1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

सार्वजनिक कर्मयोग नित्य व नैमित्तिक उपासनेच्या वेळी केलेले उपदेश

यस्त्विंद्रियाणि मनासा नियम्यारभ्यतेर्जुन|
कमेंद्रियै: कर्मयोगमसक्त: स विशिध्यसे||
-भगवदगीता अध्याय ३, श्लोक ७.
प्रेमसूत्र दोरी| नेतो तिकडे जातो हरी||
-तुकाराम

कर्माचे साम्राज्य सर्वत्र आहे, जेथे जेथे म्हणून जीवन आहे तेथे तेथे कर्म  आढळतेच. सर्व जीवमात्राचे ते लक्षण आहे, इतकेच नव्हे तर त्यावाचून जीवनाची कल्पनाही होऊ शकत नाही. फार काय तर जड पदार्थात दृढता, स्थिरता इत्यादी जे गुण दिसतात आणि बाहेरच्या शक्तीशी त्या पदार्थाकडून जो विरोध घडतो त्यावरून निर्जीव वस्तूतही उघड नसले तरी, अंतस्थ कर्म चाललेलेच दिसेल. पण, इतक्या खोल न जाता आपण जर नुसते सजीव सृष्टीपासून पुढे निरखू लागलो, तर सर्वत्र कर्माचा अबाधित विस्तार दिसतो.

वनस्पतीसृष्टीत अगदी प्राथमिक कोटीच्या लव्हाळ्यापासून तो सुंदर विस्तारलेल्या मोठ्या वटवृक्षापर्यंत ज्या असंख्य घटना आहेत, त्या सर्वांचा आपल्या अल्पजीवन कालात आत्म मरणाचा व्यापार सतत चालू असतो. तसेच केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानेच दिसणा-या जीवाणूपासून तो वनात उद्दामपणे हिंडणा-या पशुपती सिंहापर्यंत प्राणिगणांचाही तोच उद्योग अहर्निश चालू असतो. स्वत:चा घट कायम राखणे, तो वाढविणे आणि पुढे पुढे त्याचा वंशविस्तार करणे हा निसर्गदत्त व्यवहार सर्वात बहुतेक सारखाच. तहानभुकेच्या रूपाने प्रकृतीचा बडगा पाठीवर बसला की पुढे हलावे, नाही तर तेथेच स्वस्थ बसावे, एवढाच त्यांचा अधिकार. माणसांपैकीही पुष्कळांची ह्यावर मजल गेलेली नाही. हे कर्म प्राकृत अथवा तामसिक समजावे. कारण ज्यांच्याकडून ते होत असते ते त्याच्या इच्छेवर थोडेच अवलंबून असते! प्रकृतीच आपला कडक अमल चालविण्यासाठी आपल्या योजनेस त्या बिचा-यांच्या इच्छेचे स्वरूप देऊन तितके कर्म बिनतक्रार करून घेत असते.

असे हे गाडे चालले असता उत्क्रांतीची दुसरी मजल येते. प्रकृतीने जवर अत्यंत कष्टाने घडवून ठेविलेल्या काही उत्कृष्ट घटात (आतापर्यत गूढ असलेल्या) आत्मतत्त्वास ह्यानंतर जागृती येते. पण जरी ही जागृती आली तरी प्राकृत कर्मास काही विराम पडत नाही. अनादी कालापासून घटाला जे कर्माचे वळण लागले असते त्यातच आत्माही भ्रमण पावू लागतो. कुंभाराने आपल्या काठीने काही वेळ चाक फिरवून काठी काढून घेतल्यावरही ते चाक जसे पुष्कळ वेळ फिरून कुंभाराचे इष्ट कार्य करते, किंवा एकाद्या गिरणीतल्या इंजिनाची शक्ती जवळच्या जड फ्लाय व्हीलमध्ये जाऊन इंजिनच्या शक्तीस जशी फ्लाय व्हीलच्या गतीची भर पडते, त्याप्रमाणेच हा नुकताच जागा झालेला आत्मा प्राकृत कर्मातच आपल्या भ्रांतकर्माची भर टाकीत असतो, ह्यामुळे ‘मी हे आज मिळविले, हेही पुढे मिळवीन- हे तर माझे आहेच, उद्या तेही दुसरे धन माझेच होईल, हा पहा वैरी मी मारिला, इतरांनाही चित करीन, मी राजा आहे, मी भोगी, मी सिद्ध, बलवान, सुखी, मी मोठा कुलीन,-कोण मजसारखा आहे,-मी स्वत: भोगतो, दुस-याला पण देतो,- ह्या प्रकारचा गीतेत (अ. १६ श्लोक १३-१५) सांगितलेला “अज्ञानविमोहित” प्रकार होतो. फ्लाय व्हीलने गिरणीत जसे अधिक कार्य होते तसे भ्रांत आत्म्याच्या कर्माने प्रकृतीतही अधिकच घडामोड होते. हे राजसी कर्म होय. आत्म्याच्या विकासात ह्याची जरूरीच आहे.

म्हणून शहाण्यांनी ह्याची विनाकारण अवहेलना करू नये. सात्विक कर्माकडची वाट आत्म्याला ह्यातूनच आहे...” ‘कर्माचा आरंभ केल्याविना नैष्कर्म्य प्राप्त होणे नाही’ (गीता अ. ३ श्लोक ४) म्हणून ह्यात गुंतलेला ‘पुरूष’ आपल्या इष्ट वाटेवरच आहे असे समजावे.

पण, ह्या राजसी कर्माचे सर्व चलन प्रकृतीकडून मिळाले असल्यामुळे ह्याचे पर्यवसान दोन रीतीने होण्याचा संभव आहे. स्वत:ची शक्ती नसल्यामुळे कुंभाराचे चाक जसे काही वेळाने बंद पडते तसेच राजसी पुरूषाला प्रकृतीकडून जे चलन मिळाले असते ते बंद पडते आणि वृद्धावस्थेत त्याला शीण व औदासिन्य ही शिल्लक उरतात. आणि त्याच्या शरीराचे अवसान होण्यापूर्वी त्यास शोचनीय नैष्कर्म्य प्राप्त होते. हा एक प्रकार. दुसरा असा की, राजसी मनुष्यास काही अंशी स्वप्रयत्नाने व काही अंशी ईशप्रसादाने वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे, आपण करतो ती सर्व कृत्ये किती बालिश आहेत व आपल्या प्रवृत्ती वस्तुत: किती व्यर्थ आणि विवश आहेत, ह्याची खात्री होऊन तो तटस्थ आणि निष्कर्म होतो. गीतेतील दुस-या अध्यायातला ईश्वरी उपदेश ऐकून अर्जुनाची हीच स्थिती झाली. किंवा आपल्या विवेक सामर्थ्याने विश्वव्यापाराचे विज्ञान झाल्यावर वेदांत्यास अगर ब्रह्मज्ञान्यास जी विरक्ती आणि विवृत्तदशा येते तीही ह्याच प्रकारची.

ही वर सांगितलेली दुस-या प्रकारची निष्कर्म दशा प्राप्त झाली म्हणजे आपल्या वरचा प्रकृतीचा जुलूम अगदी नाहीसा होतो. आत्मा पूर्ण जागृत व स्वतंत्र होतो. ह्या उज्ज्वल जागृतीस कोणी आत्म्याचे पुनर्जन्म म्हणतात. म्हणून आम्हास द्विज ही संज्ञा येते.

पण अशा रीतीने आत्म्यास पूर्ण ज्ञान व स्वातंत्र्य प्राप्त झाले म्हणजे तो कृतकृत्य झाला असे नव्हे तर उलट आतापासूनच त्याच्या कर्तव्यास आरंभ होतो. आतापर्यंत जी त्याने कर्मे केली ती यंत्राप्रमाणे केली. ह्यावर त्याला एकाद्या हुशार आणि विश्वासू नोकराप्रमाणे कामगिरी बजावयाची असते. पण तो पूर्ण स्वतंत्र असल्यामुळे ही नोकरी पत्करणे न पत्करणे त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. वेदांती असतो तो अवश्य तितकी प्राकृत कर्मे केवळ निरूपायाने व उदासीनपणे करतो. पण जो भक्त असतो तो-

मने सहित वाचा काया| अवधी दिली देवराया||

हा तुकारामाचा मार्ग पत्करतो; केवल ज्ञानापलीकडे वेदांत्यापासून इतरांस काहीच फायदा होत नाही. पण भक्त आहे तो ईश्वरी नोकरी म्हणून परार्थास आपल्यास वाहून घेतो. ही नोककरी म्हणजे अगदी खुशीचा सवदा आहे. येथे कसली जबरदस्ती नाही. वाटल्यास करावी, वाटेल तितकी करावी! पण ब्रह्मज्ञान्यांनीही हे लक्षात ठेवावे की, स्वातंत्र्याचे जोरावर जरी त्यांनी देवाची कामगिरी सोडली तरी प्रकृतीची गुलामगिरी त्यास करावी लागणारच. एकपक्षी खुशीची नोकरी, उलट घनघोर गुलामगिरी ह्यांत शहाण्यांनीच निवडावे. बरे, नोकरी जी आहे तीही नुसती खुशीची आहे, इतकेच नव्हे तर तिचे पर्यवसान अखेर मैत्रीत होणारे आहे. नोकर आणि प्रभू ह्यांमध्ये जे सूत्र आहे ते प्रेमसूत्र आहे. नोकरी करता करता आपल्यास इतकी बढती मिळणार आहे की, आपण ईश्वराचे अगदी सके बनू. ज्ञानयोग साधून संसारातून उठावे आणि प्रकृतीचे दास्य करावे की कर्मयोग साधून ईश्वराचे मित्र होऊन पृथ्वीवर स्वर्ग आणावा ह्याचा निकाल स्वतंत्र माणसांनी करावा.

हा कर्मयोग साधणे आमच्या समाजाचा धर्म आहे. संसारात आनंदाने राहणे आणि तदंगभूत कौटुंबिक, सामाजिक, राजकीय इ. जी अनेक कर्मे असतील ती केवळ जडहित साधण्याच्या हेतूनेच नव्हे, तर ईश्वरी योजना असे समजून त्याची सेवा जाणूनबुजून करण्याचे हेतूने करणे म्हणजे वरील कर्मयोग होय. विश्वात ही जी अवाढव्य योजना आहे, ती आपल्या इच्छेवर अवलंबून नाही किंवा ती पार पाडण्याची आपल्यात शक्ती नाही, तरी ह्या योजनेस अंशत: साधनीभूत होणे किंवा तटस्थ राहणे हे आपल्या इच्छेवर आहे.

सत्कर्म कोणते व दुष्कर्म कोणते ह्यांविषयीची प्रेरणा आणि ते करण्याची स्फूर्ती ह्या प्रत्येक मानवी अंत:करणात होण्यासारख्या आहेत व त्या तशा नित्य होतातही. धर्माधिकारी व उपदेशक ह्यांचे जर काही काम असेल तर ते इतकेच की मानवी अंत:करण व ह्या प्रेरणांचा उगम जो ईश्वर ह्यांमध्ये ज्या काही उपाधी असतील त्या दूर करून आत्म्याचा ईश्वराकडचा मार्ग सुगम व जवळचा करावा. ह्या उपाधींपैकी स्वत: आपणच एक उपाधी होऊन राहू नये.

ज्ञानाचे भक्तीत आणि भक्तीचे ह्या कर्मयोगात नेहमी पर्यवसान होत आले आहे हे धर्माच्या एकंदर इतिहासावरून स्पष्ट दिसून येते.

साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे

(केशवचंद्र सेन ब्राह्मसमाजात आले त्यावेळी) हिंदुस्थानात अवघ्या १२ ठिकाणी ब्राह्मसमाजाच्या शाखा होत्या. त्या साधारण ब्राह्मसमाज स्थापन झाल्या वर्षी म्हणजे १८७८ (मे महिन्याच्या १५ तारखेस) साली १२४ शाखा हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांतून व भाषांतून झाल्या. ह्या तिस-या पुढा-याने केवळ संस्थेच्या दृष्टीनेच समाजाची अशी असामान्य वाढ केली असे नव्हे, तर त्यानेच ह्या धार्मिक सुधारणेस हिंदुस्थानात प्रत्यक्ष सामाजिक जीवनाचे स्वरूप दिले. त्याच्यावेळी हिंदुस्थानाच्या निरनिराळ्या प्रांतांत इतरही स्वामी रामकृष्ण, दयानंद सरस्वती, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा जोतीबा फुले, ज. रानडे, तेलंग इत्यादी धार्मिक व सामाजिक सुधारक होते. पण ते केवळ पुरुषांच्याच सभांकरिता आणि त्यांच्याशीच वादविवाद करून सुधारणा घडवू पाहात, पण केशवचंद्राने आबालवृद्धांना, बायकापुरुषांना, सुशिक्षितांना, फार तर काय, स्वकीय परकीयांनाही हालवून जागे केले व त्यांचा ब्राह्मसमाज स्थापिला !

मग इतक्या प्रभावशाली पुढा-याच्या उलट साधारण ब्राह्मसमाज नावाची अधिक विकसित स्वरूपाची ब्राह्मसमाजाची तिसरी आवृत्ती का काढावी लागली ? हा मोठा चित्ताकर्षक प्रश्न आहे खरे ! कोणत्याही चळवळीच्या आरंभी एकाच प्रेरक विभूतीचे प्राधान्य असते. तसेच ब्राह्मसमाजाच्या पहिल्या ५० वर्षांत बहुतेक एकतंत्रीपणाच होता. मग त्या एकतंत्राचे अधिष्ठान राजा राममोहन रॉय असो, देवेंद्रनाथ असो किंवा केशवचंद्र असो, एका धीरोदात्त व्यक्तीने हालवावे व इतरांनी हालावे असा प्रकार होता. पण ब्राह्मसमाज ही प्रधानतः स्वातंत्र्यजनक संस्था होती. अर्थात ह्या ५० वर्षांत ब्राह्मसमाजातच नव्हे तर अखिल भारतात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विचारांच्या (ता. ८ एप्रिल १९२८ रोजी पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळापुढे जे विचार प्रदर्शित केले त्याचा सारांश ‘विजयी मराठा’ ह्या पत्रात आला आहे. त्यातील काही भाग. सुबोध पत्रिका, २९ एप्रिल १९२८.

स्वातंत्र्याची प्राणप्रतिष्ठा झाली होती. ह्या पूर्वतयारीचे श्रेय राममोहन, देवेंद्र आणि केशवचंद्र आणि त्यांच्या प्रभावळीतील निकट अनुयायांस देणे अवश्य आहे. पण ५० वर्षांनंतर ह्या स्वातंत्र्योन्मुख चळवळीची सर्व सूत्रे एकाच हातात राहणे शक्य नव्हते, मग तो हात कितीही पराक्रमी असो, की पूज्य असो, की पवित्र असो ! वरवर पाहणा-यास साधारण ब्राह्मसमाजाची स्थापना कुचबिहारच्या लग्नाच्या वादामुळे झाली, असे वाटणे साहजिक आहे. केशवचंद्रांनी ब्राह्मवधूचे वय किमानपक्षी १४ वर्षांचे असावे, असा आपणच सरकारी कायदा पास करून घेतला आणि स्वतःचीच मुलगी जेव्हा कुचबिहारच्या तरुण राजकुमारास दिली, तेव्हा तिचे वय १४ वर्षांहून किंचित कमी आणि त्या राजकुमाराचे वय १८ वर्षांहून कमी होते, म्हणून घनघोर वाद उत्पन्न झाला. इतकेच नव्हे तर त्यामुळेच त्यांच्या कित्येक अनुयायांनी त्यांचे पुढारीपण झुगारून देऊन आपली ब्राह्मसमाजाची निराळी शाखा काढली हे खरे, परंतु ही लढाई केवळ व्यक्तींची नसून तत्त्वांची होती. मताप्रमाणे वागणूक झालीच पाहिजे. मग ती व्यक्ती कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुम् समर्थ केशवचंद्र झाली म्हणून काय झाले ! प्रश्न केवळ ब्राह्म मताचाच नव्हता, तर त्याच्या अनुष्ठानाचा होता.

शिवाय आतापर्यंत समाजाचे कार्य केवळ भावना आणि प्रेरणा ह्या दैवी तत्त्वांवरच चालले होते. सर्वांची मते घेऊन युक्तायुक्ततेचा विचार करून एकादी कार्यपद्धतीची सनद आखण्यात आली नव्हती. त्यामुळे ह्या वादाला अत्यंत कडू व तीव्र स्वरूप आले आणि शेवटी स्वातंत्र्य तत्त्वाचे शरीर जो सनदशीरपणा त्याचाच विजय झाला. आणि कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये प्रचंड जाहीर सभा करून केशवचंद्राच्या विरुद्ध साधारण ब्राह्मसमाजाची जोरदार स्थापना झाली ! त्या गोष्टीला आज ५० वर्षे झाली.

ह्यानंतर ब्राह्मसमाजात स्त्रिया, तरुण, लहान मुले, वृद्ध, विद्वान गृहस्थ आणि कामकरी वर्ग ह्या सर्वांचा समान दर्जाने कसा प्रातिनिधिक तत्त्वाने समावेश होऊ लागला आणि हिंदुस्थानभर ह्याच शाखेचा विस्तार केशवचंद्राच्या नवविधान नावाच्या शाखेहूनही कसा अधिक झाला ह्याचे सविस्तर वर्णन रा. शिंदे ह्यांनी केले. नंतर ते म्हणाले, ब्राह्मसमाज व बौद्ध धर्म ह्यांतील एक फरक ध्यानात ठेवण्यासारखा आहे. ब्राह्मधर्मात मनुष्यजातीच्या सर्व धर्मपंथांचा समन्वय होतो, ही गोष्ट खोटी नाही. अर्थात ब्राह्मधर्म म्हणून एक निराळा नवाच धर्म आहे, असे मुळीच नव्हे. पण बहुतेक जुने धर्मपंथ—विशेषतः बौद्धधर्म हा व्यक्तिविशिष्ट स्वरूपाचा आहे. बौद्धधर्माचाही संघ प्रत्यक्ष सिद्धार्थाच्या काळापासूनच पुरातन आहे. तरी हा बौद्धसंघ म्हणजे केवळ भिक्षुसंघच म्हणजे केवळ संन्याशांचा संघच होता. गृहस्थाश्रमालाच मुळी बौद्धधर्मात गौण स्थान आहे. मग धर्माच्या कौटुंबिक व सामाजिक स्वरूपाकडे ह्या धर्मात दुर्लक्ष झाल्यास नवल काय ! आदले दिवशी प्रत्यक्ष धर्मानंद कोसंबी ह्यानीच बौद्ध धर्माची अवनती का झाली त्याची कारणे सांगताना स्पष्ट एक कारण असे सांगितले की, बौद्ध भिक्षू व प्रत्यक्ष गौतमबुद्धानेही जातिभेदाच्या मुळावर कितीही आघात केले तरी, बौद्ध गृहस्थाश्रमी ह्यांनी हिंदुस्थानात तरी ह्या जातिभेदाचे निरसन करावे तितके केले नाही, म्हणून शेवटी चार वर्णांच्या आता चार हजारांवर जातींची आणि असंख्य पोटजातींची बजबजपुरी ह्या अभागी देशात माजली आहे. ब्राह्मधर्माचे स्वरूप आणि कार्य ह्याचे उलट आहे. ह्या धर्मात जगद्गुरु तर नाहीच पण साध्या पुरोहिताचेही बंड नाही. ज्याचा तोच राहिला. धर्माच्या सर्व तत्त्वांना सामाजिक प्रत्यक्ष स्वरूप द्यावयाचे झाल्यास केशवचंद्रासारख्या प्रतिभाशाली गुरुलाही केवळ त्याच्या आसनावरून खाली आणावे लागते, इतकेच नव्हे तर आपल्या घरातील मावशीबाई व आजीबाई, तरुण बाबू व लहान बेबी ह्यांचेही सहकार्य सामाजिक अनुष्ठानात साधावे लागते. हे शेवटचे काम अत्यंत कठीण आहे आणि ह्याशिवाय तर कोणतीही शुद्धी अथवा कसलेही संघटन होणे केवळ अशक्य आहे. हा सामाजिक स्वर्ग जर कोणी गेल्या शतकात ह्या पृथ्वीवर आणला असेल, तर तो एका साधारण ब्राह्मसमाजानेच ह्यात मुळीच अतिशयोक्ती नाही.

सह्याद्रीवरुन-२

सोमेश्वर-आगंबे घाट

ता. १३ एप्रिल १९२५ रोजी तिसरे प्रहरी आम्ही कारकळ सोडले. कारकळहून सह्याद्रीचे अगदी पायथ्याशी सोमेश्वर नावाचे एक अगदी क्षुद्र खेडे आहे. ते सुमारे ३५-४० मैल लांब आहे. रस्ता अगदी चढणीचा असल्याने मोटारला तीन तास लागतात. वेळ सायंकाळची. रस्ता घाटाजवळचा. मग भोवतालच्या सृष्टीसौंदर्याला काय उणीव असणार! दुतर्फा जाड, उंच, सरळ खोडांचे व गर्द पालवीचे गगनचुंबी जुनाट वृक्ष अगदी एकाला एक लागून जणून एक भिंतीचा तटच करून उभे असल्यामुळे मोटारीला कड्याखाली घसरण्याची भीती नव्हती. जेथे असा तट नव्हता तेथे एकाद्या नदीचे किंवा ओढ्याचे पात्र व वरील पूल लागून देखावा बदले, त्यामुळे दृष्टीला वाव मिळून दूरच्या पर्वतशिखरांचे किंवा त्यांवरील जीर्ण देवालयांचे किंवा पडलेल्या किल्ल्यांचेही दर्शन घडे. रात्री ७|| वाजता सोमेश्वरी पोचलो. येथे मोटर कंपनी बदलते. घाटाची अगदी माथ्यावर आगंबे म्हणून एक लहान गाव आहे. तेथपर्यंत बैलगाडीचा रस्ता फार तर ७-८ मैलांचा असावा. पण तो चढण्याला बैलांना ६-७ तास लागतात. दिवसा छातीवरील वाट पाहून बैलांची छाती फुटते. म्हणून हा प्रवास अगदी मध्यान्ह रात्रीचे काळोखातच करावयाचा असतो. रस्ता कठीण, डोंगरातील उंच वळणावळणाचा, किर्रर्र झाडीमधला तरी पण श्वापदांची किंवा चोरांची वगैरे येथे कसलीच दहशत नाही. मात्र बैल प्रत्येक फर्लांग दोन फर्लांगाला थकून उभे रहात, त्यावरून चढण जास्त व घाटावरील बैलांपेक्षा घाटाखालच्या बैलांत कस कमी, हे उघड दिसे. खरोखर उत्र कोकण काय किंवा केरल देश काय जनावरांची मोठी करूणास्पद आबाळ सबंध पश्चिम किना-यावर चाललेली दिसते. भातशेतीला औताची गुरे लागत नाहीत, तरी पण दुभत्याच्या गाई, म्हशी व गाडीचे बैलही इकडे देशावरून नेहमी आणावयाचे असतात. पण त्यांना खाण्याला घालण्याची कोणीच तरतूद करीत नसल्यामुळे दुभत्याची गुरे लवकर आटून व ओढीची गुरे छाती फुटून अकाली मरतात. इतकेच नव्हे तर लहान वासरेदेखील दात येण्यापूर्वीच प्राण सोडतात! ही जुनी परंपरा ह्या परशुराम क्षेत्रात अबाधित चालली आहे. तरी गोरक्षणाची दिखाऊ चळवळ कीह पांढरपेशा देशभक्तांनी चालवलेली पाहून मात्र ती सहन करणे हा घाट चढण्याहूनही कठीण पडते.

अर्ध्या घाटातच ब्रिटिशांची हद्द संपून म्हैसूर संस्थानची हद्द लागते. हद्दीवर चोरट्यांचा सुळसुळाट असावयाचा; पण तोही नाही, ह्यावरून गुराप्रमाणे माणसांचाही शारीरिक कस ह्या प्रांतात कमीच दिसतो. पोलिसांना दुसरे काही काम नसल्याने नाक्यावरील जकातदाराने गाडीवर लगेज म्हणून बांधलेल्या माझ्या सायकलवर चापून चार्ज आकारला. तरी ती गोष्ट मनावर घेण्याइतकी तरतरी पोलिसामध्येही दिसली नाही.

मध्यान्ह रात्री १ वाजता घाटमाथ्यावरील आगंबे गावी आम्ही पोचलो. ह्या नावाचे मूळ रूप आग आंबे असे असावे अशी व्यत्पत्ती माझ्या बहिणीने विनोदाने केली. घाट चढताना ‘अग आई’ असा पुष्कळ वेला म्हणावयाचा प्रसंग येतो. तेवढ्यापुरती ही व्युत्पत्ती खरी आहे असे आम्हांला कबूल करावे लागले! ब्रिटिश आणि म्हैसूर ह्या दोन संस्थानांत ही घाटाची वाट विभागली आहे. जबाबदारीही विभागून नाहीशी झाली आहे. अतिवृष्टीमुळे नेहमी दुरूस्ती ठेवणे फार खर्चाचे आहे.

म्हैसूरचा दिवाळखोरी हिशोब आणि ब्रिटिशांना लढाईची सबब ह्यांपैकी कोणती सबब खरी असेल ती असो, ह्या दोन्हीही सुधारणेचा तोरा मिरविणा-या राज्यांनी हा घाट मोटारीने ओलांडण्याइतका दुरूस्त ठेवला नाही, हे उघड आहे! मंगळूराहून मुंबईकडे किंवा बंगलूरकडे जावयाचे झाल्यास आगगाडीचा मागे नाही. कालिकतला वळसा घालून जवळजवळ मद्रासला जाऊन आगगाडीने हा द्राविडी प्राणायाम करावयाचा असतो. पावसाळ्यात पाच महिने समुद्रावरील प्रवास बंद असतो, इतकेच नव्हे तर अतिवृष्टीने एकाद्या नदिकिना-यावरचा पूल नादुरूस्त झाल्यावर  आगगाडीच नव्हे तर टपालखातेही बंद पडते, ह्यावरून सोमेश्वर-आगंबे घाटाचे महत्त्व रहदारीच्या दृष्टीने इतके महत्त्वाचे असूनही परकीय मुत्सद्दी आणि स्वकीय चळवळे ह्यांनी आजवर एकमताने ही हयगय कशी केली आहे हे पाहून दोघांचेही कौतुक केल्याशिवाय रहावत नाही. असो.

ता. १४ रोजी प्रात:काली हत्तीवर टांगलेल्या घंटांचा मधुर आणि तालबद्ध आवाज दुरून कून आम्ही जागे झालो. आम्ही संस्थानी प्रजा म्हणून आम्हांला हा आवाज नेमका ओळखण्याला मुळीच अडचण पडली नाही, तरी अशा जंगलात दरबारी हत्ती कोठून येणार म्हणून आश्चर्याने आम्ही घाटाखाली पाहू लागलो. तो चार पाच म्हैसूर संस्थानचे टिंबर डिपार्टमेंटचे मजूर रात्रभर आपले मोठाल्या लाकडी तुळ्या ओढून एकत्र करण्याचे काम आटपून आपल्या ठाण्याकडे वर येताना दिसले! जवळ आल्यावर ज्यंच्या पायांना मोठमोठाले साखळदंड बांधलेले असे रस्त्यावरून फरफरा ओढीत चाललेले हे बिनपगारी-पण जास्त पगार आणि कमी काम मागणा-या मनुष्य मजुरापेक्षा अधिक प्रामाणिक – मजूर हत्ती पाहून व त्यांनी चालविलेल्या कामाची माहिती ऐकून फार आश्चर्य वाटले. म्हैसूर संस्थानात इमारती लाकडाचे एक स्वतंत्र मोठे खातेच आहे. त्यात चंदनापासून जळाऊ बाभळीच्या लाकडापर्यंत सर्व प्रकारच्या लाकडाची एक मोठी उत्पन्नची बाब आहे. मोठमोठाली खोडे तोडणे, एकत्र करणे आणि घाटावर ओढून आणणे ही शक्तीची कामे करण्याला घाटाखालची अगर वरची इतर जनावरे व माणसे ही सारखीच असमर्थ आहेत. म्हणून ह्या संस्थानाला देवाने ही जिवंत आणि चतुर व प्रामाणिक इंजिने दिली आहेत. हा नवीन देखावा पाहून माझ्या लहानग्या मुलाला फार अचंबा वाटला. तो पाहून मलाही माझ्या ह्या प्रवासात मजबरोबर निरीक्षण करण्याला माझा मुलगाही आहे, त्याबद्दल धन्यता वाटली.

तीर्थहळळी

म्हैसूर संस्थानाचा हा तालुक्याचा गाव आगंबेहून सुमारे १५ मैलांवर आहे. तेथे आम्ही ८-८|| वाजता पोचलो. तेथे तुंगा नदी लागते. नदीत एक शिवालय आहे व तेथे स्नान करण्यासाठी एक क्षेत्र आहे, असे ऐकले होते. ह्या गावी काँग्रेसची एक डिस्ट्रिक्ट कमिटीही आहे, तिचे मुख्य अध्यक्ष भेटले, पण राज्य एतद्देशीय संस्थानचे असल्याने काँग्रेसच्या कामात ओघानेच तपशीलाच्या भरीवपणापेक्षा तत्त्वांचा पोकळपणाच जास्त आहे हे नजरेस आले. ब्राह्मसमाजाची गोष्टच काढावयाला नको, पण खादीच्या प्रसाराचा किंवा अस्पृश्यता निवारण्याच्या शिळोप्याच्या गोष्टींचादेखील इकडील विधायक कामगिरीत समावेश होत नसल्याने अध्यक्षांच्या खादीच्या टोपीशिवाय येथे काही प्रेक्षणीय व श्रवणीय नाही, हे शब्दश: खरे ठरले! सुशिक्षितांचे राजकारण व घरबसल्यांची चळवळ ही अशी टोपी घालण्यापुरतीच असणार, हे पहाण्यास संस्थानातील ह्या जंगली कोप-यात जाण्याची जरूरी नाही. ती कलकत्त्याच्या कॉलेज स्वेअरमध्येही मुबलक पहावयास मिळते. तेथेही पण केव्हा केव्हा खादीचा पोषाख करणारा एकादा बाबू शोधून काढावयास तासानुतास हिंडावे लागते. तीर्थहळळीस एक दिवस रहाण्याचा आमचा कार्यक्रम एक तासभर केलेल्या चौकशीत आटोपता घेतला आणि आम्ही मुकाट्यने पुढील मार्गास लागलो, येथून सुमारे ४० मैलांवर

शिमोगा (शिवमुख?)

हे म्हैसूर संस्थानातील एक जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. ही सर्व वाट सारखी उताराची लागली. शिमोग्यास आम्ही भर दोन प्रहरी पोचलो. एवढा मोठा गाव असून येथे कोणत्याही प्रकारची हालचाल नाही. राजधानीचे ठिकाण म्हैसूर अथवा बंगळूर ही दोन्ही पुरेशी दूर असल्याने येथे दरबा-यांचा सुळसुळाट नाही आणि काँग्रेस कमिटी नसल्याने खालसा इलाख्यातील चळवळेही येथवर लांब येण्याची तसदी घेत नाहीत. संस्थान ब्राह्मणी वर्चस्वाखाली चिरडल्याने व श्रृंगेरी मठ जवळच असल्याने सामाजिक व धार्मिक स्वातंत्र्याचे वारे येथे पोचावयाला अद्यापि पुष्कळ अवकाश आहे. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद येथे नाही. आणि हरिहराचे देऊळ फार दूर नसल्यामुळे म्हैसूरातील अय्यर-अय्यंगार उर्फ शैव-वैष्णवांचाही तंटा येथे दिसला नाही. येथे मुसलमानांचा फार मोठा भरणा दिसला. पण जे मुसलमानांचे मासले दिसले, त्यांना आपण शिया आहो की सुन्नी आहो हे देखील सांगता आले नाही. मग खिलापत कमिटीची गोष्ट दूरच राहिली. अर्थात हिंदू संघटनांची किंवा अस्पृश्यता निवारणाची किंबहुना पुराणवस्तुसंशोधनासारख्या एकाद्या वाड्मयीन विषयाचीही कोणाजवळ चर्चा करण्याचे मला धैर्यच झाले नाही. एकंदरीत हा प्रांत नैसर्गिक अथवा सामाजिक कोणत्याच भानगडीपासून अलिप्त दिसल्यामुळे आम्ही येते पूर्ण विश्रांतीसुख घेण्यासाठीच मुद्दाम तीन दिव राहिलो.

शिमोगा हे ठिकाण फार जुने नाही असे वाटते. “शिवमुख” असे ह्या नावाचे पूर्वरूप असावे अशी एकाने व्युत्पत्ती सांगितली. येथे महत्त्वाचे असे एकच वैष्णव देऊळ आहे. पण तेथेही सांप्रदायिक कडवेपणा किंवा सोवळे नाही. इतकेच नव्हे तर त्याच देवळात शिवाची पिंडी आहे. हा एक अपूर्वच प्रकार मी पाहिला. सर्वांत जुने देऊळ मारूतीचेच आहे, आणि तेही पूर्वी एकादे शिवालय असेल अशी शंका येते; घाट ओलांडल्याबरोबर जैन धर्माची चिन्हे अजीबात मावळल्याप्रमाणेच होतात. एक रोमन कॅथॉलिक ख्रिस्ती जुने देऊळ आहे. मशिदीही फारशा जुन्या नाहीत. सर्वांत जुनी वस्तू येथे तुंगा नदीच आहे! आणि तिने मात्र हे स्थान अगदी रम्य केले आहे. गाव तर अगदी तिच्या काठाकाठानेच वसला आहे. एक दोन वर्षांपूर्वी महापूर येऊन जवळजवळ अर्धा गाव वाहून गेल्यामुळे ज्या घरांनी जमीन धरली आहे ती अद्यापि उठली नाहीत. एका निपुत्रिक ख्रिस्ती श्रीमंताच्या देणगीने एक भली मोठी सुंदर धर्मशाळा, घाट व सभामंडप ह्या इमारती तुंगेच्या काठी गावाबाहेर बांधल्या आहेत. त्यांचा ताबा लोकल बोर्डाकडे असल्यामुळे भोगवटा हिंदूच्याच वाट्याला आला आहे. जसा देखावा शांत तशीच हवा व तसेच पाणीही शुद्ध व आरोग्यकारक आहे. “कृष्णास्नान व तुंगापान” ही म्हण मला आठवली. उन्हाळ्यामुळे नदीचे पाणी डोहातही कमी झाले होते व म्युनिसिपालिटीला नदीचे महत्त्व न कळल्यामुळे तिने वरील म्हणीला बाध आणिला होता, तरी तुंगेचे स्वच्छ व विस्तीर्ण पात्र, मुबलक पाणी, दोहों तीरांवरील खडकाळ व रेताळ प्रदेश वगैरे वगैरे नैसर्गिक सोहाळे धर्मशाळेच्या दुस-या मजल्यावरील गवाक्षातून सांजसकाळ पूर्ण उपभोगता येण्यासारखे आहेत, ह्यात शंका नाही. रसिकांना दोन दिवस रहावेसे वाटते.

शिमोगा येथे म्हैसूर संस्थानी आगगाडी आहे. ती बिरूर येथे एस्. एम्. आर. Southern Maratha Railway ला मिळून पुढे पुन: वेगळी होऊन म्हैसूरापर्यंत जाते. ह्या लाईनीचे शिमोगा हे शेवटचे ठाणे आहे. येथून पश्चिम किना-यावरील भटकळ बंदर लोहमार्गाने जोडण्याची सर विश्वेश्वरय्या ह्यांची महत्त्वाकांक्षा होती. तिचादेखील स्वाहा म्हैसूरसारख्या भरभराटलेल्या संस्थानाने गेल्या युद्धाच्या होमकुंडात कसा केला हे कळत नाही, तरी ह्या लोहमार्गासाठी तुंगेच्या विशाल पात्रावरून पूल बांधण्यासाठी ज्या भक्कम खांबांची उभारणी वाहत्या पात्रात आधीच होऊन राहिली आहे त्यावरून “उत्पद्यन्ते विलीयन्ते दुर्बलानां मनोरथा” हे कसे ते तेथे उघड दिसते. “दरिद्राणां” चे ऐवजी “दुर्बलानां” हा पाठभेद माझा स्वत:चा आहे. त्याबद्दल चतुर वाचकांची मी माफी मागावीच असे काही नाही.

हरिहर

ही आमच्या प्रस्तुत प्रवासाची पराकाष्ठा होती. ती जरी ईशान्येकडे होती तरी आग्नेयीकडे असणा-या विरूर नावाचे एम. एस. एम. आर. चे स्टेशन (Madras Southern Maratha Railway) गाठण्याकरिता उलट्या दिशेने आम्ही ता. १६ रोजी रात्री ७-४५ वाजता निघालो आणि विरूर येथे ११ वाजता पोचलो. वाटेत बेंकीपूर उर्फ भद्रावती ह्या स्टेशनावर म्हैसूर संस्थानाचा भला मोठा लोखंडाचा व पोलादाचा कारखाना दिसला. विजेच्या लखलखाटामुळे तो देखावा बंगाल-नागपूर रेल्वेवरून रात्रीच्या काळोखात जसा टाटा कंपनीच्या जमशेटपूरचा दिसतो, तसाच येथलाही दिसतो. विरूर स्टेशनवर कुली (हमाल) मुळीच नाहीत. उलट चोरट्यांचा सुळसुळाट आहे. कारण दोन संस्थानांच्या हद्दीवरील हे ठाणे, हेच उघड आहे. तेथे मजुरीपेक्षा उचलेपणाला तेजी असावी हे नीतिशास्त्राला नसले तरी हल्लीच्या अर्थशास्त्राला धरूनच आहे! गाड्यांची आवक-जावक येथे अपरात्री असल्यामुळे जवळ जड सामान असल्यास उतारूचे फार हाल होतात. अधिकारी व श्रीमंतांचे कोठेच नडत नाही आणि बाकीच्यासाठी रेल्वे कंपन्या नसून उलट रेल्वे कंपन्यांसाठीच हिंदुस्थानातील तिस-या वर्गाचा उतारू वर्ग आहे हे ज्यांना अनुभवावयाचे असेल त्यांनी विरूरची तीर्थयात्रा करावी. विशेषत: अमावस्येची रात्र असल्यास साक्षात्कार पूर्ण घडेल!

हरिहर येथे ता. १७ रोजी मोठ्या पहाटेस पोचलो. काही ओळखीमुळे हरिहरेश्वराच्या देवळातील आवारामध्ये एक खोली आम्हांला रहावयास मिळाली. हरिहर गाव पाहून आमची निराशा झाली. हा गाव तुंगभद्रेच्या सुंदर आणि विस्तीर्ण पात्रावर उभा आहे. हा फार प्राचीन आहे. हे क्षेत्राचे स्थान अशी प्रसिद्धी आम्ही फार ऐकिली होती. पण गाव पाहूनच नव्हे तर देऊळ पाहूनही सकृतदर्शनी आमची मोठी निराशा झाली. देवळाच्या पश्चिम बाजूला तुंगभद्रेचे विशाल पात्र अगदी जवळ येऊन भिडले आहे तरी पण मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडून आहे. तेथे भोवताली गावातील घरांची अशी दाटी झाली आहे की आपण एका प्रसिद्ध देवळापुढे आलो आहोत, असे वाटतच नाही. आत गेल्यावरही देऊळ किंचित ठेंगणे, जमिनीत बसल्यासारखे आणि ओसाड असे दिसते. आम्ही सामान उतरून किंचित विश्रांती घेऊन सावकाशपणे देऊळ पहाण्यास गेलो, आणि निरखून पाहू लागलो तो देवळातील खरी कारागिरी आणि त्याचे जुने पुराणे महात्म्य मनात भरू लागले.

शिव आणि विष्णू ह्या हिंदूंच्या दोन मुख्य उपास्य देवता. ह्यांच्यातील सख्य आणि विरोध म्हणजे हिंदू धर्माचे मोठेच रहस्य. दक्षिणेत तर ह्या विरोधावर बरीच रणे माजली आहेत. ह्या दोन्ही देवांचा ह्या ठिकाणी झालेला अभेद्य मिलाफ पहाण्याची माझी फार दिवसांची इच्छा होती. जमल्यास हा महत्त्वाचा मिलाफ होण्याला ऐतिहासिक कारणे काय झाली असावीत आणि तो मिलाफ ह्याच ठिकाणी का व कसा झाला हेही दिसल्यास पहाण्याचा माझा विचार होता.

इसवी सनाच्या ६ व्या शतकापर्यंत हिंदुस्थानात विशेषत: दक्षिण आणि पश्चिम हिंदुस्थानात बौद्ध आणि जैन धर्माचेच अगदी निर्भेळ प्राबल्य होते. ह्या दोन्ही धर्मांतही आपसात सख्य होते. दक्षिणेतील व द्राविड राजवटीतून जैनांचाच विशेष वरचष्मा होता. त्यामुळे बुद्धांचा धर्म अगोदरच निस्तेज होत आला होता. पुढे हळूहळू शैवांचा उदय होऊन दक्षिणेत चालुक्यांचा व तामिळ देशात चोळ आणि पांड्य राजांच्या आश्रयाने शैव आचार्यांनी प्रथम जैनाला हुसकून लावले. नंतर वैष्णवांनी शैवांवर कुरघोडी केली. तामिळ प्रांतात व काही अंशी कर्नाटकात वैष्णवांची आणि शैवांची अद्यापि चुरस कायम आहे, तरी इतर ठिकाणी ह्या दोन्ही संप्रदायांचा सल्ला झालेला दिसत आहे. काही काही ठिकाणी ह्या समेटाचा जाणूनबुजून प्रयत्न झाला असावा असे वाटते. ह्या वर्षारंभी मी ओरिसातील कटकपासून तो थेट मद्रासेपर्यंत किना-यावरील प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य मुख्य शैव आणि वैष्णव देवळे बारकाईने तपासून पाहिली.

“शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे|
शिवस्य-हृदये विष्णु विष्णो-हृदये शिव: ||”

ह्या मंत्रातील भाग ह्या बहुतेक देवळांतून उघड दिसून आला . विशेषत: शिवाने विष्णूपुढे बरीच हार खाल्ली आहे. बहुतेक मोठाल्या शिवालयांतून विष्णूची आणि लक्ष्मीचीही स्वतंत्र स्थापना दिसली. इतकेच नव्हे तर विष्णूमंदिरातही कित्येक ठिकाणी शिवाच्या पिंड्या दिसल्या. बंगाल्यात देवपारा ह्या गावी प्रद्युम्नईश्वर (हरिहर) ह्या जोड नावाखाली एकाच दैवताची उपासना (इ.स. ११०० पासून) होत आली आहे. पण सर्व हिंदुस्थानात हरिहराचे अभेद्य स्वरूप येथील हरिहरेश्वराच्या मंदिरातल्या इतके दुसरीकडे कोठेही आढळले नाही.

ह्या देवळात जुन्या शिलालेखांची अगदी लयलूट झाली आहे. १० फूट उंच व ५-६ फूट रूंद अशा गुळगुळीत दगडावर स्वच्छ आणि सुंदर कोरलेले जुन्या कानडीतील शिलालेख देवळाच्या आवारात जागोजाग उभे केले आहेत. बाजूस खांबावर, खाली पाय-यावर, वरती छतावरही लहान मोठे शिलालेख कोरलेले आहेतच. एकंदरीत हे देऊळ म्हणजे दगडी फळ्यांची आणि ताम्रपटांची एक मोठी लायब्ररीच आहे म्हणावयाचे. म्हैसूर सरकारनी ल्यूइस् राईस् ह्यांजकडून ‘एफिग्राफिका कर्नाटका’ नावाची जी महत्त्वाची ग्रंथमालिका प्रसिद्ध करविली आहे, तिच्या ११ व्या ग्रंथात चित्तलदुर्ग जिल्हा, दावणगिरी तालुका ह्या भागात हरिहर ह्या देवळातील व गावातील एकंदर ३८ लहान मोठे शिलालेख आणि ८-१० ताम्रपटातील लेख इंग्रजी भाषांतरासह उतरलेले आहेत. त्यांवर लेखांचा काळही दाखविलेला आहे. लेखांची भाषा संस्कृतमिश्रित जुनी कानडी आहे. काही काही लेख ५-६ पानांवर पसरलेले काव्यमय भाषेत आहेत. काही तीन चार ओळीत आटपले आहेत. बनवासीचे कदंब, हलेबीड, म्हैसूरचे होयसल, मदुरेचे पांड्य, तंजावरचे चोल, चालुक्य वगैरे अनेक राजांनी व त्यांच्या दिवाणांनी व इतर शेट सावकारांनी दिलेल्या नानात-हेच्या देणग्यांचा व शासनांचा ह्या लेखांतून उल्लेख आहे. त्यांचा काळ सुमारे इ. स. १००० पासून १५०० पर्यंतचा आहे.

सगळ्यात जुना ताम्रपट इ. स. ६९४ सालचा हरिहर येथील शानभोग सीतारामय्याजवळ आहे. त्यावेळी चालुक्य राजा विनयादित्य सत्याश्रय ह्याची छावणी हरिहराजवळील करंजप खेड्यात होती. तेव्हा त्याने एका विद्वान ब्राह्मणाला एक गाव दिल्याचे हे शासनपत्र आहे. त्यावेळी हरिहर ह्या गावाला हरिशपूर हे नाव होते. पण देवळाचा किंवा देवाचा काही उल्लेख नाही. त्यानंतर इ. स. ११०० साली केटय्या नायक ह्यांनी काही दान दिल्याचा एक लहानसा शिलालेख आहे. त्यात हरिहर देवाचा प्रथम उल्लेख आहे. पण त्यावेळीही हल्लीचे देऊळ नसावे. पुढे इ. स. १२२४ सालचा एक सुंदर आणि विस्तृत शिलालेख पोलाळ दंडाधिपाने कोरविलेला फार महत्त्वाचा आहे. त्यातील मुख्य भाग खालील शब्दात आहे:

‘स्वास्तिश्री जयाभ्युवयश्च शके वर्ष ११४५ नेव स्वभानु संवत्सर माग शुद्ध ११ वृहवारद अंदु चोळ प्रतिष्टाचार्य श्री वीरनरसिंह देवर महाप्रधानं पोळाळव दंडनार्थ ११५ होन्नकलशदिं मरव अंत आगि हरिहर देवरग्ग देवतातयं माडिसिदन् आ देवता-भवन-वासद विलासमं पेळवोदे|’

म्हैसूरच्या होयसल घराण्यातला दुस-या नरसिंह राजाचा प्रधान आणि सेनापती पोलाळ ह्याने हल्लीचे हे देऊळ इ. स. १२२३-२४ ह्या साली अगणित द्रव्य खर्चून बांधले असा ह्या लेखाचा इत्यर्थ आहे. त्यात ह्या प्रदेशाला गुह्यारण्य आणि गावाला कुडलूर अशीही नावे असलेली दिसतात. लेखाचे आरंभी म्हटलेले आहे की, काही म्हणतात की हरिशिवाय देव नाही. काही म्हणतात की हराशिवाय देव नाही. लोकांचा हा संशय दूर व्हावा, म्हणून हरिहराचे हे संयुक्त स्वरूप परमेश्वराचे. विष्णूने शिवाचे रूप घेतले आणि शिवाने विष्णूचे रूप घेतले हे वेदवाक्य खरे करण्यासाठी कुडळ येथे धारण केले! हरिहर क्षेत्राचा महिमा सेतु, वारणशी, कुरूक्षेत्र इ. क्षेत्रांहूनही जास्त आहे, असेही ह्या लेखाचे शेवटी म्हटले आहे. हे मंदिर जरी सन १२२४ साली झाले तरी ह्या देवस्थानाला देणग्या आलेल्यासंबंधी कित्येक शिलालेख इ. स. १०० पासून बरेच आहेत.

विस्ताराने हे देऊळ साधारण मध्यम प्रतीचे आहे. पण ह्यातील कोरीव काम मात्र अगदी वरिष्ठ दर्जाचे आहे. देवळाची जी सभोवार सज्जाची भिंत आहे, तिच्यावर अनेक प्राण्यांची हुबेहूब सुंदर चिमुकली चित्रे काढून नक्षी केलेली आहे. ती पाहून मन थक्क होते. खांब, भिंती आणि वर छत ही सारी अत्यंत कुसरीच्या जणू कशिद्याने भरगच्च भरून काढली आहेत. देवळाचा घाट उठावदार नसून ते ठेंगणे हेमाडपंथी थाटाचे आहे. त्याला चौथरा मुळीच नसल्याने ते जमिनीत रूतल्याप्रमाणे दिसते. निळसर रंगाच्या स्लेटीच्या मऊ दगडात एकंदर काम झाले असल्यामुळे, खांब आणि भिंती जणू शिशाच्या ओतून काढल्याप्रमाणे अगदी गुळगुळीत आणि मोहक दिसतात. भर उन्हाळ्यातही त्यांचा स्पर्श शीतळ आणि सुखदायी भासतो. माणसांची चाहूल फारच कमी असल्यामुळे आणि पश्चिमेकडील तुंगभद्रेवरचे वारे येण्याला कोठेच अडथळा नसल्यामुळे देवळात कोठेही विश्रांती घेण्यास बसले की मटकन डोळेच मिटतात, आणि “ब्रह्मानंदी लागली टाळी| कोण देहाते साभाळी||” असा प्रकार काही वेळ तरी सहजच घडतो. मुख्य देवळाभोवती रथयात्रेसाठी चारी बाजूंनी ऐसपैस जागा आहे. तिच्याभोवती काळभैरव व लक्ष्मी इत्यादी देवतांची उपमंदिरे आहेत. पण देवळाच्या ओव-यांतून कायमच्या
बि-हाडक-यांना जागा दिल्या आहेत, इतकेच नव्हे तर देवळाचा काही भाग देवळाशी संबंध नसलेल्यांनी आपल्या कायमच्या मालकीचा करून घेतला आहे, बाहेर रस्ता अगदी अरूंद, त्याच्या पलीकडे घरांची खेचाखेची व गटारातून युगानुयुगे साचलेली घाण, अशी एकंदर हयगय चाललेली पाहून फार वाईट वाटते. मात्र मलबारातल्या देवळाप्रमाणे येथे फाजील सोवळे नसल्याने अगदी देवळाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन देवळातील मूर्तीचे दर्शन घेण्यास मुभा आहे.

गाभा-यात हरिहराची एकच मूर्ती आहे. ती देवळाच्या मानाने पहाता मुळीच सुंदर नाही. भर दोन प्रहरी देवळाचे अंगणात एक मोठा आरसा ठेवून त्याची किरणे सभामंडपातून मध्यदालनातून गाभा-यातील मूर्तीवर नेमकी पाडून ती स्पष्ट बाहेर उभी राहून दाखविण्याची सोय करण्यात येते. मूर्तीचा उजवीकडचा भाग शिवाचा आणि डावीकडचा भाग विष्णूचा आहे. डावीकडच्या दोन हातात शंख आणि चक्र आणि उजवीकडच्या एका हातात त्रिशूल आणि दुसरा अभयदानासाठी नुसता पसरून उभा धरलेला आहे. डोक्यावर उजवीकडे जटा असून तिच्यात चंद्र आहे, आणि डावीकडे किरीट आहे. पण एकंदर मूर्तीला आणि आसनाला मधून मधून चिरा पडलेल्या स्पष्ट दिसतात. टिपू सुलतानाचे वेळी ह्या देवळावर वरचेवर हल्ले होऊन त्याची मराठ्यांनी अगदी आणीबाणीच्या वेळी सुटका केली आहे. ह्या धामधुमीत मूर्ती ठिकठिकाणी भंगलेली असणे साहजिक आहे. अफझलखानाच्या हल्लाचे वेळी तुळजापूरच्या भोप्यांनी जशी देवी लपविली तसाही प्रकार येथे झाला असावा. मूर्तीचे दोन वरले हात दोन खांबांवर ठेवलेले मूर्तीपासून अलग असल्यासारखे दिसतात. पायही गुडघ्यापासून खाली, आसनाच्या मागे झाकलेले आहेत. आसनावर जो पायांचा भाग दिसतो, तोही धोतराने झाकला असल्याने मूर्तीला अवास्तव ठेंगूपणा आला आहे. असा हा एकंदरीत ठाकठेकीचा आणि लपवालपवीचा साज पाहून थोडी करमणूक होते. तोंडावळा पंढरपूरच्या विठोबासारखाच असून जणू काय एकाच शिल्पकाराने ह्या दोन्ही मूर्ती एकाच वेळी घडविल्या असाव्या असा भास होतो. ह्या दोन्ही देवळांच्या कालामध्ये फारसे अंतर नसल्यामुळे आणि मध्वाचार्याच्या मुत्सद्देगिरीचा आणि मतप्रसाराचा हा काळ असल्यामुळे वरील संबंध असणे अगदीच अशक्य असावे असे वाटत नाही.

ह्या देवळात ज्या कदंब, होयसल, चोळ, चालुक्य इ. राजांनी देणग्या दिल्याचे शिलालेख आहेत, त्यांच्यामध्ये आपसांत नेहमी कटकटी होत असत. ह्या लेखांतून परस्परांवर मिळविलेल्या विजयांची जी आत्मप्रोढीची आणि परनिंदेची वर्णने खुलवून लिहिली आहेत, ती येथे एकत्र वाचून ईश्वरी महात्म्यापेक्षा मानवी लाघवाकडे जास्त लय लागून मन खट्टू होते. तरी पण अशा वर्दळीच्या प्रदेशातील केंद्रस्थानी हे क्षेत्र असल्यामुळे हरिहराला दामटून एक करण्याला ही जागा फारच योग्य आहे ह्यात शंका नाही. एकूण ईश्वरी अवताराची सूत्रे माणसांच्याच हाती आहेत हे काही खोटे नाही. त्यातल्या त्यात ह्या ठिकाणच्या क्षेत्र चालकांनी जो धूर्तपणा व दूरदर्शित्व दाखविले आहे, तो धूर्तपणा हल्लीच्या लीग ऑफ नेशन्सलाही साधला नाही असे म्हणावे लागते! द्राविड, कानडी व मराठी ह्या भाषा मद्रास आणि मुंबई हे इलाखे, म्हैसूर आणि निजाम ही संस्थाने, वगैरे अनेक प्रवाह आजही तुंगभद्रेच्या काठी उभा राहून एक करणारा जो हरिहर देव तो हल्ली आमच्या हिंदुस्थानाला अत्यंत अवश्य असलेली एकी लवकर घडवून आणो, अशी प्रार्थना करून आम्ही ता. १७ एप्रिल १९२५ रोजी हरिहर सोडले आणि ता. १८ रोजी रात्री आमच्या पुण्यास येऊन पोहोचलो.

सह्याद्रीवरुन१

क्षितिजाचे सुंदर आणि विशाल वलय-जणू जमीन अस्मानाचे गाढ आलिंगनच- अहोरात्र दिसते त्याच ठिकाणी शांती आणि शोभा ह्या दोन्ही जुळ्या बहिणींचे चिरसाम्राज्य पहावयास मिळते. महर्षींनी स्थापलेले शांतिनिकेतन ह्या साम्राज्याचे एक सिंहासनच होय!

भोवताली भला मोठा ओसाड उघडा माळ आहे आणि मधअये सुमारे २ एकर जमीन ह्या निकेतनासाठी पसंत करून महर्षींनी ती आता तरूलतांनी गजबजून टाकिली आहे. आम्र, अशोक, देवदार इत्यादी प्रकारचे गगनचुंबी वृक्ष एकमेकांच्या खांद्यावर आपले प्रशस्त बाहू ठेवू ठेवून डोलत आहेत. मध्यभागी महालवजा दोनमजली पक्की आणि भव्य इमारत आहे. तिच्यासमोर बागेत टुमदार, स्वच्छ, शुभ्र संगमरवरी दगडाचे ब्राह्ममंदिर आहे. त्याचे अग्रभागी मोकळा मंडप असून त्यावर लोहशलाकाचे नाजुक, निमुळते, गोल घुमट आहे. मंदिराच्या चारी भिंती भिंगाच्याच असल्याने उपासनेस बसले असताही चहूबाजूंचा दूरवर देखावा दिसतो. उपासकांसाठी रांगेने आसने मांडली असून, मध्यभागी वेदीसाठी एक लहानसा संगमरवरी चौरंग आणि त्यावर दोन शुभ्र शंख ठेविले आहेत. भिंतीला लागूनच चारी बाजूंनी प्रधक्षिणा करण्याकरिता येण्यासारखी उंच चबुत-यावरून वाट आहे. त्यानंतर चोहोंकडून थोडीशी मोकळी जागा राखून, भोवताली छातीइतका प्राकार आहे. मंदिराच्या दारावर अँ हे अक्षर लावलेले असून त्याच्या खालील कमानीवर पुढे दिल्याप्रमाणे त्याचा अर्थ लिहिला आहे.

सर्वे वेदा यत्पदमामनंति तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति|
यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरंति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्योत्येतत् ||१||
बाहेरील बागेत जागजागी सुंदर वृंदावने आणि कुंड्या आहेत. त्यांच्या बाजूंवर उपनिषदांतील गंभीर उतारे व लहान मोठी वचने उल्लेखिली आहेत. त्यांपैकी खाली लिहिलेले अवतरण वाचून तर ह्या स्थळाचे महत्म्य मनात चांगले बाणते.

“एष सेतुर्विधरण एषां लोकांनामसम्भेदाय |
नैनं सेतुमहोरात्रे तरतो न जरा न मृत्युर्न शोको न सुकृतं न दुष्कृतं|
सर्वे पाप्मानोSतो निवर्तन्तेSअपहतपाप्मा ह्येष ब्रह्मलोक:||”

इ. इ. ही वचने वाचीत प्रेक्षक अगदी बाहेरील दाराजवळ आला असता भिंतीत बसविलेला खालील लेख वाचून ह्या आश्रमाच्या उदार आणि पवित्र हेतूची त्याला कल्पना येते इतकेच नव्हे तर ही स्वर्गीय तत्त्वे खुद्द त्याच्या अंत:करणात खोल रूजू लागतात:

“सर्वेषामेवास्मिन् शांतिनिकेतने ब्रह्मोपासनायामधिकार: इह खल निराकारमेकं ब्रह्मैवोपासीत| संप्रदायप्रथितां देवमूर्ति मनुष्यं पशुं पक्षिणं प्रतिकृतिं लिंगं देवप्रतीकं च नाचयेत| नापि पावकं जुहुयात् धर्म स्वोदरं वा समुद्दिदश्य किमपि भूतं मा हंस्यात्| आमिषं मद्यपानं विवर्जयेत्| कस्याप्युपास्यं नावमन्येत| ब्रह्मयोगं मैत्री शमादिकं च परामृश्य समुदपदिशेत्| ब्रीडाकरं प्रमोदं चोतसृजेत|

ह्या निकेतनातील मुख्य प्रेक्षणीय भाग म्हणजे उपरिनिर्दिष्ट सप्तपर्ण वृक्षच होय.

महर्षींचे हे अत्यंत आवडीचे स्थान होते. ह्या आश्रमात चोहींकडेच पण विशेषत: ह्या ठिकाणी महर्षींचा पुण्यात्मा जणू घेर घालीत आहे असा भास होतो. ह्या जीर्ण वृक्षाचे तळाशी जेथे महर्षी नेहमी बसत तेथे आता एक सुंदर संगमरवरी वेदी बांधली आहे. तिच्या शिरोभागी ‘तिनि अमार प्राणेर आराम, मनेर आनंद, आत्मार शांति’, हे शब्द आहेत. ह्या वेदीवर बसले असता सुमारे १०-१२ पावलांवर एका संगमरवरी स्तंभावरील फलकावरची ‘शांतं शिवमद्वैतम्’ ही अक्षरे डोळ्यांत भरतात. तेथून हालावेसेच वाटत नाही.

मंदिरात दररोज प्रात:काळी ७ वाजता नित्याची उपासना होते, त्यासाठी एके आचार्य व दोन गायक ह्यांची नेमणूक झाली आहे. एरव्ही वाटेल तेव्हा वाटेल त्यास ध्यान, भजन तेथे करता येण्यासारखे आहे. दर बुधवारी व गुरूवारी मुख्योपासना होतात, त्या बाबू रविंद्रनाथ हे चालवितात. त्यावेळी येथील ब्रह्मचर्याश्रमातील १२५-१५० विद्यार्थी सर्व हजर असतात. पौष्य मासी (डिसेंबर) दरवर्षी येथे एक मोठी जत्रा भरते, तेव्हा आजूबाजूच्या खेड्यांतील ३-४ हजार खेडवळ जमून जुन्या जत्रेतलेच निरनिराळे खेळ करून १-२ दिवस करमणुकीत घालवितात.

ह्या ठिकाणी महर्षींची समाधी कशी नाही, ह्याचे आश्चर्य वाटल्यावरून शोधाअंती त्यांचे नातू द्विपेंद्र बाबू ह्यांनी असे कळविले की आपल्या रक्षेवर समाधी, थडगे अगर कोणतेही स्मारक कोठेही उभारू नये अशी महर्षींनी अगदी कडकडीत आज्ञा दिली आहे, भोवतालच्या खेड्यांतील लोकांत महर्षींसंबंधी इतका अलोट आदर आहे की, ह्या निराकाराच्या निष्काम आणि एकांतिक भक्तांची ही शेवटची इच्छा जर पूर्णपणे पाळली गेली नाही तर त्यांचे देव्हारे हा हा म्हणता माजतील, ह्यात तिळमात्र संशय नाही.

सह्याद्रीवरून – १

मंगळूर अथवा दक्षिण कानडा हा मद्रास इलाख्यातला वायव्येकडील अगदी कोप-यात खुपसलेला शेवटचा जिल्हा आहे. मुंबईकडे यावयाचे तर आगबोटीचाच काय तो मार्ग सोयीचा आहे. पावसाळ्यात चारपाच महिने तो बंद असता आगगाडीने यावयाचे ते दक्षिणेकडे उलट कोईमतूरपर्यंत ४०० मैल खाली जाऊन पुन्हा जवळ जवळ मद्रासचे बाजूने आणखी ४०० मैल पूर्वेकडे जाऊन जालारपेठ, बंगलोराहून पुण्यास येण्यासाठी एक द्राविडी प्राणायाम करावा लागतो. अलीकडे मोटारीची वाहतूक सुरू झाल्यापासून सह्याद्री ओलांडून हरिहरपर्यंत जवळचा पण दगदगीचा असा एक तिसरा मार्ग उघडा झाला आहे. उंच टेकड्या व खोल द-या, किर्रर्र झाडी व अगदी छातीवर येणारा बिकट घाट, नद्या, नाले, शेते व बागा इ. विविध देखाव्यामुले हा मार्ग अतिशय रमणीय आहे. इतकेच नव्हे तर गेल्या दोन अडीच हजार वर्षांत घडलेल्या बौद्ध, जैन, शैव आणि वैष्णव धर्माच्या झटापटींचे रणांगणही ह्याच कोप-यात विशेष खुलून दिसण्यासारखे असल्याने इतिहासभक्ताला तर हा मार्ग काशीयात्रेप्रमाणे पवित्र वाटतो. म्हणून मला ह्याच मार्गाने येण्याचा जो मोह पडला तो, बरोबर माझी बहीण, एक लहान मुलगा व बरेच सामानाचे लटांबर असतानाही मला काही केल्या आवरता येईना. शेवटी आम्ही तिघे ता. ९ एप्रिल रोजी आपले गाठोडे बांधून मंगळूराहून पूर्वेकडे सह्याद्रीवर डोळा लावून निघालो. तेव्हा पोहोचवावयास आलेल्या काही मित्रांना हासूही ले असावे, पण आमच्या धाकामुळे ते त्यांनी गालातल्या गालात दाबले असावे.

मुडबिद्री

त्याच दिवशी दोन प्रहरच्या सुमारास आम्ही सुमारे बावीस मैलांवर मुडबिद्री येथे पोहोचलो. हा गाव जैनांचे एक मोठे क्षेत्र आहे. ह्याला जैनांची दक्षिण काशी असे म्हणतात. ह्याचे वर्णन मी गेल्या वर्षी एका पत्रात केलेलेच आहे. मूळ नाव मुडबिहार म्हणजे पूर्वेकडील ठाणे असे आहे. विजयनगरची सत्ता स्थापन होण्यापूर्वी भैरवराय उर्फ बैरासू नावाच्या जैन राजघराण्याची सत्ता इकडे निरंकुश होती. त्याचकाली बांधलेली चंद्रनाथ नावाच्या तीर्थंकराची येथे एक साविरखंब (हजार खांबांची) ह्या नावाची बस्ती उर्फ देऊळ आहे. विस्तीर्ण, सुंदर आणि कोठेही भंग न पावलेल्या स्थितीत अद्यापि उरलेली ही बस्ती पाहून टिपू सुलतानासारख्या सर्वध्वंसक परकीयांचे आभार मानावेत की असली उत्पन्नाची इतर ठिकाणे गट्ट करून हल्ली गबर बनलेल्या स्वकीय पण सर्वभक्षक ब्राह्मण पुजा-यांचे अधिक आभार मानावेत ह्याचा काही सहज उलगडा होऊ शकत नाही. ह्याशिवाय येथे आणखी अठरा बस्त्या आहेत. त्यात गुरूबस्ती नावाची सर्वात मोठी व मानाची एक बस्ती आहे. येथील हल्लीची ४०००-५००० लोकवस्ती खाऊनपिऊन सुखी दिसते. येथे अद्यापि जैनांचेच प्राबल्य आहे. जमीन व व्यापार त्यांच्याच हाती आहे. पण विद्या आणि धर्माचे स्वरूप मात्र केवळ उपचारात व सोवळेपणात उरले आहे. हल्लीच्या इमारती जरी  ५००-७०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन दिसत नाहीत, तरी जैनधर्माची व संस्कृतीची ह्या प्रांतातील घडलेली प्रभावशाली कारवाई पाहाता हे ठाणे बरेच प्राचीन असावे असे वाटते. पडुबुद्री (पश्चिमेकडचे ठाणे) नावाचे समुद्रकिना-याजवळ दुसरे एक ठाणे आहे. त्यावरून म्हैसूराकडून जैनांचा धर्म व त्यांची राजसत्ता सह्याद्री ओलांडून जी पश्चिमेकडे वळली त्या ओघाचे हे टप्पेच असावेत असे वाटते. येथे जैन राजाचे लष्कर होते असे सांगतात. चंद्रनाथाच्या उठावदार बस्तीचा कोट शाबूत आहे. बंदूक ठेवून मारण्यासाठी धिप्पाड भिंतीला जी पल्लेदार ऐसपैस भोके आहेत, त्यावरून त्या ठिकाणावर मागे कटकटीच्या काळी मोर्चे बंदी होत असावी अशी जबर शंका येते. ह्यावरून जैन धर्माची शिकवण कशीही असो, जैन राजे म्हणजे केवळ शेळपट होते असे दिसत नाही. देवळावरच जर मोर्चेबंदी तर त्यांनी आपल्या अहिंसावादाला हल्लीप्रमाणे बारा वाटा मोकळ्या ठेवल्या नसतील असा तर्क करावयास हरकत वाटत नाही. केवळ जमिनीसाठी किंवा इज्जतीसाठीदेखील स्थानिक जमीनदार आपल्या वै-यांचे अमानुष रीतीने खून करून पोलीसांनाही उलट बगलेत दाबल्यासंबंधीची इकडे बरीच प्रसिद्धी आहे. असो, तरी जैनसाधूंपैकी प्रत्येकाजवळ वाटेतील किड्यांवर पाय पडू नये म्हणून मोराच्या पिसांचा झाडू असतोच.

आज चैत्री पौर्णिमा असल्यामुळे चंद्रनाथाचा वार्षिक रथोत्सव होता. नुकतीच श्रवणबेळगोळा येथील गोमटेश्वराला अभिषेक करण्याच्या महापर्वणीसाठी म्हैसूराकडे महायात्रा झाली. म्हणून हिंदुस्थानातील दूरदूरच्या प्रांतांतून हजारो जैन यात्रेकरू तेथे जमले होते. त्यांपैकी बरेच आज त्या उत्सवासाठी येथे आले होते. रथयात्रा किंबहुना समग्र मूर्तिपूजेचा संभार आणि देवालयाची रचना ही हिंदूंनी जैन आणि बौद्धधर्मीयांकडूनच घेतली आहे हे जाणून मलाही हा रथोत्सव अनायासे पहावयास मिळतो त्याबद्दल आनंद वाटला. एका अजस्त्र रथावर कागदाच्या घोड्यांचे भव्य घुमटाकृती शिखर करण्यात आले होते. रात्री बाराला सुरू होऊन सुमारे तीन तास हा उत्सव चालू होता. रथापुढे वाजंत्री होते. पण देवदासी किंवा वारांगनांच्या नाचाचे दक्षिणेत जे सर्वत्र प्रस्थ माजले आहे ते येथे जैनांच्या कोणत्याच देवालयात दिसले नाही. बाकी सर्व थाट एकाद्या वैष्णव उत्सवाप्रमाणेच होता. मजुरांच्या खांद्यावर लांब-लांब बळकट वासे देऊन त्याला दहादहा बाराबारा दिवट्या लावल्या असून त्या दोहों बाजूंनी चालवून जी रोषणाई केली होती ती येथे मी नवीनच पाहिली.

येथील जैनसमाज मुख्यत: वैश्यवृत्तीचा व अशिक्षित असल्यामुळे त्याच्या दानशूरपणाचा ओघ देवभोळेपणाच्या वाळवंटातच गडप होत असल्यास नवल नाही. चलतीच्या काळी ह्या अठराही बस्तीतून किती ऐश्वर्याचे सोहाळे चालत असतील, ह्याची आता नुसती कल्पनाच करण्यापलीकडे मार्ग उरला नाही. पण हल्ली यात्रेच्या दिवसांतही ह्या विस्तीर्ण, सुंदर आणि धडधाकट देवालयांतून अगदी निर्जन एकांतवास दिसत होता! ह्यावरून जैन समाज इकडे कसा मागे घसरत आहे हे उघड होत आहे. एक जैन कोट्याधीश निपुष वारल्यामुळे, सरकारमार्फत त्याची मिळकत धर्मकार्यास लावून त्याच्या भव्य वाड्यात आता एक संस्कृत पाठशाळा चालविण्यात येत आहे. तिचे पुस्तकालय पाहिले. मुख्य उपाध्यायांना भेटलो. म्हणण्यासारखे विशेष काहीच दिसले नाही. प्राचीन ग्रंथ जुन्या कानडीत लिहिलेले बरेच आहेत असे ऐकले. पण ते सोवळ्यात ठेवलेले आणि वेळही फार नव्हता, म्हणून ह्या सोवळ्याच्या किल्ल्यावर हल्ला चढविण्याची दगदग केली नाही. हजार खांबांच्या देवळाची शिल्पकला मात्र पहाण्यालायक आहे. ती मात्र सोवळ्यात नसल्यामुळे पहाण्यास मिळाली. दक्षिण कानडा व मलबार ह्याला पूर्वी केरळ देश असे नाव होते. सर्व केरळी मुलूख पावसाळी व रेताड असल्याने दगडाची उणीव व लाकडांची चंगळ म्हणून ह्या सर्व भागातील देवळांचा अधिक भाग लाकडी आणि फार तर भिंती व खांब तेवढे लॅटराईट म्हणजे ठिसूळ दगडाचेच असावयाचे. पण ह्या भव्य देवळाच्या भिंती व खांब तांबड्या वाळूच्या भरीव व भक्कम दगडाचे व कलाकुसरीने भरलेले आहेत. म्हणून त्यांची प्राचीनता ७०० वर्षांपूर्वी फार नसावी असे वाटते. तथापि ह्याचे छप्पर लाकडीच आहे. त्याचा घाट शेजारच्या घाटावरील इतर प्रांतात कोठेही न आढळणारा व फक्त केरळ देशातच आढळणारा असा आहे. इतकेच नव्हे तर तो नेपाळ, तिबेट व ब्रह्मदेशातील छप्परांच्या घाटाशी अगदी तंतोतंत जुळतो. शिल्पशास्त्रज्ञ फर्ग्यूसन ह्याच्या दृष्टीने ही फार आश्चर्याची बाब आहे. म्हणून इकडील शिल्पकला ईशान्येकडून आलेल्या बौद्ध व जैन मिशन-यांनीच प्राचीन काळी आणिली असावी असा तर्क आहे. नेपाळातही पाऊस व लाकूड फार व दगड कमी, म्हणून तिकडचीच भौतिक परिस्थिती इकडे असल्यामुळे येवढ्याच कोप-यात हा प्राचीन अवशेष उरला आहे. जो घाट पूर्वी बहुतेक लाकडी असे तो कालांतराने मध्ययुगात दगडचुन्याचे उठविण्याचा परिपाठ पडला असावा असे जे फर्ग्यूसनचे म्हणणे आहे तेही यथार्थ दिसते. पण हा दगडी इमारती बांधण्याचा परिपाठ ह्या प्रांतात सात-आठशे वर्षापूर्वी नसावा.

कारकळ
मुडबिद्रीहून सुमारे १०-१२ मैलांवर कारकळ ह्या नावाचा तालुक्याचा गाव ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. ही पूर्वी बैरासू जैन राजघराण्याची राजधानी होती. कारकळ-करोकल्ल-काळादगड अशी ह्या नावाची कानडीत व्यत्पत्ती सांगतात. इमारतीसाठी काळा दगड येथे विपुल मिळतो. वस्तुत: मुडबिद्रीपासूनच सह्याद्रीच्या हातापायांचा पसारा आढळू लागतो व काळ्या दगडाच्या टेकड्या दिसतात. रामसमुद्र नावाचे एका सुंदर दरीस बांध घालून एक तळे केलेले आहे. ते रामराय ह्या राजाने बांधले असावे. ह्याच तळ्याच्या काठी पुण्याच्या पर्वतीसारखी एक टेकडी शहराला लागूनच आहे. तिच्या माथ्यावर “घुमटाराज” नावाचा कारकळचा प्रसिद्ध व अक्षरश: दिगंबर पुतळा उभा आहे. हा एकाच दगडाचा असूनही ४३ फूट उंचीचा आहे. अगदी नग्न सावयव शरीर, धीरोदात्त व प्रसन्न मुद्रा, साधे पण भरीव सौंदर्य, आणि भोवतालचे शांत वातावरण ही सर्व पाहून जैन धर्माविषयीच नव्हे तर शिल्पकाराविषयीदेखील अनुकूल अशी पूज्य भावना उत्पन्न होते. वेणूर नावाचे येथून १०-१५ मैलांवर एक लहानसे खेडे आहे. तेथेही एक असाच ३५ फूट उंचीचा पुतळा आहे. तिसरा सर्वात उंच असा पुतळा श्रवण-बेळगोळा येते ५६ फूट उंचीचा आहे. हे तिन्ही पुतळे (एकेकाच) दगडातून कोरून काढलेले आहेत, ही एक त्यातल्या-त्यात आश्चर्याची गोष्ट आहे. ह्या सर्वांना गोमटेश्वर अथवा घुमटाराज हेच नाव आहे. ह्या पुतळ्यांविषयी व पूजेच्या संप्रदायाविषयी खात्रीलायक आणि पूर्ण असा खुलासा मिळत नाही. शेडबाळ येथे परवा जी अखिल भारतीय जैन परिषद झाली, तिचे अध्यक्ष श्री. नेमीसागर वर्णीजी ह्या जैन संन्याशाची मी मुडबिद्रीत भेट घेतली. त्यांनी सांगितले की, पहिल्या आदिनाथ तीर्थकरांचे दोन मुलगे पहिला भरत हा चक्रवर्ती झाला व दुसरा बाहुबली हा सामान्य राजा होता. त्या युगात माणसे फार उंच, बलवान व दीर्घार्यु होती. त्यातल्या त्यात बाहुबली हा तर भीमाप्रमाणे फारच धिप्पाड व बलिष्ठ होता. आपल्या थोरल्या भावाने चक्रवर्ती व्हावे म्हणून ह्याने राज्य व संसारलोभ टाकून तटस्थ वृत्ती स्वीकारली, हे दाखविण्यासाठी हे पुतळे उभे केले आहेत, वगैरे दंतकथा आहेत. पण जगात दुसरीकडे असे भव्य पुतळे कोठेच नाहीत, येथेच ते का आढळतात ह्याबाबतीत आमचे अज्ञान पाहून आमचे इतिहाससंसशोधन किती कमी दर्जाचे आहे ह्याबद्दल खंती वाटते. ह्या पुतळ्याच्या एका बाजूस एक शिलालेख आहे. त्यावरून इ. स. १३५४ चे सुमारास हा उभारण्यात आला असावा असे साऊथ कॅनरा डिस्ट्रिक्ट मॅन्युअलमध्ये म्हटले आहे. हा भव्य पुतळा एका मोठ्या सात-आठ फूट उंचीच्या प्रशस्त चौथ-यावर उभा केला आहे. जैनांशिवाय इतरांना ह्या चौथ-यावर चढण्याची मनाई असल्याने हा लेख प्रत्यक्ष वाचण्याची मी दगदग केली नाही. ह्या चौथ-याभोवताली सुमारे १-१|| एकर चौरस मोकळी जागा सोडून जाड भिंतीचा चौफेर असा भक्कम तट बांधला आहे. एका बाजूने वेशीवजा एक बळकट दरवाजा आहे. कोणी पहावयास गेल्यास टेकडीखालील पुजारी कुलूप उपडून दाखवावयास वर येतो. ह्या टेकडीवरून भोवतालच्या शहराचा डोंगराळ, दाट झाडीचा, विशेषत: पायथ्याशी पसरलेल्या रामसमुद्राचा देखावा फारच रमणीय व स्फूर्तिकारक दिसतो. समोरच दुस-या एका लहानशा टेकडीवर चतुर्मुख बस्ती नावाचे एक जुने व अगदी शाबूत असलेले भव्य जैन देवालय आहे. ह्याला चारीकडे तोंडे आहेत, ही सर्व इमारत छपरासुद्धा दगडी आहे.

“घुमटाराजा” चा मागमूस काही समजत नाही, इतकेच नव्हे तर त्या शब्दाची व्यत्पत्तीही सहज लागण्यासारखी नाही. “गोमटेश्वर” हे नाव गोतमेश्वरावरून वर्णविपर्यास होऊन झाले असावे. पण अशी व्यत्पत्ती स्थानिक जैनांना पसंत नाही. श्री. नेमीसागर म्हणतात की, ज्या बाहुबलीचे पुतळे आहेत तो फार उंचच होता असे नव्हे, तर तो फार सुंदरही होता व त्याला कामदेव असे दुसरे एक नाव होते. त्याच्याशी गोमटेश्वर ह्या नावाचा संबंध आहे. गोमटे म्हणजे सुंदर असा शब्द इकडील कोकणी भाषेत फार प्रचारात आहे. व तो आमच्या जुन्या व बालबोध मराठीत अद्यापि आहे. हा शब्द कामदेव ह्या शब्दापासून आलेला असणे अगदीच अशक्य नाही. तरी श्री. नेमीसागर हे संस्कृतज्ञ असल्याने गाम म्हणजे पृथ्वीवर आणि अहति म्हणजे भटकतो जो तो गामटे असा ह्या पदाचा अर्थ करतात. हा फारच दूरान्वय दिसतो. त्यापेक्षा गोतमराज हाच मूळशब्द असणे अधिक सरळ दिसते. प्राचीन पर्शियाचा सायरस नावाचा प्रसिद्ध राजपुत्र आपल्या बापाचे मरणाचे वेळी दूर कामगिरीवर गेला होता. त्याचा फायदा घेऊन मीडिया देशातील एका मघजातीच्या घोमट नावाच्या ब्राह्मणाने तोतया बनून काही दिवस राज्य बळकाविले. त्याचा पराजय करून सायरसने राज्य परत मिळविले. त्या घोमटाचा गोतम ह्या नावाशी संबंध असल्यास शोधकांनी पहावे. व्यत्पत्ती काहीही असो, पण मूर्तिपूजकांच्या कडव्या शत्रूलाही क्षणभर आपला विरोध विसरावयाला लावणारे गोमटेश्वराचे हे सावळे, गोमटे स्वरूप व सुंदर सात्विक ध्यान काही अवर्णनीय प्रकारचे आहे. ते पाहून आणि दंतकथेतील त्याचे चरित्र ऐकून सहृदय माणसाला भडभडून उमाळा आल्यावाचून रहात नाही. कारकळ शहरात किंवा आसमंतात कोठेही जा, हा पुतळा आपल्या उंच तटाच्याही वरून छातीइतका वर उंच डोकावून पहाताना कित्येक मैलांवर दिसतो. प्रेमळ व भाविक जैन यात्रेकरूंची मने हा गोमटेश्वर कशी हस्तगत करून घेत असेल हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळणे अशक्य!

ह्याशिवाय हिरेअंगडी नावाचा कारकळ शहराचा एक प्राचीन भाग आहे, तेथे नेमीनाथ नावाच्या तीर्थकराची एक बस्ती आहे. ती विस्तीर्ण व पहाण्यालायक आहे. तेथे अंगणात एक भलाभक्कम ४० फूट उंचीचा एकच दगडाचा जयस्तंभ तीन मजली उंच अशा एका चौथ-यावर तोलून उभा केला आहे. त्याचे शिल्पकाम तर दृष्ट लागण्यासारखे सुंदर आहे. घडविणाराची सौंदर्यलोलुपताच नव्हे, तर हा अजस्त्र स्तंभ कोठल्या खाणीतून काढला, तो तेथे उभा कसा केला आणि त्यावर ही प्रमाणशुद्ध आणि नयनमनोहारी कलाकुसरी कशी कोरली ह्याची काहीच कल्पना करता येत नाही. हे सर्व प्राचीन वैभव ता अस्तंगत झाले हे तर खरेच. पण कोंबड्याला उकिरड्यात आढळलेल्या हि-याप्रमाणे आम्हांला अशा प्राचीन जडजवाहिरांची नुसती जाणीवही नाही, ह्याला काय म्हणावे!

इकडील मराठे

ह्या प्रांतात महाराष्ट्रातून आलेली लष्करी पेशाची मराठे जातीची बरीच घराणी आढळली. पण त्यांची कंगाल व अडाणी स्थिती पाहून तर गहींवरच आला. ह्यांना अद्यापि मराठी अडखळत बोलता येते. ती बोली फार अशुद्ध असते. अज्ञान तर असे शंभर नंबरी की, त्यांना स्वत:ची आडनावे सांगता येत नाहीत. कारण ती त्यांना माहीत नाहीत! कित्येकांना तर आडनाव म्हणजे काय ह्याची कल्पना देखील आम्हांला करून देता आली नाही. महाराष्ट्राबाहेर आडनावाचा प्रचार विरळाच. मराठ्यांना व चित्पावनांनाच काय ती आडनावे पण तीही आमच्या जुन्या बखरीतून आतासारखी सर्रास पूर्ण आढळत नाहीत. सुमारे १००-१५० मराठ्यांचा ए स्वतंत्र मोहल्लाच ह्या गावी मी पाहिला. तम्मोजी जाधव नावाच्या एका पुढा-याने बांधलेले अंबाबाईचे देऊळ पहावयास गेलो. तो ते एका ब्राह्मण पुजा-याचे स्वाधीन होते, व तो कुलूप लावून आपल्या घरी गेला होता असे कळले, शेवटी थोडी तसदी सोसून ह्या तम्मोजीची गाठ घेतली. म्हाता-याचा वर्ण, सरळ अणकुचीदार नाक, पाणीदार व किंचित तिखट डोळे वगैरे मराठा छाप पाहून ताबडतोब ओळख पटली. पण स्वारीला आपले जाधव हे आडनाव स्मरण करण्याला बरेच डोके खाजवावे लागले. मग ही वसाहत महाराष्ट्रातून कोणत्या काळी कशी आली हे सांगणे, म्हणजे पूर्वजन्माचा वृत्तांत सांगण्याइतकेच अशक्य झाले ह्यात नवल ते काय?

कामत नावाच्या एका गौड सारस्वताच्या दुकानावर जाधवबांबांची व आमची भेट झाली. कारकळ गाव ह्या सारस्वत उर्फ कोकणी ब्राह्मणाच्या पूर्ण कह्यात गेला होता. भटजीही तेच व शेटजीही तेच. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरूषार्थ त्यांच्याच मुठीत वेळलेले! ते काही असो, जाधवांच्या घराण्याची अत्यंत अंधुक जी माहिती मिळणे शक्य होती ती ह्या कामत शेटजीकडूनच. त्याने चटकन सांगितले की, अंबाबाईचे देऊळ जाधवरावांनीच बांधले. कदाचित मजप्रमाणेच जाधवबाबांनाही ही माहिती नवीनच मिळाली असावी! फरक इतकाच की ती आमच्या स्मरणात अद्यापि आहे. पण जाधवबाबांकडे पुन्हा जाऊन त्यांच्या देवळाविषयी विचारले तर खाजवून खाजवून त्यांच्या डोक्याला टक्कल पडेल, पण देऊळ स्वत:चे हे काही त्यांना कामत शेटजीशिवाय आठवणार नाही. ही येथील मराठ्यांच्या अगदी पुढा-यांची दैना, मग इतरेजनांची काय स्थिती असेल ह्याची कल्पना “विजयी मराठ्यांच्या” वाचकांनीच करावी! तम्मोजी भेटण्यापूर्वी नेमोजी नावाचा दुसरा एक म्हातारा गृहस्थ भेटला. त्याला मागील इतिहासाचे एक दोन प्रश्न केल्याबरोबर आपल्यास पोलिसाचे धरणेच आले असे वाटून तो मुकाट्याने जो पसार झाला, तो मागे वळून पहातो कसचा? ही घराणी पूर्वी किल्ल्याच्या बंदोबस्ताकरिता होती. पण आता त्यांच्या तरवारी तर राहोच पण नांगराचा फाळही त्यांच्या वाट्यास उरला नाही. रोजची मजुरी करून किंवा आपल्या कर्जदाराच्या देवडीवर राखणदाराचे काम करून हे दिवस कंठीत आहेत! अशांना त्यांची गोत्रे कोमती, देवके कोणती, वगैरे प्रश्न विचारण्याचे माझ्या हातून होईना. तम्मोजी, नेमोजी वगैरे दुस-या अशाच नावावरून ह्याच्यावर जैन संस्कृतीचा बराच पगडा बसलेला दिसून आला. ते सर्व सांगण्यास येथे अवकाश नाही.

येथे आम्ही तीनच दिवस होतो. ब्राह्मसमाजाचे प्रसारार्थ आम्ही एक कीर्तन केले. काँग्रेस कमिटीमार्फत थोडीबहुत अस्पृश्यनिवारणार्थ चळवळ झाली होती. तिचे रडगाणे ऐकले. आमचे यजमान (ज्यांचे पाहुणे आम्ही) श्रीयुत के. पद्मनाभ कामत, एम. ए., बी. एल., येथील मुख्य पुढारी हे स्वत:च ईस्टरचे सुट्टीत सार्वजनिक कामाकरिता परगावी गेले होते. म्हणून येथे विशेष काही न करिता आम्हांला सह्याद्रीची वाट धरावी लागली. पण घुमटाराजाकडे पुन: पुन: वळून पाहिल्याशिवाय कारकळहून आमचे पाऊल काही केल्या उचलवेना. आज जवळजवळ ६०० वर्षे उन्हात, वा-यात कोकिळ-कूजित आणि विजेचा कडकडाट पायाखालील जगतातील पाप, पुण्ये, भौतिक व नैतिक द्वंद्वे इत्यादी अनेक प्रकार मैत्रिभावनेच्या समदृष्टीने पहात, तटस्थ पण उदासीन नव्हे, अशा उभ्या राहिलेल्या गोमटेश्वरा, तुला आम्ही कसे विसरावे! प्रतिभाशाली चित्रकाराने निर्माण केलेली, अनेक आधुनिक व प्राचीन विभूतींची चित्रे व मूर्ती मी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व इटाली वगैरे पाश्चात्य पुढारलेल्या देशांत पाहिल्या. नेल्सन, नेपोलियन, शेक्सपिअर, सीझर, मिल्टन, डांटे इ. ऐहिकच नव्हे तर सेंट पॉल व मोझेस इ. पारलौकिक मार्गदर्शकांच्या उठावदार मूर्ती मी अनेक वेळा निरखून पाहिल्या. पण त्या कोणीही घेरले नाही असे ह्या घुमटाराजाने मला का घेरले, ह्याचा मी विचार करू लागलो. दूरच्या गोष्टी सोडू, कलकत्त्यात जनरल औटरॅमचा अश्वारूढ पुतळा चौरंगीच्या मैदानावर उभा आहे. ५७ सालच्या बंडात बंडखोरांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी, चवताळून झेप घालणा-या वाघाप्रमाणे आपल्या घोड्यावरून मागे वळून तलवारीचा वार करीत आहे असा आव ह्या पंचरशी पुतळ्याने दाखविला आहे. तो पाहून क्षणभर अंगावर शहारे उभारतात. पण ते क्षणभरच. लगेच ह्या पाशवी शक्तीचे असले उर्मट प्रदर्शन पाहून तिरस्काराच्या लाटा उसळू लागतात. त्या दाबणे जवळजवळ अशक्य होऊन जाते. पण घुमटाराय! तुझ्या कपाळावरील गांभीर्याच्या व हनुवटीवरील माधुर्याच्या रेखा माझ्या काळजात अद्यापि खोल खोलच रूतत आहेत, ह्याचे रहस्य काय असेल बरे?

किप्लिंगने म्हटल्याप्रमाणे:

East is East and West is West
Never the twain shall meet!

हेच असेल काय ह्याचे रहस्य? काव्याचे व कलेचे हृदय म्हणजे पावित्र्य उर्फ धर्म हेच होय. हे हृदयच आपल्या अंगाबाहेर टाकून कवीने अथवा शिल्पकाराने आपली कितीही ओढाताण करून अजब सृष्टी निर्माण केली तर ती नुसती आश्चर्यकारक होईल, पण जड जीवाला उद्धारक होणार नाही. आमचे प्राचीन शिल्पकार पुष्कळदा धर्माने झपाटलेले असत. म्हणून त्यांच्या हातून अशा सृष्टी निर्माण झाल्या. पाश्चात्य शिल्पकार पुष्कळदा भक्तीपेक्षा चातुर्यावर भिस्त ठेवून कामाला लागतात म्हणून त्यांच्या कृतीला तादृश किंमत येत नाही. असो.

तजो मन लोभ चतुरायी|
भजो हरीचरण सुखदायी||१||

हेच खरे, दुसरे कलेचे रहस्य काय असावयाचे?

सही नाही, सहानुभूती !

ईश्वरी संकेताप्रमाणे ज्या लोकमान्य टिळकांशी आदरपूर्ण विरोध-भक्तीशिवाय माझा कधी फारसा संबंध आला नाही, त्यांच्या आठवणी मी इतक्या लवकर प्रसिद्ध करण्याने सामान्य वाचकांचा तरी निदान समजापेक्षा गैरसमजच जास्त होईल अशी मला भीती आहे. म्हणून रा. बापट ह्यांच्या चिकाटीस मी प्रथम बळी पडलो नाही. पण शेवटी त्यांच्या स्तुत्य हेतूपुढे हार खाऊन मी पुढील आठवणी देत आहे.
ह्या लेखात मी लाघवी स्तुती व मत्सरी निंदा सारख्याच दूर ठेवून सात आठवणींचे एकंदर दहा पॅरे लिहिले आहेत. उद्देश हा की, ह्या थोर पुरुषावर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी वेळी अवेळी दुर्गुणांचा आरोप केला ते सर्वच आणि सर्वांशी खरे नाहीत, हे मी समक्ष पाहिलेल्या उदाहरणांनी दाखवावे. टिळक राजकारणांध, समाजकारण विन्मुख, धर्मसुधारणेचे वैरी, इतर जातींचे द्वेष्टे, आपल्या चुका कधीच दुरुस्त न करण्याइतके हेकट व मठ्ठ डोक्याचे, दुस-याच्या सत्प्रयत्नांकडे नेहमी मत्सराच्या विषारी दृष्टीनेच पहाणारे इ. नैतिक दोषारोप ऐकून माझे कान किटले आहेत. ज्या प्रसंगी मी त्यांच्याकडे अत्यंत निरखून पाहात असूनही हे दोष अति सूक्ष्म प्रमाणात दिसले असे काही, अंशतः दिसले असे काही व मुळीच दिसले नाहीत असे काही प्रसंग मी निवडले आहेत. अर्थात सार्वजनिक गुणच त्यांच्यात अधिक प्रमाणात होते हे मी निराळे सांगावयास नकोच. एरव्ही त्यांच्या शत्रूंनीही त्यांची गणना थोर पुरुषात कशी केली असती बरे? आणि मी तरी या आठवणींची उठाठेव का केली असती!
(१) ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्माचे अध्ययनासाठी हिंदुस्थानातील ब्राह्मसमाजाच्या मार्फत पाठविण्याची इ. स. १९०१ मध्ये जेव्हा माझी निवडणूक झाली तेव्हा तिकडे जाण्यापूर्वी श्री. बळवंतरावजींचे दर्शन घेऊन त्यांचे प्रत्यक्ष विचार ऐकण्याची मला इच्छा झाली. त्यावेळी ते (फूट नोट – लो. टिळक ह्यांच्या आठवणी व आख्यायिका – खंड २ रा – पृष्ठे २०० ते २०६.)
लोकमान्य झाले होते, तरी लोकमान्य ही पदवी प्रचारात आली नव्हती. मी एक लहानसा अप्रसिद्ध विद्यार्थी, आचारविचार, ध्येय वगैरेत त्यांच्याशी माझे मुळीच साम्य ना संबंध, अशा स्थितीत त्यांच्याकडे जाण्यात मी धाडसच करीत आहे, असे मला वाटले. धर्माध्ययनासाठी विलायतेस जातो ही गोष्ट ऐकून तर ते खात्रीने नाकच मुरडतील अशी खूणगाठ बांधून मी गेलो तेव्हा ते अगदी जुन्या रीतीने जमिनीवरच बसले होते. जणू काय फार दिवसांचा लोभ आहे अशा सलगीने त्यांनी मला ओढून अगदी आपल्याजवळ बसवून घेतले आणि सामान्यतः उदारधर्मासंबंधी व तुलनात्मक विवेचनपद्धतीसंबंधी अगदी मोकळ्या मनाने व तज्ञपणाने आपले प्रागतिक विचार मजपुढे बोलून दाखविले, इतकेच नव्हे तर आमच्या प्रार्थनासमाजासंबंधी देखील काही बाबतीत त्यांनी आपली गुणग्राहकता प्रकट केली. आमच्या हिंदुतत्त्वज्ञानात द्वैत, अद्वैत, विशिष्ट द्वैत इ. पुढे जे तट आणि उपासनेत शैव, वैष्णव, शाक्तादी पंथ माजले. त्या योगे आपली दृष्टी विकृत होऊ न देता व त्यांचे ऐतिहासिक महत्त्वही पण कमी न करता उपनिषद काळात हिंदूंची जी निर्भय व स्वतंत्र दृष्टी होती तीच राखून पौरस्त्य, पाश्चात्य आचारविचारांची तुलना करण्यास शिका, असा त्यांनी प्रेमाचा इषारा दिला. मला सानंद आश्चर्य वाटले.
(२) परत आल्यावर धर्म सुधारण्याच्या प्रयत्नाशिवाय अस्पृश्यता निवारणाचा विशेष प्रयत्न व त्यांची देशभर घटना करण्याचे काम मी चालविले. त्याला त्यांनी स्वतः कधी विरोध केला नाही, उलट प्रसंगविशेषी न मागता वर्गण्या पाठवून दुरून का होईना पण सहानुभूती राखिली होती. इ.स. १९०७ च्या सुमारास पुण्यास जी. रा. भाजेकर, डॉ. मॅन प्रभृतींनी मद्यपानाविरोधी पिकेटिंगची जोराची चळवळ चालविली होती, त्यात लोकमान्यांची पूर्ण मदत होती. ह्याचसंबंधी मुंबईस करीरोड स्टेशनजवळ गिरणी कामगारांच्या एका प्रचंड जाहीर सभेपुढे त्यांचे आवेशयुक्त भाषण झाले. दुसरेच दिवशी ते आमचे परळ येथील मिशन पहाण्यास येणार होते, पण लवकरच त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला होऊन त्यांना सहा वर्षे कारागृही जावे लागल्याने तो योग आला नाही.

(३) पुढे इ. स. १९१६/१७ च्या सुमारास लखनौच्या काँग्रेसमध्ये हिंदु-मुस्लीम स्कीम पास झाली, त्यात रा. बळवंतरावजींचा पुढाकार होता. ह्या स्कीमला बहुजनसमाजाचा पुरस्कार नाही, केवळ वरिष्ठ वर्गातील चार सुशिक्षित चळवळ्यांनीच हे काहूर माजविले आहे असे अर्थाचे आक्षेप इंग्लंडातील सुधारणाद्वेष्ट्यांकडून घेण्यात येत होते. माँटेग्यूसारख्या सुधारणावाद्यांनाही अशा आक्षेपास हिंदुस्थानातील बहुजन समाजाकडून उत्तर जावयास पाहिजे होते. अशा आणीबाणीच्यावेळी मद्रासेकडील चळवळीच्या अनुरोधाने महाराष्ट्रातही ब्राह्मणेतर पक्षाची अगदी नवीन घटना चालू होती. पण ह्या पक्षाकडून राष्ट्रीय सभेला पाठिंबा मिळण्यासारखा नव्हता व ह्या पक्षाचे भावी सामर्थ्य व महत्त्व ओळखण्याइतकी दूरदृष्टी व भरीवपणा तेव्हाच्या कोणत्याही विद्येत पुढारलेल्या पक्षात आलेला नव्हता. म्हणून मागासलेल्या सर्व जातींना किंबहुना अस्पृश्य मानलेल्या वर्गातील सर्व जातींनाही तेव्हाच्या राष्ट्रीय मुहूर्ताचे महत्त्व समजावून देऊन स्वराज्याच्या योजनेला लहान-थोर सर्वांची सहानुभूती मिळविणे आम्हाला भाग पडले. ता. २६ ऑक्टोबर १९१७ रोजी सायंकाळी ५ वाजता शनिवारातील रा. बोमे पाटील ह्यांचे घरी "मराठा राष्ट्रीय संघाची" स्थापना झाली. संघाचे पहिले काम म्हणून गुरुवार ता. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाज्यासमोरील भव्य पटांगणात शहरात व भोवतालच्या भागात रहाणा-या सर्व जातींच्या, धर्माच्या व पंथांच्या लोकांची सभा भरली होती. लखनौ येथे राष्ट्रीय सभेने पास केलेल्या स्वराज्याच्या योजनेस पुष्टी देणे हा ह्या सभेचा उद्देश होता. सभेस सुमारे दहा हजारांपर्यंत लोकसमुदाय हजर असावा असा अंदाज आहे. रा. त्रिंबकराव आवटे वगैरे मंडळी लोकमान्यांकडे गेली. ही चळवळ तेव्हाच्या राष्ट्रीय पक्षाच्यामार्फत व्हावी असा मला लोकमान्यांचा रोख दिसला तो मला इष्ट वाटला नाही, कारण अशा ह्या चळवळीच्या बहुजनमान्यतेला व स्वतंत्रपणाला बाध येऊन तिने दिलेल्या स्वयंप्रेरित पाठिंब्यालाही उणेपणा येईल असे मी आपले स्पष्ट मत लोकमान्यांना कळविले. मराठे, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग, सुतार, सोनार, शिंपी, प्रभू, माळी, वंजारी, चांभार, कासार, कोष्टी, रामोशी, गवळी, परीट, गुजर, वारकरी संप्रदाय इतक्या १८ जातींचे व संप्रदायांचे प्रत्येकी दोन दोन असे वक्ते मुख्य ठरावावर बोलले. केवळ ब्राह्मणांचे प्रतिनिधी ह्या नात्याने लोकमान्यांनी बोलावे अशी मी ह्या सभेचा अध्यक्ष ह्या नात्याने विनंती केली व ती त्यांनी आपला पक्षाभिमान तात्काळ बाजूस ठेवून मान्य केली. "आता आपल्याला पूर्वीचे स्वराज्य नको असून पाश्चात्य धर्तीवरील स्वराज्य पाहिजे आहे." असे सांगून ते म्हणाले, "आपल्या जातिभेदामुळेच येथे ब्रिटिश राज्य स्थापन झाले आहे व जातिभेद असाच पुढे चालू राहाणार असेल तर स्वराज्यातही आमची अशीच अधोगती होईल," असे स्पष्ट बोलून त्यांनी आपली समयानुकूलता प्रकट केली !
वरील उतारे मराठा राष्ट्रीय संघाच्या नियमाच्या पुस्तकातून घेतले आहेत.
(४) टिळक राजकारणात होते किंवा राजकारणाच्या देवीपुढे समाजसुधारणेचे वासरू मारण्याकरिता त्यांचा हात नेहमी वर होता असे नव्हे, हे दाखविण्याकरिता मी खालील आठवण देत आहे.
सन १९१७ साली राष्ट्रीय मराठ्यांची पहिली अखिल भारतीय परिषद आम्ही बेळगावास भरविली. अर्थात टिळकांचे बगलबच्चे व "ब्राह्मणाळलेले" ह्या आरोपाच्या आहेराची पुष्कळशी पार्सले आमच्याकडे आली. इतक्यात अथणीची जिल्हा परिषद थाटाने झाली, तेथे लोकमान्य होते. राष्ट्रीय मराठे ह्या दृष्टीने टिळक कंपूने त्यावेळी आमची किंचित जास्त बडदास्त राखली, हे खरे. मी तर त्यावेळी टिळकांचा पंचीप्याराच बनलो होतो ! पण मुद्द्याची गोष्ट पुढेच आहे. टिळकांचा राजकारणांधपणाचा नंबर कोणता लागतो हे पाहण्याची मी ह्यावेळी अमोलिक संधी साधली. त्यांना मी अगदी एकांतात नेऊन विचारले की, डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम सोडून देऊन मी स्वतःला केवळ राजकारणालाच वाहून घेऊ काय ? त्यांनी तात्काळ "नको" म्हटले ! कित्येकांना ह्या उत्तरातही अट्टल राजकारणाचाच वास येण्याचा पूर्ण संभव आहे. पण ह्या विषयावर मन मोकळे करून एक तासभर टिळक जे बोलले ते सारे मायावी म्हणण्याइतके शाट्य त्यांच्यात नव्हते, उलट होते असे म्हणणारातच ते असण्याचा संभव मला दिसू लागला. भाषणाचा तपशील देण्यात अर्थ नाही. डिप्रेस्ड क्लासेस मिशनवर केसरीकार म्हणून नसला तरी टिळक म्हणून त्यांचा विश्वास बसून चुकला होता, व तो त्यांनी खालील आठवणीत दाखविल्याप्रमाणे मिशनच्या परिषदेत भाग घेऊन व्यक्त केलाही.
(५) पुढील वर्षी मार्च महिन्यात मुंबईत अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड ह्यांच्या अध्यक्षतेखाली भरली. हिचे मूळ किंचित मनोरंजक आहे. डॉ. कुर्तकोटी हे करवीर पीठाचे शंकराचार्य असताना एकदा आपल्या लवाजम्यासह मुंबईतील कोल्हापूर महाराजांच्या पन्हाळा लॉजमध्ये येऊन उतरले. पूर्वाश्रमीचे ते माझे मित्र असल्याने, त्यांनी मला भेटीस बोलाविले. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर अस्पृश्यता निवारणीची एक परिषद मोठ्या प्रमाणावर भरवावी व सर्व हिंदुस्थानात स्वतंत्रपणे भटकत मी लोकमत अजमावून पहावे व ह्या बाबतीत काही प्रत्यक्ष पुरावा मिळवून दिल्यास आपण शंकराचार्य ह्या नात्याने आज्ञापत्र काढू, मात्र ह्या कामी लोकमान्याचे सहकार्य मी संपादन करावे असा त्यांचा सल्ला होता. शकराचार्यांच्या आज्ञापत्राची देशस्थ व कोकणस्थ ब्राह्मणांमधील बेटी व्यवहाराचे बाबतीत कशी वासलात लागली हे मला माहीत असल्याने अशा आज्ञापत्राचे मला महत्त्व वाटेना. लोकमान्यांच्या सहकार्याविषयीही शंका नव्हती. तथापि मोठ्या प्रमाणावर एक स्वतंत्र परिषद करून देशातील प्रांतोप्रांतींच्या सर्व जातींच्या वेचक प्रमुख गृहस्थांच्या सह्या एका स्पष्ट अखिल भारतीय जाहीरनाम्यावर घ्याव्या असे मला बरेच दिवस वाटत होतेच. मी ह्या कार्यास ताबडतोब लागलो. लोकमान्य त्यावेळेस इंग्लंडला जाण्याच्या गडबडीत होते तरी ते वेळात वेळ काढून एकदा मजबरोबर पन्हाळा लॉजमध्ये श्रींचे दर्शनास गेले. श्रींपुढे सुमारे २/३ डझन नारळांनी भरलेली ताटे ठेवून लोकमान्य आदराने बसलेले पाहून मला कौतुक वाटले. आमच्या तिघांच्या विचारे परिषद भरली. पण अखेरीस शंकराचार्यांना येण्याला अवसर मिळाला नाही. तरी परिषद यशस्वी रीतीने पार पडली. इतर कामाच्या गर्दीत लोकमान्यही पुण्याहून मुद्दाम मुंबईस जाण्यास काकू करू लागले. पण मी देणेक-याप्रमाणे धरणेच घेतल्यामुळे बिचारे करतात काय ? लोकमान्य होणे हे सुखाचे नाही. तो काट्याचा मुकूट डोईस कसा खुपतो, विशेषतः पुढे जाहीरनाम्यावर सही करण्याचे नाकारताना हा मुकूट त्यांच्या कपाळावर कसा रुतला हे माझ्या प्रत्यक्ष दृष्टीस आले, कारण केसरीकर्ता म्हणून नव्हे तर केवळ टिळक म्हणूनच मी परिषदेस येतो असे बजावून सांगण्यास लोकमान्य विसरले नाहीत.

काँग्रेसने अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी घेऊन आपल्या कार्यास त्यांचा पाठिंबा मिळवावा अशा अर्थाचा ठराव लोकमान्यांनी ता. २४ मार्च १९१८ रोजी सकाळच्या बैठकीत आणिला. त्यावेळी लोकसमुदाय ७००० वर जमला होता. मंडपाच्या बाहेरही सारखी रेटारेटी चालू होती. लोकमान्यांसही आवेश चढून त्यांच्या गर्जना मंडपाबाहेर रस्त्यातच नव्हे तर पलीकडील चाळीत राहणा-या लोकांच्या कानांवरही आदळत होत्या. "पेशव्यांच्या वेळीही अस्पृश्यांनी भरलेल्या पखालीतील पाणी ब्राह्मण प्याले".... अस्पृश्यता देवास मान्य असेल तर मी त्यास देवच म्हणणार नाही. (हे उद्गार ऐकून जो गजर उडाला त्यात मंडप कोसळून पडतोसे वाटले) ...... मी येथे जरी आज शरीराने प्रथमच आलो आहे, तरी मनाने ह्या चळवळीत नेहमीच आहे..... जुन्या काळी ब्राह्मणाच्या जुलुमाने ही चाल पडली, हे मी नाकारीत नाही. पण ह्या रोगाचे आता निर्मूलन झालेच पाहिजे. वगैरे त्यांच्या तोंडचे शब्द भावी इतिहासात दुमदुमत राहतील.
पुढे मी जाहीरनाम्यावर त्यांची स्वतःची सही घेण्यास गेलो. त्यावेळी सरदारगृहात लोकमान्य होते. भोवताली त्यांची प्रभावळ बसली होती. तात्यासाहेब केळकरच नव्हे तर दादासाहेब खापर्डे ह्यांनी देखील आपला नबाबी हुक्का एकीकडे सारून तात्काळ आपली सही केली. पण लोकमान्य कचरू लागले. एक वेळ ते पुढेही आले पण दादासाहेब करंदीकर आडवे आले. शेवटी लोकमान्य अगदी काकुळतीला येऊन उभे राहून त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेविले व आर्जवू लागले की, इंग्लंडातून परत येईपर्यंत तरी मी हा आग्रह सोडावा." मी त्यांना स्पष्ट बजावले की, सही न देण्याने त्यांना स्वतःलाच नव्हे तर त्यांच्या पक्षालाही खाली पहावे लागणार आहे. पुढे माझ्या समजुतीसाठी मला एकट्यालाच एका दालनात नेऊन सामाजिक सुधारणेशी आपला कसा संबंध आहे हे नागपूरच्या पहिल्या काँग्रेसपासून सुधारकांच्या कंपूतून आपण कसे फुटलो व का फुटलो तरी आपण सुधारकच कसे आहो वगैरे बराच चित्ताकर्षक खासगी वृत्तांत निवेदन केला. तो सर्व देण्याला येथे अवकाश नाही. पण अखेर सही दिली नाहीच. पुढे ह्या सर्व प्रकरणाला "जागरूक"कारने ही शिंद्यांची सर्कस अशा जाड्या टाईपातले नाव दिले ह्यात काय आश्चर्य !
(६) लोकमान्य इंग्लंडाहून परत पुण्यात येतात तोच येथे सक्तीच्या शिक्षणाची धुमश्चक्री चालू होती. पुण्याच्या म्युनिसिपालिटीत महाजंगी वाद, सबकमिट्यांच्या बैठकी, आकडेमोड, नागरिक सभा इ. प्रकार होऊन शेवटी एके दिवशी बायकांची एक प्रचंड मिरवणूक निघून तिने म्युनिसिपालिटीत चाललेल्या एका साधारण सभेस गराडा दिला. अखेर शहराकडे रेक्लेम पाठविण्याचा विचार घेण्यासाठी विरुद्ध पक्षाने किर्लोस्कर थिएटरात एक जाहीर सभा बोलाविली. त्यावेळी बळवंतरावजी सिंहगडावर आजारी होते. तरी चालकांनी त्यांना सभेत मुद्दाम आणिले. मी त्यांचेजवळ बसलो होतो. त्यांनी ह्या दगदगीत पडावयाचे नव्हते, असे सांगून निदान त्यांनी ह्या खवळलेल्या वातावरणात बोलण्यास तरी उभे राहू नये म्हणून मी पुष्कळ विनवले. पण तरी ते बोलू लागताच मागून एक तरुणांचा तांडा तुटून आमच्या अंगावर बेफाम आला व पुढूनही अंड्यांचा आणि भज्यांचा मारा होऊ लागला. शेवटी लोकमान्यांना बाहेर काढून कशीबशी सभा मध्येच बंद करून चालकांना घरी जावे लागले.
(७) माझी त्यांची शेवटची भेट सोलापुरास गेल्या प्रांतिक सभेच्यावेळी झाली. तोही धामधुमीचाच प्रसंग होता. सक्तीच्या शिक्षणाचे बाबतीत मी ज्ञानप्रकाशात त्यांच्या विरुद्ध फार कडक लेख उघड सहीवर लिहिले. ह्याबद्दल ते मजवर फार रागावले होते, हे मला पुरे माहीत होते. तरी लवकरच एक अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत मोठे सहभोजन करण्याचा बेत काही पुढा-यांनी केला होता. अशा भोजनात मला स्वतःला काहीच महत्त्व वाटत नव्हते व अद्यापि नाही, तरी पण लोकमान्यांना अशा भोजनाला बोलवावे व ते काम मीच करावे अशी मला मंडळीने गळ घातली व मी त्यांच्याकडे गेलोही. लोकमान्य वरून कठोर पण आतून कोमल किती होते ते मला तेव्हा नीट नजरेस आले. सुरतच्या काँग्रेसमध्ये किंवा वर वर्णिलेल्या किर्लोस्कर थिएटरातील सभेत किंवा तशा इतर प्रसंगी विरूद्ध असलेल्या प्रचंड जनसमुदायापुढे ते कधी नमत नसत. जुलमी सरकारची ज्यांनी कधी भीड राखिली नाही तेच बळवंतराव एकाद्या लहानसहान प्रसंगी एकाद्या व्यक्तीच्या भिडेस पडून अगदी मवाळ होत ! ते कसेही असो. त्यांची रागाची पहिली तुफानी फैर मजवर झडून गेल्यावर ते लगेच शांत झाले, आणि सोलापुरासच काय पण प्रत्यक्ष पुण्यासही असे सहभोजन झाल्यास त्यांनी आनंदाने येण्याचे कबूल केले. जाहीरनाम्यावर सही न करण्याने त्यांच्यावर जे वर्षभर काहूर माजले होते ते सर्व ह्या सहभोजनात मिळून पचविण्याचा त्यांचा मुत्सद्दी विचार मला कळला. पण उपयोग काय ! काळाने त्यांच्यावर लवकर झडप घातल्याने सर्व ग्रंथ आटोपला, आता नुसत्या आठवणी उरल्या !

  1. समाजसेवेची मूलतत्त्वे
  2. सत्यशोधकांना इशारा अथवा नव्या पिढीचे राजकारण
  3. संसारसुखाची साधने
  4. संपादकीय
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
Page 3 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी