1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मनुष्यजन्माची सार्थकता

अब तुम कब सिमरोगे राम । जिवडा दो दिनका मेजवान ।।धृ।।
गरभपनोमें हाथ जुडाया । निकल हुवा बेमान ।।१।।
बालपनोंमें खेल गमाया । तारुनपनमें काम ।।२।।
हात पाय जब कापन लागे । निकल गया अवसान ।।३।।
झूठी काया झूठी माया । आखर मौत निदान ।।४।।
कहत कबीर सुनभाई साधो । यहि घोडा मैदान ।।५।।

मनुष्यदेहामध्ये जी ह्या प्राणाची योजना आहे, ती फार थोडा वेळ टिकणारी आहे. म्हणजे जीव हा दोन दिवसांचा मेजवान म्हणजे पाहुणा आहे. पण ह्या थोड्याच अवकाशात जीवदशेच्या द्वारा चैतन्यरूपी आत्म्याचा उद्धार करावयाचा असतो. म्हणून ज्याला जाणल्याशिवाय मनाचे खरोखर समाधान होणार नाही त्या ईश्वरास होता होईल तो ओळखण्याविषयी कबीरजी आग्रह करीत आहेत. जड स्थितीत असलेली सर्व सृष्टी ईश्वराच्या कायद्याचे पालन बिनतक्रार करीत आहे. चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि तारांगण, वायू आणि वनस्पती ही सर्व ईश्वरास नमून आहेत. गर्भावस्थेत असताना मनुष्यप्राणीही इतर जड सृष्टीप्रमाणे जणू काय ईश्वराची आज्ञा ऐकण्यास तयारच असा हात जोडून असतो, पण तो बाहेर पडून स्वतंत्र झाल्याबरोबर बेईमान होतो. अखिल जडसृष्टी ईश्वराला न जाणताच जे त्याचे नियम पाळीत असते, तेच नियम समजून उमजून पाळणे ही मनुष्यपणाची थोरवी आहे. आणि एवढ्याचसाठी त्याला जीव हा पाहुणा दोन दिवस भेटावयास आलेला असतो. परंतु विपरीत प्रकार असा होतो की आयुष्याचे हे दोन दिवस लहानसहान गोष्टीत निघून जातात. बाळपण खेळात जाते आणि तरुणपण ख्यालीखुशालीत जाते, काम म्हणजे सर्वथैव तिरस्करणीय आहे असे नाही. रामदासांनी म्हटल्यारमाणे “बरे खावे बरे जेवावे । बरे ल्यावे बरे नेसावे । मनासारखे असावे । सकळ काही । ” ही बरेपणाची इच्छा (Decency) अथवा बरे असण्याची आणि दिसण्याची प्रवृत्ती काही (फुट नोट – ता. ११-२-१९११ रोजी केलेल्या कीर्तनाचा सारांश.) वावगी नाही. लहान मुलाला जसा खेळ, तसा तरुण माणसांच्या ह्या कामना साहजिकच आहेत, पण एवढ्यातच त्याच्या सर्व शक्तीचा –हास व्हावा अशी योजना दिसत नाही. खेळ आणि कामना ह्यांच्या द्वारा स्वतःची ओळख करून घेऊन तिच्यायोगे सर्व विश्वाचा जो प्राण त्याची ओळख करून घ्यावयाचा मनुष्याचा थोर अधिकार आहे. आणि तो प्राप्त झाल्याशिवाय मनुष्याला स्वतःचीसुद्धा पूर्ण ओळख पटत नाही. तोपर्यंत त्याच्यामध्ये केवळ अंध अहंकार कसा असतो हे खालील पद्यात बुलाशहा ह्याने दाखविले आहे :

माटी खुद्दी करें दी यार ।।धृ।।
माटी जोडा माटी घोडा । माटीदा असवार ।।१।।
माटि माटिनु मारन लागी । माटी दे हतिहार ।।२।।
जिस माटीपर बहुती माटी । तिस माटी अहंकार ।।३।।
माटी बागबगीचा माटी । माटी दी गुलजार ।।४।।
माटि माटिनु देखन आई । माटी दी बहार ।।५।।
हंस खेल फिर माटि होई । पौंदी पाव पसार ।।६।।
बुलाशहा बुझारत बुझा । लाह शिरो भवसार ।।७।।

गाडी, घोडा, बागबगीचा आणि इतर सर्व संपत्ती हे मातीचेच निरनिराळे प्रकार, त्यांचे सेवन करण्यासाठी जे आपल्यामध्ये इंद्रियगण आहेत तेही पण मातीचेच प्रकार, म्हणून मातीच्या ढिगावर मातीचा ढीग रचण्यामध्ये ज्याप्रमाणे काही विशेष होत नाही, त्याचप्रमाणे केवळ इंद्रियसुखासाठी विषयांची रचना करण्यामध्येही अभिमान बाळगण्यासारखे काहीच नाही. केवळ डोईवर भार मात्र आहे. इतकेच नव्हे तर पुष्कळ वेळां अशाही प्रकारचा अभिमान उत्पन्न होतो की आपणांस देव मिळाला, नुसत्या खाण्यापिण्यामध्येच गर्क होऊन आम्ही आपणांस फसवीत नाही तर केव्हा केव्हा एकादी धार्मिक पोकळ समजूत घेऊन आपण स्वतःस धन्य मानीत असतो, आणि केव्हा केव्हा परोपकाराचे कृत्य करीत असताही अशीच फसवणूक होते. हा अनुभव बाबू रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या खालील पदात सुंदर रीतीने निवेदित झालेला आहे :

गर्व माझा हरुनि प्रभु आणिली बहु लाज ।
कवण मुखे संमुख तव राहुं हा मी आज ।।धृ।।
गवसलासि तू म्हणूनी मज मी फसवी मनिंच्या मनी ।
फजित होत संसारि या करिता तुझे काज ।।१।।
कळेनाचि आमुच्या घरी वससि कुठे प्रभु तू तरी ।
कधि न तुझ्या चरणी मला लाविले राजराज ।।२।।
त्यजुनि तिला दिनरजनी माझेचि ठायी गेलो रमुनी ।
तव न वैभवी देखिले तुला विफल चक्षु काज ।।३।।

काव्याचे वाहिक आणि आंतरिक असे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात बाहेरील सर्व पदार्थांचे हुबेहूब वर्णन असते, परंतु त्यात कवीचे हृद्गत दिसून येत नाही. दुस-या प्रकारात कवीने आपले अंतस्थ अनुभव निवेदिलेले असतात. चित्राचाही हाच प्रकार आहे. छायाचित्रांमधून (Photographs) चित्रकाराचा मागमूसही लागत नाही. परंतु चित्रकार, प्रेम, करुणा, वैराग्य, वीर्य, इत्यादी आपल्या अनुभवाचे जेव्हा बाहेरील एकाद्या देखाव्याच्या द्वारा चित्र काढतो तेव्हा ते वरिष्ठ दर्जाचे ठरते. चित्र आणि काव्य ह्यांचे हे दोन प्रकार ज्याप्रमाणे एकाहून एक श्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे जीवित्वाचे प्रकार आहेत. केवळ बाहेरचे भोग भोगून अथवा केवळ आपल्याच कल्पनेत दंग होऊन आपण राहिलो तर ‘तव न वैभवी देखिले तुला विफल चक्षुकाज’ असा पश्चात्ताप होणार आहे. पण जर आम्ही प्रत्येक वेळी आमच्या शुद्ध आणि पवित्र विचारामध्ये आणि आचारामध्ये ईश्वरी इच्छेचा विलास पाहू लागलो आणि संसारातील निरनिराळ्या प्रसंगी त्याचा समागम अनुभवू लागलो, तर आमचे जीवित
दुस-या प्रकारच्या चित्राप्रमाणे आणि काव्याप्रमाणे गंभीर आणि पूर्ण होईल. रविंद्रनाथांचे वरील पद हे दुस-या कोटीतले आहे. आणि ते त्यांच्या आध्यात्मिक जीविताचे द्योतक आहे.

असो. ह्याप्रमाणे ईश्वराचे वैभव पाहून ते ईश्वराचे आहे अशी मनाची भावना न होता आपण तिच्यात दंग झालेले असतो आणि डोळे असून आंधळे होतो. अशा रीतीने बाळपण आणि तरुणपण निघून गेल्यावर म्हातारपणी आपण निःसत्व होऊन पडतो. ईश्वरभजन करणे म्हणजे केवळ तोंडाने किंबहुना मनानेही ते स्मरण करणे एवढेच असते तर ते म्हातारपणी घडले असते. पण ज्याअर्थी कबीरजींनी ‘निकल गया अवसान’ असे म्हटले आहे त्याअर्थी भक्तिमार्गाचा अवसानाशी म्हणजे शक्तीशी निकट संबंध आहे असे होते. भक्ती म्हणजे प्रेममय शक्ती होय. ती नसेल तर आपली काया आणि माया म्हणजे शरीर आणि धन ही विफल होतात आणि आपले मरण मात्र खरे होते. प्रेममय शक्तिशिवाय जिवंत रहाणे म्हणजे निष्फळ आहे. केवळ शारीरिक अस्तित्व म्हणजे जीव नव्हे.

जिन प्रेम रस चाखा नहीं, अमृत पिया तो क्या हुवा ।
जिस इश्कते सिरना दिया, जुग जुग जिया तो क्या हुवा ।।१।।
औरो नसी हत तूं करे खुद अमल करता नहीं ।
दिलका कुफर टूटा नही, हाजी हुवा तो क्या हुवा ।।२।।
जब इश्कके दरयामें, गरकाव यह होता नही ।
गंगा जमना द्वारका नहाता फिरा तो क्या हुवा ।।३।।
वली पुकारे हो पिया पिया, पियाई पुकारते जिया दिया ।
मतलब हासल न हुवा रो रो मुवा तो क्या हुवा ।।४।।

ह्याप्रमाणे प्रेमरस जीविताचे मुख्य तत्व आहे. ह्या प्रेमाने ईश्वरही बद्ध आहे, तो म्हणतो :-
सुनो सकळ नारीनर, प्रेमबारी नयनसे ।
जानो मर्म मेरा सभी भक्तशुद्ध नयनसे ।।१।।
जैसे वत्स गायपास, रहे सदा आसपास ।
वैसेही मै भक्तसंग, रहता चिर दिन लिये ।।२।।
प्रेमका भिकारी मैं, खडा हूँ तुमरे द्वार पर ।
नही मिलति प्रेम भिक्षा, मुझको तुमसे प्रिय नर ।।३।।

ह्याप्रकारे ईश्वर स्वतःस प्रेमाचा भुकेलेला भिकारी म्हणवितो आणि भक्त ईश्वराचा दास म्हणवितो.

मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा ।
तूं दिवान तूं दिवान तूं दिवान मेरा ।।१।।
एक रोटी और लंगोटी द्वार तेरे पावा ।
भक्ति भावदेह आरोग्य नाम तेरा गावां ।।२।।
तूं दिवान मेहरबान नाम तेरा वारया ।
दास कबीर शरण आयो चरणलाग तारया ।।३।।

अशा रीतीची ईश्वराशी तद्रूप होणारी प्रेममय शक्ती आपल्या जीवितामध्ये उदयास आली पाहिजे आणि तिला कालावधी मुळीच लागू नये. कबीरजींनी म्हटल्याप्रमाणे हा घोडा हे मैदान अशी आपली तत्पर स्थिती जीवितामध्ये असली पाहिजे.

मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती-४

मन मनासि होय प्रसन्न| तेव्हां वृत्ति होय निरभिमान||१||
पावोनि गुरूकृपेची गोडी| मना मन उभवी गुढी||२||
साधके संपूर्ण| मन आवरावे जाण||३||
एका जनार्दने शरण| मने होय समाधान||४||

गेल्या तीन खेपेस ईश्वरावरील श्रद्धा, ईश्वराविषयी भक्ती व ईश्वराची उपासना हे तीन परमार्थ प्रपंचात राहूनच अनुक्रमे मनुष्यमात्राविषयी आदर, प्रेम आणि मनुष्याची सेवा ही करून साधता येतात हे सांगितले. आता चौथा आणि शेवटचा जो परमार्थ (मोक्ष) तोही प्रापंचिक साधनानेच कसा साध्य करून घेता येईल, हे पाहू.

वरील अभंगात एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे आपले मन आपणाला प्रसन्न करून घेतले म्हणजे मोक्षप्राप्ती झाली असा खरा अर्थ आहे. तुकारामही म्हणतात:

मन करारे प्रसन्न|सर्व सिद्धीचे कारण||
मोक्ष अथवा बंधन| सुख समाधान इच्छा ते||
मने प्रतिमा स्थापिली| मनें मना पूजा केली||
मने इच्छा पुरविली| मन माउली सकळाची||
मन गुरू आणि शिष्य| करी आपलेंची दास्य||
प्रसन्न आपआपणांस| गति अथवा अधोगति||
साधक वाचक पंडित| श्रोते वक्ते ऐका मात|
नाही नाही आन दैवत| तुका म्हणे दुसरें||

मन प्रसन्न करा, तेच सिद्धीचे कारण. आपले मन हे प्रत्यक्ष दैवत आहे. त्याच्याशिवाय इतर देवतांस मनामध्ये थारा दिल्याने मनोदेवता प्रसन्न प्रपंच आणइ परमार्थ ही घडणार नाहीत, इत्यादी तुकारामाचे एकनाथाप्रमाणेच म्हणणे आहे.

एकादे आपण सत्कृत्य केले, एवढ्यावरूनच भागत नाही. त्या सत्कृत्याने आपले मन आपणांस राजी झाले पाहिजे. अखेरची गुढी उभी राहावयाची ती मनानेच उभारली पाहिजे. म्हणजे आज्ञा करावयाची ती मनाने आणि ती पार पाडल्यानंतर पसंतीही मनाकडून मिळावयास पाहिजे. मनाने सांगितले की, ठीक केले, म्हणजे झाले. इतरांना बरे वाटले नाही तरी हरकत नाही. उलटपक्षी सर्वांकडून स्तुतीचा वर्षाव चाललेला आहे, पण आपले मन प्रसन्न नाही तर प्रपंचातसुद्धा सुख होत नाही, मग ज्याला स्वर्ग म्हणतात तेथे ते कसचे होईल?

मोक्षप्राप्ती म्हणजे तो काही दूरचा प्रसंग नाही. तो पदोपदी येणारा अनुभव आहे. मागे गेलेला किंवा दूरचा प्रसंग नाही. तो पदोपदी येणारा अनुभव आहे. मागे गेलेला किंवा नंतर येणारा काळ अथवा स्थिती नव्हे, तर सर्व काळी, सर्व ठिकाणी मनाची प्रसन्नता असणे शक्य झाल्यावर प्राप्त होणारी ती दिशा आहे, अनंत युगांनी मोक्षाचा काळ येणार असे जर धरले तर ही शंका उदभवेल की, पुरातन काळी होऊन गेलेल्या साधु-संतांस मोक्षप्राप्ती झाली नाही काय?

मन प्रसन्न झाले असता जे सुख मिळते, त्या सुखामध्ये आणि परामार्थिक सुखामध्ये बिलकूल फरक नाही. आपले मन नेहमी प्रसन्न ठेवावे, ह्याबद्दल तुकारामबोवांचा असा सणसणीत उपदेश आहे:

जेणे घडे नारायणी अंतराय| होत बाप माय वर्जावी ती||
तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय| आणिक उपाय दु:खमूळ||
न मानावे तैसे गुरूंचे वचन| जेणे नारायण अंतरे ते||
देव जोडे तरी करावा अधर्म| अंतरे ते कर्म नाचरावे||
आणि भगवद्गीतेतही असे म्हटले आहे:

‘सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज|’ नेमून दिलेली कर्तव्ये करीत असता त्यायोगे जर देव अंतरेल तर ती कर्मे सोडून द्या. तुम्हांमध्ये आणि ईश्वरामध्ये तुमचे आईबाप किंवा गुरू आड येऊ लागले तर त्यांनाही सोडा. ह्या ठिकाणी मन म्हणून जो आपला अंश आहे तो साक्षात ईश्वराचा अंश आहे असा अर्थ आहे. म्हणजे मन हा एक जीव आणि ईश्वर ह्या दोघांस जोडणारा दुवा आहे. म्हणून मन प्रसन्न होण्याच्या मार्गात जो जो अडथळा येईल तो तो काढून टाका, म्हणजे मोक्षप्राप्ती होईल. असा द्वैतवादी व अद्वैतवादी सर्व संतांनी एकमताने सिद्धांत केला आहे. साधूची गोष्ट बाजूस ठेवून आम्ही आपापल्या मनाची जरी साक्ष विचारली तरी तेही असेच सांगेल. मनाला सैरावरा धावू न देता आवरावे हे खरे, पण आवरता आवरता त्यास प्रसन्न करावे हे त्याहून खरे, ईश्वरावरील श्रद्धा, ईश्वराची भक्ती, त्याची उपासना, ह्या तीन परमार्थांनी अखेरीस आपल्या मनाची तळमळ मिटून त्याला शाश्वतीची शांती मिळते. तिचेच नाव निर्वाण अथवा मोक्षप्राप्ती हे होय.

मंगळूर येथील काही विशेष गोष्टी

मंगळूर शहर

प्राचीन अथेन्स शहर सात टेकड्यांवर वसले होते असे इतिहासकार सांगतात. एडिंबरो हेही टेकड्यांवर वसलेले आहे म्हणून स्कॉच लोक त्यास अर्वाचीन अथेन्स असे अभिमानाने म्हणतात. पण मंगळूर शहर सातांहून अधिक टेकड्यांवर वसलेले असून वरील दोन्ही अथेन्सलाही स्वाभाविक सौंदर्याने खात्रीने लाजवीत आहे. तशात पावसाळा संपून दसरा झाला की, मंगळापुरी (मंगळूर) दरवर्षी जणू उपवरच होते. प्रेक्षकांनी तिला ह्याच वेळी पहावयाला यावे. दंतकथा सांगते की, गोरखनाथाची कोणी मंगळा नावाची दासी होती, तीच आता मंगळापुरी (मंगळाXउरू=शहर=मंगळूरू) ची अधिष्ट देवता झाली आहे. तिचे मोठे जुने देऊळ शहराच्या नैर्ऋत्य कोनाला प्रसिद्ध आहे. आता देवी होऊन सर्वांना पूज्य होऊन बसलेली मंगळा ती पूर्वी गोरखनाथाची बटीक होती हे काय गौडबंगाल! पण समजूतदार माणसेही आपल्या जिभेची जबाबदारी न ओळखता स्वेच्छेप्रमाणे काहीतरी सांगत सुटतात, मग ती जी बोलून चालून दंतकथा तिच्या जिभेला हाड कोठून असणार? कसेही असो. मंगळादेवीचे नवरात्र आम्ही येथे पोचल्यादिवशीच संपून दसरा चालला होता. पण मंगळूरचे नवरात्र सर्व हिंवाळाभर चालणार आहे. चहूंकडे हिरवेगार गवत म्हणजे अगदी मी म्हणत आहे. बहुतेक मुख्य रस्ते टेकड्यांच्या बगलांतून बोगदेवजा खणून काढलेले असल्यामुळे त्यांच्या दोहों बाजूंस ७-८ फूट उंच ज्या भिंती आहेत त्यांवरही दोन-दोन हात लांब गवताच्या झिप-या लागलेल्या व त्यांवर बारीक शुभ्र फुले लटकलेली दिसतात. शहर म्हणजे एक निबिड अरण्यच जसे. छपरावरील एकही कउल असे मिळणार नाही की ज्याला अर्धा तास सारखे सूर्यदर्शन मिळते, मग बाहेर कडक उन्हाळा का असेना! दोन घरे ओलांडली नाही तोच एक खाचर लागते व त्यात मस्तावलेला भात झुलत असलेला दिसतो. हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती हे तीन धर्म, तुलव, मलिआळी, कानडी व कोकणी-शिवाय मोडक्या तोडक्या इंग्रजीचे शिंतोडे रस्तोरस्ती उडतात ते वेगळेच-अशा या ‘साडेचार भाषा”. ह्यांतून येथील सुमारे ४० हजार लोकसंख्या बहुतेक सारखीच विभागलेली आहे. असल्या ह्या विचित्र पुरीत ऐक्य पाहू जाणारा ‘तो एक मूर्खच.’ ‘सारस्वत’ आणि ‘कोकणी’ हे अगदी जवळचे जातभाई. पण त्यांच्यात अगोदरच प्रेमाचा उल्हास होता त्यात तेथे जन्मास आलेल्या संयुक्त परिषदेने फाल्गुनमासाची भर घातली आहे. जे सख्य सारस्वतांत व कोकण्यांत तेच येथील शेकडो वर्षांपूर्वी कॅथोलिक झालेल्यांत व नुकताच बाझल मिशनने बाप्तिस्मा दिलेल्या ख्रिस्त्यांत.  

ब्राह्मसमाज

अशा ह्या कोनाकोप-यातील शहरातही ब्राह्मसमाजाची स्थापना होऊन ३०-४० वर्षे झाली. कालिकतच्या बाजूने येथे आगगाडी तर अगदी अलीकडेच आली. तोपर्यंत येथे यावयाचे तर जलमार्गानेच. तोही मार्ग पावसाळ्यात चार महिने बंद व बाकीच्या आठ महिन्यांत आता कोठे सुखाचा झाला आहे.

अशा अडचणीत ब्राह्मधर्माचे बी कोठून व कसे येऊन पडले व त्याचे झाड आज कसे कसे फैलावले आहे, हे एक नवलच हे. हा सर्व इतिहास फारच मजेचा आहे. तो सर्व येथे देण्यास अवकाश नाही. ह्या समाजाचा वार्षिक उत्सव नुकताच साजरा करण्यात आला. त्यात विशेष हा की, येथील मंदिर लहान असून फार जुने झालेले होते, ते वाढवून पुन्हा बांधण्यात येऊन उत्सवाचे पहिले दिवशी (सप्टेंबर ता. २९ रोजी) उघडण्यात आले. त्या दिवशी समाजाचे अध्यक्ष परमपूज्य रघुनाथय्या ह्यांनी गावातील आमंत्रित प्रत्येक जातीच्या प्रतिनिधीच्या हातांतून अक्षता जमवून मंदिराच्या चारी बाजूला टाकल्या. त्यांत पंचम जातीचाही मनुष्य होता. ब्राह्ममंदिर हे सर्व जातींसाठी आहे. म्हणून हे सर्वांच्या हातांनी शुद्ध व सर्वांच्या आशीर्वादाने धन्य झाले, असा ह्या कृतीचा अर्थ होता. जुन्या मंदिराचा संकोच येथील मंडळीला बरेच दिवस भासत होता. येथील उद्योगी सेक्रेटरी रा. के. रंगराव म्हणाले, ह्याविषयी मी किती दिवस तरी मनात खंती बाळगीत होतो. आमच्या सार्वत्रिक ब्राह्ममंदिरापेक्षा ह्या गावातील ताडीवाल्या बिल्लव लोकांची भूतस्थाने ही कितीतरी विस्तीर्ण आणि सुंदर आहेत, असा मी वेदीवर बसून  किती वेळां तरी प्रार्थनेत व उपदेशाचे वेळी आक्रोश केला होता. पण तिकडे कोणाचे लक्ष गेले नाही. शेवटी मंदिराचे बाजूवरील एका मोठ्या आंब्याच्या झाडालाच करूणा आली व ते अकस्मात मंदिराच्या मुख्यशाळेवर कोसळून पडले! मग काय विचारता मंदिराचे देवाने जणू नाकच कापले! आणि आम्हांला हे ऐसपैस नवीन मंदिर बांधावे लागले. ह्या मंदिरासाठी येथील वृद्धतरूण सभासदांनी अगदी अविश्रांत श्रम केले आहेत. आता सुमारे ३०० जण सुखाने बसून उपासना ऐकतील असा आश्रय झाला आहे. पण झालेले कर्ज फेडावयास व भोवतालचे कंपाउंड व आतील सामान विकत घेण्याला अद्यापि निदान दीड हजार रूपयांची फार नड आहे. ती भागविण्यासाठी काही तरूण मंडळी रजा घेऊन बाहेरगावी भिक्षेस निघणार आहेत. कदाचित मुंबईलाही एकादा येईल. का नये येऊ? उत्सवात नेहमीप्रमाणे सर्व प्रसंग झाल्यावर यंदा मराठीत कीर्तन झाले. येथील सारस्वत मंडळीला मराठीचा फार अभिमान वाटतो, विशेषत: बायकांना तरी गिर्वाण भाषेप्रमाणे पूज्य वाटते. म्हणून मंदिराकडे ज्यांनी कधी तोंडही फिरविले नव्हते अशा पुष्कळ स्त्रीपुरूषांची मंदिरात कीर्तनाचे वेळी गर्दी जमली होती.

नये मागे पाहो वाट फिरोनिया| दुसरा संगिया साहकारी||

ह्या तुकाराम वचनाच्या आधारे श्रीकृष्णचरित्राचे आख्यान लावण्यात आले होते. वावगे म्हणावे तर साक्षात श्रीकृष्णाचे चरित्र तुकारामाचे गाइलेले, चांगले म्हणावे तर त्याचा निस्पृहपणा केवळ दु:सह होता. म्हणून जमलेली गर्दी बुचकळ्यात पडून घरोघर गेली.

निराश्रित साह्यकारी मंडळी

दुसरा संगिया साह्यकारी याची वाट मागे फिरून न पाहता अस्पृश्य वर्गाच्या उद्धारार्थ काम आज जवळजवळ १३ वर्षे येथील ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी रा.के. रंगराव हे निश्चयाने करीत आहेत. हल्ली तर त्यांनी आपला २५|३० वर्षांचा वकिलीचा धंदा गेल्या ऑगस्टात आवरून संपूर्णपणे अंत्यंजांचीच सेवा स्वीकारली आहे. ते आपल्या कुटुंबासह आता ब्राह्ममंदिरासमोरील प्रचाराश्रमात येऊन राहिले आहेत, व नावाशिवाय अनभिषिक्त प्रचारकच बनले आहेत. स्वीकारलेल्या कामात वेळोवेळी त्यांची मित्रमंडळी त्यांचे दोष काढीत आहेत, त्यांना सरसकट एकच उत्तर म्हणून आपल्या टेबलाजळील भिंतीवर ‘Fault finders will find fault even in Paradise’. हे वाक्य भव्य अक्षरांनी एका तांबडद्मा फळीवर कोरून ठेविलेले आहे. त्यांच्या शाळेतील हजरेपटावर ७३ पारियांच्या मुलांची नावे आहेत. रोजची सरासरी सुमारे ६० आहे. एक मुलगा शिकून शिक्षक बनला आहे. मुले २|३ मैलांवरून शिकावयास येतात, म्हणून त्यांस दोनप्रहरचे एक जेवण शाळेत द्यावे लागते. ६ हातमागांपैकी तीन चांगले चालले आहेत. पण कापडाला मागणी चांगली नाही. कारण गिरणीतील हलक्या स्वस्त दराच्या व वरून सारखेच दिसणा-या नगापुढे हातमागाच्या भरीव पण महाग कापडाचा टिकाव लागत नाही. पण एरंडी रेशमाच्या किड्यांची लागवड करण्यात रा. रंगरावांनी बरेच श्रेय व प्रसिद्धी संपादन केली आहे. कोइमतूर येथील शेतकीच्या कॉलेजातून ह्या किड्यांसाठी त्यांच्याकडे पुष्कळ मागणी येत आहे. हे रेशीम तयार करण्याचे कामी उच्च शिक्षण मिळविण्याकरिता मि. मेलोथ नावाच्या एका अनुभवी गृहस्थास रा. रंगरावांनी मिशनच्या मार्फतीने बंगाल्यातील पुसा येथील कॉलेजात पाठविले आहे. मंगळूरच्या कलेक्टरसाहेबांनी ह्या कामगिरीचे महत्त्व जाणून सरकारातून ५०० रू. देणगी देवविली आहे. रा. मेलोथ हे लौकरच परत येतील व पश्चिम किना-यावर जागजागी मिशनची ठाणी उघडण्यात आपल्यास मदत करतील अशी रा. रंगरावांना मोठी उमेद आहे. रा. रंगरावांचे सर्वांत नावजण्यासारखे व मदतीस अवश्य पात्र असे काम म्हणजे मंगळूरहून एका मैलावरील एका सुपीक टेकडीवर त्यांनी घातलेली पारियांची वसाहत होय. तेथे हल्ली १७ कुटुंबाची कशी तरी सोय झाली हे. पैकी चौघांस मात्र पक्क्या इमारती मिळाल्या आहेत. बाकी तात्पुरत्या झोपड्यात आहेत. सरकारने इमारती लाकूड फुकट दिले असल्याने व मजुरी ज्याची त्यानेच पुरवावयाची असल्याने ३६ रूपयांत एका कुटुंबासाठी एक पक्के घर मिळेल अशी रंगरावांनी सोय केली आहे. ५० रू. दिल्यास दोन कुटुंबांची कायमची सोय होईल असे घर तयार होते. एकंदर साठ कुळे राहतील एवढी जागा आहे. इकडे श्रीमंत उदार गृहस्थांचे लक्ष जाईल काय? एक मोटारगाडी म्हणजे २०० पारियांच्या झोपड्या हे रंगरावांचे कोष्टक मुंबईचा एकादा भाटिया शिकेल तर गरिबांचे कोटकल्याण होणार आहे! ह्या वसाहतीत दोन विहीरी काढल्या आहेत. दोन्हींसही गोडे पाणी लागले आहे. पैकी एकीचा खर्च सुमारे ५०० रू. अंदमान बेटातील कैद्यांकडून मि. सदाशिव पिले नावाच्या एका सदगृहस्थाने जमवून दिला आहे; म्हणून तिचे नाव अंदमान विहीर असे पडले आहे. एकूण अंदमानातील कैद्यांना हिंदुस्थानातील पारियांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आहे काय?

मँचेस्टर कॉलेज

गेल्या ऑक्टोबरच्या ११ तारखेच्या तिस-या प्रहरी एक हिंदू विद्यार्थी मँचेस्टर कॉलेजचे दरा ठोठावीत होता. हा ह्या देशात एव्हा नुकताच आला असल्यामुळे, ह्याचे तोंडावर नवख्याचे प्रत्येक चिन्ह स्पष्ट दिसत होते. आगगाडीतून ऑक्सफर्ड विद्यापीठाचे दुरून दर्शन झाल्यापासून ह्याच्या मुद्रेत आदराची झाक कलेकलेने वाढत होती. मँचेस्टर कॉलेज पाहिल्यावर तर ह्याची भावना ह्यालाच कळेनाशी झाली! दाराजवळ पोहोचल्याबरोबर ह्यास सुंदर व सुवाच्य शिलालेख दिसला तो हा – ‘सत्य, स्वातंत्र्य व धर्म ह्यांस वाहिलेले!’ हे बाणेदार ब्रीद ह्यास पुढे कॉलेजातील भोजनालयाच्या व पुस्तकालयाच्या दारावरही कोरलेले दिसले. काही वेळाने देवडीवाल्याने ह्यास आत नेले. थोड्याच वेळाने वयाने व त्याहून अधिक विद्येने वाकलेली एक लहानगी आकृती ह्याजपुढे आली. अर्थात ती परमपूज्य डॉ. प्रिन्सिपॉल ड्रमंडसाहेबांचीच होती. भर्तृहरीच्या लक्षणाप्रमाणे हे खरोखरीच ‘नम्रत्वेनोन्नमंत: संत:’ आहेत, ह्यात अतिशयोक्ती अगर पक्षपात लेशमात्र नाही. ह्यावरही ज्यास वरील वचनाची शंका येत असेल, त्याचेच कमनशीब म्हणावयाचे! प्रिन्सिपॉलसाहेबांनी ह्या परक्या विद्यार्थ्याचे इतक्या कळकळीने स्वागत केले की, जणू ह्याची व त्यांची फार दिवसांची ओळख आहे. असो! पण हा हिंदू विद्यार्थी ह्या विलायतेतील धार्मिक कॉलेजाचे दार ठोठावीत का उभा आहे! भरतभूमी एकेकाळी सुवर्णभूमी होती, पण आता दुष्काळाचे माहेरघर झाली आहे म्हणून काही हिंदू विद्यार्थी कायदे, कला इ. ऐहिक विषय शिकण्यास इकडे आल्यास ते येणे साहजिक आहे. पण धर्माबद्दल आर्यांच्या कीर्तीचा नगारा परके देशांतदेखील हल्ली वाजत असता हा वेडा पीर येथे का? आर्यांच्या वंशजास बापुडे मँचेस्टर कॉलेज धर्म तो काय शिकविणार? काही दृष्टीने ही शंका अगदी यथार्थ आहे. धर्म ही बाब मुळी पढिक शिक्षणाची नव्हेच. येथे परमेशवरच गुरू, विश्व हीच शाळा आणि सृष्टी हेच पुस्तक, हे कोण सूज्ञ नव्हे म्हणेल? मनुष्य काय मनुष्यास धर्म देणार! ह्या दृष्टीने पाहता जेथे धर्म नाही, तेथे तो उत्पन्न करण्याचा स्वत: मँचेस्टर कॉलेजचाही इरादा नाही. दुस-या दृष्टीने पाहता धर्मशिक्षणात प्राणायाम कसा करावा, श्राद्धमंत्र कसे म्हणावेत, अगर बाप्तिस्मा अथवा होली कम्यूनियन कसे घ्यावे वगैरे प्रकारच्या गोष्टी येत असल्यास आर्यांच्या वंशजांस धर्म शिकविण्याची गोष्ट तर एकीकडेसच राहो, पण येथील ख्रिस्त्यांसही असला लौकिक ख्रिस्तीधर्म शिकविण्यास मँचेस्टर कॉलेज केवळ नालायक आहे, आणि ह्या नालायकीबद्दल कॉलेजास मुळीच वाईट वाटत नाही. ज्या धर्माचे उपदेशक तयार करण्यास्तव ह्या कॉलेजाची योजना आहे त्या धर्मातच अशा गोष्टीस थारा मिळत नाही. तर ह्या वरील कला शिकू इच्छिणारांनी मँचेस्टर कॉलेजाच्या वाटेस जाऊ नये हेच बरे! धर्माची देणगी देवाने माणसास आधीच देऊन ठेविली आहे व हल्लीही दरघडी तो ती देत आहे. पण ह्या बीजरूपी देणगीची लागवड करणे हे माणसाचे काम आहे आणि त्यातच दात्याने दिल्याचे चीज होणार आहे. देव देतो म्हणून गुडघ्यात डोके खुपसून बसणे केवळ नेभळेपणाचे लक्षण आहे. उत्तरोत्तर विकास पावणा-या मानवी शक्तीच्या साहाय्याने व बदलणा-या परिस्थितीस अनुसरून, श्रेष्ठाने कनिष्ठांस, जाणत्याने नेणत्यांस, पवित्राने पतितांस ह्या देणगीचा फायदा दिला नाही आणि स्वत: आपल्यामध्ये ती वाढविली नाही, तर धर्माची मूळज्योत विझली आहे असे समजावे. ह्या शुद्ध बुद्धीच्या काळात श्रद्धेची बाजू उदार धर्माने बरीच राखिली आहे. आणि शुद्ध बुद्धीच्या पायावर धर्मशिक्षण येथल्याप्रमाणे इतर थोड्याच ठिकाणी मिळत असेल.

ह्या कॉलेजातून विद्यार्थी बाहेर पडल्याबरोबर त्याच्या अंगी धर्माचा दिग्विजय करण्याची पात्रता येते असा मुळीच अर्थ नव्हे. ती त्या त्या व्यक्तीच्या बळावर अवलंबून आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, श्रुतिग्रंथ, तुलनात्मक टीका, धर्मोपदेश आणि शुद्ध खासगी वर्तन इ. अकद्वारा धर्मशिक्षणाचे काम हे कॉलेज नि:पक्षपाताने, कळकळीने, दक्षतेने, धैर्याने आणि शांतपणे बजावीत आहे. आर्याचा वंशज असो की आफ्रिकेतील शिद्दी असो, कॉलेजाची द्वारे दोघांसही सारखीच उघडी आहेत. दोघांसही शिकविण्यास कॉलेजाचा अधिकार आहे. शिकणा-यात शिकण्याचीच पात्रता आहे की नाही ही शंका शोभेल, पण वरील शंका शोभत नाही.

ह्यावरून इतके तरी दिसून येईल की, हा हिंदू विद्यार्थी येथे आला ही काही वावगी गोष्ट झाली नाही. तशात ह्या कॉलेजात आलेला हा पहिला विद्यार्थी नव्हे. ह्याचेमागे तीन विद्यार्थी येथे आले असून ते आता बंगाल्यात धर्मप्रचाराचे काम मोठ्या आस्थेने बजावीत आहेत. शिवाय हल्ली जपानातूनही एक जपानी विद्यार्थी ह्याच हेतूने ह्या कॉलेजात उदार धर्माचे शिक्षण मिळवीत आहे. ह्या सुधारलेल्या शतकात केवळ भौतिक सुधारणाच होत आहे, जडवाद माजत आहे, धर्माची ग्लानी होत आहे वगैरे निराशेचे उद्गार शहाण्या लोकांच्या तोंडातूनही कधी कधी ऐकू येतात, ते केवळ त्यांचे लक्ष ह्या नवीन धर्मजागृतीकडे जावे तितके न गेल्यामुळेच होय. १९ व्या शतकापासून सर्व सुधारलेल्या जगात धर्मविचार, आचार आणि संस्था ह्यांत जी हळूहळू उत्क्रांती घडत आहे, तिची लाट हिंदुस्थानातही ब्राह्मसमाजाच्या रूपाने उसळली आहे. अर्थात निरनिराळ्या ठिकाणी उदात्त हेतूने प्रेरित होऊन काम करणा-यांमध्ये परस्पर सहानुभूती उत्पन्न होणे साहजिक आहे, आणि वर सांगितल्याप्रमाणे ह्या कॉलेजात पूर्वेचा व पश्चमेचा जो संबंध घडत आहे तो ह्या सहानुभूतीचाच परिणाम होय. अशा रीतीने परस्परांस परस्परांची नीट समज पडून, सर्वात एकच तत्त्व मंगलकार्य घडवीत आहे ह्याची प्रचीती पटली, परमेश्वराने समग्र मानवजातीस जगाच्या इतिहासात जो वारंवार उपदेश केला आहे, जे पवित्र आत्मे पाठविले आहेत व जो अनुभव दिला आहे ती सर्व जगाची समाईक संपत्ती आहे. तिचा माझे तुझे न करता गोडीगुलाबीने उपभोग घेण्यास आम् शिकलो तर वावगे होईल काय? मँचेस्टर कॉलेज तर ह्याहून दुसरे काही शिकवीत नाही. अशा उदार प्रयत्नाने जर का एकाद्या धर्माच्या संस्थेस खरोखरच धक्का पोहोचत असेल, तर ती संस्था चोरांच्या किल्ल्याप्रमाणे जितक्या लवकर ढासळेल तितके बरेच म्हणावयाचे! आणि ती तशी ढासळल्यास चोरांशिवाय इतरांस वाईटही वाटणार नाही!!  

पम धर्माशी ज्या गोष्टींचा मुळीच संबंध नाही अशांमुळे ख-या धर्माच्या मार्गात ह्या सुधारलेल्या काळात अद्यापिही अडथळे येत आहेत. आमचा देश बोलून चालून पुराणप्रिय, अवजड आणि न हालणारा. परंतु वा-याच्या वेगाने प्रगतीच्या वाटेने धावणा-या इकडील राष्ट्रांत तरी काय विशेष आहे! सबंध युरोपात मँचेस्टर कॉलेज हे एकच आणि तेही एकलकोंडे. पाखांड्यांचे कॉलेज म्हणून त्यावर जो एकदा शिक्का बसला आहे तो अद्यापि पुसला गेला नाही. ऑक्सफर्डच्या विद्यापीठात नावडतीच्या पोराप्रमाणे त्याची हेळसांड होत आहे. ह्या सोवळ्या युनिव्हर्सिटीत अद्यापि ह्या कॉलेजाचा विटाळ खपत नाही. तथापि सुधारणेची साथच अशी काही तीव्र आहे की, ह्या कॉलेजची उदरा मते नकळतच इंग्लंडच्या सा-या चर्चमधून झिरपत आहेत! त्यामुळे युनिटेरिअन धर्माचा प्रसार दलदलीत पडलेल्या पावसाप्रमाणे, वर दिसावा तितका दिसत नाही. धर्माच्या इतर कॉलेजांतील अध्यापकांस व विद्यार्थ्यांसही ख्रिस्ती शकाच्या तिस-या व चवथ्या शतकांत मतांचे जे एकदा जुने नमुने ठरून गेले आहेत त्यांप्रमाणे आपला विश्वास आहे अशी उघडपणे प्रतिज्ञा घ्यावी लागते. असल्या फार्सात ह्या कॉलेजास काही करमणूक वाटत नसल्यामुळे ते येते घडत नाहीत. ह्या कॉलेजाबाहेर उदार मतच नाही असे म्हणणे म्हणजे ब्राह्मसमाजाबाहेर हिंदुस्थानात सुधारणाच नाही असे म्हणण्याप्रमाणे चुकीचे होईल. पण आधुनिक शास्त्रास व तत्वज्ञानास पटेल अशा प्रकारचे धर्माचे उदार मत उघडउघड प्रथिपादणे ह्या समाजाच्या सर्व दर्जात ते पसरविण्यास उपदेशक व आचार्य तयार करणे हे काम मात्र ह्याच एका कॉलेजात होत आहे.

कॉलेज म्हणजे ५-७ प्रोफेसर असावयाचे. त्यांनी एकाद्या युनिव्हर्सिटीत होणा-या परीक्षांकरिता दरसाल २००-३०० विद्यार्थ्यांस ठराविक पुस्तकातील विषयात ठराविक पद्धतीने तयार करावयाचे, व शिकणा-यांनीही परीक्षेच्या धोरणाने संधान बांधावयाचे, इ. इ. कल्पना आमच्या लोकांच्या मनांत साहजिक येतात, पण वरील कॉलेजाचा ह्या कल्पनांशी फार थोडा मेळ बसतो. हे कॉलेज मागे सांगितल्याप्रमाणे केवळ धार्मिक अध्यापनाकरिता असून ह्याचा बहाणा अट्टल सुधारकी असल्यामुळे कोणत्याही बुढ्ढ्या युनिव्हर्सिटीस ह्याचा संसर्ग सोसत नाही (आणि ह्या कॉलेजासही त्याविषयी पर्वा नाही) म्हणून अर्थात कॉलेजातील अध्ययनाचा युनिव्हर्सिटीच्या परीक्षांशी कसलाही संबंध नाही. शिवाय कॉलेजाचा उद्देश उमेदवारांस सुधारकी पदव्या देण्याचा नसून, उदार व जिवंत धर्माचा समाजात सतत प्रसार करण्यासाठी दरवर्षी ताज्या दमाच्या तरूण उपदेशकांचा पुरवठा करण्याचा आहे.

अठराव्या शतकात युरोपात आधुनिक शास्त्राचा बहार अगदी नवा होता. तेव्हा जुना धर्म व नवे शास्त्र ह्यांमध्ये मोठा लढा पडला होता. ह्या दोहोंमध्ये कधी समेट होणे शक्य नाही अस सुशिक्षितांना वाटू लागले होते. ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ हेच धर्माचे लक्षण आणि जड वस्तू व जड चमत्कार ह्यांची वरवर मीमांसा करणे हीच काय ती शास्त्राची इतिकर्तव्यता असा जोपर्यंत समज आहे, तोपर्यंत वरील दोन्ही तत्त्वे परस्परविघातक आहेत अशी तर्कप्रिय माणसास भ्रांती पडणे अगदी साहजिक आहे. पण मँचेस्टर कॉलेजच्या संस्थापकांना तर्कच केवळ प्रिय नव्हता आणि वरील दोन्ही तत्त्वांची विलक्षण लक्षणेही त्यांना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी अशा आणीबाणीच्या प्रसंगी म्हणजे इ. स. १७८६ साली हे कॉलेज काढले. वास्तविक पाहता ही संस्था इ. स. १७५७ साली वॉरिंगटन अँकॅडमी ह्या नावाने वॉरिंगटन येथे स्थापना झाली होती, हिचे पुढे स. १७८६ साली मँचेस्टर कॉलेज असे रूपांतर झाले. ह्या क्रांतीच्या काळी संस्थापकांचा धर्म व शास्त्र ह्या दोहोंवरही सारखाच विश्वास होता. म्हणजे ह्यांचा धर्म शास्त्रीय होता व ह्यांचे शास्त्र धार्मिक होते. म्हणूनच केवळ असली अद्वितीय संस्था तशा काळी उद्भवली. जुना धार्मिकपणा व नवी रहाटी ह्या दोन कुबड्यांवर चालू पहाणारे सभ्य गृहस्थ हल्लीच्या प्रगतीच्या काळीही काही कमी सापडतील असे नाही, पण ह्या कॉलेजच्या चालकांच्या अंगी तेव्हापासून आतापर्यंत आपल्या पायांवरच कुबड्यांच्या साहाय्यावाचून चालण्याइतकी सचोटी आणि बळ ही दोन्ही आहेत, इतकेच नव्हे, तर व्यायामामुळे ही दोन्ही सारखी वाढत आहेत. वॉरिंगटन अँकॅडमीतील धर्मशास्त्राचे (Theology) पहिले अध्यापक (१७५७-१७६१) डॉ. जॉन टेलर हे वर्षारंभी आपले व्याख्यान सुरू करण्यापूर्वी खालील चार तत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनांवर पूर्ण ठसवीत असत:-

(१) सत्यदेवतेच्या नावाने मी तुम्हास बजावितो की, तुम्ही आताच्या व पुढच्या धर्माध्ययनात, श्रुतिग्रंथांतील साधकबाधक प्रमाणे आणि तुमची स्वत:ची सदसद्विवेकबुद्धी ह्या दोहींकडे दक्षतेने, नि:पक्षपाताने व कसोशीने नेहमी लक्ष  पुरवा, कल्पनेचा झपाटा आणि निराधार तर्क ह्यासंबंधी सावध असा;

(२) मी प्रस्थापिलेले कोणतेही तत्त्व अगर विचार ह्यांचा जो भाग तुम्हांस सप्रमाण दिसेल, त्यापेक्षा अधिक मुळीच पत्करू नका;

(३) मी हल्ली शिकविलेले व तुम्ही मानलेले कोणतेही तत्त्व तुम्हांस पुढे कच्चे अगर खोटे दिसेल, तर त्याबद्दल शंका बाळगा किंवा ते मुळीच टाकून द्या;

(४) आपले मन नेहमी मोकळे ठेवा, दुराग्रह व पक्षाभिमान ह्यांस थारा देऊ नका, आणि दुस-याच्या हक्काच्या आड तुम्ही जाऊ नका.

ही आरंभीच्या अध्यापकांची गोष्ट झाली. मध्यंतरी डॉ. मार्टिनो ह्या कॉलेजात पुष्कळ वर्षे अध्यापक होते. त्यांचे स्वत:चे धार्मिक अध्ययन ह्याच कॉलेजात झाले होते. इ. स. १८९७ साली त्यांचे ह्या कॉलेजातील अध्ययन संपून बरोबर ७० वर्षे झाली, म्हणून कॉलेजकमिटीने त्यांस अभिनंदनपत्र पाठविले, त्यास पाठविलेल्या उत्तरात मार्टिनोचे खालील सुंदर उद्गार आहेत:-

“ह्या कॉलेजने मला एक बोध दिला आहे, तो हा की मी नेहमी शिकत रहावे, आणि शिकवीत असताना तर विशेषेकरून शिकत असावे. हा बोध मजमध्ये पूर्णपणे बिंबला नसेल, तर माझा हा ७० वर्षांचा संबंध ह्या प्रगमनशील कॉलेजास, एकाद्या रिकामा पगार खात शिलकेत पडलेल्या पेन्शनदाराप्रमाणे, केवळ भारभूत झाला असेल. कॉलेज-शिक्षकांचा मी एका गोष्टीविषयी अत्यंत ऋणी आहे, ती ही की जी गोष्ट आपणास ‘एकदा..........खरी वाटली ती फिरफिरून दोनदा शिकविणे हा गुन्हा आहे, हे त्यांनी मला शिकविले,.........नवे विचार आणि ताजे वाड्मय ह्यांचा समाजात जसजसा प्रसार होईल, तसतशा आपण मागे बांधलेल्या विचाररचना विसकळून त्यांच्या पायांवर नव्या इमारती उभारल्या पाहिजेत. म्हणजेच शिक्षकांच्या मनावर गंज चढणार नाही व त्यांची गणना केवळ मोडक्या तोडक्या टाकाऊ सामानात होणार नाही.......’ ही मधली स्थिती झाली. हल्लीचे प्रिन्सिपॉल डॉ. ड्रमंड ह्यांनीही गेल्या वर्षाचे आरंभी आपले व्याख्यान सुरू करण्यापूर्वी आम्हांस मोठ्या कळकळीने सांगितले की, बाबांनो आम्ही जो तुमच्यापुढे कसलाही विचार करितो तो केवळ तुमच्या विचारास मदत व्हावी म्हणून होय, त्यावर जबरी करण्यासाठी नव्हे. तुम्हांस नापसंत झालेली आमची मते तर बाजूसच राहोत. पण जर एकादे मत आम्ही निरूत्तर प्रथिपादिले आणि त्याची सर्व प्रमाणे मिळाली असे तुम्हांस वाटले तरी तेवढ्यावरच तुम्ही तृप्त राहू नका. तुमचे व्यक्तिविषयक शोध नेहमी चालू असावेत, आमच्या प्रयत्नाने तुमचे शोध अडू नयेत किंवा आळसावू नयेत.”

ह्या प्रकारे स्वातंत्र्य आणि मोकळेपणा हे कॉलेजचे ब्रीद केवळ शब्दांतच नाही तर करणीतही आहे. कॉलेजचे एकंदर धोरण वा-याप्रमाणे मोकळे, निर्भय व नि:शंक आहे. ही गोष्ट प्रोफेसरांची जी नेमणूक झाली आहे त्यावरून दिसून येत आहे. हक्सले ह्यांनी मागे एकदा म्हटले होते की जर्मनी व हॉलंद ह्या दोन देशांखेरीज सा-या युरोपात कोठेही धर्मशास्त्राच्या अध्यापकास स्वतंत्र विचार व शोध करण्याची सवड नाही. (कारण जुन्या धर्माची जी काही ठराविक मते आहेत त्याबाहेर अध्यापक जाईल तर त्याची वरणी बंद होते.) हक्सलेसाहेबांस मँचेस्टर कॉलेजचा अपवाद आठवला नसावा. किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे मोठे नाव व दुर्भेद्य दुराग्रह इकडेच त्यांचे सर्व लक्ष लागले असावे. ह्या कॉलेजातील अधअयापकामागे ही अडाणी दहशत मुळीच नाही. तथापि हे सुधारकी कॉलेज म्हणून ह्यातील सर्व अध्यापक जहाल सुधारक आहेत असेही नाही. तसे असल्यास ह्याची स्वतंत्रता केवळ एकदेशीय झाली असती. आणि अशा बेफाम स्वातंत्र्याचे तुफान-तारू कधीच एकाद्या खडकावर आपटून नामशेष झाले असते. पण वास्तविक प्रकार तसा नाही. हल्ली कॉलेजात पाच कायमचे व दोन हंगामी अध्यापक आहेत. कायमच्या पाचापैकी जुन्या कराराचे अध्यापक रेव्ह. अँडिस हे इतके जुन्या मताचे आहेत, की हे युनिटेरिअन आहेत, की नाहीत ह्याची पुष्कळ वेळां शंका येते. तथापि कॉलेजाकडून त्यास कसलीही उपाधी पोचत नाही. इतकेच नव्हे तर साप्ताहिक उपासनेत पाळीप्रमाणे ह्यांचीही उपासना होते. मात्र तेव्हा तरूण विद्यार्थ्यांत व गावातील काही युनिटेरिअन मंडळीत किंचित कुजबुज होते. (आमच्या प्रार्थना समाजातील व्यासपीठावरून एकाद्याचा नकळत अद्वैताकडे तोल गेल्याबरोबर समाजाची मंडळी लगेच कशी एकमेकांच्या कानांशी जाते ह्याची मला ह्या प्रसंगी आठवण झाल्याशिवाय राहत नाही.)

उलटपक्षी, तुलनात्मक धर्माचे अध्यापक प्रो. कार्पेंटर व तत्त्वज्ञानाचे अध्यापक प्रो. अँपटन् हे अगदी बावनकशी सुधारक आहेत. प्रि. परमपूज्य डॉ. ड्रमंड हे जणू तोल राखण्यासाठीच की काय, मध्येच मेरूप्रमाणे स्थिर आहेत. सुधारक, उद्धारक, नवे-जुने ही विशेषणे त्यास लागू नाहीत. ते आपल्या आध्यात्मिक तेजोबलाने द्वंद्वातीत आहेत. (येथे डॉ. भांडारकरांची आठवण होते.)

असो. ह्याप्रमाणे येथील हवा अगदी मोकळी व शुद्ध आहे. स्वातंत्र्याचा प्रकार पूर्ण व पवित्र आहे. पुष्कळ वेळां असे होते की स्वतंत्र्याची पताका खांद्यावर घेऊन नाचत सुटणारी मंडळी आपल्याच पायाखाली दुस-या मुक्या प्राण्याचे स्वातंत्र्य तुडवीत असतात, ते घाईत बिचा-यास कळतच नाही. तसे येथे होत नाही. स्वातंत्र्यामुळे पुरातन वस्तूसंबंधाने अनादर उत्पन्न होत नाही. तर त्या वस्तूकडे जाण्याची वाट मोकळी होते आणि तिचे साक्षात दर्शन होऊ लागल्यामुळे आदरबुद्धी वाढू लागते. जुन्या नव्याचा कलह मिटतो. असे का तर कॉलेजच्या दारावर ‘स्वातंत्र्य’ एवढीच अक्षरे नाहीत तर त्याबरोबर ‘सत्य’ व ‘धर्म’ हीही आहेत. ‘स्वातंत्र्य’ दारावरच नाही तर आतही आहे हे वर सांगितले. त्याप्रकारे ‘सत्य’ व ‘धर्म’ ह्यांचीही कार्ये घडत आहेत. ती कॉलेजातच नव्हे तर त्याद्वारे सर्व युनिटेरिअन समाजात घडत आहेत. कसे ते हळूहळू पुढे कळेल.

भोकरवाडी येथील आपत्ती

पुण्यास भोकरवाडी येथे बहुतेक अस्पृश्य वर्गातील अगदी गरीब लोकांची वस्ती आहे. हल्लीच्या तेथील स्थितीसंबंधाने निराश्रित साहाय्यकारक मंडळीने काढलेल्या पत्रकात पुढील मजकूर आहे.

“पुणे येथील भोकरवाडीच्या मांग वस्तीत अहमदनगर जिल्ह्यातून येणा-या दुष्काळ पीडितांची अतोनात भर पडल्यामुळे तेथील स्थिती फारच हृदयद्रावक झाली आहे. अगोदरच ही वस्ती फार गर्दीची व रोगजनक होती. तशात आणखी हजार दीडहजारपर्यंत बेकारांची व भिका-यांची भर पडून हा सर्व जमाव येथील आमच्या मिशनच्या मैदानातच उघडा पडून आहे. कपड्याचे अभावी ह्या अनाथ लोकांची विशेषकरून मुलांची फार आबाळ होत आहे. शेकडो म्हातारी माणसे, आंधळे, पांगळे आणि लहान अर्भके रात्रभर उघडी पडतात. पाघरायला जुन्यापान्या कपड्याची जर कोणी मदत पाठवील, व्यापारी लोक जर आपल्या जुन्या साठ्यातून काही कापड पाठवतील, घरोघरी जाऊन जुने कपडे व धान्य गोळा करून आणण्यासाठी तरूण स्वयंसेवक पुढे येतील तर आपत्ती निवारण्याचे कामी आमच्या मिशनला मोठी मदत होईल” अशा प्रकारे विनंती करून रा. शिंदे हे स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांनी ह्या कामी पुण्याच्या म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष रा. आपटे ह्यांची सहानुभूती मिळविली असून दोन लोकांना साहाय्य देण्याच्या कामास आरंभ झाला आहे. मदत मागणारे लोक फार, साहाय्य करणारे लोक थोडे असा प्रकार असल्यामुळे रा. शिंदे व त्यांचे साहाय्यक मित्र ह्यास ह्या दोन लोकांचे हाल पहावत नाहीत. हल्ली जिकडून तिकडून पैशाच्या मागण्या होत आहेत. दुष्काळाची स्थिती सर्वत्रच आहे पण ह्या अस्पृश्य लोकांची स्थिती सहसा वरच्या वर्गातील लोकांच्या कानांवरही जात नाही, मग तो जाणून त्यास मदत करण्याची गोष्ट दूरच. ह्यावेळी राष्ट्रीय सभेच्या ठरावांची व आज्ञांची बढाई मारणा-या लोकांनी आपली तोंडे न लपविता राष्ट्रीय सभेच्या ठरावानुसार वागावयास पुढे यावे. गांधीजी आठ महिन्यांमध्ये स्वराज्य मिळवून द्यावयास तयार आहेत पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही झाले आणि अस्पृश्यता राहिली तर आम्हाला स्वराज्य केव्हाही मिळावयाचे नाही, असे त्यांचेच म्हणणे आहे. तेव्हा अस्पृश्यता घालविण्याच्या पूर्वी निदान ह्या अन्नान्न दशेला येऊन मिळालेल्या हजारो म्हाता-या, तरण्या, पुरूष स्त्रियांना, मुलांना दोन घास मिळतील व थंडीपासून त्यांचे संरक्षण करावयास तरी राष्ट्रीय सभेच्या ठरावांचे व आज्ञांचे स्तोम माजविणारे आपल्या सत्वास जागतील काय?

नुकतेच कायदे कौंसिलचे सभासद झालेले रा. घोलप ह्यांच्या दृष्टीने तर निराश्रितांसाठी मिळविलेल्या पैशांवर चरणाचे जे विठ्ठलराव शिंदे त्यांनीच आणखी चरावयास हे नवीन कुरण तयार केले आहे असे ठरण्याचा संभव आहे. विठ्ठलरावांच्या सारख्या कुचकामाच्या माणसाने आजपर्यंत आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करून १५-१६ वर्षांमध्ये जवळ मायाही बरीच केली असावी, त्यात आता दुष्काळाने त्यास आणखी साहाय्य केले आहे. अशा ह्या वेळी रा. शिंदे पुण्याच्या म्युनिसिपालिटीच्या ब्राह्मण अध्यक्षांच्या कानी लागून, काय काय गोंधळ घालताहेत एवढे तरी निराश्रितांचे खरे कैवारी जाऊन पाहतील काय? रा. घोलप हे अखिल इलाख्यातील अस्पृश्य लोकांच्या वतीने सभासद नेमले गेले आहेत. त्यांनी पुण्यास जो महारमांगाचा एकदम जमाव जमला आहे त्यांच्या आपत्तीच्या निवारणासाठी काही करावयास नको काय?

  1. भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे
  2. ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
  3. ब्राह्मणेतर समाजातर्फे मानपत्र
  4. ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
Page 16 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी