1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

संग व विषय

संगे वाढे शीण न घडे भजन| त्रिविध हे जन बहु देवा||
याचिमुळे आला संगाचा कंटाळा| दिसताती डोळा नाना छंद||
एकविध भाव राहावया ठाव| नेदी हा संदेह राहो चित्ती||
शब्दज्ञानी हित नेणती आपुले| आणिक देखिले नावडे त्या||
तुका म्हणे आता एकलेचि भले| बैसोनि उगले रहावे ते||

ह्या अभंगात तुकारामबुवा म्हणतात-संगाचे योगाने शीण येतो, व भजन काही घडत नाही. बरे, वाईट व मध्यम असे तीन प्रकारचे लोक ह्या जगामध्ये आहेत. त्यांच्या संगाने मनाची एकाग्रता होत नाही. एकाचा कल एकीकडे, दुस-याचा दुसरीकडे, तिस-याचा तिसरीकडे अशी स्थिती सर्वत्र आहे. नानाप्रकारचे छंद दृष्टीस पडतात. एक म्हणतो संसार सांभाळा, दुसरा म्हणतो समाज, राष्ट्र वगैरे सांभाळा, अशा प्रकारच्या छंदामध्ये मनास भ्रांती पडते, भजन सुचत नाही. नाना प्रकारचे गुरू, नाना प्रकारचे पंथ, नाना प्रकारची सोंगे, ढोंगे ह्यामुळे एकविध बाव रहात नाही, व मन छंदाधिस्थ होऊ जाते. नुसत्या शब्दज्ञानाने आपल्या हितास धोका पोहोचतो. ‘अर्थे लोपली पुराणे’ अशी स्थिती होते. असा प्रकार संगाचा होतो, म्हणून संगापासून दूर रहाणेच बरे. अशाच प्रकारच्या संगाविषयीचा कंटाळा त्यांनी खालील अभंगात दाखविला आहे.

रूसलो आम्ही आपुलीया संसारा| तेथे जनाचार काय पाड||
आम्हा इष्टमित्र सज्जन सोयरे| नाही या दुसरे देवाविण||
दुराविले बंधु सखे सहोदर| आणीक विचार काय तेथ||
उपाधि वचन नाइकती कान| त्रासले हे मन बहु माझे||
तुका म्हणे करा होईल ते दया| सुख दु:ख वाया न धरावे||

आम्ही आमच्या संसारावरच रूसलो आहो,तर जनाच्या आचाराला घेऊन आम्हांस काय करावयाचे आह! एकाच घरातील कुटुंबातील माणसांचे जमत नाही. बापाचा पंथ वेगळा, मुलाचा वेगळा. नव-याचा हव्यास निराळा, बायकोचा निराळा. बहीण, भाऊ ह्यांचे जर एकमेकांशी पटत नाही तर इतरांची गोष्ट बोलावयासच नको. ह्या त्रासाने माझे मन भांबावले आहे तर देवा, मला हा संसार नको, ही उपाधी नको, मी रानामध्ये जाऊन ह्या संगापासून दूर राहीन. संसारातील उपभोग्य जे विषय त्याविषयी नामदेव म्हणतात:

विषयी आसक्त झाले माझे मन| न करी तुझे ध्यान देवराया||
नाथिले संकल्प करी नानाविध| तेणे थोर खेद पावतसे||
ऐसा मी अपराधी दुराचारी देवा| भेटसी केधवा कवणे परी||
आयुष्य सरे परी न सरे कल्पना| भोगावी यातना नानाविध||
जरा-व्याधि-कष्ट भोगिता संकटी|होतसे हिंपुटी चित्त माझे||
आशा मोहोरत भ्रांत माझे चित्त| चुकलो निजहित नारायणा||
तू अनाथ कैवारी म्हणुनी धावा करी| सोडवी श्रीहरी म्हणे नामा||

माझे मन विषयामध्ये आसक्त झाल्यामुळे ते ध्यानस्थ होत नाही. अनेक प्रकारचे नसतेच संकल्प मनात उद्भवतात. अमुक मान मिळवावा, अमके धन मिळवावे म्हणून सारखा विचार चाललेला असतो. आयुष्य संपून जाते, पण कल्पना काही संपत नाही. अनंत लोक स्वर्गस्थ झाले पण कल्पना म्हणून जशाच्या तशाच कायम राहिल्या आहेत. विषयांच्या मोहामुळे माझे मन भ्रांत होते.

तुकाराम म्हणतात संग नको व नामदेव म्हणतात विषय नकोत. अशाच प्रकारचा उपदेश चोहोंकडे बहुतकरून ऐकू येतो. पण आज आपण तर संघ बनवून ह्या ठिकाणी जमलो आहो. मग परस्पर विरूद्ध ह्या दोन गोष्टींची आता सांगड ती कशी घालावयाची. तुकाराम ज्याप्रमाणे संग नको म्हणून म्हणतात, त्याचप्रमाणे तो पाहिजे असेही म्हणतात.

संगतीने होतो पंगतीचा लाभ| अशोभी अनुभव असिजेते||
जैसी तैसी असा पुढिलांचे सोई| धरिती हाती पायी आचारिये||
उपकारी नाही देखत आपदा| पुढिलांची सदा दया चित्ती||
तुका म्हणे तरी सज्जनांची कीर्ती| पुरवावी आर्ति निर्बळाची||

ज्या पंगतीला आपण जेवावयास बसतो त्या पंगतीचा लाभ आपणांस मिळतो. राजाच्या पंगतीमध्ये एकदा का शिरकाव झाला म्हणजे राजाला मिळणारे पदार्थ आपल्याला मिळावयाचेच. आम्ही कोण, गरीब का मोठे असे प्रश्न वाढपी विचारीत नाहीत. त्याचप्रमाणे आचार्यांनी, सज्जनांनी धर्मस्थापनेकरिता जे संग स्थापिलेले असतात त्या संगांमध्ये जाण्याचा अवकाश की लागलीच आपणास त्याचा लाभ मिळतो. दुबळ्याची आपत्ती निवारण करण्याकरिताच संग स्थापलेले असतात. एकट्याने बसून काही होत नाही. दुसरे एके ठिकाणी म्हटले आहे की,

संगत करे सज्जनकी| बढत बढत बढ जाय||
संगत करे नीचनकी| तो फल छोड फत्तरकी||
साधूको साधू मिले तो| हशी खुषीसे दो बात||
और गद्धेकु गद्धा मिले| तो उडउडाके दो लात||

संगत करावयाची तर उत्तम संगाबरोबर केली पाहिजे. पंखा मोडलेली नाव पंखा न मोडलेल्या नावेला धरून तरून जाते त्याप्रमाणे दुर्जन सज्जनाच्या मदतीने तरून जातो. संग करावयाचा तो सज्जनांबरोबर करावा, नाहीपेक्षा एकांती राहणे बरे. विषयाविषयी तुकाराम म्हणतात:

वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे| पक्षीही सुस्वरे आळविती||
येणे सुखे रूचे एकांताचा वास| नाही गुण-दोष अंगा येत||
आकाश मंडप पृथिवी आसन| रमे तेथे मन क्रीडा करी||
कंथा कमंडलु देह उपचारा| जाणवितो वारा अवसरू||
हरिकथा भोजन परवडी विस्तार| करोनि प्रकाश सेवे रूचि||
तुका म्हणे होय मनासी संवाद| आपुलाचि वाद आपणासी||

जे उपभोग्य पदार्थ ईश्वराने निर्माण केले आहेत, त्यांवर आसक्ती न ठेवता त्यांचे सेवन करावे. विषयांचा उपभोग घेत असताना गर्व, अहंकार, कोतेपणा जर उत्पन्न झाला तर मग ते विषय नसलेले पुरवले. बागेमध्ये फिरावयास गेलो असता हा बाग माझ्या आजाचा, माझ्या आजानेच ही झाडे लावली, माझा आजा कितीतरी वाकबगार होता, असा अहंकार उत्पन्न होऊन तेथील वृक्ष, वल्ली, फळे-फुले ह्यांचा उपभोग घेण्यापेक्षा त्यांचा नाश झालेला पुरवला. अहंकार अवनतीला कारण होतो. शुद्ध भावनेने विषयांचा आदर करावा. निरहंकारभावाने आपण सृष्टीमध्ये वावरू लागलो, तर संग व विषय आपल्या घातास कारण न होता उन्नतीसच कारण होतात. तेव्हा संगाचा व विषयांचा आदरही केला पाहिजे व अनदरही केला पाहिजे. कपडे, अलंकार, धनदौलत, मान-मरातब ह्यांचे योगे जर अहंकार उत्पन्न होत नसेल तर मग अनेकश: आणखी विषय उत्पन्न झाले तरी हरकत नाही. पण जर अहंकार उत्पन्न होईल तर मग धूमकेतू येऊन त्यांचा सत्यानाश झालेला बरा. एकंदरीत काय की, संग पाहिजे, पण तो सज्जनांचा असावा. तसे नसेल तर एकांतवास बरा. विषय पाहिजेत, पण त्यामुळे गर्व होता कामा नये. नाही तर ते विषय नसलेले बरे.

