1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मंगलोर ब्राह्म समाज

डॉ. ड्रमंड  :   मी ता. ४ फेब्रुवारी १९२४ ला कलकत्त्याहून पुण्यास आलों.  ठरल्याप्रमाणें डॉ. ड्रमंड देखील अहल्याश्रमांत माझे पाहुणे म्हणून आले.  ते आठ दिवस मजबरोबर होते.  ह्या वेळीं पुढील गोष्ट घडली.  कर्नल एच. सी. स्टीन नांवाचे एक लष्करी अधिकारी पुणें शाखेचे दरसाल १०० रु. देणारे प्रथमपासूनच मेंबर होते.  पुणें शाखेचें मीं काम सोडल्यावर ते त्या शाखेचे अध्यक्ष म्हणून अद्यापही काम करीत आहेत.  माझे पाहुणे डॉ. ड्रमंड ह्यांचा कर्नल स्टीनशीं परिचय होता म्हणून कर्नल स्टीननीं डॉ. ड्रमंड यांना पुणें लष्कर येथील वेस्टर्न इंडिया क्लबमध्यें एक दिवस जेवायला नेलें.  रात्रीं जेवणाचे वेळीं विवक्षित पोषाख घालायला असा जो युरोपियन सभ्यतेचा प्रघात आहे तो पोषाक त्या वेळीं ह्या दोघांच्याही अंगावर नव्हता.  जो पोषाख होता तो सभ्य तर्‍हेचा होता.  तथापि ठराविक आढ्यतेच्या सांचाचा तो नव्हता.  म्हणून क्लबच्या मॅनेजरानें नेहमींच्या टेबलावर जेवणाची त्यांना परवानगी दिली नाहीं.  दुसर्‍या एका खोलींत कोपर्‍यांत ठेवलेल्या टेबलावर कसें तरी जेवायला घालून त्यांची बोळवण केली. हा फाजील गौरव पाहून डॉ. ड्रमंडना फार वाईट वाटलें असें त्यांनीं मला सांगितलें.  यःकश्चित् पोषाखाच्या बाबतींत जर अस्सल युरोपियनांस अशी गचांडी बसते तर राजकीय हक्कासंबंधीं भांडत असतां अत्यंत प्रतिष्ठित हिंदु लोकांचा युरोपियनांकडून कसा उपमर्द होत असावा याची कल्पना डॉ. ड्रमंडनीं करावी असें मीं त्यांना सुचवलें.  पुढें वेळोवेळीं राजकारणाचा वाद निघे तेव्हां डॉ. ड्रमंडचें व माझें एकमत होईना.  साहजिकच आहे.  ज्याच्या पायांत जोडा त्याला खिळा टोंचतो.  म्हणून आम्ही राजकारणावर अतःपर बोलूं नये असें ठरलें.  आम्ही धर्मबंधु असलों म्हणून राजकारणबंधु थोडेच होणार !  हिंदुस्थानांतील आम्ही काळे लोक राजकारणांत एक होऊं शकत नाहीं, मग नुकतेच बाहेरून आलेल्या गोर्‍यांशीं आमचें एकमत कसें होणार ?

मंगलोरचें स्वागत  :   बंगलोर, मद्रास, कोकोनाडा, पीठापूर, कोइमतूर, कालिकत, मंगलोर वगैरे ठिकाणीं फिरून तेथील परिस्थिति डॉ. डमंडला कळवून त्यांना पाठवून देण्यांत आलें आणि मी मुंबईला आलों.  मुंबईस माझे कनिष्ठ बंधु एकनाथराव यांचेकडे माझी पत्‍नी व दोन मुलें यांस ठेवून, भगिनी जनाबाई व धाकटा मुलगा चि. रवींद्र यांस घेऊन एप्रिल महिन्यांत १९२४ त मंगळूरला आलों.  हिंदुस्थानच्या नैर्ॠत्य किनार्‍यावर कानडा भागांत कानडी भाषा चालू आहे.  मद्रास इलाख्याकडील हा शेवटचा कानडी जिल्हा होय.  ह्या जिल्ह्याच्या दक्षिणेस ब्रिटिश मलबार (कालिकत जिल्हा) आणि त्याच्या दक्षिणेस त्रावणकोर व कोचीन ह्या दोन संस्थांचा अस्सल मलबार प्रांत लागतो.  याच्या पूर्वेस कोइमतूरपासून बंगलोर नेलोर ते तहत कारोमांडलच्या किनार्‍यापर्यंत तामीळ प्रांत लागतो.  ह्या दक्षिण भागांत मंगलोर, कालिकत, कॅनानोर, कोइमतूर वगैरे शहरीं व त्रावणकोरमध्यें देखील कांहीं लहानमोठ्या ब्राह्म समाजाचें काम चालू होतें.  पण तेथे अनुभवशीर आणि वाहून घेतलेला, कलकत्त्याच्या साधारण ब्राह्म समाजाचा प्रतिनिधि म्हणून कोणी प्रचारक राहात नव्हता.  त्यामुळें ह्या प्रांतीं ब्राह्म समाजाचें काम अव्यवस्थित व विस्कळित चाललें होते.  आतां मी ब्राह्मसमाजाचें काम करण्यास मोकळा झाल्यानें कलकत्त्याच्या साधारण ब्राह्म समाजानें या प्रांतीं आपला प्रतिनिधि म्हणून माझी मोठ्या आनंदानें निवड केली.  मंगलोर शहरीं एक सुसंघटित ब्राह्म समाज आणि सुंदर ब्राह्ममंदिर होतें. इतकेंच नव्हे तर वर निर्दिष्ट केल्याप्रमाणें रा. के. रंगराव यांनीं चालवलेली आणि अखिल भारतीय निराश्रित साहाय्यकारी संस्थेला संलग्न झालेली डी. सी. मिशनची एक शाखा पण होती.  ह्या मिशनच्या कामानिमित्त माझें या प्रांतीं वेळोवेळीं जाणें-येणें होतें.  ह्या प्रांतांतल्या ब्राह्म समाजाच्या पुढार्‍यांशीं माणा व्यक्तिशः परिचय होता.  शिवाय मला कानडी चांगलें अवगत असल्यानें मंगलोर ब्राह्म समाज हें माझ्या आचार्यपदाचें मुख्य ठाणें आणि हा सर्व नैर्ॠत्य भाग माझें प्रचारक्षेत्र ठरवण्यांत आलें.  मागें १९०७ सालीं आणि पुढें एकदोनदां मंगलोर शहरीं ब्रा. समाजाच्या खास प्रचारासाठीं आलों असतां तेथील समाजबंधूचें प्रेम मजवर फार निकट जडलें होतें. म्हणून माझी ही नेमणूक सर्वानुमतें पसंत झाली होती.  आम्ही मंगलोर शहरीं ज्या वेळीं आलों त्या वेळीं सर्व मंगलोर ब्राह्म समाज आमचे स्वागतार्थ बंदरावर लोटला होता.  

राजकारणाचें वावडें  :   १९०७ सालचा काळ वेगळा आणि आतां १९२४ सालचा एप्रिल महिना वेगळा.  राजकारणानें ह्या दोन काळांत हिंदुस्थानांत मोठी क्रांति घडवून आणली.  लो. टिळकांनीं काँग्रेसला जहाल स्वरूप आणलें होतें, तर महात्मा गांधींनीं बहिष्कार, सत्याग्रह इत्यादि चळवळींनीं राजकारणास त्याहूनही उग्र स्वरूप आणलें होतें.  मंगलोर ब्राह्म समाजांत यापूर्वीपासून प्रविष्ट झालेलीं चारपांच सारस्वत घराणीं होतीं.  पं. उल्लाल रघुनाथय्या,पं. परमेश्वरय्या, रा. कृष्णराव गांगोळी B.A., B.L.,वकील, प्रत्यक्ष के.रंगराव, समाजाचे सेक्रेटरी आणि त्यांतच राजकीय तरुणांचे पुढारी व महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी कर्नल सदाशिवराव, B.A., B.L., अशीं हीं पांच घराणीं होतीं.  बाकी सर्व सभासदमंडळी सुमारें पाऊणशें बिल्लव जातीची होती.  ह्या जातीचे लोक ब्राह्म समाजांत येण्यापूर्वी अस्पृश्य गणले गेले होते.  ब्राह्म समाजाच्या एकदोन पिढ्यांच्या अनुषंगानें हे लोक चांगले सुशिक्षित व प्रतिष्ठित दर्जाला येऊन पोंचले होते.  सरकारी नोकरींत व तिकडील मोठमोठ्या युरोपियन कंपन्यांतून चांगल्या अधिकाराच्या जागेवर कामें करून ही मंडळी मान्यता पावली होती.  पण राजकारणांत ह्यापैकीं कोणीही, केव्हांही भाग घेत नव्हता हें साहजिकच होतें.  मी या वेळीं कोणत्याहि पक्षाशीं तादात्म्य झालों नसलों तरी माझ्या प्रांतीं (महाराष्ट्रीं) राजकारणांत स्वतंत्रपणें भाग घेत होतों, हें ह्या मंडळीस अद्यापि कळून आलें नव्हतें.  त्या वेळीं माझ्या डोक्यावर गांधी टोपी होती.  तिनें माझी राजकारणाची चहाडी ह्या बुजग बिल्लव लोकांना तात्काळ कळवली.  गुप्‍त कुरकुर, उघड संशय, प्रांजल भीति वगैरे भावनांच्या परंपरा सुरू झाल्या.  माझें काम कठीण आहे, ही नोटीस मला मिळाली.  अस्पृश्यांविषयींची माझी सेवा ह्या बिल्लवमंडळींना मान्य होती हें खरें; पण त्या वर्गांतून ह्या ब्राह्म बंधूंची सुटका होऊन दोन पिढ्या लोटल्यामुळें त्या वर्गाचा त्यांचा संबंध आता तुटला होता.  त्याची आठवण करून घेण्यास ते राजीही नव्हते.  अर्थात् माझ्या पात्रतेचें मुख्य लक्षणच आतां लुळें ठरलें.

मी मंगलोरास गेल्यावर सर्व पंथांत व धर्मांमध्यें काम करूं लागलों.  त्या प्रांतीं रोमन कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट पंथांचे मोठें जाळें पसरलें होतें.  कांहीं कांहीं भागांत ख्रिश्चनांचीच बहुसंख्या होती.  इतकेंच नव्हे तर पुष्कळ ठिकाणीं ख्रिस्ती झालेले पूर्वाश्रमींचे हिंदु आपल्या पूर्वाश्रमींचे जातिभेद आणि थोडीशी रूप बदललेली मूर्तिपूजा पाळीत असल्यामुळें हिंदु समाजांतही त्यांना मोठी मान्यता मिळत असे.  मी माझ्या प्रचारासाठीं व्याख्यानें व भजनेंच करून न राहतां हिंदु पद्धतीनें कीर्तनेंही करीत असें.  कीर्तनाची पद्धत जरी हिंदु होती तरी निरूपणाचा विषय नवीन व सुधारणावादी असल्यामुळें ख्रिश्चन व मुसलमान श्रोतेदेखील कीर्तनास हजर असत.  एके वेळीं मंगलोरच्या सरकारी कॉलेजांत मुद्दाम ख्रिस्ती लोकांसाठीं मीं कीर्तन केलें.  त्यांत सेंट फ्रान्सिस ऑफ असीसी ह्या रोमन कॅथालिक संताचें व्याख्यान लावलें होतें.  सेंट फ्रान्सिस हा विरक्त संन्यासी होता तरी त्याच्या विचारांत मोठी सुधारणा होती.  ती तत्कालीन पोप इनोसंट (Pope Innocent) ला आवडत नाहीं.  ह्या नाजुक गोष्टीचें निरूपण मीं इतक्या परिणामकारक रीतीनें केलें कीं कॅथालिक मंडळींत मोठी खळबळ उडाली आणि त्यांच्यांत माझ्या प्रवचनाविषयीं भवति न भवति होऊं लागली.  त्यामुळें कांहीं नवीजुनी कॅथालिक मंडळी माझीं प्रवचनें ऐकण्यास ब्राह्ममंदिरांत येऊं लागली.  मी जाईपर्यंत मंगलोरचा ब्राह्म समाज राजकारणांत मोठा सोंवळा होता.  माझे स्वतंत्र विचार ऐकून नवीन प्रवृत्तीची तरुण मंडळीं समाजांत बरीच येऊं लागली.  अशा रीतीनें ब्राह्म समाजाचा अंतस्थ भाग पेटला असतां त्यावर पुढें लिहिल्याप्रमाणें एक अकस्मात् बाँब येऊन पडला.

भावी सामाजिक सुधारणेची तयारी

हायस्कुलांत असतांना विशेषतः ४ थ्या ५ व्या इयत्तेपासून पुढें माझ्यामध्यें भावी सामाजिक सुधारणेचें बीजारोपण कसें होऊं लागलें ह्यासंबंधींच्या आठवणी देऊन मी हा हायस्कूलचा काळ पूर्ण करणार आहे.  ह्यालाही माझ्या आईबाबांचा धर्म आणि शील हींच केवळ कारणीभूत आहेत.  

भावंडांचीं नांवें  :   माझ्या आजाआजींचा धर्म कसाही असो, ते जिवंत असेतोंपर्यंत जरी माझ्या आईबाबांनीं त्यांच्या पुरातन देवदेवींच्या उपासनेची परंपरा बिनतक्रार चालविली होती-, तरी ती त्यांच्या पाठीमागें फार दिवस टिकली नाहीं.  आजा-आजी असतांनाच बाबांच्या पंढरपूरच्या वारकरी पंथांत नुसता प्रवेशच नव्हें तर पुढाकारही चालू होता.  माझ्या वडील भावाचें लाडकें नांव जरी भाऊ असें होतें तरी त्याचें पाळण्यांत ठेवलेलें खरें नांव परशुराम हें होतें.  श्रीयल्लम्मा हें रेणुकादेवी-जमदग्नि ॠषीची पत्‍नी-हिचें तेलगू अथवा कानडी नांव होय.  तिचा मुलगा परशुराम.  हें नांव माझ्या भावाला श्रीयल्लमाची भक्ति करणारी जी माझी आजी तिनें ठेविलें असावें.  पण पुढील सर्व मुलांचीं नांवें माझ्या बाबांनीं आपल्या पंढरपूरच्या भागवत संप्रदायाप्रमाणें ठेविलेलीं आहेत.  तीं अशीं.  परशुरामाच्या पाठीवरच्या आणि माझ्या आधींच्या मुलाचें नांव कृष्णा.  हा लहान असतांनाच माझे आईचे अंगाखालीं झोपेंत चेंगरून मरण पावला, हें मागें आलेंच आहे.  ह्यानंतर माझें नांव विठू.  जन्मपत्रिकेंत माझें पाळण्यांत ठेविलेलें नांव तुकाराम असें आढळतें.  माझ्या जन्माचे वेळीं बाबा पंढरपूरच्या वारीला गेले होते.  म्हणून परत आल्यावर त्यांनीं माझें नांव विठ्ठल हें ठेविलें.  मी पांचवा मुलगा.  माझ्यानंतरचा मुलगा नांव ठेवण्यापूर्वी ६।७ वे दिवशींच वारला.  नंतर मुलगी झाली.  ती ७ वी जनाक्का.  ही कार्तिक शुद्ध एकादशीस जन्मली.  ह्या वेळींही बाबा पंढरपुरास जाऊन आले असावेत.  आठवी मुलगी तान्याक्का.  हिचें पाळण्यांतलें नांव मुक्ताबाई असें आहे.  पुढें जी बरींच मुलें झालीं तीं लहानपणींच वारलीं.  त्यांपैकीं एकाचें नांव दत्त होतें.  शेवटचा मुलगा एकनाथ.  अगदीं अखेरचें मूल चंद्राबाई.  हें नांव मात्र बबलादी सिद्धांचें जें उपास्यदैवत चंद्रगिरीताई तिचेवरून ठेविलें होतें.  एकंदरींत वारकरी पंथाच्या साध्या, उदार, प्रागतिक, भागवत धर्माचा पगडा माझ्या वडिलांच्या मनावर आणि अकृत्रिक शीलावरही बसला होता.

मातापित्यांचें ॠण  :  तुकाराम हें नांव मागें पडून विठू हें माझें नांव कसें पुढें रूढ झालें त्याचा जरी शोध आतां नीट लागण्याचा संभव नाहीं, तरी माझ्या बाबांच्या भागवत धर्मांतून माझी भावी सामाजिक सुधारणा कशी उदय पावली हें शोधून काढणें तितकें कठीण नाहीं.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।  भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर ।  वर्म सर्वेश्वर पूजनावें ॥१॥

हा तुकारामाचा अभंग सर्वच वारकरी म्हणतात.  पण त्याचा ठसा बाबांनीं व आईनें माझ्या ग्रहणशील हृदयावर आपल्या प्रत्यक्ष आणि पदोपदींच्या प्रेमळ आचरणानें जो उठविला आहे, त्यांत ज्या भावी साधारण ब्राह्मसमाजाचा मी प्रचारक झालों त्यानेंही विशेष भर टाकिली असें माझ्यानें म्हणवत नाहीं.

ज्ञानदेवें घातला पाया ।  तुका झाला कळस ॥

ह्या उक्तीप्रमाणें ज्या शुद्ध भागवत धर्माची प्राणप्रतिष्ठा महाराष्ट्रांत झाली त्यांतच उदार, सामाजिक प्रागतिकतेची व सहानुभूतिपूर्ण सहिष्णुतेचीं भरपूर बीजें होतीं.

निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ।
आवडीनें नामें गाती, ते नर पावती मंगल धाम ॥

हें सुंदर भजन म्हणून नाचणार्‍या पुष्कळ वारकर्‍यांच्या आचरणामध्यें वरील साधूंच्या शुद्ध शिकवणीचा मेळ दिसत नाहीं.  पण माझ्या वडिलांच्या आचरणाविरुद्ध मला ही कुरकुर करावयाला मुळींच जागा नाहीं.  प्रार्थना अगर ब्राह्मसमाजाचा परिणाम अद्यापि मराठ्यांवरच नव्हे, तर इतरही महाराष्ट्रीयांवर झालेला नसून मी मात्र आज या समाजाचा एक का होईना पण अपात्र प्रचारक म्हणून वावरत आहें.  ह्यांत कांहीं श्रेय असेल तर मोठा भाग ह्या समाजापेक्षां माझ्या वडिलांनीं घालून दिलेल्या जिवंत आचरणाच्या धड्यांकडेच जास्त आहे !

आमचें घराणें मूळचें दक्षिणेकडील अस्सल कर्नाटकांतलें.  राजपुतांशीं संबंध लावणार्‍या उत्तरेकडील मराठ्यांपेक्षां दक्षिणेकडील देशस्थ मराठे साध्या राहणीचे व बाळबोध वळणांतले.  ह्यांचा मराठमोळा पडदानशीन नखर्‍याचा नाहीं किंवा ब्राह्मणी सोंवळेपणाच्या जातिभेदालाही फारसा जुमानणारा नाहीं.  निदान माझ्या पाहण्यांत माझ्या आजीपासून तरी ह्या दोन सामाजिक विषांची बाधा आमचे घरीं दिसून आली नाहीं.  ह्यांत माझ्या बाबांनीं आपल्या सहजसुंदर भागवत धर्माची भर टाकली.  ''कोणाही जीवाचा न घडो मत्सर'' हें वर्म तर माझ्या आईच्या स्वभावांत अगदीं श्वासोच्छ्वाप्रमाणें सहज भिनलें होतें.  ह्यांत मीं पामरानें कांहींच भर टाकणें शक्य नव्हतें.

पवित्र वातावरण  :  आमच्या घरीं पडदा नव्हता.  इतकेंच नव्हें तर बाहरेची कोणी सभ्य आणि विश्वासार्ह पाहुणेमंडळी अगर मित्रमंडळी आली, तर त्यांच्याशीं आमच्या घरचीं स्त्रीपुरुष आणि लहानथोर सर्व माणसें फार मोकळेपणानें व आपलेपणानें वागत असत.  ह्या स्वाभाविक बाळबोधपणामुळें आमच्या घरीं येणार्‍यांना अगदीं पवित्र आणि भारलेल्या वातावरणांत उतरल्याप्रमाणें अनुभव येई, असे कित्येकांनीं आमचेजवळ उघड उद्‍गार काढावे.  माझ्या मित्रांना आमच्या घरच्या अकृत्रिम व निष्कपट चालीरीति, घरांतील लोकांचा एकमेकांशीं स्नेह व गोड वागणूक आणि दुसर्‍यांशी तसेंच वर्तन अगदीं नमुनेदान वाटत.  कांहीं नवीन आलेले स्नेही तर कांहीं गोष्टींकडे टक लावूनच पाहात बसत !  आमच्या घरची शांति, तृप्‍ति, प्रीति ह्या त्यांना कांहीं अवर्णनीय वाटत.  आमच्या घरीं आल्यावर एखाद्या पुरातन देवळांत गेल्याचा त्यांना भास होऊन, परत जावेंसें वाटत नसे !  आमचे बाबा आपल्या मुलींना ''आई'' म्हणून हांक मारीत असत ही लहानशीच गोष्ट, पण परकीयांवर ह्या गोष्टींतील सहृदयतेचा परिणाम चटकन् होई.  माझ्या दोन लहान बहिणी माझ्या लहानग्या मित्रांबरोबर लडिवाळपणानें व मोकळेपणानें वागत. आई तर माझ्या कोणाही मित्राला आपल्याच मुलाप्रमाणें वागवावयाला केव्हांही तयार असे.  ह्यामुळें आमचे घरीं विश्वकुटुंबियतेचा जिवंत देखावा अथवा साक्षात्कार दिसे.

नुसता पडदा न घालणें ह्यांत कांहीं विशेष नाहीं; पण अंतःकरणांतच मुळीं पडद्याला थारा न देणें ही दैवी कृपा होय.  आमचे घर म्हणजे ह्या कृपेचा एक देव्हारा होता !  प्रापंचित विपत्ति कितीही आल्या; दारिद्र्य, आजार, मरण, कर्जाचा बोजा असले इतर कितीही मनाची पारख करणारे प्रसंग आले, तरी घरचें शांतीचें वातावरण कधीं क्षुब्ध होत नसे.  येणेंप्रमाणें भौतिक दारिद्र्यांत आत्मिक श्रीमंतीचा भोग आमचे घरीं आणि घरांतील लहानथोर व्यक्तींत दिसत असे.  अशा घरीं मग जातिभेदाला कोठून वाव मिळणार !  आधुनिक सुधारकांप्रमाणें जातिभेद मोडण्याची उठाठेव करण्याची आम्हांवर कधीं पाळीच येत नसे.  कारण तो जातिभेदचा संस्कारच आम्हांवर घडला नव्हता.  लहान मुलांपुढें मद्यपाननिषेधाच्या व्याख्यानांची जरुरीच नसते.  त्याप्रमाणें जातिभेद मोडण्याचा कोणी आम्हांला उपदेश केला असता, तरी तो मुळीं आम्हांला समजलाही नसता.  इतके आम्ही ह्या भेदाच्या अमंगळ विषाला अनभिज्ञ होतों  !

मुलींचें शिक्षण :   शिक्षणाचे बाबतींत आमच्या घराण्याचा त्या प्रांतांत मोठा विशेष होता.  बाबांनीं जें पुस्तकी शिक्षण आणि जी बहुश्रुतता मिळविली ती त्या काळचे मानानें नांवाजण्यासारखी होती.  आणि मीही पुढें हायस्कुलांत जाऊन सतत नंबर पहिला व त्या काळच्या विद्यार्थिवर्गांत अग्रगण्य झालों.  ह्याचें प्रत्यक्ष श्रेय बाबांना नाहीं तरी अप्रत्यक्षपणें पूर्व भूमिका तयार केल्याचें श्रेय त्यांचेकडेच जातें.  पण ह्यापेक्षांही त्यांच्या प्रागतिकपणाचें मोठें कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनीं आपल्या दोन्ही मुलींनाही शाळेंत घातलें ही होय.  मी जसा माझ्या हायस्कुलांत अगदीं पहिला अमदानींतला मुलगा तशा माझ्या बहिणी त्या वेळच्या मुलींच्या शाळेंतल्या जवळजवळ पहिल्याच विद्यार्थिनी होत्या !  जनाक्का आणि तान्याक्का ह्या दोघी माझेपेक्षां धाकट्या बहिणी.  पहिली मोठी हुशार, सतेज दिसे.  दुसरी धाकटी मात्र अगदीं भोळी आणि बुद्धीनें मागासलेली असे.  जनाक्का बाबांची विशेष लाडकी.  क्षत्रिय घराण्यांत लहानपणीं मुलींना मुलांचाच पोषाख घालण्याची बर्‍याच ठिकाणीं चाल आहे.  अशा मुलींना वडील केव्हां केव्हां सभांतून व दरबारांतून अशाच पुरुषी पोषाखांत घेऊन जात असतात.  जनाक्काचा हा पोषाख व त्या वेळचें तिचें बाळसें बाबांना व आमच्या घरच्या सर्व मंडळींना फार आवडत असे.  आम्हीं मुलांनीं कधीं विजार घातली नाहीं तर पण जनाक्काला ऊर्फ आपल्या 'आईला' बाबांनीं कोल्हापुरी पद्धतीची तुमान करून आवडीनें घालावी !  आणि तिनेंही ती घालून मोठ्या दिमाखानें आम्हांपुढें यावें !

स्वभाव-लक्षणें  :  वरील परिस्थितींत वाढल्यामुळें माझ्या भावी सुधारणेची तयारी कशी झाली हें निराळें फारसें सांगावयाला नको.  स्वातंत्र्याची प्रीति, नव्या जीवनाचा शोक व सत्याचा छडा लावण्याची जन्मजात हौस हीं माझ्या स्वभावाचीं मुख्य लक्षणें होतीं.  ह्या लक्षणांना कोणत्याही तर्‍हेनें आळा घालण्याचा माझ्या आईबाबांनीं कधींही प्रयत्‍न केला नाहीं, हें केवळें माझें भाग्य !  कुरणांत चरणार्‍या आईबापांजवळ त्यांचें शिंगरूं ज्याप्रमाणें स्वच्छंदानें बागडत असतें, तद्वत् माझ्या आईबाबांचा मला आश्रय होता, पण दाब कसलाही नव्हता !  मीं एखादी चांगली, पण अगदीं नवी आणि रूढीविरुद्ध गोष्ट केली, तर उलट तिचें ते कौतुकच करावयाला तयार असत !  ही अपूर्व संधि माझ्या सुधारणेला मिळाली.

अभेद भाव :  हायस्कुलांत गेल्यावर माझ्या अभ्यासांत जसे नवे नवे विषय येऊन त्यांत अप्रतिहत गति होऊं लागून माझ्या चैतन्यक्षितिजाचें वलय दिवसेंदिवस वाढूं लागलें, तसेंच मला निरनिराळ्या जातींचे व संस्कृतींचे मित्र आणि सोबती मिळत जाऊन माझ्या विचाराला आचाराचें स्वरूप देण्याचे प्रयोग करण्यालाही वाव मिळूं लागला.  ब्राह्मण-लिंगायतांसारख्या ज्या जाति मराठ्यांकडे जेवत नाहींत त्या जातींचीं माणसें आमचे विश्वकुटुंबीय घरीं जेवत.  न्हावी, धोबी वगैरे ज्या इतर हिंदूंकडे किंवां मुसलमान वगैरे परधर्मीयांकडे मराठे जेवीत नाहींत, त्या जातींचे लोकांशींही पंक्तिभेद करण्याचें पाप आमचे घरीं कधीं घडत नसे.  पण मी पुढें जेव्हां माझ्या मित्रांशीं मिळून मिसळून वागूं लागलों तेव्हां ह्यापुढची पायरी मला चढावी लागली.

मुसलमान स्नेही  :  इंग्रजी चवथ्या किंवा पांचव्या इयत्तेंत असतांना मूर्तुजा नांवाचा एक माझा मुसलमान स्नेही होता.  तो माझ्या घरीं नेहमीं येत असे व जेवतही असे.  त्यानें एके दिवशीं सहज मला आपल्या घरीं जेवावयास बोलावलें.  परजातीच्या माणसाचे घरीं प्रत्यक्ष जाऊन जेवण्याचा माझ्या जन्मांतला तो अगदीं पहिला प्रसंग होता.  मी लागलाच कबूल तर झालोंच; पण जेवणाला बसलों तेव्हां मी कांहीं तरी अपूर्व गोष्ट करतों, असें मला वाटूं लागलेलें स्पष्ट आठवतें.  त्या वेळीं माझें वय फार तर १४।१५ वर्षांचें असावें.  मूर्तुजाला व त्याच्या घरच्या माणसांना तर माझ्या ह्या मोकळेपणाचें जास्तच आश्चर्य वाटलें.  ह्यानंतर मी सहाव्या आणि सातव्या इयत्तेंत गेल्यावर सय्यद मीरासाहेब हतरुट ह्या पोक्त मुसलमान गृहस्थाचा माझ्याशीं प्रथम परिचय व नंतर अगदीं जिवलग स्नेह जडला.  मीरासाहेब आमच्या घरीं आणि मी त्यांचे घरीं अगदीं उघड जेवत असूं.  ह्या माझ्या सुधारकी वर्तनानेंच आमचा परस्परांचा लोभ जडला.  पुढें कांहीं वर्षांनीं ते वारल्यावरही त्यांचे थोरले चिरंजीव सय्यद अबदुल कादीर हे मला आपल्या मुलाप्रमाणें वाटूं लागले.  त्यांनीं शेवटीं ब्राह्मधर्माचा स्वीकार करून ते प्रार्थनासमाजाचे सभासद झाले.  शिवाय मीं स्थापन केलेल्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी (Depressed Classes Mission Society of India) चे ते एक आस्थेवाईक प्रचारकही झाले !  माझ्या सुधारकी बाण्याचा प्रत्यक्ष मीरासाहेबांवरही परिणाम झाला.  ते एक मुसलमान गृहस्थ असल्यामुळें त्यांचे घरीं अर्थात् स्त्रियांचा पडदा होता.  पण मीरासाहेबांनीं माझी व आपल्या पत्‍नीची ओळख करून दिली होती व मजपुढें त्या पडदा पाळीत नसत.

शुद्ध तत्त्वें  :  वरील गोष्टीचा विशेष खालील कारणांत आहे.  आमच्या घरीं जीं साहजिक सुधारणेचीं तत्त्वें पाळलीं जात तीं समता आणि स्वतंत्रता, उदारता आणि स्वाभिमान ह्यांच्या समतोलांत होतीं.  आमचे घरीं वरिष्ठ म्हणविणार्‍या ब्राह्मण, लिंगायत जातींचे सभ्य गृहस्थ येत असत, ते जर आपला पोकळ डौल सोडून आमच्याशीं समानतेनें व खर्‍या प्रेमानें वागत असले तरच आम्ही त्यांच्या घरीं जेवावयास जात असूं व त्यांच्याशीं घरोबा राखीत असूं.  एरवीं ते कितीही श्रीमंत किंवा घरंदाज असले तरी आम्ही त्यांचेकडे ते ब्राह्मण आहेत अगर लिंगायत आहेत एवढ्याच कारणानें जेवावयास जात नसूं !  त्याचप्रमाणें मराठ्यांपेक्षां खालच्या मानलेल्या किंवा मुसलमानांसारख्या परधर्माच्या मित्रांकडे जेवावयाला जावयाचें झाल्यास त्यांच्यात समानतेचें, स्वतंत्रतेचें अंतःकरणापासून प्रेमाचें नातें असेल तरच आम्ही जात असूं.  एरवीं नाहीं.  ह्या न्यायानें मीरासाहेबांना किंवा त्यांच्या पत्‍नीना आमच्या घराण्यापुरता तरी आपला पडदानशीनपणा सोडावा लागला, हें सहजच आहे.  अशा गोष्टी केवळ देवाण-घेवाण ह्या व्यापारी तत्त्वानें किंबहुना आधुनिक सुधारकांच्या शुद्ध बुद्धिवादानेंही घडून येण्यासारख्या नसतात.  अंतःकरणाचा जिव्हाळा, हेतूचा शुद्धपणा आणि अकृत्रिम प्रेम हा सर्व सुधारणांचा अढळ पाया होय.  ह्याच तत्त्वावर आमच्या घराण्याला त्या जुन्या काळीं व जमखंडीसारख्या मागासलेल्या अथवा कानाकोपर्‍यांतल्या प्रांतीं एवढी प्रागतिकता राखतां आली.  तींच शुद्ध स्नेहाचीं तत्त्वें माझ्या हायस्कूलच्या काळांत माझ्या स्नेहांशीं आमच्या परस्पर वर्तनांत होतीं.

पडदा, शिक्षण, जातिभेद वगैरेंचे बाबतींत इतकी प्रगति करून आमच्या विवाहाचे बाबतींत मात्र बाबांनीं असा अविचार कां केला ह्याचा वरील कारणांवरून खुलासा होण्यासारखा आहे.  तो असा कीं, त्यांची प्रागतिकता केवळ नवीन बुद्धिवादावर किंवा विचारावरून अवलंबून नव्हती.  ती निर्मळ अंतःकरणावर व दांभिकपणाच्या अभावावर अवलंबून होती आणि ह्याच वळणानुसार माझेंही वर्तन होतें.

हायस्कूलमध्यें नवीन वाङ्‌मय, नवीन विषयांचें अध्ययन व नवीन संस्कृतीचा परिचय घडल्यामुळें माझ्या स्वतःमध्यें कांहीं अंशीं बुद्धिवादाचा अंकुर दिसूं लागला होता.  तो मॅट्रिकची परीक्षा पास होऊन मी कॉलेजांत गेल्यावर अर्थात् जोरानें फोंफावूं लागला.  पण सातव्या इयत्तेंत असतांना त्या बुद्धिवादाचीं पूर्वचिन्हें थोडींशीं माझ्या वर्तनांत दिसूं लागलीं होतीं.  घरीं माझें वजन घरगुती बाबतींत बाबांवरही पडूं लागलें.  त्यामुळें त्यांनीं माझी धाकटी बहीण मुक्ताबाई हिच्या विवाहाची घाई केली नाहीं.  एरवीं उपवर होण्यापूर्वी मुलींचे लग्न झालेंच पाहिजे, ह्या समजुतीला जर आईबाबा चिकटले असते, तर मुक्ताबाईचें लग्न माझ्या आणि जनाक्काच्याप्रमाणें त्यांनीं लहानपणींच उरकून घेतलें असतें.  मुक्ताबाईचें लग्न ती जवळ जवळ १४ वर्षांची झाल्यावर झालें.  त्या वेळीं मी कॉलेजांत होतों.

सहृदयता  :  मी मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला पुणें सेंटरला बसून इ.स. १८९१ च्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्यें पास झालों.  त्या वेळीं माझें वय १८ वर्षांचें होतें.  ह्या कोवळ्या वयांत आणि मागासलेल्या कर्नाटक प्रांतांतील जमखंडीसारख्या एका छोट्या ब्राह्मणी संस्कृतीच्या संसथानांत त्या जुन्या काळांत माझ्या हातून सामाजिक सुधारणेचे जाणूनबुजून प्रयत्‍न होण्याचा प्रश्न नव्हता.  वर ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या केवळ माझ्या भावी सुधारणेचीं पूर्वचिन्हें एवढ्याच अर्थानें सांगितल्या आहेत.  पण ह्यांत एका महत्त्वाच्या तत्त्वाचा येथेंच निर्देश करणें बरें वाटतें.  तें तत्त्व म्हणजे सामाजिक असो अगर धार्मिक असो कोणत्याही खर्‍या सुधारणेचें मूळ कारण शुद्ध बुद्धिवाद आहे किंवा सहृदयता आहे ह्याचा निर्णय हें होय.  ह्या निर्णयाचे बाबतींत माझा कल दुसर्‍या कारणाकडे म्हणजे सहृदयतेकडे जास्त आहे.  हीच गोष्ट मीं वर लिहिलेल्या आठवणींतून बर्‍याच अंशीं सिद्ध होऊं पाहते.  निदान त्या वेळच्या माझ्या हायस्कूलच्या शिक्षणांत तरी शुद्ध बुद्धिवादाचा प्रादुर्भाव करून देणारे विषय म्हणजे रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र ह्यांच्या मूलतत्त्वांचीं लहान पुस्तकेंच होत.  एका वर्षांत ह्यांचे शिकवणीमुळें काय आणि त्यामुळें माझ्या विचारसरणीस निराळें वळण लागणें फारसें संभवनीय नव्हतें.  ह्यावरून असें दिसतें कीं, माझ्या आणि माझ्या आईबाबांच्या वर्तनांतील वर सांगितलेला उदारपणा व प्रागतिकपणा ह्याचें कारण माझी व त्यांची सहृदयता, न्यायाकडे प्रवृत्ति आणि दांभिकपणाचा तिटकारा हेच गुण होते.  मी पुढें कॉलेजांत गेल्यावर ह्या स्वाभाविक गुणांत बुद्धिवादाची भर पडली, एवढेंच फार तर म्हणतां येईल.

इतराजी  :  मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील सबंध वर्ष काय करावें या विवंचनेंत गेलें.  नोकरी पाहण्यासाठीं बेळगांवास सुमारें सहा महिने काढले.  तरी कोठें दाद लागेना.  शेवटीं जमखंडी हायस्कुलांत शिक्षकाची जागा रिकामी झाली, म्हणून हेडमास्तर श्री. त्रिंबकराव खांडेकर यांनीं मला जमखंडीस बोलावून घेतलें आणि रिकामी जागा मला दिली.  इंग्रजी २ र्‍या इयत्तेवर २।३ महिने काम केलें नाहीं तोंच श्रीमंत सरकारांनीं मला रामतीर्थास बोलावून नेलें व मुंबईस व्हेटरनरी कॉलेजमध्यें स्कॉलरशिप देऊन पाठवितों, असें सांगितलें; पण मीं त्या वेळीं उत्तर दिलें कीं, 'मला जनावरांचा डॉक्टर व्हावयाचे नाहीं.  आर्टस् कॉलेजमधील स्कॉलरशिप दिल्यास जावयास तयार आहे.'  यावरून यजमानांस राग येऊन त्यांनीं मला ताबडतोब नोकरीवरून दूर केलें आणि दिपवाळीचा पगारही दिला नाहीं.

भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद

येथवर माझ्या प्रचारकार्याचें स्थानिक आणि प्रांतिक स्वरूपाचें वर्णन केलें; पण प्रथम सांगितल्याप्रमाणें माझें लक्ष ब्राह्मधर्माच्या विश्वव्यापकत्वाकडे आणि त्या उच्च अधिष्ठानावरून ब्राह्मधर्माच्या भारतीय कार्याकडे नेहमीं लागून राहिलेलें असे.  या धर्माचें मुख्य अंग ही धर्मपरिषद होती.  सन १८८५ सालीं हिंदी राष्ट्रीय सभेचें पहिलें अधिवेशन मुंबई येथें भरलें.  त्यांत न्या. मू. रानडे यांचा अप्रत्यक्ष पुढाकार होता.  त्यांची बुद्धि अष्टपैलू, भावना उदार व उच्च प्रतीच्या होत्या.  पुढील दोन अधिवेशनें कलकत्ता व मद्रास शहरीं झाल्यावर अलहाबादला चौथी बैठक भरली.  आरंभापासूनच राजकारणास समाजसुधारणेचा बळकट पाठपुरावा होता.  अर्थात् ह्या चौथ्या बैठकींत उदारधर्माचा पाठिंबा ह्या राष्ट्रीय चळवळीस मिळणें क्रमप्राप्‍तच होतें.  एकेश्वरी बैठकीचे अध्यक्ष ना. मू. रानडे झाले.  कळकत्त्याचे मिस्टर आणि मिसेस् आनंदमोहन बोस, लखनौचे बिपिनबिहारी बोस, बिहारचे बलदेव नारायण, लाहोरचे पं. शिवनारायण अग्निहोत्री यांनीं आपापल्या प्रांतांतील ब्राह्मसमाजाच्या कार्यासंबंधीं भाषणें केलीं.  पुढें सालोसालीं राष्ट्रीय सभा जेथें जेथें भरेल तेथें तेथें त्या वेळीं ही धर्मपरिषदही भरविण्यांत यावी आणि पुढील वर्षाचे सेक्रेटरी म्हणून पं. शिवनाथशास्त्री यांना नेमावें, असा ठराव करण्यांत आला.

ब्राह्मसंघ  :   १८८९ सालीं मुंबईला ही परिषद मुं. प्रांतिक समाजांत भरली आणि त्या वेळीं प्रांतोप्रांतींच्या पुढार्‍यांनीं भाग घेतला.  कलकत्त्याहून नवविधान समाजाचे प्रतापचंद्र मुझुमदारही हजर होते.  तेव्हां Theistic Union (ब्राह्मसंघ) या नांवाची एक मध्यवर्ती संस्था स्थापून पुढील कार्याचा प्रयत्‍न करण्यांत यावा असें ठरलें.  (१) ब्राह्मसमाजाच्या निरनिराळ्या पक्षांच्या एकत्र उपासना व संमेलनें व्हावींत.  (२) प्रचारासाठीं एकत्र प्रयत्‍न व्हावा. (३) परोपकाराचें आणि भूतदयेचें काम एकत्र व्हावें वगैरे.  नवीनचंद्र राय ह्यांना ह्या संघाचे सेक्रेटरी नेमलें.  कलकत्त्यास साधारण ब्राह्मसमाज, नवविधान ब्राह्मसमाज व आदि ब्राह्मसमाज असे निरनिराळे पक्ष पडून ब्राह्मसमाजाच्या सामाईक कार्यांत फूट पडली होती.  ह्या नवीन संघामुळें ही फूट भरून येण्याचा बराच संभव होता आणि त्यांत आम्ही मुंबईकडील पुढार्‍यांनींच न्या. मू. रानडे ह्यांच्या नेतृत्वाखालीं उचल खाल्ली असा तर्क करण्यास बरीच जागा आहे.  कारण पुढील दोनतीन सालीं रानडे ह्यांनाच परिषदेचें अध्यक्षस्थान देण्यांत आलें होतें.  चवथी बैठक नागपुरास १८८१ सालीं भरली.  तेथें ब्राह्मसमाज नसल्यामुळें काम फारसें झालें नाहीं.  पुढील सालाकरितां वामन आबाजी मोडक व पांडुरंग सदाशिव केळकर यांस सेक्रेटरी नेमण्यांत आलें.  १८९४ सालीं मद्रासच्या बैठकीस डॉ. भांडारकर हे अध्यक्ष होते व पुढील सालीं म्हणजे १८९५ सालीं पुण्याच्या काँग्रेसचे वेळीं पुणें प्रार्थनामंदिरांत ही बैठक भरली.  त्या वेळीं अमेरिकेचे युनिटेरियन धर्माचे प्रसिद्ध प्रचारक रेव्हरंड जे. टी. संडरलंड हे हजर होते.  ह्यापुढें मधूनमधून १९०३ पर्यंत जरी ह्या परिषदेच्या बैठकी भरल्या तरी तिचें काम मंदावलें.  ५ वी बैठक अलाहाबाद येथें भरली असतां मुंबईच्या सुबोध-पत्रिकेनें लिहिलें, ''अशा प्रांतिक बैठकींचें महत्त्व राष्ट्रीय सभेच्या धामधुमींत भरणार्‍या भारतीय अधिवेशनापेक्षांही किंबहुना अधिक आहे.  कारण प्रांतिक बैठकीनें मिळविलेल्या माहितीवरून आणि अनुभवावरून राष्ट्रीय बैठकीचें काम अधिक पायाशुद्ध व पद्धतशीर होण्याचा संभव आहे.''

अशा मंदावलेल्या स्थितींत १९०३ च्या नाताळांत मद्रासेंत भरलेल्या अधिवेशनावरून ह्या परिषदेची झालेली विस्कळित स्थिति माझ्या मनांत भरली आणि पुढील सालीं मुंबईला भरणार्‍या राष्ट्रीय सभेच्या वेळीं धर्मपरिषद संघटित स्वरूपांत बोलावण्याचा मीं निश्चय केला, हें मीं सांगितलेंच आहे.  त्याप्रमाणें हीं पुनर्घटित एकदोन अधिवेशनें सोडून कराचींत भरलेल्या १९१३ सालच्या अखेरच्या बैठकीपर्यंत या कार्याचा सर्व भार सेक्रेटरी या नात्यानें मीं माझ्यावरच घेतला.

पुढील कोष्टकावरून ह्या एकेश्वरी धर्मपरिषदेच्या कार्याचें नीट समालोचन करण्यास बरें पडेल.
तक्ता

(तक्ता पाहाण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई  :  १९०३ सालच्या मद्रास-बंगालच्या सफरीवरून हिंदुस्थानांतील निरनिराळ्या ब्राह्मसमाजांची मला बरीच प्रत्यक्ष माहिती झाली होती.  १९०४ सालीं मुंबईच्या परिषदेंत हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांतून पुष्कळसे प्रमुख पुढारी मुंबईस आल्यानें त्यांच्या समक्ष परिचयाची भर पडली आणि त्यांच्यावर ह्या नवीन संघटित परिषदेचा परिणाम घडला.  मुंबई प्रार्थनासमाजांतील पुढार्‍यांनाही ह्या नवीन प्रयत्‍नांचें महत्त्व कळून चुकलें.  कलकत्त्याच्या खालोखाल मुंबई प्रार्थनासमाजाचें महत्त्व असल्यानें येथील बैठक समाजाबाहेरील लोकांवरही परिणामकारी झाली.  यंदाच्या सामाजिक परिषदेचें अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीरावमहाराजांनीं स्वीकारल्यामुळें तो एक नवीनच विशेष घडला.  म्हणून धर्मपरिषदेंतही महाराजांनीं प्रत्यक्ष भाग घ्यावा ही कल्पना मला सुचली.  स्वतः मी त्यांस आमंत्रण करण्यास गेलों हें वर आलेंच आहे.  स्वागताध्यक्षाचें काम सर नारायण चंदावरकरांनीं आणि अध्यक्षाचें काम गुरुवर्य डॉ. भांडारकरांनीं केल्यामुळें ह्या अधिवेशनास अधिक रंग चढला.  रात्रीच्या शाळांचा बक्षीससमारंभ झाला.  त्यांत अध्यक्षस्थान पत्करून त्याच रात्रीं राममोहन आश्रमांत जें थाटाचें प्रीतिभोजन झालें त्यांतही महाराजांनीं प्रमुखपणें भाग घेतला.  ह्या भोजनास मुंबईच्या आर्यसमाज आणि सामाजिक परिषदेचे प्रतिनिधि यांना आमंत्रण केलें होतें.  आर्यसमाजाचे सेक्रेटरींनीं १५० सभासदांना घेऊन येण्याचें कबुलही केलें होतें.  प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष दानशूर दामोदरदास सुकडवाला यांनीं भोजनाचा सर्व खर्च सोसण्याची जबाबदारी घेतली होती; पण मुंबई प्रा. समाजानें कांहीं मुसलमान गृहस्थांना प्रार्थनासमाजाची दीक्षा दिलेली होती, म्हणून आयत्या वेळीं आर्यसमाजिस्टांनीं भोजनाला हजर राहण्याचें टाळलें.  कृतीची बाजू आल्यावर केवळ ध्येयवादावर आकांडतांडव करणारे हे वाचीवीर कशी बगल मारतात ह्याचें हें उदाहरण आहे.  शिवाय तो काळ १९०५ सालचा होता.  आर्यसमाजांत बहुतेक गुजराथ्यांचाच भरणा होता.  कृतीच्या सुधारणेला गुजराथ प्रांत त्या काळीं तयार नव्हता त्याचें हें उदाहरण; पण महाराज श्रीमंत सयाजीराव यांनीं गुजराथ्यांना हे उदाहरण घालून दिलें ही गोष्ट मोठी संस्मरणीय झाली.  परिषदेंत निरनिराळ्या ब्राह्मो पुढार्‍यांचीं भाषणें झालीं.  तींही नमुनेदार होतीं.  पुढील परिषद बनारस येथें काँग्रेस भरत असल्यानें तेथें भरविण्याचें ठरलें.  तेव्हांपासून अशा परिषदांच्या जनरल सेक्रेटरीचें काम मींच पाहावें, असें सर्वानुमतें ठरविण्यांत आलें.

काशी  :  काशी येथें स्थानिक ब्राह्मसमाज नाहीं.  गांव जुन्या मताचा व क्षेत्राचा असल्यामुळें तेथें स्वागतमंडळ स्थापणें फार जड गेलें; पण ह्या परिषदेचें महत्त्व प्रांतोप्रांतींच्या पुढार्‍यांना कळलें असल्यानें मीं त्यांना उद्देशून जें सर्क्युलर काढलें त्याला सर्वांकडून उत्तेजनपर उत्तरें व वर्गणीच्या रकमा आल्या.  बांकीपूरचे गुरुदास चक्रवर्ती आणि कानपूरचे महेंद्रनाथ सरकार ह्या दोघां साधारण ब्राह्मसमाजाचे सभासदांनीं काशीला जाऊन परिषदेची पूर्वतयारी करण्याचे कामीं मला मोठी मदत केली.

तीन पक्ष  :   ब्राह्मसमाजाचे तीन पक्ष म्हणजे (१) राममोहन राय यांनीं स्थापलेला आणि देवेंद्रनाथांनीं चालविलेला आदि ब्राह्मसमाज, (२) त्यांतून फुटून निघालेला केशवचंद्र सेन यांचा नवविधान ब्राह्मसमाज आणि (३) त्यालाही विरोध करून विभक्त झालेला साधारण ब्राह्मसमाज.  ह्या कलकत्त्यांतील तीन वेगळ्या शाखांचा बरावाईट परिणाम अखिल भारतांतील ब्राह्मसमाजावर आणि त्याच्या प्रसारावर काय घडला हें सांगण्याचें हें स्थळ नव्हे.  मी तो परिणाम अभ्यासू या नात्यानें जाणून होतों; पण ह्या तेढीचें स्वरूप ह्या तिन्ही पक्षांचे लोक काशी येथील परिषदेंत हजर होते म्हणून मला प्रत्यक्ष दिसलें.  इतकेंच नवहे पण पुढील कार्यांत तें पावलोपावलीं नडूं लागलें.  अध्यक्षाची निवड करण्यांतच मोठी नड आली.  परिषद कमिटीचे चेअरमन डॉ. भांडारकर व मुंबई समाजाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांना काशीस येणें जमलें नाहीं.  वेळोवेळीं महाराष्ट्रीयांनीं पुढाकार घेणें हें इष्ट नव्हतें.  काशी हें गांव बगालच्या सीमाप्रांतावर असल्यानें, पुढील अधिवेशन कलकत्त्यांत भरणार असल्यानें आणि उत्तरेकडील प्रांतांत बंगाली ब्राह्मणांचीच बहुसंख्या असल्यानें कलकत्त्यांतीलच कोणा तरी सर्वमान्य पुढार्‍याला अध्यक्षस्थानीं बसविणें इष्ट होतें.  म्हणून पं. शिवनाथशास्त्री यांना अध्यक्षस्थान देण्यांत आलें आणि त्यांनीं अटकळीप्रमाणें काम देखील सुंदर रीतीनें केलें.  परिषदेचें काम एखाद्या स्थानिक समाजाच्या वार्षिक उत्सवाप्रमाणें डिसें. २४ पासून ३१ पर्यंत मोठ्या सोहळ्यानें पार पडलें.  उपासना, भजनें, व्याख्यानें, नामासंकीर्तनें आणि शेवटीं प्रीतिभोजन इत्यादि तपशिलांत कोठेंच व्यत्यय आला नाहीं.  निरनिराळ्या प्रांतांतून सुमारें ७५ ठिकाणांहून ब्राह्मसमाजाचे प्रतिनिधि आले होते.  लंडन ख्रिश्चन मिशनच्या प्रशस्त हायस्कुलाशिवाय काशी येथें दुसरीकडे कोठेंही जागा मिळाली नाहीं.  दोन तीन वर्षांच्या अनुभवामुळें ह्या खंडवजा हिंदुस्थानांतील दूरदूरच्या ब्राह्मसमाजांची सर्व प्रकारची माहिती आणि त्यांची सूचि तयार करण्याची आवश्यकता मला भासूं लागली होती.  ब्राह्मधर्मसूचिग्रंथ मींच तयार करून प्रसिद्ध करावा, असा एक ठराव परिषदेनें एकमतानें पास केला.  हा एक ह्या परिषदेचा विशेष म्हणावयाचा.  म्हणून परिषद संपल्यावर मीं बंगाल-बिहार-आसाम या प्रांतांतून एक मोठा विस्तृत दौरा काढला.  बर्‍याच दृष्टींनीं हा दौरा महत्त्वाचा होता, म्हणून त्याचा तपशील खालीं देणें जरूर आहे.

ह्या परिषदेंत बंगाल्यांतील तीन्ही पक्षांची परस्पर सहानुभूति बरीच वाढली व शिवाय निरनिराळ्या प्रांतांतील ब्राह्मांचा स्नेह झाला.  अशा हितकारक परिषदेची खबर अधिक पसरावी, मुं. प्रा. समाजासारख्या तिर्‍हाइताचे कामाची माहिती इकडल्या दूरदूरच्या समाजांस कळावी, (कारण प्रार्थनासमाज व आर्यसमाज ह्यांतील भेद न जाणणारे कांहीं ब्राह्मसमाजिस्ट इकडे भेटले.)  कांहीं प्रमुख सभासदांची प्रत्यक्ष ओळख करून घ्यावी, मुख्य मुख्य स्थानिक समाज पाहावे वगैरे हेतू मनांत धरून मी ह्या सफरीवर निघालों.

बांकीपूर  :  बिहार प्रांताची राजधानी बांकीपूर येथें ता. २ जाने. १९०६ रोजीं आलों.  हा देश जरी बिहारी (हिंदुस्थानी) लोकांचा असला तरी येथें बंगाली लोकांची बरीच वस्ती असून सार्वजनिक बाबतींत त्यांचाच पुढाकार व सुळसुळाट दिसला.  वायव्येकडील प्रांतांत ज्याप्रमाणें एकही तद्देशीय ब्राह्म सांपडणें कठीण त्याप्रमाणें सबंध बिहार प्रांतांत बिहारी ब्राह्मांची एकाच बोटावर मोजण्याइतकी संख्या आहे.  मुख्य ब्राह्मसमाज नवविधान मताचा आहे.  भाई प्रकाशचंद्र राय हे त्याचे पुढारी.  हे सर्वांशीं मिळूनमिसळून वागून सार्वजनिक कामांत पुढाकार घेणारे आहेत.  राममोहन राय सेमिनरी ही साधारण ब्राह्मसमाजाची असून त्या शाळेंतच ह्या पक्षाच्या उपासनाही होतात.  ता. ४ रोजीं राय यांचे घरीं मीं प्रमुख मंडळी जमवून प्रथम मुंबईकडची हकीकत सांगितली.  उत्सवांत एकमेकांनीं मिळून कार्यक्रम ठरवावा, एकमेकांच्या उपासनेस पाळीपाळीनें जावें असें ठरलें.  बॅ. दास यांचे घरीं ता.५ रोजीं दोन्ही पक्षांच्या स्त्रियांची सभा भरलीं.  पोस्टल मिशन, डोमेस्टिक मिशन, सामाजिक मेळा वगैरे कामें स्त्रियांनीं कशीं करावयाचीं हें मीं सांगितलें.  सिल्हेटहून काशी परिषदेस आलेल्या सौ. हेमंतकुमारी चौधरी ह्यांनीं हिंदींत भाषण केलें.

मोंघीर  :   ता. ६ रोजीं मोंघीर येथें आलों.  हें रमणीय स्थान भागीरथीचे कांठीं आहे.  पुराणांतील राजा दानशूर कर्ण ह्याची दान देण्याची जागा अद्यापि गंगेच्या तीरावर दाखवितात.  ब्राह्म यात्रेकरूंस या स्थळाचें महत्त्व असें सांगण्यांत येतें कीं, ब्राह्मसमाजांत पुढें जो भक्तिसंप्रदाय सुरू झाला तो मूळ या ठिकाणीं. सन १८७२ सालीं हल्लीचें मंदिर बांधण्यांत आलें.  या मंदिरांत एकदां कांहीं वैष्णव मंडळींस भजनास बोलविलें होतें.  त्यांपैकीं एका चांडाळ जातीच्या भक्तानें इतकें सुश्राव्य व आवेशयुक्त भजन केलें कीं, त्याचा मंडळीवर विलक्षण परिणाम झाला.  पुढें साधु अधीरनाथ ब्राह्मप्रचारक यांचें भजनाविषयीं प्रेम अधिकाधिक वाढून शेवटीं स्वतः केशवचंद्र सेन येथें असतां त्यांच्यावरही भजनाचा परिणाम घडला व येथील कार्य बरेंच वाढलें.  तरी येथील हल्लींची ओसाड व दीनवाणी स्थिति पाहून माझें मन गहिंवरलें व मानवी मनाची अस्थिरता पाहून विस्मयलें.  मंदिरापुढील पटांगणांत केशवचंद्र सेन, साधु अघोरनाथ व दीननाथ चक्रवर्ती यांच्या तीन समाधि मध्यभागीं एका चौथर्‍यावर बांधल्या आहेत.  १९०२ सालीं या गांवीं आर्यसमाजाची स्थापना झाली; पण तोही नीट चालत नाहीं.

भागलपूर  :  भागलपूर येथें ता. ७ रोजीं पोंचलों.  हा समाज ता. २२ फेब्रु. १८६४ रोजीं स्थापण्यांत आला.  राजा शिवचंद्र बॅनर्जी नांवाच्या एका अत्यंत आस्थेवाईक हितचिंतकानें स्वतः सर्व खर्च सोसून मंदिर बांधविलें.  केशवचंद्र सेन ह्यांच्या हस्तें हें मंदिर उघडण्यांत आलें.  समाजांत थोडी का होईना, पण बडी बडी प्रमुख व वृद्ध मंडळी आहेत; पण उपासनेशिवाय कांहीं काम होत नाहीं.  ता.९ रोजीं सुमारें ५।६ तरुण पदवीधर ब्राह्ममंडळींपुढें मुंबईच्या तरुण ब्राह्ममंडळाचे छापील नियम मीं वाचून दाखविले आणि तेथील पूर्वीची तरुण संस्था पुन्हां स्थापन करण्याचें ठरविलें.  ह्यानंतर रात्रीं ७ वाजतां बाबू निवारणचंद्र मुकर्जी यांचे घरीं प्रमुख मंडळी जमली.  मुंबईकडील समाजाचें तिर्‍हाईतपणाचें काम ऐकून त्यांना फार समाधान झालें.  दोघांनीं तर वारंवार अशी इच्छा प्रगट केली कीं, मुंबई व बंगाल प्रांतांतील ब्राह्मांचे अधिक निकट संबंध जुळविणें फार इष्ट आहे व त्याकरितां परस्पर विवाहव्यवहार करणें अवश्य आहे.  मीं म्हटलें कीं, निरनिराळ्या प्रांतांतील ऐपतदार ब्राह्मांनीं निरनिराळ्या प्रांतांत प्रवास केल्याशिवाय वरील व्यवहार कधींही शक्य होणार नाहीं.

काठीहार  :   हें रेल्वेचें एक मोठें जंक्शन आहे.  बरीच चौकशी केल्यावर अर्धवट बांधलेल्या ब्राह्ममंदिराचा पत्ता लागला; पण येथें समाज नाहीं.  दारें व खिडक्या नाहींत.  नुसत्या भिंतीच पाहून हें मुक्तद्वार गौडबंगाल काय आहे याचा तपास करण्यासाठीं मी तेथेंच राहिलों.  शेजारच्या एका मुसलमान गृहस्थानें सांगितलें कीं, या अर्धवट इमारतीचा क्वचित् प्रसंगीं अत्यंत खेदजनक दुरुपयोग होतो.  १८८७ सालीं रेल्वेंतील ब्राह्म नोकरांच्या-विशेषतः जानकीनाथ गांगुली व रखलदर्श चतर्जी यांच्या-प्रयत्‍नानें येथें समाज स्थापन झाला.  त्या वेळीं १० सभासद होते.  १८९९ सालीं ही अर्धवट इमारत उभी राहिली; पण इतक्यांत येथील रेल्वे ऑफिस एकदम कलकत्त्यास गेल्यामुळें येथें एकही ब्राह्मो उरला नाहीं.

पूर्णिया  :  काठीहारपासून १८ मैलांवर पूर्णिया हें जिल्ह्याचें गांव आहे.  येथें बाबू हजारीलाल हे आस्थेवाईक गृहस्थ होते.  त्यांचेकडे गेलों.  तेथें मला तारकनाथ राय नांवाचे गृहस्थ भेटले.  ह्या दोघांना मीं काठीहारचें वर्तमान कळविलें.  तेथील पूर्वीच्या फंडापैकीं २०० रु. अद्यापि शिल्लक आहेत, असें कळलें.  काठीहर येथें मंदिर आहे, पण समाज नाहीं आणि पूर्णिया येथें समाज आहे, पण मंदिर नाहीं.  पूर्णिया येथील आस्थेवाईक सभासदांस घेऊन काठीहार येथें पुन्हां गेलों.  सायंकाळीं माझें हायस्कुलांत व्याख्यान झालें.  तेथील मुख्य अधिकारी मुन्सफ एक उदार मताचे बॅरिस्टर मुसलमान होते.  त्यांनीं आपल्या सहीच्या आमंत्रणचिठ्ठया लोकांना पाठविल्या व अध्यक्षस्थान पत्करलें.  व्याख्यानानंतर बाबू हजारीलाल यांनीं येथील कांहीं मंडळींच्या सल्ल्यानें बाकी उरलेल्या शिलकेंतून मंदिर पुरें करून देण्याचें ठरविलें.

ह्या प्रकारें बिहार प्रांतांतील काम झाल्यावर मी श्रीगंगेच्या निरोप घेऊन तिचा पिता जो पर्वतराज हिमाचल त्याचे चरणांगुलीवर विराजमान झालेली वनश्रीची जणूं माहेरकडची सखी जी कुचबिहार नगरी तिच्यांत सायंकाळच्या शांत समयीं अत्यादरपूर्वक प्रवेश केला.

Read more: भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद

ब्राह्म समाजाचा शतसांवत्सरिक उत्सव

ता. १६ गुरुवार ऑगस्ट १९२८ रोजीं हौरा स्टेशनवर पोंचलों.  १८ शनिवारीं ब्राह्म समाज शतसांवत्सरिक उत्सव सुरू झाला.  सायंकाळीं प्रतिनिधीच्या स्वागतार्थ सभा झाली.   मुंबईतर्फे उत्तर देण्याचें काम मजकडे आलें.  ता. १९ ला दुपारीं २ पासून रात्रीं ८ पर्यंत सर्व धर्मीयांची मजलस झाल.  पार्शी, हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती, मुसलमान व बहाई इतक्या धर्मांचे प्रतिनिधि पहिल्या अधिवेशनांत बोलले.  सर्वांत उत्तम भाषण मि. एस. एच. कोरेंशी ह्यांनीं बहाई धर्मावर केलें.  ता. २० रोजीं सायंकाळीं सर पी. सी. रॉयचे अध्यक्षत्वाखालीं ब्राह्म समाजाचा संदेश ह्या विषयावर भाषणें झालीं.  सुरुवातीची प्रार्थना करणें मजकडे आलें.  ती मीं इंग्रजींत केली.  ती सतीशचंद्र चक्रवताअना फार आवडली असें ते मुद्दाम येऊन म्हणाले.  पहिलें भाषण माझेंच झालें.  तें फार जोरांत, थोडक्यांत व निश्चित मुद्द्यांचें झालें.  ता. २१ सकाळीं मींच उपासना चालवली. त्यांत म्हटलें, ''प्रत्येकानें आपापला देव घडवला पाहिजे.  पार्थिवपूजेंत जशीं नित्य नवीं लिंगें करावीं लागतात त्याप्रमाणें आम्हीं आपला देव बनवावा.  सत्यं, ज्ञानं, अनंत हीं नांवें आम्हींच देवांस दिलीं आहेत.  भक्तिविजयांतील प्रथमाध्यायांत देव भक्तानें कसा नांवारूपास आणिला तें सांगितलें आहे.''

कविसम्राट् टागोर  :  ता. २२ रोजीं बंगाली भाद्रपद मासाची षष्ठी असल्यानें हाच ह्या शतसांवत्सरिक उत्सवांतील मुख्य दिवस होता.  सकाळीं ५॥ वाजल्यापासूनच मंदिरांत गर्दी जमूं लागली.  आज प्रसिद्ध कविवर्य डॉ. रवींद्रनाथ टागेर हे उपासना चालवणार होते.  ८॥ वाजतां कविवर्य आले.  मीं त्यांना प्रथमच पाहिलें.  चेहरा अत्यंत सुंदर व गंभीर. किंचित् औदासीन्याची छटा दिसली.  प्राचीन ॠषिकालाची कल्पना मूर्त स्वरूपास आली.  वेदी सर्व स्फूर्त झाली.  वेदीभोंवतींचीं मोठमोठीं शुभ्र व लाल उत्फुल्ल गुलाबाचीं फुलें विकसित होऊन कविवर्यांचे उद्‍गार ऐकण्यास टपलेलीं होतीं असा भास झाला.  खालीं मान घालून कविवर्यांनीं जें आसन घातलें ते अर्धा तास वर पाहीचनात.  आवाज अलगुजासारखा कोमल व हृदयप्रवेशी होता.  मग पुढें विरल व अथांग दृष्टीनें श्रोतृवृंदाकडे पाहात ते आपलें प्रवचन वाचूं लागले.  त्या वेळीं कमलनयन म्हणून काय चीज आहे ती अनुभवास आली.  केशकलापांची शुभ्र शोभा गोधूमकांतीच्या भरु कपाळावर विलसत होती.  पिंगट रंगाचा रेशमी सैल सदरा असून त्यावर त्याच रंगाची चादर पसरली होती.  सरल नासिका, विखुरलेली दाढी, पाणीदार दृष्टिविक्षेप, एकंदरींत एक दैवतच पुढें दिसलें.  एक तास प्रवचन झालें.  ''ईश्वरी दयेला त्याच्या रौद्र स्वरूपाचें कोंदण लागतें.  विभूतीचें मोठेपण संकटाला सतत तोंड देण्यांतच असतें.''  हा प्रवचनाचा आशय होता.  सर्व भाषण बंगालींत होतें.  तरी त्यांत संस्कृत शब्दांची लयलूट असल्यानें बरेंच कळलें.  शेवटीं लोकाग्रहास्तव कवींनीं आपलें एक लहानसें पद्य गाऊन दाखवलें.  हा प्रसंग शंभराव्या वाढदिवसाला शोभण्यासारखा झाला.

सामाजिक प्रश्न  :  २४ रोजीं सकाळीं पुन्हां परिषद भरली.  विषय ''आमचे सामाजिक प्रश्न'' हा होता.  प्रथम मिसेस् के. एन. रॉयबाईंनीं बंगालींत भाषण केलें.  त्यांत स्त्रियांनीं नृत्य, गायन व नाटकें करण्यांत व पाहण्यांत कांहीं वावगें नाहीं असें त्यांनीं समर्थन केलें.  अध्यक्ष सतीशचंद्र चक्रवर्ती यांनी उठून इषारा दिला कीं, ह्या विषयावर कोणींही बोलूं नये असें पूर्वीच ठरलें आहे.  पण ज्या अर्थी बाईनें हा विषय पुढें आणला त्या अर्थी दुसर्‍या बाजूनें उत्तर आलेंच पाहिजे.  ह्यावर मीं उठून स्पष्ट सांगितलें, ''उत्तर आल्यास पुन्हां प्रत्युत्तर येऊन ह्या नाजुक विषयावर मोठें युद्ध माजेल.  शिवाय त्यांत स्त्रीदाक्षिण्यही नाहींसें होईल.''  हें रा. गिरिजाशंकर ह्यांस आवडलें नाहं.  त्यांनीं आपल्या भाषणांत प्रेमस्वातंत्र्याचा मुद्दा अप्रस्तुतपणें पुढें आणून अध्यक्षांचें निर्णायक मत मागितलें.  अध्यक्षांनीं ''प्रेमाला बंधन असलेंच पाहिजे'' असें ब्राह्म समाजाचें स्पष्ट मत सांगितलें.  नंतर माझें भाषण झालें.  ''गेल्या शतकांत ब्राह्म समाजानें स्वातंत्र्याचा पुकारा केला आहे.  आतां पुढल्या शतकीं जनता जागृत होणार.  स्त्रिया समानाधिकारी होणार आणि युवक स्वतंत्र होणार.  दासमनोवृत्तचें ब्राह्म समाजाकडून निर्मूलन झाल्यावर वरील तिन्ही बाजूंनीं वावटळ उठणार.  त्याला ब्राह्म समाज तयार आहे काय ?  आजवर धार्मिक स्वातंत्र्याचें भावनामय युद्ध झालें.  येथून पुढें आर्थिक स्वातंत्र्याचें व्यावहारिक युद्ध जुंपणार.  त्यांत ब्राह्म समाज माघार घेईल, तर आपणच उठवलेल्या वावटळींत स्वतःच गारद होण्याचीं आपत्ति येणार !''

ता. २५ रोजी 'मिशनचें कार्य' ह्या विषयावर माझ्या अध्यक्षतेखालीं परिषद झाली.  (१) स्वदेशांतील  (२) बाहेरदेशांतील  (३) बहुजनसमाजांतील वा दलितवर्गांतील असे मिशनकार्याचे तीन भाग होते.  डॉ. ग. य. चिटणीस व सुधीरचंद्र बानर्जी ह्यांचें 'बाहेरदेशांतील कार्य' ह्या विषयावर भाषण झालें. २८ रोजीं दुपारीं डॉ. ग.य. चिटणीस व डॉ. खांडवाला ब्राह्म समाजाचे सफरीवर निघणार होते.  त्यांना निरोप देण्यासाठीं जाहरी उपासना झाली, ती मीं, चालवलीं.

ब्रह्मदेशाची यात्रा

ब्राह्मदेशाला जाण्याचा माझा मुख्य उद्देश, बौद्ध धर्माचें जीवन प्रत्यक्ष पहावें आणि स्वतः अनुभवावें हा होता.  मंगलोरहून परत पुण्यास आल्यावर १९२५-२६ सालीं मीं बौद्धधर्मासंबंधीं विशेष अभ्यास केला.  विशेषतः पाली भाषेंतील धम्मपद हें पुस्तक प्रो. चिं. वि. जोशी यांच्याजवळ वाचल्यापासून माझ्या मनाला मोठी शांति प्राप्‍त होऊन बर्‍याच अंशीं माझा स्वभावही बदलत चालला होता.  दुसरा हेतु ब्रह्मदेशची सामाजिक सिथति पाहणें.  त्या देशांतील सामाजिक व कौटुंबिक स्थितीचें मला फार कौतुक वाटत असे.  ब्रह्मदेशांत जातिभेद तर नाहींत, पण स्त्री-पुरुषांत समानतेचें नातें किंबहुना स्त्रियांचा वरचष्मा आहे असें मीं ऐकलें होतें.  बौद्ध धर्माचें जीवन पाहण्यासाठी विशेशतः एकान्त विहारांत राहून त्या धर्माचें रहस्य अनुभवण्याचा विचार मनांत येऊन मीं ही यात्रा करण्याचें ठरवलें.  प्रथमतः मी ह्या प्रवासाची तारीखवार तपशील देऊन नंतर कांहीं मुख्य मुख्य गोष्टींचें विवेचन करीन.

ब्रह्मदेशांत गेल्यावर तेथें जातिभेद नसला तरी अस्पृश्यता आहे असा मला शोध लागला.  त्याविषयींची तपशीलवार माहिती माझ्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या पुस्तकांत सविस्तर आली आहे.  म्हणून तेवढा भाग मी येथें वगळतों.

ता. २१ जानेवारी १९२७ रोजीं तिसरे प्रहरीं पुण्याहून निघालों.

ता. २४ जानेवारीला कलकत्त्याला पोंचलों.

'मी बौद्ध आहें'  :   ता. २४ जानेवारीपासून ता. ६ फेब्रुवारीपर्यंत कलकत्त्याच्या ब्राह्म समाजाचा माघोत्सव होता.  त्यांत एके दिवशीं ब्राह्म समाजाच्या मिशनरींची परिषद झाली.  तींमध्यें भाषण करतांना मीं म्हटलें, ''मी बौद्ध आहें.''  हें ऐकून माझ्या मिशनरी बंधूंना आश्चर्य वाटेल. आमच्या ब्राह्म समाजांत निरनिराळ्या धर्मांतून माणसें येतात, हें खरें ना ?  मग मी बौद्ध धर्मांतून आलों असलों तर काय चुकलें ?  आज जर गौतम बुद्ध जिवंत होऊन आले आणि त्यांनीं ब्राह्म समाजाचें औदार्य पाहून त्यांत प्रवेश करण्याची इच्छा प्रदर्शित केली तर त्यांना तुम्ही ब्राह्म समाजांत घेणार नाहीं काय ?  जेथें ख्रिस्ताला व बुद्धाला शिरकाव नाहीं तेथें मजसारख्या पामराची काय धडगत !  ह्या विषयावर वाद माजूं लागला हें पाहून अध्यक्षस्थानीं गुरुदास चक्रवर्ती हे बौद्ध प्रचारक होते, त्यांनीं उठून सांगितलें, ''रा. शिंदे ह्यांचा आध्यत्मिक भाव मनांत आणा.  शब्दावर वाद नको.  ब्राह्म समाज सर्वसंग्राहक आहे आणि रा. शिंदे हें त्याचें नमुनेदार उदाहरण आहे.  आतां ते लवकरच ब्रह्मदेशांत बौद्ध धर्म पहावयास जाणार आहेत.  तेथील लोकांना त्यांच्या ब्राह्म धर्माचा उदार भाव पाहून ते ब्राह्म समाज या दोघांना फायदाच होईल.''

ता. ८ फेब्रुवारी रात्रीं रंगूनला पोचलों.  दुसरे दिवशीं बंदरांतून डॉ. पी. के. मुजुमदार, ४७ वा रस्ता, घ.नं. १५२ मध्यें पाहुणा झालों.  न्यूयॉर्क शहराप्रमाणें रंगूनचे रस्ते आंकड्यांवरून उल्लेखिले जातात.  ११ फेब्रुवारीला ब्राह्ममंदिरांत व्याख्यान देऊन ता १२ ला उपासना चालविली.  ता. १९ ला रामानंद चतर्जी व मला रंगून ब्राह्म समाजानें बेंगाल ऍकॅडेमीमध्यें चहापार्टी दिली.  ब्रह्मदेशचे, दक्षिण ब्रह्मदेश व उत्तर ब्रह्मदेश, असे दोन भाग आहेत.  दक्षिण ब्रह्मदेशांत पाश्चात्य सुधारणेचा संस्कार, शिक्षण, व्यापार, राजकारण वगैरे द्वारां अधिक झालेला दिसतो.  उत्तर ब्रह्मदेशांत जुनें वळण फार आहे.  म्हणून मीं प्रथम दक्षिण ब्रह्मदेश फिरून पाहिला.  

उ कोडण्णा  :  ता. २० फेब्रुवारीला रविवारीं सकाळीं रंगूनहून निघून मोलेमनला गेलों.  तेथील मुख्य पॅगोडे पाहून एका वृद्ध फोंजीला (भिक्षूला) भेटून त्याचा मठ पाहिला.  नंतर थाटून ह्या इतिहासप्रसिद्ध गांवीं गेलों.  हें ठिकाण प्राचीन काळीं आंध्र राजाची राजधानी होती.  म्या दबे नांवाचा पगोडा १००० फूट उंच टेकडीवर असलेला चढून पाहिला.  ह्या निर्जन आणि एकान्त स्थळीं माझी ध्यानसाधना फार चांगली झाली.  नेमेंद्र चाँ नांवाच्या विहारांत उ कोडण्णा (कौंडिन्य) नांवाच्या फोंजीला मी भेटलों.  हे पूर्वाश्रमींचे डेप्युटि कलेक्टर होते.  कोणाही प्रापंचिक गृहस्थास कांहीं काल बुद्ध भिक्षूची दिक्षा घेऊन परत गृहस्थाश्रमांत जाण्याला मुभा आहे. ह्या सवलतीला अनुसरून उ कोडण्णा यांनीं विश्रांतीसाठीं आणि अध्ययनासाठीं हा चौथा आश्रम घेतला होता.  कोडण्णा यांच्या भेटीनें शांति व गंभीरपणा ह्याचा परिणाम माझ्या मनावर फार झाला.  त्या विहाराचें वातावरणही आध्यात्मिक भावनांनीं भरलेलें होतें.  इतकें कीं आपणही कांहीं काळ बौद्ध धर्माची उपसंपदा (दीक्षा) घ्यावी असें मला वाटूं लागलें.  पोशाख व राहणी ह्याविषयीं कोडण्णा यांनीं जुने आचार घेतले तरी विचारांत ते अगदीं नवीन होते.  मीं त्यांना विचारलें, 'बुद्धं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि' हीं तीन शरण्यरत्‍नें आहेत खरीं; पण बौद्धालाच तेवढें सरण जाऊन माझा बौद्ध धर्मांत प्रवेश होऊं शकणार नाहीं काय ?  आणि तुम्ही मला दीक्षा देऊं शकाल काय ?''  त्यांनीं स्मितपूर्वक उत्तर केलें, ''तुमचा आध्यात्मिक भाव पाहून मला आनंद होत आहे.  तुम्हांला बाह्य उपसंपदेची जरुरी तरी काय उरली ?  शिवाय दिक्षा देण्यास मला अधिकार नाहीं.  तो अधिकार मठाधिपतीकडे असतो.  मी अद्यापि साधकच आहें.  एकंदरींत तुमच्या भेटीमुळें मला मोठें समाधान झालें.''  

२४ फेब्रुवारीला पेगूला गेलों व कल्याणिसीमा व श्वे थ याँ बुद्ध (उजव्या हातावर मान ठेवून, निजलेला मोठा पुतळा) पाहिला.  ता. २५ सकाळीं पेगूचा मोठा बाजार पाहून सायंकाळीं रंगूनला आलों.  ता. २६ ला रामदासनवमी आली.  सायंकाळीं महाराष्ट्र मित्रमंडळाचे विद्यमानें रा. मयेकर यांचे घरीं 'महाराष्ट्रधर्म' ह्या विषयावर कीर्तन केलें.  मिसेस् पी. के. मुजुमदार यांचेकडे मी पाहुणा होतों.  ह्याच दिवशीं तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथि होती.

२ मार्चला मिसेस् मुजुमदार यांनीं आपले घरीं कांहीं बायकांना बोलावलें होतें.  त्यांच्यापुढें 'महाराष्ट्रांतील बायकांचीं कामें' ह्या विषयावर मीं संभाषण केलें.  ता. ५ मार्च, शनिवारीं नं. ६१ रस्ता लक्ष्मीनारायण धर्मशाळेंत 'बृहद् हिंदुधर्म' आणि 'जनतेचा उद्धार' ह्या विषयावर मी इंग्रजींत भाषण दिलें.  ता. ६ ला महाराष्ट्र मित्रमंडळीच्या वार्षिक सभेमध्यें अध्यक्ष या नात्यानें भाषण केलें.  ता. ७ ला सोमवारीं उत्तर ब्रह्मदेश पाहण्यास मंडालेकडे निघालों.  गाडींत तिसर्‍या वर्गांत इतकी गर्दी होती कीं, एकसारखें १८ तास ताटकळत बसावें लागलें.  ब्रह्मी लोकांचा भोंवतालीं कलकलाट चालू होता.

जिवंत माशांची विक्री  :  ८ मार्चला मंडाले येथें पोंचलों.  रा. दत्तात्रय सखाराम नागवंशे ह्यांनीं माझा उत्तम पाहुणचार ठेवला.  अहमदाबादचे डॉ. पायगुडे नांवाचे मराठे गृहस्थ भेटले.  ता. १० ला मंडाले येथील टेकडीवरील श्वे या दो बुद्धाचा २५ फूट उंचीचा हात वर करून उभा असलेला पुतळा पाहिला.  ता. ११ ला मंडालेंतील प्रमुख देवळांतील महात्म्या मुनीचा (बुद्ध) भव्य पितळी पुतळा पाहिला. ह्या देवळांत नेहमींच भक्तांची गर्दी असते.  बाहेर अगणांत स्वच्छ तळें होतें.  त्यांतून जिवंत मासे धरून कांहीं लोक ते विकावयास ठेवीत.  भाविक लोकांनीं ते मासे विकत घेऊन पुन्हां पाण्यांत सोडले असतां पुण्य लागतें, अशी त्यांची समजूत होती. पुन्हां पुन्हां तेच तेच मासे धरल्यानें ते इतके माणसाळून गेले होते कीं, ते आपोआपच टोपलींत येऊन पडत.

टॉ सिन को :  मृतमांस  :   मंडाले येथील जुन्या राजाचा वाडा आणि ज्या ठिकाणीं लो. टिळकांना ठेवलें होतें तो राजकीय तुरुंगही मीं पाहिला.  मंडालेहून कांहीं अंतरावर पूर्वेकडे मेमियो नांवाचें हवा खाण्याचें ठिकाण आहे.  तें ३४८१ फूट उंचीवर वसलें आहे.  तेथें टॉ सिन को नांवाच्या प्राचीन वास्तुशास्त्रज्ञाकडे मी २० तास पाहुणा होतों.  ते ब्रह्मदेशचे डॉ. भांडारकरच म्हणावयाचे.  त्यांच्याशीं ब्रह्मी पुरातन वास्तुविषयासंबंधीं बराच विचारविनिमय झाला.  माझी फकिरी वृत्ति दिसत असूनही इतकी शोधक बुद्धि पाहून त्यांना आश्चर्य वाटत असल्याचें त्यांनीं बोलून दाखवलें.  हे विद्वान् गृहस्थ अगदीं युरोपियन थाटांत राहात असत.  टेबलावर जेवीत असतां एक चमत्कारिक विषय भाषणांत निघाला.  ब्रह्मी लोक मृत मांस खातात असें मीं ऐकलें होतें.  पण अधिकारयुक्त रीतीनें या गोष्टीचा उलगडा करून देणारा मला अद्याप कोणी भेटला नव्हता.  तो विषय मीं मोठ्या अदबीनें टॉसाहेबांकडे काढला.  ते म्हणाले, ''याचें तुम्हांस आश्चर्य तें कां वाटतें ?  हो, आम्ही मृतमांस खातों.  तुम्हीही मांस खातां ना ?  मग तें जिवंतच असतें काय ?  एखादा प्राणी अपघातानें मेला किंवा अन्य दृष्टीनें त्याचें मांस खाण्यालायक असेल तर तें मांस खाण्यास हरकत कोणती ?  उलटपक्षीं एखादा प्राणी आजारी असला किंवा अन्य तर्‍हेनें त्याच्या अंगांत विष भिनलें असलें तर तो केवळ मारण्यानें शुद्ध होतो काय ?  मेलेला काय किंवा मारलेला काय हा प्रश्न नाहीं.  खातेवेळीं त्याचें मांस शुद्ध असलें म्हणजे पुरें.''

१३ मार्च रविवारीं सकाळीं मंडालेहून दक्षिणेकडे ८ मैलांवर अमरापुरा या गांवीं साँडर्स वीव्हिंग इन्स्टिट्यूटचे प्रि. रा. महादेवराव मांडे यांचेकडे उतरलों.  २४ तास राहिलों.  ता. १४ ते १८ पर्यंत सगाईन टेकडीवरील विहारांत राहिलों.  ता. १८ ला अमरापुरास परत.  दोन दिवस अमरापुरा व मंडाले येथें राहिलों.  श्री. मांडे यांची पत्‍नी मोठी सच्छील व भाविक बाई होती.

महादेवराव मांडे  :   दक्षिण ब्रह्मदेशांत रंगून येथें ब्राह्म समाज व महाराष्ट्र मित्रमंडळी या दोन संस्था असूनही तेथील मंडळींत धर्माविषयीं विशेष कळकळ दिसून आली नाहीं.  ब्राह्म समाजांत डॉ. पी. के. मुजुमदार व 'महाराष्ट्र मित्रमंडळांत' रा. सबनीस एवढेच काय ते कळकळीचे पुरुष दिसले.  पण उत्तरेकडे मंडाले येथें दत्तोपंत सखाराम नागवशे आणि अमरपुरा येथें महादेवराव मांडे आणि त्यांच्या कुटुंबांतील मंडळी ह्यांना जरी ब्राह्म समाजाची फारशी माहिती नव्हती, तरी माझ्या दोनचार दिवसांच्या समागमांत, ब्राह्मसमाजाविषयीं ह्यांना फार आदर उत्पन्न झाला.  रा. मांडे यांच्या इच्छेनें त्यांच्या घरीं ब्रह्मोपासना झाली.  मिसेस् मांडे व त्यांचा मुलगा विद्याधर हीं श्रद्धेनें उपासनेस बसलीं होतीं.  या समयीं मंडालेहून आलेले रा. नागवंशे व रा. भिडे हेही हजर होते.  ह्या उपासनेचा परिणाम सर्वांवर इतका इष्ट घडला कीं, पुढील रविवारीं सगाईहून परत आल्यावर मंडाले येथें रा. मांडे, पायगुडे व नागवंशे ह्या तिघांच्या कुटुंबांतील मंडळींनीं नागवंशे ह्यांच्या बंगल्यावर सर्व दिवस उपासना, चिंतन, भजन, संभाषण व भोजन ह्यांत घालवण्याचें ठरवलें होतें.  ही सर्व मंडळी मूळ महाराष्ट्रांतूनच आलेली म्हणून मला अधिकच आपलेपणा वाटत होता.  नागवंशे यांनीं आपल्या माडीवर उपासनेची सांगितल्याप्रमाणें तयारी ठेवली होती.  सर्व बेत ठरल्याप्रमाणें झाला.  येथें एखादा हिंदी जाणणारा मिशनरी आल्यास ह्या मंडळीची ब्राह्म समाज स्थापण्याची तयारी दिसली.  रा. मांडे यांचेकडे वरचेवर कौटुंबिक उपासना होई.  हे देहु गांवीं राहणारे देशस्थ ब्राह्मण होते.  मला निरोप देतांना त्यांना गहिंवर आला.  त्यांनीं माझ्या जुन्या बहाणा आठवणीदाखल स्वतःला ठेवून घेतल्या आणि बाजारांतून पुष्कळ ब्रह्मी चिजा आणून आठवणीदाखल मला दिल्या.

मनुहा  :  २३ मार्चला सकाळीं मंडाले सोडलें.  ७॥ वाजतां ऐरावती नदीवरून बोटींतून पॅगान ह्या शहराकडे निघालों.  सायंकाळीं मी जाँ ला पोचलों.  वामन पाठक व थत्ते बोटीवर आले.  बर्मा कॉटन कंपनींत हे नोकर होते.  ता. २४ ला तिसरे प्रहरीं पॅगानला पोंचलों.  धक्क्यावर प्रिन्सिपॉल उ सैन हे मला घेण्यास आले होते.  पॅगान येथें लाखेचीं भांडीं व इतर वस्तु तयार करण्याची सरकारी शाळा आहे.  त्याच शाळेचे उ सैन हे प्रिन्सिपॉल होते.  त्यांचेकडे तीन दिवस राहिलों.  पॅगान हें प्राचीन महत्त्वाचें शहर आहे.  त्याच्या आसमंतात् अनेक प्राचीन पॅगोडे आहेत.  ता. २५ ला महाबोधी, अथपिन्या, आनंद हीं देवळें पाहिलीं.  उ शांती मा या फोंजीचें (भिक्षूचें) दर्शन घेतलें.  पॅगानचे दक्षिणेस टाँय वॉ नांवाचें एक चांडालांचें खेडें आहे.  तेथील प्राचीन मनुहा राजाचें देऊळ पाहिलें.  सायंकाळीं अंधारी रात्र झाली तरी दोन मुलें व एक कंदील बरोबर घेऊन रात्रींच पाहिलें.  ह्या देवळांत मनुहा राजा नजरकैदेंत होता.  ह्याच्याच वंशजांस पुढें वंशपरंपरा अस्पृश्य करण्यांत आलें.

थैली  :  २७ मार्च रविवारीं न्याउ गांवास निघालों.  पॅगानच्या उत्तरेस ५ मैलांवर हा गांव आहे.  बरोबर प्रि. उ सैन हेही होते.  जवळच पयाचून नांवाच्या अस्पृश्य मानलेल्या जातीचें खेडें पाहिलें.  मनुहा ह्या तेलंग राजाच्या वंशजाची ही स्थिति ब्रह्मदेशच्या अनवरथ राजानें केलेली मीं प्रत्यक्ष पाहिली.  त्याच्या वंशांतल्या हल्लींच्या पुरुषाचें घर पाहून मला भडभडून आलें.  ता. ३० ला थयोमयो व अलनम्यो ही गांवें पाहिलीं.  अलनम्यो येथें रा. वाय. के.कर्णीक जपान कॉटन कंपनीचे मुख्य कारकून व इस्त्राइल गृहस्थ बेंजामिन नागवेकर हे भेटले.  कुशिनारा पॅगोडांतील गौतम बुद्धाचा शेवटचा आजार.  मृत्यु, स्मशानयात्रा, दहन वगैरेंचे मूर्तिमंत देखावे पाहिले.  ब्रह्मदेशच्या प्रवासांत जेथें जेथें महाराष्ट्रबंधु भेटले तेथें तेथें त्यांनीं माझें फारच सन्मानपूर्वक हार्दिक स्वागत केलें.  ता. ३१ रोजीं प्रोमला पोहोंचलों.  स्वरूपचंद्र गलियाराकडे उतरलों.  त्यांच्या कारकुनानें बाजार दाखवला.  २ एप्रिल रोजीं रंगूनला परत आलों.  ता. ३ ला सायंकाळीं महाराष्ट्र मित्रमंडळानें मला पानसुपारी दिली व अकस्मात् ३५१ रु. ची थैली अर्पण केली.  बॅ. पाटसकर हे अध्यक्ष होते.  मीं ही थैली कोणत्या तरी सार्वजनिक कृत्यास वाहण्याची परवानगी मागितली.  पण हे पैसे माझ्या कुटुंबाच्याच उपयोगासाठीं जमवले असल्यानें तसाच आग्रह पडला.  शेवटीं सेक्रेटरी रा सबनीस यांनीं माझा विश्वास पटेना, म्हणून हे पैसे माझे वडील चिरंजीव प्रतापराव यांच्याकडे पाठवले.

Read more: ब्रह्मदेशाची यात्रा
  1. बिल्लवांची तक्रार
  2. बालपण
  3. बंगलोर शाखा
  4. प्रस्तावना
  • 38
  • 39
  • 40
  • 41
  • 42
  • 43
  • 44
  • 45
  • 46
  • 47
Page 43 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी