1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

विविध प्रयत्न

नागपूरच्या सरकारी कॉलेजचे प्रो. श्रीनिवास नारायण बनहट्टी यांनीं आपल्या नवभारत ग्रंथमालेतर्फे माझें 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हें पुस्तक इ.स. १९३३ सालीं प्रसिद्ध केलें आहे.  त्यांत मीं या प्रश्नाचा प्राचीन कालापासून सविस्तर व सांगोपांग विचार केला आहे.  ह्याचा परामर्ष पुढें योग्य स्थळीं घेणें बरें पडेल.  तूर्त अस्पृश्यतानिवारणासंबंधीं डिप्रेस्ड क्लासेस मिशनचें काम सुरू होण्यापूर्वी गेल्या शतकाच्या मध्यापासून जे प्रयत्‍न झाले आहेत त्याचा जरुरीपुरता निर्देश करणें बरें.  याविषयीं रा. श्री. व्यं. केतकरकृत 'महाराष्ट्रीय ज्ञानकोश' या पुस्तकांत १९२४ सालीं माझा सविस्तर लेख प्रसिद्ध झाला आहे.

पूर्वेतिहास  :  या जागतिक प्रश्नाच्या उत्पत्तीविषयीं मीं 'ज्ञानकोशा' च्या लेखाच्या आरंभीं म्हटलें आहे कीं, अस्पृश्यतेचा इतिहास निदान हिंदुस्थानांत तरी आर्य लोकांच्या आगमनाइतकाच जुना आहे.  चांडाल हा शब्द वैदिक वाङ्‌मयांत आणि बौद्ध वाङ्‌मयांतून आढळतो.  बुद्धाच्या वेळेच्या पूर्वीपासून तरी निदान चांडाल आणि इतर राष्ट्रें अस्पृश्य गणलीं जात होतीं, असे उल्लेख आढळतात.  इराणांतील झरतुष्ट्रपंथी आर्य व हिंदुस्थानांतील देवयज्ञी आर्य यांना अस्पृश्य आणि तिरस्करणीय समजत असत, असे पारश्यांच्या जुन्या व अर्वाचीन ग्रंथांत पुरावे मिळतात.  आर्यांचा हिंदुस्थानांत कायमचा जम बसल्यावर त्यांनीं येथील दस्यु ऊर्फ शूद्र नांवाच्या जित लोकांना आपल्या वस्तीजवळच, पण बाहेर राहावयास लावलें.  त्यांच्या व आपल्या संस्कृतींत भेसळ होऊं नये म्हणून त्यांनीं त्यांना अस्पृश्य ठरविलें.  ज्या अर्थी जपानांत हैटा व हीना नांवाच्या अस्पृश्य जाती अद्यापि आहेत त्या अर्थी अस्पृश्य जात ही संस्था आर्यांनींच निर्माण केली असून तिचा प्रादुर्भाव पूर्वी मोंगल लोकांतही होता हें सिद्ध होतें.  हैटा किंवा ऐटा ही जात फिलिपाइन बेटांतून जपानांत गेली असावी.  अथ्रवण (ब्राह्मण), रथेष्ट्र (राजन्य), वस्ट्रय (वैश्य) आणि हुइटि (शूद्र) असे झरतुष्ट्राच्या वेळीं इराणांत चार भेद होते.  वेदांत शूद्र हा भेद फारसा आढळत नाहीं, पण महाभारतांत अमीर आणि शूद्र यांचा उल्लेख असून सिंधु नदीच्या मुखाजवळील भागांत त्यांची वस्ती असावी असें दिसतें.  ॠग्वेदांत पुरुषसूक्तांत शूद्र शब्द झाला आहे व शुल्क यजुर्वेदांत आठ वेळां हा शब्द आला आहे.  Castes of India ह्या पुस्तकांत विल्सननें म्हटलें आहे कीं, कंदाहार प्रांतांत शूद्रोई नांवाचें प्राचीन राष्ट्र होतें आणि सिंधु नदीवर शूद्रोस नांवाचें शहर होतें.  इराणांतील हुइटी अथवा शूद्रोई आणि फिलिपाइन बेटांतील हैटा या जातींचा संबंध असल्याचें सिद्ध करतां आल्यास अस्पृश्यतेच्या प्राचीन उत्पत्तीवर आणि प्रसारावर बराच प्रकाश पडण्यासारखा आहे.  इंग्रजी शिक्षणामुळें हिंदुस्थानांत जी आधुनिक सुधारणेची प्रवृत्ति झाली तिच्यामुळें अस्पृश्यतेच्या निवारणार्थ जे ठिकठिकाणीं प्रयत्‍न झाले त्यांचा आतां विचार करूं.

महात्मा ज्योतिबा फूले  :  बंगाल्यात १८२८ सालीं राजा राममोहन राय यांनीं ब्राह्मसमाज स्थापन करून आद्य प्रगतीची ध्वा उभारली, पण अस्पृश्यतानिवारणाचा अग्र आणि अंतिम मान महाराष्ट्रासच मिळाला.  विशेषतः तो मान महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेंच प्राप्‍त झाला.  महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुणें येथें फुलमाळी समाजांत झाला.  १८४८ पर्यंत यांचे मराठी व इंग्रजी शिक्षण मिशनरी शाळेंत झालें.  १८५२ सालीं मुंबई सरकारानें ज्योतिबांना २०० रुपयांची शाल मोठी जाहीर सभा भरवून नजर केली.  त्याचें कारण १८४८ सालीं ज्योतिबांनीं मुलींची पहिली शाळा स्थापन केली आणि १८५२ सालच्या आरंभीं महार-मांगांच्या मुलांसाठीं पहिली शाळा स्थापन केली.  ही शाळा मुंबई इलाख्यांतच नव्हे तर अखिल भारताच्या इतिहासांत अस्पृश्यांसाठीं एका हिंदूनें उघडलेली पहिली शाळा होय.  सरकारी इन्स्पेक्टर मेजर कँडीसाहेब यांनी ह्या शाळेची पहिली परीक्षा २१ मार्च १८५२ रोजीं शुक्रवार पेठेंतील शाळेंत घेतली, असें त्या दिवशीं प्रसिद्ध झालेल्या ज्ञानप्रकाशच्या अंकांत नमूद झालेलें आहे.  ''ह्या वेळेस शुद्ध लिहणें व वाचणें वगैरे गोष्टींत ह्या शाळेंतील मुलांनीं विश्रामबागेंतील (वरिष्ठ वर्गाच्या) कित्येक मुलांपेक्षांही उत्तम परीक्षा दिली, असें मेजरसाहेबांनीं बोलून दाखविलें.''  ता. ५ डिसें. १८५२ च्या 'ज्ञानप्रकाशांत' पहिल्या वार्षिक रिपोर्टासबंधानें संपादकानें स्पष्ट मत दिलें आहे.  ''त्यांनीं एक मुलींची शाळा आपल्या घराजवळ काढली.  त्या कालावधींत व पुढेंही त्यांना त्यांच्या जातीकडून फार त्रास सोसावा लागला.  त्यांस शेवटीं त्यांच्या तीर्थरूपांनीं त्याच कारणावरून घरांतून बाहेर काढलें.  आपल्या नीच मानलेल्या बंधुजनांस अज्ञानसागरांतून काढून ज्ञानामृताचें सेवन देण्याकरितां त्यांनीं संकटें भोगलीं, हा त्यांचा त्या जातीवर मोठा उपकार आहे.  आम्हीही त्यांचे आभार मानतों.'' ह्या शाळेंत चांभाराच्या मुलींना ज्योतिबा स्वतः व त्यांची पत्‍नी किती कळकळीनें शिकवीत असत याविषयीं एक पत्र ज्ञानप्रकाशांत प्रसिद्ध झालें आहे. ''त्यांचे तीन मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि सखाराम यशवंत परांजपे यांची ज्योतिबांना बरीच मदत असे.  महारामांगांच्या शाळांत बरीच गर्दी होत असे.  ह्या लोकांस त्यांनीं आपल्या राहत्या घराच्या विहिरीवर पाणी भरण्यास परवानगी दिली होती.'' (अ. ए. गवंडीकृत फुले-चरित्र, पान ८)

भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीनें नानाच्या पेठेंत पुणें म्युयनिसिपालिटीकडून ता. १८ जून १९१४ रोजीं भोकरवाडीजवळील ७ एकर जागा आपल्या प्रशस्त इमारतीकरितां नव्याण्णव वर्षांच्या करारानें घेतली आहे.  हीच ती ज्योतिबांची मिळकत होय.  सरकारकडून म्युनिसिपालिटीला जी शाळा मिळाली ती देखील हल्लीं या मंडळींच्या शाळांतच सामील झाली आहे.

बाबू शशिपाद बंदोपाध्यायजी (बानर्जी)  :  बंगाल्यांत अस्पृश्यतानिवारणाचा प्रथम मान वरील ब्राह्मण गृहस्थांकडेच आहे.  हे कलकत्त्याकडील बारानगर गांवीं सन १८४० मध्यें कुलीन ब्राह्मण जातींत जन्मले.  सन १८६६ सालीं त्यांनीं ब्राह्मसमाजाची दीक्षा घेतली.  तेव्हांपासूनच ते खालच्या जातीशीं मिळूनमिसळून जेवूं-खाऊं लागले.  १८६५ सालच्या नोव्हेंबरच्या १ ल्या तारखेस बारानगरच्या गिरणींतल्या मजुरांची त्यांनीं एक सभा भरविली.  या सभेंत ठराव होऊन त्यांनीं मजुरांकरितां रात्रीच्या व दिवसाच्या शाळा काढल्या.  हा अनाचार टवाळ लोकांस न खपून त्यांनीं त्या शाळा उठविल्या.  पण बाबूजींनीं स्वतःच्या खर्चानें इमारती बांधून त्या कायम ठेवल्या.  महाराष्ट्रांतील चोखामेळ्याप्रमाणें बंगाल्यांतील कर्ताभजापंथी चांडाळवर्ग भजनाचा शोकी आहे.  त्यांचा बिहालपारा गांवीं सारंगी तयार करण्याचा एक उत्तम कारखाना आहे.  तेथें जाऊन बाबूजी चांडाळांचें कीर्तन ऐकत.  १८७० सालच्या ऑगस्ट महिन्यांत त्यांनीं अशा मजूरवर्गाचा एक क्लब काढला.  त्याच्या द्वारां त्यांना वाचनाची गोडी लागली आणि त्यांच्या मद्यपानादि दुष्ट चाली सुटल्या.  वेडीवांकडीं अभद्र गाणीं सोडून ही मंडळी सात्त्विक कीर्तनें करूं लागलीं.  १८७१ मध्यें जेव्हां बाबूजी विलायतेस निघाले तेव्हां ह्या गरीब मजुरांनीं त्यांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक मानपत्र दिलें.  या दीनांच्या सेवेबद्दलचा बाबूजींचा सत्कार ते विलायतेस गेल्यावर ब्रिस्टल शहरीं एका मिशनरी संस्थेनें मोठें मानपत्र देऊन केला.  परत आल्यावर शशिपाद बाबूंनीं गरिबांसाठीं एक पैसा किमतीचें एक मासिक काढलें.  दर महिन्यास त्याच्या १४०० प्रती खपूं लागल्या.  त्यांत पं. शिवनाथसारख्यांनीं लेख लिहिले.  श्रीमंत वर्गाचीही त्यास चांगलीच मदत असे.  'बारानगरसमाचार' नांवाचें साप्‍ताहिकही त्यांनीं काढलें.  ते चांडाळाबरोबर जेवीत; मेहेतरांच्या मुलांची शुश्रुषा करीत.  सरकारनें नुकत्याच उघडलेल्या सेव्हिंग्ज बँकेंत त्यांचे पैसे ठेवायला लावून त्यांनीं त्यांना काटकसर शिकविली.  बारानगरास पुढें ब्राह्मसमाज स्थापन झाल्यावर तेथें बरेंच काम होऊं लागलें.  कलकत्ता येथें ब्राह्मसमाजाचा माघोत्सव होतो.  त्या वेळीं मोठ्या थाटाचें नगरसंकीर्तन निघतें.  त्यांत बारानगरच्या मजुरांची एक दिंडी येऊन भजनांत भाग घेते.  हल्लीं बंगाल्यांत जें Backward Classes Mission आहे त्यांचें मूळ महाराष्ट्रांतील Depressed Classes Mission हें आहे.

मुंबईंतील एक प्रयत्‍न  :   मुंबई शहरांत १८५५ सालीं एक मंडळी नेमून तिच्या विद्यमानें कांहीं शाळा अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीं स्थापन झाल्या होत्या, पण त्या वेळीं काल अनुकूल नसल्यामुळें व चिकाटी धरून काम न झाल्यानें त्या शाळा बंद पडल्या.  १८७० सालीं ब्रह्मानंद केशवचंद्र सेन विलायतेहून परत आले व त्यांनीं धोबी तलावावर फ्रामजी कावसजी इन्स्टिट्यूटमध्यें जें व्याख्यान दिलें त्यांत त्यांनीं खालच्या जातींच्या उन्नतीसाठीं मुं. प्रा. समाजानें कांहीं कार्य करावें अशी सूचना केली.  ह्या सूचनेस अनुसरून मुं. प्रा. स. च्या मंडळींनीं रात्रीच्या कांहीं शाळा स्थापन केल्या.  त्यापैकीं दोन शाळा फक्त अस्पृश्य मानलेल्या जातींसाठीं होत्या.  १८९१ सालीं प्रा. स. चे एक सभासद शेठ दामोदरदास सुखडवाला ह्या उदार गृहस्थांनीं भायखळा येथें स्वखर्चानें अस्पृश्यांसाठीं शाळा चालविण्यासाठीं मदत केली.  सर नारायणराव चंदावरकर यांनीं १८९१ सालीं असें म्हटलें आहे कीं, 'अस्पृश्योद्धाराच्या एकंदर चळवळीचा त्या वेळपर्यंतचा इतिहास अवलोकन केला व आज अस्पृश्योद्धारार्थ चालू असलेलें कार्य ध्यानांत घेतलें तर बरेंचसें श्रेय ख्रिस्ती मिशनरी, ब्राह्मसमाज, कर्नल अलकॉट व इतर थिऑसॉफिस्ट, स्वामी दयानंद सरस्वती व आर्यसमाज यांच्याकडे जातें यांत कांहीं संशय नाहीं.'

सयाजीराव महाराज  :  भारतीय अस्पृश्यता ही एक स्वतंत्र संस्थाच आहे.  बौद्ध, जैन, शीख, लिंगायत, वैष्णव वगैरे धर्मपंथीयांनीं व इतर साधुसंतांनीं प्राचीन व मध्ययुगीन कालीं अस्पृश्यांच्या आत्मिक उद्धारासाठीं प्रयत्‍न केले आहेत, पण ते सर्व वैयक्तिक स्वरूपाचे होते.  सामुदायिक अस्पृश्यता मुळांतच नष्ट करून आधुनिक अर्थानें ती निवारण्याचें व त्यापुढचें भौतिक उद्धाराचें काम या पंथांनीं किंवा कुणीं संतांनीं केलेलें इतिहासांत नमूद नाहीं.  ह्या बाबतींतील चालू प्रयत्‍न म्हणजे आधुनिक युगाचेंच एक विशिष्ट लक्षण आहे.  पाश्चात्यांची संस्कृति या पुराणप्रिय देशांत अंमल गाजवूं लागल्यावर १९ व्या शतकाच्या मध्यापासून अशा प्रयत्‍नांना सुरुवात झाली.  केवळ कलानुक्रमाप्रमाणें पाहिल्यास श्रीमंत महाराज सरकार गायकवाड यांचा नंबर तिसरा लागतो.  महात्मा जोतिबा फुले यांचा प्रयत्‍न १८५२ सालीं, बाबू बॅनर्जी यांचा प्रयत्‍न १८६५ सालीं व श्रीमंत महाराज सर सयाजीरावांचे प्रयत्‍न १८८३ सालीं, म्हणजे त्यांना राज्याधिकार मिळाल्याबरोबर दुसर्‍या तिसर्‍या वर्षी सुरू झाले.  या दृष्टीनें पाहतां श्रीमंत महाराज म्हणजे एका मोठ्या संस्थानचे मोठे अधिपति म्हणूनच नव्हे तर अखिल भारतांतील लोकमताचे नेते, समाजसुधारक, राजकारणकुशल मुत्सद्दी व आपल्या दोस्त इंग्रज सरकारालाही पदोपदीं धडे शिकविणारे अनुभवी सत्ताधारी म्हणून जगापुढें झळकत आहेत.  १८८२ सालीं ह्या कामास हात घालतांना महाराजांचें वय अवघें वीस वर्षांचेंही नव्हतें.  इतर संस्थानांतून जीं थोडींबहुत अशीं अपूर्व कृत्यें होतात त्यांचें श्रेय एखाद्या प्रागतिक दिवाणाकडेच असतें.  १९१८ सालीं आपल्या भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची मुंबईस एक खास अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरली होती.  तिचें अध्यक्षीय भाषण करतांना महाराज म्हणाले.  ''मला या कामीं अनेक अडचणींशीं झगडावें लागलें.  कितीही मोठ्या पगाराचें आमिष दाखविलें तरी कित्येक वर्षे हिंदु शिक्षकच मिळेनात.  मुसलमानांकडून व नंतर आर्यसमाजिस्टांकडून हें काम करवून घ्यावें लागलें.''  ह्या कठिण कार्याबद्दल १९२१ सालीं 'परोपकारी सभा' या नांवाच्या सभेनें महाराजांना 'पतितपावन' अशी पदवी दिली.  त्या वेळीं महाराज म्हणाले, ''या पदवीला मी पात्र आहें असें मला तरी वाटत नाहीं.  राज्याच्या काळजीमुळें व परिस्थितीमुळें ह्या कामीं मा जितकें करावयाचें होतें तितकें घडलें नाहीं.  माझे अधिकारी मला जें सांगतात त्यावरच मला निमूटपणें अवलंबून राहावें लागतें आणि ते जें करतात त्यावरच तृप्‍त राहावें लागतें.  मानवी प्रयत्‍नाला मर्यादा असतात.  विशेषतः हिंदुस्थानांतील राजेलोकांना ते सर्वाधिकारी असूनही ह्या मर्यादा अधिकच भोंवतात.''

१८९१-९२ सालीं बडोदा, अमरेली, पाटणा आणि नवसारी येथें प्रत्येक ठिकाणीं अस्पृश्य मुलांसाठीं व मुलींसाठीं स्वतंत्र वसतिगृहें काढून त्यांच्या जेवण्याची व राहण्याची सोय केली गेली.  कपडेलत्ते, पाट्यापेन्सिली वगैरेही पुरविलीं.  ह्यानंतर कित्येक वर्षे ह्या प्रयोगाला दुष्काळ व प्लेग हीं विघ्नें आलीं.  मुलांना शाळेंत पाठविण्याला या कंगाल लोकांना त्राण उरेना.  हिंदु अधिकार्‍यांच्या सहानुभूतीच्या अभावाचीही त्यांत भर पडली.  शेवटीं ह्यांतील कांहीं वसतिगृहें बंद ठेवावीं लागलीं.  तरी देखील महाराजांनीं खर्चांत बचत न करतां बडोदें भागांत रु. ४० च्या व इतर भागांत रु. २५ च्या शिष्यवृत्त्या ठेवल्या व कसेंही करून १९०० सालापासून पुढें कांहीं वर्षे शाळांतून विद्यार्थ्यांची संख्या १०० पासून १५०० पर्यंत राहील असें केलें.  एकंदरींत ह्या थोर पुरुषाच्या अंतःकरणांत ह्या हतभागी लोकांचा ध्यास सतत लागला होता, हें माझ्या ध्यानांत येऊन चुकलें.  इतकेंच नव्हे तर ह्या महत्त्वाच्या विषयासंबंधीं माझ्या स्वतःच्या विचारांना नवीन प्रोत्साहन मिळून ब्राह्मसमाजाच्या अखिल भारतांतील माझ्या प्रचारकार्याबरोबर ह्या लोकांची निरनिराळ्या प्रांतांतील स्थिति स्वतः डोळ्यांनीं नीट निरखून अजमाविण्याची मला प्रेरणा झाली.  १९०४ सालीं मुंबई येथें राष्ट्रीय परिषदेच्या अधिवेशनाबरोबर सामाजिक परिषदेचें अधिवेशन झालें.  त्या वेळीं एकेश्वरी परिषद भरून राममोहन आश्रमांत श्रीमंत महाराजांनीं प्रीतिभोजनांत भाग घेऊन आमच्याशीं सहकार्य केलें.  या परिषदेचा महाराष्ट्रावर व विशेषतः पुण्यांतील कार्यकारी पुढार्‍यांवर जसा शुभ परिणाम झाला तसाच महाराजांच्या उत्साहशक्तीवरही झालेला दिसतो.  लगेच दोनतीन वर्षांत पुणें-मुंबई येथें सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी, सोशल सर्व्हिस लीग, सेवासदन, डि. क्ला. मिशनसारख्या अखिल हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनावर परिणाम करणार्‍या संस्थांचा उद्‍भव झाला.  उलटपक्षीं याच सुमारास श्रीमंत महाराजांनींही आपल्या राज्यांत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा पास करून राष्ट्रीय शिक्षणाचा धडा इतर लहान-मोठ्या संस्थानांसच नव्हे तर प्रत्यक्ष इंग्रज सरकारासही घालून दिला.  बडोद्याच्या इतिहासांत हें साल सोन्याच्या अक्षरांत लिहिलें जाईल.  बडोद्यांत सक्तीच्या शिक्षणाचें प्रस्थान मांडल्यावर उसळीसरशी अंत्यज शाळांची संख्या १८ ची २४७ आणि विद्यार्थ्यांची संख्या ५००० ची ९२६९ झाली.  बंद केलेल्या वसतिगृहांची पुन्हां गरज भासूं लागली.  लौकरच अंत्यजांच्या सुदैवानें आर्यसमाजी पं. आत्माराम ह्या तरबेज आणि स्वतःस वाहून घेतलेल्या कार्यवाहकाची जोड मिळाली.  १९०७-८ च्या सुमारास हल्लींचें नांवाजलेलें बडोद्याचें अंत्यज विद्यार्थी वसतिगृह उघडण्यांत आलें.  पंडितजींना त्याचें सुपरिंटेंडेंट व बडोदें राज्यांतील अंत्यजांच्या शिक्षणाचे इन्स्पेक्टर नेमण्यांत आलें.  ह्याच सुमारास महाराजांनीं मला बडोद्यास पुन्हां बोलाविलें.  न्यायमंदिराच्या भव्य दिवाणखान्यांत एक जंगी दरबारवजा जाहीर सभा बोलावून महाराजांनीं स्वतःच्या अध्यक्षतेखालीं माझें 'अस्पृश्योद्धार' ह्या विषयावर व्याख्यान करविलें.  हेंच व्याख्यान मला पुढें लिहून काढावयास सांगून 'बहिष्कृत भारत' या नांवानें तें प्रसिद्ध झाल्यावर त्याच्या १०० प्रती बडोदें दरबारनें विकत घेतल्या.  ह्या सर्व गोष्टींचा परिणाम बडोद्याच्या कार्यावर होऊन पंडित आत्मारामांच्या देखरेखीखालीं त्याला मोठा जोर आला.

डॉ. आंबेडकर ह्या अस्पृश्यवर्गाच्या प्रसिद्ध पुढार्‍याला महाराजांचा मोठा आश्रय होता.  बडोदा कॉलेजांतून ते बी.ए.झाल्यावर महाराजांनीं त्यांना अमेरिकेंत दरबारच्या खर्चानें कित्येक वर्षे ठेवून पीएच.डी. करवून आणलें.  बडोदें शहरांतील चार वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊनच न थांबतां त्यांच्या धार्मिक शिक्षणाचीही उत्तम सोय करण्यांत आली आहे.  गुजराथेंतील अंत्यजवर्ग आपापलीं धार्मिक गृहकृत्यें आपल्याच जातीच्या पुरोहिताकडून करवून घेत असतात.  त्यांना गरोडा म्हणतात.  या गरोड्यांकडून धर्मकृत्यें योग्य रीतीनें व्हावींत म्हणून त्यांच्यासाठीं एक संस्कृत शाळा काढण्यांत आली आणि त्यांत २५ गरोडा विद्यार्थ्यांना दरमहा ८ रु. स्कॉलरशिप देऊन तयार करण्यांत आले.  वसतिगृहांतील सर्व विद्यार्थ्यांना वेदमंत्रांसह नित्याची उपासना करण्यास शिकविण्यांत येतें.  शिवाय त्यांचीं दोन बालवीरपथकें आहेत.

खालील कोष्टकावरून बडोद्यांतील अंत्यज शाळांची कशी प्रगति झालीं हें दिसून येईल.
तक्ता

(तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढें दुमदुमत राहिलेल्या मंदिरप्रवेशाच्या दंगलींतही ह्या पतितपावन महाराजांनीं आघाडी मारून सरशी मिळविली आहे.  मंदिरप्रवेशाची चळवळ सुरू होण्यापूर्वीच महाराजांनीं आपलें खंडेराव-मंदिर अस्पृश्यांस खुलें केलें आणि ही चळवळ सुरू झाल्यावर १९३२ च्या ऑक्टोबर महिन्यांत सर्व हिंदुधर्मीयांस जातगोत मनांत न आणतां सरकारी देवळांत प्रवेश करुं द्यावा व तसें करण्यास खाजगी देवळांच्या मालकांचीं मनें वळवावीं अशा आशयाचा महाराजांनीं युरोपांतील लोझानहून तारेनें हुकूम पाठविला.  संकटें हीं कार्यसिद्धीचीं मापेंच होत, अशी खूणगांठ मनांत बांधून समाजधुरीणांनीं सतत वागलें पाहिजे.  महाराजांनीं असें केलें म्हणूनच त्यांना अपूर्व यश लाभलें.

थिऑसोफिकल सोसायटी  :  थिऑसोफिकल सोसायटीचे अध्यक्ष कर्नल ऑल्कॉट ह्यांनीं अस्पृश्यतानिवारणाचा उत्तम उपाय म्हणून मद्रास शहरीं आपली पहिली शाळा १८९४ सालीं एका झोपडींत काढली.  दुसरी १८९८ मध्यें व तिसरी १८९९ मध्यें उघडली.  १९०१ च्या रिपोर्टांत सर्व शाळांमिळून त्या सालच्या २० डिसेंबर रोजीं ३८४ मुलगे, १५० मुली आणि १६ शिक्षक होते.  चवथ्या इयत्तेपर्यंत तालीम, हिशेब व व्यावहारिक इंग्रजी हे विषय शिकविण्यांत येत.  त्यांच्या धर्मांत मुळींच हात घालण्यांत येत नसे.  १९०३ सालीं मीं स्वतः मद्रास शहरीं सोसायटीच्या ४ शाळा पाहिल्या.  येथें किंडरगार्टन पद्धतीचें नमुनेदार शिक्षण मीं पाहिलें.  एक तज्ज्ञ स्विस् बाई देखरेखीचें काम फारच कळकळीनें व खुषीनें करीत होती.

के. रंगराव  :  मद्रास इलाख्यांत विशेषतः पश्चिम किनार्‍यावर मलबारांत अस्पृश्यांचे हाल कल्पनातील होत आहेत.  वरिष्ठ जातींच्या व्यक्तीपासून ६०-७० फुटांच्या अंतरावर येण्यास अस्पृश्यांना अद्यापि मनाई आहे; म्हणून ह्या प्रांतीं सर्वांच्या मागून ह्या कामास सुरुवात झाली.  मंगळूर ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी रा. सा. के. रंगराव यांनीं मंगळूर येथें आपली पहिली शाळा १८९७ सालीं काढली.  त्यापूर्वी लोकमत तयार करण्यासाठीं 'पंचम लोकांचीं गार्‍हाणीं' (Wrongs of the Panchamas)  ही लहानशी चोपडी त्यांनीं इंग्रजींत प्रसिद्ध केली.  तींत त्यांनीं ह्या लोकांचीं हृदयद्रावक दुःखें वर्णिलीं आहेत.  ह्या कामीं रंगरावांना आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांकडून अनन्वित छळ सोसावा लागला.  रंगराव हे स्वतः सारस्वत जातीचे असून त्यांच्या कुटुंबाला कुटाळ लोक 'पंचमती' असें उल्लेखीत.  ह्या छळाला न जुमानतां १० वर्षांत त्यांनीं बरीच प्रगति केली.  सरकारच्या मदतीनें त्यांना त्या अवधींत ह्या संस्थेसाठीं विस्तीर्ण जागा, इमारत, उद्योगशाळा आणि वसाहतीसाठीं सुमारे २० एकर शेतकीची जागा इतकी सामुग्री संपादन करतां आली.  १९०७ च्या सुमारास मी मंगळुरास ब्राह्मसमाजाच्या कामासाठीं गेलों तेव्हां मी ही संस्था आमच्या भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींत शाखा म्हणून संलग्न करून घेतली.  तेव्हांपासून पुढें हिची बरीच भरभराट आणि प्रसिद्धि झाली.

ब्रिटिश सरकार आणि ख्रिस्ती मिशनें  :  यांनीं अस्पृश्यांची स्थिति सुधारण्यासाठीं जे कांहीं प्रयत्‍न केले ते प्रसिद्धच आहेत.  यांच्या मार्गांत अडथळा काय तो नोकरशाहीची नबाबरी पद्धति आणि मिशनर्‍यांचें धर्मांतराचें वेड एवढाच होता.  बाकी साधनें भरपूर होतीं.  हे अडथळे नसते, तर त्यांच्या हातून हा अस्पृश्यतेचा प्रश्न लवकर सुटला असता.  मद्रासकडील ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या - विशेषतः रोमन कॅथॉलिक पंथाच्या - पद्धतींत तर उघड उघड अक्षम्य दोष मला दिसले ते हे कीं जातिभेदाचें निर्मूलन करण्याचें त्यांचे धर्मांत सांगितलें असूनही केवळ आपली संस्था वाढवावी ह्या कावेबाज हेतूनें अस्पृश्य लोकांना ख्रिश्चन धर्मांत घेऊन पुन्हां त्यांना अतिनीच अवस्थेंतच ठेवण्यांत आलें आहे.  त्यामुळें त्यांना हिंदुधर्मास पारखे होऊन शिवाय जातिभेदाचे व अस्पृश्यतेचे असह्य जुलूम सोसावे लागतात.  ब्राह्मण-ख्रिस्ती लोकांशीं त्यांना मिसळून वागतां येत नाहीं.  उपासनेसाठीं ख्रिस्ती देवळांत जाण्यास त्यांना मज्जाव आहे.  मेरी माता, ख्रिस्त इत्यादि मूताअची पूजा अस्पृश्यवाड्यांत सर्रास चालू आहे.  त्यांचे पुरावे मीं स्वतः दक्षिण देशीं त्रिचनापल्ली वगैरे ठिकाणीं हिंडत असतांना पाहिले.  ख्रिस्ती लोकांत हल्लीं जी राष्ट्रीय चळवळ चालू आहे, ती कायम राहिली आणि हिंदुमहासभेसारखी चळवळ शब्दांपलीकडे जाऊन कृतींत उरली, तर लवकरच हे ख्रिस्ती अस्पृश्य पुन्हां धर्मांतर करून हिंदुधर्मांत येतील असें वाटतें.  

इंग्रज सरकारनें सक्तीचें शिक्षण देऊन शिकलेल्यांना मोठमोठ्या जागा देऊन ह्या लोकांना वर आणण्यांत आजवर जी अक्षम्य ढिलाई केली आहे, ती केली नसती तर अस्पृश्यतेला ताबडतोब ओहोटी लागली असती.  तथापि अशा बाबतींत परकीय नोकरशाही आणि परधर्मी कावेबाजी यांना पोकळ नांवें ठेवण्यापेक्षां सर्व दोष स्वकीयांनींच पत्करावा हें योग्य आहे.

आर्यसमाज, ब्राह्मसमाज, हिंदुसमाज ह्यांतील कित्येक उदार गृहस्थांनीं अस्पृश्यतानिवारणाच्या लहानमोठ्या बर्‍याच संस्था काढून ह्या कामीं पुष्कळ स्तुत्य प्रयत्‍न केले.  म्हैसूर, निजाम, हैद्राबाद, इंदोर वगैरे मोठमोठ्या संस्थानांनीं आपल्या विद्याखात्यामार्फत अस्पृश्यवर्गाची शिक्षणविषयक तरतूद पुष्कळ केली.  पण हे सर्व प्रयत्‍न भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे कामाचा बोलबाला झाल्यानंतर जी सहानुभूतीची व जागृतीची लाट देशावर पसरली तिच्यामुळें झाले.

येथवर अस्पृश्यासाठीं स्पृश्यांनीं ज्या चळवळी केल्या त्यांचाच उल्लेख आला आहे.  पण त्या बाबतींत स्वतः अस्पृश्यांनींसुद्धा आत्मोद्धाराची चळवळ केली आहे.  पूर्वी ब्रिटिश सरकारच्या सैन्यांत अस्पृश्य लोकांची भरती होत असे.  ती पुढें बंद झाली.  सुमारें १८९०-९१ पासून महार-चांभारादि अस्पृश्यांची नवीन भरती बंद झाली.  नंतर पूर्वीच्यांनाही रजा मिळूं लागली.  ह्याविषयीं दाद लावून घेण्याचे पहिले प्रयत्‍न महाड तालुक्यांतील रानडुल गांवचे पेन्शनर हवालदार गोपाळनाक विठ्ठलनाक वलंगकर नांवाच्या वृद्ध गृहस्थानें मोठ्या चिकाटीनें केले.  महात्मा जोतिबा फुले, बाबा पदमजी यासारख्यांची ह्यांना शिकवण व मदत होती.  सन १८९५ सालीं पुण्यास भरलेल्या काँग्रेसच्या वेळीं ह्यांनीं चळवळ केली होती.  दापोली येथील अस्पृश्य वर्गांतील महार-चांभार लष्करी पेन्शनरवाल्यांच्या वसाहतींत सदर बाबानें बरीच वळवळ केली.  पण चळवळ नवीन असल्यामुळें यश आलें नाहीं.  त्यांनीं हिंदुस्थान सरकाराकडे अर्ज केला असतां पेन्शनर लोकांना त्या वेळीं नुसत्या सह्या करण्याचेंही त्यावेळीं धैर्य झालें नाहीं.  पुढें हीच चळवळ पुण्याचे श्री. शिवराम जानबा कांबळे यांनीं १९०३ सालापासून मोठ्या नेटानें १९१० पर्यंत चालवली.  ती अद्याप चालूच आहे.

वडील भावाचा मृत्यु

१८८५ सालीं मी १२ वर्षांचा झालों.  माझा भाऊ १७।१८ वर्षांचा झाला होता.  ह्या सालाच्या आरंभीं माझी मराठी ५ वी इयत्ता संपून मी इंग्रजी पहिल्या इयत्तेत हायस्कूलांत गेलों.  एव्हांपासून माझ्या आयुष्यांतील एक नवीन टप्पा सुरू झाला.  माझें बाळपण संपलें आणि विद्यार्थीदशेला प्रारंभ झाला म्हणावयाचा.

नवीन टप्पा :   मराठी शाळेंत माझा गणित व भाषा वगैरे अभ्यास त्या वेळच्या शिक्षणाच्या मानानें बरा होता.  मराठी शाळेचे हेडमास्तर विष्णुपंत गवंडे फार कडक होते.  तरी माझी तरतरी पाहून ते मजवर प्रेम करीत असत.  चौथ्या इयत्तेंत अंताजीपंत पोंक्षे नांवाचे मास्तर होते.  तेही प्रेम करीत असत.  त्या वेळीं ब्राह्मणेतरांचीं मुलें सरकारी शाळेंत फारच कमी असत, त्यामुळें व मी हुषार म्हणून कोणीही माझें कौतुकच करीत.  पण दुसर्‍या इयत्तेंत असतांना दत्तापंत बेडेकर नांवाचा एक मास्तर फार तिरसट असे.  त्यानें एके दिवशीं मला अतिशय मारलें, त्यामुळें मांडींतून रक्त येत असतांना मी घरीं आलों.  हें पाहून माझे बाबा शाळेंत गेले व त्यांनीं त्या मारकट मास्तराचा खरपूस समाचार घेतला.  त्यामुळें पुढें सगळ्याच मास्तरांवर दाब बसला.  माझ्या वडील भावाची प्रगति मात्र शाळेंत मुळींच होईना.  बाबांनीं त्याला नेहमीं बोलण्याचें व मारण्याचें हें एक कारण होतें.

इंग्रजी शाळेच्या अभ्यासांत इंग्रजी शब्द पाठ करण्याचा व विशेषतः त्यांच्या स्पेलिंगचा मला भारी कंटाळा येई.  इतका कीं त्यामुळें मला इंग्रजी शाळा नकोशी वाटूं लागली.  आबा म्हैसकर नांवाचा एक ब्राह्मण मास्तर पहिल्या इयत्तेवर होता.  तो स्पेलिंग नुसतें पाठ करावयाला लावी.  घरीं किंवा शाळेंत मला मदत करावयास कोणीच नव्हतें.

ह्या वेळीं आमच्या घरीं एक अरिष्ट घडलें.  इ.स.१८८५ मध्यें जमखंडींत पटकीचा उपद्रव सुरू झाला आणि अगदीं सुरुवातीलाच माझा तरुण भाऊ १।२ दिवसच आजारी पडून एकदम वारला.  तो शांत व समजूतदार होता.  म्हणून शेजार्‍यांना व नातलगांना माझ्यापेक्षां तोच जास्त आवडत असे.  बाबा त्याच्यावर राग करीत, म्हणून आईला तो अधिक आवडत असे.  तो असा एकाएकीं वारल्यामुळें आईला व बाबांना एकदम फारच मोठा धक्का बसला.  आईनें तर पुढें ५।६ वर्षे अतिशय शोक केला.

बंधु एकनाथ  :   माझा भाऊ वारल्यावर सुमारें पांच वर्षे आम्ही अत्यंत भयंकर दारिद्र्याचे हाल सोसले.  इ.स. १८८५ च्या डिसेंबर महिन्यांत माझा धाकटा भाऊ एकनाथ हा जन्मला.  ह्यापुढचीं, माझी धाकटी बहीण मुक्ताबाई हिच्या पाठीवरचीं मुलें जन्मतःच फार अशक्त जन्मलीं.  जन्मतः एकनाथही अशक्त व किरकिर्‍या होता.  आईच्या अंगावर दूध मुळींच नव्हतें.  भाऊच्या मरणाच्या शोकानें तिचें सारें रक्त जळून गेलेलें.  मग दूध कोठून असणार ?  अशा स्थितींत धोंडूबाई नांवाची एक गवळण आईचे ओळखीची होती.  तिला ह्या मुलाची करुणा आली.  ती रोज त्याच्यापुरतें म्हशीचें ताजें दूध फुकट देत असे.  एरव्हीं एकनाथ हा वांचलाच नसता.  भाऊ वार्‍यावर मीच सर्वांत वडील अपत्य झालों.  तेव्हांपासून पोरकटपणा जाऊन माझ्या स्वभावांत एकदम फरक पडला.  आमच्या घरच्या करुणास्पद स्थितीची मजमध्यें एकदम जाणीव उत्पन्न झाली.  मी बारा वर्षांचा होतों, तरी मला सर्व कळूं लागलें.  मलाही भावाचा शोक होत होता.  त्या वेळीं मीं कसलीशी एक कविता रचली होती व दत्तात्रयावर एक आरती रचली होती.

माझ्या स्वभावांत एकदम पडलेल्या ह्या फरकामुळें आईबाबांना माझें मोठें कौतुक वाटूं लागलें.  शाळेंत माझा अभ्यासही उत्तम होऊन माझी वाहवा होऊं लागली.  इ.स. १८८६ सालीं माझी इंग्रजी पहिली इयत्ता पास होऊन मी दुसर्‍या इयत्तेंत गेलों.  तेथें गेल्यावर वर्गांत माझा नेहमीं पहिला नंबर लागूं लागला.  रोजच्या मार्कांची बेरीज होऊन महिन्याचे शेवटीं नंबर लागत.  दुसर्‍या इयत्तेपासून मीं जो एकदां पहिला नंबर पटकावला, तो अखेर सातव्या इयत्तेपर्यंत एक नंबरही खालीं उतरलों नाहीं.  एकदां पांचव्या इयत्तेंत असतांना यल्लामाच्या यात्रेला गेलों म्हणून काय तो माझा नंबर खालीं गेला.  मॅट्रिकच्या परीक्षेला जमखंडी हायस्कूलमधून जितकी मुले गेली, त्यांतही माझाच नंबर पहिला होता.

चुणचुणीतपणा  :   पहिल्या इयत्तेंत मला जी इंग्रजी भाषा अवघड वाटून, अगदीं आत्महत्या करून घ्यावी इतकें वाईट वाटत होतें, त्याच भाषेंत मी सर्व वर्गांत प्रवीण ठरलों.  विष्णुपंत गाडगीळ गांवाचे ब्राह्मण मास्तर दुसर्‍या इयत्तेवर होते.  माझी सर्व विषयांत तरतरी पाहून ते नेहमीं मजवर खूष असत.  इतर वर्गांतील सर्व मुलें ब्राह्मणांचीं असून मीच काय तो मराठ्याचा आणि तोही पहिला; ह्याचें माझ्या ब्राह्मण मासतरांना मोठें कौतुक वाटे.  कोणीही ब्राह्मणांनीं माझा जातिभेदामुळें हेवा किंवा द्वेष कधीं मी शाळेंत असतांना तरी केला नाहीं.  भाषांतरपाठमालेच्या धड्यांत मी अगदीं चुणचुणीत उत्तरें देत असें.  एकदां मला पक्कें आठवतें कीं, मास्तरांनीं एक प्रश्न केला.  तो वर्गांत कोणाला आला नाहीं.  मी त्याचें उत्तर बरोबर देईन अशी त्यांची खात्री होती आणि तसें तें मी चटकन दिलेंही.  तेव्हां गाडगीळ मास्तरांनीं मला प्रत्येक मुलाच्या तोंडावर थुंकावयास सांगितलें.  तें माझ्याच्यानें कांहीं केल्या होईना.  पण मास्तरांनीं आग्रहच धरला.  तेव्हां मला प्रत्येक मुलापुढें जाऊन किंचित् थुंकल्यासारखें करावें लागलें.  जसजसा मी वरच्या वर्गांत जाऊं लागलों, तसतसे नवीन विषय संस्कृत, बीजगणित, भूमिति, शास्त्रें वगैरे लागूं लागलीं.  तशाच लेखी परीक्षा सुरू झाल्या. पण सर्वांत पृथक् पृथक् माझाच नेहमीं पहिला नंबर असे.  त्यामुळें सर्वच मास्तरांचा व विद्यार्थ्यांचा मी आवडता झालों होतों.

चिमुकली स्कॉलरशिप  :   हायस्कुलांतील प्रत्येक वर्गांत असतांना पहिल्या दोन मुलांना दरमहा एक लहानशी स्कॉलरशिप मिळत असे.  दुसर्‍या इयत्तेंत १-१॥ रुपयापासून ती सातवे इयत्तेंत ३ रुपयेपर्यंत होती.  अर्थात् मला नेहमीं पहिल्या नंबरची स्कॉलरशिप मिळे.  ह्या वेळीं घरीं तर भयंकर दारिद्र्य असे.  माझ्या चिमुकल्या स्कॉलरशिपचीच घरीं मोठी मदत होत असे.  त्या वेळीं जमखंडींत मोठी स्वस्ताई असे.  एक रुपयाला १६ पायल्या धान्य झालेलें मला आठवतें.  मग माझ्या चिमुकल्या स्कॉलरशिपकडे माझ्या आईचे डोळे लागून राहात, ह्यांत नवल काय !  इतकी जरी स्वस्ताई होती, तरी आमचे घरीं उत्पन्न नसल्यानें आई आम्हां चार मुलांचे, बाबांचे व आपले प्राण कसे राखीत असे तें आईला किंवा देवालाच ठावें !  अर्थात् तिला बाजारांतलें वाईट व स्वस्त धान्य व तसलाच भाजीपाला आणावा लागे.  पुष्कळ वेळां पेवांत बरेच दिवस ठेवून बिघडलेले जोंधळे बाजारांत विकावयास येत.  ते फार स्वस्त म्हणून आई नेमके तेच आणी.  त्यांचा वास वाईट येई, पण आम्ही मुलें त्याच्याच भाकरी गोड करून खात असूं.   कारण गोडी धान्यांत नसून आमच्या आईच्या हातांत असे.  असल्या दाण्यांची भाकरी, तसल्याच तुरीच्या डाळीचें वरण व तांबड्यां मिरच्यांची चटणी हे तीन पदार्थ आम्हांला बासुंदीपुरीसारखे गोड लागत.  आमचें लक्ष अन्नाकडे जाऊं नये, म्हणून आई आपल्या माहेरच्या लहानपणच्या व सासरच्या करुणास्पद कहाण्या सांगत असे. त्या आमच्या काळजांत इतक्या खोल जात कीं, आमचें जेवण आटपून आमचे हात वाळले तरी आम्हांला भान राहात नसे.

पुष्कळ वेळां हें कदान्नहि आम्हांला पुरेसें मिळत नसे.  वालूबाई नांवाची एक कुणबीण पूर्वी आमची स्थिति बरी असतांना आमचे घरीं कामाला होती.  पुढें आम्हांला अशी भयंकर स्थिति प्राप्‍त झाल्यावर त्या प्रामाणिक बाईला आम्हां बाळांचा कळवळा येऊन, कोठले तरी फार दिवसांचे शिळे तुकडे आणून तिनें हळूच झांकून आईला आणून द्यावे.  मग आईनें ते ताकांत अगर वरणांत अगर दोन्ही नसल्यास नुसते पाण्यांत भिजवून आमचेसाठीं ठेवावे.  आम्हीं सर्व मुलें शाळेंतून भूक, भूक करीत आल्यावर तेंच पक्वान्न खावें आणि पुढें किती तरी वेळ नुसतीं बोटेंच चाटीत बसावें.  आमचा हा अल्पसंतोषीपणा पाहून आईनें आम्हांला न कळत आंसवें गाळावीं आणि अशा आनंदांत आपली भूक विसरावी !

तुकारामाचा संसार  :  इतकें झालें, तरी आईनें कधीं कोणाची मजुरी केली नाहीं, कीं कोणाचे दारीं चिमूटभर मीठ मागण्यासाठीं उभी राहिली नाहीं.  तिच्या आईप्रमाणें तीही उंबरठ्याच्या आंतच राही.  बाजारहाट, हिशेब वगैरे सर्व आईलाच करावें लागे.  वाणी. माळणी, तेलणी, गवळणी आईची कदर ओळखून असत.  त्या सढळ हातानें माप देत व पैशांची कधींही जिकीर करीत नसत.  एकंदरींत आमचा संसार अगदीं तुकारामबोवाच्या वळणावर चालला होता.  फरक इतकाच कीं, तुकारामाच्या मुलांना मराठी तरी लिहितां येत होतें कीं नाहीं शंका आहे.  पण मी मात्र हायस्कूलमध्ये पहिला नंबर होतों.  इतकेंच नव्हें तर माझ्या बहिणीही मुलींच्या शाळेंत लिहिणें, वाचणें, कशिदा काढणें वगैरे शिकत होत्या.  दारिद्र्यानें पाठ पुरविली, तरी आमच्या घराण्याचा रुबाब कांहीं कमी झाला नाहीं किंवा चालत असलेल्या धार्मिक व सामाजिक परंपरेंत खंड पडला नाहीं.  एकादशी, शिवरात्री, हरतालिका, गौरी-गणपति, रानसटवाई या क्षुद्र दैवतांचीही समजूत माझे आई व बाबा करावयास कधींच चुकले नाहींत.  मग नवरात्रांत समारंभ चुकत नसत हें सांगावयास नको.  या समारंभांत आमच्या घरचा पुरोहित तम्मणभट्ट डेंगरे, निदान त्याच्या घरचा कोणी लहान मुलगा का होईना, रोज पूजा सांगावयाला यावयाचाच !  नवरात्रांत नऊ दिवस तो रोज सकाळीं ११ वाजतां कांहीं मंत्र म्हणून जात असे.  तसेंच नऊ दिवस प्रत्येक रात्रीं मोठी पूजा होऊन थाटानें आरती होत असे.  मूठभर का होईना पुरण घालून आई नैवेद्याचे पांच कानोले करी.  ते आम्ही चार भावंडें पूजा आटपल्यानंतर भांडभांडून खात असूं.  भाद्रपदांतील गणेशचतुर्थीच्या उत्सवांतील गणपति पाण्यांत बुडविण्याचे वेळीं ब्राह्मण विहिरीपर्यंत आलाच पाहिजे.  दिपवाळींत एकाच पैशाच्या फटाकड्यां मी आणि माझी बहीण जनाक्का थांबून थांबून उडवीत असूं.  धाकटी तान्याक्का (मुक्ताबाई) नुसतें पाहूनच सुखी होई.  हीच आवृत्ति तुळशीचे लग्नाचे वेळीं !  आमची सांपत्तिक स्थिति बरी होती, तेव्हां भरपूर मिळालेली दक्षिणा आठवूनच, आमचे पुरोहितांनीं आपली सर्व परंपरा बिनतक्रार चालविली.  नागाचा उपास, हरतालिकेचा उपास, नवरात्राचा उपास असे नाना तर्‍हेचे उपास आई व बाबा करीत आणि आम्ही बोके त्यांच्या फराळावर हात मारून पुन्हां दुसरे दिवशीं पारण्याची वाट पाहात त्यांच्या अधीं ताटावर शेंडीला पीळ घालीत व लंगोटीचें शेपूट ओढीत बसलेले तयार !

लोकमताचे हेलकावे

लोकमताचे हेलकावे  :   आमच्या मिशनचा प्रसार सर्व देशभर झाल्यानें मी निरनिराळ्या प्रांतांत फिरत असतांना वेळोवेळीं अनेक मानपत्रें मिळालीं.  त्यांपैकीं कांहींचा खालीं उल्लेख करीत आहें -

(१) पालघाट, मलबार.
(२) हुबळी, कर्नाटक.
(३) २३ एप्रिल १९२३ रोजीं पुणें शाखेचे शिक्षक व विद्यार्थी यांजकडून ५१ व्या वाढदिवसानिमित्त.
(४) २३ एप्रिल १९२३ रोजीं पुणें शाखेच्या शिक्षकिणी व विद्यार्थिनी यांजकडून ५१ व्या वाढदिवसानिमित्त.
(५) २३ एप्रिल १९२३ रोजीं पुणें शाखेच्या शिक्षकिणी व विद्यार्थिनी यांजकडून भगिनी जनाबाईस.
(६) २३ एप्रिल १९२५ रोजीं ब्राह्मणेतर पुढार्‍यांतर्फे.
(७) १९२८ सालीं दौलतपूर (पूर्व बंगाल) कॉलेज विद्यार्थ्यांतर्फे.
(८) १९३३ डिसेंबर २३ रोजीं चोखा मेळा बोर्डिंग, आर्वी (नागपूर).
(९) १९३३ डिसेंबरमध्यें नागपूर अस्पृश्यवर्गातर्फे गणेश अक्काजी गवईंकडून.
(१०) १९३४ जून १८ रोजीं मुंबईंतील ४१ संस्थांतर्फे.

१९२५ सालांतील ब्राह्मणेतर पक्षाच्या मानपत्रास मीं खालीलप्रमाणें उत्तर दिलें.

''मुंबई येथें ४१ संस्थांतर्फे, १९३४ सालीं, जो मानपत्रसमारंभ झाला तो सर्वांत मोठा होता.  महात्मा गांधी हे या समारंभाचें अध्यक्षस्थान घेणार असें प्रसिद्ध झाल्यानें संध्याकाळीं परळच्या दामोदरदास ठाकरसी हॉलमध्यें अलोट गर्दी झाली होती.  इतकी कीं कांहीं वेळा ट्रॅमगाड्यां बंद ठेवाव्या लागल्या.  शेवटीं श्री. मथुरादास वसनजी यांच्या अध्यक्षतेखालीं समारंभ पार पडला.  उत्तर देतांना मीं म्हटलें. ''हा मी माझा स्वतःचा सन्मान समजत नाहीं.  हा माझ्या कार्यांत साह्यकारी झालेल्या सर्वांचा सन्मान आहे.  मला हिंदु, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, युरोपियन वगैरे सर्वांनीं मदत केली आहे; पण ती त्यांनीं माझ्यावर मेहेरबानी म्हणून केलेली नसून कर्तव्य म्हणून केलेली आहे.  हिंदुस्थानांतला अस्पृश्यतेसारखा एक मोठा अन्याय स्वस्थ बसून चालूं दिल्याबद्दल सर्व जग अपराधी आहे.  म्हणून या कामांत सर्व जगानें भाग घेतला पाहिजे .......... मला एक गोष्ट स्पष्ट सांगून टाकली पाहिजे.  ती ही कीं, मला इतक्या पुष्कळ संस्थांनीं मिळून मानपत्र दिलें त्याबद्दल मी आभारी आहें.  पण म्हणून मी तुमचा मिंधा राहणार नाहीं.  माझें जेथें तुमच्याशीं जमणार नाहीं, तेथें मी तुमच्याविरुद्ध गेल्याशिवाय राहणार नाहीं !''

हीं सर्व मानपत्रें बोलूनचालून माझा गौरव करण्यासाठीं दिलीं होती म्हणून त्यांतील विचार आणि भाषा अर्थात् एकाच सुराची होती म्हणून त्यांचा उल्लेख करणें मला येथें जरूर दिसत नाहीं.  परंतु माझें कठीण काम करीत असतांना माझ्यावर जी वेळोवेळीं प्रतिकूल टीका होत असे, वेळीं तीव्र निषेधही होत असे त्यांतील कांहींचा उल्लेख करणें जरूर आहे.

मिशन नुकतेंच सुरू झालें असतां एका मराठा गृहस्थाकडून खालील पत्र आले.

श्रीयुत रा. रा. शिंदे यांचे सेवेसी -
अनेक नमस्कार वि. वि.

आपणांस समक्ष पाहावें अशी इच्छा फार दिवसांची होती.  तो योग अकस्मात् ता. ३ रोजीं घडून आला.  आपण माझ्याशीं बोलत असतां आपण मराठे असल्याबद्दल आपले ठिकाणीं वसत असलेला अभिमान पाहून व अलीकडे प्रचलित असलेल्या वेदोक्तासंबंधीं आपले प्रगल्भ विचार ऐकून आपलेसंबंधीं वसत असलेलें प्रेम अधिक दृढ झालें.  परंतु आपल्यासारख्या, आमच्या समाजास सहसा न लाभणार्‍या विद्वानांनीं देशरूढीचा त्याग करून भलत्याच पद्धतीनें राहणें योग्य नाहीं असें मी आपणांस नम्रपणें सुचवतों.  आपण क्षत्रियांनीं दाढी ठेवणें हें अशास्त्र आहे असें म्हटलेंत; पण त्याचा परिणाम अज्ञानी जनसमाजाचे मनावर इष्ट न होतां अनिष्ट होतो हें आपल्यासारख्या विद्वानाच्या मनांत आलें पाहिजे.  आपल्यासारख्या दुर्मिळ विद्वानाचें लक्ष सध्यां आमचे लोकांची पीछेहाट व दैना उडाली तिकडे दुर्लभ करून महारमांगांची स्थिति सुधारण्याकडे लागावें व आम्ही जे पूर्वी उत्तम अवस्थेंत होतों ते सध्याच्या अवनत स्थितीकडे पोंचलों असतां तिकडे दुर्लक्ष व्हावें ही केवढी खेदाची गोष्ट !  हें आपलें करणें, घरचीं माणसें उपाशीं ठेवून दुसर्‍यांस पक्वान्न घालण्यासारखें आहे.  आपण ज्या समाजांत जन्मलां आणि ज्या समाजाच्या मदतीनें पदवीधर झालां व एवढें नांवारूपास चढलां, त्या समाजाची काय दैना उडाली आहे इकडे आपलें पहिल्यानें लक्ष गेलें पाहिजे होतें.  आपण प्रार्थनासमाजांत शिरलां हें माझ्या मतें बरें झालें नाहीं.  पुन्हां प्रार्थना करून सांगतों कीं, आपण प्रचारांत नसलेला पोशाख व राहणी बदला.  असें करण्यास परमात्मा आपणांस बुद्धि देवो !

आपला नम्र सेवक
गणपतराव भिकाजीराव जाधव
Clerk, Mora Barge, Uran
ता. ५।१२।१९०६


सन १९१७ सालीं मीं मराठा आणि इतर बहुजनसमाजाला राष्ट्रीय पक्षांकडे ओढण्याचा प्रयत्‍न केला म्हणून बहुजनसमाजांत खळबळ उडाली.  त्या वेळीं खालील धमकीचें पत्र नांव, गांव, पत्ता व तारीख नसलेलें मला आलें.

रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे यांस  :-

एका सरकारी अंमलदाराच्या (आज सकाळीं मला) गुप्‍त हेराकडून बातमी लागली कीं, आपण एक 'मराठा स्वराज्य संघ' स्थापन केला आहे.  आपण केवढी मोठी भयंकर चूक करून बसलां आहांत हें अजूनही आपल्या लक्षांत येत नाहीं.  तेव्हां आपण अगदीं मूर्खांतले मूर्ख आहांत असेंच म्हटलें पाहिजे.  तुम्हांला हे ब्राह्मण लोक हरबर्‍याच्या झाडावर चढवीत आहेत.  तुमच्या हातून ते मराठ्यांत फूट पाडीत आहेत.  तेव्हां आपण समाजघातक, राष्ट्रघातक होणार काय ?  तुम्ही केळकरांशीं केलेला गेल्या आठवड्यांतील सर्व गुप्‍त व्यवहार किंवा कट ही सर्व बातमी सी.आ.डी.च्या मार्फत सरकार व गव्हर्नरसाहेब यांजकडे कळविण्यांत आली आहे.  तर आपल्या मिशनचें चंबू गबाळें लवकरच आटोपून आपणांस कायमचा रामराम ठोकावा लागेल आणि मग खुशाल ब्राह्मण लोकांच्या पायांचें तीर्थ चाटीत बसा.  ब्राह्मण लोकांनीं फसवलें आहे.  तेव्हां लवकर शुद्धीवर या, नाहीं तर तोंडघशी पडाल.  मागून बोंब मारण्यांत अर्थ नाहीं.  तेव्हां मराठा स्वराज्य संघ मोडून टाका व कोणासही मदत करूं नका.  तुमच्या मिशनशिवाय तुम्ही दुसरें कोणतेंही कार्य करूं नका.  परंतु मिशनबद्दलची कळकळ आतां सरकारास राहणार नाहीं.  कारण तुम्ही जे मुख्य ते राजद्रोही आहांत म्हणून.  

हितचिंतक


अशा पत्राबद्दल कांहीं लिहिण्याची जरुरी नाहीं.  पण मराठे लोकांपैकीं कांहींनीं राष्ट्रीय कामाबद्दल असा निषेध केला असतां ब्राह्मणांतील कांहीं विद्वान् व जबाबदार व्यक्तींनीं माझी वृत्ति राष्ट्रीय नाहीं असा गैरसमज करून घेऊन उलट दिशेनें कसा निषेध केला आहे हें खालील उतार्‍यावरून समजून येईल.  सदर उतारा जानेवारी १९२३ सालच्या 'चित्रमय जगतां'तील रा. रा. महादेव राजाराम बोडस यांच्या 'अस्पृश्योद्धार' या लेखांतील आहे.

''आपली सामाजिक व धार्मिक सुधारणांचीं तट्टें चोहोंकडे नाचवण्याकरतांच निराश्रितांचा कैवार घेणार्‍यांचे हातून तयांचा उद्धार कधींही व्हावयाचा नाहीं.  कोणतीही चळवळ एकनिष्ठ असल्याशिवाय यशस्वी होत नाहीं.  एका कामांत दुसरीं दहा खेंकटीं घुसडलीं कीं सर्वच कामें बिघडतात.  अस्पृश्यतेच्या प्रश्नाला रोटीबेटीव्यवहार आणि सनातन धर्माची टवाळी चिकटविल्यानें निराश्रित शिखंडींना पुढें करून सबगोलंकार करण्याचा या मंडळींचा बेत आहे अशी साधारण लोकांची समजूत झाली व त्यामुळेंच कारण नसतां सर्व जातींचा या चळवळीला विरोध होऊं लागला.  पण तेंच सन १९१८ सालीं लो. टिळकांनीं सहानुभूति दाखवल्याबरोबर १९२० सालीं महात्मा गांधींनीं हा प्रश्न हातीं घेतला व १९२१ सालीं अहमदाबादच्या काँग्रेसमध्यें राजकीय व राष्ट्रीय करून टाकला.  रा. विठ्ठलराव शिंद्यांना १२ वर्षांत जें कार्य करतां आलें नसतें तें गांधींनीं दोन दिवसांत केलें.  म्हणजे शिंद्यांच्या कामाचें महत्त्व कमी होतें असें नाहीं. उलट असेंही म्हणतां येईल कीं, शिंद्यांच्या १२ वर्षे नांगरणीमुळें गांधींना बीजारोपण करतां आलें.  परंतु एकाच कार्याविषयीं उभयतांचा दृष्टिकोन आणि कार्यपद्धति यांतील भेद दाखवण्याकरतांच ही तुलना केली.  रा. शिंदे निराश्रितांना व्यक्तिशः सुखी करण्याकरतां झटत असल्यामुळें समाजाला विशेष कळकळ वाटत नव्हती.  समाजांत सुखी व दुःखी दोन्ही प्रकारचे लोक असल्यामुळें वैयक्तिक सुखाविषयीं लोकांना फारशी आस्था वाटत नाहीं.  पण राष्ट्राच्या भवितव्यतेचा प्रश्न आला कीं, सर्व समाज खडबडून जागा होतो.  पांचसहा कोटी निराश्रितांचा उद्धार करावयाचा तो ते अधिक सुखांत व ऐषआरामांत राहावे म्हणून नव्हे तर तीस कोटी हिंदुराष्ट्र एकजीव होऊन स्वराज्य मिळवण्यास लायक व्हावें म्हणून.  लो. टिळकांनीं निराश्रितांविषयीं नुसती शाब्दिक कळकळ दाखवली म्हणून त्यांची टवाळी करणारांचे ध्यानांत एक गोष्ट येत नाहीं कीं, ज्यांचे हातांत निराश्रितांची चळवळ आहे त्यांची जास्त योग्यताच नाहीं.  टिळक-गांधींसारख्यांकडून जास्त मदत मिळवायची असेल तर त्यांच्याप्रमाणेंच राष्ट्रकार्याला कंबर बांधली पाहिजे.  साहेब लोकांना खूष ठेवायचें, मिशनरींच्या मागें लागायचें, पैशाकरतां श्रीमंत लोकांच्या दारोदार हिंडावयाचें, मग लो. टिळकांनीं असल्या भिक्षेकर्‍यांना नुसत्या शब्दांची भीक घातली तर नवल काय ? 'You cannot serve both God and man at the same time.'  अशी एक इंग्रजींत म्हण आहे.  निराश्रितांना केवळ ऐहिक सुखेंच देणें ज्यांचें ध्येय त्यांनीं सर्व ऐहिक सुखावर पाणी सोडलेल्या टिळक-गांधीं-सारख्यांकडून मदतीची अपेक्षा करूं नये हेंच उत्तम. कारण त्यांचें ध्येय निराळें, मार्ग निराळा व दृष्टिकोनही निराळा.''

ह्याप्रमाणें लोकमताचे परस्परविरोधी हेलकावे मीं वाचकांपुढें ठेवले आहेत.  वाचकांनींच आपल्या मनाचा समतोलपणा राखून विचार करावा ह्यापेक्षां जास्त कांहीं मला सांगावयाचें नाहीं.

राजकारणाची सुरुवात

१९१४ सालच्या महायुद्धामुळें सरकारचें, शेटसावकारांचें, पुढार्‍यांचें आणि जनतेचेंही लक्ष देशाबाहेरच्या गोष्टींकडे लागलें.  सरकारची सहानुभूति पददलित म्हणून अस्पृश्यवर्गाकडे होती, ती आतां आणखी एका कारणामुळें अस्पृश्यांकडे विशेष लागली.  अस्पृश्य लोकांनीं, विशेषतः महार व चांभार जातींनीं ब्रिटिश लष्करांत फार चांगलीं कामें केलेलीं आहेत.  दक्षिण देशांतील पारिया वगैरे पलटणींनीं लॉर्ड क्लाइव्हच्या कालापासून लष्करी कामगिरींत प्रसिद्धि मिळवलेली आहे; पण पुढें बराच काळा शांतींत गेल्यामुळें या गरीब लोकांना लष्करांत मिळालेलें स्थान टिकून राहिलें नाहीं.  हा इतिहास स्वतंत्रपणें अभ्यासण्यासारखा आहे.  २० व्या शतकाच्या आरंभापासून विशेषतः महार जातीय पुढार्‍यांनीं ह्या बाबतींत उचल खाल्ली होती.  शांतीच्या काळांत कमी केलेल्या पलटणी पुन्हां सुरू कराव्यात अशा प्रकारचे अर्ज गव्हर्नर, व्हाइसरॉय, स्टेट सेक्रेटरी यांच्याकडे वेळोवेळीं करून पाहिले होते.  पुण्याचे शिवराम जानबा कांबळे, पनवेलचे सुभेदार मेजर वलनकर वगैरेंनीं ह्या बाबतींत पुढाकार घेतला होता.  अर्थात् या युद्धाच्या वेळीं सरकारला रिक्रूटांची आवश्यकता लागली.  तेव्हां मराठ्यांबरोबर महारांचाही जयजयकाराचा ध्वनि उमटूं लागला.  मुंबई व पुणें येथील टाऊन हॉलमध्यें चालू युद्धाकडे अस्पृश्यांचें लक्ष वेधण्याकरितां मोठमोठ्या जाहीर सभा होऊं लागल्या.  मिशनचें काम ह्या वर्गाची सर्व बाजूंनीं उन्नति व्हावी - मग ती शैक्षणिक असो, सामाजिक असो किंवा राजकीय असो; सरकारसंबंधीं असो किंवा सनातनी धर्माधिकार्‍यासंबंधीं असो - चोहींकडून सतत चालवणें हें होतें.  म्हणून ह्या युद्धामुळें ह्या वर्गाच्या राजकारणी महत्त्वाकांक्षेला नवीन अंकूर फुटूं लागले.  ते वाढीस लावणें मिशनला क्रमप्राप्‍तच होतें.

लखनौ पॅक्ट  :   महायुद्धाला जसजसा रंग चढूं लागला तसतसा भारतीय वरिष्ठ वर्गांच्या पुढार्‍यांच्या महत्त्वाकांक्षेला नवीन वळण लागूं लागलें.  १९१६ सालीं लखनौला काँग्रेस भरली त्या वेळीं हिंदुस्थानांतील जे निरनिराळे पक्ष होते त्यांच्यांत दृढ ऐक्य व्हावें अशी गरज भासूं लागली.  युद्धाचे शेवटीं विलायत सरकारपुढें हिंदुस्थानसाठीं अधिक हक्क मागण्याचे कामीं ह्या मागण्या एकमुखानें व्हाव्यात म्हणून, हें ऐक्य आवश्यक होतें.  हिंदुस्थानांतील मुख्य पक्ष म्हणजे हिंदु आणि मुसलमान.  ह्यांना एकमेकांजवळ ओढण्याचा प्रयत्‍न काँग्रेसला करावयाचा होता.  म्हणून लखनौच्या अधिवेशनांत हिंदुमुसलमानांचा लखनौ पॅक्ट (गट्टी) हा इतिहासप्रसिद्ध बनाव तयार झाला.  पुण्याचे लोकमान्य टिळकांची या वेळीं मोठी चलती होती.  त्यांनीं ह्या गट्टींत पुढाकार घेतला होता; पण ही गट्टी नुसती हिंदु-मुसलमानांपुरतीच होऊन कार्य भागणारें नव्हतें.  हिंदूंमध्यें जे अनेक पंथ व जाती आहेत त्यांच्यांतही ऐक्य व्हावयाला पाहिजे होतें.  पण ज्या वर्गांत राजकारणाबद्दल जागृतीच नाहीं तेथें ऐक्य कसें होणार ?  भारतीय राजकारण म्हणजे सुशिक्षितांची आणि कांहीं भांडवलदारांची चळवळ.  अफाट शेतकरीवर्ग, मजूरवर्ग व एकंदरींत बहुजनसमाज कोणत्याही सार्वजनिक चळवळीला पारखा होता.  सुशिक्षित पुढारी काय बोलतात, काय करतात हें ह्या बहुजनसमाजाला कळण्यासारखें नव्हतें.  काँग्रेसचीं कामें मोठमोठ्या शहरांतून व इंग्रजी भाषेंतून चालत.  तीं पाहावयाला जायचें झालें तरी आधीं बूटपाटलोणीची तयारी करावी लागे.  ह्यावरून ही चळवळ खालच्या वर्गांमध्यें अजून आली नव्हती हें खरें.  तो काळ आतां येऊन ठेपला होता.  महायुद्धाच्या दाबाखालीं हिंदी लोकांना कांहीं तरी हक्क देण्याचा विचार विलायतेंतील मुत्सद्दयांच्या डोक्यामध्यें येऊं लागला होता.  पुढें होणार्‍या मोर्ले-मिंटो सुधारणेचा वास कांहीं पाताळ्यंत्री पुढार्‍यांना अगोदरच येऊन चुकला होता.  लखनौ पॅक्ट हें त्याचेंच एक चिन्ह होतें.

अशा वेळीं महाराष्ट्रांत शिवाजी उत्सवासारख्या राष्ट्रीय उत्सवांचा ऊत आला होता.  शिवाजी-उत्सव, गणपति-उत्सव अशाच भावनाशील उत्सवांच्या द्वारें जनतेला हलवणें शक्य होतें.  असे उपाय करण्यांत लोकमान्यांचा हातखंडा असे.

राष्ट्रीय ऐक्याची चळवळ  :   ह्याप्रमाणें राष्ट्रीय ऐक्य वाढविण्यासाठीं महाराष्ट्रांतील निरनिराळ्या जातींचें ऐक्य करण्याचे प्रयत्‍न एकीकडे चालू असतां दुसरीकडे बहुजनसमाजांत मागासलेले, पुढारलेले ब्राह्मण व ब्राह्मणेतर, स्पृश्य व अस्पृश्य असे तट पाडण्याचे प्रयत्‍न चालू असलेले माझ्या नजरेस आले.  विशेषतः ब्राह्मण नसलेल्या सर्व जातींना एकत्र करण्यासाठीं ब्राह्मणेतर पक्ष म्हणून निर्माण होऊं लागला.  सर्व राष्ट्राची जागृति होत असतां नवीन एक पक्ष उभारणें मला त्या काळी इष्ट दिसलें नाहीं.  निदान आमच्या मिशनच्या प्रयत्‍नामुळें तरी राष्ट्राच्या ऐक्याला कोणत्याही प्रकारें बाध घडूं नये, अस्पृश्यांची जागृति तर व्हावी, पण त्यानें राष्ट्राच्या ऐक्याच्या चळवळीपासून फुटून वेगळें व्हावें हें श्रेयस्कर नाहीं असें मला वाटूं लागलें.  मी वर्‍हाड आणि मध्यप्रांत येथील मिशनच्या शाखांच्या कामीं अमरावती येथें गेलों असतां तेथील मिशनच्या स्थानिक कमिटीनें एक मोठी जाहीर सभा बोलावून त्या वेळीं चाललेल्या राष्ट्रीय ऐक्याच्या चळवळीसंबंधीं माझें मत काय आहे हें मीं लोकांस सांगावें आणि मिशनच्या कामाला बळकटी आणावी ह्यासाठीं ही जाहीर सभा भरविण्यांत आली होती.  त्यांत मीं ही गोष्ट जाहीर केली कीं, ''नवीन होऊं घातलेला ब्राह्मणेतरवाद ऐक्याला फार घातुक होईल.  योग्य रीतीनें तो चालविला नाहीं तर दोघांचें भांडण व तिसर्‍याचा लाभ असा प्रकार होईल.  अस्पृश्यांची अद्यापि नीटपणें जागृति न झाल्यामुळें त्यांची दिशाभूल होईल'' वगैरे मुद्दे मीं स्पष्ट करून सांगितले.  ब्राह्मणेतरपक्ष त्या वेळीं मुळींच संघटित झाला नव्हता.  ह्या नवीन वादाची वार्ताही पुष्कळांना माहीत नव्हती.  त्यामुळें ह्या व्याख्यानाची नवीनता लोकांना कौतुकास्पद वाटली.  कित्येकांनीं तर त्या वेळीं याची जरुर काय, असा प्रश्न केला.  पण लौकरच ह्या वादाचें उग्र रूप दिसून आल्यावर शंकाकारांना व्याख्यानाची जरुरी पटली.

पुढें पुण्यास परत आल्यावर जेधेमॅन्शनमध्यें शिवाजी-उत्सवाची पूर्वतयारी करण्याविषयीं एक सभा भरली होती.  तो उत्सव खर्‍या राष्ट्रीय स्वरूपानें कसा करण्यांत यावा ह्याविषयीं सभेंत भाषण करण्यासंबंधीं मला आमंत्रण आलें.  त्या वेळची परिस्थिति पाहून माझ्या मनानें घेतलें कीं, महाराष्ट्रांत मराठा समाज हा बहुसंख्य असून महाराष्ट्राच्या पाठीचा कणा असल्यासारखा आश्रयभूत आहे.  तेव्हां ह्या समाजाची जागृति तर एका बाजूनें व्हावीच; पण त्या जागृतीमुळें महाराष्ट्रांत फूट न पडावी.  उलट ब्राह्मणांपासून तों अस्पृश्यांपर्यंत हें जागृतीचें व ऐक्याचें लोण खालीं उतरावें, आणि ह्या हेतूनें मध्यवर्ती मराठ्यांना जागें करावें हा विचार सतत माझ्या मनांत घोळूं लागला.  पुढें लौकरच ''मराठा राष्ट्रीय संघ'' या नांवाची संस्था उघडण्यांत आली.  तया संघाचें एक जाहीर पत्रक छापूर प्रसिद्ध करण्यांत आलें.  तयांत आरंभीं खालील मजकूर आहे.

मराठा राष्ट्रीय संघ  :  ''हल्लीं आपल्या देशांत जी जोराची राष्ट्रसुधारणेची चळवळ चालू आहे तिच्यामुळें लहानथोर समाजांमध्यें चांगली जागृति झाली आहे.  आपल्या महाराष्ट्रांत केवळ संख्येनेंच नव्हे तर इतर अनेक कारणांमुळें मराठा समाज हा एक प्रमुख समाज आहे.  गतकालांत तर हा समाज सर्व महाराष्ट्राचा पोशिंदा होता असें पूर्वेतिहास सांगत आहे.  हल्लीं देखील शेती, शिपाईगिरी आणि गिरण्यांतील कष्टसाध्य काम वगैरेंच्या दृष्टीनें देशाच्या पोषणाचीच नव्हे तर त्याच्या संरक्षणाचीहि मुख्य जबाबदारी ह्याच इतिहासप्रसिद्ध समाजावर अवलंबून आहे; आणि ही जबाबदारी पार पाडण्यांत ब्रि. साम्राज्याच्या संरक्षणाचे कामीं देखील मराठ्यांनीं माघान न घेतां आपलें रक्त ओतून सक्रीय राजनिष्ठा प्रकट केली आहे.  अशा हल्लींच्या आणिबाणीच्या स्थितीमध्यें मराठ्यांनीं सर्वसाधारण राष्ट्रीय बाबीसंबंधीं उदासीन किंवा अज्ञानी राहणें मुळींच श्रेयस्कर नाहीं.  इतकेंच नव्हे, तर मराठ्यांचे विशेष हितसंबंध, गरजा आणि अडचणी असतील त्यांची उज्ज्वल जाणीव त्यांच्यांत असणें, हें केवळ त्यांच्याच नव्हे तर राष्ट्राच्या हिताला पोषक आहे; कारण वर निर्दिष्ट केलेल्या त्यांच्या वरील राष्ट्रीय जबाबदारीवरून त्यांचे हितसंबंध म्हणजे पर्यायानें राष्ट्राचेच हितसंबंध आहेत असें दिसून येईल.

वरील सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करून पुणें येथील प्रमुख मराठा मंडळीची एक प्रास्ताविक सभा रा. गोविंद कृष्णाजी बोत्रे, रा. त्रिंबक हरी आवटे व रा. काशिनाथ ठकूजी जाधव, रा. नरहर गोविंद शिंदे ह्यांच्या आमंत्रणावरून रा. बोत्रे यांचे वाड्यांत ता. २६ ऑक्टोबर १९१७ रोजीं सायंकाळीं ५ वाजतां भरली होती.  त्या वेळीं रा. नारायण ग्यानबा एखंडे ह्यांनीं मंडळींच्या सूचनेवरून अध्यक्षस्थान स्वीकारलें आणि त्यांच्या विनंतीवरून रा. विठ्ठल रामजी शिंदे यांनीं साधारणतः हल्लींच्या परिस्थितींचें आणि विशेषतः मराठा समाजाच्या आजच्या कर्तव्याचें दिग्नदर्शन केलें.  त्यानंतर रा. निंबाळकर, रा. गायकवाड, रा. त्रिंबकराव हरी आवटे, रा. जाधव वगैरेंचीं समयोचित भाषणें झालीं.  त्यानंतर सर्वांनुमतें ह्या संघाचें राष्ट्रीय सभेला अनुकूल असें धोरण ठरून पुढील संघाचें पहिलें काम म्हणून राष्ट्रीय सभा व मुस्लीम लीग ह्यांनीं लखनौच्या बैठकींत स्वराज्याची जी एकत्र योजना ठरविली तिला पाठिंबा देण्यासाठीं पुणें शहरांत व भोंवतालच्या भागांत राहणार्‍या सर्व पंथांच्या, जातींच्या व धर्मांच्या लोकांनीं सभा बोलवावी असें ठरलें.''

वर ठरलेली जंगी जाहीर सभा गुरुवार ता. ८ नोव्हेंबर १९१७ रोजीं सायंकाळीं येथील मराठा संघाच्या विद्यमानें शनिवारवाड्यांपुढील भव्य पटांगणांत भरली.  तींत शहरांतील सर्व जातींचे, धर्मांचे व पंथांचे लोक उपस्थित होते.  लखनौ येथें राष्ट्रीय सभेनें पास केलेल्या स्वराज्याच्या योजनेस पुष्टी देणें हा या सभेचा उद्देश होता.  सभेस सुमारें १०,००० पर्यंत लोकसमुदाय हजर होता.  सभेचें अध्यक्षस्थान मजकडे आलें होतें.

सूचनेस श्री. मा. ह. घोरपडे ह्यांचें अनुमोदन मिळाल्यावर अध्यक्ष म्हणाले, ''गेल्या दोन-तीन महिन्यांत आपणांमध्यें मागासलेले व पुढारलेले ब्राह्मण व अब्राह्मण असे तट पाडण्याचे प्रयत्‍न होत आहेत.  मागासलेल्या तटांत मराठ्यांचीही गणना होऊं लागली व त्यांचा स्वराज्यास विरोध आहे असें भासविण्यांत येऊं लागलें.  वस्तुस्थिति तशी नाहीं.  ज्या मराठ्यांनीं दोनशें वर्षांपूर्वीच स्वराज्य स्थापन करून त्याचा उपभोगही घेतला ते मराठे स्वराज्य मागण्यासही भितात हें केव्हांही शक्य नाहीं.  मराठ्यांसंबंधानें पसरविण्यांत आलेल्या ह्या विपरीत ग्रहाची असत्यता सिद्ध करण्याकरितां व मराठा जातीच्या खास हिताचें संरक्षण करण्याकरितां गेल्या विजयादशमीच्या सुमुहूर्तावर ह्या शनिवारवाड्यांस साक्षी ठेवून जवळच असलेल्या एका घरीं 'मराठा राष्ट्रीय संघ' अस्तित्वांत आला.  त्याची ही सभा म्हणजे पहिली कमगिरी होय.  

''मराठ्यांचे हितसंबंध वेगळे आहेत असें कित्येक म्हणतात.  परंतु त्यांचे हितसंबंध वेगळे ते काय असणार ?  सगळ्या महाराष्ट्राचे हितसंबंध तेच मराठा जातीचे हितसंबंध.  स्वराज्य तर मागावयाचें पण आमच्या जातीचे स्वतंत्र प्रतिनिधि असले पाहिजेत अशी सर्वांनीं मागणी करावयाची म्हणजे देणाराचा व घेणाराचा दोघांचाही गोंधळ उडून जावा.  मराठ्यांना स्वराज्य तें काय हें कळतच नाहीं असाही एक आक्षेप आहे; पण त्यांत कांहीं राम नाहीं.  आमच्यापैकीं पुष्कळ लोक अशिक्षित असले तरी कार्य हें उपजतबुद्धीनेंच कळतें.  आमच्या घरची व्यवस्था आम्हीं ठेवावयाची इतकें न कळण्याइतके का ते दुधखुळे आहेत ?  स्वराज्याची मागणी व्हावी तितक्या जोरांत होत नाहीं असें माँटेग्यूसाहेबांनीं कांहीं दिवसांपूर्वी बोलून दाखविलें. वस्तुतः पाहतां स्वराज्याची तृष्णा सर्वांना सारखी आहे.  ती वारंवार बोलून दाखविण्याचें काम मराठा संघाकडून होईल.''

सभेच्या सुरुवातीस लखनौ येथें पास झालेल्या स्वराज्याच्या ठरावास पुष्टी देणारा ठराव मांडला तो रा. त्र्यं. ह. आवटे ह्यांनी सभेपुढें मांडला व त्यास निरनिराळ्या जातींच्या व संस्थांच्या वतीनें निरनिराळ्या वक्तयांनीं पुष्टी दिली.

स्वराज्याच्या ठरावावर लोकमान्य टिळक यांचें भाषण झालें.  ते म्हणाले, ''जातिभेदाच्या अनिष्ट तत्त्वाचा नवीन राज्यांतहि शिरकाव करूं नका.  आतां आपल्याला पूर्वीचें स्वराज्य नको असून पाश्चिमात्य धर्तीवरील स्वराज्य पाहिजे.  आपल्या जातिभेदामुळेंच येथें ब्रि. राज्य स्थापन झालें व तो जातिभेद असाच पुढें चालू राहणार असेल तर स्वराज्यांतही अशीच आमची अधोगति होईल.  जातिभेदानें आमचे फार नुकसान झालें आहे.  राष्ट्रीय सभेनें केलेली मागणी कोणत्याही एका जातीपुरती नसून तिच्यांत सर्व जातींच्या सर्व हितसंबंधांचे संरक्षण होईल.''  रा. टिळक यांच्या भाषणानंतर पास झालेले ठराव राष्ट्रीय सभेकडे व सरकारी अधिकार्‍यांकडे पाठवण्याचा अधिकार अध्यक्षांना देण्यांत आल्यावर त्यांचे आभार मानून सभा विसर्जन करण्यांत आली.  

न्या. मू. चंदावरकर  :  परवांच्या सभेच्या अध्यक्षीय भाषणांत सर नारायणराव म्हणाले, ''आजपर्यंत मीं पुष्कळ सभांचें अध्यक्षस्थान स्वीकारलें आहे; परंतु आजच्या सभेचें अध्यक्षस्थान स्वीकारतांना मला जितका मनःपूर्वक आनंद होत आहे तितका यापूर्वी केव्हांही वाटला नव्हता.  तुमचा उद्धार झाला तरच एकंदर देशाचा उद्धार होणार.  आजच्या सभेच्या कार्यक्रमामध्यें राजकीय सुधारणेसंबंधानें दोन ठराव आहेत.  राजकीय बाबतींत तुमच्यामध्यें जागृति होत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.  राजकीय सुधारणा व्हावी ही हिंदी लोकांची मागणी कित्येक वर्षांची आहे.  कोणत्या सुधारणा करावयाच्या तें ठरविण्याकरितां स्टेट सेक्रेटरी मि. माँटेग्यू व व्हाइसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड हे निरनिराळ्या प्रांतांत फिरून चौकशी करणार आहेत.  राजकीय बाबतींत सुधारणा झालीच पाहिजे; परंतु ती सुधारणा सर्वांनाच फायदेशीर झाली पाहिजे.  सर्व जातींच्या व धर्मांच्या लोकांना - स्पृश्य व अस्पृश्य लोकांना - फायदा झालाच पाहिजे.  अस्पृश्यवर्गांतील लोकांची संख्या या देशांतील एकंदर लोकसंख्येच्या एकपंचमांशाइतकी आहे.  ह्या लोकांनांही या सुधारणा फायदेशीर झाल्या पाहिजेत.  तेव्हां त्यांनीं आपलें म्हणणें सरकारास कळविलें पाहिजे.  या वेळीं तें उदासीन राहिले तर त्यांचें नुकसान होईल.  अस्पृश्यांचा उदयकाल नजीक आला आहे.  मात्र त्यांनीं ह्या काळाचा फायदा घेण्यासाठीं दक्षता ठेवली पाहिजे.''

ना. म. जोशी  :  ह्यानंतर अध्यक्षांच्या आज्ञेवरून रा. ना. म. जोशी यांनीं भाषण केलें, ''ह्यापूर्वी शिक्षणप्रसार, अस्पृश्यत्वाचा निषेध, मद्यपाननिषेध वगैरे विषयांसंबंधीं अस्पृश्य लोकांतील पुष्कळ सभा आजपर्यंत भरल्या आहेत.  परंतु आजची सभा ह्या सभांहून भिन्न आहे.  राजकीय बाबतींत अस्पृश्यांतही जागृति होत असल्याचें, त्यांच्यामध्यें स्वहक्कांबद्दल जाणीव होत असल्याचें, ही सभा दर्शवते.  त्याबद्दल मी त्यांचें अभिनंदन करतों.  ह्या देशांतील अधिकारीवर्गानें पुष्कळ चांगल्या गोष्टी केल्या आहेत, पण तो परकीय असल्यानें आणि त्याच्यावर लोकमताचा दाब नसल्यानें एकंदरींत राज्यपद्धति सदोषच आहे.  जोड्यांतला कांटा पायाला कोठें टोंचतो हें तो जोडा वापरणारासच समजतें.  त्याप्रमाणें लोकांचीं सुखदुःखें लोकांच्या प्रतिनिधींना जितकीं समजतील तितकीं अधिकारीवर्गाला कळणें अशक्य आहे.  हिंदी लोकांना महत्त्वाचे राजकीय हक्क मिळाले तर अस्पृश्यवर्गाची सुधारणा बंद होईल अशी कित्येकांना भीति वाटते.  परंतु तशी भीति वाटण्याचें कारण नाहीं.  आपल्याच देशांतील लोकांचें मन वळविणें कठीण जाईल कीं परकीयांचें ह्याचा विचा करा.  अस्पृश्यांचे स्वतंत्र प्रतिनिधि कायदे कौन्सिलांत बसूं नयेत, असें म्हणणारे कांहीं लोक आहेत.''

दुही  :  ही सभा उधळून लावण्याकरितां रा. नारायणराव पवार आणि इतर कांहीं मंडळी सभेंत चळवळ करीत होती.  त्यांना तेथें यश आलें नाहीं, तरी अखेरीस राष्ट्रीय मराठा पक्ष व सत्यशोधक मराठा पक्ष असे दोन तट मराठा समाजामध्यें पडले.  पहिल्या पक्षाच्या दोन परिषदा बेळगांव व वर्धा येथें पुढील दोन वर्षांत झाल्या.  दुसर्‍या पक्षाच्या मुंबई व पुणें येथें झाल्या; पण मराठा राष्ट्रीय संघाला अनुसरून त्या पक्षांतील कांहींना सामाजिक सुधारणा मान्य होईना आणि सत्यशोधक समाजाला सामाजिक सुधारणा पूर्ण मान्य होती तरी राष्ट्रीय सभेची चळवळ मान्य होईना.  हळूहळू ब्राह्मणेतर पक्षाची स्वतंत्र घटना होऊं लागली.  शनिवारवाड्यांपुढील जाहीर सभेंत महारांच्या वतीनें कोणी वक्ता नव्हता हें ध्यानांत घेण्यासारखें आहे.  चांभार, मांग वगैरेंच्या बहुसंख्य लोकांना राष्ट्रीय सभेचें अनुयायित्व पटत असे, पण महार बहुशः राष्ट्रीय सभेपासून फटकून राहात.  ब्राह्मणेतर पक्षांतही ते मिसळत नसत.  त्यांचा स्वतंत्र तृतीय पंथ निघाला.

पुण्याला बहुजनसमाजांतून राष्ट्रैक्याची चळवळ चालू असतां मुंबईस आमच्या मिशनतर्फे अगदीं अशीच एक जंगी जाहीर सभा ता. ११ नोव्हेंबर रोजीं भायखळा येथील मदनपुर्‍यांत झाली.  सुमारें ५००० लोकसमुदाय जमला होता.

विजापूर येथील धर्मकार्य  :  ता. १२ मे १९१८ च्या सुबोध पत्रिकेंत विजापूर येथील धर्मपरिषदेची हकीकत खालीलप्रमाणें आहे.

''विजापूर येथें गेल्या आठवड्यांत जी प्रांतिक परिषद झाली, तीस एक दिवस उशीरा आरंभ झाल्यानें ता. ४ रोजीं प्रांतिक परिषदेच्या मंडपांत फार महत्त्वाचें कार्य झालें.  तेथें या दिवशीं जी सभा झाली तीस ''उदार धर्माची सभा'' असें अन्वर्थक नांव देण्यांत आलें होतें.  अध्यक्षस्थानीं ना. पांडुरंगराव देसाई यांची योजना झाली होती.  या सभेस प्रार्थना व ब्राह्म समाज ह्यांची बाजू रा. रा. वि. रा. शिंदे व बाबू सुधीरचंद्र बानर्जी यांनीं सभेपुढे मांडली.  रा. शिंदे म्हणाले, ''राजकीय प्रांतिक परिषदेसाठीं हा भव्य मंडप उभारला असतांना तिचें अधिवेशन होण्यापूर्वीच या धर्मसभेचें पिल्लू या मंडपांत कां सोडण्यांत आलें असा प्रश्न तर्कप्रिय लोकांकडून करण्यांस आलेला माझ्या कानांवर आला आहे.  त्याचें उत्तर देण्याला हाच प्रसंग योग्य आहे.  आम्हां पौरस्त्य लोकांच्या विशेषतः सनातन म्हणून गाजलेल्या हिंदुधर्मीयांच्या कीर्तीचा नगारा असा आहे कीं, आम्ही कोणतेंही काम ईश्वराचें नांव आणि धर्माचा संस्कार केल्याशिवाय करीत नाहीं.  जेवणाचा घांससुद्धां नारायणाचे नांव घेऊन घेतों.  उद्यां तर ह्या ठिकाणीं मोठमोठे राष्ट्रीय निश्च होणार आहेत.  त्यापूर्वी ईश्वरस्मरण न करणें हें आपल्या सनातन धर्माभिमानास शोभेल काय ?  ह्यावरून आजची ही धर्मसभा उद्यांच्या राष्ट्रकार्याचें पुण्याहवाचन म्हटल्यास हरकत नाहीं आणि त्याविषयीं कुतर्क काढणें म्हणजे आमच्या पूर्वपरंपरेला झुगारून देणेंच होय.  प्रार्थनासमाजाचा एक सभासद म्हणून मी बोलत आहें.  व्यक्तीची उन्नति करणें हें प्राचीन हिंदु धर्माचें लक्षण होतें आणि केवळ समाजाच्या उन्नतीकरितां झटणें हें आधुनिक ख्रिस्ती धर्माचें लक्षण आहे.  ह्या दोहींचा गोड मिलाफ करण्याची हांव प्रार्थनासमाज बाळगीत आहे आणि या ध्येयाच्या आड येणें म्हणजे अधर्म अशी माझी अल्पमति आहे.''  असें सांगून रा. शिंदे यांनीं अशा आणीबाणीच्या पुढार्‍यांनीं अथवा अनुयायांनीं आपल्या जातीच्या, मताच्या किंवा पंथाच्या सबबीवर आमच्या या हतभागी देशांत दुहीचें, द्वेषाचें किंवा भ्रांतीचें साम्राज्य माजवूं नये, अशी विनंती केली.  ह्या प्रसंगीं जवळजवळ २००० लोकसमूह होता व त्यांत शंभर एक स्त्रिया होत्या.  विजापूरसारख्या ठिकाणीं इतक्या लोकांना प्रार्थना व ब्राह्म समाजाची माहिती करून देण्याची संधि आमच्या बंधूंना साधतां आली हें फार ठीक झालें.  हा योग रा. शिंदे यांनीं जुळवून आणल्याचें कळतें.

सुबोधपत्रिकेच्या ह्याच अंकांत (१२ मे १९१८) खालील मजकूर आढळतो.  (ही परिषद डी. सी. मिशनच्या विद्यमानें भरली होती.  पुण्याचे ना. बी. एस. कामत अध्यक्ष होते.  परिषदेच्या कामांत मदत करण्यासाठीं रा. कृ. गो. पाताडे मजबरोबर होते.)  

महार परिषद  :  ''विजापूर येथें मागासलेल्या वर्गाच्या वतीनें जी परिषद झाली तींत झालेल्या भाषणांत वक्त्यांनीं उच्च जातींच्या पुढार्‍यांची मनसोक्त निंदा केली.  ती इतकी कीं, झाला हा प्रकार ठीक झाला नाहीं असें टाइम्स ऑफ इंडियासारख्या पत्रालाही वाटलें.  इकडे हा असा प्रकार झाला तर तिकडे अकोल्यास महारांच्या परिषदेंत निराश्रित साह्यकारी मंडळींचे आभार मानण्याचा ठराव पसार होऊन या संस्थेचें राजकीय धोरण आपल्याला पसंत नाहीं असा अव्यापारेषु व्यापार करणारा ठराव पास झाला आहे !  ही मंडळी लोकहिताचें काम करण्यासाठीं स्थापन झालेली आहे व हिच्यांतील सर्व माणसांचें राजकीय बाबतींत मतैक्य नाहीं ह्या एका गोष्टीवरूनच संस्थेचें असें राजकीय धोरण असणें शक्य नाहीं हें कोणासही सहज कळण्यासारखें आहे.  असें असतां आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठीं ही कुचेष्टा करण्याची बुद्धि आमच्या महारबंधूंना झाली ह्याबद्दल आम्हांला फार वाईट वाटतें.  निराश्रित सहकारी मंडळी ही सरकारमध्यें नोंदलेली संस्था आहे हें पूर्णपणें माहीत असून तींतील कांहीं मंडळींचे विचार सबंध संस्थेवर लादून संस्थेला राजकीय करण्याचा प्रयत्‍न करणें हें सरळ वृत्तीच्या माणसाला शोभण्यासारखें नाहीं.''

मॅंचेस्टर कॉलेज

इंग्लंडांतील प्रचारक पद्धतशीरपणें तयार करण्यासाठीं मँचेस्टर कॉलेज या नांवाची केवळ उदार धर्मशिक्षणासाठीं वाहिलेली संस्था ऑक्सफर्ड येथें आहे.  मँचेस्टर कॉलेज हे मँचेस्टर येथें प्रथम निघून लंडन वगैरे ठिकाणीं स्थलांतर पावून आतां ऑक्सफर्ड शहरांत स्वतःच्या कायमच्या इमारतींत चालू आहे.

वास्तविक पाहतां ही संस्था इ.स. १७५७ मध्यें वॉरिंग्टन अकॅडमी या नांवानें वॉरिंग्टन येथें स्थापन झाली.  तिचें पुढें १७८६ सालीं मँचेस्टर कॉलेज असें रूपांतर झालें.  या क्रांतीच्या काळीं संस्थापकांचा धर्म व शास्त्र या दोहोंवरही सारखाच विश्वास होता.  म्हणजे यांचा धर्म शास्त्रीय व शास्त्र धार्मिक होतें.

अध्यापक वर्ग  :  पहिले प्राध्यापक जॉन टेलर हे ( १७५७-६१ सालीं ) होतें.  इ.स. १८९७ सालापर्यंत प्रसिद्ध डॉ. मार्टिनो हे प्राध्यापक होते.  त्यानंतर माझ्या वेळीं व नंतरही डॉ. ड्रमंड हे प्रिन्सिपाल होते.  हे विद्येनें तसेच श्रद्धेनें आणि शीलानें फार मोठे गृहस्थ होते.  ह्यांच्याशिवाय प्रो. अप्टन (तत्त्वज्ञान), प्रो. कार्पेन्टर (तुलनात्मक धर्म व पाली भाषा), प्रो. ऑजर्स (Church history  -ख्रिस्तीसंघाचा इतिहास), प्रो. जॅक्स (समाजशास्त्र आणि Hibburt Journal चे संस्थापक व संचालक) वगैरे जाडे पंडित त्या विषयाचे अध्यापक होते.  प्रिन्सिपाल ड्रमंड हे बायबल आणि धर्मशास्त्र शिकवीत.  ह्यांपैकीं प्रो. कार्पेन्टर हे तुलनात्मक धर्म ह्या माझ्या ऐच्छिक विषयाचे विशिष्ट Tutor म्हणजे माझ्या अभ्यासावर देखरेख ठेवणारे, नेमून दिलेले गुरु असत.  त्यांच्याजवळ मीं पाली भाषा आणि बुद्धधर्माचा विशेष अभ्यास केला.  दोन वर्षांचा अभ्यास आटोपून ह्या कॉलेजचा डिप्लोमा मला देतेवेळीं कॉलेज-कमिटीकडे प्रो. कार्पेन्टरनें मजबद्दलचें जें प्रशस्तीपत्र पाठविलें त्यांत माझ्या खास गुरूनें (डॉ. कार्पेन्टरनें) चांगले गौरवपर आणि प्रेमळ उद्‍गार काढले होते.

पूर्व व पश्चिम  :  हिंदुस्थानांतील विश्वविद्यालयांप्रमाणें ह्या कॉलेजांत विद्यार्थ्यांची परीक्षारूपी शर्यत लावून त्यांच्या शहाणपणाचा दर्जा ठरवीत नाहींत.  नेमून दिलेले खास गुरु आपापल्या शिष्यांना निरनिराळ्या विषयांत निबंध लिहिण्यास सांगून त्यांच्या अभ्यासाची आणि विचारविकासाची पारख करतात.  वर्षअखेर खास निबंध लिहावयाला देऊन त्यांत दाखवलेल्या हुशारीप्रमाणें प्रशस्तिपत्र लिहून देतात.  कॉलेजांत विद्यार्थीही इकडच्याप्रमाणें शेंकड्यांनीं किंवा हजारांनीं मोजतां येण्यासारखा प्रकार मँचेस्टर कॉलेजांत नाहीं.  एका वेळीं फार तर १५।२० विद्यार्थ्यांहून जास्त नसतात.  तेही दोन वर्षांतून विभागलेले असतात.  ते दुसरीकडे बी.ए. अगर एम.ए. होऊन आलेले असतात.  अगोदरच कोणत्या तरी गीर्वाण प्राचीन भाषेंत त्यांना पदवी मिळालेली नसेल तर अशा कोणत्या तरी दोन प्राचीन भाषांचा अभ्यास करण्याची ह्या कॉलेजांत व्यवस्था असते.  मुंबई विश्वविद्यालयाचा संस्कृतचा बी.ए. असल्यानें मीं येथें पालीचा अभ्यास जास्ती केला.

धर्मपरिवार  :  मँचेस्टर कॉलेजचें महत्त्व त्यांतील केवळ ठराविक अभ्यासक्रमावर मुळींच अवलंबून नाहीं.  तें एक उदार धर्मशिक्षणाचें कुटुंबच होतें.  १५।२० विद्यार्थी, पांच सात प्रोफेसर, त्यांच्या मुली, नाती व इतर कुटुंबीय ह्या सर्वांचा धर्मपरिवार म्हणजेच कॉलेज.  कॉलेजची इमारत प्रशस्त, नवी आणि सुंदर.  अवाढव्य पुस्तकालय, गंभीर व स्वतंत्र उपासनालय आणि त्यांत दर आठवड्यांला प्रार्थनेसाठीं जमणारा ऑक्सफर्ड शहरांतील युनिटेरियन समाज असें एक कॉलेजहूनही मोठें कुटुंब होतें.  कॉलेजच्या उपासनालयांत प्रोफेसर मंडळी रविवारची साप्‍ताहिक उपासना चालवीत.  त्याशिवाय दर बुधवारीं सायंकाळीं कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्यानें उपासना चालवण्यास शिकावें म्हणून एक साप्‍ताहिक उपासना व उपदेश तयार करावयाचा असे.  तो ऐकून सूचना देण्यासाठीं एका खास प्रोफेसराची नेमणूक आहे.

निबंध व प्रयोग  :  ह्याशिवाय विद्यार्थ्यांना वत्तृफ्त्वाचे प्रसंग यावेत, मोठमोठ्या विषयांवर विचारविनिमय करण्याला त्यांना अवसर मिळावा म्हणून मार्टिनो क्लब या नांवाची संस्था स्थापन करण्यांत आली होती.  प्रत्येक टर्ममध्यें हा क्लब दोनदां भरत असे.  त्यांतच वर सांगितल्याप्रमाणें चेट्कॉव्ह ह्या रशियनानें रशियांतील धर्मशिक्षण ह्यावर निबंध वाचला.  हे मोठे ग्रंथकार असून प्रसिद्ध Socialist व Anarchist होते.  ऑक्सफर्डमधील सर्व युनिटेरियन समाजांतील स्त्रीपुरुषांचा परिचय व्हावा, विचारविनिमय वाढावा, म्हणून वर्षांतून निदान एक तरी मोठें स्नेहसंमेलन घडविण्यांत येत असे. अशा एका स्नेहसंमेलनांत The Romance of Social Reform in India ह्या विषयावर मीं एक निबंध वाचला.  नुसता निबंधच न वाचतां, 'हिंदुगृहपद्धति व सामाजिक स्थिति' कशी असते हें प्रत्यक्ष दाखविण्याकरितां मध्यम स्थितींतील कुटुंबाच्या देखाव्याची सजावट मीं करून दाखविली.  कांहीं तरुणांना व तरुणींना हिंदी पोषाख देऊन हिंदुपद्धतीनें बसविण्यांत आलें होतें.  पोषाक, सामान, नकली दागदागिने वगैरे एका दुकानांतून तात्पुरते आणले होते.  नवीन लग्न झालेली सूनबाई कोपर्‍यांत भिंतीकडे तोंड करून कशी बसते, जवळ आलेल्या परीक्षेसाठीं तिचा नवरा मोठमोठ्यानें घोकंपट्टी करीत दुसर्‍या कोपर्‍यांत कसा बसतो, कोणी वडीलधारें माणूस अवचित आल्यावर दोघें उठून कसे नमस्कार करतात वगैरे दृश्यें हावभावांसकट दाखविण्यांत आलीं.  एकंदर प्रयोग लोकांना इतकां आवडला कीं 'Inquirer' नांवाच्या युनिटेरियन समाजाच्या मुखपत्रांत हा निबंध आणि हा सर्व प्रकार प्रकाशित झाला.  इतकेंच नव्हे तर त्या सर्व लेखाचें भाषांतर एका फ्रेंच वर्तमानपत्रानें प्रसिद्ध करून त्याची एक प्रत मजकडे आभारपूर्वक पाठविली.

चहापान  :  नवीन टर्म सुरू झाल्यावर कॉलेजांतील वृद्ध प्रोफेसर प्रत्येक विद्यार्थ्याला समक्ष भेटून, आपल्या घरीं चहा घेण्याला दर आठवड्यांतून कोणता दिवस मुक्रर केला आहे तो कळवीत असत.  सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वसतिगृहांत जागा मिळत नसे.  असे विद्यार्थी गांवांत भाड्यांनें जागा घेऊन राहात असत.  अशा विद्यार्थ्यांच्या घरीं जाण्यासही प्रोफेसर्स कमीपणा मानीत नसत.  त्यांच्या घरीं चहाची परतभेट देण्यासही आनंदानें जात.  मग अशा कॉलेजला कुटुंब म्हणूं नये तर काय म्हणावें ?

उपासक  :  सकाळीं १० पासून दोन प्रहरीं १ पर्यंत तीनच तास कॉलेजची व्याख्यानें असत.  झालींच तर संध्याकाळीं जाहीर व्याख्यानें असत.  रात्रींच्या वेळीं क्लबच्या सभा, संमेलनें चालत.  वर्षांतून सहा महिने अभ्यास आणि सहा महिने सुट्टी असें वर सांगितलेंच आहे.  पण आठवड्यांतून चार दिवस कॉलेज व तीन दिवस सुट्टया असत.  शनिवार, आदितवार, सोमवार हे सुट्टीचे दिवस ठेवण्याचें कारण हें कीं, इतर गांवांतील कुठल्याही एका युनिटेरियन समाजामध्यें जर एखादे वेळीं उपासक आचार्य नसले तर मँचेस्टर कॉलेजांतील विद्यार्थ्याला तें काम करण्याला पाठविण्यांत येत असे आणि सांजसकाळच्या दोन उपासनेसाठीं जाण्यायेण्याचें भाडें, पाहुणचारासह दोन पौंड वेतन त्याला मिळत असे.  ही वर्णी मलाही लागत असे.  ब्राह्मसमाजाचा प्रतिनिधी म्हणून मला विशेष आवडीनें निवडण्यांत येत असे.  ह्या व इतर अनेक प्रकारांनीं हें कॉलेज म्हणजे सर्व देशांतील सर्व युनिटेरियन समाजाचें एक काळीजच (Heart) होऊन राहिलें होतें.  याशिवाय मुलांना गरीब लोकांच्या वस्तींत जाऊन तेथें दयेचीं व परोपकाराचीं कामें करण्याची संवय लागावी म्हणून एका स्वतंत्र लहानशा मिशनची स्थापना झाली होती. ह्याचा कॉलेजशीं प्रत्यक्ष संबंध नव्हता.  तरी डॉ. ड्रॅमड यांची कन्या मिस नेली हिनें पुढाकार घेऊन हें चालविलें होतें आणि कॉलेजचे विद्यार्थी त्यांत भाग घेत होते.

  1. मूर्ति-पूजा
  2. मिशनची घटना
  3. माझ्या खोड्या
  4. माझ्या एकान्त सहली
  • 34
  • 35
  • 36
  • 37
  • 38
  • 39
  • 40
  • 41
  • 42
  • 43
Page 39 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी