1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

दांभिक देशभक्तांपेक्षा

[महात्मा फुले यांच्यासंबंधी १९२६-२७ साली गुरूवर्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी खालील उद्गार काढले].

“म. फुले हे असामान्य पुरूष होते. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोदक समाजाने महाराष्ट्रात ब्राह्मो समाजापेक्षाही अधिक कार्य केले आहे. या समाजाचे ध्येय उच्च आहे. जोतिरावांनी लिहिलेले ‘सत्यधर्म’ पुस्तक हे सत्यशोधकांचे बायबल आहे. हे पुस्तक ब्राह्मो समाजाच्या प्रार्थनेच्या वेळी आम्ही घेतो. मी छातीला हात लावून सांगतो की जोतीरावांचे चरित्रात महाराष्ट्राचा महत्त्वाचा इतिहास ग्रंथित झाला आहे. दांभिक देशभक्तापेक्षा त्यांची देशभक्ती फारच वरच्या दर्जाची आहे.”

थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्व

गेल्या तारीख ३० जून रोजी सायंकाळी पुणे येथील मराठा स्टूडंटस् ब्रदरहूडपुढे रा. विठ्ठल रामजी शिंदे, बी. ए. ह्यांचे “मराठ्यांच्या इतिहासात श्रीशाहू छत्रपतींच्या कारकीर्दीचे महत्त्व” ह्या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्याते प्रथम आपल्या व्याख्यानाचा उद्देश सांगताना म्हणाले “मराठ्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या इतिहासाची अद्याप जाणीव मुळीच झालेली नाही. हया भ्रातृमंडळातील कॉलेजमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांचे लक्ष इकडे अवश्य जावे. कॉलेजमध्ये अगोदर इतिहास विषय नीट शिकविला जात नाही. तशात हिंदुस्थानचा इतिहास शिकवीत असता मोगल कारकीर्द संपताच इंग्रज कारकीर्द सुरू होते. जणू मराठे म्हणून कोणी झालेच नाहीत. कर्नल मेडोज टेलर ह्यांचा इतिहास कॉलेजमध्ये लावलेला असतो, त्यात श्रीशिवाजीचे नाव शोधून काढण्यास इंडेक्स शोधावे लागते. बहुतेक विद्यार्थ्यांनी ग्रँट डफचे मराठ्यांच्या इतिहासाचे पुस्तक नुसते पाहिलेही नसते. असे म्हणून रा. शिंदे ह्यांनी ग्रँट डफच्या इतिहासाची दोन पुस्तके व दुसरे काही महत्त्वाचे इतिहासावरील ग्रंथ आपल्या पुढे बसलेल्या विद्यार्थ्यांना दाखवून मराठा इतिहास वाङ्मयाचा थोडक्यात इतिहास सांगितला. नंतर शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे महत्त्व महाराजांच्याच शब्दांत सांगण्यासाठी त्यांनी पुढील गोष्ट सांगितली. शाहू महाराज अगदी वृद्ध झाले असता एकदा माळव्याचे राजे जयसिंग ह्यांनी शाहू महाराजांना हिंदू धर्मासाठी काय केले व काय काय दानधर्म केला असे पत्राने विचारिले. ह्यावर महाराजांनी उत्तर लिहिले की, “रामेश्वरापासून दिल्लीपर्यंत आम्ही मुसलमानांच्या हातून सर्व देश जिंकला आणि तो ब्राह्मणांचे स्वाधीन केला”. महाराजांच्या ह्या मार्मिक वाक्यात त्यांच्या कारकीर्दीचे सर्व महत्त्व वर्णिलेले आहे. श्रीशिवाजींनी हिंदुपदपादशाहीचा पाया घातला. त्यांच्या मागोमाग औरंगजेबाची स्वारी दक्षिणेवर झाली. तेव्हा राजाराम महाराजांनी मोठ्या प्रयासाने वेळ मारून नेली. पुढे (फुट नोट- बडोदे, जागृती, शनिवार ता. २७ माहे जुलै सन १९१८ मधील लेख.) शाहू महाराज अटकेतून सुटका होऊन ते दक्षिणेत आल्यावर त्यांनी आपल्या आजोबांनी मिळविलेले राज्य परत काबीज केले, इतकेच नव्हे तर भरतखंडाच्या बहुतेक भागावर मराठ्यांची सत्ता आणि जरब कशी बसविली, हे इतिहासात वाचणे अत्यंत स्फूर्तिदायक आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या वाक्याचा दुसरा भाग म्हणजे त्यांना आपले राज्य ब्राह्मणांच्या स्वाधीन का करावे लागले ही गोष्टसुद्धा मराठ्यांनी अत्यंत सूक्ष्म रीतीने विचार करण्यासारखी आहे. हिंदुपदपादशाहीचा खुंटा श्रीशाहूराजांनी पुष्कळ हलवून तो खोल नेला. परंतु इतर बाबतीत हलविल्याने खुंटा बळकट झाला तरी, ह्या बाबतीत मराठी राज्याचा खोल गेलेला खुंटा ढिला कसा झाला ह्याची कारणे शाहू महाराजांच्या कारकीर्दीतच मार्मिक इतिहास वाचकांस भरपूर दिसून येण्यासारखी आहेत.

महाराज इ. स. १७०७ त दक्षिणेस आले. १७१४ पर्यंतचा काळ त्यांचाच पाय महाराष्ट्रामध्ये बळकट होण्यास लागला आणि ह्या कामी त्यांना बाळाजी विश्वनाथ ह्यांची मदत घेणे जरूर वाटले. आंग्र्यांकडून पराभव पावून भैरोपंत पिंगळे हा पेशवेहदाला नालायक होऊन देशस्थ पिंगळ्यांचे ठिकाणी, कोकणस्थ बाळाजी विश्वनाथाची स्थापना झाली. इतकेच नव्हे तर धनाजी जाधवाचा मुलगा चंद्रसेन जाधव ह्याच्याशी बाळाजी विश्वनाथाचे जे भांडण झाले, त्यात शाहूंनी बाळाजीचीच पाठ थोपटली आणि चंद्रसेन जाधव रुसून मोगलांस जाऊन मिळाला. तेव्हापासून सेनापतीपदावरही पेशव्यांचा शह बसू लागला. शिवाजी महाराजांनी जी अष्टप्रधानांची योजना केली होती, त्यात पंतप्रतिनिधीचे पद नव्हते. ते राजारामाला निर्माण करावे लागले. त्याचे कारण औरंगजेबाच्या दहशतीमुळे राजारामास दक्षिणेस दूर जिंजीस राहावे लागल्यामुळे त्यांना आपला प्रतिनिधी म्हणजे व्हाइसरॉय साता-यास ठेवावा लागला. हे प्रतिनिधीचे पद शाहू महाराजांच्या कारकीर्दीतही देशस्थ ब्राह्मणाकडेच चालू होते. वास्तविक पाहता शाहू महाराज स्वतः साता-यास राहू लागल्यामुळे ह्या पदाची जरुरीच नव्हती. पण महाराज पडले वैभवी आणि विलासी म्हणून त्यांना पेशवे आणि प्रतिनिधी म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि व्हाईसरॉय ह्या दोघांनाही आपल्या उजवी डावीकडे बसवून घेण्याची संवय लागली.

पण ह्या दोनही अधिका-यांचे एकमेकांशी कधीच जुळत नसे. बाळाजी विश्वनाथानंतर त्याचा मुलगा बाजीराव हा बापाहूनही प्रतापी निघाला. बापाची मुत्सद्देगिरी संभाळून त्याने तलवारही गाजविली. परंतु त्याला नेहमी प्रतिनिधीशी कटकट करावी लागत असे. त्याचे तोंड नेहमी उत्तरेकडे तर प्रतिनिधीचे दक्षिणेकडे. बाजीरावाने म्हणावे की माळवा जिंकून अटकेवर निशाण लावावे, तर प्रतिनिधीने म्हणावे कर्नाटक जिंकावे. श्रीशाहूंनी दोघांनाही हाताशी धरून दोन्ही दिशा जिंकल्या. परंतु खुंटा ढिला झाला तो झालाच. मराठी राज्य स्थापनेच्या समयी मराठ्यांचा देशाभिमान आणि तसाच त्यांचा स्वार्थ ह्या दोन्ही भिन्न गुणांचा हृदयभेदी देखावा दिसून येतो. हे राष्ट्रकार्य करीत असता ब्राह्मण आणि मराठे हे दोघेही कामास आले. त्यावेळी ते जसे खांद्यास खांदा लावून लढले तसेच त्यांनी एकमेकांच्या गळ्यावरही प्रहार केले. इतकेच नव्हे तर मराठ्यांनी मराठ्यांच्या आणि खुद्द आपल्या भावाच्या आणि ब्राह्मणांनी ब्राह्मणांच्या गळ्यावर शस्त्र पुष्कळ वेळां उचललेले दिसते. पेशवाईचे पदच नव्हे तर सातारच्या राजाला बाहुले बनवून सर्व सत्ता आपल्या घराण्यात आली, पण ती बाळाजी बाजीरावाच्या एकट्याच्याच हाती जाते हे सहन न होऊन त्याचा भाऊ सदाशिवराव हा रुसून कोल्हापूरकरांच्या गळ्यास मिठी मारू पहातो. आणि त्याचे समाधान करण्यासाठी महादजीपंत पुरंदरे, ज्याच्या देशस्थ ब्राह्मण घराण्याने बाळाजी विश्वनाथाच्या घराण्यावर अनंत उपकार केले होते, तो आपल्याकडचा अधिकार स्वखुषीने सोडून देतो, आणि सदाशिवराव भाऊ कोल्हापूरकरांचे पेशवाई पद सोडून परत येतो. असल्या घरभेदी भाऊबंदकीचा सुकाळ प्रत्यक्ष राजाराम महाराजांच्या कारकीर्दीतही होता, तो श्रीशाहूंच्या वैभवशाली कारकीर्दीने अधिकच बोकाळला. भाऊबंदकी आणि जातिभेद ह्यांचे विष मराठी राज्याच्या अंगी जन्मापासून मुरल्यामुळे ते चिरस्थायी होण्यासारखे नव्हते.

डॉ. भांडारकरांस मानपत्र

आजच्या प्रसंगी मी माझ्या मनाच्या कलाप्रमाणेच वागावयाचे झाल्यास मी मुळीच बोलावयास उठलो नसतो. कारण आम्हा पौरस्त्यांमध्ये मर्यादेचे व विनयाचे जे नियम आहेत, त्याप्रमाणे एकाने दुस-याचा आणि विशेषेकरून लहानांनी वडिलांचा बहुमान करावयाचा झाल्यास तो शब्दांनी व्यक्त करू नये, तर वर्तनानेच दाखवावा असे आहे. एकाद्यास कोणी म्हटले की, तुझ्या आईवर तुझी प्रीती आहे, हे शब्दांनी सिद्ध कर किंवा पित्यासंबंधी तुझी पूज्यबुद्धी असल्याचे आम्हांस उघड प्रत्ययास आणून दे, तर त्याला काय वाटेल ? त्याचप्रकारे, आज मला प्रत्यक्ष आमच्या गुरुवर्यांचे पुढे उभे राहून त्यांचेविषयी आम्हांला असे वाटते, तसे वाटते इ. म्हणावे लागत आहे. ह्यात एका दृष्टीने मजवर मोठा जुलूम होत आहे. पण असो. ज्याअर्थी, मी त्यास वश झालो आहे त्याअर्थी मला आपले काम बजावले पाहिजे.

प्रथम कोणी अशी शंका घेतील की, डॉ. साहेबांस हा अपूर्व मान मिळून आज किती दिवस तरी झाले आणि ही समाजातील तरुण मंडळी त्यांच्या अभिनंदनास अगदी सर्वांच्या मागून अशी रेंगाळत का आली आहे ? पण खरा प्रकार असा आहे की, जरी ह्या मंडळीने सर्वांच्या मागून अभिनंदन उघड रीतीने केले आहे, तरी ते करण्याचा विचार ह्यांच्या मनात सर्वांच्या आधी आला आहे. मला पक्के आठवते की, डॉ. साहेबांस ही पदवी मिळाल्याबरोबर लगेच एक सामाजिक तरुण मजकडे आला आणि विचारू लागला, की आता आम्ही काय करावयाचे ? आम्हांस तर फारच आनंद होत आहे. मी तेव्हा इतकेच म्हणालो की, आम्ही तूर्त हेच करावयाचे की लोकांत कोण बडी बडी मंडळी आमच्या गुरुवर्यांचे कसकसे अभिनंदन करतील ते कौतुकाने पहावे. आणि खरोखर आमचा समाज म्हणजे एक कुटुंब. डॉ. साहेबांशी आमचे घरगुती नाते. (फुट नोट- गु. डॉ. भांडारकरांना मुंबई युनिव्हर्सिटीची एल. एल. डी. ही पदवी मिळाली, त्या वेळी त्यांचे अभिनंदन करण्याकरिता जी सभा भरविली होती त्या सभेमध्ये झालेल्या भाषणाचा सारांश. सुबोध पत्रिका ५-२-१९०५) तर बाहेर लोकांकडून अनेकवार सन्मान व अभिनंदन पाहून डॉ. साहेब अखेरीस घरी आले असता आम्ही घरातील लहान मंडळींनी त्यांचे असे उल्हासाने स्वागत करावे ह्यात काहीच वावगे नाही, तर ते यथायोग्यच झाले.

ह्या प्रसंगी मी डॉ. मजकुरांची मोघम स्तुती किंवा त्यांचे काही सामान्य गुण गात बसत नाही. आता जी फुलांची माळ आम्ही त्यांच्या गळ्यात घातली आहे, ती जशी ते थोडाच वेळ केवळ उपचारासाठी घेऊन शेवटी येथल्या येथेच ठेवून ते व आम्हीही निघून जाणार आहो, तशीच गत अशा स्तुतीच्या माळेची होईल. म्हणून डॉ. साहेबांचे एक दोन विशेष गुण जे अगदी माझ्या अनुभवासच आले ते मी सांगत आहे. आणि तेही आमच्या फायद्यासाठी, त्यांच्या बढाईसाठी नव्हे. समाजाचे गुणदोष समाजास सांगण्यात डॉ. साहेब अगदी निस्पृह आहेत हे तर आता बहुश्रुतच आहे, पण ह्याहूनही एका दृष्टीने दुर्लभ जो गुण खासगी व्यवहारातही आपले कर्तव्य बजावतेवेळी निर्भय व निर्भीडपणा ठेवणे, हा त्यांच्यात आहे. एका व्यक्तीसंबंधी आपले मत त्याच्या समक्ष अगदी सरळपणे व सात्त्विकपणे सांगून टाकण्यात ते मुळीच कसूर करीत नाहीत, त्यामुळे त्यांच्या समागमात राहणा-या तरुणांस फार लाभ होण्यासारखा आहे. दुसरी विशेष गोष्ट मी पाहिलेली त्यांची नित्याची कौटुंबिक उपासना ही होय. स्वाशयनिवेदन व आत्मपरिक्षणांनी परिपूर्ण भरलेल्या त्यांच्या व्यक्तिप्रार्थना, आम्हांला पान उलटण्याचीही फुरसद न मिळता त्यांना समयोचित सुचणारे तुकोबांचे अभंग अगदी विनीत भावाने त्यांच्या भोवताली बसलेली त्यांची मुले, नातू व नाती व त्यांचे भजन हे सर्व पाहून परक्याचे मनावर देखील फार खोल व शुभ परिणाम होण्यासारखा आहे.

बंगाल्यातील महर्षी देवेंद्रनाथ हे आता परलोकवासी झाले. पण आमचे महर्षी आमच्यात अद्यापि आहेत ही किती भाग्याची गोष्ट ! हे महर्षीही त्याप्रमाणेच आमच्या समाजाचे प्रधान आचार्य आणि महनीय उपाध्याय आहेत. उपासना व उपदेश ह्याशिवाय कौटुंबिक विधिसंस्कार ह्यांनीच ग्रथित करून ठेविले आहेत. इतकेच नव्हे तर उपनयन, विवाह, नामकरण, आदिकरून घरगुती विधी ह्यांच्या हस्ते जितके झाले आहेत, तितके समाजात इतरांकडून झाले नसतील. शेवटी गुरुवर्यांजवळ एकच मागणी मागून मी रजा घेतो. आमच्या समाजाच्या मतासंबंधी एकाद्या वजनदार ग्रंथाची हल्ली मोठी उणीव आहे. बाह्य ग्रंथाचे प्रामाण्य समाज मानीत नाही, तेव्हा अशा ग्रंथास पुढे भलतेच महत्त्व येईल अशी भीती कोणास बाळगण्याचे कारण नाही. तर डॉ. साहेबांच्याच हस्ते असा ग्रंथ होईल तर आम्ही फार आभारी होऊ.

डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. १०-४-१९०२

नाताळच्या खालोखाल ईस्टर हा ख्रिस्ती लोकांचा मोठा सण आहे. ह्याची गणना चांद्रमानाप्रमाणे होत असल्यामुळे सौर वर्षात ह्याची तारीख मागे पुढे बदलते. गुड फ्रायडे (चांगला शुक्रवार) पासून तो पुढच्या सोमवार अखेर, अत्यंत गरजेची-विशेषेकरून दारूची दुकाने खेरीज करून, बाकी सर्व दुकाने सर्वत्र ह्या चार दिवसांत बंद असतात. हा चांगला शुक्रवार येशू ख्रिस्ताची पुण्यतिथी होय. ह्याच दिवशी ज्यू लोकांनी त्यास सुळावर चढविले. पुढे तीन दिवसांनी आदित्यवारी तो थडग्यातून आपल्या जड शरीरासह उठला आणि आकाशात देवाच्या उजवीकडे बसला अशी जुन्या ख्रिस्ती लोकांची भोळी समजूत आहे. म्हणून शुक्रवार हा शोकाचा दिवस आणि  आदित्यवार हा आनंदाचा दिवस मानून देवळातील सर्व आराधनेचे प्रकार ह्या समजुतीस अनुरूपच होतात. चांगल्या शुक्रवाराच्या पूर्वीच्या सहा आठवड्यास लेंट (Lent) हे नाव आहे. हा शब्द सॅक्सन भाषेतील लेनटन् (Leneten) ह्या शब्दापासून आला आहे, लेनिटनचा अर्थ लांबणे व ह्या सहा आठवड्यांत दिवस अधिकाधिक लांबत असतो व रात्र कमी होत असते. ह्यावरून लेंटची संस्था ख्रिस्ताच्याही पूर्वीची असून नंतर तिला ख्रिस्ती धर्माचे स्वरूप आले ते असे,:-……जॉन दि बाप्टिस्ट ह्याने ख्रिस्तास बाप्तिस्मा दिल्यावर ख्रिस्ताने ४० दिवस वनवास भोगिला. चाळीस अहोरात्री त्याने उपवास केला. ह्या अवधीत सैतानाने त्यास अनेक प्रकारे भुलविण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. ह्यानंतर ख्रिस्त, लोकांस उपदेश करण्या निघाला. हे चाळीस दिवस आता लेंट ह्या नावाने  पवित्र मानण्यात येत आहेत. हिंदू लोक जसे चातुर्मास साधला नही तरी शेवटची कार्तिकी एकादशी तरी पाळतात तसे इकडेही निदान गुडफ्रायडेच्या दिवशी पुष्कळ बायका, मुले व म्हातारी माणसे उपवास करितात. फराळाचे मुख्य जिन्नस म्हणजे मासे व अंडी हे होत. आमच्याकडे जसे एकादशीच्या दिवशी केळी, रताळी, भुईमूग इ. जिन्नस दोनप्रहरी अगदी महाग होतात. तसेच येथे (डेव्हनपोर्ट हे मासे धरण्याचे मुख्य ठिकाण असूनही) शुक्रवारी सकाळीच बाजारात मासा म्हणजे अगदी दुर्मिळ पदार्थ झाला होता, असे आमच्या घरवालीने सांगितले. अशा प्रकारची व्रते आणि धार्मिकपणा रोमन कॅथोलिक लोकांमध्ये फार आढळतो. संध्याकाळी एका कॅथोलिक देवळातून बाहेर पडल्यावर एका गृहस्थाशी बोलत असताना त्याने म्हटले, “हे प्रॉटेस्टंट लोक इतके उद्दाम आहेत की ते आजदेखील मांस खातात” मग मी त्यास विचारले तुम्ही मासे नाही का खात? ते धार्मिक गृह्थ म्हणाले, “मासे काय प्राणी आहेत?” हे ऐकून मी निरूत्तर झालो!

एकंदरीत हा सण शोकाचा व अनुतापाचा आहे. म्हणून क्वचित काही पापभीरू लोक कसलीही मौज, चैन अथवा करमणूक न करिता घरी स्वस्थ चिंतनात काल घालवितात, पण अशी उदाहरणे दिवसेदिवस दुर्मिळ होऊ लागली आहेत असे दिसते.

सुशिक्षित आणि फॅशनेबल लोकांत तर कोणत्याही प्रकारचे सण पाळणे म्हणजे गावंढळपणाचे लक्षण समजले जाते. हे राष्ट्र अत्यंत उद्यगी लोकांचे असल्यामुळे बहुजनसमाज सुट्टी मिळाल्याबरोबर सहजच ती चैनीत व करमणुकीत घालवितो. हा वसंत ऋतूचा काळ असल्यामुळे फुटबॉल, हॉकी इ. मोकळ्या हवेतले खेळ खेळणे व ते पाहणे ह्या मुख्य करमणुकीखालील वर्गाची मोठी करमणुक म्हणजे दारू पिणे. धर्माधिकारी ह्या सर्वच करमणुकी सरसकट बंद करण्याठी कंठशोष करितात म्हणून त्यांस कोणीही विचारीत नाहीत!

आज सारा  दिवसभर सर्व देवळांत उपासना चालू असतात. सकाळच्या उपासनेस येथील एका प्रॉटेस्टंट मुख्य देवळात गेलो. उपासकांची संख्या १० पुरूष, ३० बायका, १०० मुळे इतकी होती. नेहमी बायकापुरूषांचे प्रमाण बहुतेक असेच असते. कॅथोलिक देवळात पूजेचा संभार विशेष आणि आराधनाक अधिक थाटाचा असतो, तशात जवळच प्लिमथ येथे कॅथोलिक कथीड्रल म्हणजे मुख्य मठस्थान आहे, म्हणून तेथे संध्याकाळच्या मुख्य उपासनेस गेलो. कथीड्रलची इमारत जुनी आणि भव्य आहे. जागोजागी ख्रिस्ताच्या व ख्रिस्ती साधुसंतांच्या अनेक मूर्तींची स्थापना केली आहे. देवळात सर्वत्र शोकचिन्हे दिसत होती. मुख्य गाभा-यातील देव्हारा व त्यातील मूर्ती ह्यांवर काळ्या पडद्याचे झाकण होते. इतर मूर्तीपुढे नेहमी असणारा धूपदीप, पुष्पांचा थाटही आज नव्हता. ह्यामुळे देवळात शिरल्याबरोबर असा काही अवर्णनीय गंभीर देखावा दिसला की लवकरच अंत:करण खेदमय भावाने भरून गेले. पहावे तिकडे ख्रिस्ताच्या दु:खपर्यवसायी चरित्राचे असे प्रदर्शन होत होते की पुण्यशील आत्म्यास पश्चात्ताप घडावा! मग पाप्यांची काय कथा!

७|| वाजता उपासनेस प्रारंभ झाला. प्रत्येक स्त्रीपुरूष देवळात आल्याबरोबर देव्हा-यासमोर गुडघे किंचित वाकवून पुढे जाई. नेमिल्या वेळी बिशपचा छबिना आला. सर्वांपुढे वृद्ध आणि मौनव्रत धारण करणा-या बिशपची स्वारी, त्याच्या मागून ८|१० धर्माधिकारी व त्यांच्या मागून सुमारे ६० गाणा-या मुलांचा मेळा, अशा क्रमाने येऊन सर्व मुख्य गाभा-यात आपापल्या जागी बसले. दोन रांगांच्यामध्ये एका व्यासपीठावर बायबल ठेविले होते त्यातील निवडक भाग प्रत्येक धर्माधिकारी पुढे पूर्वेकडे तोंड करून म्हणजे इतर सर्व उपासकांकडे पाठ करून वाचीत असे. असे सर्व धर्माधिका-यांनी केल्यावर मुख्य कॅननचा उपदेश झाला. त्यात त्याने ख्रिस्तास सुळी देण्याच्या प्रसंगाचे वर्णन केले, त्याच्या रक्ताने भाविक मनुष्याच्या पापाचे क्षालन कसे होते, त्याप्रसंगी जे अनेक चमत्कार घडले ते सर्व अक्षरश: खरे आहेत, त्याविषयी जुन्या ज्यू लोकांच्या करारातही भविष्य आहे इ. इ. गोष्टी त्याने सांगितल्या. त्याचा पोषाक, पायघोळ पांढरी कफनी, छातीवर तांबडे वस्त्र, कंबरेस व दोन्ही बाजूंनी जरीकाठी काळ्या कापडाच्य पट्ट्या, डोकीस मुकुटाकृती काळी टोपी असा होता. व्याख्यानात जेव्हा ख्रिस्ताचे नाव येई तेव्हा तो आपली टोपी उचलीत असे व सर्व उपासक नमन करीत. व्याख्यान आटपल्यावर मेळ्यातील मुलांनी अत्यंत करूण व दीर्घ स्वराने काही गाणी म्हटली. आज कसलेही वाद्य वाजविण्यात आले नाही. ह्यानंतर ख्रिस्ताच्या प्राणोत्क्रमणाची वेळ आली. ह्यावेळी पृथ्वीवर चहूंकडे मोठा अंधार पडला, धरणीकंप झाला आणि मोठा आवाज झाला इ. वर्णन बायबलात आहे. म्हणून आता तसेच करण्यात आले. देवळातील सर्व दिवे ग्यासचे असल्याने ते एकदम नाहीसे केले. पाच मिनिटे चहूंकडे अंधार आणि सामसूम झाले. ह्यावेळी ह्या मोठ्या देवळात सुमारे ३०० लोक होते; पण कोणीही मोठ्याने श्वोसोच्छवास देखील करीना. शेवटी धरणीकंपाची नक्कल करण्यास्तव एका कोप-यातून धडधड असा बारीक आवाज झाला! मग सर्व दिवे एकदम लागले आणि उपासना आटपली!!

प्रॉटेस्टंट देवळात ह्या नकला होत नाहीत, पण व्याख्यानांचा सारांश बहुतेक असाच असतो. युनिटेरिअन देऊळ गुड फ्रायडेच्या दिवशी तर मुळी बंदच होते व इस्टरच्या आदित्यवारी त्यातील दोन्ही उपासना एका ब्राह्माने चालविल्या!

डी. सी. मिशनचा १७ वा वाढदिवस

“अस्पृश्यांचा” उद्धार करण्यात “स्पृश्य” आपलाच उद्धार करीत आहेत हा सर चंदावरकरांचा मार्मिक उदगार मिशन उघडते वेळी १६ वर्षापूर्वी काढलेला अद्यापि एका आध्यात्मिक सत्याची साक्ष देत आहे. ह्या मिशनच्या मिशनरीची सांसारिक तरतूद कधीच करण्यात आलेली नव्हती. मिळेल ते द्यावे व हातून होईल ते मुकाट्याने काम करावे अशी व्यवस्था कशीबशी आजपर्यंत पार पडली. मनू पालटल्यामुळे असली जुनीपुराणी व्यवस्था पुढे टिकणार नाही अशा तक्रारी पुष्कळ ऐकल्या, पण हा प्रश्न सोडविण्याला मात्र कोणीच पुढे येत नाही.  अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न आता काँग्रेसने हाती घेतला आहे, व सक्तीच्या शिक्षणाची बिलेही पास होऊ लागली आहेत. पण रड आणि ओरड तशीच कायम आहे. ह्यावरून असे दिसते की, लोकशिक्षण, अस्पृश्यतानिवारण वगैरेसारखी कामे सार्वजनिक ठरावापेक्षा बहुतकरून सार्वजनिक स्वार्थत्यागावरच अधिक अवलंबून असावीत. दिवसेंदिवस अशा स्वार्थत्यागास मात्र अधिक ओहटी लागल्यामुळे काही लोक त्यागाची उणीव शाब्दिक ठरावांनी भरून काढू पहात आहेत. सामाजिक सुधारणेला राजकीय स्वरूप आल्याने व जातीजातींत जगभर तेढ माजून राहिल्यामुळे असल्या मिशनच्या बाबतीत कच्च्या दिलाच्या माणसांनी निराश होणे साहजिक आहे. असली कामे जड साधनापेक्षा आध्यात्मिक साधनांनीच जास्त साध्य होणार हे खरे. पण हल्ली जे भयंकर युगांतर होत आहे त्यात आध्यात्मिक साधने मागे पडून फेरपक्षाच्या जड साधनांचा गवगवा फार माजला आहे. त्यामुळे “अस्पृश्य” वर्गाच्या काही पुढा-यांची दिशाभूल मात्र होण्याचा संभव बराच आहे. सक्तीचे शिक्षण मिळाले तरी खरी अस्पृश्यता जाण्याला थोडा जास्तच अवधी लागेल अशी भीती आहे. मुंबई, पुणे, नागपूर, हुबळी, मंगळूर, कालीकत, बंगलूर, मद्रास, भावनगर, राजकोट वगैरे ठिकाणी ह्या मिशनची ठाणी आहेत. ती चालू राहोत, किंवा बंद पडोत, काँग्रेस कितीही ठराव किंवा कौंसिले कितीही बिले पास करोत, जोपर्यंत “स्पृश्य” मानलेल्यांचा स्वार्थत्याग व ममता व “अस्पृश्य” मानलेल्यांची सहनशीलता आणि सहकारिता ही वाढत नाहीत तोपर्यंत ह्या मिशनचे काम संपले असे म्हणता यावयाचे नाही! ईश्वर करो आणि हे काम लवकर संपो!!

पुणे येथील नव्या इमारती बांधण्याची सर्व कामे आता संपलेली आहेत. कंत्राटदाराच्या अडचणीमुळे त्यांनी मुख्य इमारत अद्यापि मिशनच्या ताब्यात दिली नसली तरी लवकरच त्यांच्याकडून काम संपून प्रवेश-समारंभ होण्यास हरकत राहणार नाही. एकंदर खर्च एक लाख रूपयांवर होईल. अशा कठीण काळात मिशनला इतक्या इमारती मिळाल्या ही ईश्वरी देणगीच समजावयाची. इंदूरच्या महाराजांनी पहिले २०,००० रूपये दिले नसते तर ही कल्पनाच निघाली नसती. मुंबई सरकारांनी बरीच देणगी दिल्याने मिशन त्यांचेही आभारी आहे. पुणे शाखा जड साधनांच्या दृष्टीने आता स्थिर झाली असे म्हणता येईल. आपली उन्नती करून घेणे हे ह्यापुढे “बहिष्कृत” वर्गावरच अधिक अवलंबून आहे. त्यांची दौषैकदृष्टी लवकर कमी न होईल तर “वरिष्ठ” म्हणविणा-या वर्गातून त्यांच्या सेवेस जास्त माणसे वाहून घेतील असे दिसत नाही. जी माणसे अद्यापि टिकून आहेत, त्यांच्यामध्येही ख-याखोट्या सबबीवर वितंडवाद माजणे चालू कलियुगात शोभण्यासारखेच आहे. तथापि कोणीही त्यांचा अंत पाहण्यात आपला काळ दवडणार नाहीत अशी आशा आहे! शेवटी कर्ताकरविता परमेश्वर समर्थ हेच खरे!

  1. टिळकांच्या मानपत्रास विरोध
  2. जलप्रवास
  3. जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा सुवर्णमहोत्सव
  4. जनातून वनात आणि परत
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • 29
  • 30
  • 31
Page 27 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी