डी. सी. मिशनचा १७ वा वाढदिवस

“अस्पृश्यांचा” उद्धार करण्यात “स्पृश्य” आपलाच उद्धार करीत आहेत हा सर चंदावरकरांचा मार्मिक उदगार मिशन उघडते वेळी १६ वर्षापूर्वी काढलेला अद्यापि एका आध्यात्मिक सत्याची साक्ष देत आहे. ह्या मिशनच्या मिशनरीची सांसारिक तरतूद कधीच करण्यात आलेली नव्हती. मिळेल ते द्यावे व हातून होईल ते मुकाट्याने काम करावे अशी व्यवस्था कशीबशी आजपर्यंत पार पडली. मनू पालटल्यामुळे असली जुनीपुराणी व्यवस्था पुढे टिकणार नाही अशा तक्रारी पुष्कळ ऐकल्या, पण हा प्रश्न सोडविण्याला मात्र कोणीच पुढे येत नाही.  अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न आता काँग्रेसने हाती घेतला आहे, व सक्तीच्या शिक्षणाची बिलेही पास होऊ लागली आहेत. पण रड आणि ओरड तशीच कायम आहे. ह्यावरून असे दिसते की, लोकशिक्षण, अस्पृश्यतानिवारण वगैरेसारखी कामे सार्वजनिक ठरावापेक्षा बहुतकरून सार्वजनिक स्वार्थत्यागावरच अधिक अवलंबून असावीत. दिवसेंदिवस अशा स्वार्थत्यागास मात्र अधिक ओहटी लागल्यामुळे काही लोक त्यागाची उणीव शाब्दिक ठरावांनी भरून काढू पहात आहेत. सामाजिक सुधारणेला राजकीय स्वरूप आल्याने व जातीजातींत जगभर तेढ माजून राहिल्यामुळे असल्या मिशनच्या बाबतीत कच्च्या दिलाच्या माणसांनी निराश होणे साहजिक आहे. असली कामे जड साधनापेक्षा आध्यात्मिक साधनांनीच जास्त साध्य होणार हे खरे. पण हल्ली जे भयंकर युगांतर होत आहे त्यात आध्यात्मिक साधने मागे पडून फेरपक्षाच्या जड साधनांचा गवगवा फार माजला आहे. त्यामुळे “अस्पृश्य” वर्गाच्या काही पुढा-यांची दिशाभूल मात्र होण्याचा संभव बराच आहे. सक्तीचे शिक्षण मिळाले तरी खरी अस्पृश्यता जाण्याला थोडा जास्तच अवधी लागेल अशी भीती आहे. मुंबई, पुणे, नागपूर, हुबळी, मंगळूर, कालीकत, बंगलूर, मद्रास, भावनगर, राजकोट वगैरे ठिकाणी ह्या मिशनची ठाणी आहेत. ती चालू राहोत, किंवा बंद पडोत, काँग्रेस कितीही ठराव किंवा कौंसिले कितीही बिले पास करोत, जोपर्यंत “स्पृश्य” मानलेल्यांचा स्वार्थत्याग व ममता व “अस्पृश्य” मानलेल्यांची सहनशीलता आणि सहकारिता ही वाढत नाहीत तोपर्यंत ह्या मिशनचे काम संपले असे म्हणता यावयाचे नाही! ईश्वर करो आणि हे काम लवकर संपो!!

पुणे येथील नव्या इमारती बांधण्याची सर्व कामे आता संपलेली आहेत. कंत्राटदाराच्या अडचणीमुळे त्यांनी मुख्य इमारत अद्यापि मिशनच्या ताब्यात दिली नसली तरी लवकरच त्यांच्याकडून काम संपून प्रवेश-समारंभ होण्यास हरकत राहणार नाही. एकंदर खर्च एक लाख रूपयांवर होईल. अशा कठीण काळात मिशनला इतक्या इमारती मिळाल्या ही ईश्वरी देणगीच समजावयाची. इंदूरच्या महाराजांनी पहिले २०,००० रूपये दिले नसते तर ही कल्पनाच निघाली नसती. मुंबई सरकारांनी बरीच देणगी दिल्याने मिशन त्यांचेही आभारी आहे. पुणे शाखा जड साधनांच्या दृष्टीने आता स्थिर झाली असे म्हणता येईल. आपली उन्नती करून घेणे हे ह्यापुढे “बहिष्कृत” वर्गावरच अधिक अवलंबून आहे. त्यांची दौषैकदृष्टी लवकर कमी न होईल तर “वरिष्ठ” म्हणविणा-या वर्गातून त्यांच्या सेवेस जास्त माणसे वाहून घेतील असे दिसत नाही. जी माणसे अद्यापि टिकून आहेत, त्यांच्यामध्येही ख-याखोट्या सबबीवर वितंडवाद माजणे चालू कलियुगात शोभण्यासारखेच आहे. तथापि कोणीही त्यांचा अंत पाहण्यात आपला काळ दवडणार नाहीत अशी आशा आहे! शेवटी कर्ताकरविता परमेश्वर समर्थ हेच खरे!