श्रीशाहू छत्रपतींच्या मनाचा विकास

श्रीशाहूरायांच्या चरित्राकडे शास्त्रीयदृष्ट्या आणि सहानुभूतीने पाहू गेल्यास एक गोष्ट दिसून येते ती ही की, त्यांचे मन उत्क्रमणशील होते आणि तशीच दुसरी गोष्ट ही की, ते उत्कर्षशील होते. श्रीशाहू गादीवर येण्यापूर्वी कोल्हापूरचा इतिहास म्हणजे एक मोठी अंधारी रात्र होती. अंधा-या रात्रीत अनेकविध पापे घडतात आणि ती कोणास कळून येत नाहीत. त्याचप्रमाणे ह्या राजवटीत पेशव्याच्या काळापासून तो श्रीशाहूंच्या मनाचा विकास होऊ लागून त्यांच्या ख-या पौरुषास सुरुवात होईपर्यंत स्वकीय व परकीयांचा जो धुमाकूळ चालला होता त्याची खरी कहाणी कोणी मार्मिकपणे सांगेल तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. प्रत्यक्ष श्रीशाहूरायांच्या बाळपणी त्यांचे पुढे विकसलेले पौरुष त्यांच्यात होते की नाही हे कोणास आजमावता आले नसते इतके ते दिसण्यात साधे किंबहुना बावळट होते असे सांगतात. पण ह्या बावळटपणाच्या पडद्याआड त्यांच्या चारित्र्याचा जीव आणि जागृती ही दोन्ही सुरक्षित होती. हा पडदा नसता तर ही दोन्ही ह्या फारा दिवसांच्या विषारी वातावरणात केव्हाच करपून गेली असती. बाळपणाप्रमाणेच ह्यांच्या तारुण्यातही ह्यांच्या सार्वजनिक चारित्र्याचा अंकुर योग्य वेळेच्या पूर्वीच बाहेर फुटून आला नाही हेही बरे झाले.

सन १९०६-७ साल हा मोठा मुहूर्तकाळ होता. जगात आणि विशेषतः हिंदुस्थानात हा मुहूर्त बराच जाणवला. युरोपात ह्या वेळी महायुद्धाची हांडी शिजत होती तर हिंदुस्थानात राजकीय, सामाजिक व एकंदरीत सर्व बाजूने राष्ट्रीय जागृतीचा स्फोट होत होता. पुण्यातून टिळकाला जरी प्रत्यक्ष उचलून मंडाले येथे कारागृही ठेवण्यात आले तरी टिळकशाही अधिकच फोफावू लागली होती. पण तिच्याच तोडीची परंतु अधिक विधायक स्वरूपाची राष्ट्रीयता डिप्रेस्ड क्लासेस मिशन, सेवासदन, सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी, सोशल सर्व्हीस लीग वगैरे सर्व राष्ट्रभर पसरणा-या प्रागतिक संस्थांच्या रूपाने उदय पावू (फूट नोट- दैनिक सत्यवादी, राजर्षी शाहू खास अंक, १९२८ ऑगस्ट.) लागली होती. वसंत ऋतूत वनराजीत जशी एकदम जीवनकळा चहूंकडे फुटून दिसते, त्याप्रमाणे ह्या एक दोन वर्षांतच सर्वांगसुंदर राष्ट्रीयता सर्वत्र चमकू लागली. ह्याच मुहूर्ताला पडद्याआड बेमालूम वाढत असलेले शाहूरायाचे पौरुष एकदम फुटून बाहेर आले. तरी त्याच्या आत हळूहळू कोणाला न कळत त्याचा विकास होत होता.

शाहू राजा नुसता मराठा नव्हता. ब्राह्मणेतरही नव्हता. तो नवयुगातला स्वयंपूर्ण राष्ट्रपुरुष होता. तो परकीयांची नांगी ओळखून होता ही गोष्ट ज्यांनी त्यांच्याशी गुजगोष्टी केल्या त्यांना तरी सांगणे नको. तो हाडाचा मराठा असल्याने जो गनिमी कावा त्याच्या हाडांत भिनला होता तो त्याच्या हाडांत भिनला होता तो आता त्याच्या वर्तनात उघड चमकू लागला. हा कावा त्याने पत्करला नसता तर महाराष्ट्राच्या जनतेला जागी करून तिच्या पायांवर उभी करण्याचे अवघड काम त्याच्या हातून झाले नसते. टिळक आणि ज्योतीबा फुले ह्या दोघांचेही हल्ले सामन्यांचे होते. श्रीशाहू जरी आता पडद्याबाहेर पडला होता तरी त्याने कधी कोणाला सामना दिला नाही.

पण प्रत्येकाच्या बगलेतील हाडे त्यांना नकळत ह्या राष्ट्रसेवकाने हासत हासत खिळखिळ करून टाकली. इतकी की, भटशाहीप्रमाणेच पुढे पुढे नोकरशाहीलाही हे कोल्हापुरी कोडे विचार आणि कौतुकही करावयास भाग पाडू लागले. ह्या वर्णनावरून श्रीशाहू एकादा हा लेनीनच्या वळणावरचा क्रांतिकारक उत्पात होता, असे कोणी समजेल तर तेही खरे नाही. तो महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा स्वाभाविक तरंग होता हेच जास्त बरे.

माझा आणि त्यांचा जो अल्पसा प्रत्यक्ष परिचय होता त्यावरून सामाजिक बाबतीत तरी त्यांच्या मनाची जी उत्क्रांती घडली तिचे काही टप्पे मला जसे दिसले तसे येथे थोडक्यात देणे प्रासंगिक वाटते. भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची स्थापना झाल्यावर तिच्या अव्वल अमदानीत माझ्या व त्यांच्या ज्या भेटी झाल्या त्यावेळी अस्पृश्यांविषयी त्यांची सहानुभूती अद्यापि बनली नव्हती, असे माझ्या स्पष्ट नजरेस आले. मात्र अस्पृश्यांविषयी द्वेष त्यांच्या कोमल मनात असणेच शक्य नव्हते. द्वेष नसणे आणि प्रेमाचा पाझर फुटणे ह्यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. पण तेही अंतर त्यांनी हळूहळू ओलांडले. महाराज ब्राह्मसमाजाचे चहाते होते. म्हणून त्यांनी दोन-चार वेळा कोल्हापुरात प्रार्थनासमाजाच्या उत्सवाच्या व इतर समारंभाच्या वेळी दरबारी मदत सढळ हाताने दिली. तथापि त्यांचा ओढा ब्राह्म अथवा प्रार्थनासमाजापेक्षा आर्यसमाजाकडे होता हे उघडच दिसत होते. पण ह्याचे कारण ब्राह्म आणि आर्यसमाज ह्यांचा जो धार्मिक मतभेद आहे त्यात नसून ब्राह्मांपेक्षा आर्य हे ऐहिक झटापटीत अधिक धाडसी आणि लोकसंग्राहक आहेत ह्याच गोष्टीत होते. पुढे महायुद्धाच्या प्रसंगाने महाराजांना विलायत प्रवास घडला. तिकडून परत आल्यावर महाराजांचे सार्वजनिक चारित्र्य पूर्ण बनलेले दिसले. अस्पृश्यता निवारणच काय पण समग्र जातिभेदाची इमारतही सत्याला आणि स्वातंत्र्याला कोंडून ठेवण्यासाठी तयार केलेली धूर्ताची एक पुरातन कारवाईच अशी त्यांची खात्री झालेली दिसली. भेटीव्यवहाराची काय कथा, पण उघडउघड रोटीव्यवहार आणि बेटीव्यवहारालाही ते स्वतः छाती ठोकून जितके तयार होते त्याहून जास्त तयार मला दुसरा कोणीही लोकनायक दिसला नाही. मेसापोटेमियातील एका वेढ्यात जे मराठे सापडले, त्यांनी घोड्यांचे मांस खुशाल खावे, कोणी जातीबाहेर टाकल्यास आपण स्वतःच्या जवळच्या आप्तांशी त्याचा शरीरसंबंध करू अशी जाहीर खबर त्यांनी दिली. हिंदुस्थानातल्या निरनिराळ्या राजेरजवाड्यांत मिश्रविवाह व्हावेत असे त्यांचे मतच नव्हे तर प्रयत्नही होते हे मला माहीत आहे.

महाराजांप्रमाणे इतरही थोडे सुधारक असतील. पण त्यांचा विशेष हा आहे की, ते राजपदावर असल्यामुळे त्यांच्या कार्यात यश येऊन अखिल महाराष्ट्र जसा हालला तसा व तितका दुस-या कोणाच्या प्रयत्नाने हालला नाही. ह्याचे प्रत्यंतर पाहावयाचे झाल्यास कोल्हापुरास जाऊन कोणीही पाहावे. बेटीव्यवहार आणि रोटीव्यवहार मराठ्यांचा तरी इतर खालील समजल्या जाणा-या कोणत्याही जातीशी तेथे राजरोस चालला आहे. अस्पृश्यांची तर गणना जवळजवळ मराठ्यांतच होऊ लागली आहे. ब्राह्मणात काय प्रकार आहे ते सांगवत नाही. त्यांच्यात काही सोवळे अद्यापि उरले असेल तर ते कदाचित श्रीशाहूरायाच्या नितांत प्रयत्नाची प्रतिक्रिया म्हणून असेल; पण ब्राह्मणेतरांत तरी अपमानकारक सोवळे आता फारसे राहिले नाही. हे सत्यशोधक समाजाच्या तेथील वार्षिक सहभोजनावरून स्पष्ट दिसते. केवळ समारंभाचे वेळीच सहभोजन होत नसून घरगुती एरव्हीच्या प्रसंगी देखील अस्पृश्यांशी उघड पंक्तिव्यवहार झालेला मी पुष्कळ वेळां प्रत्यक्ष पाहिला आहे. हा सर्व प्रभाव केवळ श्रीशाहूंच्या धडाडीचा म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर राहील आणि ज्या प्रागतिकांनी परिषदांतून त्यांचेविषयी औपचारिक दुःखवट्याचे ठराव पास करण्याचेही नाकारिले त्यांचा विसर महाराष्ट्राला आताच पडत चालला आहे; मग पुढे त्यांची आठवण कोण काढणार !

श्री. विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका

[पत्रिकेच्या खास प्रतिनिधीकडून]

सुबोध पत्रिकेच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त डायमंड ज्युबिलीच्या खास अंकाकरिता काही संदेश देण्याविषयी रा. शिंदे ह्यांना आग्रह केला असता, त्यांच्याशी जे संभाषण झाले त्याचा सारांश थोडक्यात पुढील शब्दांत दिली आहे-

प्रार्थना समाजाच्या उदात्त तत्त्वाचा प्रसार करण्याचे कामी सुबोध पत्रिकेला आजपर्यंत जे यश प्राप्त झाले आहे, त्याचे बहुतेक श्रेय माझे मित्र रा. द्वारकानाथपंत वैद्य ह्यांनाच दिले पाहिजे. म्हणून माझ्या दृष्टीने व माझ्या प्रामाणिक समजुतीप्रमाणे मी स्पष्ट शब्दात असे म्हणतो की, रा. वैद्य ह्यांच्याच निष्ठापूर्वक, फलाशा न धरता कर्तव्यकर्म करण्याच्या धोरणामुळेच पत्रिकेला हे स्वरूप प्राप्त झाले आहे व तेव्हापासून आजपर्यंत रा. वैद्य हेच तिचे मराठी बाजूचे संपादक आहेत. त्यांनी अनेक संकटांतून, मोठ्या वादळातून, धैर्याने, चिकाटीने, सतत उद्योगाने, आपल्या खासगी गरजा व अडचणी ह्यांस न जुमानता, कोणत्याही प्रकारचे वेतन न घेता पत्रिकेस वाचविले आहे, एवढेच नव्हे तर पत्रिकेबद्दलची त्यांची तळमळ इतकी प्रखर आहे की एक कायमचा निधी जमविण्याच्या त्यांच्या कार्यास यश येत चालले आहे. शुद्ध, सनातन, शाश्वत तत्त्वाचा प्रसार करण्याचे साधन पत्रिका आहे हे जाणून ते पत्र चिरकाल टिकेल अशा प्रकारची व्यवस्था करण्याकरिताच वरील निधी जमविण्यात येत आहे हे रा. वैद्य व त्यांचे साहायक ह्यांना भूषणावह आहे.

दृढनिश्चयाने व नेटाने समाजाच्या उदार धोरणास अनुसरून पत्रिकेच्याद्वारे रा. वैद्य ह्यांनी जी लोकसेवा केली आहे, ती बहुमोल असून तिचे परिणाम फार हितकारक झाले आहेत व ते भविष्य काळीही टिकण्यासारखे आहेत. त्यांनी पत्रिकेत प्रसिद्ध केलेली निरनिराळ्या गंभीर विषयांवरील प्रचंड लेखमाला पाहिली तर त्यांच्या चिकाटीचे व दीर्घोद्योगाचे मोठे आश्चर्य वाटते. त्यांच्या लेखामध्ये त्यांच्या अंत:करणातील तळमळ दिसून येते. त्यांची गंभीर विचारसरणी, मुद्देसूदपणे विषयांची केलेली मांडणी व समतोल वृत्ती हे गुण त्यांच्या लेखामध्ये जागोजाग आढळून येतात.

गाजावाजा न करिता अगदी नियमितपणे, निश्चयाने व अविश्रांतपणे रा. वैद्यांनी जी ही समाजाची सेवा आज तीन तपे केली आहे, अशा प्रकारचे उदाहरण आपल्या ह्या हिंदुस्थानात तरी क्वचितच आढळते येतात.

गाजावाजा न करिता अगदी नियमितपणे, निश्चयाने व अविश्रांतपणे रा. वैद्यांनी जी ही समाजाची सेवा आज तीन तपे केली आहे, तशा प्रकारचे उदाहरण आपल्या ह्या हिंदुस्थानात तरी क्वचितच आढळते व हा विचार मनात आला म्हणजे अंत:करण भरून येते आणि हे देवाचे कार्य त्यांनी एकसारखे चालू ठेवले आहे, म्हणून त्यांच्याविषयी धन्योद्गार सहजपणे मुखातून बाहेर पडल्याशिवाय रहात नाहीत.

ह्यानंतर पत्रिकेच्या दुस-या कामगिरीविषयी काही सांगा असे रा. शिंदे ह्यांना विचारले असता, ते म्हणाले की, अशा प्रसंगी रा. वैद्य ह्यांच्या कामगिरी व्यतिरिक्त मी दुसरे काही सांगितले तर रा. वैद्य ह्यांची कामगिरी लोकांच्या दृष्टीआड होऊन तिचे महत्त्व कमी होईल म्हणून ह्यावेळी रा. वैद्य ह्यांची कामगिरीच स्पष्टपणे लोकांच्या ध्यानात यावी, हीच माझी इच्छा आहे, तेव्हा मी दुसरे काही सांगत नाही, मात्र, जगन्नियंत्या परमेश्वराजवळ माझी एवढीच प्रार्थना आहे की, त्याने रा. वैद्य ह्यांना उदंड आयुष्य व भरपूर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य देऊन त्यांच्याकडून अशीच जनसेवा उत्तरोत्तर करवून घ्यावी!

श्री. महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य-श्रीमंत सयाजीराव गायकवाड

श्रीमंत महाराज सर सयाजीराव गायकवाड ह्यांच्या ७१ व्या वाढदिवसाचा अत्यंत शुभ प्रसंग (ता. मार्च १७ इसवी सन १९३३) जवळ येत चालला आहे. त्या निमित्त त्यांच्या चरित्राचा व कार्याचा एक ग्रंथ तयार करून त्यांना नम्रतापूर्वक अर्पण करण्याचा विचार त्यांच्या चाहत्यांनी केला आहे, ही गोष्ट जितकी आनंददायक आहे, तितकीच सूचक आहे. मीही महाराजांचा एक अत्यंत नम्र चाहताच नव्हे तर त्यांच्याकडून उपकृत झालेला मनुष्य असल्यामुळे सदर ग्रंथकर्त्यांनी मला वरील विषयावर एक लेख त्या पुस्तकात घालण्यासाठी लिहिण्याची विनंती केली, ह्याबद्दल मी त्यांचा मोठा आभारी आहे. परंतु त्या कामासाठी मला अवधी मात्र फार थोडा मिळाला आहे. माझा व महाराजांचा जरी चिरपरिचय आहे व वरील विषय म्हणजे माझ्या सार्वजनिक सेवेचा एक मुख्य भाग आहे, तरी महाराजांनी या विषयात जे अफाट व उदार प्रयत्न व्यक्तिश: व आपल्या दीर्घ कारकीर्दीत चालविले आहेत, त्यांचे संपूर्ण आणि उठावदार शब्दचित्र तयार करण्यासाठी जरूर ती सामग्री तूर्त माझ्याजवळ नाही व ती मिळवून हे माझे आवडते काम करण्यास आता अवसरही मिळणार नाही.

महाराजांनी जे प्रत्यक्ष कार्य केलेले आहे, त्याची नुसती तारीखवार जंत्री तयार करून त्यात महाराजांना ह्या कठीण पण राष्ट्रीय पुण्यसेवेत जी महनीय सिद्धी मिळाली आहे, तिचे कार्यकारणदर्शी पर्यालोचन केले तरी ही कृती मोठी रंजक व प्रेरक होईल ह्यात शंका नाही. पण ही कृती ह्या विषयाचा केवळ बाह्य अथवा अभिधात्मक भाग ठरेल. महाराजांच्या अंतरंगात अवगाहन करून त्यांना ह्या पुण्यकार्याची लहानपणी व तरूणपणी प्रेरणा केव्हा व कशी कशी झाली, ह्या अपूर्व विषयाकडे त्यांच्या विविध कार्यप्रचुर जीवनात त्यांचे मन कसकसे आकृष्ट झाले व ह्या राष्ट्रीय पाप-निष्कृतीचा यज्ञ करीत असताना त्यांच्या मनाला आशानिराशा, हर्षामर्ष व धन्यता कशी वाटत गेली वगैरे अनुभवांचे शब्दचित्र वटविण्याची संधी ज्या कोणा सुदैवी चित्रकाराला मिळेल तो धन्य!

श्रीमंत सयाजीराव महाराजांचे कार्य विस्तृत व दूरगामी आहे. केवळ राज्यकर्ते ह्या नात्याने एक वटहुकूम काढून त्यांना अस्पृश्यतेचे कार्य करता आले असते. लोकमताचा पाठिंबा नसताना असली समाजसुधारणेची कार्मे केवळ हुकुमाच्या जोरावर करणे जवळ जवळ अशक्य, निदान दुर्घट तरी असते. पण जपानचे बादशाह व तुर्कस्तानचे सर्वाधिकारी केमालपाशा ह्यांनी काही झटपट सुधारणा केवळ दंडनीतीच्या द्वारे करून दाखविल्या आहेत. पण ह्या महाराजांना असे एखादे डोळे दिपविणारे दिव्य दाखवावयाचे नसून एका बाजूने हळूहळू लोकमत बनवून दुस-या बाजूने अस्पृश्योद्धाराचा कायमचा पाया घालावयाचा होता, म्हणून त्यांनी प्रस्तुत विलंबाचा पण टिकाऊ मार्ग पत्करला. ह्या विवेचनावरून महाराज हे एक अस्पृश्यतानिवारकच नसून अस्पृश्योद्धारकही आहेत, हे भावी इतिहास भावी पिढ्यांना गंभीर रवाने गर्जून सांगेल ह्याची खात्री पटते.

भारतीय अस्पृश्यता ही एक स्वतंत्र संस्थाच आहे. बौद्ध, जैन, शीख, लिंगायत, वैष्णव वगैरे धर्मपंथांनी व इतर साधुसंतांनी प्राचीन व मध्यकालीन अस्पृश्यांच्या आत्मिक उद्धारासाठी थोडेबहुत प्रयत्न केले आहेत, पण हे सर्व बहुतेक वैयक्तिक स्वरूपाचे होते. सामुदायिक अस्पृश्यता मुळातच नष्ट करून आधुनिक अर्थाने निवारणाचे व त्यापुढचे भौतिक उद्धाराचे काम ह्या पंथांनी किंवा कोणा संतांनी केलेले इतिहासात नमूद नाही. ह्या बाबतीतील चालू प्रयत्न म्हणजे आधुनिक युगाचेच एक विशिष्ट लक्षण आहे, असे म्हटल्यास तज्ज्ञाकडून विरोध होईल असे वाटत नाही. पाश्चात्यांची संस्कृती ह्या पुराणप्रिय देशात अंमल गाजवू लागल्यानंतर गेल्या म्हणजे इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून अशा ह्या प्रयत्नास सुरूवात झाली. केवळ कालानुक्रमाप्रमाणे पाहिल्यास भारतीय अस्पृश्योद्धारकांमध्ये श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाडांचा नंबर तिसरा लागतो. पहिल्या अस्पृश्योद्धारकाचा मान महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना, दुसरा मान बंगाल्यातील ब्राह्मसमाजाचे प्रसिद्ध परोपकारी गृहस्थ बाबू शशिपाद बानर्जी ह्यांना आणि तिसरा मान आमचे लेखनायक गुर्जराधिपती श्रीमंत महाराजांकडे जात आहे. फुले ह्यांचे प्रयत्न इ. सन १८५२ साली, बानर्जींचे प्रयत्न १८६५ आणि महाराजांचे प्रयत्न १८८३ साली म्हणजे त्यांना राज्याचे अधिकार मिळाल्यावर दुस-या, तिस-या वर्षापासूनच सुरू झाले.

पहिले फुले व्यक्तिश: गरीब व जातिश: मागासलेल्या वर्गातले; दुसरे बानर्जी व्यक्तिश: संपन्न व जातिश: उच्च वर्णातले होत व तिसरे महाराज सर्वतोपरी थोर स्थितीतले आहेत. पहिल्या दोन व्यक्ती दिवंगत झाल्या. तिसरे आमच्या सुदैवाने अद्यापि धडधाकट व पूर्णपणे कार्यक्षम स्थितीत आहेत. ह्यामुळे कार्याच्या प्रमाणाच्या व सिद्धीच्या दृष्टीने पाहताना वरील दोघांपेक्षा महाराजांचे काम इतके विस्तीर्ण व परिणामकारी झाले आहे की, ह्या तिघांच्या कार्याची तुलना करणेच व्यर्थ आहे, इतकेच नव्हे, अगदी देशभर फोफावत आहे व जिची पाळेमुळे खाली खोल शिरत आहेत, त्या चळवळीची धुराही महाराजांनी सतत आपल्या खांद्यावर घेऊन अगदी अग्रगण्य पुढा-यांतील आपले प्रमुख स्थान कायम राखले आहे. ह्या दृष्टीने पाहता महाराज म्हणजे नुसते एका मोठ्या संस्थानाचे सर्वाधिकारी, अधिपती म्हणूनच नव्हे तर अखिल भारतातील लोकमताचे नेते, समाजसुधारक आणि राजकारणकुशल मुत्सद्दी, इतकेच नव्हे तर आपल्या दोस्त इंग्रज सरकारानाही पदोपदी धडे शिकविणारे अनुभवी सत्ताधारी म्हणून जगापुढे झळकत आहेत.

इ. स. १९१८ साली आमच्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची मुंबईस एक खास अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषद भरली; तिचे अध्यक्ष श्रीमंत महाराजच होते. त्यांचे अध्यक्षीय भाषण झाले ते ह्या विषयावरील एक महत्त्वाचे वाड़मय झाले आहे. त्यांचे भाषण आटोपल्यावर त्यांचे दिवाण मनुभाई मेथा ह्यांनी बडोदे संस्थानात अस्पृश्यांसाठी तेव्हापर्यंत काय काय केले ह्याच्या संक्षिप्त माहितीचा एक खर्डा माझ्या हाती दिला. त्यात म्हटले होते की, श्री. महाराजांनी इ. स. १८८२ सालीच ही सुधारणा आपल्या राज्यात सुरू करून लवकरच निरनिराळ्या भागांत १८ शाळा ह्या अंत्यज लोकांसाठी उघडल्या. शाळांची ही संख्या वाढत १८९६ साली २० झाली. सन १८८२ साली ह्या कामात हात घालताना महाराजांचे वय अवघे २० वर्षांचेही नव्हते. दुस-या कोणत्या संस्थानिकाचे लक्ष इतक्या कोवळ्या वयात ह्या हतभागी लोकांच्या दीन स्थितीकडे गेले असेल बरे? प्रत्यक्ष ब्रिटिश इलाख्यात तरी त्यांच्या शिक्षणाची सोय अशा कळकळीने व इतक्या प्रगतीने झाली आहे काय? इतर संस्थानांतून जी थोडीबहुत अशी अपूर्व कृत्ये होतात, त्यांचे श्रेय एखाद्या प्रागतिक दिवाणाकडेच  असते. पण ह्या महाराजांची गोष्ट तशी नाही. ह्यांनी वरील परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले, “मला ह्या कामी अनेक अडचणींशी झगडावे लागले. कितीही पगाराचे आमिष दाखविले तरी कित्येक वर्षे हिंदू शिक्षकच मिळेनात.” मुसलमानांकडून व नंतर आर्यसमाजिस्टांकडून हे काम करून घ्यावे लागले.

ह्या अत्यंत कठीण सुधारणेत महाराजांनी अपूर्व यश संपादन केल्याबद्दल सन १९२१ साली परोपकारी सभा नावाच्या एका संस्थेचे महाराजांना पतितपावन अशी पदवी दिली. त्यावेळी उत्तरादाखल केलेल्या भाषणात महाराज म्हणाले, “ह्या पदवीला मी पात्र आहे, असे मला तरी वाटत नाही. उलट माझ्यावर ह्या पदवीमुळे एक अवघड जबाबदारी लाधली जात आहे. त्या क्षेत्रात मी एकटाच खपत आहे, असे नसून इतर जे कोणी आहेत, त्यांच्याकडेही हा मान जातो. राज्याच्या काळजीमुळे व परिस्थितीमुळे ह्या कामी मला जितके करावयाचे होते तितके माझे हातून घडले नाही. माझे अधिकारी मला जे सांगतात त्यावर मला अवलंबून रहावे लागते, आणि ते जे करतात त्यावरच तृप्त रहावे लागते. मानवी प्रयत्नाला मर्यादा असतात, विशेषत: हिंदुस्थानातील राजे लोकांना, ते सर्वाधिकारी असूनही ह्या मर्यादा भोवतात!” अशा अस्पष्ट उदगारावरून अवघ्या १९ वर्षांच्या तरूण महाराजांना ह्या नवीन सुधारणेची मेढ रोवताना अधिका-यांकडून व लोकांकडून पाठिंबा किती मिळाला व अडथळे किती आले ह्याची अंधुक कल्पना वाचकांनीच करावी. महाराजांनी विद्वान व प्रागतिक अधिकारी वेळोवेळी हाताशी धरले खरे, पण महात्मा गांधीसारख्या वृद्ध देवमाणसाला ज्या गुजरात देशाने थोड्याच वर्षापूर्वी अस्पृश्यांच्या बाबतीत जुमानले नाही, त्या देशातील लोकमत ५० वर्षांपूर्वी ह्या अनुभवी तरूण राजाला अगदी सतावून सोडल्याशिवाय राहिले असेल हे संभवत नाही. काहीही असो, ह्या सत्कार्याची मेढ तर या खंबीर पुरूषाने पहिल्या धडाक्यासरशी रोविली तिचा विस्तार पुढे कसा झाला ते आता पाहू.

बडोदे संस्थानाच्या सन १९३१ सालच्या खानेसुमारीच्या हवालात अस्पृश्यांची संख्या खालीलप्रमाणे दिली आहे:-

अ.क्र.
जात
लोकसंख्या
१ भंगी
३१,०१८
२ बुरूड व वासफोडो   ४७८
३ चांभार
   ४२,८०२
४ गरोडा
७,७९६
५ होलार  
५४
६ महार
५७२
७ मांग 
३७
८ नाड्या
६२२
९ शेणवा ९,६४३
१० थोडी ५६
११ तुरी १,७११
१२ वाकर व धेड
१,०७,९८८
  एकूण २,०२,७७७

एवढी मोठी अस्पृश्यांची संख्या राज्याच्या दूरदूरच्या भागांत पसरलेली पाहून महाराजांच्या मनात त्यांच्याविषयी कळवळा आला असेल ह्यात काय नवल? ह्या लोकांसाठी महाराजांनी शाळा काढल्या ‘व सन १८९१-९२ साली बडोदे, अमरेली, पाटण आणि नवसारी येथे वसतिगृहे काढून त्यांच्या जेवण्याखाण्याची व राहण्याची सोय केली. त्यांना कपडेलत्ते, पाट्यापेन्सिली व पुस्तके पुरविण्याचा उपक्रमही महाराजांनी सुरू केला. मुंबई सरकारने पुण्यास एक वसतिगृह उघडले ते ह्यानंतर ३० वर्षांनी म्हणजे सन १९२२ साली! वरील चार वसतिगृहांमुळे अंत्यज वर्गांना उत्तेजन मिळून पुढील ५-६ सालांत शाळांतून शिकणा-या मुलांची संख्या दुपटीने वाढली. ह्या काळी दरवर्षी अंत्यजांचे एक दोन विद्यार्थी गुरजराथी ६ व्या इयत्तेच्या परीक्षेला बसत असत. ह्यानंतर कित्येक वर्षे ह्या प्रयोगाला दुष्काळ आणि प्लेगची मोठी विघ्ने आली. ह्या कंगाल लोकांना हातावर पोट भरावयाचे असते. त्यामुळे मुलांना शाळेला पाठवावयाला त्राण उरेना. ह्यात हिंदू अधिका-यांच्या सहानुभूतीच्या अभावाचीही भर पडली. अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागत नाही अशी हूल उठविण्यात आली. शेवटी ही वसतिगृहे बंद ठेवावी लागली. तरी पण श्री. महाराजांनी खर्चात बचत न करता, बडोदे भागात रूपये ४० च्या व इतर भागात रू. २५ च्या शिष्यवृत्त्या ठेवल्या  कसेही करून इ. स. १९०० सालापासून पुढे काही वर्षे शाळांतून ह्या विद्यार्थ्यांची संख्या सरासरीने एक हजारापासून दीड हजार राहील असे केले.

इ. स. १९०३ सालच्या सप्टेंबर अखेर ऑक्सफोर्ड विद्यालयातील धर्मशिक्षण संपवून मी स्वदेशी आलो. महाराज साहेबांनी मला लगेच भेटीला बोलाविले आणि बडोदे शहरातील अंत्यजांच्या त्यावेळी ज्या चार शाळा ब-या चालल्या होत्या त्या तपासून मला काय वाटते ते समक्ष कळविण्याची आज्ञा केली. ह्या शाळांतून शिकून पास झालेली मुले कामाच्या अभावी रिकामी हिंडतात. त्यांना काही योग्य नोक-या देण्याची व्यवस्था होईल काय? असे मी महाराजांना विचारले, पण ते त्या काळी गुजराथसारख्या प्रांतात शक्य नव्हते. मात्र अशा मुलांना अधिक शिष्यवृत्त्या देऊन वरिष्ठ शिक्षणाकडे पाठविण्याचे महाराजांनी कबूल केले. एकंदरीत ह्या थोर पुरूषाच्या अंत:करणात ह्या हतभागी लोकांचा ध्यास सतत लागला होता, हे माझ्या ध्यानात तेव्हाच येऊन चुकले. इतकेच नव्हे तर ह्या महत्त्वाच्या विषयासंबंधी माझ्या स्वत:च्या विचाराला नवीन प्रोत्साहन मिळून ब्राह्म समाजाच्या अखिल भारतातील माझ्या प्रचारकार्याबरोबर ह्या लोकांची निरनिराळ्या प्रांतातील स्थिती स्वत: डोळ्यांनी निरखून अजमावण्याची मलाही प्रेरणा झाली.

इ. स. १९०४ च्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मुंबईस राष्ट्रीय परिषदेचे अधिवेशन झाले. त्याचवेळी मुंबईत भरलेल्या सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान श्री. महाराजांनी स्वीकारले. इतकेच नव्हे तर ह्या समारंभाचे शेवटी रात्री आमच्या राममोहन आश्रमात सर्व जातींचे मोठे सहभोजन झाले. त्याचे अध्यक्षही महाराजाच होते. त्या बक्षिस समारंभात चांभार जातीच्या एका लहान मुलाने धिटाईने भाषण केले व ज्याचे महाराजांनी आपल्या भाषणात प्रेमाने अभिनंदन केले तोच मुलगा रा. शिवतरकर हल्ली डॉ. आंबेडकरांचा सेक्रेटरी होऊन त्यांच्या स्वजातीच्या उन्नतीच्या कार्यात मदत करीत आहे. स्वत: डॉ. आंबेडकरांना तर महाराजांचा फारच मोठा आश्रय होता. ते बडोदे कॉलेजातून बी. ए. झाल्यावर त्यांना बडोदे संस्थानच्या धारासभेत सभासद नेमले. नंतर लवकरच पुढील शिक्षणासाठी बरीच वर्षे पुष्कळ खर्च करून त्यांना अमेरिकेत ठेवले होते. तेथून पी एच्.डी. होऊन आल्यावर काही दिवस बडोद्यात डॉ. आंबेडकरांनी नोकरीही केली आहे.

वरील सामाजिक परिषदेचा महाराष्ट्रावर व विशेषत: पुण्यातील कार्यकारी पुढा-यांवर जसा शुभ परिणाम झाला, तसाच महाराजांच्या उत्साहशक्तीवरही झालेला दिसतो. लगेच दोन तीन वर्षांत पुणे, मुंबई येथे सर्व्हंट्स् ऑफ इंडिया सोसायटी, सोशल सर्व्हीस लीग, सेवासदन, डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियासारख्या अखिल हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनावर परिणाम करणा-या संस्थांचा उद्भव झाला. ह्याच सुमारास महाराजांनी आपल्या राज्यात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा धडा इतर लहान मोठ्या संस्थांनासच नव्हे तर प्रत्यक्ष इंग्रज सरकारासही घालून दिला. बडोद्याच्या इतिहासात हे साल सोन्याच्या अक्षरांनी लिहिले जाईल. बडोद्यास सक्तीच्या शिक्षणाचे प्रस्थान मांडल्याबरोबर उसळीसरशी अंत्यज शाळांची १८ ची २४७ आणि विद्यार्थ्यांची संख्या २००० ची ९२६९ झाली. बंद केलेल्या वसतिगृहांची पुन: गरज भासू लागली आणि एकंदर ह्या वाढलेल्या वाचकांकरिता एका तरबेज आणि वाहून घेतलेल्या कार्यवाहकाची खास निवड करावी लागली आणि लवकरच अंत्यजांच्या सुदैवाने पंडित आत्माराम हे ह्या कार्यास लाभले. १९०७-८ च्या सुमारास बडोद्यास हल्ली असलेले व अखिल भारतात नमुनेदार झालेले अंत्यज विद्यार्थी वसतिगृह उघडण्यात येऊन पंडितजींना त्या गृहाचे सुपरिंटेंडेंट व बडोदे राज्यातील अंत्यज शिक्षणाचे इन्स्पेक्टर नेमण्यात आले.

ह्यापूर्वी एक दोन वर्षे मुंबईस आमच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ् इंडिया ह्या संस्थेची स्थापना ता. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी झाली व प्रांतोप्रांती तिच्या शाखा निघू लागल्या. दरवर्षी जेथे जेथे काँग्रेसची अधिवेशने होत, तेथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषदेचीही अधिवेशने होऊ लागली. सुरतच्या काँग्रेसच्या वेली सन १९०७ साली असेच एक अधिवेशन भरविले होते. महाराजांचे लक्ष आपल्याच राज्यातील अस्पृश्यांकडे लागले होते असे नसून ते अखिल भारताचे एक अग्रगण्य पुढारी असल्यामुळे ते आमच्या ह्या मिशनची प्रगती मन लावून निरखीत होते. म्हणून ह्याच सुमारास त्यांनी मला बडोद्यास बोलाविले. बडोद्याचे न्यायमंदिराच्या भव्य दिवाणखान्यात एक जंगी दरबारवजा जाहीर सभा बोलावून स्वत:च्या अध्यक्षत्वाखाली त्यांनी माझे अस्पृश्योद्धार ह्या विषयावर एक व्यख्यान करविले. हेच व्याख्यान मला पुढे लिहून काढण्यास सांगून ते स्वतंत्र पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचाही खर्च दिला. बहिष्कृत भारत ह्या नावाने ते प्रसिद्ध झाल्यावर त्याच्या १००० प्रती बडोदे सरकारने विकत घेऊन वाटल्या. ह्याचप्रमाणे पंडित सातळेकर ह्यांनी केलेल्या स्पर्शास्पर्श ह्या पुस्तकालाही महाराजांची मोठी मदत झाली आहे. अर्थात ह्या सर्व गोष्टींचा परिणाम बडोद्यातील कार्यावरही होऊ लवकरच पंडित आत्माराम ह्यांच्या देखरेखीखाली कार्यास मोठा जोर आला.


इ. स. १९०९ साली महाराजांचा मुक्काम पुणे, मुंबईकडे झाला. त्यावेळी सप्टेंबर महिन्यात आमच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या पुणे शाखेच्या शाळांच्या बक्षिस समारंभाचे आणि मुंबईतील टाऊनहॉलमध्ये ता. १८ ऑक्टोबर रोजी भरलेल्या आमच्या मिशनच्या भ्रातृसंस्थेच्या वाढदिवस समारंभाचे महाराजच अध्यक्ष झाले. ह्या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १००० रूपये व २००० रूपयांची देणगी देऊन महाराज मिशनचे आश्रयदाते झाले. श्री. सयाजीराव गायकवाड स्कॉलरशिप फंड नावाने अद्यापि ह्या फंडाच्या व्याजातून आमच्या शाळांतील विद्यार्थ्यांना नियमित रीतीने शिष्यवृत्या दिल्या जात आहेत. शिवाय आमच्या वसतिगृहातील रा. भटकर नावाच्या एक महार विद्यार्थी मॅट्रिक परीक्षेत पास झाल्यावर त्याला कॉलेजातील पुढील शिक्षणासाठी दरमहा रू. २५ स्कॉलरशिप दिली. पुण्यातील बक्षिस समारंभाचे वेळी पुणे शहर व लष्कर येथे राहणा-या निरनिराळ्या अस्पृश्य वर्गांतील लोकांनी आपसात वर्गणी करून महाराजांच्या अस्पृश्योद्धारक कार्याचा जाहीर गौरव करण्यासाठी एक मानपत्र अर्पण केले. त्यावेळी महाराजांच्या दर्शनासाठी लहान थोर स्त्री-पुरूषांची अलोट गर्दी जमली होती. निरनिराळ्या अस्पृश्यवर्गीय स्त्रियांनी जुन्या रिवाजाप्रमाणे आरती करून महाराजांना मोठ्या प्रेमाने ओवाळिले. महाराजांनीही परत भेट म्हणून आरतीत ५/५ सोन्याच्या मोहरा ठेवून आपली गोड समयज्ञता प्रकट केली. तो एकंदर देखावा अत्यंत हृदयस्पर्शी झाला.

हा समारंभ आटोपून महाराजसाहेब परत बडोद्यास गेल्यावर लगेच पुणे येथील महार समाजाचे प्रमुख पुढारी रा. शिवराम जानबा कांबळे व रा. श्रीपतराव थोरात ह्या दोघांना महाराजांनी बडोद्यास खास आमंत्रण देऊन नेले व त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांचा योग्य सत्कार केला व त्यांना उघड रीतीने रामहालात आमंत्रण करून आपल्या टेबलावर सहभोजन केले.

ह्यापुढे ९ वर्षांनी सन १९१८ साली मुंबई येथे आमच्या मिशनची अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद झाली. तिचे अध्यक्ष होऊन महाराजांनी ह्या राष्ट्रकार्यास पुन: नवीन चैतन्य दिले.

अंत्यज वर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता नुसत्या शाळा आणि वसतिगृहे स्थापून महाराज स्वस्थ बसले नाहीत. बडोदा येथील वसतिगृह ही एक अखिल भारतात नमुनेदार संस्था आहे, हे वर सांगितलेच आहे. हा प्राचीन गुरूकुलाच्या धर्तीवर एक पुण्याश्रम आहे. पंडित आत्माराम ह्या आश्रमातच राहत असतात. त्यांच्या मुलांनाही वडिलांचेच समाजसेवेचे वळण लागले आहे. येथील विद्यार्थ्यांच्या (मुलांची वेगळी व मुलींची वेगळी) भोजनाची, स्नानाची, अभ्यासाची व व्यायामाची अगदी उच्चवर्णीयांप्रमाणेच उत्तम सोय केलेली आहे. गुजरातेतील अंत्यज सर्व आपापली धार्मिक गृहकृत्ये आपल्या जातीतल्याच पुरोहिताकडून करून घेतात. त्यांना गरोडा म्हणतात. ह्या गरोड्यांकडून धर्मकृत्ये योग्य रीतीने व्हावी म्हणून त्यांच्यासाठी एक संस्कृत शाळा काढण्यात आली आणि तीत २५ गरोडा विद्यार्थ्यांना दरमहा रूपये ८ च्या स्कॉलरशिपा देऊन तयार करण्यात आले. वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना वेदमंत्रासह नित्याची उपासना करण्यास शिकविण्यात येते. शिवाय त्यांची दोन बालवीर पथके आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेली आहेत. एकंदरीत हा आश्रम पाहणा-यावर फार उदात्त परिणाम होतो. ह्या देशातील व बाहेरील पुष्कळ प्रसिद्ध पुरूषांनी हा आश्रम समक्ष पाहून आश्चर्य प्रकट केले आहे. कलकत्त्याचे प्रसिद्ध कोट्याधीश रा. ब. जुगलकिशोर बिर्ला ह्यांनी ह्या आश्रमास १९१९ च्या नोव्हेंबरमध्ये भेट दिली; तेव्हा आश्रमातील स्वच्छता आणि विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणविषयक पात्रता पाहून त्यांच्यावर इतका परिणाम झाली की, त्यांनी विद्यार्थ्यांना गीता शिकविण्यासाठी व शिष्यवृत्त्या देण्यासाठी रू. १५,००० ची देणगी दिली. ह्या देणगीतून विद्यार्थ्यांच्या खास परीक्षा घेऊन त्याप्रमामे शिष्यवृत्या देण्यात येतात. ह्या आश्रमाला श्री. महराजांची वरचेवर भेट असते. सन १९१० जानेवारी २३ रोजी बडोद्यातील सर्व अस्पृश्य विद्यार्थ्यांना मोतीबागेतील राजवाड्यात समक्ष जमवून त्यांनी मोठी थाटाची मेजवानी दिली. पुन: १९१२ साली अस्पृश्यांच्या सर्व मुलांना लक्ष्मीविलास राजवाड्यात जमवून खाऊ वाटला. त्यावेळी इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर पाहुणे आले होते. त्यांना हा प्रकार फार आवडून त्यांनी स्वत: १००० रूपये शिष्यवृत्त्यांसाठी दिले.

खालील कोष्टकावरून बडोद्यातील अंत्यज शाळांची कशी प्रगती झाली हे दिसून येईल.

वर्ष मुलांच्या शाळा मुलींच्या शाळा एकंदर शाळा
विदयार्थी
१८८३     २  
१८८४     ९  
१८९१     १० ७८४
१९००     २२ १,७२६
१९१०-११   ४ २८८ १५,५४१
१९२०-२१ २२२ २५ २२६ १२,०९५
१९२५-२६ २२० ५ २२५ १५,४०३
१९३०-३१ १९९ २ २०१ १८,३८८
१९३१-३२ ९० १ ९१ २०,९०३*
*स्वतंत्र शाळा बंद.

वर जी इ. स. १८८३ पासून १९३२ अखेर शाळांच्या व विद्यार्थ्यांच्या संख्येत एकंदरीत प्रगती दाखविली आहे तिच्यात मधून मधून चढउतार दिसत आहे. बडोदे राज्यातील अंत्यजांची एकंदर लोकसंख्या वर दर्शविल्याप्रमाणे २,०२,७७७ आहे. त्यापैकी आजतागायत प्राथमिक शाळांत शिकणा-या एकंदर मुलांची संख्या २०,९०३ आहे.

गेल्गा वर्षापासून अस्पृश्यांकरिता स्वतंत्र निराळ्या शाळा नसाव्यात अशी विद्या खात्याने आपल्या धोरतात दुरूस्ती केल्याचे समजते. ही दुरूस्त होऊन अस्पृश्यांच्या स्वतंत्र ११० शाळा गेल्या वर्षात कमी केल्या गेल्या. तरी गेल्या वर्षी मुलांच्या संख्येत २,५१५ वाढच झाली आहे. ती खरे व टिकाऊ असल्यास ही दुरूस्ती वावगी नाही.

कलाभुवन, ट्रेनिंग कॉलेज, हायस्कुले व कॉलेजे ह्यांतून अस्पृश्यांना शिकण्यास सर्रास मोकळीक होऊन बरीच वर्षे झाली आहेत, तरी पण पदवीधरांची संख्या ११२ हून जास्त आढळत नाही. पण सबंध मुंबई इलाख्यात तरी आज सर्व अस्पृश्य वर्गाच्या पदवीधरांची संख्या ६ वर कोठे गेली आहे? अशा स्थितीत बडोद्यासच नाव कोण ठेवू शकेल? हल्ली हायस्कुलात १५०, कलाभुवनात १५, ट्रेनिंग कॉलेजात १७ मुले शिकत आहेत. दुय्यम शिक्षणार्थ एकंदर ३६ स्कॉलरशिपा आहेत. बडोदे राज्यात सर्व अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षण मोफतच मिळते.

पहिली १०/१२ वर्षे अस्पृश्य वर्गांना शिकविण्याला हिंदू शिक्षकच मिळत नसत. कितीही पगार घेऊन एकादा हिंदू मिळाला तरी तो टिकून रहात नसे. म्हणून अशा शाळांत मुसलमान शिक्षकावर काम भागवावे लागे. असे स्वत: महाराज साहेबांनाच एका संमेलनात उघड सांगावे लागले. पण आता ही स्थिती पालटून हल्ली १६६ अंत्यज वर्गाचेच शिक्षक विद्या खात्यात अध्यापनाचे पवित्र काम करीत आहेत, ही गोष्ट खरोखर महराजांना भूषणावह आहे.

इ. स. १९३२ साली बडोदे राज्यातील २४ खेड्यांत २४ निरनिराळ्या सहकारी पतपेढ्या ३६० अस्पृश्यवर्गीय सभासदांच्या फायद्यासाठी काम करीत होत्या, अशी मला माहिती मिळालेली आठवते. त्यास दरमहा ४ आणे व्याजाने थकलेल्या कर्जफेडीसाठी शेतकीची आउते घेण्यासाठी व हातमाग खरेदी करण्यासाठी रकमा कर्जाऊ देण्यात आल्या.

बडोदे, आमरेली, पाटण, नवसारी येथील चार बोर्डिंगांतील सर्व मुलींना शिवणकाम, कशिदा व स्वयंपाक शिकविण्यात येतो. इ. स. १९१९ साली ह्या बोर्डिंगातील १७ वर्षांच्या एका अनाथ मुलीचा विवाह एका उच्चवर्णीयाशी करून देण्यात आला. तेव्हा दरबाराकडून रू. ३० ह्या वधूला स्त्री-धन म्हणून देण्यात आले.

बडोदे राज्यातील सर्व दवाखाने, कोर्टे, इतर सरकारी कचे-या व ग्रंथालये सर्व अस्पृश्यांना सर्वदा मोकळी झाली आहेत. धारासभेतून अस्पृश्य प्रतिनिधीची मधून मधून नेमणूक होते. मुलकी खात्यात एक पदवीधर व कितीतरी कारकून राजरोस सर्वांबरोबर बसून कामे करीत आहेत.

हल्ली दुमदुमत असलेल्या मंदिर-प्रवेशाच्या दंगलीत ह्या पतितपावन महाराजांनी आघाडी मारून सरशी मिळविली आहे. हल्लीची मंदिर-प्रवेशाची चळवळ सुरू होण्यापूर्वीच त्यांनी आपले खंडेरावाचे मंदिर अस्पृश्यांस खुले केले होते, आणि गेल्या ऑक्टोबर महिन्यात तर सर्व हिंदू धर्मीयांस जातगोत मनात न आणता सरकारी देवळातून प्रवेश करू द्यावा व तसे करण्यास खासगी देवळाच्या मालकांची मने वळवावी, कारण परमेश्वर सर्वांवर सारखेच प्रेम करतो, अशा आशयाचा श्री. महराज साहेबांनी लोझानहून तारेने हुकूम पाठविला. ह्या विरूद्ध काहींनी चळवळ चालविली असली तरी तिला मुळीच जोर नाही. ब्रिटिश हिंदुस्थानातून सध्या चालू असलेल्या मंदिर-प्रवेशाच्या चळवळीस तेथील सनातनी मंडली जोराने विरोध करीत आहेत, पण तितका तीव्र विरोध बडोद्यास नाही असे समजते. सत्कार्य म्हटले म्हणजे त्यात विघ्नेही यावयाचीच. पण त्यामुळे घाबरून न जाता, संकटे ही कार्यसिद्धीची मापेच होत अशी मनात खूणगाठ बांधून समाजधुरीणांनी आपले लोकशिक्षणाचे व लोकोन्नतीचे कार्य सतत करीत राहिले पाहिजे. महराजांनी असे केले व म्हणूनच आज त्यांना अस्पृश्योद्धाराच्या ह्या पुण्यकार्यात अपूर्व यश मिळविता आले.

असो, “परगुणपरिमाणून पर्वतीकृत्य नित्यं| निज-हृदि विकसन्त: सन्ति सन्त: कियन्त:” || ह्या कोटीतील ह्या महान संतास दीर्घायु व पूर्ण आरोग्य लाभो आणि त्यांच्याकडून अस्पृश्यांचा कायमचा उद्धार होवो अशी परमेश्वराजवळ नम्रतापूर्वक मागणी करून मी हा अल्पलेख पुरा करितो.

श्री. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, बडोदे येथील तत्त्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष

[बडोदे येथील साहित्य संमेलनात तत्त्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष-संक्षिप्त लेख]  

महाराष्ट्रात हल्ली साहित्यसेवेच्या नावाने निदान दोन तरी मध्यवर्ती संस्था आणि तिच्या शाखा काम करीत आहेत. त्या: (१) साहित्य संमेलन व (२) साहित्यपरिषद, पण एकीचेही काम पद्धतशीर व समाधानकारक चालत नाही, असे ज्यांना तज्ञता व अनुभव आहे अशा साहित्यसेवकांना वाटू लागले आहे. त्याचे कारण एकीचा हेतू केवळ करमणूक म्हणजे समारंभ हा, दुसरीचा गंभीर म्हणजे संशोधन आणि स्वतंत्र ग्रंथनिर्मिती हा. हे दोन्ही हेतू फार महत्त्वाचे आहेत, ह्यात संशय नाही. पण ते इतके भिन्न आहेत की त्यांची जबरीची सांगड बांधल्याने दोन्ही साधेनात. समारंभाचे कार्य मात्र जास्त जोराने चालले आहे. कारण त्यात स्त्रियांची व तरूणांची करमणूक होते म्हणून सालोसाल गर्दी अधिकाधिक जमते. पण तितक्याच प्रमाणात परिषदेचे किचकट काम मागे पडत चालले आहे, हे कोणाचे लक्षात येत नाही. ह्या वर्षी बडोद्यात पुन्हा ह्या दोन्ही उद्देशांना व कार्यांना एकाच साखळीत जखडण्याचा वरवर स्तुत्य पण वस्तुत: अव्यवहारी प्रयत्न करण्यात आला. पण ती एकत्र सुखाने नांदणार  नाहीत, असेच अनुभवास येईल.

समारंभाचे कार्य चांगले यशस्वी चालले आहे, ह्यात कोणालाही आनंदच मानावयास जागा आहे. काव्यगायन, फोटो, सहभोजन, सहल करणे वगैरे सोहाळे सर्व जातींचे स्त्रीपुरूष, तरूण, पोक्त चार दिवस एकत्र होऊन उपभोगतात ह्याचा इष्ट परिणाम वाड़मयावर-निदान ललित वाड़मयावर तरी झाल्याशिवाय राहाणार नाही. पण इतिहास, तत्त्वज्ञान, व्युत्पत्ती शास्त्र, व्याकरण अनेक विज्ञाने ह्याची वाट काय? जणू काय ह्यांची गणना साहित्यात होतच नाही, अशा वृत्तीमुळे त्यांची कुचंबणा चालली आहे. ह्यावर्षी बडोद्यात ८-९ विभाग करण्यात आले, पण नुसत्या अध्यक्षीय भाषणांनाही वेळ व स्थळ मिळाले नाही. स्वत: मजकडे आलेल्या तत्त्वज्ञान व समाजशास्त्र ह्या विषयावर एकही निबंध लिहून आला नाही. सेक्रेटरींनी आयत्या वेळी एक खास सर्क्युलर फिरविले, तरी नुसते आयत्यावेळचे वक्तेही मिळाले नाहीत. इतर विषयांचेही जळजवळ हेच हालच झाले. म्हणून काही विभागाच्या अध्यक्षांनी काही महत्त्वाचे ठराव समग्र बैठकीत कसेबसे पास करून घेतले. पण अशा ठरावाने काय लाभणार? अश्लील वड़मयासंबंधी चर्चा केव्हा पुढे येईल, आणि त्यावर वक्तृत्वाचे फवारे केव्हा सोडू व सोडलेले पाहू, अशी ज्या समुदायास तळमळ लागली होती, त्याने वरील कार्यप्रेरक ठराव पास केले काय, न केले काय, सारखेच नव्हे काय? माझी मुळी अपेक्षाच नव्हती, मग निराशा झाली, असे तरी कसे म्हणू?

साहित्यपरिषदेचे महत्त्व मी पूर्णपणे जाणून आहे. तिची घटना वेगळीच झाली पाहिजे. पण तिचेमुळे समारंभात विघ्न आणणे शहाणपणाचे मुळीच होणार नाही. समारंभाची आगबोट जोरात चालली आहे. म्हणून तिचे शेपटीला परिषदेची चिमुकली नाव अडकवणे हेही पण शहाणपणाचे होणार नाही. पूर्वी नाताळात काँग्रेसच्या बैठका जोरात भरत, त्या वेळच्या तमासगिरांच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी इतर लहान मोठ्या परिषदांचे चालकही ह्या मुहूर्तावर आपले कार्य उरकून घेत असत. पण त्यांना काय यश आले बरे? आता काँग्रेसचे स्तोम बंद झाले तर ह्या सटरफटर परिषदांची पाले केव्हाच दिसेनाशी झाली ना? अशीच गत साहित्य परिषदेची न होवो.

माझी नम्र सूचना मला आलेल्या अनुभवावरून एवढीच की, साहित्यपरिषदेचे काम असे काही शिळोप्याचे नाही, की एकाद्या संमेलनाच्या मागील दालनात बसून उरल्यासुरल्या वेळात, आल्या गेल्यांनी ते उरकून टाकता येईल त्या सभेस तज्ज्ञांनी यावे. त्यांना धनिकांचा व इतर देशभक्तांचा पाठिंबा असावा. प्रत्यक्ष काम जरी तज्ज्ञाचेच असले तरी त्याचा पुरस्कार व नियंत्रणे व्हावे म्हणून इतर योग्य व समर्थ माणसांची योजना निरनिराळ्या समित्यांवर अवश्य व्हावी.

हा लेख अगदी संक्षिप्त प्रमाणात मागण्यात आल्याने ह्यापेक्षा अधिक विस्ताराला जागाच नाही.

  1. शिवाजी की रामदास?
  2. शास्त्र आणि तत्त्वज्ञान-२
  3. शास्त्र आणि तत्त्वज्ञान-१
  4. शासनयोग
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
Page 5 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी