1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे

१ माझे बालपण

माझा जन्म १८७८ साली कार्तिक महिन्यात जमखिंडी येथे झाला. कै. विठ्ठलराव शिंदे ह्यांच्यापेक्षा मी पाच वर्षाने लहान. त्यावेळी सर्वत्र जुन्या सनातनी रूढाचारांचे प्राबल्य असे. अशा रूढाचारांचा पगडा आमच्या घराण्यावर पडला होता, हे साहजिकच आहे. आमच्या घरी अतिशय गरिबी. आमच्या बाबांना जमखिंडी संस्थानात सरकार दरबारी जामदार म्हणून नोकरी होती. माझ्या आईला एकंदर २० मुले झाली त्यांपैकी विठुअण्णा (कै. विठ्ठलरावांना आम्ही लहानपणी हेच संबोधन लावीत असू) हे आमच्या आईचे पाचवे अपत्य तर मी सातवे. माझ्या पाठीवर तान्याक्का ही बहीण जन्मली. विठुआण्णापेक्षाही भाऊअण्णा नावाचे माझे बंधू माझ्यापेक्षा आठ एक वर्षानी वडीलच. जमखिंडी संस्थान कर्नाटकाच्या सरहद्दीवर, म्हणून आमची नावे कानडी वळणावर गेलेली आहेत.

त्या काळच्या पद्धतीनुसार मुलगी जन्माला आली की, तिच्या लग्नाच्या तयारीस आईबाप लागावयाचे. माझेही तसेच झाले. मी लहानपणी अंगाने बरीच स्थूल असे, पण सा-या भावंडांत रंगाने तितकीच उजळ होते. माझ्या वडिलांचे गोपाळराव कामते हे चांगलेच स्नेही होते. त्यांचा धंदा शेतीचा, पण ते सावकारीही करीत. गोपळराव बरेच मातब्बर गृहस्थ होते. त्यांना पण लक्ष्मीबाई नावाची एक मुलगी होती. गोपाळरावांची इच्छा अशी की, त्यांची मुलगी आमच्या विठुअण्णाला करून घ्यावी, आणि मला त्यांच्या मुलाला द्यावी. पण आमच्या विठुअण्णाची व लक्ष्मीबाईची पत्रिका न जमल्याने तसा विवाह न होता, माझ्या वयाच्या पाचव्या वर्षी माझे लग्न गोपाळरावांच्या मुलाशी-कृष्णरावाशी झाले. विठुअण्णा व कृष्णराव लहाहनपणी एकत्र खेळत. लग्नात त्यांचे वय विठुअण्णा इतकेच म्हणजे दहा वर्षाचे होते. भाऊअण्णा, विठुअण्णा यांच्या लग्नाबरोबरच एकाच मांडवात, माझे पण लग्न उरकून घेण्यात आले. गोपाळरावांच्या इतमामाप्रमाणे माझे बाबांनी सालंकृत कन्यादान केले. माझ्या लग्नात सासरच्या माणसांनी कसलाच रूसवाफुगवा दर्शविला नाही. ह्याचे कारण आमचे समजूतदार सासरे गोपाळराव व सासूबाई द्वारकाबाई. गोपाळरावांचा व बाबांचा अतिशय स्नेह म्हणून मी सासरी लाडातच वाढले. मी सात आठ वर्षाची होताच सासरी गेले. जमखिंडी शहरापासून माझे सासर-आसंगी हे गाव अवघ्या १६ मैलांवर आहे. गोपाळरावांना आमच्या बाबांबद्दल फार आदर असे. बाबांनी आपला मुलगा-विठुअण्णा शाळेत घालून चांगला हुषार केला होता, हे त्यांना फार कौतुकाचे वाटे. त्याचवेळी आपल्या मुलाचे कृष्णरावांचे शिक्षणाकडे अजीबात दुर्लक्ष, उलट ते गावात उनाडक्या करीत म्हणून मनास फार लावून घेत. विठुअण्णांची अभ्यासातील हुषारी व स्वभावातील चुणचुणीतपणा गोपाळरावांच्या मनात फार भरला होता. म्हणूनच त्यांना आपली मुलगी विठुअण्णाला द्यावी असे फार वाटत होते. एकंदरीत शिक्षणाबद्दल त्यांचे फार चांगले मत होते म्हणूनच त्यांनी आपणहून आमच्या बाबांना कळविले की, माझा कृष्णा शिकला नाही तेव्हा जनाला (मला) तरी लिहिणे वाचणे शिकवा, म्हणूनच मला घरीच शिकविण्यात येऊ लागले.

२ दाढीमुळे घोटाळा

 कै. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांची १९०५ साली अस्पृश्योद्धारार्थ अखिल भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची (All India Depressed Classes Mission) स्थापना केल्यावर त्या संस्थेच्या अनेक शाखा स्थापण्यात आल्या. त्यांपैकी कर्नाटक शाखेसाठी फंड जमा करण्याकरता श्री. शिंदे आपले साहाय्यक श्री. ए.एम. सय्यद ह्यांचेसह १९११ साली बेळगावला गेले होते. बेळगावला रहात असलेल्या एका सारस्वत गृहस्थांना त्यांनी आपल्या येण्याबाबतचे अगाऊ पत्र पाठविले होते. त्याप्रमाणे श्री. शिंदे व सय्यद बेळगावला पोचले. ती वेळी दुपारी १२ वाजण्याची होती. सारस्वत गृहस्थाच्या घरी पोचताच “मालक आहेत का” अशी पृच्छा केली. घरातील बायकामंडळींनी नोकराकरवी मालक काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी गेल्याचे कळवले. तेव्हा श्री. सय्यद ह्यांनी पुन्हा एकदा नोकराकरवी खुलासा केला की आम्ही येणार असल्याचे अगाऊ पत्राने कळविण्यात आले होते. इतकेच नव्हे तर मालकांनी आपल्याकडेच उतरावे असा आग्रह पुन्हा उत्तरादाखल पत्र पाठवून केल्याचे कळविले. परक्या ठिकाणी अपरिचित माणसांशी विशेषत: बायकामाणसांशी गाठ पडली म्हणजे काय प्रसंग ओढवतो ह्याची जाणीव ह्या दोघांस होऊ लागली. विशेषत: अण्णासाहेबांच्या दाढीकडे घरातील बायकामंडळीचे लक्ष जाताच त्यांनी ते मुसलमान असावेत असा ग्रह करून घेतल्याने नोकराकरवी घराच्या ओसरीवरच सामान ठेवण्यास सांगितले. दुपारची वेळ. भूक सपाटून लागलेली. त्यात प्रवासाचा शीण आलेला, बराच वेळ झाला तरी जेवणास बोलावण्याचे काहीच चिन्ह दिसेना. तेव्हा जेवण नाही, निदान चहाची तरी कुठे सोय होते किंवा नाही ह्याचा तलास घेण्यासाठी श्री. सय्यद सिद्ध झाले. घरासमोरच्याच हॉटेलमधील पो-यास चहा पाठवून देण्यास सांगून श्री. सय्यद परत फिरले. पण बराच वेळ झाला तरी हॉटेलमधून देखील चहा काही येईना. असे पाहून श्री. सय्यद ह्यांनी पुन्हा एकदा ओसरीवरून हॉटेलच्या पो-यास चहाकरता हाक मारण्यास सुरूवात केली. पण तो तर मालकाच्या तोंडाकडे पाहून उभा राही. तेव्हा मालकच आपल्या पो-यावर जोराने खेकसून म्हणाला, “अरे सांगना, त्यात भ्यायचे काय? चटकन् सांगून टाक.” तेव्हा पो-या सय्यदाजवळ येऊन म्हणाला, “साहेब, तुम्हाला चहा देण्याची आमची कोणतीच हरकत नाही. पण.... चमत्कारिक नजरेने श्री. अण्णासाहेबांच्या दाढीकडे पहात त्याने स्पष्ट सांगितले... तुमच्याबरोबर आलेल्या मुसलमान गृहस्थांना मात्र चहा देता येणार नाही. आम्ही फक्त हिंदूनाच चहा फराल देत असतो.” सय्यदांच्या लक्षात सारा प्रकार आला. मालकाला ऐकू जाईल इतक्या बेताने ते म्हणाले, “अरे, तुला ठाऊक नाही? हे तर हिंदू आहेत. केवळ दाढी राखली म्हणून ते काही मुसलमान नाहीत. त्यांचे नाव शिंदे असून ते मूळचे कर्नाटकातीलच रहिवासी आहेत”. हे ऐकताच मालक लगबगीने सय्यदांच्याकडे आला व म्हणाला, “आम्हांलाहो काय माहीत! आता खुशाल चहा घ्या......”

 

सय्यद कर्नाटकातले असल्याने आतापर्यंत कानडीतूनच. बोलत होते. मालकाने जवळ येऊन वरील वाक्य उच्चारताच सय्यदांनी त्याला श्री. शिंदे ह्यांना चांगल्या प्रकारे कानडी भाषा अवगत असल्याचे कळविले. तेव्हा मालक चांगलाच खजील झाला.

 

३ अस्पृश्यता निवारणार्थ जाहीरनामा!

 

१९१८ साली मार्च महिन्याच्या २३ तारखेस पुण्यात भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद बडोद्याचे महाराज श्रीमंत सर सयाजीराव गायकवाड ह्यांचे अध्यक्षतेखाली भरली होती. आमच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या आतापर्यंत ज्या काही परिषदा झाल्या त्यात ही परिषद मोठ्या थाटामाटाने पार पडली. सभेस बाबू बिपिनचंद्र पाल, बॅ. जयकर, अँड. भुलाभाई देसाई, श्री. जमनादास मेहता, सर नारायणराव चंदावरकर, लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, श्री. न. चिं. केळकर वगैरे मोठमोठी मंडळी हजर होती. परिषदेच्या अभिनंदनार्थ अनेक मोठमोठ्या लोकांच्या तारा आल्या. त्यांत म. गांधी, कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज, करवीर मठाचे शंकराचार्य ह्यांच्याही तारा होत्या. द्वारकापीठाच्या शंकराचार्याकडून एक विलक्षण तार आल्याचे मला चांगलेच आठवते. त्यात, “सर सयाजीराव महाराज आणि रा. विठ्ठल रामजी शिंदे हे आधुनिक काळातील कलिपुरूष आहेत” अशा शब्दात त्यांचा तीव्र निषेध केला होता.

 

सभेत बॅ. जयकरांनी एक मुख्य ठराव मांडला, तो असा की “अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन व्हावे, ह्यासाठी प्रत्येक प्रांतातील विचारी व जबाबदार कार्यकर्त्या पुढा-यांच्या सह्यानिशी एक जाहीरनामा काढण्यात यावा. आणि त्याअन्वये शाळा, दवाखाने, सार्वजनिक खर्चाने चालविलेल्या सर्व संस्था पाणवठ्याच्या जागा, म्युनिसिपालिटीचे नळ, करमणुकीची ठिकाणे आणि देवालये ह्यांमध्ये अस्पृश्यांना कसलाही प्रतिबंध न राहता ती पूर्णपणे मोकळी असावी.” ह्या ठरावावर लोकमान्य टिळकांनी जे भाषण केले ते फारच महत्त्वाचे व उत्कृष्ट असे ठरले. ते म्हणाले की, “नीच मानलेल्या जातीच्या मनुष्यास स्पर्श झाला म्हणजे पाप लागते ही समजूत साफ चुकीची आहे. अस्पृश्यता वेदात नव्हती. होती असे सिद्ध झाल्यास मी वेदप्रामाण्य मानणार नाही. मनुष्याने अस्पृश्यता पाळणे हे ईश्वरासही मान्य नाही. मान्य असल्यास अशा ईश्वरासही मी मानणार नाही”. लो. टिळकांनी अशा प्रकारचे आवेशयुक्त भाषण करताच परिषदेतून टाळ्यांचा एकच कडकडाट झाला, तो इतका की आपले भाषण पुरे होण्यासाठी टिळकांना ‘टाळ्या बंद करा’ असे सांगावे लागले, तरी लोक टाळ्या वाजवण्याचे थांबवेनात. लो. टिळकांच्यानंतर त्यांचे कट्टर अनुयायी दादासाहेब खापर्डे ह्यांनाही स्फुरण चढून त्यांनी असे सांगितले की, स्पर्शास्पर्श किंवा रोटीबेटी व्यवहार ह्या गोष्टींचा चातुर्वर्ण्याशी काहीच संबंध नाही. पूर्वी ब्राह्मणाच्या मुली सर्रासपणे क्षत्रियांना देत व क्षत्रियांच्या मुली ब्राह्मण करून घेत. असे असल्याने आपण अनिष्ट रूढाचार सोडून देऊन अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे.

 

लवकरच परिषदेतल्या जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्यात आला. त्याच्या शेकडो छापील प्रती प्रांतोप्रांतीच्या पुढा-यांकडे सह्यांसाठी पाठविण्यात आल्या. मसुद्यात एक विशेष टीप होती. ती अशी की, “मी खाली सही करणार वरील ठरावातील अटी स्वत: अक्षरश: पाळीन आणि मी स्वत: हरप्रयत्न करून दुस-याकडूनही त्या पाळल्या जातील असे प्रयत्न सतत करीन. जवळ-जळ ३०० च्या वर सर्व प्रांतांच्या ठळकठळक पुढा-यांच्या सह्या झाल्या. पहिली सही कविसम्राट रवींद्रनाथ टागोर ह्यांची पडली. पण सांगण्यास खेद वाटतो की, लो. टिळकांची काही सही मिळेना. ती देण्यास त्यांच्या कट्टर अनुयायांकडून त्यांना अनुमती मिळेना. नवलाची गोष्ट ही की, हे अनुयायी आपल्या सह्या देऊनचुकले होते. जणू काही त्यांच्या पक्षातील प्रमुखाने सही दिली नाही तर त्यातच त्यांच्या सा-या पक्षाची इज्जत शिल्लक राहत होती. ह्या गोष्टीचा सा-या महाराष्ट्रात बराच गवगवा होऊन राहिला होता. ही एकच गोष्ट सोडून दिल्यास अस्पृश्यता निवारणाचे कामी आमच्या मिशनशी लो. टिळकांनी मोठ्या उदार मनाने सहकार्य केले आहे हे मला चांगलेच आठवते.

ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज

एकाद्या वृक्षाची साल आणि त्याचा गाभा ह्यांच्यामध्ये परस्पर जो संबंध आहे, तोच संबंध ब्राह्मसमाज व ब्राह्मधर्म ह्यांमध्ये आहे. वृक्षाच्या सालीमध्ये कालांतराने फेरफार होतो, पण गाभा तोच असतो. ह्याप्रमाणे ब्राह्मसमाजाचे जरी रूपांतर होणे शक्य असले, तरी ब्राह्मधर्म हा सनातनच राहणार म्हणून त्याची तत्त्वे काय आहेत ते आपण प्रथम पाहू.

प्रथम तत्त्व, मोकळा विश्वास हे आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यामध्ये बुद्धी अथवा विवेक म्हणून एक शक्ती आहे, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये श्रद्धा अथवा विश्वास अशी एक शक्ती आहे. विश्वास असावयास पाहिजे, असे आमचे म्हणणे नाही, पण तो प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीअधिक मानाने असतोच, असे आमचे म्हणणे आहे. आणि ह्यासंबंधाची ब्राह्मधर्माची पहिली आज्ञा अशी आहे की, तो विश्वास मोकळा ठेवावा. त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध अथवा दडपण असू नये. काही स्वाभाविक कारणांनी आपला विश्वास कमी होत असेल, किंवा नष्ट होत असेल, तर तसे होऊ द्यावे, पण अन्य काही कारणाने नवीन विश्वास उत्पन्न होत असेल किंवा जुना दृढ होत असेल तर ते मात्र होता देऊ नये असे म्हणणे काही मोकळ्या विश्वासाचे लक्षण नाही. विश्वासास दोन्ही बाजूंनी मोकळे ठेविले पाहिजे. त्याच्या जाण्याच्या किंवा येण्याच्या मार्गावर कसलेही कृत्रिम दडपण ठेवणे हा अधर्म होय, कारण ज्या अर्थी विश्वास ही आपली एक नैसर्गिक उपजत देणगी आहे त्या अर्थी तिला इतर कृत्रिम उपायांची जरूरी नाही, इतकेच नव्हे, तर तिला त्यांची बाधा न होऊ देणे हे आपले कर्तव्य आहे.

दुसरे तत्त्व, वाढते ज्ञान हे होय. आम्ही आपले ज्ञान वाढणारे आहे की नाही ह्याची नेहमी खबरदारी घेतली पाहिजे. अद्वैतवाद्यांचा अदवैत सिद्धांत हे वाढते ज्ञान नव्हे, जे आहे ते एकच तत्त्व आहे असा एकदा मनाचा ग्रह झाला की मनाची गतीच खुंटली असे होते. पुढे जाणावयाचे ते काय आणि नेणावयाचे ते काय? ह्या कारणामुळे ब्राह्मधर्मानुयायांच्या पसंतीस अद्वैतवाद उतरत नाही. एरवी ब्राह्मसमाज अद्वैतवादी आहे किंवा द्वैतवादी आहे ह्याची चर्चा करण्याच्या भानगडीत पडण्याचे कारण नाही. नित्य नवे नवे जे अनुभव येतात आणि सोध लागतात, त्यांची किंमत नाहीशी करून टाकणारा अद्वैतवाद ब्राह्मास रूचत नाही. कारम व्यक्तीस येणा-या ह्या एकाद्या लहानशाही ताज्या अनुभवाची किंमत शिळ्या अद्वैतवादापेक्षा मोठी आहे. येणेप्रकारे प्रत्येक व्यक्तीस जे अनुभव येतात आणि तत्कालीन मनूमध्ये जे भोवताली नानाप्रकारचे शोध लागतात, त्या सर्वांचा सुसंस्कार त्या व्यक्तीच्या मनावर होऊन अखेरीस तिला जी पूर्ण प्रज्ञा प्राप्त होईल ती देखील प्रगमनशीलच असणार ह्याशिवाय ज्ञानाची इतर कोणतीही स्थिती ब्राह्मास संभवनीय दिसत नाही. त्याप्रमाणे विश्वास मोकळा ठेवण्यात, त्याचप्रमाणे ज्ञान वाढते ठेवण्यातही ब्राह्मास कोणत्याही प्रकारचा धोका दिसत नाही. उलट ही त्याची आवश्यक कर्तव्ये आहेत.

तिसरे तत्त्व शुद्ध प्रीती हे होय. “ऐसी कळवळ्याची जाती| करी लाभाविण प्रीति” ह्या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे आपली प्रीती लाभावीण असली पाहिजे. शुद्ध प्रीती नुसती लाभावीण असते, एवढेच नव्हे, तर त आणि तिचा विषय ह्यांच्यामध्ये स्थळ आणि वेळ ह्यांचे कोणतेच अंतर राहू शकत नाही. सर्व विश्वाचे आपण मध्यबिंदू होऊन सर्वांवर आपण प्रीती करू लागतो. ह्याप्रमाणे निरंतर आणि निर्लोभ प्रेम ब्राह्मधर्माचे तिसरे आवश्यक लक्षण होय.

चौथे लक्षण सात्विक सेवा होय. वरील प्रेमाच्या योगे सेवा करीत असताना मनास कोणत्याही प्रकारे निराशा आणि शीण होण्याचा संभव नसतो. आजपर्यंत केलेले प्रयत्न केले नसते तर बरे झाले असते, असे म्हणण्याची पाळीच येत नाही. कारण ही सात्विक सेवा करीत असताना प्रतिक्षणी आनंदच होत असतो. तो आनंद पुढे कधी तरी व्हावयाचा आहे असे नसते, शिवाय पदोपदी अधइक सेवा करण्याची शक्ती वाढतच जाते. म्हणून ही सात्विकसेवा असे म्हटले आहे.

येणेप्रमाणे सारांशरूपाने ब्राह्मधर्माचे स्वरूप आहे. ह्या धर्माची संस्थापना राममोहन रॉय यांनी केली असे म्हणता येत नाही. ह्यावर वेळोवेळी जी काही अनिष्ट वेष्टमे पडत आहेत, त्यांचे निराकरण करून ही तत्त्वे अधिक उज्ज्वल करण्याचा नवीन प्रारंभ राममोहन रॉय ह्यांनी सन १८३१ साली केला. पण वर सांगितल्याप्रमाणे झाडातील गाभ्याच्या संरक्षणासाठी ज्याप्रमाणे सालीची जरूरी आहे. त्याचप्रमाणे ह्या सनातन तत्त्वांचा योगक्षेम  चालण्यासाठी नवीन रचनेची आणि पद्धतीची जरूरी आहे. त्याचे नाव ब्राह्मसमाज आणि त्याची स्थापना राममोहन रॉय ह्यांनी केली. मनुष्याच्या अंत:करणामध्ये स्वाभाविकपणे वागत असलेल्या वरील ब्राह्मतत्त्वांची उघाडणी आणि विकास व्हावा म्हणून अशा समाजाचा देशोदेशी, प्रांतोप्रांती आणि गावोगावी प्रसार करणे आवश्यक आहे, तसा समाज ह्या कोल्हापूर शहरात स्थापन होऊन हा वार्षिकोत्सव साजरा करण्यात येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. तथापि ब्राह्मधर्माच्या सनातनपणात बाधा येत नाही. यद्यपि सालीमुळे गाभ्याला वेष्टण पडून त्याच्या स्वतंत्रपणास बाधा येते, किंबहुना सालीच्या दोषामुले गाभ्यावर विकारही घडतो, तथापि सालीशिवाय गाभ्याची स्थिती आणि वाढ शक्य नाही म्हणून सालीचे महत्त्व लक्षात आणलेच पाहिजे. पण एकादे जुनाट झाड आतून पोकळ होऊन नुसती वरील साल मात्र रहाते आणि असे झाले असता ते केव्हातरी जसे खाली गळून पडतेच तशीच निरनिराळ्या काळी ह्या धर्मपंथांची वाट लागते हे आपण विसरू नये. ह्या नियमास ब्राह्मसमाजही अपवाद होणार नाही. कालांतराने ब्राह्मधर्माची जीवनत्त्वे हल्लीच्या समाजातून नाहीशी झाली तर अन्य रीतीने त्याच्यावर निराळे नवीन वेष्टण येईल, पण ब्राह्मधर्माचा मनुष्यजातीतून अजीबात नायनाट होणे नाही. हा शाश्वत संबंध ध्यानात ठेवूनच समाजाचा ठिकठिकाणी प्रसार करण्याचे काम प्रत्येक ब्राह्माने करावयास पाहिजे. सर्व हिंदुस्थानभर किंबहुना जगभर ब्राह्मसमाजाचा विस्तार झाला, पण त्यामध्ये प्रत्यक्ष ब्राह्मधर्मालाच जर अवशेष राहिला नाही, तर रानातल्या झाडाच्या जुन्या ढोल्कयाप्रमाणे ह्या समाजाची स्थइती होईल व त्याचे मह्त्त्व सर्पणापेक्षा जास्त उरणार नाही हे जरी खरे आहे, तरी सनातन ब्राह्मधर्मतत्त्वांची वाढ ह्या किंवा अशा समाजाशिवाय होणे केवळ अशक्य आहे. समाजदोषाने तत्त्वे थोडीबहुत दूषित होणारच, आणि शेवटी समाजाचा अजीबात लयही होणार, असे असताही समाजाशिवाय धर्मतत्त्वास गत्यंतर नाही हे जाणून प्रत्येक ब्राह्माने आपल्या समाजाचा योग्य अभिमान राखून ह्याचा सतत योगक्षेम चालविणे जरूर आहे. आपले कलेवर कधीतरी विलयाला जाणार, आत्मा अविनाशी आहे, कलेवराची बाधा आत्म्याला होते, ह्या गोष्टी कितीही ख-या असल्या म्हणून आम्ही आपल्या शरीराची जोपासना करणे सोडून देणे हे जसे मूर्खपणाचे आणि घाताचे होणार आहे, तसेच आपल्या समजाविषयी उदासीन रहाणे हेही आत्मघातकीपणाचे होणार आहे. समाजाची खटाटोप सोडून देऊन सनातन ब्राह्मतत्त्वाचे आचरण करू पाहणारी एकादी ब्राह्मव्यक्ती अन्नपाणी वर्ज्य करून मोक्षास जाऊ इच्छिणा-या बुद्धिभ्रष्टाप्रमाणेच आहे असे समजण्यास काहीच हरकत नाही. त्याचे जीवित ज्याप्रमाणे एक दोन दिवसांत बंद पडेल, त्याचप्रमाणे ह्या ब्राह्मव्यक्तीचेही ब्राह्मधर्माचरण अल्पकाळातच नष्ट होईल.

ब्राह्मणेतर समाजातर्फे मानपत्र

गुरूवर्य श्री. विठ्ठल रामजी शिंदे, बी. ए.

ह्यांचे सेवेशी-

सद्धर्म-प्रचारक अण्णासाहेब, सामाजिक विषमतेचे विष रोमारोमात भिनल्यामुळे, निर्जीव झालेल्या आमच्या हिंदुस्थानास, सद्धर्मछत्राखाली समतेच्या अमृताचे घुटके पाजून त्यास धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महात्मा गौतमबुद्ध, महावीर, चोखामेळा, नामदेव, एकनाथ, तुकाराम, राममोहन रॉय, दयानंद, जोतिराव फुले, विवेकानंद इत्यादी धर्मवीरांच्या परिश्रमाने पुनीत झालेल्या कार्यासच आपण आजन्म वाहून घेतले, ह्याबद्दल आम्हा अखिल ब्राह्मणेतर समाजास फार धन्यता वाटत आहे. आपण गेल्या पंचवीस वर्षांत केलेल्या राष्ट्रीय कार्याबद्दल ह्या देशातील कोणत्याही धर्माच्या, मताच्या अथवा राजकीय पक्षांच्या लोकांनी आपल्याविषयी गौरवपूर्वक अभिमान बाळगणे जरूर आहे.

ता. २३-४-२३ रोजी आपल्या ५१ व्या वाढदिवशी आपल्या स्नेही व अनुयायी मंडळींनी आपणास दिलेले मानपत्र आपल्या स्मरणात असेलच. त्यानंतर गेल्या दोन वर्षात आपण बंगाल, मध्यप्रांत, ओरिसा, तेलंगण, तामीळप्रांत, मलबार, कर्नाटक आणि महाराष्ट्र देशांत बाह्य धर्माच्या प्रसारासाठी संचार करीत असताना इतर धर्मपंथांविषयी उदारपणाची वृत्ती ठेवून जे कार्य केले, ते सत्यशोधक समाजाच्या उद्देशास पटण्यासारखे आहे, हे आम्ही नम्रतापूर्वक नमूद करितो.

आपण दक्षिण हिंदुस्थानात असताना, वैकोम येथे चाललेल्या सत्याग्रहाचे समक्ष हजर राहून निरीक्षण केले व तेथील सत्याग्रही मंडळीस योग्य उत्तेजन दिले ह्यांबद्दल आम्ही आपणास अनेक धन्यवाद देतो. कर्मठ ब्राह्मण्याचा अविर्भाव आणणा-या लोकांनी आपण व महात्मा गांधी ह्यांनी आदि-हिंदू समाजाचे न्याय्य हक्क त्यांना देण्यासाठी केलेल्या सूचनांकडे बुद्धिपुर:सर दुर्लक्ष केले, हे आपल्या लक्षात आले असेलच, त्यावरून ब्राह्मणेतरांची स्वतंत्र चळवळ अधिक जोराने चालविण्यासाठी आपला आशीर्वाद व पाठिंबा असावा अशी आम्ही अपेक्षा करितो.

आपल्या वरील प्रवासामध्ये आपण इतिहास व भाषाशास्त्राचाही व्यासंग कायम ठेवून त्यासाठी प्राचीन स्थळे व पवित्र क्षेत्रे ह्यांचे निरीक्षण करून त्याबद्दल आपले विचार वारंवार भाषण व लेखनाद्वारे प्रसिद्ध केले ह्याबद्दल आम्ही आपले फार आभारी आहो.

कर्मवीर अण्णासाहेब, आपण स्थापन करून प्राणांपलिकडे जतन केलेल्या The Depressed Classes Mission Society of India भारतीय निराश्रीत साह्यकारी मंडळीमध्ये नाना त-हेचे मतभेद व अनेक अडचणी उत्पन्न झाल्या, त्या सर्वांना शांतपणे व धैर्याने तोंड दिले व शेवटी काही मंडळींनी मुंबई हायकोर्टात आपल्या उलट दावा लाविला असता आपण त्यात विजयी झाला हे केवळ आपण केलेल्या असिधाराव्रताच्या तपश्चर्येचे फळच होय, असे आम्हांस वाटते. अण्णासाहेब, आपण अस्पृश्यता निवारक चळवळीचे मुख्य केंद्र पुणे येथेच ठेवून आपली इतर कार्ये पुण्यास राहूनच करावी व आपल्य समागमाचा आणइ उपदेशाचा लाभ आम्हांस सतत द्यावा अशी आपणास आमची कळकळीची विनंती आहे.

राष्ट्रवीर अण्णासाहेब, आपल्या कार्यात आपल्य परमप्रिय भगिनी सौ. जनाबाई शिंदे ह्यांनी योग्य पाठराखी केली ह्याबद्दल त्यांनाही आम्ही शतश: धन्यवाद देतो, व शेवटी भरतखंडात आपल्यासारख्या विबुद्धमान्यनरवर महात्म्यांना दीर्घायु, यश व आरोग्य प्राप्त व्हावे, आणि आपल्यासारखी नररत्ने ह्या भरतखंडाला उत्तरोत्तर अधिक लाभावीत अशी त्या जगन्नियंत्याजवळ आमची मन:पूर्वक प्रार्थना आहे.

आपला नम्र,
अखिल ब्राह्मणेतर समाज

ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती

ब्राह्म आणि प्रार्थनासमाज अशा नावाचे वरवर पाहता निरर्थक भेदाचे गौडबंगाल काय आहे, हे बाहेरच्यास समजणे कठीण आहे. किंबहुना नवीन भरती झालेल्या तरूणांनाही हे कोडे लवकर उकलणार नाही. ह्या दोन्ही नावांच्या समाजाचा धर्म जरी तंतोतंत एकमेवाद्वितीय आहे, तरी ह्या समाजांतील परस्पर भेद अर्थशून्य मुळीच नाहीत. जे समाज आपल्या तात्त्विक धर्माचे सामाजिक अनुष्ठान आपल्या नित्याच्या आणि नैमित्तिक प्रसंगी सहकुटुंब श्रद्धेने आणि निष्ठेने करतात, त्यांना ब्राह्म हे नाव आहे. ज्यांना हे धैर्य, निष्ठा आणि कळकळ नाही किंबहुना अश निष्ठा राखणे आपला धर्मच नव्हे, असे छातीला हात लावून सांगण्याचा कोडगेपणाचा आवाज प्रसंगवशात ज्यांच्या व्यासपीठावरून ऐकू येतो, अशांना प्रार्थनासमाज हे नाव आहे. केव्हा केव्हा मोठ्या समाजानी आपल्यास ब्राह्म हे सोन्यासारखे चकाकणारे नाव घेऊन आपले हसे करून घेतले आहे. अशा दृष्टीने पाहता मुंबई समाजाने आपले ‘प्रार्थनासमाज’ हेच नाव कायम ठेवून आपला निदान शहामपणावरील हक्क तरी शाबीत केला आहे, असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.

आधुनिक भारताचा जनक आणि महात्मा गांधीसारख्या थोरा-मोठ्यांनाही आजोबा शोभेल असा जो राममोहन रॉय ह्यांच्याही काळापासून ह्या पवित्र आर्मिक चळवळीवर स्वकीय व परकीय टीकाखोरांनी विषारी, कडक सौम्य परंतु गैरलागू आणि खरी व न्यायी अशा अनेक प्रकारच्या टीका केल्या आहेत. “भावी राजकारणी उंटाचे पिलू” असा आक्षेप आम्हांवर अगदी गेल्या पिढीच्य अखेरपर्यंत ऐकू येत होता. परंतु जेव्हा कर्झनशाहीच्या नीतीमुळे बेफाम झालेले काही माथेफिरू ब्राह्म तरूण खुनी खटल्यातही सापडले आणि बंगालच्य फाळणीसारख्या देशाभिमानी चळवळीच्या लाटांवर स्वार होऊन बंगालभर दौडत असलेले एकजात ब्राह्मसमाजाचेच पुढारी कर्झनसारख्या मदांधाच्याही डोळ्यांवर येऊन आदळू लागले आणि शेवटी कलकत्त्याच्या साधारण ब्राह्मसमाजाच्या मंदिरात जी एरवीदेखील गर्दीमुळे जागेची मारामार होते, तिच्यात सी. आय. डी. भक्त घुसल्यामुळे तेथे श्वास कोंडण्याची पाळी आली, तेव्हा कोठे हे कल्पित आक्षेपाचे राजकारणी “उंटाचे पिल्लू” ब्राह्मसमाजातून पळाले. ते अद्यापि कोठे दडले त्याचा पत्ता नाही.

मूर्तिपूजा ही जशी हिंदुधर्माची पहिली पायरी तशीच ब्राह्मसमाजही भावी ख्रिस्तांची पहिली पायरी असा आक्षेप उर्फ आशा धरून काही आशाळभूत ख्रिस्ती मिशनरी अद्यापि ब्राह्मांना खिजवीत असतील. पण महायुद्धामुळे बाहेरील मदतीची आयात. कमी झाल्यामुळे तेथे आजपर्यंत केवळ धंदा करून पोट भरणा-या वरील प्रकारच्या मिशन एजंटाची स्वदेशी निर्यातही जास्त जास्त होऊ लागली आहे. येणेप्रमाणे वरील दोन मुख्य आक्षेपांची वासलात होत आहे. तरीही ब्राह्मसमाजाचे उलट “मवाळाचा क्लब,” “रावबहादुरांचा आखाडा,” “नोकरीवाल्यांची पेढी,” “उतावळ्या नव-याच्या गुडघ्यावरले बाशिंग,” “मटण मार्तंडाचे रेष्टाराँ” इत्यादी अनेक भारदस्त नसले तरी चटकदार शब्दप्रयोग चव्हाट्यावरील भाषणात व कधी कधी तसल्याच लेखांतूनही चमकून तात्काळ नाहीसे होतात, त्याला इलाजच नाही. असले आक्षेप अलीकडे ब्राह्मसमाजाच्या उलट येत नसून प्रार्थनासमाजानाच अनुलक्षून असतात. शिमग्यातल्या शिव्या लागतील त्यांनाच लागू होतील अशा न्यायाने प्रार्थनासमाजाचे सभासदही, एका कानाने ऐकून दुस-या कानाने सोडण्याच्याच लायकीचे हे आक्षेप आहेत, असे समजून असतातहे बाहेरच्यांनी ध्यानात बाळगावे.

ह्या सर्व समाजाचे खरे व्यंग म्हणजे पोकळ पांडित्यच होय. ही गोष्ट, प्रत्यक्ष कलकत्त्याच्याही काही पुढा-यांच्या मनावर जशी वठावी तशी वठत नाही. मग प्रार्थनासमाजाची तर काय कथा! ब्राह्मधर्म जो हल्ली ज्या प्रकारांनी प्रचारला जात आहे तो आणि त्याचे ते चाल प्रकार केवळ पंडित किंबहुना पंडितमन्य लोकांमध्येच आजवर खपण्याचा संभव होता. पण आजकाल ते प्रचार पंडितमन्यामध्येही खपेनासे होऊ लागले आहेत. पण हा चालू काळाचा महिमा आमच्या नजरेत अद्यापि भरावा तसा भरत नाही. ही मात्र चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. लक्ष्मी व सरस्वतीचे एकवेळ सख्य जुळेल....इतिहासात असले अपवित्र सख्य पुष्कळदा घडवून लक्ष्मीचे दिवाळे आणि सरस्वतीचे वैधव्य पुष्कळांनी पाहिले आहे. पण भरीव भक्तीचे व पोकळ पांडित्याचे एक क्षणभरही सूत जमणार नाही.

कलकत्त्याचे चालू साली निवडून आलेले अध्यक्ष पंडित सीतानाथ तत्त्वभूषण हे केवळ पोकळ पंडित नसून एक कर्मयोगी भक्तही आहेत. पण त्यांच्या प्रचाराचा सर्व पाया बहुजनसमाजाच्या गावीही नसलेल्या दुर्लभ पांडित्यावरच रचिलेला आहे. त्यांनी एका प्रचारक परिषदेत तोंड भरून स्पष्ट सांगितले की ब्राह्मधर्माचा प्रचार बहुजनसमाजात करू पाहणे म्हणजे ब्राह्मधर्माची अवनती करू पाहणेच होय. पंडित मजकुरांच्या म्हणण्यात पुष्कळ सत्य आहे हे मी जाणून आहे. ब्राह्मधर्माची घोषणा म्हणजे स्वातंत्र्याची घोषणा होय. शिस्तीची जबाबदारी खांद्यावर न घेता उठल्यासुटल्यांनी बहुजनसमाजात जाऊन स्वातंत्र्याची वल्गना केल्याने बहुजनसमाज वर न जाता ब्राह्मसमाज मात्र खाली येईल. पंडित मजकुरांच्या म्हणण्याचा अर्थ मी येणेप्रमाणे माझ्या मनाने करून त्यांचे समर्थन करीत आहे. त्यांना मुळीच दोष देत नाही. पण ब्राह्मसमाजाचे एक अतिपांडित्य हे एक व्यंग आहे एवढे खरे. ख-या भक्तीत स्वातंत्र्य आणि शिस्त ह्यांचा एकजीव समरस होत आहे. असा आत्मविश्वास नसल्यामुळे कदाचित ब्राह्म प्रचारकाकडून बहुजनसमाजाची धार्मिक सेवा व्हावी तशी आजवर झाली नसावी हा माझा तर्क चुकत असल्यास व कोणीतरी दुसरे कारण दाखवील तर मी आभारीच होईन.

वरील मुद्दा पांडित्याचा झाला. मुंबई प्रार्थनासमाजाचे आद्य प्रचारक परलोकवासी सदाशिवराव केळकर हे एक अत्यंत प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ व स्वार्थत्यागी गृहस्थ होते. त्यांनी तर ह्या पांडित्याच्या मुद्द्यावरच शोक करून करून प्राण सोडला. त्यांचे सर्वात लहान चिरंजीव माधवराव केळकर हे आपल्या बापाप्रमाणे करारी व तत्त्वनिष्ठ आहेत. दोघाही पितापुत्रांना पांडित्याची बाधा झालेली नव्हती आणि नाही. हल्ली मुंबई प्रार्थनासमाजात रा. माधवरावांनी एक धामधूम चालविलेली दिसते आणि इतर काही सदगृहस्थांनी विवाहविधीवर चर्चा चालविलेली आहे. जणू काय सामाजिक आणि धार्मिक जीवनाचे महत्त्व केवळ विवाहावरच अवलंबून आहे आणि तसे असले तरी विवाहाचे पावित्र्य जणू बाह्य विधीमूळेच अडून राहिले आहे. एकंदरीत केळकरांना आणि इतर विवाहविधीवाल्यांना मुंबई प्रार्थनासमाजाची एक नवीन सुधारलेली जात बनवावी असे वाटू लागले आहे, असे दिसते. आश्चर्य मात्र हे की, जातिभेद मोडण्यासाठीच केवळ ही नवीन जात बनविण्याची युक्ती ह्यांना सुचली आहे. पण काट्यांनी काटा काढण्यासाठी ही जी एक नवीन काटेरी झाडांची लागवड चालू आहे ती यशस्वी झाल्यास, पुढे जे काटे मोडतील ते काढण्यास काय उपाय योजावा. हा प्रश्न शिल्लक उरतोच.

ते कसेही असो. पण विशेष मनोरंजक ह्याही पुढेच आहे. गेल्या सुबोध पत्रिकेत “जातिभेद कसा मोडता येईल” ह्याविषयी उपाय सुचविताना माधवरावांनी एक चमत्कारिक वाक्य लिहिले आहे. ते हे “पण जोपर्यंत आम्ही जातिभेद मोडण्यास तयार नाही व तो मोडण्यास काही उपाय करीत नाही तोपर्यंत आमच्या समाजात खालच्या जातीचे, मुसलमान व ज्यू धर्माचे लोक सभासद करून घेणे चूक आहे.” जणू काय मुंबईचा समाज “खालच्या” जातींना व परकीयांना बळेच आत ओढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे व असे लोक बेसुमार त्याच्या आत घुसतच आहेत! बरे खरोखरीच असा प्रकार घडलाच तर जाती मोडण्याच्या बाबतीत केळकर म्हणतात त्याप्रमाणे तो अपायकारक होईल की उलट एक प्रकारे उपकारच होईल? भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची (Depressed Classes Mission of India) पहिली शाळा परळ येथे उघडण्याच्या समारंभ सन १९०६ त झाला. त्यावेळी परलोकवासी सदाशिवराव केळकरांनी आपल्या जाहीर भाषणात अस्पृश्यता निवारण्याचे कामी “अस्पृश्यांची उन्नती होईल की ती करू पहाणाराची अवनती होईल” अशी एक सहानुभूतीपूर्वक शंका काढली होती. तिला उत्तर देताना सर नारायण चंदावरकर ह्यांनी “अस्पृश्यांच्या उद्धारातच स्पृश्यांचा उद्धार आहे” अशी समजूत घातली होती. पण मला वाटते अशा सर्व चर्चेत केवळ अतिपांडित्यच भरलेले असते. पांडित्याला मग ते खरे असो, खोटे असो, भरीव असो, पोकळ असो ख-या धर्मात किंवा परोपकारात जागाच नाही. माझा अल्पानुभव असा आहे की, एका दाराने अतिपांडित्य आत शिरू लागले की, सेवा आणि भक्ती ही केव्हाच दुस-या दारांनी बाहेर पडलेली त्याला आढळतात म्हणून मी असे विनवितो की, रा. माधवरावांनी जाती मोडण्यासाठीदेखील नवी जात काढू नये.

महार, मांग, भंगी, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी फार तर काय आपण नास्तिक आहे असा स्वत:चा गैरसमज करून घेणारे अलीकडचे सर्व पोषाकी विद्वानही आत आले तरी त्यांना सभासद म्हणूनही येऊ द्यावे. केवळ मूर्ती फोडणे किंवा जाती मोडणे हा शब्दप्रयोगच मुळात भ्रामक आहे. आमच्या समाजानी हा भ्रम सोडावा. स्वातंत्र्य, शुद्धी आणि मैत्री ह्या भावना जेथे जेथे आहेत, तेथेच ब्राह्मसमाज आहे. इतरत्र कितीही सुंदर इमारती दिसल्या किंवा मधुर गाणी ऐकू आली तरी तेथे ब्राह्मसमाज नसून तेथे कदाचित ब्राह्मसमाजाची पूर्वतयारीच चालू आहे असा धीर आम्ही सर्वांनी राखावा. सत्य संकल्पाचा दाता भगवान आहे. आतून त्याचा आवाज ऐकू येतो. तिकडेच आम्ही कान द्यावेत. टीकाकार काही म्हणोत बापुडे!

ब्रह्मानंद केशवचंद्र सेन

रा. रा. रामराव बाबर ह्यांनी लहान मुलांकरिता ब्रह्मानंद केशवचंद्र सेन ह्यांचे अल्पचरित्र लिहून प्रसिद्ध केले ह्याबद्दल माला आनंद वाटत आहे. राममोहन रॉयाशिवाय महाराष्ट्राबाहेरील दुस-या कोणाही ब्राह्मपुरुषांची चरित्रे मराठीत प्रसिद्ध झालेली माझ्या आढळण्यात नाहीत. एवढे लहानसे चरित्र तरी केशवचंद्र सेनाने ह्या पूर्वीच प्रसिद्ध व्हावयास पाहिजे होते ते रा. बाबर ह्यांनी प्रसिद्ध केले, ह्याबद्दल बालवर्ग त्यांचा आभारी होईल. ब्राह्मसमाजाचा धर्म मुख्यतः तुलनात्मक धर्माच्या पायावरच उभारलेला आहे. तो सर्वसंग्राहक असून विश्वधर्म होण्याला लायक आहे. संस्थापक, राजा राममोहन रॉय ह्यांनी त्याची जरी विचारात आखणी केली होती, तरी व्यवहारात खरी संघटना बाबू केशवचंद्र सेन ह्यांनीच केली. ह्या संघटनेला उदात्त भावनेचे बुरुज लावले. केशवचंद्र झाला नसता तर ब्राह्मसमजाला स्थाईक स्वरूप आलेच नसते. महर्षी देवेंद्रनाथ ह्यांनी मोठी कामगिरी केली खरी, तरी ती केवळ हिंदुधर्माच्याच शुद्ध स्वरूपाच्या पायावर उभी होती. भूत, वर्तमान, भावी सर्व धर्मांच्या अनुयायांना एकत्र यावयाला जर कोणी प्रशस्त भूमिका तयार केली असेल तर ती ब्रह्मानंदानीच केली, असे म्हणण्यात मी धाडस करीत आहे, असे वाटत नाही. पाश्चात्य देशांत ख्रिश्चन धर्माची सुधारणा करणारे युनिटेरियन व युनिव्हरसॅलिस्ट इत्यादी पंथांच्या हातूनही ह्या पूर्ण समन्वयाचे कार्य झाले नाही. इराणातील बहाई समाजाने महंमद पैगंबराच्या धर्माची मोठीच आघाडी मारली आहे खरी. तथापि तत्त्वज्ञान आणि भावना ह्यांचा समरस करून समन्वयाचे काम केशवचंद्राइतके कोणी केले नाही हे खरे ! असे असूनही काही व्यक्तिविषयक कारणांमुळे ब्रह्मानंदासारख्या थोर नेत्याला ब्राह्मांकडूनही विरोध होऊन त्यांचे नाव किंचित मागे पडले होते, तथापि गेल्या वर्षी त्यांच्या शतसांवत्सरिक जयंतिनिमित्त सर्व हिंदुस्थानभर व  बाहेरही जो अपूर्व उत्साहपूर्वक गौरव करण्यात आला, त्यावरून भावी इतिहासात केशवचंद्र सेन आपले योग्य ते पद मिळवू शकेल (फुट नोट – ब्रह्मानंद केशवचंद्र सेन ह्या पुस्तकाची प्रस्तावना १९३९.) अशी अशा वाटत आहे, ती खरी व्हवयाची असेल तर रा. बाबर ह्यांचेप्रमाणे माझ्या इतर मित्रांनीही अबालवृद्धांसाठी प्रचंड प्रयत्न केले पाहिजेत. परमेश्वर तशी प्रेरणा त्यांना करो !

मंत्र कमी आणि थुंकी जास्त
धार्मिक जीवनात जाहिरातीला जागा नाही. धर्माच्या प्रकाशाला मापट्याखाली झाकू नका. असे जरी ख्रिस्ताने म्हटले तरी ह्या उक्तीचा उपयोगापेक्षा दुरुपयोग होण्याचा आजकाल अधिक संभव आहे. प्रचारकांनी ज्याप्रमाणे आपली स्वतःची दुःखे वेशीवर टांगू नयेत त्याचप्रमाणे धर्माचा प्रकाशही, एकाद्या केरोसीन दिव्याप्रमाणे, टांगण्याला वेशीवर जाऊ नये. बगदादमध्ये जाऊन जीव धोक्यात घालण्यापेक्षा कलकत्त्यासारख्या सुंदर शहरात दीर्घायुषी झाला असता तर गृहस्थाच्या दृष्टीने बळदेव अधिक शहाणा ठरता. काही गृहस्थ बगदादला जाणे ही जाहिरात ठरवितील, तर काही प्रचारक कलकत्त्यास चिकटणेची जाहिरात ठरवितील. आपले धनमान सांभाळण्याचा हक्क गृहस्थांनी राखून ठेविल्यास आणि उलटपक्षी आपले जीवित लांब आणि रुंद करावे की ते तीव्र आणि आखूड करावे हे ठरविण्याचा हक्क प्रचारकांनी आपल्याकडे ठेविल्यास अशा प्रचारकांवर तरी निदान जाहिरातीचा आरोप न यावा, हे बरे. युरोप, अमेरिकेचे प्रचारक हिंदुस्थानात येणार म्हणूनच केवळ आम्ही जावे असे नाही. हे केवळ अनुकरण होईल. हे जाहिरातीहूनही कमी फलदायी आहे. केवळ कर्तव्यासाठी प्रत्यक्ष जीवाची पर्वा न बाळगणारे प्रचारक ब्राह्मसमाजात कमी होऊ लागले म्हणूनच आमच्या समाजात धर्म कमी आणि वावदूकपणा जास्त वाढू लागला आहे. ‘मंत्र कमी आणि थुंकी जास्त’ अशी एक गावठी म्हण कानडी भाषेत वाईट ब्राह्मणाला लागू आहे. ती आम्हांला न लागो, म्हणजे मिळविली. लो.अ. ही वि.

करी प्रभुराय सखा

मनास प्रभू पटत नाही तर त्या प्रभूला सखा तो कसा करणार ? मनुष्याची मजल इतकी गेली पाहिजे की, मनुष्याची करमणूक वगैरे साधारण जीवनाचा दर्जा चढून गेल्यावर मानवी जीवन मिळविले पाहिजे. जीवनाचे दोन भाग करता येतील. एक पशुजीवन व दुसरे मानवीजीवन. खाणे पिणे ह्याच्या पलीकडे विचार नसणे ह्याला पशुजीवन म्हणण्यात येते. पशुदेखील (फुट नोट – सुबोध पत्रिका, मुंबई २९ जुलै १९२८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका पत्राचा उतारा.) पशुजीवनापलीकडे आपला व्यवहार करितात. आफ्रिकेसारख्या दाट वनात जाऊन त्या ठिकाणी पशू कशा त-हेने वागतात हे पाहण्यासाठी तेथील लोक जात असतात. रानात हिंस्र पशू असतात. हे भयंकर ठिकाण आहे अशी आपली समजूत झालेली असते. पण तसा सर्वस्वी प्रकार नसून उलट मनुष्याची पहिली कोटी—पहिली पायरी म्हटली म्हणजे पशू. ते खाण्यापिण्यापलीकडे सात्विक विहार करीत असतात. त्या ठिकाणी जिब्रा, कांगारू, हरीण अशासारखे वनस्पतीआहारावर राहणारे गरीब, सुंदर पशू सात्विक क्रीडा करीत असतात. आपल्या मुलांचे कौतुक करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. एवढे कशाला ? आपण जर दिवाणखान्यात बसलो असता आपल्या घरातील मांजर आपल्या पोरांसह तेथे येऊन खेळते किंवा आपण कोचावर किंवा कशावर तरी बसून आपल्या पोरांचे खेळ बघत बसते. ह्यावरून त्यांचे प्रेम दिसून येते. शरीराचे दास्य करून न राहता आध्यात्मिकाचे पहिले जीवन जे सात्विक करमणुकीत असते ते स्वीकारले पाहिजे. जिवंत असलेला प्राणी असा कोणता आहे की ज्याला करमणूक नको. शरीराचे पोषण व संरक्षण करण्यापलीकडे जे कार्य केले जाते ते आध्यात्मिक होय. ह्या सात्विक करमणुकी करीत असता पुढे वरिष्ठ प्रकारचे ज्ञान, वरिष्ठ प्रकारचे प्रेम व वरिष्ठ प्रकारचा यत्न व्हावयास लागून परिघ वाढत वाढत जातो.

दुःसाध्य रोग झाला असता प्रभुराज सखा करावा. साधे रोग पाहिजे तो बरा करील, पण महाभयंकर रोग बरे करण्यास तसाच वैद्य पाहिजे. असा वैद्य प्रभुशिवाय कोणी नाही. मनुष्य मनुष्याचा सखा होऊ शकत नाही. कारण तोही रागावतो, पतन पावतो. सखा परमेश्वर आहे तर त्यालाच सखा करा व आपले सार्थक करून घ्या. (फुट नोट – मंगळवार ता. ८ मे १९१२ रोजी कोल्हापूर येथील ब्राह्मसमाजाच्या तिस-या वार्षिकोत्सवात दिलेल्या व्याख्यानाचा गोषवारा. सुबोध पत्रिका, मुंबई १२ मे १९१२.)

 

  1. बौद्धधर्म जीर्णोद्धार
  2. बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड येथील उल्हास
  3. बहुजन पक्ष
  4. बहाई समाजाचा ब्राह्मसमाजास संदेश
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
Page 17 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी