1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

नीती-३

आम्ही ज्या आध्यात्मिक जीवनाच्या नीतीचे प्रतिपादन करीत आहो तिची इतर नीतीच्या तुलनेने पाहता काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात. त्यांपैकी काही थोडी येथे सांगता येतील.

आध्यात्मिक नीती संयोजक आणि प्रागतिक आहे, केवळ नियामक नाही. अनेकविध नियमांच्या साखळीने जीवनाला बद्ध करून त्या नियामांच्या परिपूर्तीवरच कर्तृत्वशक्तीचे सर्व अभिसरण अवलंबून ठेवण्याचा ह्या नीतीचा हेतू नाही, उलट आमच्या सर्व शक्तींचा विकास करून त्यांच्या विजयाला अवसर देणे आणि तद्वारा मानवी क्षेत्रांतर्गत प्रत्येक व्यवहाराचे बाबतीत चैतन्यसाम्राज्याच्या मर्यादा विस्तृत करणे हा ह्या नीतीचा महान हेतू आहे. आध्यात्मिक जीवनाप्रमाणे तज्जन्य नीतीदेखील मायातीत स्वरूपाचीच अर्थात असणार. नीती म्हणजे आमच्या ज्या केवळ कालपरत्वे बदलत जाणा-या गरजा असतील त्या भागविण्याचे एक साधन असा नीतीचा क्षुद्र अर्थ नाही. कालविच्छिन्न शुभाशुभाची ख-या नीतीला गणना नाही. परंतु यद्यपि आध्यात्मिक नीती कालातीत आहे आणि तिच्या प्रेरणेमुळे अमूक केवळ युगधर्म व अमूक सनातन धर्म अशी विभाग प्रतिपत्ती होते तरी तिच्या स्वत:च्या कार्यक्षेत्रात अमूक कार्य आणि अमूक अकार्य अशा विविक्तीलाही जागा आहेच आणि खरोखर कालवशात आम्हांला जे निरनिराळे अनुभव येतात त्यात खोल शिरून त्याचा अखेरचा ठाव घेतल्यानेच आमच्या नीतीला खरी बळकटी येणार आहे आणि एवढ्याच दृष्टीने पाहता आम्हीही एक प्रकारे आधुनिक नीतीचा पुरस्कार करीत आहो, येरवी जिला प्रस्तुत काळी “आधुनिक” असे नाव मात्र प्राप्त झाले आहे तिचा आम्ही निश्चयाने त्याग करीत आहो. कारण ही “आधुनिक” नीती बहुतांशांनी व्यक्तीच्या इच्छा आणि लहरी ह्यांनाच वश होणारी असते असे आढळून येते.

वरील विवेचनावरून हे उघड होते की आध्यात्मिक नीती म्हणजे निसर्गाचाच एक परिणाम नव्हे. ती मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाचा कोणताही भाग किंवा त्याच्या सामाजिक संबंधाचे कोणतेही पर्यवसानही नव्हे, तर जीवनाच्या विकासामध्ये आध्यात्मिक नीतीचा उदय म्हणजे एकादा अतिशय महत्त्वाचा संस्कार होय. तो एक नवीनच उपक्रम म्हणावयाचा. (ह्या उदयाला जीवनाचे प्राकृतातून संस्कृताप्रत आक्रमणच म्हणता येईल.) नीतीच्या पायावर जीवनाची नवीन घटना करावयाची झाल्यास वर सांगितल्याप्रमाणे एक युद्धच व्हावयाला पाहिजे आणि ह्या युद्धामध्ये विरूद्ध पक्षाकडील मुख्य किल्ला कोणता आणि युद्धाचा रोख कोणत्या दिशेने मुख्यत: वळवावयाचा हे ठरविण्यावरच आमच्या आयुष्याचे व आचरणाचे सर्वसाधारण धोरण अवलंबून राहणार आहे. प्रथमत: मनुष्याचा जो इंद्रियस्वाभाव आहे त्याच्याशी ह्या नीतीने आपले धोरण ठाम ठरविले पाहिजे. चैतन्याचा एकदा एक विविक्षित रोख ठरल्यावर त्यापुढे इंद्रियांनी आपली बाजू पडती ठेविली पाहिजे हे खरे. पण आम्ही वर निर्दिष्ट केलेच आहे की निसर्ग आणि इंद्रिये ह्यांच्या हक्कांची योग्य संभावना न करता केवळ वैराग्याच्या भरीस पडून त्याचे नि:शेष निर्मूलन करण्याच्या हटवादास आम्ही बळी पडू तर पुन्हा समष्टिरूप जीवनाची घडी बिघडेल आणि नैतिक कार्याच्या गांभीर्याला धक्का पोहोचेल.

बाहेर सामाजिक जीवनामध्ये तसाच आत व्यक्तीच्या अंत:करणामध्ये हल्ली जो आध्यात्मिक जीवनाचा खोटा आणि नकली आविर्भाव होत आहे त्याच्या अगदी उलट ह्या जीवनाची खरी आणि टिकाऊ घटना करणे ही नीतीची मुख्य कामगिरी होय. म्हणून सामाजिक संबंधांचा सर्वस्वी त्याग करून केवळ व्यक्तिगत जीवनाचाच अवलंब केल्यानेही वरील कार्य साध्य होणार नाही. जीवनाची हल्ली जी सामान्य अवस्था पाहण्यात येते तिच्यावरून त्याच्या आध्यात्मिकत्वाचा किंवा स्वातंत्र्याचा विकास होईल असा काही सुमार दिसत नाही. जीवनामध्ये बीजस्वरूपाने असणारी जी मूळ चैतन्याची प्रचोदना, तिचा अन्य गौण हेतू साध्य करून घेण्यासाठी एक साधन अशा भावनेने हल्ली उपयोग करून घेण्यात येत आहे, हा मिथ्याचार होय. तसेच आपण चैतन्याचाच अनुसार करावा आणि त्यासाठी आपल्या इतर सर्वस्वाची होळी करून टाकावी अशा भावनांमध्येच साधारणत: गुंतून राहण्यात मनुष्यमात्रास मोठी गोडी वाटते. ह्या तमोमय आत्मवंचनेतून मुक्त होऊन जीवाने प्रबोध आणि शक्ती संपादन करणे हे ह्या (नूतन) नीतीचे मुख्य लक्षण होय. ह्या असत्याने भरलेल्या जगात सत्य आणि प्रामाणिकपणा रोवण्याकरिता जीवाला प्रथम निष्ठेची आणि असामान्य धैर्याची फार मोठी जरूरी भासते.

अतएव ह्या (नवीन) नीतीमुळे जीवनाचे ठायी मोठा विरोध जुंपून राहतो. औदासिन्य आणि अव्यवस्था ह्यांच्या शय्येवर हल्ली जो जीव झोपी गेलेला आहे त्याला जागा करण्याचे तिचे मुख्य काम आहे आणि म्हणून ह्या भागाचे आरंभी निर्दिष्ट केलेले आणि हल्ली चहूंकडे प्रचलित असलेले नीतीचे जे निरनिराळे प्रकार आहेत त्यांच्याशी ह्या (नवीन) नीतीचा विविक्षित संबंध जडला पाहिजे. ह्या आध्यात्मिक नीतीला आपल्या स्वत: सिद्धस्वरूपाची खात्री पटली असेल तर तिला इतर गौण नीतीमध्येही सध्याचा काही अंश आहे हे सहज ओळखता येईल आणि इतरत्र सत्याचे दिसून येणारे अंश तिने मान्य केल्याने ती स्वत:च केवळ निरनिराळ्या चिंध्या बनविलेली एक वाकळ आहे असा अर्थ निष्पन्न होण्याची भीती नाही. (१) मागील भागात आध्यात्मिक जीवन आणि धर्म ह्यांचा जो संबंध निर्दिष्ट करण्यात आला, त्यावरून धर्माची नीतीला कोणत्या प्रकारे मदत होण्यासारखी आहे हे कळेल. (२) आध्यात्मिक जीवनाला जर सर्वसाधारण स्वरूप यावयाला पाहिजे असेल तर संस्कृतीच्या नीतीचीही त्याला जरूरी आहेच. (३) सामाजिक जीवनाच्या अंतर्घटनेमध्ये सामाजिक नीतीचे महत्त्व कळून येते. (४) शिवाय बौद्धिक नीतीने सुचविल्याप्रमाणे नीती म्हणजे केवळ मानवी गरजा भागविण्याचे एक साधन नसून मनुष्यातील अशी तिची स्वतंत्र पदवी आहे हेही खरे. (५) शेवटी व्यक्तिगत नीतीच्याही सर्व गरजा आध्यात्मिक नीतीमध्ये भागण्यासारख्या आहेत. पण हे सर्व केव्हा शक्य होईल? आमचे जे परस्परविरोधी स्वानुभव आहेत त्या सर्वांच्याही पलीकडे आमच्या जीवनाचे मूळ आहे आणि ते सर्वकाल विच्छिन्न व स्वतंत्र असे आहे. म्हणजे स्वयंभू आध्यात्मिक जीवनामध्येच आमची ही पदवी आहे असा साक्षात्कार जेव्हा घडेल तेव्हाच वरील सर्व प्रकार शक्य होतील; एरव्ही नाहीत. आणि ह्या स्वतंत्र पदवीच्या प्राप्तीविना आमच्या ह्या कालमर्यादित क्षेत्रामध्ये ती पण आण्ही एक पाऊलभरसुद्धा मार्ग वस्तुत: पाहता आक्रमिला असे म्हणता येणार नाही.

विश्वंभरे विश्व सामाविले पोटी|
तेथेचि शेवटी आम्ही असो||

नीती-१

 

धर्माविषयातील वाद आणि गोंधळ ह्यांमुळे अगदी बेजारून पुष्कळ जिज्ञासू, नीतीचा प्रांत कमी वादग्रस्त आणि जास्त सुगम असेल अशा समजुतीने तिकडे वळतात. नीतीची अगदी मूलततत्त्वांचीही किंमत न ओळखणारे असे कोणी असलेच तरी फारच कमी निघतील. विश्वासघातापेक्षा प्रामाणिकपणा बरा. द्वेषापेक्षा प्रेम श्रेष्ठ ह्याविषयी मुळीच वाद नाही. पण हे मूलतत्त्वासंबंधी मतैक्य पुढे कोठपर्यंत टिकते व ख-या जिज्ञासूच्या मार्गात त्याला ह्या तात्त्विक समेटीचा कितपत फायदा मिळण्यासारखा आहे, ह्याविषयी जबर शंकाच आहे. अगदी सारख्याच आध्यात्मिक प्रगतीच्या दोन जरी भिन्न व्यक्ती घेतल्या तरी त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिविषयक व्यवहारात नैतिक मेळ बसविणे फार दुर्घट होते. केवळ नीतीलाच मानणारे जे काही थोडे अलीकडे नवीन समाज निघाले आहेत त्यांनी नीतीसंबंधी सामान्य सिद्धांत बसविण्याच्या भानगडीत न पडता नुसती व्यावहारिक नीती एवढेच काय ते आपल्या कर्तव्याचे क्षेत्र केले तर त्यांना कोणाचा विरोध फारसा येणार नाही. पण आम्ही जेव्हा व्यक्तिविषयक आचरणाच्या गोष्टीचे आलोचन समष्टीरूपाने करू लागतो आणि त्यांचा दृढ असा काही पाया असेल तो शोधू लागतो तेव्हा आमच्यापुढे एकामागून एक मोठे गूढ प्रश्न येऊन उभे राहतात आणि मग लवकरच असे उघड दिसून येते की, अखिल जीविताचे समष्टीरूप आणि अंतिम सत्याशी त्याचा तात्त्विक संबंध ह्यांविषयी आमच्या भावना दृढ झाल्याविना नीतीतत्त्वांना पायाच नव्हे तर त्यांची नुसती विशद कल्पनाही स्थिर राहू शकत नाही. जीविताचे समष्टीरूप आणि केवळ सत्याशी त्याचा संबंध ह्याविषयीच जर हल्लीचे काळी इतका धरसोडपणा आहे तर त्याचा परिणाम खास असाच होणार की, नीतिविषयी आमचे तात्त्विक विचार हल्लीप्रमाणे साशंक आणि अस्पष्टच राहावयाचे. खरा प्रकार पुढे वर्णिल्याप्रमाणे आहे:-

जिचा पाया अढळ आहे व स्वरूप निश्चित आहे अशा नीतीची आम्हामध्ये उणीवच आहे. स्वत: नीती म्हणजे काय हे शोधू गेल्यास संचित आणि क्रियमाण ह्यांचे ती एक अतिशय गुंतागुंतीचे जाळेच आहे असे दिसेल. त्यादृष्टीने पाहता आमच्यामध्ये जो साधनसंपत्तीचा अभाव व्यक्त होतो, तो लपविण्याकरिता बाहेरून केवळ बहुश्रुतपणा आणि पांडित्य ह्यांचा आम्ही आव घालतो. तो इतका की अंतरी अगदी लाजिरवाणे दारिद्र्य वसत असूनही बाहेरून आम्ही श्रीमंती मिरवीत असतो.

नीतीचे भिन्न भिन्न पाच प्रकार पुढे सांगितले आहेत. त्यांपैकी प्रत्येक आमच्या आत्म्याचा मार्गदर्शक होऊ पहात आहे. ह्या प्रत्येकामध्ये अंशत: काही सत्य आहे, पण कोणताही एकच प्रकार आमच्या आत्म्याचे शासन चालविण्यास सर्वस्वी पात्र ठरत नाही. प्रत्येकाची धाव विशिष्ट ठिकाणीपर्यंत पोहोचते आणि मग तेथे त्यांची हद्द संपली असे आम्हांस कळून चुकते. (१) पहिला प्रकार धार्मिक नीतीचा होय. त्यामध्ये आमचा संकल्प (प्रयत्नशक्ती) आणि आमची भावी प्रगती ह्या दोन्ही दैवी शक्तीवरच अवलंबून ठेवण्यात येतात. ह्यामुळे मनुष्याच्या आध्यात्मिक स्वातंत्र्याला मोठा धोका पोचतो आणि मनुष्य केवळ सहनशीलच होऊन राहण्याचा संभव असतो. इतकेच नव्हे तर त्या त्या प्रमाणाने त्या दीन धर्मावर अवलंबून राहणा-या नीतीची शक्ती आणि संसारनियामकता ह्याही क्षीण होऊ लागतात.

(२) दुसरा प्रकार संस्कृतीच्या नीतीचा होय. ह्याचा सर्व रोख मानवी प्रगतीची वाढ करण्याकडे असतो. ह्यामुळे आंतरिक आवडनावड ह्याना गौणत्व आणि बाह्य समारंभ व बाह्यसृष्टी ह्यानाच फाजील प्राधान्य मिळू लागते. बाह्य संकल्पाच्या अविश्रांत वाढत जाणा-या विस्तारामुळे अंतरात्म्याच्या एकंदरीत कल्याणाला ह्या नीतीमुळेही धोकाच पोचण्याचा संभव आहे. मनुष्य म्हणजे केवळ एक यंत्र आणि अनात्मिक अशा बाह्य संस्कृतीच्या विस्ताराचे एक साधन होऊन बसण्याचा मोठा धोका आहे. (३) तिसरा प्रकार सामाजिक नीतीचा होय. सामाजिक हित हेच काय ते ह्याचे मुख्य ध्येय सामाजिक ऐक्याविषयीच्या भावना बळावत जाऊन मानवी प्रयत्नाचे मान. पुष्कळ विपुल होते हे खरे पण एकंदर जीवित समष्टीची प्रमाणबद्धता कायम रहात नाही (व्यक्तीच्या विकासात मोठा व्यत्यय येतो). शिवाय ह्या प्रकारामुले जीविताच्या वरपांगी सुधारणांचे जास्त स्तोम माजविले जाऊन जीविताच्या रहस्याची अधोगती आणि अवनतीच होते. (४) काही जाड्या तत्त्ववेत्त्यांनी शुद्धबुद्धीची नीती म्हणून चौथा प्रकार सांगितला आहे. ह्या प्रकारामुळे केवळ अपयुक्तता आणि रमणीयता ह्यांचे जे ग्राम्य प्रांत असतील त्यातून मनुष्याचा उद्धार होऊन त्याला काही अंशी आंतरिक स्वातंत्र्यही मिळण्याचा संभव आहे, पण ह्या प्रकाराचे महत्त्व कसेही असो ते केवळ विचारजन्य आणि विशिष्टत्वहीन आहे ही गोष्ट एकपक्षी स्वत:सिद्ध आहे व इतरपक्षी अदृश्य आणि केवळ भावनामय जगाची ठाम निश्चिती प्रस्तुत काळी तर अद्यापि झालेली नाही म्हणून ह्या प्रकारच्या नीतीला सुरक्षित पायाच मिळणे तूर्त तरी सुलभ नाही. (५) शेवटचा प्रकार व्यक्तिविषयक नीतीचा होय. हा काही विशिष्ट रमणीय आत्म्याच्या अनुभवामध्येच आढळून येतो. अशा आत्म्याचे आचरणाचे ध्येय म्हणजे आपल्या स्वत:च्या विशिष्ट स्वभावाचा पूर्ण विकास करून घेणे व आपल्या अंत:करणामध्ये ज्या काही मूळ शक्ती असतील त्यांची सुव्यवस्थित आणि निर्धास्तपणे वाढ करणे हेच असते. परंतु अशा धन्य व्यक्ती सामान्यत: आमच्या आढळात येतात त्याहून फारच मोठ्या दर्जाच्या व विशिष्टशील संपत्तिशाली असावयास पाहिजेत, इतकेच नव्हे तर त्या तशा असल्या तरी इतरांनी त्यांचेच अनुकरण करावे असा त्यांचा अधिकार असेल असे सांगवत नाही. कदाचित ह्या प्रकाराचेच पूर्णपणे अवलंबन करू गेल्यास तो एक शुद्ध आत्मरतीचा किंबहुना पोकळ आत्मप्रतिभासाचाच प्रकार होईल.

प्रस्तुत काळी आमच्यामध्ये वर वर्णिलेल्या नीतीचे भिन्न भिन्न रोख आणि हेतू जे रूढ झालेले आहेत त्यांचा परिणाम काय झाला आहे हे पाहू गेले असता दिसून येईल की नीतीसंबंधाच्या आमच्या कल्पनांना एकप्रकारे क्षोभ आणि ऊत मात्र आला आहे एवढेच. त्यामुळे आम्हांला नीतिशास्त्राचे ठाम सिद्धांत मिळाले अशातला प्रकार नाही. प्रयत्नाची पुष्कळ द्वारे खुली झाली म्हणून एकाद्या सर्वसामान्य कर्तव्याचा साक्षात्कार झाला असे होत नाही. मात्र ह्या यत्नबाहुल्यामुळे व्यक्तीव्यक्तींमध्ये, पक्षपक्षांमध्ये, जीवनाच्या शाखाशाखांमध्ये हल्ली दुही वाढत आहे एवढाच काय तो ह्याचा परिणाम. त्यामुळे वर सांगितलेली दुही अंशत: तरी कमी होत जाऊन शेवटी केवळ मनुष्यजीवितापलीकडेही आमचे जे काही ध्येय असण्याचा संभव आहे त्या दृश्यातील ध्येयाला अनुसरून आपले प्रयत्नारंभ चालवावे अशी आमच्यामध्ये भावना उत्पन्न होईल असा काही अंदाज दिसत नाही. तर मग आम्हांला अशा काही एका नवीनच नीतीची जरूरी आहे की जी आमच्या अंतर्जीवनामधून उदयास येईल. आणि ही जरूरी आम्हांला भासते त्याहूनही वस्तुत: पुष्कळच अधिक आहे. कारण हल्ली ज्याच्या कसाला आम्ही आपले व्यक्तिविषयक सर्व प्रयत्न आणि संकल्प लावून पाहू असे कोणतेही एकादे सर्वसाधारण आणि सर्वमान्य असे धोरण ठाम ठरतच नाही. त्यामुळे जीवनामध्ये अनेक प्रकारची द्वैते माजत चालली आहेत. आणि जगताशी आमचा आध्यात्मिक संबंध अगदी तुटत चालला आहे. जगत म्हणजे आमच्या सभोवती एक तमोमय आणि अभेद्य असा नियतीचा पडदाच जणू पसरला आहे. ह्या संकल्पसमारंभातच आम्ही गुंतून गेल्यामुळे ह्या नियतीवर आमची काहीच सत्ता चालेनाशी झाली आहे. ती सत्ता पुन्हा संपादन करावयाची झाल्यास “ऊँ ओम् तत् सत्” ह्या वाक्याची आणि साक्षात्काराची पुनर्घटनाच करावयाला पाहिजे आणि तीही आमच्या स्वत:च्या कर्तृत्वशक्तीच्या जोरावरच केली पाहिजे. अनिश्चय आणि अविद्या ह्यांच्याशी आम्हांला दारूण युद्ध जुंपले पाहिजे, ह्या युद्धामुळे आमच्या सर्व संसाराचे शुभ आणि अशुभ, मित्र आणि वैरी असे भेद पडत जातील हे खरे, पण त्यामुळेच आमच्या जीविताला पूर्णपणे एक नवीन चेतना तरी प्राप्त होईल आणि संसार हे त्याचे नाव समर्थ होऊन विशाल आणि विश्वंभर अशा स्वरूपाला ते जाऊन पोहचेल. मानवी आत्मा म्हमजे कोणी केवळ साक्षीदार नसून ह्या विश्वरचनेच्या महत्कार्यामध्ये तो प्रत्यक्ष साहाय्यकारी आहे हे सत्य अनुभवास यावयाचे असल्यास त्याला मार्ग म्हमजे वर निर्दिष्ट केलेला युद्धारंभच होय. मानवी स्वभावाचे जे नैतिक (सात्विक संकल्पमय) स्वरूप आहे त्यावर ज्या ज्या म्हणून गोष्टींचे झाकण पडेल त्या सर्वाला एकच अविद्या हे नाव देता येईल. ह्या अविद्येमुळे मनुष्य केवळ नियतीचा दास बनून, घोर अचेतन कवचामध्ये कोंडलेल्या चैतन्याप्रमाणे लघुता आणि हीनता पावतो. काही विशिष्ट पक्षाचे आणि मताचे लोक ह्या दास्यस्थितीतच सुख मानून राहू शकतील, पण अखिल मनुष्यजात अशा कोंडमा-यात कायमची राहणे शक्य नाही. आपल्या जीविताचा काही गूढ अर्थ आहे व त्याला काही अंतिम मोलही आहे, अशी जी मनुष्यजातीची श्रद्धा आहे ती जर खरी असेल तर नीतीमीमांसेवर आजपर्यंत ज्या अनेक ब-यावाईट कोटिक्रमांचे कवच वाढले आहे ते सर्व फोडून टाकून नीतीच्या नवीन शोधाला पुन्हा एकवार लागल्याशिवाय मनुष्यप्राणी कधी राहावयाचा नाही.

नीती -२

आज पुन्हा वर नीतीचा हा प्रश्न आम्हांला हाती घ्यावयाचा असेल तर अगोदरच त्याची पूर्वतयारी सुस्पष्ट रीतीने करावयास पाहिजे. प्रस्तुतच्या सक्षुब्ध सामाजिक स्थितीमध्ये ख-या नीतीचे संपादन आम्हांला कधीच करता येणार नाही. हल्ली गाजत असलेला गोंधळ खाली टाकून वर उंच निराळ्याच वातावरणात गेले पाहिजे. तदनंतर जगाचे समष्टी स्वरूप आणि त्या स्वरूपामधील आमची स्वत:ची पदवी एतत्संबंधी सम्यक आणि निश्चित ज्ञान आम्हांला झाले पाहिजे. नीती म्हणून काही निराळा स्वत:सिद्ध आणि स्वयंभू असा पदार्थ नाही. जीवनाच्या समष्टी स्वरूपाचे ज्ञान झाल्याशिवाय ख-या नीतीचा उदयच संभवत नाही. नैतिक आचरण घडून येण्यापूर्वी जडातून चैतन्याकडे जीविताचे आक्रमण झालेच पाहिजे. हे आक्रमण घडून आल्यावर, जीवाची निसर्गाच्या नियंत्रणातून सुटका होऊन त्यास एकपक्षी नैतिक स्वातंत्र्य प्राप्त होते, तर दुसरेपक्षी केवळ स्वसंरक्षणाची (एकदेशीय हीन) भावना लयास जाऊन त्याच्या पुढे अतींद्रिय ध्येयाचा उदय होतो, म्हणजे ह्या दोन साक्षात्कारामुळे जड सृष्टीतून निराळ्याच सृष्टीचा भास त्याला होऊ लागतो. ह्या इंद्रियनिर्मित जगतामध्ये हे वरील दोन्ही साक्षात्कार जवळजवळ अशक्यच वाटतात. कारण ज्या कार्यारंभाचे पर्यवसान कर्त्याच्या कल्याणामध्ये अतएव त्याच्या स्वसंरक्षणामध्ये होत नाही अशा कार्यारंभाची कल्पना तरी कशी व्हावी? जे आपण नव्हे अशा कशासाटी तरी आपल्या शक्तीचा लय करावा असे विधान केले असता अनवस्था दोष येत नाही काय?

प्रस्तुत काळी नीतीच्या प्रश्नाचे महत्त्व आम्हांला खरोखरच पूर्णपणे कळले असेल आणि ख-या नीतिप्रीत्यर्थ आम्हांला वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे दारूण युद्ध जुंपावयाचे असेल तर आम्हांला आमच्या सा-या अस्तित्वाचा पाया कोठे आहे तो पाहिला पाहिजे. आणि केवळ वरवरच्या मायिक अनुभवावरच अवलंबून न राहता आमचे अढळपद कोठे आहे व कसे आहे ह्याचा मार्ग काढला पाहिजे. आतापर्यंत आम्ही चालविलेल्या जीवनमीमांसेवरून पाहता आम्ही निर्दिष्ट केलेल्या स्वयंभू आध्यात्मिक जीवनामध्येच वरील अढळपद आणि त्यातून प्रादुर्भाव पावणारी विवक्षित नीती आम्हांला लाभणे शक्य आहे. जगाला प्रथम आत्मसंविती आणि नंतर खरे सत्य जे लाभते ते ह्या स्वयंभू आध्यात्मिक जीवनामुळेच. वर सांगितलेले दोन भिन्न साक्षात्कार जे ह्या मायिक जगात अशक्य वाटतात ते ह्या जीवनाच्या अनुरोधाने पाहता शक्य दिसतात. आध्यात्मिक जीवनामध्येच खरे स्वातंत्र्य प्राप्त होणे कसे शक्य आहे, हे ज्ञान आम्ही मागील एका भागात करून घेतले आहे. ह्या आध्यात्मिक जीवनामध्येच नवीन शुद्ध आणि अद्वैत अशा आत्म्याची प्रतीती घडल्यामुळे आचाराला केवळ मायिक अहंकारावरच अवलंबून राहण्याचे कारण उरत नाही. म्हणून आचाराला ह्या नवीन नीतिमध्ये स्वातंत्र्य प्राप्त होते. ह्या नीतिमध्ये प्रयत्नाची प्रेरणा आपणाबाहेर कोठून यावयाची नसते किंवा प्रयत्नाचे पर्यवसानही आपणाबाहेर कोठेतरी व्हावयाचे नसते, हा सर्व प्रयत्न-व्यवहार आपणामध्येच चालावयाचा असतो, कारण आपणामध्ये अखिल विश्व सामावलेले असते. स्वसंरक्षणाचा हेतू अगदी तात्विक अर्थाने आध्यात्मिक जीवनामध्ये ह्या नवीन कर्तृत्वाचेयोगे संपादला जातो. बाह्य नैसर्गिक सृष्टीमध्ये जो (तामसी द्वैतपर) स्वरक्षणाचा व्यवहार चालला असतो, त्याच्याशी वरील तात्विक स्वरक्षणाचे नुसते नाममात्र सादृश्य रहाते.

आध्यात्मिक जीवन जेव्हा स्वसंवेद्य, स्वयंप्रेरित आणि स्वतंत्र होते, तेव्हा नीती हा त्याचा मध्यबिंदू झालाच म्हणावयाचा. ह्या अवाढव्य संसारामध्ये जीवाला नीती म्हणून काही बाहेरून मिळालेली देणगी नव्हे, तर ती स्वत:च जीवनविकासातील एक प्रमुख अवस्था होय. आध्यात्मिक जीवनामध्ये स्वसंवेदना तेव्हाच प्रादुर्भूत झाली म्हणावयाची की जेव्हा त्यामध्ये नीतीचा उद्गार निघाला आणि तद्नंतर हा त्या जीवनाचा भावी विकार नीतिद्वाराच व्हावयाचा असतो. नीतिमुळेच मनुष्य आध्यात्मिक जीवनाकडे वळतो असा ह्याचा अर्थ नव्हे, तर नीती म्हणजे आध्यात्मिक जीवनाची एक पायरी उंच जाणे होय. ह्यावरून सर्व मानवी नीतीचा पाया ह्या आध्यात्मिक नीतिमध्येच रोविला असला पाहिजे हे सिद्ध होते.

इतक्या खोल पायावर उभारलेल्या नीतीचा संबंध जीवनाच्या सर्व व्यवहाराशी जडला पाहिजे. ह्या संसारातील अगदी भिन्न भिन्न संबंध आणि अनुभव हे सर्वच नीतीच्या कक्षेत आले पाहिजेत व ते तिच्या कसाला उतरले पाहिजेत. पण ह्या आध्यात्मिक नीतीच्या (मंगलमय) कक्षेत ज्या ज्या म्हणून गोष्टी घेण्यात येतील त्यांच्या मूळ स्वरूपात ह्या कक्षेबाहेर असलेल्या गोष्टीत न आढळून येणारे असे काहीतरी उच्चतर रूपांतर घडून आले पाहिजे. (नीतीच्या बाहेर काव्य आणि तत्त्वज्ञान ह्यांच्याही स्वतंत्र कक्षा आहेतच) नीतीच्या पायावरच सर्व व्यवहार करावेत असे जे आमचे म्हणणे आहे, त्याचा अर्थ असा नव्हे की, कला आणि शास्त्रे ह्यांचा अभ्यास मनुष्याने निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करावा. हा अर्थ (अगदी बालबोध आहे, इतकेच नव्हे तर) ब-याच कोत्या दृष्टीचा समजला जाईल. आमचा खरा अर्थ एवढाच आहे की, (केवळ मीमांसेच्या दृष्टीने) जे जे काही नीतीच्या कक्षेच्या बाहेर असेल ते ते सर्वही जीवाने आत्मसात करून घेतले पाहिजे. सत्य आणि सौंदर्य ही केवळ आपल्या अध्ययनाचे बाह्य विषय होत. म्हणून त्यांना आपल्या अंतर्जीवनाचे बाहेरच ठेवून अलगपणे त्याचा अभ्यास करीत राहू नये. त्यांच्याशी तादात्म्य पावले पाहिजे. अशा तादात्म्यानेच बाह्य विषयाचा लाभ घडला असता अंतर्जीविताची वाढ होऊ शकते. जीवन अशा प्रकारे अंतर्बाह्य द्वंद्वातीत जेव्हा होते, तेव्हाच बाह्य विषयातही आत्मा आहे आणि स्वातंत्र्य म्हणून काही एकादी भाकड कल्पना नसून तो एक वास्तविक अनुभव आहे असे कळून चुकते.

इतिहासाचा शोध करून पाहता असेच आढळून येईल की, जेव्हा जेव्हा म्हणून आध्यात्मिक जीवनाच्या मध्यबिंदूचे स्थान नीतीचे स्वीकारले नाही तेव्हा तेव्हा इतर दृष्टीने बाह्य संपत्तीचा अवडंबर कितीही माजला असला तरी अंतर्जीवित शुष्क आणि अस्थिर होऊन डळमळू लागले आहे. व्यक्तीच्याही बाबतीत हाच प्रत्यय येतो की, अंत:करणात नीतीची जबाबदारी ओळखल्याशिवाय संसारातील गूढ प्रश्नांचा अखेरचा निकाल कधीच लागणार नाही. ही जबाबदारी पटली म्हणजे आणि ती द्वेषामध्ये आणि कलहामध्येच पटावयाला पाहिजे........मग अंत:करणामध्ये जे स्वराज्य नांदत आहे त्याचे दर्शन घडते. बाह्य मायिक जगात परस्पर विघातक किती जरी बंडे घडून आली तरी अंत:स्वराज्य त्यायोगे कधीच पदच्युत होत नाही, परंतु जर का अंत:करणातच नीतीची ओळख पटली नाही तर मात्र बाहेरील बंडाचा जय होऊन आध्यात्मिक जीवन पदभ्रष्ट होण्याची आपत्ती कदापि टळण्यासारखी नाही.

निष्ठा व नास्तिक्य

[अहमदनगर येथे विविध ठिकाणी केलेल्या व्याख्यानांचा गोषवारा].

निर्गुण व निराकार अशा एकाच परमेश्वराचे वर्णन सर्व धर्मांत केले आहे. हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र असा भेदाभेद परमेश्वराच्या घरी नाही. मनुष्यमात्राने निर्माण केलेल्या सर्व जातीच्या व स्थितीच्या लोकांस जो समान दृष्टीने पहातो, रंक असो अथवा राव असो, उच्चवर्णीय असो अथवा अस्पृश्य असो, जो कोणी त्यास शरण जातो त्यास तो सारखाच प्रसन्न होतो. संत तुकाराम, नामदेव शिंपी, रोहिदास चांभार व चोखा महार ह्या सर्व सदभक्तांस परमेश्वर सारख्याच प्रमाणात प्रसन्न झाला.

निष्ठा व नास्तिक्य हे दोन शब्द परस्पर विरोधवाचक असले तरी निष्ठेशिवाय नास्तिक्य भाव उत्पन्न होऊन त्यांचे छळ होण्याचे कारण छळकांची आपल्या धर्ममतांवरील निष्ठाच होय. हिंदुस्थानात आज धर्माबद्दल अनास्था निर्माण झाल्याचे दिसून येते. ज्याप्रमाणे पतिपत्नीचा आमरण संबंध असतो, तसेच हाती घेतलेल्या विशिष्ट कार्याचा व आपला आमरण संबंध असावा. राममोहन रॉय व केशवचंद्र सेन ह्यांचे ठायी कार्यनिष्ठा व धर्मनिष्ठा ह्या दोहोंचाही मिलाप झाला होता. आपले आचरण आपल्या धर्माप्रमाणे ठेविले असता आपल्या आध्यात्मिक जिण्याची वाढ होते व आपल्या धर्माचे महत्व वाढते.

धर्मांचे सहकार्य

सर्व धर्मांत एकाच परमेश्वराच्या अस्तित्वाचे वर्णन केले आहे. भेद एवढा असतो की, निरनिराळ्या धर्माचे परमेश्वर वर्णनाचे निरनिराळे मार्ग आहेत. वर्तुळाच्या परिघावरून शेकडो रेघा मध्यबिंदूकडे ओढता येतात. हाच प्रकार सर्व धर्माचा आहे. म्हणजे धर्मामध्ये बिंदू परमेश्वर आहे, हे लक्षात आणून परधर्माशी आपली नेहमी सहिष्णुता प्रकट करून इतर धर्माशी सहकार्य करावे. पापाबद्दल पाप्याचा द्वेष न करिता खुद्द त्या पापाचाच द्वेष केला पाहिजे. रोग्याची शुश्रुषा करण्याऐवजी त्यास आरोग्यावर व्याख्यान दिले असता त्या बिचा-या रोग्यास काय फायदा? त्याची शुश्रुषाच केली पाहिजे. व तद्वत कोणत्याही धर्माचा मनुष्य असो, आपला धर्माभिमान एका बाजूला ठेवून आपण त्याची सेवा करावी व त्याच्या अंत:करणातील अंमगलता काढून टाकावी. हा पापी आहे, हा परधर्मीय आहे, हा अस्पृशअय आहे असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न धरिता त्याची वृत्ती खरी खरी धार्मिक बनवावी असे केले असता सर्व धर्मांमध्ये सहकार्याचे बीज उत्पन्न होईल.

निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतारवाद व विकासवाद

त्याग तरी ऐसा करा| अहंकारा दवडावे||१||
आपुले मरण पाहिले म्यां डोळां| तो झाला सोहळा अनुपम्य||१||
सकल चिंतामणी शरीर|

आमच्या मंडळीच्या सुधारणेची दोन अंगे आहेत. एक धार्मिक व दुसरे सामाजिक. कोणी आमच्यातीलच म्हणतो की, धार्मिक अंग नुसते राखावे. आमच्या भजनाला, उपासनेला, कोणी फारसे किंवा मुळीच आड येत नाहीत व यायचेही नाहीत, पण तुम्ही सामाजिक खटाटोपी करू लागाल, तर मात्र पदोपदी अडथळे आणून घ्याल. पण माझे म्हणणे असे की, धार्मिक सुधारणा करू की सामाजिक करू किंवा कोणती आधी करू, हा जो प्रश्न आहे तो आपल्यामधील अहंकार गेला नाही म्हणूनच पुढे येतो असे म्हटले पाहिजे. धर्मविभूती, आध्यात्मिक सुधारक, ज्याला पुढे लोकांत अवतार किंवा मग देवच म्हणतात, अशांचे एक तरी उदाहरण डोळ्यापुढे आणा की, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता-धार्मिक साधने, सुधारणा करू व सामाजिक सोडून देऊ का? त्यांना कधी ह्याबद्दल संशय नव्हताच, कारण, त्यांची रहाटी अगदी कडेलोटपणाची होती. आजकालच्या लोकांनी अहंकार समूळ सोडला पाहिजे. इंग्रजीत म्हणतात,

If you want to gain, you must loose yourself first; die to live…..

म्हणजे जर मिळवावयाचे आहे तर हरवून घ्या आधी. खरोखरीच विरोधाभास दिसतो आहे हा. नाही तर काय? म्हणे भरा. कशासाठी? तर जिवंत राहण्यासाठी, पण ह्यातील तत्त्वाकडे दृष्टी दिल्यास ह्या वचनाची सत्यता लक्षात आल्यावाचून राहणार नाही.

तुमच्यापुढे हे द्वैत वा-यासही उभे न राहता तुमचे आचरण सर्वकाळ ईश्वरास स्मरून व अहंता, अहंकार, अहंभाव ह्यांस विसरून होत राहिले, म्हणजे मग तुम्हांला वाराणसीसारख्या तीर्थस्थानी जाण्यास नको. ती वाराणसी, आणखी तिच्या पलीकडे काही दुसरी काशी असली तरी ती तुमच्याजवळ येते आहे. कारण हे पहा, तीर्थाला तीर्थपम आले कोठून? तर साधूशी त्याचा पूर्वसमागम घडला होता म्हणून. मोठी जाडी विभूती आध्यात्मिक व कर्ती सुधारक अशी मुळाशी असल्यामुळेच तर तीर्थाचे माहात्म्य. असा हा तुमचा अधिकार वाढेल. तुकोबांनी म्हटले आहे की, “आपुले मरण मी पाहिले” अहम, अहंकारवृत्ती त्यांच्यामधून समूळ निघून गेली, तो सोहळा काय अनुपम| ह्याबरोबर सहज हेही दिसते की, साधूंची वचने बहुतकरून विरोधाची असतात किंवा वाटतात. इतका नेटाचा विचार त्यांच्या अंत:करणात येतो की, ‘वाचमर्थोSनुधावति’ असे मग होते. पण याहून जास्त विचार करून पाहू की मीपणाचा काय सर्वस्वी नायनाट होतो किंवा करावयाचा की काय? तर तसे नसून मीपणाचा विस्तारच करून सर्वात्मकपणे भोग झाला हा अनुभव घ्यावयाचा. आत्मवृत्ती संकोचित न करता तिचा परिघ एकसारखा पसरतच रहावयाचा. हे जर आपणांस कर्तव्य नसेल, हा प्रवृत्तीमार्ग न आवडून निवृत्तिमार्ग श्रेष्ठ वाटत असेल तर निवृत्ती, निवृत्ती म्हणजे कोठवर खरोखर गेली पाहिजे हे लक्षात घ्यावे.

म्हणजे हे तुम्ही कबूल कराल की, शेवटी दोरीने गळ्याला फास लावून घेतला पाहिजे. तेव्हा सुटला एकदा मानवप्राणी! ह्या सांसारिक आत्मयातनेतून, मिळाला त्याला मोक्ष! पण ह्याला मोक्ष म्हणायचे नाहीच. पशूला वाटते की वर शिंगे, खाली पाय, ह्यामधला जो तो मी. परंतु मनुष्याला स्वाभाविकच स्वत:पुरते पाहून समाधान नाही. त्याचा मी हा मध्यबिंदु सर्व स्थितीत खरा, पण त्याचा जवळचा परिघ घेतला तर त्याचे स्वत:चे कुटुंब होय. बहुतेक सुधारलेल्या मनुष्याची मजल म्हणजे त्याचा परिघ आजकाल पाहिले असता स्वत:च्या राष्ट्रापर्यंत जातो. हिंदुस्थानाची सीमा काय बुवा, तर उत्तरेस हिमालय पर्वत वगैरे सुरूवात करून इतक्याच प्रदेशाशी फक्त आपला निकटचा किंवा तात्त्विकतेचा ही संबंध, तितक्यापुरताच काय तो अभिमान. पण मी खरोखरी उत्तम झालो केव्हा समजायाचे किंवा याचा अर्थ काय, तर माझ्या सहानुभूतीचा, नव्हे, आत्मप्रचीतीचा परिघ अनंत वाढलेला आहे व मध्यबिंदूशी मी आहे. अहंभावाचा ताठा मिरविणा-याने डोळे उघडून विचार करून पाहिले पाहिजे की, अरे मी आपणांस म्हणतो, पण मी म्हणजे कोण? कोठेसा आहे? ह्या अफाट विश्वाच्या एका कोप-यात, कोठला तो कोपरा, कोप-यातल्या कोप-यात कोणता अंश म्हणावा, अंशाचा कोणता अंश म्हणावा, काहीच नाही, इतकी क्षुल्लक जागा व्यापणारा प्राणी मी, माझी मातब्बरी काय की, मी गर्वाने फुगून नेहमी कु-र्यातच असावे? ह्याचा त्याग झाला असता नारायम म्हणजे नराचे अयन ज्याच्यामध्ये त्याने समर्याद, क्षुद्र, आकुंचित जगातून उमटून आपल्याला आपल्या अंगाशी लावून घेतले असा अनुभव येतो.

तेव्हा तात्त्विकदृष्ट्या विचार केला असता मी म्हणतो की, निवृत्तीचा मार्ग न पत्करता जाज्वल्य प्रवृत्ती करावयाची. ह्याने किती लोकांचा भरिभार आपल्यावर घेतला पाहिजे ह्याचा विचार करा. प्रेसिडेंट रूझव्हेल्टचे उद्दिष्ट असे आहे की, नेहमी सात्त्विक युद्ध करीत राहिले पाहिजे. आपल्याकडे तुकारामबुवाही म्हणतात की ‘रात्रंदिवस आम्हांला युद्धाचा प्रसंग’. मी तरी समजतो निवृत्ती म्हणजे नाशच, मेल्यापेक्षा अहंकार तरी असू द्या. चालता चालता कधी तरी ठेच लागेल व मन ताळ्यावर येईल म्हणायाला जागा राहते. कृष्णाने अर्जुनाला अखेरचा निरोप अट्टाहासाने प्रवृत्तीविषयकच सांगितला आहे. तो त्याला म्हणतो, अरे ह्यापेक्षा तुला काय सांगू, मी जर अव्यक्तातून व्यक्त होतो आहे, मी प्रवृत्त आहे, तोपर्यंत तू निवृत्तीची कथा सांगू नकोस.

आता तुम्ही विचाराल, कायहो, ज्याला परिघ अनंत, त्याचा मध्यबिंदू कोठे आहे? तर गणितशास्त्राच्या नेहमीच्या रीतीने पाहिले, तर तो बिंदू पाहिजे तेथे असू शकेल. संकुचित अहंकार सोडायला पाहिजे व जी विश्वाची संपत्ती त्याचा अभिमान, त्याविषयी आनंद, काळजी, कर्तबगारी दाखविली पाहिजे. मनुष्य एकसारखा प्रवृत्त, कार्यकारी, कर्मी, कर्मप्रचुर आहे, निवृत्त कधी नाही-अशा प्रकारे ज्यांचा दुराभिमान गेला आहे, त्यांच्यानेच काही काम झालेले आहे. ज्यांच्या ठिकाणी एकतानता, प्रामाणिकपणा, निष्कामता, धैर्य, जे व्रतस्थ, ज्यास अपेक्षा नाही, त्यांचेच हातून सुधारणेची कामे होतात. जे पाऊल टाकायचे, ते निश्चयाने, धैर्याने टाकावयाचे आहे.

आपण म्हणाल “ अहंकाराचा परिघ अमर्याद करा असे सांगता पण ह्या सांगण्या-बोलण्याच्याच गोष्टी आहेत. असे ज्याचे हातून होईल तो पुरूष अवतारच म्हटला पाहिजे, तो हजारो वर्षांनी येतो. कोणी तरी आम्हांला असा चांगला नायक, सेनापती, प्रमुख, म्होरक्या, अशी एक विभूती प्रखर तेजाची पाहिजे.” पण ह्याला माझे उत्तर असे आहे की, खरोखरी प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. अवतार मी अनिष्ट म्हणत नाही, इष्टच आहे, पण त्याने होते काय, तर काही काळपावेतो त्याच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उदाहरण तेजस्वितेने परिणाम होतो, आपण एकदम खालून वर उचलले जातो. पण तो स्वाभाविक क्रमिक विकास म्हणावयाचा नाही. तर प्रत्येक आत्म्याचे मरण मरून प्रत्येकास स्वत:च्या श्रमाच्या मोबदल्यात आनंद झाला पाहिजे. ‘आत्मैव आत्मनो बंधु:’ या तत्त्वाचा स्वीकार करून आपण आपल्याच पायावर उभे राहण्यास शिकले पाहिजे व राहिले पाहिजे. मला इतकेही वाटते की आज जी काय आमच्यात आत्मकला अंशभूत आहे, इच्छाशक्ती, बाहुबल, एक-एक पाऊल स्वत: पुढे टाकण्याची शक्ती आहे, ती जाऊन, अवतारी व्यक्तीच्या विद्युदाकर्षणाने एकदम कामे फार होणार असतील, तर तो अवतार नको, व ती कामेही पण नकोत! विकास, विकासच झाला पाहिजे हेच मी धरून बसेन. अवतारवादाने प्रदर्शित केलेला एक फार उंच व इतर सर्व अत्यंत नीच, खालावलेले असा विषमभाव मला पसंत पडत नाही. तर सर्वांची सर्व बाजूंनी व तीही स्वत:चे प्रयत्नांनी उन्नती होत जावी, हेच श्रेयस्कर. अवतारांची गरज भासू लागल्यास समजावे येथे रोग आहे, स्वाभाविक स्थिती ही नव्हे, स्वत:चा दम संपला, स्वयंशक्ती हरपली, स्वत:चा जोर नाहीसा किंवा कमी तरी झाला. पण चांगल्या सुदृढ राष्ट्रात स्वयंस्फूर्ती हा एक गुण असतो, म्हणजे कोणतेही कृत्य स्वत: आपल्यास कळलेल्या दिशेने करण्यास अंगावर घ्यावयाचे. त्या राष्ट्राच्या विभूतींच्या व सामान्य लोकांच्यामध्येही मग इतके अवाढव्य अंतर नसते, हेही लक्षात ठेवले पाहिजे.

तेव्हा मी म्हणतो की आमचा परिघ वाढविण्याची आमची योग्यता असताना, ईश्वराजवळ का होईना, पण ही काय याचना करावयाची की आम्हांला अवतार द्या, आपला अवतार होऊ द्या, नाहीतर आम्ही मागे मागे जाऊ. अवतारमत खरे असले तरी मी तर म्हणेन की, परमात्मन् तुमचे आजपर्यंत पुष्कळ अवतार झाले असतील, पण आता तुमचा तो क्षीरसागर, ते स्वर्गनिधान वगैरे सोडून खाली मनुष्यलोकात येण्याची तसदी घेऊ नका. तर आमचा विकास तुम्हीस करा. तरच तुमच्या एकंदर विश्वयोजनेस आमच्याकडून साह्य होईल!

  1. निराश्रित साह्यकारी मंडळी
  2. निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
  3. निराश्रित साहाय्य
  4. नाममंत्राचे सामर्थ्य
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
Page 23 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी