२३९. ह्या आकडेवारीवरून मराठे तसेच लिंगायत ब्राह्मणवर्गाच्या तुलनेत किती मागे होते याची कल्पना येऊ शकते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढे १९२१ साली सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा मुलांसाठी तसेच मुलींसाठी का आग्रह धरला याचीही कल्पना या आकडेवारीवरून येऊ शकते.


मात्र प्राथमिक शिक्षण निरतिशय महत्त्वाचे असले तरी ती नागरिकत्वाची प्राथमिक तयारीच होय. जणू काय हे सार्वत्रिक शिक्षण मराठे जातीला मिळाले आहे असे गृहीत धरून विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढील विचार मांडला. समोर बसलेल्या तरुण कॉलेज विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, “विश्वविद्यालयातून यशस्वी होऊन बाहेर पडल्यावर तुम्ही अगदी पहिली खबरदारी ठेविली पाहिजे, ती ही की, राजकीय कर्तव्य आधी की सामाजिक आधी; आमच्या देशोन्नतीला उद्योगधंद्याची जरुरी आहे की उदार धर्मप्रसाराची जरुरी आहे; सामाजिक सुधारणा करावयाची ती शिंगे मोडून की शिंगावर धूळ घेऊन; माझ्या जातीच्याच कल्याणाला माझे सर्वस्व वाहू किंवा निःसीम परोपकारास वाहून घेऊ, ह्या व अशा वादात तुम्ही मुळीच पडू नये. हा वाद नुसता पोरकट आहे इतकेच नव्हे, तर निव्वळ खोटा आहे... ह्यापुढे कामाची विभागणी चांगली पडत चालली आहे म्हणून तुम्ही आपली आवड, मगदूर, साधने ह्या सर्वांचा विचार करून राष्ट्रकार्याच्या विशाल आणि विघ्नांनी भरलेल्या क्षेत्रातून तुमचा स्वतःचा विशिष्ट मार्ग शोधून काढून होता होईल त्याला आमरण चिकटून रहा.” ही खबरदारी सर्वच सुशिक्षित तरुण नागरिकांनी घ्वावयाची आहे, असे सांगून विशेषकरून मराठा नागरिकांनी काय करणे आवश्यक आहे यासंबंधी विचार मांडताना शिंदे म्हणाले, “आजपर्यंत हायस्कुलातून व कॉलेजातून बरेच मराठे गृहस्थ बाहेर पडून आपल्या स्वतःचा चरितार्थ व स्वदेशाची सेवा आपआपल्या परीने करीत आहेत. परंतु राजकारण, समाजसुधारणा, समाजसेवा, धर्मप्रसार, उद्योगवृद्धी, साहित्यवर्धन, ललितकलांचा उत्कर्ष, परदेशगमन, मागासलेल्यांचा पुढाकार, हीन जातींचा परामर्श, सर्वसाधारण परोपकार ही व अशीच दुसरी आणखी नागरिकत्वाची परस्पर जी भिन्न अंग आहेत त्यांत सुशिक्षित मराठ्यांचा त्यांच्या संख्येच्या मानाने कितीसा हात आहे बरे? राजकीय चळवळ म्हणजे काही विशिष्ट जातीचा सुळसुळाट असा आम्हावर परकीयांचा का आरोप असावा? सामाजिक परिषदेच्या रंगभूमीवर नेहमी काही विशिष्ट घाटांचीच पागोटी का दिसतात? स्वदेशी बँक व इतर मोठ्या प्रमाणावरचे धंदे जे हल्ली चालू आहेत त्यांपैकी मराठ्यांनी किती चालविले आहेत? मी वर धंद्याचे प्रमाण दाखविणारे जे कोष्टक दिले आहेत त्यात वकील, डॉक्टर व इतर तसलेच प्रतिष्ठित पण स्वतंत्र धंदे करणारे मराठे किती मिळतील? ब्राह्मण, लिंगायत, जैन, पारशी मुसलमान ह्यांच्यातल्याप्रमाणे केवळ स्वतःच्या कष्टाने पैसा मिळवून लौकिकाला चढलेले लक्ष्मीपुत्र मराठ्यांमध्ये मागे किती झाले व आता किती उरलेले आहेत? लेखक, शोधक, आवडीने प्रवास करणारे, स्वदेशात सामाजिक छळ सोसणारे अथवा परदेशात राजकीय अपमान सोसणारे हल्ली जे कोणी हिंदी नागरिक आहेत त्यात सुशिक्षितांच्या मानाने पाहिले असताही किती मराठे आहेत बरे? हे आणि असले कित्येक दुसे स्वाशयनिवेदनात्मक व अंतःपरीक्षणात्मक प्रश्न तुम्ही स्वतःस वारंवार विचारा.” हे सांगत असताना आपला उद्देश मराठा जातीला हिणविण्याचा मुळीच नाही; ही इशारत देण्यात आपला उद्देश ‘भावी नागरिकत्वाची तयारी करावयाची असेल तर तुम्ही जे शिक्षण घेत आहात त्यामध्ये तुमच्या तयारीला आवश्यक अशी पोषकद्रव्ये आहेत काय ह्याचा विचार करा असे आवाहन करण्याचा व ती तशी नसतील तर शिक्षण जास्त भरीव कसे केले पाहिजे ह्याचा विचार केला पाहिजे हे सांगण्याचा आहे’ असे ते स्पष्ट करतात. व्याख्यानाच्य अखेरीस मराठ्यांची सामाजिक आणि साहित्यविषयक काय कर्तव्ये आहेत ह्यासंबंधी शिंद्यांनी आपले विचार मांडले. राजकी, धार्मिक, औद्योगिक वगैरे बाबींसंबंधी मराठे या नात्याने इतर सुशिक्षितांहून काही वेगळी विशेष कर्तव्ये आहेत असे आपल्याला वाटत नाही. मात्र समाजिक बाबतीत मराठ्यांची कर्तव्ये इतरांहून भिन्न आहेत असे त्यांनी प्रतिपादिले. खरे म्हणजे मागासलेले ह्या लाज आणणा-या वि शेषणाची आम्हाला चीड आली पाहिज. ह्या ओंगळ विशेषणाचे शेपूट केवळ पुस्तकी शिक्षणाचा फैलाव झाली तरी तेवढ्यानेच गळून पडणार नाही. त्याबाबतीत शिक्षणापेक्षा सामाजिक सुधारणा हा विशे, परिणामकारी तोडगा असल्याचे आपल्याला वाटते असे त्यांनी नमूद केले. समाजाचा अर्धा भाग असणारा जो स्त्रीसमाज त्याची मात्र आपल्यामध्ये फार शोचनीय स्थिती आहे. पडद्याची चाल व दुसरेही काही निरर्थक नवे-जुने ढंग आपल्यात अद्यापि दडी मारून बसले आहेत. मराठ्यांना ख-या नागरिकत्वाचा योगक्षेम साधावयाचा असल्यास इतरांप्रमाणे त्यांनी पूर्ण आधुनिकच बनले पाहिजे. प्रगतीच्या मार्गात अडखळून किंवा कुंथून चालावयाचे नाही, निष्ठा आणि नम्रता कायम ठेवून पराकाष्ठा केली पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. तलवारीच्या युद्धाचा आता काळ गेला, तेवढ्यावरून युद्धच सर्व संपले असे नाही. नैतिक युद्ध पुढे चालणार आहे.


सामाजिक बाबतीतील मागासलेपणा दूर करण्यासंबंधी विवेचन केल्यानंतर साहित्यासंबंधी जे भावी ग्रंथकार असलीत त्यांच्यासाठी त्यंनी एक-दोन सूचना केल्या. मराठ्यांची एक बाळबोध रहाटी आहे ती ब्राह्मणी रहाटीखाली किंवा नवीन चालून येणा-या पाश्चात्त्य प्रभावाच्या संमिश्र रहाटीखाली अद्यापि दबून गेली नाही. मराठी भाषेत ज्या काही थोड्या नाव घेण्यासारख्या कादंब-या व नाटके झाली आहेत ती बहुतेक प्रतिभासंपन्न ब्राह्मण ग्रंथकारांनीच लिहिली आहेत. त्यांतील नायक व नायिका हे मराठे आहेत व तदनुरोधाने बहुतेक सामाजिक आणि घरगुती देखावे मराठ्यांच्याच रहाटीचेच त्यांना वठवावे लागले आहेत. परंतु ह्या ब्राह्मणग्रंथकारांना मराठ्यांच्या रहाटीचे छायाचित्र निर्दोषपणे काढता आलेले नाही. छायाचित्र निर्दोषपणे काढण्यासाठी लेखकास त्या त्या जातीशी तादात्म्य पावता आले पाहिजे. मराठी साहित्यातील ही उणीव भरून निघावयाची असेल तर तुमच्यातूनच मार्मिक कवी निर्माण झाले पाहिजेत असे त्यांनी म्हटले. मात्र प्रतिभावंत साहित्यिक निर्माण होण्यात मानवी प्रयत्नापेक्षा ईश्वरी देणगीवर अधिक अवलंबून रहावे लागते असेही त्यांनी नमूद केले.


इतिहासलेखनाचा मात्र तसा प्रकार नाही. महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास म्हणजे ब्राह्मण आणि मराठे ह्या दोन वीर बंधूंची संयुक्त कृती आहे. जसा ह्या दोघांनी मिळून तलवारीला तलवार किंवा तलवारीला लेखणी भिडवून हा इतिहास निर्माण केला तसे आता ह्यापुढे त्याचे शब्दचित्रही दोन्ही जातींच्या विद्वानांनी लेखणीला लेखणी भिडवून रेखाटले आणि रंगविले पाहिजे. प्रत्यक्ष इतिहासलेखनाचा काल अद्यापि आला नसला तरी इतिहाससंशोधनाचा काळ तरी हल्ली व्यर्थ जात आहे असे त्यांनी सांगितले. ह्या बाबतीत ब्राह्मण शोधक जसे व जितके प्रयत्न करीत आहेत तसे मराठे करीत आहेत असे दिसून येत नाही. हे ध्यानात घेऊन तुम्ही आतापासून आपली कंबर बांधून आपल्या ब्राह्मणबंधूंशी व ब्राह्मणगुरूंशीही केवळ सात्त्विक अशी अहमहमिका चालविली पाहिजे. आज जशी साधने मिळतील तसा उद्या इतिहासग्रंथ वठेल. पुढील चित्रपटाच्या रेखा वक्र होऊ नयेत व रंगात भेसळ होऊ नये यासाठी आतापासूनच दोघांनी (ब्राह्मणांनी व मराठ्यांनी) सावधगिरी राखण्यात व श्रम घेण्यात कसूर करू नये, अशी अपेक्षा त्यांनी प्रकट केला.


मराठी साहित्यातील अवास्तव चित्रणाच्या नेमक्या उणिवांवर त्यांनी बोट ठेवले. साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात मराठे अभावानेच दिसतात, त्याचप्रमाणे इतिहाससंशोधनाच्या क्षेत्रात त्यांची अनुपस्थिती विशेषत्वाने जाणवते. भावी काळात इतिहास यथार्थपणे लिहावयाचा असेल तर ब्राह्मण व मराठे यांचे इतिहाससंशोधनात संयुक्त प्रयत्न व्हावेत ही बाब त्यांनी प्रतिपादिली. व्याख्यानाच्या अखेरीस ज्याप्रमाणे आपल्या स्वतःसंबंधी आणि आपल्या कुटुंबियासंबंधी कर्तव्य करणे जरुरीचे असते; त्याचप्रमाणे आपली नागरिक कर्तव्ये पार पाडणे आवश्यक असते ही जबाबदारीची जाणीव त्यांनी सुशिक्षित मराठ्यांना करून दिली. भगवदगीतेच्या तिस-या अध्यायातील बारावा श्लोक उद्धृत करून त्यांनी असे म्हटले, “आपण नगरात राहून जी नागरिक सुखे भोगतो त्याचे आमच्या डोक्यावर ऋण असते. ते ऋण आम्ही नागरिक कर्तव्याच्या रूपाने न फेडता आम्ही नागरिक सुखे मात्र भोगीत राहू तर आम्ही शुद्ध चोरी केल्याप्रमाणे होईल. हे अपश्रेय तुम्हाला न लागो आणि तुम्हा सर्वांच्या हातून मायदेशीची सेवा घडो,” अशी शुभेच्छापर प्रार्थना करून त्यांनी आपले भाषण संपविले.


संदर्भ
१.    पांडुरंग चिमणाजी पाटील, माझ्या आठवणी, मौज प्रकाशन, मुंबई, १९६४, पृ. १२३-२४.
२.    तीन व्याख्याने, मराठा स्टुडंट्स ब्रदरहूड, पुणे प्रकाशकः ल. दे. ठोसर, पुणे, १९१४. सदर पुस्तिकेत मराठा भ्रातृमंडळाच्या वार्षिक संमेलनप्रसंगी पांडुरंग चिमणाजी पाटील यांनी ‘विलायतचा प्रवास’ ह्या विषयावर १५ मार्च १९१३ रोजी दिलेले व्याख्यान, विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सुशिक्षित मराठ्यांची कर्तव्ये’ ह्या विषयावर २० जून १९१४ रोजी दिलेले व्याख्यान व सौ. गंगाबाई खेडकर (डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या कन्या) यांनी २१ जून १९१४ रोजी ‘विद्यार्थ्यांची कर्तव्ये’ ह्या विषयावर दिलेले व्याख्यान, अशी तीन व्याख्याने समाविष्ट केलेली आहेत. प्रस्तुत प्रकरणातील उल्लेख शिंदे यांच्या व्याख्यानातील पुस्तिकेच्या पृ. १८ ते ३५ मधील आहेत.

मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग

व्हायकोम येथील सत्याग्रहाचे प्रकरण संपल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे हे साधू शिवप्रसाद यांना बरोबर घेऊन मलबार प्रांताच्या दौ-यावर निघाले. धर्मप्रसाराच्या कार्याच्या जोडीनेच मलबार प्रांतातील वैशिष्टयपूर्ण समजल्या जाणा-या समाजस्थितीचे, तेथील जातिव्यवस्थेचे व कुटुंबव्यवस्थेचे निरीक्षण करावे असा शिंदे यांचा मनोदय होता. समाजशास्त्रीय स्वरुपाच्या निरीक्षणाबद्दल त्यांच्या ठिकाणी केवळ कुतूहल होते असे नव्हे, तर जगातील आणि भारतातील समाजस्थितीचे अवलोकन करण्याची त्यांच्या ठिकाणी प्रबळ उर्मी होती असे म्हणणे रास्त ठरेल. युरोपात असताना त्यांनी तेथील वेगवेगळ्या देशांमध्ये हिंडून सामाजिक परिस्थितीचे अवलोकन व चिंतन केले. सामाजिक दृष्टिकोणातून निरिक्षण करण्याच्या दृष्टीने हिंदुस्थानमध्ये विविधता आणि वैचित्र्य विपुल प्रमाणात होते व वेळोवेळी केलेल्या भारतामधील दौ-यांत ते डोळसपणे समाजस्थितीचे अवलोकन करीत आले होते.


त्या वेळच्या मलबार प्रांतामध्ये विशेषतः नायर समाजात, मातृसत्ताक कुटुंबपद्धती प्रचलित होती. नंबुद्री नावाचे ब्राह्मण आणि नायर नावाचे क्षत्रिय ह्या दोन प्रभावी जाती तेथे होत्या व त्यांचे परस्परसंबंध हेही वैशिष्टयपूर्ण होते. नंबुद्री व नायर ह्या जातींमध्ये अनुलोम विवाहपद्धती प्रचलित होती. नंबुद्री हे श्रेष्ठ समजले जात व नंबुद्री घरातील थोरला मुलगाच केवळ नंबुद्री जातीतील मुलीशी लग्न करीत असे. इतर धाकटे भाऊ नायर जातीतील मुलीशी लग्न करीत असत. आपल्या घरातील मुलगी नंबुद्री ब्राह्मणाला विवाह संबंधात देणे नायर मंडळी भूषणास्पद मानीत. नंब्रुद्री घरातील केवळ थोरला मुलगाच नंबुद्री मुलीशी लग्न करीत असल्यामुळे नंबुद्री मुलींचा विवाह होणे कठीण पडत असे व या कारणाने नंबुद्री ब्राह्मण अनेक नंबुद्री स्त्रियांशी विवाह करीत असे. नायर कन्येने नंबुद्री तरुणाशी विवाह करणे ह्या चालीला 'संबंधम्' असे नाव असे. नंबुद्री आणि नायर यांच्यात या प्रकारचा बेटीविवाह असला तरी रोटीव्यवहार होत नसे हीही एक सामाजिक विसंगती त्या वेळेला प्रचलित होती. नायर लोक हे नंबुद्रीप्रमाणेच आल्याहून कनिष्ठ समजल्या जाणा-या जातीशी बेटीव्यवहार करीत असत. मलबारातील हा नायर समाज मातृसत्ताक पद्धतीचा होता. म्हणजे आर्थिक मिळकतीचा वारसा व वहिवाट बायकांकडून चालत असे. पुरुष हा मिळकतीचा नुसता व्यवस्थापक असे.


वस्त्रप्रावरणाच्या बाबतीतही नायर लोकांत चमत्कारिक चाली असल्याचें शिंदे यांना आढळून आले. कमरेपासून शरीराच्या वरील भागावर कोणतेच वस्त्र न घेण्याची पद्धत होती. स्त्रिया अर्धनग्नच असत. छातीवर एखादा लहानसा रुमाल किंवा वस्त्र टाकले की त्यांचा पोशाख पुरा होत असे. पण कोणी वडीलधारा पुरुषमाणूस समोर आल्यास त्याचा मान राखण्याकरिता तोही रुमाल बाजूला करण्याची पद्धती होती. युरोपियन लोक ज्याप्रमाणे डोक्यावरची टोपी काढून सन्मान दाखवितात त्याप्रमाणे छातीवरीचे वस्त्र काढण्याची ही पद्धत स्त्रियांमध्ये होती. नायरांहून कनिष्ठ समजल्या जाणा-या जातीतील स्त्रिया रसत्यावरुन उघड्या छातीने हिंडत असल्याचे त्यांना दिसून आले. वरिष्ठ जातीपुढे छातीवर वस्त्र घेऊन जाणे म्हणजे त्यांचा उपमर्द करण्यासारखे आहे असे कनिष्ठवर्गीय स्त्रिया समजत. कलावंतिणी व वाईट चालीच्या स्त्रिया अंगावर संपूर्ण पोशाख घातील. अशा अनेकविध सामाजिक वहिवाटी शिंदे यांना प्रचारात असलेल्या दिसून आल्या.


ह्या प्रवासामध्ये कपडे घालण्याच्या चालीबद्दल एक मनोरंजक हकिकत शिंदे यांना ऐकण्यास मिळाली. मंगलोरकडे कोवीं नावाची एक जंगली जात आहे. त्या जातीच्या बायका रस्त्यातून अर्धनग्न स्थितीत हिंडत असत. तेथील डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनचे सेक्रेटरी के. रंगराव यांच्या मनात एकदा असे आले, की ह्या जातीच्या स्त्रियांस सभ्य चालीरीती शिकवाव्यात. त्यांनी बरेचसे नवीन कापड आणून त्याच्या चोळ्या शिवून त्या ह्या स्त्रियांस वाटण्याची व्यवस्था केली. प्रथम हा नवीन पोशाख पाहून त्या बायकांना आनंद वाटला. पण त्या घरोघर गेल्यावर त्यांच्या जमातीला हा भ्रष्टाचार पाहून इतका राग आला की त्यांनी ह्या बायकांस बेदम मारले. दुस-या दिवशी त्या बायकांनी नवीन पोशाखाचे गाठोडे परत आणून के.रंगरावांच्या अंगणात फेकून दिले व त्यांना अत्यंत बीभत्स शिव्याशाप देत, त्रागा करीत त्या निघून गेल्या. या प्रांतातील लोकांची स्वच्छतेविषयी आस्था मात्र दांडगी असे. प्रत्येकाच्या परड्यामद्ये तळी असत. जाता-येता कित्येक वेळा स्नान करुन ओलेत्याने स्त्री-पुरुष हिंडत, असेही शिंदे यांच्या दृष्टोत्पत्तीला आले.


मलबार प्रांतातील प्रवास करुन व तेथील समाजस्थितीचे अशा प्रकारचे अवलोकन करुन विठ्ठल रामजी शिंदे १८ जून १९२४ रोजी मंगलोर शहरी परत आले. पाहतात तो, त्यांच्या आयुष्यात संघर्षाचा आणखी एक पेचप्रसंग निर्माण झाला होता. मलबारात हिंडत असातना वेगवेगळ्या ब्राह्मसमाजाला भेटी दिल्यानंतर शिंदे यांच्या लक्षात आले होते, प्रत्येक स्थानिक समाजात कुठल्यातरी प्रकारचा अंतस्त कलह आहे, त्याचप्रमाणे ब्राह्मसमाजी मंडळीना राजकारणाची अवास्तव धास्ती आहे. मंगलोर समाजामध्येही याहून वेगळी परिस्थिती नाही असे त्यांच्या अनुभवास आले. परत आल्यानंतर दोन दिवसांतच म्हणजे २० जून रोजी दहा बिल्लव जातीच्या पुढा-यांच्या सह्यांचे एक रजिस्टर पत्र शिंदे यांना मिळाले. ह्या पत्रात शिंदे यांच्याबद्दल तक्रारी नमूद केल्या होत्या. त्या अशा :


१. शिंदे हे त्यांना विनंती करुनही गांधीटोपी घालावयाचे सोडीत नाहीत.
२. व्हायकोमच्या दौ-यावर असताना कालिकत येथे व दक्षिण मलबारात जाहीर सभांतून राजकीय विषयावर भाषणे करुन शिंदे यांनी राजकीय चळवळीत भाग घेतला,
३. शिंदे यांच्या ह्या वर्तनामुळे व कृत्यामुळे सरकारी व युरोपियन कंपनीत नोकर असलेल्या सही करणा-या दहा गृहस्थांना व इतरांनाही शिंदे यांच्या राजकारणापासून धोका पोहोचणे संभवनीय आहे.
४. म्हणून शिंदे यांनी इत:पर आपण राजकारणात भाग घेणार नाही' असा लेख आपल्या सहीनिशी ज्या ज्या वृत्तपत्रांतून त्यांच्या राजकीय चळवळीविषयक वृत्त आले अशा वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करावा व असे तातडीने न झाल्यास ब्राह्मसमाजाची जादा साधारण सभा बोलावून योग्य तो उपाय करावा लागेल. हे पत्र वाचल्यावर स्वाभाविकपणेच शिंदे यांना वाईट वाटले असणार. मात्र आपल्या अंत:प्रेरणेशी कोणत्याही प्रकारे ते प्रतारणा करणे शक्य नव्हते. त्यांची धर्मविषयक व राजकारणविषयक जी प्रामाणिक भूमिका होती तिला अनुसरुनच शिंदे यांचे कार्य व विचारप्रकटन चालले होते. आपल्या लौकिक प्रतिष्ठेच्या आणि सरकारदरबारी व जनसामान्यांत असलेल्या प्रतिष्ठा सांभाळण्याच्या चिंतेतून बिल्लव मंडळूकडून हे कृत्य घडले होते. शिंदे यांनी ह्या पत्राला ताबडतोब उत्तर दिले, " मी मंगलोर येथे परत आल्यावर खुलास घेऊन मग ही तक्रार केली असती तर चालले असते. दौ-यावर मी जी चळवळ केली, भाषणे दिली त्यांचा विषय राजकारण मुळीच नसून समाजसुधारणा व धर्मसुधारणा हाच होता. अर्थात राजकारणात भाग घेणार नाही असे लिहून देण्यास मी मुळीच बांधलेला नाही. तो माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. ब्राह्मसमाजाच्या हिताला बाध न आणता राजकारणाच्या मूलतत्त्वाबद्दल ऊहापोह करणे माझे पवित्र कर्तव्य आहे. आता तरी तक्रार करणा-यांशी समक्ष भेटून तक्रार मिटवावी. कलकत्याच्या ज्या साधारण ब्राह्मसमाजाचा प्रतिनिधी म्हणून मी हे कार्य करीत आहे त्यांच्या सांगण्यावरुनच मी व्हायकोमला गेलो आणि जे जे मी केले ते ते सर्व त्यांना पसंत पडेल अशी माझी खात्री आहे."


बिल्लव पुढा-यांनी नमूद केलेली गांधी टोपीबद्दलची तक्रार शिंदे यांना अगदीच पोरकटपणाची वाटली.परंतु त्या काळी विशेषत: दक्षिणेत गांधी टोपीवर सरकारचा मोठा रोष होता, हेही त्यांच्या ध्यानात आले होते व म्हणूनच बिल्लव मंडळींना गांधीटोपीबद्दल धास्ती वाटत होती. एखाद्या घरी गांधीटोपीवाला आहे असे कळले तर सरकार त्या घरावर नजर ठेवी असेही त्यांना कळले. ( अगदी पुढच्या काळातही गांधी टोपीचा दबाव दक्षिण प्रांतात जाणवत होता. गांधीटोपीबद्दल मद्रास हायकोर्टात चाललेल्या एका खटल्याचा निर्णय लागून गांधी टोपी घालणे हे राष्ट्रद्रोहाचे कृत्य नाही असा निकाल मद्रास हायकोर्टाने दिला. )


स्वाभाविकपणेच इंग्रज सरकारची मर्जी राखू पाहणारी बिल्लव मंडळी गांधीटोपीला बिचकत होती. शिंदे यांचा गांधीटोपी घालण्याचा आग्रहच असला तरी निदान तिचा रंग तरी काळा असावा एवढी सवलत द्यायला ही मंडळी तयार होती. पण गांधीटोपी घालणे ही बाब शिंदे यांना काही मोठी तत्त्वाची वाटली नाही व डोक्यावर काहीच घालावयाचे नाही असा निर्णय शिंदे यांनी तेव्हा घेतला व पुढच्या आयुष्यातही पाळला. खादी न वापरण्याबद्दलचा आग्रह बिल्लव पुढा-यांनी सोडून दिला. शिंदे यांच्याविरुद्ध पत्र लिहिणा-या दहा मंडळींत दोन पोलीस अधिकारी होते. त्यामुळे ही बिल्लव मंडली कोणत्या धोरणाची आहेत हे शिंदे यांच्या लक्षात आले. हे सर्व प्रकरण आपल्या बाजूसह शिंदे यांनी कलकत्याच्या ब्राह्मसमाजाच्या कमिटीकडे पाठविले. त्यांनी शिंदे यांची बाजू पूर्णपणे उचलली. साधारण ब्राह्म समाजाच्या अध्यक्षांनी स्वत:च्या सहीने मंगलोर ब्राह्मसमाजाच्या अध्यक्षांना पत्र लिहून आपल्या मिशनरींचा व प्रतिनिदींचा उपमर्द होत आहे अशी स्पष्ट तक्रार केली.


कलकत्ता येथील साधारण ब्राह्मसमाजाकडून शिंदे यांना दरमहा जी नेमणूक होती त्यासाठी थोडासा भाग ( दरमहा रु. २५/-) मंगलोर समाजाकडून कलकत्यास जात असे. ह्या रकमेशिवाय कोणताही खर्चाचा भाग शिंदे यांच्याबाबतीत मंगलोर समाजावर पडत नव्हता. पण आपल्याविरुद्ध मंगलोर समाजाने अशा प्रकारची चमत्कारिक तक्रार केली आहे हे समजल्यावर मंगलोर समाजाकडून पाठविली जाणारा हा रकमेचा भाग स्वीकारण्याचे शिंदे यांनी नाकारले. मुंबई येथील प्रार्थनासमाजातील धुरिणांशी मतबेद झाल्यानंतर १९१० नंतर शिंदे यांनी मुंबई प्रार्थनासमाजाकडून प्रचारक म्हणून मिळणारे वेतन घेण्याचे आपणहून थांबविले होते. नेमकी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती मंगलोर येथेही झाली. शिंदे यांच्याबाबतीत योगच अशा प्रकारचे होते असे दिसते. शिंदे यांची राजकारण, समाजकारण ह्यांचा समावेश करणारी व्यापक धर्मकल्पना मुंबई येथील प्रार्थनासमाजाच्या धुरिणांना पचली नाही, त्याचप्रमाणे मंगलोर येथील लब्धप्रतिष्ठित बिल्लव ब्राह्मोंना मानवली नाही. मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग मिटेना. शिंदे आणि स्थानिक पुढारी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होईना. अंतर्गत कलह तसाच धुमसत राहिला. ह्या धुमसणा-या कलहात तेल पडावे अशीच आणखी एक घटना त्या सुमारास घडली.


मंगलोर ब्राह्म समाजाचे बिल्लव जातीचे सभासद व पुढारी दिवाणबहादूर एम्.बंगेरा यांच्या भावाच्या मुलीचे लग्न निघाले. दिवाणबहादूर एम् बंगेरा यांचे पूर्ण नाव मंगलोर मुंडप्पा बंगेरा असे होते. ह्या सुमारास ते डिस्ट्रिक्ट जज्ज म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्या आधी मंगलोर म्युनिसिपलटीचे कमिशनर म्हणूनही ते काही काळ कारभार सांभाळत होते. त्या काळातच आपल्या प्रतिष्ठेच्या व अधिकाराच्या बळावर त्यांनी मंगलोर ब्राह्म समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी करण्यासाठी जागा व परवानगी दिली. ब्राह्मसमाजीयाना स्वतंत्र स्मशानभूमी असणे ही हिंदुस्थानात अपवादभूतच घटना म्हणावी लागेल. दिवाणबहादूर बंगेरा यांचा दबदबा मोठा होता. दक्षिण हिदुस्थानमध्ये डिस्ट्रिक्ट जज्जाच्या पदापर्यंत पोहोचणारे ते पहिले भारतीय गृहस्थ होते. त्यांच्या कुटुंबातही मुले शिकलेली व मोठमोठ्या हुद्यावर काम करणारी होती. त्यांचा एक मुलगा लंडनमध्ये वैद्यकीय व्यवसाय करीत होता. दोन मुले सरकारी नोकरीत न्याय खात्यात व मुलकी खात्यात अधिकारी होती व एक बॅंकेमध्ये मॅनेजर होता. अशा या लब्धप्रतिष्ठित ब्राह्म कुटुंबातील मुलीचे लग्न निघाले. स्वाभाविकपणेच ब्राह्मसमाजाचे मिशनरी असलेल्या शिंदे यांनी समाजाला पुरोहित या नात्याने हे लग्न लावावे अशी दि. ब. बंगेरा यांनी इच्छा प्रदर्शित केली. परंतु बंगेरा ह्यांच्या भावी जावयांनी शिंदे यांच्याबाबतच्या निषेधपत्रावर सही केली होती. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन ह्या भावी जावयांनी आपली सही परत घेऊन आपल्याबद्दलचा विश्वास प्रकट केल्याशिवाय लग्नविधीत आपण भाग घेणार नाही असे शिंदे यांनी दि. ब. बंगेरा यांना स्पष्ट कळविले. शिंदे यांच्या या भूमिकेने दि. ब. बंगेरा यांना राग येऊन हे प्रकरण अधिकच चिघळू लागले.


अशा वेळी पुण्याचा अहल्याश्राच्या नविन इमारतीच्या उद्घाटनासाठी मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन हे ऑक्टोबर महिन्यात येण्याचे ठरले. शिंदे यांनी त्यांच्या स्वागतार्थ पुण्यास यावे असे पुणे शाखेचे आग्रहाचे निमंत्रण शिंदे यांना आले. म्हणून त्यांना पुण्यास या समारंभासाठी जावे लागले. त्यानंतर दोन महिने ते तिकडेच राहिले. बेळगावास नाताळास काँग्रेसचे अधिवेशन झाले त्याला जोडून भारतीय अस्पृश्यता निवारक परिषदेची बैठक काँग्रेसच्या मंडपात घेण्याचे ठरले. त्यासाठी शिंदे यांनी आपला मुक्काम वाढविला. ह्या परिषदेचे अध्यक्ष रामलिंगम् रेड्डी होते व परिषदेपुढे म. गांधीचे मुख्य भाषण झाले. परिषद आटोपल्यानंतर नवे-जुने गोवे येथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी शिंदे यांनी प्रवासाचा बेत आखला व तो पार पाडून जानेवारी १९२५ च्या प्रारंभी ते मंगलोरला पोहोचले.


अजूनही दहा निषेधकांचा वाद धुमसतच होता. निषेध करणा-यापैकी समक्ष भेटून वादाची तड लावण्यासाठी कुणी पुढे येत नव्हते, की माघार घेत नव्हते. शिंदे यांची भूमिका तत्त्वाला धरून असल्यामुळे त्यांनी माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. मंगलोर ब्राह्मसमाजाचे अध्यक्ष के. रंगराव हे पूर्णपणे शिंदे यांच्या बाजूचे होते. परंतु त्यांनाही या प्रकरणाची तड लावता येईना. उलट बिल्लव मंडळींचा आग्रह बघून त्यांचा विषाद उत्तरोत्तर वाढतच गेला व समाजाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ते मद्रासला निघून गेले. शिंदे यांनी पुढचे तीन महिने या प्रकरणाची तड लावण्याच्या दृष्टीने वाट पाहिली. अखेरीस कलकत्याच्या साधारण ब्राह्मसमाजाच्या कमिटीची अनुमती घेऊन मंगलोर ब्राह्मसमाजाचा निरोप घेऊन ते पुण्यास कायमचे राहण्यासाठी आले.


अशा रीतीने जिथे मन लावून काम केले त्या संस्थेशी फारकत घेण्याचा हा आणखी एक प्रसंग शिंदे यांच्या आयुष्यात लिहिलेला होता.  त्यांच्या धर्मविषयक कार्याचे एक आवर्तन मंगलोर येथे पूर्ण झाले.

बहुमान, अवमान आणि निष्ठा

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कृतिशील जीवनाला प्रारंभ झाल्यापासून त्यांना अनेकवार भारताच्या विविध प्रांतांत प्रवास करावा लागला. ब्राह्मसमाजाचे कार्य असो, की डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम असो, संपूर्ण भारत हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. कार्यानिमित्त केलेल्या ह्या प्रवासामध्ये भारतातील विविध प्रांतांतील मंडळींना शिंदे यांच्या कार्याचा परिचय झाला, त्याचप्रमाणे त्यांनी अपूर्व स्वार्थत्याग करुन अस्पृश्यांनिवारणाचे अत्यंत कळकळीने चालविलेले कार्य पाहून त्यांच्याबद्दल आदराची भावना ह्या मंडळींच्या मनात स्वाभाविकपणे निर्माण होत होती. ह्या आदरांच्या पोटी भारतातील विविध संस्थांनी शिंदे यांना मानपत्र अर्पण करुन त्यांचा गौरव केला. मुंबई प्रांतामध्ये त्यांच्या कार्याबद्दल गौरव होणे ही गोष्ट स्वाभाविक होती. भारतातील अन्य प्रांतांमध्येही त्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला ही गोष्ट विशेष म्हणावी लागेल.


शिंदे यांना मिळालेल्या मानपत्रांपैकी काही मानपत्रे खाली नमूद केल्याप्रमाणे :
१) पालघाट, मलबार.
२) हुबळी, कर्नाटक.
३) २३ एप्रिल १९२३ रोजी मिशनच्या पुणे शाखेचे शिक्षक व विद्यार्थी यांजकडून ५१ व्या वाढदिवसानिमित्त.
४) मिशनच्या पुणे शाखेच्या शिक्षिका व विद्यार्थिनी यांच्याकडून ५१ व्या वाढदिवसानिमित्त.
५) २३ एप्रिल १९२५ रोजी पुमे येथे ब्राह्मणेत्तर पुढा-यांतर्फे.
६) १९२८ साली दौलतपूर (पूर्व बंगाल) कॉलेज विद्यार्थ्यांतर्फे.
७) २३ डिसेंबर १९३३ रोजी चोखामेळा बोर्डिंग, आर्वी, नागपूर, मध्यप्रदेश.
८) डिसेंबर १९३३ मध्ये नागपूर अस्पृश्यवर्गातर्फे गणेश आकाजी गवई यांच्याकडून.
९) १८ जून १९३४ रोजी मुंबई येथे ४१ संस्थांतर्फे.


शिंदे यांनी आपल्या जीवितकार्याला प्रारंभ केल्यापासून मराठा जातीतील व्यक्तींनी आणि पुढा-यांनी त्यांच्याबद्दल एक अपेक्षा व्यक्त केलेली दिसून येते. ती ही की, शिंदे यांनी ब्राह्मसमाजाचे कार्य न करता तसेच अस्पृश्यवर्गासाठी कार्य न करता मागासलेल्या स्वजातीय मराठ्यांसाठीच कार्य करावे, क्वचित मराठा जातीची कक्षा वाढवून ब्राह्मणेतर पक्षाने शिंदे यांनी बहुजन समाजासाठी कार्य करावे, ही अपेक्षा प्रकट केलेली आढळते. डिसेंबर १९०३ पासून म्हणजे मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून कामाला आरंभ केल्यापासून शिंदे यांची ह्या प्रश्नाबाबत निश्चित स्वरुपाची भूमिका दिसून येते व ती तितक्याच दृढपणाने आयुष्यभर टिकून राहिलेली आढळते. ब्राह्मधर्म प्रचाराचे कार्य म्हणजे सर्व जातिधर्मीयांना उन्नत धर्माची शिकवण देण्याचे व्यापक पातळीवरील कार्य त्यांनी आरंभिले होते. ह्या कामाचा संकोच करुन केवळ मराठी जातीपुरते संकुचित स्वरुपाचे काम करण्याची कल्पना त्यांना पटली नाही. शिंदे हे ऑक्सफर्ड येथील शिक्षण आटोपून स्वदेसी नुकतेच आले होते. ऑक्टोबर १९०३ मध्ये ते बडोद्यास गेले असताना तेथील मराठा मंडळींनी त्यांच्या सत्कारार्थ पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित केला होता. ह्या प्रसंगी वक्त्यांची एका मागून एक जी भाषणे झाली, त्यामधून प्रतिकूलच सूर निगू लागला. शिंदे यांचे शिक्षण मराठा समाजाच्या खर्चातून झालेले असल्याने व विलायतेचा प्रवासखर्चही महारांजांच्या पैशातून झालेला असल्याने शिंदे यांनी मराठा समाजाच्या सेवेला हजर राहणे योग्य होते, ते प्रार्थनासमाजात शिरले हे बरे झाले नाही, असा बहुतेक व्याख्यात्यांचा विरोधात्म सुर होता. अशी भाषणे झाल्यानंतर मंडळी ज्या वेळेला त्यांच्या गळ्यात माळ घालावयास आली, तेव्हा उत्तर देताना शिंदे म्हणाले, "असे जर आहे, तर मी ही माळ घालण्यास लायक नाही. म्हणून ती हातातच घेत आहे. प्रार्थनासमाज सर्वांसाठी आहे आणि त्यासाठी मला तयार केले, हे मराठ्यांस-विशेषतः महाराजांना-भूषणावहच आहे. स्वतः महाराज हेच जर केवळ मराठ्यांकरिता नाहीत, तर त्यांचा अनुयायी मी निराळा कसा होऊ?"


धर्मकार्याचाच एक भाग म्हणून शिंदे यांनी ऑक्टोबर १९०६ मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना करुन अस्पृश्यतानिवारणाचे कार्य सुरु केले होते, ही गोष्टही मराठा समाजातील काही व्यक्तींना रुचली नाही. गणपतराव भिकाजीराव जाधव ह्या एका अपरिचित मराठी गृहस्थाने ५ डिसेंबर १९०६ रोजी विठठल रामजी शिंदे यांना पत्र लिहून आपली नापसंती अगदी स्पष्टपणाने नमूद केली आहे. त्यांनी म्हटले,"आपल्यासारख्या दुर्मीळ विद्वानांचे लक्ष सध्या आमचे लोकांची पीछेहाट व दैना उडाली तिकडे दुर्लक्ष महारमांगांची स्थिती सुधारण्याकडे लागावी व आम्ही जे पूर्वी उत्तम अवस्थेत होतो, ते सध्याच्या अवनत स्थितीकडे पोहचलो असता, तिकडे दुर्लक्ष व्हावे ही केवढी खेदाची गोष्ट! हे आपले करणे घरची माणसे उपाशी ठेऊन दुस-यास पक्वान्न घालण्यासारखे आहे. आपण ज्या समाजात जन्मलो आणि ज्या समाजाच्या मदतीने पदवीधर झालो, व एवढे नावारुपास चढलो, त्या समाजाची काय दैना उडाली आहे इकडे आपले पहिल्याने लक्ष गेले पाहिजे होते. आपण प्रार्थनासमाजात शिरला ते माझ्या मते बरे झाले नाही. पुन्हा प्रार्थना करुन सांगतो की, आपण प्रचारात नसलेला पोशाख व राहणीमा बदला, असे करण्यास परमात्मा आपणास बुद्धी देवो."


कार्यारंभीच आपल्या समाजामध्ये आपल्याबद्दल काहीएक अपेक्षा निर्माण झाली आहे, हे शिंदे यांना जसे जाणवले, त्याचप्रमाणे आपण धर्मप्रसाराचे व अस्पृश्यतानिवारणाचे जे काम पत्करले आहे, त्याबद्दल मराठी समाजात आपल्याबद्दल नाराजी निर्माण झाली आहे हेही त्यांच्या लक्षात आले होते. परंतु याबाबत शिंदे यांची भूमिका स्वच्छ व दृढ स्वरुपाची होती. मराठी समाजाची व एकंदर बहुजन समाजाची उन्नती व्हावी, अशी त्यांची इच्छा जरूर होती. विद्याबल, द्रव्यबल व अधिकारबल यांच्याअभावी बहुजन समाज हा दुबळा झालेला आहे व त्याची प्रगती व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी १९२० सालची निवडणूक लढविताना आपल्या बहुजन पक्षाचा जाहीरनामा तयार केलेला होता. मात्र मराठी समाज व बहुजन समाज यापेक्षा अस्पृश्यतेचा प्रश्न अतिशय निकडीचा आहे; कारण अस्पृश्यतेमुळे होणारा अन्याय दारुण स्वरुपाचा असून मनुष्यतेला कलंक लावणार आहे, असे त्यांना वाटत असल्यामुळे अस्पृश्यतानिवारणाच्या कामाची अत्यंत निकड त्यांना जाणवत होती व आपले शक्तिसर्वस्व वेचून अस्पृश्यतानिवारणाचेच कार्य आपण करावे असे त्यांनी योजिले होते. बहुजन समाजासाठी कार्य व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य यासंबंधीचा तणाव त्यांच्या मनात पुढील काळात राजकीय व सामाजिक काम करीत असतानाही दिसून येतो. १९२३ साली मिशनच्या प्रत्यक्ष जबाबदारीतून ते मुक्त झाले असले तरी अस्पृश्यतानिवारणकार्याचा त्यांचा ध्यास हा यत्किंचितही कमी झाला नव्हता. त्यांना मिळालेल्या विविध मानपत्रांना त्यांनी जी उत्तरे दिली, त्यामधूनही त्यांची अस्पृश्यतानिवारणाकार्यावरील निष्ठा किती अढळ आणि उत्कट होती, याचे प्रत्यंतर आपणाला येते.


शिंदे यांच्या ५३ व्या वाढदिवशी २३ एप्रिल १९२५ रोजी ब्राह्मणेतर समाजाच्या वतीने त्यांना जे मानपत्र देण्यात आले त्यांच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात त्यांच्या मनाचे प्रतिबिंब उत्तम प्रकारे उमटलेले दिसते. ते आपण मागील एका प्रकरणात विस्ताराने पाहिले आहे. त्या वेळी उत्तरदाखल केलेल्या भाषणात त्यांना होऊन बसला हे आत्यंतिक तळमळीने सांगितले.


१८ जून १९३४ रोजी मुंबईतील ४१ संस्थांच्य वतीने विठ्ठल रामजी शिंदे यांना मानपत्र देण्याचा समारंभ भव्य प्रमाणात साजरा झाला. महात्मा गांधी ह्या समारंभाचे अध्यक्षस्थान घेणार हे प्रसिद्ध झाल्याने परळच्या दामोदरदास ठाकरसी हॉलमध्ये अलोट गर्दी झाली होती. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक लवकर संपू न शकल्याने महात्मा गांधींच्या ऐवजी मथुरादास वसनजी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पाड पडला. मानपत्र दिल्याबद्दल अण्णासाहेब शिंदे यांनी विविध संस्थांचे आभार मानले व पुढे ते म्हणाले, "जोपर्यंत समाजाच्या अंतःकरणातून अस्पृश्यतेसारखे दूषण पुसून टाकले जात नाही व अंतःकरणे शुद्ध होत नाहीत, तोपर्यंत ह्या मानपत्राचा काहीही उपयोग नाही. जोपर्यंत अस्पृश्यतेचा हा कलंक आपण पुसून टाकीत नाही, तोपर्यंत मातृभूमीच्या स्वराज्याचे स्वप्न आपण बघू शकत नाही. खिश्चन, इस्लाम अथवा झरतुष्ट्र यांसारखे धर्म अस्पृश्यतेला थारा देत नाहीत. केवळ हिंदूच जातीजातींमध्ये अशा प्रकारचा गलिच्छ भेदभाव करतात." उत्तरादाखल केलेल्या भाषणात ते पुढे असेही म्हणाले की, "हिंदुस्थानातील अस्पृश्यतेसारखा एक मोठा अन्याय स्वस्थ बसून चालू दिल्याबद्दल सर्व जग अपराधी आहे. म्हणून या कामात सर्व जगाने भाग घेतला पाहिजे. "


आपल्या होणा-या या बहुमानाच्या प्रसंगी अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांनी दिलेल्या सहकार्याचे व अस्पृश्यतानिवारणार्थ केलेल्या कामाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. "ह्या कार्यास माझ्या भगिनी, आई-बाप ह्यांनी रात्रदिवस झटून मदत केलेली आहे. विरोध तर नाहीच नाही, नसुता आशीर्वादच नव्हे तर ह्या कार्यामध्ये माझे नोकर म्हणून माझ्या आईबापांनी मिशनमध्ये काम केले आहे. ग्लोब मिलच्या आजूबाजूची वस्ती म्हणजे पूर्वी नरकपुरीच होती. त्या ठिकाणी हरिजनांच्या आजारी बायांना आपल्या अंथरुणात निजवून ठेऊन माझ्या आईने त्यांची सेवा निरपेक्षबुद्धीने केली आहे." पुढे ते म्हणाले, "स्वराज्य मंदिरातील लाकडी दारे मोकळी केल्याने अस्पृश्यतेचा कलंक नाहीसा होणार नाही, तर आत्मिक दारे उघडल्यानेच ते काम होणार आहे. महात्मा गांधी आज येथे आले असते तर त्यांना पूर्वीच्या एका गोष्टीची आठवण करुन दिली असती. त्या वेळी मी त्यांना म्हणालो, "गांधीजी, मी मोठा देशद्रोही (टेरर) आहे. कारण मला तुमचे स्वराज्य नको आहे, स्वराज्याचा नाद सोडून प्रथम तुम्ही महारवाड्यात जाऊन रहा कसे व प्रथम त्यांची अस्पृश्यता नष्ट करा पाहू, नंतर स्वराज्याच्या पाठीमागे लागा." महात्माजी त्या वेळी हसले व म्हणाले, "मि. शिंदे, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण सध्या तरी मला माझ्या मताप्रमाणे वागू द्या." उत्तरादाखल केलेल्या भाषणाच्या अखेरीस ते म्हणाले, "अस्पृश्यता अजून नष्ट झालेली नाही व ती नष्ट करण्याचा आपण कसून प्रयत्न कराल ह्या अटीवर मी ह्या मानपत्राचा स्वीकार करीत आहे." प्रत्येक मानपत्राच्या वेळी उत्तरादाखल केलेल्या भाषणात अस्पृश्यतानिवारणाकार्याबद्दलची त्यांची तीव्र तळमळ आणि ह्या कामाबद्दलची अव्यभिचारी निष्ठा प्रकट होते.


१९१७-१८ नंतर देशात राजकारणाचे जोरदार वारे वाहू लागल्यानंतर राजकीय स्वार्थ साधण्याची प्रेरणा प्रबळ होऊ लागली. त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून शंदे यांच्यावर ब्राह्मणेत्तर पक्षीय त्याचप्रमाणे अस्पृश्यवर्गीय मंडळींकडून टीकेचे आघात होऊ लागले. मराठवर्गाला राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात ओढण्याच्या उद्देशाने शिंदे यांच्या प्रेरणेने मराठा राष्ट्रीय संघाची पुण्यामध्ये स्थापना करण्यात आली. एका कडव्या ब्राह्मणेतर व्यक्तीने हितचिंतक या टोपणनावाने शिंदे यांना परखड शब्दात दूषणे दिली आहेत. ह्या पत्रामध्ये मराठी स्वराज्य संघाची स्थापना करणारे तुम्ही मूर्खातले मूर्ख आहात असेही शिंदे यांना या पत्रलेखकाने म्हटले आहे. "तुम्हाला हे ब्राह्मणलोक हरभ-याच्या झाडावर चढवीत आहेत. तुमच्या हातून ते मराठ्यांत फूट पाडीत आहेत. तुमच्या सर्व गुप्त व्यवहाराची किंवा कटाची बातमी सी. आय. डी. च्या मार्फत गव्हर्नरसाहेब यांजकडे कळविण्यात आली आहे." इत्यादी मजकूर लिहून मिशनचे चंबूगबाळे लवकर आपटून आपणास कायमचा रामराम ठोकावा लागेल आणि मग खुशाल ब्राह्मलोकांच्या पायाचे तीर्थ चाटीत बसाल वगैरे मजकूर लिहून मराठी स्वराज्य संघ मोडून टाका व तुमच्या मिशनशिवाय दुसरे कोणतेही कार्य करु नका असा सल्ला या 'हितचिंतकाने' दिला आहे. कडव्या मराठी अभिमानी माणसांची शिंदे यांच्याकडे बघण्याची कोणती दृष्टी होती हे प्रातिनिधिक स्वरुपात या पत्रावरुन दिसून येते.


माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्यानंतर भारताच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार वावटळ निर्माण झाली. अस्पृश्यवर्गाचे कायदेकौन्सिलात कोणत्या प्रकारे प्रतिनिधी जावेत, ह्याबद्दल शिंदे यांच्या मताचा विपर्यास काही अस्पृश्यवर्गीय मंडळींनी केलेला दिसतो. शिंदे हेच जणू काय अस्पृश्यांचे कडवे शत्रू आहेत, असे समजून त्यांच्यावर केवळ कठोरच नव्हे, तर अत्यंत अश्लाघ्य स्वरुपाची टीका अस्पृश्यांनी चालविलेल्या वृत्तपत्रातून येत राहिली. ज्यांच्यासाठी घरदार सोडून अत्यंत खडतर अशा प्रकारे सेवाव्रत दीड पट शिंदे यांनी चालविले होते, त्यांच्याकडून होणारी या प्रकारची निंदा पचविणे हे शिंदे यांना काही सोपे गेलेले नसणार. मात्र ऋषितुल्य अशा प्रकारच्या समजसपणाने त्यांनी याही टीकेकडे पाहिले. मानपत्रातून केलेला गौरव असो की, वर्तमानपत्रातून झालेली टीका असो, या दोन्हीकडे विठ्ठल रामजी शिंदे हे समवृत्तीने पाहत होते. बहुमान अथवा अवमान यांकडे बघण्याची त्यांची दृष्टी कशी प्रगल्भ, समभावाची आणि समंजस विनोदाची होती, याची कल्पना त्यांनी मानपत्राला दिलेल्या एका उत्तराच्या भाषणावरुन येऊ शकते. त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त मिशनच्या शिक्षकवर्गाने २३ एप्रिल १९२३ रोजी त्यांना मानपत्र अर्पण केले होते, या प्रसंगी त्यांनी उत्तरादाखल जे भाषण केले त्यामध्ये त्यांची मनोभूमिका उत्तर प्रकारे दिसून येते. "मनुष्याच्या चरित्रात ज्या कित्येक आपत्ती येतात त्यातील आपली झालेली अकटोविकट स्तुती आपल्याच कानांने ऐकणे ही होय. जेव्हा जेव्हा असे दुर्धर प्रसंग माझ्यावर येतात, तेव्हा ते सहन करण्याचा एकच तोडगा माझ्याजवळ आहे. तो हा की, इतर वेळेला जी माझी निंदा व अपमान झालेला असतो त्याची मी आठवण करतो आणि या स्तुतिनिंदेचे ओझे ब्रह्मार्पण करुन, मी माझ्या कार्यास मोकळा होतो." हे मानपत्र शिंदे यांना दिले गेले, त्या काळातच शिंदे यांच्या राजकारणविषयक भूमिकेबाबत व मिसनबाबत टीकेची झोड उठविली गेली होती. कठोर अशा स्वरुपाच्या टीकेने त्यांच्या मनावर खोल आघात झालेले असणार. ह्या अवमानाकडेही वरच्या पातळीवरुन बघण्याची प्रगल्भता अण्णासाहेबांच्या ठिकाणी होती. निंदा असो की स्तुती असो की आपल्या अंगाला लागू नये, यासाठी विनोदाचा अस्त्र म्हणूनही उपयोग करण्याची तरल विनोदबुद्धी शिंदे यांच्या ठिकाणी होती, म्हणून वरील उत्तरादाखल केलेल्या भाषणात ते पुढे म्हणाले, "विठ्ठल रामजी शिंदे आणि मानपत्र आणि तेही पुण्यासारख्या शङरात ! हा प्रकार विचित्र खरा, नेहमी जाच करुन घेण्याची एखाद्या गाढवाला सवय असावी, त्याला एखाद्याने कुरवाळून झूल घातली, तर ती त्यास जशी असह्म होईल, तद्वतच आजचे मानपत्र मला झाले आहे."

अण्णासाहेब शिंदे हे टीकेचे निराकरण करण्याच्या भरीस पडताना कधी दिसत नाहीत. स्तुती मात्र त्यांना अगदीच सहन होत नाही, असे दिसते. ही स्तुती अथवा गौरव झटकून टाकल्याशिवाय त्यांना बरे वाटत नाही. त्यांची विनोदबुद्धीच अशा वेळी त्यांना उपयोगी पडते. १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना जी शिक्षा झाली होती, ती भोगून ते येरवड्याच्या तुरुंगातून १४ ऑक्टोबर १९३० रोजी सुटून बाहेर आले. दुस-या दिवशी रे मार्केटमध्ये त्यांच्या अभिनंदनार्थ सभा झाली. गौरवपर भाषणे झाल्यानंतर त्यांच्या गळ्यात माळ घातली, तेव्हा ते म्हणाले, "आता कायदेभंग करुन तुरुंगात जाणे इतकी सामान्य गोष्ट झाली आहे की, अशा माळा तुरुंगातून परत आलेल्यांच्या गळ्यात न घालता त्या माळा अद्यापि तरुंगात न गेलेल्यांच्या गळ्यात घातलेल्या ब-या."

 

प्रोफेसरांच्या कुटुंबात सरोवर प्रांती

मेपासून दोन महिन्यांची कॉलेजची टर्म सुरू झाली. विठ्ठल रामजींचा अभ्यास आणि अवांतर वाचन चालू होते. नवनवीन विचार त्यांच्या कानावर पडत होते व नव्या विचाराचे ग्रहण करताना त्यांना आनंद वाटत असे. कॉलेजच्या देवळामध्ये दर रविवारी प्रोफेसरांच्याही उपासना होत असत. २० मे १९०२च्या रविवारी प्रो. रेव्ह. ऑजर्स यांची झालेली उपसना त्यांना फारच चांगली वाटली. सुधारक युनिटेरियन धर्ममतावर टीका करण्याचे, त्यांच्या उणिवा दाखविण्याचे स्वातंत्र्य सहजपणे येथे प्रोफेसर मंडळी घेत असत.

प्रो. ऑजर्स यांनी धर्माची सत्यता व आवश्यकता ही उपयुक्तता, नीती वगैरे बाह्य गोष्टींच्या पलीकडची आणि आत्म्याच्या अनिर्वचनीय व्यापारात निगूढ अशी आहे असे सांगून उदार धर्म व सुधारणा ह्यांस धर्माचे हे श्रेष्ठ स्वरूप कळत नाही. अशा आशयाचा उपदेश केला.१

धर्म, परमेश्वर ह्यांच्याबद्दल विविध मते शिंदे यांच्या कानावर पडत होती आणि त्याबद्दल त्यांचे चिंतनही चालू असे. त्यांच्या मनाची आध्यात्मिक तळमळ चाललीच होती. ह्या दिवशीच त्यांच्या मनाला अशांतता वाटू लागल्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी एकतारीवर 'संकट कोण निवारी प्रभूविण' हे पद म्हणून बराच वेळ भजन केले. नंतर रीस डेव्हीड ह्यांच्या ‘बुद्धधर्म’ ह्या पुस्तकाची तीसएक पाने वाचली. रात्रीचे साडेबारा वाजले होते. चांदणे स्वच्छ पडले होते. सर्वत्र सामसूम होती. देखावा सौम्य, गंभीर होता. थोडेसे फिरून येऊन विठ्ठल रामजी अंथरुणावर पडले. आपल्या मनाची चाचपणी त्यांनी केली. गेल्या तीन-चार वर्षांपासून अंतर्मुख होऊन स्वतःच्या मनाचा कानोसा घेण्याची त्यांची सवय होती. त्यांची परमेश्वरावर श्रद्धा अभंग होती पण जीविताचे गूढ काय हे कळत नाही. ते कधी उकलेल काय? अशी विनवणी त्यांनी परमेश्वराजवळ केली.२

त्यांच्या ह्या तीव्र स्वरूपाच्या आध्यात्मिक तळमळीचा परिणाम असेल, परमेश्वराचा आपल्याला साक्षात्कार झाल्याची अनुभूती त्यांना आल्यासारखी वाटली. १९०२ च्या छोट्या रोजनिशीत ३० मे रोजी अशा अनुभवाची त्यांनी नोंद केली आहे. “मी ‘अमेरिकन जर्नल ऑफ थिऑलॉजी’ मधील ‘जपानमधील सद्यःकालीन धर्मस्थीती’ हा लेख वाचताना अगदी रंगून गेलो होतो. मी सहज डोके वर करून बाहेर पाहिले, केवढे अपूर्व दृश्य दिसले. मँचेस्टर कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसलो होतो. शेल्फमध्ये असलेले ग्रंथ जिवंत झाले. डॉ. मार्टिनोचे वचन डाव्या बाजूला. झिनो, सॉक्रेटीस ह्यांची वचने समोर. ह्या गतकालीन विभूतीच्या आत्म्याशी माझा संवाद सुरू झाला. बाहेर सायंप्रकाश ओसरून अंधार होऊ लागला होता. नंतर वेगाने अंधारून आले. मी आत्मभान विसरून गूढ अशा ध्यानावस्थेत गेलो. मी परमेश्वराला पाहिले.”3 ह्या दिवसात अशा आध्यामात्मिक अनुभूतीची ओढ त्यांना लागून राहिली होती. लवकरच दुसरा एक अनिर्वचनीय आनंदाचा आध्यात्मिक अनुभव सरोवर प्रांतात प्रो. कार्पेंटर यांच्याकडे ते मुक्कामाला असताना आला.

प्रो. कार्पेंटर यांनी लेक डिस्ट्रिक्टमध्ये बॉरोडेल येथे आपल्या बि-हाडी सुटीचे पंधरा दिवस घालविण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे आणि त्यांचे सहा वर्गबंधू यांना बोलावले होते. मँचेस्टर कॉलेज म्हणजे एक मोठे कुटुंबच होते. कॉलेजात विद्यार्थी पंधरा-वीस, पाच-सात प्रोफेसर, त्यांच्या मुली, नाती व इतर कुटुंबीय असा सगळा धर्मपरिवार म्हणजे बृहत् कुटुंब असे. ज्येष्ठ प्राध्यापक विद्यार्थ्यांना आळीपाळीने आपल्या घरी चहा घेण्याला आठवड्यातील एक दिवस मुक्रर करून अगत्याने निमंत्रण करीत असत. प्रो. कार्पेंटर यांनी निसर्गरम्य अशा सरोवर प्रांतातील बॉरोडेल या गावी लीथस् कॉटेज हे निवासस्थान सुटीमध्ये भाड्याने घेतली होते. या उन्हाळ्याच्या सुटीत प्रत्येक पंधरवड्यात पाच-सहा विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी बोलावून सर्व विद्यार्थ्यांचा पाहुणाचार करावयाचे प्रो. कार्पेंटर यांनी ठरविले होते. १४ जुलै १९०२ रोजी सकाळी साडेनऊ वाजता ऑक्सफर्डहून शिंदे रेल्वेने निघाले. बरोबर त्यांचे मित्र मि. कॉक आणि मि. बार्न्स होते. मि. फर्ग्युसन, मि. लॉकेट आणि मि. लमिस व मि. टिंडेल हे त्यांच्या आधीच कार्पेंटरांच्या बि-हाडी पोहोचले होते. हायस्कूलमध्ये गेल्यानंतर वर्डस्वर्थसारख्या कवीच्या कवितांतून सरोवर प्रांतातील निसर्गाचे रम्य वर्णन त्यांनी वाचले होते. तो रम्य असा सरोवर प्रांत प्रत्यक्ष आपल्याला पहायला मिळणार ह्याबद्दल विठ्ठल रामजींना विलक्षण आनंद झाला होता. त्यांची गाडी ७० मैल वेगाने निघाली आणि प्रवासात प्रारंभी मनावर प्रतिकूल परिणाम करणारे चित्र त्यांना पहावे लागले. वाटेत बर्मिंगहॅमपासून, स्टॅफर्ड शेफिल्ड, मँचेस्टर अशी कारखान्यांची गावे असलेला मुलूख लँकस्टरपर्यंत लागला. कारखान्यांनी गजबजलेला हा प्रदेश ‘ब्लॅक कंट्री’ म्हणून ओळखला जातो. “बाहेर धुराने व धुळीने दिशा धुंद झाल्या होत्या. मांडीवरच्या वर्तमानपत्रावर दोन-चार मिनिटांतच कोळशाची भुकटी साचे. छाती वर करून बाहेर डोकावल्यास चहूकडे नुसती गिरण्यांची धुराडी व त्यांतून निघणारे धुरांचे कल्लोळ दिसत. घरे देवळे व रस्ते ही सर्व सारखीच काळवंडून गेली होती.” हे दृश्य बघितल्यावर विठ्ठल रामजींच्या मनात आले. अशा वातावरणात  अष्टौप्रहर राहून निर्जिव यंत्राप्रमाणे झीज सोसणा-या हतभागी मजुरांची काय दशा असेल. आमच्या कवींनी नुसत्या कल्पनेनेच भवचक्राची चित्रे काढली आहेत. येथे मात्र हे चक्र प्रत्यक्ष भ्रमत असलेले दिसत आहे. प्रगतीची ही काळी खरखरीत बाजू जाणवून, सुधारणेची ही दोन अंगे बघून ते अंतर्मुख झाले. सुधारणेच्या बाह्य भपक्यामागे तिचे हे कष्ट, घामाच्या धारा कशा असतात हे जाणवले. येथे नुसती मोकळी हवाही मिळत नाही ही किती दुर्भाग्याची गोष्ट. सुधारणेला उद्देशून ते मनातल्या मनात म्हणाले, “हाल आणि श्रमाची तर गोष्ट राहू दे. जगात राहण्याची कला आपल्यास चांगली साधली आहे असे तू किती वेळा तरी म्हणतेस. पण नाही सुधारणे ! तुलादेखील अद्यापि पुष्कळ सुधारले पाहिजे आहे.”४

शिंदे यांच्या मनात या प्रकारचे विचार यावेत असेच एकंदर बाहेरचे दृश्य होते. दोन तास झाले तरी वेगाने धावणा-या गाडीतून खिडकीच्या बाहेर मोकळा प्रदेश असा फार वेळ पहायला सापडेना. “व्यापाराची घडामोड व उद्योगाची धड्धड् किती लगट केली तरी मागे राहीनात. एखादे पटांगण नजरेस पडल्यास त्यात धुरकट व दमट हवेत आणि कोळशाच्या राखेत कंगाल पोरे बागडत आहेत असे दिसावे! घरे पहावीत तर कबुतराच्या खुराड्यासारखी रांगेत नेमकी बसविलेली. सोय आणि शांती यामुळे इतकी सवंगली आहेत की बिचा-यांस राहता भुई पुरेना.”५ अशा प्रकारच्या विचाराच्या तंद्रीत काळा प्रदेश संपून गाडी पेनरिथ् स्टेशनवर येऊन पोहोचली. माणसाने दूषित केलेला प्रांत ओलांडून निसर्गाच्या अकृत्रिम प्रदेशामध्ये त्यांनी प्रवेश केला. पेनरिथपासून केसिकपर्यंत सरोवर प्रांतात जाण्यासाठी अठरा मैलांचा फाटा असलेल्या रेल्वेने तिघेजण केसिकला संध्याकाळी सहा वाजता पोहोचले. केसिक येथे पोहोचल्यावर, आता केवळ निसर्गाच्याच सान्निध्यात आल्यानंतर, विठ्ठल रामजी शिंदे यांची वृत्ती उल्हासित झाली. त्यांनी म्हटले, “केसिक येथे पोहोचल्याबरोबर सुधारणेची शेवटची खूण जी आगगाडी तिलाही निरोप दिला. माहेरी आल्यावर सासरच्या गड्यास निरोप देताना कितीसे वाईट वाटते हे प्रत्येक सासुरवाशिणीस माहीत आहेच.”६ शिंदे यांचा निसर्ग व यांत्रिक सुधारणेचे वातावरण यांकडे बघण्याचा कोणता दृष्टिकोण होता, हे त्यांनी दिलेल्या उपमेवरून उत्तम रीतीने प्रत्ययाला येते.

प्रो. कार्पेंटर आणि फर्ग्युसन त्यांना घरी नेण्यासाठी आले होते. ऑक्सफर्ड विद्यालयात नेहमी विद्याव्यासंगात पाहिलेल्या प्रोफेसरसाहेबांची मूर्ती येथे त्यांना निराळी दिसली. अंगात पहाडी सडा पोशाख, हातात रानटी काठी, खांद्यावरून आडवी जानव्यासारखी सोडलेली कातड्याच्या वादीस अडकवलेली लहानशी दुर्बिणीची थैली, गालावर हासे, तोंडात माहितीचा पुरवठा, भाषणात विनोद असे त्यांच्या गुरूचे चालतेबोलते अपूर्व चित्र दिसले. त्यांनी सामान बसमधून पाठवून बोटीने डरवेंट वॉटर सरोवरावरून व डरवेंट नदीवरून पाळीपाळीने दोघे-दोघेजण बोट वल्हवीत निघाले. बोटीत वजन फार झाल्यास आधी शिंद्यांना नदीत ढकलू अशी प्रो. कार्पेंटरांनी त्यांची थट्टा केली. अत्यंत धडधडीच्या प्रदेशातून अत्यंत शांत स्थळी आल्यावर शिंदे यांच्या मनाला विलक्षण आनंद वाटला. सरोवराचे पाणी स्तब्ध व स्वच्छ होते. जणू एक मोठा आरसाच. दोन बाजूस उंच पर्वत. स्किडो पर्वताची उंची ३, ००० फूट. हे सरोवर बॉरोडेल नावाच्या दरीत शिरते. एका बाजूस १, ००० फूट उंचीचा कडा तुटलेला. दुसरीकडे गवताने आच्छादलेली टेकडी. अशा रम्य स्थानातून नाव वल्हवीत ते लीथस् कॉटेच्या जवळ पोहोचले. ही नाव झाडाच्या मुळाशी बांधून त्यांनी किना-यावर पाय ठेवला तोच मिसेस् कार्पेंटरबाईंनी झोपडीच्या खिडकीतून बाहेर डोकावून आणि हातरुमाल हलवून मोठ्या प्रेमाने त्यांचे स्वागत केले.

इंग्लिश सरोवर प्रांत हे एक सा-या युरोपात पाहण्यासारखे रमणीय स्थळ आणि त्यात डरवेंट वॉटर हे सुंदर सरोवर व त्याच्या काठचे बॉरोडेल खोरे हे अतिसुंदर ठिकाण आहे. शिंदे यांच्या गुरूची कुटिका बॉरोडेल खो-याच्या तोंडाशी, डरवेंट नदीच्या काठी, डोंगराच्या बगलेत, जेथून सर्व सरोवर नजरेत चांगले भरेल अशा नाक्यावर उभी होती. त्यामुळे ह्या कुटीतून उठता-बसता सदैव निसर्गाची रमणीय अशी शोभा दिसत असे. ह्या कुटीत आल्यानंतर सगळ्यांचे संध्याकाळचे जेवण झाल्यावर प्रोफेसरांच्या बरोबर सगळ्या विद्यार्थ्यांनी दरीमध्ये शतपावली केली.

दुस-या दिवशी सकाळी आठ वाजता न्याहारी आपोटल्यावर विठ्ठल रामजी शिंदे हे कॉक, बार्न्स, फर्ग्युसन व लॉकेट यांच्यासमवेत नौकेतून फिरावयास गेले. डरवेंट नदीतून डरवेंट वॉटर सरोवरात दोन मैल दूर असलेल्या हर्बट नावाच्या लहानशा बेटापर्यंत ते जाऊन आले. दोन प्रहरी प्रोफेसरांबरोबर स्किडो डोंगरावर फिरावयास गेले ते डरवेंट सरोवरातून नाव वल्हवीत रात्री आठ वाजता सगळे परतले. नऊ वाजता जेवण आटोपल्यावर विठ्ठल रामजी शिंदे कॉक यांच्याबरोबर बॉरोडेल दरीमध्ये शतपावलीस निघाले.

अलीकडच्या काळात शिंदे यांच्या मनाला आध्यात्मिक तळमळ लागून राहिली होती. थोड्याच दिवसांपूर्वी ते मँचेस्टर कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसले असताना त्यांना आध्यात्मिक अनुभवाची प्रचिती आली होती याचा आधी उल्लेख केलेला आहेच. आज ते बॉरोडेल दरीत शतपावलीस गेले असताना निसर्गाच्या सान्निध्यात, दुर्मीळ अशा आध्यात्मिक अनुभवाची त्यांना प्रतीती आली. या अनुभवाचे त्यांनी वर्णन केले आहे ते असे :

“ही शतपावली कधी तरी विसरणे शक्य आहे काय ! ह्या डोंगरातील सडकही रुंद, प्रशस्त आणि धुतल्यासारखी स्वच्छ होती. दोहो बाजूंस हजार हजार फुटांचे उंचवटे क्वचित अगदी अंगाला येऊन भिडत. क्वचित पुन्हा मागे हटत. त्यांवरून नाना जातींची झाडे पालवली होती, फुले फुलली होती, लता लोंबत होत्या, लोहाळे लगटले होते. भारतीय देखाव्यांची प्रमुख लक्षणे जी रंगीबेरंगी शोभा आणि परिमळाचा दर्प ती मात्र येथे नव्हती. तथापि सौंदर्यात उणीव भासत नव्हतीच. उजवीकडचा कडा सरळ तुटला होता. डावीकडे डरवेंट नदी खडकातून उतरत असता आपल्याशीच मंद स्वरात मंजुळ ओव्या गात होती. त्या स्वरास सृष्टि-राग म्हणतात असे माझ्या मित्राने सांगितले.

“चहूकडे इतके निवांत की पातळ पानही लवत नव्हते. शांतीचेच साम्राज्य जणू डोळ्यांनी निरखू लागलो. सुधारणेची कटके तिने येथून बारा कोस पळविली होती. सुधारणा, उद्धारणा वगैरे विचारांचा गवगवाही बंद पडला. बाह्य शांतीमुळे अंतरातील खोल शब्द अधिकाधिक स्पष्ट ऐकू येऊ लागले. साडेनऊ वाजले होते तरी असा गोड संधिप्रकाश पडला होती की, वाचता सहज यावे. समोर कॅसल क्रॅगच्या निमुळत्या मनो-यावर दशमीचा चंद्र लोंबत होता. आम्ही दोघे संगतीने चाललो होतो, तरी बोलत नव्हतो. स्वतः कौतुक करण्याचीही वेळ मागेच टळून गेली होती, मग संवादाल जागा कुठे राहिली! जसजसे पुढे जावे तसतशी दरी आकसू लागली. नकळत सृष्टीने आम्हांला शेवटी अगदी अंतःपुरात नेले! तेथे जिवलग जनांचीही स्मृती उरली नाही. निकट विषयांचेदेखील भान उडाले. लौकिकातून नाहीसेच झालो!

“असा कोण जादूवाला ह्या भारलेल्या अंतःपुरात होता, की ज्याने आमची अशी पाहता पाहता पराधीन अवस्था करून सोडली! वरती जो एकदा लय लागला तो खाली करण्याची काही शक्ती उरली नाही.

आनंद होत होता काय आम्हांला?
सांगवत नाही. काही वेळापूर्वी मात्र झाला होता खरा.
आम्ही काही पहात होतो काय?
नव्हतो! दिसत होते पण काहीतरी!
मागितले का काही?
छे हो! काय मागावयाचे?
जिवाला कसे होत होते?
मधूनमधून सुस्कारे बाहेर पडत होते!
ते का म्हणून?

“कोणी सांगावे! काहीतरी आतून बाहेर निघत होते व काही बाहेरून आत शिरत होते. छे, मी काहीतरी वेड्यासारखे वर्णन करीत आहे. एकूण हा प्रकार काय? आणि ते कोण?...

“...मला तर आता असे कळून चुकले की, वरील जो प्रकार घडला ती माझी प्रार्थना होती आणि परमेश्वरावाचून जवळ कोणी नव्हते. एकूण प्रार्थनेचे काम साधे व सोपे आहे काय? होय... देवा! अशी प्रार्थना करावयाला व ही भेट घ्यावयाला सरोवर प्रांतापर्यंत येण्याचीच जरुरी आहे काय? नाही. जेथे कसली उपाधी नाही, अशा कोठल्याही उघड्या जागेत आणि मोकळ्या हवेतही उपासना घडण्यासारखी आहे. माणसांच्या गर्दीतही देवा, तू भेटतोस. नाही कसे म्हणू? घरी आईची माया, बहिणीची प्रीती, पत्नीचा अनुराग, पुत्राचे वात्सल्य, समाजात शेजा-याची सहानुभूती, मित्रांचा स्नेह, राष्ट्रात देशभक्तांची कळकळ व संतांचा अनुग्रह आणि शेवटी जगतात महात्म्यांची निरपेक्ष अनुकंपा इत्यादी दर्शनेही तुझ्याशिवाय इतर कोणाची असू शकतील? जनात तुझा असा साक्षात्कार घडतो खरा, पण तो किती विरळा. उलटपक्षी किती कठीण अनुभव येतो! पण इथले तुझे रूप कसे अबाधित आणि अखंड आहे! हे वरचे आकाशाचे छत कधी फाटेल काय? हा खालचा सरोवराचा आरसा कधी फुटेल किंवा मळेल काय? ह्या पाखरांचे गळे कधी बसतील काय? हे पर्वताचे तट, हा वा-याचा पंखा, वृक्ष, वल्ली, दळ, पाषाण, पाणी, आकाशातील मेघ ह्यांवरूनही सर्वत्र ईश्वरा, ‘तुझी कुशलधाम नामावली’ अशी सुवाच्य रेखाटली आहे! लहान बालकेदेखील ती वाचून आनंद पावतात! मग आम्ही का असे वारंवार विन्मुख व्हावे? हे कल्याणनिधान, आम्ही स्वतःभोवती जो क्षुद्र चिंतेचा गुंता निरंतर गोवीत असतो तो तूच करुणेने उकल आणि आतासारखेच वेळोवेळी आपल्याकडे कृपाहस्ताने आम्हांला ओढून घे. आमच्या इच्छेनेच तुजकडे येण्याची आमची शक्ती नव्हे! वगैरे, वगैरे प्रार्थना देव भेटून गेल्यावर उघडपणे करीत आम्ही परत कुटिकेत आलो.”७

खरे तर सव्वा दहा वाजले होते तरी त्यांना परतावेसे वाटत नव्हते. पौर्णिमेच्या रात्री उपासनेस या ठिकाणी येऊन सारी रात्र येथेच काढावयाची व पर्वतशिखरावरून दर्शन घेऊन घरी जावयाचे असा त्या दोघांनी बेत केला.

मनोमन त्यांची प्रार्थना होती-देवा, अशी वारंवार भेट दे!

शिंदे यांनी आपल्याला येणा-या यासारख्या आध्यात्मिक अनुभूतीचे स्वरूप अंतर्मुख होऊन न्याहाळले आहे. अशा अनुभवाचे विश्लेक्षण करून त्याचे स्वरूप कोणत्याही प्रकारे गूढ, दैवी असेन नसून साधारण मानवी अनुभूतीचा तो भाग कसा असू शकतो हेही त्यांनी दाखवून दिले. लीथस् कॉटेजमधील मुक्काम आटोपून सुमारे तीन आठवड्यांनी ते स्कॉटलंड येथील सरोवर प्रांतात गेले होते. बेनलोमंड ह्या ३००० फूट उंच अशा डोंगरावर ते गेले असता असीम शांततेचा अनुभव त्यांना आला. ह्या अनुभवाचे वर्णन करताना ओघात त्यांनी समाधी या शब्दाचा उपयोग केला. शिंदे यांना आलेल्या या आध्यात्मिक स्वरूपाच्या अनुभवासंबंधी त्यांनी स्पष्टीकरण केले आहे. ते म्हणतात, “ वरील पत्रात मी माझ्या निरनिराळ्या खासगी अनुभवास ‘प्रार्थना, भेट, समाधी’ अशी मोठी नावे दिली आहेत. त्यावरून वाचकास ही आत्मप्रौढी आहे असे वाटेल आणि केलेले वर्णन अतिशयोक्तीचे आहे असा आरोप येईल. पण खरा प्रकार तसा नाही. वरील प्रसंगी कोणाही यःकश्चित मनुष्याची वरील अवस्था होणे साहजिक आहे. फार तर काय, खालील प्राण्यांतही जेथे जेथे चैतन्याचा अधिक विकास झालेला असतो तेथे तेथे वरील सौंदर्यदर्शनाचे प्रसंगी वरील समाधीचा म्हणजे चैतन्याच्या एकीकरणाचा प्रकार सहज घडतो. मेघास पाहून मोर नाचून नाचून तटस्थ होतो. वसंतगामी कोकिळा गाऊन गाऊन स्तब्ध बसते. 'सर्प भुलोनी गुंतला नादा । गारुडिये फांदा घातलासे।' हे तुंकाराम सांगतात. असा जर सर्वत्र सृष्टिनियम आहे तर त्याला माझेच मन का अपवाद असेल!”

पुढे ते असेही स्पष्ट करतात की, या प्रकारचा अनुभव सर्वसाधारणमानाने सर्वच माणसांस होण्यासारखा असून किंबहुना होत असूनही जर काहीजण तिकडे तादृश लक्ष पुरवीत नसतील अगर लक्ष पुरवूनही त्या त्या अनुभवाचा तादृश अर्थ करीत नसतील तर ती त्यांची खुशी. पण ह्या बाहेरच्या खुशीच्या भिन्नत्वामुळे आतील स्वाभाविक अनुभवास बाध येत नाही किंवा भिन्नत्वही येत नाही. या प्रकारचा आध्यात्मिक अनुभव हा ह्या जगात काही थोड्या अधिकारी धर्मपुरुषासा येणारा अनुभव आहे असे नव्हे, तर सर्वच माणसांना हा अनुभव येऊ शकतो अथवा येत असतो असे सांगून केवळ वृत्तिभिन्नत्वामुळे काहीजण त्या अनुभवाकडे लक्ष पुरवितात, काहीजण पुरवीत नाहीत. मात्र आत्म्याला
येणा-या अनुभवाचे स्वरूप हे सारखेच असते. आपल्याला विश्वामधील चैतन्याची प्रतीती येणे, आपल्यातील चैतन्य आणि विश्वामधील चैतन्य एकरूपच आहे या प्रकारची प्रचिती हे या आध्यात्मिक अनुभवाचे स्वरूप आहे अशी शिंदे यांची धारणा दिसते.८

इंग्लंडमधील व स्कॉटलंडमधील सरोवर प्रांती या प्रकारची जी प्रतीती आली व तिच्या अनुषंगाने विठ्ठल रामजी शिंदे यांनी जे चिंतन केले त्यामुळे अलीकडच्या काळात जी आध्यात्मिक तळमळ त्यांना लागून राहिली होती ती शांत झाली असे दिसते.

विठ्ठल रामजी शिंदे यांचे निसर्गप्रेम उत्कट होते. आपण बालपणात निसर्गाला हृदयदान दिले असे त्यांनी म्हटले आहे. आपल्याला असलेली निसर्गाची आवड परिपूर्ण व्हावी, निसर्गाच्या अनेकविध रम्यतेचा अनुभव मिळावा ह्या दृष्टीने सरोवर प्रांतातील वास्तव्य ही त्यांना मोठीच पर्वणी होती. दररोज एका नव्या निसर्गरम्य ठिकाणी प्रोफेसरांचे हे विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय सहल काढीत होते व निसर्गसौंदर्याचा, विमुक्त भटकण्याचा व चालण्याच्या परिश्रमाचा मनसोक्त अनुभव घेत होते. १६ जुलैला दोन घोड्यांच्या मोठ्या बसमधून घरातील सर्व मंडळी-एकूण ११ जण-बटरमिअर ह्या सरोवराची सफर करण्याकरिता निघाले; तर १७ जुलैला विठ्ठल रामजी शिंदे नौकेमधून डरवेंट वॉटरवरून ४ मैलाचे अंतर कापून केसिकला जाऊन आले. १८ जुलैला प्रो. कार्पेंटर, त्यांचे पाच विद्यार्थी आणि रेव्ह. लमिस असे सातजण अल्सवॉटर सरोवर पाहण्यास गेले. अल्सवॉटर हे तर विठ्ठल रामजींना डरवेंट वॉटर सरोवरापेक्षा अधिक सुंदर वाटले. सुमारे दोन हजार फूट चढल्यावर अर्ध्या मैलाची घाटशीळ लागली. दुस-या बाजूने ते थर्लमियर सरोवराकडे उतरले. २३ जुलैला ग्रासमिअर सरोवराच्या काठी असलेल्या ग्रासमिअर खेड्यामध्ये ते वर्डस्वर्थची समाधी पाहण्यासाठी गेले. स्कॉफेल हा इंग्लंडमधील ३२१० फूट उंचीचा सर्वात उंच डोंगर. २४ जुलैला ते इतर तीन मित्रांसह हा डोंगर चढून गेले. तेथे त्यांनी डरवेंट नदीचा उमग पाहिला. सरोवर प्रांतातील अशी एकाहून एक रम्य स्थळे बघण्याचा उपक्रम त्यांनी उत्साहाने चालविला होता.

प्रोफेसरांच्या बि-हाडी बहुधा दररोज सकाळी ११ वाजता कौटुंबिक उपासना होत असे. २० जुलैची कौटुंबिक उपासना विठ्ठल रामजी शिंदे यांना फारच भावली. प्रार्थनेनंतर प्रो. कार्पेंटर यांनी हरफर्ड ब्रुक याचे एक व्याख्यान वाचले व त्यानंतर मॅथ्यू अर्नोल्डची कविता वाचली.

ही कविता वाचताना त्यांचे डोळे आसवांनी भरले होते. प्रोफेसरांची वेगवेगळी रूपे विठ्ठल रामजींना प्रतीत होत होती. भावत होती. प्रोफेसरांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या मनावर फार अनुकूल परिणाम घडत होता.

इंग्लंडमधील एखादा धर्ममेळा कसा असतो हे पाहण्याची, त्याचा अनुभव घेण्याची संधी शिंदे यांना प्राप्त झाली. २० जुलैच्या रविवारपासूनच केसिक येथे सुरू
होणा-या आठवड्याच्या कन्व्हेन्शनला (धर्ममेळ्याला) शिंदे संध्याकाळी गेले होते. बॉरोडेलपासून सुमारे चौदा मैल अंतरावर केसिक हे रमणीय स्थान आहे. १८७५ मध्ये रेव्ह. कॅनन बॅटर्सबाय ह्यांनी येथे प्रथमतः हा मेळा भरविला. पहिली दोन वर्षे हा मेळा एस्किन स्ट्रिटवर भाड्याच्या तंबूमध्ये भरत असे. त्यात सुमारे ६०० माणसे सामावली जात. सध्या केसिक कन्व्हेशनच्या कौन्सिलच्या मालकीच्या तंबूत मेळा भरत असून दरवर्षी सुमारे हजारभर लोक उपस्थित राहतात. १९०२ मधील मेळा हा अठ्ठाविसावा वार्षिक मेळा होता. हा मेळा संघटित करणारी मंडळी जुन्या ख्रिस्ती मताची असली तरी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पंथाभिमान नाही असे शिंदे यांना जाणवले. जॉन मॅकलीनचे परिणामकारक भाषण झाले. बहुजन समाजाचे लक्ष ख्रिस्ती धर्माकडे लागावे ह्या हेतूने हा मेळा भरविला होता.९ (अद्यापही केसिक येथे हा मेळा दरवर्षी दोन आठवडे भरविला जातो. एवढेच नव्हे तर देशातील अन्य दहा-बारा ठिकाणी ‘कौन्सिल कन्व्हेशन’ या नावानेच धर्ममेळे भरविले जातात. केसिक येथील धर्ममेळ्यात झालेल्या भाषणांचे पुस्तकही केसिक धर्मसंघाच्या वतीने प्रकाशित केले जाते.१०)

२२ जुलैला मंगळवारी पाऊस सारखा लागलेला होता. सहलीला जाणे शक्य नव्हते. आपल्या पाहुण्या विद्यार्थ्यींनी आजचा पूर्ण दिवस केसिक कन्व्हेन्शनला घालवावा असे प्रोफेसर कार्पेंटर यांनी सुचविले. विठ्ठल रामजी सकाळी ११ वाजल्यापासून रात्री साडेआठपर्यंत तीन्ही बैठकांना हजर होते. लंडनच्या रेव्ह. एफ्. आर. मेयर यांनी चांगला उपदेश केला. सुमारे दोन हजार लोक मावतली असे दोन तंबू उभारलेले होते. संगीत, भक्तिपर, उदात्त आणि करुण रसाने भरले होते. उपासना संपल्यावर रेव्ह. मेयर यांनी अशी प्रार्थना केली की, सर्व मंडप तटस्थ होता व ईशपायी लीन झाला. “तुम्हाला पश्चात्ताप वाटतो काय? तुमची पापे आठवतात काय? दुसर-याचे तुम्ही ऋणी आहात काय? अद्यापि ते ऋण देऊ नये असे वाटते काय? हल्ली कोणाचा मत्सर वाटतो काय? देवाच्या क्षमेचा कधी अनुभव आला आहे काय? क्षमेस पात्र आहात असे वाटते काय? असे व दुसरे अंतःकरण भेदणारे प्रश्न उपासक मंद व खोल स्वराने थांबून थाबून विचारीत असे. रेव्हा. मेयर ह्यांच्या प्रार्थनेचा बहुजन समजावर विलक्षण परिणाम झाल्याचे दिसत होते. प्रार्थना संपल्यावर तर एख तरुण मुलगी स्फुंदून स्फुंदून रडत होती व एक वृद्ध गृहस्थ तिचे सांत्वन करत होता असे दृश्य विठ्ठल रामजी शिंदे यांना दिसले.

केसिकमधील हा धर्ममेळा बघितल्यावर आपल्याकडील क्षेत्राच्या ठिकाणी भरणा-या यात्रांची तुलना त्यांच्या मनात आली. आपल्याकडे काशी, रामेश्वर इत्यादी ठिकाणच्या कर्मठ यात्रा उच्च वर्गाच्या असतात आणि जोतीबा, जेजुरी, सौंदत्ती येथील यात्रा बहुजनवर्गाच्या असतात. आपल्याकडील यात्रेचा दुसरा प्रकार म्हणजे पंढरपूर, आळंदी येथे भरणा-या भक्तीच्या यात्रा. केसिक कन्व्हेन्शनची गणना त्यांना भक्तिमार्गी यात्रेमध्ये करावीशी वाटते. कोणत्याही पंथाचा अभिनिवेश न बाळगता बहुजनांत भक्तीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने, अंतःकरणशुद्धीच्या दृष्टीने त्यांना हा मेळा महत्त्वाचा वाटला.११

प्रोफेसरांचे पाहुणे विद्यार्थी येथील मुक्कामात जसे निसर्गाच्या सान्निध्यात रमत होते; कौटुंबिक उपासनेचा अथवा प्रसंगोपात सार्वजनिक उपासनेचा पवित्र अनुभव घेत होते; त्याचप्रमाणे कौटुंबिक वातावरणात, हास्यविनोदात रंगून जात होते. मनःपूर्वक चर्चा करीत होते.

सुटीतील करमणुकीचा प्रकार म्हणून विद्यार्थ्यांनी पॉझ मॅगेझिन नावेच एक तात्पुरते हस्तलिखित अनियतकालिक पत्र काढले. त्यातील सगळा मजकूर विनोदाने भरलेला असे. आपल्या आदरणीय वाटणा-या प्रोफेसरांनाही विनोदविषय बनविण्याचे स्वातंत्र्य त्यातील लिखाणात निःसंकोचपणे घेतले जाई. प्रो. कार्पेंटर यांना चिप, प्रो. रेव्ह. ऍप्टन यांना अपी आणि प्रिन्सिपॉल ड्रमंड यांना डमी अशी विनोदी टोपणनावे देऊन त्यांच्या नावापुढे समर्पक विनोदात्म अशा कविता लिहिण्याचे स्वातंत्र्य घेतले जाई. धर्मशिक्षण घेणारे हे विद्यार्थी उच्छृंखलपणा करण्यात मुळीच कमी नव्हते. प्रिन्सिपॉल ड्रमंड यांना पाच सुंदर तरुण मुली होत्या. त्यांच्या नावापुढे खालील वचन होते.
Happy is the man whose quiver is full
ह्या मुली म्हणजे भात्यातील पाच मदनबाणच होत असा व्यंग्यार्थ त्यातून सुचविला होता.

प्रो. कार्पेंटर यांच्या नावापुढे खालील कविता होती.
Each day he does a mountain climb
A ten miles row, three meals, a witticism.
And fills the intervening time
With Pali Texts and Hebrew Criticism.

शिंदे यांच्यावरील कविता अशी :
A meek and modest Indian
Who will, unless he faints,
Some day duly be worshipped
Among his country saints.
He is no vulgur fraction
As single student be
But he and Mrs. Shinde
Form one integrity.

१७ जुलैचा अंक प्रो. कार्पेंटर यांनीच वाचला. एका लेखाच्या शेवटी पाच जणांची व्यंगचित्रे रेखाटली होती व नाव दिले होते, ‘कॉलेज ब्यूटी.’ त्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचे फेटा बांधून शेमला सोडलेले, नाक आहे त्याहून जास्त अपरे दाखविलेले, एका बाजूने रेखाटलेले व्यंगचित्र आहे.१२

रात्रीच्या जेवणानंतर कधी कधी दिवाणखान्यात एखाद्या विषयावर चांगले संभाषण होई. १९ जुलै रात्री जेन ऑस्टिनच्या कादंबरीविषयी बोलणे झाले. विठ्ठल रामजींनी प्रो. कार्पेंटर यांच्याशी बरीच चर्चा केली. प्रो. कार्पेंटर यांना ऑस्टिनबाईंच्या कादंब-या विशेष महत्त्वाच्या वाटल्या नाहीत. त्यांचे म्हणणे असे होते, की ऑस्टिनच्या नायिका व इतर मुली ह्यांची मुख्य चिंता म्हणजे लग्नाची. ह्यावरून ऑस्टिनबाईंची आयुष्यभराची थोर कल्पना होती असे दिसत नाही. चित्र बरोबर हुबेहुब वठविले म्हणून मोलाचे ठरत नाही. अंतरात्म्यास रमविणारे व शिकविणारे असे काही असल्याशिवाय चित्राला किंत येत नाही अशी प्रो. कार्पेंटर यांनी भूमिका मांडली. विठ्ठल रामजी शिंदे यांचे म्हणणे असे पडले की, कादंबरीकाराच्या वास्तविक व काल्पनिक (रियालिस्टिक व आयडियालिस्टिक) अशा ज्या दोन जाती आहेत त्यांपैकी वास्तविक कादंबरीकारांमध्ये जेन ऑस्टिनचा नंबर अगदी पहिला लागेल.

२० जुलैच्या रात्री एक विनोदात्म आणि हृद्य संभाषणात्मक प्रसंग घडला. केसिक कन्व्हेन्शनवरून परत येत असताना विठ्ठल रामजी शिंदे यांना अंधारात व आडवळणास कित्येक प्रेमी जोडपी प्रियाराधनात गर्क झालेली दिसली. येथे वारंवार दिसणारे मानवी संसारातील हे चित्र अत्यंत गोड व पवित्र वाटे. गरीब लोकांस दिवाणखाने व बागा नसल्याने सार्वजनिक उपवनात व रस्त्याने आराधना करावी लागते. त्याबद्दल त्यांना फारशी शरम वाटत नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. घरी परत आल्यावर ह्यासंबंधी प्रोफेसर व पाहुणे स्त्रीपुरुष यांच्याबरोबर मौजेचे भाषण झाले. प्रोफेसर व इतर सभ्य गृहस्थ अशीच आराधना करतात काय असा शिंद्यांच्या प्रश्न ऐकून मंडळींना भारी कौतुक वाटले. कार्पेंटरबाई निजावयास जाताना त्यांच्या कानाशी जाऊन म्हणाल्या, “मला एक गुप्त गोष्ट सांगावयाची आहे ती ही की, प्रोफेसरही अशीच आराधना करतात बरे.”

अशा मनमोकळ्या कौटुंबिक वातावरणात येथील मुक्कामात सगळ्यांचा काळ मोठ्या आनंदात चालला होता. ह्या पंधरा दिवसातील “बहुतेक दिवस सकाळी आठ वाजता न्याहरी करून संध्याकाळी आठ वाजता जेवणाच्या वेळेपर्यंत खांद्यावर फराळाच्या पडशा टाकून जंगलातून हिंडत, पाण्यावरून तरंगत आणि पर्वतावरून सरपटत काळ घालविला.” आणि बि-हाडी असल्यावर मनमोकळ्या हास्यविनोदात आणि कधी कधी गंभीर चर्चेत, अशा दैनंदिन कार्यक्रमात पंधरा दिवस झपाट्याने सरले. विठ्ठल रामजींनी पुढचा कार्यक्रम म्हणून स्कॉटलंडमधील शहरे आणि तेथील सरोवर प्रांत बघावयाचे ठरविले होते. २८ जुलै १९०२ रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी आपल्या प्रेमळ, अगत्यशील गुरूंचा, गुरुपत्नींचा तसेच आनंदी वर्गबंधूंचा निरोप घेतला आणि स्कॉच सरोवरे पाहण्याचा उद्देश मनात ठेवून एडिंबरोला जाण्यासाठी निघाले.

संदर्भ
१.    शिंदे यांची १९०१-०२ ची छोटी हस्तलिखित रोजनिशी.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. १०३-१०४.
३.    शिंदे यांची १९०१-०२ ची छोटी हस्तलिखित रोजनिशी.
४.    विठ्ठल रामजी शिंदे, ‘जनांतून वनात व परत’ सुबोधपत्रिका, १ फेब्रुवारी १९०३, समाविष्ट, विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने, उपदेश, पृ. ५८-५९.
५.    तत्रैव, पृ. ५९.
६.    तत्रैव, पृ. ६०.
७.    तत्रैव, पृ. ६२-६३.
८.    तत्रैव, पृ. ६८-६९.
९.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ११४.
१०.    डेव्हिड पोर्टर (संपा.) दि गॉस्पेल, दि स्पिरिट, दि चर्च, केसिक कन्व्हेन्शन कैन्सिल, ब्रॉम्ले, केंट, इंग्लंड, १९७८, पृ. ७.
११.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ११५.
१२.    पॉझ मॅगेझिन, हस्तलिखित, मँचेस्टर कॉलेज ग्रंथालय, ऑक्सफर्ड.

पुण्यास स्थलांतर

आपल्या आत्मनिवेदनपर ग्रंथामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या जन्मानंतर त्यांच्या गृहज्योतिषांनी वर्तविलेली कुंडली जशीच्या तशी दिली आहे. ह्या कुंडलीबद्दल लिहिताना त्यांनी म्हटले आहे. “वरील अशुद्ध लेखनावरून पुरोहितबुवा फारसे मोठे भाषापंडित होते असे दिसत नाही. त्यांचे ज्योतिषशास्त्रपांडित्य किती होते हे सांगण्याचा मला अधिकार नाही.” फलश्रुती ताडून पाहता कुंडलीत सांगितलेले योग अनुभवाला आले नाहीत असे त्यांनी नमूद केले. मात्र स्वतःच्या आयुष्याचे सिंहावलोकन करताना त्यांना आपल्या आयुष्यासंबंधी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जाणवली. ती म्हणजे त्यांच्या आयुष्यात दर दहा वर्षांनी एक ठळक स्थित्यंतर घडून येत राहिले. त्यांचा जन्म १८७३ सालचा. त्यांच्या आयुष्यात पहिले परिवर्तन घडून आले, ते म्हणजे १८८२-८३च्या सुमारास त्यांचा विवाह झाला. वडिलांनी विवाहप्रीत्यर्थ वडिलोपार्जित घर गहाण ठेवून कर्ज काढले. त्या पायी सर्व मिळकत जाऊन भयंकर दारिद्र्य आले. वडील बंधूचा मृत्यू झाला आणि त्यांचे स्वतःचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. दुसरे परिवर्तन १८९२-९३ साली घडून आले. मॅट्रिक्युलेशनची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना जमखंडी येथील शाळेत शिक्षकाची जी पहिली नोकरी मिळाली होती ती सुटली व कॉलेजशिक्षणासाठी ते पुण्यास गेले. तिसरे परिवर्तन १९०३ साली घडले. विलायतेहून धर्मशिक्षण संपवून ते मुंबईस परत आले. प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून सार्वजनिक कामाला प्रारंभ केला. चौथे परिवर्त १९१२-१४च्या सुमारास घडून आले. प्रचारक ह्या नात्याने प्रार्थनासमाजाशी असलेला त्यांचा संबंध सुटला. भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या कार्याचे अर्धे तप संपले. मुंबई शहराची वस्ती सोडून पुणे शाखेची व्यवस्था त्यांनी प्रत्यक्ष ताब्यात घेतली व त्यासाठी पुण्यास येऊन राहिले.
शिंदे यांनी नमूद केलेल्या त्यांच्या दशवार्षिक स्थित्यंतरात एक महत्त्वाची गोष्ट मात्र बसत नाही. त्यांच्या जीवनातील कदाचित सर्वात महत्त्वाचे सामाजिक कार्य म्हणजे १९०६ साली त्यांनी केलेली भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळाची स्थापना. अर्थात शिंदे यांच्या भूमिकेनुसार हे कार्य धर्मकार्याच्या अंतर्गतच मोडणारे आहे.

१९१० नंतर मुंबईमधील वास्तव्याची दोन वर्षे शिंदे यांच्या दृष्टीने मोठी संकटाची व क्लेशदायक अशी गेली. त्यांना ज्यांच्याबद्दल अतीव भक्ती वाटत होती; ज्यांचा आधार वाटत होता असे त्यांचे आईबाप ह्या काळात वारले. मुंबई प्रार्थनासमाजाचा प्रचारक या नात्याने असलेला त्यांचा संबंध संपुष्टात आला ही तर दुःखाची बाब होतीच; शिवाय त्यामुळे त्यांच्या योगक्षेमाचे तुटपुंजे का होईना जे साधन होते तेही नाहीसे झाले. घरातील मंडळी रोगग्रस्त झाली. ह्या अडचणींमुळे अण्णासाहेब शिंदे फार रंजीस आले. परंतु मिशनच्या कामासाठी आणखी दोन वर्षे त्यांनी मुंबईत मोठ्या निर्धाराने काढली. मिशनची व्याप्ती झपाट्याने वाढत होती. केवळ मुंबईतच नव्हे, तर गुजरात, कर्नाटक इथेही मिशनच्या शाखा निघालेल्या होत्या. मुंबईप्रमाणेच पुण्यालाही मिशनचे काम अत्यंत जोरदारपणे चालले होते. मुंबईत मिशनच्या कामाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने शिंदे यांनी विचार सुरू केला. परंतु मुंबईसारख्या दाट शहरात मिशनला पुरेशी जागा मिळेल अशी लक्षणे त्यांना दिसेनात. सरकारलाच कचे-यांसाठी जागा कमी पडू लागली होती. मुंबई शहरातील वस्ती लंब रेषेत पसरू लागली. अशा वाढत्या वस्तीमध्ये मुंबईला मिशनसाठी अधिक जागा मिळणे त्यांना दुरापास्त वाटू लागले. त्या शिवाय मुंबईचा खर्चीकपणाही मिशनच्या विस्ताराच्या दृष्टीने परवड्यासारखा नाही हे त्यांना जाणवू लागले. तेव्हा मिशनचे ठाणे सर्व प्रकारच्या चळवळीचे केंद्र असलेल्या पुणे शहरामध्ये हलवावे असा विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागला आणि पुण्यास स्थलांतर करणे भाग पडावे अशी परिस्थितीही त्यांच्याबाबतीत निर्माण झाली.

एकतर, मुंबई शाखेचे काम त्यांचे सहकारी श्री. वामनराव सोहोनी हे उत्तम त-हेने पार पाडीत होते, म्हणून मुंबईच्या कामाची कोणत्याही प्रकारे काळजी करण्याची त्यांना गरज राहिली नव्हती. वामनराव सोहोनी हे विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक होते. प्रार्थनासमाजाच्या कार्यात त्यांना गोडी होती. १९०६ सालच्या होळीच्या दिवशी अण्णासाहेब शिंदे हे वामनराव सोहोनी यांना आपल्याबरोबर परळ भागातील अस्पृश्यांची स्थिती बघण्यासाठी घेऊन गेले होते. तेथे सोहोनी यांनी अस्पृश्यवर्गाची जी दुर्दशा पाहिली त्याचा खोल ठसा त्यांच्या मनावर उमटला व त्यांच्या अंतःकरणात ह्या दीन वर्गाबद्दल करुणा उत्पन्न झाली. त्याच साली ऑक्टोबरमध्ये अण्णासाहेब शिंदे यांनी भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची मुहूर्तमेढ रोविली. त्या वेळी वामनराव सोहनी हे विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक असेल तरी, त्यांनीच म्हटल्याप्रमाणे त्यांचे अंतःकरण निराश्रित साहाय्यकारी मंडळीत होते. वामनराव सोहोनींच्या मनाचा हा कल ध्यानात घेऊन, तसेच त्यांची कार्यकुशलता लक्षात घेऊन त्यांनी भा. नि. सा. मंडळींमध्ये आजीव सेवक म्हणून सामील व्हावे अशी शिंदे यांनी आपली इच्छा त्यांच्याजवळ प्रकट केली. सय्यद अब्दुल कादर, भगिनी जनाबाई ही मंडळी आपआपल्या नोक-या सोडून मिशनची आजीव सेवक आधीच झाली होती. सोहोनींनीही त्यांच्याप्रमाणे निर्णय घेतला व मुंबई शाखेचे कुलगुरू म्हणून मिशनच्या आश्रमामध्ये कायमचे येऊन राहिले. मुंबई शाखेचे केंद्र हे परळ येथील पोयबावडीच्या नाक्यासमोर घडियाली हॉल या नावाच्या एका प्रशस्त जुन्या बंगल्यात करण्यात आले होते. हा बंगला दुमजली व भोवताली उपगृहे असलेला होता. इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या वतीने हा बंगला सवलतीच्या भाड्याने मिळाला होता. मुंबई शाखेची अशी चांगली व्यवस्था लागलेली असल्यामुळे व वामनराव सोहोनींच्या जबाबदार हातांत तेथील कारभार असल्यामुळे अण्णासाहेब अन्यत्र जाण्याचा विचार करू शकत होते.

पुणे येथील मिशनची शाखा १९०८ साली स्थापन झाली होती व या शाखेचा कारभार सन्मानीय सेक्रेटरी म्हणून श्री. ए. के. मुदलियार हे अत्यंत जबाबदारीने पाहत होते. ह्या शाखेच्या कामाला मार्गदर्शन करण्यासाठी व देखरेख ठेवण्यासाठी प्रतिष्ठित मंडळींची स्थानिक कमिटीही होती. शेतकी कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. हॅरॉल्ड एच. मॅन हे तिचे अध्यक्ष, प्रिन्सिपॉल र. पु. परांजपे हे उपाध्यक्ष तर ऑ. बी. एस्. कामत, एस्. वाय. जव्हेरी आणि मा. ह. घोरपडे हे सभासद होते. श्री. मुदलियार यांच्यावर ह्या सुमाराला मोठीच कौटुंबिक आपत्ती कोसळली. त्यांच्या पत्नी सौ. सीताबाई एकाएकी निवर्तल्या. त्यांची मुदलियार यांना कामामध्ये मोठी मदत होत असे. ह्या कौटुंबिक आपत्तीमुळे मुदलियार यांना मिशनच्या कामाचा राजीनामा देणे भाग पडले. ऑगस्ट १९१२ मध्ये पुणे शाखेने ठराव केला की जनरल सेक्रेटरी यांनी म्हणजे शिंदे यांनी पुढील तजवीज करावी व ती होईपर्यंत स्वतः पुण्यास राहून ह्या कामाची जबाबदारी घ्यावी. पुणे शाखेने केलेल्या विनंतीनुसार पुणे शाखेचे सेक्रेटरी म्हणून शिंदे यांनी ही जबाबदारी पत्करली व मिशनचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही आपली जबाबदारी ते तेथूनच पार पाडू लागले.

ह्या सुमारासच मिशनच्या कामाची फेरव्यवस्था करणे भाग पडले. शेठ दोमोदरदास सुखडवाला यांची मदत बंद पडल्यामुळे मुंबईचे निराश्रित सेवसदन बंद ठेवावे लागले व तेथे काम करणा-या भगिनी जनाबाई यांची दुस-या कामावर रवानगी करावी लागली. व-हाडची आणि मध्यप्रांताची परिस्थिती अजमावून पाहण्यासाठी जनाबाई तिकडे गेल्या आणि यवतमाळ येथे लहानसे वसतिगृह काढून ते चालवू लागल्या. याचवेळी हुबळी येथे कर्नाटक शाखा उघडण्यात येऊन तिची जबाबदारी सय्यद अब्दुल कादर यांच्यावर सोपविण्यात आली. सय्यद अब्दुल कारद हे मूळ जमखंडीचे. विठ्ठल रामजी शिंदे हे वयाने लहान असतानाही सय्यद अब्दुल कादर यांच्या वडिलांचा त्यांच्याशी स्नेह जुळला होता. या प्रकारचा कौटुंबिक संबंध असल्यामुळे व विठ्ठल रामजींबद्दल सय्यदांच्या मनात आदराची भावना असल्यामुळे पोर्ट ट्रस्टमधील आपली नोकरी सोडून ते मिशनचे आजीव कार्यवाह झाले होते. अण्णासाहेबांच्या प्रभावामुळे त्यांनी ब्राह्मसमाजाची दीक्षा घेतली होती व प्रथम पत्नी निवर्तल्यानंतर कल्याणीबाई या सारस्वत तरुणीशी त्यांनी १९०९ साली विवाह केला होता. सय्यद हे जमखंडी येथील असल्यामुळे व कानडी ही मातृभाषेप्रमाणे त्यांना अवगत असल्यामुळे हुबळी येथील कर्नाटक शाखेचे काम ते उत्तम प्रकारे करून शकले. कल्याणीबाईंची ह्या कामी त्यांना मदत मिळत होती. मिशनमधील आपल्या सहका-यांची अशा प्रकारे नवी व्यवस्था लावल्यानंतर १९१३ सालच्या आरंभी पुणे शाखेच्या पुनर्घटनेसाठी शिंदे यांनी पुण्यास यावयाचे ठरविले. राहण्याची स्वतंत्र व्यवस्था होईपर्यंत काही काळ ते आपले स्नेही प्रा. केशवराव कानिटकर यांच्या फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरातील बंगल्यामध्ये सहकुटुंब येऊन राहिले.१

संदर्भ
१.    प्रा. केशवराव कानिटकर यांचे ज्येष्ठ श्री. नरहर यांची पुण्यात १६ मे १९७४ रोजी घेतलेली मुलाखत.

  1. परिषदा, संमेलने यांमधील सहभाग
  2. नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन
  3. तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न
  4. खटल्याचा दैवदुर्विलास
  • 123
  • 124
  • 125
  • 126
  • 127
  • 128
  • 129
  • 130
  • 131
  • 132
Page 128 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी