1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

बौद्धधर्म जीर्णोद्धार

व्याख्यान जुळवून आणणारे, व्याख्यानाचे स्थळ व प्रसंग, श्रोते आणि वक्ता ह्यांपैकी कोणीही बौद्धधर्माचे नसताना ह्या विषयावर व्याख्यान का होत आहे, अशी शंका येणे साहजिक आहे. प्रस्तुत विषयाचा समाजशास्त्राच्या दृष्टीने विचार करावयाचा आहे. कोणत्याही लोकांची धर्मसंबंधी मते, विश्वास, विधी आणि व्यवहार ही सर्व त्या लोकांची सामाजिक प्रगती किती झाली आहे हे पाहण्याची मुख्य साधने होत; व समाजशास्त्राच्या अध्ययनाची मुख्य सामग्री म्हणण्यासही हरकत नाही. आधुनिक समाजशास्त्राचे प्रधान आचार्य स्पेन्सर साहेब हे होत. इतर भौतिक शास्त्रे ज्या स्वयंभू नैसर्गिक बाह्य नियमांनी बांधली गेली आहेत, त्याच नैसर्गिक नियमांचा अम्मल मानवी समाजाची उत्पत्ती, वाढ व लय ह्या गोष्टींतही आहे, हे मत स्पेन्सरने जोराने प्रतिपादिले आहे. स्पेन्सरचे मत समाजशास्त्र (Sociology) हा जीवनशास्त्र (Biology) ह्यांचा एक केवळ खांब आहे असे होते, पण ह्या मतात अलीकडे बरीच सुधारणा होत चालली आहे. व्याख्यात्यांनी ह्या ठिकाणी प्रो. मॅकॅन्झी ह्यांच्या ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजातील ह्युमॅनिझम “Humanism” वरील व्याख्यानातील एक उतारा वाचून दाखविला. त्यातील आशय असा होता की, खालील प्राण्यातील व्यक्तीच्या व जातीच्या पूर्वेतिहासाचा परिणाम तिच्याच वर्तमान व भावी जीवनक्रमावर घडतो. पण तो तिला कळून येत नाही. मनुष्याला हा घडून येणारा परिणाम समजतो, इतकेच नव्हे तर मनुष्य जाणूनबुजून आपल्या व्यक्तीच्या तशाच जातीच्या पूर्वेतिहासातील महत्त्वाच्या गोष्टींचा फायदा घेऊन त्यांच्या बळावर आपला पुढील आयुष्यक्रम रचीत असतो व ह्यातच त्याचा मनुष्यपणा खालील प्राण्यांहून विशेष आहे. ह्यावरून समाजशास्त्र हा केवळ जीवनशास्त्राचा एक भाग आहे, ही समजूत अपूर्ती ठरते.

बौद्धधर्म हा आमच्या लोकांच्या पूर्वेतिहासातील एक केवळ महत्त्वाचा भाग आहे. इतकेच नव्हे तर तो आमच्या हल्लीच्या धार्मिक व सामाजिक जीवनाचा एक मोठा घटक आहे. ही जाणीव आम्ही आमच्यामध्य ठेविली नाही म्हणून वस्तुस्थिती तशी नाही असे होणार नाही. आमचे जीवन मात्र पशूप्रमाणे जाणीवहीन, आणि केवळ बाह्य नियमांच्या बळावर वाहत चालले आहे, असे होईल. बौद्धधर्म हा आमचा बिनमोल वारसा आहे. त्याची नुसती जाणीव ठेवूनच तृप्त न राहता मागे काय झाले असेल ते असो. अत:पर त्यावर आपला अभिमानाने हक्क शाबीत करून आम्ही त्याचा लाभ घ्यावयाला पाहिजे आहे. ह्या दृष्टीने पाहता आजचा विषय नुसता समाजशास्त्राच्या अध्ययनाचाच नसून तो समाजसुधारणेचाही आहे असे दिसून येईल. पण खरोखर तो ह्याहीपेक्षा जास्त आहे. व्याख्यात्यांनी स्वत:ला ज्या धर्मसंप्रदायाला वाहून घेतले आहे, त्याची त्यांना अशी आज्ञा आहे की, सर्व धर्मांचे चौकस व निरपेक्ष बुद्धीने संशोधन व तुलना करून त्यातून जे सारभूत सत्य निघेल त्याच्या आधारे दुस-याची सेवा व स्वत:ची उन्नती करून घ्यावी व हेच काय ते खरे धर्माचरण समजावे. ह्या दृष्टीने आजचे व्याख्यान उज्ज्वल धर्माची एक लहानशी कामगिरीच होय.

भगवान गौतमबुद्धाने शिकविलेले धर्मसिद्धांत, त्यांनी घालून दिलेले आचरणाचे नियम व रेखाटलेली ध्येये ह्यांचा समग्र विचार करण्याची आज जरूरी नाही व तसे करण्यास अवकाशही नाही. अलीकडे प्रसिद्ध होणा-या कोणत्याही पुस्तकात ती सापडतील. त्या सर्वांच्या सामान्य लक्षणांपैकी काही मुख्य लक्षणांचा ऊहापोह करणे हे आजच्या प्रसंगाला अनुसरून आहे.

लक्षण १ ले- बुद्धाच्या सिद्धांताचे पहिले लक्षण म्हणजे त्याची अत्यंत सयुक्तिकता हे होय. आधुनिक तत्त्वज्ञानामध्ये ऑगस्ट कॉम्ट ह्याने जो निश्चितज्ञानवाद (Positivism) सुरू केला, त्याचा उपक्रम गौतमबुद्धाने जवळजवळ १५०० वर्षांपूर्वीच ह्या देशात केला होता. एकापक्षी अंधविश्वास, अंधकल्पना, पोकळ तर्क, रूढी अथवा आत्मवाक्याचे अवलंबन इ. मनाचे जे हीन दर्जाचे व्यापार व अन्यपक्षी श्रद्धा, प्रेरणा, प्रतिभा इत्यादी उच्च दर्जाचे जे व्यापार आहेत, त्या दोन्हींपासून सारखेच अलिप्त राहून तथागताने आपले सिद्धांत स्थापित करण्याचा शक्य तो प्रयत्न केला आहे. म्हणून त्याच्या शिक्षेत चमत्कार, गूढ तत्त्वे, गुप्तज्ञान वगैरेंना थारा नाही. इतकेच नव्हे तर मानवी बुद्धिशिवाय ज्ञानाची इतर द्वारे त्याने जणू काय बंदच केल्यामुळे त्याचे सिद्धांत काही अंशी नीरस आणि नैराश्यजनक भासण्याचाही संभव आहे. पण ते काही असो, इतक्या प्राचीन काळी तथागताने कडकडीत युक्तिवादाची इतकी शिकस्त केली हे पाहून रीस डेव्हीडसारख्या आधुनिक युक्तिवाद्यासही त्याचे कौतुक केल्यावाचून राहवत नाही. पण युक्तिवादाची शिकस्त करणे ह्यातच बौद्ध सिद्धांताच्या पहिल्या लक्षणाची  परिसमाप्ती होत नाही. युक्तिवाद आणि बुद्धिवाद ह्यांत पुष्कळ फरक आहे. साहजिक विचाराने एकादी गोष्ट युक्त किंवा अयुक्त दिसेल तशी ती बरी किंवा वाईट ठरविणे व त्याप्रमाणे वागणे हा युक्तिवाद होय. आणि मानवी बुद्धीच्याच द्वारे सर्व सत्याचा निर्णय करण्याचा आग्रह धरणे व मानवी बुद्धीने ठरविलेले तत्त्व तेच अखेरचे सत्य मानणे हा बुद्धिवाद होय. मनुष्य स्वाभाविकपणे युक्तिवादाच्या साहाय्याने विचार करू लागला म्हणजे सहजच त्याच्या युक्तिवादाचा परिणाम वरील बुद्धिवादात होतो. पण तेथेच त्याची वाढ थांबत नाही, तर लवकरच त्याच्या बुद्धिवादाचा विकास विज्ञानवादात होतो. म्हणजे आपल्या बुद्धीनेच अंतिम सत्य ठरविण्याचा आग्रह कमी होऊन अंतिम सत्य म्हणून काही कायमची वस्तू आहे, तिला कशाचीही अपेक्षा किंवा अवलंब नसता ती केवळ निर्गुण आहे, अशा प्रकारचा आग्रह वाढू लागतो. शेवटी निरनिराळ्या दर्शनकारांनी ह्या ‘केवला’ ची किंवा ब्रह्माची किंवा ‘निर्गुणा’ ची निरनिराळ्या रीतीने उपपत्ती केल्यावर त्याच्या सामान्य अनुयायी समूहामध्ये वरील युक्तिवाद, बुद्धिवाद, किंवा विज्ञानवाद हे तिन्ही मावळून जाऊन त्यांचे अखेरचे पर्यवसान  जो हटवाद तो मात्र कायम राहतो. भगवान गौतमबुद्धाने आपल्या युक्तिवादामध्ये बुद्धिवादाचाही आग्रह शिरू दिला नाही. मग पुढील आपत्तीपरंपरेचा तर प्रश्नच उरला नाही.

युरोपातील मध्ययुगातील हटवादाशी झगडण्यासाठी प्रथम साहजिक युक्तिवादाचा उदय झाला. त्याचा विकास १८ व्या व १९ व्या शतकांतील आधुनिक बुद्धिवादात (Rationalism) व केवलवादात (Absolutism) झाला. ह्या दोन्ही वादांतील आग्रहाचा भाग तेवढा निरस्त करण्यासाठी युरोप आणि अमेरिकेत हल्ली पुन: युक्तिवाद आणि व्यवहारवाद अधिक व्यवस्थित रीतीने व नेटाने मांडण्यात येत आहे. लंडनमध्ये शिलर आणि ड्यूवेप्रभृती, फ्रान्सात प्रो. बर्गसन् आणि इतालीत सिनोर पॉपिनी ह्या मंडळीने (Humanism) ह्या नावाने व अमेरिकेतील प्रसिद्ध तत्त्ववेत्ता प्रो. वुइल्यम जेम्स प्रभृतिमंडळीने (Pragmatism) व्यवहारवाद ह्या नावाने वरील बुद्धिवाद आणि केवलवादाच्या उलट चळवळ करण्याचा तर अगदी विडाच उचलला आहे. ह्या नवीन विचारक्रांतीच्या दृष्टीने पाहता खालील उता-यावरून बौद्ध विचाराची पद्धत २० व्या शतकातल्याप्रमाणे अगदी ताजी होती असे दिसते.

बॅक्ट्रिया देशातील सागलचा राजा मिलिंद (Minander) ह्याने नागसेन नावाच्या बुद्ध भिक्षूला प्रश्न केला-“तुमचे नाव काय?” भिक्षूने उत्तर केले, “माझे आई बाप, माझे सोबती व इतर मला ‘नागसेन’ ह्या शब्दाने  हाक मारितात, पण तेवढ्यावरून ‘नागसेन’ म्हणून काही निराळीच वस्तू आहे से आपण समजू नये.”

राजा म्हणाला,-‘काय! नागसेन म्हणून काहीच वस्तू नाही, तर तुमच्या पापपुण्याचा अधिकारी कोण? तुम्ही मिथ्यावादी आहा...’ नागसेनाने राजास उलट प्रश्न विचारला, ‘राजा, आपण ज्या रथात बसून आला तो रथ म्हणजे त्याचे चाक काय? जू काय? वरील छत्र काय? सारथी काय? घोडे काय? वरील ध्वज काय?’ इ. ह्या सर्व बारीक प्रश्नांस राजाने नकारार्थी उत्तर दिल्यावर नागसेनाने पुन: विचारले,-‘....ही सर्व पृथक् साहित्ये रचून ठेविल्यास जो ढीग होईल तो रथ होईल काय? किंवा ही एकत्र रचलेली साहित्ये काढून घेतली असता मागे रथ म्हणून काही उरेल काय?...’ ह्याही प्रश्नास राजास नकारार्थीच उत्तर द्यावे लागले. तेव्हा नागसेनाने राजास म्हटले ‘राजा, आपमही मजप्रमाणेच मिथ्यावादी ठरता.’

ह्याप्रमाणे निरर्थक आणि दुराग्रही केवलवादाच्या उलट भगवान् बुद्धाची शिक्षा होती. ते नास्तिक नव्हते, केवळ (Pragmatist) व्यवहारवादी होते. तथापि तत्कालीन ब्राह्मणांनी व मध्ययुगातील शंकराचार्यांनी त्यांना नास्तिक ठरविले. इतकेच नव्हे इतर प. लोकवासी राजारामशास्त्री भागवतासारख्या विचारी आधुनिकांनी देखील ‘बौद्धधर्म म्हणजे अंधार’ शी हूल उठवावी हे किती आश्चर्य?

लक्षण २ रे- बोद्ध सिद्धांत ज्याप्रमाणे सयुक्तिक असून केवळ पोकळ, तार्किक किंवा विज्ञानवायूने भरलेले नसत, तर उलट निश्चित व्यवहारवादी असत. त्याप्रमाणेच बौद्धधर्माचरणही पूर्णपणे प्रागतिक असून शिवाय उलटपक्षी अत्यंत सहिष्णुतापर व सहानुभूतिपर असे. सुधारक झाला की तो सहिष्णु झालाच असे पुष्कळ वेळां आढळून येत नाही. मताने मात्र कडकडीत प्रागतिकता मिरविणे, त्यातही केव्हा केव्हा कचरणे, पण कृतीचे वेळी सपशेल अंग चोरणे आणि उलट केवळ आपल्या विचारसुधारणेच्या जोरावरच पुराणपक्षाशीरणे माजविणे असली खोटी सुधारक लक्षणे दुर्दैवाने इतिहासात वेळोवेळी आढळून येतात. बौद्धधर्मातील आचार अशा कोटीतला मुळीच नव्हता.

परवा चवथ्या प्रांतिक सामाजिक परिषदेची बैठक काशी येथे झाली त्यावेळी परिषदेच्या स्वागत कमिटीच्या अध्यक्षांनी मोठ्या अभिमानाने सांगितले की, हिंदुस्थानातील आद्य सुधारक श्रीगौतमबुद्ध ह्याने आपल्या सुधारणेच्या मंगल कार्यास ह्याच पुण्यक्षेत्री सुरूवात केली आणि खरोखरीच तेव्हापासून ह्या मंगलकार्याचा ओघ आमच्या देशात अप्रतिम वेगाने व सर्व बाजूंनी चालला होता. स्त्रियांस पुरूषांप्रमाणेच हक्क होते; किंबहुना धर्मप्रसाराचे कामी देखील स्त्रिया पुढाकार घेत होत्या. सिव्हलद्वीपात धर्माचा प्रसार करण्यासाठी अशोक राजाने प्रत्यक्ष आपल्या कन्येस दीक्षा देऊन पाठविले. पशुमेध, नरमेधादिकांचे क्रूर प्रकार, विधिवैकल्याचे वेडेचार आणि अशा सर्वच प्रकारच्या धर्मभ्रमाचे पटल ह्या नवीन धर्माने दूर केले. हिंदुस्थानातील बद्धमूल झालेल्या ज्या जातिभेदाचे निरसन करण्याचे कामी ख्रिस्ती धर्माला, किंवा त्याहून करड्या महंमदी धर्मालाही पूर्ण यश आलेले नाही. त्या जातिभेदाला आणि वर्णभेदाला श्रीगौतमाच्या धर्मछत्राखाली थाराच मिळेनासा झाला. कारण विहितधर्माचे आचरण करण्याचे बाबतीत तथागताने अर्धवटपणाचे किंवा तिशहाणपणाचे अवलंबन कधीच केले नाही. पण चमत्कार हा की जे कोणी आग्रहाने एकादी सुधारणा घडवून आणतात त्यांच्या त्या आग्रहाची धुमी एकदम पेटली म्हणजे मग तिच्यात परपक्षविषयक सहिष्णुतेची, सहानुभूतीची किंबहुना सदयतेची देखील आहुती पडते, ते त्यास कळत नाही किंवा कळले तरी त्याची ते पर्वा करीतनासे होतात. प्रॉटेस्टंट लोकांना रोमन कॅथॉलिकांचा व प्युरिटन पंथाच्या लोकांना पूजाविषयक विधींचा व उपकरणांचा कसा तिरस्कार येतो किंवा मुसलमानांनी धर्मसुधारणेच्या नावाने  मूर्तिपूजकांचा किती छळ केला ह्या उदाहरणांवरून सुधारकांच्या असहिष्मुतेविषयी काही अंशी तरी कल्पना करता येईल.

बौद्धधर्माचा प्रसार असा नाही. स्वत:गौतमानेच काय पण त्याच्या कोणत्याही अनुयायाने सुधारणा घडवून आणण्याच्या आपल्या आवेशाला स्वत:च्या सहिष्णुतेचा बळी दिला असल्याने उदाहरण कोठेच आढळत नाही. उलट असा प्रकार पुष्कळदा घडण्याचा उल्लेख आहे की, परधर्मीयांनी तथागताकडे वादविवाद करण्यास यावे व तथागताचे विचार, विनय व प्रसन्नता पाहून वादात हार जाऊन शेवटी त्याच्याच धर्माचा उघड स्वीकार करण्यास तयार व्हावे व अशा समयी तथागतानेच उलट त्यास आपला जुना पंथ अशा उतावीळपण एकाएकी सोडण्याचे कारण नाही म्हणून त्यातलीच चांगली बाजू त्यांना, दाखविण्याचा प्रयत्न करावा. लालूच दाखवून किंवा जबरी करून केवळ आपल्या अनुयायांची संख्या वाढविण्याची प्रवृत्ती बौद्धधर्मात कधीच नव्हती. हिंदुस्थानात किंवा जेथे बौद्धधर्माचा प्रसार झाला आहे अशा चीन, जपान देशांत तेथील पूर्वीच्या धर्मानुयायाशी मिळून मिसळून राहण्याचा प्रथमपासूनच कल आहे. पण ह्या अपूर्व सौम्यतेचे कारण आपला धर्म वाढला काय किंवा न वाढला काय ह्याविषयी बेपर्वाई किंवा नेभळेपणा होता असेही नाही. धर्मप्रसारासाठी गौतमाने स्वत: जसे आपले राज्य, तरूण भार्या आणि नूतन बालक ह्या सर्वांवर पाणी सोडले, तसाच स्वार्थत्याग करणारे हजारो भिक्षू त्याला त्याच्या ह्यातीतच मिळाले आणि मागाहून त्यांची परंपरा कायम राहिली म्हणूनच एके काळी बौद्धधर्म बहुतेक आशिया खंडभर पसरला व अद्यापि जगातील एक-तृतियांशावर लोकसंख्या त्या धर्माची आहे, ह्याप्रमाणे मतासारखी कृती करण्याचे शौर्य, आपले मत व आचार दूरवर पसरण्याचे वीर्य, परमत-सहिष्णुता व सहानुभूती ह्या वृत्तीचे औदार्य इ. परस्पर भिन्न गुणांचा समावेश एका गौतम बुद्धाच्या धर्माशिवाय इतरत्र सापडणे दुर्मिळ ह्यात शंका नाही.

लक्षण ३ रे-बौद्धधर्म निश्चितवादी, व्यवहारवादी आणि प्रागतिक होता. ह्यावरून तो केवळ जडवादी व ऐहिक गोष्टीतच गुरफटलेला असा होता असे नव्हे. बौद्धधर्मातील विरक्ती आणि निर्वाणविषयक अत्युच्च आध्यात्मिक आदर्श सर्वश्रुत आहेत. बौद्धधर्मातील प्रचारक भिक्षूंना कडकडीत वैराग्य पाळावे लागत असे. पण त्यासंबंधीही श्रीगौतमांनी मध्यमा प्रथिपत्तीचा मार्ग घालून देऊन विरक्ती किंवा विषयासक्ती ह्या दोन्हींचाही अतिरेक होऊ न देण्याची खबरदारी घेतली होती. ह्या मध्यमाप्रतिपत्तीच्यायोगे बुद्धभिक्षूंना कडकडीत वैराग्य असताही त्यांचे इतरत्र दिसून येणारे दुष्परिणाम त्यांना भोवले नाहीत. म्हणजे त्यांच्यातील सहृदयतेच्या प्रवृत्तीचे झरे आटले नाहीत. सहृदयतेचे दोन प्रकार आहेत. एक भूतदया व दुसरी सदभिरूची. भूतदया हा तर बुद्धाच्या शिक्षेचा विशिष्ट गुण होय. पण ब्राह्मणाचे रक्त ढेकणांना पाजणे हा अलीकडच्या जैनधर्मात आढळणारा अहिंसेचा प्रकार बौद्धामध्ये नाही. पशुयज्ञातील केवळ पशूंची प्राणहानी पाहूनच नव्हे तर पशूंचे हे अत्यंत हाल होत असत त्यामुळे श्रीगोतमाच्या कोमल अंत:करणास पाझर फुटला आणि त्यांनी सर्व प्रकारची हवने व क्रूर विधी बंद केले. त्यामुळे सर्वत्र मांसभक्षण बंद झाले असे नाही, तरी हल्ली भरतखंडात जो निर्मांसाहार प्रचलित झाला आहे त्याचे बरेच श्रेय बौद्धधर्माकडेच आहे. वैद्यशास्त्राचे शोध लावण्यासाठी प्राण्याच्या शरीरावर जिवंतपणी जे कठोर प्रयोग करण्यात येतात, त्याच्या प्रतिबंधार्थ हल्ली पाश्चात्य देशात जोराची चळवळ चालू आहे. पण ही चळवळ करणा-यांत सर्वच निर्मांसाहारी आहेत असे नाही. ह्या मंडळीमध्ये जरी केवळ क्रूरता आणि क्लेशनिवारण करण्यापुरतीच अहिंसा असते, तशीच बौद्धधर्मातही आहे. तिच्यात हिंदूंचा सोवळेपणा किंवा जैनांचा वेडगळपणा ही दोन्ही नाहीत.

सहृदयतेचा दुसरा प्रकार जी सदभिरूची ह्याविषयी ‘चीन देशातील बुद्धधर्म’ ह्या ग्रंथाचे कर्ते रेव्ह. बील (हे चीन देशात पुष्कळ दिवस राहिलेले ख्रिस्ती मिशनरी आहेत, त्यांची बुद्धधर्माविषयी पक्षपातबुद्धी असण्याची मुळीच भीती नाही.) हे म्हणतात की, चीन देशात बौद्धधर्मी लोकांनी सुंदर देवळे बांधून चित्रकला आणि शिल्पकला ह्यांची मोठी अभिवृद्धी केली. तसेच सुंदर बागांतून चित्रविचित्र नवीन फुलांची लागवड करून व त्यांची आपल्या उपासना मंदिरातून नित्य नैमित्तिकप्रसंगी थाटाची मांडणी करून लोकांच्यासदभिरूचीची पुष्कळ वाढ केली.

ह्यावरून बुद्ध भिक्षू म्हणजे अलीकडच्या बैराग्यासारखे सर्व संसारावर रूसलेले सदा असंतुष्ट व तुसड्या स्वभावाचे परावलंबी व परान्नपुष्ट होऊन गावाबाहेरच्या घाणेरड्या धर्मशाळांतून लोळत पडलेले असे नव्हते हे सिद्ध होते. आज सर्व हिंदुस्थानभर निर्जन गिरिकंदरांतून लहान मोठ्या गुंफा आणि लेणी आढळतात. ती एके काळी उद्योगी, शांत आणि सहृदय भिक्षूंनी गजबजलेली, आल्हादकारक वस्तीची ठिकाणे होती. ती लोकवस्तीच्या अशुद्ध वातावरणापासून जरी अलिप्त असली, तरी खालील मैदानात रहाणा-या जनसमूहाच्या शिक्षणार्थ व कल्याणार्थ ह्या भिक्षूंच्या अविश्रांत प्रयत्नांचे जे प्रवाह वहात असत, त्यांची ही ठिकाणे केवळ उगमस्थानेच असत.

बौद्धधर्माचे प्राचरक विरक्त आणि सहृदय असत, इतकेच नव्हे, तर त्यांचे प्रयत्न प्रवृत्तिपर असत. ह्या प्रचारकांचा शिरोमणी जो अशोक राजा त्याने तर अगदी भिक्षूप्रमाणेच निरंतर जनसेवेत आपले सर्व आयुष्य वेचले आणि आपल्या स्वत:च्या मुलांमुलींनाही भिक्षू केले. त्याने धर्ममहामात्रा नावाचा एक नवीनच अधिकारी नेमून त्याच्याकडून आपल्या विशाल साम्राज्याच्या शिवेवर राहणा-या जंगली लोकांचीही सुस्थिती आणि अभिवृद्धी व्हावी अशी तरतूद केली होती. त्याने आपल्याच नव्हे, तर आपल्या मांडलिकांच्या व आपल्या शेजारच्या राज्यातही मनुष्याकरिता व पशूंकरिता दवाखाने स्थापिले व अरण्यातून उपयुक्त औषधी वनस्पतींची व फळझाडांची लागवड सुरू केली. जागजागी तळी, विहिरी इत्यादी खणून व वाटेने सावलीसाठी झाडे लावून माणसांना व गुरांना सारखेच सुखविले.

विस्तार

ह्या वरील तीन लक्षणांनी युक्त हा धर्म होता म्हणून जुन्या काळात जेव्हा प्रवासाची साधने आतासारखी नव्हती, तरीही त्याचा इतका प्रसार झाला. अशोकाच्या वेळीच हा धर्म सर्व हिंदुस्थानभर पसरला, इतकेच नव्हे, तर बाहेर बॅक्ट्रिया व पार्थिया व आशियाच्या पश्चिम किना-यापर्यंत ह्याचे प्रचारक गेले. पूर्वेस सयाम, ब्रह्मदेश, ह्या देशांत दक्षिणेस सिलोनातही ह्याची स्थापना झाली. चीन व जपानकडे ह्याची माहिती झाली ती प्रथम आशियातील पश्चिम राष्ट्रात ह्या धर्माचा जो ख्रिस्ती शकाच्या आरंभी प्रसार झाला होता, त्यावरून झाली. त्यावरून चीन देशाच्या मिंगही (इ. स. ५८-७६) राजाने प्रथम हिंदुस्थानात १८ चिनी विद्यार्थ्यांना बुद्धधर्माची माहिती करून घेण्यासाठी पाठविले. ते हिमालयाला वळसा घालून वायव्येकडून ह्या देशात आले व येथील बरेच धर्मग्रंथ व दोघे भिक्षू त्यांनी आपल्या बरोबर चिनात गेले. त्या लोकांकडून बौद्धधर्माचा चीन देशात झपाट्याने प्रसार झाला व लवकरच जपान, कोरिया, मंगोलिया, सौबिरिया व तिबेट वगैरे बहुतेक आशियाचे भाग ह्याने व्यापून टाकले.

पुढे हिंदुस्थानात ह्या धर्माला उतरती कळा लागून तो शेवटी बहुतेक नामशेष झाला, त्याची जी कारणे आहेत, त्यांपैकी त्या धर्माची वर सांगितलेली सहिष्णुता व सौम्यता हेही एक कारण आहे. मुसलमानांच्या स्वा-या व हिंदूंचा छळ ही कारणे आहेतच. प्रसिद्ध चिनी प्रवासी हिंदुस्थानात आला त्यावेळी देखील ज्या ज्या प्रांती ह्या धर्माला तेथील प्रबळ राजाचा आश्रय होता, तेथे बौद्ध धर्माइतकाच हिंदुधर्माचा जोर चालू होता, हे बुद्धधर्माच्या अपूर्व सौम्यपणाचेच फळ म्हणावयाचे. कान्यकुब्ज देशाचा प्रसिद्ध शिलादित्य राजा ज्याने इ. स. ६३४ साली एक मोठी धर्मपरिषद भरविली, तो बुद्धधर्माचा अनुयायी व मोठाच पुरस्कर्ता होता, तरी त्याच्या राजधानीत जसे १०० बौद्ध विहार होते, तशीच १०० ब्राह्मणधर्माची देवळेही होती. पुढे लवकरच कुमारिल भट्ट व शंकराचार्य ह्यांच्या चिथावणीने, बौद्धांचा राजाश्रय नाहीसा होऊन घोर जुलूम व छळ सुरू झाला. व शेवटी ह्या सात्विक व सौम्य धर्माने आपल्या मायदेशाला कायमचा रामराम ठोकला.

जीर्णोद्धार

आधुनिक निरपेक्ष ओघामुळे व विचारपद्धतीमुळे ह्या धर्माची खरी तत्त्वे व मोठी कामगिरी लोकांपुढे येऊन पाश्चात्य देशांत व आमचेकडेही ह्याविषयी बरीच सहानुभूती वाढू लागली आहे. ज्यांच्या पूर्वजांनी एकाद्या नवीन धर्मस्थापकावर धोंडे मारून त्याचा प्राण घ्यावा, त्यांनीच पुढे त्याचे भले मोठे सुंदर थडगे बांधण्यास पुढे यावे हा प्रकार सर्वत्रच आहे. परवा पेशावर येथे ज्या बुद्धाच्या अस्थी सापडल्या त्या ब्रह्मदेशात न पाठविता ह्याच देशात ठेवण्याविषयी व्हाइसरायसाहेबांना विनंती करण्याकरिता एक डेप्युटेशन गेले होते, तोही वरच्याचाच प्रकार. पण ह्यापेक्षा बौद्धधर्माच्या जीर्णोद्धाराची अधिक महत्त्वाची चिन्हे अलीकडे दिसू लागली आहेत. मद्रास येथील सरकारी कॉलेजातील प्रॉफेसर नरसू ह्यांनी बौद्धधर्मावर एक पुस्तक करून तेथे एक संघ स्थापन केला आहे आणि तो केवळ सुशिक्षित लोकांचाच नव्हे, तर तेथील बरीच पारिया वगैरे अस्पृश्य जातीची मंडळी ह्या समाजात आहेत. अद्यापि ह्या उद्धाराचे काम वरील सुशिक्षित व समजुतदार वर्गातच व तेही वाड्मयाच्याद्वारे बरेच व्हावयाला पाहिजे आहे. हल्ली प्रसिद्ध पाली पंडित व बुद्धधर्माचे तेजस्वी प्रचारक प्रो. धर्मानंद कोसंबी ह्यांच्या विद्वत्तेमुळे व परिश्रमामुले कलकत्ताव मुंबई ह्या दोन युनिव्हर्सिटींत तरी पाली भाषेचा शिरकाव झाला आह. ह्या बाबतीत बहुजनसमाजास सहज समजेल अशा सुलभ वाडंमयाचा जारीने प्रसार व्हावयाला पाहिजे. अशावेळी धर्मानंद हे तूर्त काही वर्षे अमेरिकेत रहाणार असल्यामुळे, त्यांच्या येथील कामात व्यत्यय आला आहे, तरी अमेरिकेतील हॉवर्ड युनिव्हर्सिटीत पाली भाषेतील महत्त्वाच्या व कठीण ग्रंथाचे भाषांतर करण्याच्या कामीच त्यांचा उपयोग होणार असल्यामुळे जीर्णोद्धाराचे काम चालू राहीलच. एकंदरीत आता जो बौद्धधर्माचा जीर्णोद्धार व्हावा अशी आमची इच्छा आहे, तो हल्ली इतरत्र प्रचलित असलेल्या त्या धर्माच्या विधिवैकल्यांचा, टिळाटोपीचा किंवा निर्जीव आचाराचा नव्हे, तर ज्या उदार तत्त्वाच्या योगे मागील काळी मनुष्यजातीची उन्नती झाली, त्यांचा आमच्यामध्ये पुन: उद्धार होऊन आमच्या धर्मसमजुतीस सर्वदेशीयता व आचरणाला अधिक उज्ज्वलता येवो इतकीच इच्छा आहे.

बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड येथील उल्हास

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड

परीक्षेच्या घाईमुळे हे पत्र एकदोन आठवड्यांचे शिळे झाले आहे. तथापि मजकूर शांतीसंबंधाचा असल्याने इतकी घाई केली नाही म्हणून काही हरकत नाही.

दक्षिणारण्यातील नरमेध तर संपला. त्याची आता गत गोष्ट झाली. आपले सुमारे ९६ हजार कामास आले. पैकी सुमारे चौथाई तर यमाने जागच्या जागी वसूल केली. हा जो इतक्यांना मोक्ष मिळाला तोही काही फुकट नव्हे. तर मागे हळहळणा-यांना त्याबद्दल जवळजवळ ३ अब्जांचा खर्च आला आहे. प्रथिपक्षाचे काय काय नुकसान झाले ह्याचा अद्याप पत्ता नाही. भावी इतिहासकार रिकामपणई त्याचा हळूहळू छडा लावतील!

धर्मयुद्ध असो वा कसेही असो, युद्ध म्हणजे अनिष्ट. सतत विकास पावणा-या मानवी आयुष्यात सांग्रामिक कालाची आवश्यकता असेल. पण आवश्यकतेवरून त्याचा चांगुलपणा सिद्ध होत नाही. एके काळी मानवजातीस विद्या, कला, शास्त्र ह्यांपेक्षा युद्धाचीच प्रौढी विशेष वाटत होती. आणि हल्लीच्या काळी, स्पेन्सरसारख्या सात्विक ब्राह्मणांनी सांग्रामिक युगाहून औद्योगिक युग अधिक श्रेयस्कर व उन्नत आहे असे कितीही प्रस्थापिले तरी वरील प्रौढी अद्यापी व्हावी तितकी कमी झाली नाही. इतकेच नव्हे तर त्याच स्पेन्सरसाहेबांनी नुकताच आपला अगदी शेवटचा म्हणून जो ग्रंथ प्रसिद्ध केला आहे त्यात सुधारलेल्या जगात हल्ली ज्या अनार्यपणाच्या लाटा उसळत आहेत त्यांचे चांगले दिग्दर्शन केले आहे. पशुदशेतून मानवदशेचा विकास झाला आहे हे डार्विनचे मत कित्येक कोमल अंत:करणाच्या माणसांस पसंत नाही. तरी जोवर राष्ट्राराष्ट्रांतील वाद आम्हांस रक्तपाताशिवाय मिटविणे अशक्य दिसते तोवर आमच्या पूर्वज-पशूंचे अवशेष आमच्यात अद्यापि कायम आहेत हे कबूल करणे निदान समंजसपणाचे आहे.

सुबोध पत्रिका, ता. २०-७-१९०२.

काही असो, दक्षिण खंडाला शोभणारे हे रणकंदन एकदाचे आटपले म्हणून ह्या उत्तर द्वीपात सर्वत्र आनंदी आनंद झाला आहे. आबालवृद्ध, स्त्रीपुरूष, सुधारक-उद्धारक ह्या सर्वांना अजुनी आनंदाचे उमाळे येत आहेत.

ह्या लोकांची आनंद प्रदर्शित करण्याची त-हा काही अप्रतिमच! युद्ध चांगले की वाईट हे सांगणे फार सोपे आहे. पण ते संपल्यावर ह्यांनी जो आपला राष्ट्रीय उल्हास दाखविला-आणि तोही ऑक्सफर्डसारख्या पवित्र आणि शांत शही-तो पाहून परकीयाने त्यास बरा अगर वाईट म्हणणे फार जोखमीचे काम आहे! म्हणून प्रथम एकदोन दिवशी-विशेषत: रात्री येथे जो प्रकार घडला-नव्हे मला दिसला तो लिहीत आहे. वाचकांनीच आपापले तर्क जपून करावेत.

तहाची तार येथे रविवारी रात्री पोहोचली, म्हणून तेव्हा काही विशेष घडले नाही. दुसरे दिवशी सकाळी मी माझे खोलीत न्याहारीस बसलो असता आमची घरवाली हातात एक मोठी रंगीबेरंगी पताका घेऊन अवचित माझ्यापुढे उभी राहिली. तिच्या तोंडावर विजयश्री स्पष्ट दिसत होती. नंतर खालील छोटासा संवाद झाला:

मी-कायहो तुम्हा (बायकां) लाही आनंद होतो ना!
ती-हो!हो! हे काय विचारणे.
मी-राज्य मिळाले म्हमून की लढाई संपली म्हणून?
ती-दोन्ही रीतींनी.
मी-म्हणजे दुस-या रीतीनेही होतो म्हणावयाचा?
ती-तर हो काय! भाकरीवरदेखील कर बसविण्यापर्यत मजल आली तर लढाई एकदाची संपली म्हणूनही आनंद का वाटू नये?
मी- तर मग ह्या निशाणीचे प्रयोजन काय?
ती- तो भाग वेगळा. ही निशाणी न लाविली तर संध्याकाळच्या आत माझ्या खिडक्यांना तावदाने राहणार नाहीत!
मी- काय म्हणता?
ती- तर काय! मॅफकिंगचा जेव्हा वेढा उठल्याची बातमी आली तेव्हा येथील रस्त्यातील पोरट्यांनी कोण कहर केला!
मी- एकूण ह्या निशाणीची अनेक कारणे आहेत एक, राज्य मिळाले म्हणून, दुसरे, लढाई संपली म्हणून, तिसरे, रस्त्यातील उनाड देशाभिमानास बुजगावणे म्हणून इ. शेवटी बाईने हासत घरावर निशाण लाविले.

नंतर मी दाराबाहेर येऊन पाहतो तो आळीतील प्रत्येक खिडकीतून युनिअनजॅक बाहेर पडत होता. हामरस्त्यावर तर जारीने तयारी चालली होती. दुकानदार, वखारीवाले आणि घरंदाज इत्यादी लोक आपापल्यापरी निरनिराळी जयचिन्हे उभारण्यात गुंतले होते. लहानसान पताका, मोठ बावटे, गुढ्या, तोरणे ह्यांचा थोड्याच वेळात मोठा गहजब उडाला. शहरातील मुख्य रस्त्यात तर रंगाची चंगळ झाली होती. दिवश जसजसा वर येऊ लागला तसतशी अधिक तयारी होऊन अधिक शोभा येऊ लागली. खटारेवाल्यांनी आपल्या खटा-यांवर व बगीवाल्यांनी घोड्यांच्या कानांवर आणि चाबकांच्या शेवटास निरनिराळ्या रंगांच्या फिती लाविल्या! लवकरच बायसिकल्सवरूनही झेंडे फडकू लागले. अखेरीस ही आनंदाची साथ गुलहौशी बायकांच्या कुत-यांपर्यंत पसरून त्यांचे गळे रंगले! अनुकरण आणि चढाओढ ह्यांमुळे हा प्रकार कोठवर वाढेल ह्याचा सुमार लागेना. तिस-या प्रहरी लहान-लहान मुले खांद्यावर पताका ठेवून, तोंडाने कथिलाची शिंगे फुंकून त्यांचा कर्कश आवाज काढीत रस्त्यातून भटकू लागली!

सांजावून किंचित कडोसा पडल्यावर देखावा बदलला. दुकानांवरून व घरांवरून ग्यासच्या चित्रविचित्र दिव्यांची रचना केली होती. त्या सर्वांनी आता पेट घेतला. कित्येक ठिकाणी जपानी कागदी कंदीलांची तोरणे रस्त्यावरून आडवी टांगली होती. काही कॉलेजांवरून कार्तिकाची विशेष शोभा दिसत होती. सार्वजनिक आनंद प्रदर्शनाचे ह्या लोकांचे मुख्य साधन बॉन फायर्स म्हणजे होळ्या. गावात ह्या निरनिराळ्या ठिकाणी ८-१० रचिल्या होत्या. मोडकी पेटारे, डांबर ठेवण्याची पिंपे आणि इतर सटरफटर ह्यांनी काही होळ्या २५ फुटांपर्यंत उंच गेल्या होत्या. ह्यांचाही आता एकच भडका उडाला. इकडील गरीब व खालच्या वर्गाची एरवी देखील सायंकाळी फुरसतीच्या वेळची मुख्य करमणूक म्हणजे गावातील मुख्य रस्त्यातून इकडे तिकडे मनसोक्त भटकणे. त्यात तरूण मुलींचा भरणा विशेष! आज तर ह्या गर्दीला काही निराळाच रंग आला होता. होळ्या पेटल्यावर रस्त्यात अगदी खेचाखेची झाली.

रात्रीचा पूर्ण अमल बसल्यावर ह्या देखाव्याचे तिसरे आणि भलतेच रूपांतर झाले! सकाळी पाडवा, संध्याकाळी दिपवाली तर रात्रीच्या काळोखात ह्या उत्सवाने आमच्या शिमग्यासही लाजविले! ह्या शिमग्यातील मुख्य पार्ट युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी बजाविला!! संध्याकाळनंतर विद्यार्थी युनिव्हर्सिटीचा झगा आणि टोपीशिवाय खोलीबाहेर कोठेही दिसल्यास त्यास दंड, ११ वाजल्यावर बाहेर दिसल्यास दंड, १२ वाजल्यावर दिसल्यास जबर दंड, इ. ह्या युनिव्हर्सिटीचे नेहमीचे अगदी कडक कायदे आहेत. पण मॅफकिंगच्या रात्रीच्या अनुभवावरून आज हे सर्व कायदे तहकूब करण्यात आले होते. मग काय विचारता! दहादहा बाराबारा रंगेल गडी हातात हात घालून लांब रांगा बनवून गर्दीतून अर्धे उघडे बोडके हैदोस करीत निघत. गावठी तरूण मुलींच्याही अशाच रांगा चालल्या! ह्या भिन्न जातींच्या रांगा जेव्हा समोरासमोर भिडत तेव्हा रांगांचे वर्तुळ बनत असे. मग क्षणमात्र “चुंबति कामपि श्लिष्यति कामपि कामपि रमयति रामामं” ही अस्सल गोकुळी रासक्रीडा होई! अशा प्रसंगी सभ्य मुली बाहेर पडत नाहीत. पडल्या तर त्यांचा सभ्यापणा कायम राहत नाही. थोडा वेळ त्याचा भंग झाला म्हणून त्याचे त्यांस वाईट वाटत नाही. वाटले तरी कोणी विचारीत नाही. अलीकडे आमच्या शिमग्यासंबंधी निदान सुधारक पत्रातून तरी थोडी टीका होते. पण तशी देखील इकडे काही दिसली नाही. कारण बोलून चालून हा तात्पुरता पोरकटपणा, असा येते सर्वानुमते ठराव झालासे दिसते. काही असो, नवख्यास एकंदरीत हा प्रकार पाहून धक्का बसल्याशिवाय राहत नाही.

डोळ्यांचा भडका जसा कमी होऊ लागला तसे आजूबाजूचे फालतूक अडगळीचे सामान आत येऊन पडू लागले! एके ठिकाणी तर एका मोडक्या घरावर हल्ला झाल्यामुळे, पोलीसास मध्यस्थी करावी लागील! अशा प्रकारच्या आनंदाच्या वेळी ऑक्सफर्डमध्ये दुसरा एक विशेष मौजेचा प्रकार दृष्टीस पडतो. तो असा, विद्यार्थ्यांच्या टोळ्या रस्त्यातून हिंडत असता गावातील टोळ्यांशी काही तरी कुरापत काढून मरामारी करतात. ह्या तंट्यास येथे ‘टाऊनीज एँड गाऊनीज प्यड्स’ म्हणजे झगेकरी व गावकरी ह्यांचे तंटे असे म्हणतात. हीच चाल फार पुरातन काळापासून आहे. पूर्वी खरोखरीचे मोठे दंगे होत असत. ह्या वेळीही एका कॉलेजच्या दारात. सुमारे तासभर दंगामस्ती झाली. ह्याचे प्रथम मला फार आश्चर्य वाटून इकड पोलीस का दुर्लक्ष करतात ह्याबद्दल मी एका शिपायास विचारिले. येथील पोलीस म्हणजे धिप्पाड, कर्तव्यदक्ष, शांत आणि अतिसभ्य लोक असतात. त्यांपैकीच एक म्हणाला..... “अशावेळी आम्ही जास्त सवलत देतो. आम्हीच जर चिडलो तर सारा गाव खवळेल. हे दंगे विशेष विकोपास पेटले तरच आम्ही शांतपणे मिटवितो” त्याने असेही हासत हासत सांगितले-“भांडण मिटविताना मला स्वत:लाच तीनदा मार खावा लागला!” ह्यावरून हा शेंदाड शिपाई होता असे नव्हे. तर चिडखोरपणा व अरेरावी ह्या गुणांची पोलिसास आवश्यकता नाही, इतकेच त्याने फार गोडपणे सुचविले!

असो, ह्या प्रकारे पहिल्या एकदोन रात्री येथे अनेक तमाशे दिसले. पण हीच तमासगीर विद्यार्थी मंडळी दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे म्युझिअम, लायब्र-या लॅबोरेटरी वगैरे ठिकाणी आपापल्या व्यासंगात गुंग झालेली दिसली!!

बहुजन पक्ष

[रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे हे पुणे शहरातर्फे नव्या कौन्सिलमध्ये निवडून येण्याची खटपट करीत आहेत. त्यांनी ‘बहुजन पक्ष’ असा मथळा देऊन एक विस्तृत लेख बडोद्याच्या जागृती पत्रामध्ये प्रसिद्ध केला आहे. ह्या लेखामध्ये बहुजन समाजाच्या निरनिराळ्या हितसंबंधाचे रा. शिंदे ह्यांनी केलेले विवेचन बोधपर म्हणून पुढे दिले आहे............ संपादक.]

१ शेतकरी- ह्यात डोईजड जमीनदारांचा अथवा पिढीजाद जहागीरदारांचा समावेश मुळीच होऊ शकत नाही जो आपल्या मालकीचे अथवा कौलाचे शेत आपणच वाहतो, आणि त्या कामासाठी पुरेशा मजूरदारांना समान दर्जाचे योग्य वेतन देऊन सांभाळतो, तोच शेतकरी जाणावा. पाश्चात्य देशात अशालाच ‘पेझंट प्रोप्रायटर’ म्हणतात. तो जरी स्वतंत्र असला तरी, धन, विद्या अथवा अधिकार नसल्यामुळे अद्यापि मागासलेला राहिला आहे.

२ शिपाई- ह्यात सरदाराची गणना मुळीच नाही. कारण अधिकारबलामुळे त्यांचा समावेश पुढारलेल्या वर्गात करणे योग्य आहे. हितसंबंधाच्या विरोधामुळे बहुजन पक्षात हे सामील न होणे साहजिकच आहे. पण सामान्य शिपायांचे हितसंबंध आमच्या पक्षानेच राखले पाहिजेत. कारण ते मागासलेले आहेत. कुणबी जसा सर्वांचा खरा पोशिंदा आणि मोठमोठे ऐतखाऊ जमीनदार अथवा जहागीरदार हे केवळ पोष्य, तसाच हातावर शीर घेऊन लढणारा एकांडा शिलेदार हाच खरा क्षत्रिय. तो केवळ पट्टेवाला, चपराशी नव्हे. त्याच्या बळावर किताब मिळविणारे व पिढीजाद पेन्शने झोडणारे सरदार हे जरी जातीने क्षत्रिय असले, तरी ते मागासलेले नसतात. म्हणूनच त्यांच्या हितसंबंधाची काळजी आमच्या पक्षाला वाहण्याचे कारण नाही. पण शिपाईगिरी मात्र आम्ही राखलीच पाहिजे.

३ शिक्षक वर्ग- ह्यात सोवळेशास्त्री हक्कदार पुरोहित किंवा बलुते जोशी ह्याची गणना करिता येत नाही. वाड़मयाचे किंवा उद्यमाचे व्यावहारिक शिक्षण देण्याला जे कोणी लायक आहेत, आपल्या वृत्तीला पिढीजाद हक्क न सांगता बाजार भावाप्रमाणे चालू वेतन घेण्यास तयार आहेत त्यांची जात, धर्म, देश काही असो, त्यांचे हितसंबंध त्या पक्षाने राखणे जरूर आहे. कारण तेही मागासलेलेच आहेत, व त्यांचे हितसंबंध हे राष्ट्रीय आहेत.

४. उद्यमी- सुतार, सोनार, साळी, शिंपी, गवळी, माळी, तेली, तांबोळी हेही राष्ट्राचे धारक असून ह्यांचा दर्जा शेतकरी किंवा शिपाई ह्यांच्यापेक्षा रतीभरही कमी नाही. ते मागासलेले आहेत. नाटकवाले, गोंधळी, शकून सांगणारे जोशी आणि पोवाडे गाणारे शाहीर, वैदू आणि पोरक्या मुलांना पाजणा-या दायांचीही जरूरी प्रसंगविशेषी ह्या बहुजन समाजरूपी बळीराजाला लागते. तर मग त्यांच्या हिताचा विसर त्याला कसा पडेल?

५. दुकानदार- ह्यात व्याज देऊन दुस-याचे भांडवल वळवून आणून त्यावर गब्बर होणारे पेढीवाले वर्ज्य आहेत, असे समजावे. परंतु उद्यमी लोकांच्या व मजुरांच्या साहाय्याने जी राष्ट्रीय संपत्ती शेतक-याने निर्माण केली व शिपायाने राखिली तिची देशभर वाटणी होण्याला बिनव्याजी भांडवलवाल्या दुकानदारांचीही तितकीच जरूरी आहे. तोही जोवर मागासलेला राहील तोवर त्याला पुढे आणण्यासाठी आमच्या पक्षाने झटणे अवश्य आहे.

६. मजूर वर्ग- ह्यात बाजार भावाप्रमाणे वेतन घेऊन अंगमेहनत करणारेच नव्हे तर बुद्धिचातुर्य लढविणारे वकील, डॉक्टर ह्यांचाही समावेश होण्याचा संभव आहे. परंतु हा दुसरा वर्ग आपल्या विद्याबळामुळे आपल्या गरजेपेक्षा जास्ती धनसंचय करून अधिकारपदावरही जाऊन सहज बसतो. इतकेच नव्हे तर बहुजन समाजाचे पुढारीपणही त्याच्याच वाट्याला येते. आणि मग सगळीच कालवा कालव होते. असे लोक तत्त्वत: मजूर असले तरी वस्तुत: मागासलेले नसल्यामुळे त्याच्या हितसंबंधाची जोपासना करण्याची जबाबदारी दुर्बळ जनपद पक्षावर न ठेवता त्यांच्या स्वत:वरच ठेवणे अगदी योग्य होईल. बाकी उरलेल्या ख-या आणि अंगमेहनती मजुरांची दाद तर आमच्या पक्षाशिवाय इतर कोठेच लागणे शक्य नाही. बाजार भावाप्रमाणे आपल्या मजुरीचे दर, कामाची वेळ, विश्रांतीच्या अटी, बाळपण, आजारीपण, म्हातरपण, कौटुंबिक आणि स्त्रीपणाच्या आपत्ती इत्यादी कारणावरून उदभवणारे हक्क वगैरेची मागणी करण्यास हा वर्ग मोकळा आहे, ह्याविषयी तर प्रश्नच नाही. पण ही मागणी राष्ट्राचे समवाय-हित सांभाळून ती पूर्ण रीतीने वसूल करून घेण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी येईल अशी संघशक्ती त्यांच्यामध्ये आणणे हे ह्या पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे जरूरीचे आणि कठीण असे कर्तव्य आहे. तथापि, हा पक्ष म्हणजे केवळ मजूर पक्षच नव्हे, तो जनपद पक्ष असल्यामुळे सर्व राष्ट्राचा पक्ष आहे. मजूर डोईजड झाल्यास त्याची समजूत  करण्याचाही अधिकार सर्वापेक्षा ह्या पक्षाला जास्त आहे.

७. अस्पृश्यवर्ग- अस्पृश्यपणामुळे हा वर्ग मागासलेला आहे, इतकेच नव्हे तर चिरडला गेला आहे. धर्माची, परंपरेची, रूढीची अगर दुसरी कोणतीही खरी खोटी कारणे न सांगत बसता ह्या वर्गाची अस्पृश्यता व असाह्यता पूर्णपणे नष्ट करून त्यांना अगदी समान दर्जाने बहुजन समाजात एकजीव करणे हे ह्या पक्षाचे केवळ पवित्र काम आहे. ते तातडीने केले तरच धडगत आहे. पुष्कळशी संधी वायफळ वादात, ढोंगी ठरावात आणि मतलबी सहानुभूतीत अगोदरच दवडली गेली असल्यामुळे त्या वर्गातील काही व्यक्तींना साहाजिकपणे भलतेच वळणही लागून चुकले आहे. ही ठेच खाऊनही आमच्या पक्षाचे डोळे उघडले नाहीत तर ते कायमचेच झाकलेले बरे, असे म्हणण्याची पाळी जवळ येऊन ठेपली आहे.

८. स्त्रीवर्ग- चालू राज्यक्रांतीत आमच्या देशातील स्त्रीवर्गाचे हाती काहीच लाभले नाही म्हणून आमच्या पक्षाने हताश होण्याचे कारण नाही. उलटपक्षी आमचा पक्ष विद्वानांचा नाही, वक्त्यांचा नाही, ओरडणारांचा नाही, म्हणून तो स्त्रीवर्गाला विसरणारांचा आहे असे थोडेच होणार आहे! स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा. त्यांची हयगय करू तर पाळण्यातच आमचे थडगे डोलू लागेल हे आम्ही जाणून आहो.

बहाई समाजाचा ब्राह्मसमाजास संदेश

मुंबईच्या प्रार्थनासमाजाच्या ४३ व्या वार्षिकोत्सवाचा तिसरा दिवस सोमवार ह्या दिवशी सकाळी भजन झाले. सायंकाळी रा. रा. वि. रा. शिंदे ह्यांचे वरील विषयावर व्याख्यान झाले.

गेल्या शतकात राजा राममोहन रॉय ह्यांनी तुलनात्मक धर्मशास्त्राचा पाया घातला. त्यांनी प्रथम निरनिराळ्या धर्मांचे अध्ययनकेले. त्यामुळे आज आम्हाला युरोप किंवा अमेरिका येथील युनिटेरिअन अगर दुसरे कोणी उदारमतवादी लोक ह्यांच्याविषयी किंचित तरी आपलेपणा वाटतो. जपानने एकादे नवीन जहाज तयार केले की, आपण त्याची चौकशी करू लागलो. परंतु इराणसारख्या जवळच्या देशात आपल्याच सारख्या आर्य लोकांनी अनेक प्रकारच्या अडचणी सोसून जी उदार धर्माची पताका फडकविली आहे त्याची आम्हाला काही दाद नसावी व बहाई धर्मामध्ये काही उदार तत्त्वांचा समावेश आहे किंवा कसे ह्याविषयीही आम्हाला शंका असावी हे आश्चर्याचे आहे. आम्ही व्यवहारात दुस-या मनुष्याचे विशेष विचार न करता, सहज उणे काढून जातो, सत्यासत्यतेविषयी फारसा विचार करीत नाही, विशेष वादाच्या प्रसंगी प्रतिपक्षाच्या मन:स्थितीचा विचार करून ज्याप्रमाणे वर्तमानपत्रकर्ता लेख लिहिण्याच्या भानगडीत पडत नाही आणि सहज तडकाफडकी प्रतिपक्षाचे उणे काढतो व वर्मी लागणारे बाण अनेक प्रसंगी विनाकारण सोडतो त्याप्रमाणे ज्या देशातील लोक ४०-५० वर्षांपूर्वी थोड्याशा भांडणावरून सहज डोके उडवीत असत. जेथे भर रस्त्यावर खून होणे व रस्त्यातून रक्ताचे पाट वाहणे म्हणजे अगदी साधारण प्रकार होऊन गेला होता, सारांश, जेथील लोक इतके कडवे होते, त्या लोकांमध्ये उदार धर्माची पताका रोवली जावी, ब्राह्मधर्माइतका जरी नाही तर त्याच्यासारखा उदार भाग ज्यांच्या धर्मामध्ये दिसत आहे, ज्यांची मते, ज्यांचा उत्साह ज्यांची धर्मनीती पाहून शेकडो हजारो अमेरिकन लोक थक्क झाले आहेत युरोपातील कित्येक विद्वान लोकांचे ज्या चळवळीकडे लक्ष लागून राहिलेले आहे, त्या उदार धर्माच्या चळवळीचा आम्हास पत्ता असू नये हे ठीक नव्हे.

अशी प्रस्तावना करून त्यांनी बहाई धर्माचा इतिहास सांगितला व अखेरीस आज त्या धर्माची काय स्थिती आहे हे सांगताना ते पुढे म्हणाले:

बहाई धर्मामध्ये ब्राह्म धर्माची उदार तत्वे सर्वाशांने सापडणे शक्य नाही. त्या धर्माचा धर्मग्रंथासंबंधाने आग्रह नाही. बहाई लोकांनी राजकारणात पडू नये अशी त्यांच्या विद्यमान गुरूंची आज्ञा आहे. जी राजसत्ता चालू असेल ती मान्य करून तीस पोषक अशा चळवळी करावयाच्या. सर्व देशांतील सर्व धर्मांतील दुजाभाव, परकेपणा गेला पाहिजे. आपण सर्व एका पित्याची लेकरे आहोत हा भाव विशेष रीतीने जागृत होऊन सर्वत्र बंधूप्रीती नांदू लागली पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष आहे. मात्र त्यांचा गुरूकडे विशेष कल आहे. कधी कधी १९ ही संख्या पवित्र मानण्याकडे विशेष कल असतो. त्यांच्या हल्लीच्या पुढा-याचे असे म्हणणे आहे की, साधारण माणसे ही लाकडाप्रमाणे आहेत व धर्मगुरू हा विस्तवाप्रमाणे आहे. कित्येक माणसे दगडाप्रमाणे असतात. लाकडाचा अग्नीशी संयोग झाला म्हणजे अधिक भडका होतो पण तोच अग्नी दगडावर पडला म्हणजे काही वेळाने विझून जातो. आणि व्याख्याते म्हणतात की, आमच्यातील काही माणसांमध्ये पाण्याचा गुणधर्म असतो. म्हणजे विस्तवावर पाणी पडताच तो प्रज्वलित अग्नी बापडा विझून जातो, त्याप्रमाणे काही माणसाच्या संयोगाने दुस-याच्या ठिकाणी पेटलेली धर्मज्योतही विझून जाते. परंतु ह्या धर्मामध्ये एका व्यक्तीला धर्मगुरू म्हणून विशेष मान द्यावयाचा हा जरी आमच्या दृष्टीने गौणपक्ष असला तरी साधूसंतांना मान देणारे व त्यांच्याविषयी आदर दाखवतो असे म्हणणारे जे आम्हीते आमच्या स्वत:च्या समाजातील ज्या थोर पुरूषांच्या ठायी धर्मज्योत अत्यंत प्रज्वलित होती त्यांचा कोठे सहवास करून घेत असतो? आमचे राजा राममोहन रॉय, महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर, आमचे ब्रह्मानंद केशवचंद्र सेन ह्यांच्या विचारांशी यांच्या चरित्राशी आम्ही कितीसा संबंध ठेवीत असतो व आमच्या स्वत:च्या आचरणाच्या द्वारे यांच्याविषयी आम्ही कितीसा आदर दाखवीत असतो?

आज ह्या बहाई लोकांत एकोपा आहे. परस्परांविषयी प्रेम व आदर आहे, सर्वांविषयी सहानुभूती आहे, ह्यांची राजनिष्ठा प्रबल आहे. ह्या सर्व गोष्टी आम्ही लक्षात घेण्यासारख्या आहेत.

बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?

वुडसाइड रे. कार्लाईल

इंग्लंडच्या दक्षिण किना-यावर ब्रिडपोर्ट नावाचा एक टुमदार गाव आहे. त्याचे पूर्वेस तीन मैलांवर बर्टन नावाचे एक सुमारे ७०० वस्तीचे चिमुकले खेडे आहे. खेड्याबाहेर गावकुशीत एका जुन्या पण स्वच्छ इमारतीत मी एक शाळा पाहिली. तिच्या भोवताली निर्मळ, साधे पण विस्तीर्ण पटांगण होते. येथून एका हाकेवर टेकडीच्या पलीकडे समुद्र पसरला होता. शाळेत शिरताना एक लहानशी देवडी लागली. तीत मुलांच्या टोप्या ठेवण्यास भिंतीत खुंट्या ठोकल्या होत्या. खाली नंबर लावले होते. प्रत्येकाचा नंबर ठरलेला होता. शाळेची मधली मोठी मुख्य खोली ६० फूट लांब व २० फूट रूंद होती. तीत मुलांच्या वयाच्या मानाने केलेले दोन मोठे वर्ग बसले होते. मुलांची संख्या ७१ व मुलींची ६७ होती. ती सर्व मिळूनच बसल्यामुळे मुलगे व मुली अशा फाजील जातिभेदास ह्या शाळेत कोठे जागा राहिली नव्हती. माणसांच्या निरनिराळ्या जातिभेदास तर ह्या बेटातूनच हद्दपार केले आहे, हे येथे नव्याने सांगावयास नकोच.

शाळेत गेल्यावर प्रथम भिंतीवर ख्रिस्ताची मोठमोठी चित्रे अगदी लहान मुलांसही कळतील अशी दिसली. समोरच्या तसबिरीत तो काही लहान मुलांस आपल्या जवळ घेत होता. खाली हे त्याचेच वाक्य होते. ‘लहानग्यास मजकडे येऊ द्या. स्वर्गीय राज्य अशांचेच आहे.’ भोवताली त्याच्या इतर परोपकाराचे प्रदर्शन केले होते. शिवाय भिंतीवर चंद्र, चौक, कोन, गोल इ. अनेक रंगांच्या निरनिराळ्या आकृती जागोजाग लावल्या होत्या. मधून खंडाचे व देशाचे नकाशे कायमचे सोडले होते. शिवाय काही प्रसिद्ध पुरूषांचे व स्थळांचे लहान मोठे फोटो टांगले होते.

हेडमास्तर हुषार, दक्ष व अत्यंत आदरशील दिसले. त्यांची पत्नीही शाळेत शिकवीत होती. व दुसरी एक मदतनीस शिक्षकीण होती. वहिवाटीप्रमाणे मुलांच्या सात इयत्ता होत्या, पण शिक्षकांच्या अनुभवाप्रमाणे, शिक्षणाच्या सोयीप्रमाणे व मुलांच्या हुषारीप्रमाणे मुलांचे खरे वर्ग चारच होते.

वर्षातून एकदोनदा शाळेत येणा-या उंटावरील शहाण्या इन्स्पेक्टरांची मास्तरांच्या मागे कोरडी पिरपिर फारशी दिसली नाही. त्यास व्यक्तिस्वातंत्र्य बरेच आहे.

६ व्या अगर ७ व्या वर्षी मुलांचा शाळेतील नियमित अभ्यासक्रम सुरू होतो. त्याच्यापूर्वीही काही अर्भके शाळेत खेळावयास येतात. गरीबांची मुले १५ व्या वर्षी शाळेतून बाहेर काम पाहण्यास जातात. शाळा खेड्यातील असल्यामुळे मुलामुलींच्या शिक्षणात काही फरक दिसला नाही. मुलांपेक्षा मुली मोठ्या दिसल्या. कारण मुलास आपला धंदा शिकण्यास लवकर शाळेतून सुटण्याची घाई असते. शाळेतून बाहेर पडल्यावर ५-६ वर्षांत कोणता तरी विशेष धंदा शिकून स्वत:चा निर्वाह साधावा लागतो. मुलीस तितकी घाई नसते. शाळा सकाळी ९ पासून १२ पर्यंत व दुपारी २ ते ५ पर्यंत उघडी असते. दररोज २ प्रमाणे वर्षातून निदान प्रत्येक मुलाच्या ४०० तरी हजि-या असल्या पाहिजेत.

बाजूच्या एका खोलीत लहान मुलांचा वर्ग अगर बिनयत्ता होती. ह्यांच्या स्लेटीवर खिळ्याने कायमच्या आडव्या-उभ्या रेघा मारल्या होत्या. अक्षरे व आकडे लिहावयाचे ते प्रत्येक चौकात एक असे लिहीत. त्यामुळे लहानपणापासूनच प्रमाणशीर, व्यवस्थेने व रांगेने लिहिण्याची सवय लागे. ह्याचा परिणामही मला लवकरच दिसला. काही लेखी परीक्षेच्या उत्तरांचे कागद मी पाहिले. कागदाचे छापलेले व आखलेले ठरीव नमुने होते. उत्तरे इतक्या व्यवस्थेशीर रीतीने लिहिली होती की परीक्षेच्या घाईत ती लिहिली असावीत हे संभवनीय वाटेना. पण ती तशी लिहिली होती ह्यात शंका नाही. कोठेही डाग अगर ठिपका दिसला नाही. तीन चार वर्षांनी तीन अर्भके लाकडाच्या निरनिराळ्या आकृतींच्या तुकड्यांनी घरे बांधून एका बाजूस खेळत होती.

एका मोठ्या कपाटात शाळेची म्युझिअम होती, ती अशी: वरच्या खान्यात साबण तयार करण्याची सामग्री, क्षार, तेले वगैरे व निरनिराळे साबणांचे मासले, खालच्या खान्यात दगडी कोळसा व इतर उद्भिजे, दुस-या बाजूस साखरेची सामग्री, उसाचे कांडे, मक्याचे कणीस इ. पासून तयार झालेल्या साखरेपर्यंत रूपांतरे, त्याच्या खाली रेशमी किड्यांच्या वेष्टनापासून तो तयार केलेल्या सुंदर लडीपर्यंत रूपांतरे, दुस-या बाजूस शेजारच्या कॉगडन डोंगरावर सापडलेले जुन्या रोमन लोकांचे दात, हाडे, थडग्यातील भांडी, हत्यारे वगैरे; खालच्य खणात धान्ये, बीजे आणि कापसापासून तो कापडापर्यंत गिरणीतील रूपांतरे, दुसरीकडे भूमितीचे ज्ञान करून देण्यास निरनिराळ्या आकाराचे लहान मोठे ठोकलळे ठेविले होते. एका तावदानी पेटीत शिसपेन्सिलीचे पर्याय व दुसरीत पोलाद व तांब्याच्या पट्टीपासून तो टाकाच्या टोकापर्यंत कृती दाखविली होती. एका बाजूस चित्रांचे काही कित्ते ठेविले होते. त्यांत खेड्यातील दोंदील पाटीलबुवा व दरबारातील रणधीर सेनानी ह्यांचे तारतम्यदर्शक हावभाव हुबेहुब पण साध्या रेघांनी दाखविले होते. काही निरनिराळ्या घाटांचे गोंडस खोजे व मातीची इतर भांडीही होती. कपाटाखाली झाडाचे एक खोड कित्येक सहस्त्र वर्षापूर्वी भूगर्भामध्ये दडपून जाऊन साक्षात दगड बनलेले पाहण्यासाठी ठेविले होते, इ. सामग्रीच्या साहाय्याने मुलांच्या कुवतीप्रमाणे खालील विषयांवर गोष्टीच्या रूपाने सप्रयोग व साक्षात पदार्थ दाखवून मुलांचे लक्ष वेधले जाई:

बिनयत्ता १,२,३ री इयत्ता ४,५,६,७ वी इयत्ता
ऍपल फळ, एंजिन, सेफ्टी लँप, दगडी कोळसा, मीठ,
सूर्यकमळ, कापड, घड्याळ, वाफेचे यंत्र, पंप,
मध, मधमाशी, छत्री, बेडूक, मेघवृष्टी,
साबणस चामडे, काच, भुई, ‘आमची निशाणे’,
खेड्यातील बाग, झाडाचे भाग, गलबते, समुद्र,
ससा, पोस्टशिपाई, आगकाड्या, इ.इ. गवत, तारायंत्र,
ऑफिस, दीपस्तंभ,   इ. इ.
बर्फ, पाऊस.    

कोणत्याही मुलास फी मुळीच पडत नाही. इतकेच नव्हे तर पुस्तके, वह्या, पाट्या व पेनादेखील शाळेतूनच मिळतात. शाळा सुटताना शाळेच्या वस्तू शाळेतच व्यवस्थेने मांडून ठेवण्याची जी कवाईत होते ती प्रेक्षणीय असते. ह्याशिवाय प्रत्येक कौंटीत २० मुलांच्या आणि २० मुलींच्या स्कॉलरशिपांची दरसाल गुणांप्रमाणे वाटणी होते.

मुलांचा शाळेत जो अभ्यास होतो तेवढाच. घरी धडे बिलकूल देत नाहीत. घरी धडे घोकीत बसलेला एकही कोवळा विद्यार्थी मला अझून तरी दिसला नाही. अलीकडे येथे सर्व शाळांतून ड्रॉईंगवर फारच मेहनत घेतली जाते. १२-१४ वर्षांच्या मुलांनी काढलेल्या चित्रांची सुबकता पाहून मन थक्क झाले. चित्रकलेने हातास कुशलता, डोळ्यांस मार्मिकता व चित्तास रसिकता येते. म्हणून ह्या कलेच्या भौतिक, मानसिक व नैतिक गुणांची ह्या लोकांस मोठी चहा वाटत आहे. निदान कमीत कमी १०-१२ तरी चित्रे जीत नाहीत अशी मला ह्या देशात एकही झोपडी अद्यापि आढळली नाही. शेवटी मुलांकडून काही गाणई म्हणून दाखविली. आरंभी हारमोनिअममधून गाण्याचा सूर मास्तर सांगे. नंतर सर्व मुले अशी ठेक्यात म्हणत की जणू एक बँडच. ह्यावरून लहानग्यांसही सुरांची माहिती झालेली दिसली. बायबलाची साधारण माहिती, कोणत्याही विशिष्ट पंथाची मते अगर धर्मवेड मुलांच्या मनात न भरविता. शाळेतूनच देण्यात येते.

शाळा सुटण्याच्या पूर्वी शिक्षकाने प्रार्थना केली. नंतर ‘हे द्याळू पित्या’....अशी आर्थरवाने ह्या अर्भकांची प्रार्थना सुरू झाली. शेवटी प्रभूप्रार्थना संपून तथास्तू (Amen) म्हटल्यावर माझे डोळे उघडले. ते केव्हा मिटले होते हे मला कळलेच नव्हते.

प्रार्थना आटपल्याबरोबर प्रत्येक मुलगा लष्करी थाटाचा सलाम करून आपली टोपी व्यवस्थेने घेऊन बाहेर पडला. व्यायामशाळेत मुलांस लष्करी व साधे ड्रील आणि डंबेल्स शिकवितात. शाळा सुरू असता मुलांस वरचेवर ५-१० मिनिटे पटांगणात खेळावयास सोडतात.

कोणत्याही मोठ्या शहरापासून दूर व समुद्रकाठच्या डोंगराळ प्रदेशातील ह्या क्षुद्र खेड्यातील शाळेची ही व्यवस्था पाहून माझे डोक्यात विचारांचे व मनात विकारांचे काहूर माजले ह्यात काय नवल बरे! नसते तर मात्र नवल खरे!!

  1. बंदिस्त बळीराजा
  2. बंगालचीसफर
  3. बंगलूरच्या रस्त्यातील एक फेरी
  4. प्रेरणा आणि प्रयत्न
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
Page 18 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी